Feb 25, 2021

गुरुचरित्रमिदं खलु कामधुक् - १


॥ श्री गणेशाय नम: ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-दत्तात्रेयसद्गुरुभ्यो नमः ॥ अथ ध्यानम् बालार्कप्रभमिन्द्रनीलजटिलं भस्माङगरागोज्ज्वलं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचर्माम्बरम् । ब्रह्मज्ञैः सनकादिभिः परिवृतं सिद्धैः समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे ह्रदि मुदा ध्येयं सदा योगिभिः ॥ श्री गुरुचरित्र हे सरस्वती गंगाधर यांनी प्रत्यक्ष श्री गुरूंच्या, श्री दत्तात्रेयांच्या आज्ञेवरून लिहिलेले आहे. ' श्रुतं हरति पापानि ' अर्थात वेद, पुराणें आणि प्रासादिक ग्रंथ श्रवण केल्याने पाप हरते, हे वेदवाक्य आहे. त्यांतील दिव्य अक्षरांतून शुभ स्पंदने निर्माण होत असतात, त्यांमुळे त्यांचे पठणमात्रें फळ मिळतेच. परंतु ही ईश्वर आराधना केवळ श्रवण, वाचन करणे यापुरतीच मर्यादित न ठेवता त्यांचे मनन करावे, त्यातून योग्य तो बोध घ्यावा, यासाठी हा अल्प प्रयास. ॐ नमो जी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा । जय जय लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥ सकळ मंगल कार्यांसी । प्रथम वंदिजे तुम्हांसी । चतुर्दश-विद्यांसी । स्वामी तूंचि लंबोदरा

प्राचीन ग्रंथ परंपरेस अनुसरून श्री गुरुचरित्रकार ग्रंथारंभ मंगलाचरणाने करतात. ग्रंथलेखन निर्विघ्नपणे व्हावे यासाठी अर्थातच विघनहर्त्या गणरायाला, गिरिजेच्या कुमाराला वंदन करून प्रार्थना करतात.

माझे अंतःकरणींचें व्हावें । गुरुचरित्र कथन करावें । पूर्णदृष्टीनें पहावें । ग्रंथसिद्धि पाववीं दातारा ॥

तू तुझ्या कृपादृष्टीनें हा ग्रंथ पूर्णत्वास न्यावा, अशी विनवणी करतात.

पुढें, सरस्वती गंगाधर विद्यादात्री शारदेला नमन करून तिचे स्तवन करतात. सकल विद्या, वेद, शास्त्रें जिच्या वाणीतून उत्पन्न झाली, अशा वागीश्वरीला गुरुचरित्र विस्तार करण्यासाठी चांगली मति द्यावी, असा आशीर्वाद मागतात.

विद्यावेदशास्त्रांसी । अधिकार जाणा शारदेसी । तिये वंदितां विश्वासी । ज्ञान होय अवधारा ॥ऐक माझी विनंति । द्यावी आतां अवलीला मति । विस्तार करावया गुरुचरित्रीं । मतिप्रकाश करीं मज ॥

त्यानंतर आपल्या गुरूंचे नाव नृसिंह-सरस्वती आहे, त्या नामांत तूही स्थित आहेस. तसेच, माझेही नाव सरस्वती गंगाधर आहे, म्हणून तू मजवरही लोभ ठेव, अशी प्रार्थना करीत आपले प्रतिभा चातुर्यही दाखवतात.

गुरुचे नामीं तुझी स्थिति । म्हणती ' नृसिंह-सरस्वती ' । याकारणें मजवरी प्रीति । नाम आपुलें म्हणोनि ॥

तदनंतर अनुक्रमें ब्रह्मा, विष्णू, शिव, समस्त देवी-देवता, सिद्ध माहात्मे, ऋषीमुनी, गंधर्व-यक्ष-किन्नर, पराशर, व्यास आणि वाल्मिकी ऋषी यांना वंदन करून ' भाषा न ये महाराष्ट्र । म्हणोनि विनवीं तुम्हांसी ॥ समस्त तुम्ही कृपा करणें । माझिया वचना साह्य होणे ।' अशी आळवणी करतात. अर्थात, हा देखील सद्गुरुकृपेचा चमत्कार म्हणावयास हवा. श्रीगुरूंचा वरदहस्त मस्तकी असल्यास अशक्यही कसे शक्य होते, हेच यावरून सिद्ध होते.

तसेच, आपल्या पूर्वजांचे स्मरण करून आपस्तंब शाखेच्या कौंडिण्य ऋषींच्या गोत्रातील साखरे कुळाची ओळख करून देतात. सायंदेव - नागनाथ - देवराव - गंगाधर अशी कुलपुरुषांची नांवे सांगत आपल्या चंपा नामक आईच्याही पूर्वजांचे स्मरण करतात.

ग्रंथलेखनाचा हेतू स्पष्ट करीत गुरुचरित्रकार आपल्या वंशावर पूर्वीपासूनच श्री गुरूंची कृपा होती आणि त्यांचे चरित्र लिहिण्याची आज्ञा झाली हे सांगतांना लिहितात -

पूर्वापार आमुचे वंशी । गुरु प्रसन्न अहर्निशी । निरोप देती मातें परियेसीं । ' चरित्र आपुलें विस्तारीं ॥ चरित्र ऐसें श्रीगुरुचें । वर्णावया शक्ति कैंची वाचे । आज्ञा असे श्रीगुरुची । म्हणोनि वाचें बोलतसें ॥

प्रत्यक्ष गुरुआज्ञेवरून लिहिलेले हे श्री गुरुचरित्र कामधेनू असून श्रोत्यांनी ते एकाग्रतेने श्रवण केल्यास त्यांना सहजच महाज्ञान प्राप्त होते. ज्यास पुत्रपौत्रीं चाड । त्यासी हे कथा असे गोड । लक्ष्मी वसे अखंड । तया भुवनीं परियेसा ॥ ऐशी कथा जयांचे घरीं । वाचिती नित्य मनोहरी । श्रियायुक्त निरंतरीं । नांदती कलत्रपुत्रयुक्त ॥ रोगराई तया भुवनीं । नव्हती गुरुकृपेंकरोनि । निःसंदेह सात दिनीं । ऐकतां बंधन तुटे जाणा ॥ अशी या सिद्ध ग्रंथाची महती कथन करून गुरुचरित्रकार आपले गुरु श्री नृसिंह सरस्वती ह्यांची कथा सांगण्यास सुरुवात करतात. ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


Feb 23, 2021

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय १०


सुबय्या श्रेष्ठीची कथा, श्री आपळराजांची ऋणमुक्तता, श्रीपादांची वेंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा, व बापनार्युलु यांच्या वंशांवर कृपादृष्टी आणि श्री नरसिंह राजवर्मा यांस स्वप्न-दृष्टांत

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

श्रीपादप्रभूंच्या तिरुमलदासास झालेल्या आदेशाचे पालन करीत शंकरभट्टांनी कुरवपुरास प्रयाण केले. तिरुमलदासांनी त्यांचे यथायोग्य आतिथ्य तर केलेच होते, मात्र त्याहूनही अधिक असा श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीलांचा अनमोल ठेवा शंकरभट्टांस दिला होता. प्रभूंच्या त्या शब्दातीत बाललीलांचे पुन्हा पुन्हा स्मरण करीत शंकरभट्टांचा प्रवास सुरु होता. काही वेळ चालल्यानंतर त्यांना दूरवर एक अश्वत्थ वृक्ष दिसला. एव्हाना माध्याह्न समय झाला होता. दुपारच्या भोजनाचा काही तरी प्रबंध करावयास हवा, असा विचार ते करू लागले. तेव्हढ्यात त्यांना त्या अश्वत्थाखाली कोणीतरी विश्रांती घेत आहे, असे दिसले. त्या व्यक्तीसच जवळपास एखाद्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मिळेल का ? हे विचारावे म्हणून ते त्या वृक्षाकडे वळले.

अश्वत्थाजवळ आल्यावर त्यांना एक यज्ञोपवीत धारण केलेला जटाधारी पुरुष दिसला. त्या योगीराजाचे डोळे जणू करुणेने ओतप्रोत भरलेले होते आणि तो अतिशय तन्मयतेने श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत होता. एक झोळी आणि त्यात असलेले एक ताम्रपात्र एवढीच काय ती त्याची साधन-सामुग्री दिसत होती. शंकरभट्टांना पाहताच मंद स्मित करीत त्याने त्यांची विचारपूस केली. आपली ओळख सांगून त्या योगीस वंदन करीत शंकरभट्ट म्हणाले, " श्रीमान, आपण श्रीपाद प्रभूंचे कृपांकीत भक्त आहात का ? तुम्हाला त्यांच्या दर्शनाचा लाभ झाला आहे का ?"

त्यावर गंभीर स्वरांत ते मुनी बोलू लागले, " माझे नाव सुबय्या श्रेष्ठी असून माझा जन्म वैश्य कुळांत झाला आहे. पिठीकापुरांतील पिढीजात संपन्न असलेल्या आमच्या घराण्यांत अनेक धार्मिक दिव्य ग्रंथांच्या पारायणाची परंपरा असल्याने आम्हांला ' ग्रंथी ' असेही म्हणतात. माझ्या लहानपणीच माझ्या माता-पित्याचे छत्र हरपले. युवावस्थेत आल्यावर मी देशाटन करीत व्यापार करू लागलो. त्या सुमारास मळयाळ देशातील पालक्काड प्रांतातील बिल्वमंगल नावाच्या ब्राह्मणाशी माझी ओळख झाली. आम्ही दोघे मिळून काही काळ व्यापार करु लागलो. व्यापारांत आम्हांला भरपूर फायदा होत होता. दुर्दैवाने, आम्ही वाईट संगतीस लागलो आणि मद्य, जुगार, वैश्या अशा अनेक व्यसनांत आमचे धन आम्ही उडवू लागलो. पुढे, अरबांशी केलेल्या एका अश्व व्यापारांत आमचे अतोनात नुकसान झाले आणि आम्ही कर्जबाजारी झालो. त्या धक्क्याने माझी धर्मपत्नी मृत्यू पावली. थोड्याच दिवसांत आमच्या मंदबुद्धी पुत्राचाही अकाली मृत्यू झाला. अर्थात हे सर्व माझ्या कुकर्मांचे भोग होते."

" पिठीकापुरांत व्यापार करीत असतांना मी कुठल्याही धर्मनियमांचे पालन करीत नसे. विशेष करून ऋणवसुली करतांना देव-ब्राह्मणांचा विचार न करता अतिशय स्वार्थी आणि निर्दयी असे माझे वर्तन होते. एकदा श्रीपादप्रभूंचे पिता श्री आपळराज यांच्याकडे आईनविल्ली येथून त्यांचे काही नातेवाईक आले. त्यावेळीं, त्या सर्वांची भोजन व्यवस्था करण्यासाठी पुरेसे धन त्यांच्याकडे नव्हते. आपळराज हे श्री वेंकटप्पय्या श्रेष्ठींच्या घरी पौरोहित्य करत असले तरी, केवळ धर्मनियमांनुसार मिळणारी दक्षिणाच स्वीकारत असत. त्यामुळे, त्यांच्या दुकानांत न जाता ते माझ्या दुकानात आले आणि अगदी नाईलाजाने त्यांनी एक वराह एव्हढ्या किमतीचे जिन्नस उधारीवर देण्याची मला प्रार्थना केली. तसेच, मला धन मिळाल्यावर मी आपले देणें त्वरित फेडेन, अशी ग्वाही दिली. तेव्हा मी आपळराजांना जिन्नस दिले खरे, मात्र काही काळानंतर मी खोटे हिशेब दाखवून चक्रीवाढ व्याज आकारत, ' आपण मला आता १० वराह देणे बाकी आहे. ' असे त्यांना कळविले. वास्तविक पाहता, माझा राजशर्मांच्या राहत्या घरावर डोळा होता. त्यांच्या परिवारास गृहत्याग करणे भाग पडावे, अशी माझी कुटील योजना होती. तदनुसार, मी लवकरच राजशर्मांचे घर विकत घेऊन त्यांना १-२ वराह देऊन हा उधारीचा व्यवहार पूर्ण करणार, असे ग्रामस्थांना सांगत असे. माझे हे दुष्ट कारस्थान श्री वेंकटप्पय्या श्रेष्ठींनी मात्र त्वरित जाणले आणि क्रोधायमान होत मला म्हणाले, " अरे, धनांध होऊन तू आपळराज यांच्यासारख्या पुण्यात्म्यांचा अपमान करीत आहेस. आमच्या कुलपुरोहिताशी दुर्वर्तन केल्याचे फळ तुला लवकरच भोगावे लागेल, ह्याचे स्मरण ठेव. "

तरीही, मी माझा दुराग्रह सोडत नव्हतो. एक दिवस मी श्रेष्ठींच्या घरी आलो असता मला तिथे बाळ श्रीपाद खेळत असलेले दिसले. पुन्हा एकदा आपळराजांचा पाणउतारा करावा या हेतूने मी श्रेष्ठींस उपहासानें म्हणालो, " जर राज शर्मा माझे ऋण फेडू शकत नसतील तर त्यांनी त्यांच्या तीन पुत्रांपैकी एकास माझ्या दुकानात चाकरी करण्यास पाठवावे. अरे पण, त्यांचा एक पुत्र आंधळा, तर दुसरा पांगळा आणि तिसरा हा केवळ तीन वर्षाचा बालक आहे. त्यांमुळे हे तीन पुत्र माझी चाकरी करून पित्याचे ऋण फेडणे सर्वथा अशक्यच दिसते. नाही का ?" माझे हे कठोर बोलणे श्रेष्ठींना असह्य झाले, आणि त्यांच्या डोळ्यांत दुःखाश्रु आले. श्रीपादांनी आपल्या चिमुकल्या हातांनी त्यांचे अश्रू पुसले आणि शांतपणे म्हणाले, " आजोबा, मी असतांना आपण का कष्टी होता ?" आणि माझ्याकडे वळून म्हणाले, " अरे सुबय्या, मी माझ्या पित्याचे हे ऋण फेडीन. मी आत्ताच तुझ्या दुकानात सेवा करून माझ्या पित्यास ऋणमुक्त करेन. मात्र, तुझे देणे देऊन झाल्यावर तुझ्या घरी लक्ष्मी राहणार नाही, हे लक्षांत ठेव." ' विनाशकाले विपरित बुद्धी... ' या वचनाप्रमाणे श्रीपाद स्वामींच्या या बोलण्याकडे मी पूर्णतः दुर्लक्ष तर केलेच, पण " श्रीपादांच्या ऐवजी मी तुमच्या दुकानात काम करतो. " ही श्रेष्ठींची विनंतीही मी धुडकावली. अखेर नाईलाजाने, बाळ श्रीपादांना घेऊन वेंकटपय्या श्रेष्ठी माझ्या दुकानात आले.

इतके बोलून सुबय्या श्रेष्ठी काही क्षण थांबला आणि आपले डोळे मिटून त्याने अतिशय उत्कटतेनें एकदा श्रीपाद श्रीवल्लभांचे नाम घेतले. नंतर शंकरभट्टांकडे पाहत त्याने पुढील कथा सांगावयास सुरुवात केली. तो म्हणाला, " त्यावेळी एक जटाधारी संन्यासी दुकानात येऊन तांब्याच्या पात्राची चौकशी करू लागला. तातडीची गरज असल्याने त्या संन्याशाने अधिक किंमत देण्याचीही तयारी दर्शवली. त्याला हवे असलेल्या पात्राचे माझ्या दुकानांत खरे तर बत्तीस नग होते, मात्र मी त्याला " माझ्याकडे हे एकच पात्र शिल्लक आहे आणि त्याची किंमत दहा वराह आहे. " असे सांगितले. तो जटाधारी ती रक्कम देण्यास त्वरित तयार झाला, परंतु त्याने एक अट ठेवली. वेंकटपय्या यांच्या मांडीवर बसलेल्या बाळ श्रीपादांकडे पाहत तो म्हणाला, " केवळ या तेजस्वी बालकाच्या हातांनी ते पात्र मला द्यावे." या व्यवहारातील फायद्यावर डोळा ठेवून अर्थातच मी या गोष्टीला अनुमती दिली आणि त्याच्या मागणीनुसार बाळ श्रीपादांनी ते ताम्रपात्र त्या जटाधारी संन्याशास दिले. ते पात्र त्याच्या हातात देतांना बाळ श्रीपाद खट्याळपणे हसत म्हणाले, " झाले ना तुझ्या मनासारखे ? तुझ्या घरी लक्ष्मी अखंड राहील. तू आता संन्यासी वेष त्यागून गृहस्थाश्रम स्वीकार." त्यावर अत्यंत समाधानाने तो जटाधारी संन्यासी तेथून निघून गेला. मीही हा विशेष धनलाभ झाल्याने अहंकारपूर्ण स्वरांत म्हणालो, " ह्या विक्रीने मला फायदा झाला असल्याने अप्पळराज शर्मांचे दहा वराहाचे ऋण फिटले आणि त्यांच्याबरोबर केलेला हा उधारीचा व्यवहार पूर्ण झाला. या क्षणी श्रीपाद माझ्या ऋणातून मुक्त झाले. " ते ऐकून वेंकटपय्यांनी गायत्रीच्या साक्षीने मला अप्पळराज शर्मा ऋणमुक्त झाल्याचा पुनरुच्चार करावयास सांगितला. त्याप्रमाणे मी पुन्हा एकदा हा व्यवहार पूर्ण झाल्याचे माझे वचन बोलल्यावर बाळ श्रीपादांना घेऊन वेंकटपय्या आपल्या घरी परतले."

" मीही उरलेल्या एकतीस ताम्रपत्रांची नोंद करावी म्हणून दुकानाच्या आतल्या दालनात गेलो, तर काय आश्चर्य तिथे केवळ एकच ताम्रपात्र होते. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना, कारण काही वेळापूर्वीच तिथे बत्तीस पात्रें होती. खरोखर श्रीपाद प्रभूंच्या लीला अनाकलनीय आणि अगम्य होत्या. त्यांच्यासमोर बोललेले प्रत्येक वचन सत्य होत असे. प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंच्या दिव्य करकमलांनी ते ताम्रपात्र स्वीकारणाऱ्या त्या जटाधारी संन्याशाच्या भाग्याचे काय वर्णन करावे बरें ! त्याची कुठल्या जन्मींची पुण्याई फळास आली अन हा अलभ्य लाभ घडला, हे न कळें ! माझ्या उद्धाराची वेळ आली असतांना माझे दुर्दैव आडवे आले हेच खरे ! अशा रितीने श्रीपादप्रभूंनी अद्भुतरित्या केवळ काही क्षणांतच माझ्या खोट्या हिशोबाने आकारलेल्या ऋणाएव्हढी रक्कम मला मिळवून दिली आणि आपल्या पित्यास ऋणमुक्त केले."

इथपर्यंतची कथा सांगून सुबय्या श्रेष्ठी शंकरभट्टांस म्हणाले, " महाशय, आपण क्षुधेने व्याकुळ झालेले दिसत आहात. ' जर तुमच्या घरी कोणीही कधीही भुकेला-तहानलेला आला तर जात, धर्म, कुलादि यांविषयीं मनांत कसलाही किंतु न बाळगता प्रथम त्या व्यक्तीस आपल्या परिस्थितीनुसार खाऊ-पिऊ घाला.' असे श्रीपाद श्रीवल्लभ नेहेमीच आपल्या भक्तांना सांगत असत. तेव्हा, आपण आता आपल्या भोजनाची व्यवस्था करू. इथे जवळच एक जलाशय आहे, तेथे जाऊन तुम्ही संध्यादि उरकून घ्या. तोपर्यंत मी या वनातून केळीची व पळसाची पाने घेऊन येतो, आज आपण दोडक्याचे वरण आणि भात असे भोजन करू या." हे बोलणे ऐकून शंकरभट्टांस आश्चर्य वाटले. सुब्बय्याजवळ काहीच शिधा सामुग्री अथवा भोजन पात्रे दिसत नव्हती. त्यांमुळे इतक्या थोड्या कालावधीत हा आपल्यासाठी हे विशेष भोजन कसे बरे बनवणार ? असा विचार करीत ते जलाशयाकडे निघाले. तिथे मुखमार्जन करून, हात-पाय धुवून ते परतले, तोपर्यंत सुब्बय्याने दोन केळीची पाने मांडली होती आणि शेजारीच पळस पत्राचे द्रोणही ठेवले होते. त्याच्यासमोर ते झोळीतील ताम्रपात्र होते.

शंकरभट्टांस पाहताच त्याने त्यांना एका पानासमोर बसायची खूण केली. त्यानंतर, शांतपणे आपले डोळे मिटून काही क्षण तो ध्यानस्थ झाला. शंकरभट्ट हे सर्व नवलाईने पाहत होते. तेव्हढ्यात सुब्बय्याने डोळे उघडले. श्रीपाद प्रभूंचे नाम घेत ते ताम्रपात्र उचलले आणि त्या रिकाम्या पात्रातून द्रोणांत पाणी भरले. नंतर, त्याच भांड्यातून दोडक्याचे वरण आणि भातही वाढला. त्या दोघांनी आचमन, चित्राहुती करून भोजन केले. ते अत्यंत रुचकर पदार्थ प्रसाद म्हणून ग्रहण करताना शंकरभट्टांनी अपूर्व अशी तृप्ती अनुभवली. भोजनानंतर त्यांनी ते ताम्रपात्र पाहिले असता, ते पहिल्याप्रमाणेच रिकामे होते. त्यांच्या आश्चर्यास पारावार उरला नाही.

थोडा वेळ विश्रांती घेऊन सुबय्या पुन्हा एकदा श्रीपाद प्रभूंच्या लीला कथन करू लागला. " शंकरा, तुझ्या मनांत या ताम्रपत्राविषयी कुतुहूल आणि असंख्य प्रश्न आहेत ना ? तर आता पुढील वृत्तांत ऐक. बाळ श्रीपादांनी अनाकलनीय अशी लीला करून आपल्या पित्यास ऋणमुक्त केले, ही वार्ता पीठिकापुरांत वाऱ्याप्रमाणे पसरली. अप्पळराज आणि सुमती महाराणी यांच्या नेत्रांतून पुत्र वात्सल्यतेने अश्रुधारा वाहू लागल्या. त्या वेळी त्यांच्या घरी वेंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा, बापनार्य आणि काही प्रतिष्ठित मंडळी जमली होती. मलाही तिथे बोलावले गेले. तिथे जाताच त्या ज्येष्ठ मंडळींसमोर मी श्री राजशर्मांचे उधारी देणे व्याजासहित फिटले, हे सर्वांना सांगितले. तरीही, कुणी एक जटाधारी येऊन दहा वराह देऊन ताम्रपात्र खरेदी करतो, त्यांमुळे आपण ऋणमुक्त झालो ह्याविषयी अप्पळराज शर्मा अजूनही साशंक होते. तेव्हा, बाळ श्रीपाद म्हणाले, " तात, पित्याला ऋणमुक्त करणे हे पुत्राचे कर्तव्यच आहे. मी केवळ तीन वर्षाचा बालक आहे, असे आपणांस वाटते. पंचमहाभूतांनीही ' मी श्री दत्तात्रेय आहे ' अशी साक्ष दिल्यावरदेखील, केवळ अज्ञानामुळे तुम्हांस याचा वारंवार विसर पडतो. ह्या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय माझ्या संकल्पमात्रे होतो. ह्या सृष्टीचक्रांतील अनेक गूढ रहस्ये यांचे मी साक्षीभूत होऊन अवलोकन करतो. मी सर्वव्यापी, सर्वज्ञ आणि सर्वांतर्यामी असून ह्या दत्ततत्त्वाची सर्वांस कर्मफल आणि भावानुरूप अनुभुती देतो.

हा सुबय्या पूर्वजन्मी एका जंगलप्रदेशातील दत्तमंदिराचा पुजारी होता. अत्यंत दुर्वर्तनी असा हा पुजारी कधीच वेदधर्मानुसार आचरण करीत नसे. एके दिवशी, त्याने ती ताम्र दत्तमूर्ती विकली आणि ग्रामस्थांना मात्र दत्तमूर्ती चोरीला गेली, असे सांगितले. मूर्ती विकून आलेले धन त्याने अर्थातच वाममार्गाने खर्च केले. आज जो जटाधारी संन्याशी ताम्रपत्राच्या शोधात आला होता, तो पूर्वजन्मी सोनार होता. त्यानेच ती ताम्र दत्तमूर्ती त्या पुजाऱ्याकडून विकत घेतली होती. ती दत्तमूर्ती वितळवून बत्तीस ताम्रपात्रे बनवून त्याने धन कमावले होते, त्यामुळे ह्या जन्मी तो दरिद्री म्हणून जन्मला होता. त्या पुजाऱ्याने अनेक वर्षे श्री दत्तात्रेयांचे अर्चन केले होते, ह्याच पुण्यकर्मामुळे ह्या जन्मी श्रीमंत अशा श्रेष्ठी कुळात तो सुबय्या म्हणून जन्मला. पूर्वजन्मी तो सोनार नरसिंहाची आराधना करीत असे. त्या पुण्याईमुळे त्याला पूर्वजन्म स्मृती झाली आणि मला अनन्यभावाने शरण येऊन आपले दारिद्र्य हरण करण्याची आर्त प्रार्थना केली. मीही त्याच्या भक्तिभावाने प्रसन्न होऊन त्यास पीठिकापुर येथे येऊन माझ्या हातून ताम्रपात्र स्वीकार असा दृष्टांत दिला. हा सुबय्या खोटे हिशोब दाखवून दहा वराह इतके कर्ज दाखवणार, हे मला ज्ञात होते. म्हणूनच त्याला त्या संन्याशाकडून दहा वराह मिळतील, असा योग मी जुळवून आणला. माझ्या दृष्टांतानुसार तो आपल्या देणेदारांचा त्रास चुकविण्यासाठी जटाधारी संन्याशाचा वेष धारण करून पीठिकापुरांत आला. पुढील वृत्तांत आपणास ज्ञातच आहे."

त्यानंतर श्रीपाद प्रभू माझ्याकडे पाहत गंभीर स्वरांत बोलू लागले, " सुबय्या, तुझ्या दुकानात आता केवळ एकच ताम्रपात्र उरले आहे ना ? तू त्या जटाधारी संन्याशाकडून दहा वराह घेताच तुझे सर्व पुण्यफळ क्षय पावले. तुझी सर्व व्यसने, चिंतामणी नामक वैश्या, कर्जवसुली करतांनाचे तुझे वर्तन हे सर्व मी जाणतो. आपले कर्मभोग तुला आता भोगणे प्राप्त आहे. यापुढे तू झोळी घेऊन खाण्याचे पदार्थ विकशील. माझ्या पित्याने आतिथ्यासाठी तुझ्याकडून धन उधार घेतले होते आणि अतिथींस दोडक्याचे वरण आणि भात असा भोजन प्रबंध केला होता. काही काळाने तुझी अन्नान दशा होईल, त्यावेळी ह्या उरलेल्या एकाच ताम्रपात्रातून तुला गरजेपुरते पाणी, दोडक्याचे वरण आणि भात मिळेल, असा माझा तुला आशीर्वाद आहे. मी तुझा मृत्युयोगही दूर करत आहे. आज रात्री तुझ्या घराच्या दक्षिण दरवाजाजवळ एक म्हैस येईल. तिला तू स्वहस्तें रांधलेले दोडक्याचे वरण आणि भात खाऊ घाल. जेणें करून तुझे मृत्यू गंडांतर टळेल." त्यावेळी श्रीपाद क्रोधायमान दिसू लागले, तेथील सर्व मंडळींना ते जणू उग्र नृसिंहरूपांत दिसू लागले. सर्वांना भयभीत झालेले पाहून श्रीपाद पुन्हा मूळ स्वरूपांत आले आणि म्हणाले, " आजोबा, मीच नृसिंहमूर्ती आहे. परंतु, आपणास घाबरायचे काहीच कारण नाही. नरसिंह वर्मा - वेंकटप्पय्या श्रेष्ठींच्या आर्य वैश्यांचा, बापनार्य यांच्या लाभाद महर्षी गोत्राचा आणि माझा फार जुना अनुबंध आहे. त्यांच्यावर माझा वरदहस्त नेहेमीच राहील. तुमच्या वंशातील कोणत्याही पुरुषाने श्रीपाद श्रीवल्लभांची नवविधा भक्तींपैकी कुठल्याही मार्गाने आराधना केल्यास, माझी कृपादृष्टी तुमच्यावर राहील. तुमच्या तेहत्तीसाव्या पिढीच्या काळांत माझ्या जन्मस्थळी महासंस्थान निर्माण होईल. तिथेच माझ्या दिव्य पादुकांची स्थापना होईल." श्रीपाद प्रभूंची ही भविष्यवाणी ऐकून आम्ही सर्व जण स्तंभित झालो. हे तर प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयच आहेत, अशी आमची दृढ श्रद्धा झाली. अप्पळराज शर्मा - सुमती महाराणी यांनी पूर्वजन्मी दत्ताराधना केली होती, भगवान दत्तात्रेयांचा त्यांच्यावर वरदहस्त तर होताच, पण त्याचबरोबर वेंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा, आणि बापनार्युलु यांच्याही अनेक जन्मांच्या ईश्वर उपासनेचे आणि पुण्यकर्मांचे फलित म्हणूनच या सत्शील दाम्पत्यापोटी दत्तात्रेयांनी अवतार घेतला. याच कारणास्तव या तिघांकडून धन स्वीकारले तर ते दान होत नाही, उलट ते धन न स्वीकारल्यास महापाप लागू शकते हेच श्रीपाद आपल्या पित्यास समजावू इच्छित होते.

सुब्बय्याने सांगितलेला हा दिव्यानुभव ऐकून शंकरभट्ट दिग्मूढ झाले. पण त्यांच्या मनांत एक शंका उद्भवली. त्यांनी सुब्बय्याला नम्रतापूर्वक विचारले, " स्वामी, श्रीपाद श्रीवल्लभ हे श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत, असे म्हणतात. पण मग तेच नरसिंह अवतार, शिवस्वरूप, श्रीकृष्ण आणि श्रीनिवासदेखील तेच आहेत असे म्हणता, ह्याचा कृपया खुलासा करावा." त्यांवर मंद स्मित करीत सुबय्या श्रेष्ठी उत्तरले, " महोदय, ह्या सकळ ब्रह्माण्डाचे नियंता असलेले श्रीपादस्वामी सकल देवता स्वरूप आहेत. तेच ब्रह्मा, श्री विष्णु आणि सदाशिव आहेत, त्यांच्या ठायीं सर्व देवी-देवता, ऋषी-मुनी यांचेही वास्तव्य असते. नवग्रह हे त्यांचेच स्वरूप आहे. शनिदेव कर्मकारक आहेत, मंगळ ग्रहांतील चित्रा नक्षत्रांवर श्रीपादांचा जन्म झाला. त्यामुळे, चित्रा नक्षत्र असता केलेले श्रीपादांचे पूजन अपूर्व असे फळ देते. श्रीपाद श्रीवल्लभ षोडश कलांनी परिपूर्ण आहेत. त्यांच्या प्रत्येक कलेमधून तन-मन-आत्मस्वरूपी (१० x १० x १० = १०००) अशी हजारो स्पंदने प्रवर्तित होतात. त्यांच्या अष्टविधा प्रकृतीच त्यांच्या भार्या आहेत. अशा प्रकारे, श्रीपाद श्रीकृष्णच आहेत, तसेच श्री व्यंकटेश श्रीनिवासदेखील त्यांचेच रूप आहे."

याविषयीची मी तुला श्रीपादांची अजून एक कथा सांगतो. एकदा बाळ श्रीपाद नरसिंह वर्मांना म्हणाले, " आजोबा, उद्या आपण दोघे घोडागाडीतून आपली जमीन पहाण्यास जाऊ या. ती भूमाता माझ्या पद्स्पर्शाची कित्येक दिवसांपासून प्रार्थना करीत आहे." तेव्हा नरसिंह राजशर्मा लीनतेने म्हणाले, " अरे श्रीपादबाळा, माझे एक तुझ्याकडे मागणे आहे. आपली ही पीठिकापूराजवळ जी काही जमीन आहे, तिथेच एक छोटेसे गांव वसवून काही कष्टकरी लोकांना वाट्याने शेती करायला द्यावी, आणि जमिनीचा मालक म्हणून केवळ नाममात्र मोबदला घ्यावा, असा माझा मानस आहे. हा सर्व व्यवहार, हिशोब बघण्यासाठी मी तुझ्या पित्यास म्हणजेच श्री अप्पळराज शर्मा यांस कुलकर्णी पद देऊ इच्छितो. तसेही आईनविल्ली या ग्रामाचे कुलकर्णी पद ते सांभाळीत नाहीच ना ?" त्यांचा तो संकल्प ऐकून श्रीपाद हसत म्हणाले, " आजोबा, तुम्ही केवळ तुमच्या जमिनदारीचा विचार करत हा निर्णय घेत आहात. माझ्या पित्याने आणि तदनंतर मी हे कुलकर्णीपद सांभाळावे, हीच तुमची इच्छा आहे. परंतु, मला या सकळ ब्रह्माण्डाचे काळचक्र, कोट्यावधी प्राणिमात्रांचे कर्मफल हिशोब अविरत सांभाळावे लागतात. मुळात माझ्या ह्या अवताराचे मुख्य प्रयोजन विश्वकुंडलिनी जागृत करणे हेच आहे. ह्या पीठिकापुराची कुंडलिनी मी आपल्या, बापनार्युलु, आणि वेंकटप्पय्या श्रेष्ठी यांच्या तेहत्तीसाव्या पिढीत जागृत करीन, तेव्हा आपण ही चिंता करणे सर्वथा सोडून द्या."

सुबय्या म्हणाले, " शंकरा, श्रीपाद श्रीवल्लभांनी पीठिकापुर सोडून इतरत्र कुठे जाऊ नये, यासाठीच नरसिंह वर्मांचा हा प्रयत्न होता. मात्र प्रभूंचे अवतारकार्य जाणून घेण्यास आपण असमर्थ आहोत, हेच खरें ! त्याच रात्री नरसिंह वर्मांना स्वप्नदृष्टांत झाला, त्यांना श्रीपाद प्रभूंनी श्री नृसिंहांच्या बत्तीस अवतार स्वरूपांत दर्शन दिले. ती रूपे अशी होती. : १) कुंदपाद नरसिंहमूर्ती २) कोप नरसिंहमूर्ती ३) दिव्य नरसिंहमूर्ती ४) ब्रह्मांड नरसिंहमूर्ती ५) समुद्र नरसिंहमूर्ती ६) विश्वरूप नरसिंहमूर्ती ७) वीर नरसिंहमूर्ती ८) क्रूर नरसिंहमूर्ती ९) बिभीत्स नरसिंहमूर्ती १०) रौद्र नरसिंहमूर्ती ११) धूम्र नरसिंहमूर्ती १२) वह्नि नरसिंहमूर्ती १३) व्याघ्र नरसिंहमूर्ती १४) बिडाल नरसिंहमूर्ती १५) भीम नरसिंहमूर्ती १६) पाताळ नरसिंहमूर्ती १७) आकाश नरसिंहमूर्ती १८) वक्र नरसिंहमूर्ती १९) चक्र नरसिंहमूर्ती २०) शंख नरसिंहमूर्ती २१) सत्त्व नरसिंहमूर्ती २२) अद्भूत नरसिंहमूर्ती २३) वेग नरसिंहमूर्ती २४) विदारण नरसिंहमूर्ती २५) योगानंद नरसिंहमूर्ती २६) लक्ष्मी नरसिंहमूर्ती २७) भद्र नरसिंहमूर्ती २८) राज नरसिंहमूर्ती २९) वल्लभ नरसिंहमूर्ती. तिसावे नरसिंहाचे रूप म्हणून श्रीपाद वल्लभ प्रगट झाले. तर एकतिसाव्या अवतार स्वरूपांत श्री नृसिंह सरस्वती महाराज आणि बत्तिसाव्या नरसिंहमूर्ती रूपात प्रज्ञापुराचे (अक्कलकोटचे) श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन झाले."

" शंकरभट्टा, आज आपण इथेच थांबू या. ज्योतिषशास्त्रानुसार उद्याचा दिवस अतिशय शुभ आहे. त्या मंगलयोगावर मी तुला श्रीपादांच्या अनेक आश्चर्यकारक लीला कथन करेन. माझा मित्र बिल्वमंगल आणि वैश्या चिंतामणी हे पीठिकापुरांत कसे आले ? श्रीपाद प्रभूंनी त्यांच्यावर कशी कृपा केली ? नरसिंह वर्मांच्या शेतांतील श्रीपादांचा चमत्कार आणि चित्रवाडा या ग्रामाची कथाही मी तुला सांगेन. श्रीपाद प्रभूंचे भविष्यांतील अवतार आणि त्यांचे काही संकल्प यांविषयीही मी काही विवरण करेन. अत्यंत भक्तिभावाने केलेल्या प्रभूंच्या स्मरणाने, अथवा केवळ त्यांच्या लीला श्रवण केल्या असता पूर्वजन्मांतील अनेक पातकांच्या राशी सहजच भस्म होतात. आजची रात्र आपण श्रीपाद श्रीवल्लभांचे अखंड नामस्मरण करू या." असे म्हणून सुबय्या श्रेष्ठी जवळच असलेल्या त्यांच्या कुटीत शंकरभट्टास घेऊन गेले. त्या कुटीत दोन ताडपत्रीच्या चटया होत्या. तसेच, चार श्वान त्या कुटीचे रक्षण करीत होते. शंकरभट्टही प्रभूंच्या ह्या अद्भुत लीला ऐकण्याचे भाग्य आज आपल्याला लाभले, जणू श्रीपादांचा कृपाप्रसादच आपणास प्राप्त झाला, असा मनोमन विचार करीत नामस्मरणांत रंगून गेले. ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ अध्याय फलश्रुती - दुर्भाग्य नाश


Feb 16, 2021

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र - ( श्लोक ८१ ते ९० )


 || श्री गणेशाय नमः ||

दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू. जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.

महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.

|| श्री गुरुदेव दत्त ||

त्रिविक्रमायाह कर्मगतिं दत्तविदा पुनः ।
वियुक्तं पतितं चक्रे श्रीदत्तः शरणं मम ॥८१॥
भावार्थ : ज्या श्रीगुरूंनी त्रिविक्रमयतींना कर्मविपाक संहितेचे ज्ञान देऊन, त्या पतिताला अल्पावधीसाठी दिलेल्या गतजन्मीच्या स्मृती आणि ज्ञानापासून पुन्हा विलग केले, असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.
रक्षसे वामदेवेन भस्ममाहात्म्यमुद्-गतिम् ।
उक्तां त्रिविक्रमायाह श्रीदत्तः शरणं मम ॥८२॥
भावार्थ : ज्या गुरुमहाराजांनी, पूर्वी वामदेव ऋषींनी ब्रह्मराक्षसाला सांगितलेले भस्म माहात्म्य आणि त्याचा केलेला उद्धार याची कथा त्रिविक्रम मुनींना सांगितली, असे ते श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.
गोपीनाथसुतो रुग्णो मृतस्तत्स्त्री शुशोच ताम् ।
बोधयामास यो योगी श्रीदत्तः शरणं मम ॥८३॥

Feb 12, 2021

कार्तवीर्योsर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् - ३


 || श्री गणेशाय नमः || श्री दत्त समर्थ ||

अर्जुनाची ती प्रार्थना ऐकून गर्गमुनींना संतोष वाटला. आपल्या उपदेशाचा उचित परिणाम झाला आहे, याचे त्यांना अतिशय समाधान वाटले. श्री दत्तप्रभूंचे मनःपूर्वक स्मरण करून त्यांनी अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास आरंभ केला. गर्गमुनी म्हणाले -

पूर्वी जंभासुर नावाचा महापराक्रमी दैत्य होता. त्याने संपूर्ण पृथ्वीचे राज्य जिंकले आणि स्वतःला सम्राट घोषित करून अत्यंत जुलुमी पद्धतीने तो राज्यकारभार करू लागला. त्या अतिमहत्वाकांक्षी दैत्याने नंतर स्वर्गावरही चढाई केली. देवराज इंद्र आणि जंभासुर दैत्य यांच्यात घनघोर युद्ध झाले. त्या संग्रामात देवांनी पराक्रम करून दैत्य सेनेचा संहार केला, मात्र अखेर त्या बलशाली दैत्याने अमरावती जिंकून स्वर्गलोकीचे राज्य आपल्या ताब्यात घेतले. पराभूत झालेल्या देवांनी मेरू पर्वतावरील एका गुहेचा आसरा घेतला. आपले स्वर्गलोकीचे राज्य परत मिळविण्यासाठी इंद्रासहित सर्व देव देवगुरु बृहस्पतीकडे आले आणि आपणांस योग्य मार्गदर्शन करावे, अशी प्रार्थना केली. त्यावेळी, देवगुरु बृहस्पतींनी इंद्रासहित सर्व देवगणांस बोध केला. तसेच, त्यांना सह्याद्री पर्वतावर वास करणाऱ्या श्री दत्तात्रेयांस अनन्यभावें शरण जा, तेच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील असे सांगितले.

आपल्या गुरूंची आज्ञा घेऊन इंद्रादिक देव सत्वर सह्याद्रीच्या शिखरावरील श्री दत्तप्रभूंच्या आश्रमांत आले. श्री दत्तात्रेयांचे ते ' मन-बुद्धीपर वाचे अगोचरु ' असे रूप पाहून त्या सर्वांचेच देहभान हरपले. त्यावेळीं, श्री दत्तमहाराजांजवळ सौंदर्यवती अनघादेवीही होती. सर्व देवांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला, मात्र दत्तात्रेयांनी इंद्रादिक देवांकडे अजिबात लक्ष दिले नाही. क्षणभर सर्व देव खिन्न झाले, मात्र देवगुरुंच्या उपदेशाचे स्मरण करून ते सर्व अढळ श्रद्धेने दत्तप्रभूंची सेवा करू लागले. असा बराच काळ लोटला, मात्र दत्तप्रभूंनी ना त्यांची दखल घेतली ना विचारपूस केली. तरीही, अपार कष्ट झेलुनही प्रभूंच्या कृपेची याचना करणाऱ्या त्या सर्व देवांचा दृढ निश्चय आणि अनन्यभाव पाहून अखेर दत्तात्रेय इंद्रास म्हणाले, " देवराज, आपण उगाच इतके कष्ट घेत आहात. मी मद्यासक्त, स्त्रीरत भ्रष्ट असून माझ्यापासून आपणांस कदापिही लाभ होणार नाही. तेव्हा, तुम्ही दुसऱ्या एखाद्या योग्य पराक्रमी पुरुषाकडे जावे." श्री दत्तप्रभूंचे हे बोलणे ऐकून त्या सर्व सुरवरांना आपल्या गुरूंचा उपदेश आठवला. हीच आपली कसोटी आहे, हे लक्षांत घेऊन इंद्रादि देव श्री दत्तांची , " तू ईश्वर स्वच्छंद । भेदपरिच्छेद तुज नाहीं । तूं अनघ अससी । अनघा हे असे तसी । तुझा होतां अनुग्रह । कोण करील निग्रह ।" अशी स्तुती करू लागले. त्यांचा तो दृढभाव आणि चित्तशुद्धी झालेली पाहून दत्तप्रभू प्रसन्न झाले. त्यांनी आता जंभासुराचा विनाश अटळ आहे, तसेच स्वर्गलोकीचे राज्य तुम्हांस लवकरच प्राप्त होईल, असा आशीर्वाद दिला. केवळ स्रीमोहच असुरांचा विनाश करू शकेल, हे भगवान दत्तात्रेय जाणून होते. त्यांनी देवांना दैत्यांशी युद्ध करून युक्तीने त्यांना आपल्या आश्रमांत घेऊन यायला सांगितले. दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार, देवांनी दैत्यांबरोबर रण पुकारले. काही काळ युद्ध करून पूर्वनियोजित युद्धनीतीचे पालन करीत सुरसेनेने समरभूमीतून पळ काढला. त्यांचा पाठलाग करीत सर्व दैत्यही सह्याद्रीवर दत्तात्रेयांच्या आश्रमांत आले. तिथे अनुपम सौंदर्यवती अशा अनघादेवीला बघून ती दैत्यसेना आपण इथे सुरांशी युद्ध करत आलो आहे, हेच विसरली. त्या आदिमायेविषयीं त्यांच्या मनात अभिलाषा निर्माण झाली. त्यांनी तिला पालखीत बसविले आणि डोक्यावर ती पालखी घेऊन ते निघून गेले. दैत्यांचे हे आसुरी कृत्य बघून श्री दत्तात्रेय म्हणाले, " देवेंद्रा, परस्त्रीस्पर्श हे महापातक आहे. त्या पापाच्या प्रभावाने लवकरच दैत्यांचे सामर्थ्य आणि ऐश्वर्य नष्ट होईल.

श्री: पदगाssलयदात्री सक्थिगतांशुकदात्री । गुह्यगता प्रमदादा क्रोडगतार्भकदा चेत् ॥
चेद्धृदि कामितदात्री कण्ठगता वसुदात्री । चेन्मुखगाsशनवाग्दा मूर्धगता तु शिरोदा ॥
तन्मूर्धगाsधुनेयं श्री: शीर्षाण्युत्कृत्य सत्वरम् । आयास्यत्यत्र नैवात्र शङ्का ह्येते मृतोपमा: ॥

अर्थात, श्री म्हणजे लक्ष्मी जर पायांत असेल तर गृहदात्री असते. श्री जर छातीवर घेतली तर वस्त्रलाभ आणि गुह्येंद्रियांत असेल तर स्त्रीलाभ होतो. श्री बाहूंवर संततीकारक, हृदयांत विराजमान झाली तर इच्छापूर्तीकारक, कंठात धनदायक, आणि वाणींत असेल तर शक्ती आणि यशदायक असते. मात्र लक्ष्मीला मस्तकावर घेतले असता विनाश घडविते. तेव्हा देवांनो, दैत्यांचा पराजय आता अटळ आहे. तुम्ही एक क्षणही न दवडतां निर्भय होऊन दैत्यांवर आक्रमण करा. तुमचा विजय आता निश्चित आहे. " दत्तप्रभूंच्या या वचनांवर विश्वास ठेवून इंद्रादिक देवांनी त्वेषाने पुन्हा एकदा दैत्यांशी युद्ध आरंभिले. दुराचरण आणि महापातक यांनी निस्तेज झालेले ते दैत्य थोड्याच वेळांत पराभूत झाले. श्री दत्तकृपेनें त्या दुष्ट दैत्यांचा संहार करून देवसेना विजयी झाली.

आदिमाया अनघादेवीही श्री दत्तप्रभूंच्या अंकावर पुन्हा विराजमान झाली. सर्व देवगणांसहित इंद्राने सद्गदित होत श्रीदत्तप्रभू आणि अनघा देवीची स्तुती केली. त्या स्तवनाने आणि सेवाभावाने प्रसन्न झालेल्या श्री दत्तात्रेयांनी आशीर्वाद देऊन इंद्रास कर्तव्यदक्षतेने स्वर्गलोकीचे राज्य करावयास सांगितले. तसेच सर्व देवांस हवा तो वर मागून घ्यावा असेही सांगितले. त्यांवर, सर्व देवांनी कृतज्ञतेने ' भक्ती द्यावी निश्चयेंसी । दिवा निशी प्रेमयुक्त ।' असे वरदान मागितले. आजसुद्धा, अतीव श्रद्धेने देवराज इंद्र दररोज योगिराज दत्तप्रभूंच्या दर्शनास येत असतो.

इतका कथाभाग सांगून गर्गमुनी अर्जुनाला म्हणाले, " युवराज, स्वर्गीचे वैभवही आपल्या आराध्य देवतेच्या भक्तीपुढे गौण वाटणे, हेच त्या देवतेच्या पूर्ण कृपेचे द्योतक आहे. हेच भक्तीचे अंतिम फळ आहे. तुझ्या मनांत उद्भवलेली ही दत्तदर्शनाची इच्छा कल्याणकारी आहे. तू आता अनन्यभावानें त्यांना शरण जा, तेच तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करतील." गर्गमुनींचा हा हितोपदेश ऐकून अर्जुनाचे मन भक्तिभावाने भरून आले. अतीव श्रद्धेने त्याने आपल्या कुलगुरूंना प्रणिपात केला आणि कृतार्थभावाने म्हणाला, " गुरुवर्य, दत्तचरणांची भक्ती आपण माझ्या हृदयांत उपजविली, याबद्दल मी आपला सदैव ऋणी आहे. माझ्यावर सत्वर दत्तकृपा व्हावी, असा आपण मला आशीर्वाद द्या. दत्तदर्शनासाठी मी अतिशय उत्सुक झालो आहे, आपण आता मला आज्ञा द्यावी." गर्गमुनींनी तथास्तु असे आशीर्वचन देताच अर्जुनाने श्री दत्तप्रभूंच्या सह्याद्रीवरील आश्रमाकडे प्रयाण केले.

क्रमश:


Feb 10, 2021

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय ९


कर्मफल मीमांसा, श्री साईबाबा व गाडगे महाराज अवतार संकेत, श्री सच्चिदानंदावधूतांचा धर्मनिर्णय, आणि पंचमहाभूतांची साक्ष

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच तिरुमलदास आणि शंकरभट्ट यांनी स्नानसंध्यादि नित्यान्हिक उरकले. त्यानंतर प्राणायाम करून मन एकाग्र केले. अशा रितीनें, सबाह्य अभ्यंतरीं शुद्ध होऊन ते दोघेही श्रीपाद श्रीवल्लभांचे ध्यान करू लागले. तो गुरुवारचा शुभ दिवस होता. हळू हळू सूर्यनारायणांचे पृथ्वीतलांवर आगमन होऊ लागले. सूर्याच्या त्या प्रथम किरणांत तिरुमलदास आणि शंकरभट्ट या दोघांनाही त्यांच्या आराध्यदेवतेचे दर्शन झाले. अत्यंत तेजस्वी, दिव्य आणि मनोहर अशा षोडशवर्षीय युवकाच्या रूपांत झालेले श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे ते क्षणिक दर्शन त्यांना मंगलप्रद वाटले. मात्र त्यावेळीं एक अकल्पित घटना घडली. श्रीपाद प्रभूंना नैवैद्य म्हणून जे चणे ठेवले होते, त्यावर सूर्यकिरणें पडताच ते चणे लोखंडात रूपांतरित झाले. लोखंडाचे ते चणें पाहून शंकरभट्ट खिन्न झाले. आपल्या हातून काही प्रमाद घडला असावा का अथवा भविष्यकालीन घटनेचे हे सूचक आहे का?, ह्या विचाराने ते कष्टी झाले. या शंका निवारणार्थ आपण तिरुमलदासाशीच बोलावे, असा विचार करून शंकरभट्ट वळले. एव्हढ्यात, तिरुमलदासच बोलू लागले, " शंकरा, आज दुपारीच तू भोजन करून कुरवपुरांस प्रयाण करावेस, असा श्री दत्तप्रभूंचा आदेश झाला आहे. आजचा दिवस अतिशय शुभ आहे. श्री दत्त क्षेत्री दररोज माध्यान्हकाळीं प्रत्यक्ष दत्तमहाराज भिक्षा मागतात, ह्या गोष्टीचे तू नित्य स्मरण ठेव."

त्यावर शंकरभट्ट लीनतेने उत्तरले, " स्वामी, आपल्यासारख्या ज्येष्ठ भक्ताकडून मी दररोज श्री दत्तप्रभूंचे अवतार, त्यांच्या कथा, वेद निरुपणादी श्रवण करीत होतो. आपल्या रसाळ वाणीतून श्रीपाद प्रभूंचे अनुभव, त्यांच्या लीला ऐकतांना अनिर्वचनीय असा आनंद मला मिळत होता. तसेच आपल्या आदरातिथ्याबद्दलही मी आपला ऋणी आहे. आज मात्र माझ्या मनांत एक शंका उद्भवली आहे. प्रातःकाळी अर्चन करतांना श्रीपादस्वामींना नैवेद्य म्हणून अर्पण केलेले चणे लोखंडाचे झाले, या घटनेने मी खिन्न झालो आहे. आपण कृपया माझ्या ह्या संशयाचे निरसन करावे अशी मी आपणांस प्रार्थना करतो." तेव्हा, शांत स्वरांत तिरुमलदास म्हणाले, " शंकरभट्टा, हा या कलियुगाचा महिमा आहे. ज्याप्रमाणे खनिजद्रव्यांत चैतन्य निद्रावस्थेत असते, त्याचप्रमाणे सांप्रत कली प्रबळ झाल्यामुळे मनुष्य देहांत आस्तिकता, चैतन्य असेच निद्रावस्थेंत राहील. प्राणशक्तीत असलेले हे चैतन्य वेदोक्त आराधना, योगसाधना, जप-ध्यानादी उपायांनी हळूहळू विकसित होते. मानवी देहाच्या मूलाधारात सुप्तरूपांत असलेले हे चैतन्य जागृत झाल्यास साधकांस निर्विकल्प समाधीचा अनुभव येतो आणि तो त्या परब्रह्माशी एकरूप होतो. या स्थितीत तो कर्मबंधनांतून मुक्त होतो. मानवी मन हे अतिशय चंचल असते, मात्र श्री प्रभूंचे अतिमानस हे कल्पनातीत, अगम्य आणि प्रकाशाच्या वेगापेक्षाही असंख्य पटीने अधिक वेगवान आहे. प्रत्येक क्षणी कोट्यावधी साधकांनी, भक्तांनी, प्राणिमात्रांनी केलेल्या प्रार्थना श्रीपाद प्रभूचरणीं पोहोचतात. ह्या अनंत कोटी ब्रह्माण्डाचे सृजन-पालन आणि संहार करणारे श्री दत्तात्रेयच सगुण साकार मनुष्य देह धारण करून श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपांत आपल्या भक्तांस दर्शन देत असतात."

तिरुमलदासाचे हे स्पष्टीकरण ऐकून शंकरभट्टांचे समाधान झाले, पण किंचित चिंताग्रस्त होत ते म्हणाले, " प्रभू श्रीपादांच्या ह्या कथा ऐकतांना मला कितीतरी वेळा त्यांच्या अस्तित्वाची, सान्निध्याची जाणीव झाली. ह्या सृष्टीरचनेतील अनेक रहस्यें, वेदांतील क्लिष्ट तत्त्वें, भगवंताचे स्वरूप अशा अनेक विषयांवर आपण विस्तृत निरूपणही केले. मात्र वेदांनाही ज्यांचे वर्णन करणे शक्य नाही, असे अनंत, दिव्य स्वरूपी परमगुरु यांचे हे अथांग चरित्र मी कसे लिहावे ? हे अद्भुत कार्य माझ्याकडून घडेल का ? याविषयीं माझे मन साशंक आहे." तेव्हा, अत्यंत आश्वासक स्वरांत तिरुमलदास म्हणाले, " वत्सा, श्रींचे हे चरित्र लेखन तुझ्या हातूनच होणार आहे, हे विधिलिखित सत्य आहे. केवळ या शुभ कार्यासाठीच तुला श्रीपादांचे अनेक भक्तश्रेष्ठ त्यांचे अनुभव सांगतील आणि तू ते लेखणीबद्ध करशील. स्वतः श्रीपाद प्रभूच त्यांचे हे दिव्य चरित्र लिहितील, तू केवळ निमित्तमात्र असशील अशी दृढ श्रद्धा ठेव. त्या परब्रह्मास तू अनन्यभावाने शरण जा आणि मग तुला त्यांच्या कृपेची अनुभूती निश्चितच येईल."

महर्षी अत्रि आणि महासती अनसूया यांच्या भक्तीनें प्रसन्न होऊन परमगुरु श्री दत्तात्रेय त्रिगुणात्मक त्रैमूर्तीच्या स्वरूपांत अवतार घेते झाले. पूर्वायुगांतील श्री दत्त हेच श्रीपाद श्रीवल्लभ आहेत का ? अशी शंका तुझ्या मनांत निर्माण झाली. त्या शंकेचे निवारण करण्यासाठीच प्रभूंनी हे नैवेद्याचे चणे लोखंडात रूपांतरित केले. ह्या जन्म-मृत्यूच्या चक्रास कारणीभूत असलेले हे अज्ञान नष्ट करून आपल्या भक्तांस मोक्ष-कैवल्य आदींचा लाभ करून देण्यासाठीच हा अवतार झाला आहे. मनुष्याच्या अध:पतनाचे लक्ष मार्ग असतील तर तो परमकृपाळू परमात्मा दशलक्ष मार्गांनी आपल्यावर अनुग्रह करतो. त्या करुणासागर प्रभूंना अनन्यभक्तीनें शरण गेल्यास मनुष्यास शाश्वत सुख प्राप्त होते. सलग तीन अहोरात्र श्रीपाद प्रभूंचे निरंतर मनःपूर्वक स्मरण अथवा ध्यान केले असता, त्या साधकास श्रीपाद प्रभूंचे साक्षात दर्शन होते. केवळ स्मरणमात्रेच प्रसन्न होणाऱ्या श्री दत्तप्रभूंचा हा आद्य अवतार आहे. त्यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवून आपण आध्यात्मिक प्रगती साधावी. तिरुमलदासाने श्री गुरूंचा असा महिमा सांगूनदेखील शंकरभट्टांच्या मनांतील संशय पूर्णत: दूर झाला नव्हता. कुशंकाग्रस्त मनानेच ते विचार करू लागले, " श्रीपाद श्रीवल्लभ जर खरोखरच श्री दत्तात्रेयांचे अवतार असतील, तर प्रभू मला भगवान श्रीकृष्णांचे निर्वाण कधी झाले, या कलियुगाचा आरंभ दिन कुठला याविषयीं दृष्टांत देतील." शंकरभट्ट असा विचार करतच होते तेवढ्यात कानठळ्या बसतील असा प्रचंड ध्वनी झाला. अनपेक्षितपणे झालेल्या त्या मोठ्या आवाजाने शंकरभट्टांची श्रवणशक्ती, तर तिरुमलदासाची वाचाशक्तीच नष्ट झाली. खूप प्रयत्न करूनसुद्धा त्यांच्या मुखातून एक शब्दही निघत नव्हता आणि शंकरभट्टांस काहीच ऐकू येत नव्हते. इतक्यात तिथे नैवेद्यासाठी म्हणून ठेवलेले चणे जे लोखंडाचे झाले होते, ते चणे हळूहळू '' श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये '' या दिव्य मंत्राक्षरांत आकारबद्ध झाले. त्या चण्यांवरच एक धवल पत्र प्रगटले आणि त्या तलम पत्रावर अक्षरें उमटू लागली - श्रीकृष्णांचे निर्वाण ख्रिस्त पूर्व ३१०२ साली झाले. त्यानंतर प्रमादी नामक संवत्सरात चैत्र शुद्ध प्रतिपदेला शुक्रवारी, अश्विनी नक्षत्र सुरु झाल्यावर कलियुगाचा प्रारंभ झाला. ते अनाकलनीय दृश्य पाहून शंकरभट्ट अतिशय भयभीत झाले, आपल्या वर्तनाचा त्यांना पश्चात्ताप होऊ लागला. त्यांनी मनोमन श्रीपादप्रभूंची क्षमायाचना केली. अन काय आश्चर्य ! त्याच क्षणी ते सर्व विरून गेले आणि लोखंडाचे चणे पूर्ववत झाले. ते पाहून त्या करुणासागर प्रभूंनी आपल्या अनंत अपराधांबद्दल क्षमा केली, या विचाराने शंकरभट्ट सदगदित झाले आणि ते कृतार्थभावाने तिरुमलदासाकडे पाहू लागले. त्यावेळीं, तिरुमलदासाच्या मुखावर जणू ब्रह्मतेजचं विलसत आहे, असे त्यांना भासले. मंद स्मितहास्य करीत तिरुमलदास बोलू लागले, " शंकरा, श्रीपादप्रभूंचा पुढील अवतार लवकरच महाराष्ट्र देशांत श्री नृसिंह सरस्वती म्हणून होणार आहे. माझी बाळकृष्णांवर श्रद्धा आहे, हे तू जाणतोच. श्रीपादप्रभूंची आपल्या भक्तांवर जन्मोजन्मी कृपादृष्टी असते. माझ्या पुढील जन्मातही समर्थ सद्गुरू रूपांत अवतारित झालेल्या साई बाबा यांच्याकडून मला अनुग्रह प्राप्त होईल. गाडगे महाराज या नावाने मी पुन्हा रजक कुळांत जन्म घेईन. ' गोपाला ! गोपाला ! देवकीनंदन गोपाला !' या नाम मंत्राने मी पुन्हा माझ्या कृष्णभक्तीत रंगून जाईन."

तिरुमलदास पुढे म्हणाले, " प्रत्येक जीवास आपल्या कर्माचे फळ हे भोगावेच लागते. प्रत्यक्ष भगवंताचीदेखील त्यातून सुटका नाही. मात्र मनुष्य पुण्यसंचय, दानधर्म, सत्पुरुषांची सेवा आदी साधनांद्वारे आपल्या पापकर्मांचा क्षय करू शकतो. परमेश्वर, संत-माहात्मे, अवतारी पुरुष, सद्गुरू पुण्यस्वरूप असल्याने त्यांना शरण आलेल्यांची संचित पाप कर्मे ते आपल्या योगसामर्थ्याने दग्ध करू शकतात. त्यांना भक्तिभावाने अर्पण केलेल्या उपचारांनीसुद्धा कर्मांची तीव्रता कमी होऊ शकते, अर्थात जशी श्रद्धा, भक्ती आणि भाव तसेच फळ मिळते. त्यांच्या चरणीं आर्ततेनें केलेली प्रार्थना त्वरित फलित होते. शंकरा, भावेंविण भक्ती नाही आणि भक्तीविण मुक्ती नाही, हेच सत्य आहे. श्रीपाद प्रभू त्यांच्या शरणागतांचे कर्मदोष काही वेळा निर्जीव पाषाण-दगड यांना भोगावयास लावून त्या पातकांचे निवारण करत असत. तुला, मी याविषयीची एका भक्ताची कथा सांगतो."

सुमती महाराणी श्रीपादांना त्यांच्या जन्मापासून पुरेसे स्तनपान करू शकत नसे. श्री आपळराज यांच्या घरी एक गाय होती, मात्र तिचे दूध अगदीच कालाग्निशमन दत्तांच्या नैवैद्यापुरतेच मिळायचे. कधी कधी त्या वंशपरंपरागत दत्तमूर्तीस नैवैद्य दाखवायच्या आधीच श्रीपाद ते दूध देवघरांत जाऊन प्राशन करायचे. त्या दिवशी आपळराज मग देवास गुळाचा नेवैद्य दाखवून उपवास करायचे. पतीस उपवास घडल्यामुळे सुमती महाराणीदेखील उपवास करीत असे. आपल्या या दिव्य शिशुस आपण पुरेसे दूध देऊ शकत नाही, या विचारांनी ते सदाचारी माता-पिता दुःखी होत असत. श्री आपळराज स्वतः वेदशास्त्र पारंगत होते. केवळ पौरोहित्य करून मिळणाऱ्या दक्षिणेवरच ते आपला प्रपंच करीत होते. वेंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंहराय वर्मा आणि सासरे श्री सत्यऋषिश्वर (श्री बापन्नार्य) यांच्याकडूनदेखील ते कधीही दान घेत नसत. एके दिवशी सुमती महाराणीने आपल्या पतीस, माझ्या दुधाने बाळ श्रीपादांची भूक भागत नाही, यासाठी एक गोदान स्वीकारण्याची विनवणी केली, मात्र आपळराजांनी त्यास नकार दिला.

श्री आपळराज शर्मा यांचे वडील श्रीधररामराज शर्मा वेलनाड्डु येथील ग्रामाधिकारी होते. वेळ प्रसंगी करवसुलीसाठी त्यांना धर्माविरुद्ध जाऊन आचरण करावे लागत असे. याच पिढीजात कर्मदोषांमुळे आपळराज-सुमती महाराणी यांच्या दोन पुत्रांस जन्मतः वैगुण्य आले होते. प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंचा अवतार असलेल्या श्रीपादांनादेखील हे प्रारब्ध भोगावे लागले, त्यांमुळेच त्यांना पुरेसे दूध मिळू शकत नव्हते. कर्मचक्राचा हा नियम प्रत्यक्ष भगवंतांलाही लागू होतो, हेच आपल्या भक्तांना दाखविण्यासाठी प्रभूंनी ही लीला केली.

श्री वेंकटप्पय्या श्रेष्ठी आणि नरसिंहराय वर्मा हे दोघेही श्रीपादांवर पौत्रवत प्रेम करीत असत. बाळ श्रीपादांच्या या दुग्ध समस्येचे निवारण करण्यासाठी त्यांनी एक उपाय योजना केली. श्री नरसिंह वर्मांची एक शुभ लक्षणयुक्त गाय श्रेष्ठींनी विकत घेतली. गोमाता विक्रय करून आलेले ते सर्व धन श्री वर्मांनी आपळराजांस पौरोहित्यानिमित्त दक्षिणा म्हणून दिले. मात्र वेदशास्त्रनियमांचे कठोर पालन करणाऱ्या आपळराजांनी ते सर्व द्रव्य न घेता केवळ धर्ममान्य असलेलीच दक्षिणा स्वीकारली. तेव्हा, मी क्षत्रिय आहे आणि एकदा दान दिलेले द्रव्य मी परत घेऊ शकत नाही, असे म्हणत वर्मांनी ती उरलेली दक्षिणा स्वीकारण्यास नकार दिला. हा वादविवाद मिटवण्यासाठी अखेर ब्राह्मण परिषद बोलावण्यात आली. शास्त्राज्ञांचा परामर्श घेऊन त्या सभेत श्री बापन्नार्यानी '' आपळराज शर्मानी अस्वीकार केलेले हे धन ज्यांना घ्यावयाचे असेल त्यांनी घ्यावे.'' असा निर्णय दिला. एक शुभलक्षणीं गाय विकत घेण्यास पुरेसे असलेले ते धन आपणांस मिळावे या हेतूने अनेक ब्राह्मणांत चढाओढ सुरु झाली. ग्रामांतील पापय्या शास्त्री नामक एका वेदाध्ययनी ब्राह्मणाने आपण श्रेष्ठ दत्तभक्त आणि धर्मपरायण असून सत्पात्री आहोत, असे मोठ्या चातुर्यतेने सर्वांस समजाविले. ब्रह्मवृंदांनीही ते धन त्या ब्राह्मणास देण्याचा निर्णय दिला.

ते स्वीकारून पापय्या शास्त्री स्वतःवरच खूष होत आपल्या घरी परतला. तेव्हा, तिथे त्याचे मामा भेटण्यासाठी आलेले दिसले. त्यांचे स्वागत करून, ' आपण आता भोजनासाठी इथेच थांबावे.' अशी पापय्याने विनंती केली. त्यावर, ' मी वर्षातून केवळ एकदाच भोजन करतो. मात्र आपण लवकरच भेटू.' असे म्हणून त्याचे मामा त्वरेनें तिथून निघून गेले. ते विचित्र बोलणें ऐकून पापय्या शास्त्री संभ्रमात पडले. त्याचवेळी, त्याची पत्नी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, " स्वामी, तुमचे एकुलते एक मामा तर गतवर्षीच वारले. मग अगदी त्यांच्यासारखेच दिसणारे हे कोण होते ?" पत्नीचे हे बोलणे ऐकताच पापय्या शास्त्रीच्या पायाखालची जमीनच सरकली. आपण मृतात्मा तर पाहिला नाही ना ? या भीतीने त्यांची गाळण उडाली. आपले उपास्य दैवत श्री दत्तात्रेय यांची आपल्यावर अवकृपा झाली का ? आपल्या हातून काही अक्षम्य गुन्हा घडला का ? असा विचार करीत पापय्या श्री स्वयंभू दत्तात्रेय कुक्कुटेश्वराच्या मंदिरात गेला. तेव्हा मार्गांत काही अपशकुनही झाले. त्या दिवशी तो एकाग्रतेने दत्तप्रभूंचे ध्यान, जप वा इतर साधना काहीच करू शकला नाही. विमनस्क अवस्थेतच तो घरी परतला. तेव्हा, त्याला आपली पत्नी सुवासिनी न दिसता गतधवा दिसू लागली. पापय्याचे ते विचित्र वर्तन आणि दिवसभरांत घडलेल्या घटना पाहून त्याची पत्नी चिंताग्रस्त झाली. श्रीपादप्रभू दत्तावतारी आहेत, अशी तिची पहिल्यापासूनच दृढ श्रद्धा होती. त्यांनाच आपण आता शरण जावे असा विचार करून ती श्रीपाद स्वामींकडे आली आणि आपल्या सौभाग्याचे रक्षण करावे, अशी तिने त्यांना आर्त प्रार्थना केली. श्रीपादांनाही तिच्या अढळ निष्ठेला, उत्कट भक्तीला दाद द्यावीच लागली. प्रभूंनी पापय्याच्या पत्नीला नूतन गृह प्रवेश आणि विधीवत वास्तुपूजा करावयास सांगितली.

श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार तिने पीठिकापुरांतील काही प्रतिष्ठित आणि सदाचारसंपन्न व्यक्तींना नवीन गृह बांधण्यासाठी मदतीची याचना केली. अशा रितीने, थोडी आपली जमापुंजी खर्चून, गरजेनुसार ऋण काढून आणि काही मदत घेऊन लवकरच पापय्या शास्त्रींचे नवीन गृह निर्माण झाले. अर्थात श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर सर्व कार्ये निर्विघ्नपणें पार पडणारच, यांत काही शंकाच नाही. नूतन प्रवेश केल्यावर पापय्या शास्त्रींचा सर्व त्रास नाहीसा होऊन ते पूर्ववत झाले.

" शंकरा, तुला या कथेतील कर्मफल रहस्य कळले का ? पापय्या शास्त्रींची मृत्यूदशा सुरु होती, त्यांच्या कुंडलीत अपमृत्यूचा योग होता. श्रीपाद प्रभूंनी त्याला मानसिक त्रास, जननिंदा, धनव्यय अशा प्रकारचे कष्ट देऊन त्याच्या कर्मदोषांचे निवारण केले. नूतन गृह बांधतांना जे मोठे पाषाण अथवा पर्वतशिला फोडल्या जात होत्या, त्या क्षणीच श्रीपादांच्या कृपादृष्टीमुळें पापय्याच्या पातकांचीही शकले होत होती. आपण थोर दत्तभक्त आहोत, त्यांमुळे कुक्कुटेश्वर मंदिरातील पाषाणमूर्ती सर्वदा आपले रक्षण करील अशा अहंकारांत पापय्या शास्त्री होता. मात्र पीठिकापुरांत बालकरूपांत असलेल्या आपल्या आराध्य देवतेला तो ओळखू शकला नाही. श्रीपादांना तो श्रद्धापूर्वक शरण आला असता, तर आपल्या योगाग्नीनें प्रभूंनी सहज त्याच्या कर्मदोषांचा क्षय केला असता. ' जेथें सप्रेम नाही भगवंताची भक्ती तेथे कर्मे अवश्य बाधिती ॥' या उक्तीचा त्याला पुरेपूर अनुभव आला. मात्र त्याच्या पत्नीच्या भावभक्तीनुसार त्याला भगवंताचा अनुग्रह प्राप्त झाला. श्रीपादांचा असा कृपानुभव घेतल्यावर मात्र पापय्याने ते दत्तप्रभूंचे अवतार आहेत हे ओळखले आणि त्याची श्रद्धा त्यांच्या चरणीं दृढ झाली.

श्री श्रेष्ठी आणि श्री वर्मा मात्र अजूनही बाळ श्रीपादांच्या दुग्ध समस्येचे निवारण न झाल्याने चिंतीत होते. त्या दोघांनी श्री बापन्नार्यांशी याविषयी चर्चा केली. आपल्या नंदिनीसमान असलेल्या धेनूचे क्षीर श्रीपादांस मिळावे, यासाठी ही गोमाता आम्ही आपल्या गोठ्यांत आणतो, अशी त्यांनी श्री बापन्नार्यांस विनंती केली. मात्र, आपले श्वशुर बापन्नार्य यांच्याकडूनही गोदान घेण्यास श्री आपळराजांनी नकार दिला. त्याच सुमारास हिमालयातील सतोपथ या प्रांतामधील श्री सच्चिदानंदावधूत नामक ज्येष्ठ आणि वयोवृद्ध महायोगींचे पीठिकापुरांत आगमन झाले. ते कैवल्यश्रुंगी येथे असलेल्या श्री विश्वेश्वरप्रभूंचे शिष्य होते. श्री प्रभू दत्तात्रेयांच्या आद्य अवताराचे दर्शन तू घेऊन कृतार्थ व्हावेस, असा त्यांच्या गुरूंचा सच्चिदानंदावधूतांना आदेश झाला होता. श्री बापन्नार्यांनी त्यांचा यथायोग्य आदरसत्कार केला. एके दिवशी, त्या वयोवृद्ध तपस्व्यांना बापन्नार्यांनी आपळराज आपणाकडून गोदान स्वीकारण्यास नकार देत असून आपण काही तरी मार्ग सुचवावा, अशी प्रार्थना केली.

तेव्हा, ब्राह्मण परिषदेत हा प्रश्न मांडला गेला. श्री सच्चिदानंदावधूत यांनी, " श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तात्रेय आहेत. आपण अजाण लोकांनी व्यर्थ नियम बंधनात न पडता प्रभूंना गोरस अर्पण करण्याच्या या सुवर्णसंधीचा लाभ घेतला पाहिजे." असे निक्षून सांगितले. सभेतील काही ब्रह्मवृंदाने यांवर आक्षेप घेत, बाळ श्रीपाद हे दत्तात्रेय असल्याचे त्यांना साधार सिद्ध करण्यास सांगितले. त्यावेळी, त्या श्रेष्ठ योग्याने आपल्या तप:सामर्थ्याने पंचमहाभूतांना साक्ष देण्यास सांगितले. त्यांच्यावर गुरु श्री विश्वेश्वरप्रभूंचा वरदहस्त होताच. भूमाता, वरुण, अग्नि, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी, " श्रीपाद श्री दत्तप्रभूच आहेत. सत्य ऋषीश्वरांनी श्री श्रेष्ठीकडून गोदान घ्यावे आणि श्वशुरांनी जामातास प्रीतिपूर्वक दिलेली भेट हे दान होत नाही, त्यांमुळे आपळराज शर्मा यांनी त्या गोमातेचा स्वीकार करावा." अशी साक्ष दिली. हा धर्मसंमत निर्णय मान्य करून आपळराजांनी श्री बापन्नार्यांनी दिलेली गोमाता भेट म्हणून स्वीकारली. त्या प्रसंगी, नरसिंह वर्मा यांनी त्या धेनुची विक्री करून मिळालेले धन आपले कुलपुरोहित असलेल्या आपळराज शर्मा यांस दक्षिणा म्हणून देण्याचा मानस व्यक्त केला. श्री सच्चिदानंदावधूत यांनीही त्यास अनुकूलता दर्शविली. अशा प्रकारें त्या ज्येष्ठ मुनींच्या योग्य मार्गदर्शनाने श्रेष्ठी आणि वर्मा या दोघांस अपूर्व पुण्यसंचयाचा अलभ्य लाभ झाला.

भविष्यकाळांत, श्रीपाद श्रीवल्लभांच्या आशीर्वादाने पीठिकापुर महासंस्थान म्हणून उदयास येईल. श्रीपादांचे चरित्र संस्कृत भाषेत लिहिले जाईल. त्यानंतर '' श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत '' हा ग्रंथ प्रकाशित होईल. भूर्जपत्रात लिहिलेला मूळ ग्रंथ, श्रीपादांच्या जन्मस्थानी जमिनीखाली अदृश्यरूपांत राहील. त्या परम पवित्र स्थानी त्यांच्या पादुकांची स्थापना आणि मंदिर निर्माण होईल. प्रत्यक्ष श्रीपाद प्रभूंना गोदान केलेल्या महापुण्यशाली वेंकटप्पय्या श्रेष्ठी यांच्या वंशावर लक्ष्मीची कृपा असेल. आपल्या पुण्यसंचयामुळे या जन्मानंतर ते हिरण्यलोकात काही काळ राहतील. श्रीपाद श्रीवल्लभांच्या पुढील श्री नृसिंह अवतारांतदेखील ते ऐश्वर्यसंपन्न वैश्य कुळात जन्म घेतील आणि त्यांना प्रभूंचे सान्निध्य आणि दर्शन यांचा लाभ होईल. " शंकरा, गोदान हे विशेष शुभप्रद आहेच, त्यांतून प्रत्यक्ष भगवंताला केलेल्या त्या दानाचे अपूर्व असे फळ मिळणार यांविषयी तिळमात्र शंकाच नाही. प्रभूंच्या आदेशानुसार, तू आता कुरवपुरास प्रयाण करावेस. श्रीपाद श्रील्लभ सदैव तुझी रक्षा करतील.", असे म्हणून तिरुमलदासाने शंकरभट्टांस निरोप दिला.

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय फलश्रुती - प्रारब्ध, कर्मदोष नाश