अवश्य वाचावे असे काही :-
ह. भ. प. श्रीदासगणू महाराजकृत अर्वाचीन भक्तलीलामृत - अध्याय ३१ वा ( श्रीसाईबाबा चरित्र )
ह. भ. प. श्रीदासगणू महाराजकृत अर्वाचीन भक्तलीलामृत - अध्याय ३२ वा ( श्रीसाईबाबा चरित्र )
अवश्य वाचावे असे काही :-
ह. भ. प. श्रीदासगणू महाराजकृत अर्वाचीन भक्तलीलामृत - अध्याय ३१ वा ( श्रीसाईबाबा चरित्र )
ह. भ. प. श्रीदासगणू महाराजकृत अर्वाचीन भक्तलीलामृत - अध्याय ३२ वा ( श्रीसाईबाबा चरित्र )
॥ श्री गणेशाय नमः ॥ हे चित्स्वरुप सर्वेश्वरा । आनंदमूर्ते उदारा । स्वयंप्रकाशा निर्विकारा । सर्वावस्थातीत तूं ॥१॥ ऐसें तुझें अगम्य रुप । मी न जाणें मायबाप । जेथें वेदही साक्षेप । नेति नेति म्हणतसे ॥२॥ वसिष्ठ भृगू पराशर । जे ज्ञाननभींचे भास्कर । त्यांनाही तुझा न लागला पार । मग मी तेथें काजवा किती ॥३॥ हें असों दे कांही देवा । परी मी करीतसें तुझा धांवा । मम मर्नी वास करावा । हा ग्रंथ वदविण्यास्तव ॥४॥ तया शिर्डीग्रामासी । आले सांईच्या दर्शनासी । नानासाहेब पुण्यराशी । दुसरे नाना निमोणकर ॥५॥ चांदोरकरांनीं पदीं माथा । ठेवूनि बोलले तत्त्वतां । हे साईमहाराजा समर्था । पुरे आतां हा संसार ॥६॥ अवघीं शास्त्रे संसारासी । निःसार आहे म्हणती ऐसीं । ह्या प्रपंचरुप शृंखलेसी । तोड सत्त्वरीं दीनबंधो ॥७॥ जो जो सुखाची हांव धरावी । तों तों दुःखाची स्वारी व्हावी । आशा सटवी नाचवी । ठायीं ठायीं आम्हांला ॥८॥ शोधूं जातां संसारांत । सुखाचा न लेश सत्य । मी कंटाळलों त्याप्रत । नको संबंध तयाचा ॥९॥ ऐसें ऐकतां त्यांचे भाषण । बाबा बोलले हांसोन । हें भलतेंचि वेड्या मोहक ध्यान । कोठून तुज उदेलें ॥१०॥ तुझी आहे सत्य गिरा । परी चुकतोसी वेड्या जरा । यावद्देह तावत् खरा । आहे संसार पाठीर्शी ॥११॥ तो न चुकला कोणासी । मग तूं त्या कैसा सोडिसी । तो सोडितां न ये मजसी । मीही त्यांत गुंतलों ॥१२॥ संसाराची रुपें अनेक । तीं मी सांगतों तुजला देख । देहावरी आहे झांक । पहा तया संसाराची ॥१३॥ काम मोह मद मत्सर । यांचा जो कां परस्पर । संबंध तोही संसार । आहे बापा शिष्योत्तमा ॥१४॥ डोळे पदार्थ पाहती । कर्ण ध्वनीतें ग्रहण करिती । रसना रसातें सेविती । याचेंही नांव संसार ॥१५॥ मनाचे जे जे व्यापार । याचेंही नांव संसार । शारीर धर्म साचार । अवघे संसाररुपी बा ॥१६॥ स्वरुप या संसाराचें । मिश्रण दोन वस्तूंचें । तें हें संसारबंधन साचें । तुटलें नाहीं कोणासी ॥१७॥ दारा पुत्र कन्यादिकांसी । संसार म्हणती निश्चयेसी । तो मात्र ओखटा तुजसी । वाटू लागला सांप्रत ॥१८॥ दारा पुत्र कन्या जाण । बंधु भाचे पुतणे स्वजन । यांच्या त्रासें सेविलें रान । परी न सुटे संसार हा ॥१९॥ ऐसें वदतां गुरुवर । काय बोलती चांदोरकर । हा शेवटला संसार । नको बाबा मात्र मज ॥२०॥ या शेवटल्या संसारीं । दुःख होतें नानापरी । वरले संसार निर्धारीं । अवघे ईश्वरनिर्मित ॥२१॥ त्यां न कोणाचा उपाय चाले । ते पाहिजेत अवघे केले । शेवटल्यासी मात्र विटलें । मन सोडीव त्यापासून ॥२२॥ तैं बाबा म्हणती हांसत । तो तुझा तूंचि केला निर्मित । मग आतां त्याप्रत । कंटाळूनि काय होतें ॥२३॥ संचित क्रियमाण पूर्वीचें । देहप्रारब्ध फळ त्याचें । हेंचि देहप्रारब्ध जन्माचें । आहे मूळ कारण ॥२४॥ तें देहप्रारब्ध भोगल्याविण । न सुटे कवणालागून । तें भोगण्याकारण । प्राणी जन्म पावती ॥२५॥ गरीब मध्यम श्रीमान । प्रापंचिक ब्रह्मचारी जाण । वानप्रस्थ संन्यासी पूर्ण । उच्च नीच अवघे ॥२६॥ घोडा बैल कोल्हा मोर । व्याघ्र गेंडा तरस घार । श्वान बिडाल सूकर । विंचू सर्प मुंग्या पिसा ॥२७॥ ह्या अवघ्यांच्या अस्तित्वासी । प्राण कारण निश्चयेंसी । तो प्राण अवघ्यांपाशीं । आहे एकसारिखा ॥२८॥ मग बाह्य स्वरुपीं भिन्नत्व । कां दिसावे जगतांत । याचा विचार मनांत । केलास कां त्वां कधींतरी ॥२९॥ याचा विचार करूं जातां । ऐसें कळों येईल तत्त्वतां । कीं हें संचित क्रियमाण सत्ता । म्हणोनि प्राणि भिन्न भिन्न ॥३०॥ हें झालें वर्गीकरण । जैसा वर्ग तैसें लक्षण । मग त्या स्थितीसी कंटाळून । काय होतें शिष्योत्तमा ॥३१॥ व्याघ्र सेविती मांस । सूकर सेविती विष्ठेस । तरस पुरलेल्या प्रेतास । देहस्वभावें उकरीतसे ॥३२॥ कोवळ्या कमलपत्रास । सेविताती राजहंस । घारी गिधार्डे सडक्यास । देहस्वभावें सेविती ॥३३॥ जैसी योनी तैसी कृती । ही जगाची रीत निश्चिती । त्यांतचि देहप्रारब्ध भोगिती । कमीजास्त मानानें ॥३४॥ पहा कित्येक पंचानन । स्वेच्छे सेविती कानन । कित्येकांसी दरवेशी बांधून । दारोदार हिंडविती ॥३५॥ धनिकाश्रित जे कां श्वान । तें बैसती गाद्यांवरुन । कित्येक गांवांत भटकून । तुकड्यासाठी घोटाळती ॥३६॥ कित्येक गांईसी घांस दाणा । अंबोण पेंड प्रकार नाना । तृणही न मिळे कित्येकींना । कित्येक उकिरडा फुंकिती ॥३७॥ या अधिक-उण्याचें कारण । एक देहप्रारब्ध जाण । तें अवघें भोगिल्याविण । कालत्रयीं सुटेना ॥३८॥ तोचि न्याय मानवांत । एक गरीब एक श्रीमंत । एक सभाग्य एक अनाथ । एक भिक्षा मागतसे ॥३९॥ एक उडवी घोडे गाड्या । एकाच्या त्या महाल माडया । एक जागेवर उघड्या । दिगंबर निजतसे ॥४०॥ कित्येकांसी मुलें होती । कित्येकांची होऊनि जाती । कित्येक वांझ राहती । कित्येक त्रासती संततीला ॥४१॥ ऐसें ऐकतां समर्थवचन । चांदोरकर कर जोडून । म्हणती हे कबूल मजकारण । परी सुखदुःख व्हावें कां ॥४२॥ सौख्य होतां हर्ष वाटे । दुःख होतां हृदय फाटे । सुखदुःख हे भेटे । क्षणक्षणां संसारीं ॥४३॥ म्हणूनि ही सुखदुःखाची । खाणी आहे प्रपंच साची । तीचि त्यागितां दुःखाची । नोहे बाबा कदा बाधा ॥४४॥ ऐसें ऐकता भाषण शिष्याचें । बाबा बोलले साचें । अरे सुखदुःख हेंचि भ्रांतीचे । आहे पटल केवळ ॥४५॥ प्रपंचांतील जें जें सुख । तें तें नव्हे खरें देख । बळेंचि त्याला प्रापंचिक । सत्य घेती मानूनी ॥४६॥ पाहो देहप्रारब्धे एकाप्रत । खाया मिळे पंचामृत । एकासी वाळले तुकडे सत्य । एकासी मिळे कळणा कोंडा ॥४७॥ तुकडे-कळणा-कोंडेवाला । दुःखी समजे आपणाला । पंचामृताचा धनी भला । म्हणे कांही कमी नसे ॥४८॥ सेविलिया मधुर पक्वान्न । अथवा कळणा कोंडा जाण । या दोहोंचें अधिष्ठान । तृप्ति जठरस्थ अग्नीची ॥४९॥ शाला दुशाला जरतारी । घेऊनि कोणी नानापरी । भूषविती तनु साजिरी । कोणी पांघुरती वल्कलें ॥५०॥ शाल दुशाल वल्कलाचें । आहे प्रयोजन एकचि साचें । रक्षण करणें तनूचें । कांहीं न यापलीकडे ॥५१॥ मग या सुख-दुःखांचा । उपयोग केवळ मानण्याचा । हें मानणें तिमिर साचा । आहे घातक मानवांसी ॥५२॥ या सुखदुःखांचे तरंग उठती । जे जे कांही आपुल्या चित्तीं । ती अवघी होय भ्रांती । मोह तिचा वाहूं नको ॥५३॥ येथें शंका येईल ऐसी । तरंग अवघे उठण्यासी । कांहीतरी मुळासी । अन्य वस्तू पाहिजे ॥५४॥ लहरी नसती जलाविण । प्रकाश न दीपावांचून । तैसें या तरंगांकारण । कोणीतरी पाहिजे ॥५५॥ लोभमोहादि षड्रिपु देख । हे तरंगांसी उत्पादक । तें तरंगस्वरुप मोहक । असत्य सत्य भासवी ॥५६॥ धनिकाहातीं सुवर्णकडें । पाहूनि दरिद्री चरफडे । हे चरफडणें रोकडें । तरंग उठवी मत्सर ॥५७॥ तें असावें मजपाशीं । ऐसें जें वाटे मानसीं । ह्या तरंगाचे उठावणीसी । झाला लोभ कारण ॥५८॥ ऐशाचिपरी अवघें होतें । तें कोठवरी सांगूं तूंतें । म्हणूनि आधी षड्रिपूंतें । जिंकिलें पाहिजे शिष्यवरा ॥५९॥ मग त्या षड्रिपुशक्तींचा । नायनाट होतां साचा । लाग न साधे तयांचा । तरंग उठविण्या मानसीं ॥६०॥ परी या षड्रिपूंची । समूळ शक्ति न हरितां साची । गुलामत्वाच्या जागीं त्यांची । करीं अवघ्यांची योजना ॥६१॥ मग या सहा गुलामांवर । ज्ञानासी करीं जमादार । त्याच्याही वरी अधिकार । सद्विचारशक्तीचा ॥६२॥ मग या खोटया सुखदुःखांची । बाधा न होय तुज साची । खऱ्या सुखदुःखांची । व्याख्या ऐक सांगतो ॥६३॥ मुक्ती हेंचि खरें सुख । जन्ममरणफेरा हेंचि दुःख । याव्यतिरिक्त दुसरी भ्रामक । आहेत बापा सुखदुःखे ॥६४॥ असो आता या संसारी । तुवा वागावे कैशापरी । हें मी सांगतों निर्धारीं । तिकडे अवधान द्यावें तुवां ॥६५॥ देहप्रारब्धानुरोधें । प्राप्त स्थिती तिच्यामध्यें । आनंद मानूनि रहावें बुधें । खोटी तळमळ करूं नये ॥६६॥ घरीं आलिया संपत्ती । आपण व्हावें नम्र अती । फळे येतां लीन होती । वृक्ष जैसे शिष्योत्तमा ॥६७॥ हें नम्र होणें चांगलें । परी न सर्वांठायीं भलें । दुष्ट दुर्जन ओळखिले । पाहिजेत पुरे या जगतीं ॥६८॥ कां कीं धनिक नम्र होतां । यांना फावे तत्त्वतां । म्हणूनि दुष्टीं कठोरता । धरिला पाहिजे मानर्सी ॥६९॥ साधु संत सज्जन । यांचा राखणें मान । लीन व्हावें लव्हाळ्याहून । त्यांचे ठायीं सर्वदा ॥७०॥ श्रीमंती दुपारची छाया । हें न जावें विसरुनियां । धनमद अंगी आणूनिया । न छळी कोणा निरर्थक ॥ ७१ ॥ आपुली प्राप्ति पाहून । दान धर्म करावा जाण । उगीच कर्ज काढून । उधळेपणा करूं नये ॥७२॥ प्रपंच जरी अशाश्वत । परी ते प्रारब्ध सत्य । तो प्रपंच करण्याप्रत । द्रव्य अवश्य पाहिजे ॥७३॥ शरीरीं जैसी आवश्यकता । आहे पित्ताची तत्त्वतां । तैसी प्रपंचीं ज्ञानवंता । आहे या धनाची ॥७४॥ अवश्य वस्तु जरीं हें धन । परी त्यांतचि न गोवीं मन । राहू नको कदा कृपण । उदार बुद्धि असावी ॥७५॥ परी फाजील उदारता । नाहीं कामाची सर्वथा । द्रव्य अवघें संपूनि जातां । कोणी न विचारी मागुनी ॥७६॥ उदारपण उधळेपण । या दोघांची सांगड जाण । एके ठिकाणीं घातल्या पूर्ण । होईल बापा अनर्थ ॥७७॥ द्रव्यदानीं पहाणें योग्यता । तैसीच त्याची आवश्यकता । याचा विचार तत्त्वतां । करुनि हात सढळ करीं ॥७८॥ पंगु अनाथ रोगग्रस्त । पोरकीं मुलें समस्त । एकादें सार्वजनिक कृत्य । योग्य द्रव्यदानासी ॥७९॥ तैसीच योग्य विद्वाना । पाहूनि करीं संभावना । अनाथ स्त्रीच्या बाळंतपणा । यथाशक्ति मदत करीं ॥८०॥ अन्नदानाचे प्रकार तीन । विशेष नित्य कार्याकारण । विशेष जें कां अन्नदान । तें केव्हां करावें ॥८१॥ घरी संपत्ति बहु आलिया । काळ अनुकूल असलिया । सदिच्छा मनीं झालिया । सहस्त्रभोजन घालावें ॥८२॥ तेथें उच्च नीच भेद नाहीं । तें चहूं वर्णी श्रेष्ठ पाहीं । सुष्ट दुष्ट अवघेही । योग्य या अन्नदानातें ॥८३॥ भंडारा अथवा प्रयोजन । हे याचेचि भेद पूर्ण । परी हें कर्ज काढून । करूं नये कदाही ॥८४॥ आतां नित्य अन्नदानासी । योग्य कोण सांगतों तुजसी । पांथिक तापसी संन्यासी । तडी तापडी भुकेलेला ॥८५॥ मागूनियां कोरात्र । जे करिती ग्रत विद्यार्जन । ऐसा माधुकऱ्यालागून । नित्यान्न घालावें ॥८६॥ लग्न मौंजी ऋतुशांती । सण व्रतोद्यापन निश्चितीं । या अवघ्या प्रसंगांप्रती । कार्यकारण म्हणावें ॥८७॥ या कार्याकारण प्रसंगासी । वाहणें इष्टमित्रांस । आप्त सखे सोयऱ्यांस । आदरें द्यावें अन्न बापा ॥८८॥ हे अन्नदानाचे प्रकार । तुज कथिले साचार । योग्यायोग्य विचार । तोही पैं कथन केला ॥८९॥ वस्त्रदानाची हीच स्थिती । हें विसरु नको कल्पांतीं । आपुल्या अंगी असल्या शक्ती । परपीडा नित्य निवारावी ॥९०॥ हातीं कांही असलिया सत्ता । तिचा दुरुपयोग न करणें सर्वथा । न्यायासनी बैसतां । लांचलुचपत घेऊं नको ॥९१॥ ज्या कार्याची जबाबदारी । नेमिली असे आपुल्या शिरीं । तें कार्य उत्तम करीं । वाहूनि काळजी तयाची ॥९२॥ वाजवीपेक्षां फाजील देख । न करावा पोषाक । अहंपणाची झांक । आणूनि तोरा दावू नको ॥९३॥ कांही नसतां कारण । कोणाचा न करीं अपमान । शठ दुष्ट ओळखून । सदा असावें अंतरी ॥९४॥ कन्या पुत्र दास दासी । या देहप्रारब्धें प्राप्त तुजसी । झाल्या असती तयांसीं । वागवावें प्रीतीनें ॥९५॥ " दारा पुत्र कन्या स्वजन “ । या माझें माझेंचि म्हणून । मनीं वाहतां अभिमान । कारण जन्ममरणांसी ॥९६॥ कां कीं हें देहप्रारब्ध सकल । येथेंचि अवघें सरेल । त्याचा लेशही न उरेल । अंतीं संगती यावया ॥९७॥ या अवघ्यांची महती । आहे याचि जन्मापुरती । मागल्या जन्मींचें निश्चितीं । कोठें आहे गणगोत ॥९८॥ तें ज्या ज्या जन्मींच सरुनि जातें । वासना मात्र बद्ध करिते । तीच वासना कारण होते । पुढलिया जन्मासी ॥९९॥ म्हणूनि या स्वकीयांचा । खोटा मोह न वाहीं साचा । तरीचि अक्षय सुखाचा । लाभ होईल तुजलागी ॥१००॥ जैसे आपण धर्मशाळेत । जातो क्षणैक रहाण्याप्रत । तात्पुरती सोय तेथ घेतो । आपण करुनि ॥१०१॥ म्हणूनि त्या धर्मशाळेचा । मोह ना आपणा उपजे साचा । तोचि प्रकार येथींचा । प्रपंच ही धर्मशाळा ॥१०२॥ ऐसें प्रत्यकानें वागावें । कर्तव्य आपुलें करावें । तें करीत असतां ओळखावें । सच्चिदानंद ईश्वरा ॥१०३॥ पुत्र आपुला आणि पराचा । निर्माणकर्ता एकचि साचा । परी आपुल्या पुत्राचा । भार स्थापिला आपुल्या शिरी ॥१०४॥ म्हणूनि त्याचें संगोपन । करोनि उत्तम शिक्षण । द्यावें थोडेंबहुत धन । त्यासाठीं ठेवावें ॥१०५॥ परंतु मींचि पुत्रासी पोशिलें । मींचि त्यासी शिक्षण दिलें । मींच त्यासाठीं ठेविलें । धन ऐसें मानूं नको ॥१०६॥ कर्तव्य आपण करावें । कर्तृव्य ईश्वरा द्यावें । फलही त्यासीच समर्पावें । अलिप्त आपण रहावया ॥१०७॥ ज्ञानाचा करुनि उपयोग । बरें वाईट जाणें सांग । जें जें बरें त्यासी अंग । देऊनि वाईट टाकावें ॥१०८॥ उत्तम कार्य हातीं घ्यावें । तें तें नाना प्रयत्नें शेवटास न्यावें । कीर्तिरुपें उरावें । मागें मरुनि गेल्यावर ॥१०९॥ अंगी असावें कर्तृत्व । न रहावें निर्माल्यवत । हाचि पुरूषाचा पुरुषार्थ । किती सांगूं तुजप्रती ॥११०॥ कर्तृत्व करितां अभिमान । वहावा बापा मनीं जाण । फल येतांचि व्हावें लीन । अभिमान तो झुगारोनि ॥१११॥ जोंवरी जीवाचें अस्तित्व । तोंवरीं त्या जपणें सत्य । मरण घडतां व्यर्थ । शोक त्याचा करूं नये ॥११२॥ कां कीं शोक करण्यापाहीं । तेथें जागा उरलीच नाहीं । सुज्ञांसी न त्यांचे वाटे कांही । मूर्ख मात्र करिती शोक ॥११३॥ पहा पांचांची उसनवारी । आणिली होती आजिवरी । ती त्यांची त्यांना निर्धारीं । परत केली प्राणानें ॥११४॥ वायु वायूंत मिळाला । तेज मिळालें तेजाला । ऐसी आपआपले ठिकाणाला । गेलीं निघूनि पंचभूतें ॥११५॥ शरीर भाग पृथ्वीचा । तो निजसम दृश्य साचा । म्हणोनि तो शोक करण्याचा । नाहीं विषय शिष्योत्तमा ॥११६॥ तैसेंचि होतां मुलाचें जनन । हर्ष करीं न द्यावें मन । तो सृष्टीचा व्यवहार समजून । स्वस्थ रहावें नारायणा ॥११७॥ पहा पृथ्वी बीजा धारण करी । घन वृष्टि करिती वरी । मग तो सूर्य आपुल्या करीं । मोडालागीं निपजवितो ॥११८॥ त्या मोडाचें होतां जनन । पृथ्वीं सूर्य आणि घन । काय आनंद मानून । नाचूं लागती दश दिशा ॥११९॥ त्याचा मोठा वृक्ष होवो । अथवा आजि जळूनि जावो । परी हर्ष शोक रिघावो । न करी त्यांच्या मानसीं ॥१२०॥ तैसें रहावें आपण । मग शोक दुःख कोठून । शोक-दुःखांच्या अभावि जाण । मुक्त स्थिति चांदोरकरा ॥१२१॥ याच्या पुढील जें कां कथन । तें मी पुढे सांगेन । एकादे वेळीं तुजलागून । राही सावधान निजकर्मी ॥१२२॥ ऐसी ऐकोनि समर्थ-वाणी । चांदोरकर आनंदले मनीं । बाबांचे धरिले पाय दोनी । घट्ट मिठी मारुनियां ॥१२३॥ नयनीं लोटल्या अश्रुधारा । रोमांच उठले शरीरा । हे साई समर्थ उदारा । उद्धार माझा केला तूं ॥१२४॥ बोधरूपी वर्षतां घन । अज्ञानधुराळा बसून । गेला आमुचा आजि पूर्ण । किती उपकार आठवूं ॥१२५॥ ऐसाचि हर्ष निमोणकरा । झाला असे साजिरा । दोघेही आपुल्या घरा । गेले वंदूनि बाबांतें ॥१२६॥ सीता बेदरे सांगूं किती । बाबांनी जी कथिली नीती । भक्त चांदोरकरप्रती । ती मीं वेडे कथिली तुला ॥१२७॥ या नीतीचें पठण । जो कोणी भाविक जन । करी नित्य भावेंकरुन । त्यासी न होय भवबाधा ॥१२८॥ स्वस्ति श्रीभक्तलीलामृत । वर्षला हें बोधामृत । तें सेवा तुम्हीं समस्त । विनंती करी दासगणू ॥१२९॥ ॥ श्री हरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ ॥ इति द्वात्रिंशाऽध्यायः समाप्तः ॥
अवश्य वाचावे असे काही :-
ह. भ. प. श्रीदासगणू महाराजकृत अर्वाचीन भक्तलीलामृत - अध्याय ३१ वा ( श्रीसाईबाबा चरित्र )
॥ श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी पंचतुंडा उमापती । जयजयाजी प्रतापज्योती । तुझें बालक मी निश्चिती । माझी उपेक्षा करूं नको ॥१॥ कैलासपर्वत परमरम्य । तें त्वां केलें निवासधाम । प्रदोषकाली पुरुषोत्तम । तुजलागी ध्यातसे ॥२॥ पूर्वी दक्षप्रजापती । तुज अवमानीतां पशुपती । कोपोनि तूं निश्चिती । वीरभद्र प्रकटविला ॥३॥ स्वभक्तांचे करण्या रक्षण । दक्ष अससी तूं पार्वतीरमण । तो तूं मज दयाघन । कां उपेक्षिसी कळेना ॥४॥ काय तुझ्या आले मनीं । की हा पातकी अज्ञानी । म्हणोनि हे शूलपाणी । भेटसी ना अझूनि मज ॥५॥ परी व्याधाचे मनी वृत्त । आणणे हे उमानाथ। मी लेकरुं तुझे सत्य । माझी उपेक्षा करुं नको ॥६॥ असो ईश्वराचे भक्त निर्वाण । कोणत्याही जातीत पावोत जनन । ते साक्षात् होती नारायणे । तेथे शंका घेणे नको ॥७॥ जयांची मुळीच एक जाती । जैसी हृदयांत प्राणज्योती । किंवा जगांत एक विभूती । ईश्वर जैसा साच की ॥८॥ मतें पंथाभिमान । यांतें न ज्यांच्या चिर्ती स्थान । तेथें द्वैत कोठून। करी रिघाव सुज्ञ हो ॥९॥ पूर्वी कमाल कबीर । होऊनि गेले भक्त थोर । त्यांचे जातीसी परमेश्वर । काय पाहता जाहला ॥१०॥ ईश्वर भावाचा भुकेला । हाचि आहे दुष्काळ त्याला । सद्भक्तीसी असे विकला । दयाघन पांडुरंग ॥११॥ कोणत्याही जातीत । बा कोणत्याही स्थितीत । निर्माण होवोत भगवद्भक्त । ते प्रिय हरीतें ॥१२॥ गंगेचिया दक्षिणेस । ग्राम एक चार कोस । शिरडी नाम विलसे त्यास । कोपरगांवासंनिध ॥१३॥ तया शिरडी ग्रामासी । आले महाराज पुण्यराशी । बाबा साई जयांसी । म्हणती अवघे भक्तजन ॥१४॥ तयांचा तो ठावठिकाण । न कळे कवणालागून । चित्त आनंदमयपूर्ण । जयांचें तें सर्वदा ॥१५॥ कोणी जरी केला प्रश्न । की आपण आलांत कोठून । ठावठिकाण नामाभिधान । काय सांगा आपुले ॥१६॥ ऐसा प्रश्न होतां क्षर्णी । महाराज देती उत्तर झणीं । जेवीं मेघगर्जना होतां गगनीं । धारा अवतरती भूवरी ॥१७॥ आम्हांसी नाही ठावठिकाण । आम्ही मुळीच निर्गुण । कर्मवशे पावूनि बंधन । पिंडाप्रती पावलों ॥१८॥ या पिंडासी देह म्हणती । देहीं आमुचें नांव निश्चितीं । विश्व हेचि गाव निगुती । आमुचे जाणा सर्वथा ॥१९॥ ब्रह्म आमुचा जनिता । माया आमुची माता । यायोगें ती साकारता । आम्ही पावलों शरीर हे ॥२०॥ हेचि तयांचे प्रत्युत्तर । लोकांचिये प्रश्नावर । जग अवघें नश्वर । भावना जयांची सर्वदा ॥२१॥ त्या महाराजें शिरडींत । चमत्कार केले अगणित । सकल वर्णावया येथ । नाहीं मती दासातें ॥२२॥ आर्धीच ते गांव लहान । त्यांतूनि थोडकी दुकान । तीही असती बहुत सान । हिंगबोजवार विक्रीची ॥२३॥ त्या दुकानदारांपासी । महाराज मागूनि तेलासी । दीप लाविती मशीदीसी । तैसेचि देउळी अगणित ॥२४॥ ऐशीपरी कित्येक वेळां । साईंनी दीपोत्सव केला । नित्य तेल देण्याला । वाणी अवघे कंटाळले॥२५॥ दुकानदार अवघे जन । करिती विचार एकवटून । रोज आणावें कोठून । तेल यांते द्यावया ॥२६॥ ऐसा विचार करुनि मानसी । महाराज येतां दुकानासी । खोटेंचि सांगती तयांसी । तेल नाही म्हणूनियां ॥२७॥ ऐसें उत्तर ऐकतांक्षणी । बाबा चकित झाले मनी । असत्य वदण्या यांलागुनी । कांही न वाटे अवघड ॥२८॥ यानेंचि हे बुडाले जन । दुरावला नारायण । पुढे हे पावती पतन । आपुलिया कर्मवशें ॥२९॥ जो असत्य वदे वाणी । तो पातक्यांचा मुकुटमणी । तयांसी तो चक्रपाणी । न भेटे कदापि ॥३०॥ सत्य वाक्य ज्याचेजवळ । तयासी विकला घननीळ । जपतपादि सकळ । सत्यापुढे बापुडें ॥३१॥ सत्य पुण्याईचा घाट । सत्य ही मोक्षाची वाट । सत्य आनंदनदीचा घाट । तें सत्य न सोडावे ॥३२॥ वाण्यांसी न देतां प्रत्युत्तर । महाराज निघाले सत्वर । कृत्य केलें अघटित थोर । अगाध लीला बाबांची ॥३३॥ मशीदीच्या सभोवार । पणत्या ठेविल्या प्रचुर । कांकडे घातले आंत थोर । कौतुकें लोक पाहती ॥३४॥ जन परस्परें बोलती । तेलवीण कैसे लागती । दीप येथे निश्चिती । वेडा पीर असे हा ॥३५॥ खडकी पेरणे बीजालागुन । अथवा वांझेचे बाळंतपण। करावया सुज्ञ जन । इच्छील काय कधींतरी ॥३६॥ हा वेडयांचा शिखामणी । अज्ञान्यांचा अग्रगणी । दीप तेलावांचूनी । लावावया इच्छीतसे ॥३७॥ तेल होतें टमरेलांत । लावण्यापुरतें सांजवात। ते घेउनि हातांत । गेले बाबा मशीदीसी ॥३८॥ तें नानासाहेब डेंगळे । लोकांसी बोलू लागले । तुम्हीं अंध झाला सगळे । उगी तयासी निंदूं नका ॥३९॥ कोणाची योग्यता कैशापरी । हे एक जाणे श्रीहरी । हिरा पडला जरी गारी । तरी कां गार मानावा ॥४०॥ काही वेळ बसा स्वस्थ । हा फकीर काय करितो येथे । तें पहा हो सावचित्त । वृथा घाई करूं नका ॥४१॥ ऐसें लोकांसी सांगितले । डेंगळे मशीदीसी आले। मौनव्रत धारण केलें । चमत्कार पहावया ॥४२॥ ते काय केलें महाराजांनी । तेलांत घालूनि अर्धे पाणी । आत्मारामालागुनी । अर्पण केले तेधवां ॥४३॥ तेलमिश्रित पाणी प्याले । मग निवळ पाणी घेतलें । पणत्यांमाजी ओतलें । स्नेहाऐवजी तत्क्षणीं ॥४४ ॥ काडी ओढूनि पेटविले । दीप बाबांनी अवघे भले । चकित झाले डेंगळे । पाय धरले जावोनी ॥४५॥ दिवे जाळिले रात्रभर । लोक पाहती चमत्कार । केवढा बाबांचा अधिकार । प्रति-ईश्वर जन्मला ॥ ४६॥ शिरडीचे लोक मिळाले । साईपदीं लीन झाले । म्हणती आम्ही अपराध केले । कोपू नका आम्हांवरी ॥४७ ॥ आम्ही पोरें तुमचीं । तुम्ही आहां माय साची । क्षमा करा अपराधांची । साईमहाराज कृपानिधी ॥४८॥ तुम्ही कृपेचे सागर । तुम्ही ज्ञाननभीचे दिनकर । तुम्हीं सद्गुणांचे सरोवर । शांततेचे मेरु तुम्ही ॥४९॥ तेधवां बाबा अवघ्यांप्रती । बोलू लागले निश्चिती । तुम्ही ऐका रे माझी उक्ती । ये समयी सावचित्तें ॥५०॥ वर्तन ठेवा ऐशापरी । जेणें राजी राहील श्रीहरी । असत्य न वदावी वैखरी । सत्य सदा सांभाळावें ॥५१॥ घातपात कवणाचा । करु नका कधींच साचा । धर्मकर्मी द्रव्याचा । व्यय करावा यथाशक्ती ॥५२॥ तरीच होईल कल्याण । अंतीं भेटेल नारायण । हे माझें सत्य वचन । सदा वागवा मानसीं ॥५३॥ ते मानले अवघ्यांसी । वंदूनि साई चरणांसी । लोक गेले स्थानासी । अति आनंदे आपुल्या ॥५४॥ साईमहाराज योगाभ्यासी । किती वर्णावें तयांसी । त्यांच्या अगम्य लीलांसी । वर्णितां न ये पार कधीं ॥५५॥ हे अखिल वर्तमान । चितांबरां लागून । डेंगळयांनी केले कथन । तेही भाविक म्हणोनियां ॥५६॥ असे शय्या विचित्र बाबांची । एक फळी लांकडाची । रुंदी एक वीत साची । असे लांब चार हात ॥५७॥ तीच त्यांचा स्पंदन । तीच त्यांचे अंथरुण । जीर्ण चिंध्यांनी बांधून । टांगिलीसे मशिदींत ॥५८॥ ती मशीद होती जीर्ण । किलच्याही गेल्या निघून । अगदीं आढयाचे सन्निधान । फळी टांगिली बाबांनी ॥५९॥ नुसतें बैसतां तिच्यावरी । तनू होय धनूपरी । ऐशा विचित्र शय्येवरी । शयन करिती महाराज ॥६०॥ फळीचे उभय बाजूंसी । म्हणजे उशापायथ्यासी । लावूनि दिवे पुण्यराशी । निजती योग बळाने ॥६१॥ नुसता पाय ठेवितां वरी । जी तुटेल निर्धारीं । ऐसी तिची बळकटी खरी । काय वर्णन करावे ॥६२॥ तें असत्य वाटे कित्येकांस । म्हणूनि मुद्दाम रात्रीस । जाऊनि पाहती बाबांस । तों ते निद्रिस्त फळीवरी ॥६३॥ ही मौज पाहण्याप्रती । दाटी होऊ लागली अती । तेणें उपाधी निश्चिती । होऊ लागली सर्वदा ॥६४ ॥ त्या फळीस म्हणूनी । तोडूनि टाकिले एके दिनीं । मोकळे त्रासापासूनी । शीघ्र व्हावयाकारणे ॥६५ ॥ ख्याती झाली लोकांत । बाबा साई महामहंत । नवसही अनंत । करूं लागले तयांप्रती ॥६६॥ शिरडी झाले महाक्षेत्र । वाराणसीसम पवित्र । बाबांमुळे सर्वत्र । नांव झाले तियेचें ॥६७॥ जैसे पुष्पयोगें मृत्तिकेस । किंवा हिऱ्यामुळे कोंदणास । वा सुवर्णामुळे चिंधीस । महत्त्व येतें जैशापरी ॥६८॥ तैसें शिरडीसी बाबांमुळे । भूमंडळी महत्त्व आले । खेड्याचे क्षेत्र बनले। थोर योग्यता साधूची ॥६९॥ असो एके समयासी । मंडळी आली बहुवसी । तया शिरडी ग्रामासी । सिद्धदर्शन घ्यावया ॥७०॥ चांदोरकर कुळभूषण । गोविंदात्मज नारायण । कलेक्टराचा चिटणीस जाण । नानासाहेब म्हणती जया ॥७१॥ दुजे रामदास हरिदास । वास जयांचा वांईस । तिसरे त्यांचे सोबतीस । होते बापू नगरकर ॥७२॥ कानगांवकर ते चौथे । ऐसे जमोनि आले तेथें । सिद्धदर्शन घ्यायातें । शिरडीग्रामीं श्रवण करा ॥७३॥ त्या रामदासी बुवासी । जाणे होतें दुसरे दिवशी । हनुमंताच्या जयंतीसी । सीनातटी नगरांत ॥७४॥ ते तळमळ करूं लागले । म्हणती पाहिजे आतांचि गेलें । दर्शन घेणे पुरे झालें । चला गाडी आटोपा ॥७५॥ तैं महाराज म्हणती चिटणीसासी । प्रथम करुनि भोजनासी । मग जावें वाटे मशीं । तुम्ही नगराकारणे ॥७६॥ या ऐकोनि महाराजवचना । स्तब्ध झाले साहेब नाना । घेऊनि कानगांवकरांना । केली तयारी भोजनाची ॥७७॥ इकडे तो वांईकर । जावया झाला बहुत आतुर । म्हणे अहो बापू नगरकर । काय विचार करणे आतां ॥७८॥ माझी उद्यां आहे कथा । नगरामाजी तत्त्वतां । या वेडयाच्या नादा आतां । लागणे पुरे झालें ॥७९॥ चिटणीसाचे आहे ठीक । घरी पैसा मुबलक । मला मागणे येईल भीक । लागतां नादीं साईंच्या ॥८०॥ येथें न प्राप्ति कवडीची । चला वाट धरुं स्टेशनाची । गाडी पाहिजे आतांची । साधिली आपणां अवश्य ॥८१॥ ऐसे बोलूनि निघाले । उभयतां स्टेशनावरी आले। मागें शिरडीसी राहिले । कानगांवकर व चिटणीस ॥८२॥ महाराज म्हणती चिटणीसासी । पहा जनांची रीत कैसी । सोडोनि साथीदारांसी । दक्ष असती मतलबा ॥८३॥। म्हणोनि ऐसा करावा साथी । जो न सोडी कल्पांतीं । जैसा सुवास सुमनाप्रती । कधींही न विसंबे ॥८४॥ असो झाली भोजनें । आतां तुम्हीही येथूनि जाणें । जें बोललों ते मनीं धरणें । अवकाश आहे गाडीसी ॥८५॥ तें मानिले चिटणिसांनीं । ठेवूनि मस्तक साईचरणीं । निघते झाले तेथोनी । स्टेशनावरी यावया ॥८६॥ इकडे बापू आणि कथेकरी । बैसले उपाशीं स्टेशनावरी । चडफडत आपुले अंतरी । कांही न मिळे खावया ॥८७॥ चिटणीसांना पाहून । गेले दोघे विरघळून । खाली घालोनियां मान । माती उकरीत बैसले ॥८८॥ चांदोरकर पुसती तयांसी । कां हो न गेलां नगरासी । गाडी न मिळाली वाटते मजसी । तुम्हां जावयाकारणे ॥८९॥ तैं म्हणे तो नगरकर । आज गाडीसी आहे उशीर । तीन घंटे साचार । मेलों उपाशी मात्र आम्ही ॥९०॥ साधूचें नायकिलें । त्याचें हे फळ लाधले । तुम्हीं मात्र बरें केलें । फजीत आम्ही पावलों ॥९१॥ मग अवघे बसूनि गाडींत । आले शहर नगराप्रत । त्रिकालज्ञ बाबा सत्य । नमन माझें तयांसी ॥९२॥ असो शिरडी ग्रामीचा । अप्पा कुळकर्णी होय साचा । शुद्ध भाव जडला त्याचा । साईचिये पदापाशीं ॥९३॥ पूर्वकर्म जैसें असे । तैसी बुद्धि होतसे । त्या अप्पाचिया कर्मवशें । काय घडले तें ऐका ॥९४॥ कांही एके कामांत । अप्पावरी आली आफत । ती खरी अथवा खोटी सत्य । हें ठाऊक ईश्वराला ॥९५॥ गवगवा झाला लोकांत । अप्पा कुळकर्णी लबाड सत्य । तैसेंचि भूपाचे मनांत । आलें असे त्याविषयीं ॥९६॥ कोणी म्हणती तयावरती । खटला होणार हें निश्चितीं । ऐसें ऐकतां चित्तीं । धडकी अप्पाच्या भरली असे ॥९७॥ अप्पासी केले बोलावणे । प्रांताच्या साहेबानें । हुकूम लिहूनि धाडिला त्यानें । यावे तुम्ही जबाबा ॥९८॥ हुकूम पडतां हातांत । अप्पा झाला भयभीत । म्हणे आतां शिरडीप्रत । येणे कशाचे घडते हो ॥९९॥ निघतेवेळी तयांनी । बाबांसी जोडिले दोन्ही पाणी । बोलता झाला गहिंवरुनी । कठिण प्रसंग आला हा ॥१००॥ तुम्ही साधु सत्पुरुष । तुम्ही साक्षात् श्रीनिवास । तुम्ही शास्ते काळास । हे मी जाणतों गुरुराया ॥१०१॥ ही माझेवरची आफत । सत्य आहे किंवा मिथ्य । हे जाणसी तूं समर्थ । त्रिकालज्ञ महाराजा ॥१०२॥ त्याविषयी बोलणें नाहीं । अब्रु राख माझे आई । रडूं लागला धायी धायीं । पायां मिठी घालोनी ॥१०३॥ माझें कांहीं वाईट होतां । आपुलें नांव जाईल समर्था । याचा विचार आणोनि चित्ता । संकट माझें हरावे ॥१०४॥ जवळी असतां कुबेर । कां हिंडावे दारोदार । सोडोनि क्षीरसागर । मीन जाय ओहोळाकडे ॥१०५॥ माझा वशिला तुझे पाय । तुंचि माझी बापमाय । या वेळी साह्य होय । संकट माझें हरावें ॥१०६॥ मजला म्हणती अवघे जन । हा बाबांचा कल्याण । शिक्षा होतां मजलागून । काळोखी लागेल तुम्हांतें ॥१०७॥ कामधेनूचे पोरांनीं । कां लागावें अन्यस्तनीं । कल्पवृक्षाचे फळांनीं । कां पडावे कांटयांत ॥१०८॥ ह्याचा करा विचार । कृपा करा माझेवर । जगांत अवघ्या नाहींतर । निंदा होईल आपुली ॥१०९॥ ऐसें ऐकतां दीन वचन । महाराज द्रवले मनीं पूर्ण । बोलले अप्पालागून । ऐक वचन माझें हें ॥११०॥ नेवाशास प्रांतस्वारी । आहे सांप्रत प्रवरातीरीं । तुवां जावे तेथवरी । भय चित्तीं मानूं नको ॥१११॥ तेथे जगाचा सूत्रधार । मोहिनीरुप परमेश्वर । ज्या नमिता झाला ज्ञानेश्वर । भावार्थदीपिका लिहितांना ॥११२॥ जो दशावतार धरिता । जो अल्लाइलाही तत्त्वता । मूढ जीवांचे उद्धारार्थ । सगुण झाला ज्ञानेश्वर ॥११३॥ तया करुनि नमस्कार । साहेबापुढे व्हावे हजर । पाठ तुझी साचार । तोचि राखील निश्चयें ॥११४॥ तें अप्पानें मानिलें । प्रवरातटासी येणे केलें। मोहिनीराजासी वंदिलें । मग गेले कचेरीस ॥११५॥ हृदयीं बाबांचे स्मरण । जबाब दिला लिहून । तो साहेबानें ऐकोन । सोडून दिले तयातें ॥११६॥ साहेब म्हणे अप्पासी । त्वां न खाल्लें पैशासी । ऐसें खातरीने वाटे मजसी । जा म्यां तुला सोडिलें ॥११७॥ तें ऐकतां हुजूरवचन । आनंदले अप्पाचें मन । शिरडीकडे तोंड करुन । नाचू लागला आनंदें ॥११८॥ हे साईमहाराज कल्पद्रुमा । भक्तजनांचे पूर्णकामा । वैराग्याच्या निवासधामा । केलीस कृपा माझेवरी ॥११९॥ तेणें मी झालों धन्य । या जगामार्जी जाण । अब्रूचें केलें रक्षण । माझ्या तुवां पुण्यवंता ॥१२०॥ अप्पा तेथूनि दुसरे दिवशीं । परत आला शिरडीसी । नमूनि साईपदासी । वर्तमान श्रुत केलें ॥१२१॥ बोलले बाबा त्यावर । कर्ता करविता परमेश्वर । भक्तांसाठी शार्ङ्गधर । जें न घडे तें घडवीतसे ॥१२२॥ पुढे एके समयासी । नारायण कृष्ण पेणशासी । दाखविले चमत्कारासी । कथानक ऐका हो ॥१२३॥ कांता तया पेणशाची । परम भाविक उदार मनाची । तिची इच्छा दर्शनाची । झाली असे बाबांच्या ॥१२४॥ सती विनवी जोडूनि करा । हे मत्सौभाग्यमांडारा । हे मत्सौख्यनभींचे दिनकरा । माझी विनंती ऐका हे ॥१२५॥ कर्णोपकर्णी ऐकिली मात । शिरडी नामक ग्रामांत । बाबा साई महामहंत । योग्य असती दर्शना ॥१२६॥ म्हणूनि वाटते माझ्या मनीं । चला त्या गांवालागुनी । लीन होऊ संतचरणीं । आपण उभयतां प्राणेश्वरा ॥१२७॥ पेणसे म्हणती त्यावरी । ऐक मद्वचना सुंदरी । शिरडी ग्रामभीतरी । कोणी न संत सुशीले ॥१२८॥ तेथें एक मुसलमान । वेडापिसा आहे जाण । बळेचि ढोंग माजवून । जग लुटाया बैसला ॥१२९॥ त्याचा मांडिला देव्हारा । या अज्ञ जनांनी खरा । म्हणोनि ऐकें माझी गिरा । भलता हट्ट घेऊ नको ॥१३०॥ जेथे मुळीच क्षारपण । तेथें मधुरता कोठून । बेगडाचें उत्तम सुवर्ण । होईल कां सांग कांते ॥१३१॥ तूं न पडावे याचें भरी । तो शिरडीमधला भिकारी । तुकडे मागोनि घरोघरीं । पोट आपले भरीतसे ॥१३२॥ साध्वीचे चित्तीं तळमळ । परी लागलीसे प्रबळ । म्हणे कधीं अर्पीन भाळ । त्या महाराजपदीं मी ॥१३३॥ पेणसे पुढे फिरत फिरत । आले शिरडी ग्रामांत । सवें कांता सद्गुणी शांत । नाम माई जियेचें ॥१३४॥ पेणसे सरकारी कामी गुंतले । तों साध्वीनें काय केलें । जावोनि आपुले साधिलें । कार्य तेधवां दर्शनाचें ॥१३५॥ साईपदीं अर्पितां भाळ । निमाली मनाची तळमळ । समाधान झालें सकळ । कौतुकें सांगे पतीसी ॥१३६॥ मी गेले दर्शनासी । तो खराचि आहे पुण्यराशी । तुम्हीं नका निंदूं त्यासी । दर्शन घ्या हो साधूचें ॥१३७॥ कांतेच्या आग्रहावरून । आले दर्शनाकारण । तें महाराज बोलले गर्जोन । येऊ नका कोणी येथें ॥१३८॥ धोंडा घेऊनि हातीं । पुढे येतां मारीन म्हणती । मी आहे ढोंगी अती । माझें दर्शन घेऊं नका ॥१३९ ॥ मी जातीने आहे हीन । वेडा पिसा मुसलमान । तुम्ही उच्चवर्णी ब्राह्मण । बाटाल दर्शन घेतांचि ॥१४०॥ ऐसें बोलतां तयासी । पेणसे विरघळले मानर्सी । म्हणती हा असे ज्ञानराशी । त्रिकालज्ञ महाराज ॥१४१॥ आहीं बोललो उभयतां । ते यां कळलें तत्त्वतां । जैसी वाऱ्याची व्यापकता । तैसी यांच्या ज्ञानाची ॥१४२॥ पेणशांनी विचार केला । लावूनि अप्पाचा वशिला । लाभ करुनि घेतला । सत्पुरुषदर्शनाचा ॥१४३॥ यासी लोटतां कांहीं दिन । काय घडले वर्तमान । तें ऐका हो भाविकजन । श्रवणीं सादर बैसावें ॥१४४॥ एके दिनी सहजगती । महाराज बोलले अप्पाप्रती । आज चोरटे निश्चितीं । आले आपुल्या गांवांत ॥१४५॥ या चोरांची तऱ्हा निराळी । घराचा विक्षभ न करिती मुळी । ऐन मालावरी सगळी । दृष्टी असे तयांची ॥१४६॥ तो करुनि हरण । जाती सवें घेऊन । चोरी करितां न दिसती जाण । ऐसे महाबिलंदर ते ॥१४७॥ त्यांची प्रथमतः होईल स्वारी । आजि वेडया तुझ्यावरी । यास्तव जा कांहीतरी । बंदोबस्त करावया ॥१४८॥ मथितार्थ या गोष्टीचा । अप्पासी न कळला साचा । पहारा बसवूनि भिल्लांचा । लौकिकी बंदोबस्त केला असे ॥१४९॥ गल्लोगल्ली फिरे गस्त । होतां एक प्रहर रात्र । जुलाब उलटया अप्पाप्रत । होऊ लागल्या मरीच्या ॥१५०॥ शरीर झालें अवघें गार । बांबे व्यापिले पदकर । नासिक कळस साचार । झालासे वांकडा ॥१५१॥ खोल खोल डोळे गेले । नाडयांनी स्थान सोडिले । लोक शोकाकुल झाले । पाहूनि स्थिति अप्पाची ॥१५२॥ कांता झाली घाबरी । पाहतां नवऱ्याची स्थिती खरी । धावोनि आली झडकरी । मशीदींत बाबांच्या ॥१५३॥ महाराजांचे धरुनि पाय । रडूं लागली धाय धाय । बाबा माझा पतिराज । सोडूनियां चालिला ॥१५४॥ द्या हो उदी अंगारा । तेणें उतार पडेल जरा । सौभाग्यजहाज सागरा । नका बुडवू महाराजा ॥१५६॥ महाराज म्हणती तियेसी । नको करूं शोकासी। जो जन्मला मृत्यु त्यासी । आहे येणार एके दिनीं ॥१५६॥ जन्ममृत्यु ईश्वरी कळा । तोचि उरला भरुनि सगळा । करुं गेलिया तो वेगळा । कांही न ये हातासी ॥१५७॥ कोणी न जन्मे मरे कोणी । पहा परी ज्ञानचक्षूंनी । तूंही न निराळी त्यापासोनी । येईल हे प्रत्यया ॥१५८॥ जैसी बंडी झालिया जीर्ण । लोक देताती फेंकून । किंवा नावडे म्हणून । त्याग करिती तियेचा ॥१५९॥ तैसे हे शरीरवसन । पांघरलासे बाळे प्राण । तो प्राण नारायण । अक्षय अभंग निर्विकल्प ॥१६०॥ म्हणूनि अंगारे करूं नको । उगीच ठिगळें मारुं नको । आड त्याच्या येऊं नको । जाऊ दे त्यासी मुक्कामा ॥१६१॥ माझ्या आधीच अप्पांनी । बदलावया आपुली कफनी । केली तयारी त्यालागुनी । तूं आड येऊं नको ॥१६२॥ अप्पासी मिळेल सद्गती । मोक्ष आला त्याचे हातीं । चर्मचक्षूंच्या आड निश्चितीं । होताहे तो होऊं दे ॥१६३॥ ऐसें निरवूनि तियेसी । लावूनि दिधलें गेहासी । झाला अप्पा स्वर्गवासी । तात्काळ कांहीं वेळाने ॥१६४॥ दुसरे दिवशी गांवांत । दोन तीन लागले लोक सत्य । अवघे झाले भयभीत । विनवू लागले साईंसी ॥१६५॥ बाबा पोत खेळू लागली मरी । ह्याचा विचार कांहीतरी । करा तुम्ही आमुच्या नगरीं । असूनि काय उपयोग ॥१६६॥ महाराज म्हणती त्यांप्रत । जातील माणसें सात । या आपुल्या शिरडींत । मग न राहे मरी ती ॥१६७॥ बोलले तैसें झालें सत्य । मेली माणसे अवघीं सात । केवढे बाबांचे सामर्थ्य । आधींच भाकित केले तिचे ॥१६८॥ आतां ऐका पुढील प्रकार । तुम्ही श्रोते उदार धीर । । दासगणू मी तुमचें पोर । बोबडया शब्दें सांगतसे ॥१६९॥ कोंडया सुतार नामें एक । भक्त होता परम भाविक । त्यावरी बाबांचे प्रेम देख । होते आगळें सर्वांहुनी ॥१७०॥ बाबा म्हणती कोंडयासी । तुवां जावे खळवाडीसी । आग मधल्या गंजीसी । लागली ति विझवावया ॥१७१॥ कोंडया झाला घाबरा । खळ्यासी गेला करुनि त्वरा । तेथे तपास करुनि पुरा । आलासे तो माघारी ॥१७२॥ बाबा उगीच काहीतरी । सांगूनि मजला त्रास भारी । दिधला दुपारच्या अवसरी । पाय माझे पोळले ॥१७३॥ बाबा म्हणती ऐक जरा । माझी नोहे असत्य गिरा । वळूनि पाहें माघारा । तो पहा धूर निघाला ॥१७४॥ सुड्यांसी सुड्या लागल्या दाट । मधल्या सुडीनें घेतला पेट । गावांत झाला बोभाट । पेटलीसे खळवाडी ॥१७५॥ दिवस होता उन्हाळयाचा । त्यांत समय दुपारचा । प्रभंजन सुटला जोराचा । प्रलयवातासमान ॥१७६॥ कडकडां झाडे मोडती ॥ छपरें गगनीं उडूं पाहती । वावटळीसी नाहीं गणती । दुर्धर प्रसंग ओढवला ॥१७७॥ लोक अवघे घाबरले । साईबाबांकडे आले । घट्ट तयांचे पाय धरिले । रडूं लागले दीनवत ॥१७८॥ हे साईबाबा कृपाराशी । आग लागली खळवाडीसी । आतां आमुची गति कैसी । सांगा होईल महाराजा ॥१७९॥ खळवाडी आमुचा प्राण । खळवाडी आमुचें जीवन । ती अवघी जळाल्या जाण । अन्न न मिळेल आम्हांतें ॥१८०॥ मुले माणसे मरतील जाणं । करुनियां अन्नअन्न । गुरेही सोडतील प्राण । चाऱ्यावांचून दयाळा ॥१८१॥ यासाठी काहीतरी । उपाय सांगा झडकरी । तुम्ही साक्षात् श्रीहरी । भूतभविष्य जाणते ॥१८२॥ त्या जनांच्या विनंतीसी । देऊनि मान पुण्यराशी । गेले त्वरें खळ्यासी । आग विझवायाकारणे ॥१८३॥ गंजी जी होती पेटली । ती महाराजांनी अवलोकिली । धार पाण्याची फिरविली । भोवतालीं गंजीच्या ॥१८४॥ ही एवढीचि जळेल । दुसरीसी न धक्का लागेल । हा अग्नीचा भाग सकल । विझवू नका कोणी इसी ॥१८५॥ जैसें महाराज बोलिले । तैसेंचि पुढे प्रत्यया आलें । जन अवघे आनंदले । थोर महती बाबांची ॥१८६॥ अवघ्या गंजी शेजारच्या । रक्षण केल्या असती साच्या । अंमल आपुला अग्नीच्या- । वरही ज्यांनी चालविला ॥१८७॥ सत्पुरुषाच्या आज्ञेत । पंचभूते वागती सत्य । सच्चिदानंद रमानाथ । सेवे तिष्ठत जयांच्या ॥१८८॥ अस्तमानाचे समयासी । मंडळी आली दर्शनासी । नानासाहेब पुण्यराशी । चिटणीस नगर जिल्ह्याचे ॥१८९॥ चांदोरकर दर्शनासी । गेले बाबांच्या मशीदीसी । आपण होऊनि तयांसी । महाराज बोलले ते ऐका ॥१९०॥ हे माझे गुणनिधाना । गोविंदात्मज नारायणा । चांदोरकरकुलभूषणा । पहा हे लोक मतलबी ॥१९१॥ आणि या भागचंदाची । गंजी जळाली असे साची । पाठ पुरविली त्याने आमुची । तोटा झाला म्हणोनी ॥१९२॥ लाभ-हानी जन्म-मरण । हें ईश्वराचे आधीन । परी हे कैसे अंध जन । विसरताती तयाला ॥१९३ ॥ लाभ होतां आनंदावें । हानि होतां कां रडावें । माझें माझें म्हणावें । अर्थ काय यामध्ये ॥१९४॥ गंजी कोठली मारवाडयाची । ती मुळीच कडब्याची । उत्पत्ति ती तियेची । झालीसे बीजापासूनी ॥१९५॥ तें बीज धरिले भूमीनीं । पाऊस पाडिला मेघांनीं । रवीनें अमृतकारांनीं । आणिलें त्या आकारा ॥१९६॥ ऐसे याचे मालक तीन । पृथ्वी, सूर्य, सजल घन । हा माझें माझें म्हणोन । उगाचि टिऱ्या बडवीतसे ॥१९७॥ ती अग्नीनें भक्षिली । सूर्याची सत्ता अधिक झाली । पृथ्वी बिचारी होरपळली । मात्र अग्नितापानें ॥१९८॥ मेघासी यांची दाद नाहीं । तो घमेंडानंदन पाहीं । चंचल सौदामिनीठायीं रममाण जाहला ॥१९९॥ जे स्त्रियांशी लंपट अती । असती की मूढमती । ते कधी ना जाणती । आपुल्या लाभहानीतें ॥२००॥ तो त्यामुळे उगीच बैसला । सूर्याने दावा साधिला । भूमीपासूनि हिसकूनि नेला । माल आपुला म्हणोनी ॥२०१॥ जगांत जितुक्या वस्तु असती । त्यांची अशीच उत्पत्ती । मालक तियेचे निश्चितीं । नाही आपण सर्वदा ॥२०२॥ तूं तरी कांही सांग याला । हा उगीचि करितो दुःखाला । मघांपासूनि त्रास दिला । याने मला अनिवार ॥२०३॥ एक्या हाती ईश्वर देतो । सवेंचि दुसऱ्या हाती नेतो । प्राण सुखदुःखा कारण होतो । अज्ञान गांठी म्हणोनियां ॥२०४॥ जा शेटजी घरा स्वस्थ । फायदा दुसऱ्या व्यापारांत । होईल तुमचा निश्चित । येईल नुकसान भरुनि हें ॥२०५॥ ऐसा वर्षतां बोधघन । अवघे आनंदले पूर्ण । चिटणीसांनी केले वंदन । सद्गदित जाहले ॥२०६॥ हे भक्तचकोरपूर्णचंद्रा । हे अपरोक्षज्ञानाच्या समुद्रा । द्यावी मातें ज्ञानमुद्रा । जेणे अज्ञान निरसेल ॥२०७॥ देव कोण कैसा असे । तो कोठें वसतसे । काय केलिया भेटतसे । हे सांगा मजप्रती ॥२०८॥ जग हे मुळीच नश्वर । मग कां करावा हा व्यापार । ह्याचे वर्म फोडोनि सत्वर । मजलार्गी सांगावें ॥२०९॥ ऐसे ऐकतां चिटणीसांचे । भाषण बोलले महाराज साचें । विवेचन ह्या गोष्टीचे । करीन पुढे एके दिना ॥२१०॥ जैसे चांदोरकर भक्त पुरे । तैसेचि गणेश विष्णु बेरे। त्यांचे कथानक आदरें । ऐका थोडे सांगतो ॥२११॥ हे जिल्ह्याचे तपासणीदार । असती शेतकी-खात्यावर । ते मुद्दाम शिरडीवर । आले दर्शन घ्यावया ॥२१२॥ बाबांसी करितां वंदन । बोलले त्यांकारण । तुम्हीं आतांचि येथून । निघून जावें शीघ्रगति ॥२१३ ॥ वेळ थोडाही करुं नका । क्षण एकही राहूं नका । भरधाव आपुला तांगा हांका । कोपरगांवा शीघ्र जावें ॥२१४ ॥ ठेवूनि विश्वास महाराजवचनी । बेरे निघाले तेथूनी । त्यांच्या तांग्यामागोनी । येत होता दुसरा तांगा ॥२१५॥ त्या दुसऱ्या तांग्यांत । जे बैसले होते गुहस्थ । ते बोलले बेऱ्यांप्रत । थांबा आम्हां येऊं द्या ॥२१६॥ तांगा चालवा हळूहळू । नका हरिणासारखे पळू । अजूनि आहे बहुत वेळू । स्टेशनावरी गाडीसी ॥२१७॥ बेऱ्यांनी न त्या मान दिला । तांगा भरधांव हांकिला । गोदाप्रवाह ओलांडिला । पोहोंचले असती स्टेशनासी ॥२१८॥ मागोमाग ऐकिली मात । लुटला तांगा रस्त्यांत । चोरटयांनी लवणांत । कोपरगांव रस्त्यावरी ॥२१९॥ मारहाण फार झाली । संपत्ति अवघी लुटोनि नेली । पोलीस मंडळी निघाली । तपासासी तयाच्या ॥२२०॥ हें ऐकतां अशुभ वृत्त । बेरे म्हणती हे सद्गुरूनाथ । संकटांतूनि या पोराप्रत । तुम्ही सत्य वांचविलें ॥२२१॥ एक हिरण्यकेशी ब्राह्मण । वशिष्ठगोत्री ज्ञानसंपन्न । जयाचें तें वसतिस्थान । पुण्यपट्टण जाणा हो ॥२२२॥ तो असे थोर अधिकारी । श्रीमान सदय अंतरीं । निष्ठा ब्रह्मकर्मावरी । जयाची ती अत्यन्त ॥२२३॥ म्हणे घ्यावें धाराग्न । परी कांता पावली मरण । कांतेचियावांचून । अग्निहोत्र कैसें घडे ॥२२४॥ पोटीं नसे संतती । घरीं अगणित संपत्ती । लग्न कराया नेघे मती । पन्नाशी भरली म्हणूनियां ॥२२५॥ त्यासी म्हणती कित्येक जन । करा हो तुम्हीं दुसरे लग्न । प्रयत्नांती नारायण । पावतो ऐसे शास्त्र ॥२२६॥ बागाईताची मनीं आस । परी न खणी विहिरीस । वा न घेई पाटास । मग कैसें घडावे तें ॥२२७॥ म्हणूनि आमुची प्रार्थना । साहेब आपण मनीं आणा । वधू पाहूनि सुलक्षणा । लग्न करुनि घ्यावें हो ॥२२८॥ तैं ते म्हणती हरिपंत । आतां संततीची आस व्यर्थ । हांसें मात्र जगतांत । होईल लग्न करतांचि ॥२२९॥ वयासी आली पन्नासी । म्हातारपणीं संततीसी । पाहीन ऐसा पुण्यराशी । मी नव्हें हो खचित ॥२३०॥ जरी एकदां सांगेल संत । मशीं लग्न करण्याप्रत | तरी लग्नाचा योग सत्य । घडूनि येईल निश्चयें ॥२३१॥ ऐसें बोलूनि जनांसी । हरिपंत आले शिरडीसी । जातां साईदर्शनासी । बाबा बोलूं लागले ॥२३२॥ हरीबा तूं सभाग्य नर । लग्न करी रे सत्वर । पुत्र देईल शंकर । इच्छा पुरेल मनींची ॥२३३॥ उगीच शंका न वाहीं मनीं । तुझा सर्वस्वे आहे ऋणी । भोलानाथ शूलपाणी । कर्पूरगौर परमात्मा ॥२३४॥ तें ऐकतां जन हरिखले । म्हणती आतां बरे झालें । संतानुमोदन मिळाले । लग्न दुसरे करावया ॥२३५॥ तरी म्हणती हरिपंत । ज्योतिष्याचे पाहिजे मत । तें मिळाल्या निश्चित । विवाह करीन दूसरा ॥२३६॥ ऐसें बोलूनि नगरांत गेले । तो पुण्याहुनि पत्र आलें । की एक ज्योतिषी येथे भले । आले असती विद्वान ॥२३७॥ एवं च मत ज्योतिष्याचें । पडले तेघवां अनुकूल साचें । लग्न झाले पंतांचे । साईकृपेकरुनी ॥२३८॥ ते स्त्रीपुरुष तरु चूत । साईकृपा हा वसंत । फल त्या वृक्षा येईल सत्य । शंका मुळींच घेणे नको ॥२३९॥ जोंधळा आला पोटरींत । वरी पाऊस पडला बहुत । हवाही शुद्ध अत्यंत । मग कणसाची शंका कां ॥२४०॥ त्या हरिपंत द्विजाची । निष्ठा साईपदीं साची । योग्यता थोर बाबांची । नमन माझें तयांतें ॥२४१॥ बाबा साई कृपाराशी । ज्ञाननभींचा पूर्ण शशी । चिंतामणी भाविकासी । चिंतिले फल देणार ॥२४२॥ नित्य स्मरतां त्या साईपदा । हरतील अवघ्या आपदा । सीता बेदरे त्या तूं कदा । विसरु नको स्वप्नींही ॥२४३ ॥ तरीचि होईल कल्याण । आपुलें उभयतांचे जाण । साईमहाराज कृपाघन । वळंघेल आपणावरी ॥२४४॥ जे या साईचरित्रासी । श्रवण करितील प्रेमेंसी । त्यांसी रक्षील हृषीकेशी । सत्य सत्य त्रिवाचा ॥२४५॥ पुढील अध्यायीं कथा गहन । त्रिवर्गासी उपदेशकथन । तो उपदेश करितां श्रवण । पुरुषार्थ चारी साधतील ॥२४६॥ दास गणूचे बोबडे बोल । तुम्हीं ऐका हो भक्त प्रेमळ । साईचरणी अर्पितां भाळ । इच्छा पुरतील मनींच्या ॥२४७॥ याचे जो करी पारायण । त्याचे पाप होय दहन । पाठी राखील नारायण । तयाची ती सर्वदा ॥२४८॥ स्वस्ति श्रीभक्तलीलामृत । रम्य बाबांचे पवित्र चरित्र । हे केवळ परमामृत । सेवा सेवा गणू म्हणे ॥२४९॥