Apr 26, 2024

श्रीनृसिंहतात्यामहाराजकृत श्रीमाणिकप्रभूंची आरती


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


जय देव जय देव जयगुरू माणिका । सद्‌गुरु माणिका ।  तव पद मोक्ष आम्हां न स्मरू आणिका ॥धृ.॥ काया वाचा मनें शुद्ध मी शरण तुसी । ठेवुनी मस्तकि हस्तक ज्योती मिळविसी ।  मुमुक्षूला मोक्ष क्षणार्धे तूं देशी । दाउनि चारि देह ब्रह्मा म्हणवीसी ॥१॥ देहातीत विदेही योगी मुगुटमणी । कर्म शुभाशुभ करिसी हेतू नाही मनीं । राजा अथवा रंक पाहसी सम दोनी । तवसम साधू असती परि योगित्वासि उणी ॥२॥ परोपकारी अससी वर्णू काय किती । अकल्पिता तूं देसी करू मी काय स्तुती ।  वर्णाया गुरुमहिमा शेषा नाहि मती । जग ताराया आलासी अंशत्रयमूर्ती ॥३॥  सुरवर इच्छिति दर्शन घेऊं आम्हि त्यासी । देवादिकां अप्राप्त प्राप्त तू आम्हासी ।  पडता चरणीं मी मुक्त होईन म्हणे काशी । सुकृत बहु जन्मांचें नरसिंहापाशी ॥४॥


॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥



Apr 17, 2024

॥ अवतरला रघुनंदन । पूर्णब्रह्म जगद्‌गुरु ॥


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीराम श्रीराम श्रीराम

सर्व दत्तभक्तांना श्रीरामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा !


वसंतऋततु चैत्रमास । शुक्लपक्ष नवमी दिवस । सूर्यवंशीं जगन्निवास । सूर्यवासरीं जन्मला ॥
माध्यान्हा आला चंडकिरण । पुष्य नक्षत्र साधून । अवतरला रघुनंदन । पूर्णब्रह्म जगद्‌गुरु ॥
श्रीराम केवळ परब्रह्म । त्यासी जाहला म्हणतां जन्म । संत हांसतील परम । तत्त्वज्ञानवेत्ते जे ॥

ज्याची लीला ऐकतां अपार । खंडे जन्म मृत्यु दुर्धर । त्या रामासी जन्मसंसार । काळत्रयीं घडेना ॥

सारी अयोध्या ज्या घटनेची वाट पाहत होती ती घटना व घटीका जवळ येत होती. अति शुभदायी असा चैत्र महिना आला. दशरथाची महाराणी कौसल्या आता आसन्नप्रसवा झाली होती. तिच्या सुंदर मुखावर अलौकिक असे तेज दिसत होते. अयोध्या नगरीत सर्वत्र शुभशकून होत होते. चैत्रातील शुद्ध नवमी तिथी उगवली आणि कौसल्येला प्रसूती वेदना सुरु झाल्या. सूर्य नारायण मध्यान्ही आले, तेव्हा कौसल्या महाराणी प्रसूत होऊन तेजःपुंज सावळ्या रंगाचा पुत्र जन्माला आला. जणू काही पृथ्वीतलावर त्यावेळी वसंतऋतूला अत्यंतिक बहर आला, सर्व सुरवर आपापली विमाने घेऊन अयोध्या नगरीवर गगनातून स्वर्गातील पुष्पांची वृष्टी करीत होते ! कौसल्येचा पुत्र म्हणून जन्म घेण्याआधी श्रीहरि विष्णूंनी एक अद्भुत लीला केली. केवळ कौसल्येसाठी ते श्रीपती पद्म-शंख-चक्र-गदाधारी अशा चतुर्भुज रूपांत प्रगट झाले.

ते कौसल्या सती बैसली असतां एकांतीं तों अष्टदश वरुषांची मूर्ति सन्मुख देखे अकस्मात ॥

लक्ष्मी, सरस्वती आणि गंगा यांनी त्यांच्या दिव्य चरणांचा आश्रय घेतला होता. त्यांचे तेज सूर्य चंद्रापेक्षाही अवर्णनीय होते.

संध्याराग अरुण बालार्क दिव्य रत्नांचे काढिले रंग देख तळवे तैसे सुरेख श्रीरामाचे वाटती ॥

सहस्र विजांच्या प्रकाशासम तेजस्वी असा पीतांबर दिसत होता तर मेखलेचे मणी म्हणजे जणू शीतल झालेले सूर्य भासत होते. त्यांनी धारण केलेल्या घागऱ्यांचे कोमल ध्वनी जणू वेद ऋचांशी स्पर्धा करीत होते.

कंठात सूर्यासारखा तेजस्वी कौस्तुभ मणी होता. शंख, चक्र, गदा व पद्म अशी भ्रषणे चारी हातांत होती. त्या चारी हातांना सुवर्ण भूषणे शोभत होती.

श्यामलांगी अति निर्मळ वरी डोले वैजंतीची माळ अनंत भक्त हृदयीं धरिले तरीच वक्षःस्थळ रुंदावलें ॥

जणू कोट्यावधी मदनांच्या सौंदर्यासम त्या त्रिलोकेशाच्या मुद्रेचे कसे वर्णन करावे बरें ?

कंबुकंठ अति शोभत नासिक सरळ सुकुमार बहुत मंदिस्मितवदन विराजत कोटि मन्मथ ओंवाळिजे ॥ विद्रुमवर्ण अधर सतेज माजी ओळीनें झळकती द्विज त्या तेजें शशी नक्षत्रें तेजःपुंज झांकोळती पाहतां ॥ त्रैलोकींचा मेळवोनि आनंद ओतिलें रामाचें वदनारविंद आकर्ण नेत्र भु्रकुटी विशद धनुष्याकृति शोभती स्वानंदसरोवरींचीं कमलदलें तैसे आकर्ण नयन विकासले त्या कृपादृष्टीनें निवाले प्रेमळ जन सर्वही 

कौसल्येने ते केशवाचे अतिमोहक रुप डोळे भरून पाहिले अन कौसल्या बोले ते अवसरीं भक्तवत्सला मधुकैटभारी तूं आतां बाळवेष धरीं माझें उदरीं अवतरें ॥

हे भगवंता ! आतां तू बाल स्वरूप हो. लोक म्हणतील कौसल्यानंदन ॥ ऐसा होय तूं मनमोहन ॥"

कौसल्यामातेने केलेली ही प्रार्थना ऐकताच श्रीहरि विष्णूंनी आपले विराट दिव्य स्वरूप आवरले आणि तिच्यापुढे ते बालकरूपांत प्रकट झाले !

सजलजलदवर्ण कोमळ तो कौसल्येपुढें जाहला बाळ तंव ते परम सुवेळ पुष्यार्कयोग ते समयीं ॥

जो क्षीरसागरवासी तमालनीळ तो कौसल्येपुढें जाहला बाळ चरणांगुष्ठ धरोनि कोमळ मुखकमळीं घालीतसे

महाराणी कौसल्या प्रसूत झाली आणि राजपुत्र जन्मला, ही वार्ता अयोध्या नगरीत पसरली. अयोध्याजन आनंदोत्सव साजरा करू लागले.

थोड्याच वेळांत राणी सुमित्रेस पुत्रप्राप्ती झाली, ही शुभ वार्ता नगरांत पसरली. अयोध्यावासियांचा आनंद द्विगुणित झाला, तोच राणी कैकयीस जुळे पुत्र झाले हे सुखद वर्तमान सर्वांस कळविण्यांत आले. असा तिथे मोठा आनंदसोहळा झाला.

तों सुमित्रेसी जाहला पुत्र म्हणोनि धांवत आले विप्र कैकयीस जाहले दोन कुमर ते विष्णूचे शंखचक्र अवतार क्षीरसागरींहूनि श्रीधर कौसल्येमंदिरी पातला ॥ 

तेरावे दिवशीं वसिष्ठऋषि नामकरण ठेवी चौघांसी कौसल्येचा राम तेजोराशी जो वैकुंठवासी जगदात्मा ॥ सुमित्रेचा नंदन त्याचें नाम ठेविलें लक्ष्मण जो काद्रवेयकुलभूषण विष्णु शयन ज्यावरी करी ॥ कैकयीचे जे कां सुत भरत शत्रुघ्न निश्चित चौघे दशरथी जगविख्यात जाहले ॥

रघुवंशाची पुण्याई फळांस आली होती, भगवंताने बालस्वरूप धारण करून दशरथाचा पुत्र म्हणून अवतार घेतला होता.

पुराणपुरुष परात्पर तो ब्रह्मानंद श्रीधरवर अयोध्येंत अवतरला साचार ॥

॥ श्रीराम श्रीराम श्रीराम


श्रीरामचंद्रांचा पाळणा


बाळा जो जो रे कुळभूषणा । दशरथनंदना । निद्रा करि बाळा मनमोहना । रामा लक्षुमणा ॥धृ॥ पाळणा लांबविला अयोध्येसी । दशरथाचे वंशी । पुत्र जन्मला हृषीकेशी । कौसल्येचे कुशी ॥१॥ रत्नजडित पालख । झळके अलौकिक । वरती पहुडले कुलदिपक । त्रिभुवननायक ॥२॥ हालवी कौसल्या सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी । पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जती जयजयकार ॥३॥ विश्‍वव्यापका रघुराया । निद्रा करी बा सखया । तुजवर कुरवंडी करुनिया । सांडिन आपुली काया ॥४॥ येऊनि वसिष्ठ सत्वर । सागे जन्मांतर । राम परब्रहा साचार । सातवा अवतार ॥५॥ याग रक्षुनिया अवधारा । मारुनि रजनीचरा । जाईल सीतेच्या स्वयंवरा । उद्धरि गौतमदारा ॥६॥ पर्णिले जानकी सुरुपा । भंगुनिया शिवचापा । रावण लज्जित महाकोप । नव्हे पण हा सोपा ॥७॥ सिंधूजलडोही अवलीळा । नामे तरतिल शिळा । त्यावरी उतरुनिया दयाळा । नेईल वानरमेळा ॥८॥ समूळ मर्दूनि रावण । स्थापिल बिभीषण । देव सोडविले संपूर्ण । आनंदले त्रिभुवन ॥९॥ राम भावाचा भुकेला । भक्ताधीन झाला । दास विठ्ठले ऎकिला । पाळणा गाईला ॥१०॥

संतकवी श्री दासगणू महाराजविरचित श्रीरामप्रभूंचा पाळणा


बाळा जो जो रे ! रघुराया । भक्तवत्सला ! सदया ॥धृ०॥ त्रिभुवन पाळना तुजसाठीं शशिवदना । निद्रा करि बारे ! अघशमना । रामा राजिवनयना ॥१॥ ऋग् यजु साचार पाळण्याचे खूर । अठरा पुराणें निर्धार । उपनिषदें विणकर ॥२॥ गादी भावाची त्यावरती । उशि सोज्वल भक्तीची । रामा घातिली म्या, मधे साची । शाल वैराग्याची ॥३॥ शांति ही दोरी घेउनिया । मी बघ अपुले करी । हालविन तुजलागी रघुराया । दासगणूला तारी ॥४॥


॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


Apr 10, 2024

भावार्थ श्रीगुरुलीलामृत - देवतावंदन


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ  द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-श्रीस्वामीसमर्थमहाराजाय नमः ॥ 

प्रारंभी श्रीमंगलमूर्ति । ज्याचे योगें स्फुरे चैतन्य स्फूर्ति । ब्रह्मादिक देव असुर नर जया वंदिती । त्या नमियेलें आदरें ॥  
श्रीमद्दत्तावतारी अक्कलकोट स्वामी महाराजांचे चरित्र - श्रीगुरुलीलामृत या पोथीच्या प्रारंभी ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य गणेश वंदन करतात. ग्रंथलेखनाचे कार्य निर्विघ्नपणे व्हावें आणि इष्टदेवतेचा अनुग्रह लाभावा यासाठी ग्रंथकर्ते ग्रंथारंभी जे स्तवन करतात त्यास मंगलाचरण म्हणतात. ग्रंथारंभी देवतावंदन । शिष्टाचार प्रवृत्तिजनन । परंपरा मंगलाचरण । अवश्य केले पाहिजे ॥ याच परंपरेला अनुसरून वामनबुवा आद्यपूजेचा मान असलेल्या आणि जो चतुर्दशविद्या, चौसष्ठ कलांचा अधिपती आहे त्या गणपतीची अनेक प्रकारें स्तुती करून, गजानन हेरंब लंबोदरा । विघ्नांतका सर्वविद्या-सागरा । ग्रंथ सिद्धीस नेऊनि दातारा । पूर्ण करा सविस्तर ॥ अशी प्रार्थना करतात. 
त्यानंतर, अनादिविद्येची चित्तशक्ती भगवती सरस्वती, वेदमूर्ति सकल ऋषिवर्य, वेदव्यास - सुरगुरू बृहस्पति, इंद्रादि सुरवर, ग्रहादिक या सर्वांना स्मरणपूर्वक वंदन करतात. जगदगुरु श्रीशंकराचार्य, कालिदासादि कविवर्य, नवनाथादि योगीश्वर आणि ज्ञानेश्वरादि संत-सज्जनांना नमन करून ग्रंथलेखनास सहाय्य करावे अशी प्रार्थना करतात.
पुढे वामनबुवा, आतां वंदूं मातापिता । कुलदेवतादि ग्रामस्थान वास्तुदेवता । ज्यांचे कृपे इहपर साध्य तत्वतां । होय सर्वथा निर्धारें ॥ अशी आपल्या कुळाची माहिती देतांना लिहितात - अहमदनगरनिवासी धारण्य गोत्री वैद्य घराण्यांत माझा जन्म झाला असून सप्तशृंगनिवासिनी जगदंबा आणि श्रीशंकर हे या कुळावर निरंतर प्रसन्न आहेत. माझे पूर्वज माणिक, मोरेश्वर, भटूवैद्य, नारायण आदि निष्णांत वैद्य होते. 
भट्टूवैद्यास होते चार नंदन । त्यांत श्रेष्ठ नारायण विद्वान । तयासि श्रीजगदंबा प्रसन्न । बोले चाले तत्संगें ॥ माझे खापरपणजोबा नारायण वैद्यांस स्वतः सप्तशृंगनिवासिनी माता औषधी आणून देत असे. माझे पणजोबा त्र्यंबक ब्रह्मज्ञानी होते आणि ते वाल्मीक ग्रामीं म्हणजेच वामोरी येथे वास्तव्यास आले. तर माझे आजोबा विठ्ठल उत्तम ज्योतिर्वैद्य होते. माझ्या पित्याचे नाव रावजीभट्ट आणि मातेचे नाव अहल्या होते.
तदनंतर ग्रंथप्रयोजनाचा आरंभ करतांना वामनबुवा - गुरुलीला वर्णनार्थ महाराजा । निजाज्ञा झाली या चरणरजा । मंदमति मी ह्या ग्रंथरूपी कार्यध्वजा । सिद्धीस नेणार आपणचि ॥ अशी अक्कलकोट स्वामी समर्थांची अभ्यर्थना करतात. 
आपल्या सद्‌गुरुंचे स्तवन करतांना वामनबुवांची गुरुभक्ती आणि गुरुनिष्ठा प्रत्येक ओवींमधून इतकी अधोरेखित होते की आपणही श्रीगुरुंचे स्वरूप आणि गुणवर्णनांत अगदी रंगून जातो. - ॐ नमः श्रीसद्‌गुरुनाथा । श्रीगुरुदेवदत्त स्वामी समर्था । पूर्णब्रह्म केवल अनादि यथार्था । आपणचि एक अद्वितीय ॥ जे ऋषि, मुनि, योगिजन, आणि भक्तजनांचे ध्येय आहेत, या जगताचे आधार आहेत, तेच परात्पर, परमगुरु श्रीदत्तात्रेय तुम्हीच आहात. सनकादिकांसही वंदनीय असलेले परब्रह्मस्वरूप, दीनानाथ, अनंतकोटी ब्रह्मांडनायक असे हे हरि-हर-ब्रह्माचे अवतार हे सद्‌गुरु तुम्हीच आहात. साधू-संतसज्जनाचे रक्षण करण्यासाठी, खल-दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी आणि धर्मसंस्थापनासाठी युगायुगी तुम्हीच अवतीर्ण होता. या कलियुगांत जागोजागी घोर दुराचरण होऊ लागले, तेव्हा श्रीपादश्रीवल्लभ रूपांत तुम्ही अवतरित झाला आणि भक्तजनांस सन्मार्ग दाखवला. त्यानंतर पुन्हा एकदा नरवेषांत यति नरसिंह सरस्वती झाला आणि सद्‌धर्म-नीति यांची घडी बसवून असंख्य भक्तजनांचा उद्धार केला. 
पुढे काही कालाने पुनरपि । घोर कलियुगीं प्राणी होऊं लागले पापी । म्हणून दत्तात्रेय ब्रह्मस्वरूपी । अवतरले नृसिंह-यतिरूपें ॥ - या सकल जगताच्या उद्धारासाठी श्रीगुरु नृसिंहयतीश्वरांनी या पृथ्वीतलावर स्वच्छंद संचार केला. हिमाचल, जगन्नाथ, हरिद्वार, द्वारका, गिरनार पर्वत, प्रयाग, गया, श्रीकाशी, व्यंकटेशगिरी, रामेश्वर, नारायण-बिंदू-पंपा-मानस सरोवर, मातुलिंग, खेटक, पंढरपूर, कांची द्वय, बदरीकेदार या तीर्थस्थानीं आणि भागिरथी, गोदावरी, कृष्णा तीरांवरील अनेक पावन क्षेत्रीं तीर्थाटन केले. तेच हे परमात्मा श्रीनृसिंहसरस्वती सोलापुरात काही काळ वास्तव्य करून फिरत फिरत अक्कलकोटी आले आणि भक्तजनांच्या उद्धारासाठी एकवीस वर्षे तिथेच राहिले. श्रीदत्तात्रेयांचे अवतार असलेले, सर्व चराचर सृष्टीला व्यापून उरलेले, सर्वांतर्यामी असे गुरु समर्थ स्वामी जगत-हितार्थ अक्कलकोटग्रामीं वसले, त्यांच्या चरणकमळांना मी अनन्यभावाने नमन करतो. वामनबुवांची अशी भावपूर्ण प्रार्थना ऐकून सद्‌गुरु स्वामी समर्थ प्रसन्न झाले आणि अंतरी प्रगटूनि अत्रिनंदन । ग्रंथ सिद्धीस जाईल निर्विघ्न । आशीर्वचन बोलती ॥
प्रत्यक्ष श्रीस्वामी समर्थांची अशी आज्ञा आणि आशीर्वाद प्राप्त झाल्यावर श्री वामनबुवा वैद्य श्रीगुरुलीलामृत हा ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ करतात. 
दत्तात्रेयस्वामीकृपे सविस्तर । ग्रंथ आरंभिला गुरुलीलामृत-सागर । सत्संकल्पसिद्धीप्रदातार । पूर्ण करील त्याचा तो ॥ 
॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

Apr 4, 2024

श्री स्वामी समर्थ श्रीकरुणास्तोत्र - प्रथमोऽध्यायः


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ 

जय जयाजी महाराजा । दीनदयाळा सद्‌गुरुराजा । वेदां अगोचर महिमा तुझा । आनंदकंदा श्रीहरी ॥१॥ जय जयाजी कल्पतरु । विश्वातीता विश्वंभरु । अनाथसखया जगद्‌गुरु । आदिरूपा निर्विकल्पा ॥२॥ जयजयाजी अनाथसखया । कृपें निवारिसी भवभया । मापातीता भक्तसदया । अनाथनाथा दीनबंधो ॥३॥ जय जयाजी दीनोद्धारा । विश्वपती कृपासागरा । अतर्क्य अनंत अवतारा । हेही लीला सहज तुझी ॥४॥ सच्चिदानंदा गुणातीता । लीला लाघवी अनंता । तुझिया चरणीं श्रीस्वामीसमर्था । नमन माझे साष्टांगी ॥५॥ तूंचि सद्‌रूप । तूंचि चिद्‌रूप । तूं आनंदरूप । याही वेगळा तूंचि तूं ॥६॥ निर्विकल्पा निरामया । निष्कलंका निराधारिया । निष्प्रपंचा तुझी माया । ब्रह्मादिका अतर्क्य ॥७॥ निःसंगा निरंतरा । निर्गुणा निराकारा । निर्मोहा निराकारा । निर्व्यंगा निर्धूता तूं ॥८॥ गुणासहिता निर्गुणा । मायातीता निरंजना । मूळपुरुष सनातना । आदि-अंत-रहित तूं ॥९॥ आता करूं स्तवन । तरी स्तवनातीत तूं जाण । अथवा करुं नमन । तेंहि तैसेंचि ॥१०॥ रूप पाहूं तरी तूं अरूप साचार । ऐसा वेद-शास्त्रें करिती निर्धार । असो, काही न करावें, तरी उद्धार । कैसा होय जीवांचा ॥११॥ म्हणून तूंचि सगुण । तूंचि निर्गुण । तूंचि खेळसी त्रिगुण । मायामय सहजचि ॥१२॥ मायेकरितां तुझें ज्ञान । तुजकरितां माया जाण । ऐसें तुमचे परस्पर ऐक्य असणें । म्हणूनि अतर्क्य म्हणतसें ॥१३॥ तथापि आपुल्या कार्याकरितां । तुज स्तवितसें अनंता । कृपाकटाक्षे सांभाळावें आतां । दास म्हणवितों म्हणूनी ॥१४॥ श्रीकेशवा नारायणा । श्रीमाधवा वामना । श्रीअच्युता मधुसूदना । श्रीवासुदेवा गोविंदा ॥१५॥ श्रीगुरु सद्‌गुरु । सच्चिदानंद परात्परु । अनाथसखया कल्पतरु । श्रीसमर्थस्वामी ॥१६॥ मी तो अति हीन-दीन । महापापी चांडाळ पूर्ण । आतां आपुल्या कृपेंकरून । उद्धारावें श्रीअनंता ॥१७॥ मला पापें कवटाळिती । माझ्या आचरणे नरक-भीती । मज दोषिया यम कांपती । दंड कोणता करावा ॥१८॥ म्यां चौर्यकर्म केलें । परस्त्रियांतें भोगिलें । अखाद्यही भक्षिलें । मिती नाही असत्या ॥१९॥ केलें अपेयपान । बहुत निंदिले सज्जन । मी कोण हें नाठवे पूर्ण । झालों केवळ आत्मघातकी ॥२०॥ जैसा सूर्य आणि प्रकाश । तैसा माया आणि परेश । म्हणूनि तुज स्तवितां हृषीकेश । मायेचें स्तवन होतसे ॥२१॥ म्यां सायासें दोष संचिले । जें करूं नये तें केलें । रात्रंदिवस विषय भोगिले । उसंत नाही क्षणमात्र ॥२२॥ म्यां देह पोषिला । इंद्रियांसी लळा दिधला । म्यां सन्मार्ग सोडिला । उन्मत्तपणाचेनि योगें ॥२३॥ कामुक झालों परस्त्रियांचेनि । जी स्त्री दिसे ती हवीच वाटे मनीं । अन्य विषय हे तैसेचि निशिदिनीं । आवडती मायबापा ॥२४॥ सुखाचा नाहीं लेश । दुःख भोगिले असोस । झाला आयुष्याचा नाश । दुर्लभ नरदेह गेला ॥२५॥ वांचूनि काय केलें । बहुत पाप संचिलें । जन्मोजन्मीं पुरे वहिलें । राई पर्वतासारख्या ॥२६॥ नाहीं केलें तीर्थाटन । नाहीं मातृपितृसेवन । नाहीं अतिथिपूजन । घडले नाही दानधर्म ॥२७॥ नाहीं घडलें तुझें अर्चन । नाहीं घडलें कथाश्रवण । नाहीं परोपकारी वेचिलें धन । तुजप्रीत्यर्थ महाराजा ॥२८॥ नाही केली भूतदया । नाहीं झिजविली भजनीं काया । नाहीं घडली सत्क्रिया । अनुभवें खूण कळतसे ॥२९॥ नाहीं केला सद्विचार । नाही पाहिले सारासार । म्हणूनि पुढे काय होणार । पश्चात्ताप होईना ॥३०॥ नाहीं संध्यास्नान । नाहीं वेदपठण । नाही तुझें स्मरण । नाम वाचें येईना ॥३१॥ नाहीं केले कोणा वंदन । नाहीं भगवन्मूर्ति-अर्चन । नाहीं कोणतें व्रत घडले जाण । तुज संतोषाकारणें ॥३२॥ प्रपंची वाटे हव्यास । भागवतधर्मी कंटाळा चित्तास । सत्पुरुषांचे बोध-वित्तास । मन अती संतापें ॥ ३३॥ माझी स्त्री, माझे पुत्र । माझ्या कन्या, माझे मित्र । माझे जामात, माझे वित्त । आणि संसार माझा ॥३४॥ माझा देह, माझें घर । माझे बंधू, माझा परिवार । अती वाढविला जोजार । आपुल्या बंधनाकारणें ॥३५॥ मी शहाणा मी थोर । मी विद्वान मी चतुर । मी संपन्न, मी उदार । ऐसें मनीं वाटतसे ॥३६॥ मी कार्यकर्ता, मी भाग्यवान । मी दीर्घदर्शी पुण्यवान । मी पालनकर्ता गुणवान । आपल्या परिवाराचा ॥३७॥ मी बोलका लोकप्रिय । मी भक्त मी उदय । मी श्रेष्ठ, मश्यक काम । अन्य मजपुढे ॥३८॥ इत्यादि सत्य वाटे हा अविचार । असत्य वाटे तो सद्विचार । प्रस्तुत माझा तो आचार । ऐसाचि आहे गुरुश्रेष्ठा ॥३९॥ काया-वाचा-मन । कांहीं पाहतां न दिसे पुण्य । जळो माझे जन्म घेणें । भूमिभार जाहलों ॥४०॥ सकळ अवगुणांची राशी । जन्मा आलो दोष-संचयांशी । आतां माझी सुटका कैशी । होय ते कळेना ॥४१॥ कोणते जन्मीचें पुण्य पदरीं । म्हणोनि आलो तुझे नामरूप दरबारीं । आतां जैसी युक्ती दिसेल बरी । तैसें करी मायबापा ॥ ४२॥ कलियुगीं अति दुर्धर । तेथ तुझें नाम दरबार थोर । बहुत पावविले परपार । या दरबारीं ऐसें ऐकतों ॥४३॥ तुझ्या प्राप्तीविषयीं करावें साधन । तरी ती नाही आंगवण । ऐसें मला माझे मन । साक्ष देतसे ॥४४॥ तुजप्रीत्यर्थ करावें तीर्थाटन । तरी शरीरीं शक्ती नाही जाण । अथवा करुं पुरश्चरण । तरी मन तेथ न बैसे ॥४५॥ भूतमात्रीं दया करूं । तरी तोही न दिसे विचारू । दोषदृष्टी निरंतरु । म्हणूनि तेंही नावडे ॥४६॥ करावें अध्यात्म-श्रवण । तरी चंचल नावरे मन । करावें वर्णाश्रमधर्म जाण । तरी तेथ श्रद्धा न बैसे ॥४७॥ करावे वेदपठण । किंवा तुझें अर्चन-कीर्तन । तरी शरीरी आले वृद्धपण । तोही उपाय चालेना ॥४८॥ जरी करूं सत्पात्री दान । तरी पदरीं नाहीं ध्यान । भावे सेवावे संतजन । तरी पूज्यबुद्धी असेना ॥४९॥ करू इंद्रियदमन । अथवा योग-साधन । तरी आवरेना चंचल मन । तोही विचार दिसेना ॥५०॥ जरी करावे यज्ञयाग । अथवा सर्वसंगपरित्याग । तरी आवडती विषयभोग । कंटाळा मना न ये कीं ॥५१॥ करावा अरण्यवास । की परोपकारीं वेचावें शरीरास । तरी देहीं ममता वाढली असोस । तूं जाणसी दयाळा ॥५२॥ व्रतांचे करावे सायास । तरी अन्नावांचूनि प्राण कासावीस । जरी घ्यावा संन्यास । तरी चित्तीं वैराग्य नाहीं ॥५३॥ करावें प्रेमें भजन । अंतरी प्रेम नाहीं जाण । करावें ध्याननिष्ठ मन । तरी एकारता नव्हे कीं ॥५४॥ करावे शरणागतीचे उपाय । तरी न होय बुद्धीचा निश्चय । आतां काय करूं उपाय । तुज पावावयाकारणें ॥५५॥ ज्ञानचक्षूंविषयीं आंधळा । वैराग्याविषयीं पांगळा । गुरुसेवेविषयी खुळा । ऐसा अधम जन्मला ॥५६॥ नाही ऐकिली कथा । नाही केली तुझी वार्ता । लेश न दिसे पाहतां । पूर्वसुकृताचा ॥५७॥ तेथ आमचे वैभव तें किती । संसारी होतसे नित्य फजिती । तरी लाज न उपजे चित्तीं । विरक्ती अंतरी होईना ॥५८॥ मीठ मिळे, तरी न मिळे पीठ । पीठ मिळे, तरी न मिळे मीठ । तरी प्रपंची आवडी अवीट । ऐसें जाहलें महाराजा ॥५९॥ पुढे भाग्य येणार । मग भोग मी भोगणार ! ऐशिया संकल्पे बांधिलें घर । इया रीतीं ॥६०॥ अल्पमात्र विषयासाठी । नीच जनाचे लागे पाठी । नाना प्रकारचे संकटीं । घाली आपणांकारणे ॥६१॥ करूं नये ते करी । धरूं नये तें धरी । बोलूं नये तें वैखरी । भलतेंचि बडबडे ॥६२॥ नाठवे मागील केलें । पुढे काय होणार न कळे । ऐसे जाहलो जी आंधळे । केवळ डोळे अमान ॥६३॥ देव कोण, मी कोण । कोण असले तें ज्ञान । याचा विचार न पाहे मन । आणि विषयमृगजळी धावतसे ॥६४॥ ऐसा अवगुणी अन्यायी । किती म्हणुनी सांगू काई । आता आपुलें ब्रीद पाही । आणि सोडवी मजलागीं ॥६५॥ सोडवी म्हणता वाटें लाज । नाही केले सेवेचे काज । परंतु दयाळु महाराज । तारी तारी पतितासी ॥६६॥ नको पाहूं पुण्य । नको पाहूं अवगुण । नको पाहूं गुण । असे की नाही समर्था ॥६७॥ नाही भाव नाही भक्ती । नाही नेम नाहीं विरक्ती । नाहीं निश्चय चित्तीं । तुझे पाय प्राप्तीसी ॥६८॥ नेणें निर्गुण । नेणे सगुण । नेणें मी हा कोण । नेणें तत्त्वचिंतन ॥६९॥ नाहीं शांती नाहीं ज्ञान । नाहीं विचार नाहीं साधन । नाहीं सत्समागमी आवडी पूर्ण । अविवेकी पूर्ण दुरात्मा ॥७०॥ ऐसा पापी मी अघोरी । काय वाणूं एके वैखरी । पाषाण जन्मलों संसारीं । केवळ महामूर्ख ॥७१॥ असो, आता किती सांगू अवगुण । धिक धिक् माझा नरदेह जाण । आतां कांहीं करावें साधन । ऐसा हेत उपजला ॥७२॥ तों आला वृद्धापकाळ । गेलें तारुण्य सकळ । शक्ति नाही अळुमाळ । झालों पांगुळ सर्वोपरी ॥७३॥ अंतरी होतो पश्चात्ताप । जन्मांतरीचे मोठे पाप । तेणें गुणें विक्षेप । वारंवार होती पैं ॥७४॥ कांहीं साधन करावे ऐसा हेत मना । तों मागें ओढिती विषय-वासना । जैसा पायीं दोर लावुनी जाणा । कीटकासी ओढिती ॥७५॥ म्हणोनि झालों कासावीस । तुझ्या कृपेची आस । करतिसें गा हृषीकेश । गुरुराया समर्था ॥७६॥ येथुनी कधी सोडविसी । कधी आपुला दास म्हणविसी । कधी मजवरी दया करिसी । हे न कळे मजलागीं ॥७७॥ कांहीं एक निमित्त करुनी । महापापी सोडविले भयापासुनी । अजामिळादि कुंटिणी । ऐसे पुराणीं ऐकतों ॥७८॥ तोच धरुनी आधार । तुजपाशी रडतो वारंवार । हाका मारितों सत्वर । कृपा करी भलतिया भावें ॥७९॥ उदंड शब्द ज्ञानी बोलती । की आत्मा आपणचि निश्चितीं । साधनाच्या विपत्ती । कां सोसाव्या ॥८०॥ न लगे भजन । न लगे पूजन । न लगे नेम न लगे दान । न लगे कांहीं वैराग्यादि ॥८१॥ न लगे व्रत न लगे तीर्थ । न लगे पाहणे ग्रंथ । न लगे कांहीं खटपटींचा पंथ । साक्षात् आपण ब्रह्मरूप ॥८२॥ परि तें न ये मना । जेविल्याविणें पोट भरेना । पोटावरी पदार्थ नाना । बांधिले तरी व्यर्थचि ॥८३॥ तैसें वैराग्यविण शब्दज्ञान । बोलताती वाउगाचि शीण । दिवसेंदिवस वाढे अभिमान । मी ज्ञानी म्हणोनी ॥८४॥ वृत्तीची चळवळ जाईना । विषयांची लालुची सुटेना । क्षणभर शांती न ये मना । आणि म्हणतो मी ब्राह्मण ॥८५॥ असो त्यांचे ज्ञान त्यांसी । ती स्थिती नको मजसी । झणीं मज त्यांत घालिसी । अनर्थ थोर होईल ॥८६॥ आतां कृपा करी भलतिये परी । मज दीनातें उद्धरीं । आम्हीं अभाविकें भवसमुद्रीं । बुडतसों स्वामिया ॥८७ ॥ मी आपुला निवेदिला भाव । तूंही सर्वसाक्षी जाणसी सर्व । जेणे होय तरणोपाय । त्या त्या मार्गे नेई जे ॥८८॥ प्रपंची ठेवी भलत्या रीतीं । परी तुझी आवड असो द्यावी चित्तीं । संसारी नाना विपत्ती । झाल्या तरी होवोत कां ॥८९॥ परी ज्या आम्हां सोडविती । त्याच होवोत कां विपत्ती । नाहीं तरी खंडेल तव भक्ती । ऐसें नको करूं दयाळा ॥९०॥ कर्मे पाठीं घेतलीं। म्हणोनि शक्ती न चले आपुली । नाना संकटीं घाली । आपुल्या इच्छे विपरीत ॥९१॥ तेथ मुख्य देह अधिष्ठान । तो केला रोगाधीन । बुद्धीही नसे सत्त्वसंपन्न । आतां म्यां काय करावे ? ॥९२॥ जो जो करूं जावा उपाय । तो तो होतसे अपाय । कैसा होय तरणोपाय । तो आम्हां कळेना ॥९३॥ वरी वरी म्हणे शरणागत । अंतरी विषयी आसक्त । दंभें जाहलों महंत । भक्तिरहस्य नेणोनी ॥९४॥ लोकांत मान्यता जाहली जरी । लज्जा वाटे अंतरीं । अभक्तपणे असोनि दूरी । भक्त ऐसें म्हणवितों ॥९५॥ असो, आतां कांहीं । मज ठेवी आपुले पायीं । करोनी माझी सोई । अनुभवारूढ करावा ॥९६ ॥ तूं कृपावंत किती । मातेचें प्रेम तें किती । खूण बाणली प्रचिती । आली अंतरीं ॥९७॥ इष्टमित्र, बंधू, गोत । तूंच सखा भगवंत । अपराध घालोनी पोटांत । आपुला दास म्हणवावें ॥९८॥ माझा उपाय किंचित । स्वसामर्थ्ये न चले जेथ । कांहीं करोनि निमित्त । मज तारावें समर्था ॥९९॥ मी लौकिकीं शरणागत । साधुत्व मिरवितों लोकांत । हेंचि करोनी निमित्त । मज तारावें समर्था ॥१००॥ परिसासी लोह शिवो भलत्या भावें । परी तेणें सुवर्णचि करावें । तैसें मज सांभाळावें । उणे पुरे समर्था ॥१०१॥ मीठ समुद्र मिळणी । तत्काळ होय पाणी । तैसी माझी कर्मकेरसुणी । जाळोनि टाकावी समर्था ॥१०२॥ जैसा गांव ओहोळ । मिळतां तात्काळ गंगाजळ । तैसें माझे कर्मफळ । धुवोनिया टाकावें ॥१०३॥ मी तुझ्या दासाचा दास । बळेचि तुझी धरिली कास । पाहतसें कृपेचि आस । कधीं करशील म्हणोनी ॥१०४॥  मी पातकी ब्रीदाचा । तरी जवळी येण्या अधिकार कैचा । दूर उभा राहोनि वाचा । तुझें नाम जपतसें ॥१०५॥ आतां तो जैसा क्रौंचपक्षी । दुरोनीच पिलियातें रक्षी । तैसा मज संरक्षी । आपुल्या ब्रीदाकारणें ॥१०६॥ कां कासवी आपुलिये । दृष्टीं पिलियांचे पोषण विये । तैसी मजवरी करुणा माये । केलीच करावी ॥१०७॥ कृपा तों केली किंचित । म्हणोनि नाम वाचेसी येत । परी त्या नामाचे सामर्थ्य हृदयांत । न ठसे अद्यापि ॥१०८॥ म्हणोनी जी कृपा केली । तिची सार्थकता नाही झाली । म्हणोनी असोसी राहिली । आणि तळमळ मानसीं ॥१०९॥ असो, आतां विचार । मजकडे केलाचि करावा कृपाकर । आणि हा भव दुर्धर । यांतुनी पार करावें ॥११०॥ नामीं धरावा विश्वास । पायीं राखावें चित्तास । आवरावें चंचळ मनांस । आपुलिया सामर्थ्ये ॥१११॥ विषयांपासून सोडवावें । देहबंधनांतून मुक्त करावें । बोधामृत पाजावें । जेणें हें अज्ञान नासे ॥११२॥ जेणें तुझी सेवा घडे । जेणे हा पूर्वसंस्कार मोडे । अहंकारावरी चिरा पडे । आणि नाशती कामादि ॥११३॥ जेणें उपजे भक्ती । सज्जनसेवेसी प्रीती । दया उपजो भूतमात्रीं । चित्त निर्विकार असावें ॥११४॥ हें घ्यावया नाहीं अधिकार । परि तूं घेववी कृपासागर । याचक मी तुझें दार । धरुनी उभा राहिलों ॥११५॥ तूं दयेचा सागर । तूं ममतेचे आगर । उदारत्वाचा डोंगर । कृपें दीन लक्षावा ॥११६॥ तूं वात्सल्याचें सरोवर । तूं भाग्याचे शिखर । अभागी मी पामर । कृपाकटाक्षे लक्षावा ॥११७॥ तूं विश्वाचा पालक । तूं धर्माचा रक्षक । म्हणूनि मी एक अभागी रंक । शरण आलों जी समर्था ॥११८॥ तूं भक्तांचा सुखकारी । शरणागतांचा साह्यकारी । मी अभाविक दास परी । रक्षण माझें करावें ॥११९॥ तूं देवाचा देव । तूं वैभवाचें वैभव । तूं मायेचा गौरव । तूंचि सत्ता तूंचि लक्षी ॥१२०॥ पोट भरेल ऐशिया आशा । रानपाला खाल्ला जगदीशा । तयात अमरवल्ली मर्त्यपाशा । होती छेदणारी जी ॥१२१॥ तियेचे झाले सेवन । सुटला मृत्युभयापासून । हे सहज न कळतां जाहले जाण । कोणा एकासी ॥१२२॥ तैसा जी मी देवाधिदेवा । लटिकाचि शरण वासुदेवा । तुज आलों परी तुवां । आपुलें ब्रीद साच केलें ॥१२३॥ कांचमणी घेऊन परिस देणें । की पय देऊनी उदक मागणें । हे साजे तुज एकाकरणें । यदर्थी संदेह असेना ॥१२४॥ मुळी मी भक्त तुझा सकाम । परि करी मज निष्काम । आणि शरणागतीचें वर्म । मज अंतरी प्रबोधावें ॥१२५॥ नको पाहूं पुण्य । नको पाहूं अवगुण । नको पाहूं गुण । आहे की नाहीं ॥१२६॥ नको पाहूं ज्ञान । नको पाहूं ध्यान । नको पाहूं मन । वश आहे कीं नाहीं ॥१२७॥ नको पाहूं पाप । नको पाहूं जप । नको पाहूं तप । आहे की नाही ॥१२८॥ नको पाहूं भक्ती । नको पाहूं विरक्ती । नको पाहू शरणागती । आहे की नाहीं ॥१२९॥ नको पाहूं आचार । नको पाहूं निर्धार । नको पाहूं विचार । आहे की नाही ॥१३०॥ नको पाहूं धर्म । नको पाहूं कर्म । नको पाहूं नेम । आहे की नाहीं ॥१३१॥ नको पाहूं भावा । नको पाहूं सेवा । नको पाहूं देवाधिदेवा । संचित माझें ॥१३२॥ माझी स्थिती मीं स्पष्ट वर्णिली । परि सत्ताधीशा, जैसी आपुली । इच्छा असेल तदनुरूप साउली । करी दीनावरी ॥१३३॥ न मागें धन, न मागें विद्या । न मागें मान, न मागें सन्मान । न मागें कल्याण । या प्रपंचाचें ॥१३४॥ न मागें पशु, न मागे पुत्र । न मागें पृथ्वी, न मागे कलत्र । न मागें वस्त्र किंवा पात्र । जी तुझें विस्मरण करणारीं ॥१३५॥ शरीरी बहुत द्यावी शक्ती । आणि तुझी सेवा घडो अहोरात्रीं । यावेगळी नसे प्रीती । अंतरापासुनी महाराजा ॥१३६॥ मोक्षाची इच्छा नाहीं अंतरीं । आणि जन्म येवो भलत्या परी । दोन वर द्यावे श्रीहरी । कृपा करुनी दीनासी ॥१३७॥ पुनःपुन्हा हेंचि मागणें । सत्संगती आणि आपुली सेवा देणें । अन्य काही नसे सांगणे । तुझे पाय शिवतसें ॥१३८॥ जयाचे अंगी बळकट सामर्थ्य । तिहीं बळेंचि संपादिला परमार्थ । मी तो केवळ असमर्थ । हीन दीन अभागी ॥१३९॥ म्हणोनि करितसें विनवणी । सहस्र लोटांगणे चरणीं । घालोनी प्रार्थी दीनवाणी । कृपादृष्टी इच्छितसें ॥१४०॥ जय जयाजी श्रीस्वामी समर्था । मज संपादुनी देई मागिल्या अर्था । मग न मागे काही समर्था । तुझी आण मागतसे ॥१४१॥ लोटांगण साधुसंतासीं । दंडवत महानुभावांसी । नमन तयां भाविकांसी । प्रीतिनंद करीतसे ॥१४२॥ ॥ इति श्रीकरुणास्तोत्रस्य प्रथमोऽध्यायः संपूर्णम् ॥ ॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥  

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


Mar 15, 2024

अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे...


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

भक्तास्तव प्रगट होऊनि शुष्ककाष्ठी केली तयावरि कृपामृतपूर्ण दृष्टी तेणे परीच चुकवी मम जन्म फेरे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥१विश्वासलों दृढ मनें तुझिया पदासी की वारिसील म्हणुनि मम आपदांसी ते दाविशील नयना कधि सांग बा रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥२देवा तुझे हृदय कोमल फार आहे ऐशापरी निगमशास्त्रहि आण वाहे ते काय वाक्य लटिकें करतोसि बा रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥३मी दीन हीन कुमती तुज वर्म ठावें ऐशापरि त्यजुनि कोप उदार व्हावे गाती तुझे पतितपावन नाम सारे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥४माझे अपारतम पातकसंघ जाळी क्रोधाग्निनें हरि तझ्या सहमूळ जाळी तैसा करी दृढ जसा भवबंध बा रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥५श्रीपद्महस्त मम मस्तकी ठेवी बापा दृष्टीस दाखवि बरें निजचित्स्वरुपा हे दान दे वचन अन्य न मी वदें रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥६आयुष्य घालूनि अधिक मृत द्विजाला त्वां वांचवोनि जनिं वाढविली स्वलीला होसी समर्थ मज चाळविसी वृथा रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥७वेंचावयासि करुणाघन लोभ वाटे टाकून दे बिरुद लावि मला अवाटे नाही तरी झडकरी मज भेट दे रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥८पाप्यासि तारुनि बळे जन सोकवीले तुझेचि कृत्य तुज मुख्य फळासि आले हे सोडीसी तरि सुटेल तुला कसे रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥९हे श्रीधरे रचुनिया नवरत्नमाला प्रेमेचि अर्पिली बरी पुरुषोत्तमाला हे वर्णिता नरहरी संकट सर्व वारी श्रीपादसद्‌गुरु यतीश्वर चिद्विहारी ॥१० 


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


Mar 11, 2024

ह. भ. प. श्रीदासगणू महाराजकृत अर्वाचीन भक्तलीलामृत - अध्याय ३३ वा ( श्रीसाईबाबा चरित्र )


॥ श्री गणेशाय नमः ॥ तूं त्रिगुणातीत त्रिगुणात्मक । तूं विश्वातीत विश्वव्यापक । तूं सच्चिदानंद वरदायक । सर्वारंभ आला तूं ॥१॥ तूं शब्दातें उत्पादिता । शब्दही तूंचि समर्था । तुज वेगळे करूं जातां । बोलणें अवघें खुंटतें ॥२॥ तूं मंगलरूप मंगलकर्ता । मग अमंगलाची कशासि वार्ता । तुझ्या पदरीं बांधलों असतां । अशिव मातें स्पर्शेना ॥३॥ असो कांही दिवस गेल्यावर । ते बाबांचे शिष्य चांदोरकर । आले दर्शनार्थ साचार । तया शिरडी ग्रामासी ॥४॥ करूनि पदांचें वंदन । बोलते झाले नारायण । बाबा आतां पुढील कथन । मजलाग कथन करा ॥५॥ ऐसें ऐकतां शिष्यवचन । बाबा आनंदले पूर्ण । म्हणती आतां अवधान । द्यावें माझिया बोलासी ॥६॥ सुख-दुःखांचिये अंती । जरी आहे मुक्तस्थिती । ती स्थिती येण्याप्रती । वागणें कैसें सांगतों तें ॥७॥ देहप्रारब्ध भोगितां । सदसद्‌विचार- शक्तिसत्ता । जागृत ठेवावी सर्वथा । तिसी फांटा देऊं नये ॥८॥ सहजगतीनें जें जें घडे । तें तें देहप्रारब्ध रोकडें । कर्म करुनि जें जें घडे । तें न देहप्रारब्ध ॥९॥ पहा कित्येक चोऱ्या करिती । कृतकर्मे शिक्षा भोगिती । हें भोगणे निश्चितीं । नोहे देहप्रारब्ध ॥१०॥ जहर पिता घडे मरण । हें नोहे देहप्रारब्ध जाण । हें कृतीचें फळ पूर्ण । कर्त्यालागीं मिळतसे ॥११॥ नायनाट करूनि धन्याचा । कारकून होय मालक साचा । हाही देहप्रारब्याचा । नोहे भाग शिष्योत्तमा ॥१२॥ मग तो कारकून झाल्या धनी । राहे सदा चैनींनी । गाड्या घोडे उडवोनी । म्हणे मी सुखी झालों ॥१३॥ त्यानें जो धन्याचा केला घात । तें जोडिलें पाप सत्य । हेंचि पुढील जन्माप्रत । संचित क्रियमाण होईल ॥१४॥ संचित क्रियामाणाप्रमाणे । जन्म होईल त्याकारणे । हें जाणती शहाणे । नाहीं काम मूर्खाचें ॥१५॥ शिवाय देहप्रारब्धेंकरुन । जें लाधलें होतें कारकूनपण । तें त्यानें शिल्लक जाण । ठेविलें पुढिले जन्मासी ॥१६॥ एवंच पुढील जन्माची ।केली तयारी त्यानें साची । जन्ममरण-यात्रा अशाची । कोठूनि सांग चुकेल ॥१७॥ पहा कितीएक पदवीधर । आरुढती अधिकारावर । कित्येक हिंडूनि जगभर । देती नुसतीं व्याख्यानें ॥१८॥ कित्येक योगी होती । कित्येक दुकानें घालिती । कित्येक पोरें पढविती । होऊनि शिक्षक शाळेमध्यें ॥१९॥ योगी शिक्षक दुकानदार । व्याख्याता अधिकारी नर । अवघे आहेत पदवीधर । प्रयत्न अवघ्यांचा सारिखा ॥२०॥ हा भिन्न भिन्न व्यवसाय मग । कां व्हावा मजसी सांग । अरे हा देहप्रारब्धयोग । नाहीं फळ प्रयत्नांचें ॥२१॥ ऐसें वदतां गुरुवर । काय बोलती चांदोरकर । चोरी करूनि होतां चोर । मात्र म्हणावें कर्मफळ ॥२२॥ आणि देहप्रारब्ध येथें मात्र । म्हणावें कां सांगा त्वरित । हेंही कर्मजन्य फल सत्य । कां बाबा म्हणूं नये ॥२३॥ ऐसे वदतां तो प्रेमळ भक्त । बोलते झाले साईनाथ । तें ऐका सावचित्त । श्रोते वेळ दवडूं नका ॥२४॥ हे चांदोरकर-कुलभूषणा । महासज्जना नारायणा । ह्या भलत्याचि वेड्या कल्पना । काढूनि मज विचारिसी ॥२५॥ पहा कित्येक खरे चोर । असूनि सुटती सत्वर । पुरावा न होत त्यांचेवर । हें देहप्रारब्ध तयांचें ॥२६॥ एक चोर तुरुंगांतरीं । एक चोर असूनि सावापरी । मग येथ कृत्यफल निर्धारीं । कोठें गेलें सांग पां ॥२७॥ दोघांचे एक कृत्य । एक सुटे एक शिक्षा भोगीत । म्हणोनी आहे कृत्यातीत । देहप्रारब्ध नारायणा ॥२८॥ परि त्या सुटलेल्या चोराचे । पाप न जाय कधी साचें । तें पुढलिया जन्माचे । होईल सत्य कारण ॥२९॥ म्हणोनि आतां सांगणें तुजसी । भोगितां देहप्रारब्धासी । जागृत ठेवावें नितीसी । म्हणजे काय होईल ॥३०॥ सज्जनांची करणें संगत । बसावें त्यांच्या मंडळींत । दुष्ट दुर्जन अभक्त । ह्यांची साउली नसावी ॥३१॥ अभक्ष्या भक्ष्य करूं नये । वितंडवादी पडू नये । खोटे वचन देऊं नये । कवणासही कदाकाळी ॥३२॥ एकदां वचन दिल्यावरी । निमूटपणे खरे कर्री । वचनभंगी श्रीहरी । दुरावेल नारायणा ॥३३॥ काम शरीरी संचारतां । रमावें स्वस्त्रीशी सर्वथा । पाहूनि पराची सुंदर कांता । विकारकरीं न द्यावें मन ॥३४॥ काम शुद्ध स्वस्त्रीशीं । परी सदा न सेवीं तवासी । कामलोलुप मानवासी । मुक्ती मिळण अशक्य ॥३५॥ हा काम मोठा रे खंबीर । न होऊं देत चित्त स्थिर । षड्रिपूंत याचा जोर । सर्वांहूनि आगळा ॥३६॥ म्हणोनि ठेवूनि प्रमाण । करावे कामाचे सेवन । विवेकाचें लोढणें जाण । कंठी त्याच्या बांधावे ॥३७॥ कामासी वागवावें आज्ञेत । आपण न जावें त्याच्या कह्यांत । ऐसे जो वागे सत्य । तोचि सुज्ञ समजावा ॥३८॥ देहप्रारब्ध भोगण्याप्रत । षड्रिपूंची जेवढी गरज सत्य । तितुक्यापुरता तयाप्रत । मान द्यावा शिष्योत्तमा ॥३९॥ हरिनामाचा लोभ धरीं । अनीतीविषयीं क्रोध वरी । आशा मोक्षाची अंतरीं । मोह वहावा परमार्थाचा ॥४०॥ दुष्कृत्यांचा करीं मत्सर । भक्तिभावें परमेश्वर । आपुला करीं साचार । जागा मदा देऊं नको ॥४१॥ सत्पुरूषांच्या ऐकणे कथा । चित्ताची ठेवी शुद्धता । मान राखणें ज्ञानवंता । आपुल्या जनकजननीचा ॥४२॥ सहस्त्र तीर्थांचे ठिकाणीं । एक मानवी निजजननी । पिता आराध्य दैवत म्हणूनी । वंदन त्याचे करावें ॥४३॥ आपुले जे कां सहोदर । प्रेम ठेवीं तयांवर । भगिनींना अंतर । शक्ती असल्या देऊं नको ॥४४॥ पत्नीसी प्रेमें वागवावें । परी स्त्रैण कदा न व्हावें । तिचें अनुमोदन घ्यावे । फक्त गृहकार्यांत ॥४५॥ आपुल्या पुत्रस्नुषेंत । विपट पाडू नये सत्य । तीं असतां एकांतांत । तेथें आपण जाऊं नये ॥४६॥ अपत्यासी न थट्टा करणे । ती मित्राचीं लक्षणें । नोकरासी न सलगी करणें । कन्याविक्रय करूं नको ॥४७॥ द्रव्य अथवा पाहुनि वतन । जरठासी न करीं कन्यादान । असावा जामात सुलक्षण । कन्येसी आपुल्या शोभेलसा ॥४८॥ हे पुरुषधर्म कथिले तुजसी । ऐसा जो वागे तयासी । बद्धस्थिति न बाधे विवशी । सदाचारीं वर्तल्या ॥४९॥ निजपतीची करणें सेवा । हा स्त्रियांचा धर्म बरवा । तोचि त्यांनी आदरावा । अन्य धर्म नसे त्यां ॥५०॥ पति हाच स्त्रिचा देव । तोचि तिचा पंढरिराव । पतिपदीं शुद्ध भाव । ठेवूनि रहावें आनंदें ॥५१॥ पतिकोपीं नम्रता धरी । प्रपंचात साह्य करी । तीचि होय धन्य नारी । गृहलक्ष्मी जाणावी ॥५२॥ ठेवूनि पतीसी दुश्चित । जी आचरे नाना व्रत । ती पापिणी कुलटा सत्य । तोंड तिचे पाहूं नये ॥५३॥ स्त्रियांनी विनय सोडूं नये । छचोर चाळे करूं नये । परपुरुषासीं बोलू नये । कोणी नसतां त्या ठायीं ॥५४॥ जरी आपुला सहोदर । तरी तो पुरुष आहे पर । म्हणूनि त्यासी साचार । एकांत स्त्रीने करू नये ॥५५॥ या स्त्रीदेहाची विचित्र स्थिती । तो अनीतीचा भक्ष्य निश्चितीं । म्हणूनि सावधगिरी अती । ठेवली पाहिजे शिष्योत्तमा ॥५६॥ शेळी भक्ष्य लांडग्याचें । म्हणूनि तिला कुंपण सार्चे । करूनि ठेविती काट्यांचें । रक्षण तिचें करावया ॥५७॥ तोचि आहे न्याय येथें । स्त्रीदेहरूप शेळीतें । तीव्र व्रतकुंपणातें । बांधूनि रक्षण करावें ॥५८॥ पति सकाम पाहूनी । तत्पर रहावे स्त्रियांनी । लहान मुलांच्या संगोपनीं । दक्ष फार असावें ॥५९॥ मुलें आपुली सन्मार्गरत । होतील ऐसे शिक्षण सत्य । देणे आपुल्या मुलांप्रत । नाना गोष्टी सांगोनी ॥६०॥ सासू-श्वशुर दीर जावा । यांचा द्वेष न करावा । सवत असल्या प्रेमभावा । तिच्याविषयीं धरणें मनीं ॥६१॥ चारचौघांनी गुण घ्यावे । ऐसें वर्तन असावें । पत्याज्ञेनें आचरावें । व्रत एकादें आल्या मनीं ॥६२॥ पूर्वपापेकरून । भर्ता झालिया गतप्राण । कडकडीत ब्रह्मचर्य धरून । आयुष्य आपुले कंठावे ॥६३॥ वैधव्य नशिबी आल्यावरी । न पहुडिजे मृदु शय्येवरी । सौगंधित उट्या शरीरीं । कदा आपुल्या करूं नये ॥६४॥ नक्त हविष्यान्न शाकाव्रत । एकादश्यादि उपवास सत्य । आचरोनी जगन्नाथ । हृदयसंपुटीं सांठवावा ॥६५॥ जेणें होय कामोद्दीपन । ऐसें न कदा सेविणें अन्न । सदा अध्यात्मनिरूपण । ऐकत जावें विधवांनी ॥६६॥ आत्मानात्मविचार करणें । संन्यस्तापरी राहाणें । देवतार्चन भक्तीनें । करूनि पुराणें वाचावीं ॥६७॥ ही साधारण पुरुष-स्त्री नीति । कथन केली तुजप्रती । ऐसें वागतां बद्धस्थिति । अनायासें होय दूर ॥६८॥ आतां बद्धस्थितीचीं लक्षणें । सांगतों मी तुजकारणें । तिकडे आपुलें अवधान देणें । करुनि मन एकाग्र ॥६९॥ धर्माधर्म जाणेना । ईश्वर कोण हें ओळखेना । मनीं न उपजे सद्वासना । त्यासी बद्ध म्हणावें ॥७०॥ जो केवळ कपटपटू । ज्याचें वचन सदा कटू । ज्याचीं पापें अचाटू । तोही बद्ध जाणावा ॥७१॥ साधु संत सज्जन । यांते न ओळखी ज्याचें मन । प्रपंची जो तल्लीन । तोही बद्ध जाणावा ॥ ७२ ॥ दानधर्मी न ज्याची मती । पोकळ वितंडवादी अती । तोही बद्ध निश्चितीं । शिष्योत्तमा जाणावा ॥७३ ॥ परांच्या ठेवी बुडवीत असे । आपुला सबराद करीत असे । साधुसंतां निंदीतसे । तोही बद्ध जाणावा ॥७४ ॥ आपुली वाढविण्या थोरी । उगीच दुसऱ्यांची निंदा करी । सोंग साधूचें घेऊनि वरी । करी अनीति तो बद्ध ॥७५॥ प्रपंच ज्याचा परमार्थ । प्रपंच ज्याचा पुरुषार्थ । सदा प्रपंचीं ज्याचें चित्त । तोही बद्ध जाणावा ॥७६॥ जो मित्राचा द्रोह करी । जो गुरुशी वैर धरी । विश्वास महावाक्यावरी । ज्याचा नसे तो बद्ध ॥७७॥ नाना ग्रंथ भाराभार । करूनियां पाठांतर । ज्याचें न होय शुद्ध अंतर । तोही बद्ध जाणावा ॥७८॥ बद्धासी न मिळे सद्गती । बद्धासी न घडे सत्संगती । तो जाय यमलोकाप्रती । यातना अमित भोगावया ॥७९॥ आतां मुमुक्षुलक्षण । करितों मी तुज कथन । तीं करावीं तुवां श्रवण । सद्भाव ठेवूनियां ॥८०॥ जो बद्धस्थितीसी कंटाळला । जाणे सदसद्‌विचाराला । म्हणे कधीं भेटेल मला । देव तो मुमुक्षु ॥८१॥ सत्संगाची करी आस । निःसार मानी जगतास । जो विटला प्रपंचास । तो मुमुक्षु जाणावा ॥८२॥ देहप्रारब्धें जी स्थिती । प्राप्त झाली तयाप्रती । त्यांतचि मानी चित्तीं । समाधान मुमुक्षु ॥८३॥ जयासी पाप करण्याचें । वाटतसे भय साचें । असत्य न बोले कदा वाचे । तो मुमुक्षु जाणावा ॥८४॥ कृतकर्माचा पश्यात्ताप । ज्यासी झाला असेल सत्य । तो जरी असला पतित । तरी मुमुक्षु जाणावा ॥८५॥ देवाविषयीं ज्यासी आस्था । साधूंचे ठायीं नम्रता । जो नीतीचा असे भोक्ता । तो मुमुक्षु जाणावा ॥८६॥ जो क्षणैक सत्संग सोडीना । ज्यांची अखंड रतली रसना । श्रीहरीच्या नामीं जाणा । तो साधक म्हणावा ॥८७॥ विष वाटे विषय ज्यासी । जो अध्यात्माविद्येसी । साधावया प्रतिदिवशीं । यत्न करी तो साधक बा ॥८८॥ जो ध्यान करी ईश्वराचें । ग्रहण करुनि एकांताचें । त्याचें पद साधकाचें । घेतलें ऐसें म्हणावें ॥८९॥ जो हरीचे गुणानुवाद । ऐकतां मानी आनंद । कंठ होतसे सद्गद । तो साधक म्हणावा ॥९०॥ लौकिकाची न करितां पर्वा । करी सदा संतसेवा । चित्तांतुनि रमाधवा । जाऊं न दे तो साधक ॥९१॥ निंदा स्तुति ज्या समान । तैसाचि मानापमान । जन आणि जनार्दन । एक जया सिद्ध तो ॥१२॥ षड्रिपूंचे विकार । ज्यासी न होती तिळभर । संकल्प निमाले साचार । अवघे जयाचे सिद्ध तो ॥९३॥ संकल्प अथवा विकल्पासी । जागा न मुळींचि जयापाशीं । मी तूं या भावनेसी । न जाणे तो सिद्ध ॥९४॥ देहाची न ज्यांना क्षिती । जे मीचि ब्रह्म ऐसें लेखिती । सुखदुःखांचा अभाव चित्तीं । ज्यांच्या असे ते सिद्ध ॥९५॥ ह्या ज्या मी कथिल्या स्थिती चार । ह्यांचा करी पूर्ण विचार । हें जें दिसतें चराचर । तें स्वरूप ईश्वराचें ॥९६॥ ईश्वर आहे अवघ्या ठायीं । त्याविण रिता ठाव नाहीं । परि मायेनें ठकविलें पाही । उमगूं न दे त्या ईश्वरा ॥९७॥ मीं तूं आणि माधव सत्य । तैसा मारुती पंढरीनाथ । म्हाळसापती काशीनाथ । आडकर साठे हरीपंत ॥९८॥ काका तात्या गणेश बेरे । तैशीचि वेणू पहा रे । भालचंद्रादि लोक सारे । आहेत अंश प्रभुचें ॥९९॥ म्हणूनि कोणीं कोणाचा । द्वेष करूं नये साचा । अवघ्या ठिकाणीं ईश्वराचा । वास हे विसरुं नये ॥१००॥ म्हणजे अंगी निर्वैरता । आपोआप निपजे तत्वतां । निर्वैरतेचा उदय होतां । साधेल अवघें हळूहळू ॥१०१॥ चित्त जाण मानवाचें । आहे उच्छृंखल साचें । तें स्थिर करण्याचें । प्रयत्न केले पाहिजेत ॥१०२॥ जैसी मक्षिका अवघ्यावर । बैसे पैं वैश्वनर । पाहतां फिरे सत्वर । तेथूनियां माघारी ॥१०३॥ तैसेच हें रंगेल मन । सर्वाठायीं रमे पूर्ण । परी एक ब्रह्म पाहून । तोंड आपुलें फिरवीतसे ॥१०४॥ ऐसें हें ओढाळ मन । ब्रह्मीं न झाल्या संलग्न । जन्ममरणयात्रा जाण । नाहीं चुकणार नारायणा ॥१०५॥ ती तों चुकविली पाहिजे आधी । येऊनियां नरजन्मामधीं । या जन्मापरी संधी । नाहीं दुसरी अमोलिक ॥१०६॥ म्हणूनि मन करण्या स्थिर । हा मूर्तिपूजेचा प्रकार । मूर्तीतही परमेश्वर । नाहीं परी ती करावी ॥१०७॥ मूर्तिपूजा भावें करितां । चित्ताची होय एकाग्रता । एकाग्रतेविण तत्त्वतां । न ये स्थिरत्व मनासी ॥१०८॥ पुढ़ें करावें मनन ध्यान । अध्यात्म ग्रंथावलोकन । तैसें वागण्याचा आपण । प्रयत्न करावा निश्चयें ॥१०९॥ सर्व विद्यांत प्रधान । ही आत्मविद्या जाण । दिवौकसी पंचवदन । वा पर्वती मेरु जैसा ॥११०॥ आत्मविद्या साधिल्यावरी । मुक्ति चालूनि येते घरीं । बंदा गुलाम श्रीहरी । होतो त्याचा अंकित ॥१११॥ ही अध्यात्मविद्येची पायरी । तुम्हां अवघड चढण्या जरी । परि सुलभ युक्ति खरी । सांगतों मोक्षा जावया ॥११२॥ तूं मारुती हरीपंत । बेरे काका तात्यादि भक्त । यांहीं अनुसरणें हीचि रीत । मोक्षालागीं जावया ॥ ११३ ॥ मागे तुला आणि निमोणकरा । ज्या कथिलें ज्ञानभांडारा । तैसें वागूनि परमेश्वरा । शरण जावें अवघ्यांनी ॥११४॥ नित्य घ्यावें सिद्धदर्शन । नीति जागृत ठेवून । या पुण्येंकरून । अंतसमयीं राहेल शुद्धी ॥११५॥ मात्र तया अंतसमयीं । आस कोणाची करूं नाहीं । मन एकाग्र लवलाहीं । करूनि प्रभू आठवावा ॥११६॥ जें आपुलें आराध्य दैवत । त्याचें करावें ध्यान सत्य । त्या ध्यानांत घडतां अंत । समीपता मुक्ति मिळेल ॥११७॥ जैसी नुकतीच गेली बन्नू । बोधेगांवात सुलक्षणू । तैसेचि अडकर आणि वेणू । मुक्त होतील आत्मज्ञानें ॥११८॥ ऐसें बोलून अभयहस्त । ठेविला चांदोरकरशिरीं सत्य । धन्य महाराज साईनाथ । नमन माझें तयांसी ॥११९॥ ऐसी नीति चांदोरकरांनीं । ऐकून द्वय जोडिले पाणि । लीन होऊनि साईचरणीं । बोलूं लागले सद्‌भावें ॥१२०॥ हे परब्रह्ममूर्ते गुणगंभीरा । हे महासिद्धा करुणाकरा । मायबापा परम उदारा । भवनदीचा तारु तूं ॥१२१॥ होऊनि आम्हां अज्ञजनांसी । नेलेंसी  पैलतटासी । सांगूनि दिव्य ज्ञानासी । ऐसीच कृपा असों दे ॥१२२॥ तैं म्हणती साईनाथ । तुम्ही अवघें माझे भक्त । मी न विसरें तुम्हांप्रत । नका करूं काळजी ॥१२३॥ अल्ला इलाही श्रीराम । देईल तुम्हां सौख्यधाम । पुरवील तुमचें कोड काम । वचन माझें प्रमाण हें ॥१२४॥ सीता बेदरे आण चित्तीं । ही बाबांची थोर महती । चाल त्यांच्या दर्शनाप्रती । वंदन करूं पायांचें ॥१२५॥ त्यांच्या भक्तांच्या खेटराची । सरही न ये आपणां साची । परी बाबा माय अनाथांची । तारण आपुलें करील ॥१२६॥ आजि बाबांचे जमले भक्त । चांदोरकरादि हरिपंत । बाबांनीं आपुल्या भक्तांप्रत । केली आहे मेजवानी ॥१२७॥ ज्ञान वैराग्य आणि भक्ती । हींच पक्वान्नें निश्चितीं । करूनि आपल्या भक्तांप्रती । जेवा म्हणती यथेच्छ ॥ १२८॥ जें जें रुचेल जयासी । तें तें त्यानें सेवणें ऐसी । ताकीद आपुल्या भक्तांसी । बाबा करिती चाल सिते ॥१२९॥ आपण उभयतां कुत्र्यापरी । त्या समर्थाच्या राहूं द्वारी । एखादा तो तुकडा तरी । फेंकील आपणांकडे गे ॥१३०॥ तोचि पुरेल आपणांसी । कृतार्थ वेडे करण्यासी । चाल पर्वणी पुन्हां ऐसी । नाहीं कधीं येणार ॥१३१॥ शताश्वमेघांचें पुण्य । येथेंचि मिळेल तुम्हांलागून । या अध्याया केल्या पठन । एक वेळही श्रोतें हो ॥१३२॥ ही साईंची अध्यायत्रयीं । सरस्वती गंगा यमुना पाहीं । हेंचि प्रयाग सांगू काई । भावार्थात बुडी घ्या ॥१३३ ॥ स्वस्ति श्रीभक्तलीलामृत । वदलों यथामति सत्य । हे तारक भक्तांप्रत । होवो म्हणे दासगणू ॥१३४॥
॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
॥ इति त्रयस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः ॥


अवश्य वाचावे असे काही :-

ह. भ. प. श्रीदासगणू महाराजकृत अर्वाचीन भक्तलीलामृत - अध्याय ३१ वा ( श्रीसाईबाबा चरित्र )

ह. भ. प. श्रीदासगणू महाराजकृत अर्वाचीन भक्तलीलामृत - अध्याय ३२ वा ( श्रीसाईबाबा चरित्र )



Mar 7, 2024

ह. भ. प. श्रीदासगणू महाराजकृत अर्वाचीन भक्तलीलामृत - अध्याय ३२ वा ( श्रीसाईबाबा चरित्र )


॥ श्री गणेशाय नमः ॥ हे चित्स्वरुप सर्वेश्वरा । आनंदमूर्ते उदारा । स्वयंप्रकाशा निर्विकारा । सर्वावस्थातीत तूं ॥१॥ ऐसें तुझें अगम्य रुप । मी न जाणें मायबाप । जेथें वेदही साक्षेप । नेति नेति म्हणतसे ॥२॥ वसिष्ठ भृगू पराशर । जे ज्ञाननभींचे भास्कर । त्यांनाही तुझा न लागला पार । मग मी तेथें काजवा किती ॥३॥ हें असों दे कांही देवा । परी मी करीतसें तुझा धांवा । मम मर्नी वास करावा । हा ग्रंथ वदविण्यास्तव ॥४॥ तया शिर्डीग्रामासी । आले सांईच्या दर्शनासी । नानासाहेब पुण्यराशी । दुसरे नाना निमोणकर ॥५॥ चांदोरकरांनीं पदीं माथा । ठेवूनि बोलले तत्त्वतां । हे साईमहाराजा समर्था । पुरे आतां हा संसार ॥६॥ अवघीं शास्त्रे संसारासी । निःसार आहे म्हणती ऐसीं । ह्या प्रपंचरुप शृंखलेसी । तोड सत्त्वरीं दीनबंधो ॥७॥ जो जो सुखाची हांव धरावी । तों तों दुःखाची स्वारी व्हावी । आशा सटवी नाचवी । ठायीं ठायीं आम्हांला ॥८॥ शोधूं जातां संसारांत । सुखाचा न लेश सत्य । मी कंटाळलों त्याप्रत । नको संबंध तयाचा ॥९॥ ऐसें ऐकतां त्यांचे भाषण । बाबा बोलले हांसोन । हें भलतेंचि वेड्या मोहक ध्यान । कोठून तुज उदेलें ॥१०॥ तुझी आहे सत्य गिरा । परी चुकतोसी वेड्या जरा । यावद्देह तावत् खरा । आहे संसार पाठीर्शी ॥११॥ तो न चुकला कोणासी । मग तूं त्या कैसा सोडिसी । तो सोडितां न ये मजसी । मीही त्यांत गुंतलों ॥१२॥ संसाराची रुपें अनेक । तीं मी सांगतों तुजला देख । देहावरी आहे झांक । पहा तया संसाराची ॥१३॥ काम मोह मद मत्सर । यांचा जो कां परस्पर । संबंध तोही संसार । आहे बापा शिष्योत्तमा ॥१४॥ डोळे पदार्थ पाहती । कर्ण ध्वनीतें ग्रहण करिती । रसना रसातें सेविती । याचेंही नांव संसार ॥१५॥ मनाचे जे जे व्यापार । याचेंही नांव संसार । शारीर धर्म साचार । अवघे संसाररुपी बा ॥१६॥ स्वरुप या संसाराचें । मिश्रण दोन वस्तूंचें । तें हें संसारबंधन साचें । तुटलें नाहीं कोणासी ॥१७॥ दारा पुत्र कन्यादिकांसी । संसार म्हणती निश्चयेसी । तो मात्र ओखटा तुजसी । वाटू लागला सांप्रत ॥१८॥ दारा पुत्र कन्या जाण । बंधु भाचे पुतणे स्वजन । यांच्या त्रासें सेविलें रान । परी न सुटे संसार हा ॥१९॥ ऐसें वदतां गुरुवर । काय बोलती चांदोरकर । हा शेवटला संसार । नको बाबा मात्र मज ॥२०॥ या शेवटल्या संसारीं । दुःख होतें नानापरी । वरले संसार निर्धारीं । अवघे ईश्वरनिर्मित ॥२१॥ त्यां न कोणाचा उपाय चाले । ते पाहिजेत अवघे केले । शेवटल्यासी मात्र विटलें । मन सोडीव त्यापासून ॥२२॥ तैं बाबा म्हणती हांसत । तो तुझा तूंचि केला निर्मित । मग आतां त्याप्रत । कंटाळूनि काय होतें ॥२३॥ संचित क्रियमाण पूर्वीचें । देहप्रारब्ध फळ त्याचें । हेंचि देहप्रारब्ध जन्माचें । आहे मूळ कारण ॥२४॥ तें देहप्रारब्ध भोगल्याविण । न सुटे कवणालागून । तें भोगण्याकारण । प्राणी जन्म पावती ॥२५॥ गरीब मध्यम श्रीमान । प्रापंचिक ब्रह्मचारी जाण । वानप्रस्थ संन्यासी पूर्ण । उच्च नीच अवघे ॥२६॥ घोडा बैल कोल्हा मोर । व्याघ्र गेंडा तरस घार । श्वान बिडाल सूकर । विंचू सर्प मुंग्या पिसा ॥२७॥ ह्या अवघ्यांच्या अस्तित्वासी । प्राण कारण निश्चयेंसी । तो प्राण अवघ्यांपाशीं । आहे एकसारिखा ॥२८॥ मग बाह्य स्वरुपीं भिन्नत्व । कां दिसावे  जगतांत । याचा विचार मनांत । केलास कां त्वां कधींतरी ॥२९॥ याचा विचार करूं जातां । ऐसें कळों येईल तत्त्वतां । कीं हें संचित क्रियमाण सत्ता । म्हणोनि प्राणि भिन्न भिन्न ॥३०॥ हें झालें वर्गीकरण । जैसा वर्ग तैसें लक्षण । मग त्या स्थितीसी कंटाळून । काय होतें शिष्योत्तमा ॥३१॥ व्याघ्र सेविती मांस । सूकर सेविती विष्ठेस । तरस पुरलेल्या प्रेतास । देहस्वभावें उकरीतसे ॥३२॥ कोवळ्या कमलपत्रास । सेविताती राजहंस । घारी गिधार्डे सडक्यास । देहस्वभावें सेविती ॥३३॥ जैसी योनी तैसी कृती । ही जगाची रीत निश्चिती । त्यांतचि देहप्रारब्ध भोगिती । कमीजास्त मानानें ॥३४॥ पहा कित्येक पंचानन । स्वेच्छे सेविती कानन । कित्येकांसी दरवेशी बांधून । दारोदार हिंडविती ॥३५॥ धनिकाश्रित जे कां श्वान । तें बैसती गाद्यांवरुन । कित्येक गांवांत भटकून । तुकड्यासाठी घोटाळती ॥३६॥ कित्येक गांईसी घांस दाणा । अंबोण पेंड प्रकार नाना । तृणही न मिळे कित्येकींना । कित्येक उकिरडा फुंकिती ॥३७॥ या अधिक-उण्याचें कारण । एक देहप्रारब्ध जाण । तें अवघें भोगिल्याविण । कालत्रयीं सुटेना ॥३८॥ तोचि न्याय मानवांत । एक गरीब एक श्रीमंत । एक सभाग्य एक अनाथ । एक भिक्षा मागतसे ॥३९॥ एक उडवी घोडे गाड्या । एकाच्या त्या महाल माडया । एक जागेवर उघड्या । दिगंबर निजतसे ॥४०॥ कित्येकांसी मुलें होती । कित्येकांची होऊनि जाती । कित्येक वांझ राहती । कित्येक त्रासती संततीला ॥४१॥ ऐसें ऐकतां समर्थवचन । चांदोरकर कर जोडून । म्हणती हे कबूल मजकारण । परी सुखदुःख व्हावें कां ॥४२॥ सौख्य होतां हर्ष वाटे । दुःख होतां हृदय फाटे । सुखदुःख हे भेटे । क्षणक्षणां संसारीं ॥४३॥ म्हणूनि ही सुखदुःखाची । खाणी आहे प्रपंच साची । तीचि त्यागितां दुःखाची । नोहे बाबा कदा बाधा ॥४४॥ ऐसें ऐकता भाषण शिष्याचें । बाबा बोलले साचें । अरे सुखदुःख हेंचि भ्रांतीचे । आहे पटल केवळ ॥४५॥ प्रपंचांतील जें जें सुख । तें तें नव्हे खरें देख । बळेंचि त्याला प्रापंचिक । सत्य घेती मानूनी ॥४६॥ पाहो देहप्रारब्धे एकाप्रत । खाया मिळे पंचामृत । एकासी वाळले तुकडे सत्य । एकासी मिळे कळणा कोंडा ॥४७॥ तुकडे-कळणा-कोंडेवाला । दुःखी समजे आपणाला । पंचामृताचा धनी भला । म्हणे कांही कमी नसे ॥४८॥ सेविलिया मधुर पक्वान्न । अथवा कळणा कोंडा जाण । या दोहोंचें अधिष्ठान । तृप्ति जठरस्थ अग्नीची ॥४९॥ शाला दुशाला जरतारी । घेऊनि कोणी नानापरी । भूषविती तनु साजिरी । कोणी पांघुरती वल्कलें ॥५०॥ शाल दुशाल वल्कलाचें । आहे प्रयोजन एकचि साचें । रक्षण करणें तनूचें । कांहीं न यापलीकडे ॥५१॥ मग या सुख-दुःखांचा । उपयोग केवळ मानण्याचा । हें मानणें तिमिर साचा । आहे घातक मानवांसी ॥५२॥ या सुखदुःखांचे तरंग उठती । जे जे कांही आपुल्या चित्तीं । ती अवघी होय भ्रांती । मोह तिचा वाहूं नको ॥५३॥ येथें शंका येईल ऐसी । तरंग अवघे उठण्यासी । कांहीतरी मुळासी । अन्य वस्तू पाहिजे ॥५४॥ लहरी नसती जलाविण । प्रकाश न दीपावांचून । तैसें या तरंगांकारण । कोणीतरी पाहिजे ॥५५॥ लोभमोहादि षड्रिपु देख । हे तरंगांसी उत्पादक । तें तरंगस्वरुप मोहक । असत्य सत्य भासवी ॥५६॥ धनिकाहातीं सुवर्णकडें । पाहूनि दरिद्री चरफडे । हे चरफडणें रोकडें । तरंग उठवी मत्सर ॥५७॥ तें असावें मजपाशीं । ऐसें जें वाटे मानसीं । ह्या तरंगाचे उठावणीसी । झाला लोभ कारण ॥५८॥ ऐशाचिपरी अवघें होतें । तें कोठवरी सांगूं तूंतें । म्हणूनि आधी षड्रिपूंतें । जिंकिलें पाहिजे शिष्यवरा ॥५९॥ मग त्या षड्रिपुशक्तींचा । नायनाट होतां साचा । लाग न साधे तयांचा । तरंग उठविण्या मानसीं ॥६०॥ परी या षड्रिपूंची । समूळ शक्ति न हरितां साची । गुलामत्वाच्या जागीं त्यांची । करीं अवघ्यांची योजना ॥६१॥ मग या सहा गुलामांवर । ज्ञानासी करीं जमादार । त्याच्याही वरी अधिकार । सद्विचारशक्तीचा ॥६२॥ मग या खोटया सुखदुःखांची । बाधा न होय तुज साची । खऱ्या सुखदुःखांची । व्याख्या ऐक सांगतो ॥६३॥ मुक्ती हेंचि खरें सुख । जन्ममरणफेरा हेंचि दुःख । याव्यतिरिक्त दुसरी भ्रामक । आहेत बापा सुखदुःखे ॥६४॥ असो आता या संसारी । तुवा वागावे कैशापरी । हें मी सांगतों निर्धारीं । तिकडे अवधान द्यावें तुवां ॥६५॥ देहप्रारब्धानुरोधें । प्राप्त स्थिती तिच्यामध्यें । आनंद मानूनि रहावें बुधें । खोटी तळमळ करूं नये ॥६६॥ घरीं आलिया संपत्ती । आपण व्हावें नम्र अती । फळे येतां लीन होती । वृक्ष जैसे शिष्योत्तमा ॥६७॥ हें नम्र होणें चांगलें । परी न सर्वांठायीं भलें । दुष्ट दुर्जन ओळखिले । पाहिजेत पुरे या जगतीं ॥६८॥ कां कीं धनिक नम्र होतां । यांना फावे तत्त्वतां । म्हणूनि दुष्टीं कठोरता । धरिला पाहिजे मानर्सी ॥६९॥ साधु संत सज्जन । यांचा राखणें मान । लीन व्हावें लव्हाळ्याहून । त्यांचे ठायीं सर्वदा ॥७०॥ श्रीमंती दुपारची छाया । हें न जावें विसरुनियां । धनमद अंगी आणूनिया । न छळी कोणा निरर्थक ॥ ७१ ॥ आपुली प्राप्ति पाहून । दान धर्म करावा जाण । उगीच कर्ज काढून । उधळेपणा करूं नये ॥७२॥ प्रपंच जरी अशाश्वत । परी ते प्रारब्ध सत्य । तो प्रपंच करण्याप्रत । द्रव्य अवश्य पाहिजे ॥७३॥ शरीरीं जैसी आवश्यकता । आहे पित्ताची तत्त्वतां । तैसी प्रपंचीं ज्ञानवंता । आहे या धनाची ॥७४॥ अवश्य वस्तु जरीं हें धन । परी त्यांतचि न गोवीं मन । राहू नको कदा कृपण । उदार बुद्धि असावी ॥७५॥ परी फाजील उदारता । नाहीं कामाची सर्वथा । द्रव्य अवघें संपूनि जातां । कोणी न विचारी मागुनी ॥७६॥ उदारपण उधळेपण । या दोघांची सांगड जाण । एके ठिकाणीं घातल्या पूर्ण । होईल बापा अनर्थ ॥७७॥ द्रव्यदानीं पहाणें योग्यता । तैसीच त्याची आवश्यकता । याचा विचार तत्त्वतां । करुनि हात सढळ करीं ॥७८॥ पंगु अनाथ रोगग्रस्त । पोरकीं मुलें समस्त । एकादें सार्वजनिक कृत्य । योग्य द्रव्यदानासी ॥७९॥ तैसीच योग्य विद्वाना । पाहूनि करीं संभावना । अनाथ स्त्रीच्या बाळंतपणा । यथाशक्ति मदत करीं ॥८०॥ अन्नदानाचे प्रकार तीन । विशेष नित्य कार्याकारण । विशेष जें कां अन्नदान । तें केव्हां करावें ॥८१॥ घरी संपत्ति बहु आलिया । काळ अनुकूल असलिया । सदिच्छा मनीं झालिया । सहस्त्रभोजन घालावें ॥८२॥ तेथें उच्च नीच भेद नाहीं । तें चहूं वर्णी श्रेष्ठ पाहीं । सुष्ट दुष्ट अवघेही । योग्य या अन्नदानातें ॥८३॥ भंडारा अथवा प्रयोजन । हे याचेचि भेद पूर्ण । परी हें कर्ज काढून । करूं नये कदाही ॥८४॥ आतां नित्य अन्नदानासी । योग्य कोण सांगतों तुजसी । पांथिक तापसी संन्यासी । तडी तापडी भुकेलेला ॥८५॥ मागूनियां कोरात्र । जे करिती ग्रत विद्यार्जन । ऐसा माधुकऱ्यालागून । नित्यान्न घालावें ॥८६॥ लग्न मौंजी ऋतुशांती । सण व्रतोद्यापन निश्चितीं । या अवघ्या प्रसंगांप्रती । कार्यकारण म्हणावें ॥८७॥ या कार्याकारण प्रसंगासी । वाहणें इष्टमित्रांस । आप्त सखे सोयऱ्यांस । आदरें द्यावें अन्न बापा ॥८८॥ हे अन्नदानाचे प्रकार । तुज कथिले साचार । योग्यायोग्य विचार । तोही पैं कथन केला ॥८९॥ वस्त्रदानाची हीच स्थिती । हें विसरु नको कल्पांतीं । आपुल्या अंगी असल्या शक्ती । परपीडा नित्य निवारावी ॥९०॥ हातीं कांही असलिया सत्ता । तिचा दुरुपयोग न करणें सर्वथा । न्यायासनी बैसतां । लांचलुचपत घेऊं नको ॥९१॥ ज्या कार्याची जबाबदारी । नेमिली असे आपुल्या शिरीं । तें कार्य उत्तम करीं । वाहूनि काळजी तयाची ॥९२॥ वाजवीपेक्षां फाजील देख । न करावा पोषाक । अहंपणाची झांक । आणूनि तोरा दावू नको ॥९३॥ कांही नसतां कारण । कोणाचा न करीं अपमान । शठ दुष्ट ओळखून । सदा असावें अंतरी ॥९४॥ कन्या पुत्र दास दासी । या देहप्रारब्धें प्राप्त तुजसी । झाल्या असती तयांसीं । वागवावें प्रीतीनें ॥९५॥ " दारा पुत्र कन्या स्वजन “ । या माझें माझेंचि म्हणून । मनीं वाहतां अभिमान । कारण जन्ममरणांसी ॥९६॥ कां कीं हें देहप्रारब्ध सकल । येथेंचि अवघें सरेल । त्याचा लेशही न उरेल । अंतीं संगती यावया ॥९७॥ या अवघ्यांची महती । आहे याचि जन्मापुरती । मागल्या जन्मींचें निश्चितीं । कोठें आहे गणगोत ॥९८॥ तें ज्या ज्या जन्मींच सरुनि जातें । वासना मात्र बद्ध करिते । तीच वासना कारण होते । पुढलिया जन्मासी ॥९९॥ म्हणूनि या स्वकीयांचा । खोटा मोह न वाहीं साचा । तरीचि अक्षय सुखाचा । लाभ होईल तुजलागी ॥१००॥ जैसे आपण धर्मशाळेत । जातो क्षणैक रहाण्याप्रत । तात्पुरती सोय तेथ घेतो । आपण करुनि ॥१०१॥ म्हणूनि त्या धर्मशाळेचा । मोह ना आपणा उपजे साचा । तोचि प्रकार येथींचा । प्रपंच ही धर्मशाळा ॥१०२॥ ऐसें प्रत्यकानें वागावें । कर्तव्य आपुलें करावें । तें करीत असतां ओळखावें । सच्चिदानंद ईश्वरा ॥१०३॥ पुत्र आपुला आणि पराचा । निर्माणकर्ता एकचि साचा । परी आपुल्या पुत्राचा । भार स्थापिला आपुल्या शिरी ॥१०४॥ म्हणूनि त्याचें संगोपन । करोनि उत्तम शिक्षण । द्यावें थोडेंबहुत धन । त्यासाठीं ठेवावें ॥१०५॥ परंतु मींचि पुत्रासी पोशिलें । मींचि त्यासी शिक्षण दिलें । मींच त्यासाठीं ठेविलें । धन ऐसें मानूं नको ॥१०६॥ कर्तव्य आपण करावें । कर्तृव्य ईश्वरा द्यावें । फलही त्यासीच समर्पावें । अलिप्त आपण रहावया ॥१०७॥ ज्ञानाचा करुनि उपयोग । बरें वाईट जाणें सांग । जें जें बरें त्यासी अंग । देऊनि वाईट टाकावें ॥१०८॥ उत्तम कार्य हातीं घ्यावें । तें तें नाना प्रयत्नें शेवटास न्यावें । कीर्तिरुपें उरावें । मागें मरुनि गेल्यावर ॥१०९॥ अंगी असावें कर्तृत्व । न रहावें निर्माल्यवत । हाचि पुरूषाचा पुरुषार्थ । किती सांगूं तुजप्रती ॥११०॥ कर्तृत्व करितां अभिमान । वहावा बापा मनीं जाण । फल येतांचि व्हावें लीन । अभिमान तो झुगारोनि ॥१११॥ जोंवरी जीवाचें अस्तित्व । तोंवरीं त्या जपणें सत्य । मरण घडतां व्यर्थ । शोक त्याचा करूं नये ॥११२॥ कां कीं शोक करण्यापाहीं । तेथें जागा उरलीच नाहीं । सुज्ञांसी न त्यांचे वाटे कांही । मूर्ख मात्र करिती शोक ॥११३॥ पहा पांचांची उसनवारी । आणिली होती आजिवरी । ती त्यांची त्यांना निर्धारीं । परत केली प्राणानें ॥११४॥ वायु वायूंत मिळाला । तेज मिळालें तेजाला । ऐसी आपआपले ठिकाणाला । गेलीं निघूनि पंचभूतें ॥११५॥ शरीर भाग पृथ्वीचा । तो निजसम दृश्य साचा । म्हणोनि तो शोक करण्याचा । नाहीं विषय शिष्योत्तमा ॥११६॥ तैसेंचि होतां मुलाचें जनन । हर्ष करीं न द्यावें मन । तो सृष्टीचा व्यवहार समजून । स्वस्थ रहावें नारायणा ॥११७॥ पहा पृथ्वी बीजा धारण करी । घन वृष्टि करिती वरी । मग तो सूर्य आपुल्या करीं । मोडालागीं निपजवितो ॥११८॥ त्या मोडाचें होतां जनन । पृथ्वीं सूर्य आणि घन । काय आनंद मानून । नाचूं लागती दश दिशा ॥११९॥ त्याचा मोठा वृक्ष होवो । अथवा आजि जळूनि जावो । परी हर्ष शोक रिघावो । न करी त्यांच्या मानसीं ॥१२०॥ तैसें रहावें आपण । मग शोक दुःख कोठून । शोक-दुःखांच्या अभावि जाण । मुक्त स्थिति चांदोरकरा ॥१२१॥ याच्या पुढील जें कां कथन । तें मी पुढे सांगेन । एकादे वेळीं तुजलागून । राही सावधान निजकर्मी ॥१२२॥ ऐसी ऐकोनि समर्थ-वाणी । चांदोरकर आनंदले मनीं । बाबांचे धरिले पाय दोनी । घट्ट मिठी मारुनियां ॥१२३॥ नयनीं लोटल्या अश्रुधारा । रोमांच उठले शरीरा । हे साई समर्थ उदारा । उद्धार माझा केला तूं ॥१२४॥ बोधरूपी वर्षतां घन । अज्ञानधुराळा बसून । गेला आमुचा आजि पूर्ण । किती उपकार आठवूं ॥१२५॥ ऐसाचि हर्ष निमोणकरा । झाला असे साजिरा । दोघेही आपुल्या घरा । गेले वंदूनि बाबांतें ॥१२६॥ सीता बेदरे सांगूं किती । बाबांनी जी कथिली नीती । भक्त चांदोरकरप्रती । ती मीं वेडे कथिली तुला ॥१२७॥ या नीतीचें पठण । जो कोणी भाविक जन । करी नित्य भावेंकरुन । त्यासी न होय भवबाधा ॥१२८॥ स्वस्ति श्रीभक्तलीलामृत । वर्षला हें बोधामृत । तें सेवा तुम्हीं समस्त । विनंती करी दासगणू ॥१२९॥ ॥ श्री हरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ ॥ इति द्वात्रिंशाऽध्यायः समाप्तः ॥ 


अवश्य वाचावे असे काही :-

ह. भ. प. श्रीदासगणू महाराजकृत अर्वाचीन भक्तलीलामृत - अध्याय ३१ वा ( श्रीसाईबाबा चरित्र )