Feb 28, 2022

श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा - महाशिवरात्री माहात्म्य


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय

जेथें सर्वदा शिवस्मरण । तेथें भुक्ति मुक्ति सर्वकल्याण । नाना संकटें विघ्ने दारुण । न बाधती कालत्रयीं ॥१॥ संकेतें अथवा हास्येंकरुन । भलत्या मिसें घडो शिवस्मरण । न कळतां परिसासी लोह जाण । संघटतां सुवर्ण करी कीं ॥२॥ न कळतां प्राशिलें अमृत । परी अमर करी की यथार्थ । औषधी नेणतां भक्षित । परी रोग सत्य हरी कीं ॥३॥ शुष्कतृणपर्वत अद्भुत । नेणतां बाळक अकस्मात । अग्निस्फुलिंग टाकीत । परी भस्म यथार्थ करी कीं ॥४॥ तैसें न कळतां घडे शिवस्मरण । परी सकळ दोषां होय दहन । अथवा विनोदेंकरुन । शिवस्मरण घडो कां ॥५॥ हे कां व्यर्थ हांका फोडिती । शिव शिव नामें आरडती । अरे कां हे उगे न राहती । हरहर गर्जती वेळोवेळां ॥६॥ शिवनामाचा करिती कोल्हाळ । माझें उठविलें कपाळ । शिव शिव म्हणतां वेळोवेळ । काय येतें यांच्या हाता ॥७॥ ऐसी हेळणा करी क्षणोक्षणीं । परी उमावल्लभनाम ये वदनीं । पुत्रकन्यानामेंकरुनी । शिवस्मरण घडो कां ॥८॥ महाप्रीतीनें करितां शिवस्मरण । आदरें करितां शिवध्यान । शिवस्वरुप मानूनि ब्राह्मण । संतर्पण करी सदां ॥९॥ ऐसी शिवी आवडी धरी । त्याहीमाजी आली शिवरात्री । उपवास जागरण करी । होय बोहरी महत्पापा ॥१०॥ ते दिवशीं बिल्वदळें घेऊन । यथासांग घडलें शिवार्चन । तरी सहस्त्रजन्मींचे पाप संपूर्ण । भस्म होऊनी जाईल ॥११॥ नित्य बिल्वदळें शिवासी वाहत । त्याएवढा नाहीं पुण्यवंत । तो तरेल हें नवल नव्हे सत्य । त्याच्या दर्शनें बहुत तरती ॥१२॥ प्रातःकाळी घेतां शिवदर्शन । यामिनीचें पाप जाय जळोन । पूर्वजन्मींचें दोष गहन । माध्याह्नीं दर्शन घेतां नुरती ॥१३॥ सायंकाळीं शिव पाहतां सप्रेम । सप्तजन्मींचें पाप होय भस्म । शिवरात्रीचा महिमा परम । शेषही वर्णू शकेना ॥१४॥ कपिलाषष्ठी अर्धोदय संक्रमण । महोदय गजच्छाया ग्रहण । इतुकेही पर्वकाळ ओंवाळून । शिवरात्रीवरुन टाकावे ॥१५॥ शिवरात्री आधींच पुण्यदिवस । त्याहीवरी पूजन जागरण विशेष । त्रिकाळपूजा आणि रुद्रघोष । त्याच्या पुण्यासी पार नाहीं ॥१६॥ वसिष्ठ विश्वामित्रादि मुनीश्वर । सुरगण गंधर्व किन्नर । सिद्ध चारण विद्याधर । शिवरात्रिव्रत करिताती ॥१७॥ यदर्थीं सुरस कथा बहुत । शौनकादिकां सांगे सूत । ती श्रोतीं ऐकावी सावचित्त । अत्यादरें करुनियां ॥१८॥ तरी मासामाजी माघमास । ज्याचा व्यास महिमा वर्णी विशेष । त्याहीमाजी कृष्णचतुर्दशीस । मुख्य शिवरात्र जाणिजे ॥१९॥ विंध्याद्रिवासी एक व्याध । मृगपक्षिघातक परमनिषिद्ध । महानिर्दय हिंसक निषाद । केले अपराध बहुत तेणें ॥२०॥ धनुष्यबाण घेऊनि करीं । पारधीस चालिला दुराचारी । पाश वागुरा कक्षेसी धरी । कवच लेत हरितवर्ण ॥२१॥ करीं गोधांगुलित्राण । आणिकही हातीं शस्त्रसामुग्री घेऊन । काननीं जातां शिवस्थान । शोभायमान देखिलें ॥२२॥ तंव तो शिवरात्रीचा दिन । यात्रा आली चहूंकडून । शिवमंदिर शृंगारुन । शोभा आणिली कैलासींची ॥२३॥ शुद्धरजततगटवर्ण । देवालय झळके शोभायमान । गगनचुंबित ध्वज पूर्ण । रत्नजडित कळस तळपताती ॥२४॥ मध्यें मणिमय शिवलिंग । भक्त पूजा करिती सांग । अभिषेकधारा अभंग । विप्र धरिती रुद्रघोषें ॥२५॥ एक टाळ मृदुंग घेऊन । सप्रेम करिती शिवकीर्तन । श्रोते करटाळी वाजवून । हरहर शब्दें घोष करिती ॥२६॥ नाना परिमळद्रव्यसुवास । तेणें दशदिशा दुमदुमिल्या विशेष । लक्ष दीपांचे प्रकाश । जलजघोष घंटारव ॥२७॥ शशिमुखा गर्जती भेरी । त्यांचा नाद न माये अंबरीं । एवं चतुर्विध वाद्यें नानापरी । भक्त वाजविती आनंदें ॥२८॥ तों तेथें व्याध पातला । समोर विलोकी सर्व सोहळा । एक मुहूर्त उभा ठाकला । हांसत बोलिला विनोदे ॥२९॥ हे मूर्ख अवघे जन । येथें द्रव्य काय व्यर्थ नासोन । आंत दगड बाहेर पाषाण । देवपण येथें कैंचे ॥३०॥ उत्तम अन्न सांडून । व्यर्थ कां करिती उपोषण । ऐसिया चेष्टा करीत तेथून । काननाप्रती जातसे ॥३१॥ लोक नामें गर्जती वारंवार । आपणही विनोदें म्हणें शिव हरहर । सहज सव्य घालूनि शिवमंदिर । घोर कांतार प्रवेशला ॥३२॥ वाचेसी लागला तोचि वेध । विनोदें बोले शिव शिव शब्द । नामप्रतापें दोष अगाध । झडत सर्व चालिले ॥३३॥ घोरांदर सेवितां वन । नाढळतीच जीव लघुदारुण । तों वरुणदिग्वधूचें सदन । वासरमणि प्रवेशला ॥३४॥ निशा प्रवर्तली सबळ । कीं ब्रह्मांडकरंडां भरलें काजळ । कीं विशाळ कृष्णकंबळ । मंडप काय उभारिला ॥३५॥ विगतधवा जेवीं कामिनी । तेवीं न शोभे कदा यामिनी । जरी मंडित दिसे उडुगणीं । परी पतिहीन रजनी ते ॥३६॥ जैसा पंडित गेलिया सभेंतून । मूर्ख जल्पती पाखंडज्ञान । जेवीं अस्ता जाता सहस्त्रकिरण । उडुगणें मागें झळकती ॥३७॥ असो ऐसी निशा दाटली सुबुद्ध । अवघा वेळ उपवासी निषाद । तों एक सरोवर अगाध । दृष्टीं देखिलें शोधितां ॥३८॥ अनेक संपत्ती सभाग्यसदनीं । तेवीं सरोवरीं शोभती कुमुदिनी । तटीं बिल्ववृक्ष गगनीं । शोभायमान पसरला ॥३९॥ योगभ्रष्ट कर्मभूमीस पावती जनन । तेवीं बिल्व डहाळिया गगनींहून । भूमीस लागल्या येऊन । माजी रविशशिकिरण न दिसे ॥४०॥ त्यांत तम दाटलें दारुण । माजी बैसला व्याध जाऊन । शरासनीं शर लावून । कानाडी ओढोनि सावज लक्षी ॥४१॥ दृष्टीं बिल्वदळें दाटली बहुत । तीं दक्षिण हस्तें खुडोनि टाकीत । तों तेथें पद्मजहस्ते स्थापित । शिवलिंग दिव्य होतें ॥४२॥ त्यावरी बिल्वदळें पडत । तेणें संतोषला अपर्णानाथ । व्याधास उपवास जागरण घडत । सायास न करितां अनायासें ॥४३॥ वाचेसी शिवनामाचा चाळा । हर हर म्हणे वेळोवेळां । पापक्षय होत चालिला । पूजन स्मरण सर्व घडलें ॥४४॥ एक याम झालिया रजनी । तों जलपानालागीं एक हरिणी । आली तेथें ते गर्भिणी । परम सुकुमार तेजस्वी ॥४५॥ व्याध तिणें लक्षिला दुरुन । कृतांतवत परम दारुण । आकर्ण ओढिला बाण । देखोनिया हरिणी बोलतसे ॥४६॥ म्हणे महापुरुषा अन्यायाविण । कां मजवरी लाविला बाण । मी तव हरिणी आहे गर्भिण । वध तुवां न करावा ॥४७॥ उदरांत गर्भ सूक्ष्म अज्ञान । वधितां दोष तुज दारुण । एक रथभरी जीव वधिता सान । तरी एक बस्त वधियेला ॥४८॥ शत बस्त वधितां एक । वृषभहत्येचें पातक । शत वृषभ तैं गोहत्या देख । घडली शास्त्र वदतसे ॥४९॥ शत गोहत्यांचें पातक पूर्ण । एक वधिता होय ब्राह्मण । शत ब्रह्महत्येचें पातक जाण । एक स्त्री वधिलिया ॥५०॥ शत स्त्रियांहूनि अधिक । एक गुरुहत्येचे पातक । त्याहूनि शतगुणी देख । एक गर्भिण वधिलिया ॥५१॥ तरी अन्याय नसतां ये अवसरीं । मज मारिसी कां वनांतरीं । व्याध म्हणे कुटुंब घरीं । उपवासी वाट पहात ॥५२॥ मीही आजी निराहार । अन्न नाहींच अणुमात्र । परी मृगी होऊनि सुंदर । गोष्टी वदसी शास्त्रींच्या ॥५३॥ मज आश्चर्य वाटतें पोटीं । नराऐशा सांगसी गोष्टी । तुज देखोनियां दृष्टीं । दया हृदयीं उपजतसे ॥५४॥ पूर्वी तूं होतीस कोण । तुज एवढें ज्ञान कोठून । तूं विशाळनेत्री रुपलावण्य । सर्व वर्तमान मज सांगे ॥५५॥ मृगी म्हणे ते अवसरीं । पूर्वी मंथन करितां क्षीरसागरीं । चतुर्दश रत्नें काढिलीं सुरासुरीं । महाप्रयत्नें करुनियां ॥५६॥ त्यांमाजी मी रंभा चतुर । मज देखोनि भुलती सुरवर । नाना तपें आचरोनि अपार । तपस्वी पावती आम्हांतें ॥५७॥ म्यां नयनकटाक्षजाळें पसरुन । बांधिले निर्जरांचें मनमीन । माझिया अंगसुवासा वेधून । मुनिभ्रमर धांवती ॥५८॥ माझें गायन ऐकावया सुरंग । सुधापानीं धांवती कुरंग । मी भोगीं स्वर्गीचे दिव्य भोग । स्वरुपें न मानी कोणासी ॥५९॥ मद अंगीं चढला बहुत । शिवभजन टाकिलें समस्त । शिवरात्री सोमवार प्रदोषव्रत । शिवार्चन सांडिलें म्यां ॥६०॥ सोडोनियां सुधापान । करुं लागलें मद्यप्राशन । हिरण्यनामा दैत्य दारुण । सुर सोडोनि रतलें त्यासीं ॥६१॥ ऐसा लोटला काळ अपार । मृगयेस गेला तो असुर । त्या दुष्टासंगे अपर्णावर- । भजनपूजन विसरलें ॥६२॥ मनास ऐसें वाटलें पूर्ण । असुर गेला मृगयेलागुन । इतुक्यांत घ्यावें शिवदर्शन । म्हणोनि गेलें कैलासा ॥६३॥ मज देखतां हिमनगजामात । परम क्षोभोनि शाप देत । तूं परम पापिणी यथार्थ । मृगी होई मृत्युलोकीं ॥६४॥ तुझ्या सख्या दोघीजणी । त्या होतील तुजसवें हरिणी । हिरण्य असुर माझिये भजनीं । असावध सर्वदा ॥६५॥ तोही मृग होऊनि सत्य । तुम्हांसीच होईल रत । ऐक व्याधा सावचित्त । मग म्यां शिव प्रार्थिला ॥६६॥ हे पंचवदना विरुपाक्षा । सच्चिदानंदा कर्माध्यक्षा । दक्षमखदळणा सर्वसाक्षा । उःशाप देईं आम्हांतें ॥६७॥ भोळा चक्रवर्ती दयाळ । उःशाप वदला पयःफेनधवल । द्वादश वर्षें भरतां तात्काळ । पावाल माझिया पदातें ॥६८॥ मग आम्हीं मृगयोनीं । जन्मलों ये कर्मअवनीं । मी गर्भिणी आहें हरिणी । प्रसूतकाळ समीप असे ॥६९॥ तरी मी आपुल्या स्वस्थळा जावोन । सत्वर येतें गर्भ ठेऊन । मग तूं सुखें घेईं प्राण । सत्य वचन हें माझें ॥७०॥ ऐसी मृगी बोलली सावचित्त । त्यावरी तो व्याध काय बोलत । तूं गोड बोलसी यथार्थ । परी विश्वास मज न वाटे ॥७१॥ नानापरी असत्य बोलोन । करावें शरीराचें संरक्षण । हें प्राणिमात्रास आहे ज्ञान । तरी तूं शपथ वदे आतां ॥७२॥ महत्पापें उच्चारुन । शपथ वदें यथार्थ पूर्ण । यावरी ते हरिणी दीनवदन । वाहात आण ऐका ते ॥७३॥ ब्राह्मणकुळीं उपजोन । जो न करी वेदशास्त्राध्ययन । सत्यशौचवर्जित संध्याहीन । माझें शिरीं पातक तें ॥७४॥ एक वेदविक्रय करिती पूर्ण । कृतघ्न परपीडक नावडे भजन । एक दानासी करिती विघ्न । गुरु निंदाश्रवण एक करिती ॥७५॥ रमावर-उमावरांची निंदा । त्या पापाची मज होय आपदा । दान दिधलें जें ब्रह्मवृंदा । हिरोनी घेती माघारें ॥७६॥ एक यतिनिंदा करिती । एक शास्त्रें पहाती द्वैत निर्मिती । नाना भ्रष्टमार्ग आचरती । स्वधर्म आपुला सांडूनियां ॥७७॥ देवालयामाजी जाऊनी । हरिकथापुराणश्रवणीं । जे बैसती विडा घेउनी । ते कोडी होती पापिये ॥७८॥ जे देवळांत करिती स्त्रीसंभोग । कीं स्त्री-भ्रतारांसी करिती वियोग । ते नपुसंक होवोनि अभाग्य । उपजती या जन्मीं ॥७९॥ वर्मकर्में निंदा करीत । तो जगपुरीषभक्षक काग होत । शिष्यांसी विद्या असोनि न सांगत । तो पिंगळा होत निर्धारें ॥८०॥ अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती । त्यानिमित्तें गंडमाळा होती । परक्षेत्रींच्या गाई वळोनि आणिती । ते अल्पायुषी होती या जन्मीं ॥८१॥ जो राजा करी प्रजापीडण । तो या जन्मीं व्याघ्र कां सर्प होय दारुण । वृथा करी साधुछळण । निर्वंश पूर्ण होय त्याचा ॥८२॥ स्त्रिया व्रतनेम करीत । भ्रतारासी अव्हेरित ।  धनधान्य असोनि वंचित । त्या वाघुळा होती या जन्मीं ॥८३॥ पुरुष कुरुप म्हणोनियां त्यागिती । त्या या जन्मीं बालविधवा होती । तेथेंही जारकर्म करिती । मग त्या होती वारांगना ॥८४॥ ज्या भ्रतारासी निर्भर्त्सिती । त्या दासी किंवा कुलटा होती । सेवक स्वामीचा द्रोह करिती । ते जन्मा येती श्वानाच्या ॥८५॥ सेवकापासून सेवा घेऊन । त्याचें न दे जो वेतन । तो अत्यंत भिकारी होऊन । दारोदारीं हिंडतसे ॥८६॥ स्त्री-पुरुष गुज बोलतां । जो जाऊनि ऐके तत्वतां । त्याची स्त्री दुरावे हिंडतां । अन्न न मिळे तयातें ॥८७॥ जे जारण मारण करिती । ते भूत प्रेत पिशाच्च होती । यती उपवासें पीडिती । त्यांतें दुष्काळ जन्मवरी ॥८८॥ स्त्री रजस्वला होऊनी । गृही वावरे जे पापिणी । पूर्वज रुधिरीं पडती पतनीं । त्या गृही देव-पितृगण न येती ॥८९॥ जे देवाच्या दीपाचें तेल नेती । ते या जन्मीं निपुत्रिक होती । ज्या रांधितां अन्न चोरोनी भक्षिती । त्या मार्जारी होती या जन्मीं ॥९०॥ ब्राह्मणांस कदन्न घालून । आपण भक्षिती षड्रसपक्वान्न । त्यांचे गर्भ पडती गळोन । आपुलिया कर्मवशें ॥९१॥ जो मातापित्यांसी शिणवीत । तो ये जन्मीं मर्कट होत । सासू-श्वशुरां स्नुषा गांजीत । तरी बाळक न वांचे तियेचें ॥९२॥ मृगी म्हणे व्याधालागून । जरी मी न ये परतोन । तरी ही महत्पापें संपूर्ण । माझ्या माथां बैसोत ॥९३॥ हे मिथ्या गोष्ट होय साचार । तरी घडो शिवपूजेचा अपहार । ऐसी शपथ ऐकतां निर्धार । व्याध शंकला मानसीं ॥९४॥ म्हणे पतिव्रते जाई आतां । सत्वर येईं निशा सरतां । हरिणी म्हणे शिवपदासी तत्वतां । पुण्यवंता जाशील ॥९५॥ उदकपान करोनि वेगीं । निजाश्रमा गेली ते कुरंगी । इकडे व्याध दक्षिणभागीं । टाकी बिल्वदळें खुडूनियां ॥९६॥ दोन प्रहर झाली यामिनी । द्वितीय पूजा शिवें मानूनी । अर्धपाप जळालें मुळींहुनी । सप्तजन्मींचें तेधवा ॥९७॥ नामीं आवड जडली पूर्ण । व्याध करी शिवस्मरण । मृगीमुखें ऐकिलें निरुपण । सहज जागरण घडलें तया ॥९८॥ तों दुसरी हरिणी अकस्मात । पातली तेथें तृषाक्रांत । व्याधें बाण ओढितां त्वरित । करुणा भाकी हरिणी ते ॥९९॥ म्हणे व्याधा ऐक ये समयीं । मज कामानळें पीडीलें पाहीं । पतीसी भोग देवोनि लवलाही । परतोनि येतें सत्वर ॥१००॥ व्याध आश्चर्य करी मनांत । म्हणे शपथ बोलोनी जाई त्वरित। धन्य तुमचें जीवित्व । सर्व शास्त्रार्थ ठाऊका ॥१०१॥ वापी तडाग सरोवर । जो पतित मोडी देवागार । गुरुनिंदक मद्यपानीं दुराचार । तीं पापें समग्र मस्तकीं माझ्या ॥१०२॥ महाक्षत्रिय आपण म्हणवित । समरांगणीं मागें पळत । वृत्ति हरी सीमा लोटीत । ग्रंथ निंदित महापुरुषांचे ॥१०३॥ वेदशास्त्रांची निंदा करी । संत-भक्तांसीं द्वेष धरी । हरि-हर चरित्रें अव्हेरी । माझें शिरीं तीं पापें ॥१०४॥ धनधान्य असोनि पाहीं । पतीलागीं शिणवी म्हणे नाहीं । पति सांडोनि निजे परगृहीं । तीं पापें माझिया माथां ॥१०५॥ पुत्र स्नुषा सन्मार्ग वर्ततां । त्यांसी व्यर्थचि गांजिती जे न पाहता । ते कुरुप होती तत्वतां । हिंडतां भिक्षा न मिळेचि ॥१०६॥ बंधु-बंधु जे वैर करिती । ते या जन्मीं मत्स्य होती । गुरुचें उणें जे पाहती । त्यांची संपत्ती दग्ध होय ॥१०७॥ जे मार्गस्थांचीं वस्त्रें हरिती । ते अतिशूद्र प्रेतवस्त्रें पांघरती । आम्ही तपस्वी म्हणोनियां अनाचार करिती । ते घुले होती मोकाट ॥१०८॥ दासी स्वामीची सेवा न करी । ती ये जन्मीं होय मगरी । जो कन्याविक्रय करी । हिंसकयोनीं निपजे तो ॥१०९॥ स्त्री भ्रताराची सेवा करीत । तीस जो व्यर्थचि गांजित । त्याचा गृहभंग होत । जन्मजन्मांतरीं न सुटे ॥११०॥ ब्राह्मण करी रसविक्रय । घेतां देतां मद्यपी होय । जो ब्रह्मवृंदा अपमानिताहे । तो होय ब्रह्मराक्षस ॥१११॥ एकें उपकार केला । जो नष्ट नाठवी त्याला । तो कृतघ्न जंत झाला । पूर्वकर्में जाणिजे ॥११२॥ विप्र श्राद्धीं जेवुनी । स्त्रीभोग करी ते दिनीं । तो श्वानसूकरयोनीं । उपजेल निःसंशयें ॥११३॥ व्यवहारी दहांत बैसोन । खोटी साक्ष देई गर्जोन । पूर्वज नरकीं पावती पतन । असत्य साक्ष देतांचि ॥११४॥ दोघी स्त्रिया करोन । एकीचेंच राखी जो मन । तो गोचिड होय जाण । सारमेयशरीरीं ॥११५॥ पूर्वजन्मीं कोंडी उदक । त्याचा मळमूत्रनिरोध देख । करितां साधुनिंदा आवश्यक । सत्वरदंत भग्न होती ॥११६॥ देवालयीं करी भोजन । तरी ये जन्मीं होय क्षीण । पृथ्वीपतीची निंदा करितां जाण । उदरीं मंदाग्नि होय पैं ॥११७॥ ग्रहणसमयीं करी भोजन । त्यासी पित्तरोग होय दारुण । परबाळें विकी परदेशीं नेऊन । तरी सर्वांगी कुष्ठ भरे ॥११८॥ जी स्त्री करी गर्भपातन । ती उपजे वंध्या होऊन । देवालय टाकी पाडोन । तरी अंगभंग होय त्याचा ॥११९॥ अपराधाविण स्त्रीसी गांजिता हे । त्याचें ये जन्मीं एक अंग जाये । ब्राह्मणाचे अन्न हरिती पापिये । त्यांचा वंश न वाढे कधीं ॥१२०॥ गुरु संत माता पिता । त्यांसी होय जो निर्भत्सिता । तरी वाचा जाय त्तवतां । अडखळे बोलतां क्षणक्षणां ॥१२१॥ जो ब्राह्मणांसी दंड मारी । त्यासी व्याधितिडका लागती शरीरीं । जो संतांसी वादविवाद करी । दीर्घ दंत होती त्याचे ॥१२२॥ देवद्वारींचे तरुवर । अश्वत्थादि वृक्ष साचार । तोडितां पांगुळ होय निर्धार । भिक्षा न मिळे हिंडता ॥१२३॥ जो सूतकअन्न भक्षित । त्याचे उदरी नाना रोग होत । आपणचि परिमळद्रव्य भोगी समस्त । तरी दुर्गंधी सत्य सर्वांगीं ॥१२४॥ ब्राह्मणाचे ऋण न देतां । तरी बाळपणीं मृत्यु पावे पिता । जलवृक्षछाया मोडितां । तरी एकही स्थळ न मिळे त्यातें ॥१२५॥ ब्राह्मणासी आशा लावून । चाळवी नेदी कदा दान । तो ये जन्मी अन्न अन्न । करीत हिंडे घरोघरीं ॥१२६॥ जो पुत्रद्वेष करीत । आणि दरिद्रियाचें लग्न मोडित । तरी स्त्रीसी सल राहे पोटांत । वंध्या निश्चित संसारीं ॥१२७॥ जेणें ब्राह्मण बांधिले निग्रहून । त्यासी सांडसें तोडी सूर्यनंदन । जो नायके कथाग्रंथ पावन । बधिर होय जन्मोजन्मीं ॥१२८॥ जो पीडी माता-पितयांस । त्याचा सर्वदा होई कार्यनाश । एकास भजे निंदी सर्व देवांस । तरी एकचि पुत्र होय त्यासी ॥१२९॥ जो चांडाळ गोवध करी । त्यासी मिळे कर्कशा नारी । वृषभ वधितां निर्धारीं । शतमूर्ख पुत्र होय त्यासी ॥१३०॥ उदकतृणेंविण पशु मारीत । तरी मुक्याच प्रजा होती समस्त । जो पतिव्रतेसी भोगूं इच्छित । तरी कुरुप नारी कर्कशा मिळे ॥१३१॥ जो पारधी बहु जीव संहारी । तो फेंपरा होय संसारीं । गुरुचा त्याग जो चांडाळ करी । तो उपजतांचि मृत्यु पावे ॥१३२॥ नित्य अथवा रविवारी मुतें रवीसमोर । त्याचे बाळपणीं दंत भग्न केश शुभ्र । जे मृत बाळासाठीं रुदती निर्धार । त्यांस हांसतां निपुत्रिक होय ॥१३३॥ हरिणी म्हणे व्याधालागून । मी सत्वरी येतें पतीसी भोग देऊन । न ये तरी हीं पापें संपूर्ण । माझ्या माथां बैसोत पैं ॥१३४॥ व्याध मनांत शंकोन । म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान । सत्वर येईं गृहासी जाऊन । सत्य संपूर्ण सांभाळीं ॥१३५॥ जलपान करोनि वेगीं । आश्रमा गेली ते कुरंगी । तो मृगराज तेच प्रसंगीं । जलपानार्थ पातला ॥१३६॥ व्याधें ओढिला बाण । तों मृग बोले दीनवदन । म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण । त्यांसी पुसोन येतों मी ॥१३७॥ शपथ ऐकें त्वरित । कीर्तन करिती प्रेमळ भक्त । तो कथारंग मोडितां निर्वंश होत । पाप सत्य मम माथां ॥१३८॥ ब्रह्मकर्म वेदोक्त । शुद्र निजांगें आचरत । तो अधम नरकीं पडत । परधर्म आचरतां ॥१३९॥ तीर्थयात्रेसी विघ्नें करी । वाटपाडी वस्त्र द्रव्य हरी । तरी सर्वांगीं व्रण अघोरीं । नरकीं पडे कल्पपर्यंत ॥१४०॥ शास्त्रकोशीं नाहीं प्रमाण । कूटकविता करी क्षुद्र लक्षून । हरिती ब्राह्मणांचा मान । तरी संतान तयांचें न वाढे ॥१४१॥ हरिदिनीं शिवदिनीं उपोषण । विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण । तरी हस्त पाद क्षीण । होती त्याचे निर्धारें ॥१४२॥ एक शिवहरीप्रतिमा फोडिती । एक भगवद्भक्तां विघ्नें करिती । एक शिवमहिमा उच्छेदिती । नरकीं होती कीटक ते ॥१४३॥ मातृद्रोही त्यासी व्याधी भरे । पितृद्रोही पिशाच विचरे । गुरुद्रोही तत्काळ मरे । भूतप्रेतगणीं विचरे तो ॥१४४॥ विप्र आहार बहुत जेविती । त्यांसी जो हांसे दुर्मती । त्याचे मुखीं अरोचकरोग निश्चिती । न सोडिती जन्मवरी ॥१४५॥ एक गोविक्रय करिती । एक कन्याविक्रय अर्जिती । ते नर मार्जार मस्त होती । बाळें भक्षिती आपुलीं ॥१४६॥ जो कन्या भगिनी अभिलाषी । कामदृष्टीं न्याहाळी पतिव्रतेसी । प्रमेहरोग होय त्यासी । कीं खडा गुह्यांत दाटत ॥१४७॥ प्रासादभंग लिंगभंग करी । देवांचीं उपकरणें अलंकार चोरी । देवप्रतिष्ठा अव्हेरी । पंडुरोग होय ॥१४८॥ एक मित्रद्रोह विश्वासघात करिती । मातृपितृहत्या गुरुसी संकटीं पाडिती । ब्रह्मवध गोवध न वारिती । अंगी सामर्थ्य असोनियां ॥१४९॥ ब्राह्मण बैसवोनि बाहेरी । उत्तमान्न जेविती गृहांतरीं । सोयर्‍ऱ्यांची प्रार्थना करी । संग्रहणी पोटशूळ होती तया ॥१५०॥ एक कर्मभ्रष्ट पंचयज्ञ न करिती । एक ब्राह्मणांची सदनें जाळिती । एक दीनासी मार्गी नागविती । एक संतांचा करिती अपमान ॥१५१॥ एक करिती गुरुछळण । एक म्हणती पाहों याचें लक्षण । नाना दोष आरोपिती अज्ञान । त्यांचें संतान न वाढे ॥१५२॥ जो सदा पितृद्वेष करी । जो ब्रह्मवृदांसी अव्हेरी । शिवकीर्तन ऐकतां  त्रासे अंतरी । तरी पितृवीर्य नव्हे तो ॥१५३॥ शिवकीर्तनीं नव्हे सादर । तरी कर्णमूळरोग निर्धार । नसत्याच गोष्टी जल्पे अपार । तों दर्दुर होय निर्धारें ॥१५४॥ शिवकीर्तन किंवा पुराणश्रवण । तेथें शयन करितां सर्प होय दारुण । एक अतिवादक छळक जाण । ते पिशाचयोनी पावती ॥१५५॥ एकां देवार्चनीं वीट येत । ब्राह्मण पूजावया कंटाळत । तीर्थप्रसाद अव्हेरीत । त्यांच्या आखुडती अंगशिरा ॥१५६॥ मृग म्हणे ऐसीं पापें अपार । मम मस्तकीं होईल परम भार । मग पारधी म्हणे सत्वर । जाई स्वस्थाना मृगवर्या ॥१५७॥ व्याध शिवनामें गर्जे ते क्षणीं । कंठ सद्गदित अश्रु नयनीं । मागुती बिल्वदळें खुडोनी । शिवावरी टाकीतसे ॥१५८॥ चौंप्रहरांच्या पूजा चारी । संपूर्ण झाल्या शिवजागरीं । सप्तजन्मींचीं पापें निर्धारीं । मुळींहूनी भस्म झालीं ॥१५९॥ तों पूर्वदिशा मुख प्रक्षाळित । सुपर्णाग्रज उदय पावत । आरक्तवर्ण शोभा दिसत । तेंचि कुंकुम प्राचीचें ॥१६०॥ तों तिसरी मृगी आली अकस्मात । व्याध देखिला कृतांतवत । म्हणे मारुं नको मज यथार्थ । बाळासी स्तन देऊन येतें मी ॥१६१॥ व्याध अत्यंत हर्षभरित । म्हणे ही काय बोलेल शास्त्रार्थ । तो ऐकावया म्हणत । शपथ करुनि जाय तूं ॥१६२॥ यावरी मृगी म्हणे व्याधा ऐक । जो तृणदाहक ग्रामदाहक । गो ब्राह्मणांचें कोंडी उदक । क्षयरोग त्यासी न सोडी ॥१६३॥ ब्राह्मणांची सदनें हरिती देख । त्यांचे पूर्वज रौरवीं पडती निःशंक । मातृ-पुत्रां बिघडती एक । स्त्रीपुरुषां बिघड पाडिती ॥१६४॥ देवब्राह्मण देखोन । खालती न करिती कदा मान । निंदिती बोलती कठोर वचन । यम करचरण छेदी तयांचे ॥१६५॥ परवस्तु चोरावया देख । अखंड लाविला असे रोख । साधुसन्मानानें मानी दुःख । त्यासी नेत्ररोगतिडका न सोडिती ॥१६६॥ पुस्तकचोर ते मुके होती । रत्नचोरांचे नेत्र जाती । अत्यंत गर्वी ते महिष होती । पारधी निश्चिती श्येनपक्षी ॥१६७॥ भक्तांची जो निंदा करीत । त्याचे मुखीं दुर्गंधी घाणित । जो माता-पितयांसी ताडित । लुला होत यालागीं ॥१६८॥ जो अत्यंत कृपण । धन न वेंची अणुप्रमाण । तो महाभुजंग होऊन । धुसधुसीत बैसे तेथें ॥१६९॥ भिक्षेसी यतीश्वर आला । तो जेणें रिता दवडिला । शिव त्यावरी जाण कोपला । संतति संपत्ति दग्ध होय ॥१७०॥ ब्राह्मण बैसला पात्रावरी । उठवूनि घातला बाहेरी । त्याहूनियां दुराचारी । दुसरा कोणी नसेचि ॥१७१॥ ऐसा धर्माधर्म ऐकोन । पारधी सद्गद बोले वचन । स्वस्थळा जाई जलपान करोन । बाळांसी स्तन देऊन येईं ॥१७२॥ ऐसें ऐकोनि मृगी लवलाह्या । गेली जलप्राशन करुनियां । बाळें स्तनीं लावूनियां । तृप्त केलीं तियेनें ॥१७३॥ वडील झाली प्रसूत । दुसरी पतीची कामना पुरवित । मृगराज म्हणे आतां त्वरित। जाऊं चला व्याधापासीं ॥१७४॥ मृग पाडसांसहित सर्वही । व्याधापासीं आली लवलाही । मृग म्हणे ते समयीं । आधीं मज वधी पारधिया ॥१७५॥ मृगी म्हणे हा नव्हे विधी । आम्हीं जाऊं पतीच्या आधीं । पाडसें म्हणती त्रिशुद्धी । आम्हांसी वधीं पारधिया ॥१७६॥ त्यांचीं वचनें ऐकतां ते क्षणीं । व्याध सद्गद झाला मनीं । अश्रुधारा लोटल्या नयनीं । लागे चरणीं तयांच्या ॥१७७॥ म्हणे धन्य जिणें माझे झालें । तुमचेनि मुखें निरुपण ऐकिलें । बहुतां जन्मींचे पाप जळालें । पावन केले शरीर ॥१७८॥ माता पिता गुरु देव । तु्म्हीच आतां माझे सर्व । कैंचा संसार मिथ्या वाव । पुत्रकलत्र सर्व लटकें ॥१७९॥ व्याध बोले प्रेमेंकरुन । आतां कधीं मी शिवपद पावेन । तों अकस्मात आलें विमान । शिवगण बैसले त्यावरी ॥१८०॥ पंचवदन दशभुज । व्याघ्रांबर नेसलें महाराज । अद्भुत तयांचे तेज । दिक्चक्रामाजी न समाये ॥१८१॥ दिव्य वाद्यें वाजविती किन्नर । आलाप करिती विद्याधर । दिव्य सुमनांचे संभार । सुरगण स्वयें वर्षती ॥१८२॥ मृगें पावली दिव्य शरीर । व्याध करी साष्टांग नमस्कार । मुखें म्हणे जय जय शिव हर हर । तों शरीरभाव पालटला ॥१८३॥ परिसीं झगडतां लोह होय सुवर्ण । तैसा व्याध झाला दशभुज पंचवदन । शिवगणीं बहुत प्रार्थून । दिव्य विमानीं बैसविला ॥१८४॥ मृगें पावलीं दिव्य शरीर । तींही विमानीं आरुढली समग्र । व्याधाची स्तुती वारंवार । करिती सुरगण सर्वही ॥१८५॥ व्याध नेला शिवपदाप्रती । तारामंडळी मृगें राहती । अद्यापि गगनीं झळकती । जन पाहती सर्व डोळां ॥१८६॥ सत्यवतीहृदयरत्नखाणी । रसभरित बोलिला लिंगपुराणीं । तें सज्जन ऐकोत दिनरजनीं । ब्रह्मानंदेकरुनियां ॥१८७॥ धन्य ते शिवरात्रीव्रत । श्रवणें पातक दग्ध होत । जे हें पठण करिती सावचित्त । धन्य पुण्यवंत नर तेचि ॥१८८॥ सज्जन श्रोते निर्जर सत्य । प्राशन करोत शिवलिलामृत । निंदक असुर कुतर्कीं बहुत । त्यांसी प्राप्त कैचें हे ॥१८९॥ कैलासनाथ ब्रह्मानंद । तयाचें पदकल्हार सुगंध । तेथें श्रीधर अभंग षट्पद । रुंजी घालीत शिवनामें ॥१९०॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सज्जन अखंड । द्वितीयाध्याय गोड हा ॥१९१॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥


Feb 20, 2022

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी ४६ ते ५०


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥


तेथून प्रगट भुवन । मग उद्धरु धरा जाण । धर्माते वाढवून | तोडू बंधन कलीचे ॥४६॥ ऐशी ध्वनी निर्धार । गर्जला गुरु दिगंबर । सर्व देवी केला नमस्कार । आनंद थोर प्रगटला ॥४७॥ या भूतलावर जेव्हा धर्माचा ऱ्हास होऊ लागतो, त्यावेळीं संत-सज्जनांचे रक्षण करण्यासाठी, जीवमात्रांचे दुःख दूर करून त्यांना सुखी करण्यासाठी, त्यांना भक्तिमार्गाकडे वळविण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. श्रीशैल्य यात्रेच्या वेळी अदृश्य झालेले श्रीनृसिंहसरस्वती सुमारे तीनशे वर्षे समाधी अवस्थेत राहिले आणि श्री स्वामी समर्थ म्हणून पुन्हा एकदा अवतरित झाले. असंख्य संसारी जीवांना आत्मकल्याणाचा मार्ग दाखविणे, धर्माची अधोगती थोपवून कलीच्या प्रभावांतून सामान्य जनांस मुक्त करणे हेच आपले अवतारकार्य आहे, असे श्री गुरूंनी गर्जून सांगितले. श्री दत्तप्रभूंचे हे वचन ऐकून सर्व देवी-देवता हर्षोल्हासित झाल्या आणि त्यांनी अत्यंत भक्तिपूर्वक समर्थांना नमन केले, प्रभूंचा जयजयकार केला. आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी श्री स्वामी समर्थ कर्दळीवनांतून निघाले. तेथून भ्रमण करीत ते बंगालमध्ये गेले. पुढें, गंगातटाने हरिद्वार, केदारेश्वर आदि तीर्थक्षेत्रांना भेटी देत ते गोदावरीकाठीं आले. तिथे त्यांनी बरीच वर्षे वास्तव्य केले. नंतर, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, सोलापूर असे फिरत फिरत अक्कलकोट नगरीत आले आणि तिथेच स्थिरावले. मात्र, स्मर्तृगामी श्री दत्तात्रेयांचा अवतार असल्याने स्वामींनी अनेक भक्तांना गिरनार, आबू पर्वत, वाराणसी, बडोदा, श्री गिरी पर्वत या आणि अशा अनेक ठिकाणीही दर्शन दिले. त्यांच्या लीला अगम्य आहेत, हेच खरें !

शालिवाहन शके तीनशे चाळीस । शुद्ध पक्ष पूर्ण चैत्र मास । अवतार घेतला द्वितीयेस । वटछायेसी दिगंबरु ॥४८॥ तै धरा आनंदली थोर । मज दावा रूप सुकुमार । सेवा करीन निर्धार । पादकिंकरी होऊनिया ॥४९॥ श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती या पूर्वावतारांप्रमाणे, अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांचा जन्म माता-पित्याच्या पोटी झालेला नाही. ते अयोनिज आहेत. त्यांच्या प्रकटीकरणाबाबतदेखील त्यांच्या अधिकारी भक्तगणांत मत-मतांतरे आहेत. यासंदर्भात, श्री स्वामी समर्थांचे कृपांकित भक्त श्री आनंदनाथ महाराज म्हणतात - कलीच्या वाढत्या प्रभावाने धर्माला ग्लानी येऊ लागली होती. सिद्ध-योगी धर्मकार्य करू शकत नव्हते, संत-सज्जनांना पीडा होऊ लागली होती. सर्वत्र अनाचाराचेच राज्य होते. अखेर, त्रस्त झालेल्या भूदेवीने त्या परब्रह्माची करुणा भाकली. तेव्हा, जगत्कल्याणासाठी श्री दत्तप्रभूंनी शालिवाहन शके ३४० ( इ.स. ४१८ ) मधील चैत्र शुद्ध द्वितीयेला, गुरुवारी नगाधिराज हिमालयाच्या उत्तरभागांत एका वटवृक्षातळीं अवतार घेतला. परमेश्वराचे ते दिव्य स्वरूप पाहून भूमातेला अतिशय आनंद झाला. श्री स्वामींच्या पावन पदस्पर्शाने कृतार्थ झालेल्या धरेनें त्यांचा जयजयकार केला. तसेच हे जगत्प्रभो, आपली सेवा करण्याचे भाग्य मला निरंतर लाभावे, अशी प्रार्थनाही केली.

ऐसी गर्जना प्रकट । आनंद बोधवी हितार्थ । गुह्य हे निजबोधार्थ । न बोलावे दांभिका ॥५०॥ अशाप्रकारे, अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांचे अवतार-रहस्य, दिव्य स्वरूप, आणि अवतार कार्य आदिंचे वर्णन करून श्री आनंदनाथ महाराज म्हणतात - केवळ स्मरण करताच धावत येणारे, अल्प सेवेनेही संतुष्ट होणारे, आणि करुणेचा सागर असणारे भगवान दत्तात्रेय मानवदेहाने या पृथ्वीतलावर अवतरले ! राव, रंक, सज्जन, दुर्जन, सामान्य जन इतकेच नव्हे तर पशु-पक्षी-वृक्ष यांनादेखील श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा लाभ झाला. त्या योगीश्वरानें आपल्या सर्वच भक्तांचे ऐहिक कल्याण तर केलेच, तसेच अनेक अधिकारी भक्तांना आत्मसाक्षात्कार घडवून मुक्तीही दिली. तेव्हा स्वामीभक्तहो, आपल्या भक्तांचा अखंड योगक्षेम चालवणा-या, अनन्यभावानें शरण आलेल्या भक्तांवर सदैव कृपानुग्रह करणाऱ्या श्री स्वामी समर्थांचे तुम्ही सदैव नामस्मरण करा. जन्म-मृत्यूच्या संसृतिचक्रातून मुक्त होण्यासाठी हीच सहज सोपी साधना आहे. हा भक्तिमार्ग तुम्हांस निश्चितच परमात्म्याची प्राप्ती करून देईल. मात्र, यासाठी अढळ श्रद्धा आणि शुद्ध अंतःकरण अत्यंत आवश्यक आहे. याच कारणास्तव, तुम्ही हे भक्तिरहस्य दांभिकांना कधीही सांगू नका.


॥ इति श्रीगुरुस्तवनस्तोत्रं संपूर्णं

॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

Feb 17, 2022

श्रीगुरुनिजानंदगमनं


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

कुरवपूर येथील रविदास नामक रजक कृष्णा नदीत नाव चालवीत असे. त्याला श्रीपादप्रभूंचा अनुग्रह प्राप्त झाला होता. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचा हा एकनिष्ठ भक्त स्वामींची सर्व सेवा अत्यंत मनोभावें करीत असे. श्रीपाद स्वामी स्नानासाठी दररोज कृष्णा नदीवर जात असत. त्यांचा जाण्या-येण्याचा मार्ग रविदास झाडून स्वच्छ ठेवीत असे. त्यावेळी, श्रीपाद श्रीवल्लभांचे नित्य दर्शन घेऊन तो त्यांना अत्यंत भक्तिभावाने साष्टांग नमस्कार करीत असे. स्वामीही त्याच्या नमस्काराचा अत्यंत प्रसन्न मुद्रेने स्वीकार करीत असत. रविदासाची इच्छा पूर्ण करण्यासाठी, श्री गुरूंनी ‘ तू पुढील जन्मीं यवन राजा होऊन सुखाने राजवैभवाचा उपभोग घेशील.’ असे वरदान दिले. त्यावर, ‘ त्या जन्मीदेखील मला आपले दर्शन पुन्हा घडावे आणि आपली सेवा करण्याचे परमभाग्य प्राप्त व्हावे. ‘ अशी रविदासाने प्रभूंना प्रार्थना केली. तेव्हा, त्यावर प्रभूंनी त्याला ‘ तथास्तु’ असा आशीर्वाद दिला.
यथावकाश, तो रजक बिदरच्या बादशहाच्या पोटी जन्मला. पूर्वजन्मीच्या संस्कारांमुळे त्याचे वर्तन अत्यंत धार्मिक व सदाचारसंपन्न होते. श्री गुरूंचा आशीर्वाद फलस्वरूप झाल्यामुळे पुत्रपौत्रयुक्त दीर्घायुषी आयुष्य तर त्याला लाभलेच, अन त्याने राजवैभवाचादेखील पूर्ण उपभोग घेतला. उतार आयुष्यात त्याला एक असाध्य व्याधी जडली. त्या व्याधी उपशमनार्थ, विद्वान ब्राह्मणांच्या सल्ल्यानुसार तो गाणगापूर क्षेत्री श्री नृसिंहसरस्वतींच्या दर्शनासाठी आला. त्यावेळी, ‘ कां रे रजका कोठें अससी । बहुत दिवसां भेटलासी । आमचा दास होवोनियां ॥’ असे म्हणत स्वामींनी त्याला त्याच्या पूर्वजन्मीची स्मृती दिली व श्रीपाद प्रभूच नृसिंहसरस्वती रूपांत आपणाला पुन्हा भेटले, हे त्याला समजले. स्वामी महाराजांची भक्तवत्सलता अनुभवून तो यवन राजा कृतकृत्य झाला. त्याने प्रभूंना वंदन करून त्यांचे स्तवन केले. श्रीगुरूंच्या केवळ दर्शनानेच तो परमभक्त पूर्णतः व्याधीमुक्त झाला. पुढें, यवन राजाची विनंती मान्य करून श्रीगुरु त्याच्या नगरीत गेले. तिथे त्याचा आदरसत्कार स्वीकारून, त्यांनी राजपरिवारास आशीर्वाद दिला. 
त्यानंतर श्रीगुरुंनी गोदावरीची सिंहस्थ पर्वणी यात्रा केली व ते गाणगापुरी परतले. ‘ प्रगट झालों बहुवसी । राजा आला भेटावयासी । उपजली भक्ति म्लेंच्छासी । नाना याती येतील ॥' हे नृसिंहसरस्वती स्वामींनी अंतर्ज्ञानाने जाणले. तेव्हा, या सर्व गोष्टींचा आपल्या भक्तांना, शिष्यांना त्रास होऊ नये, यास्तव त्यांनी लौकिकदृष्ट्या गुप्त होण्याचा निश्चय केला. श्रीगुरुंनी आपल्या शिष्यांना बोलावून सांगितले, “ आम्ही आता लौकिकदृष्टीने श्री शैल्य पर्वतावर यात्रेसाठी जाऊ व श्री मल्लिकार्जुनाशी ऐक्य पावू. मात्र आमच्या भक्तांसाठी सूक्ष्म देहाने सदैव या मठात राहू.”  श्रीगुरुंचे हे बोलणे ऐकून सर्व भक्तगणांना अतीव दुःख झाले. श्री नृसिंहसरस्वतींची प्रार्थना करीत “ हे गुरुराया, " तूंचि आमुचा मातापिता । बाळकांते सोडूनि माता । केवीं जाय अव्हेरिता । आपल्या केवळ दर्शनमात्रें आमची पातकें नष्ट होत असत. आपण भक्तांची कामधेनूच आहात. आमचा असा अव्हेर करू नका.” अशी ते सर्व विनवणी करू लागले. आपल्या स्वामींच्या विरहाच्या केवळ कल्पनेनेदेखील ते सर्व भक्त व्याकुळ झाले होते. 
तेव्हा, श्रीगुरुंनी आपल्या कृपामय दृष्टीने सर्व भक्तांकडे पाहिले. त्यावेळी श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या कमलनेत्रांतून जणू दया व करुणा यांचा वर्षाव होत होता. आपल्या भक्तांना ग्वाही देत श्रीगुरु अत्यंत आश्वासक स्वरांत बोलू लागले, “ मी आपणांस सोडून जातो आहे, अशी व्यर्थ चिंता करू नका. लौकिकदृष्ट्या जरी आम्ही श्रीशैल्य गमन करीत असलो तरी आमच्या भक्तांसाठी मी सदैव गाणगापुरांतील मठातच गुप्तपणे वास करणार आहे. आम्ही प्रातःस्नान कृष्णातीरीं करून पंचगंगा संगमावरील, श्री नृसिंहवाडी क्षेत्री औदुंबरवृक्षातळीं अनुष्ठान करू. त्यानंतर, माध्यान्हकाळीं येथील भीमा-अमरजा संगमावर स्नान करून मठांत निर्गुण स्वरूपांत पूजेचा स्वीकार करू. जे माझे खरे भक्त असतील त्यांना मी येथे सगुण रूपात दर्शन देईन. संगमावरील जो अश्वत्थ कल्पवृक्ष आहे, त्याची तुम्ही नित्य पूजा करा. विघ्नहर चिंतामणीचेही पूजन करा. माझ्या निर्गुण पादुका मी या मठामध्ये ठेवल्या आहेत, त्यांची त्रिकाल पूजा करा. अष्टतीर्थांचेही सेवन करा. या सेवेने तुमच्या सर्व इष्ट मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या चिंतेचे, कार्यातील विघ्नांचे निवारण होईल."
अशा रीतीने, भक्तांची समजूत घालून श्रीगुरूंनी सर्वांचा निरोप घेतला आणि ते शैल्य पर्वत यात्रेला निघाले. गावांतील भक्तही काही अंतरापर्यंत त्यांना सोडण्यास गेले आणि दुःखित अंतःकरणाने गाणगापूर मठात परतले. तेव्हा, श्रीगुरूंनी मठातच त्यांना दर्शन दिले. ही प्रचिती घेतल्यावर, श्रीगुरु प्रत्यक्ष येथेच आहेत याची सर्वांनाच खात्री पटली. इकडे श्री गुरु दृश्य देहाने श्रीशैल्य पर्वताजवळ पाताळगंगातीरी आले. श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार, शिष्यांनी शेवंती, कमळ, कल्हार आदि फुले गोळा करून त्यांचे मृदू आसन तयार केले. श्रीगुरूंचा निरोप घेताना ते शिष्यगण अतिशय शोकविव्हल झाले होते. पुष्पासनीं आसनस्थ झालेले श्रीगुरू सर्व भक्तांना म्हणाले, ” लौकिकदृष्ट्या आम्ही अवतारसमाप्ती करीत असलो तरी माझ्या भक्तांच्या घरीं मी निरंतर असेन. निजस्थानी पोहोचल्याची खूण म्हणून आम्ही चार शेवंतीची प्रसादपुष्पे पाठवू. ती प्रसादपुष्पें तुम्ही नित्य पूजेत ठेवा.” असे सांगून श्री नृसिंहसरस्वती महाराज गुप्त झाले. त्यावेळी बहुधान्य नाम संवत्सर होते. गुरु कन्या राशीस होता. उत्तरायणात कुंभेत रवि होता. शिशिर ऋतू, माघ वद्य प्रतिपदा, शुक्रवार शके १३८० ( १९ जानेवारी १४५९ ) या दिवशीं श्रीगुरु समाधीत निजानंदी मग्न झाले.
श्री गुरु गंगेच्या प्रवाहावरच अदृश्य झालेले पाहून सर्व शिष्य व्याकुळ झाले, एव्हढ्यात पैलतीरावरून नावाडी आले व त्यांनी सांगितले की आम्ही पलीकडच्या तीरावर एक मुनीश्वर पहिले. त्यांचा वेष संन्याशाचा असून त्यांचे हाती दंड होता. त्यांनी पायात सुवर्णपादुका घातल्या होत्या. त्यांनी आम्हांला त्यांचे नाव नृसिंहसरस्वती असे सांगितले. तसेच, “ आम्ही कर्दळी वनात जात आहोत, पण गाणगापुरांतही आम्ही नित्य राहू. माझी भक्ती करून वंशोवंशी सुखाने राहावे.” असा तुम्हांला त्यांनी निरोप दिला आहे. ते ऐकून शिष्यांना समाधान वाटले. तेव्हा, सर्व शिष्य गुरुवचनाप्रमाणे प्रसादपुष्पे येण्याची वाट पाहू लागले. इतक्यात चार प्रसादपुष्पे वाहत आली. ती शेवंतीची चार फुले सायंदेव, नंदी, नरहरी व सिद्धमुनी या चार मुख्य शिष्यांनी घेतली व ते आपापल्या स्थानी परतले. 
श्रीगुरूंच्या अवतारसमाप्तीचे कारण कथन करतांना श्रीगुरुचरित्रकार म्हणतात - 
कलियुगीं अधर्म वृद्धि पावले I म्हणोनि श्रीगुरू गुप्त झाले I  भक्तजनांला जैसे पहिले I तैसेच भेटती अद्यापि ॥ मात्र श्री नृसिंह सरस्वती महाराज आपल्या भक्तांच्या इष्ट मनोकामना पूर्ण करण्यासाठी पादुकास्थानीं अदृश्य स्वरूपांत आजही वास करतात, अशी ग्वाही देऊन श्रीगुरुचरित्राचे माहात्म्य पुनःपुनः विशद करीत, प्रत्यक्ष श्रीगुरुंनी सांगितलेली साधना व फलश्रुती सांगताना गुरुचरित्रकार लिहितात -       
आणिक सांगेन एक खूण । गायनीं करावें माझें स्मरण । त्यांचे घरीं मी असें जाण । गायनीं प्रीति बहु मज ॥ नित्य जे जन गायन करिती । त्यांवरी माझी अतिप्रीति । त्यांच्या घरीं अखंडिती । आपण असें अवधारा ॥ व्याधि नसती त्यांचे घरी । दरिद्र जाय त्वरित दूरी । पुत्रपौत्र-श्रियाकरीं । शतायुषी नांदतील ॥ ऐकती चरित्र माझें जरी । अथवा वाचिती जन निरंतरी । लक्ष्मी राहे त्यांचे घरीं । संदेह न धरावा मानसीं ॥ 
दत्तभक्तांनी श्रद्धेने सदगुरुसेवा करून या वचनांची प्रचिती घेऊन पाहावी. 
म्हणे सरस्वती-गंगाधर । नामधारक लाधला वर । लक्ष्मीवंत पुत्र-कुमर । शतायुषी श्रियायुक्त ॥ श्रीगुरुचरित्र ऐकतां । लाधली सकळाभीष्टता । याकारणें ऐका समस्त । श्रीगुरुचरित्र कामधेनु ॥ अमृताची असे माथणी । स्वीकारावी त्वरित सकळ जनीं । धर्मार्थ-काम-मोक्षसाधनीं । हेचि कथा ऐकावी ॥ पुत्रपौत्रीं ज्यासी चाड । त्यासी हे कथा असे गोड । लक्ष्मी राहे अखंड । श्रवण करी त्या प्राणियां-घरीं ॥ चतुर्विध पुरुषार्थ । लाधती श्रवणें परमार्थ । श्रीनृसिंहसरस्वती गुरुनाथ । रक्षी त्यांचे वंशोवंशी ॥ असा निर्वाळाही सरस्वती-गंगाधर देतात.

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


Feb 14, 2022

शिवोपासना - प्रदोष व्रत, श्रीशिवलीलामृत अध्याय पाचवा


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय

 

शिवोपासनेत प्रदोष व्रताचे विशेष माहात्म्य आहे. चैत्र-वैशाखादि मासांतील शुद्ध आणि वद्य पक्षातील त्रयोदशीस प्रदोष व्रत केले जाते. प्रदोष म्हणजे त्रयोदशीचा सूर्यास्तापूर्वीचा तीन घटकांचा ( साधारण ७२ मिनिटे ) काळ ! प्रदोषकाळी यक्ष, किन्नर, गंधर्व, सिद्ध, सर्व सुरवर, अप्सरा आणि शिवगण श्री शंकरांच्या दर्शनार्थ येतात. त्यामुळे, शिवपूजनासाठी ही वेळ अत्यंत शुभदायक मानली जाते.

या दिवशी सूर्यास्तापूर्वी स्नान करावे. अष्टदल कमळावर शिवलिंगाची स्थापना करावी. पार्वती-परमेश्वरासहित सकल शिवपरिवारास आमंत्रित करावे. श्रीशंकरांना संकल्प सांगावा आणि माझ्या यथामति-यथाशक्ति केलेल्या पूजेचा आपण स्वीकार करावा, अशी प्रार्थना करावी. त्यानंतर, त्यांचे श्रद्धापूर्वक यथासांग पूजन करावे. दीप, धूप लावावा. महादेवांची आवडती फुले, बिल्वपत्रें अवश्य अर्पण करावी. प्रत्येक उपचार अर्पण करतांना ' ॐ नमः शिवाय ' हा महामंत्र म्हणावा.

आवाहन - ॐ नमः शिवाय । आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि । असे म्हणून अक्षता वाहाव्यात.

स्नान - बिल्वपत्राने शिवलिंगावर जल शिंपडावे. पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करतांना, ॐ श्री शंकराय नमः । ॐ श्री कैलासपतये नमः । ॐ श्री पार्वतीपतये नमः । ॐ श्री शांतिसागराय नमः । ॐ श्री सुखदाताय नमः । ॐ श्री विघ्नहर्त्रे नमः । ॐ शांतिः शांतिः शांतिः हा मंत्र जपावा. त्यानंतर, शुद्ध जलाने स्नान घालावे. त्यानंतर वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, फुले, बिल्वपत्रें अर्पण करावीत. दीप, धूप दाखवावा.

नैवेद्यं समर्पयामि असे म्हणून दूध, पेढे यांचा नैवेद्य दाखवावा. पूगीफलं, तांबूलं समर्पयामि असे म्हणून महादेवांस विडा अर्पण करावा. भक्तिभावानें नमन करावे आणि आरती-मंत्रपुष्पांजली म्हणावी. ' ॐ र्‍हीं नमः शिवाय ' हा मंत्र अकरा वेळा मनोमन जपावा. शिव-पार्वतीला अत्यंत श्रद्धापूर्वक नमस्कार करावा आणि ' हे भगवंता, मी यथाशक्ती-यथामति आपले जे पूजन केले आहे, ते आपण स्वीकारा. काही न्यून राहिले असेल तर क्षमा असावी. ' अशी प्रार्थना करावी.

दुसऱ्या दिवशी, गच्छगच्छं सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर । यत्र ब्रह्मोदये देवास्तत्रगच्छ उमामहेश्वर ॥ पुनरागमनाय च असा मंत्र म्हणत नमस्कार करावा आणि अक्षता वाहून उत्तरपूजा करावी.


सोमवारी प्रदोष असेल तर त्याला सोमप्रदोष म्हणतात. सोमप्रदोषकाळी शिवपूजन केल्यास आरोग्यप्राप्ती, आयु-वृद्धी यांचा लाभ होतो. मंगळवारी भौमप्रदोष होतो. भौमप्रदोष व्रत प्रामुख्याने ऋणमुक्तीसाठी केले जाते. तर कृष्णपक्षातील शनि-प्रदोष विशेष फलदायी असतो.


*** श्रीशिवलीलामृत अध्याय पाचवा ***


श्रीगणेशाय नमः ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय

सदाशिव अक्षरे चारी । सदा उच्चारी ज्याची वैखरी । जो नित्य शिवार्चन करी । तो उद्धरी बहुता जीवा ॥१॥ बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार । शास्त्रवक्ते करिती विचार । परी जे शिवनामे शुद्ध साचार । कासया इतर साधने त्यां ॥२॥ नामाचा महिमा परम-अद्भूत । त्यावरी प्रदोषव्रत आचरत । त्यासी सर्वसिद्धि प्राप्त होत । सत्य सत्य त्रिवाचा ॥३॥ तुष्टि पुष्टि धृति आयुष्यवर्धन । संतति संपत्ति दिव्य ज्ञान । पाहिजे तिही प्रदोषव्रत पूर्ण । यथासांग करावें ॥४॥ प्रदोषव्रत भावे आचरितां । या जन्मीं प्रचीत पहावी तत्त्वतां । दारिद्र्य आणि महद्व्यथा । निःशेष पळती षण्मासांत ॥५॥ एक संवत्सरें होय ज्ञान । द्वादशवर्षी महद्भाग्य पूर्ण । हें जो असत्य मानील व्यासवचन । त्यासी बंधन कल्पांतवरी ॥६॥ त्याचा गुरु लटिकाच जाण । त्याची दांभिक भक्ति लटिकेंच ज्ञान । उमावल्लभचरणीं ज्याचे मन । त्याहुनि पावन कोणी नाहीं ॥७॥ मृत्यु गंडांतरे दारूण । प्रदोषव्रतें जाती निरसोन । येविषयीं इतिहास जाण । सूत सांगे शौनकादिका ॥८॥ विदर्भदेशींचा भूभुज । सत्यरथ नामें तेजःपुंज । सर्वधर्मरत पराक्रमी सहज । बंदीजन वर्णिती सदा ॥९॥ बहु दिवस राज्य करीत । परी शिवभजनीं नाहीं रत । त्यावरी शाल्व देशीचा नृपनाथ । बळें आला चालूनियां ॥१०॥ आणीक त्याचे आप्त । क्षोणीपाल साह्य झाले बहुत । सप्त दिवसपर्यंत । युद्ध अद्भुत जाहलें ॥११॥ हा एकला ते बहुत । समरभूमीसी सत्यरथ । धारातीर्थी पावला मृत्यु । शत्रु नगरांत प्रवेशले ॥१२॥ राजपत्नी गरोदर राजस । पूर्ण झाले नवमास । एकलीच पायीं पळतां वनास । थोर अनर्थ ओढवला ॥१३॥ परम सुकुमार लावण्यहरिणी । कंटक-सराटे रूतती चरणीं । मूर्च्छना येऊनि पडे धरणीं । उठोनि पाहे मागेपुढें ॥१४॥ शत्रु धरितील अकस्मात । म्हणोनि पुढती उठोनि पळत । किंवा ते विद्युल्लता फिरत । अवनीवरी वाटतसे ॥१५॥ वस्त्रें-अलंकार-मंडित । हिर्‍ऱ्यांऐसे दंत झळकत । जिचा मुखेंदु देखतां रतिकांत । तन्मय होवोनि नृत्य करी ॥१६॥ पहा कर्माची गति गहन । जिच्या अंगुष्ठी न पडे सूर्यकिरण । ते गरोदर हिंडे विपिन । मृगनेत्री गजगामिनी ॥१७॥ वनी हिंडे महासती । जेवीं नैषधरायाची दमयंती । कीं भिल्लीरूपें हैमवती । दुस्तरवनी तैसी हिंडे ॥१८॥ कर्म-नदीच्या प्रवाही जाण । पडली तीस काढील कोण । असो एका वृक्षाखाली येऊन । परम व्याकुळ पडियेली ॥१९॥ शतांचीं शतें दासी । ओळंगती सदैव जियेपासीं । इंदुमती नाम जियेसी । ते भूमीवरी लोळत ॥२०॥ चहुंकडे पाहे दीनवदनीं । जिव्हा मुख वाळलें न मिळे पाणी । तों प्रसूत झाली तेच क्षणीं । दिव्य पुत्र जन्मला ॥२१॥ तृषेनें तळमळी अत्यंत । कोण उदक देईल तेथ । बाळ टाकूनि उठत बसत । गेली एका सरोवरा ॥२२॥ उदकांत प्रवेशली तेच क्षणीं । अंजुळी भरोनि घेतले पाणी । तंव ग्राहे नेली ओढोनी । विदारूनी भक्षिली ॥२३॥ घोर कर्मांचें विंदान । वनीं एकला रडे राजनंदन । तंव उमानामक विप्रपत्नी जाण । विगतधवा पातली ॥२४॥ माता पिता बंधु पाहीं । तियेलागीं कोणी नाहीं । एका वर्षाचा पुत्र तीसही । कडिये घेवोनि आली तेथें ॥२५॥ तों नाहीं केलें नालच्छेदन । ऐसें बाळ उमा देखोन । म्हणे आहा रे ऐसें पुत्ररत्न । कोणीं टाकिलें दुस्तर वनीं ॥२६॥ म्हणे कोण याती कोण वर्ण । मी कैसें नेऊं उचलून । जावें जरी टाकून । वृक व्याघ्र भक्षितील कीं ॥२७॥ स्तनी दाटूनी फुटला पान्हा । नेत्रीं ढाळीत अश्रुजीवना । बाळ पुढें घेऊनि ते ललना । मुखकमळीं स्तन लावी ॥२८॥ संशयसमुद्रीं पडली वेल्हाळ । म्हणे नेऊ कीं नको बाळ । तंव तो कृपाळु पयःफेनधवल । यतिरूप धरूनि पातला ॥२९॥ उमेलागीं म्हणे त्रिपुरारी । बाळ नेई संशय न धरी । महद्भाग्य तुझें सुंदरी । क्षत्रिय राजपुत्र तुज सांपडला ॥३०॥ कोणासी न सांगे हे मात । समान पाळीं दोघे सुत । भणंगासी परीस होय प्राप्त । तैसें तुज जाहले ॥३१॥ अकस्मात निधि जोडत । कीं चिंतामणि पुढें येऊनि पडत । कीं मृताच्या मुखात । पडे अमृत पूर्वदत्ते ॥३२॥ ऐसें बोलोनि त्रिपुरारी । गुप्त झाला ते अवसरी । मग दोघे पुत्र घेवोनि ते नारी । देशग्रामांतरीं हिंडत ॥३३॥ ब्रह्मपुत्राचें नाम शुचिव्रत । राजपुत्राचें नाम ठेविले धर्मगुप्त । घरोघरी भिक्षा मागत । कडिये खांदी घेऊनिया ॥३४॥ लोक पुसतां उमा सांगत । माझे पोटीचे दोघे सुत । ऐसी हिंडत हिंडत । एकचक्रनगरा पातली ॥३५॥ घरोघरी भिक्षा मागत । तों शिवालय देखिलें अकस्मात । आंत द्विज दाटले बहुत । शांडिल्य त्यांत मुख्य ऋषि ॥३६॥ शिवाराधना करिती विधियुक्त । तों उमा आली शिवालयांत । क्षण एक पूजा विलोकीत । तों शांडिल्य ऋषि बोलिला ॥३७॥ अहा कर्म कैसें गहन । हा राजपुत्र हिंडे दीन होऊन । कैसें विचित्र प्राक्तन । उमा वचन ऐकती जाहली ॥३८॥ ऋषीचे चरण उमा धरीत । म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तांत । त्रिकालज्ञानी महासमर्थ । भूतभविष्यज्ञान तुम्हां ॥३९॥ याचीं माता पिता कोण । आहेत कीं पावली मरण । यावरी शांडिल्य सांगे वर्तमान । याचा पिता जाण सत्यरथ ॥४०॥ तो पूर्वी होता नृप जाण । प्रदोषसमयीं करी शिवार्चन । तों शत्रु आले चहूकडोन । नगर त्याचें वेढिले ॥४१॥ शत्रूंची गजबज ऐकून । उठिला तैसीच पूजा सांडोन । तव प्रधान आला पुढें धांवोन । शत्रू धरोनि आणिले ॥४२॥ त्यांचा शिरच्छेद करून । पूजा पूर्ण न करितां उन्मत्तपणें । तैसाच जाऊनि करी भोजन । नाहीं स्मरण विषयांधा ॥४३॥ त्याकरितां या जन्मीं जाण । सत्यरथ अल्पायुषी होऊन । अल्पवयांत गेला मरोन । म्हणोनि पूजन न सोडावें ॥४४॥ याच्या मातेने सवत मारिली । ती जळी विवशी झाली । पूर्व वैरें वोढोनि नेली । क्रोधे भक्षिली विदारूनी ॥४५॥ हा राजपुत्र धर्मगुप्त । यानें काहीच केले नाही शिवव्रत । म्हणोनि मातापितारहित । अरण्यांत पडियेला ॥४६॥ याकरितां प्रदोषकाळीं । अव्यग्र पूजावा इंदुमौळी । पूजन सांडुनि कदाकाळीं । सर्वथाही न उठावें ॥४७॥ भवानीस बैसवूनि कैलासनाथ । प्रदोषकाळी पुढे नृत्य करीत । वाग्देवी वीणा वाजवीत । वेणु पुरुहूत वाजवीतसे ॥४८॥ अंबुजसंभव ताल सावरी । भार्गवी गातसे मधुरस्वरीं । मृदुंग वाजवी मधुकैटभारी । नृत्यगती पाहूनिया ॥४९॥ यक्षपति शिवप्राणमित्र । हस्त जोडोनि उभा समोर । यक्षगण गंधर्व किन्नर । सुरासुर उभे असती ॥५०॥ ऐसा प्रदोषकाळीचा महिमा । अगोचर निगमांगमां । मग काय बोले उमा । मम पुत्र दरिद्री कां झाला ॥५१॥ तुझ्या पुत्रें प्रतिग्रह बहुत । पूर्वी घेतले दुष्ट अमित । दान केले नाही किंचित । शिवार्चन न करी कदा ॥५२॥ परान्नें जिव्हा दग्ध यथार्थ । दुष्ट प्रतिग्रहें दग्ध हस्त । स्त्रीअभिलाषे नेत्र दग्ध होत । मंत्रासी सामर्थ्य मग कैचें ॥५३॥ मग उमेनें पुत्र दोन्ही । घातले ऋषीचे चरणीं । तेणें पंचाक्षर मंत्र उपदेशुनी । प्रदोषव्रत उपदेशिले ॥५४॥ पक्षप्रदोष शनिप्रदोष । महिमा वर्णिला अतिविशेष । निराहार असावे त्रयोदशीस । दिवसा सत्कर्म आचरावें ॥५५॥ तीन घटिका झालिया रजनी । प्रदोषपूजा आरंभावी प्रीतीकरूनी । गोमये भूमि सारवूनी । दिव्य मंडप उभारिजे ॥५६॥ चित्रविचित्र वितान । कर्दळीस्तंभ इक्षुदंडेकरून । मंडप कीजे शोभायमान । रंगमाळा नानापरी ॥५७॥ शुभ्र वस्त्र नेसावें आपण । शुभ्र गंध सुवाससुमन । मग शिवलिंग स्थापून । पूजा करावी विधियुक्त ॥५८॥ प्राणायाम करून देखा । अंतर्बाह्य न्यास मातृका । दक्षिणभागीं पूजावें मुरांतका । सव्यभागी अग्नि तो ॥५९॥ वीरभद्र गजानन । अष्ट महासिद्धि अष्ट भैरव पूर्ण । अष्ट दिक्पालपूजन । सप्तावरणी शिवपूजा ॥६०॥ यथासांग शिवध्यान । मग करावे पूजन । राजोपचारे सर्व समर्पून । करावे स्तवन शिवाचें ॥६१॥ जयजय गौरीनाथ निर्मळ । जय जय कोटिचंद्र सुशीतळ । सच्चिदानंदघन अढळ । पूर्णब्रह्म सनातन ॥६२॥ ऐसे प्रदोषव्रत ऐकवून । बाळ उपदेशिले दोघेजण । मग ते एकमनेकरून । राहते झाले एकचक्री ॥६३॥ चार महिनेपर्यंत । दोघेही आचरती प्रदोषव्रत । गुरुवचने यथार्थ । शिवपूजन करिती पै ॥६४॥ शिवपूजा न द्यावी सर्वथा । न द्यावे प्रसादतीर्था । शत ब्रह्महत्यांचें पाप माथां । होय सांगता शांडिल्य ॥६५॥ सर्व पापांहूनि पाप थोर । शिवपूजेचा अपहार । असो ते दोघे किशोर । सदा सादर शिवभजनीं ॥६६॥ ब्रह्मपुत्र शुचिव्रत । एकला नदीतीरी क्रीडत । दरडी ढासळता अकस्मात । द्रव्यघट सापडला ॥६७॥ घरासी आला घेऊन । माता संतोषली देखोन । म्हणे प्रदोषव्रताचा महिमा जाण । ऐश्वर्य चढत चालिले ॥६८॥ राजपुत्रास म्हणे ते समयी । अर्ध द्रव्यविभाग घेई । थेरू म्हणे सहसाही । विभाग न घेई अग्रजा ॥६९॥ या अवनीतील धन । आमुचेच आहे संपूर्ण । असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण । न विसरती कदाही ॥७०॥ यावरी एकदां दोघेजण । गेले वनविहारालागून । तो गंधर्वकन्या येऊन । क्रीडता दृष्टी देखिल्या ॥७१॥ दोघे पाहती दुरूनी । परम सुंदर लावण्यखाणी । शुचिव्रत म्हणे राजपुत्रालागुनी । परदारा नयनी न पहाव्या ॥७२॥ दर्शने हरती चित्त । स्पर्शनें बळ वीर्य हरीत । कौटिल्यदंभसंयुक्त । महाअनर्थकारिणी ॥७३॥ ब्रह्मसुतास तेथे ठेवून । राजपुत्र चालिला सुलक्षण । स्वरूप सुंदर मन्मथाहून । आकर्णनयन कोमलांग ॥७४॥ जवळी येवोनि पाहात । तव मुख्य नायिका विराजित । अंशुमती नामें विख्यात । गंधर्वकन्या पद्मिनी ॥७५॥ कोद्रविणनामा गंधर्वपति । त्याची कन्या अंशुमती । पिता पुसे महेशाप्रती । हे कन्या अर्पू कोणातें ॥७६॥ मग बोले हिमनगजामात । धर्मगुप्त सत्यरथाचा सुत । तो माझा परम भक्त । त्यासी देई अंशुमती ॥७७॥ हे पूर्वीचे शिववचन । असो यावरी अंशुमती पाहे दुरोन । न्याहाळीत राजनंदन । वाटे पंचबाण दुसरा ॥७८॥ क्षीरसिंधूंत रोहिणीरमण । काय आला कलंक धुवोन । तैसे राजपुत्राचे वदन । अंशुमती न्याहाळी ॥७९॥ बत्तिसलक्षणसंयुक्त । आजानुबाहू चापशरमंडित । विशाळ वक्षःस्थळ चालत । करिनायक ज्यापरी ॥८०॥ ऐसा तो गुणाढ्य देखूनि त्वरित । अंशुमती सखयांप्रती सांगत । तुम्ही दुज्या वनाप्रती जाऊनि समस्त । सुमने आणावी सुवासे ॥८१॥ अवश्य म्हणोनि त्या ललना । जात्या झाल्या आणिका वना । अंशुमती एकली जाणा । राजपुत्रा खुणावीत ॥८२॥ भूरुहपल्लव पसरून । एकांती घातलें आसन । वरी वृक्षडाहाळिया भेदून । भूमीवरी पसरल्या ॥८३॥ असो तेथे बैसला येऊन । राजपुत्र सुहास्यवदन । विशाळभाळ आकर्णनयन । आरक्त ओष्ठ सुकुमार ॥८४॥ मंजुळभाषिणी नेत्रकटाक्षबाणी । विंधिली ते लावण्यहरिणी । मनोजमूर्च्छना सांवरूनी । वर्तमान पुसे तयाते ॥८५॥ शृंगारसरोवरा तुजपासी । मी वास करीन राजहंसी । देखतां तव वदन दिव्यशशी । मम मानसचकोर नृत्य करी ॥८६॥ तव मुखाब्ज देखता आनंद । झेपावती मम नेत्रमिलिंद । की तव वचन गर्जता अंबुद । मम चित्तशिखी नृत्य करी ॥८७॥ कविगुरूहुनी तेज विशाळ । आत्मकंठीची काढिली मुक्ताफळमाळ । कंठी सूदली तत्काळ । चरणी भाळ ठेवीत ॥८८॥ म्हणे मी कायावाचामनेंकरून । तुझी ललना झाले पूर्ण । यावरी धर्मगुप्त वचन । काय बोलता जाहला ॥८९॥ मी जनकजननीविरहित । राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत । तव पित्यासी कळता मात । घडे कैसे वरानने ॥९०॥ यावरी म्हणे अंशुमती । तीन दिवसां येईन या स्थळाप्रती । तुम्हीं यावें शीघ्रगती । लग्नसिद्धि साधावया ॥९१॥ ऐसे बोलून ते चातुर्यराशी । वेगे आली पितयापाशीं । झाले वर्तमान सांगे त्यासी । तो परम मानसी संतोषला ॥९२॥ राजपुत्र गेला परतोन । बंधूप्रती सांगे सर्व वर्तमान । शांडिल्यगुरूचे वचन स्मरून । म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा ॥९३॥ गुरुचरणीं ज्याचे मन । त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून । काळमृत्युभयापासून । सर्वदा रक्षी देशिक तो ॥९४॥ यावरी ते दोघे बंधु येऊन । मातेसी सांगती वर्तमान । येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन । फळ देत चालिले ॥९५॥ यावरी तिसरे दिवशी । दोघेही गेले त्या वनासी । गंधर्वराज सहपरिवारेसी । सर्व सामग्री घेऊनि आला ॥९६॥ दृष्टी देखता जामात । गंधर्व आनंदसमुद्री पोहत । छत्र सेना सुखासन त्वरित । धाडूनि उमा आणविली ॥९७॥ यावरी यथासांग लग्न । चारी दिवस पूर्ण । काही एक पदार्थ न्यून । पडिला नाहीं तेधवां ॥९८॥ स्वर्गीच्या दिव्य वस्तु अमोलिक सतेज । विहिणीस देत गंधर्वराज । लक्ष रथ दहा सहस्त्र गज । तेजःपुंज एक लक्ष वाजी ॥९९॥ एक लक्ष दासदासी । अक्षय कोश रत्नराशी । अक्षय भाते देत शक्तीसी । दिव्य चाप बहुसाल ॥१००॥ अपार सेना संगे देत । एक सेनापति गंधर्व बळिवंत । उमा दोघा पुत्रांसववेत । मान देवोनि बोळविली ॥१०१॥ सुखासनारूढ अंशुमती । पतीसवे चालली शीघ्रगती । कनकवेत्रपाणी पुढे धावती । वाहनासवे जियेच्या ॥१०२॥ चतुर्विध वाद्यांचे गजर । चतुरंग चालिला दळभार । येऊनि वेढिले विदर्भनगर । सत्यरथपितयाचें ॥१०३॥ नगरदुर्गावरूनि अपार । उल्हाटयंत्राचा होत भडिगार । परी गंधर्वाचें बळ फार । घेतले नगर क्षणार्धे ॥१०४॥ जेणें पूर्वी पिता मारिला जाण । त्याचें नाम दुर्मर्षण । तो जिताचि धरूनि जाण । आपला करून सोडिला ॥१०५॥ देशोदेशीचे प्रजाजन । धावती करभार घेऊन । उत्तम मुहूर्त पाहून । सिंहासनारूढ जाहला ॥१०६॥ माता उमा बंधू शुचिव्रत । त्यांसमवेत राज्य करीत । दहा सहस्त्र वर्षेपर्यंत । यशवंत राज्य केलें ॥१०७॥ शांडिल्य गुरु आणून । शतपद्म अर्पिले धन । रत्नाभिषेक करून । अलंकार वस्त्रे दीधली ॥१०८॥ दुर्भिक्ष जळशोष अवर्षण । आधि व्याधि वैवध्य मरण । दुःख शोक कलह विघ्न । राज्यातूनि पळाली ॥१०९॥ प्रजा भूदेव दायाद । देती रायासी आशिर्वाद । कोणासही नाही खेद । सदा आनंद घरोघरी ॥११०॥ ऐसा अंशुमतीसमवेत । धर्मगुप्त राज्य करीत । यौवराज्य शुचिव्रताते देत । पारिपत्य सर्व करी ॥१११॥ ऐसे दहा सहस्त्र वर्षे राज्य करून । सुदत्तपुत्रासी राज्य देऊन । चिंतितां मनीं उमाधवचरण । दिव्य विमान धाडिले ॥११२॥ दिव्य देह पावोनि नृपती । माता-बंधुसमवेत अंशुमती । शिवाविमानी बैसती । करीत स्तुति शिवाची ॥११३॥ कैलासपदासी जाऊन । जगदात्मा शिव विलोकून । जयजयकार करून । लोटांगणे घालिती ॥११४॥ दीनबंधु जगन्नाथ । पतित पावन कृपावंत । हृदयीं धरूनि समस्त । अक्षयपदीं स्थापिली ॥११५॥ हें धर्मगुप्ताचे आख्यान । करिती जे श्रवण पठण । लेखन रक्षण अनुमोदन । तरी पंचवदन रक्षी तयां ॥११६॥ सकळ पापांचा होय क्षय । जेथे जाय तेथे विजय । धनधान्यवृद्धि होय । ऋण जाय निरसूनी ॥११७॥ प्रदोषमहिमा अद्भुत । जे आचरती ऐकूनि ग्रंथ । तेथें कैचे दारिद्र मृत्य । सत्य सत्य त्रिवाचा ॥११८॥ ज्याच्या घरीं शिवलीलामृत ग्रंथ । त्याची शिव पाठी राखीत । सदा हिंडे उमाकांत । अंती शिवपद प्राप्त तया ॥११९॥ हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस । पद्मरचनाफळें आली पाडास । कुतर्कवादी जे वायस । मुखरोग त्यांस नावडे ॥१२०॥ जयजय ब्रह्मानंदा विरूपाक्षा । श्रीधरवरदा सर्वसाक्षा । दुष्टकर्ममोचका कर्माध्यक्षा । न येसी लक्षा निगमागमां ॥१२१॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सज्जन अखंड । पंचमाध्याय गोड हा ॥१२२॥ इति पंचमोऽध्यायः ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु

Feb 11, 2022

श्रीगजानन विजय नित्यपाठ


*** श्री गजानन महाराज प्रगट दिन विशेष ***

गण गण गणात बोते
अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त-प्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सद्‌गुरु श्री गजानन महाराज की जय जय

ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय नमः

🔷🔶🔷 श्रीगजानन विजय नित्यपाठ - PDF इथे उपलब्ध आहे.
***॥ श्री गजानन महाराजार्पणमस्तु ॥***

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय २१


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय श्रोते आतां सावधान । हा कळसाध्याय परिसा पूर्ण । तुमचें भाग्य धन्य धन्य । संतकथा ऐकतसां ॥१॥ एकविधा निष्ठा ज्याची । जडली गजाननपदीं साची । त्याच्या दुःखसंकटांची । होळीच होते निःसंशय ॥२॥ बांधीत असतां मंदिर । काम करीत शिखरावर । एक होता मजूर । हाताखालीं गवंड्यांच्या ॥३॥ तो धोंडा देतां मिस्तरीला । एकाएकी झोंक गेला । तीस फुटांवरुन पडला । खालीं घडीव दगडावर ॥४॥ तो पडतां लोकांनीं पाहिला । जन म्हणती मेला मेला । उंचावरुन खालीं पडला । आतां कशाचा वांचे तो ? ॥५॥ परी घडलें अघटित । कोठें न लागलें त्याप्रत । जैसा चेंडू झेलितात । तैसें त्याचें जाहलें ॥६॥ मजूर म्हणे लोकांला । माझा जेव्हां झोक गेला । तेव्हां एकानें धरलें मला । पडतां पडतां करास ॥७॥ पाय भूमीसी लागतां क्षणीं । तो न दिसला मजलागुनी । हें वृत्त ऐकुनी । लोक अवघे आनंदले ॥८॥ अभिश्राप कोणाचा । समर्थ ना घेती साचा । हा योग पडण्याचा । दैवानेंच आला तुज ॥९॥ या तुझ्या पडण्यानें । स्पर्श केला समर्थानें । तुझ्या कराकारणें । ऐसें भाग्य कोणाचें ? ॥१०॥ असो एक बाई रजपुताची । जयपुराहून आली साची । बाधा होती भूताची । तया अबलेकारणें ॥११॥ तिसी जयपूर ग्रामाला । दत्तात्रयांचा दृष्टान्त झाला । तूं या रामनवमीला । जाईं शेगांवाकारणें ॥१२॥ तेथें संत जागती ज्योत । श्रीगजानन सद्‌गुरुनाथ । ते या तुझ्या पिशाच्याप्रत । मुक्ति देतील निःसंशयें ॥१३॥ या दृष्टान्तेंकरुन । आपुल्या दोन मुलांसी घेऊन । रामनवमीसाठीं जाण । बाई आली शेगांवा ॥१४॥ प्रतिपदेपासून भला । उत्सवासी आरंभ झाला । अफाट समुदाय मिळाला । नवमीस श्रोते शेगांवीं ॥१५॥ काम सभामंडपाचें । चाललें होतें तेथ साचें । खांब मोठमोठे दगडाचे । उभे केले असती ॥१६॥ उत्सवाच्या निमित्त भलें । काम भक्तांनीं बंद केलें । खांब होते बसविलेले । नुसते मात्र ते ठाईं ॥१७॥ श्रीरामाचा जन्म झाला । प्रसादासाठीं लोटला । जनांचा तो समुदाय भला । तो न मसी वर्णवे ॥१८॥ त्या गर्दीत ही बाई । उभी खांबास एक्या पायीं । होती तिला सोसली नाहीं । गर्दी ती यत्किंचित ॥१९॥ म्हणून खांबाच्या आश्रया । गेली निर्भय व्हावया । गर्दी ती चुकवावया । परी झालें विपरीत ॥२०॥ तोच खांब कोसळला । तिच्या शरीरा पडला । तो पहातां लोकांला । ऐसें वाटूं लागलें ॥२१॥ तिचा बहुतेक गेला प्राण । ही बाई कोठील कोण ? । लहान मुलें दिसतीं दोन । खांबाखालीं येधवां ॥२२॥ दहावीस जणांनीं । खांब काढिला अंगावरुनी । पाणी मुखांत घालोनी । डॉक्टर लोबोकडे पाठविले ॥२३॥ तिनें ह्या रजपुतीणीला । रीतीप्रमाणें उपचार केला । लोबो म्हणे ना लागला । मार इला कोठेंच ॥२४॥ आश्चर्य वाटलें लोकांला । प्राण बाईचा वांचला । हा जो कांहीं प्रकार झाला । तो घडला इतुक्यास्तव ॥२५॥ खांब पाडून अंगावरी । भूत जें होतें शरीरीं । त्या भूतास मुक्ति खरी । दिधली त्या गजाननें ॥२६॥ बाई होऊन पूर्ववत । गेली जयपूर शहराप्रत । नांदूं लागली आनंदांत । ऐसा प्रभाव स्वामींचा ॥२७॥ ऐसेंच एका उत्सवासी । नाईक नवर्‍याच्या मस्तकासी । सोडीत असतां मंडपासी । लाकडी गोल पडला हो ॥२८॥ तोही गोल थोर होता । परी स्वामींची अगाध सत्ता । कोठेंही ना आघात होतां । नाईक नवरा वांचला ॥२९॥ पुत्र कृष्णाजी पाटलाचा । रामचंद्र नांवाचा । परमभक्त समर्थांचा । एक असे शेगांवीं ॥३०॥ एके दिवशीं त्याच्या घरीं । येते झाले साक्षात्कारी । ऐन दुपारच्या अवसरीं । गोसाव्याच्या रुपानें ॥३१॥ भूक लागली मला देखा । अन्न कांहीं देतां कां ? । ऐसें म्हणून मारिली हांका । रामचंद्र पाटलातें ॥३२॥ निरखून पाहातां गोसाव्यासी । तों ते असावे पुण्यराशी । स्वामी गजानन निश्चयेंसी । ऐसें त्याला वाटलें ॥३३॥ गोसाव्याचा धरुन हात । आला घेऊन घरांत । दिला बसण्यास पाट । पूजा केली पायांची ॥३४॥ गोसावी म्हणे पाटलाला । आज मी मुद्दाम आलों मुला । कांहीं तुज सांगण्याला । तें तूं ऐके मनापून ॥३५॥ आण ताट वाढून । सुग्रास देईं भोजन । मर्जी असल्या पांघरुण । घाल एखादें अंगावरी ॥३६॥ पूजा अन्न दक्षिणा । याचकांसी दिल्या जाणा । तें पावतें नारायणा । येविषयीं शंका नसे ॥३७॥ आणलें ताट वाढूनी । गोसावी जेवला प्रेमानीं । पांच रुपये पाटलांनीं । दक्षिणा ठेविली त्याच्या करां ॥३८॥ तैं गोसावी म्हणाला । ही दक्षिणा नको मला । तूं पाहिजे कारभार केला । गजाननाच्या मठांत ॥३९॥ तीच दक्षिणा मागण्यासी । मी आलों तुझ्यापासीं । ती आनंदें देईं मसी । म्हणजे कल्याण होईल ॥४०॥ समर्थसेवेची दक्षिणा । देऊन तुष्टवी माझ्या मना । योग्य मनुष्य तुझ्याविणा । कोणी न येथें सांप्रत ॥४१॥ तुझी कांता आजारी । वरचेवरी पडते जरी । तीही होईल बापा परी । ही दक्षिणा दिल्यानें ॥४२॥ बोलाव तुझ्या पुत्राप्रत । त्याच्या कंठीं एक ताईत । बांधितों म्हणजे चेटूकभूत । याची न बाधा होय त्यासी ॥४३॥ मी तुझ्या पाठीस । आहे जाण रात्रंदिवस । ताईत बांधून कंठास । गोसावी जाऊं लागला ॥४४॥ दाराबाहेर जातां भला । अंतर्धान पावला । पाहातां पाहातां झाला । दिसेनासा रस्त्यांत ॥४५॥ पाटील अवघ्या दिवसभर । मानसीं करी विचार । श्रीगजानन स्वामी साचार । आले उपदेश करायाला ॥४६॥ रात्रीं स्वप्नीं येऊन । संशय केला निरसन । ऐसें स्वामी गजानन । भक्तवत्सल खरोखरी ॥४७॥ श्रीगजानन चरित्र । तारक असोनी परमपवित्र । अनुभव येण्या मात्र । सबळ निष्ठा पाहिजे ॥४८॥ या ग्रंथाची अवतरणिका । देतों आतां ही तुम्ही ऐका । वेळ उगा दवडूं नका । पूर्ण व्हावें सावधान ॥४९॥ प्रथमाध्यायीं मंगलाचरण । देवगुरुचें वंदन । केलें पुढें निवेदन । गजाननाच्या पूर्वचरिता ॥५०॥ माघमासीं सप्तमीसी । समर्थ आले शेगांवासी । देवीदासाच्या सदनापासी । दिसते झाले प्रथमतः ॥५१॥ बंकटलाल दामोदर । दोन होते चतुर नर । त्यांनीं परीक्षा अखेर । केली गजाननाची ॥५२॥ कथा द्वितीयाध्यायांत । येणेंपरी आहे सत्य । गोविंदबुवाच्या कीर्तनांत । महाराज येऊन बैसले ॥५३॥ पितांबर शिंप्याला । रस्त्यांत चमत्कार दाविला । बंकटलालाच्या घराला । महाराज गेले शेवटीं ॥५४॥ कथा तृतीयाध्यायाला । गोसाव्यानें नवस केला । गांजाचा श्रीसमर्थांला । पाजण्याचा विबुध हो ॥५५॥ त्याची इच्छा पुरविली । प्रथा गांजाची पडली । तेथपासोनी भली । शेगांवचे मठांत ॥५६॥ जानराव देशमुखाचें । गंडांतर टाळिलें साचें । देऊन तीर्थ पायांचें । आपुलें तें स्वामींनीं ॥५७॥ मृत्यूचे तें प्रकार । तेथें कथिले सविस्तर । विठोबासी दिला मार । ढोंग करितो म्हणोनी ॥५८॥ कथा चतुर्थाध्यायाठायीं । येणें रीतीं असे पाही । जानकीरामें दिला नाहीं । विस्तव चिलमीकारणें ॥५९॥ किडे पडले चिंचवण्यांत । अन्न गेलें वायां सत्य । सोनारानें जोडून हात । केली विनंती समर्थांला ॥६०॥ त्याचा अपराध क्षमा केला । पूर्ववत्‌ केले चिंचवण्याला । जानकीराम भक्त झाला । ते दिवसापासून ॥६१॥ होते दोन कान्होले । उतरंडीसी ठेविलेले । तेच समर्थें मागितले । खाया चंदू मुकिंदासी ॥६२॥ चिंचोलीच्या माधवाला । यमलोक दावून मुक्त केला । शिष्याहातें करविला । थाट वसंतपूजेचा ॥६३॥ कथा पंचमाध्यायांत । महाराज पिंपळगांवांत । बसले शंकराच्या मंदिरांत । पद्मासन घालोनिया ॥६४॥ गुराख्यांनीं पूजा केली । गांवची मंडळी तेथें आली । महाराजांसी घेऊन गेली । पिंपळगांवाकारणें ॥६५॥ हें कळलें बंकटलाला । तो पिंपळगांवास गेला । महाराजांसी आणण्याला । परत शेगांवाकारणें ॥६६॥ समर्थांसी आणिलें परत । कांहीं दिवस राहून तेथ । पुन्हां गेले अकोलींत । भास्करासी तारावया ॥६७॥ कोरड्या ठणठणीत विहिरीला । जिवंत झरा फोडीला । एका क्षणांत आणिलें जला । त्या कोरड्या विहिरीठायीं ॥६८॥ भास्कराची उडवली भ्रांती । घेऊन आले तयाप्रती । शेगांवास गुरुमूर्ति । ही कथा पंचमांत ॥६९॥ षष्ठाध्यायीं ऐसी कथा । बंकटलालें सद्‌गुरुनाथा । मक्याचीं कणसें खाण्याकरितां । नेलें आपुल्या मळ्यांत ॥७०॥ गांधीलमाशा उठल्या तेथ । लोक होऊन भयभीत । पळूं लागले असती सत्य । जीव आपुला घेऊनी ॥७१॥ बाधा गांधीलमाश्यांची । महाराजा न झाली साची । घेतली असे शिष्यत्वाची । परीक्षा बंकटलालाची ॥७२॥ नरसिंगजीस भेटण्याला । स्वामी गेले अकोटाला । जो नरसिंगजी होता भला । शिष्य कोतशा अल्लीचा ॥७३॥ कांहीं दिवस राहिले । अकोटामाजी भले । नरसिंगजीसी हितगुज केलें । बंधु आपुला म्हणून ॥७४॥ चंद्रभागेच्या तीरीं । शिवरग्रामाभीतरीं । कृपा व्रजभूषणावरी । केली असे जाऊन ॥७५॥ मारुतीच्या मंदिरांत । श्रावणमासाच्या उत्सवांत । समर्थ आले राहण्याप्रत । येथें षष्ठमाची पूर्तता ॥७६॥ गांवीची पाटील मंडळी । अवघी आडदांड होती भली । हमेश होई बोलाचाली । त्यांची समर्थांबरोबर ॥७७॥ हरि पाटलासवें भले । महाराज कुस्ती खेळले । मल्लविद्येचें दाविलें । प्रत्यंतर बहुतांला ॥७८॥ ऊंसाचा चमत्कार । दाऊनिया साचार । अभिमानाचा परिहार । केला पाटील मंडळींच्या ॥७९॥ भिक्यानामें दिला सुत । खंडू कडताजी पाटलाप्रत । आम्रभोजनाचें व्रत । चालविण्यास कथिलें पाटलाला ॥८०॥ ऐशा कथा सप्तमाध्यायीं । कथन केल्या आहेत पाही । निष्ठा समर्थांच्या ठायीं । जडली पाटील मंडळींची ॥८१॥ कथा आहे अष्टमांत । दुफळी पाटील देशमुखांत । अर्ज दिधला सरकारांत । महारांनीं विरुद्ध पाटलाच्या ॥८२॥ खंडूवरी बालंट आलें । तें समर्थांनीं नासिलें । निर्दोष सुटते झाले । खंडू पाटील खटल्यांतून ॥८३॥ तेलंगी ब्राह्मणाला । वेद म्हणून दाखविला । आपण कोण हा कळविला । सहज लीलेनें समाचार ॥८४॥ कृष्णाजीच्या मळ्याशीं । महाराज राहिले छपरासी । मंदिराच्या सान्निध्यासी । चंद्रमौळी हराच्या ॥८५॥ ब्रह्मगिरी गोसाव्याला । अभिमानरहित केला । "नैनं छिन्दन्ति" श्लोकाला । रहस्यासह सांगून ॥८६॥ जळत्या पलंगाच्यावर । महाराज बसते झाले स्थिर । न जाळे वैश्वानर । केव्हांही खर्‍या संताला ॥८७॥ कथा नवमाध्यायाला । द्वाड घोडा शांत केला । खूण नवस करणाराला । दिली असे गांजाची ॥८८॥ दासनवमीचे उत्सवासी । समर्थ बाळापुरासी । घेऊन आपल्या शिष्यांसी । बाळकृष्णाच्या घरां गेले ॥८९॥ बाळकृष्णालागून । करविलें समर्थांचें दर्शन । संशयरहित केलें मन । तया रामदास्याचें ॥९०॥ दशमाध्यायीं सुरेख । उमरावतीचें कथानक । उपरति झाली पुरी देख । तेथें बाळाभाऊला ॥९१॥ गणेश आप्पा चंद्राबाई । यांनीं अर्पिला संसार पायीं । भावभक्तीनें लवलाही । श्रीगजाननस्वामींच्या ॥९२॥ गणेश दादा खापर्ड्याला । शुभ आशीर्वाद दिधला । छत्रीनें मारुन बाळाला । परीक्षा त्याची घेतली ॥९३॥ द्वाड गाय सुकलालाची । अति गरीब केली साची । दांभिक भक्ति घुड्याची । कशी ती कथन केली ॥९४॥ एकादशाध्यायीं कथन । भास्करासी डसला श्वान । आले त्र्यंबकेश्वरीं जाऊन । गोपाळदासा भेटले ॥९५॥ झ्यामसिंगाच्या विनंतीसी । देऊन मान अडगांवासी । येते झाले पुण्यराशी । श्रीगजाननमहाराज ॥९६॥ निजधामा भास्कर गेला । त्याचा देह ठेविला । द्वारकेश्वरा सन्निध भला । सतीबाईंचे शेजारीं ॥९७॥ आज्ञा केली कावळ्यांला । तुम्ही न यावें या स्थला । वांचविलें गणु जवर्‍याला । सुरुंग उडतां विहिरींत ॥९८॥ शेट बचुलालाची । कथा द्वादशाध्यायीं साची । मूर्ति निरिच्छपणाची । प्रत्यक्ष होते महाराज ॥९९॥ स्वामींचें वस्त्र नेसला । पितांबर शिंपी कोंडोलीला । स्वइच्छेने येता झाला । परमभक्त होता जो ॥१००॥ पितांबरानें कोंडोलीसी । बळिरामाच्या शेतासी । वठलेलिया आंब्यासी । पानें फळें आणविली ॥१०१॥ पितांबर राहिला कोंडोलींत । तेथेंच झाला समाधिस्थ । नव मठ झाला स्थापित । शेगांवीं समर्थ इच्छेनें ॥१०२॥ विचार करुनी मानसीं । बसून रेतीच्या गाडीसी । महाराज नव्या मठासी । आले जुन्या मठांतून ॥१०३॥ झ्यामसिंगानें मुंडगांवाला । नेलें गजाननस्वामीला । पर्जन्यानें घोटाळा । भंडार्‍याचा केला असे ॥१०४॥ झ्यामसिंगानें आपुली । इस्टेट समर्था अर्पिली । पुंडलीकाची निमाली । गाठ प्लेगाची श्रीकृपें ॥१०५॥ कथाभाग तेराव्याचा । महारोग गोसाव्याचा । हरण गंगाभारतीचा । केला असें गजाननें ॥१०६॥ बंडुतात्यासी भाग्य आलें । भूमींत धन सांपडलें । कर्जापासून मुक्त केलें । समर्थानें निजकृपें ॥१०७॥ नर्मदेच्या स्नानास । सोमवती अमावास्यास । नौका फुटतां छिद्रास । हात लाविला नर्मदेनीं ॥१०८॥ विडा माधवनाथाला । शिष्याहातीं पाठविला । या कथा चवदाव्याला । वर्णिल्या असती साकल्यें ॥१०९॥ अध्याय तो पंधरावा । शिवजयंतीचा आहे बरवा । आले अकोलें नामक गांवा । टिळक बाळ गंगाधर ॥११०॥ भाकरी प्रसाद पाठविला । कोल्हटकराचे हस्तें भला । मुंबईंत लोकमान्याला । ग्रहण कराया कारणें ॥१११॥ श्रीधर गोविंद काळ्यास । करिते झालें उपदेश । नको जाऊं विलायतेस । येथेंच आहे सर्व कांहीं ॥११२॥ कथा ऐशा सोळाव्यासी । पुंडलीक अंजनगांवासी । जातां निवारिले त्यासी । येऊनिया स्वप्नांत ॥११३॥ पादुकांचा प्रसाद त्याला । झ्यामसिंगहस्तें पाठविला । कवराच्या भाजीभाकरीला । ग्रहण केलें आनंदें ॥११४॥ छरा तुकारामाचा । कानामधून पडला साचा । ह्या अशा कथांचा । समावेश सोळाव्यांत ॥११५॥ सतराव्यांत कथा सुरस । विष्णूसाच्या घरास । जाया मलकापुरास । समर्थ निघाले गाडींतून ॥११६॥ नग्न फिरती म्हणूनी । खटला भरला पोलिसांनीं । केवळ अहंपणानीं । सत्पुरुषासी त्रास द्याया ॥११७॥ महेताबशा सांईला । पाठवून दिलें पंजाबाला । हिंदुयवनांविषयीं केला । कळकळीचा बोध त्यासी ॥११८॥ बापुरावाच्या कांतेसी । भानामती न मानी साची । भेट गंगाभागीरथीसी । झाली अकोटीं विहिरींत ॥११९॥ कथा बायजा माळणीची । अठराव्यामाजीं साची । कवर डॉक्‍टरच्या फोडाची । कथा यांत ग्रंथित असे ॥१२०॥ महाराज गेले पंढरीला । घेऊन अवघ्यां लोकांला । तेथें बापुना काळ्याला । दर्शन हरीचें करविलें ॥१२१॥ कवठे बहादुरचा वारकरी । मरीनें झाला आजारी । त्यास घटकेमाझारीं । समर्थानें बरें केलें ॥१२२॥ एक्या कर्मठ ब्राह्मणाला । श्वान उठवून मेलेला । दावून त्याचा गलित केला । कर्माभिमान श्रोते हो ॥१२३॥ कथा एकोणविसाव्यासी । दिला काशीनाथपंतासी । आशीर्वाद तो अतिहर्षी । तो येतां दर्शना ॥१२४॥ गोपाळ मुकिंद बुटी भला । नागपुरासी घेऊन गेला । श्रीगजाननस्वामीला । आपुल्या गेहाकारणें ॥१२५॥ त्याच्या मनीं ऐसा हेत । महाराज ठेवावें नागपुरांत । परी हरि पाटलांनीं परत । आणिले समर्थ शेगांवीं ॥१२६॥ धार कल्याणचे रंगनाथ । साधु आले भेटण्याप्रत । समर्थांसी शेगांवांत । ऐसे आणि कितीतरी ॥१२७॥ श्रीवासुदेवानंद सरस्वती । जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ति । दृष्टादृष्ट होतां नुसती । आनंद झाला उभयतांतें ॥१२८॥ तेव्हां बाळाभाऊला । जो कां होता संशय आला । तो समर्थांनीं निवटिला । करुनिया उपदेश ॥१२९॥ साळुबाई भक्तीण मठांत । आहे अजूनपर्यंत । घेऊनी डाळ पीठ । स्वयंपाक करी अहोरात्र ॥१३०॥ प्रल्हादबुवा जोशाला । होता कृपेचा योग आला । तो न तया फलद झाला । तयाचिया दुर्दैवें ॥१३१॥ शेवटीं समर्थांचेपाशीं । आत्माराम राहिला आदरेंसी । जलंब गांवचा रहिवासी । प्रत्यहीं सेवेकारण ॥१३२॥ स्वामी दत्तात्रय केदार । दुसरा नारायण जामकर । दुधाहारी बुवा - दुधाचा ज्यांचा आहार । तिघेजण स्वामीचे भक्त निर्वाण ॥१३३॥ केलें खळ्याचें संरक्षण । गाढवांचेपासून । समर्था मारितां आलें मरण । नारायणासी बाळापुरी ॥१३४॥ गजाननाचें कृपे भलें । जाखड्याचें लग्न झालें । कपीलधारेसी दिधलें । दर्शन निमोणकराला ॥१३५॥ तुकारामें आपुला । पुत्र समर्था वाहिला । नारायण नामें भला । सेवा करावयाकारणें ॥१३६॥ पंढरीतें जाऊन । विठ्ठलातें विचारुन । महाराज आले परतून । शेगांवाकारणें ॥१३७॥ पुढें भाद्रपदमासासी । ऋषिपंचमीच्या पुण्य दिवशीं । आधुनिक कालाचा हा ऋषि । समाधिस्थ जहाला ॥१३८॥ विसाव्यामाजीं इतर । श्रींची समाधि झाल्यावर । जे का घडले चमत्कार । त्यांचें वर्णन केलें असे ॥१३९॥ गणपतराव कोठाड्याने । पूजन केलें आनंदानें । दसर्‍याच्या त्या मुहूर्तानें । अभिषेक करून समाधीस ॥१४०लक्ष्मण हरी जांजळासी । अवधूत जयराम खेडकरासी । भेटते झाले पुण्यराशी । संन्याशाच्या वेषानें ॥ १४१संत असामान्य गजानन । ब्रह्मवेत्ता करूणाघन । महापुरामाजीं केलें रक्षण । निजभक्त माधव जोश्याचे ॥१४२यादव गणेश सुभेदारासी । भेटलें भिक्षेकरीरूपें वर्ध्यासी । फायदा झाला त्यास व्यापारासी । श्रीगजानन योगीराजकृपेनें ॥१४३व्यतिपातीं न जाऊं दिलें । शेगांवासी परत आणिले । प्रसाद ग्रहण करण्यासी भलें । भाऊ राजाराम कवराला ॥ १४४रतनसाच्या बालकाला । सोबणीचा रोग झाला । परी तो आरोग्यवंत झाला । समर्थकृपा झाल्यावर ॥१४५॥ कन्या रामचंद्र पाटलाची । चंद्रभागा नांवाची । व्याधिमुक्त झाली साची । हें महत्त्व श्रींच्या तीर्थअंगार्‍याचें ॥१४६॥ तैसेचि रामचंद्राची अंगना । जानकाबाई सुलक्षणा । वातविकार जाऊनियां । निर्दोष ती जाहली ॥१४७॥ राजा नामें पुत्र दादा कोल्हटकराचा । आहे प्रसाद समर्थांचा । श्रीगजाननलीलांचा पार न लागायाचा । संतकृपा अमोल असें खरी ॥१४८॥ जे जे भाविक भक्त कोणी । त्यांना त्यांना अजुनी । दर्शन देती कैवल्यदानी । त्यांच्या इच्छा पुरवून ॥१४९॥ वर्गणीच्या जोरें भलें । समाधीचें काम झालें । मनापासून भक्त झटले । वर्गणी गोळा कराया ॥१५०॥ असंख्य दानशूरांनीं । मोठमोठया रकमा देऊनि । केली मठाची उभारणी । भक्तिस्तव समर्थांच्या ॥१५१धर्मकृत्यें किती तरी । झालीं समर्थांसमोरी । खरे खरेच साक्षात्कारी । श्रीगजाननमहाराज ॥१५२माझा स्वामी गजानन । येऊं न देई कदा विघ्न । भक्तांचें करण्या संरक्षण । मुळींच बसला येथें तो ॥१५३॥ तरी अवघ्या जनांनीं । श्रीगजाननाच्या चरणीं । पूर्ववत् निष्ठा ठेवूनी । सुखालागीं अनुभवावें ॥१५४॥ एकदां तरी वर्षांतून । घ्यावें गजाननाचें दर्शन । एकदां तरी पारायण । करा गजाननचरित्राचें ॥१५५॥ श्रीगजाननस्वामी-चरित । जो नियमें वाचील सत्य । त्याचे पुरतील मनोरथ । गजाननकृपेनें ॥१५६॥ जो या ग्रंथीं ठेवील भाव । त्यासी पावेल स्वामीराव । संकटीं त्याच्या घेईल धांव । रक्षण त्याचें करावया ॥१५७॥ हा ग्रंथ केवळ चिंतामणी । चिंतिलें फळ देईल जाणी । दृढतर विश्वास असल्या मनीं । हें मात्र विसरुं नका ॥१५८॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । नौका होवो भाविकांप्रत । भवसिंधु तरावया ॥१५९॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति एकविंशोऽध्यायः समाप्तः ॥
॥ पुंडलीक वरदा हरिविठ्ठल ॥
॥ सीताकांतस्मरण जयजय राम ॥
॥ पार्वतीपते हरहर महादेव ॥
॥समाप्त॥

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय २०


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय असो समाधिस्थ झाल्यावर । श्रीगजानन साधुवर । म्हणूं लागले नारीनर । आतां काय ह्या शेगांवीं ॥१॥ आतां खेपा शेगांवांत । करणें आहे कीं निमित्त ? । देव नसतां देव्हार्‍यांत । माळा बांधणें व्यर्थची ॥२॥ ऐसें कित्येक बोलती । परी ती असे साच भ्रांती । महाराजांची दिव्य ज्योति । अदृश्य आहे तेच ठायां ॥३॥ जेवीं इंद्रायणीचे तीरीं । ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी । ते आहेत भेटले परी । तेंच ठायीं भाविकां ॥४॥ तैशीच शेगांवांत । श्रीगजाननस्वामी समर्थ । ऐसा जयांचा सिद्धांत । दर्शन त्यांना तेथ होतें ॥५॥ ते विषयींची एक कथा । सांगतों मी येथ आतां । गणपत कोठाडे नामे होता । एक भाविक गृहस्थ ॥६॥ अस्तमानीं प्रति दिवशीं । यावें त्यानें मठासी । बैसोनियां समाधीपासीं । स्तवन करावें एकनिष्ठें ॥७॥ एकदां ऐसें वाटलें त्यास । अभिषेक करून समाधीस । उद्यांच्या विजयादशमीस । ब्राह्मणभोजन घालावें ॥८॥ केली सर्व तयारी । अभिषेकाची साजिरी । शिधा मठाभीतरीं । धाडिला मोठ्या प्रमाणांत ॥९॥ तैं कांता म्हणे हो प्राणनाथा ! । हें तुम्ही काय करितां । हाड नाहीं तुमच्या हातां । खर्च करण्याच्या बाबतींत ॥१०॥ उद्यां आहे विजयादशमी । म्हणून पोरांबाळांसी । कपडे अलंकार अंगासी । करून घाला कांही तरी ॥११॥ हें कांतेचें भाषण । गणपतरावा न रुचलें जाण । तो म्हणे प्रपंचाहून । श्रेष्ठ परमार्थ वाटे मला ॥१२॥ तोच त्याच्या कांतेसी । स्वप्न पडलें रात्रीसी । उगे न छळी पतीसी । तो करतो तें करूं दे ॥१३॥ अभिषेक ब्राह्मणभोजन । हें पारमार्थिक आहे पुण्य । त्याच्यासाठीं वेंचितां धन । तें न जाय अनाठायीं ॥१४॥ पेरलेल्या बीजापरी । त्याची स्थिती होते खरी । म्हणून सांगतों तुला पोरी । अडथळा त्या करूं नको ॥१५॥ ऐशा पाहून स्वप्नास । सांगती झाली पतीस । तेणें गणपतरावास । हर्ष झाला विबुध हो ॥१६॥ आले का हें प्रत्यंतर । महाराज येथेंच साचार । सोडून द्यावा कुविचार । आजपासून कांहीं तरी ॥१७॥ असो गणपतरावानें । पूजन केलें आनंदानें । त्या दसर्‍याच्या मुहूर्तानें । खर्चही केला अत्युतम ॥१८॥ या गणपतरावाची । निष्ठा समर्थपदीं साची । जडली शुद्ध स्वरूपाची । होती पहिल्यापासून ॥१९॥ लक्ष्मण हरी जांजळाला । ऐसाच अनुभव एक वेळां । बोरीबंदरावरी आला । तो ऐका सांगतों ॥२०॥ कांहीं कामानिमित्त । लक्ष्मण गेला मुंबईत । हा समर्थांचा होता भक्त । पहिल्यापासून विबुध हो ॥२१॥ असो बोरीबंदरावरी । लक्ष्मण आला जाया घरीं । तों आगगाडीच्या धक्क्यावरीं । एक भेटला परमहंस ॥२२॥ आजानुबाहु उंच बांधा । दृष्टि नासाग्रासी सदा । ओंकाराचा सर्वदा । जप चालला त्याच्या मुखीं ॥२३॥ तो बोलला लक्ष्मणास । तूं गजाननाचा आहेस शिष्य । ऐसें असून हताश । कां होतोस कळेना ? ॥२४॥ तूं आपुल्या जेव्हां घरीं । पुण्यतिथि केलीस खरी । चारशें पानांची तयारी । करून अमरावतीला ॥२५॥ पुत्रशोक बापटासी । झाला असून प्रसादासीं । तो तुझ्या गेहासी । आला होता ना सांग तें ॥२६॥ पेठकराचे ब्राह्मण भले । सांग कशानें राहिले ? । अरे गजाननस्वामी गेले । त्या उभयतांच्या स्वप्नांत ॥२७॥ उपदेश करून दोघांस । आणिले होतें प्रसादास । हें कैसें विसरलास ? । सांग मला ये वेळीं ॥२८॥ खुणेच्या गोष्टी ऐकून । साशंक झाला लक्ष्मण । म्हणे हा असावा कोण । हें कांहीं कळत नसे ॥२९॥ लक्ष्मणें त्या संन्याशाला । आदरें नमस्कार केला । तो पाहातां पाहातां गुप्त झाला । बोरीबंदर स्टेशनासी ॥३०॥ मग लक्ष्मण येऊन घरीं । वागूं लागला पहिल्यापरी । प्रतिवर्षी आपुल्या घरीं । पुण्यतिथीचा प्रारंभ केला ॥३१॥ अवधूत जयराम खेडकरासी । राहीत साहीत गांवांसी । भेटते झाले पुण्यराशी । संन्याशाच्या वेषानें ॥३२॥ एक माधव मार्तंड जोशी । होता रेव्हेन्यु ऑफिसर । त्याचा गजानन साधुवर । पूर्ण होता भरवंसा ॥३३॥ कळंबासी दिवसभर मोजणी केली । पुढें त्यास इच्छा झाली । अस्तमानाचे समयां भली । शेगांवास जाण्याची ॥३४॥ आज गुरुवारचा आहे दिन । घेऊं समर्थांचें दर्शन । ऐसा विचार करून । आज्ञा केली शिपायाला ॥३५॥ जोड आपुली वेगें दमणी । जाऊं शेगांवालागूनी । रात्र तेथें काढूनी । येऊं सकाळीं परत पुन्हां ॥३६॥ तईं तो शिपाई कुतुबुद्दीन । बोलला कर जोडून । आभाळ आलें भरून । याचा विचार करावा ॥३७॥ जोशी म्हणाले त्यावर । अरे आतां होऊं नदीपार । जा दमणी करी तयार । उगीच सबबी सांगूं नको ॥३८॥ शिपायानें जोडिली दमणी । आला लगेंच घेऊनी । जोशी आंत बैसोनी । जाऊं लागले शेगांवा ॥३९॥ दमणी घातली नदींत । तों पाणी आलें अकस्मात । जाण्या बैल तटाप्रत । अवसर नाहीं राहिला ॥४०॥ झंझावात बळावला । कडकडाट करी चपला । मन नदीला पूर आला । क्षणामाजीं भयंकर ॥४१॥ शिपाई म्हणे कुतुबुद्दीन । साहेब येथेंच आलें मरण । तुम्हां आम्हांलागून । उपाय यासी आतां नसे ॥४२॥ तईं माधव मार्तंड जोशी । घाबरे झाले निजमानसीं । बाहूं लागले समर्थांसी । करुणायुक्त वचानें ॥४३॥ हे समर्थ गजानना । रक्षणा आमुच्या करी प्राणां । अशा संकटीं तुझ्याविणा । त्राता न कोणी आम्हांतें ॥४४॥ जोशी म्हणाले समर्था । अगाध आहे तुझी सत्ता । वाटेल तें करी आतां । तारी अथवा मारी आम्हां ॥४५॥ तो ऐशा महापुरांतूनी । पैल तटा पावली दमणी । उभी राहिली येऊनी । सडकेवरी शेगांवाच्या ॥४६॥ ऐसा प्रकार पाहतां । आनंदले उभयतां । पाहा केवढीं अगाध सत्ता । आहे अवलीया बाबांची ॥४७॥ पुरामाजीं रक्षण केलें । निज भक्तां ना बुडूं दिलें । जोशी शेगांवाप्रती आले । एक घटका रात्रीस ॥४८॥ वंदन केलें समाधीला । पालखीचा पाहिला सोहळा । दुसरे दिवशीं बहुत केला । दानधर्म जोशांनीं ॥४९॥ साकल्य कथिलें वर्तमान । केली विनंती बाळाभाऊलागुन । हे नवसाचे ब्राह्मण । तुम्ही घाला माझ्यास्तव ॥५०॥ एक यादव गणेश सुभेदार । होता हिंगणीचा राहाणार । हा करीतसे व्यापार । वर्‍हाडांत कापसाचा ॥५१॥ यांस एके सालीं भला । दहा हजार तोटा आला । त्या चिंतेनें क्षीण झाला । कांहीं न सुचे मानसीं ॥५२॥ हा एकदां वर्ध्यांत । आला कांहीं कामानिमित्त । उतरण्या गेला घरांत । विनायक असिरकराच्या ॥५३॥ तों इतक्यात तेथें आला । एक भिकारी बुध हो भला । भिक्षां कांहीं मागण्याला । असिरकराच्या घरांत ॥५४॥ पोषाख अवघा मराठी । करामाजीं भव्य काठी । डोईस होती टोपी मोठी । बनातीची मळकट ॥५५॥ कंपवायुनें शरीर । कांपत होतें वरच्यावर । त्यास पाहातां असिरकर । चित्तीं परम कोपले ॥५६॥ जा बेट्या मागल्या द्वारीं । तेथें मिळेल भिक्षा खरी । नको चढूंस पायरी । ओसरीची ये वेळां ॥५७॥ परी हे बोल त्याचे । भिक्षेकरी न मानी साचे । येऊनी वरती ओसरीचे । यादवासन्निध बैसला ॥५८॥ घाल भिक्षा कांहीं तरी । असें म्हणून पुढें करी । भिक्षापात्र भिकारी । यादव सुभेदाराच्या ॥५९॥ त्यातें पाहातां न्याहाळून । तईं तो भासला गजानन । सुभेदाराकारण । शेगांवचा राजयोगी ॥६०॥ तेज मुद्रा बोलणें । होतें समर्थाप्रमाणें । तें पाहून ऐसें म्हणे । सुभेदार निज चित्तीं ॥६१॥ कांहीं असो पैसे दोन । देऊं भिकार्‍याकारण । श्रीगजानन समजून । ऊहापोह ज्याचा नको ॥६२॥ पैसे घेतले भिकार्‍यानें । आणिक कांहीं देई म्हणे । श्रीगजाननाकारणें । शेरणी वाट गुळाची ॥६३॥ ते वायदे करिसी वरचेवर । ते मी न आतां मानणार । तोटा दहा हजार । तुज व्यापारीं आला ना ? ॥६४॥ पुन्हां रुपये काढिले । भिकार्‍यासी अर्पिले । तों इतुक्यांत घरांत गेले । विनायकराव असिरकर ॥६५॥ यादवराव एकटा बसला । होता असिरकराच्या ओसरीला । तें पाहून बोलला । सुभेदारासी येणें रीतीं ॥६६॥ तुझ्या अवघ्या अंगावर । दृष्टि पडूं देई एकवार । माझीं तेणें होईल दूर । व्याधि तुझी यादवा ॥६७॥ रुपये घेऊन भिक्षेकरी । गेला द्वाराच्या बाहेरी । यादवानें बहुतापरी । तपास केला गांवांत ॥६८॥ सुभेदार म्हणे मानसीं । हे समर्थ असल्या आज दिवशीं । फायदा होईल व्यापारासी । कांहींतरी निःसंशय ॥६९॥ तों सुभेदाराच्या । गाड्या आल्या कापसाच्या । विकावयासाठीं साच्या । वर्ध्याचिया बाजारीं ॥७०॥ विक्री होतां किंमत । येती झाली तया बहुत । तेणें यादव चित्तांत । समाधान पावला ॥७१॥ आणि निश्चय ऐसा केला । जो भिकारी भेटला । तो होता समर्थ भला । श्रीगजानन योगीराज ॥७२॥ समर्थ आपुल्या भक्तांसी । रक्षण करती अहर्निशीं । निष्ठा मात्र त्यांचेविषयीं । दृढतर पाहिजे मनांत ॥७३॥ भाऊ राजाराम कवर । खामगांवीं होता डॉक्टर । त्याची तेल्हार्‍यावर । बदली असे जाहली ॥७४॥ म्हणून तेथें जाण्याला । खामगांवाहून निघाला । सहकुटुंब मठांत आला । घ्याया श्रींचें दर्शन ॥७५॥ गाडी केली तेल्हार्‍याची । तयारी केली निघण्याची । वेळ अस्तमानाची । असती झाली ते वेळां ॥७६॥ बाळाभाऊ मठाधिपती । तो त्या बोलला येणें रीति । अहो ऐका माझी विनंती । प्रसाद घेऊन जावें तुम्हीं ? ॥७७॥ ह्यांतून आहे व्यतिपात । हें आणावें मनांत । कवर सांगें त्याप्रत । मला निकड आहे बहु ॥७८॥ बोलल्याप्रमाणें निघाला । तेल्हार्‍यासी डॉक्टर भला । घेऊन मुलांमाणसांला । दमणीमाजीं बसून ॥७९॥ तों चमत्कार ऐसा झाला । तेल्हार्‍याचा रस्ता चुकला । कोणी न भेटे पंथाला । विचारावें कोणा जरी ॥८०॥ गाडी अरुंद रस्त्यावर । दोही बांजूस कांटे फार । गाडी उभी कांठावर । एका भव्य तलावाच्या ॥८१॥ म्हणतां झाला गाडीवाला । साहेब रस्ता आहे चुकला । हें ऐकून कवराला । आश्चर्य वाटलें मानसीं ॥८२॥ तूं तेल्हार्‍याचा म्हणून । तुझी गाडी केली जाण । आडमार्गें आणून । आम्हां कैसें सोडिलें ? ॥८३॥ ऐसें कवर बोलतां । गाडीवाला जोडी हातां । कां हो मजला शिव्या देतां ? । म्यां न अपराध केला कीं ॥८४॥ बैलही ना कोठें वळले । तें नीट येथेंच आले । तलाव पाहातां स्तब्ध झाले । हा न रस्ता तेल्हार्‍याचा ॥८५॥ मग कवर समजला मनांत । हें समर्थाचें आहे कृत्य । प्रसाद घेतल्याविरहित । कां कीं मी निघालों ॥८६॥ बाळाभाऊच्या विनंतीला । मीं नाहीं मान दिला । म्हणून माझा रस्ता चुकला । आतां वाट गवसे कशी ? ॥८७॥ हें भयंकर कानन । येथें मशी त्राता कोण । गजानना ! तुजवांचून । रक्षण माझें कराया ॥८८॥ तों तळ्याच्या दुसर्‍या बाजूला । घांगरमाळांचा आवाज झाला । डॉक्टराच्या कानीं पडला । तेणें आला थोडा धीर ॥८९॥ गाडीवाल्यासी म्हणे कवर । रस्ता नाहीं फार दूर । या चाहुलीचा सुमार । धरून गाडी हाण आतां ॥९०॥ तों हें शेगांवचें शिवार । आहे समजलें साचार । मग म्हणाला डॉक्टर । चाल शेगांवीं परत आतां ॥९१॥ सूर्योदयाचे समायाला । शेगांवासी कवर आला । वृत्तांत बाळाभाऊला । केला सर्व निवेदन ॥९२॥ मग बाळाभाऊ म्हणाले । हेंच आज बरें झालें । व्यतिपातीं न जाऊं दिलें । समर्थांनीं तुम्हांस ॥९३॥ संतांच्या जे असेल मनीं । तेंच येईल घडोनी । भरंवसा त्यांचे चरणीं । ठेवून स्वस्थ असावें ॥९४॥ दुसरे दिवशीं प्रसादासी । घेऊन गेला तेल्हार्‍यासी । आतां पुढील गोष्टीसी । अवधान द्यावें श्रवणातें ॥९५॥ एक रतनसा नामें नर । होता जातीनें भावसार । तयाचा मुलगा दिनकर । होता एक वर्षाचा ॥९६॥ त्यासी सोबणीचा रोग झाला । कोणी म्हणती सटावला । बालक अवघा सुकून गेला । रक्त न राहिलें अंगांत ॥९७॥ वैद्य म्हणती रतनसासी । आतां औषध न देईं यासी । हा तुझ्या हातासी । लागणें आहे अशक्य ॥९८॥ ऐसें ऐकून रतनसा । रडूं लागला ढसढसां । शेवटीं विचार त्यानें ऐसा । केला आपुल्या मानसीं ॥९९॥ येवींतेवी मरतें पोर । माझें आतां साचार । पाहूं करून एकवार । उपाय हा शेवटचा ॥१००॥ हातपाय गार झाले । नेत्रतेज मंदावलें । मनगटाचें सोडिलें । ठिकाण पाहा नाड्यांनीं ॥१०१॥ ऐशा स्थितिमाझारी । रतनसानें पुत्र करीं । घेऊन ठेविला असें द्वारीं । नेऊनिया समर्थांच्या ॥१०२॥ आणि केला त्यांसी नवस । पुत्र माझा उठल्यास । शेरणी वांटीन तुम्हांस । मी पांच रुपयांची ॥१०३॥ तुम्ही पावले अवघ्यांला । त्याचा अनुभव द्यावा मला । मीही आहे आपुला । माझी उपेक्षा करूं नका ॥१०४॥ माझें मूल द्वारांत । तुझ्या जरी झालें मृत । तरी अवघ्या वर्‍हाडांत । तुझी होईल नाचक्की ॥१०५॥ अमृततुल्य तुझी दृष्टि । त्याची करावी आज वृष्टि । नको करूंस मला कष्टी । महापुरुषा गजानना ! ॥१०६॥ त्यास कांहीं वेळ झाला । तों प्रकार ऐसा घडून आला । मूल हातापायांला । हालवावया लागलें ॥१०७॥ नाडी आली ठिकाणीं । रुदन करूं लागलें जाणी । तों प्रकार पाहूनी । लोक सारे आनंदले ॥१०८॥ समर्थकृपा झाल्यावर । राहील कोठून त्या दर ? । सूर्याचिया समोर । तमाचा तो पाड नसे ॥१०९॥ दिनकर थोडे दिवसांत । होता झाला पूर्वतत । नवस असला श्रद्धायुक्त । तो फळे हा न्याय असे ॥११०॥ दादा कोल्हटकरांचा । पुत्र राजा नांवाचा । आहे प्रसाद समर्थांचा । संतकृपा अमोल खरी ॥१११॥ कन्या रामचंद्र पाटलाची । चंद्रभागा नांवाची । ज्वान अठरा वर्षांची । लाडेगांव सासर जिचें ॥११२॥ लाडेगांवाहून माहेरीं । चंद्रभागा आली खरी । प्रसूतीस्तव निर्धारी । जनरीतीप्रमाणें ॥११३॥ मोठ्या कष्टानें प्रसूती । झाली तिची निश्चिती । तोंच चंद्रभागेवरती । ज्वरें अंमल बसविला ॥११४॥ तो होतां नवज्वर । थकून गेले डॉक्टर । औषधउपचार केले फार । आपुल्या मुलीस पाटलांनीं ॥११५॥ थोडाबहुत गुण आला । व्याधि तितक्यापुरता दबला । परी नव्हता मुळींच झाला । नामशेष देहांतूनी ॥११६॥ चंद्रभागा आजारी । पडूं लागली वरच्यावरी । मग पाटलानें केला विचार अंतरी । आतां वैद्य गजानन ॥११७॥ तारो अथवा मारो इसी । अंगारा लावा प्रतिदिवसीं । तीर्थ द्यावें प्यावयासी । समर्थांच्या पायांचें ॥११८॥ पिता मोठा निष्ठावंत । समर्थांवरी अवघा हेत । हळुंहळूं त्या पोरीप्रत । गुण येता जाहला ॥११९॥ तिला उठवत नव्हतें शय्येसी । तीच आली दर्शनासी । पायीं चालत मठासी । हें महत्त्व अंगार्‍याचें ॥१२०॥ निष्ठावंत ज्याचा भाव । तयाशीं पावे देव । उपास्यापदीं भाव । उपासकें ठेवावा ॥१२१॥ रामचंद्राची अंगना । जानकाबाई सुलक्षणा । परी दैवयोग सुटेना । तो भोगल्यांवाचुनी ॥१२२॥ वाताचा झाला विकार । जानकाबाईस साचार । पोट दुखे वरच्यावर । कांहीं उपाय चालेना ॥१२३॥ औषध देतां दबे वात । पुनः उठे पूर्ववत । ऐसा क्रम दिवस बहुत । चालला होता श्रोते हो ॥१२४॥ औषध उपाय बहुत केले । जाणतेही आणविले । गंडे बहुत बांधिले । करीं जानकाबाईच्या ॥१२५॥ पाटील बिचारा सारें करी । कांता बरी न होय परी । विचार त्यानें अखेरीं । ऐशा रीतीं ठरविला ॥१२६॥ वैद्य आतां गजानन । जाणता आतां गजानन । देव ऋषि आतां गजानन । तो जें वाटेल तें करो ॥१२७॥ माझी बायको सून त्याची । ही भावना माझी साची । आतां अन्य उपायांची । गरज नाहीं आम्हांला ॥१२८॥ तूं उद्यांपासून । प्रातःकाळीं करी स्नान । मठामाजीं जाऊन । घाली प्रदक्षिणा समाधीसी ॥१२९॥ तें तिनें पतीचें वचन । सर्वथैव केलें मान्य । समर्थ समाधीलागून । घालूं लागली प्रदक्षिणा ॥१३०॥ गेल्या न त्या मात्र वायां । दया आली सद्‌गुरुराया । वातविकार जाऊनियां । निर्दोष ती जाहली ॥१३१॥ खर्‍या खर्‍या संतांची । सेवा न जाई वायां साची । परी निष्ठा मानवाची । जडणें तेथें अशक्य ॥१३२॥ समर्थांच्या नंतर । बाळाभाऊ गादीवर । बसले त्यांचे चमत्कार । कांहीं थोडे जाहले ॥१३३॥ हे वैशाख वद्य षष्ठीसी । शेगांवीं गेले वैकुंठासी । त्यांच्यामागून गादीसी । बसले येऊन नारायण ॥१३४॥ कांहीं दिवस यांनींही । अधिकार चालविला ते ठायीं । यांची समाधि झाली पाही । चैत्र शुद्ध षष्ठीला ॥१३५॥ पूर्वसुकृतावांचून । संतसेवा न घडे जाण । संतसेवेचें महत्पुण्य । त्या पुण्या पार नसे ॥१३६॥ श्रीगजाननलीलेचा । पार कधीं न लागायाचा । अंबरीच्या चांदण्यांचा । हिशेब कोणा न लागे कधीं ॥१३७॥ त्यानें जें जें वदविलें । तें तें मीं कथित केलें । लेखणीनें अक्षर लिहिलें । परी तें न तिचें सामर्थ्य ॥१३८॥ त्यांच्या कृपेंकरून । मीं हें केलें लेखन । येथें माझें मोठेपण । कांहींच नाहीं विबुध हो ! ॥१३९॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति विंशोऽध्यायः समाप्तः ॥