Feb 11, 2022

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय ८


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय असो मागील अध्यायीं । देशमुख पाटलाठायीं । मुक्कामातें दुफळीबाई । येऊन बैसली हें ऐकिलें ॥१॥ असो तळ्याचिया कांठावर । देशमुखांचा एक महार । करुं लागला चरचर । या खंडू पाटलापुढें ॥२॥ पाटील गांवीचा अधिकारी । पाटील गांवीची पांढरी । कांहीं कामावरुन खरी । कुरबुर झाली उभयतांत ॥३॥ तो असे मर्‍या महार । देशमुखांचा ज्याला जोर । तो बोलला उणें उत्तर । खंडू पाटलाकारणें ॥४॥ पाटील वदला त्यावरी । तुझी रीत ही नाहीं बरी । गरीबानें पायरी । आपली कधीं सोडूं नये ॥५॥ तरी महार ऐकेना । करुं लागला चेष्टा नाना । त्याच्या ऐकोनी भाषणा । पाटील खवळला मानसीं ॥६॥ बाचाबाचीचें कारण । होतें अति क्षुल्लक जाण । कागद ठाण्यालागून । पाठवणें होते पाटलाला ॥७॥ तो टप्पा न्यावयासी । सांगितले होते महारासी । कीं तूं असाच जा अकोल्यासी । तहशिलींत टप्पा द्याया हा ॥८॥ तें ऐकोनी वदला महार । मी न हा टप्पा नेणार । देशमुखाच्या आश्रितावर । तुमचा डोळा हमेशा ॥९॥ कांहीं असो आज दिनीं । मी टप्पा न जाय घेवोनी । तुझ्या हुकूमालागूनी । बोंबा शिमग्याच्या समजतों मी ॥१०॥ ऐसें वदनीं बोलला । हावभावही तैसा केला । मूठ वळुनि हात नेला । त्यानें आपल्या मुखापुढें ॥११॥ ती त्याची पाहूनि कृती । खंडू पाटील कोपला चित्तीं । भरीव वेळूची कांठी होती । पाटलाच्या हातांत ॥१२॥ पाटील मूळचा जोरदार । त्याच काठीचा रागें केला प्रहार । तेणें बेशुद्ध झाला महार । हात त्याचा गेला मोडूनी ॥१३॥ पाटील दुसर्‍या महाराला । गेले टप्पा द्यावयाला । तों इकडे वृत्तान्त कैसा झाला । तो आता सांगतों ॥१४॥ तो महार त्याच्या आप्तांनीं । नेला उचलून देशमुखसदनीं । मोडला हात हे पाहूनि । देशमुख ते संतोषले ॥१५॥ वा ! वा ! छान गोष्ट झाली । आपणां कुरापत काढण्या भली । ही अनायासें संधी आली । ती उपयोगी न दवडणें ॥१६॥ त्यांनीं त्या महारासी । तात्काळ नेलें कचेरीसी । समजाविलें अधिकार्‍यासी । खोटेंनाटें विबुध हो ॥१७॥ फिर्याद त्या महाराची । पुस्तकांत नोंदली साची । आज्ञा झाली अधिकार्‍याची । पाटील पकडून आणावया ॥१८॥ तें खंडू पाटला समजलें । धाबें त्याचें दणाणलें । तोंडचें पाणी पळालें । झाला अति चिंतातुर ॥१९॥ खंडू हताश होऊन बसला । तों एक विचार सुचला त्याला । श्रीगजानन महाराजांला । सांकडें हें घालावें ॥२०॥ त्या साधूचे वांचून । या संकटाचें निरसन । करणारा न कोणी आन । राहिला या वर्‍हाडीं ॥२१॥ लौकिकीं यत्‍न करण्याला । बंधू गेले अकोल्याला । खंडू पाटील नीट आला । समर्थांकडे रात्रीस ॥२२॥ येतांच केला नमस्कार । शिर ठेविलें पायांवर । महाराज आला कठीण फार । प्रसंग तो माझ्यावरी ॥२३॥ सरकारी कामानिमित्त । मी एका महाराप्रत । तळ्यापाशीं ताडिलें सत्य । करांतील काठीनें ॥२४॥ त्यानिमित्त कैद मला । होण्याचा उद्यां प्रसंग आला । समर्था माझ्या इज्जतीला । तुजवीण कोण रक्षील ? ॥२५॥ उद्यां येतील राजदूत । मला येथूनि नेण्याप्रत । बेडी ठोकोनि पायांत । ऐसें आज ऐकिलें ॥२६॥ ऐसें वदून समर्थाला । पाटील रडूं लागला । आसवांचा तो चालला । पूर नेत्रांवाटें हो ! ॥२७॥ इकडे समर्थांनीं भले । दोन्ही हातीं कवटाळीलें । खंडू पाटला हृदयीं धरिलें । त्याचें सांत्वन करावया ॥२८॥ अरे कामकर्त्या पुरुषाप्रत । ऐशीं संकटें येतात । वरच्यावरी जाण सत्य । त्याची चिंता वाहूं नको ॥२९॥ जा भिऊं नकोस तिळभर । बेडी न तुशीं पडणार । किती जरी केला जोर । देशमुखानें आपला ॥३०॥ तेंच पुढें खरें झालें । पाटील निर्दोषी म्हणून सुटले । जें कां संत मुखावाटें आलें । तें न खोटें होई कधीं ॥३१॥ पाटील मंडळी उत्तरोत्तर । भजूं लागली साचार । कोणा नाहीं आवडणार । अमृत तें सेवावया ॥३२॥ पुढें खंडू पाटलानें । करुन विनंति प्रेमानें । नेलें रहावयाकारणें । समर्थाला निजगृहीं ॥३३॥ असतां पाटील सदनांत । गजाननस्वामी समर्थ । ब्राह्मण आले अवचित । दहापांच तैलंगी ॥३४॥ तैलंगी विद्वान असती । कर्मठ वेदावरी प्रीती । परी धनाचा लोभ चित्तीं । राही ज्यांच्या विशेष ॥३५॥ तें कांहीं मिळेल म्हणून । समर्थांकडे आले जाण । तयी होते पांघरुण । घेऊन समर्थ निजलेलें ॥३६॥ त्यांना जागे करण्याप्रत । ब्राह्मण म्हणूं लागले मंत्र । जटेचे ते स्वरांसहित । अति उच्च स्वरानें ॥३७॥ मंत्र म्हणण्यांत चूक झाली । ती न त्यांनीं दुरुस्त केली । म्हणून आसनीं उठून बसली । गजाननाची स्वारी पहा ॥३८॥ आणि ऐसें वदले ब्राह्मणाला । तुम्ही कशासाठीं वैदिक झालां । हीनत्व वेदविद्येला । आणूं नका रे निरर्थक ॥३९॥ ही न विद्या पोटाची । मोक्षदात्री आहे साची । बा डोईस बांधल्या शालीची । किंमत कांहीं राखा हो ॥४०॥ मी म्हणतों ऐसें म्हणा । खरे स्वर मनीं आणा । उगीच भोळ्या भाविकांना । सोंग आणून नाडूं नका ॥४१॥ जी ऋचा ब्राह्मणांनीं । म्हणण्यां सुरुं केली जाणी । तोच अध्याय समर्थांनीं । धड धड म्हणून दाखविला ॥४२॥ चूक न कोठें म्हणण्यांत । शब्दोच्चार स्पष्ट सत्य । वाटे वसिष्ठ मूर्तिमंत । वेद म्हणण्या बसला असे ॥४३॥ तेलंगी तें ऐकून चकित झाले । अधोवदन बैसले । मुख वरी करण्या आपुलें । भय मनीं वाटलें त्यां ॥४४॥ विप्र म्हणती आपुल्या मनीं । हा पिसा कशाचा महाज्ञानी । चारी वेद याच्या वदनीं । नांदतात प्रत्यक्ष ॥४५॥ असो खंडू पाटलाकडून । त्या ब्राह्मणांलागून । देते झाले दयाघन । रुपया रुपया दक्षिणा ॥४६॥ ब्राह्मण संतुष्ट झाले । अन्य गांवा निघून गेले । महाराजही कंटाळले । उपाधिला गांवच्या ॥४७॥ गांवाचिया उत्तरेला । एक मळा सान्निध्याला । या मळ्यांत भाजीपाला । होत होता बहुवस ॥४८॥ एक शिवाचें मंदिर । तेथें होतें साचार । लिंबतरुंची थंडगार । छाया होती ते ठायीं ॥४९॥ हा कृष्णाजी पाटलाचा । मळा होता मालकीचा । हा कृष्णाजी खंडुजीचा । सगळ्यांत शेवटला भाऊ असे ॥५०॥ त्या मळ्यांत महाराज आले । शिवालयासन्निध बसले । एका ओटयावरी भले । निंबतरुच्या छायेंत ॥५१॥ समर्थ म्हणाले कृष्णाजीसी । मी आलों तुझ्या मळ्यासी । कांहीं दिवस रहावयासी । या श्रीशंकरासन्निध ॥५२॥ तें वाक्य ऐकिलें । सहा पत्रें आणविलें । ओट्यावरी छप्पर केलें । कृष्णाजीनें तात्काळ ॥५३॥ महाराजांचे बरोबर । होता पाटील भास्कर । सेवा करण्या निरंतर । दुसरा तुकाराम कोकाट्या ॥५४॥ खाण्यापिण्याची तरतूद सारी । निजांगें कृष्णाजी पाटील करी । समर्थ तें जेवल्यावरी । तो प्रसाद घेत असे ॥५५॥ असो गजानन असतां मळ्यांत । गोष्ट घडली अद्‌भुत । येते झाले फिरत फिरत । दहावीस गोसावी ते ठायां ॥५६॥ समर्थांचा बोलबाला । त्यांनीं आधींच होता ऐकिला । म्हणूनि त्यांनीं तळ दिला । येऊनि या मळ्यामध्यें ॥५७॥ गोसावी म्हणती पाटलासी । आम्ही आहों तीर्थवासी । जातों रामेश्वरासी । भागीरथीला घेऊन ॥५८॥ ब्रह्मगिरी गोसाव्याचे । आम्ही शिष्य आहो साचे । महाराजही आमुचे । आहेत सांप्रत बरोबर ॥५९॥ शिरापुरींचें अयाचित । आम्हां द्यावें तुम्हीं त्वरित । लागे जो ओढण्याप्रत । गांजा तोही पुरवावा ॥६०॥ आम्ही गोसावी वैराग्यभरित । जाणतों अवघा वेदांत । मर्जी असल्या मळ्यांत । या पोथी ऐकावया ॥६१॥ कृष्णाजी म्हणे त्यावरी । उद्यां घालीन शिरापुरी । आज आहेत भाकरी । त्याच जाव्या घेऊन ॥६२॥ जितुका गांजा ओढाल । तितुका तेथेच मिळेल । तेथें चालतां बोलतां कंठनीळ । बसला आहे पत्र्यामध्यें ॥६३॥ दोन प्रहराची वेळा खरी । घेतल्या चूण भाकरी । मळ्यांत येऊनि विहिरीवरी । बसलें गोसावी भोजना ॥६४॥ समर्थांच्या समोरी । एका छपराभीतरी । गोसाव्यांनी लाविली खरी । आपआपली कडासनें ॥६५॥ त्यांचा जो होता महंत । ब्रह्मगिरी नामें सत्य । तो भगवद्‌गीतेप्रत । वाचूं लागला अस्तमानी ॥६६॥ गोसावी श्रवणा बैसले । गांवांतूनही कांहीं आले । पोथी ऐकावया भले । त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची ॥६७॥ "नैनं छिन्दन्ति" हा श्लोक । निरुपणाचा होता देख । ब्रह्मगिरी पक्का दांभिक । स्वानुभवाचा लेश नसे ॥६८॥ सारे पोथी ऐकिल्यावरी । येऊन बसले पत्र्याभीतरीं । गजाननाच्या समोरी । संतदर्शन घ्यावया ॥६९॥ लोक म्हणती छपराला । निरुपणाचा भाग झाला । येथें पत्र्यास बैसला । स्वानुभवाचा पुरुष हा ॥७०॥ तेथें ऐकला इतिहास । येथें पाहिला प्रत्यक्ष पुरुष । या भाषणें गोसाव्यास । राग आला कांहींसा ॥७१॥ अवघे गोसावी गांजा प्याया । बसले होते घेऊनिया । त्या पत्र्याचिया ठायां । चालली चिलीम गांजाची ॥७२॥ पत्र्यांत पलंगाच्या वरी । बसली होती समर्थस्वारी । चिलीम भरुन वरच्यावरी । प्याया देई भास्कर ॥७३॥ त्या चिलिमीच्या विस्तवाची । ठिणगी पलंगीं पडली साची । ती पडतांना कोणाची । दृष्टि न गेली तिच्यावर ॥७४॥ कांहीं वेळ गेल्यावर । निघूं लागला धूर । पलंग पेटला अखेर । एकदम चहूं बाजूंनीं ॥७५॥ तो प्रकार पाहतां । भास्कर बोले सद्‌गुरुनाथा । पलंग सोडा शीघ्र आतां । या खालीं उतरुन ॥७६॥ तयीं समर्थ बोलले वाचें । भास्करा अग्नि विझविण्याचें । कारण नाहीं तुला साचें । जल मुळींच आणूं नको ॥७७॥ अहो महाराज ब्रह्मगिरी । या बैसा पलंगावरी । तुम्हां आहे अवगत खरी । भगवद्‌गीता साकल्यें ॥७८॥ त्याच्या परीक्षेची वेळ । आणिली हरीनें तात्काळ । ब्रह्मा न जाळी अनळ । याचा प्रत्यय दाखवा ॥७९॥ "नैनं छिन्दन्ति" श्लोकावर । व्याख्यान केलें एक प्रहर । आतां कां मानितां दर । या पलंगीं बसण्याचा ? ॥८०॥ पलंग पेटला चौफेर । ज्वाळा निघूं लागल्या थोर । परी महाराज आसनीं स्थिर । हलले मुळीं न इतकेंही ॥८१॥ जा जा भास्करा लौकरी । ब्रह्मगिरीला करीं धरी । आणून बसवी अत्यादरीं । या जळत्या पलंगास ॥८२॥ ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशीं । मला न न्या पलंगापाशीं । महाराजांच्या अधिकाराशीं । मीं नाहीं जाणितलें ॥८३॥ तें न मानी भास्कर । ओढीत आणिला फरफर । उभा केला समोर । आपल्या सद्‌गुरुरायांच्या ॥८४॥ गोसावी म्हणे भीत भीत । मी पोटभर्‍या आहे संत । शिरापुरी खाण्याप्रत । मी झालों गोसावी ॥८५॥ तुला पिसा मी म्हणालों । आतां पस्तावा पावलों । मी दांतीं तृण धरुन आलों । शरण तुला ! अभय दे ॥८६॥ शेगांवच्या जनांनीं । केली समर्था विनवणी । आपणा अग्नीपासूनी । भय नाहीं हें खरें ॥८७॥ तरी महाराज आमच्यासाठीं । उतरा खालीं ज्ञानजेठी । गोसावी झाला हिंपुटी । तो न कांहीं बोलला ॥८८॥ लोक विनंतीस द्याया मान । खालीं उतरले गजानन । तो पलंग पडला कोसळून । एक पळही न लागलें त्या ॥८९॥ अवघाच होता जळला । जो भाग शेष उरला । तो लोकांनीं विझविला । साक्ष दावण्या इतरांसी ॥९०॥ ब्रह्मगिरी पायीं लागला । निरभिमान अवघा झाला । स्पर्श होता गंगाजला । मल कोठूनी राही तेथ ? ॥९१॥ मग मध्यरात्रीच्या समयाला । ब्रह्मगिरीस बोध केला । आजपासून चेष्टेला । तूं या सोडून देईं रे ॥९२॥ ज्यांनीं राख लावावी । त्यांनीं उपाधी दूर ठेवावी । अनुभवावीण न सांगावी । गोष्ट कोणा निरर्थक ॥९३॥ उगीच खाया शिरापुरी । भटकूं नको भूमीवरी । सार न तया माझारीं । येतुलेंही गवसणार ॥९४॥ ऐसा बोध ऐकिला । ब्रह्मगिरी विरक्त झाला । प्रातःकाळींच उठोन गेला । कोणा न भेटतां शिष्यांसह ॥९५॥  शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥इति अष्टमो‍ऽध्यायः समाप्तः ॥

No comments:

Post a Comment