Apr 26, 2024

श्रीनृसिंहतात्यामहाराजकृत श्रीमाणिकप्रभूंची आरती


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


जय देव जय देव जयगुरू माणिका । सद्‌गुरु माणिका ।  तव पद मोक्ष आम्हां न स्मरू आणिका ॥धृ.॥ काया वाचा मनें शुद्ध मी शरण तुसी । ठेवुनी मस्तकि हस्तक ज्योती मिळविसी ।  मुमुक्षूला मोक्ष क्षणार्धे तूं देशी । दाउनि चारि देह ब्रह्मा म्हणवीसी ॥१॥ देहातीत विदेही योगी मुगुटमणी । कर्म शुभाशुभ करिसी हेतू नाही मनीं । राजा अथवा रंक पाहसी सम दोनी । तवसम साधू असती परि योगित्वासि उणी ॥२॥ परोपकारी अससी वर्णू काय किती । अकल्पिता तूं देसी करू मी काय स्तुती ।  वर्णाया गुरुमहिमा शेषा नाहि मती । जग ताराया आलासी अंशत्रयमूर्ती ॥३॥  सुरवर इच्छिति दर्शन घेऊं आम्हि त्यासी । देवादिकां अप्राप्त प्राप्त तू आम्हासी ।  पडता चरणीं मी मुक्त होईन म्हणे काशी । सुकृत बहु जन्मांचें नरसिंहापाशी ॥४॥


॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥



Apr 17, 2024

॥ अवतरला रघुनंदन । पूर्णब्रह्म जगद्‌गुरु ॥


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीराम श्रीराम श्रीराम

सर्व दत्तभक्तांना श्रीरामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा !


वसंतऋततु चैत्रमास । शुक्लपक्ष नवमी दिवस । सूर्यवंशीं जगन्निवास । सूर्यवासरीं जन्मला ॥
माध्यान्हा आला चंडकिरण । पुष्य नक्षत्र साधून । अवतरला रघुनंदन । पूर्णब्रह्म जगद्‌गुरु ॥
श्रीराम केवळ परब्रह्म । त्यासी जाहला म्हणतां जन्म । संत हांसतील परम । तत्त्वज्ञानवेत्ते जे ॥

ज्याची लीला ऐकतां अपार । खंडे जन्म मृत्यु दुर्धर । त्या रामासी जन्मसंसार । काळत्रयीं घडेना ॥

सारी अयोध्या ज्या घटनेची वाट पाहत होती ती घटना व घटीका जवळ येत होती. अति शुभदायी असा चैत्र महिना आला. दशरथाची महाराणी कौसल्या आता आसन्नप्रसवा झाली होती. तिच्या सुंदर मुखावर अलौकिक असे तेज दिसत होते. अयोध्या नगरीत सर्वत्र शुभशकून होत होते. चैत्रातील शुद्ध नवमी तिथी उगवली आणि कौसल्येला प्रसूती वेदना सुरु झाल्या. सूर्य नारायण मध्यान्ही आले, तेव्हा कौसल्या महाराणी प्रसूत होऊन तेजःपुंज सावळ्या रंगाचा पुत्र जन्माला आला. जणू काही पृथ्वीतलावर त्यावेळी वसंतऋतूला अत्यंतिक बहर आला, सर्व सुरवर आपापली विमाने घेऊन अयोध्या नगरीवर गगनातून स्वर्गातील पुष्पांची वृष्टी करीत होते ! कौसल्येचा पुत्र म्हणून जन्म घेण्याआधी श्रीहरि विष्णूंनी एक अद्भुत लीला केली. केवळ कौसल्येसाठी ते श्रीपती पद्म-शंख-चक्र-गदाधारी अशा चतुर्भुज रूपांत प्रगट झाले.

ते कौसल्या सती बैसली असतां एकांतीं तों अष्टदश वरुषांची मूर्ति सन्मुख देखे अकस्मात ॥

लक्ष्मी, सरस्वती आणि गंगा यांनी त्यांच्या दिव्य चरणांचा आश्रय घेतला होता. त्यांचे तेज सूर्य चंद्रापेक्षाही अवर्णनीय होते.

संध्याराग अरुण बालार्क दिव्य रत्नांचे काढिले रंग देख तळवे तैसे सुरेख श्रीरामाचे वाटती ॥

सहस्र विजांच्या प्रकाशासम तेजस्वी असा पीतांबर दिसत होता तर मेखलेचे मणी म्हणजे जणू शीतल झालेले सूर्य भासत होते. त्यांनी धारण केलेल्या घागऱ्यांचे कोमल ध्वनी जणू वेद ऋचांशी स्पर्धा करीत होते.

कंठात सूर्यासारखा तेजस्वी कौस्तुभ मणी होता. शंख, चक्र, गदा व पद्म अशी भ्रषणे चारी हातांत होती. त्या चारी हातांना सुवर्ण भूषणे शोभत होती.

श्यामलांगी अति निर्मळ वरी डोले वैजंतीची माळ अनंत भक्त हृदयीं धरिले तरीच वक्षःस्थळ रुंदावलें ॥

जणू कोट्यावधी मदनांच्या सौंदर्यासम त्या त्रिलोकेशाच्या मुद्रेचे कसे वर्णन करावे बरें ?

कंबुकंठ अति शोभत नासिक सरळ सुकुमार बहुत मंदिस्मितवदन विराजत कोटि मन्मथ ओंवाळिजे ॥ विद्रुमवर्ण अधर सतेज माजी ओळीनें झळकती द्विज त्या तेजें शशी नक्षत्रें तेजःपुंज झांकोळती पाहतां ॥ त्रैलोकींचा मेळवोनि आनंद ओतिलें रामाचें वदनारविंद आकर्ण नेत्र भु्रकुटी विशद धनुष्याकृति शोभती स्वानंदसरोवरींचीं कमलदलें तैसे आकर्ण नयन विकासले त्या कृपादृष्टीनें निवाले प्रेमळ जन सर्वही 

कौसल्येने ते केशवाचे अतिमोहक रुप डोळे भरून पाहिले अन कौसल्या बोले ते अवसरीं भक्तवत्सला मधुकैटभारी तूं आतां बाळवेष धरीं माझें उदरीं अवतरें ॥

हे भगवंता ! आतां तू बाल स्वरूप हो. लोक म्हणतील कौसल्यानंदन ॥ ऐसा होय तूं मनमोहन ॥"

कौसल्यामातेने केलेली ही प्रार्थना ऐकताच श्रीहरि विष्णूंनी आपले विराट दिव्य स्वरूप आवरले आणि तिच्यापुढे ते बालकरूपांत प्रकट झाले !

सजलजलदवर्ण कोमळ तो कौसल्येपुढें जाहला बाळ तंव ते परम सुवेळ पुष्यार्कयोग ते समयीं ॥

जो क्षीरसागरवासी तमालनीळ तो कौसल्येपुढें जाहला बाळ चरणांगुष्ठ धरोनि कोमळ मुखकमळीं घालीतसे

महाराणी कौसल्या प्रसूत झाली आणि राजपुत्र जन्मला, ही वार्ता अयोध्या नगरीत पसरली. अयोध्याजन आनंदोत्सव साजरा करू लागले.

थोड्याच वेळांत राणी सुमित्रेस पुत्रप्राप्ती झाली, ही शुभ वार्ता नगरांत पसरली. अयोध्यावासियांचा आनंद द्विगुणित झाला, तोच राणी कैकयीस जुळे पुत्र झाले हे सुखद वर्तमान सर्वांस कळविण्यांत आले. असा तिथे मोठा आनंदसोहळा झाला.

तों सुमित्रेसी जाहला पुत्र म्हणोनि धांवत आले विप्र कैकयीस जाहले दोन कुमर ते विष्णूचे शंखचक्र अवतार क्षीरसागरींहूनि श्रीधर कौसल्येमंदिरी पातला ॥ 

तेरावे दिवशीं वसिष्ठऋषि नामकरण ठेवी चौघांसी कौसल्येचा राम तेजोराशी जो वैकुंठवासी जगदात्मा ॥ सुमित्रेचा नंदन त्याचें नाम ठेविलें लक्ष्मण जो काद्रवेयकुलभूषण विष्णु शयन ज्यावरी करी ॥ कैकयीचे जे कां सुत भरत शत्रुघ्न निश्चित चौघे दशरथी जगविख्यात जाहले ॥

रघुवंशाची पुण्याई फळांस आली होती, भगवंताने बालस्वरूप धारण करून दशरथाचा पुत्र म्हणून अवतार घेतला होता.

पुराणपुरुष परात्पर तो ब्रह्मानंद श्रीधरवर अयोध्येंत अवतरला साचार ॥

॥ श्रीराम श्रीराम श्रीराम


श्रीरामचंद्रांचा पाळणा


बाळा जो जो रे कुळभूषणा । दशरथनंदना । निद्रा करि बाळा मनमोहना । रामा लक्षुमणा ॥धृ॥ पाळणा लांबविला अयोध्येसी । दशरथाचे वंशी । पुत्र जन्मला हृषीकेशी । कौसल्येचे कुशी ॥१॥ रत्नजडित पालख । झळके अलौकिक । वरती पहुडले कुलदिपक । त्रिभुवननायक ॥२॥ हालवी कौसल्या सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी । पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जती जयजयकार ॥३॥ विश्‍वव्यापका रघुराया । निद्रा करी बा सखया । तुजवर कुरवंडी करुनिया । सांडिन आपुली काया ॥४॥ येऊनि वसिष्ठ सत्वर । सागे जन्मांतर । राम परब्रहा साचार । सातवा अवतार ॥५॥ याग रक्षुनिया अवधारा । मारुनि रजनीचरा । जाईल सीतेच्या स्वयंवरा । उद्धरि गौतमदारा ॥६॥ पर्णिले जानकी सुरुपा । भंगुनिया शिवचापा । रावण लज्जित महाकोप । नव्हे पण हा सोपा ॥७॥ सिंधूजलडोही अवलीळा । नामे तरतिल शिळा । त्यावरी उतरुनिया दयाळा । नेईल वानरमेळा ॥८॥ समूळ मर्दूनि रावण । स्थापिल बिभीषण । देव सोडविले संपूर्ण । आनंदले त्रिभुवन ॥९॥ राम भावाचा भुकेला । भक्ताधीन झाला । दास विठ्ठले ऎकिला । पाळणा गाईला ॥१०॥

संतकवी श्री दासगणू महाराजविरचित श्रीरामप्रभूंचा पाळणा


बाळा जो जो रे ! रघुराया । भक्तवत्सला ! सदया ॥धृ०॥ त्रिभुवन पाळना तुजसाठीं शशिवदना । निद्रा करि बारे ! अघशमना । रामा राजिवनयना ॥१॥ ऋग् यजु साचार पाळण्याचे खूर । अठरा पुराणें निर्धार । उपनिषदें विणकर ॥२॥ गादी भावाची त्यावरती । उशि सोज्वल भक्तीची । रामा घातिली म्या, मधे साची । शाल वैराग्याची ॥३॥ शांति ही दोरी घेउनिया । मी बघ अपुले करी । हालविन तुजलागी रघुराया । दासगणूला तारी ॥४॥


॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


Apr 10, 2024

भावार्थ श्रीगुरुलीलामृत - देवतावंदन


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ  द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-श्रीस्वामीसमर्थमहाराजाय नमः ॥ 

प्रारंभी श्रीमंगलमूर्ति । ज्याचे योगें स्फुरे चैतन्य स्फूर्ति । ब्रह्मादिक देव असुर नर जया वंदिती । त्या नमियेलें आदरें ॥  
श्रीमद्दत्तावतारी अक्कलकोट स्वामी महाराजांचे चरित्र - श्रीगुरुलीलामृत या पोथीच्या प्रारंभी ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य गणेश वंदन करतात. ग्रंथलेखनाचे कार्य निर्विघ्नपणे व्हावें आणि इष्टदेवतेचा अनुग्रह लाभावा यासाठी ग्रंथकर्ते ग्रंथारंभी जे स्तवन करतात त्यास मंगलाचरण म्हणतात. ग्रंथारंभी देवतावंदन । शिष्टाचार प्रवृत्तिजनन । परंपरा मंगलाचरण । अवश्य केले पाहिजे ॥ याच परंपरेला अनुसरून वामनबुवा आद्यपूजेचा मान असलेल्या आणि जो चतुर्दशविद्या, चौसष्ठ कलांचा अधिपती आहे त्या गणपतीची अनेक प्रकारें स्तुती करून, गजानन हेरंब लंबोदरा । विघ्नांतका सर्वविद्या-सागरा । ग्रंथ सिद्धीस नेऊनि दातारा । पूर्ण करा सविस्तर ॥ अशी प्रार्थना करतात. 
त्यानंतर, अनादिविद्येची चित्तशक्ती भगवती सरस्वती, वेदमूर्ति सकल ऋषिवर्य, वेदव्यास - सुरगुरू बृहस्पति, इंद्रादि सुरवर, ग्रहादिक या सर्वांना स्मरणपूर्वक वंदन करतात. जगदगुरु श्रीशंकराचार्य, कालिदासादि कविवर्य, नवनाथादि योगीश्वर आणि ज्ञानेश्वरादि संत-सज्जनांना नमन करून ग्रंथलेखनास सहाय्य करावे अशी प्रार्थना करतात.
पुढे वामनबुवा, आतां वंदूं मातापिता । कुलदेवतादि ग्रामस्थान वास्तुदेवता । ज्यांचे कृपे इहपर साध्य तत्वतां । होय सर्वथा निर्धारें ॥ अशी आपल्या कुळाची माहिती देतांना लिहितात - अहमदनगरनिवासी धारण्य गोत्री वैद्य घराण्यांत माझा जन्म झाला असून सप्तशृंगनिवासिनी जगदंबा आणि श्रीशंकर हे या कुळावर निरंतर प्रसन्न आहेत. माझे पूर्वज माणिक, मोरेश्वर, भटूवैद्य, नारायण आदि निष्णांत वैद्य होते. 
भट्टूवैद्यास होते चार नंदन । त्यांत श्रेष्ठ नारायण विद्वान । तयासि श्रीजगदंबा प्रसन्न । बोले चाले तत्संगें ॥ माझे खापरपणजोबा नारायण वैद्यांस स्वतः सप्तशृंगनिवासिनी माता औषधी आणून देत असे. माझे पणजोबा त्र्यंबक ब्रह्मज्ञानी होते आणि ते वाल्मीक ग्रामीं म्हणजेच वामोरी येथे वास्तव्यास आले. तर माझे आजोबा विठ्ठल उत्तम ज्योतिर्वैद्य होते. माझ्या पित्याचे नाव रावजीभट्ट आणि मातेचे नाव अहल्या होते.
तदनंतर ग्रंथप्रयोजनाचा आरंभ करतांना वामनबुवा - गुरुलीला वर्णनार्थ महाराजा । निजाज्ञा झाली या चरणरजा । मंदमति मी ह्या ग्रंथरूपी कार्यध्वजा । सिद्धीस नेणार आपणचि ॥ अशी अक्कलकोट स्वामी समर्थांची अभ्यर्थना करतात. 
आपल्या सद्‌गुरुंचे स्तवन करतांना वामनबुवांची गुरुभक्ती आणि गुरुनिष्ठा प्रत्येक ओवींमधून इतकी अधोरेखित होते की आपणही श्रीगुरुंचे स्वरूप आणि गुणवर्णनांत अगदी रंगून जातो. - ॐ नमः श्रीसद्‌गुरुनाथा । श्रीगुरुदेवदत्त स्वामी समर्था । पूर्णब्रह्म केवल अनादि यथार्था । आपणचि एक अद्वितीय ॥ जे ऋषि, मुनि, योगिजन, आणि भक्तजनांचे ध्येय आहेत, या जगताचे आधार आहेत, तेच परात्पर, परमगुरु श्रीदत्तात्रेय तुम्हीच आहात. सनकादिकांसही वंदनीय असलेले परब्रह्मस्वरूप, दीनानाथ, अनंतकोटी ब्रह्मांडनायक असे हे हरि-हर-ब्रह्माचे अवतार हे सद्‌गुरु तुम्हीच आहात. साधू-संतसज्जनाचे रक्षण करण्यासाठी, खल-दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी आणि धर्मसंस्थापनासाठी युगायुगी तुम्हीच अवतीर्ण होता. या कलियुगांत जागोजागी घोर दुराचरण होऊ लागले, तेव्हा श्रीपादश्रीवल्लभ रूपांत तुम्ही अवतरित झाला आणि भक्तजनांस सन्मार्ग दाखवला. त्यानंतर पुन्हा एकदा नरवेषांत यति नरसिंह सरस्वती झाला आणि सद्‌धर्म-नीति यांची घडी बसवून असंख्य भक्तजनांचा उद्धार केला. 
पुढे काही कालाने पुनरपि । घोर कलियुगीं प्राणी होऊं लागले पापी । म्हणून दत्तात्रेय ब्रह्मस्वरूपी । अवतरले नृसिंह-यतिरूपें ॥ - या सकल जगताच्या उद्धारासाठी श्रीगुरु नृसिंहयतीश्वरांनी या पृथ्वीतलावर स्वच्छंद संचार केला. हिमाचल, जगन्नाथ, हरिद्वार, द्वारका, गिरनार पर्वत, प्रयाग, गया, श्रीकाशी, व्यंकटेशगिरी, रामेश्वर, नारायण-बिंदू-पंपा-मानस सरोवर, मातुलिंग, खेटक, पंढरपूर, कांची द्वय, बदरीकेदार या तीर्थस्थानीं आणि भागिरथी, गोदावरी, कृष्णा तीरांवरील अनेक पावन क्षेत्रीं तीर्थाटन केले. तेच हे परमात्मा श्रीनृसिंहसरस्वती सोलापुरात काही काळ वास्तव्य करून फिरत फिरत अक्कलकोटी आले आणि भक्तजनांच्या उद्धारासाठी एकवीस वर्षे तिथेच राहिले. श्रीदत्तात्रेयांचे अवतार असलेले, सर्व चराचर सृष्टीला व्यापून उरलेले, सर्वांतर्यामी असे गुरु समर्थ स्वामी जगत-हितार्थ अक्कलकोटग्रामीं वसले, त्यांच्या चरणकमळांना मी अनन्यभावाने नमन करतो. वामनबुवांची अशी भावपूर्ण प्रार्थना ऐकून सद्‌गुरु स्वामी समर्थ प्रसन्न झाले आणि अंतरी प्रगटूनि अत्रिनंदन । ग्रंथ सिद्धीस जाईल निर्विघ्न । आशीर्वचन बोलती ॥
प्रत्यक्ष श्रीस्वामी समर्थांची अशी आज्ञा आणि आशीर्वाद प्राप्त झाल्यावर श्री वामनबुवा वैद्य श्रीगुरुलीलामृत हा ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ करतात. 
दत्तात्रेयस्वामीकृपे सविस्तर । ग्रंथ आरंभिला गुरुलीलामृत-सागर । सत्संकल्पसिद्धीप्रदातार । पूर्ण करील त्याचा तो ॥ 
॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

Apr 4, 2024

श्री स्वामी समर्थ श्रीकरुणास्तोत्र - प्रथमोऽध्यायः


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ 

जय जयाजी महाराजा । दीनदयाळा सद्‌गुरुराजा । वेदां अगोचर महिमा तुझा । आनंदकंदा श्रीहरी ॥१॥ जय जयाजी कल्पतरु । विश्वातीता विश्वंभरु । अनाथसखया जगद्‌गुरु । आदिरूपा निर्विकल्पा ॥२॥ जयजयाजी अनाथसखया । कृपें निवारिसी भवभया । मापातीता भक्तसदया । अनाथनाथा दीनबंधो ॥३॥ जय जयाजी दीनोद्धारा । विश्वपती कृपासागरा । अतर्क्य अनंत अवतारा । हेही लीला सहज तुझी ॥४॥ सच्चिदानंदा गुणातीता । लीला लाघवी अनंता । तुझिया चरणीं श्रीस्वामीसमर्था । नमन माझे साष्टांगी ॥५॥ तूंचि सद्‌रूप । तूंचि चिद्‌रूप । तूं आनंदरूप । याही वेगळा तूंचि तूं ॥६॥ निर्विकल्पा निरामया । निष्कलंका निराधारिया । निष्प्रपंचा तुझी माया । ब्रह्मादिका अतर्क्य ॥७॥ निःसंगा निरंतरा । निर्गुणा निराकारा । निर्मोहा निराकारा । निर्व्यंगा निर्धूता तूं ॥८॥ गुणासहिता निर्गुणा । मायातीता निरंजना । मूळपुरुष सनातना । आदि-अंत-रहित तूं ॥९॥ आता करूं स्तवन । तरी स्तवनातीत तूं जाण । अथवा करुं नमन । तेंहि तैसेंचि ॥१०॥ रूप पाहूं तरी तूं अरूप साचार । ऐसा वेद-शास्त्रें करिती निर्धार । असो, काही न करावें, तरी उद्धार । कैसा होय जीवांचा ॥११॥ म्हणून तूंचि सगुण । तूंचि निर्गुण । तूंचि खेळसी त्रिगुण । मायामय सहजचि ॥१२॥ मायेकरितां तुझें ज्ञान । तुजकरितां माया जाण । ऐसें तुमचे परस्पर ऐक्य असणें । म्हणूनि अतर्क्य म्हणतसें ॥१३॥ तथापि आपुल्या कार्याकरितां । तुज स्तवितसें अनंता । कृपाकटाक्षे सांभाळावें आतां । दास म्हणवितों म्हणूनी ॥१४॥ श्रीकेशवा नारायणा । श्रीमाधवा वामना । श्रीअच्युता मधुसूदना । श्रीवासुदेवा गोविंदा ॥१५॥ श्रीगुरु सद्‌गुरु । सच्चिदानंद परात्परु । अनाथसखया कल्पतरु । श्रीसमर्थस्वामी ॥१६॥ मी तो अति हीन-दीन । महापापी चांडाळ पूर्ण । आतां आपुल्या कृपेंकरून । उद्धारावें श्रीअनंता ॥१७॥ मला पापें कवटाळिती । माझ्या आचरणे नरक-भीती । मज दोषिया यम कांपती । दंड कोणता करावा ॥१८॥ म्यां चौर्यकर्म केलें । परस्त्रियांतें भोगिलें । अखाद्यही भक्षिलें । मिती नाही असत्या ॥१९॥ केलें अपेयपान । बहुत निंदिले सज्जन । मी कोण हें नाठवे पूर्ण । झालों केवळ आत्मघातकी ॥२०॥ जैसा सूर्य आणि प्रकाश । तैसा माया आणि परेश । म्हणूनि तुज स्तवितां हृषीकेश । मायेचें स्तवन होतसे ॥२१॥ म्यां सायासें दोष संचिले । जें करूं नये तें केलें । रात्रंदिवस विषय भोगिले । उसंत नाही क्षणमात्र ॥२२॥ म्यां देह पोषिला । इंद्रियांसी लळा दिधला । म्यां सन्मार्ग सोडिला । उन्मत्तपणाचेनि योगें ॥२३॥ कामुक झालों परस्त्रियांचेनि । जी स्त्री दिसे ती हवीच वाटे मनीं । अन्य विषय हे तैसेचि निशिदिनीं । आवडती मायबापा ॥२४॥ सुखाचा नाहीं लेश । दुःख भोगिले असोस । झाला आयुष्याचा नाश । दुर्लभ नरदेह गेला ॥२५॥ वांचूनि काय केलें । बहुत पाप संचिलें । जन्मोजन्मीं पुरे वहिलें । राई पर्वतासारख्या ॥२६॥ नाहीं केलें तीर्थाटन । नाहीं मातृपितृसेवन । नाहीं अतिथिपूजन । घडले नाही दानधर्म ॥२७॥ नाहीं घडलें तुझें अर्चन । नाहीं घडलें कथाश्रवण । नाहीं परोपकारी वेचिलें धन । तुजप्रीत्यर्थ महाराजा ॥२८॥ नाही केली भूतदया । नाहीं झिजविली भजनीं काया । नाहीं घडली सत्क्रिया । अनुभवें खूण कळतसे ॥२९॥ नाहीं केला सद्विचार । नाही पाहिले सारासार । म्हणूनि पुढे काय होणार । पश्चात्ताप होईना ॥३०॥ नाहीं संध्यास्नान । नाहीं वेदपठण । नाही तुझें स्मरण । नाम वाचें येईना ॥३१॥ नाहीं केले कोणा वंदन । नाहीं भगवन्मूर्ति-अर्चन । नाहीं कोणतें व्रत घडले जाण । तुज संतोषाकारणें ॥३२॥ प्रपंची वाटे हव्यास । भागवतधर्मी कंटाळा चित्तास । सत्पुरुषांचे बोध-वित्तास । मन अती संतापें ॥ ३३॥ माझी स्त्री, माझे पुत्र । माझ्या कन्या, माझे मित्र । माझे जामात, माझे वित्त । आणि संसार माझा ॥३४॥ माझा देह, माझें घर । माझे बंधू, माझा परिवार । अती वाढविला जोजार । आपुल्या बंधनाकारणें ॥३५॥ मी शहाणा मी थोर । मी विद्वान मी चतुर । मी संपन्न, मी उदार । ऐसें मनीं वाटतसे ॥३६॥ मी कार्यकर्ता, मी भाग्यवान । मी दीर्घदर्शी पुण्यवान । मी पालनकर्ता गुणवान । आपल्या परिवाराचा ॥३७॥ मी बोलका लोकप्रिय । मी भक्त मी उदय । मी श्रेष्ठ, मश्यक काम । अन्य मजपुढे ॥३८॥ इत्यादि सत्य वाटे हा अविचार । असत्य वाटे तो सद्विचार । प्रस्तुत माझा तो आचार । ऐसाचि आहे गुरुश्रेष्ठा ॥३९॥ काया-वाचा-मन । कांहीं पाहतां न दिसे पुण्य । जळो माझे जन्म घेणें । भूमिभार जाहलों ॥४०॥ सकळ अवगुणांची राशी । जन्मा आलो दोष-संचयांशी । आतां माझी सुटका कैशी । होय ते कळेना ॥४१॥ कोणते जन्मीचें पुण्य पदरीं । म्हणोनि आलो तुझे नामरूप दरबारीं । आतां जैसी युक्ती दिसेल बरी । तैसें करी मायबापा ॥ ४२॥ कलियुगीं अति दुर्धर । तेथ तुझें नाम दरबार थोर । बहुत पावविले परपार । या दरबारीं ऐसें ऐकतों ॥४३॥ तुझ्या प्राप्तीविषयीं करावें साधन । तरी ती नाही आंगवण । ऐसें मला माझे मन । साक्ष देतसे ॥४४॥ तुजप्रीत्यर्थ करावें तीर्थाटन । तरी शरीरीं शक्ती नाही जाण । अथवा करुं पुरश्चरण । तरी मन तेथ न बैसे ॥४५॥ भूतमात्रीं दया करूं । तरी तोही न दिसे विचारू । दोषदृष्टी निरंतरु । म्हणूनि तेंही नावडे ॥४६॥ करावें अध्यात्म-श्रवण । तरी चंचल नावरे मन । करावें वर्णाश्रमधर्म जाण । तरी तेथ श्रद्धा न बैसे ॥४७॥ करावे वेदपठण । किंवा तुझें अर्चन-कीर्तन । तरी शरीरी आले वृद्धपण । तोही उपाय चालेना ॥४८॥ जरी करूं सत्पात्री दान । तरी पदरीं नाहीं ध्यान । भावे सेवावे संतजन । तरी पूज्यबुद्धी असेना ॥४९॥ करू इंद्रियदमन । अथवा योग-साधन । तरी आवरेना चंचल मन । तोही विचार दिसेना ॥५०॥ जरी करावे यज्ञयाग । अथवा सर्वसंगपरित्याग । तरी आवडती विषयभोग । कंटाळा मना न ये कीं ॥५१॥ करावा अरण्यवास । की परोपकारीं वेचावें शरीरास । तरी देहीं ममता वाढली असोस । तूं जाणसी दयाळा ॥५२॥ व्रतांचे करावे सायास । तरी अन्नावांचूनि प्राण कासावीस । जरी घ्यावा संन्यास । तरी चित्तीं वैराग्य नाहीं ॥५३॥ करावें प्रेमें भजन । अंतरी प्रेम नाहीं जाण । करावें ध्याननिष्ठ मन । तरी एकारता नव्हे कीं ॥५४॥ करावे शरणागतीचे उपाय । तरी न होय बुद्धीचा निश्चय । आतां काय करूं उपाय । तुज पावावयाकारणें ॥५५॥ ज्ञानचक्षूंविषयीं आंधळा । वैराग्याविषयीं पांगळा । गुरुसेवेविषयी खुळा । ऐसा अधम जन्मला ॥५६॥ नाही ऐकिली कथा । नाही केली तुझी वार्ता । लेश न दिसे पाहतां । पूर्वसुकृताचा ॥५७॥ तेथ आमचे वैभव तें किती । संसारी होतसे नित्य फजिती । तरी लाज न उपजे चित्तीं । विरक्ती अंतरी होईना ॥५८॥ मीठ मिळे, तरी न मिळे पीठ । पीठ मिळे, तरी न मिळे मीठ । तरी प्रपंची आवडी अवीट । ऐसें जाहलें महाराजा ॥५९॥ पुढे भाग्य येणार । मग भोग मी भोगणार ! ऐशिया संकल्पे बांधिलें घर । इया रीतीं ॥६०॥ अल्पमात्र विषयासाठी । नीच जनाचे लागे पाठी । नाना प्रकारचे संकटीं । घाली आपणांकारणे ॥६१॥ करूं नये ते करी । धरूं नये तें धरी । बोलूं नये तें वैखरी । भलतेंचि बडबडे ॥६२॥ नाठवे मागील केलें । पुढे काय होणार न कळे । ऐसे जाहलो जी आंधळे । केवळ डोळे अमान ॥६३॥ देव कोण, मी कोण । कोण असले तें ज्ञान । याचा विचार न पाहे मन । आणि विषयमृगजळी धावतसे ॥६४॥ ऐसा अवगुणी अन्यायी । किती म्हणुनी सांगू काई । आता आपुलें ब्रीद पाही । आणि सोडवी मजलागीं ॥६५॥ सोडवी म्हणता वाटें लाज । नाही केले सेवेचे काज । परंतु दयाळु महाराज । तारी तारी पतितासी ॥६६॥ नको पाहूं पुण्य । नको पाहूं अवगुण । नको पाहूं गुण । असे की नाही समर्था ॥६७॥ नाही भाव नाही भक्ती । नाही नेम नाहीं विरक्ती । नाहीं निश्चय चित्तीं । तुझे पाय प्राप्तीसी ॥६८॥ नेणें निर्गुण । नेणे सगुण । नेणें मी हा कोण । नेणें तत्त्वचिंतन ॥६९॥ नाहीं शांती नाहीं ज्ञान । नाहीं विचार नाहीं साधन । नाहीं सत्समागमी आवडी पूर्ण । अविवेकी पूर्ण दुरात्मा ॥७०॥ ऐसा पापी मी अघोरी । काय वाणूं एके वैखरी । पाषाण जन्मलों संसारीं । केवळ महामूर्ख ॥७१॥ असो, आता किती सांगू अवगुण । धिक धिक् माझा नरदेह जाण । आतां कांहीं करावें साधन । ऐसा हेत उपजला ॥७२॥ तों आला वृद्धापकाळ । गेलें तारुण्य सकळ । शक्ति नाही अळुमाळ । झालों पांगुळ सर्वोपरी ॥७३॥ अंतरी होतो पश्चात्ताप । जन्मांतरीचे मोठे पाप । तेणें गुणें विक्षेप । वारंवार होती पैं ॥७४॥ कांहीं साधन करावे ऐसा हेत मना । तों मागें ओढिती विषय-वासना । जैसा पायीं दोर लावुनी जाणा । कीटकासी ओढिती ॥७५॥ म्हणोनि झालों कासावीस । तुझ्या कृपेची आस । करतिसें गा हृषीकेश । गुरुराया समर्था ॥७६॥ येथुनी कधी सोडविसी । कधी आपुला दास म्हणविसी । कधी मजवरी दया करिसी । हे न कळे मजलागीं ॥७७॥ कांहीं एक निमित्त करुनी । महापापी सोडविले भयापासुनी । अजामिळादि कुंटिणी । ऐसे पुराणीं ऐकतों ॥७८॥ तोच धरुनी आधार । तुजपाशी रडतो वारंवार । हाका मारितों सत्वर । कृपा करी भलतिया भावें ॥७९॥ उदंड शब्द ज्ञानी बोलती । की आत्मा आपणचि निश्चितीं । साधनाच्या विपत्ती । कां सोसाव्या ॥८०॥ न लगे भजन । न लगे पूजन । न लगे नेम न लगे दान । न लगे कांहीं वैराग्यादि ॥८१॥ न लगे व्रत न लगे तीर्थ । न लगे पाहणे ग्रंथ । न लगे कांहीं खटपटींचा पंथ । साक्षात् आपण ब्रह्मरूप ॥८२॥ परि तें न ये मना । जेविल्याविणें पोट भरेना । पोटावरी पदार्थ नाना । बांधिले तरी व्यर्थचि ॥८३॥ तैसें वैराग्यविण शब्दज्ञान । बोलताती वाउगाचि शीण । दिवसेंदिवस वाढे अभिमान । मी ज्ञानी म्हणोनी ॥८४॥ वृत्तीची चळवळ जाईना । विषयांची लालुची सुटेना । क्षणभर शांती न ये मना । आणि म्हणतो मी ब्राह्मण ॥८५॥ असो त्यांचे ज्ञान त्यांसी । ती स्थिती नको मजसी । झणीं मज त्यांत घालिसी । अनर्थ थोर होईल ॥८६॥ आतां कृपा करी भलतिये परी । मज दीनातें उद्धरीं । आम्हीं अभाविकें भवसमुद्रीं । बुडतसों स्वामिया ॥८७ ॥ मी आपुला निवेदिला भाव । तूंही सर्वसाक्षी जाणसी सर्व । जेणे होय तरणोपाय । त्या त्या मार्गे नेई जे ॥८८॥ प्रपंची ठेवी भलत्या रीतीं । परी तुझी आवड असो द्यावी चित्तीं । संसारी नाना विपत्ती । झाल्या तरी होवोत कां ॥८९॥ परी ज्या आम्हां सोडविती । त्याच होवोत कां विपत्ती । नाहीं तरी खंडेल तव भक्ती । ऐसें नको करूं दयाळा ॥९०॥ कर्मे पाठीं घेतलीं। म्हणोनि शक्ती न चले आपुली । नाना संकटीं घाली । आपुल्या इच्छे विपरीत ॥९१॥ तेथ मुख्य देह अधिष्ठान । तो केला रोगाधीन । बुद्धीही नसे सत्त्वसंपन्न । आतां म्यां काय करावे ? ॥९२॥ जो जो करूं जावा उपाय । तो तो होतसे अपाय । कैसा होय तरणोपाय । तो आम्हां कळेना ॥९३॥ वरी वरी म्हणे शरणागत । अंतरी विषयी आसक्त । दंभें जाहलों महंत । भक्तिरहस्य नेणोनी ॥९४॥ लोकांत मान्यता जाहली जरी । लज्जा वाटे अंतरीं । अभक्तपणे असोनि दूरी । भक्त ऐसें म्हणवितों ॥९५॥ असो, आतां कांहीं । मज ठेवी आपुले पायीं । करोनी माझी सोई । अनुभवारूढ करावा ॥९६ ॥ तूं कृपावंत किती । मातेचें प्रेम तें किती । खूण बाणली प्रचिती । आली अंतरीं ॥९७॥ इष्टमित्र, बंधू, गोत । तूंच सखा भगवंत । अपराध घालोनी पोटांत । आपुला दास म्हणवावें ॥९८॥ माझा उपाय किंचित । स्वसामर्थ्ये न चले जेथ । कांहीं करोनि निमित्त । मज तारावें समर्था ॥९९॥ मी लौकिकीं शरणागत । साधुत्व मिरवितों लोकांत । हेंचि करोनी निमित्त । मज तारावें समर्था ॥१००॥ परिसासी लोह शिवो भलत्या भावें । परी तेणें सुवर्णचि करावें । तैसें मज सांभाळावें । उणे पुरे समर्था ॥१०१॥ मीठ समुद्र मिळणी । तत्काळ होय पाणी । तैसी माझी कर्मकेरसुणी । जाळोनि टाकावी समर्था ॥१०२॥ जैसा गांव ओहोळ । मिळतां तात्काळ गंगाजळ । तैसें माझे कर्मफळ । धुवोनिया टाकावें ॥१०३॥ मी तुझ्या दासाचा दास । बळेचि तुझी धरिली कास । पाहतसें कृपेचि आस । कधीं करशील म्हणोनी ॥१०४॥  मी पातकी ब्रीदाचा । तरी जवळी येण्या अधिकार कैचा । दूर उभा राहोनि वाचा । तुझें नाम जपतसें ॥१०५॥ आतां तो जैसा क्रौंचपक्षी । दुरोनीच पिलियातें रक्षी । तैसा मज संरक्षी । आपुल्या ब्रीदाकारणें ॥१०६॥ कां कासवी आपुलिये । दृष्टीं पिलियांचे पोषण विये । तैसी मजवरी करुणा माये । केलीच करावी ॥१०७॥ कृपा तों केली किंचित । म्हणोनि नाम वाचेसी येत । परी त्या नामाचे सामर्थ्य हृदयांत । न ठसे अद्यापि ॥१०८॥ म्हणोनी जी कृपा केली । तिची सार्थकता नाही झाली । म्हणोनी असोसी राहिली । आणि तळमळ मानसीं ॥१०९॥ असो, आतां विचार । मजकडे केलाचि करावा कृपाकर । आणि हा भव दुर्धर । यांतुनी पार करावें ॥११०॥ नामीं धरावा विश्वास । पायीं राखावें चित्तास । आवरावें चंचळ मनांस । आपुलिया सामर्थ्ये ॥१११॥ विषयांपासून सोडवावें । देहबंधनांतून मुक्त करावें । बोधामृत पाजावें । जेणें हें अज्ञान नासे ॥११२॥ जेणें तुझी सेवा घडे । जेणे हा पूर्वसंस्कार मोडे । अहंकारावरी चिरा पडे । आणि नाशती कामादि ॥११३॥ जेणें उपजे भक्ती । सज्जनसेवेसी प्रीती । दया उपजो भूतमात्रीं । चित्त निर्विकार असावें ॥११४॥ हें घ्यावया नाहीं अधिकार । परि तूं घेववी कृपासागर । याचक मी तुझें दार । धरुनी उभा राहिलों ॥११५॥ तूं दयेचा सागर । तूं ममतेचे आगर । उदारत्वाचा डोंगर । कृपें दीन लक्षावा ॥११६॥ तूं वात्सल्याचें सरोवर । तूं भाग्याचे शिखर । अभागी मी पामर । कृपाकटाक्षे लक्षावा ॥११७॥ तूं विश्वाचा पालक । तूं धर्माचा रक्षक । म्हणूनि मी एक अभागी रंक । शरण आलों जी समर्था ॥११८॥ तूं भक्तांचा सुखकारी । शरणागतांचा साह्यकारी । मी अभाविक दास परी । रक्षण माझें करावें ॥११९॥ तूं देवाचा देव । तूं वैभवाचें वैभव । तूं मायेचा गौरव । तूंचि सत्ता तूंचि लक्षी ॥१२०॥ पोट भरेल ऐशिया आशा । रानपाला खाल्ला जगदीशा । तयात अमरवल्ली मर्त्यपाशा । होती छेदणारी जी ॥१२१॥ तियेचे झाले सेवन । सुटला मृत्युभयापासून । हे सहज न कळतां जाहले जाण । कोणा एकासी ॥१२२॥ तैसा जी मी देवाधिदेवा । लटिकाचि शरण वासुदेवा । तुज आलों परी तुवां । आपुलें ब्रीद साच केलें ॥१२३॥ कांचमणी घेऊन परिस देणें । की पय देऊनी उदक मागणें । हे साजे तुज एकाकरणें । यदर्थी संदेह असेना ॥१२४॥ मुळी मी भक्त तुझा सकाम । परि करी मज निष्काम । आणि शरणागतीचें वर्म । मज अंतरी प्रबोधावें ॥१२५॥ नको पाहूं पुण्य । नको पाहूं अवगुण । नको पाहूं गुण । आहे की नाहीं ॥१२६॥ नको पाहूं ज्ञान । नको पाहूं ध्यान । नको पाहूं मन । वश आहे कीं नाहीं ॥१२७॥ नको पाहूं पाप । नको पाहूं जप । नको पाहूं तप । आहे की नाही ॥१२८॥ नको पाहूं भक्ती । नको पाहूं विरक्ती । नको पाहू शरणागती । आहे की नाहीं ॥१२९॥ नको पाहूं आचार । नको पाहूं निर्धार । नको पाहूं विचार । आहे की नाही ॥१३०॥ नको पाहूं धर्म । नको पाहूं कर्म । नको पाहूं नेम । आहे की नाहीं ॥१३१॥ नको पाहूं भावा । नको पाहूं सेवा । नको पाहूं देवाधिदेवा । संचित माझें ॥१३२॥ माझी स्थिती मीं स्पष्ट वर्णिली । परि सत्ताधीशा, जैसी आपुली । इच्छा असेल तदनुरूप साउली । करी दीनावरी ॥१३३॥ न मागें धन, न मागें विद्या । न मागें मान, न मागें सन्मान । न मागें कल्याण । या प्रपंचाचें ॥१३४॥ न मागें पशु, न मागे पुत्र । न मागें पृथ्वी, न मागे कलत्र । न मागें वस्त्र किंवा पात्र । जी तुझें विस्मरण करणारीं ॥१३५॥ शरीरी बहुत द्यावी शक्ती । आणि तुझी सेवा घडो अहोरात्रीं । यावेगळी नसे प्रीती । अंतरापासुनी महाराजा ॥१३६॥ मोक्षाची इच्छा नाहीं अंतरीं । आणि जन्म येवो भलत्या परी । दोन वर द्यावे श्रीहरी । कृपा करुनी दीनासी ॥१३७॥ पुनःपुन्हा हेंचि मागणें । सत्संगती आणि आपुली सेवा देणें । अन्य काही नसे सांगणे । तुझे पाय शिवतसें ॥१३८॥ जयाचे अंगी बळकट सामर्थ्य । तिहीं बळेंचि संपादिला परमार्थ । मी तो केवळ असमर्थ । हीन दीन अभागी ॥१३९॥ म्हणोनि करितसें विनवणी । सहस्र लोटांगणे चरणीं । घालोनी प्रार्थी दीनवाणी । कृपादृष्टी इच्छितसें ॥१४०॥ जय जयाजी श्रीस्वामी समर्था । मज संपादुनी देई मागिल्या अर्था । मग न मागे काही समर्था । तुझी आण मागतसे ॥१४१॥ लोटांगण साधुसंतासीं । दंडवत महानुभावांसी । नमन तयां भाविकांसी । प्रीतिनंद करीतसे ॥१४२॥ ॥ इति श्रीकरुणास्तोत्रस्य प्रथमोऽध्यायः संपूर्णम् ॥ ॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥  

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


Mar 15, 2024

अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे...


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

भक्तास्तव प्रगट होऊनि शुष्ककाष्ठी केली तयावरि कृपामृतपूर्ण दृष्टी तेणे परीच चुकवी मम जन्म फेरे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥१विश्वासलों दृढ मनें तुझिया पदासी की वारिसील म्हणुनि मम आपदांसी ते दाविशील नयना कधि सांग बा रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥२देवा तुझे हृदय कोमल फार आहे ऐशापरी निगमशास्त्रहि आण वाहे ते काय वाक्य लटिकें करतोसि बा रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥३मी दीन हीन कुमती तुज वर्म ठावें ऐशापरि त्यजुनि कोप उदार व्हावे गाती तुझे पतितपावन नाम सारे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥४माझे अपारतम पातकसंघ जाळी क्रोधाग्निनें हरि तझ्या सहमूळ जाळी तैसा करी दृढ जसा भवबंध बा रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥५श्रीपद्महस्त मम मस्तकी ठेवी बापा दृष्टीस दाखवि बरें निजचित्स्वरुपा हे दान दे वचन अन्य न मी वदें रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥६आयुष्य घालूनि अधिक मृत द्विजाला त्वां वांचवोनि जनिं वाढविली स्वलीला होसी समर्थ मज चाळविसी वृथा रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥७वेंचावयासि करुणाघन लोभ वाटे टाकून दे बिरुद लावि मला अवाटे नाही तरी झडकरी मज भेट दे रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥८पाप्यासि तारुनि बळे जन सोकवीले तुझेचि कृत्य तुज मुख्य फळासि आले हे सोडीसी तरि सुटेल तुला कसे रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥९हे श्रीधरे रचुनिया नवरत्नमाला प्रेमेचि अर्पिली बरी पुरुषोत्तमाला हे वर्णिता नरहरी संकट सर्व वारी श्रीपादसद्‌गुरु यतीश्वर चिद्विहारी ॥१० 


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥