Mar 20, 2026

भावार्थ श्रीगुरुलीलामृत - महीवरी संचरती गुरुनाथ


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ  द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-श्रीस्वामीसमर्थमहाराजाय नमः ॥
जनानुग्रहार्थ घेतीं अवतार । साधूंच्या परित्राणार्थ साचार । नरहरि दत्तात्रेय गुरुवर । परोपकारार्थ सोसिती कष्ट ॥  या पृथ्वीतलावर समस्त प्राणिमात्रांच्या नित्य कल्याणार्थ श्रीदत्तगुरु पुन्हा पुन्हा अवतरीत होत असतात. एकदा हिमालय पर्वतावर श्रीमन्नृसिंह यतिवर्य जगदुद्धारासाठी स्वेच्छाचारें संचार करीत होते. त्या पावन स्थानी अनेक योगी, मुनी, जपी, ब्रह्मचारी सतत अनुष्ठान करीत असतात. त्यांच्या या थोर तपाचे फल-वरदान देण्यासाठीच श्रीगुरुस्वामी तिथे प्रत्यक्ष प्रगटले होते. त्यावेळीं चीन देशांतील एक दाम्पत्य वनौषधी शोधण्यासाठी तिथे आले होते. भगवी वस्त्रें धारण केलेल्या श्रीस्वामींना पाहून ते चिनी स्त्री-पुरुष त्यांची कुचेष्टा करू लागले. हे रिकामे सोंग काय । वृत्ति दिसते पिशाच्चमय । समर्थांची अशी निंदा करीत ते दोघेही पोट धरून हसू लागले. हिमालयातील मनोहर निसर्ग पाहून त्यांच्या मनांत कामोद्भव झाला अन ते तिथेच प्रणयक्रीडा करू लागले. तोच एक विपरीत घडले, त्या पुरुषाचे सुंदर, सावयवी स्त्रीत रूपांतर झाले अन त्याची पत्नी पुरुषावयवसकट नररूप झाली. एकमेकांची अशी अवस्था पाहून ते दोघेही अत्यंत भयभीत झाले. अचानक हे संकट काय ओढवले बरें, असा विचार करत असतांना अचानक त्यांचे लक्ष गुहेतील तपस्वी नृसिंहसरस्वती महाराजांकडे गेले. श्रीस्वामी समर्थांना पाहून ते दोघेही अतिशय लज्जित झाले आणि ' ही यतींद्राचीच माया खरी । सुरनरां अगम्य ।' हे त्या दोघांनीही ओळखले.  श्रीनृसिंहस्वामींची उन्मत्तपणे निंदा केल्याचेच हे फळ आहे, याची त्या पती-पत्नीला पूर्णतः जाणीव झाली. आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होऊन ते दोघेही स्वामींना अनन्य शरण गेले आणि ' क्षमा करा जी अपराध । शरणागतां रक्षावें ।' अशी वारंवार प्रार्थना करत म्हणाले, " महाराज, पूर्वजन्मीचे किंचित सुकृत होते, म्हणूनच तुमचे दिव्य चरण दृष्टीस पडले. मात्र अज्ञान आणि तामसीपणामुळे आम्ही तुम्हांस ओळखले नाही. हे सद्‌गुरुनाथा, आमचे अपराध क्षमा करा अन हे परस्परांचे विपरीत देह पूर्ववत करा." त्या दोघांनीही केलेली शुद्धांत:करणपूर्वक अभ्यर्थना ऐकून सदगुरु दयाघन कळवळले आणि त्यांनी केवळ कृपादृष्टीनें अवलोकन करताच त्या चिनी पती-पत्नीची काया तात्काळ पूर्ववत झाली. स्वामींचा कृपाप्रसाद प्राप्त झाल्याने ते दाम्पत्य अतिशय आनंदले आणि त्यांना पुनः पुनः नमस्कार करू लागले. मग समर्थांनी त्यांना अनेक शुभाशीर्वाद दिले अन चीन देशी परतण्याची आज्ञा केली. पुढें मग ते पती-पत्नी अहर्निश गुरुपदांचे चिंतन करीत जीवन कंठू लागले. यथावकाश त्यांना पुत्रप्राप्तीही झाली अन गुरुभक्तीमुळे त्यांचे वंशपारंपरी इहपर कल्याण झाले.                         
त्या हिमालय पर्वतावर दुसऱ्या प्रांतातील चार शिकारी मृगयेसाठी आले होते. ते उदरपूर्तीसाठी सतत शिकार करीत असत. एकदा श्री स्वामी समर्थांची स्वारी आम्रवृक्षातळीं बसली होती, त्यावेळीं अतिशय घाबरलेले एक हरणाचे पाडस समर्थांच्या आश्रयास आले. हे चार पारधी त्या पाडसाची शिकार करण्यासाठी पाठलाग करीत होते. वृक्षाखालीं बसलेल्या समर्थांजवळ ते मृग पाडस पाहून ते व्याध क्रोधानें बंदुकीचे बार अन अनेक तीर त्या पाडसावर मारू लागले. परी त्या मृगवत्सासह । वृद्ध नृसिंहसरस्वती निःस्पृह । स्वानंदी निमग्न पितामह । निर्भयें स्वस्थ बैसले ॥ त्या शिकाऱ्यांनी कितीतरी बंदुका झाडल्या, मात्र स्वामींच्या नखालाही अणुमात्र धक्का लागला नाही. तो अवचित प्रकार पाहून ते शिकारी भांबावून गेले. तोच समर्थांनी त्या व्याधांकडे पाहून दोन खडे फेकले अन काय आश्चर्य ! ते चारही व्याध तटस्थ झाले. त्यांची शरीरें, बंदुका आणि तीर यांची हालचाल बंद झाली. सुमारें दोन याम त्या चौघांचीही देहस्मृति नाहीशी झाली, अन अखेर सानुतापें ते स्वामींना शरण गेले. कृपावलोकनें तात्काळीं । चौघांची तटस्थता गेली । देहशुद्धी बरवी आली । गुरुमाऊली वळल्यानें ॥  श्रीगुरुस्वामींचे ते अतुल सामर्थ्य पाहून व्याध त्यांचे स्तवन करू लागले. समर्थांनीही 'सर्वभूती अविरोध प्रेम । संरक्षूनि सत्य स्वधर्म ।' अशी त्यांना आज्ञा दिली. श्रीगुरुदर्शनाचा थोर महिमा अनुभवून ते सर्व शिकारी योगक्षेम पावले. परम कृपाळू श्रीगुरुमहाराज हिंसक-दुष्ट यांचाही उद्धार करतात आणि यथार्थ भक्ति, ज्ञान देऊन सकल जनांचे इहपर कल्याण करतात. पुढें एक अपूर्व नवल वर्तले. ते चार शिकारी पाठलाग करत असतांना ते मृग पाडस अन त्याच्या कुटुंबियांची ताटातूट झाली होती. आपल्या वत्साचा शोध घेत घेत हरिणी अन मृग त्या आम्रवृक्षाजवळ आले. तिथे योगिराजांसमवेत आपले पाडस बघून ते दोघेही आनंदले. तयासि पाहून नृसिंहयति । प्रसन्नवदनें हांसती । वदती का रे विप्रा आम्हांप्रति । नोळखिसी सांप्रत ॥  " अरे, आम्ही गाणगापुरांत असतांना तू आमचा भक्त होतास. तू रोगग्रस्त झाला असता आमची सेवा करून तू व्याधिनिर्मुक्त झाला. तुझी पत्नी शुद्ध पतिव्रता होती, तुम्ही पुत्रपौत्रश्रियायुक्त होता. मात्र एकदा तुम्ही सत्पुरुषास छळले, त्या पातकाचे फळ म्हणून हा मृगजन्म तुम्हांस घ्यावा लागला. " श्री समर्थांचे हे वचन ऐकून त्यांना पूर्वजन्मस्मृती आली. त्या मृग-मृगीने नृसिंहसरस्वती महाराजांना साष्टांग नमन केले. स्वामीदर्शनमात्रें त्या उभयतांना तात्काळ वाचा फुटली - बहुत जन्मांचे सुकृत । आजि फळलें आम्हांप्रत । देखिले पुन्हा श्रीगुरुदत्त । झालो पावन गुरुराया ॥ अशी प्रार्थना करून ते पूर्वजन्मवृत्तांत कथन करू लागले. माझा पहिला जन्म रोगी ब्राह्मण, दुसरा वृषभ, तृतीय जन्मी शूद्र तर चतुर्थ जन्म हा काशी क्षेत्रीं तंतुकार म्हणून झाला. त्या पुण्यतीर्थी व्यभिचार घडल्याने पाचवा जन्म खराचा, तर सहाव्या जन्मांत हस्तिनापुरी सुवर्णकार झालो. त्या जन्मांत माझी पतिव्रता पत्नी साधु-संत-माहात्म्यांना मूठ मूठभर पीठाचे दान करीत असे. त्या पुण्याईने हा मृगाचा जन्म लाभला. आज व्याधहस्तें कुलक्षय योग होता, मात्र पदरीं काही पूर्वपुण्यसंचय होता म्हणूनच समर्थांच्या दिव्य चरणांचे दर्शन झाले. पुरे झाल्या जन्मखेपा । आतां सोडवा मायबापा । दीनबंधो व्हावी कृपा । त्रिविध तापां निरसावें ॥ त्यांचे असे करुणावचन ऐकून श्रीस्वामी प्रसन्न झाले अन " तुम्हांस सद्धर्माचारी, पुण्यशील अशा ब्राह्मणवंशी पुढील जन्म प्राप्त होईल, आम्ही महाराष्ट्र दक्षिणदेशी आमच्या स्वक्षेत्रीं वास करू तेव्हा तुम्हांस पुन्हा दर्शनलाभ होईल." असा शुभाशीर्वाद देऊन स्वामींनी त्या तिन्ही मृगांच्या मस्तकीं आपला अभयहस्त ठेवला.  त्या हिमालयांतील दुर्गम गुहांमध्ये जप-तप, अनुष्ठान करणारे तपस्वी, ऋषीमुनी वास करीत होते. ते या श्रीमददत्तात्रेयप्रभू आणि मूक पशु यांच्यातील संवादाचे प्रत्यक्षदर्शी होते. त्या परमपुरुष, परमहंसाची ही अघटित लीला पाहून त्या सर्वांनी स्वामींचा जयजयकार केला आणि ' चलावें गुहेंतील आश्रमास । संध्यासमय जाहला ।' अशी प्रार्थना केली. 
॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
क्रमश:

आवडे दत्तभक्तांसी ...


No comments:

Post a Comment