Feb 11, 2022

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय १०


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय असो एकदां पुण्यराशी । गेले उमरावतीसी । जाऊन उतरले सदनासी । आत्माराम भिकाजीच्या ॥१॥ हा आत्माराम भिकाजीसुत । उमरावतीचा असे प्रांत । मोठा अधिकार हातांत । होता त्याच्या विबुध हो ॥२॥ त्याच्या घरीं समर्थ गेले । ते त्यानें सांग पूजिलें । मंगलस्नान घातलें । उष्णोदकानें गजानना ॥३॥ उटणीं नाना प्रकारचीं । अंगा लाविलीं साचीं । वृत्ति आनंदली त्याची । संतसहवासें तेधवां ॥४॥ कर्वतीकांठी उमरेडचा । धोतरजोडा नेसविला साचा । भालीं केशरी गंधाचा । भव्य तिलक लाविलासे ॥५॥ कंठामाजीं पुष्पहार । नैवेद्याचे नाना प्रकार । दक्षिणेसी शंभर । रुपये त्यानें ठेविले ॥६॥ धूप, दीप आरती झाली । पुष्पांजली समर्पिली । दर्शनालागी दाटी झाली । उमरावतीच्या लोकांची ॥७॥ प्रत्येका ऐसें वाटावें । समर्थ आपल्या घरीं न्यावें । यथासांग करावें । पूजन त्यांचें येणें रितीं ॥८॥ इच्छा ऐसी बहुतां झाली । परी थोडक्यांची मनीषा पुरली । सदनीं पाऊलें लागण्या भलीं । पुण्य पाहिजे बलवत्तर ॥९॥ गणेश श्रीकृष्ण खापर्डे । उमरावतीचे गृहस्थ भाविक बडे । वकीलींत ज्यांच्यापुढें । ढीग रुपयांचे पडती कीं ॥१०॥ त्यानें विनंति करितां खरी । महाराज गेले त्याच्या घरीं । तेथें ही झाली याचपरी । समर्थांची पूजा हो ! ॥११॥ गणेश आप्पा म्हणूनी । होता लिंगायत वाणी । चंद्राबाई कामिनी । त्याची परम भाविक असे ॥१२॥ ती बोलली पतीला । हा साधु पाहिजे नेला । कसेंही करुन घराला । पाहा विनंती करुन ॥१३॥ परि आप्पा बोलेना । छाती त्याची होईना । बोलवावयासी निजसदना । श्रीगजानन साधुते ॥१४॥ महाराज वदले अखेर । गणेश आप्पाचा धरुन कर । तुझें किती आहे सदन दूर । तेवढें सांग मला ? ॥१५॥  ऐसें महाराज बोलतां । गणेश आप्पाचिया चित्ता । हर्ष झाला तत्त्वतां । तो न शब्दें बोलवें ॥१६॥ समर्थांस नेऊन सदनीं । पूजा केली उभयतांनीं । आपुला संसार त्यांचे चरणीं । अर्पण केला तात्काळ ॥१७॥ असो ऐशा पूजा अमित । झाल्या उमरावतीत । त्या प्रत्येक पूजेप्रत । एक गृहस्थ हजर असे ॥१८॥ तो आत्माराम भिकाजीचा । नात्यानें हा होता भाचा । राहणार मुंबई शहरींचा । तारमास्तर असे कीं ॥१९॥ तो रजा घेऊन भला । उमरावतीस होता आला । भेटण्या आपुल्या मामाला । बाळाभाऊ नाम ज्याचें ॥२०॥ त्या बाळाभाऊकारण । समर्थांचें लागलें ध्यान । म्हणे ऐशा साधूचे चरण । सोडून कुठें जाऊं नये ॥२१॥ असो कांहीं दिवसांनीं । शेगांवीं आले परतोनी । मळ्यासी न जातां जाणी । आले मंदिरीं मोट्याच्या ॥२२॥ त्या मंदिराच्या पूर्वेस । एक जागा होती ओस । गजानन पुण्य पुरुष । येऊन बसला ते ठायां ॥२३॥ बातमी महाराज आल्याची । कृष्णा पाटला कळली साची । त्यांनीं जागा मळ्याची । सोडली हें समजलें ॥२४॥ म्हणून आला धांवत । त्या ओस जागेवरी सत्य । महाराजा करुन दंडवत । अधोवदन बैसला ॥२५॥ पाटील बोले त्यावर । जोडोन आपले दोन्ही कर । महाराज मळ्याचा अव्हेर । कां हो आज केलांत हा ? ॥२६॥ ही देशमुखाच्या बाजूची । जागा आहे बघा साची । एका माळ्याच्या मालकीची । येथें तुम्ही राहूं नका ॥२७॥ मळ्यांत मर्जी नसेल जरी । तरी चला राहात्या घरीं । तें खालीं करितों सत्वरीं । तुम्हांसाठीं दयाळा ॥२८॥ पाटील बंधू धांवून आले । महाराजा विनवूं लागले । निजसदना या या भले । हरी आणि नारायण ॥२९॥ महाराज बोलले तयासी । मी जो या जागेसी । येऊन बसलों आज दिवशीं । तें तुमच्या हितास्तव ॥३०॥ सखाराम देईल जागा । पुढचें करुं आपण बघा । म्हणजे अवघ्यांस यांत भागा । घेतां येईल सहजची ॥३१॥ समेट अवघ्यांचा होऊनी । मठ बांधिला त्या ठिकाणीं । परशराम सावजींनीं । मेहेनत घेतली विशेष ॥३२॥ समर्थांच्या बरोबर । निस्सीम भक्त होते चार । भास्कर, बाळाभाऊ, पितांबर । उमरावतीचा गणेश आप्पा ॥३३॥ रामचंद्र गुरव त्याचपरी । राहात होता बरोबरी । हे पांच पांडव, श्रीहरी । गजानन शोभूं लागले ॥३४॥ वृत्ति बाळाभाऊची । अतिविरक्त झाली साची । पर्वा न त्यानें नौकरीची । केली यत्किंचित्‌ आपुल्या ॥३५॥ एकदां बळेंच घालवून । दिलें बाळाभाऊकारण । परी तो आला परतून । राजीनामा देवानिया ॥३६॥ बाळाभाऊ शेगांवासी । येतां भास्कर बोलला त्यासी । झाली जयाला विरक्ति । त्यानेंच येथें यावें रे ! ॥३७॥ हें अहंकाराचें भाषण । समर्था न खपले जाण । त्यांनीं भास्कराचें अज्ञान । निवटाया कृत्य केलें ऐसें ॥३८॥ एका गृहस्थाच्या हातीं । भली थोरली छत्री होती । ती गजाननें घेऊन हातीं । बाळास झोडूं लागले ॥३९॥ मारतां मारतां मोडली । बुध हो छत्री भली । मग एक मोठी घेतली । भरीव कांठी वेळूची ॥४०॥ तिनें मारणें सुरुं केलें । तें पाहतां लोक भ्याले । कांहीं कांहीं पळून गेले । सोडून त्या मठाला ॥४१॥ परी बाळाभाऊ तसाच पडला । समर्थांच्या पुढें भला । कैक म्हणती असेल मेला । तो या अशा मारानें ॥४२॥ भास्करही झाला चिंतातुर । बाळाभाऊचा पाहून मार । परी समर्थांच्या समोर । बोलण्या छाती होईना ॥४३॥ तीही काठी मोडली खरी । बाळाभाऊच्या पाठीवरी । मग तो कंटाळून अखेरीं । तुडवूं लागले तयाला ॥४४॥ बंकटलाल म्हणे भीत भीत । समर्था हा आपुला भक्त । पुरें झालें याप्रत । आतां ऐसें तुडवणें ॥४५॥ ऐसें ऐकतां भाषण । समर्थ वदले हांसून । हें असंबद्ध भाषण । कां करितां कळेना ॥४६॥ तो महाराज म्हणाले बाळासी । उठ वत्सा वेगेसी । या आलेल्या मंडळीसी । अंग तुझें दाखिव ॥४७॥ ऐसी आज्ञा होता भला । बाळाभाऊ उठून बसला । लोक त्याच्या अंगाला । पाहूं लागले निरखून ॥४८॥ तों वळाचें नांव नाहीं । कोठेंही न लागलें कांहीं । तो पहिल्यापरीच होता पाहीं । निमग्न आपुल्या आनंदांत ॥४९॥ त्यायोगें भास्कराला । बाळाभाऊचा अधिकार कळला । मग तोही ना पुन्हां बोलला । वेडेवांकडें बाळासी ॥५०॥ सुकलाल नामें आगरवाला । होता बाळापुराला । श्रोते त्याच्या आगराला । गाय एक द्वाड होती ॥५१॥ तिनें गांवांत फिरावें । मुलांमाणसां तुडवावें । सशक्तांसी हुंदाडावें । शिंगानें कीं आपुल्या ॥५२॥ घरीं बांधून ठेवितां । चर्‍हाटें तोडी हां हां म्हणतां । सांखळीसी आणिली लघुता । बांधतां त्या गाईनें ॥५३॥ ती गाय नोव्हे वाघीण । बाळापुराकारण । लोक गेले कंटाळून । त्रास सोसितां तियेचा ॥५४॥ अखेर लोक म्हणती । आतां याला एक युक्ति । गोविंदबुवाचा घोडा म्हणती । समर्थानें गरीब केला ॥५५॥ तूंही या गाईला । घेऊन जा शेगांवाला । अर्पण करी समर्थाला । म्हणजे अवघें संपलें ॥५६॥ तें अवघ्यांस मानवलें । गाय नेण्याचें ठरविलें । तिला धरण्यासाठीं केलें । प्रयत्‍न नानापरीचे ॥५७॥ साखळदंडानें बांधून पुरी । गाय घातली गाडीवरी । आणिली शेगांवाभीतरीं । गजाननासी द्यावया ॥५८॥  समर्थांपुढें येतांक्षणीं । गाय झाली दीनवाणी । तिनें लोचनीं आणून पाणी । पाहिलें त्या पुण्यपुरुषा ॥५९॥ महाराज म्हणाले अवघ्यांना । हा काय तुमचा मूर्खपणा । गाईस ऐशा यातना । देणें कांहीं बरें नव्हे ॥६०॥ तिला आतांच करा मुक्त । ती न हुंदाडी कोणाप्रत । परी लावण्या तिला हात । छाती कोणाची होईना ॥६१॥ जो तो पाहून मागें सरे । तेथ समर्थ आले त्वरें । आपुल्या त्या पुनीत करें । बंधनें तोडिलीं धेनूचीं ॥६२॥ बंधनें अवघीं तुटतां भलीं । गाय गाडीच्या खालीं आली । पुढले पाय टेकिती झाली । समर्थां वंदन करावया ॥६३॥ समर्थ म्हणाले धेनूस । बाई कोणा न द्यावा त्रास । तूं या सोडून मठास । कोठेंही जाऊं नको ॥६४॥ ऐसा घडतां प्रकार । अवघ्यांनीं केला जयजयकार । उच्च स्वरानें त्रिवार । समर्थांच्या नांवाचा ॥६५॥ बाळापूरची मंडळी । बाळापुरा निघून गेली । गाय तेथेंच राहिली । शेगांवासी मठामध्यें ॥६६॥ त्या दिवसापासून । ठावे न तिला चर्‍हाट जाण । सुज्ञ धेनूचे अवघे गुण । तिच्या ठायीं पातले ॥६७॥ अजून त्या शेगांवातें । तिची संतती नांदते । जे कांहीं वदती ब्रह्मवेत्ते । तेंच येतें घडोन ॥६८॥ असो एक कारंज्याचा । लक्ष्मण घुडे नांवाचा । विप्र वाजसनीय शाखेचा । धनकनक संपन्न असे ॥६९॥ त्यासी रोग झाला पोटांत । उपाय केले अत्यंत । परि न आला गुण किंचित । खर्च सारा व्यर्थ गेला ॥७०॥ त्यानें समर्थांची कीर्ति । कर्णोपकर्णी ऐकली होती । म्हणून सहपरिवारें सत्वरगती । आला शेगांवाकारणें ॥७१॥ करण्या नुसता नमस्कार । असमर्थ होतें शरीर । त्याच्या कुटुंबानें पदर । समर्थांपुढें पसरिला ॥७२॥ आणि म्हणाली दयाघना ! । मी आपली धर्मकन्या । माझ्या पतीच्या यातना । हरण कराव्या आपण ॥७३॥ त्या वेळीं समर्थस्वारी । आंबा खात होती खरी । तोच फेकिला अंगावरी । त्या लक्ष्मणकांतेच्या ॥७४॥ जा दे हा पतीस खाया । व्याधि त्याची बरी व्हाया । तूं शोभसी त्यास जाया । पति-भक्ति परायण ॥७५॥ भास्कर म्हणे ’ अहो बाई ' । आतां न बसा ये ठाईं । आपल्या पतीस लवलाही । घेऊन जा कारंज्यातें ॥७६॥ प्रसाद आंब्याचा जो कां तुला । समर्थकरीं प्राप्त झाला । तोच घाली खावयाला । आपुल्या पतीकारणें ॥७७॥ यानें तुझें होईल काम । गुण येईल अत्युत्तम । लक्ष्मणासी आराम । होईल आंबा खातांच ॥७८॥ बाई घेऊन आंब्याला । येती झाली कारंज्याला । प्रसाद खाऊं घातला । आंब्याचा आपल्या पतीस ॥७९॥ हें वैद्यांनीं जईं ऐकिलें । तई त्या वाईट वाटलें या पोटातील रोगाला आंबा हेंच कुपथ्य होय ॥८०॥ तुम्ही तो प्रसाद दिलेला । पाहिजे होता भक्षण केला । पत्‍नीचें पुण्य पतीला । उपयोगीं पडतसे ॥८१॥ ऐसें वैद्य बोलले । आप्त अवघे घाबरले । जे ते टोचूं लागले । लक्ष्मणाच्या पत्‍नीस ॥८२॥ परी झालें अघटित । लक्ष्मणाचें पोट सत्य । रेच होऊन अकस्मात । मऊ होऊन गेले हो ॥८३॥ शौचावाटें व्याधि गेली । हळूंहळूं शक्ति आली । पहिल्या परीच होती झाली । प्रकृति लक्ष्मणाची ॥८४॥ निसर्गाच्या बाहेरी । वैद्यशास्त्र कांहीं न करी । तेथें उपयोगी पडे खरी । कृपा देवसंतांची ॥८५॥ लक्ष्मण बरा झाल्यावर । आला शेगांवीं सत्वर । म्हणे महाराज माझें घर । पाय लावून पवित्र करा ॥८६॥ आग्रह त्याचा विशेष पडला । महाराज गेले कारंज्याला । तेधवां होते संगतीला । शंकर, भाऊ, पितांबर ॥८७॥ घरीं नेऊन पूजा केली । दक्षिणा ती निवेदिलीं । अवघी संपत्ती आपुली । आहे मी कोण देणार ? ॥८८॥ परी एका ताटांत । कांहीं रुपये ठेविले सत्य । महाराज बघून त्याप्रत । ऐशा रिती बोलले ॥८९॥ म्हणशी माझें कांहीं न उरलें । मग हे रुपये कोठून आणिले ? । लक्ष्मणा ऐसें चाळे । दांभिकपणाचे करुं नको ॥९०॥ लक्ष्मण कांहीं न बोलला । मौन धरुन बैसला । परी समर्थें आग्रह धरिला । खजिन्याचें दार उघडी ॥९१॥ भीत भीत मोकळें द्वार । केलें त्यानें अखेर । खजिन्याच्या उमर्‍यावर । स्वतः जाऊन बैसला ॥९२॥ आणि म्हणाला महाराज यावें । वाटेल तें घेऊन जावें । ऐसें बोलला जरी बरवें । परी अन्यभाव अंतरींचा ॥९३॥ हें त्याचें दांभिकपण । समर्था आलें कळोन । बहुरुप्याचें राजेपण । कोठून टिके बाजारीं ? ॥९४॥ सोडून त्याच्या घरासी । उपाशी निघाले पुण्यरासी । दांभिकांच्या सदनासी । संत न होती तृप्त कदा ॥९५॥ जातां जातां बोलले । माझें माझें म्हणसी भलें । भोग आतां त्याचीं फळें । माझा उपाय त्यास नसे ॥९६॥ मी कृपा करावया । आलों होतो या ठाया । याहीपेक्षां दुप्पट द्याया । परी ते न तुझ्या प्रारब्धीं ॥९७॥ तेंच पुढें झालें सत्य । एका सहा महिन्यांत । अवघी लक्ष्मी झाली फस्त । तया भिक्षेची वेळ आली ॥९८॥ म्हणून श्रोते परमार्थांत । खोटेपणा न खपे किंचित् । याचसाठीं हें चरित्र । समर्थें घडवून आणिलें ॥९९॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति दशमोऽध्यायः समाप्तः ॥

No comments:

Post a Comment