Feb 11, 2022

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय ९


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय गोविंदबुवा टाकळीकर । एक हरिदास होता थोर । तो कराया कीर्तनगजर । शेगांवासी पातला ॥१॥ तेथें शिवाचें मंदिर । पुरातन होतें साचार । ज्याचा केला जीर्णोद्धार । मोटे नामक सावकारें ॥२॥ म्हणोन मोट्याचें मंदिर । वदूं लागले नारीनर । आतां पुढचा प्रकार । काय झाला तो ऐका ॥३॥ त्या मोट्यांच्या मंदिरीं । उतरले टाकळीकर कथेकरी । त्यांचा घोडा समोरी । बांधिला होता मंदिराच्या ॥४॥ घोडा अतिद्वाड होता । कोणासही मारी लाथा । समोरून कोणी येतां । त्यास चावे कुत्र्यासम ॥५॥ खिंकाळे रात्रंदिवस । वाईट खोड्या बहुवस । आल्या होत्या मुक्कामास । श्रोते तया घोड्याच्या ॥६॥ लोखंडाच्या सांखळ्या । होत्या त्यासी बांधण्या केल्या । त्या या समयीं राहिल्या । टाकळीमाजीं विसरून ॥७॥ चर्‍हाटानें कसा तरी । घोडा मंदिरासामोरी । बांधूनिया कथेकरी । निजले जाऊन शय्येला ॥८॥ ऐशा रात्रसमयास । श्रीगजानन पुण्यपुरुष । घोडा बांधल्या ठायास । येते झालें सहजगतीं ॥९॥ जे जे कोणी द्वाड असती । त्यांना सुधारण्याप्रती । साधुपुरुष अवतार घेती । ईशाज्ञेनें भूमीवर ॥१०॥ असो गजानन घोड्यापासी । आले रात्रसमयासी । जाऊनी निजले अति हर्षीं । चहूं पायांत घोड्याच्या ॥११॥ मुखें भजन चाललें होतें । ' गणी गण गणांत बोते ' । या सांकेतिक भजनातें । जाणण्या कोण समर्थ हो ? ॥१२॥ म्हणजे मना समजे नित्य । जीव हा ब्रह्मास सत्य । मानूं नको तयाप्रत । निराळा त्या तोचि असे ॥१३॥ ' गिणगिण गिणांत बोते ' । कोणी ' गणी गण गणांत बोते ' । ऐशीं आहेत दोन मतें । या भजनाविषयीं शेगांवीं ॥१४॥ वरील भजन मुखानें । चाललें होतें आनंदानें । वाटे या भजनरूप सांखळीनें । घोडा बांधूनी टाकिला ॥१५॥ गोविंदबुवांच्या अंतरीं । धास्ती होती जबर खरी । म्हणून तो वरच्यावरी । उठून पाहे वारूला ॥१६॥ तो ठाण्यावरी घोडा शांत । ऐसें पडता दृष्टीप्रत । गोविंदबुवांच्या चित्तांत । अति नवल वाटलें ॥१७॥ हें काय आहे तें पहाया गेलें । तो एक माणूस दिसलें । चोहों पायांत निजलेले । त्या द्वाड घोड्याच्या ॥१८॥ अति निकट येऊनी । पाहूं लागले निरखूनी । तों दिसले कैवल्यदानी । तेथे गोविंदबुवाला ॥१९॥ ते म्हणाले मनांत । घोडा कां झाला शांत । हें कळलें कारणासहित । मजलागीं येधवां ॥२०॥ समर्थांच्या सहवासें । घोडा शांत झालासे । जेथें कस्तुरी तेथें नसे । दुर्गंधाला थारा कदा ॥२१॥ समर्थांच्या पायांवरी । गोविंदबुवानें अत्यादरीं । शिर ठेविलें निर्धारीं । अष्टभाव दाटले ॥२२॥ मुखें करूं लागलें स्तवन । आपण खरेच गजानन । विघ्नांचे करितसा कंदन । याचा प्रत्यय आज आला ॥२३॥ माझा घोडा द्वाड अती । सर्वही ज्याला भीती । तेथेंच आलात गुरुमूर्ती । हरण्या त्याचा द्वाडपणां ॥२४॥ स्वामी घोड्यास म्हणाले, " आता गड्या । करूं नकोस खोड्या । त्या येथेंच रोकड्या । द्याव्या अवघ्या सोडून "॥२५॥ ऐसें त्यासी बोलून । निघून गेले दयाघन । कृपाकटाक्षें करून । पशूही ज्यानें आकळिला ॥२६॥ असो श्रोते दुसरे दिवशीं । मळ्यांत असतां पुण्यराशी । आले गोविंदबुवा दर्शनासी । घोड्यावरी बैसून ॥२७॥ तो मळ्यांत आलेला पाहून । लोक बोलले त्याकारण । गोविंदबुवा ही घेऊन । पीडा कशास येथें आला ॥२८॥ गोविंदबुवा त्यांसी वदले । तुमचें म्हणणें मीं ऐकिले । माझ्या घोड्यास शहाणें केलें । काल रात्रीं समर्थांनी ॥२९॥ चिंचेखालीं उभा केला । टाकळीकरांनी घोडा भला । चर्‍हाटावांचूनी राहिला । उभा तो एक प्रहर ॥३०॥ भाजीपाला कोवळा घांस । मळ्यांत होता विशेष । परी ना लाविलें त्यास । तोंड घोड्यानें एकाही ॥३१॥ पहा संताची केवढी शक्ती । पशुही आज्ञेत वागती । पत्र्यांत आरंभिली स्तुती । गोविंदबुवांनीं समर्थांची ॥३२॥
श्लोक ( पृथ्वी वृत्त )
अचिंत्य जगताप्रती कृति तुझी न कोणा कळे । असो खलहि केवढा तव कृपें सुमार्गी वळे ॥
उणें पुढति ये तुझ्या खचित रत्नचिंतामणी । शिरीं सतत माझिया वरदहस्त ठेवा झणीं ॥१॥
ऐसी स्तुती करून । गेले गोविंदबुवा निघून । घोड्यास आपल्या घेऊन । टाकळी ग्रामाकारणें ॥३३॥ प्रत्येक दिनीं शेगावीं । यात्रा येई नवी नवी । कांहीं तरी धरून जीवीं । हेतु आपल्या श्रोते हो ॥३४॥ त्या यात्रेकरू मंडळींत । बाळापूरचे दोन गृहस्थ । आले कांहीं धरूनि हेत । समर्थांच्या दर्शना ॥३५॥ पथीं जातां एकमेकां । बोलूं लागले ऐसें देखा । पुढल्या वारीस गांजा सुका । येऊं आपण घेऊन ॥३६॥ लोक आणती बर्फी खवा । आपण गांजा नेऊं बरवा । गांठ धोतरां बांधून ठेवा । ना तरी विस्मृति होईल ॥३७॥ पुढल्या वारीस दोघेजण । आले दर्शनाकारण । परि गेले विसरोन । गांजा तों आणावया ॥३८॥ शिर ठेवितां पायांवरी । आठवण त्यांना झाली खरी । कीं नाहीं आणिला बरोबरी । गांजा तो आपण ॥३९॥ आतां पुढच्या वारीसी । दुप्पट आणूं गांज्यासी । ऐसें बोलून मानसीं । दर्शन घेऊन गेले हो ॥४०॥ पुढल्या वारीस तेंच झालें । गांजा आणण्याचे विसरले । कर जोडून मात्र बसले । स्मृती नसे गांजाची ॥४१॥ तै स्वामीं म्हणाले भास्करासी । पाहा जगाची रीत कैसी । गांठ मारून धोतरासी । विसरती जिन्नस आणावया ॥४२॥ बेटे मनीं नवस करिती । आणि हात हालवित येथें येती । अशानें कां पूर्ण होती । त्यांच्या मनींचे मनोरथ ? ॥४३॥ हे शब्द त्या दोघांसी । अति लागले मानसीं । पाहूं लागले एकमेकांसी । कुतूहल दृष्टीनें ॥४४॥ आपण नवस केला मनीं । तो जाणिला समर्थांनी । आतां येऊं घेऊनी । चला गांजा गांवांतून ॥४५॥ ऐसा विचार करून उठले । गांवांत जाऊं लागले । गांजा आणावयाला भले । तैं महाराज वदलें त्या ॥४६॥ आतां आणण्यां गांजाप्रत । नका जाऊं पेठेंत । मेळ हमेशा बोलण्यांत । ठेवा तुम्ही आपुल्या ॥४७॥ लबाडाचे न हेतु पुरती । ही खुणगांठ बांधा चित्तीं । तुमचे काम झाल्यावरती । मर्जी असल्या गांजा आणा ॥४८॥ पुढील आठवड्यांत तुमचें काम । होईल जा अत्युत्तम । परी कदा न चुकवा नेम । पांच वार्‍या येथील करा ॥४९॥ कां कीं हा येथें स्थिर । आहे मृडानीपती कर्पूरगौर । ज्याच्या कृपेनें कुबेर । जगीं झाला धनपती ॥५०॥ ऐसा उपदेश ऐकून । महाराजांशीं वंदून । घेतलें शिवाचें दर्शन । आणि गेले बाळापुरा ॥५१॥ पुढील आठवड्यामाजी भले । काम त्यांचें फत्ते झालें । तेही गांजा घेऊन आले । शेगावांत वारीला ॥५२॥ त्या बाळापुरची दुसरी कथा । तुम्ही ऐका श्रोते आतां । बाळकृष्ण नामें होता । बाळापुरात रामदासी ॥५३॥ कांता त्याची पुतळाबाई । परम भाविक होती पाही । दरवर्षी वारीस जाई । पायीं सज्जनगडाते ॥५४॥ पतिपत्नीचा विचार एक । पौष मासीं निघती देख । ओझ्यासाठीं घोडे एक । घेऊनिया बरोबरी ॥५५॥ कुबडी कंथा दासबोध । सवें हें सामान अति शुद्ध । साधुत्वाचा नव्हता मद । तयासी कीं चढलेला ॥५६॥ मार्गी चालतां ग्रामांतरीं । प्रत्यहीं झोळी फिरवी खरी । त्या झोळीच्या भिक्षेवरी । नैवेद्य करी रामाला ॥५७॥ पौष वद्यांत बाळापूर । सोडी नवमीला साचार । असे कांता बरोबर । पुतळाबाई नाम जिचें ॥५८॥ बाळकृष्णबुवा हातीं । चंदनाच्या चिपळ्या असती । पुतळाबाई करी साथी । झांज हाती घेऊन ॥५९॥ रघुपतीचा नामगजर । करी पंथानें निरंतर । शेगांव, खामगांव, मेहेकर । देऊळगांवराजा पुढें ॥६०॥ आनंदीस्वामींस जालनापुरीं । वंदुनिया जांब नगरीं ।
वंदन गोदेला करी पुढें दिवर्‍यास येऊन ॥६१॥ पुढें बीड आंबेजोगाईचे । मोहोरी बेलेश्वर स्वामीचे । पट्टशिष्य समर्थांचे । डोमगांवी कल्याण ॥६२॥ नरसिंगपूर पंढरपूर । नातेपोतें शिंगणापूर । वाई आणि सातारा । असे जे गडाच्या पायथ्याशीं ॥६३॥ माघ वद्य प्रतिपदेला । तो येऊन पहुचे भला । श्रीसज्जनगडाला । नवमीच्या त्या उत्सवासी ॥६४॥ यथाशक्तिप्रमाणें । ब्राह्मणभोजन करावें त्यानें । श्रीस्वामीसमर्थांकारणें । खरा खराच रामदासी ॥६५॥ ऐसे रामदासी आतां । होणें कठीण सर्वथा । दासनवमीचा उत्सव होता । परत जाई त्याच मार्गें ॥६६॥ ऐसा क्रम चालला । बहुत दिवस त्याचा भला । साठ वर्षें देहाला । गेलीं त्याच्या उलटुन ॥६७॥ माघ वद्य द्वादशीस । सोडून सज्जनगडास । निघावें परत जावयास । त्यानें आपुल्या बाळापुरा ॥६८॥ असो वद्य एकादशीसी । बसला समर्थ समाधींपासीं । आले दुःखाश्रु लोचनासी । शब्द न त्यासी बोलवे ॥६९॥ हे रामदास स्वामी समर्था ! । हे गुरुराया पुण्यवंता ! । माझें शरीर थकलें आतां । वारी न पायीं होईल ॥७०॥ नेम चालला आजवर । आतां पडूं पाहे अंतर । परमार्थासी शरीर । निकोप आधीं पाहिजे ॥७१॥ तरीच सर्व घडे कांहीं । हे रामदासा माझे आई । हें म्हणण्याची जरूर नाहीं । आपण सर्व जाणतसा ॥७२॥ ऐशी प्रार्थना करून । निजला शय्येस जाऊन । तों प्रभातकाळीं पडलें स्वप्न । बाळकृष्णबुवाला ॥७३॥ स्वप्नीं म्हणाले रामदास । ऐसा न होई हताश । नको येऊं येथून खास । या सज्जनगडाते ॥७४॥ माझी कृपा तुझ्यावरी । माझा उत्सव बाळापुरीं । करावा तूं आपल्या घरीं । मी येईन नवमीला ॥७५॥ ऐसें स्वप्न पाहिलें । बाळकृष्ण आनंदले । कांतेसह परत आले । बाळापुरास आपुल्या घरीं ॥७६॥ पुढें श्रोते दुसरे वर्षी । काय झालें माघमासीं । त्या बाळापुरासी । तें आतां अवधारा ॥७७॥ माघ वद्य प्रतिपदेस । समर्थांच्या उत्सवास । आरंभ बाळापुरास । बाळकृष्णांनीं घरीं केला ॥७८॥ दासबोधाचें वाचन । रात्रीस हरिकीर्तन । दोन प्रहरीं ब्राह्मणभोजन । धुपार्ती अस्तमानाला ॥७९॥ ऐसा थाट बाळापुरा । नव दिवस झाला खरा । नववे दिवशीं दोन प्रहरा । अघटित आलें घडून ॥८०॥ श्रीगजानन साक्षात्कारी । श्रोते तया बाळापुरी । उभे राहिले दोन प्रहरी । नवमी तिथि लक्षून ॥८१॥ बाळकृष्णांच्या द्वारांत । रामाभिषेक चालला आंत । लोक झाले विस्मित । गजाननासी पाहुनियां ॥८२॥ म्हणूं लागले बुवासी । उठा उठा हो वेगेसीं । तुमच्या दासनवमीसी । द्वारीं पातलें गजानन ॥८३॥ त्यावरी बुवा म्हणाले । गजानन आले बरें झालें । त्याही संतांचे लागले । पाय माझ्या घरासी ॥८४॥ परी आजच्या दिनी साची । मी वाट पाहतो समर्थांची । त्या सज्जनगड निवासीयाची । आतूर होऊन ये ठायां ॥८५॥ इकडे स्वामी गजानन । द्वारीं उभे राहून । जयजय रघुवीर म्हणोन । श्लोक बोलूं लागले ॥८६॥
श्लोक - अहिल्या शिळा राघवें मुक्त केली । पदीं लागतां दिव्य होऊन गेली ॥ अशी वाणी ऐकतां उठली । स्वारी बाळकृष्णाची ॥८७॥ पाहाती जों येऊन द्वारीं । तों गजाननाची नग्न स्वारी । आजानुबाहु साजिरी । उभी निजानंदामध्यें ॥८८॥ करण्या गेला नमस्कार । तों रामदास दिसले साचार । हाती कुबडी जटाभार । रुळत होता पाठीवरीं ॥८९॥ भालीं त्रिपुंड्र उभा साचा । होता गोपिचंदनाचा । नेसलेल्या लंगोटीचा । रंग होता हिरमुजी ॥९०॥ ऐसें रूप पाहिलें । बाळकृष्णा भरतें आलें । प्रेमाचें तें श्रोते भलें । नयनीं संचले आनंदाश्रु ॥९१॥ तों सवेंच दिसती गजानन । त्याच्या नेत्रांकारण । कुबडी लंगोटी कांहींच न । त्रिपुंड्र शिरींचा जटाभार ॥९२॥ पुनः त्यानें हताश व्हावें । तो रामदास स्वामी दिसावे । पुनः जों निरखून पाहावें । तों मागुती गजानन ॥९३॥ मग म्हणाले गजानन । रामदासासी प्रेमेंकरून । नको गांगरूं देऊं मन । तुझा समर्थ मीच असे ॥९४॥ तुला सज्जनगडीं दिलें वचन । कीं दासनवमीस येईन । मी बाळापुरालागून । ह्याचे स्मरण आहे कां ? ॥९५॥ त्या वचनाची पूर्तता । करण्यास येथें आलों आतां । दे सोडोन अवघी चिंता । मीच आहे रामदास ॥९६॥ बाळकृष्णाचा धरून हात । गजानन आलें घरात । एका मोठ्या पाटीं स्थित । स्वामी गजानन जाहले ॥९७॥ बाळापुरीं पुकार झाली । गजानन आल्याची ती भली । मंडळीं धांवू लागली । दर्शन घ्याया पायांचे ॥९८॥ रामदासी अवघ्या दिवसभर । करीत राहिला विचार । शेवटीं रात्र होतां तीन प्रहर । स्वप्न पडलें बाळकृष्णा ॥९९॥ अरे, गजानन माझीच मूर्ति । हल्लीं तुमच्या वर्‍हाड प्रांतीं । संशय मुळीं ना धरी चित्तीं । तो धरितां बुडशील ॥१००॥ ऐसें स्वप्न पडल्यावरी । बाळकृष्ण तोषला भारी । मस्तक ठेविलें अत्यादरीं । गजाननाचें पायांवर ॥१०१॥ नवमी माझी सांग झाली । न्यूनता कांही न उरली । अर्भकावरी कृपा केली । तेणें धन्य झालो मी ॥१०२॥ भोजनोत्तर निघून गेले । स्वामी शेगांवासी भलें । रस्त्यानें न कोणा दिसलें । क्षणांत पोचले शेगांवीं ॥१०३॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति नवमोऽध्यायः समाप्तः ॥

No comments:

Post a Comment