Mar 21, 2022

श्री शिव माहात्म्य - दाशार्हराजाचे आख्यान


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय


प्रथम ग्रंथारंभी शंकराला प्रणाम करून, व्यासमहाराज ग्रंथाला प्रारंभ करतात. एकदां नैमिषारण्यांत शौनकादि ऋषि पुराणश्रवणाच्या इच्छेनें एकत्र जमले असतां, त्याठिकाणी सूतांचे आगमन झाले. ऋषींनी सूताला अर्घ्यपाद्यादिकांनी आतिथ्य केल्यानंतर प्रश्न केला की, सूता ! आपल्या मुखाने शिवमाहात्म्य श्रवण करावे, अशी आम्हाला इच्छा झाली आहे. असा शौनकादि ऋषींचा प्रश्न ऐकून सूत म्हणतात - शौनकादि मुनिहो ! तुम्हाला मी श्री शंकराचें व शिवभक्तांचे माहात्म्य सांगतो, ऐका. 
पूर्वी मथुरानगरीत दाशार्ह नांवाचा एक राजा होता. त्याची कलावती नांवाची पत्नी होती. एकदा त्याने आपल्या राणीला आलिंगन दिले असता, त्याचा देह पत्नीच्या व्रतप्रभावानें दग्ध होऊ लागला. तेव्हां ती त्याला म्हणाली, “ नाथ, मी व्रतस्थ असल्यामुळे तुम्ही मला स्पर्श केला, त्यायोगें तमची अशी स्थिति झाली. मी शिवमंत्राचा जप करीत असल्यामुळे निष्पाप झाले आहे. आपणही गर्गमुनींकडे जाऊन शिवमंत्राचा उपदेश ग्रहण करावा, त्यामुळे तुम्हीही माझ्याप्रमाणेच निष्पाप होऊन सुखी व्हाल.” आपल्या पत्नीचे हे बोलणें ऐकून दाशार्हराज त्वरित गर्गमुनींकडे गेला आणि त्याने गुरुमुखाने षडक्षरमंत्राचा उपदेश घेतला. 
मुनीवर, सर्व मंत्रामध्ये शिवपंचाक्षरी व शिवषडक्षरी असे दोन मंत्र सर्वश्रेष्ठ आहेत. 'ॐ नमः शिवाय ' हा षडक्षरी मंत्र होय व ' नमः शिवाय ' हा पंचाक्षरी मंत्र होय. षडक्षरीमंत्रांत प्रणव असल्यामुळे, त्याचा द्विजांनीच जप करावा व स्त्रियांनी पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. ह्या मंत्राच्या जपाने सर्व सिद्धी प्राप्त होतात. ह्या मंत्राचा सतत जप करावा. हा मंत्र जपल्यास सर्व पापें नष्ट होतात. 
गुरूंच्या मार्गदर्शनाने केलेल्या त्या उपासनेचे फळ लवकरच त्या दाशार्ह नृपास प्राप्त झाले. त्या राजाच्या शरीरांत असणारी पातकें कावळ्याच्या स्वरूपानें तडफडत बाहेर पडून निघून गेली आणि भस्म झाली. त्या दिवसापासून तो राजा शिवमंत्राचा जप मोठ्या भक्तिभावानें करूं लागला. शिवकृपेमुळे तो निष्पाप होऊन पत्नीसह सुखाने शिवध्यान करीत राहू लागला. 
हे दाशार्हाख्यान श्रवण व पठण करणारे सर्वपापातून मुक्त होतात.

लेखन - पुराणपुरुष नरहर रावजी शास्त्री जोगळेकर 

No comments:

Post a Comment