Showing posts with label श्री सत्यदत्त व्रत आख्यान. Show all posts
Showing posts with label श्री सत्यदत्त व्रत आख्यान. Show all posts

Aug 9, 2025

श्री.प.प.श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं दकारादिदत्तात्रेयाष्टोत्तरशतनामस्तोत्रं


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

श्री सत्यदत्त व्रत करतांना या दिव्य स्तोत्राचे पठण अवश्य करावे.
















दत्तं वन्दे दशातीतं दयाब्धिं दहनं दमम् । दक्षं दरघ्नं दस्युघ्नं दर्शं दर्पहरं दवम्  ॥१॥ दातारं दारुणं दांतं दास्यादं दानतोषणम् । दानं दावप्रियं दावं दासत्रं दारवर्जितम् ॥२॥ दिक्पं दिवसपं दिक्स्थं दिव्ययोगं दिगम्बरम । दिव्यं दिष्टं दिनं दिश्यं दिव्याङ्गं दितिजार्चितम् ॥३॥ दीनपं दीधितिं दीप्तं दीर्घं दीपं च दीप्तगुम् । दीनसेव्यं दीनबन्धुं दीक्षादं दीक्षितोत्तमम् ॥४॥ दुर्ज्ञेयं दुर्ग्रहं दुर्गं दुर्गेशं दुःखभंजनम् । दुष्टघ्नं दुग्धपं दुःखं दुर्वासोऽग्र्यं दुरासदम् ॥५॥ दूतं दूतप्रियं दूष्यं दूष्यत्रं दूरदर्शिपम् । दूरं दूरतमं दूर्वाभं दूराङ्गं च दूरगम् ॥६॥ देवार्च्यं देवपं देवं देयज्ञं देवतोत्तमम् । देहज्ञं देहिनं देशं देशिकं देहिजीवनम् ॥७॥ दैन्यं दैन्यहरं दैवं दैन्यदं दैविकांतकम् । दैत्यघ्नं दैवतं दैर्घ्यं दैवज्ञं दैहिकार्तिदम् ॥८॥ दोषघ्नं दोषदं दोषं दोषित्रं दोर्द्वयान्वितम् । दोषज्ञं दोहपं दोषेड्बन्धुं दोर्ज्ञं च दोहदम् ॥९॥ दौरात्म्यघ्नं दौर्मनस्य-हरं दौर्भाग्यमोचनम् । दौष्ट्यत्रं दौष्कुल्यदोष-हरं दौर्हृद्यभञ्जनम् ॥१०॥ दण्डज्ञं दण्डिनं दण्डं दम्भघ्नं दम्भिशासनम् । दन्त्यास्यं दन्तुरं दंशिघ्नं दण्ड्यज्ञं च दण्डदं ॥११॥ अनन्तानन्तनामानि सन्ति तेऽनन्तविक्रम । वेदोऽपि चकितो यत्र नुर्वाग्हृद्दूर का कथा ॥१२॥ ॥ इति श्री.प.प.श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं दकारादिदत्तात्रेयाष्टोत्तरशतनामस्तोत्रं संपूर्णम् ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Sep 15, 2021

श्री सत्यदत्त व्रत आख्यान - अध्याय ५ आणि उत्तरपूजन


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

॥ श्रीगुरुचरणारविन्दाभ्यां नमः ॥


अध्याय ५

॥ श्रीदत्त ॥ सूत म्हणाले, " शरण आलेल्या भक्ताचे रक्षण करणे हे कल्याणकारक व्रत ज्याने स्वीकारले आहे असा, हा परमेश्वर ( दत्तात्रेय ) आहे. हे मुनिश्रेष्‍ठ हो, पुन्हा आदराने त्यांची महती श्रवण करा.॥१॥ गोदावरीतटी राहणारा हरिशर्मा नामक एक ब्राह्मण होता. त्याला वीस वर्षाचा एक पुत्र होता. त्याला जन्मापासूनच गुल्म ( पानथरी ), आठ वर्षांचा क्षय, तीन वर्षांचा जलोदर, एक वर्षाचा जीर्णज्वर व सहा महिन्यांचा दमायुक्त अतिसार व चार महिन्यांपासून भगंदर हे विकार झाले होते.॥२-३॥ शेवटी त्रिदोषाने व्याप्त झालेल्या त्या आपल्या मरणोन्मुख पतीला पाहून, अत्यंत दुःखी झालेली त्याची सोळा वर्षांची पत्नी, परम दत्तभक्त विष्णुदत्तांना शरण गेली,॥४॥ व त्यांना म्हणाली, "हे ब्राह्मणदेवा, मला सौभाग्य द्या. माझे पती रोगपीडित झाले आहेत आणि त्यांना केलेले अतिशय चांगले औषधोपचारही दुर्दैवाने निष्फळ झाले आहेत."॥५॥ त्या साध्वी स्त्रीने अशाप्रकारे प्रार्थना केली असता, दयाळू विष्णुदत्त तिच्या घरी गेले. नंतर तिच्या पतीला पाहून व कर्मविपाक शास्त्राचे अवलोकन करुन त्या साध्वी स्त्रीकडून श्रीसत्यदत्तव्रत करविते झाले.॥६॥ त्या व्रतप्रभावानें, क्रमाने प्रत्येक व्रतांपासून ते ते रोग शीघ्र नाहीसे झाले. नंतर विष्णुदत्तांनी त्या ब्राह्मणाच्या ह्रदयाला स्पर्श करुन उपनिषन्मंत्राचा जप केला.॥७॥ त्यामुळे तो ब्राह्मण, रोगमुक्त होऊन, इहलोकी संपत्ती, आयुष्य, संतती, कीर्ती व श्रीदत्तभक्ती यांचा लाभ करुन घेऊन शेवटी परलोकी उत्तम गतीस प्राप्त झाला.॥८॥ याप्रमाणे श्रीसत्यदत्ताचे व्रत, मनुष्यांना पापनाशक, तुष्‍टी देणारे, पुष्‍टी देणारे, भुक्ती व मुक्ती देणारे असे आहे. श्रीदत्तांच्या अनुग्रहानेच मी हे संक्षेपाने कथन केले आहे."॥९॥ वेदधर्मा म्हणाले, "हे दीपका, असे सूतांच्या मुखातून श्रवण करुन, नैमिष्यारण्यातील महर्षींनी, एकाग्रचित्त होऊन, श्रद्धेने श्रीसत्यदत्ताचे व्रत केले.॥१०॥ हे वत्सा दीपका, यज्ञदीक्षा घेतलेले ते महर्षी, प्रभू श्रीदत्तात्रेयांच्या दर्शनाची आकांक्षा करणारे, एकाग्रचित्ताने श्रीदत्तदेवांच्या चरणकमलांचे ध्यान करू लागले.॥११॥ नंतर सुखकारक ज्याचा स्पर्श आहे, असा सुगंधी वायू वाहू लागला व त्याच्या पाठोपाठ तेजोराशी श्रीदत्तात्रेय स्वमायेच्या योगाने प्रकट झाले.॥१२॥ उदय पावणार्‍या सूर्याप्रमाणे त्या तेजोमंडलाच्या मध्ये असणार्‍या श्रीसत्यदत्ताला, चर्मचक्षूंनी अवलोकन करण्यास ते ऋषी समर्थ झाले नाहीत.॥१३॥ नेत्र मिटून ते ब्राह्मण शांतपणे, ह्रदयामध्ये श्रीहरीची प्रार्थना करु लागले.॥१४॥ आम्हांला प्रभूचे दर्शन कसे होईल, याप्रमाणे ते ऋषी चिंतन करीत असतांना, मेघाप्रमाणे आकाशवाणी झाली. ती अशी की, "हे ऋषीहो, नेत्र उघडा." अशी ईश्वराने प्रेरणा केलेले ते ब्राह्मण भगवत्स्वरुप पाहते झाले व शुद्धचित्त होऊन स्तुती करु लागले.॥१५॥ ऋषी म्हणाले, "खरोखर आपण ऋषी नाही. तसेच वर्णाश्रमचिह्न धारण करणारेही नाही, तर आपण त्रिगुणातीत परब्रह्मस्वरुप आहात. आपणच स्वांशांशाने हे संपूर्ण विश्व उत्पन्न केले आहे.॥१६॥ आसुरी वृत्ती असणारे असे आपल्या मायेने मोहित झालेले लोक, आपले दिव्य, उत्तम, व सत्य असे तेजोमय रुप जाणत नाहीत म्हणूनच या संसारात फार श्रमतात.॥१७॥ तू या विश्वाची उत्पत्ती, पोषण व संहार करणारा आहेस. प्रत्यक्ष ब्रह्मतत्त्व तूच आहेस. हे परमात्मन् ! हे सर्व विश्व खरोखर ब्रह्मरुप आहे आणि तू सर्वात्मा आहेस.॥१८॥ तुझ्यापासून हे विश्व उत्पन्न होते, तुझ्या ठिकाणी रममाण होते व तुझ्या स्वरुपात लीन होते. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, सूर्य, चंद्र व अग्निहोत्री ब्राह्मण या आठ रुपांनी जगन्मय तूच भासत आहेस.॥१९॥ तुझे अत्यंत गूढ असे स्वरुप, सामान्य जनांना समजण्यास कठीण असून ते जाणण्याविषयी आम्ही जो प्रयत्न केला आणि जे रुप आम्ही काही प्रमाणांत जाणू शकलो, हा सर्व आपलाच प्रसाद आहे. याचा अनुभव पूर्वपुण्याईनेच आम्हाला आलेला आहे."॥२०॥ वेदधर्मा ऋषी पुढे कथन करू लागले. याप्रमाणे ऋषींनी स्तवन केल्यामुळे संतुष्‍ट झालेले परमात्मा दत्तात्रेय, त्या ऋषींना, सर्व विश्व आपल्या स्वरुपाच्या ठिकाणी दाखवून मेघाप्रमाणे गंभीर वाणीने त्यांना म्हणाले,॥२१॥ "हे ब्राह्मणहो ! तुमच्यावर कृपा करण्यासाठी मी येथे आलो आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या अनेक जन्मातील तपश्चर्येमुळे, ब्रह्मचर्य, यमनियम, यज्ञयाग इत्यादि साधनानुष्‍ठानामुळे, तसेच या तुम्ही केलेल्या सत्यदत्तव्रतामुळे मी तुमच्यावर संतुष्‍ट झालो आहे. याकरिता तुम्ही लवकर इष्‍ट तो वर मागून घ्या."॥२२-२३॥ त्यावेळी शौनकादि ऋषी म्हणाले, "हे महादेवा ! तूच आम्हास स्वस्वरुपाचे ज्ञान करुन देऊन, स्वभक्त व शांतचित्त कर. कारण तूच सर्वसाक्षी आहेस. आम्ही काय बोलावे ? आपणच आमचा मनोरथ जाणून, सर्वतोपरी योग्य असा अनुग्रह करा."॥२४॥ तेव्हा श्रीसत्यदत्त म्हणाले, "जे तुम्ही श्रद्धेने मला प्रिय असे स्तवन केले, ते मनुष्यांना योगसिद्धी देणारे व भुक्तिमुक्ती देणारे असे आहे.॥२५॥ हे उत्तम अनुष्‍ठानशील ब्राह्मणहो ! तुम्ही या जन्मीच देहांती, मन व वाणीला गोचर न होणार्‍या माझ्या परमानंदस्वरुप श्रेष्‍ठपदाला प्राप्त व्हाल, यात शंका नाही.॥२६॥ तसेच हे सत्यदत्तव्रत, सन्निपात, नेत्ररोग, मेह, कुष्‍ठ, श्लेष्म, क्षय, ज्वर, वातविकार, पित्तविकार, गुल्मरोग, देशांत स्वचक्र, परचक्र, इत्यादिकांनी उत्पन्न होणारा क्षोभ या सर्वांचा नाश करील.॥२७॥ या व्रताने, वंध्या स्त्रीस पुत्र होईल. संकटांनी गांजून गेलेला मनुष्य त्यातून मुक्त होईल. दरिद्री पुरुषाला द्रव्यप्राप्ती होईल. रोग्याला आरोग्य प्राप्ती होईल. मुमुक्षू पुरुषाला सद्गती प्राप्त होईल. ज्याला जे इष्‍ट असेल, ते त्याला या श्रीसत्यदत्तव्रताच्या योगाने प्राप्त होईल."॥२८॥ श्रीवेदधर्मामुनी म्हणाले," दीपका,याप्रमाणे बोलून, स्वप्नामध्ये पाहिलेल्या द्रव्यराशीप्रमाणे तेजोराशी, देवाधिदेव श्रीदत्तराज एकदम अंतर्धान पावले. हे अवलोकन करुन शौनकादि ऋषी अत्यंत आश्चर्यचकित झाले.॥२९॥ वत्सा श्रीदीपका, असा ज्या श्रीप्रभूंचा प्रभाव आहे अशा, शरणागतांविषयी दयाळू, स्मरण केल्याबरोबर भक्ताकडे जाणार्‍या सर्वेश्वर श्रीदत्तात्रेयांचे पूजन, श्रद्धाभक्तीने करुन तूही परमानंदाला प्राप्त हो."॥३०॥
श्रीमत सत्यदत्त हेच सर्वांच्या हृदयरूपी कमलात विराजमान आहेत, ते श्रेष्ठ संन्यासीजनांचे आचार्य असून, त्यांनी श्री वासुदेवानंद सरस्वती या संन्यासी स्वामींच्या बुद्धीला प्रेरणा दिली. त्यानुसार, त्यांनी रचलेल्या श्री सत्यदत्त व्रत आख्यानातील हा पाचवा अध्याय आहे.
॥ इति सत्यदत्त व्रतोपाख्याने पंचमोध्यायः ॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीदत्त ॥ 
**********************************************************
उत्तरपूजन 

अध्याय कथा वाचन पूर्ण झाल्यावर, 
॥ अनेन यथा शक्ति श्री सत्यदत्त व्रतकथा वाचनेन नैवेद्यसाहित पूजनेन श्री दत्तात्रेय: साङग: सपरिवार: प्रियताम् ॥ 
हा मंत्र म्हणून उत्तर पूजन करावे. 
नंतर, दीपारती अथवा कर्पूरारती करावी. 

करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरुवुनिया मन ॥ दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करून ॥धृ.॥
धरणीवर नर पीडित झाले भवरोगे सर्व । कामक्रोधादिक रिपुवर्गे व्यापूनि सगर्व । 
योग याग तप दान नेणती असताही अपूर्व । सुलभपणे निजभजनें त्यासी उद्धरी जो शर्व ॥१॥
अत्रिमुनींच्या सदनी तिन्ही देव भुके येती । भिक्षुक होऊनि अनसूयेप्रति बोलती त्रयमूर्ति । 
नग्न होऊनि आम्हांप्रती द्या अन्न असे वदति । परिसुनि होऊनि नग्न अन्न दे तव ते शिशु होती ॥२॥
दुर्वासाभिध मौनी जाहला शंभू प्रमथेंद्र । ब्रह्मदेव तो जाहला चंद्र जाहला तो उपेंद्र । 
दत्तात्रेय जो वीतनिद्र तो तारका योगीन्द्र । वासुदेव यच्चरण चिंतूनि हो नित्यातंद्र ॥३॥ 

त्यानंतर, श्री. प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीस्वामीविरचित घोरकष्टोद्धरणस्तोत्रम् म्हणावे. 
॥ घोरकष्टोद्धरणस्तोत्रम् ॥
श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव ॥
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥१॥
त्वं नो माता त्वं पिताऽऽप्तोऽधिपस्त्वम् । त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् ॥
त्वं सर्वस्वं नोऽप्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥२॥
पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यम् । भीतिं क्लेशं त्वं हराऽऽशु त्वदन्यम् ॥
त्रातारं नो वीक्ष्य ईशास्तजूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥३॥
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वत्तो देव त्वं शरण्योऽकहर्ता ॥
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥४॥
धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् । सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।
भावासक्तिं चाखिलानंदमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥५॥
श्लोकपंचकमेततद्यो लोकमङ्गलवर्धनम् । प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ॥
॥ इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानन्दसरस्वतीस्वामीविरचितं
घोरकष्टोद्धारणस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

॥ यस्या स्मृत्या च नामोक्त्या तपोयज्ञक्रियादिषु । न्यूनं सम्पूर्णतां याति सद्यो वन्दे तम् अच्युतम् ॥ अशी श्री दत्तात्रेयांची प्रार्थना करावी. 
॥ ॐ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ॥  






॥ श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त ॥ श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु  

श्री सत्यदत्त व्रत आख्यान - अध्याय ३ आणि अध्याय ४


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

॥ श्रीगुरुचरणारविन्दाभ्यां नमः ॥


अध्याय ३ ॥ श्रीदत्त ॥ शौनकादि ऋषी म्हणाले, " हे सूत मुनिवर्य, आपण अत्यंत बुद्धिमान् असून पौराणिकांमध्ये श्रेष्‍ठ आहात, तरी श्रीसत्यदत्ताचे माहात्म्य आम्हाला आणखी सांगा. कारण ते श्रवण करण्याची इच्छा आम्हांस झाली आहे."॥१॥ ते ऐकून सूत म्हणाले, " चंद्रवंशात उत्पन्न झालेला आयु नावाचा महाबुद्धिमान, दाता व जितेंद्रिय असा एक सम्राट राजा होता. पण त्याला अपत्य नसल्यामुळे तो दुःखी होता.॥२॥ मुनींनी सांगितलेले दत्तात्रेयांचे माहात्म्य श्रवण करुन अत्यंत विश्वासाने, नम्रतापूर्वक तो शौनक गुरुवर्यांना पुत्रप्राप्तीसाठी शरण गेला.॥३॥ तेव्हा त्यास शौनक म्हणाले, " हे राजेंद्रा, श्रीसत्यदत्तांचे व्रत यथाविधी कर. त्या व्रताच्या प्रभावाने तुला सुपुत्र निश्चित प्राप्त होईल."॥४॥ असे सद्गुरुंचे वाक्य ऐकून तो राजा एकाग्रचित्त होऊन, यथाविधी श्रीसत्यदत्तांचे व्रत करिता झाला आणि मोठया भक्तीने पत्नी व बंधुजन यांच्यासह प्रसाद सेवन करीता झाला.॥५॥ नंतर त्याच्या राणीस, महापुरुषांच्या लक्षणांनी संपन्न असा एक तेजस्वी पुरुष येऊन, त्याने आपणास मोठे पाणीदार मोती दिले व दूध भरलेल्या शंखाने आपणावर अभिषेक केला, असे स्वप्न पडले. ते स्वप्न तिने राजास कथन केले.॥६-७॥ राजाही प्रातःकालीन स्नानदानादि क्रियांनी शुद्ध होऊन, ते स्वप्न शौनकमुनींस सांगता झाला. ते ऐकून शौनकमुनी म्हणाले, " अनुसूयेच्या गर्भातील रत्न असणार्‍या श्रीदत्तात्रेय प्रभूंनी हे फल अर्पण केले आहे. धर्मात्मा, विष्णुभक्त, उत्तम अशा चंद्रवंशाला भूषण असा पुत्र होईल, हे या स्वप्नाने सूचित केले आहे, याविषयी काहीच शंका नाही."॥८-९॥ याच वेळी हुंडासुराची कन्या मैत्रिणीसह नंदवनामध्ये गेली होती. तेथे काही चारण परस्परांमध्ये बोलत होते, " आयुराजास होणारा पुत्र हुंडासुराचा नाश करील." असे त्यांचे भाषण त्या मुलीने ऐकले आणि तात्काळ नगरांत परत येऊन तिने ते वृत्त आपला पिता, हुंडासुरास कथन केले.॥१०-११॥ दुरात्मा दुष्‍ट दानव हे ऐकून आश्चर्यचकित झाला. खरोखरच हा माझा शत्रू आहे. याला प्रयत्नाने मारलाच पाहिजे.॥१२॥ असा निश्चय करुन तो राक्षस, इंदुमती राणीस दुष्‍ट-वाईट स्वप्ने दाखविता झाला. तथापि श्रीदत्तांनी रक्षण केलेला इंदुमतीचा तो भाग्यवान् गर्भ नाश पावला नाही.॥१३॥इतकेच नव्हे, तर दिवसेंदिवस तो वृद्धिंगत झाला. पूर्ण दिवस भरल्यावर, शुभ काली, रवी, गुरु, शुक्र, बुध व चंद्र हे पांचही ग्रह उच्चस्थानी असून अस्तंगत नसताना, महाभाग्यवान् अशा पुत्रास इंदुमती प्रसविती झाली.॥१४॥ त्या सुंदर बालकास पाहून राणी इंदुमती आनंदित झाली. आयुराजानेही पुत्रजन्माची वार्ता श्रवण करुन, प्रेमाने पुत्राचा जातकर्मसंस्कार केले व अनेक प्रकारची दाने दिली. इतक्यात, कोणी एक दासी प्रसूतिगृहातून बाहेर आली.॥१५-१६॥ मायावी हुंडासुराने त्या दासीच्या अंगात प्रवेश केला आणि बालकाला तेथून नेण्याची इच्छा करणार्‍या त्या राक्षसाने सर्वांना शीघ्र निद्रा यावी या हेतूने मंत्र विद्येचा जप केला.॥१७॥ त्यामुळे राणीसह सर्व मोहित होऊन झोपले असता, हंडासुर दैत्य आपल्या खर्‍या रुपाने प्रकट होऊन त्या बालकाचे अपहरण करिता झाला.॥१८॥ त्या बालकासह आपल्या कांचन नावाच्या नगरात जाऊन त्या दैत्याने आपल्या प्रिय पत्नीला बोलाविले व तिच्या स्वाधीन ते बालक करुन दैत्य म्हणाला,॥१९॥ " हे प्रिये, तू आपल्या समक्ष या अर्भकाला मारुन व त्याचे मांस शिजवून प्रातःकाळी खाण्याकरिता मला दे."॥२०॥" बरे आहे", असे म्हणून ती दैत्य स्त्री त्या बालकाला घेऊन स्वयंपाकघरात गेली आणि तेथे असणा‍र्‍या एकला नावाच्या दासीला तिने कठोरपणाने अशी आज्ञा केली, " कोणताही विचार न करता या बालकाला मारुन व त्याचे मांस उत्तम प्रकारे शिजवून ते तू दैत्यराजास खाण्यास दे." असे म्हणून त्या बालकाला दासीच्या हातात देऊन ती दैत्य स्त्री आपल्या महालात निघून गेली. त्या दासीनेही ते बालक मारुन शिजविण्यासाठी आचार्‍याच्या हाती दिले.॥२१-२२॥ हुंडासुराची स्त्री, विश्वासाने बालकाला मारण्यासाठी दासीजवळ देऊन दुसर्‍या कामाकरिता निघून गेली. तेथे फक्त ती दासी राहिली.॥२३॥ नंतर त्या निर्दय आचार्‍याने नवीनच जन्मलेल्या त्या दिव्य बालकाला मारण्याकरिता त्याच्यावर शस्त्रप्रहार केला, पण त्यामुळे त्या बालकाला काहीच व्यथा झाली नाही.॥२४॥ उलट, श्रीदत्तांचे चक्र त्याचे रक्षण करीत असल्याने त्या आचार्‍याचे शस्त्रच मोडले. बालक न मरता सुरक्षितच राहिले. ते पाहून या बालकाच्या सुदैवाने, ती क्रूर एकला दासीही एकदम शांत झाली.॥२५॥ आणि ती त्या आचार्‍यास म्हणाली, "हे बुद्धिमाना, तू या बालकाला मारु नकोस." त्याने ते कबूल केल्यावर ते दोघे त्या बालकासह नगराबाहेर गेले आणि वसिष्‍ठऋषींच्या आश्रमाच्या बाहेर त्या बालकाला ठेवून शीघ्र परत आले. नंतर त्या आचार्‍याने एका मृग शिशूला मारुन, ते मांस शिजवून दैत्यराजास विश्वासपूर्वक दिले. त्यावेळी तो मूर्ख हुंडासुर मोठया आनंदाने मांस खाऊन स्वतःस कृतकृत्य समजता झाला. त्यानंतर प्रभातकाळी, ज्ञानी पुरुषांमध्ये श्रेष्‍ठ असे वसिष्ठऋषी आपल्या आश्रमाच्या बाहेर येऊन पाहतात, तो त्यांना एक दिव्य बालक एकटेच तेथे निजलेले दिसले. तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन बोलू लागले.॥२६-२७-२८-२९-३०॥ " ऋषीहो, हे कोणाचे सुंदर बालक, रात्री येथे कोणी आणून ठेवले ते समजत नाही."॥३१॥ ते सर्व ऋषीही त्या बालकाला पाहून विस्मित झाले. नंतर त्रिकालज्ञ योगी वसिष्‍ठऋषी ध्यानाने सर्व जाणून बोलू लागले,॥३२॥" हा सोमवंशातील आयुराजापासून दत्तसेवेचे फल म्हणून उत्पन्न झालेला पुत्र असून श्रीदत्तात्रेय याचे नित्य रक्षण करीत असल्याने, हा दीर्घायू व सर्व राजलक्षणांनी संपन्न असा आहे.॥३३॥ हुंडासुराने, हा आपला नाश करणारा आहे असे जाणून सूतिकागृहातून याचा अपहार केला. पण दैवाने हा तेथून सुटून येथे आला आहे." याप्रमाणे बोलून महान् तत्त्वज्ञानी वसिष्‍ठ ऋषीही त्या दिव्य बालकाला पाहून ईशमायेने मोहित झाले.॥३४॥ आणि मोठया दयेने दोन्ही हातांत त्या बालकाला घेऊन आपल्या आश्रमामध्ये नेते झाले. आणि म्हणाले, " श्रीदत्तप्रसादामुळे देवांना व मनुष्यांना विपत्तीतून शीघ्र मुक्त करुन विजयी असा हा सम्राट राजा होईल." या प्रमाणे वसिष्‍ठऋषी बोलत असता देव पुष्पवृष्‍टी करते झाले.॥३५-३६॥ अप्सरा नृत्य करू लागल्या व गंधर्व सुस्वर गायन करू लागले. त्यावेळी आश्रमातील ऋषीही संतुष्‍ट होऊन कुमाराला आशीर्वाद देते झाले.॥३७॥ "हा बालक दीर्घायुषी व ओजबल यांनी संपन्न होवो.", असा आशीर्वाद ऋषींनी कुमाराला दिला. नंतर वसिष्‍ठ ऋषींनी शास्त्रानुसार त्याचा नामकरण विधी केला.॥३८॥ "बालभावांनी ज्या अर्थी केव्हाही तुझे अंतःकरण दूषित झाले नाही त्याअर्थी, हे देववंदिता, तू नहुष या नावाने प्रसिद्ध होशील. तुझे कल्याण असो."॥३९॥ महासती अरुंधतीही वात्सल्यामुळे त्याचे लालनपालन करुन, औरस पुत्राप्रमाणे नेहमी रक्षण करती झाली.॥४०॥ नहुषाला अकरावे वर्ष लागले असता, वसिष्ठांनी क्षत्रियाला उचित अशा विधीने यथाशास्त्र त्याचे उपनयन करुन त्याला वेद,वेदांग, शास्त्रें यथार्थ शिकविली.॥४१॥ सरहस्य धनुर्वेद, विशेषतः सविधान अस्त्रविद्या, ज्ञानशास्त्र, राजनीती, इतिहास, पुराण या सर्वांचे अध्ययन त्याच्याकडून करविते झाले.॥४२॥ याप्रमाणे विद्याग्रहण करीत असताना, यथाविधी शिष्यत्व स्वीकारुन तो नहुष मन, वाणी, शरीरादिकांनी सद्गुरु वसिष्‍ठ ऋषींचे सेवन भक्तिपूर्वक करिता झाला.॥४३॥ या प्रमाणे निर्मत्सर व सर्वगुणांनी पूर्ण असा नहुष, वसिष्‍ठ ऋषींच्या प्रसादाने सर्व विद्यापारंगत झाला.॥४४॥ श्रीमत सत्यदत्त हेच सर्वांच्या हृदयरूपी कमलात विराजमान आहेत, ते श्रेष्ठ संन्यासीजनांचे आचार्य असून, त्यांनी श्री वासुदेवानंद सरस्वती या संन्यासी स्वामींच्या बुद्धीला प्रेरणा दिली. त्यानुसार, त्यांनी रचलेल्या श्री सत्यदत्त व्रत आख्यानातील हा तिसरा अध्याय आहे. ॥ इति श्रीसत्यदत्तव्रतोपाख्याने तृतीयोध्यायः ॥३॥

**************************************************************

अध्याय ४ ॥ श्रीदत्त ॥ सूत पुढें म्हणाले, " आजपर्यंत झालेल्या संचित पापापासून आमचे रक्षण कर, अशी जे एकदाच प्रार्थना करतात, त्यांचेही जो परमात्मा रक्षण करतो अशा परमात्म्याची, नित्य चिंतन करणार्‍या भक्तांविषयी उपेक्षाबुद्धी कशी असेल ?॥१॥ इकडे हुंडासुराने ते अर्भक नेले असता, प्रातःकाल झाल्यावर, प्रस्वापिनी विद्येमुळे झोपी गेलेले सर्व लोक जागे झाले.॥२॥ राणी इंदुमतीही निद्रेतून जागी झाली व चोहीकडे पाहते तो आपले बालक दिसत नाही, कोणी नेले तेही कळत नाही, यामुळे अत्यंत दुःखित होऊन हाहाःकारपूर्वक विलाप करती झाली.॥३॥ " माझा सर्व लक्षणांनी युक्त, देवपुत्राप्रमाणे असणारा, श्रीदत्तांनी दिलेला व रक्षिलेला पुत्र येथून कुणी कसा बरे नेला व कशासाठी नेला ?॥४॥ हाय हाय ! हे पुत्रा, हे बाळा गुणनिधाना, तू कोठे आहेस ?" याप्रमाणे विलाप करणारी ती राणी मृतवत् मूर्च्छित पडली.॥५॥ आयु राजाही ही अप्रिय वार्ता ऐकल्याबरोबर सूतिकागृहामध्ये आला आणि मूर्च्छित झालेल्या राणीस त्याने पाहिले. त्यामुळे अतिशय विव्हळ व दीन होऊन विलाप करीत म्हणाला, " श्रीदत्तात्रेयांच्या प्रसादाचे फळ अक्षय्य असते, असे मी ऐकले आहे. त्याप्रमाणे मला उत्तम गुणवान् असा पुत्रही झाला. पण एकाएकी हे संकट कसे आले, ते मला समजत नाही."॥६-७॥ दुःखातिरेकाने मोहित होऊन आयुराजा पुढे बोलू लागला, " या लोकांत धर्माचरणाचे फळ काहीच नाही. तसेच तपश्चर्येचा व दानाचाही काही उपयोग नाही. माझा सुपुत्र एकाएकी नाहीसा झाल्यामुळे मला असे निश्चित वाटू लागले आहे. हे दीनवत्सला श्रीदत्तप्रभो, या आर्तभक्ताचे आपण रक्षण करावे."॥८॥ यानंतर श्रीदत्तांनी प्रेरित असे दिव्यदर्शन नारदमुनी त्या ठिकाणी आले. श्रीहरिभक्त नारद मुनी आलेले पाहून, आयुराजा त्यांना सामोरा गेला व त्यांचे यथाविधी पूजन करुन आपले दुःख निवेदन केले.॥९॥ ते ऐकून नारदमुनी म्हणाले, "राजा, नाशिवंत पुत्रापासून तुला काय लाभ मिळणार ? तसेच हे नश्वर गृह, क्षेत्र, शरीर यांचा तरी तुला काय उपयोग होणार ? नित्य प्रकाशमान् आनंदरुप श्रीदत्तपरमात्मा तुझ्या हृदयांतच आहेत. त्यांनाच तू शरण जा.॥१०॥ ज्या पुत्राकरिता तू शोक करीत आहेस, तो तुझा पुत्र हुंडासुराने मारण्याकरिता उचलून नेला असताही, दैवयोगाने एका श्रेष्‍ठ ऋषींच्या आश्रमात तो सुरक्षित आहे.॥११॥ धनुर्विद्येत निपुण होऊन तो लवकरच हुंडासुराचा नाश करील व पत्नीसह इकडे येईल. या लोकी राजसुख भोगून, मर्त्य असूनही इंद्रपदाचा देखील उपभोग घेईल."॥१२॥ असे सांगून नारदमुनी निघून गेले असता, ते वृत्त राजाने राणीस कथन केले. " हे प्रिये, देवऋषींची वाणी सत्य आहे. तसेच श्रीदत्तप्रभूंचा वरही सत्यच आहे.॥१३॥ श्रीदत्तांचा प्रसाद खोटा कसा बरे होईल ? म्हणून शरीर शोषण करणारा शोक तू सोडून दे." याप्रमाणे देवर्षी नारदमुनींवर विश्वास असल्यामुळे, श्रीदत्तांचे माहात्म्य स्मरण करुन व श्रीसत्यदत्तांचे पूजन करुन ते राजाराणी सुखाने राहू लागले. त्या व्रताच्याप्रभावाने प्रेरित झालेले मुनिश्रेष्‍ठ वसिष्‍ठ ऋषी, एके दिवशी असे नहुषाला बोलावून म्हणाले,॥१४-१५॥ " हे नहुषा, तू आयुराजा व इंदुमती राणी यांचा पुत्र आहेस. हा मुलगा हुंडासुराला मारील असे चारणांनी बोललेले ऐकून तुझ्यापासून आपला मृत्यू होईल या भीतीने, तुलाच मारुन टाकावे म्हणून हुंडासुराने सूतिकागृहातून तुला उचलून घरी आणले व ठार मारण्याकरिता आचार्‍याजवळ दिले. पण सुदैवाने त्या आचार्‍यालाच दया उत्पन्न होऊन त्यानेच तुला या आश्रमात आणून ठेविले.॥१६-१७॥ हे चंद्रवंशास भूषण असणार्‍या वत्सा, तुझे पालन पोषण आजपर्यंत आमच्याकडून झाले आहे. तथापि तू खरा क्षत्रिय आहेस, म्हणून हिंस्त्र पशूंचा नाश करण्यासाठी मृगया कर आणि हे आयुष्मन् महाबाहो, धनुर्विद्यानिष्णात अशा नहुषा, श्रीदत्तप्रभू तुझे पाठीराखे असल्यामुळे तू सत्वर जाऊन हुंडासुराचा नाश कर.॥१८-१९॥ ब्राह्मण, पितर, देव, स्वर्ग,पृथ्वी व पूषा हे सर्व संकटांपासून तुझे रक्षण करोत. तो हुंडासुर निष्प्रभ होवो व तुला पूर्णपणे विजय प्राप्त होवो. "॥२०॥ असे सांगून सद्गुरुंनी त्याला युद्धाकरिता पाठविले. ज्याला सर्वांचा आशीर्वाद मिळाला आहे असा नहुष भक्तीने आपल्या गुरुवर्यांस नमस्कार करुन व श्रीदत्तांचे स्मरण करुन म्हणाला,॥२१॥ " ज्यांनी गर्भाधानापासून आजपर्यंत वात्सल्यानें माझे रक्षण केले, ते अत्रिनंदन दत्तात्रेय युद्धामध्ये जय देऊन माझे रक्षण करो."॥२२॥याप्रमाणे बोलून तो नहुष, हुंडासुराला मारण्यासाठी निघाला. त्यावेळी देव पुष्पवृष्‍टी करु लागले व सर्व ऋषींनी आशीर्वाद दिला.॥२३॥ त्या वेळी इंद्राच्या आज्ञेने त्याचा सारथी मातली, नहुषाजवळ रथासह येऊन म्हणाला, " मला देवेंद्राने तुला सहाय्य करण्यासाठी मुद्दाम पाठविले आहे. म्हणून मी आणलेल्या या दिव्य अश्व जोडलेल्या रथामध्ये बसून तू हुंडासुराचा नाश कर." ते ऐकून नहुष आनंदित होऊन व नमस्कार करुन रथामध्ये बसला.॥२४-२५॥ वेदोक्तमंत्रांनी सन्नद्ध होऊन (चिलखत घालून) तो महिषासुराला मारण्यासाठी निघाला. नंतर त्या ठिकाणी त्याच्या सहाय्यासाठी देवसैनिक आले.॥२६॥ नहुषाचे सैनिक सिद्ध, गुह्यक, गंधर्व, यक्ष, विद्याधर, सर्प यांनी केलेला कलकला शब्द ऐकून, भयभीत झालेला हुंडासुर म्हणाला,॥२७॥ "हे दुता, जा, हा मोठा कोलाहल कोठून ऐकू येत आहे ते जाणून लवकर परत ये." दूत हुंडासुराच्या आज्ञेप्रमाणे तिकडे गेला आणि प्रयत्नपूर्वक काय आहे ते जाणून परत येऊन हुंडासुरास म्हणाला, " आयुराजाचा मोठा शूर व अजिंक्य असा पुत्र नहुष, इंद्राच्या रथामध्ये बसून युद्धाकरिता आलेला आहे." हे ऐकून क्रुद्ध झालेला हुंडासुराने पत्नी, दासी व आचारी यांना हाक मारुन पुनः पुनः विचारले, "अरे, तुम्ही तो बालक मारला किंवा नाही ते खरे सांगा." तेव्हा ते म्हणाले, "त्याच वेळी त्या बालकाला मारले व त्याचे मांस आपण खाऊनही टाकले.॥२८-२९-३०॥ खरोखर दैव हेच प्रबल आहे असे मानून, ज्याची आज्ञा अत्यंत उग्र व कठोर आहे, असा तो हुंडासुर दैत्यांना म्हणाला, " तुम्ही सर्वांनी युद्ध करण्यासाठी रणांगणावर जावे. जे कोणी भिऊन राहतील त्यांना येथेच एका क्षणात मी ठार मारीन."॥३१॥ याप्रमाणे दैत्यांना आज्ञा करुन तो हुंडासुर, चिलखत घालून दैत्यसेनेसह नहुषाबरोबर युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर गेला. अत्यंत रागावलेला तो हुंडासुर गर्जना करीत नहुषासमोर येऊन त्याला म्हणाला,॥३२॥ "अरे मनुष्यपुत्रा, उगीच गर्जना करु नकोस. मी मोठा प्रतापी हुंडासुर आहे. तू माझ्यापुढे युद्धाकरिता उभा राहशील, तर या देवांसह जिवंत परत जाणार नाहीस."॥३३॥ ते ऐकून नहुष म्हणाला, " चंद्रवंशांत उत्पन्न झालेल्या कोणत्याही राजाचे चरित्र असे भित्रेपणाचे कधीच असणार नाही. तू जर शूर असशील, तर युद्ध कर. येथे नुसता वाचाळपणा काय कामाचा ?॥३४॥ प्रथमपासूनच मला मारण्यासाठी तू टपला आहेस. पण तुझाच प्राण हरण करणारा मी आहे हे लक्षांत ठेव. भगवान् श्रीदत्तप्रभू ज्याचे रक्षक आहेत अशा माझ्यावर कोणता मूर्ख हल्ला करील ?"॥३५॥ असे कठोर बोलून, धनुष्य आकर्ण ओढून, त्यावर बाण लावून, सैन्यासह ते परस्परांशी युद्ध करु लागले.॥३६ ॥ अहोरात्र ते तुमुल (तुंबळ) युद्ध चालले होते. त्यात पुष्कळच हत्ती-घोडे घायाळ झाले. काही मृत झाले. काहींचे रथही भग्न झाले.॥३७॥ मांसरुपी कर्दमांनी युक्त अशा असुरांच्या शरीरातील रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. शेवटी आपल्या गुरूंना प्रणाम करुन व अत्रिनंदन श्रीदत्तात्रेयांचे स्मरण करुन नहुषाने वासवी,ऐंद्री शक्ती हुंडासुरावर सोडली. तिच्या योगाने तो छिन्नभिन्न होऊन मरण पावला. यानंतर रंभेला बरोबर घेऊन अशोकसुंदरी, त्या विजयी नहुषाकडे येऊन म्हणाली, "हे नहुषा, तुझी मी धर्मपत्नी आहे म्हणून माझ्याबरोबर तू विवाह कर." हे ऐकून नहुष म्हणाला, " माझ्या गुरुवर्यांच्या अनुमतीने त्यांच्यासमोरच मी तुझ्याशी विवाह करीन. हे जर तुला मान्य असेल तर पाहा."॥३८-३९-४०॥ "बरे आहे, "असे म्हणून आनंदाने त्याच्या रथामध्ये ती व रंभा बसली. नहुषाने वसिष्‍ठऋषींकडे येऊन त्यांना नमस्कार केला व सर्व वृत्त कथन केले.॥४१॥ ते ऐकून आनंदित झालेल्या वसिष्‍ठमहर्षींनी, सुलग्नसमयी अशोकसुंदरी व नहुष यांचा विवाह लावला आणि नंतर मातापितरांना भेटण्यासाठी नहुषाला पत्नीसह पाठविले.॥४२॥ वसिष्‍ठ-ऋषींना नमस्कार करुन, प्रभेसह निघणार्‍या सूर्याप्रमाणे, आपल्या भार्येसह रथारुढ झालेला नहुष मातापितरांच्याकडे आला आणि सांत्वनपूर्वक त्यांचा शोक नाहीसा करता झाला.॥४३॥ नंतर त्याने रथासह मातलि व रंभा यांना स्वर्गांत परत पाठविले. श्रीदत्तात्रेयांचा वर व सद्गुरुवाक्य यांची आयुराजा आणि इंदुमती राणी यांना आठवण होऊन, तसेच रती व मदनाप्रमाणे असणार्‍या आपल्या सुनेला व मुलाला पाहून आनंद झाला. आयुराजाने नंतर त्या नहुषाला यथाविधी राज्याभिषेक केला.॥४४-४५॥ त्या पित्यापासून प्राप्त झालेल्या राज्याचे रक्षण नहुषानेही उत्तम प्रकारे यथाशास्त्र केले व इहलोकी उत्तम सुख भोगून, त्याच देहाने चिरकालपर्यंत इंद्रपदाचाही उपभोग घेतला. तसेच आयुराजानेही यथाशास्त्र वानप्रस्थाश्रम स्वीकारुन पत्नीसह वनामध्येच वास्तव्य केले.॥४६॥ नित्य अत्रितनय श्रीदत्तप्रभूंच्या ध्यानप्रभावाने अक्षय्य अशा सायुज्य मुक्तिप्रत गेला. अर्थार्थी भक्त आयुराजा श्रीदत्तात्रेयांची सेवा करुन, ऐहिक सर्व सुखांचा उपभोग घेऊन, क्रमाने मुक्त झाला. याप्रमाणे श्रीदत्तप्रभूंचा महिमा आहे. त्या प्रभूचा कोणीही भक्त नाश पावत नाही, इतकेच नव्हे, तर उत्तरोत्तर त्याचे कल्याणच होते.॥४७॥ श्रीमत सत्यदत्त हेच सर्वांच्या हृदयरूपी कमलात विराजमान आहेत, ते श्रेष्ठ संन्यासीजनांचे आचार्य असून, त्यांनी श्री वासुदेवानंद सरस्वती या संन्यासी स्वामींच्या बुद्धीला प्रेरणा दिली. त्यानुसार, त्यांनी रचलेल्या श्री सत्यदत्त व्रत आख्यानातील हा चौथा अध्याय आहे. ॥ इति श्रीसत्यदत्तव्रतोपाख्याने चतुर्थोऽध्यायः ॥४॥


क्रमश:


श्री सत्यदत्त व्रत आख्यान - अध्याय १ आणि अध्याय २


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

॥ श्रीगुरुचरणारविन्दाभ्यां नमः ॥

अध्याय १
वेदधर्मामुनींचा सच्छिष्य श्रीदीपक, एके दिवशी त्यांना विचारता झाला, " गुरुवर्य ! मोठमोठे सिद्ध महात्मे ज्याला वंदन करतात व ज्याचे सर्वश्रेष्‍ठ चरित्र वर्णन करतात, असे श्रीदत्तात्रेय नाव असलेले हे कोण देव आहेत ?"॥१॥ शिष्याचा प्रश्न ऐकून श्रीवेदधर्माऋषी म्हणाले, " हे दीपका ! या भूतलावर तू मोठा धन्य आहेस, कृतकृत्य आहेस व तसाच अत्यंत भाग्यवानही आहेस; कारण तुला श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य ऐकण्याविषयी ही उत्तम बुद्धी उत्पन्न झाली आहे.॥२॥ योगीश्वर श्रीदत्तप्रभूंचे श्रेष्‍ठ व पापनाशक असे माहात्म्य तुला सांगतो. ते श्रीसत्यदत्तव्रतातून व्यक्त होणारे असून मनुष्यांना तत्काल सिद्धी देणारे आहे.॥३॥ कलियुग आलेले जाणून श्रीशौनकादिमहर्षींनी स्वर्गलोक मिळविण्याकरिता एक सहस्त्रसंवत्सरपर्यंत चालणारा सत्रयाग सुरु केला.॥४॥ एके दिवशी प्रातःकाळी ते ऋषी श्रीअग्निनारायणाला आहुत्या देऊन स्वस्थ बसले असतां, मान्य अशा पुराणज्ञ सूतांना त्यांनी आदराने असा प्रश्न केला.॥५॥ ऋषी म्हणाले, "हे महाबुद्धिमान् व सर्व शास्त्रांत निष्णात असणार्‍या सूता ! सच्चिदानंदरुप श्रीदत्तदेवस्वरुपी वासुदेवाचे, मनुष्यांना सर्व संपत्ती व श्रेष्‍ठ आनंद देणारे माहात्म्य आम्हाला सांग व त्या श्रीप्रभूंची सर्व बाजूने योगप्रभाव व्यक्त करणारी आख्यानेही सांग.॥६-७॥त्याच्या भक्तांना अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त झाले असे आम्ही ऐकले आहे."॥८॥ सूत त्यांना म्हणाले, "हे वेदवेदांगनिष्णात ऋषीहो, आपण सर्व सावधानतेने श्रवण करा. श्रीदत्तात्रेयांच्या कृपाप्रसादाने पूर्वी जसे ऐकले तसे त्या प्रभूंचे माहात्म्य, तुमच्या संतोषाकरितां मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही एकचित्ताने ऐका.॥९॥ ब्रह्मज्ञवरीयान् अशी पदवी असणारे म्हणजे सहाव्या ज्ञानभूमिकेवर आरुढ झालेले, श्रेष्ठब्रह्मज्ञानी अत्रिमहर्षि श्रीब्रह्मदेवांच्या प्रेरणेने, पुत्रपाप्तीकरिता त्रिगुणांचा अधिपती जो परमात्मा, त्याची उपासना करावी म्हणून श्रीअनसूया या आपल्या पत्नीसह ऋक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले.॥१०॥ चित्त ताब्यांत ठेवून व केवळ वायूचा आहार करून तप करणाऱ्या द्वंद्वातीत अत्रिमुनींनी, गरुडासनावर राहून त्या एकमेवाद्वितीय परमात्म्याचे ध्यान, तसा पुत्र व्हावा म्हणून शंभर वर्षे केले.॥११॥ अशी तपश्चर्या झाल्यावर, त्या तपाने संतुष्‍ट होऊन वर देण्याची ज्यांना उत्कट इच्छा आहे असे श्रीब्रह्मा, श्रीविष्णू व श्रीमहेश्वर हे तिन्ही देव आपापली चिन्हे धारण करुन श्रीअत्रिऋषींच्या आश्रमात प्राप्त झाले.॥१२॥ आणि म्हणाले, " हे ऋषे, तू सत्यसंकल्प आहेस व तुझे मनीषित असत्य होणार नाही. ज्या एक तत्त्वाचे तू आजपर्यंत ध्यान केलेस, ते आमच्यापेक्षा अन्य कोण आहे ?॥१३॥ माझ्यासारखा पुत्र मिळावा म्हणून तू ध्यान केलेस, याकरिता तुझे झालेले श्रम सफल होण्याकरिता, मी सर्वस्वरुप असा माझा आत्माच तुला दिला आहे."॥१४॥ याप्रमाणे तीनही देवांनी श्री अत्रिमुनींना वर देऊन ते तत्काल गुप्त झाले. नंतर चतुर्भुज श्रीदत्तात्रेय श्रीअत्रिऋषींसमोर प्रकट झाले.॥१५॥ नित्यतृप्त असे भगवान् श्रीदत्तप्रभू, आपली भक्ताधीनता दाखविण्याकरिता, मातापितरांना संतोष देत योगमायेसह त्या आश्रमात राहिले.॥१६॥ नंतर कोणे एके काळी, एक ब्राह्मण, गर्भादानादि सर्व संस्कार ज्याचे झाले आहेत असा, वेदवेदांगांचे अध्ययन करुन आश्रमधर्माचे अनुष्‍ठानही ज्याने केले आहे असा, एके ठिकाणी राहात होता.॥१७॥ विवेकवैराग्यादि साधनचतुष्‍टयसंपन्न व अभय, सत्त्वशुद्धी इत्यादि दैवी संपत्तीने युक्त असूनही, अनेक शास्त्रे श्रवण करुन झालेल्या भ्रमामुळे तो ब्राह्मण चित्तशांती मिळवू शकला नाही.॥१८॥ श्रीसद्गुरुंनी सांगितलेली उपासना केली असतां चित्त स्थिर होऊन तत्त्वबोध उत्पन्न होतो म्हणून उपनिषत्प्रतिपाद्य श्रीदत्तांचे ध्यान-पूजन प्रयत्नपूर्वक करुनही, दर्शन न झाल्यामुळे खिन्नचित्त झालेल्या व विषाद, शोक यांनी युक्त असणार्‍या त्या ब्राह्मणास तारण्याकरिता, योगश्रीमान् दिगंबर श्रीदत्तप्रभू त्याचेसमोर प्रगट झाले.॥१९-२०॥ मनोहर मार्गशीर्ष मास, शुक्लपक्ष पौर्णिमा तिथी, मृग नक्षत्र, गुरुवार प्रदोषकाळ अशा शुभसमयीं भगवान् श्रीदत्तात्रेय प्रगट झाले.॥२१॥ आणि त्या ब्राह्मणास म्हणाले, "हे विप्रा ! तू खिन्न असल्यासारखा दिसतो आहेस. तुझ्या खिन्नतेचे कारण काय असेल ते सर्व मला सांग."॥२२॥ त्या वेळी भक्तियुक्त अंतःकरणाने नम्र होऊन, भगवान् श्रीदत्तात्रेयांना नमस्कार करुन तो ब्राह्मण म्हणाला, " ज्ञानवान् पुरुष अनर्थापासून मुक्त होतो असे ऐकून, त्या इच्छेने, मी अनेक शास्त्रांचे श्रवण केले, परंतु माझा भ्रम गेला नाही.॥२३॥ तेव्हा यांपैकी कोणता मार्ग श्रेयस्कर, कल्याणकारक, निर्भय व सुगम आहे, हे सद्गुरो ! तो कृपा करुन मला सांगा."॥२४॥ श्रीदत्त म्हणाले, "तुझा प्रश्न अत्यंत योग्य आहे. म्हणून मी आता सांगतो ते लक्षपूर्वक श्रवण कर. श्रुतीने प्रतिपादन केलेले, युक्तीने सिद्ध झालेले व अनुभवास आलेले जे सत्य ते तुला सांगतो.॥२५॥ मी ही ईश्वराची आराधनाच करीत आहे, अशी बुद्धी ठेवून स्वधर्माचे अनुष्‍ठान करीत राहिल्याने सदाचरणी लोकांवर ईश्वराचा प्रसाद होतो. म्हणजे तद्रूप श्रीसद्गुरु सुलभ होतात.॥२६॥ श्रीसद्गुरुंचा उत्तम प्रसाद झाला असतां, जीवांच्या अज्ञानरुप प्रतिबंधाचा नाश होतो तसेच दुष्‍ट भावनांचाही नाश होऊन तत्क्षणी मुक्ती देणारे विज्ञान प्राप्त होते.॥२७॥ सत्यव्रत, सत्यपर, त्रिसत्य, सत्याचे कारण, सत्यनिष्‍ठ, सत्याचेही सत्य, सत्यनेत्र व सत्यात्मक सर्व मीच आहे, हे तू निश्चयपूर्वक जाण.॥२८॥ जसे आंधळे जन हत्तीचा एक एक अवयव चांचपून त्या त्या अवयवासारखाच हत्ती आहे, असे आपापसात भांडण करतात, तसाच प्रकार अल्पज्ञ पुरुषाचा शास्त्रज्ञानाबद्दल होतो.॥२९॥ याप्रमाणे माझ्या सांगण्याचे तत्त्व जाणून, उपनिषदांना संमत असलेले सत्तत्त्व जाणून, त्याचे आलोचन करण्यातच तू मग्न असावेस. त्या योगाने तू मुक्त होऊन कृतार्थ होशील." असा त्या ब्राह्मणास प्रभू श्रीदत्तात्रेयांनी आशीर्वाद दिला.॥३०॥
श्रीमत सत्यदत्त हेच सर्वांच्या हृदयरूपी कमलात विराजमान आहेत, ते श्रेष्ठ संन्यासीजनांचे आचार्य असून, त्यांनी श्री वासुदेवानंद सरस्वती या संन्यासी स्वामींच्या बुद्धीला प्रेरणा दिली. त्यानुसार, त्यांनी रचलेल्या श्री सत्यदत्त व्रत आख्यानातील हा पहिला अध्याय आहे.
॥ इति श्रीसत्यदत्तव्रतोपाख्याने प्रथमोऽध्यायः ॥
**********************************************************************

अध्याय २
॥ श्रीदत्त ॥ सूत म्हणाले, " याप्रमाणे भगवान् श्रीदत्तात्रेयांनी कथन केलेले ज्ञान श्रवण करुन ज्याचे मन संतुष्‍ट झाले आहे असा तो ब्राह्मण श्रीसत्यदत्तास नमस्कार असो, असे बोलून व नमस्कार करुन श्रीदत्तांना म्हणाला,॥१॥ " विराटापासून अश्वत्थादि स्थावरांपर्यंत ईश्वराची अनेक स्वरुपे शास्त्रामध्ये सांगितलेली दिसतात. त्यातील अर्चनीय व मोक्षसिद्धी देणारा कोण ते मला सांगा."॥२॥ श्रीदत्त म्हणाले, " माझ्या चिदंशाने युक्त असलेले ते सर्वही देवता आपापल्या अधिकारानुरुप फल देणारे आहेत; पण सर्वरुप अशा माझ्या भजनामुळे चित्तातील कामक्रोधादि मलांचा नाश होतो.॥३॥ त्याचे मूळ कारण असलेल्या अज्ञानाचाही नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो. मज निर्गुणाची उपासना केली असता त्या योगाने सर्व इष्‍टप्राप्ती होऊन मुक्तीही मिळते.॥४॥ म्हणून हे द्विजा, तू सर्व धर्म मार्ग सोडून मला शरण ये; म्हणजे माझ्या प्रसादाने दोषरहित होऊन तू मुक्त होशील व तुला पूर्ण शांती मिळेल.॥५॥ तुझे कल्याण असो. माझ्या कथनाचे मनन करुन सार ग्रहण कर आणि माझ्या भक्तांमध्ये हा भक्तीयोग तू प्रयत्नपूर्वक प्रकाशित कर."॥६॥ असे बोलून भगवान् श्रीदत्तात्रेय लीलेने शीघ्र अंतर्धान पावले आणि तो ब्राह्मण त्यांच्या उपदेशाच्या निदिध्यासाने कृतकृत्य होता झाला.॥७॥ सूत पुढे म्हणाले, "हे ऋषीजनहो, वेदान्तशास्त्र, गुरु व ईश्वर या तिघांची आजन्म सेवा करावी. प्रथम ज्ञानप्राप्तीसाठी करावी, नंतर कृतघ्नपणाचा दोष लागू नये म्हणून करावी.॥८॥अशा प्रकारे शास्त्राज्ञा मनांत आणून तो ब्राह्मण, प्रेमनिर्भर होऊन श्रीसत्यदत्ताचे व्रत करू लागला.॥९॥
॥श्रीदत्त॥
पौर्णिमा, संक्रांत, गुरुवार अथवा कोणताही शुभकाल अशा समयी उपोषण करुन, गंधपुष्पादि सर्व पूजा साहित्य जमवून, कल्पोक्तविधीप्रमाणे सात आवरणदेवतांसहित मुनीश्वर श्रीदत्तात्रेयरुपी श्रीसत्यदत्ताचे पूजन तो करीत असे.॥१०-११॥ साखर, गव्हाचा रवा व तूप हे पदार्थ समप्रमाणात, पण सव्वापट म्हणजे सव्वाशेर, सव्वापायली, सव्वा मण, सव्वा खंडी या प्रमाणात शक्तीप्रमाणे घेऊन आणि उत्तम प्रकारे दुधात शिजवून त्यात वेलदोडे, बेदाणा, केशर इत्यादि घालून तो नैवेद्य त्या ब्राह्मणाने श्रीसत्यदत्तप्रभूंस समर्पण करीत असे आणि ब्राह्मण व आप्तबांधव यांच्यासह त्याने तो प्रसाद ग्रहण करीत असे.॥१२-१३॥ याप्रमाणे श्रीसत्यदत्ताचे व्रत करणारा तो ब्राह्मण शुद्ध भक्तिप्रेमाने योगींद्र श्रीदत्तात्रेयांची उपासना करीत राहून, त्या बलाने पुत्रेषणा, वित्तेषणा व लोकेषणा या सर्वही एषणा सोडून, इंद्रियविजयी होऊन श्रीदत्तात्रेयांनी उपदिष्‍ट ज्ञानाच्या प्रभावाने शेवटी पुनरावृत्तिविरहित अशा तेजोनिधी श्रीदत्तात्रेयांच्या सायुज्यमुक्तीप्रत प्राप्त झाला.॥१४-१५॥
श्रीमत सत्यदत्त हेच सर्वांच्या हृदयरूपी कमलात विराजमान आहेत, ते श्रेष्ठ संन्यासीजनांचे आचार्य असून, त्यांनी श्री वासुदेवानंद सरस्वती या संन्यासी स्वामींच्या बुद्धीला प्रेरणा दिली. त्यानुसार, त्यांनी रचलेल्या श्री सत्यदत्त व्रत आख्यानातील हा दुसरा अध्याय आहे.
॥ इति श्रीसत्यदत्तव्रतोपाख्याने द्वितीयोऽध्यायः ॥२॥

क्रमश:

श्री सत्यदत्त व्रत आख्यान - पंचोपचारी पूजन


॥ श्री गणेशाय नमः॥


दत्तभक्तहो, हा श्री सत्यदत्त व्रताचा शास्त्रोक्त पूजा विधी नाही. या व्रतासाठी संकल्पपूर्वक षोडपोचारें पूजा करतात. मात्र, दृढ श्रद्धा ठेवून केलेली श्री दत्तप्रभूंची उपासना निश्चितच फलद्रूप होते. केवळ यासाठी, ही श्री दत्तमहाराजांची सहज सोपी आणि कुणालाही करता येईल अशी पंचोपचारी पूजा इथे देत आहोत.

श्री दत्तप्रभूंची पंचोपचारी पूजा
॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
॥ श्रीमन्महागणाधिपतये नमः । कुलदेवताभ्यो नमः । आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः । सर्वेभ्यो देवेभ्यो नमः । एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः । अविघ्नमस्तु ॥
॥ॐ भूर्भुवः स्वः नमो भगवते दत्तात्रेयाय साङगाय सपरिवाराय नमः ध्यायामि ध्यानम् समर्पयामि ॥

श्री दत्तात्रेयांचे ध्यान करावे.
ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय साङगाय सपरिवाराय नमः आवाहयामि ॥
श्री दत्तात्रेयांना पूजेसाठी येण्याची प्रार्थना करावी.
ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय साङगाय सपरिवाराय नमः आसनं समर्पयामि ॥
श्री दत्तात्रेयांना आसनस्थ होण्याची प्रार्थना करावी.
ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय साङगाय सपरिवाराय नमः पाद्यं समर्पयामि ॥
श्री दत्तात्रेयांचे चरणद्वय शुद्ध जलाने प्रक्षालन करावे.
ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय साङगाय सपरिवाराय नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ॥
श्री दत्तात्रेयांना चंदन लावावे.
ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय साङगाय सपरिवाराय नमः अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि ॥
श्री दत्तात्रेयांना अक्षता वाहाव्यात.
ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय साङगाय सपरिवाराय नमः ऋतुकालोद्भवपुष्पाणि समर्पयामि ॥
श्री दत्तात्रेयांना शेवंती, पारिजातक आदि फुले अर्पण करावी.
ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय साङगाय सपरिवाराय नमः धूपं समर्पयामि ॥
श्री दत्तात्रेयांना धूप अर्पण करावा.
ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय साङगाय सपरिवाराय नमः दीपं दर्शयामि ॥
श्री दत्तात्रेयांची दीपारती करावी.
ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय साङगाय सपरिवाराय नमः नैवेद्यं समर्पयामि ॥

श्री दत्तात्रेयांना शिरा, पंचामृत अथवा दूध-साखरेचा नैवेद्य दाखवावा.
परिषिञ्चामि ।
॥ अमृतोपस्तरणमसि स्वाहा । ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपनाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ॥
॥ मध्ये प्राशनार्थे पानीयं समर्पयामि ॥ उत्तरापोशनं समर्पयामि ॥ हस्तप्रक्षालनं समर्पयामि ॥
॥ मुखप्रक्षालनं समर्पयामि ॥ करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि ॥ आचमनीयं समर्पयामि ॥
॥ मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं समर्पयामि ॥ सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि ॥
॥ फलानि समर्पयामि ॥ महामङ्गलनीराञ्‍जनदीपं समर्पयामि ॥
श्री दत्तात्रेयांना विडा, दक्षिणा, फळें अर्पण करावी आणि प्रभूंची आरती करावी.
॥ कर्पूरार्तिक्यदीपं समर्पयामि ॥ श्री दत्तात्रेयांची कर्पूरारती करावी.

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा । त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।

नेति नेति शब्द न ये अनुमाना । सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता । आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ. ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त । अभाग्यासी कैसी न कळे ही मात ॥
पराही परतली कैचा हा हेत । जन्म मरणाचा पुरला असे अंत ॥१॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥२॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान ॥३॥

॥ प्रदक्षिणां नमस्कारांश्च समर्पयामि ॥ श्री दत्तात्रेयांना प्रदक्षिणा-नमन करावे.
॥ मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि ॥ श्री दत्तात्रेयांची प्रार्थना करून फुले वाहावी.

आपली पूजा करतांना माझ्याकडून काही उणें राहिलें असेल तर मला क्षमा करावी आणि यथामति-यथाशक्ती केलेली ही पूजा आपण मान्य करावी, अशी श्री दत्तप्रभूंना मनोभावें प्रार्थना करावी.

त्यानंतर, श्री सत्यदत्त व्रत अध्याय कथा वाचन करावे.


क्रमश: