Mar 20, 2022

ह. भ. प. श्रीदासगणू महाराजकृत अर्वाचीन भक्तलीलामृत - अध्याय ३१ वा ( श्रीसाईबाबा चरित्र )


॥ श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी पंचतुंडा उमापती । जयजयाजी प्रतापज्योती । तुझें बालक मी निश्चिती । माझी उपेक्षा करूं नको ॥१॥ कैलासपर्वत परमरम्य । तें त्वां केलें निवासधाम । प्रदोषकाली पुरुषोत्तम । तुजलागी ध्यातसे ॥२॥ पूर्वी दक्षप्रजापती । तुज अवमानीतां पशुपती । कोपोनि तूं निश्चिती । वीरभद्र प्रकटविला ॥३॥ स्वभक्तांचे करण्या रक्षण । दक्ष अससी तूं पार्वतीरमण । तो तूं मज दयाघन । कां उपेक्षिसी कळेना ॥४॥ काय तुझ्या आले मनीं । की हा पातकी अज्ञानी । म्हणोनि हे शूलपाणी । भेटसी ना अझूनि मज ॥५॥ परी व्याधाचे मनी वृत्त । आणणे हे उमानाथ। मी लेकरुं तुझे सत्य । माझी उपेक्षा करुं नको ॥६॥ असो ईश्वराचे भक्त निर्वाण । कोणत्याही जातीत पावोत जनन । ते साक्षात् होती नारायणे । तेथे शंका घेणे नको ॥७॥ जयांची मुळीच एक जाती । जैसी हृदयांत प्राणज्योती । किंवा जगांत एक विभूती । ईश्वर जैसा साच की ॥८॥ मतें पंथाभिमान । यांतें न ज्यांच्या चिर्ती स्थान । तेथें द्वैत कोठून। करी रिघाव सुज्ञ हो ॥९॥ पूर्वी कमाल कबीर । होऊनि गेले भक्त थोर । त्यांचे जातीसी परमेश्वर । काय पाहता जाहला ॥१०॥ ईश्वर भावाचा भुकेला । हाचि आहे दुष्काळ त्याला । सद्‌भक्तीसी असे विकला । दयाघन पांडुरंग ॥११॥ कोणत्याही जातीत । बा कोणत्याही स्थितीत । निर्माण होवोत भगवद्‌भक्त । ते प्रिय हरीतें ॥१२॥ गंगेचिया दक्षिणेस । ग्राम एक चार कोस । शिरडी नाम विलसे त्यास । कोपरगांवासंनिध ॥१३॥ तया शिरडी ग्रामासी । आले महाराज पुण्यराशी । बाबा साई जयांसी । म्हणती अवघे भक्तजन ॥१४॥ तयांचा तो ठावठिकाण । न कळे कवणालागून । चित्त आनंदमयपूर्ण । जयांचें तें सर्वदा ॥१५॥ कोणी जरी केला प्रश्न । की आपण आलांत कोठून । ठावठिकाण नामाभिधान । काय सांगा आपुले ॥१६॥ ऐसा प्रश्न होतां क्षर्णी । महाराज देती उत्तर झणीं । जेवीं मेघगर्जना होतां गगनीं । धारा अवतरती भूवरी ॥१७॥ आम्हांसी नाही ठावठिकाण । आम्ही मुळीच निर्गुण । कर्मवशे पावूनि बंधन । पिंडाप्रती पावलों ॥१८॥ या पिंडासी देह म्हणती । देहीं आमुचें नांव निश्चितीं । विश्व हेचि गाव निगुती । आमुचे जाणा सर्वथा ॥१९॥ ब्रह्म आमुचा जनिता । माया आमुची माता । यायोगें ती साकारता । आम्ही पावलों शरीर हे ॥२०॥ हेचि तयांचे प्रत्युत्तर । लोकांचिये प्रश्नावर । जग अवघें नश्वर । भावना जयांची सर्वदा ॥२१॥ त्या महाराजें  शिरडींत । चमत्कार केले अगणित । सकल वर्णावया येथ । नाहीं मती दासातें ॥२२॥ आर्धीच ते गांव लहान । त्यांतूनि थोडकी दुकान । तीही असती बहुत सान । हिंगबोजवार विक्रीची ॥२३॥ त्या दुकानदारांपासी । महाराज मागूनि तेलासी । दीप लाविती मशीदीसी । तैसेचि देउळी अगणित ॥२४॥ ऐशीपरी कित्येक वेळां । साईंनी दीपोत्सव केला । नित्य तेल देण्याला । वाणी अवघे कंटाळले॥२५॥ दुकानदार अवघे जन । करिती विचार एकवटून । रोज आणावें कोठून । तेल यांते द्यावया ॥२६॥ ऐसा विचार करुनि मानसी । महाराज येतां दुकानासी । खोटेंचि सांगती तयांसी । तेल नाही म्हणूनियां ॥२७॥ ऐसें उत्तर ऐकतांक्षणी । बाबा चकित झाले मनी । असत्य वदण्या यांलागुनी । कांही न वाटे अवघड ॥२८॥ यानेंचि हे बुडाले जन । दुरावला नारायण । पुढे हे पावती पतन । आपुलिया कर्मवशें ॥२९॥ जो असत्य वदे वाणी । तो पातक्यांचा मुकुटमणी । तयांसी तो चक्रपाणी । न भेटे कदापि ॥३०॥ सत्य वाक्य ज्याचेजवळ । तयासी विकला घननीळ । जपतपादि सकळ । सत्यापुढे बापुडें ॥३१॥ सत्य पुण्याईचा घाट । सत्य ही मोक्षाची वाट । सत्य आनंदनदीचा घाट । तें सत्य न सोडावे ॥३२॥ वाण्यांसी न देतां प्रत्युत्तर । महाराज निघाले सत्वर । कृत्य केलें अघटित थोर । अगाध लीला बाबांची ॥३३॥ मशीदीच्या सभोवार । पणत्या ठेविल्या प्रचुर । कांकडे घातले आंत थोर । कौतुकें लोक पाहती ॥३४॥ जन परस्परें बोलती । तेलवीण कैसे लागती । दीप येथे निश्चिती । वेडा पीर असे हा ॥३५॥ खडकी पेरणे बीजालागुन । अथवा वांझेचे बाळंतपण। करावया सुज्ञ जन । इच्छील काय कधींतरी ॥३६॥ हा वेडयांचा शिखामणी । अज्ञान्यांचा अग्रगणी । दीप तेलावांचूनी । लावावया इच्छीतसे ॥३७॥ तेल होतें टमरेलांत । लावण्यापुरतें सांजवात। ते घेउनि हातांत । गेले बाबा मशीदीसी ॥३८॥ तें नानासाहेब डेंगळे । लोकांसी बोलू लागले । तुम्हीं अंध झाला सगळे । उगी तयासी निंदूं नका ॥३९॥ कोणाची योग्यता कैशापरी । हे एक जाणे श्रीहरी । हिरा पडला जरी गारी । तरी कां गार मानावा ॥४०॥ काही वेळ बसा स्वस्थ । हा फकीर काय करितो येथे । तें पहा हो सावचित्त । वृथा घाई करूं नका ॥४१॥ ऐसें लोकांसी सांगितले । डेंगळे मशीदीसी आले। मौनव्रत धारण केलें । चमत्कार पहावया ॥४२॥ ते काय केलें महाराजांनी । तेलांत घालूनि अर्धे पाणी । आत्मारामालागुनी । अर्पण केले तेधवां ॥४३॥ तेलमिश्रित पाणी प्याले । मग निवळ पाणी घेतलें । पणत्यांमाजी ओतलें । स्नेहाऐवजी तत्क्षणीं ॥४४ ॥ काडी ओढूनि पेटविले । दीप बाबांनी अवघे भले । चकित झाले डेंगळे । पाय धरले जावोनी ॥४५॥ दिवे जाळिले रात्रभर । लोक पाहती चमत्कार । केवढा बाबांचा अधिकार । प्रति-ईश्वर जन्मला ॥ ४६॥ शिरडीचे लोक मिळाले । साईपदीं लीन झाले । म्हणती आम्ही अपराध केले । कोपू नका आम्हांवरी ॥४७ ॥ आम्ही पोरें तुमचीं । तुम्ही आहां माय साची । क्षमा करा अपराधांची । साईमहाराज कृपानिधी ॥४८॥ तुम्ही कृपेचे सागर । तुम्ही ज्ञाननभीचे दिनकर । तुम्हीं सद्गुणांचे सरोवर । शांततेचे मेरु तुम्ही ॥४९॥ तेधवां बाबा अवघ्यांप्रती । बोलू लागले निश्चिती । तुम्ही ऐका रे माझी उक्ती । ये समयी सावचित्तें ॥५०॥ वर्तन ठेवा ऐशापरी । जेणें राजी राहील श्रीहरी । असत्य न वदावी वैखरी । सत्य सदा सांभाळावें ॥५१॥ घातपात कवणाचा । करु नका कधींच साचा । धर्मकर्मी द्रव्याचा । व्यय करावा यथाशक्ती ॥५२॥ तरीच होईल कल्याण । अंतीं भेटेल नारायण । हे माझें सत्य वचन । सदा वागवा मानसीं ॥५३॥ ते मानले अवघ्यांसी । वंदूनि साई चरणांसी । लोक गेले स्थानासी । अति आनंदे आपुल्या ॥५४॥ साईमहाराज योगाभ्यासी । किती वर्णावें तयांसी । त्यांच्या अगम्य लीलांसी । वर्णितां न ये पार कधीं ॥५५॥ हे अखिल वर्तमान । चितांबरां लागून । डेंगळयांनी केले कथन । तेही भाविक म्हणोनियां ॥५६॥ असे शय्या विचित्र बाबांची । एक फळी लांकडाची । रुंदी एक वीत साची । असे लांब चार हात ॥५७॥ तीच त्यांचा स्पंदन । तीच त्यांचे अंथरुण । जीर्ण चिंध्यांनी बांधून । टांगिलीसे मशिदींत ॥५८॥ ती मशीद होती जीर्ण । किलच्याही गेल्या निघून । अगदीं आढयाचे सन्निधान । फळी टांगिली बाबांनी ॥५९॥ नुसतें बैसतां तिच्यावरी । तनू होय धनूपरी । ऐशा विचित्र शय्येवरी । शयन करिती महाराज ॥६०॥ फळीचे उभय बाजूंसी । म्हणजे उशापायथ्यासी । लावूनि दिवे पुण्यराशी । निजती योग बळाने ॥६१॥ नुसता पाय ठेवितां वरी । जी तुटेल निर्धारीं । ऐसी तिची बळकटी खरी । काय वर्णन करावे ॥६२॥ तें असत्य वाटे कित्येकांस । म्हणूनि मुद्दाम रात्रीस । जाऊनि पाहती बाबांस । तों ते निद्रिस्त फळीवरी ॥६३॥ ही मौज पाहण्याप्रती । दाटी होऊ लागली अती । तेणें उपाधी निश्चिती । होऊ लागली सर्वदा ॥६४ ॥ त्या फळीस म्हणूनी । तोडूनि टाकिले एके दिनीं । मोकळे त्रासापासूनी । शीघ्र व्हावयाकारणे ॥६५ ॥ ख्याती झाली लोकांत । बाबा साई महामहंत । नवसही अनंत । करूं लागले तयांप्रती ॥६६॥ शिरडी झाले महाक्षेत्र । वाराणसीसम पवित्र । बाबांमुळे सर्वत्र । नांव झाले तियेचें ॥६७॥ जैसे पुष्पयोगें मृत्तिकेस । किंवा हिऱ्यामुळे कोंदणास । वा सुवर्णामुळे चिंधीस । महत्त्व येतें जैशापरी ॥६८॥ तैसें शिरडीसी बाबांमुळे । भूमंडळी महत्त्व आले । खेड्याचे क्षेत्र बनले। थोर योग्यता साधूची ॥६९॥ असो एके समयासी । मंडळी आली बहुवसी । तया शिरडी ग्रामासी । सिद्धदर्शन घ्यावया ॥७०॥ चांदोरकर कुळभूषण । गोविंदात्मज नारायण । कलेक्टराचा चिटणीस जाण । नानासाहेब म्हणती जया ॥७१॥ दुजे रामदास हरिदास । वास जयांचा वांईस । तिसरे त्यांचे सोबतीस । होते बापू नगरकर ॥७२॥ कानगांवकर ते चौथे । ऐसे जमोनि आले तेथें । सिद्धदर्शन घ्यायातें । शिरडीग्रामीं श्रवण करा ॥७३॥ त्या रामदासी बुवासी । जाणे होतें दुसरे दिवशी । हनुमंताच्या जयंतीसी । सीनातटी नगरांत ॥७४॥ ते तळमळ करूं लागले । म्हणती पाहिजे आतांचि गेलें । दर्शन घेणे पुरे झालें । चला गाडी आटोपा ॥७५॥ तैं महाराज म्हणती चिटणीसासी । प्रथम करुनि भोजनासी । मग जावें वाटे मशीं । तुम्ही नगराकारणे ॥७६॥ या ऐकोनि महाराजवचना । स्तब्ध झाले साहेब नाना । घेऊनि कानगांवकरांना । केली तयारी भोजनाची ॥७७॥ इकडे तो वांईकर । जावया झाला बहुत आतुर । म्हणे अहो बापू नगरकर । काय विचार करणे आतां ॥७८॥ माझी उद्यां आहे कथा । नगरामाजी तत्त्वतां । या वेडयाच्या नादा आतां । लागणे पुरे झालें ॥७९॥ चिटणीसाचे आहे ठीक । घरी पैसा मुबलक । मला मागणे येईल भीक । लागतां नादीं साईंच्या ॥८०॥ येथें न प्राप्ति कवडीची । चला वाट धरुं स्टेशनाची । गाडी पाहिजे आतांची । साधिली आपणां अवश्य ॥८१॥ ऐसे बोलूनि निघाले । उभयतां स्टेशनावरी आले। मागें शिरडीसी राहिले । कानगांवकर व चिटणीस ॥८२॥ महाराज म्हणती चिटणीसासी । पहा जनांची रीत कैसी । सोडोनि साथीदारांसी । दक्ष असती मतलबा ॥८३॥। म्हणोनि ऐसा करावा साथी । जो न सोडी कल्पांतीं । जैसा सुवास सुमनाप्रती । कधींही न विसंबे ॥८४॥ असो झाली भोजनें । आतां तुम्हीही येथूनि जाणें । जें बोललों ते मनीं  धरणें । अवकाश आहे गाडीसी ॥८५॥ तें मानिले चिटणिसांनीं । ठेवूनि मस्तक साईचरणीं । निघते झाले तेथोनी । स्टेशनावरी यावया ॥८६॥ इकडे बापू आणि कथेकरी । बैसले उपाशीं स्टेशनावरी । चडफडत आपुले अंतरी । कांही न मिळे खावया ॥८७॥ चिटणीसांना पाहून । गेले दोघे विरघळून । खाली घालोनियां मान । माती उकरीत बैसले ॥८८॥ चांदोरकर पुसती तयांसी । कां हो न गेलां नगरासी । गाडी न मिळाली वाटते मजसी । तुम्हां जावयाकारणे ॥८९॥ तैं म्हणे तो नगरकर । आज गाडीसी आहे उशीर । तीन घंटे साचार । मेलों उपाशी मात्र आम्ही ॥९०॥ साधूचें नायकिलें । त्याचें हे फळ लाधले । तुम्हीं मात्र बरें केलें । फजीत आम्ही पावलों ॥९१॥ मग अवघे बसूनि गाडींत । आले शहर नगराप्रत । त्रिकालज्ञ बाबा सत्य । नमन माझें तयांसी ॥९२॥ असो शिरडी ग्रामीचा । अप्पा कुळकर्णी होय साचा । शुद्ध भाव जडला त्याचा । साईचिये पदापाशीं ॥९३॥ पूर्वकर्म जैसें असे । तैसी बुद्धि होतसे । त्या अप्पाचिया कर्मवशें । काय घडले तें ऐका ॥९४॥ कांही एके कामांत । अप्पावरी आली आफत । ती खरी अथवा खोटी सत्य । हें ठाऊक ईश्वराला ॥९५॥ गवगवा झाला लोकांत । अप्पा कुळकर्णी लबाड सत्य । तैसेंचि भूपाचे मनांत । आलें असे त्याविषयीं ॥९६॥ कोणी म्हणती तयावरती । खटला होणार हें निश्चितीं । ऐसें ऐकतां चित्तीं । धडकी अप्पाच्या भरली असे ॥९७॥ अप्पासी केले बोलावणे । प्रांताच्या साहेबानें । हुकूम लिहूनि धाडिला त्यानें । यावे तुम्ही जबाबा ॥९८॥ हुकूम पडतां हातांत । अप्पा झाला भयभीत । म्हणे आतां शिरडीप्रत । येणे कशाचे घडते हो ॥९९॥ निघतेवेळी तयांनी । बाबांसी जोडिले दोन्ही पाणी । बोलता झाला गहिंवरुनी । कठिण प्रसंग आला हा ॥१००॥ तुम्ही साधु सत्पुरुष । तुम्ही साक्षात् श्रीनिवास । तुम्ही शास्ते काळास । हे मी जाणतों गुरुराया ॥१०१॥ ही माझेवरची आफत । सत्य आहे किंवा मिथ्य । हे जाणसी तूं समर्थ । त्रिकालज्ञ महाराजा ॥१०२॥ त्याविषयी बोलणें नाहीं । अब्रु राख माझे आई । रडूं लागला धायी धायीं । पायां मिठी घालोनी ॥१०३॥ माझें कांहीं वाईट होतां । आपुलें नांव जाईल समर्था । याचा विचार आणोनि चित्ता । संकट माझें हरावे ॥१०४॥ जवळी असतां कुबेर । कां हिंडावे दारोदार । सोडोनि क्षीरसागर । मीन जाय ओहोळाकडे ॥१०५॥ माझा वशिला तुझे पाय । तुंचि माझी बापमाय । या वेळी साह्य होय । संकट माझें हरावें ॥१०६॥ मजला म्हणती अवघे जन । हा बाबांचा कल्याण । शिक्षा होतां मजलागून । काळोखी लागेल तुम्हांतें ॥१०७॥ कामधेनूचे पोरांनीं । कां लागावें अन्यस्तनीं । कल्पवृक्षाचे फळांनीं । कां पडावे कांटयांत ॥१०८॥ ह्याचा करा विचार । कृपा करा माझेवर । जगांत अवघ्या नाहींतर । निंदा होईल आपुली ॥१०९॥ ऐसें ऐकतां दीन वचन । महाराज द्रवले मनीं पूर्ण । बोलले अप्पालागून । ऐक वचन माझें हें ॥११०॥ नेवाशास प्रांतस्वारी । आहे सांप्रत प्रवरातीरीं । तुवां जावे तेथवरी । भय चित्तीं मानूं नको ॥१११॥ तेथे जगाचा सूत्रधार । मोहिनीरुप परमेश्वर । ज्या नमिता झाला ज्ञानेश्वर । भावार्थदीपिका लिहितांना ॥११२॥ जो दशावतार धरिता । जो अल्लाइलाही तत्त्वता । मूढ जीवांचे उद्धारार्थ । सगुण झाला ज्ञानेश्वर ॥११३॥ तया करुनि नमस्कार । साहेबापुढे व्हावे हजर । पाठ तुझी साचार । तोचि राखील निश्चयें ॥११४॥ तें अप्पानें मानिलें । प्रवरातटासी येणे केलें। मोहिनीराजासी वंदिलें । मग गेले कचेरीस ॥११५॥ हृदयीं बाबांचे स्मरण । जबाब दिला लिहून । तो साहेबानें ऐकोन । सोडून दिले तयातें ॥११६॥ साहेब म्हणे अप्पासी । त्वां न खाल्लें पैशासी । ऐसें खातरीने वाटे मजसी । जा म्यां तुला सोडिलें ॥११७॥ तें ऐकतां हुजूरवचन । आनंदले अप्पाचें मन । शिरडीकडे तोंड करुन । नाचू लागला आनंदें ॥११८॥ हे साईमहाराज कल्पद्रुमा । भक्तजनांचे पूर्णकामा । वैराग्याच्या निवासधामा । केलीस कृपा माझेवरी ॥११९॥ तेणें मी झालों धन्य । या जगामार्जी जाण । अब्रूचें केलें रक्षण । माझ्या तुवां पुण्यवंता ॥१२०॥ अप्पा तेथूनि दुसरे दिवशीं । परत आला शिरडीसी । नमूनि साईपदासी । वर्तमान श्रुत केलें ॥१२१॥ बोलले बाबा त्यावर । कर्ता करविता परमेश्वर । भक्तांसाठी शार्ङ्गधर । जें न घडे तें घडवीतसे ॥१२२॥ पुढे एके समयासी । नारायण कृष्ण पेणशासी । दाखविले चमत्कारासी । कथानक ऐका हो ॥१२३॥ कांता तया पेणशाची । परम भाविक उदार मनाची । तिची इच्छा दर्शनाची । झाली असे बाबांच्या ॥१२४॥ सती विनवी जोडूनि करा । हे मत्सौभाग्यमांडारा । हे मत्सौख्यनभींचे दिनकरा । माझी विनंती ऐका हे ॥१२५॥ कर्णोपकर्णी ऐकिली मात । शिरडी नामक ग्रामांत । बाबा साई महामहंत । योग्य असती दर्शना ॥१२६॥ म्हणूनि वाटते माझ्या मनीं । चला त्या गांवालागुनी । लीन होऊ संतचरणीं । आपण उभयतां प्राणेश्वरा ॥१२७॥ पेणसे म्हणती त्यावरी । ऐक मद्वचना सुंदरी । शिरडी ग्रामभीतरी । कोणी न संत सुशीले ॥१२८॥ तेथें एक मुसलमान । वेडापिसा आहे जाण । बळेचि ढोंग माजवून । जग लुटाया बैसला ॥१२९॥ त्याचा मांडिला देव्हारा । या अज्ञ जनांनी खरा । म्हणोनि ऐकें माझी गिरा । भलता हट्ट घेऊ नको ॥१३०॥ जेथे मुळीच क्षारपण । तेथें मधुरता कोठून । बेगडाचें उत्तम सुवर्ण । होईल कां सांग कांते ॥१३१॥ तूं न पडावे याचें भरी । तो शिरडीमधला भिकारी । तुकडे मागोनि घरोघरीं । पोट आपले भरीतसे ॥१३२॥ साध्वीचे चित्तीं तळमळ । परी लागलीसे प्रबळ । म्हणे कधीं अर्पीन भाळ । त्या महाराजपदीं मी ॥१३३॥ पेणसे पुढे फिरत फिरत । आले शिरडी ग्रामांत । सवें कांता सद्गुणी शांत । नाम माई जियेचें ॥१३४॥ पेणसे सरकारी कामी गुंतले । तों साध्वीनें काय केलें । जावोनि आपुले साधिलें । कार्य तेधवां दर्शनाचें ॥१३५॥ साईपदीं अर्पितां भाळ । निमाली मनाची तळमळ । समाधान झालें सकळ । कौतुकें सांगे पतीसी ॥१३६॥ मी गेले दर्शनासी । तो खराचि आहे पुण्यराशी । तुम्हीं नका निंदूं त्यासी । दर्शन घ्या हो साधूचें ॥१३७॥ कांतेच्या आग्रहावरून । आले दर्शनाकारण । तें महाराज बोलले गर्जोन । येऊ नका कोणी येथें ॥१३८॥ धोंडा घेऊनि हातीं । पुढे येतां मारीन म्हणती । मी आहे ढोंगी अती । माझें दर्शन घेऊं नका ॥१३९ ॥ मी जातीने आहे हीन । वेडा पिसा मुसलमान । तुम्ही उच्चवर्णी ब्राह्मण । बाटाल दर्शन घेतांचि ॥१४०॥ ऐसें बोलतां तयासी । पेणसे विरघळले मानर्सी । म्हणती हा असे ज्ञानराशी । त्रिकालज्ञ महाराज ॥१४१॥ आहीं बोललो उभयतां । ते यां कळलें तत्त्वतां । जैसी वाऱ्याची व्यापकता । तैसी यांच्या ज्ञानाची ॥१४२॥ पेणशांनी विचार केला । लावूनि अप्पाचा वशिला । लाभ करुनि घेतला । सत्पुरुषदर्शनाचा ॥१४३॥ यासी लोटतां कांहीं दिन । काय घडले वर्तमान । तें ऐका हो भाविकजन । श्रवणीं सादर बैसावें ॥१४४॥ एके दिनी सहजगती । महाराज बोलले अप्पाप्रती । आज चोरटे निश्चितीं । आले आपुल्या गांवांत ॥१४५॥ या चोरांची तऱ्हा निराळी । घराचा विक्षभ न करिती मुळी । ऐन मालावरी सगळी । दृष्टी असे तयांची ॥१४६॥ तो करुनि हरण । जाती सवें घेऊन । चोरी करितां न दिसती जाण । ऐसे महाबिलंदर ते ॥१४७॥ त्यांची प्रथमतः होईल स्वारी । आजि वेडया तुझ्यावरी । यास्तव जा कांहीतरी । बंदोबस्त करावया ॥१४८॥ मथितार्थ या गोष्टीचा । अप्पासी न कळला साचा । पहारा बसवूनि भिल्लांचा । लौकिकी बंदोबस्त केला असे ॥१४९॥ गल्लोगल्ली फिरे गस्त । होतां एक प्रहर रात्र । जुलाब उलटया अप्पाप्रत । होऊ लागल्या मरीच्या ॥१५०॥ शरीर झालें अवघें गार । बांबे व्यापिले पदकर । नासिक कळस साचार । झालासे वांकडा ॥१५१॥ खोल खोल डोळे गेले । नाडयांनी स्थान सोडिले । लोक शोकाकुल झाले । पाहूनि स्थिति अप्पाची ॥१५२॥ कांता झाली घाबरी । पाहतां नवऱ्याची स्थिती खरी । धावोनि आली झडकरी । मशीदींत बाबांच्या ॥१५३॥ महाराजांचे धरुनि पाय । रडूं लागली धाय धाय । बाबा माझा पतिराज । सोडूनियां चालिला ॥१५४॥ द्या हो उदी अंगारा । तेणें उतार पडेल जरा । सौभाग्यजहाज सागरा । नका बुडवू महाराजा ॥१५६॥ महाराज म्हणती तियेसी । नको करूं शोकासी। जो जन्मला मृत्यु त्यासी । आहे येणार एके दिनीं ॥१५६॥ जन्ममृत्यु ईश्वरी कळा । तोचि उरला भरुनि सगळा । करुं गेलिया तो वेगळा । कांही न ये हातासी ॥१५७॥ कोणी न जन्मे मरे कोणी । पहा परी ज्ञानचक्षूंनी । तूंही न निराळी त्यापासोनी । येईल हे प्रत्यया ॥१५८॥ जैसी बंडी झालिया जीर्ण । लोक देताती फेंकून । किंवा नावडे म्हणून । त्याग करिती तियेचा ॥१५९॥ तैसे हे शरीरवसन । पांघरलासे बाळे प्राण । तो प्राण नारायण । अक्षय अभंग निर्विकल्प ॥१६०॥ म्हणूनि अंगारे करूं नको । उगीच ठिगळें मारुं नको । आड त्याच्या येऊं नको । जाऊ दे त्यासी मुक्कामा ॥१६१॥ माझ्या आधीच अप्पांनी । बदलावया आपुली कफनी । केली तयारी त्यालागुनी । तूं आड येऊं नको ॥१६२॥ अप्पासी मिळेल सद्‌गती । मोक्ष आला त्याचे हातीं । चर्मचक्षूंच्या आड निश्चितीं । होताहे तो होऊं दे ॥१६३॥ ऐसें निरवूनि तियेसी । लावूनि दिधलें गेहासी । झाला अप्पा स्वर्गवासी । तात्काळ कांहीं वेळाने ॥१६४॥ दुसरे दिवशी गांवांत । दोन तीन लागले लोक सत्य । अवघे झाले भयभीत । विनवू लागले साईंसी ॥१६५॥ बाबा पोत खेळू लागली मरी । ह्याचा विचार कांहीतरी । करा तुम्ही आमुच्या नगरीं । असूनि काय उपयोग ॥१६६॥ महाराज म्हणती त्यांप्रत । जातील माणसें सात । या आपुल्या शिरडींत । मग न राहे मरी ती ॥१६७॥ बोलले तैसें झालें सत्य । मेली माणसे अवघीं सात । केवढे बाबांचे सामर्थ्य । आधींच भाकित केले तिचे ॥१६८॥ आतां ऐका पुढील प्रकार । तुम्ही श्रोते उदार धीर । । दासगणू मी तुमचें पोर । बोबडया शब्दें सांगतसे ॥१६९॥ कोंडया सुतार नामें एक । भक्त होता परम भाविक । त्यावरी बाबांचे प्रेम देख । होते आगळें  सर्वांहुनी ॥१७०॥ बाबा म्हणती कोंडयासी । तुवां जावे खळवाडीसी । आग मधल्या गंजीसी । लागली ति विझवावया ॥१७१॥ कोंडया झाला घाबरा । खळ्यासी गेला करुनि त्वरा । तेथे तपास करुनि पुरा । आलासे तो माघारी ॥१७२॥ बाबा उगीच काहीतरी । सांगूनि मजला त्रास भारी । दिधला दुपारच्या अवसरी । पाय माझे पोळले ॥१७३॥ बाबा म्हणती ऐक जरा । माझी नोहे असत्य गिरा । वळूनि पाहें माघारा । तो पहा धूर निघाला ॥१७४॥ सुड्यांसी सुड्या लागल्या दाट । मधल्या सुडीनें घेतला पेट । गावांत झाला बोभाट । पेटलीसे खळवाडी ॥१७५॥ दिवस होता उन्हाळयाचा । त्यांत समय दुपारचा । प्रभंजन सुटला जोराचा । प्रलयवातासमान ॥१७६॥ कडकडां झाडे मोडती ॥ छपरें गगनीं उडूं पाहती । वावटळीसी नाहीं गणती । दुर्धर प्रसंग ओढवला ॥१७७॥ लोक अवघे घाबरले । साईबाबांकडे आले । घट्ट तयांचे पाय धरिले । रडूं लागले दीनवत ॥१७८॥ हे साईबाबा कृपाराशी । आग लागली खळवाडीसी । आतां आमुची गति कैसी । सांगा होईल महाराजा ॥१७९॥ खळवाडी आमुचा प्राण । खळवाडी आमुचें जीवन । ती अवघी जळाल्या जाण । अन्न न मिळेल आम्हांतें ॥१८०॥ मुले माणसे मरतील जाणं । करुनियां अन्नअन्न । गुरेही सोडतील प्राण । चाऱ्यावांचून दयाळा ॥१८१॥ यासाठी काहीतरी । उपाय सांगा झडकरी । तुम्ही साक्षात् श्रीहरी । भूतभविष्य जाणते ॥१८२॥ त्या जनांच्या विनंतीसी । देऊनि मान पुण्यराशी । गेले त्वरें खळ्यासी । आग विझवायाकारणे ॥१८३॥ गंजी जी होती पेटली । ती महाराजांनी अवलोकिली । धार पाण्याची फिरविली । भोवतालीं गंजीच्या ॥१८४॥ ही एवढीचि जळेल । दुसरीसी न धक्का लागेल । हा अग्नीचा भाग सकल । विझवू नका कोणी इसी ॥१८५॥ जैसें महाराज बोलिले । तैसेंचि पुढे प्रत्यया आलें । जन अवघे आनंदले । थोर महती बाबांची ॥१८६॥ अवघ्या गंजी शेजारच्या । रक्षण केल्या असती साच्या । अंमल आपुला अग्नीच्या- । वरही ज्यांनी चालविला ॥१८७॥ सत्पुरुषाच्या आज्ञेत । पंचभूते वागती सत्य । सच्चिदानंद रमानाथ । सेवे तिष्ठत जयांच्या ॥१८८॥ अस्तमानाचे समयासी । मंडळी आली दर्शनासी । नानासाहेब पुण्यराशी । चिटणीस नगर जिल्ह्याचे ॥१८९॥ चांदोरकर दर्शनासी । गेले बाबांच्या मशीदीसी । आपण होऊनि तयांसी । महाराज बोलले ते ऐका ॥१९०॥ हे माझे गुणनिधाना । गोविंदात्मज नारायणा । चांदोरकरकुलभूषणा । पहा हे लोक मतलबी ॥१९१॥ आणि या भागचंदाची । गंजी जळाली असे साची । पाठ पुरविली त्याने आमुची । तोटा झाला म्हणोनी ॥१९२॥ लाभ-हानी जन्म-मरण । हें ईश्वराचे आधीन । परी हे कैसे अंध जन । विसरताती तयाला ॥१९३ ॥ लाभ होतां आनंदावें । हानि होतां कां रडावें । माझें माझें म्हणावें । अर्थ काय यामध्ये ॥१९४॥ गंजी कोठली मारवाडयाची । ती मुळीच कडब्याची । उत्पत्ति ती तियेची । झालीसे बीजापासूनी ॥१९५॥ तें बीज धरिले भूमीनीं । पाऊस  पाडिला मेघांनीं । रवीनें अमृतकारांनीं । आणिलें त्या आकारा ॥१९६॥ ऐसे याचे मालक तीन । पृथ्वी, सूर्य, सजल घन । हा माझें माझें म्हणोन । उगाचि टिऱ्या बडवीतसे ॥१९७॥ ती अग्नीनें भक्षिली । सूर्याची सत्ता अधिक झाली । पृथ्वी बिचारी होरपळली । मात्र अग्नितापानें ॥१९८॥ मेघासी यांची दाद नाहीं । तो घमेंडानंदन पाहीं । चंचल सौदामिनीठायीं रममाण जाहला ॥१९९॥ जे स्त्रियांशी लंपट अती । असती की मूढमती । ते कधी ना जाणती । आपुल्या लाभहानीतें ॥२०॥ तो त्यामुळे उगीच बैसला । सूर्याने दावा साधिला । भूमीपासूनि हिसकूनि नेला । माल आपुला म्हणोनी ॥२०१॥ जगांत जितुक्या वस्तु असती । त्यांची अशीच उत्पत्ती । मालक तियेचे निश्चितीं । नाही आपण सर्वदा ॥२०२॥ तूं तरी  कांही सांग याला । हा उगीचि करितो दुःखाला । मघांपासूनि त्रास दिला । याने मला अनिवार ॥२०३॥ एक्या हाती ईश्वर देतो । सवेंचि दुसऱ्या हाती नेतो । प्राण सुखदुःखा कारण होतो । अज्ञान  गांठी म्हणोनियां ॥२०४॥ जा शेटजी घरा स्वस्थ । फायदा दुसऱ्या व्यापारांत । होईल तुमचा निश्चित । येईल नुकसान भरुनि हें ॥२०५॥ ऐसा वर्षतां बोधघन । अवघे आनंदले पूर्ण । चिटणीसांनी केले वंदन । सद्गदित जाहले ॥२०६॥ हे भक्तचकोरपूर्णचंद्रा । हे अपरोक्षज्ञानाच्या समुद्रा । द्यावी मातें ज्ञानमुद्रा । जेणे अज्ञान निरसेल ॥२०७॥ देव कोण कैसा असे । तो कोठें वसतसे । काय केलिया भेटतसे । हे सांगा मजप्रती ॥२०८॥ जग हे मुळीच नश्वर । मग कां करावा हा व्यापार । ह्याचे वर्म फोडोनि सत्वर । मजलार्गी सांगावें ॥२०९॥ ऐसे ऐकतां चिटणीसांचे । भाषण बोलले महाराज साचें । विवेचन ह्या गोष्टीचे । करीन पुढे एके दिना ॥२१०॥ जैसे चांदोरकर भक्त पुरे । तैसेचि गणेश विष्णु बेरे। त्यांचे कथानक आदरें । ऐका थोडे सांगतो ॥२११॥ हे जिल्ह्याचे तपासणीदार । असती शेतकी-खात्यावर । ते मुद्दाम शिरडीवर । आले दर्शन घ्यावया ॥२१२॥ बाबांसी करितां वंदन । बोलले त्यांकारण । तुम्हीं आतांचि येथून । निघून जावें शीघ्रगति ॥२१३ ॥ वेळ थोडाही करुं नका । क्षण एकही राहूं नका । भरधाव आपुला तांगा हांका । कोपरगांवा शीघ्र जावें ॥२१४ ॥ ठेवूनि विश्वास महाराजवचनी । बेरे निघाले तेथूनी । त्यांच्या तांग्यामागोनी । येत होता दुसरा तांगा ॥२१५॥ त्या दुसऱ्या तांग्यांत । जे बैसले होते गुहस्थ । ते बोलले बेऱ्यांप्रत । थांबा आम्हां येऊं द्या ॥२१६॥ तांगा चालवा हळूहळू । नका हरिणासारखे पळू । अजूनि आहे बहुत वेळू । स्टेशनावरी गाडीसी ॥२१७॥ बेऱ्यांनी न त्या मान दिला । तांगा भरधांव हांकिला । गोदाप्रवाह ओलांडिला । पोहोंचले असती स्टेशनासी ॥२१८॥ मागोमाग ऐकिली मात । लुटला तांगा रस्त्यांत । चोरटयांनी लवणांत । कोपरगांव रस्त्यावरी ॥२१९॥ मारहाण फार झाली । संपत्ति अवघी लुटोनि नेली । पोलीस मंडळी निघाली । तपासासी तयाच्या ॥२२०॥ हें ऐकतां अशुभ वृत्त । बेरे म्हणती हे सद्गुरूनाथ । संकटांतूनि या पोराप्रत । तुम्ही सत्य वांचविलें ॥२२१॥ एक हिरण्यकेशी ब्राह्मण । वशिष्ठगोत्री ज्ञानसंपन्न । जयाचें तें वसतिस्थान । पुण्यपट्टण जाणा हो ॥२२२॥ तो असे थोर अधिकारी । श्रीमान सदय अंतरीं । निष्ठा ब्रह्मकर्मावरी । जयाची ती अत्यन्त ॥२२३॥ म्हणे घ्यावें धाराग्न । परी कांता पावली मरण । कांतेचियावांचून । अग्निहोत्र कैसें घडे ॥२२४॥ पोटीं नसे संतती । घरीं अगणित संपत्ती । लग्न कराया नेघे मती । पन्नाशी भरली म्हणूनियां ॥२२५॥ त्यासी म्हणती कित्येक जन । करा हो तुम्हीं दुसरे लग्न । प्रयत्नांती नारायण । पावतो ऐसे शास्त्र ॥२२६॥ बागाईताची मनीं आस । परी न खणी विहिरीस । वा न घेई पाटास । मग कैसें घडावे तें ॥२२७॥ म्हणूनि आमुची प्रार्थना । साहेब आपण मनीं आणा । वधू पाहूनि सुलक्षणा । लग्न करुनि घ्यावें हो ॥२२८॥ तैं ते म्हणती हरिपंत । आतां संततीची आस व्यर्थ । हांसें मात्र जगतांत । होईल लग्न करतांचि ॥२२॥ वयासी आली पन्नासी । म्हातारपणीं संततीसी । पाहीन ऐसा पुण्यराशी । मी नव्हें हो खचित ॥२३०॥ जरी एकदां सांगेल संत । मशीं लग्न करण्याप्रत | तरी लग्नाचा योग सत्य । घडूनि येईल निश्चयें ॥२३१॥ ऐसें बोलूनि जनांसी । हरिपंत आले शिरडीसी । जातां साईदर्शनासी । बाबा बोलूं लागले ॥२३२॥ हरीबा तूं सभाग्य नर । लग्न करी रे सत्वर । पुत्र देईल शंकर । इच्छा पुरेल मनींची ॥२३३॥ उगीच शंका न वाहीं मनीं । तुझा सर्वस्वे आहे ऋणी । भोलानाथ शूलपाणी । कर्पूरगौर परमात्मा ॥२३४॥ तें ऐकतां जन हरिखले । म्हणती आतां बरे झालें । संतानुमोदन मिळाले । लग्न दुसरे करावया ॥२३५॥ तरी म्हणती हरिपंत । ज्योतिष्याचे पाहिजे मत । तें मिळाल्या निश्चित । विवाह करीन दूसरा ॥२३६॥ ऐसें बोलूनि नगरांत गेले । तो पुण्याहुनि पत्र आलें । की एक ज्योतिषी येथे भले । आले असती विद्वान ॥२३७॥ एवं च मत ज्योतिष्याचें । पडले तेघवां अनुकूल साचें । लग्न झाले पंतांचे । साईकृपेकरुनी ॥२३८॥ ते स्त्रीपुरुष तरु चूत । साईकृपा हा वसंत । फल त्या वृक्षा येईल सत्य । शंका मुळींच घेणे नको ॥२३९॥ जोंधळा आला पोटरींत । वरी पाऊस पडला बहुत । हवाही शुद्ध अत्यंत । मग कणसाची शंका कां ॥२४०॥ त्या हरिपंत द्विजाची । निष्ठा साईपदीं साची । योग्यता थोर बाबांची । नमन माझें तयांतें ॥२४१॥ बाबा साई कृपाराशी । ज्ञाननभींचा पूर्ण शशी । चिंतामणी भाविकासी । चिंतिले फल देणार ॥२४२॥ नित्य स्मरतां त्या साईपदा । हरतील अवघ्या आपदा । सीता बेदरे त्या तूं कदा । विसरु नको स्वप्नींही ॥२४३ ॥ तरीचि होईल कल्याण । आपुलें उभयतांचे जाण । साईमहाराज कृपाघन । वळंघेल आपणावरी ॥२४४॥ जे या साईचरित्रासी । श्रवण करितील प्रेमेंसी । त्यांसी रक्षील हृषीकेशी । सत्य सत्य त्रिवाचा ॥२४५॥ पुढील अध्यायीं कथा गहन । त्रिवर्गासी उपदेशकथन । तो उपदेश करितां श्रवण । पुरुषार्थ चारी साधतील ॥२४६॥ दास गणूचे बोबडे बोल । तुम्हीं ऐका हो भक्त प्रेमळ । साईचरणी अर्पितां भाळ । इच्छा पुरतील मनींच्या ॥२४॥ याचे जो करी पारायण । त्याचे पाप होय दहन । पाठी राखील नारायण । तयाची ती सर्वदा ॥२४८॥ स्वस्ति श्रीभक्तलीलामृत । रम्य बाबांचे पवित्र चरित्र । हे केवळ परमामृत । सेवा सेवा गणू म्हणे ॥२४९॥

॥ श्री हरिहरार्पणमस्तु । शुभं भवतु ॥ 
॥ इति एकत्रिंशोऽध्यायः समाप्तः॥


No comments:

Post a Comment