Showing posts with label श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत. Show all posts
Showing posts with label श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत. Show all posts

Aug 27, 2025

श्रीसमर्थ रामदासस्वामीकृत श्रीगणेश स्तवन - श्रीपाद श्रीवल्लभ अवतार कथन


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये

सर्व दत्तभक्तांना श्री गणेश चतुर्थी आणि 'श्रीदत्तप्रभूंचे संपूर्ण योगावतार' या नांवाने जगतविख्यात असलेले, श्री भगवान दत्तात्रेयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा !!



मयूरेशा, लंबोदरा खळखळू दे मांगल्य झरा
हरी अवकृपा तिमिरा  बा, गजानना, हेरंबा वक्रतुंडा जगन्नायका


श्रीसमर्थ रामदासस्वामीकृत श्रीगणेश स्तवन :

ॐ नमोजी गणनायका । सर्व सिद्धि फळदायका । अज्ञानभ्रांति छेदका । बोधरूपा ॥१॥ वंदूनिया मंगळनिधी । कार्य करितां सर्व सिद्धि आघात अडथळे उपाधी । बाधूं शकेना ॥२॥ ऐसा सर्वांगे सुंदरू । सकळ विद्यांचा आगरू । त्यासी माझा नमस्कारू । साष्टांग भावें ॥३॥ ध्यान गणेशाचे वर्णितां । मति प्रकाश होये भ्रांता । गुणानुवाद श्रवण करितां । वोळे सरस्वती ॥४॥ जयासी ब्रह्मादिक वंदिती । तेथे मानव बापूडे किती । असो प्राणी मंदमती । तेहीं गणेश चिंतावा ॥५॥


श्रीपाद श्रीवल्लभ अवतार कथन

श्रीपाद श्रीवल्लभ यांचा चरित्रग्रंथ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ! या अक्षरसत्य ग्रंथामध्ये श्रीपाद स्वामींच्या जन्माचे विस्तृतपणें वर्णन केले आहे.

आंध्र प्रदेशात मल्याद्रीपूर नामक एक गाव होते. तेच मल्याद्रीपुर सध्या मल्लादि या नावाने ओळखले जाते. त्या ग्रामांत मल्लादि नावाची दोन वेदशास्त्रपारंगत घराणी होती. मल्लादि बापन्नावधानि या नांवाचे विद्यावंत हरितस गोत्रीय तर मल्लादि श्रीधरअवधानी या नांवाचे विद्वान कौशिक गोत्रीय होते. श्रीधरअवधानी यांची बहिण राजमांबा हिचा विवाह बापन्नावधानी यांच्या बरोबर झाला होता. गोदावरी तटांवर असलेल्या आइनविल्लि या गांवात गणपती महायाग संपन्न होणार होता. त्या यज्ञासाठी हे दोन्ही प्राज्ञ पंडित तिथे गेले होते. यज्ञ सर्वथा शास्त्रोक्त विधींनुसार पार पडल्यास, शेवटची आहुती यज्ञवेदींत अर्पण करतेवेळीं प्रत्यक्ष महागणपती स्वर्णकांतीयुक्त स्वरूपांत दर्शन देईल आणि आहुती स्वीकारेल, अशी ग्वाही वेदोक्त मंत्र पठण करणाऱ्या ब्राह्मणांनी दिली होती. त्या विधीवत संपन्न झालेल्या यज्ञाची सांगता सुफळ झाली देखील - वेदमंत्र उच्चारून यज्ञपूर्ततेची आहुती देताच त्या यज्ञकुंडातून सुवर्णकांतीयुक्त, दैदीप्यमान श्रीगणेश प्रगट झाले आणि आपल्या सोंडेत त्यांनी ती आहुती स्वीकारली. श्री गणेश महायाग यथासांग पार पडल्याचे ते फलित पाहून सर्वच तुष्ट झाले. तिथे उपस्थित असलेल्या सर्व भाविकांनी हर्षित होऊन गजाननास नमस्कार केला. प्रसन्न होऊन श्री महागणपती वरदान देत म्हणाले, " मी स्वतः गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण कलेने श्रीपाद श्रीवल्लभ रुपाने अवतार घेईन." गणेशाचे आशीर्वचन ऐकून सर्वांनी त्यांचा जयजयकार केला, मात्र त्या सभेतील तीन नास्तिकांचा त्यावर विश्वास बसला नाही. ते शंकित स्वरांत म्हणाले, " हे दृश्य नक्कीच इंद्रजाल अथवा महेंद्रजाल असावे. हे प्रत्यक्ष महागणपती असतील तर त्यांनी परत एकदा दर्शन द्यावे. " त्या नास्तिकांचे हे वक्तव्य ऐकताच होमकुंडातील विभूती महागणपतीच्या स्वरुपात दृश्यमान झाली आणि आपल्या दिव्य वाणींत बोलू लागली, " मीच परब्रह्म आहे. मीच या सकल ब्रह्माण्डाचा स्वामी असून ईश-पार्वतीनंदन म्हणून या जगतांत प्रसिद्ध आहे. त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी श्रीशंकरांनी, शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास अटकाव करतेवेळी श्री विष्णूंनी, महिषासुराशी युद्ध करण्यापूर्वी श्री आदिमाया जगदंबेनी तसेच सकल देवता, योगी, तपस्वी आणि ऋषी- मुनी यांनीही माझेच स्मरण आणि आराधना करून अभीष्ट प्राप्त केले. ब्रह्मा आणि रुद्र श्री विष्णुरूपात विलीन झाले, तेच त्रैमूर्ति दत्तात्रेय आहेत. शास्त्रांच्या वचनांनुसार मीच दत्तरूप आहे. तेच महागणपतीरूपी श्री दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपांत गणेशचतुर्थीच्या दिवशी अवतार घेतील. माझ्या आजच्या दर्शनाप्रमाणेच दिव्य ज्योतीच्या स्वरूपांत ते प्रगट होतील." 

मल्लादि बापन्नावधानि यांच्या राजयोगावर जन्मलेल्या कन्येच्या जन्मपत्रिकेत सर्वच ग्रह शुभस्थानीं होते. त्यांनी तिचे सुमती महाराणी असे नामकरण केले. तिचा विवाह अप्पललक्ष्मी नरसिंहराज शर्मा नामक भारद्वाज गोत्रीय विप्राशी झाला होता. आपळराज आणि सुमती यांच्या पूर्वजन्मीच्या दत्तभक्तीचे, पुण्यकर्मांचे फलित म्हणूनच त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांचे माता-पिता होण्याचे सद्भाग्य लाभले होते. त्या सत्शील दाम्पत्याचा पूर्वजन्म वृत्तांत थोडक्यात असा - पूर्वयुगीं सह्य पर्वताजवळील माहूर गांवी विष्णुदत्त नामक कर्मनिष्ठ ब्राह्मण रहात होता. तो श्री दत्तप्रभूंचा भक्त होता. त्याची पत्नी सोमदेवम्मा ( श्री दत्तमाहात्म्यात हिचे नाव सुशीला असे आले आहे.) थोर पतिव्रता होती. साक्षात श्री दत्तात्रेय त्या ब्राह्मणाच्या गृही दर्श श्राद्धदिनीं भोजन करण्यासाठी आले होते. त्या पंक्तीला श्री सूर्यनारायण आणि अग्निदेवही यांनीही भोजन स्वीकारले होते. त्यावेळीं, या तीनही देवतांचे उत्तमोत्तम आशीर्वाद त्या धर्मपरायण ब्राह्मण पती-पत्नीस मिळाले होते आणि त्यांच्या पितरांनाही सद्‌गती प्राप्त झाली होती. पुढें, याच पती-पत्नींनी पीठापुरी आपळराज आणि सुमती म्हणून पुन्हा जन्म घेतला होता. सुमतीचे अहोभाग्य असे की या जन्मींदेखील सुमतीला पुनःश्च श्री दत्तप्रभूंचे दर्शन घडले होते आणि भक्तकामकल्पद्रुम श्री दत्तात्रेय, आपळराज-सुमती यांचा पुत्र म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेते झाले. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थी रोजी सूर्योदयाच्या वेळी झाला. या अवताराचे वेगळेपण अथवा असाधारणत्व असे की श्रीपादांचा जन्म मातेच्या उदरातून सामान्य मुलासारखा न होता, दिव्य ज्योतीरूपाने झाला. त्यावेळी प्रसूतिगृहात मंगल वाद्ये वाजू लागली. पवित्र अशा वेदमंत्रांचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला. त्यांच्या जन्मानंतर सतत नऊ दिवस, तीन फणा असलेला नाग त्यांच्या मस्तकी छत्र धरीत असे. भक्तजनरक्षणार्थ श्रीगुरुनाथ या भूतलावर अवतरला होता.


॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


अवश्य वाचा :

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - श्रीपादावतारकथन


Mar 23, 2022

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय १२


कलियुगाचा कालखंड, जीवमात्रांचे आयुर्मान, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण फलप्राप्ती, अन्नदानाचे महत्त्व, कुलशेखराचे गर्वहरण, आणि भीमास कृपाप्रसाद 

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

श्री सुब्बया श्रेष्ठी मोठे विद्वतप्रचुर आणि व्यासंगी होते. आपल्या ओघवत्या वाणींत ते कितीतरी नवनवीन विषयांची सुलभतेनें ओळख करून देत असत. तें इह-पर कल्याणदायक असे ज्ञानामृत श्रवण केल्यामुळें श्रोत्यांची, साधकांची आत्मोद्धाराच्या प्रगतीपथावर सहजच वाटचाल होत असे. त्यांनी कथन केलेल्या श्रीपाद प्रभूंच्या सर्वच बाललीला ऐकून शंकरभट्ट विस्मित तर होत असतच, मात्र श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार लीलांचे वर्णन करण्याचा आपण केलेला जो संकल्प आहे, त्यास त्या परब्रह्माचा कृपाशीर्वाद आहे, अशीच त्यांची दिवसोंदिवस दृढ श्रद्धा बळावत होती. श्रीपाद अवताराची महती सांगताना श्री सुब्बया श्रेष्ठी म्हणाले. - श्रीपाद श्रीवल्लभ हेच श्री वेंकटेश्वर आहेत. कलियुगांत श्रीपाद प्रभूच कल्की होऊन अवतरित होणार आहेत. सांध्र-सिंधु वेदांतानुसार या कलियुगाची पाच हजार वर्षे सरल्यावर सामान्य प्रलय होईल आणि त्यानंतर सत्ययुगाचा आरंभ होईल. मात्र, वेदश्रुतींच्या कालगणनेनुसार या कलियुगाचा कालखंड चार लाख बत्तीस हजार वर्षे आहे. यांत अंतर्दशा, सूक्ष्मदशा, विदशा यांचा अंतर्भाव होतो. अर्थातच वेदांत जाणणाऱ्याला हे सर्व ज्ञात असते.  या कलियुगांत ब्रह्मदेवाने प्रत्येक जीवमात्रांस एकशेवीस वर्षांचे आयुष्यमान दिले आहे. मात्र, याचा अर्थ प्रत्येक प्राणिमात्र आपापले भौतिक शरीर एकशेवीस धारण करू शकतील असा नव्हे, तर याचा गूढार्थ असा की, सामान्य स्थितींत एकशेवीस वर्षांत घेता येतील इतके श्वास आणि प्रश्वास प्रत्येकांस दिले आहेत. क्रोधिष्ठ, वेगवान जीवन जगू पाहणारे, चिंताग्रस्त अथवा दुष्प्रवृत्तीचे लोक आपले श्वास वेगाने घेऊन कमी  वेळात  संपवून  टाकतात. उदाहरण म्हणून बघायचे झाल्यास, हळूहळू श्वास-प्रश्वास घेणारे महाकाय कासव ३०० वर्षे जगते. तर, चंचल असे मर्कट तेच श्वास-प्रश्वास लवकर घेऊन अल्पकाळच  जिवंत  राहते. तसेच, योगी-मुनीजन अनेक योगासने, वायुंचे  कुंभक आदि क्रियांनी श्वास शरीराच्या अंतर्भागात फिरवत राहतात. परिणामी, त्यांचे अनेक श्वास वाचतात आणि ते दीर्घायुषी होतात. यांविषयी योगशास्त्राचे सखोल ज्ञान असलेले विस्तृतपणें समजावून सांगू शकतील.   मानवी शरीरावर जिवाणूंचादेखील परिणाम होत असतो. त्यामुळे सर्व शरीर, त्यातील अवयव, प्राणशक्ति आणि मनःशक्ती यांत बदल होत राहतात. मनःशक्तीचे अतुलनीय सामर्थ्य दैवीशक्ति, दैवीकृपा यांची अनुभूती देऊ शकते आणि त्याद्वारे साधकाचे मन, प्राण आणि शरीर शुद्ध होऊ लागते. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हे साक्षात त्या परब्रह्माचेच स्वरूप आहे. या दिव्य ग्रंथातील प्रत्येक अक्षरात सिद्धशक्ती आणि योगशक्ती समाविष्ट आहेत. असे प्रासादिक ग्रंथ सश्रद्धेने वाचल्यास प्रत्यक्ष श्रीपाद प्रभूंच्या कृपेची अनुभूती येते. या ग्रंथाचे पारायण करणाऱ्या भक्तांच्या ऐहिक मनोकामना तर सत्वर पूर्ण होतातच, तसेच परमार्थिक, परलौकिक कल्याणदेखील होते. या परमसिद्ध ग्रंथाचे शास्त्रोक्त पद्धतीने पारायण करावे आणि तदनंतर कमीत कमी अकरा सत्पुरुषांना भोजन द्यावे अथवा कुठल्याही दत्तक्षेत्रीं जाऊन भोजनखर्चाएवढी रक्कम दान करावी. सत्पुरुषांना अन्नदान केल्याने आयुष्यवृद्धी होते. तसेच, सत्पुरुषांच्या आशीर्वादाने शांती, पुष्टी, तुष्टी, समाधान, ऐश्वर्य, भाग्य आदिरूपांत कैकपटीने फळदेखील मिळते. पांडव वनवासात असतांना द्रौपदीने श्रद्धेने अर्पण केलेल्या अन्नाच्या केवळ एका कणाने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि त्या भक्ताभिमानी परमात्म्यानें दुर्वास महर्षी आणि त्यांच्या दहा हजार शिष्यांना उत्तम, सुग्रास भोजन दिले. तसेच, साधकांनी श्रीकृष्ण आणि सुदामा यांचीही कथा सदैव स्मरणांत ठेवावी. सुदामाच्या पत्नीने भक्तिभावाने दिलेले पोहे श्रीकृष्णांनी स्वीकारले आणि त्याबदल्यात अपार ऐश्वर्य, राजवैभवाचे वरदान दिले. कर्मसूत्राची तीव्रता कशी असते आणि त्या परब्रह्माची कृपा झाल्यास त्याचे काय फल प्राप्त होते, हेच या कथेतून विशद होते. श्रीपाद प्रभू आता चार वर्षांचे झाले होते. पीठीकापुरवासी त्यांच्या नित्य नूतन लीला अनुभवीत असत. एके दिवशी, मल्याळ देशातील कुलशेखर नामक एक मल्ल पीठीकापुरांत आला. तो वर्मकलेत निष्णात होता. ही एक प्रकारची मर्मकला होय. आपल्या शरीराच्या अनेक भागांवर नियंत्रण करू शकणारी अशी काही महत्वाची ऊर्जाकेंद्रे असतात, त्यांना मर्मबिंदू असे म्हणतात. या विशिष्ट मर्मबिंदूंवर योग्य पद्धतीने दाब अथवा जोर देऊन शरीराचा कोणताही एखादा अवयव दुर्बल करता येतो किंवा त्यांत वैकल्यही निर्माण करता येते. ही वर्मकला युद्धांत बलशाली शत्रूला नामोहरम करण्यासाठीही वापरत असत. मात्र काही विशेष मर्मस्थाने ज्यांचा रोगचिकित्सा पद्धतीत लोकांच्या वेदना दूर करण्यासाठी किंवा रोगपरिहारार्थ उपयोग करण्यात येतो. शरीरावरील या १२ विशिष्ट मर्मस्थानी प्रचंड प्राणशक्ती अथवा चैतन्य असते, त्यांना ' अडंगल ' असे संबोधतात. वैद्यशास्त्रांत यांचा शोध प्रथमतः प्राचीन, विख्यात वैद्य सुश्रुत यांनी लावला. वैद्यशास्त्राचा सखोल अभ्यास केलेले निपुण वैद्य या वर्मकलेचा उपयोग लोककल्याणासाठी करतात.  हा कुलशेखर मल्ल सप्तगिरी बालाजीचा म्हणजेच वेंकटेश्वराचा भक्त होता. अनेक राज्यांतील प्रबळ मल्लयोद्ध्यांना पराजित करून त्याने विजयपताका प्राप्त केल्या होत्या. आता पीठीकापुरातील मल्लयोद्ध्यांना जिंकण्याचा त्याचा मानस होता. पीठीकापुरातील मल्लदेखिल कुलशेखराचे मल्लकौशल्य जाणून होते. त्या सर्व मल्लांनी एकत्र येऊन असा विचार केला की - या मल्लयुद्धांत कुलशेखरच्या हातून आपला पराभव अथवा मृत्यू निश्चित आहे. त्यांमुळे आपल्या या नगरीची प्रतिष्ठा नक्कीच धुळीस मिळेल. यांवर आता प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंचे अवतार असलेल्या श्रीपादांना शरण जाणे हा एकमेव उपाय दिसत आहे. त्या मल्लांची श्रीपाद प्रभूंवर दृढ श्रद्धा होती. त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंकडे जाण्याचे ठरविले. त्यावेळी श्रीपाद स्वामी वर्मांच्या घरी होते. श्रीयुत वर्मा यांनी बाळ श्रीपादांसाठी खास एक सुंदर चांदीचे जरीकाम केलेली पगडी बनविली होती. ती पगडी मोठ्या कौतुकानें श्रीपादांना घालून ते नेहेमीच आपल्या शेतजमिनी दाखविण्यासाठी त्यांना नेत असत. प्रभूंचा चरणस्पर्श आपल्या भूखंडांना व्हावा, असा त्यांचा श्रद्धाभाव होता. त्या दिवशी मात्र, " आजोबा, आज आपण थोड्या वेळाने आपल्या शेतांत जाऊ या. " असे बाळ श्रीपाद त्यांना म्हणाले.  थोड्याच वेळांत तिथे पीठीकापुरातील सर्व मल्ल आले आणि त्यांनी श्रीपादांकडे कृपायाचना केली. शरणागतवत्सल प्रभूंनी त्यांना अभय दिले. तदनंतर, स्वामींनी भीम नावांच्या एका युवकांस बोलावले. या भीमाचे शरीर आठ ठिकाणी वाकले होते. तो अतिशय अशक्त असून काही काम करू शकत नसे. तरीही त्या कुबड्या युवकास वर्मांनी आश्रय दिला होता. तें त्यास त्याच्या शक्तीनुसार थोडेफार काम करायला सांगत असत आणि त्याच्या उदरनिर्वाहापुरते वेतन देत असत. भीमाची श्रीपादचरणीं दृढ भक्ती होती व आपले व्यंग दूर व्हावें अशी तो प्रभूंना नेहेमी प्रार्थना करीत असे. अंतर्ज्ञानी श्रीपाद स्वामीही त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहत असत. " माझ्या भक्ता, थोडा धीर धर. तुझी प्रार्थना सत्वरच फळांस येणार आहे. " असेच जणू काही ते आपल्या दयार्द्र आणि करुणामय नजरेने भीमास सूचित करत असत. पुढें, बाळ श्रीपाद त्या सर्व मल्लांना म्हणाले, " तुम्ही सर्वजण निश्चिन्त राहा. हा आपला भीम कुलशेखरबरोबर द्वंद्वयुद्ध करेल." श्री दत्तप्रभूंच्या लीला अनाकलनीय आणि अगम्य असतात हेच खरें ! भीमाची श्रीपाद स्वामींवर अढळ श्रद्धा होती. त्यानें क्षणाचाही विलंब न करता प्रभूंचे आज्ञापालन करण्यास होकार दिला. कुक्कुटेश्वर मंदीराच्या जवळच हे मल्लयुद्ध आयोजित करण्यात आले. ही अपूर्व घटना पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी जमली. ठरल्याप्रमाणें भीम आणि कुलशेखर यांच्यातील मल्लयुद्धास प्रारंभ झाला. कुलशेखर मोठ्या त्वेषानें भीमास मारू लागला. पण काय आश्चर्य ! कुलशेखर ज्या ठिकाणी भीमावर प्रहार करत होता, त्याच ठिकाणी त्याला स्वतःला मार लागून वेदना होत असत.  याऊलट, कुलशेखर करत असलेल्या प्रत्येक वाराबरोबर भीमाचे कुबड नष्ट होऊन त्याचे शरीर अधिकाधिक बलवान होत होते. अखेर, कुलशेखर संपूर्णतः निर्बळ झाला आणि तो श्रीपाद प्रभूंना शरण आला. श्रीपाद स्वामींना अनन्यभावाने त्याने वंदन केले. तेव्हा, श्रीपाद धीर-गंभीर स्वरांत म्हणाले, " कुलशेखरा, मनुष्य शरीरावर असलेल्या १०८ मर्मस्थानांचे तुला सर्वथैव ज्ञान आहे. तर या भीमाची माझ्यावर नितांत श्रद्धा आहे अन मी त्याचे सदैव रक्षण करेन, हा दृढ विश्वास आहे. तू विद्यापारंगत असला तरीही जयपत्रे घेऊन गर्विष्ठ झाला आहेस. यासाठी दंड म्हणून आजपासून या भीमाची संपूर्ण दुर्बलता मी तुला देत आहे. तुला अन्न-वस्त्र आदिंची कमतरता जाणवणार नाही, मात्र यापुढें तू सामर्थ्यहीन होशील. तुझी प्राणशक्ती घेऊन हा भीम अत्यंत बलशाली होईल. अरे, तिरुपतीस्थित वेंकटेश्वर मीच आहे. माझा भक्त असूनही तू या वर्मकलेचा दुरूपयोग केलास. परिणामी, तुझी ही विद्या आजपासून निष्फळ होईल. मात्र, तुझ्या उपासनेचे फलित मी तुला देत आहे." इतके बोलून श्रीपाद प्रभूंनी कुलशेखरला त्याची आराध्यदेवता अर्थात पद्मावतीसह व्यंकटेश्वराच्या रूपात क्षणिक दर्शन दिले.  ही अद्भुत लीला कथन करून श्री सुब्बया श्रेष्ठी शंकरभट्टांस म्हणाले, " वत्सा, श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रकथा कल्पनातीत आहेत. त्या भक्तवत्सल दत्तप्रभूंचा कृपाशीर्वाद प्राप्त करणे, हेच आपल्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे. श्रीपाद स्वामी करुणासागर आहेत, ते निश्चितच आपलें इह-पर कल्याण करतील."

अध्याय फलश्रुती - शरीरारोग्य प्राप्ती

द्वितीय दिवस विश्राम


Mar 19, 2021

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय ११


श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्म रहस्य, बापानार्यांचे दिव्य अनुभव, श्री नरसिंह वर्मांस इष्ट देवतेचे दर्शन, बिल्वमंगल आणि चिंतामणी यांचा उद्धार  

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच स्नानादि उरकून शंकरभट्ट कुटीत परतले. सुबय्या श्रेष्ठींची उर्वरित कथा ऐकण्यास ते उत्सुक होते. त्यावेळीं सुबय्या आपली नित्य पूजा आटपून ध्यानाला बसले होते. शंकरभट्टही मग तिथेच आसनस्थ होऊन मनोमन नामस्मरण करू लागले. काही घटकांनंतर सुब्बय्यानें आपले ध्यान संपवले आणि शंकरभट्टांकडे पाहून म्हणाले, " महोदय, तुम्हांला श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म म्हणजे एक अद्भुत चमत्कार होता, हे माहित आहे का ? अनसूया मातेसमान असलेली सुमती महाराणी शनिप्रदोष व्रत अतीव श्रद्धेनें करीत असे. त्याच पुण्यप्रभावानें श्री दत्तप्रभू तिच्या उदरी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपानें अवतरले. योगसाधनेत असतांना अप्पळराज शर्मा आणि सुमती महाराणी यांच्या नेत्रांमधून एकेक योग ज्योती प्रकट झाली आणि त्या दोन दिव्य ज्योतींचा संयोग होऊन ते तेज सुमती मातेच्या गर्भात प्रवेशले. ही एक अनाकलनीय, दैवी योगप्रक्रिया होती. त्यानंतर नऊ महिन्यांनी केवळ ज्योतीरूपानें श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला. केवळ दोन वर्षाचे बालक असतांनाच त्यांच्या असंख्य लीला पीठिकापुरवासियांनी अनुभवल्या. अर्थात सर्व देव-देवतास्वरूप असलेल्या दत्तप्रभूंना अशक्य ते काय ? प्रभूंच्या लीलांचे स्मरण केले तरी सर्व पातकांच्या राशी सहजच नाश पावतात. श्रीपादांच्या जन्मानंतर अप्पळराज आणि सुमती या दाम्पत्यास तीन कन्याही झाल्या. श्रीपादांच्या पाठची बहीण विद्याधरीचा विवाह मल्लादी घराण्यांतील चंद्रशेखर या सत्शील ब्राह्मणाशी झाला. तर दुसरी भगिनी राधेचा विवाह विजयवाटिका या क्षेत्रांतील विश्वनाथ कृष्णावधानुलु या विद्यासंपन्न विप्राशी आणि सर्वात धाकटी बहीण सुरेखाचा विवाह मंगलगिरी येथील ताडपल्ली दत्तात्रेय अवधानुलु नावाच्या वेदपारंगत द्विजाशी झाला."

" गोदावरी मंडलातील ताटंकपूर गावांतील वाजपेय याजी पौंडरिक महायाग विधीवत करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पीठिकापुरम येथील मल्लादि आणि वाजपेय याजींचा निकट संबंध होता. हे वाजपेय याजी ' इदं ब्राह्मं इदं क्षात्रं ' या सिद्धांताचे पुरस्कर्ते होते, म्हणजेच ते ब्राह्मतेजाने युक्त तर होतेच, तसेच त्यांनी क्षात्रतेजही अंगिकारले होते. कन्नड देशात खास ऋग्वेद पाठाच्या अध्ययनासाठी ताटंकपुरातून मायणाचार्युलु नामक वाजपेय याजी यांना पाचारण करण्यात आले होते. तिथे त्यांनी अनेक अडचणींचा सामना करून वैदिक धर्म जागृत ठेवला. मायणाचार्यांस माधवाचार्य आणि सायणाचार्य नावाचे दोन विद्वान पुत्र होते. सायणाचार्य हे वेदपारंगत असून त्यांनी वेदश्रुतींवर आधारित ग्रंथलेखन केले होते, तर माधवाचार्य यांनी महालक्ष्मीच्या कृपानुग्रहासाठी तीव्र तपाचरण केले होते. त्यांमुळे प्रसन्न होऊन देवी महालक्ष्मीने त्यांना वर मागण्यास सांगितले असता, ' मी लोखंडास स्पर्श करताच ते सुवर्णमय व्हावे. ' असा कृपाशिर्वाद माधवाचार्यांनी मागितला. तेव्हा, आदिशक्ती वदली, " वत्सा, या जन्मीं हे सर्वथा अशक्यप्राय वाटते, तू दुसरे वरदान मागावेस." त्यांवर अत्यंत लीनतेने माधवाचार्य म्हणाले, " माते, मी तुला साक्षी ठेवून संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच नाही का ? तेव्हा, माझ्यावर तुझी कृपा व्हावी, हीच प्रार्थना आहे. " त्यांच्या चातुर्यतेने प्रसन्न होऊन महालक्ष्मीने त्यांना इच्छित वर दिला. संन्यासाश्रम स्वीकारताच त्यांनी आपले नाव विद्यारण्यस्वामी असे घेतले. त्यांना श्रीपाद प्रभुंचाही अनुग्रह प्राप्त झाला होता. मात्र त्यांचे त्या जन्मीं कर्मफळ नष्ट न झाल्यानें ते पुढील शतकात, सायनाचार्यांच्या वशांत गोविंद दीक्षित म्हणून जन्म घेतील आणि तंजावर प्रांताचे कर्तव्यनिष्ठ महामंत्री होतील, असा आशीर्वाद देऊन श्रीपादप्रभूंनी त्यांचा उद्धार केला. त्यांच्याच संन्यास परंपरेतील तिसऱ्या पिढीतील श्रीकृष्ण सरस्वती हे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पुढील अवतारात त्यांचे दीक्षा गुरु होते. खरोखरच श्रीदत्तप्रभू आपल्या साधकांच्या, भक्तांच्या सर्वच शुभकामनांची पूर्ती करून सदैव त्यांचे कल्याण करतात." एव्हढे बोलून सुबय्या श्रेष्ठींनी श्रीपादांचे नाम घेत त्यांना प्रणिपात केला.

त्यानंतर थोडे जल प्राशन करून त्यांनी पुढील कथा सांगावयास सुरुवात केली. - श्रीपाद श्रीवल्लभांचा आपल्या आजोबा म्हणजेच बापनार्युलुंबरोबर विशेष स्नेहबंध होता. आपण दत्तावतार आहोत, हे सिद्ध करणाऱ्या अनेक लीलांची त्यांनी आपल्या आजोबांना अनुभूती दिली होती. शंकरा, दोन भुवयांच्या मध्यबिंदूवर आज्ञाचक्र असते, हे तर तुला ज्ञात आहेच. योगी, अवतारी महापुरुषांचे हे ज्ञानकेंद्र त्यांच्या अतींद्रिय दृष्टीमुळे विकसित झालेले असते. याचमुळें ते भूत-वर्तमान-भविष्य जाणू शकतात. असेच एकदा, श्रीपादांनी बापानार्यांच्या भ्रूमध्यात स्पर्श केला आणि त्यांना स्वतःच्या पुढील अवतारांसंबधी अभिज्ञान दिले. आपल्या आजोबांचे आज्ञाचक्र जागृत करून श्रीपाद म्हणले, " तुम्हांला संन्यासाश्रम स्वीकारण्याची मनीषा आहे, हे मी जाणतो. परंतु, ह्या सृष्टीचक्राच्या मी केलेल्या संकल्पांनुसार या किंवा पुढच्या जन्मींदेखील हे शक्य नाही. यास्तव, माझा पुढील अवतारात मी तुमचे हे रूप घेऊन तुमची कर्मबंधनें, वासना आदिंचा नाश करणार आहे." तेव्हा, समाधिमग्न झालेल्या बापानार्यांना, काही क्षणांसाठी हिमालयात कठोर तप करणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले. पुढच्याच क्षणीं ते प्रयाग या महाक्षेत्रांतील त्रिवेणी संगमावर स्नान करीत असल्याचे दिसले. काही वेळांत, तिथेच श्रीपाद श्रीवल्लभ दिसू लागले आणि बघता बघता ते स्वरूप कुक्कुटेश्वराच्या स्वयंभू दत्तमूर्तीत विलिन झाले. त्याच मूर्तीने अवधूत स्वरूप धारण केले आणि बापनार्यांची दुहिता सुमती महाराणीकडून भिक्षा स्वीकारली. त्याच अवधूताने श्रीपाद श्रीवल्लभांचे बालरूप घेतले आणि ते सुमती महाराणीच्या मांडीवर हसू-खेळू लागले. क्षणार्धात, ते तान्हें बालक एक षोडशवर्षीय युवक दिसू लागले. दोन नद्यांच्या संगमावर आपल्या शिष्यांसहित अनुष्ठान करीत असलेला तो संन्यासी रूपांतील तेजस्वी युवक हुबेहूब बापनार्यांसारखाच दिसत होता. बापनार्यांकडे पाहून मंद स्मित करीत तो योगी म्हणाला, " मला नृसिंह सरस्वती असे म्हणतात. मी गंधर्वपूर येथे वास करतो." इतके बोलून ते नदीतील पुष्पासनावर बसून श्रीशैल्यास गमन करते झाले. तेथील कर्दळीवनात अनेक शतके तपश्चर्या करून पुन्हा एकदा ते जनकल्याणासाठी कौपिनधारी वृद्ध तपस्वी वेषांत अवतरित झाले. आपण श्री स्वामी समर्थ असल्याचे सांगून त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात विलीन झाली आणि त्यांचे दिव्य स्वरूप श्री शैल्य येथील मल्लिकार्जुन शिवलिंगात अदृश्य झाले. त्याचवेळी, त्या शिवलिंगातुन देववाणी ऐकू आली, " बापनार्या ! तू केलेल्या अध्वर्यत्वाने श्रीशैल्यास सूर्यमंडळातील तेजाचा शक्तिपात झाला होता. त्याचेच फलस्वरूप म्हणून तुला, त्रिमूर्ती दत्तात्रेयांचे स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या तीन रूपांचे दर्शन देऊन अनुग्रहित करीत आहे." अष्टभाव जागृत झालेले बापनार्य सद्गदित होऊन नमन करीतच होते, त्याच क्षणीं ते समाधीतून बाहेर आले अन काय आश्चर्य ! तीन वर्षाचा अतिशय लोभस श्रीपाद त्यांच्याकडे पाहत खट्याळपणे हसत होता. समाधी अवस्थेत आलेल्या त्या दिव्य अनुभवाने आपले जीवन जणू सार्थक झाले आहे असे त्यांना वाटले आणि अतिशय वात्सल्यतेनें त्यांनी आपल्या नातवास कवटाळले.

बापनार्य आणि अप्पळराज शर्मा या दोघांच्याही घरी अग्निहोत्र करीत असत. साधारणपणें, शमी अथवा पिंपळाची काष्ठें अग्निकुंडात ठेवून अग्नीची पूजा करतात. मात्र, बापनार्य आणि अप्पळराज हे दोघेही समिधा अग्निकुंडात घालून केवळ वेदमंत्रोच्चारण करून अग्नी निर्माण करीत असत. त्यादिवशी मात्र, बापनार्युलुंनी अनेकदा वेदमंत्र म्हणूनही अग्नी प्रगट झाला नाही. बापनार्य अगदीच हताश झाले. तिथेच खेळत असलेल्या बाळ श्रीपादांनी आपल्या आजोबांची ती अवस्था पाहिली आणि अग्निकुंडाकडे दृष्टीक्षेप करीत म्हणाले, " अग्निदेवा, माझ्या आजोबांच्या देवकार्यांत तू अडथळा आणू नये, अशी माझी तुला आज्ञा आहे." तत्क्षणीच अग्निकुंडात अग्नी प्रज्वलित झाला. हा चमत्कार पाहून बापनार्य दिग्मूढ झाले. दुसऱ्या एका प्रसंगी, बाळ श्रीपादांनी आपल्या मातुल आजोबांना त्यांच्या पूर्वजन्मासंबंधीची एक कथा सांगितली. कृतयुगात बापानार्युलु हे लाभाद नामक महर्षी होते. त्यांचा मंगल महर्षि नावाचा एक शिष्य होता. एकदा, दर्भ कापतांना चुकून त्याच्या हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले. मात्र त्या रक्ताची गाठ होऊन त्यातून सुगंधित अशी विभूती निर्माण झाली. ते पाहून त्या शिष्याला आपणास सिद्धावस्था प्राप्त झाली आहे, असा अहंकार निर्माण झाला. तेव्हा, श्री महादेव तिथे अवतीर्ण झाले. मंगल महर्षींकडे पाहत त्यांनी स्वतःचा हस्त सहजच वर केला अन हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडू लागली. सदाशिव गंभीर स्वरांत म्हणाले, '' त्रेतायुगात भारद्वाज ऋषी पीठिकापुरम इथे सवितृकाठक यज्ञ करतील, त्या महाचयनामध्ये उत्पन्न झालेल्या विभूतीपैकी केवळ लवमात्र विभूती मी तुला दाखविली. " श्री शंकरांचे ते बोलणे ऐकून मंगल महर्षीचे गर्वहरण झाले आणि त्याने प्रभूंस साष्टांग नमन केले. पीठिकापुरम या क्षेत्राचे असे माहात्म्य आहे. श्रीपादांचे असे कितीतरी अनाकलनीय आणि दैवी चमत्कार बापनार्य, वेंकटप्पय्या श्रेष्ठी, आणि नरसिंह वर्मा यांनी अनुभवले होते.

एके दिवशी, नरसिंह वर्मा बाळ श्रीपादांना आपले शेत आणि इतर जमीन दाखविण्यासाठी आपल्या घोडागाडीतून घेऊन गेले. त्यांची मुबलक जमीन होती. त्यांच्या सुपीक शेतात विविध प्रकारची पिके, भाज्या आणि फळांचे उत्पन्न होत असे. मात्र एका शेतातील दोडक्याचा वेल बहरत नसे, कधी काळी चुकून एखादे फुल आले तरी ते एक तर गळून जाई अथवा सुकून जायचे. त्यातूनही त्या वेलीस एखादे फळ आले तर ते अतिशय कडवट असे आणि कोणीही खाऊ शकत नसे. नरसिंह वर्मांनी तो दोडक्याचा वेल बाळ श्रीपादांना दाखविला आणि म्हणाले, " श्रीपादा, या वेलीचे दोडके नेहेमीच कडू निघतात, बरें !" त्यांवर हसत श्रीपाद उत्तरले, " आजोबा, ही भूमी अतिशय पवित्र असून पुरातन काळी अनेक दत्तोपासक इथे साधना करीत होते. श्री दत्तात्रेयांचे बाल स्वरूप असलेल्या माझ्या पदस्पर्शासाठी ही धरणीमाता आतुर झाली होती. तिचे हे मागणें तिच्या भाषेत आपणांस सांगत होती. आज या भूमातेची प्रार्थना फळांस आली आणि तुम्ही मला इथे घेऊन आला. यापुढे, ह्या वेलीस उत्तम प्रकारचे दोडके येतील." बाळ श्रीपादांचे हे वरप्रद बोलणे ऐकून नरसिंह वर्मा अतिशय आनंदित झाले आणि कृतज्ञतेने म्हणाले, " प्रभो, आपल्या कृपादृष्टीमुळेच यापुढे चवदार दोडके या शेतात उत्पन्न होतील, यांत काहीच शंका नाही. मात्र, माझी एक प्रार्थना आहे. आपण या दोडक्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा." त्यांचा भक्तिभाव जाणून श्रीपाद स्वीकृती देत म्हणाले, " आजोबा, आमच्या घरी सर्वांनाच दोडक्याचे वरण आवडते. तुम्ही तयार झालेले दोडकें आमच्या घरी पाठवा, मी ते अवश्य ग्रहण करीन." नवलाईची गोष्ट म्हणजे त्या प्रसंगानंतर त्या वेलीस अतिशय रुचकर असे भरपूर दोडके येऊ लागले.

बाळ श्रीपाद नरसिंह वर्मांच्या शेतांतून खेळत-बागडत फिरू लागले. थोड्या वेळाने, तिथे आसपासच्या पहाडांवर राहणारे काही भिल्ल युवक-युवती आले. ग्रामस्थ त्यांना चेंचु असे संबोधत असत. त्या सर्वांनी श्रीपादप्रभूंना भक्तिभावानें वंदन केले. त्यावेळी, नरसिंह वर्मांना श्रीपादांच्या मुखमंडळाभोवती दिव्य तेजोवलय दिसले. त्यांच्याकडे मंद स्मित करून प्रभू म्हणाले, " आजोबा, हे चेंचुलोक नरसिंहावताराशी निगडित आहेत. ते देवी महालक्ष्मीला आपली बहीण मानतात आणि तिची आराधना करतात. तुम्हीही श्रीहरी विष्णूंचा अवतार नरसिंह यांचे भक्त आहात. तुम्ही या चेंचुलोकांची मनःपूर्वक प्रार्थना केल्यास तुम्हांला तुमच्या इष्टदेवतेचे दर्शन होईल." क्षणभर, बाळ श्रीपाद आपली थट्टा-मस्करीच करीत आहे, असे नरसिंह वर्मांना वाटले. तरीही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, त्यांनी त्या चंचु युवक-युवतींस श्री नरसिंह स्वामींचा दर्शनलाभ व्हावा, अशी विनवणी केली. त्यावर, " आपली अशी इच्छा असेल तर आम्ही आत्ताच आमची बहीण चंचुलक्ष्मी आणि तिचा पती नरसिंह यांस आपणाकडे घेऊन येतो." असे म्हणून हसत हसत ती मंडळी निघून गेली. क्षणभर विश्रांती घेऊन सुबय्या म्हणाले, " शंकरभट्टा, श्रीपादांचे प्रत्येक वचन, लीला त्यांच्या साधक-भक्तांच्या हितकल्याणासाठीच असत. त्यांना अनन्यभावानें शरण आलेले अभक्त, पशु, पक्षी, इतकेच नव्हें तर भूमी यांचाही त्यांनी सदैव उद्धारच केला. कर्मसंयोगाने मीही त्याचवेळी नरसिंह वर्मांच्या शेताजवळून चाललो होतो. श्रीपादप्रभूंनी मला हाक मारून जवळ बोलावले आणि म्हणाले, " सुबय्या श्रेष्ठीं, त्या वृक्षाजवळील मार्गावरून कोण येत आहे, ते पाहिलेस का ? अरे, ते बिल्वमंगल आणि चिंतामणी वैश्या आहेत. तू आता त्वरित या ठिकाणी वाळलेल्या काटक्यांचा ढीग करून पेटव." श्रीपादांचे ते बोलणे ऐकून मी आणि नरसिंह वर्मा दोघेही अचंबित झालो. मी प्रभू दाखवित असलेल्या दिशेनें वळून पाहिले तर खरोखरीच माझा मित्र बिल्वमंगल आणि चिंतामणी वैश्या श्रीपाद प्रभूंकडे चालत येत होते."

" ते दोघेही अजून श्रीपाद प्रभूंजवळ पोहोचलेही नव्हते, तोवर श्रीपादांच्या आज्ञेचे पालन करीत आम्ही सुक्या काटक्या गोळा करून पेटवल्या. जसा त्या शुष्क काष्ठांनी पेट घेतला, त्यावेळी थोड्याच अंतरावर असलेल्या बिल्वमंगल आणि चिंतामणी या दोघांनाही आपले शरीर जणू दहन होत आहे, अशी पीडा होत होती. त्या वेदना असह्य होऊन अखेर त्या दोघांचीही शुद्ध हरपली, अन ते जमिनीवर कोसळले. त्यांच्या सहाय्याकरिता आम्ही त्यांच्याकडे धाव घेऊ लागलो, परंतु श्रीपादस्वामींनी आम्हांस थांबविले. काही क्षणांतच त्या दोघांच्याही शरीरातून त्यांचाच सारख्या दिसणाऱ्या दोन काळ्या आकृती बाहेर पडल्या आणि रुदन करीत त्या अग्नींत भस्मसात झाल्या. या अकल्पित प्रकारानंतर बिल्वमंगल आणि चिंतामणी दोघेही शुद्धीवर आले. तिथे श्रीपादांना पाहताच त्या दोघांनीही त्यांस अतीव श्रद्धेने वंदन केले आणि सद्गदित होऊन आपली कहाणी सांगू लागले - ते दोघेही गुरुवायुर क्षेत्री श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी गेले असता सुदैवानें तिथेच त्यांना कुरूरअम्मा नावाच्या महायोगिनीच्या दर्शनाचाही लाभ झाला. तिने सहजच त्या दोघांना ' श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु ' अर्थात श्रीपाद श्रीवल्लभांचे तुम्हांस लवकरच दर्शन घडेल असा कल्याणप्रद आशिर्वाद दिला. त्या अधिकारी योगिनीने दिलेल्या अभीप्सिताच्या दैवीप्रभावाने बिल्वमंगल आणि चिंतामणीच्या मनांत भक्ति, वैराग्याचे बीज पेरले गेले. पीठीकापुराकडे येत असतांना मार्गात त्यांना मंगलगिरी हे जागृत स्थान लागले. तेथील नरसिंहस्वामींचे दर्शन घेत असतांना त्यांनी, " हे स्वामी, कुरूरअम्मांच्या शुभाशीर्वादाने जेव्हा आम्हांस दत्तावतारी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाचा लाभ होईल, त्याचवेळी त्यांच्याबरोबर आम्हांस आपले म्हणजेच श्री नृसिंहांचेही दर्शन होईल असे सौभाग्य आम्हांस प्राप्त व्हावे. " अशी आर्त प्रार्थना केली. मी आणि नरसिंह वर्मा ह्या सर्व अतर्क्य घटना पाहून स्तंभित झालो होतो."

" एव्हढ्यात ते पहाडी भिल्ल आपली बहीण चेंचुलक्ष्मी हिला घेऊन त्या स्थळीं आले. त्या युवक-युवतींबरोबर श्री नृसिंहदेवही होते. दोन्ही हात मागे बांधलेल्या श्री नृसिंहदेवास त्या चेंचुलोकांनी श्रीपादप्रभूंसमोर आणून उभे केले. अशा एकामागून एक घडत असलेल्या विचित्र लीला पूर्वी कधी कुठल्याही युगांत झाल्या असतील, असे मला वाटत नाही. श्री नृसिंहस्वामींकडे दृष्टिक्षेप टाकत श्रीपाद प्रभू प्रश्न विचारू लागले, " पूर्वयुगातील नरसिंह तूच आहेस ना ? ही चेंचुलक्ष्मी तुझी पत्नीच आहे ना ? आणि तूच हिरण्यकश्यपूचा वध करून आपला भक्त, प्रल्हाद याचे रक्षण केले होतेस ना ? " उत्तरादाखल श्री नृसिंहदेवांनी त्रिवार होकार उच्चारला. त्याच क्षणीं श्री नृसिंहदेव व चेंचुलक्ष्मी हे दिव्य ज्योतींत रूपांतरित झाले आणि श्रीपाद प्रभूंच्या शरीरात विलीन झाले. त्याचबरोबर ते सर्व पहाडी चेंचुलोकही अंतर्धान पावले. श्रीपाद स्वामींची कृपा आणि आशीर्वचनामुळे माझा मित्र बिल्वमंगल महर्षी झाला आणि चिंतामणी योगिनी झाली. त्यावेळीं, ' या चित्रविचित्र घटना घडलेल्या नरसिंह वर्मांच्या जमिनींवर लवकरच एक ग्राम निर्माण होईल आणि त्या गावाचे नाव ' चित्रवाडा ' असेल.' अशी श्रीपाद श्रीवल्लभांनी भविष्यवाणी केली. अर्थात हादेखील दत्तप्रभूंचाच सिद्धसंकल्प होता, हेच सत्य आहे. " हा कथाभाग सांगून सुबय्या श्रेष्ठींनी उच्च स्वरांत तीनदा श्रीपाद श्रीवल्लभांचे नाम घेतले आणि मोठ्या भक्तिभावानें प्रभूंचा जयजयकार करू लागले. स्वामींच्या ह्या अघटित सामर्थ्य लीला ऐकून स्तिमित झालेले शंकरभट्ट, त्यांच्याही नकळत त्या जयजयकारांत सुबय्यांना साथ देऊ लागले.  

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय फलश्रुती - दुर्गुणांपासून मुक्ती


Feb 23, 2021

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय १०


सुबय्या श्रेष्ठीची कथा, श्री आपळराजांची ऋणमुक्तता, श्रीपादांची वेंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा, व बापनार्युलु यांच्या वंशांवर कृपादृष्टी आणि श्री नरसिंह राजवर्मा यांस स्वप्न-दृष्टांत

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

श्रीपादप्रभूंच्या तिरुमलदासास झालेल्या आदेशाचे पालन करीत शंकरभट्टांनी कुरवपुरास प्रयाण केले. तिरुमलदासांनी त्यांचे यथायोग्य आतिथ्य तर केलेच होते, मात्र त्याहूनही अधिक असा श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीलांचा अनमोल ठेवा शंकरभट्टांस दिला होता. प्रभूंच्या त्या शब्दातीत बाललीलांचे पुन्हा पुन्हा स्मरण करीत शंकरभट्टांचा प्रवास सुरु होता. काही वेळ चालल्यानंतर त्यांना दूरवर एक अश्वत्थ वृक्ष दिसला. एव्हाना माध्याह्न समय झाला होता. दुपारच्या भोजनाचा काही तरी प्रबंध करावयास हवा, असा विचार ते करू लागले. तेव्हढ्यात त्यांना त्या अश्वत्थाखाली कोणीतरी विश्रांती घेत आहे, असे दिसले. त्या व्यक्तीसच जवळपास एखाद्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मिळेल का ? हे विचारावे म्हणून ते त्या वृक्षाकडे वळले.

अश्वत्थाजवळ आल्यावर त्यांना एक यज्ञोपवीत धारण केलेला जटाधारी पुरुष दिसला. त्या योगीराजाचे डोळे जणू करुणेने ओतप्रोत भरलेले होते आणि तो अतिशय तन्मयतेने श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत होता. एक झोळी आणि त्यात असलेले एक ताम्रपात्र एवढीच काय ती त्याची साधन-सामुग्री दिसत होती. शंकरभट्टांना पाहताच मंद स्मित करीत त्याने त्यांची विचारपूस केली. आपली ओळख सांगून त्या योगीस वंदन करीत शंकरभट्ट म्हणाले, " श्रीमान, आपण श्रीपाद प्रभूंचे कृपांकीत भक्त आहात का ? तुम्हाला त्यांच्या दर्शनाचा लाभ झाला आहे का ?"

त्यावर गंभीर स्वरांत ते मुनी बोलू लागले, " माझे नाव सुबय्या श्रेष्ठी असून माझा जन्म वैश्य कुळांत झाला आहे. पिठीकापुरांतील पिढीजात संपन्न असलेल्या आमच्या घराण्यांत अनेक धार्मिक दिव्य ग्रंथांच्या पारायणाची परंपरा असल्याने आम्हांला ' ग्रंथी ' असेही म्हणतात. माझ्या लहानपणीच माझ्या माता-पित्याचे छत्र हरपले. युवावस्थेत आल्यावर मी देशाटन करीत व्यापार करू लागलो. त्या सुमारास मळयाळ देशातील पालक्काड प्रांतातील बिल्वमंगल नावाच्या ब्राह्मणाशी माझी ओळख झाली. आम्ही दोघे मिळून काही काळ व्यापार करु लागलो. व्यापारांत आम्हांला भरपूर फायदा होत होता. दुर्दैवाने, आम्ही वाईट संगतीस लागलो आणि मद्य, जुगार, वैश्या अशा अनेक व्यसनांत आमचे धन आम्ही उडवू लागलो. पुढे, अरबांशी केलेल्या एका अश्व व्यापारांत आमचे अतोनात नुकसान झाले आणि आम्ही कर्जबाजारी झालो. त्या धक्क्याने माझी धर्मपत्नी मृत्यू पावली. थोड्याच दिवसांत आमच्या मंदबुद्धी पुत्राचाही अकाली मृत्यू झाला. अर्थात हे सर्व माझ्या कुकर्मांचे भोग होते."

" पिठीकापुरांत व्यापार करीत असतांना मी कुठल्याही धर्मनियमांचे पालन करीत नसे. विशेष करून ऋणवसुली करतांना देव-ब्राह्मणांचा विचार न करता अतिशय स्वार्थी आणि निर्दयी असे माझे वर्तन होते. एकदा श्रीपादप्रभूंचे पिता श्री आपळराज यांच्याकडे आईनविल्ली येथून त्यांचे काही नातेवाईक आले. त्यावेळीं, त्या सर्वांची भोजन व्यवस्था करण्यासाठी पुरेसे धन त्यांच्याकडे नव्हते. आपळराज हे श्री वेंकटप्पय्या श्रेष्ठींच्या घरी पौरोहित्य करत असले तरी, केवळ धर्मनियमांनुसार मिळणारी दक्षिणाच स्वीकारत असत. त्यामुळे, त्यांच्या दुकानांत न जाता ते माझ्या दुकानात आले आणि अगदी नाईलाजाने त्यांनी एक वराह एव्हढ्या किमतीचे जिन्नस उधारीवर देण्याची मला प्रार्थना केली. तसेच, मला धन मिळाल्यावर मी आपले देणें त्वरित फेडेन, अशी ग्वाही दिली. तेव्हा मी आपळराजांना जिन्नस दिले खरे, मात्र काही काळानंतर मी खोटे हिशेब दाखवून चक्रीवाढ व्याज आकारत, ' आपण मला आता १० वराह देणे बाकी आहे. ' असे त्यांना कळविले. वास्तविक पाहता, माझा राजशर्मांच्या राहत्या घरावर डोळा होता. त्यांच्या परिवारास गृहत्याग करणे भाग पडावे, अशी माझी कुटील योजना होती. तदनुसार, मी लवकरच राजशर्मांचे घर विकत घेऊन त्यांना १-२ वराह देऊन हा उधारीचा व्यवहार पूर्ण करणार, असे ग्रामस्थांना सांगत असे. माझे हे दुष्ट कारस्थान श्री वेंकटप्पय्या श्रेष्ठींनी मात्र त्वरित जाणले आणि क्रोधायमान होत मला म्हणाले, " अरे, धनांध होऊन तू आपळराज यांच्यासारख्या पुण्यात्म्यांचा अपमान करीत आहेस. आमच्या कुलपुरोहिताशी दुर्वर्तन केल्याचे फळ तुला लवकरच भोगावे लागेल, ह्याचे स्मरण ठेव. "

तरीही, मी माझा दुराग्रह सोडत नव्हतो. एक दिवस मी श्रेष्ठींच्या घरी आलो असता मला तिथे बाळ श्रीपाद खेळत असलेले दिसले. पुन्हा एकदा आपळराजांचा पाणउतारा करावा या हेतूने मी श्रेष्ठींस उपहासानें म्हणालो, " जर राज शर्मा माझे ऋण फेडू शकत नसतील तर त्यांनी त्यांच्या तीन पुत्रांपैकी एकास माझ्या दुकानात चाकरी करण्यास पाठवावे. अरे पण, त्यांचा एक पुत्र आंधळा, तर दुसरा पांगळा आणि तिसरा हा केवळ तीन वर्षाचा बालक आहे. त्यांमुळे हे तीन पुत्र माझी चाकरी करून पित्याचे ऋण फेडणे सर्वथा अशक्यच दिसते. नाही का ?" माझे हे कठोर बोलणे श्रेष्ठींना असह्य झाले, आणि त्यांच्या डोळ्यांत दुःखाश्रु आले. श्रीपादांनी आपल्या चिमुकल्या हातांनी त्यांचे अश्रू पुसले आणि शांतपणे म्हणाले, " आजोबा, मी असतांना आपण का कष्टी होता ?" आणि माझ्याकडे वळून म्हणाले, " अरे सुबय्या, मी माझ्या पित्याचे हे ऋण फेडीन. मी आत्ताच तुझ्या दुकानात सेवा करून माझ्या पित्यास ऋणमुक्त करेन. मात्र, तुझे देणे देऊन झाल्यावर तुझ्या घरी लक्ष्मी राहणार नाही, हे लक्षांत ठेव." ' विनाशकाले विपरित बुद्धी... ' या वचनाप्रमाणे श्रीपाद स्वामींच्या या बोलण्याकडे मी पूर्णतः दुर्लक्ष तर केलेच, पण " श्रीपादांच्या ऐवजी मी तुमच्या दुकानात काम करतो. " ही श्रेष्ठींची विनंतीही मी धुडकावली. अखेर नाईलाजाने, बाळ श्रीपादांना घेऊन वेंकटपय्या श्रेष्ठी माझ्या दुकानात आले.

इतके बोलून सुबय्या श्रेष्ठी काही क्षण थांबला आणि आपले डोळे मिटून त्याने अतिशय उत्कटतेनें एकदा श्रीपाद श्रीवल्लभांचे नाम घेतले. नंतर शंकरभट्टांकडे पाहत त्याने पुढील कथा सांगावयास सुरुवात केली. तो म्हणाला, " त्यावेळी एक जटाधारी संन्यासी दुकानात येऊन तांब्याच्या पात्राची चौकशी करू लागला. तातडीची गरज असल्याने त्या संन्याशाने अधिक किंमत देण्याचीही तयारी दर्शवली. त्याला हवे असलेल्या पात्राचे माझ्या दुकानांत खरे तर बत्तीस नग होते, मात्र मी त्याला " माझ्याकडे हे एकच पात्र शिल्लक आहे आणि त्याची किंमत दहा वराह आहे. " असे सांगितले. तो जटाधारी ती रक्कम देण्यास त्वरित तयार झाला, परंतु त्याने एक अट ठेवली. वेंकटपय्या यांच्या मांडीवर बसलेल्या बाळ श्रीपादांकडे पाहत तो म्हणाला, " केवळ या तेजस्वी बालकाच्या हातांनी ते पात्र मला द्यावे." या व्यवहारातील फायद्यावर डोळा ठेवून अर्थातच मी या गोष्टीला अनुमती दिली आणि त्याच्या मागणीनुसार बाळ श्रीपादांनी ते ताम्रपात्र त्या जटाधारी संन्याशास दिले. ते पात्र त्याच्या हातात देतांना बाळ श्रीपाद खट्याळपणे हसत म्हणाले, " झाले ना तुझ्या मनासारखे ? तुझ्या घरी लक्ष्मी अखंड राहील. तू आता संन्यासी वेष त्यागून गृहस्थाश्रम स्वीकार." त्यावर अत्यंत समाधानाने तो जटाधारी संन्यासी तेथून निघून गेला. मीही हा विशेष धनलाभ झाल्याने अहंकारपूर्ण स्वरांत म्हणालो, " ह्या विक्रीने मला फायदा झाला असल्याने अप्पळराज शर्मांचे दहा वराहाचे ऋण फिटले आणि त्यांच्याबरोबर केलेला हा उधारीचा व्यवहार पूर्ण झाला. या क्षणी श्रीपाद माझ्या ऋणातून मुक्त झाले. " ते ऐकून वेंकटपय्यांनी गायत्रीच्या साक्षीने मला अप्पळराज शर्मा ऋणमुक्त झाल्याचा पुनरुच्चार करावयास सांगितला. त्याप्रमाणे मी पुन्हा एकदा हा व्यवहार पूर्ण झाल्याचे माझे वचन बोलल्यावर बाळ श्रीपादांना घेऊन वेंकटपय्या आपल्या घरी परतले."

" मीही उरलेल्या एकतीस ताम्रपत्रांची नोंद करावी म्हणून दुकानाच्या आतल्या दालनात गेलो, तर काय आश्चर्य तिथे केवळ एकच ताम्रपात्र होते. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना, कारण काही वेळापूर्वीच तिथे बत्तीस पात्रें होती. खरोखर श्रीपाद प्रभूंच्या लीला अनाकलनीय आणि अगम्य होत्या. त्यांच्यासमोर बोललेले प्रत्येक वचन सत्य होत असे. प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंच्या दिव्य करकमलांनी ते ताम्रपात्र स्वीकारणाऱ्या त्या जटाधारी संन्याशाच्या भाग्याचे काय वर्णन करावे बरें ! त्याची कुठल्या जन्मींची पुण्याई फळास आली अन हा अलभ्य लाभ घडला, हे न कळें ! माझ्या उद्धाराची वेळ आली असतांना माझे दुर्दैव आडवे आले हेच खरे ! अशा रितीने श्रीपादप्रभूंनी अद्भुतरित्या केवळ काही क्षणांतच माझ्या खोट्या हिशोबाने आकारलेल्या ऋणाएव्हढी रक्कम मला मिळवून दिली आणि आपल्या पित्यास ऋणमुक्त केले."

इथपर्यंतची कथा सांगून सुबय्या श्रेष्ठी शंकरभट्टांस म्हणाले, " महाशय, आपण क्षुधेने व्याकुळ झालेले दिसत आहात. ' जर तुमच्या घरी कोणीही कधीही भुकेला-तहानलेला आला तर जात, धर्म, कुलादि यांविषयीं मनांत कसलाही किंतु न बाळगता प्रथम त्या व्यक्तीस आपल्या परिस्थितीनुसार खाऊ-पिऊ घाला.' असे श्रीपाद श्रीवल्लभ नेहेमीच आपल्या भक्तांना सांगत असत. तेव्हा, आपण आता आपल्या भोजनाची व्यवस्था करू. इथे जवळच एक जलाशय आहे, तेथे जाऊन तुम्ही संध्यादि उरकून घ्या. तोपर्यंत मी या वनातून केळीची व पळसाची पाने घेऊन येतो, आज आपण दोडक्याचे वरण आणि भात असे भोजन करू या." हे बोलणे ऐकून शंकरभट्टांस आश्चर्य वाटले. सुब्बय्याजवळ काहीच शिधा सामुग्री अथवा भोजन पात्रे दिसत नव्हती. त्यांमुळे इतक्या थोड्या कालावधीत हा आपल्यासाठी हे विशेष भोजन कसे बरे बनवणार ? असा विचार करीत ते जलाशयाकडे निघाले. तिथे मुखमार्जन करून, हात-पाय धुवून ते परतले, तोपर्यंत सुब्बय्याने दोन केळीची पाने मांडली होती आणि शेजारीच पळस पत्राचे द्रोणही ठेवले होते. त्याच्यासमोर ते झोळीतील ताम्रपात्र होते.

शंकरभट्टांस पाहताच त्याने त्यांना एका पानासमोर बसायची खूण केली. त्यानंतर, शांतपणे आपले डोळे मिटून काही क्षण तो ध्यानस्थ झाला. शंकरभट्ट हे सर्व नवलाईने पाहत होते. तेव्हढ्यात सुब्बय्याने डोळे उघडले. श्रीपाद प्रभूंचे नाम घेत ते ताम्रपात्र उचलले आणि त्या रिकाम्या पात्रातून द्रोणांत पाणी भरले. नंतर, त्याच भांड्यातून दोडक्याचे वरण आणि भातही वाढला. त्या दोघांनी आचमन, चित्राहुती करून भोजन केले. ते अत्यंत रुचकर पदार्थ प्रसाद म्हणून ग्रहण करताना शंकरभट्टांनी अपूर्व अशी तृप्ती अनुभवली. भोजनानंतर त्यांनी ते ताम्रपात्र पाहिले असता, ते पहिल्याप्रमाणेच रिकामे होते. त्यांच्या आश्चर्यास पारावार उरला नाही.

थोडा वेळ विश्रांती घेऊन सुबय्या पुन्हा एकदा श्रीपाद प्रभूंच्या लीला कथन करू लागला. " शंकरा, तुझ्या मनांत या ताम्रपत्राविषयी कुतुहूल आणि असंख्य प्रश्न आहेत ना ? तर आता पुढील वृत्तांत ऐक. बाळ श्रीपादांनी अनाकलनीय अशी लीला करून आपल्या पित्यास ऋणमुक्त केले, ही वार्ता पीठिकापुरांत वाऱ्याप्रमाणे पसरली. अप्पळराज आणि सुमती महाराणी यांच्या नेत्रांतून पुत्र वात्सल्यतेने अश्रुधारा वाहू लागल्या. त्या वेळी त्यांच्या घरी वेंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा, बापनार्य आणि काही प्रतिष्ठित मंडळी जमली होती. मलाही तिथे बोलावले गेले. तिथे जाताच त्या ज्येष्ठ मंडळींसमोर मी श्री राजशर्मांचे उधारी देणे व्याजासहित फिटले, हे सर्वांना सांगितले. तरीही, कुणी एक जटाधारी येऊन दहा वराह देऊन ताम्रपात्र खरेदी करतो, त्यांमुळे आपण ऋणमुक्त झालो ह्याविषयी अप्पळराज शर्मा अजूनही साशंक होते. तेव्हा, बाळ श्रीपाद म्हणाले, " तात, पित्याला ऋणमुक्त करणे हे पुत्राचे कर्तव्यच आहे. मी केवळ तीन वर्षाचा बालक आहे, असे आपणांस वाटते. पंचमहाभूतांनीही ' मी श्री दत्तात्रेय आहे ' अशी साक्ष दिल्यावरदेखील, केवळ अज्ञानामुळे तुम्हांस याचा वारंवार विसर पडतो. ह्या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय माझ्या संकल्पमात्रे होतो. ह्या सृष्टीचक्रांतील अनेक गूढ रहस्ये यांचे मी साक्षीभूत होऊन अवलोकन करतो. मी सर्वव्यापी, सर्वज्ञ आणि सर्वांतर्यामी असून ह्या दत्ततत्त्वाची सर्वांस कर्मफल आणि भावानुरूप अनुभुती देतो.

हा सुबय्या पूर्वजन्मी एका जंगलप्रदेशातील दत्तमंदिराचा पुजारी होता. अत्यंत दुर्वर्तनी असा हा पुजारी कधीच वेदधर्मानुसार आचरण करीत नसे. एके दिवशी, त्याने ती ताम्र दत्तमूर्ती विकली आणि ग्रामस्थांना मात्र दत्तमूर्ती चोरीला गेली, असे सांगितले. मूर्ती विकून आलेले धन त्याने अर्थातच वाममार्गाने खर्च केले. आज जो जटाधारी संन्याशी ताम्रपत्राच्या शोधात आला होता, तो पूर्वजन्मी सोनार होता. त्यानेच ती ताम्र दत्तमूर्ती त्या पुजाऱ्याकडून विकत घेतली होती. ती दत्तमूर्ती वितळवून बत्तीस ताम्रपात्रे बनवून त्याने धन कमावले होते, त्यामुळे ह्या जन्मी तो दरिद्री म्हणून जन्मला होता. त्या पुजाऱ्याने अनेक वर्षे श्री दत्तात्रेयांचे अर्चन केले होते, ह्याच पुण्यकर्मामुळे ह्या जन्मी श्रीमंत अशा श्रेष्ठी कुळात तो सुबय्या म्हणून जन्मला. पूर्वजन्मी तो सोनार नरसिंहाची आराधना करीत असे. त्या पुण्याईमुळे त्याला पूर्वजन्म स्मृती झाली आणि मला अनन्यभावाने शरण येऊन आपले दारिद्र्य हरण करण्याची आर्त प्रार्थना केली. मीही त्याच्या भक्तिभावाने प्रसन्न होऊन त्यास पीठिकापुर येथे येऊन माझ्या हातून ताम्रपात्र स्वीकार असा दृष्टांत दिला. हा सुबय्या खोटे हिशोब दाखवून दहा वराह इतके कर्ज दाखवणार, हे मला ज्ञात होते. म्हणूनच त्याला त्या संन्याशाकडून दहा वराह मिळतील, असा योग मी जुळवून आणला. माझ्या दृष्टांतानुसार तो आपल्या देणेदारांचा त्रास चुकविण्यासाठी जटाधारी संन्याशाचा वेष धारण करून पीठिकापुरांत आला. पुढील वृत्तांत आपणास ज्ञातच आहे."

त्यानंतर श्रीपाद प्रभू माझ्याकडे पाहत गंभीर स्वरांत बोलू लागले, " सुबय्या, तुझ्या दुकानात आता केवळ एकच ताम्रपात्र उरले आहे ना ? तू त्या जटाधारी संन्याशाकडून दहा वराह घेताच तुझे सर्व पुण्यफळ क्षय पावले. तुझी सर्व व्यसने, चिंतामणी नामक वैश्या, कर्जवसुली करतांनाचे तुझे वर्तन हे सर्व मी जाणतो. आपले कर्मभोग तुला आता भोगणे प्राप्त आहे. यापुढे तू झोळी घेऊन खाण्याचे पदार्थ विकशील. माझ्या पित्याने आतिथ्यासाठी तुझ्याकडून धन उधार घेतले होते आणि अतिथींस दोडक्याचे वरण आणि भात असा भोजन प्रबंध केला होता. काही काळाने तुझी अन्नान दशा होईल, त्यावेळी ह्या उरलेल्या एकाच ताम्रपात्रातून तुला गरजेपुरते पाणी, दोडक्याचे वरण आणि भात मिळेल, असा माझा तुला आशीर्वाद आहे. मी तुझा मृत्युयोगही दूर करत आहे. आज रात्री तुझ्या घराच्या दक्षिण दरवाजाजवळ एक म्हैस येईल. तिला तू स्वहस्तें रांधलेले दोडक्याचे वरण आणि भात खाऊ घाल. जेणें करून तुझे मृत्यू गंडांतर टळेल." त्यावेळी श्रीपाद क्रोधायमान दिसू लागले, तेथील सर्व मंडळींना ते जणू उग्र नृसिंहरूपांत दिसू लागले. सर्वांना भयभीत झालेले पाहून श्रीपाद पुन्हा मूळ स्वरूपांत आले आणि म्हणाले, " आजोबा, मीच नृसिंहमूर्ती आहे. परंतु, आपणास घाबरायचे काहीच कारण नाही. नरसिंह वर्मा - वेंकटप्पय्या श्रेष्ठींच्या आर्य वैश्यांचा, बापनार्य यांच्या लाभाद महर्षी गोत्राचा आणि माझा फार जुना अनुबंध आहे. त्यांच्यावर माझा वरदहस्त नेहेमीच राहील. तुमच्या वंशातील कोणत्याही पुरुषाने श्रीपाद श्रीवल्लभांची नवविधा भक्तींपैकी कुठल्याही मार्गाने आराधना केल्यास, माझी कृपादृष्टी तुमच्यावर राहील. तुमच्या तेहत्तीसाव्या पिढीच्या काळांत माझ्या जन्मस्थळी महासंस्थान निर्माण होईल. तिथेच माझ्या दिव्य पादुकांची स्थापना होईल." श्रीपाद प्रभूंची ही भविष्यवाणी ऐकून आम्ही सर्व जण स्तंभित झालो. हे तर प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयच आहेत, अशी आमची दृढ श्रद्धा झाली. अप्पळराज शर्मा - सुमती महाराणी यांनी पूर्वजन्मी दत्ताराधना केली होती, भगवान दत्तात्रेयांचा त्यांच्यावर वरदहस्त तर होताच, पण त्याचबरोबर वेंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा, आणि बापनार्युलु यांच्याही अनेक जन्मांच्या ईश्वर उपासनेचे आणि पुण्यकर्मांचे फलित म्हणूनच या सत्शील दाम्पत्यापोटी दत्तात्रेयांनी अवतार घेतला. याच कारणास्तव या तिघांकडून धन स्वीकारले तर ते दान होत नाही, उलट ते धन न स्वीकारल्यास महापाप लागू शकते हेच श्रीपाद आपल्या पित्यास समजावू इच्छित होते.

सुब्बय्याने सांगितलेला हा दिव्यानुभव ऐकून शंकरभट्ट दिग्मूढ झाले. पण त्यांच्या मनांत एक शंका उद्भवली. त्यांनी सुब्बय्याला नम्रतापूर्वक विचारले, " स्वामी, श्रीपाद श्रीवल्लभ हे श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत, असे म्हणतात. पण मग तेच नरसिंह अवतार, शिवस्वरूप, श्रीकृष्ण आणि श्रीनिवासदेखील तेच आहेत असे म्हणता, ह्याचा कृपया खुलासा करावा." त्यांवर मंद स्मित करीत सुबय्या श्रेष्ठी उत्तरले, " महोदय, ह्या सकळ ब्रह्माण्डाचे नियंता असलेले श्रीपादस्वामी सकल देवता स्वरूप आहेत. तेच ब्रह्मा, श्री विष्णु आणि सदाशिव आहेत, त्यांच्या ठायीं सर्व देवी-देवता, ऋषी-मुनी यांचेही वास्तव्य असते. नवग्रह हे त्यांचेच स्वरूप आहे. शनिदेव कर्मकारक आहेत, मंगळ ग्रहांतील चित्रा नक्षत्रांवर श्रीपादांचा जन्म झाला. त्यामुळे, चित्रा नक्षत्र असता केलेले श्रीपादांचे पूजन अपूर्व असे फळ देते. श्रीपाद श्रीवल्लभ षोडश कलांनी परिपूर्ण आहेत. त्यांच्या प्रत्येक कलेमधून तन-मन-आत्मस्वरूपी (१० x १० x १० = १०००) अशी हजारो स्पंदने प्रवर्तित होतात. त्यांच्या अष्टविधा प्रकृतीच त्यांच्या भार्या आहेत. अशा प्रकारे, श्रीपाद श्रीकृष्णच आहेत, तसेच श्री व्यंकटेश श्रीनिवासदेखील त्यांचेच रूप आहे."

याविषयीची मी तुला श्रीपादांची अजून एक कथा सांगतो. एकदा बाळ श्रीपाद नरसिंह वर्मांना म्हणाले, " आजोबा, उद्या आपण दोघे घोडागाडीतून आपली जमीन पहाण्यास जाऊ या. ती भूमाता माझ्या पद्स्पर्शाची कित्येक दिवसांपासून प्रार्थना करीत आहे." तेव्हा नरसिंह राजशर्मा लीनतेने म्हणाले, " अरे श्रीपादबाळा, माझे एक तुझ्याकडे मागणे आहे. आपली ही पीठिकापूराजवळ जी काही जमीन आहे, तिथेच एक छोटेसे गांव वसवून काही कष्टकरी लोकांना वाट्याने शेती करायला द्यावी, आणि जमिनीचा मालक म्हणून केवळ नाममात्र मोबदला घ्यावा, असा माझा मानस आहे. हा सर्व व्यवहार, हिशोब बघण्यासाठी मी तुझ्या पित्यास म्हणजेच श्री अप्पळराज शर्मा यांस कुलकर्णी पद देऊ इच्छितो. तसेही आईनविल्ली या ग्रामाचे कुलकर्णी पद ते सांभाळीत नाहीच ना ?" त्यांचा तो संकल्प ऐकून श्रीपाद हसत म्हणाले, " आजोबा, तुम्ही केवळ तुमच्या जमिनदारीचा विचार करत हा निर्णय घेत आहात. माझ्या पित्याने आणि तदनंतर मी हे कुलकर्णीपद सांभाळावे, हीच तुमची इच्छा आहे. परंतु, मला या सकळ ब्रह्माण्डाचे काळचक्र, कोट्यावधी प्राणिमात्रांचे कर्मफल हिशोब अविरत सांभाळावे लागतात. मुळात माझ्या ह्या अवताराचे मुख्य प्रयोजन विश्वकुंडलिनी जागृत करणे हेच आहे. ह्या पीठिकापुराची कुंडलिनी मी आपल्या, बापनार्युलु, आणि वेंकटप्पय्या श्रेष्ठी यांच्या तेहत्तीसाव्या पिढीत जागृत करीन, तेव्हा आपण ही चिंता करणे सर्वथा सोडून द्या."

सुबय्या म्हणाले, " शंकरा, श्रीपाद श्रीवल्लभांनी पीठिकापुर सोडून इतरत्र कुठे जाऊ नये, यासाठीच नरसिंह वर्मांचा हा प्रयत्न होता. मात्र प्रभूंचे अवतारकार्य जाणून घेण्यास आपण असमर्थ आहोत, हेच खरें ! त्याच रात्री नरसिंह वर्मांना स्वप्नदृष्टांत झाला, त्यांना श्रीपाद प्रभूंनी श्री नृसिंहांच्या बत्तीस अवतार स्वरूपांत दर्शन दिले. ती रूपे अशी होती. : १) कुंदपाद नरसिंहमूर्ती २) कोप नरसिंहमूर्ती ३) दिव्य नरसिंहमूर्ती ४) ब्रह्मांड नरसिंहमूर्ती ५) समुद्र नरसिंहमूर्ती ६) विश्वरूप नरसिंहमूर्ती ७) वीर नरसिंहमूर्ती ८) क्रूर नरसिंहमूर्ती ९) बिभीत्स नरसिंहमूर्ती १०) रौद्र नरसिंहमूर्ती ११) धूम्र नरसिंहमूर्ती १२) वह्नि नरसिंहमूर्ती १३) व्याघ्र नरसिंहमूर्ती १४) बिडाल नरसिंहमूर्ती १५) भीम नरसिंहमूर्ती १६) पाताळ नरसिंहमूर्ती १७) आकाश नरसिंहमूर्ती १८) वक्र नरसिंहमूर्ती १९) चक्र नरसिंहमूर्ती २०) शंख नरसिंहमूर्ती २१) सत्त्व नरसिंहमूर्ती २२) अद्भूत नरसिंहमूर्ती २३) वेग नरसिंहमूर्ती २४) विदारण नरसिंहमूर्ती २५) योगानंद नरसिंहमूर्ती २६) लक्ष्मी नरसिंहमूर्ती २७) भद्र नरसिंहमूर्ती २८) राज नरसिंहमूर्ती २९) वल्लभ नरसिंहमूर्ती. तिसावे नरसिंहाचे रूप म्हणून श्रीपाद वल्लभ प्रगट झाले. तर एकतिसाव्या अवतार स्वरूपांत श्री नृसिंह सरस्वती महाराज आणि बत्तिसाव्या नरसिंहमूर्ती रूपात प्रज्ञापुराचे (अक्कलकोटचे) श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन झाले."

" शंकरभट्टा, आज आपण इथेच थांबू या. ज्योतिषशास्त्रानुसार उद्याचा दिवस अतिशय शुभ आहे. त्या मंगलयोगावर मी तुला श्रीपादांच्या अनेक आश्चर्यकारक लीला कथन करेन. माझा मित्र बिल्वमंगल आणि वैश्या चिंतामणी हे पीठिकापुरांत कसे आले ? श्रीपाद प्रभूंनी त्यांच्यावर कशी कृपा केली ? नरसिंह वर्मांच्या शेतांतील श्रीपादांचा चमत्कार आणि चित्रवाडा या ग्रामाची कथाही मी तुला सांगेन. श्रीपाद प्रभूंचे भविष्यांतील अवतार आणि त्यांचे काही संकल्प यांविषयीही मी काही विवरण करेन. अत्यंत भक्तिभावाने केलेल्या प्रभूंच्या स्मरणाने, अथवा केवळ त्यांच्या लीला श्रवण केल्या असता पूर्वजन्मांतील अनेक पातकांच्या राशी सहजच भस्म होतात. आजची रात्र आपण श्रीपाद श्रीवल्लभांचे अखंड नामस्मरण करू या." असे म्हणून सुबय्या श्रेष्ठी जवळच असलेल्या त्यांच्या कुटीत शंकरभट्टास घेऊन गेले. त्या कुटीत दोन ताडपत्रीच्या चटया होत्या. तसेच, चार श्वान त्या कुटीचे रक्षण करीत होते. शंकरभट्टही प्रभूंच्या ह्या अद्भुत लीला ऐकण्याचे भाग्य आज आपल्याला लाभले, जणू श्रीपादांचा कृपाप्रसादच आपणास प्राप्त झाला, असा मनोमन विचार करीत नामस्मरणांत रंगून गेले. ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ अध्याय फलश्रुती - दुर्भाग्य नाश


Feb 10, 2021

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय ९


कर्मफल मीमांसा, श्री साईबाबा व गाडगे महाराज अवतार संकेत, श्री सच्चिदानंदावधूतांचा धर्मनिर्णय, आणि पंचमहाभूतांची साक्ष

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच तिरुमलदास आणि शंकरभट्ट यांनी स्नानसंध्यादि नित्यान्हिक उरकले. त्यानंतर प्राणायाम करून मन एकाग्र केले. अशा रितीनें, सबाह्य अभ्यंतरीं शुद्ध होऊन ते दोघेही श्रीपाद श्रीवल्लभांचे ध्यान करू लागले. तो गुरुवारचा शुभ दिवस होता. हळू हळू सूर्यनारायणांचे पृथ्वीतलांवर आगमन होऊ लागले. सूर्याच्या त्या प्रथम किरणांत तिरुमलदास आणि शंकरभट्ट या दोघांनाही त्यांच्या आराध्यदेवतेचे दर्शन झाले. अत्यंत तेजस्वी, दिव्य आणि मनोहर अशा षोडशवर्षीय युवकाच्या रूपांत झालेले श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे ते क्षणिक दर्शन त्यांना मंगलप्रद वाटले. मात्र त्यावेळीं एक अकल्पित घटना घडली. श्रीपाद प्रभूंना नैवैद्य म्हणून जे चणे ठेवले होते, त्यावर सूर्यकिरणें पडताच ते चणे लोखंडात रूपांतरित झाले. लोखंडाचे ते चणें पाहून शंकरभट्ट खिन्न झाले. आपल्या हातून काही प्रमाद घडला असावा का अथवा भविष्यकालीन घटनेचे हे सूचक आहे का?, ह्या विचाराने ते कष्टी झाले. या शंका निवारणार्थ आपण तिरुमलदासाशीच बोलावे, असा विचार करून शंकरभट्ट वळले. एव्हढ्यात, तिरुमलदासच बोलू लागले, " शंकरा, आज दुपारीच तू भोजन करून कुरवपुरांस प्रयाण करावेस, असा श्री दत्तप्रभूंचा आदेश झाला आहे. आजचा दिवस अतिशय शुभ आहे. श्री दत्त क्षेत्री दररोज माध्यान्हकाळीं प्रत्यक्ष दत्तमहाराज भिक्षा मागतात, ह्या गोष्टीचे तू नित्य स्मरण ठेव."

त्यावर शंकरभट्ट लीनतेने उत्तरले, " स्वामी, आपल्यासारख्या ज्येष्ठ भक्ताकडून मी दररोज श्री दत्तप्रभूंचे अवतार, त्यांच्या कथा, वेद निरुपणादी श्रवण करीत होतो. आपल्या रसाळ वाणीतून श्रीपाद प्रभूंचे अनुभव, त्यांच्या लीला ऐकतांना अनिर्वचनीय असा आनंद मला मिळत होता. तसेच आपल्या आदरातिथ्याबद्दलही मी आपला ऋणी आहे. आज मात्र माझ्या मनांत एक शंका उद्भवली आहे. प्रातःकाळी अर्चन करतांना श्रीपादस्वामींना नैवेद्य म्हणून अर्पण केलेले चणे लोखंडाचे झाले, या घटनेने मी खिन्न झालो आहे. आपण कृपया माझ्या ह्या संशयाचे निरसन करावे अशी मी आपणांस प्रार्थना करतो." तेव्हा, शांत स्वरांत तिरुमलदास म्हणाले, " शंकरभट्टा, हा या कलियुगाचा महिमा आहे. ज्याप्रमाणे खनिजद्रव्यांत चैतन्य निद्रावस्थेत असते, त्याचप्रमाणे सांप्रत कली प्रबळ झाल्यामुळे मनुष्य देहांत आस्तिकता, चैतन्य असेच निद्रावस्थेंत राहील. प्राणशक्तीत असलेले हे चैतन्य वेदोक्त आराधना, योगसाधना, जप-ध्यानादी उपायांनी हळूहळू विकसित होते. मानवी देहाच्या मूलाधारात सुप्तरूपांत असलेले हे चैतन्य जागृत झाल्यास साधकांस निर्विकल्प समाधीचा अनुभव येतो आणि तो त्या परब्रह्माशी एकरूप होतो. या स्थितीत तो कर्मबंधनांतून मुक्त होतो. मानवी मन हे अतिशय चंचल असते, मात्र श्री प्रभूंचे अतिमानस हे कल्पनातीत, अगम्य आणि प्रकाशाच्या वेगापेक्षाही असंख्य पटीने अधिक वेगवान आहे. प्रत्येक क्षणी कोट्यावधी साधकांनी, भक्तांनी, प्राणिमात्रांनी केलेल्या प्रार्थना श्रीपाद प्रभूचरणीं पोहोचतात. ह्या अनंत कोटी ब्रह्माण्डाचे सृजन-पालन आणि संहार करणारे श्री दत्तात्रेयच सगुण साकार मनुष्य देह धारण करून श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपांत आपल्या भक्तांस दर्शन देत असतात."

तिरुमलदासाचे हे स्पष्टीकरण ऐकून शंकरभट्टांचे समाधान झाले, पण किंचित चिंताग्रस्त होत ते म्हणाले, " प्रभू श्रीपादांच्या ह्या कथा ऐकतांना मला कितीतरी वेळा त्यांच्या अस्तित्वाची, सान्निध्याची जाणीव झाली. ह्या सृष्टीरचनेतील अनेक रहस्यें, वेदांतील क्लिष्ट तत्त्वें, भगवंताचे स्वरूप अशा अनेक विषयांवर आपण विस्तृत निरूपणही केले. मात्र वेदांनाही ज्यांचे वर्णन करणे शक्य नाही, असे अनंत, दिव्य स्वरूपी परमगुरु यांचे हे अथांग चरित्र मी कसे लिहावे ? हे अद्भुत कार्य माझ्याकडून घडेल का ? याविषयीं माझे मन साशंक आहे." तेव्हा, अत्यंत आश्वासक स्वरांत तिरुमलदास म्हणाले, " वत्सा, श्रींचे हे चरित्र लेखन तुझ्या हातूनच होणार आहे, हे विधिलिखित सत्य आहे. केवळ या शुभ कार्यासाठीच तुला श्रीपादांचे अनेक भक्तश्रेष्ठ त्यांचे अनुभव सांगतील आणि तू ते लेखणीबद्ध करशील. स्वतः श्रीपाद प्रभूच त्यांचे हे दिव्य चरित्र लिहितील, तू केवळ निमित्तमात्र असशील अशी दृढ श्रद्धा ठेव. त्या परब्रह्मास तू अनन्यभावाने शरण जा आणि मग तुला त्यांच्या कृपेची अनुभूती निश्चितच येईल."

महर्षी अत्रि आणि महासती अनसूया यांच्या भक्तीनें प्रसन्न होऊन परमगुरु श्री दत्तात्रेय त्रिगुणात्मक त्रैमूर्तीच्या स्वरूपांत अवतार घेते झाले. पूर्वायुगांतील श्री दत्त हेच श्रीपाद श्रीवल्लभ आहेत का ? अशी शंका तुझ्या मनांत निर्माण झाली. त्या शंकेचे निवारण करण्यासाठीच प्रभूंनी हे नैवेद्याचे चणे लोखंडात रूपांतरित केले. ह्या जन्म-मृत्यूच्या चक्रास कारणीभूत असलेले हे अज्ञान नष्ट करून आपल्या भक्तांस मोक्ष-कैवल्य आदींचा लाभ करून देण्यासाठीच हा अवतार झाला आहे. मनुष्याच्या अध:पतनाचे लक्ष मार्ग असतील तर तो परमकृपाळू परमात्मा दशलक्ष मार्गांनी आपल्यावर अनुग्रह करतो. त्या करुणासागर प्रभूंना अनन्यभक्तीनें शरण गेल्यास मनुष्यास शाश्वत सुख प्राप्त होते. सलग तीन अहोरात्र श्रीपाद प्रभूंचे निरंतर मनःपूर्वक स्मरण अथवा ध्यान केले असता, त्या साधकास श्रीपाद प्रभूंचे साक्षात दर्शन होते. केवळ स्मरणमात्रेच प्रसन्न होणाऱ्या श्री दत्तप्रभूंचा हा आद्य अवतार आहे. त्यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवून आपण आध्यात्मिक प्रगती साधावी. तिरुमलदासाने श्री गुरूंचा असा महिमा सांगूनदेखील शंकरभट्टांच्या मनांतील संशय पूर्णत: दूर झाला नव्हता. कुशंकाग्रस्त मनानेच ते विचार करू लागले, " श्रीपाद श्रीवल्लभ जर खरोखरच श्री दत्तात्रेयांचे अवतार असतील, तर प्रभू मला भगवान श्रीकृष्णांचे निर्वाण कधी झाले, या कलियुगाचा आरंभ दिन कुठला याविषयीं दृष्टांत देतील." शंकरभट्ट असा विचार करतच होते तेवढ्यात कानठळ्या बसतील असा प्रचंड ध्वनी झाला. अनपेक्षितपणे झालेल्या त्या मोठ्या आवाजाने शंकरभट्टांची श्रवणशक्ती, तर तिरुमलदासाची वाचाशक्तीच नष्ट झाली. खूप प्रयत्न करूनसुद्धा त्यांच्या मुखातून एक शब्दही निघत नव्हता आणि शंकरभट्टांस काहीच ऐकू येत नव्हते. इतक्यात तिथे नैवेद्यासाठी म्हणून ठेवलेले चणे जे लोखंडाचे झाले होते, ते चणे हळूहळू '' श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये '' या दिव्य मंत्राक्षरांत आकारबद्ध झाले. त्या चण्यांवरच एक धवल पत्र प्रगटले आणि त्या तलम पत्रावर अक्षरें उमटू लागली - श्रीकृष्णांचे निर्वाण ख्रिस्त पूर्व ३१०२ साली झाले. त्यानंतर प्रमादी नामक संवत्सरात चैत्र शुद्ध प्रतिपदेला शुक्रवारी, अश्विनी नक्षत्र सुरु झाल्यावर कलियुगाचा प्रारंभ झाला. ते अनाकलनीय दृश्य पाहून शंकरभट्ट अतिशय भयभीत झाले, आपल्या वर्तनाचा त्यांना पश्चात्ताप होऊ लागला. त्यांनी मनोमन श्रीपादप्रभूंची क्षमायाचना केली. अन काय आश्चर्य ! त्याच क्षणी ते सर्व विरून गेले आणि लोखंडाचे चणे पूर्ववत झाले. ते पाहून त्या करुणासागर प्रभूंनी आपल्या अनंत अपराधांबद्दल क्षमा केली, या विचाराने शंकरभट्ट सदगदित झाले आणि ते कृतार्थभावाने तिरुमलदासाकडे पाहू लागले. त्यावेळीं, तिरुमलदासाच्या मुखावर जणू ब्रह्मतेजचं विलसत आहे, असे त्यांना भासले. मंद स्मितहास्य करीत तिरुमलदास बोलू लागले, " शंकरा, श्रीपादप्रभूंचा पुढील अवतार लवकरच महाराष्ट्र देशांत श्री नृसिंह सरस्वती म्हणून होणार आहे. माझी बाळकृष्णांवर श्रद्धा आहे, हे तू जाणतोच. श्रीपादप्रभूंची आपल्या भक्तांवर जन्मोजन्मी कृपादृष्टी असते. माझ्या पुढील जन्मातही समर्थ सद्गुरू रूपांत अवतारित झालेल्या साई बाबा यांच्याकडून मला अनुग्रह प्राप्त होईल. गाडगे महाराज या नावाने मी पुन्हा रजक कुळांत जन्म घेईन. ' गोपाला ! गोपाला ! देवकीनंदन गोपाला !' या नाम मंत्राने मी पुन्हा माझ्या कृष्णभक्तीत रंगून जाईन."

तिरुमलदास पुढे म्हणाले, " प्रत्येक जीवास आपल्या कर्माचे फळ हे भोगावेच लागते. प्रत्यक्ष भगवंताचीदेखील त्यातून सुटका नाही. मात्र मनुष्य पुण्यसंचय, दानधर्म, सत्पुरुषांची सेवा आदी साधनांद्वारे आपल्या पापकर्मांचा क्षय करू शकतो. परमेश्वर, संत-माहात्मे, अवतारी पुरुष, सद्गुरू पुण्यस्वरूप असल्याने त्यांना शरण आलेल्यांची संचित पाप कर्मे ते आपल्या योगसामर्थ्याने दग्ध करू शकतात. त्यांना भक्तिभावाने अर्पण केलेल्या उपचारांनीसुद्धा कर्मांची तीव्रता कमी होऊ शकते, अर्थात जशी श्रद्धा, भक्ती आणि भाव तसेच फळ मिळते. त्यांच्या चरणीं आर्ततेनें केलेली प्रार्थना त्वरित फलित होते. शंकरा, भावेंविण भक्ती नाही आणि भक्तीविण मुक्ती नाही, हेच सत्य आहे. श्रीपाद प्रभू त्यांच्या शरणागतांचे कर्मदोष काही वेळा निर्जीव पाषाण-दगड यांना भोगावयास लावून त्या पातकांचे निवारण करत असत. तुला, मी याविषयीची एका भक्ताची कथा सांगतो."

सुमती महाराणी श्रीपादांना त्यांच्या जन्मापासून पुरेसे स्तनपान करू शकत नसे. श्री आपळराज यांच्या घरी एक गाय होती, मात्र तिचे दूध अगदीच कालाग्निशमन दत्तांच्या नैवैद्यापुरतेच मिळायचे. कधी कधी त्या वंशपरंपरागत दत्तमूर्तीस नैवैद्य दाखवायच्या आधीच श्रीपाद ते दूध देवघरांत जाऊन प्राशन करायचे. त्या दिवशी आपळराज मग देवास गुळाचा नेवैद्य दाखवून उपवास करायचे. पतीस उपवास घडल्यामुळे सुमती महाराणीदेखील उपवास करीत असे. आपल्या या दिव्य शिशुस आपण पुरेसे दूध देऊ शकत नाही, या विचारांनी ते सदाचारी माता-पिता दुःखी होत असत. श्री आपळराज स्वतः वेदशास्त्र पारंगत होते. केवळ पौरोहित्य करून मिळणाऱ्या दक्षिणेवरच ते आपला प्रपंच करीत होते. वेंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंहराय वर्मा आणि सासरे श्री सत्यऋषिश्वर (श्री बापन्नार्य) यांच्याकडूनदेखील ते कधीही दान घेत नसत. एके दिवशी सुमती महाराणीने आपल्या पतीस, माझ्या दुधाने बाळ श्रीपादांची भूक भागत नाही, यासाठी एक गोदान स्वीकारण्याची विनवणी केली, मात्र आपळराजांनी त्यास नकार दिला.

श्री आपळराज शर्मा यांचे वडील श्रीधररामराज शर्मा वेलनाड्डु येथील ग्रामाधिकारी होते. वेळ प्रसंगी करवसुलीसाठी त्यांना धर्माविरुद्ध जाऊन आचरण करावे लागत असे. याच पिढीजात कर्मदोषांमुळे आपळराज-सुमती महाराणी यांच्या दोन पुत्रांस जन्मतः वैगुण्य आले होते. प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंचा अवतार असलेल्या श्रीपादांनादेखील हे प्रारब्ध भोगावे लागले, त्यांमुळेच त्यांना पुरेसे दूध मिळू शकत नव्हते. कर्मचक्राचा हा नियम प्रत्यक्ष भगवंतांलाही लागू होतो, हेच आपल्या भक्तांना दाखविण्यासाठी प्रभूंनी ही लीला केली.

श्री वेंकटप्पय्या श्रेष्ठी आणि नरसिंहराय वर्मा हे दोघेही श्रीपादांवर पौत्रवत प्रेम करीत असत. बाळ श्रीपादांच्या या दुग्ध समस्येचे निवारण करण्यासाठी त्यांनी एक उपाय योजना केली. श्री नरसिंह वर्मांची एक शुभ लक्षणयुक्त गाय श्रेष्ठींनी विकत घेतली. गोमाता विक्रय करून आलेले ते सर्व धन श्री वर्मांनी आपळराजांस पौरोहित्यानिमित्त दक्षिणा म्हणून दिले. मात्र वेदशास्त्रनियमांचे कठोर पालन करणाऱ्या आपळराजांनी ते सर्व द्रव्य न घेता केवळ धर्ममान्य असलेलीच दक्षिणा स्वीकारली. तेव्हा, मी क्षत्रिय आहे आणि एकदा दान दिलेले द्रव्य मी परत घेऊ शकत नाही, असे म्हणत वर्मांनी ती उरलेली दक्षिणा स्वीकारण्यास नकार दिला. हा वादविवाद मिटवण्यासाठी अखेर ब्राह्मण परिषद बोलावण्यात आली. शास्त्राज्ञांचा परामर्श घेऊन त्या सभेत श्री बापन्नार्यानी '' आपळराज शर्मानी अस्वीकार केलेले हे धन ज्यांना घ्यावयाचे असेल त्यांनी घ्यावे.'' असा निर्णय दिला. एक शुभलक्षणीं गाय विकत घेण्यास पुरेसे असलेले ते धन आपणांस मिळावे या हेतूने अनेक ब्राह्मणांत चढाओढ सुरु झाली. ग्रामांतील पापय्या शास्त्री नामक एका वेदाध्ययनी ब्राह्मणाने आपण श्रेष्ठ दत्तभक्त आणि धर्मपरायण असून सत्पात्री आहोत, असे मोठ्या चातुर्यतेने सर्वांस समजाविले. ब्रह्मवृंदांनीही ते धन त्या ब्राह्मणास देण्याचा निर्णय दिला.

ते स्वीकारून पापय्या शास्त्री स्वतःवरच खूष होत आपल्या घरी परतला. तेव्हा, तिथे त्याचे मामा भेटण्यासाठी आलेले दिसले. त्यांचे स्वागत करून, ' आपण आता भोजनासाठी इथेच थांबावे.' अशी पापय्याने विनंती केली. त्यावर, ' मी वर्षातून केवळ एकदाच भोजन करतो. मात्र आपण लवकरच भेटू.' असे म्हणून त्याचे मामा त्वरेनें तिथून निघून गेले. ते विचित्र बोलणें ऐकून पापय्या शास्त्री संभ्रमात पडले. त्याचवेळी, त्याची पत्नी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, " स्वामी, तुमचे एकुलते एक मामा तर गतवर्षीच वारले. मग अगदी त्यांच्यासारखेच दिसणारे हे कोण होते ?" पत्नीचे हे बोलणे ऐकताच पापय्या शास्त्रीच्या पायाखालची जमीनच सरकली. आपण मृतात्मा तर पाहिला नाही ना ? या भीतीने त्यांची गाळण उडाली. आपले उपास्य दैवत श्री दत्तात्रेय यांची आपल्यावर अवकृपा झाली का ? आपल्या हातून काही अक्षम्य गुन्हा घडला का ? असा विचार करीत पापय्या श्री स्वयंभू दत्तात्रेय कुक्कुटेश्वराच्या मंदिरात गेला. तेव्हा मार्गांत काही अपशकुनही झाले. त्या दिवशी तो एकाग्रतेने दत्तप्रभूंचे ध्यान, जप वा इतर साधना काहीच करू शकला नाही. विमनस्क अवस्थेतच तो घरी परतला. तेव्हा, त्याला आपली पत्नी सुवासिनी न दिसता गतधवा दिसू लागली. पापय्याचे ते विचित्र वर्तन आणि दिवसभरांत घडलेल्या घटना पाहून त्याची पत्नी चिंताग्रस्त झाली. श्रीपादप्रभू दत्तावतारी आहेत, अशी तिची पहिल्यापासूनच दृढ श्रद्धा होती. त्यांनाच आपण आता शरण जावे असा विचार करून ती श्रीपाद स्वामींकडे आली आणि आपल्या सौभाग्याचे रक्षण करावे, अशी तिने त्यांना आर्त प्रार्थना केली. श्रीपादांनाही तिच्या अढळ निष्ठेला, उत्कट भक्तीला दाद द्यावीच लागली. प्रभूंनी पापय्याच्या पत्नीला नूतन गृह प्रवेश आणि विधीवत वास्तुपूजा करावयास सांगितली.

श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार तिने पीठिकापुरांतील काही प्रतिष्ठित आणि सदाचारसंपन्न व्यक्तींना नवीन गृह बांधण्यासाठी मदतीची याचना केली. अशा रितीने, थोडी आपली जमापुंजी खर्चून, गरजेनुसार ऋण काढून आणि काही मदत घेऊन लवकरच पापय्या शास्त्रींचे नवीन गृह निर्माण झाले. अर्थात श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर सर्व कार्ये निर्विघ्नपणें पार पडणारच, यांत काही शंकाच नाही. नूतन प्रवेश केल्यावर पापय्या शास्त्रींचा सर्व त्रास नाहीसा होऊन ते पूर्ववत झाले.

" शंकरा, तुला या कथेतील कर्मफल रहस्य कळले का ? पापय्या शास्त्रींची मृत्यूदशा सुरु होती, त्यांच्या कुंडलीत अपमृत्यूचा योग होता. श्रीपाद प्रभूंनी त्याला मानसिक त्रास, जननिंदा, धनव्यय अशा प्रकारचे कष्ट देऊन त्याच्या कर्मदोषांचे निवारण केले. नूतन गृह बांधतांना जे मोठे पाषाण अथवा पर्वतशिला फोडल्या जात होत्या, त्या क्षणीच श्रीपादांच्या कृपादृष्टीमुळें पापय्याच्या पातकांचीही शकले होत होती. आपण थोर दत्तभक्त आहोत, त्यांमुळे कुक्कुटेश्वर मंदिरातील पाषाणमूर्ती सर्वदा आपले रक्षण करील अशा अहंकारांत पापय्या शास्त्री होता. मात्र पीठिकापुरांत बालकरूपांत असलेल्या आपल्या आराध्य देवतेला तो ओळखू शकला नाही. श्रीपादांना तो श्रद्धापूर्वक शरण आला असता, तर आपल्या योगाग्नीनें प्रभूंनी सहज त्याच्या कर्मदोषांचा क्षय केला असता. ' जेथें सप्रेम नाही भगवंताची भक्ती तेथे कर्मे अवश्य बाधिती ॥' या उक्तीचा त्याला पुरेपूर अनुभव आला. मात्र त्याच्या पत्नीच्या भावभक्तीनुसार त्याला भगवंताचा अनुग्रह प्राप्त झाला. श्रीपादांचा असा कृपानुभव घेतल्यावर मात्र पापय्याने ते दत्तप्रभूंचे अवतार आहेत हे ओळखले आणि त्याची श्रद्धा त्यांच्या चरणीं दृढ झाली.

श्री श्रेष्ठी आणि श्री वर्मा मात्र अजूनही बाळ श्रीपादांच्या दुग्ध समस्येचे निवारण न झाल्याने चिंतीत होते. त्या दोघांनी श्री बापन्नार्यांशी याविषयी चर्चा केली. आपल्या नंदिनीसमान असलेल्या धेनूचे क्षीर श्रीपादांस मिळावे, यासाठी ही गोमाता आम्ही आपल्या गोठ्यांत आणतो, अशी त्यांनी श्री बापन्नार्यांस विनंती केली. मात्र, आपले श्वशुर बापन्नार्य यांच्याकडूनही गोदान घेण्यास श्री आपळराजांनी नकार दिला. त्याच सुमारास हिमालयातील सतोपथ या प्रांतामधील श्री सच्चिदानंदावधूत नामक ज्येष्ठ आणि वयोवृद्ध महायोगींचे पीठिकापुरांत आगमन झाले. ते कैवल्यश्रुंगी येथे असलेल्या श्री विश्वेश्वरप्रभूंचे शिष्य होते. श्री प्रभू दत्तात्रेयांच्या आद्य अवताराचे दर्शन तू घेऊन कृतार्थ व्हावेस, असा त्यांच्या गुरूंचा सच्चिदानंदावधूतांना आदेश झाला होता. श्री बापन्नार्यांनी त्यांचा यथायोग्य आदरसत्कार केला. एके दिवशी, त्या वयोवृद्ध तपस्व्यांना बापन्नार्यांनी आपळराज आपणाकडून गोदान स्वीकारण्यास नकार देत असून आपण काही तरी मार्ग सुचवावा, अशी प्रार्थना केली.

तेव्हा, ब्राह्मण परिषदेत हा प्रश्न मांडला गेला. श्री सच्चिदानंदावधूत यांनी, " श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तात्रेय आहेत. आपण अजाण लोकांनी व्यर्थ नियम बंधनात न पडता प्रभूंना गोरस अर्पण करण्याच्या या सुवर्णसंधीचा लाभ घेतला पाहिजे." असे निक्षून सांगितले. सभेतील काही ब्रह्मवृंदाने यांवर आक्षेप घेत, बाळ श्रीपाद हे दत्तात्रेय असल्याचे त्यांना साधार सिद्ध करण्यास सांगितले. त्यावेळी, त्या श्रेष्ठ योग्याने आपल्या तप:सामर्थ्याने पंचमहाभूतांना साक्ष देण्यास सांगितले. त्यांच्यावर गुरु श्री विश्वेश्वरप्रभूंचा वरदहस्त होताच. भूमाता, वरुण, अग्नि, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी, " श्रीपाद श्री दत्तप्रभूच आहेत. सत्य ऋषीश्वरांनी श्री श्रेष्ठीकडून गोदान घ्यावे आणि श्वशुरांनी जामातास प्रीतिपूर्वक दिलेली भेट हे दान होत नाही, त्यांमुळे आपळराज शर्मा यांनी त्या गोमातेचा स्वीकार करावा." अशी साक्ष दिली. हा धर्मसंमत निर्णय मान्य करून आपळराजांनी श्री बापन्नार्यांनी दिलेली गोमाता भेट म्हणून स्वीकारली. त्या प्रसंगी, नरसिंह वर्मा यांनी त्या धेनुची विक्री करून मिळालेले धन आपले कुलपुरोहित असलेल्या आपळराज शर्मा यांस दक्षिणा म्हणून देण्याचा मानस व्यक्त केला. श्री सच्चिदानंदावधूत यांनीही त्यास अनुकूलता दर्शविली. अशा प्रकारें त्या ज्येष्ठ मुनींच्या योग्य मार्गदर्शनाने श्रेष्ठी आणि वर्मा या दोघांस अपूर्व पुण्यसंचयाचा अलभ्य लाभ झाला.

भविष्यकाळांत, श्रीपाद श्रीवल्लभांच्या आशीर्वादाने पीठिकापुर महासंस्थान म्हणून उदयास येईल. श्रीपादांचे चरित्र संस्कृत भाषेत लिहिले जाईल. त्यानंतर '' श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत '' हा ग्रंथ प्रकाशित होईल. भूर्जपत्रात लिहिलेला मूळ ग्रंथ, श्रीपादांच्या जन्मस्थानी जमिनीखाली अदृश्यरूपांत राहील. त्या परम पवित्र स्थानी त्यांच्या पादुकांची स्थापना आणि मंदिर निर्माण होईल. प्रत्यक्ष श्रीपाद प्रभूंना गोदान केलेल्या महापुण्यशाली वेंकटप्पय्या श्रेष्ठी यांच्या वंशावर लक्ष्मीची कृपा असेल. आपल्या पुण्यसंचयामुळे या जन्मानंतर ते हिरण्यलोकात काही काळ राहतील. श्रीपाद श्रीवल्लभांच्या पुढील श्री नृसिंह अवतारांतदेखील ते ऐश्वर्यसंपन्न वैश्य कुळात जन्म घेतील आणि त्यांना प्रभूंचे सान्निध्य आणि दर्शन यांचा लाभ होईल. " शंकरा, गोदान हे विशेष शुभप्रद आहेच, त्यांतून प्रत्यक्ष भगवंताला केलेल्या त्या दानाचे अपूर्व असे फळ मिळणार यांविषयी तिळमात्र शंकाच नाही. प्रभूंच्या आदेशानुसार, तू आता कुरवपुरास प्रयाण करावेस. श्रीपाद श्रील्लभ सदैव तुझी रक्षा करतील.", असे म्हणून तिरुमलदासाने शंकरभट्टांस निरोप दिला.

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय फलश्रुती - प्रारब्ध, कर्मदोष नाश


Jan 28, 2021

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय ८


श्री दत्तात्रेय स्वरूप वर्णन, आत्मसाक्षात्कार - कर्मचक्र परिणाम, श्रीपादस्वामींचा वर्णाश्रमाविषयी व्यापक दृष्टिकोन आणि माधव सिद्धाची कथा

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

नित्यनियमांनुसार प्रात:कर्मे आटपून पुन्हा एकदा तिरुमलदास श्रीपादप्रभूंची कथा शंकरभट्टांस ऐकवू लागले. श्रोता एकाग्रचित्ताने आणि श्रद्धापूर्वक ऐकत असल्यास वक्त्याच्याही वाणीस जणू घुमारे फुटतात. श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या भक्तीरसांत रंगून गेलेले ते दोन निष्ठावंत भक्त प्रभूंच्या लीलांचे सतत श्रवण, चिंतन आणि मनन करीत होते. या ब्रह्माण्डाची रचना आणि कार्य, वेदांतील अनेक क्लिष्ट तत्त्वें, अगम्य घटना, ईश्वरी संकेत आदि अनेक विषयांवर तिरुमलदास अतिशय सुलभ आणि रसाळ वाणींत प्रबोधन करीत होते. श्रीपादांचे स्मरण करून ते म्हणाले, " शंकरभट्टा, या सृष्टीच्या प्रारंभी पंचमहाभूतें निर्माण झाली. विधात्याने सर्वप्रथम या पंचमहाभूतांपासून हिरण्यगर्भ म्हणजेच प्राणांची निर्मिती केली. या प्राणमय कोशात स्थित असलेल्या जीवधातू शक्तीला शरीर असे म्हणतात. या ईश्वरी तत्त्वांचे आकलन करण्यासाठी ज्ञानेंद्रिये आणि ते जाणून योग्य कर्मे करण्यासाठी कर्मेंद्रिये यांची रचना झाली. शरीरातील प्रत्येक इंद्रियाची एक एक देवता असते. त्या त्या देवतेच्या प्रभावानेच ती इंद्रियें कार्यरत असतात. ही ५ ज्ञानेंद्रिये आणि ५ कर्मेंद्रिये यांचे नियंत्रण मन करत असते. साधकाने नेहेमीच सात्विक आहार घेतला पाहिजे. जसा आहार तसेच आपले विचार होतात. मनुष्याच्या कर्माचरणाचे मूळ कारण अहंकार होय. थोडक्यांत मनुष्यांस कर्मानुसारच फलप्राप्ती होत असते. अर्थात मन प्रसन्न आणि संतुलित असल्यास अहंकार शेष राहत नाही. अशा साधकाच्या ध्यानादि उपासना, मंत्र, इतर कर्मे सत्वर फलित होतात आणि तो मुक्तावस्था पावून परब्रह्मात लीन होतो. या शरीरांत प्राण, विश्वास, आकाश, वायु, अग्नी, जल, भूमी, इंद्रिये, मन, अन्न, बल, विचार, मंत्र, कर्म, लोक, लोकांतील विविध नावे अशा सोळा कळा असतात. अहंकार पूर्णपणे नामशेष झाल्यावरच आत्मसाक्षात्कार होतो, त्यावेळी ह्या सोळा कला आपल्या मूलतत्वांत विलीन होतात आणि आत्मज्ञान ब्रह्मस्वरूपात लीन होते. आत्मसाक्षात्कारी योग्यांस जन्मांतरांचे कर्मफळ शेष राहत नाही. हेच थोर सिद्ध योगीमुनी आपल्यासारख्या मुमुक्षांस त्या परमात्म्याच्या दिव्य लीलांचे दर्शन घडवतात. मात्र एखाद्या योग्यास जर आपल्या योगशक्तीचा अहंकार झाला तर तो परमात्मा पुन्हा एकदा तो अहंकार नष्ट करून त्यास आत्मोन्नतीचा योग्य मार्ग दाखवितो. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी या सकल षोडश कलांनी परिपूर्ण असे परब्रह्म आहेत.

पूर्वी, आईनविल्ली येथे संपन्न झालेल्या महायज्ञांत श्रीवरसिद्धी विनायक म्हणजेच महागणपती प्रगट झाले होते. त्यावेळी, त्या परब्रह्माने श्री बापन्नार्यांना एक विशेष कार्य करण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार, श्री बापन्नार्यांच्या अध्वर्यत्वाने श्रीशैल्यास सूर्यमंडळातील तेजाचा शक्तिपात झाला होता. त्या दिवशीच गोकर्ण क्षेत्री, काशीमध्ये, बदरी आणि केदार या क्षेत्रीदेखील एकाच वेळी त्या परमात्म्याच्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात झाला होता. श्री दत्तप्रभूंनी घेतलेला हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार आणि हा शक्तीपात ह्या दोन अत्यंत अनाकलनीय अशा दैवी घटना आहेत.

श्री दत्तात्रेय या विश्वाचे चालक, नियंते असून मोक्षदाते आहेत. त्यांच्यापासून त्रिमूर्ती आणि या त्रिमूर्तींपासून तेहत्तीस कोटी देव-देवता उत्पन्न झाल्या. यास्तव, केवळ श्री दत्तात्रेयांचे नामस्मरण केले असता सर्व देवतांचे पूजन-अर्चन यांचा लाभ होतो. त्यांची आराधना करण्यासाठी केवळ त्यांच्या दिव्य पादुकांचे केलेले भावपूर्ण पूजनदेखील अपूर्व फळ देते. स्मरतां क्षणीच प्रसन्न होणाऱ्या या परब्रह्माचे वर्णन करण्यास मानवच काय तर सर्व देवता आणि ऋषीमुनींसुद्धा असमर्थ आहेत. ' मी माझ्या भक्तांचा उद्धार करणारच.' असे ब्रीद असलेल्या श्री दत्तप्रभूंस पुन्हा पुन्हा प्रणाम ! त्रिमूर्ती स्वरूपांतील श्रीदत्तप्रभूंची आराधना करतांना ब्रह्ममुखाचे ऋषीपूजन करावे. श्री विष्णुमुखाचे श्री सत्यनारायण व्रत व विष्णु सहस्त्रनाम आवर्तन करतांना अर्चन करावे. तर रुद्रमुखास, रुद्राभिषेकाने अभिषेक करावा. श्रीदत्तप्रभूंच्या ब्रह्ममुखाच्या जिव्हेवर विद्याधात्री सरस्वती वास करते. श्री विष्णूमुखाच्या वक्ष:स्थळी ऐश्वर्यप्रदायिनी लक्ष्मीचा वास आहे, तर रुद्रमुखाच्या वामभागी आदिशक्ती गौरीचा वास आहे. सृष्टीतील सकल स्त्री देवता शक्ती श्रीपादांच्या वामभागी आणि पुरुष देवता दक्षिण भागी विराजमान आहेत. तिरुपतीमधील सप्तगिरीवर अवतरलेले श्री वेंकटेश्वर स्वामी हे साक्षात श्री दत्तप्रभूच आहेत. पूर्व युगांत श्री दत्तात्रेयांनी सोळा अवतार घेतले होते. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : १) योगीराज, २) अत्रिवरद, ३) दिगंबरावधूत, ४) कालाग्निशमन, ५) योगीजन वल्लभ, ६) लीला विश्वंभर, ७) सिद्धराज, ८) ज्ञानसागर, ९) विश्वंभरावधूत, १०) मायामुक्तावधूत, ११) आदिगुरु, १२) संस्कारहीन शिवस्वरूप, १३) देवदेव, १४) दिगंबर, १५) दत्तावधूत, आणि १६) श्यामकमल लोचन.

श्रीहरी विष्णूंनी ज्यावेळी वामनावतार घेतला, साधारण त्याच सुमारास जन्मत: ब्रह्मज्ञानी असलेले महर्षी श्री वामदेव यांचा जन्म झाला होता. त्यांच्या जन्माचे वैशिष्ट्य असे की त्यांनी त्यांच्या मातेच्या गर्भातून दोनदा जन्म घेतला. श्रीपादप्रभूंचा जन्मदेखील असाच झाला होता. प्रथमतः ते केवळ ज्योती स्वरूपांत प्रगट झाले होते. त्यानंतर, देव-देवता, महायोगी, ऋषिगण आणि सिद्धपुरुष यांनी त्यांची प्रार्थना केली असता, मातेच्या गर्भातून ज्योतीरूपाने बाहेर येऊन पुन्हा गर्भस्थ झालेल्या श्रीपादप्रभूंनी भाद्रपद शुक्ल चतुर्थीस ( श्रीगणेश चतुर्थी ) अवतार घेतला. दोनदा जन्म झालेला हा महागणपतीरूपी श्री दत्तात्रेयांचा अवतार सकल षोडश कलांनी परिपूर्ण आणि पूर्ण ब्रह्मज्ञानी होता. श्रीपादप्रभूंचे जन्म नक्षत्र चित्रा आणि या नक्षत्राचा अधिपती अंगारक (मंगळ) आहे. त्यामुळे, चित्रा नक्षत्र असतांना केलेले श्रीपादांचे पूजन अत्यंत शुभदायक फळ देते.

पूर्वी समाजांत चतुर्वर्ण पद्धती अस्तित्वात होती. मात्र श्रीपाद प्रभूंनी ह्या वर्णाश्रमधर्माला व्यावहारिकदृष्ट्या व्यापक स्वरूप आणि नवी दृष्टी दिली. ब्राह्मणांनी वेदवचनांचे पालन करून ब्रह्मज्ञानप्राप्ती हेच आपले जीवनध्येय ठेवावे, तरच तो खरा ब्राह्मण होय. असे धर्मयुक्त आचरण न करता दुराचारी वर्तन करणाऱ्या ब्राह्मणाचे ब्राह्मतेज लय पावते आणि कर्मफलानुसार त्याचा पुढील जन्म चांडाळयोनींत होतो. त्याचप्रमाणे क्षत्रियाने क्षात्रधर्माचे पालन करावे. क्षत्रियाने ब्रह्मज्ञानाच्या आकांक्षेने निरंतर तपाचरण केल्यास त्यास ब्राह्मणत्व प्राप्त होते. ऋषी विश्वामित्र यांनी आपल्या कठोर तपश्चर्येनें ब्राह्मणत्व प्राप्त केले होते आणि जन्माने ब्राह्मण असणाऱ्या भगवान परशुरामांनी क्षात्रधर्म अंगिकारला. याच नियमानुसार, जन्मत: वैश्य अथवा शुद्र हेदेखील विहित कर्मे करून ब्रह्मज्ञानी होऊ शकतात. याचेच एक उदाहरण म्हणून तू माझ्याकडे बघ. मी केवळ एक रजक आहे, तरीही श्रीपाद प्रभूंच्या कृपेनें मलासुद्धा ब्रह्मज्ञान प्राप्त झाले नाही का ? केवळ एका विशिष्ट वर्णात आपला जन्म झाला म्हणजे आपला तोच वर्ण हा नियम नसून आपल्या आपल्या कर्माचरणावर आपला वर्ण ठरतो. इतकेच नव्हें, तर पुढील जन्मसुद्धा शेष कर्मफलानुसारच प्राप्त होतो.

त्यानंतर तिरुमलदासांनी कर्मफल मीमांसा याविषयी सविस्तर वर्णन केले. 'ह्या कर्मचक्रातून प्रत्यक्ष देवदेवताही मुक्त होऊ शकत नाही, आपले संचित कर्म भोगण्यासाठी त्यांना या पृथ्वीतलावर पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो.' हा सिद्धांत शंकरभट्टांना समजावून सांगताना त्यांनी अहिल्या, सीता, द्रौपदी, तारा, मंदोदरी या महापतिव्रता पंचकन्या आणि त्यांच्या पूर्वजन्मांचे रहस्य कथन केले. निरंतर श्रीपादांचे नामस्मरण अथवा ध्यान केले असता तो अवघा परिसर अतिशय शुभ आणि पवित्र स्पंदनाने भरून जातो. साधकांस तेथे अपूर्व अशा मनःशांतीचा अनुभव येतो. पीठिकापुरांतील ग्रामस्थांच्या जन्मांतरीच्या पुण्यकर्माचे फलित म्हणून श्री दत्तात्रेयांनी तेथे श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपांत अवतार घेतला. मात्र सद्गुणी, सदवर्तनी भाग्यवंतच त्यांचे खरे स्वरूप ओळखू शकले आणि मोक्षप्राप्ती, आत्मोन्नती करण्यास पात्र ठरले. एखादा अभक्त अनन्यभावानें अथवा आपल्या वर्तनाचा पश्चात्ताप होऊन श्रीपाद श्रीवल्लभांना शरण आल्यास, त्या करुणासागर प्रभूंनी नेहेमीच त्याचा उद्धार केला, त्यांस अभय दिले.

त्यावेळीं पीठिकापुरांत एका बालोन्मत्त अवधूताचे आगमन झाले. त्या सिद्धपुरुषाच्या मार्गदर्शनाने स्वयंभू श्री दत्ताची मूर्ती एका नदीत सापडली. लवकरच एका शुभ मुहूर्तावर त्या स्वयंभू दत्तात्रेयांची श्री आप्पलराज शर्मा आणि सुमती महाराणी या सद्गुणी दाम्पत्याच्या हस्ते विधीवत पुन:प्रतिष्ठापना झाली. त्याच दिवशी श्री बापन्नार्य यांनी त्या अवधूतांस आपल्या घरी भिक्षेस येण्याची प्रार्थना केली. ते सिद्धपुरुष भिक्षेसाठी त्यांच्या घरी आले असता, त्यांना श्रीपाद स्वामींचे दर्शन झाले. केवळ दोन वर्षाच्या त्या तेजस्वी बालकास पाहिल्यावर त्या अवधूतांच्या मनात पुत्रवात्सल्य उत्पन्न झाले आणि त्यांची समाधी लागली. तेव्हा, " माधवा, मी सोळा वर्षाचा झाल्यावर हरिहर-बुक्कराय हिंदू साम्राज्याची स्थापना करेल. त्याच्या दरबारांत तू विद्यारण्य महर्षि या नावाने प्रख्यात होशील. पुढील शतकांत तू तुझ्या सहोदराच्या वंशात राजर्षी गोविंद दिक्षित म्हणून जन्म घेशील आणि तंजावूर संस्थानाचा विद्वान महामंत्री होशील." असा श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यास कृपादृष्टांत दिला. श्रीपादांचे हे आशीर्वचन ऐकून त्या अवधूताचे अष्टभाव जागृत झाले, त्याने तुष्ट चित्ताने बाळ श्रीपादांना आपल्याजवळ घेतले. इतक्यात, श्रीपादांनी त्या सिद्धास साष्टांग नमन केले. प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी नमस्कार केल्यामुळे दिग्मूढ झालेल्या त्या अवधूतास पाहून श्रीपाद आपल्या मधुर वाणींत बोलू लागले, " त्या पुढचा तुझा जन्म शृंगेरी पीठाधिपती म्हणून होईल. तुझे नाव विद्यारण्य असेल आणि तू पुन्हा तुझ्याच शिष्यपरंपरेत कृष्ण सरस्वती म्हणून जन्म घेशील. तुझ्या मनांत माझ्याविषयीं पुत्रवात्सल्यभाव निर्माण झाला आहे. या कारणास्तव, तू कृष्णसरस्वती होऊन मला माझ्या पुढील नृसिंहसरस्वती नामक अवतारात काशी क्षेत्रीं संन्यास दीक्षा देशील. त्यावेळीं श्री काशी विश्वेश्वर आणि माता अन्नपूर्णा यांचा आशीर्वाद प्राप्त होईल. " श्रीपादांची ही भविष्यवाणी ऐकून त्या सिद्धपुरुषाने त्यांना मनोमन वंदन केले. त्या अवधूताच्या अनंत जन्मांची पुण्याई जणू फळाला आली आणि त्याला प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचे दर्शन आणि कृपाशिर्वाद यांचा लाभ झाला.

त्या पीठिकापुरांत श्रीपाद श्रीवल्लभ नामक केवळ दोन वर्षाच्या बालकरूपांत असलेल्या श्री दत्तप्रभूंनी अगणित बाललीला केल्या आणि आपल्या भक्तांना आपण षोडश कलांनी परिपूर्ण असा महा-अवतार असल्याची वारंवार प्रचिती दिली. इथपर्यंतची कथा सांगून तिरुमलदास शंकरभट्टांस म्हणाले, " आज आपण इथेच थांबू. उद्या पुन्हा मी तुला श्रीपाद श्रीवल्लभांच्या आणखी लीला, चरित्र कथा सांगेन. " श्रीपाद श्रीवल्लभांचे हे दिव्य चरित्र त्यांच्याच निस्सीम भक्ताकडून ऐकण्याचा हा अपूर्व योग आपल्यास लाभला, हे आपले सद्भाग्यच आहे, असा विचार शंकरभट्टांच्या मनीं आला. आपल्यावर सतत अशीच स्वामींची कृपादृष्टी रहावी, अशी प्रार्थना करीत ते लवकरच निद्राधीन झाले.

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय फलश्रुती - संतान प्राप्ती, श्री कृपा, ऐश्वर्य लाभ