Feb 11, 2022

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय १९


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय महाराज असतां शेगांवांत । विप्र एक काशिनाथ । जो खंडेरावाचा होय सुत । गर्दे उपनांव जयाचें ॥१॥ तो आला दर्शना । समर्थांच्या वंदिले चरणां । मूर्ति पाहून त्याच्या मना । आनंद झाला अतिशय ॥२॥ माझें भाग्य धन्य धन्य । म्हणून हें पाहण्या चरण । आलों खामगांवाहून । त्याचें सार्थक झालें कीं ॥३॥ तों समर्थांनीं लीला केली । कोपरखिळी मारिली । काशीनाथाच्या पाठीस भली । आपुल्या परमकृपेनें ॥४॥ जा तुझा हेत पुरला । वाट पाहे तारवाला । या भाषणें घोंटाळला । काशिनाथ मानसीं ॥५॥ त्याचें गूढ कळेना । पुसण्या छाती होईना । निमुटपणें वंदून चरणा । गेला निघून खामगांवीं ॥६॥ तों तारवाला शिपाई । उभा दारांत होता पाही । तार घेतली घाई घाई । कशाची ती बघण्यास ॥७॥ तारेंत हा मजकूर । तुमचा केला तक्‍रुर । मुनसफीच्या हुद्द्यावर । मोर्शी तालुक्याकारणें ॥८॥ तें पाहतां आनंदला । कोपरखिळीचा अर्थ कळला । त्या काशिनाथपंताला । पहा संतांचें ज्ञान कैसें ? ॥९॥ असो एकदां नागपुरीं । समर्थांची गेली स्वारी । गोपाळ बुटीचीया घरीं । त्याच्या अति आग्रहानें ॥१०॥ बुटीचा ऐसा विचार । या सीताबर्डीवर । महाराज ठेवावे निरंतर । जाऊं न द्यावें शेगांवा ॥११॥ शेगांव पडलें भणभणीत । अवघे लोक दुःखित । विनविती हरी पाटलाप्रत । महाराज येथें आणा हो ॥१२॥ तुम्हीं नागपुराप्रती जावें । समर्थांसी घेऊन यावें । आम्हां अवघ्यांस सुखवावें । हीच आहे विनंति ॥१३॥ इकडे बुटीच्या घरांत । आजुर्दे राहिले संत । जेवीं हस्तिनापुरांत । कृष्ण नाहीं आनंदला ॥१४॥ महाराज म्हणती बुटीसी । जाऊं दे मज शेगांवासी । या आपुल्या भव्य सदनासी । ठेवून आम्हां घेऊं नको ॥१५॥ तें बुटी मुळींच मानीना । समर्था जाऊं देईना । अनागोंदीचा रामराणा । बुटी वाटे निःसंशय ॥१६॥ बुटी भाविक होता जरी । अहंता नव्हती गेली खरी । श्रीमंतीचा गर्व भारी । त्याच्या ठाईं वसतसे ॥१७॥ रोज ब्राह्मणभोजन । समर्थांपुढें सदा भजन । परी शेगांवचे येत जन । बंदी त्या तो करीतसे ॥१८॥ शेगांवचे लोक भले । जरी आणावया गेले । परी न कांहीं उपाय चाले । गेले तसेंच आले परत ॥१९॥ इकडे भक्त पाटील हरी । कांहीं मंडळीं बरोबरी । घेऊन निघाला नागपुरीं । समर्थांसी आणावया ॥२०॥ बसला अग्निरथांत । त्याच वेळीं वदले संत । त्या गोपाळ बुटीप्रत । येणें रीति तें ऐका ॥२१॥ अरे गोपाळा ! पाटील हरी । निघाला यावया नागपुरीं । तो येण्याच्या आंत परी । मला येथून जाऊं दे ॥२२॥ तो येथें आल्यावर । शांतता नाहीं राहणार । तो पडला जमेदार । याचा विचार करावा ॥२३॥ हरी पाटील तेथें आला । शिपायानें अटकाव केला । परी तो न त्यानें मानिला । प्रवेश केला सदनांत ॥२४॥ गोपाळ बुटीचिया घरीं । पंगत होती थोर खरी । पाटील आल्याच्या अवसरीं । आले ब्राह्मण भोजना ॥२५॥ असो हरी पाटील सदनांत । आले समर्था नेण्याप्रत । तों महाराज निघाले धांवत । द्वारीं त्यास भेटावया ॥२६॥ चाल हरी शेगांवासी । येथें मुळीं न राहणें मसी । तूं आलास न्यावयासी । हें फार बरें झालें ॥२७॥ समर्थ जाऊं लागले । तें गोपाळाने पाहिलें । अनन्यभावें चरण धरिले । समर्थांचे येऊन ॥२८॥ विक्षेप माझा गुरुराया ! । नका करुं या समया । दोन घांस घेऊनियां । इच्छित स्थला मग जावें ॥२९॥ तैसेंच बुटी पाटलासी । बोलूं लागले विनयेसी । तुम्ही घेऊन प्रसादासी । जावें हेंच मागणें ॥३०॥ येथें न रहाती महाराज । हें समजून आलें आज । पंक्तित माझी राखा लाज । तुम्हीच पाटील येधवां ॥३१॥ आत्तांच समर्थ गेले जरी । लोक उपाशी उठतील तरी । आणि अवघ्या नागपुरीं । टीका माझी होईल पहा ॥३२॥ भोजनें होईपर्यंत । महाराज राहिले तेथ । शेगांवची समस्त । मंडळी पंक्तीस जेवली ॥३३॥ भोजनोत्तर तयारी । निघण्याची ती झाली खरी । दर्शनाची भीड भारी । झाली बुटीच्या वाड्यांत ॥३४॥ कुटुंब गोपाळ बुटीचें । जानकाबाई नांवाचें । परम भाविक होते साचें । गृहलक्ष्मीच होती जी ॥३५॥ तिनें केली विनवणी । महाराजांचे चरणीं । माझा हेतु मनींच्या मनीं । बसूं पहातो गुरुराया ! ॥३६॥ तईं महाराज बोलले । तुझ्या मना मीं जाणीतलें । ऐसें म्हणून लाविलें । कुंकूं तिच्या कपाळास ॥३७॥ आणखी एक पुत्र तुला । परम सद्‌गुणी होईल भला । अंती जाशील वैकुंठाला । सौभाग्यासह बाळे तूं ॥३८॥ ऐसा आशीर्वाद देऊन । निघते झाले दयाघन । त्या सीताबर्डीहून । आले रघूजीच्या घरीं ॥३९॥ हा भोसला राजा रघूजी । उदार मनाचा भक्त गाजी । ज्यानें ठेविला राम राजी । आपुल्या शुद्ध वर्तनें ॥४०॥ त्याचें लौकीकीं राज्य गेलें । जें अशाश्वत होतें भलें । शाश्वत स्वरुपाचें आलें । सद्‌गुरुभक्तीचें राज्य घरा ॥४१॥ उत्तम प्रकारचा आदर । केला राजानें साचार । त्याचा घेऊन पाहुणचार । रामटेकासी गेले पुढें ॥४२॥ तेथें रामाचें दर्शन । घेऊन आले परतून । शेगांवच्या मठा जाण । हरी पाटलासमवेत ॥४३॥ धार-कल्याणचे रंगनाथ । जे थोर साधु मोंगलाईंत । होते ते भेटण्याप्रत । समर्था आले शेगांवीं ॥४४॥ अध्यात्माचीं बोलणीं । सांकेतिक केलीं दोघांनीं । त्याचा भावार्थ जाणण्या कोणी । तेथें नव्हता समर्थ ॥४५॥ श्रीवासुदेवानंदसरस्वती । कर्ममार्गीं ज्याची प्रीति । कृष्णातटाका ज्यांची महती । माणगांवीं जन्म ज्यांचा ॥४६॥ ते येण्याचे अगोदर । बाळाभाऊस साचार । बोलते झाले गुरुवर । स्वामी गजानन सिद्धयोगी ॥४७॥ अरे बाळा उदयिक । माझा बंधु येतो एक । मजलागीं भेटण्या देख । त्याचा आदर करावा ॥४८॥ तो आहे कर्मठ भारी । म्हणून उद्यां पथांतरीं । चिंध्या न पडूं द्या निर्धारी । अंगण स्वच्छ ठेवा रे ॥४९॥ ऐसें बाळास आदलें दिवशीं । सांगते झाले पुण्यराशी । तों एक प्रहर दिवसासी । स्वामी पातले ते ठायां ॥५०॥ एकमेकांसी पाहतां । दोघे हंसले तत्त्वतां । हर्ष उभयतांच्या चित्ता । झाला होता अनिवार ॥५१॥ स्वामी जेव्हां मठांत आले । तेव्हां गजानन होते बैसले । आपल्या पलंगावरी भले । चिटक्या करानें वाजवीत ॥५२॥ स्वामी येतां चिटकी थांबली । दृष्टादृष्ट दोघां झाली । तैं स्वामींनीं विचारिली । आज्ञा परत जावया ॥५३॥ फार बरें म्हणून । गजाननें तुकविली मान । स्वामी गेले निघून । बाळास कौतुक वाटलें ॥५४॥ बाळा म्हणे गुरुराया । हें दृश्य पाहूनियां । संशय उपजला चित्ता ठायां । त्याची निवृत्ति करा हो ॥५५॥ त्यांचा मार्ग अगदीं भिन्न । तुमच्या ह्या मार्गाहून । ऐसें साच असून । तुमचा बंधु कसा तो ? ॥५६॥ ऐसा प्रश्न ऐकिला । समर्थ देती उत्तर त्याला । बरवा प्रश्न बाळा केला । त्वां हा आज आम्हांतें ॥५७॥ ईश्वराकडे जाण्याचे । तीन मार्ग असती साचे । हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे । गांवा जाऊन मिळतात ॥५८॥ स्वरुपें त्यांचीं भिन्न भिन्न । दिसतीं पाहणारांकारण । तेणें घोटाळा वरितें मन । पाहाणारांचें राजसा ! ॥५९॥ सोंवळें ओंवळें संध्यास्नान । व्रत उपोषणें अनुष्ठान । या कृत्यांलागून । अंगें म्हणावीं कर्माचीं ॥६०॥ हीं अंगें जो आचरी । निरालसपणें खरीं । तोच समजावा भूवरी । ब्रह्मवेत्ता कर्मठ ॥६१॥ अधिक न्यून येथें होतां । कर्ममार्ग न ये हातां । म्हणून विशेष तत्परता । ठेविली पाहिजे आचरणीं ॥६२॥ आतां भक्तिमार्गाचें । ऐक हें लक्षण साचें । भक्तिपंथानें जाणाराचें । मन पाहिजे शुद्ध अती ॥६३॥ मलीनता मनाठायीं । अंशेंही राहिल्या पाही । त्याच्या हातां येत नाहीं । भक्तिरहस्य बापा रे ! ॥६४॥ दया प्रेम लीनता । अंगीं पाहिजे तत्त्वतां । श्रवणीं पूजनीं आस्था । पाहिजे त्याची विशेष ॥६५॥ मुखामाजीं नामस्मरण । करणें हरीस जाणून । ऐशीं अंगें असतीं जाण । या भक्तिमार्गाला ॥६६॥ या अंगासह जो भक्ती करी । त्यालाच भेटे श्रीहरी । भक्तिमार्गाची न ये सरी । त्याचा विधी सोपा असे ॥६७॥ परी तो करण्या आचरण । कर्माहून कठीण जाण । जेवीं गगनाचें जवळपण । नेत्रालागीं दिसतसे ॥६८॥ आतां योगमार्ग तिसरा । सांगतों मी ऐक खरा । या योगमार्गाचा पसारा । दोघांपेक्षां जास्त असे ॥६९॥ परी हा पसारा निश्चयेंसी । आहे ज्याचा त्याचे पासीं । योगमार्ग साधण्यासी । बाहेरचें न कांहीं लागे ॥७०॥ जेवढें आहे ब्रह्मांडांत । तेवढें आहे पिंडांत । त्या पिंडांतील साहित्य । घेऊन योग साधावा ॥७१॥ आसनें रेचक कुंभक । इडापिंगलेचे भेद देख । धौती मुद्रा त्राटक । कळलें पाहिजे मानवां ॥७२॥ कुंडली आणि सुषुम्ना । यांचें ज्ञान पाहिजे जाणा । आधी योग करणारांना । तरीच तो साधेल ॥७३॥ या तिन्ही मार्गांचें । अंतिम फळ ज्ञान साचें । परी तें ज्ञान प्रेमाचें । वीण असतां कामा नये ॥७४॥ मुक्कामास गेल्यावर । मार्गांचा न उरें विचार । जो मार्गी चालतो नर । महत्त्व त्याचें त्यास वाटे ॥७५॥ या तिन्ही मार्गांचे ते पांथ । मुक्कामीं पोंचल्या होती संत । मग तयांच्या संबंधांत । द्वैत नसे एतुलेंही ॥७६॥ वसिष्ठ, वामदेव, जमदग्नी । अत्री, पाराशर, शांडिल्य मुनी । हे कर्ममार्गाच्या सेवनीं । मुक्कामासी पोंचले ॥७७॥ व्यास, नारद, कयाधू-कुमर । मारुती, शबरी, अक्रूर । उद्धव, सुदामा, पार्थ, विदूर । हे गेले भक्तिमार्गें ॥७८॥ श्रीशंकराचार्य गुरुवर । मच्छिंद्र, गोरख, जालंदर । हे चढले जिना थोर । या योगमार्गाचा ॥७९॥ जो वसिष्ठा लाभ झाला । तोच विदुराच्या पदरीं पडला । तोच मच्छिंद्रानें भोगिला । फळामाजीं फरक नसे ॥८०॥ आम्ही हीं भावंडें सारीं । येतें झालों भूमीवरी । कैवल्याच्या मार्गावरी । भाविक आणून सोडावया ॥८१॥ जें ज्याला आवडेल । तिकडे तो जाईल । आणि मोक्षरुपी भोगील फल । त्या त्या पंथा आचरोनी ॥८२॥ आतां नको पुसूंस कांहीं । हें न कोणा सांगे पाही । निवांत बसूं दे ये ठायीं । पिसेंपणाच्या पासोडीनें ॥८३॥ ज्याची निष्ठा बसेल । वा, जो माझा असेल । त्याचेंच कार्य होईल । इतरांची ना जरुर मला ॥८४॥ ऐसा उपदेश ऐकिला । बाळाभाऊच्या नेत्रांला । प्रेमाश्रूंचा लोटला । पूर तो न आवरे त्या ॥८५॥ मौनेंच केला नमस्कार । श्रीगजानन साधु थोर । वर्‍हाड प्रांताचा उद्धार । करावयासी अवतरला ॥८६॥ साळुबाई नांवाची । एक असे कण्व शाखेची । ती होती महाराजांची । मनापासून भक्तिण ॥८७॥ तिला महाराज एके दिनीं । ऐशा परी वदले वाणी । डाळ पीठ घेऊनी । स्वयंपाक करी अहोरात्र ॥८८॥ जे येतील तयांना । साळु घाल भोजना । येणेंच तूं नारायणा । प्रिय होशील निःसंशय ॥८९॥ प्रल्हादबुवा जोशाला । होता कृपेचा योग आला । तो न तया फलद झाला । तयाचिया दुर्दैवें ॥९०॥ खामगांवच्या सान्निध्यासी । जलंब गांव परियेसीं । त्या गांवचा रहिवासी । तुळसीराम एक असे ॥९१॥ पुत्र हा तुळसीरामाचा । आत्माराम नांवाचा । होता तैलबुद्धीचा । वेदाध्ययनीं प्रेम ज्याचें ॥९२॥ हा धर्मपीठ वाराणसी । जी भागीरथीच्या तटा काशी । तेथें गेला अध्ययनासी । वेदवेदांग स्मृतीच्या ॥९३॥ प्रत्यहीं भागीरथीचें स्नान । माधुकरीचें सेवी अन्न । गुरुगृहातें जाऊन । करी अध्ययन श्रुतीचें ॥९४॥ स्वदेशीं येतां शेगांवासी । गेला असे अति हर्षी । हजिरी ती द्यावयासी । श्रीगजाननमहाराजा ॥९५॥ तो वेदविद्येचा जाणता । गजानन केवळ ज्ञानसविता । आत्माराम वेद म्हणतां । कोठें कोठें चुकतसे ॥९६॥ त्या चुकीची दुरुस्ती । करुं लागले सदगुरुमूर्ती । आत्मारामाचे संगतीं । वेद म्हणती महाराज ॥९७॥ ऐकतां त्यांचें वेदाध्ययन । तन्मय होती विद्वान । शेवटीं समर्थांचे सेवेकारण । आत्माराम राहिला आदरेंसी ॥९८॥ प्रत्यहीं सेवेकारण । यावें त्यानें जलंबाहून । चुकविला ना एकही दिन । ऐसा एकनिष्ठ भक्त तो ॥९९॥ समर्थांच्या पश्चात । हाच होता मठांत । पूजा अर्चा करण्याप्रत । सद्‌गुरुंच्या समाधीची ॥१००॥ मोबदला न घेतां भली । एकनिष्ठ सेवा केली । शेवटीं त्यानेंच अर्पिली । इस्टेट आपली महाराजा ॥१०१॥ इस्टेट अल्प साचार । एक जमीन एक घर । येथें न दृष्टि किंमतीवर । देणें आहे भाग पहा ॥१०२॥ स्वामी दत्तात्रय केदार । दुसरा नारायण जामकर । निवळ दुधाचा ज्यांचा आहार । तो दुधाहारी बुवा ॥१०३॥ ऐसे श्रोते तिघेजण । स्वामीचे भक्त निर्वाण । ज्यांनीं आपुलें तनमन । समर्थचरणीं अर्पिलें ॥१०४॥ मोरगांव भाकरे नांवाचा । गांव बाळापूर तालुक्याचा । तेथील मारुतीपंत पटवार्‍याचा । वृत्तान्त ऐका थोडासा ॥१०५॥ श्रोते ! त्या मोरगांवांत । मारुतीपंताच्या शेतांत । पिकाचें रक्षण करण्याप्रत । तिमाजी नामें माळी होता ॥१०६॥ तो माळी खळ्याभीतरीं । निजला निशीच्या अवसरीं । गाढ झोंप लागली खरी । ते अवसरीं तयाला ॥१०७॥ उलटून गेले दोन प्रहर । कुंभाराचे दहावीस खर । खळ्यांत येऊनी दाण्यावर । पडले असती पांड्याच्या ॥१०८॥ हा पांड्या मारुतीपंत । महाराजांचा होता भक्त । म्हणून सद्‌गुरुरायाप्रत । लीला करणें भाग आलें ॥१०९॥ क्षणांत जाऊनी मोरगांवासी । हांक मारिली तिमाजीसी । अरे ! जागा होई त्वरेंसी । रासेसी गाढवें पडलीं ना ॥११०॥ ऐसें मोठयानें बोलून । तिमाजीस जागे करुन । महाराज पावले अंतर्धान । खळ्यामधून तेधवां ॥१११॥ तिमाजी उठून पाहतां । गाढवें दिसलीं तत्त्वतां । म्हणे काय करुं आतां । मालक रागे भरेल कीं ॥११२॥ तो विश्वासला माझ्यावर । मी निजता झालों निसूर । रास ही निम्यावर । खाऊन टाकली गाढवांनीं ॥११३॥ कांहीं असो चुकीची । माफी मागितली पाहिजे साची । उदार बुद्धि मारुतीची । आहे तो क्षमाच करील ॥११४॥ ऐसें मनाशीं बोलून । उदयास येतां नारायण । तिमाजी गांवांत येऊन । पाय धरी पंताचे ॥११५॥ गाढवांनी रास खाल्ली । नुकसानी पाहिजे पाहिली । खळ्यामाजीं जाऊनि भली । म्हणजे मज वाटेल बरें ॥११६॥ मारुती म्हणाले त्यावर । खळ्यांत यावया साचार । वेळ ना मला तिळभर । मी निघालों शेगांवा ॥११७॥ दर्शन घेऊन सद्‌गुरुचें । त्या गजानन महाराजांचें । उद्यां सकाळीं धान्याचें । काय झालें तें पाहीन ॥११८॥ ऐसें बोलून शेगांवाला । मारुतीपंत येतां झाला । दर्शनासाठीं मठांत गेला । दहा अकराचे सुमारास ॥११९॥ मारुतीनें दर्शन । घेतां केलें हास्यवदन । तुझ्यासाठीं मजकारण । त्रास झाला रात्रीसी ॥१२०॥ तुम्ही माझे भक्त होतां । मला राखण्या लावितां । झोपाळू नोकर ठेवितां । आणि आपण निजतां खुशाल घरीं ॥१२१॥ ऐसी खूण पटतांक्षणीं । मारुतीनें जोडून पाणि । मस्तक ठेवूनियां चरणीं । ऐसें वचन बोलला ॥१२२॥ ब्रह्मांडाचें संरक्षण । आपण करितां येथून । लेंकरासाठीं त्रास पूर्ण । माता सोसी वरच्यावरी ॥१२३॥ मी लेंकरुं आपुलें । म्हणूनियां आपण केलें । खळ्यांत तें जाऊन भलें । मोरगांवीं संरक्षण ॥१२४॥ ऐसीच कृपा निरंतर । स्वामी असावी माझ्यावर । आतांच जाऊन करितों दूर । नोकरीवरुन तिमाजीला ॥१२५॥ ऐसें बोलतां मारुती । कौतुक वाटलें समर्थांप्रती । आणि भाषण केलें येणें रीतीं । तें आतां अवधारा ॥१२६॥ छे ! छे ! वेड्या ! तिमाजीस । नको मुळींच काढूंस । नोकरीवरुन खास । तिमाजी नोकर इमानी ॥१२७॥ ऐसें गुरुवचन ऐकिलें । मारुतीसी चोज जहालें । पहा संतांचें कर्तृत्व भलें । कैसें आहे अगाध ॥१२८॥ शके अठराशें सोळासी । महाराज बाळापुरासी । असतां गोष्ट झाली ऐसी । ती थोडकी सांगतों ॥१२९॥ तेथें सुखलाल बन्सीलालाची । एक बैठक होती साची । त्या बैठकीसमोर महाराजांची । स्वारी बैसली आनंदांत ॥१३०॥ मूर्ति अवघी दिगंबर । वस्त्र नव्हतें तिळभर । त्या पाहून भाविक नर । नमन करुन जात होते ॥१३१॥ तो होता हमरस्ता । बाजारपेठेचा तत्त्वतां । त्या पंथानें जात होता । एक पोलिस हवालदार ॥१३२॥ नांव त्या हवालदाराचें । नारायण आसराजी होतें साचें । समर्था पाहून डोकें त्याचें । फिरुन गेलें तात्काळ ॥१३३॥ तो म्हणे हा नंगा धोत । मुद्दाम बसला पंथांत । साधू ना हा भोंदू सत्य । त्याची उपेक्षा न करणें बरी ॥१३४॥ ऐसें बोलून जवळीं गेला । अद्वातद्वां बोलूं लागला । लाज कैसी नाहीं तुजला । नंगा बसतोस रस्त्यावरी ॥१३५॥ हे घे त्याचें प्रायश्चित्त । तुला मी देतों आज येथ । ऐसें बोलून स्वामीप्रत । मारुं लागला छडीनें ॥१३६॥ वळ पाठपोटावरी । उठते झाले निर्धारी । परी ना हवालदार आवरी । मारता हात आपुला ॥१३७॥ ऐसें तेधवां पाहून । एक गृहस्थ आला धांवून । आपुल्या दुकानामधून । हुंडीवाला नाम ज्याचें ॥१३८॥ तो म्हणे हे हवालदार । तूं विचार कांहीं कर । उगेंच सत्पुरुषावर । हात टाकणें बरें नव्हे ॥१३९॥ कां कीं, संतांचा कैवारी । एक आहे श्रीहरी । वळ त्यांच्या पाठीवरी । उठले ते कां न दिसले तुला ? ॥१४०॥ हें तूं आज केलें । हें न कांहीं बरें झालें । अजून तरी उघडी डोळें । माफी माग गुन्ह्याची ॥ १४१॥ हवालदार म्हणे माफीचें । कारण मसीं न मागण्याचें । कावळ्याचे शापें साचें । काय ढोरें मरतील ! ॥ १४२॥ तेंच पुढें सत्य झालें । हवालदार पंचत्व पावले । त्या बाळापूर नगरींत भले । आपण केलेल्या कृत्यानें ॥ १४३॥ एका पंधरवड्यांत । हवालदाराचे अवघे आप्त । होते झाले भस्मीभूत । एका साधूस मारल्यानें ॥१४४॥ नगर जिल्ह्यांत संगमनेर । प्रवरा नदीचे कांठावर । तेथें हरी जाखडी असे विप्र । ऐका त्याचा वृत्तान्त हा ॥१४५॥ हा हरी जाखडी माध्यंदिन । होता यजुर्वेदी ब्राह्मण । गांवोगांव फिरुन । पोट आपुलें भरीतसे ॥१४६॥ तो फिरत फिरत शेगांवासी । आला समर्थ दर्शनासी । बसतां झाला पायांपासीं । श्रीगजानन स्वामींच्या ॥१४७॥ तईं हरी म्हणे चित्तासी । हा केवढा ज्ञानरासी । येऊनियां पायांपासीं । विन्मुख जाणें भाग मला ॥१४८॥ संग्रहासी नाहीं धन । शेतवाडा मळा जाण । मी ना मुळींच विद्वान । मला कन्या कोण देईल ? ॥१४९॥ हे स्वामी गजानना । सच्चिदानंदा दयाघना ! । संसारसुखाची वासना । जहालीं मनीं बलवत्तर ॥१५०॥ ऐसें जो इच्छी मनांत । तोंच त्याच्या अंगावर्त । थुंकते झाले सद्‌गुरुनाथ । इच्छेस त्याच्या जाणूनी ॥१५१॥ पहा जगाची रीत कैसी । अवघेच इच्छिती संसारासी । सच्चिदानंद श्रीहरीसी । पहाण्या न कोणी तयार ॥१५२॥ ऐसें आपणासी बोललें । पुन्हां जाखड्यासी पाहिलें । जें जें तूं इच्छिलें । सांप्रतकालीं मनांत ॥१५३॥ तें तें अवघें होईल पूर्ण । पुत्रपौत्र तुजलागून । होतील संग्रहासी धन । तेंही थोडकें राहील ॥१५४॥ जा आतां परत घरा । सुखें करी संसारा । करीत असावा परमेश्वरा । आठव वेड्या ! विसरुं नको ॥१५५॥ ऐसें तयासी बोलून । प्रसाद म्हणून थोडकें धन । दिलें हरी जाखड्याकारण । लग्न स्वतःचें करावया ॥१५६॥ हरी जाखड्या संगमनेरीं । सुखी जहाला संसारीं । महाराजाची वाणी खरी । ती कोठून खोटी होईल ॥१५७॥ ऐसाच एक निमोणकर । गोविंदाचा कुमार । रामचंद्र नामें साचार । ओव्हरसिअरच्या हुद्यावरी ॥१५८॥ असो एक्या पर्वणीसी । निमोणकर गेले कपिलधारा तीर्थासी । योगाभ्यास थोडा यासी । येत होता विबुध हो ॥१५९॥ तो पूर्ण व्हावा म्हणून । इच्छित होतें त्याचें मन । गोसावी बैराग्यालागून । पुसूं लागला तेथल्या ॥१६०॥ नाहीं नाहीं माहीत मात । ऐकूं येई सर्वत्र । तेणें निमोणकर चित्तांत । हताश पूर्ण जहाला ॥१६१॥ काय करुं देवा आतां । मला योगाभ्यास शिकवितां । कोठें भेटेल तत्त्वतां । ती कृपा करुन सांगणें ॥१६२॥ तो कपीलधारेवरी । एक पुरुष देखिला अधिकारी । ज्याचे हात गुडघ्यावरी । येऊन सहज लागले ॥१६३॥ उंच बांधा मुद्रा शांत । बैसला होता ध्यानस्थ । त्यास घातले दंडवत । निमोणकरानें अष्टांगेंसी ॥१६४॥ बराच वेळ झाला जरी । योगी न कांहीं बोले परी । अस्तमानाची वेळ खरी । समीप येऊं लागली हो ॥१६५॥ तैं निमोणकर म्हणे समर्था ! । अंत माझा किती पहातां । ठाऊक असल्या योगगाथा । मशीं कांहीं शिकवा हो ॥१६६॥ तो अखेर अस्तमानीं । बोलते झाले कैवल्यदानी । हा चित्रपट घेऊनी । जा आपुलें काम करी ॥१६७॥ षोडशाक्षरी त्यावर । मंत्र लिहिला आहे थोर । त्याचा वाणीनें निरंतर । जप आपुला करावा ॥१६८॥ मंत्रप्रभावें थोडा बहुत । योग येईल तुजप्रत । योगमार्ग हा अत्यंत । कठीण सर्व योगामध्यें ॥१६९॥ नेटाचा केला यत्‍न । ब्रह्मचर्य संभाळून । येतील दहापांच आसन । धौती नौती केल्यावरी ॥१७०॥ जा पुढें न विचारी मला । हा घे देतों प्रसाद तुला । ऐसें बोलून उचलिला । एक तांबडा खडा करें ॥१७१॥ तो देऊनियां मजसी । गुप्त झालें पुण्यरासी । तेंच पुढें नाशिकासी । गंगेवरी भेटले त्या ॥१७२॥ महाराज माझा कंटाळा । कांहो ! आपणच कां केला ? । आपुल्या नांव गांवाला । न सांगतांच गेला कीं ॥१७३॥ महाराज डोळे वटारुन । बोलते झाले त्याकारण । तांबडा खडा देऊन । नांव माझें कथिलें म्या ॥१७४॥ नर्मदेचा गणपती । तांबडा असतो निश्चिती । तूं मूळचाच मूढमती । रहस्य त्याचें न जाणिलें ॥१७५॥ म्हणून त्याचें गूढ तुला । पडतें झालें जाण मुला ! । मी रहातों शेगांवाला । गजानन हें नांव माझें ॥१७६॥ धुमाळ सदनापर्यंत । चाल माझ्या समवेत । ऐसें बोलूनी झाले गुप्त । चहूंकडे पाहूं लागले निमोणकर ॥१७७॥ कंटाळून अखेरी । धुमाळाच्या आले घरीं । तों गजानन महाराज ओसरीवरी । बसले ऐसें पाहिले ॥१७८॥ मौनेंच करुन वंदन । कथिलें धुमाळाकारण । कपीलधारेपासून । जें कां झालें इथवरी ॥१७९॥ तें ऐकून धुमाळाला । अतिशय आनंद जहाला । तो म्हणे योगीराजाला । वाण कशाची सांग मज ॥१८०॥ जो तांबडा खडा तुसी । दिला तो ठेवून पाटासी । करणें पूजा अर्चेसी । सद्भावें निरंतर ॥१८१॥ योगाभ्यास ही समोरी । त्या खड्याच्या आदरें करी । त्याच्या कृपेनें कांहीं तरी । योगाभ्यास येईल ॥१८२॥ तेंच पुढें झालें सत्य । योगाभ्यास थोडाबहुत । आला निमोणकराप्रत । श्रीगजाननकृपेनें ॥१८३॥ एक शेगांवचा रहिवासी । तुकाराम कोकाटे परियेसी । त्याची संतति यमसदनासी । जाऊं लागली उपजतांच ॥१८४॥ म्हणून त्यानें समर्थांला । एकदां नवस ऐसा केला । जरी देशील संततीला । दीर्घायुषी गुरुराया ॥१८५॥ तरी एक मुलगा त्यांतून । तुसी करीन अर्पण । मनोरथ त्याचें पूर्ण । केले श्रीगजाननस्वामींनें ॥१८६॥ दोन तीन मुलें झालीं । परी नवसाची न राहिली । आठवण तुकारामा भली । संततीच्या मोहानें ॥१८७॥ तो थोरला मुलगा नारायण । रोग झाला त्याकारण । औषधोपचार केलें जाण । परी न आला गुण कांहीं ॥१८८॥ नाडी बंद होऊं लागली । नेत्रांची ती दृष्टि थिजली । धुगधुगी मात्र उरली । होती त्याच्या छातीला ॥१८९॥ ती स्थिती पाहून । तुकारामा झाली आठवण । नवस केल्याची ती जाण । एकदम त्या समयाला ॥१९०॥ तुकाराम म्हणे गुरुराया । हा पुत्र माझा वांचलिया । अर्पण करीन सदया । सेवा तुमची करण्यास ॥१९१॥ ऐसा वचनबद्ध होतां क्षणीं । नाडी आली ठिकाणीं । हळुहळुं नेत्र उघडोनी । पाहूं लागला बाल तो ॥१९२॥ व्याधि बरी झाल्यावर । तो नारायण नामे कुमार । आणून सोडला मठावर । नवस आपला फेडावया ॥१९३॥ तो नारायण अजूनी । आहे तया ठिकाणीं । बोलिलेला नवस कोणी । महाराजांचा चुकवूं नये ॥१९४॥ असो पुढें आषाढमासीं । महाराज गेले पंढरीसी । घेऊन हरी पाटलासी । विठ्ठलासी भेटावया ॥१९५॥ जो जगदाधार जगत्पति । वेद ज्याचे गुण गाती । जो संतांच्या वसे चित्तीं । रुक्मिणीपती दयाघन ॥१९६॥ पंढरीस आले गजानन । चंद्रभागेचें केलें स्नान । गेलें घ्याया दर्शन । पांडुरंगाचें राऊळीं ॥१९७॥ हे देवा पंढरीनाथा । हे अचिंत्या अद्वया समर्था । हे भक्तपरेशा रुक्मिणीकांता । ऐक माझी विनवणी ॥१९८॥ तुझ्या आज्ञेनें आजवर । भ्रमण केलें भूमिवर । जे जे भाविक होते नर । त्यांचे मनोरथ पूर्ण केले ॥१९९॥ आतां अवतारकार्य संपलें । हें तूं जाणसी वहिले । पुंडलीक वरदा विठ्ठले । जाया आज्ञा असावी ॥२००॥ देवा ! मी भाद्रपदमासीं । जावया इच्छितों वैकुंठासी । अक्षय्यीचे रहावयासी । तुझ्या चरणांसन्निध ॥२०१॥ ऐसी करुन विनवणी । समर्थांनीं जोडिले पाणि । अश्रु आले लोचनीं । विरह हरीचा साहवेना ॥२०२॥ हरी पाटील जोडून हातां । पुसूं लागला पुण्यवंता । अश्रु कां हो सद्‌गुरुनाथा । आणिले लोचनीं ये वेळां ? ॥२०३॥ महाराज म्हणाले त्यावर । हरी पाटलाचा धरुन कर । सांगितले तरी न कळणार । त्याचें वर्म बापा तुला ॥२०४॥ तो विषय खोल भारी । तूं न पडावें त्या भीतरीं । इतकेंच सांगतों श्रवण करी । संगत माझी थोडी असे ॥२०५॥ चाल आतां शेगांवाला । तूं आपल्या ठिकाणाला । तुमच्या पाटील वंशाला । कांहीं न कमी पडेल ॥२०६॥ पंढरीचें मावंदें केलें । शेगांवामाजी भलें । चित्त चिंतेनें व्याप्त झालें । मात्र हरी पाटलाचें ॥२०७॥ पुढें श्रावणमास गेला । क्षीणता आली तनूला । पुढें भाद्रपदमास आला । काय झालें तें ऐका ॥२०८॥ गणेश चतुर्थीचे दिवशीं । महाराज म्हणाले अवघ्यांसी । आतां गणपती बोळवण्यासी । यावें तुम्हीं मठांत ॥२०९॥ कथा गणेशपुराणांत । ऐशापरी आहे ग्रंथित । चतुर्थीच्या निमित्त । पार्थिव गणपती करावा ॥२१०॥ त्याची पूजा अर्चा करुन । नैवेद्य करावा समर्पण । दुसरे दिवशीं विसर्जून । बोळवावा जलामध्यें ॥२११॥ तो दिवस आज आला । तो साजरा पाहिजे केला । या पार्थिव देहाला । तुम्ही बोळवा आनंदें ॥२१२॥ दुःख न करावें यत्किंचित । आम्हीं आहों येथें स्थित । तुम्हां सांभाळण्याप्रती सत्य । तुमचा विसर पडणें नसे ॥२१३॥ हें शरीर वस्त्रापरी । बदलणें आहे निर्धारी । ऐसें गीताशास्त्रांतरीं । भगवान् वदला अर्जुना ॥२१४॥ जे जे ब्रह्मवेत्ते झाले । त्यांनीं त्यांनीं ऐसेंच केले । शरीरवस्त्रांसी बदलिलें । हें कांहीं विसरुं नका ॥२१५॥ चतुर्थीचा अवघा दिवस । आनंदामाजीं काढिला खास । बाळाभाऊच्या धरिलें करास । आसनीं आपल्या बसविलें ॥२१६॥ मी गेलों ऐसें मानूं नका । भक्तींत अंतर करुं नका । कदा मजलागीं विसरुं नका । मी आहे येथेंच ॥२१७॥ ऐसें भाषण करुन । योगें रोधिला असे प्राण । दिला मस्तकी ठेवून । त्या महात्म्या पुरुषानें ॥२१८॥ शके अठराशें बत्तीस । साधारणनाम संवत्सरास । भाद्रपद शुद्ध पंचमीस । गुरुवारी प्रहर दिवसाला ॥२१९॥ प्राण रोधितां शब्द केला । ’जय गजानन’ ऐसा भला । सच्चिदानंदीं लीन झाला । शेगांवामाझारीं ॥२२०॥ देहाचें तें चलनवलन । पार गेलें मावळोन । स्वामी समाधिस्थ पाहून । लोक हळूहळूं लागले ॥२२१॥ पुकार झाली गांवांत । स्वामी झाले समाधिस्थ । ऐसी ऐकतां मात । हृदय पिटती नारीनर ॥२२२॥ गेला गेला साक्षात्कारी । चालता बोलता श्रीहरी । गेला गेला कैवारी । आज दीनजनांचा ॥२२३॥ अहो गजाननस्वामी समर्था ! । आतां आम्हांस कोण त्राता ? । कां रे इतक्यांत पुण्यवंता । गेलास आम्हां सोडून ? ॥२२४॥ मार्तंड पाटील, हरी पाटील । विष्णुसा, बंकटलाल । ताराचंद प्रेमळ । भक्त स्वामींचा जो असे ॥२२५॥ श्रीपतराव कुळकर्णी । मठामाजीं जमले जाणी । विचार केला अवघ्यांनीं । ऐशा रीतिं श्रोते हो ॥२२६॥ आज आहे पंचमीचा दिवस । समाधि न द्या स्वामीस । हाळोपाळीच्या लोकांस । येऊं द्या हो दर्शना ॥२२७॥ ज्यांच्या नशिबीं असेल । तयांना दर्शन घडेल । नका करुं आतां वेळ । जासूद धाडा चोहींकडे ॥२२८॥ गोविंदशास्त्री डोणगांवचे । एक विद्वान् होते साचे । ते बोलिले आपुल्या वाचें । सर्व लोकांस येणें रीतिं ॥२२९॥ त्यांच्या आवडत्या भक्तांसी । ते दर्शन देतील निश्चयेंसी । तोंपर्यंत प्राणासी । मस्तकीं धारण करतील ॥२३०॥ त्याची प्रचीति पहावया । नको कोठें लांब जाया । पहा लोणी ठेवूनियां । येधवां मस्तकीं स्वामींच्या ॥२३१॥ लोणी ठेवितां शिरावरी । तें पघळूं लागलें निर्धारीं । जो तो त्याचें कौतुक करी । बल हें योगशास्त्राचें ॥२३२॥ तो प्रकार पहातां । गोविंदशास्त्री झाला बोलतां । एक दिवसाची काय कथा । हे राहतील वर्षभर ॥२३३॥ निःसंशय ऐशा स्थितींत । परी हें करणें अनुचित । आवडते अवघे आलिया भक्त । समाधि द्या स्वामीला ॥२३४॥ तें अवघ्यांस मानवलें । स्वामींपुढें आदरें भलें । भजन त्यांनीं मांडिलें । हजार टाळ जमला हो ॥२३५॥ दूरदूरच्या भक्तांप्रत । स्वामी जाऊन स्वप्नांत । आपुल्या समाधीची मात । कळविते झाले विबुध हो ॥२३६॥ तया ऋषिपंचमीला । अपार मेळा मिळाला । लोकांचा तो शेगांवाला । घ्याया दर्शन स्वामींचें ॥२३७॥ रथ केला तयार । दिंड्या आल्या अपार । सडे घातले रस्त्यावर । गोमयाचे बायांनी ॥२३८॥ मूर्ति ठेविली रथांत । मिरवणूक निघाली आनंदात । रात्रभरी शेगांवांत । तो ना थाट वर्णवे ॥२३९॥ तुळशी बुक्का गुलाल फुले । भक्त उधळूं लागले । फुलांखाली झाकून गेले । श्रीगजानन महाराज ॥२४०॥ बर्फी पेढ्यांस नाहीं मिती । लोक वांटिती खिरापती । कित्येकांनी रथावरती । रूपये पैसे उधळीले ॥२४१॥ ऐशी मिरवणूक रात्रभर । शेगांवी निघून अखेर । उदयास येता दिनकर । परत आली मठांत ॥२४२॥ समाधीच्या जागेवरी । मूर्ति नेऊन ठेविली खरी । रूद्राभिषेक केला वरी । अखेरचा देहाला ॥२४३॥ पूजा केली पंचोपचार । आरती उजळली अखेर । भक्तांनी केला नामगजर । गजाननाचे नांवाचा ॥२४४॥ जय जय अवलिया गजानना ! । हे नरदेहधारी नारायणा ! । अविनाशरूपा आनंदघना ! । परात्परा जगत्पते ॥२४५॥ ऐशा भजनाभीतरीं । मूर्ति ठेविली आसनावरी । उत्तराभिमुख साजिरी । शास्त्रमार्गाप्रमाणें ॥२४६॥ अखेरचे दर्शन । अवघ्यांनी घेतले जाण । ’जय स्वामी गजानन’ । ऐसें मुखें बोलोनी ॥२४७॥ मीठ अर्गजा अबीर । यांनी ती भरली गार । शिळा लावूनी केलें द्वार । बंद भक्तांनी शेवटीं ॥२४८॥ दहा दिवसपर्यंत । समाराधना चालली तेथ । घेऊन गेले असंख्यात । लोक स्वामींच्या प्रसादा ॥२४९॥ खरोखरीच संतांचा । अधिकार तो थोर साचा । सार्वभौम राजाचा । पाड नाही त्यांच्या पुढे ॥२५०॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति एकोनविंशोऽध्यायः समाप्तः ॥

No comments:

Post a Comment