Jul 29, 2020

चित्त स्थैर्यकारक स्तोत्र


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


अनसूया अत्रिपासून संजात | दत्तात्रेया तू महाबुद्धीमंत |


सर्व देवांचा अधिदेव प्रख्यात | माझे चित्त करी स्थिर ॥ १ ॥


शरण आलेल्यांचा जगात | दीनांचा तारक अखिल कर्ता ज्ञात |


सर्वचालक देवा तू त्वरित | माझे चित्त करी स्थिर ॥ २ ॥


सर्व मंगलाचे मंगल पावन | सर्व आधिव्याधींचे औषध महान |


सर्व संकटांचा हर्ता तू शोभन | माझे चित्त करी स्थिर ॥ ३ ॥


स्मरताक्षणी स्वभक्तांना | भेटसी आरोग्यप्रदा रिपुनाशना |


भुक्तिमुक्ति दाता तू सर्वांना | माझे चित्त करी स्थिर ॥ ४ ॥


सर्व पापांचा क्षय करी | ताप दैन्य सारे निवारी |


अभिष्टदात्या प्रभो तू सावरी | माझे चित्त करी स्थिर ॥ ५ ॥


जो हे श्लोक पंचक वाचेल | नित्यनेमें नियम चित्त निर्मळ |


स्थिर चित्त तो होईल | भगवत्कृपापात्र जगती ॥ ६ ॥


॥ इति श्री परमहंस परिवाज्रकाचार्य वासुदेवानंदसरस्वतीविरचितं मनःस्थिरीकरणं स्तोत्रं संपूर्णम् ॥


Jul 27, 2020

कार्तवीर्योsर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् - १


|| श्री गणेशाय नमः || श्री दत्त समर्थ ||

यच्छिष्यस्मरणात्सद्यो गतनष्टादि लभ्यते || य ईश: सर्वतस्त्राता दत्तात्रेयं नमामि तं || प. प. वासुदेवानंदरचित दत्तस्तव या स्तोत्रांत भगवान दत्तात्रेयांच्या ज्या महाप्रतापी सद्-भक्ताचा आणि धर्मपरायण परमशिष्याचा उल्लेख केला आहे, त्या चक्रवर्ती कार्तवीर्याच्या श्री दत्तमाहात्म्यात वर्णिलेल्या ह्या काही कथा.

प्रसिद्ध सोमवंशातील हैहय राजाच्या कुळांत कृतवीर्य नावाचा सार्वभौम राजा होऊन गेला. तो कर्तव्यत्पर आणि पराक्रमी होता. त्याला शंभर पुत्र होते. दुर्दैवाने त्या राजपुत्रांकडून काही प्रमाद घडल्याने च्यवन ऋषींनी त्या सर्व राजपुत्रांस शाप दिला आणि त्यायोगें त्यांचा मृत्यू झाला. पुत्रवियोगानें राजा कृतवीर्य अतिशय दु:खी झाला आणि त्याचे राज्यकारभारातून चित्त उडाले. एके दिवशी, तो असाच खिन्न होऊन बसला असता राजगुरूंचे तिथे आगमन झाले. कृतवीर्य राजाने आपल्या गुरूंचे उचित स्वागत करून त्यांस साष्टांग नमस्कार केला आणि अत्यंत दीनपणे त्यांस म्हणाला, " गुरुवर्य, काही पूर्वार्जित सत्कर्मांमुळेच मला आज आपले दर्शन झाले. माझ्या पुत्रांच्या अकाली मृत्यूमुळे मी पुरता खचून गेलो आहे. आपणांस सर्व ज्ञात आहेच. ' प्रारब्धकर्मणां भोगादेव क्षय: ' अर्थात प्रारब्ध कर्म भोगणे अपरिहार्य आहे, हे शास्त्रवचन सत्य असले तरी त्या कर्मसिद्धांताची तीव्रता कमी करण्यासाठी आपणच मला आता योग्य मार्ग दाखवू शकता." त्याचे बोलणे ऐकून श्रीगुरुंनी त्यास धर्मबोध केला आणि सूर्यदेवतेची उपासना करण्यास सांगितले. त्याकरिता गुरूंनी कृतवीर्य राजास भानुसप्तमी व्रताचा शास्त्रोक्त विधी सांगून ते व्रत आचरण्यास सांगितले. तसेच, "हे राजन, वैदिक धर्मातील हे व्रत दृढ भक्तीने केले असता सर्व पापांचे शमन होऊन उत्तम सुख आणि सत्पुत्र आदी लाभ होतात. तेव्हा, पुण्यप्राप्ती होऊन तुझा वंश वृद्धिगंत होण्यासाठी तू ह्या व्रताचे पालन कर. सूर्यनारायणांच्या कृपेने तुझी सर्व अरिष्टे दूर होऊन तुझी संतती वाढेल." अशी ग्वाहीही दिली. आपल्या गुरूंचे हे बोलणे ऐकून राजास अतिशय समाधान वाटले आणि त्याने आपल्या गुरूंचे पूजन करून आशीर्वाद मागितला. त्यानंतर अत्यंत भक्तिभावाने त्याने त्या व्रताचे आचरण केले.

काही काळानंतर महर्षी याज्ञवल्क्यांची पत्नी महासाध्वी मैत्रेयी योगायोगाने राजप्रासादांत आली असता, कृतवीर्याची पत्नी राणी शीलधरा हिने तिचा योग्य आदर सत्कार केला. तसेच, आपले दु:ख तिला निवेदन करून उत्तम पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली. ब्रह्मवादिनी मैत्रेयीनें राणी शीलधरा हिला अनंतव्रत करण्यास सांगितले. ह्या व्रताची महती सांगतांना विदुषी मैत्रेयी म्हणाली, " हे राज्ञी, दत्तपुराणांत ह्या व्रताचे दत्तव्रत असे वर्णन केले आहे. स्वतः श्री दत्तप्रभूंनी ह्या सर्वक्षेष्ठ व्रताचे माहात्म्य आणि आचरणविधी सांगितला आहे. ह्या व्रताच्या प्रभावाने त्या सर्वेश्वराची कृपा होऊन तुम्हांला त्रैलोक्यांत कीर्ती गाजवणारा उत्तम, सद्-गुणी पुत्र होईल." राणीनें त्या ऋषिपत्नीच्या चरणीं लीन होत कृपाशिर्वादाची प्रार्थना केली. राणी शीलधरेने मैत्रेयीचा हा उपदेश राजा कृतवीर्याला सांगून हे व्रत करण्यासाठी त्याची अनुज्ञा मागितली आणि सत्वर व्रतास आरंभ केला. राणी शीलधरा पूर्वीपासूनच दत्तप्रभूंची उपासना करीत असे, त्यामुळे अनंतव्रताचे आचरण करतांनासुद्धा तिने भगवान अनंत म्हणजे श्री दत्तात्रेयच अशी श्रद्धा ठेवूनच निष्ठापूर्वक ते व्रत केले.

राणीच्या त्या भक्तिभावानें भगवान दत्तात्रेय प्रसन्न झाले. प्रभूंनी आपलें निजरूप दाखवून शीलधरेस स्वप्नदृष्टांत देऊन " अत्युत्कट धर्मफळ । राज्ञी मिळेल तत्काळ । तुला पुत्र होईल सबळ । सप्तद्वीपपाळक ॥ जो अकुंठितगती । स्मरतां देईल भेटी ।" असा आशीर्वाद दिला. अर्थात, " ह्या धर्माचरणाचे तुला लवकरच फळ मिळेल. सप्त द्वीपांवर राज्य करणारा, संकल्पमात्रें त्रैलोक्यांत कुठेही जाऊ शकणारा आणि स्मरतां क्षणीच दर्शन देणारा असा महाबलीशाली पुत्र तुला होईल.", असा वर देऊन ते भक्तवत्सल श्री दत्तात्रेय अंतर्धान पावले आणि राणी शीलधरा निद्रेतून जागी झाली. स्वप्नांत झालेल्या आपल्या उपास्य देवतेच्या दर्शनाने ती अतिशय हर्षित झाली होती आणि तिने राजा कृतवीर्याला ते शुभ स्वप्न सांगितलें. ते ऐकून राजाही अतिशय संतोषला. लवकरच त्या उभयंतास दत्तप्रभूंच्या आशीर्वचनाची प्रचिती आली, राणी शीलधरा गर्भवती झाली. तिला अतिशय उत्तम डोहाळे लागले, राजाने ते तत्पर पूर्ण केले. तसेच यथाशास्त्र पुंसवनादि संस्कारही केले. आपल्या राजकर्तव्याचे उत्तम रीतीने पालन करत ते राजा-राणी ईश्वर आराधनेत काळ व्यतीत करू लागले.


क्रमश:


Jul 23, 2020

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र - ( श्लोक ४५ ते ५२ )


|| श्री गणेशाय नमः ||

दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू. जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.


महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.

|| श्री गुरुदेव दत्त ||


कार्तवीर्यार्जुनायादाद्योगर्धिमुभयीं प्रभुः ।

अव्याहतगतिं चासौ श्रीदत्तः शरणं मम ॥४५॥

भावार्थ : ज्या प्रभूने कार्तवीर्यार्जुनाला योगसामर्थ्य आणि ऐहिक-पारलौकिक अशी दोन्ही प्रकारची ऐश्वर्ये प्रदान केली, तसेच त्रैलोक्यांत मुक्तपणे संचार करण्याचेही वरदान दिले, असे माझ्या हृदयीं स्थित असलेले श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.

Jul 21, 2020

॥ धावत येसी भक्तांसाठी, ब्रह्मा विष्णु महेश्वरा ॥



दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा |

धावत येसी भक्तांसाठी, ब्रह्मा विष्णु महेश्वरा || धृ. ||

गोड मंजिरी घुमते कानी 

नाम रंगले गुरुच्या ध्यानी |

ध्यानामधुनी तुझ्या कृपेचा

गजर होतसे दिगंबरा ||

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || १ ||

किती वर्णु मी रुप गुरुंचे 

निधान माझ्या शांती सुखाचे |

गुरुदत्तांच्या गुरुवारी या

म्हणा भक्त हो दिगंबरा ||

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || २ ||

गाणगापुरी जमलो सारे 

मूर्तीमंत हा दत्त पहा रे |

काळजात हे ठेवूनी जा रे 

नाम एक रे दिगंबरा ||

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || ३ ||

झोळी उघडा या हृदयाची 

रास भरा रे गुरुनामाची |

आयुष्याच्या वाटेवरती 

सोबत द्यावी दिगंबरा ||

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || ४ ||




Jul 17, 2020

श्री भक्तलीलामृत - अध्याय ४९ ( श्री नृसिंहसरस्वती महाराज आख्यान आणि श्रीमुद्‍गलभट्टांची कथा )


श्री नृसिंह सरस्वती महाराज आख्यान आणि श्रीमुद्‍गलभट्टांची कथा ॥ श्रीगणेशाय नमः ॥ अनंत अपार घनसावळां । असंख्यात असती त्याच्या लीला । ज्याच्या रोमरंघ्रीं सकळा । ब्रह्मांडमाळा साठती ॥१॥ चंद्र आणि रविमंडळ । हें जयाचें नेत्र युगुळ । एकवीस स्वर्ग सप्त पाताळ । यांहूनि विशाळ जगदात्मा ॥२॥ वेदत्रयांचा घोर जाण । विधाता बाळक निपजलें सान । चराचर अवघेंचि निर्मिलें त्याणें । परीपार नेणें श्रीहरीचा ॥३॥ हें विराटस्वरूप आणितां ध्यानीं । तरी निजभक्तासि नकळेचि मनीं । मग पंढरीसि सगुणरूप धरोनी । कैवल्यदानी उभा असे ॥४॥ ठाण साजिरें सुकुमार ।समपद ठेविले विटेवर । जघनीं शोभती दोन्हीकर । श्रीमुख मनोहर जयाचें ॥५॥ भाविक प्रेमळ देखोनी दृष्टीं । तयांसि तत्काळ देतसे भेटी । तुळसी माळा शोभती कंठीं । नासाग्रीं दृष्टी धरियेली ॥६॥ हा पुंडलीकें थोर उपकार केला । भूतळामाजी देव आणिला । विठ्ठल नाम ठेविलें त्याला । विश्वोद्धार जाहला यास्तव ॥७॥ मागिले अध्यायीं कथा सुंदर । परमभक्त विठ्ठल पुरंदर । देवें त्यासि घेवोनि खांद्यावर । पंढरपुर दाखविलें ॥८॥ आतां नरसिंह सरस्वती महासंत । तो दत्तात्रेय अंश मूर्तिमंत । विश्वोद्धार करावया सत्य । अवतरे निश्चित नररूपें ॥९॥ साक्षर एक होता ब्राह्मण । तयासि नव्हतें पुत्रसंतान । त्याच्या पोटीं अत्रिनंदन । पूर्वपुण्यें अवतरले ॥१०॥ पुत्रसुख पाहतां नयनी । विप्रसंतोष पावला मनीं । स्वरूपें सुंदर सुलक्षणीं । देखोनि जननी सुखावे ॥११॥ बारा दिवस लोटतां जाण । नरसिंह ठेविलें नामाभिधान । पाचवे वर्षी व्रतबंध करून । तयासि अध्ययन सांगती ॥१२॥ एकदा ग्रंथ विलोकित । तो तयासि होय मुखोद्-गत। देखोनि ब्राह्मण आश्चर्य करित । विशाळ म्हणत बुद्धी याची ॥१३॥ एक म्हणती अंगिरानंदन । लीलावतारी जाहला सगुण । एक म्हणती द्वैपायन । आम्हां कारणें भासत ॥१४॥ त्याच्या साम्यतेसि निश्चितीं । दुसरा ब्राह्मण न दिसेचि क्षितीं । जिव्हाग्रीं बैसली सरस्वती । नांव ठेविती तेंचि मग ॥१५॥ नरसिंह सरस्वती म्हणवोनी । नामाभिधान बोलती जनीं । पितयासि संतोष वाटे मनीं । प्रज्ञा देखोनी पुत्राची ॥१६॥ आठा वरुषांत येतांचि जाण । वेदवेदांतीं दिसे निपुण । मुखोद्-गत सकळ पुराणें । जैसा अपसूर्य ब्राह्मण दिसतसे ॥१७॥मातापितयांचि न धरीच आर्ती । सर्वकाळ विदेहस्थिती । भजन करी एकांतीं । अरण्यपंथीं जावोनियां ॥१८॥ हास्यविनोद कोणाप्रती । मुखें न बोले वचनोक्ती । क्षुधातृषेची करी न आर्ती । निर्विषय मती तयाची ॥१९॥ ऐसीं चिन्हें त्याचीं उमटतां । चिंतातुर मातापिता । म्हणती पुत्र जाहला नवस करितां । परी विदेही अवस्था तयाची ॥२०॥ अरण्यांत जावोनि एकांतीं । बैसत असे अहोरात्रीं । लग्न करावें कैशा रीतीं । विपरीत स्थिती दिसतसे ॥२१॥ नवस सायास करितां फार । देवें आपणासि दीधला पुत्र । त्याचें विपरीत दिसे चरित्र । कैसा विचार करावा ॥२२॥ तंव कोणें एके दिवसीं जाण । स्वमुखें पितापुत्रासि म्हणे । तूं एकांतीं बैसतोसि जाऊन । न घालिसी मन संसारीं ॥२३॥ तों पुत्र उत्तर देतसे देखा । संसार शब्द हाचि लटिका । जेवीं वाझेचिया लेकां । जन्मपत्रिका तें कैंची ॥२४॥ का मृगजळाचा दिसे समुद्र । तयावरुते जहाज फिरे । स्वप्नींचें धन साचार । सांठविलें त्यामाजी ॥२५॥ तेवीं संसारशब्द मिथ्यामय । याची क्षीत मानितोसि काय । तू आत्मस्वरूप विचारूनि पाहे । तेणें सार्थक होय जन्माचें ॥२६॥ ऐसी नरसिंहसरस्वती । पितयासि बोले वचनोक्ती । परी तें नये त्याच्या चित्तीं । पडिली भ्रांती देहलोभें ॥२७॥आंधळ्यासि आरसा दाखवितां देख । तयासि न दिसे आपुलें मुख । कां बधिरासि गायनाचें सुख । वाटेल नावेक कैसेनी ॥२८॥ तेवीं योगमायेचें पडळ जाण । जयाच्या नेत्रासि बैसलें ढांपण । तयासि नावडे आत्मसाधन । प्रपंचीं निमग्न सर्वदा ॥२९॥ याची स्थिती देखोनी ऐसी । मग पुत्र म्हणतसे पितयासी । आतां आज्ञा द्यावी मजसी । वाराणसीसी जावया ॥३०॥ ऐकोनी पुत्राचें उदास वचन । अश्रुपातें भरले लोचन । म्हणे आम्हांसि नसतां संतान । जातेसि टाकोन कैशा रीतीं ॥३१॥ दुसरा पुत्र असता जर । तरी तुज आज्ञा देतों सत्वर । वार्धक्यदशा आली फार । कंठूं संसार कैशा रीतीं ॥३२॥ ऐकोनि पितयाचें उत्तर । काय बोले योगेश्वर । तुम्हांसि दोन होतील पुत्र । चिंता अनुमात्र करू नका ॥३३॥ आणिक एक कन्या सुलक्षणी थोर । सुशील आणि परमपवित्र । करील वंशाचा उद्धार । सत्य उत्तर हें माझें ॥३४॥ ऐसा वर वदोनि त्यांसी । नमस्कारी मातापितयासी । मग तो जावोनि वाराणसीं । झाला संन्यासी श्रीपाद ॥३५॥ सांडोनि दंडकमंडलूस । तत्काळ जाहला परमहंस । क्षेत्रवासी मान्य करिती त्यास । प्रज्ञा विशेष देखोनी ॥३६॥ त्याचें दर्शन होतांचि देख । भक्तीसि लागती संसारिक । दैवी संपत्तीनें वर्तती लोक । गुण सात्विक होय त्यांचा ॥३७॥ आणिक वैराग्यशीळ ज्ञानी विरक्त । शिष्य जाहले तीन शत । एक संवत्सर राहिले तेथ । प्रतिष्ठा बहुत वाढली ॥३८॥ यास्तव उदास होऊनि मनें । मग स्वदेशासि येती परतोन । जो अनन्यभावें येतसे शरण । तरी अनुग्रह देणें तयासीं ॥३९॥ ऐसे संप्रदायी जाहले बहुत । गणती पाहतां शतें सात । सवें घेवोनि तितुकियांत । स्वदेशांत मग आले ॥४०॥ थोर बंड माजलें निश्चिती । दर्शनासि लोक दुरून येती । बहुतांजनांसि लाविली भक्ती । पुण्यमूर्ती ते झाले ॥४१॥ अष्टसिद्धी सकळ दासी । इच्छिले पदार्थ अनुकूल त्यासी । परी दुर्वळें पाचारिता भिक्षेसी । त्याच्या आर्तीसी पुरवितसे ॥४२॥ ऐशा रीतीं क्रमितां पंथ । गाणगापुरासि आले त्वरित । मग सकळ शिष्यांसमवेत । वास्तव्य तेथें पैं केलें ॥४३॥ तेथें अमरजा गंगा वाहे जाण । तिच्या तीरीं करिती स्नान । दर्शनासि दुरूनि येती जन ।अद्-भूत महिमान वाढलें ॥४४॥ तंव क्षेत्रवासी धरामर । महापंडित वैदिक विप्र । स्वामीचा महिमा ऐकोनि थोर । वारंवार निंदिती ॥४५॥ म्हणती गृहस्थाश्रम केलियाविण । त्यानें घेतलें संन्यासग्रहण । आणि दंड बहिर्वासही टाकून । जनांत नग्न फिरताती ॥४६॥ सकळ धर्म त्यजिला पर । अन्न लागतें गोळाभर । अवघे मिळोनि धरामर । म्हणती पुसावें सत्वर तयासी ॥४७॥ स्वामींचे करावया छळण । चालिले पांचशत ब्राह्मण । तों देवें कौतुक मांडिलें पूर्ण । अद्-भूत प्रभंजन सोडिला ॥४८॥ धुळी उडतांचि निराळीं । कोणासि शुद्धी नाहीं राहिली ।अवघींच वस्त्रें उडोनि गेली । नग्न जाहले दिगंबर ॥४९॥ पांचशत होते ब्राह्मण । तितुकेही अवघे दिसती नग्न । एकाकडे एक पाहून । लज्जायमान ते होती ॥५०॥ वृद्ध तरुणवय निश्चिती । आपुल्या हातें लिंगें झांकिती । कोणी न हांसे कोणाप्रती । एकचि गती सकळांची ॥५१॥ ऐसा चमत्कार देखोन । मग पश्चात्ताप जाहला सकळांकारणें । म्हणे स्वामींसि निंदिलें आपण । त्याचें कारण हें दिसे ॥५२॥ आतां परतोनि जातां घरासी । तरी आपुल्यास हांसती क्षेत्रवासी । म्हणतील कोणें नागविलें तुम्हांसी । तरी काय तयांसी सांगावें ॥५३॥ कर्माची विचित्र गति जाण । लोकांत जाहलें लाजिरवाणें । एक म्हणती सांडोनि अभिमान । स्वामीसि शरण जाऊं आतां ॥५४॥ जेथें नरसिंह सरस्वती । तेथें पातले सत्वर गती । परम सद्-भाव धरोनि चित्तीं । स्वमुखें स्तुती करिताती ॥५५॥ जयजयाजी परब्रह्म मूर्ती । अवधुतरूपें अवतार क्षिती । तुझा महिमा वदतां निश्चितीं । कुंठित श्रुती जाहल्या ॥५६॥ माध्यान्ही थुंकतां भानुवरी । तों शिंतोडे पडती आपुलेचि शिरीं । तैसी आम्हासि जाहली परी । तरी क्षमा करीं अपराध ॥५७॥ ऎकोनि ब्राह्मणांची ग्लांती । स्वामींसि दया उपजली चित्तीं । मग सिद्धींसी आज्ञा सत्वर करिती । नूतन वस्त्रें देती तयां ॥५८॥ ऐसा चमत्कार देखोन । नमस्कार करिती सकळ ब्राह्मण । मग स्वामींसि आज्ञा मागोन । आपुलालें स्थान पावले ॥५९॥ तैं पासोनि ते धरामर । द्वेष न करिती अणुमात्र । तों आणिक एक वर्तलें चरित्र । तें ऐका सादर भाविकहो ॥६०॥ शिष्यसंप्रदायासि न कळत । स्वामी उठोनि गेले त्वरित । अमरजा तीरीं पाहोनि एकांत । स्नानासि जळांत प्रवेशले ॥६१॥ बुडी देतांचि साचार । लोटोनि गेल्या घटिका चार । हें कोळियानें देखिलें नेत्रद्वारें । विस्मित अंतर तयाचें ॥६२॥ म्हणे स्वामीसी उशीर लागला आहे । तरीं जळीं सुसरीनें गिळिलें काय । म्हणोनि जळीं पाहों जाय । तों नवल काय देखिलें ॥६३॥ जळांत नेत्र उघडोनि पाहत । तों सात अप्सरा असती तेथ । दिव्य मंदिर देखिलें तेथ । पाहतां झांकती नेत्र पातीं ॥६४॥ त्याणीं स्वामींसी नेऊनि घरीं । पूजा केली सर्वोपचारीं । कोळी पाहतसे नेत्रद्वारीं । उभा बाहेरी राहोनियां ॥६५॥ षोडशोपचारें झालिया पूजन । स्वामींसी  घातलें मिष्टान्न भोजन । मुखशुद्धी विडा घेऊन । मग तयासि पुसोन चालिले ॥६६॥ मंदिराबाहेर तये वेळीं । येतां दृष्टीसि देखिला कोळी । वर्तमान पुसतांचि सकळी । त्याणें तात्काळीं सांगीतलें ॥६७॥ मग स्वामी कोळियासि शिकविती । कौतुक देखिलें जे निश्चिती । हा वृत्तांत न सांगावा कोणाप्रति । त्याणें तात्काळीं सांगीतलें ॥६८॥ एक हंडाभर मोहरा होन । दीधले तेव्हां त्याजकारण । मग बाहेर पातले जळांतून । हें कोणाकारणें श्रुत नाहीं ॥६९॥ धन लाधलें कोळियासि । परी गोष्ट न टिकेचि तयापासी । म्हणें स्वामींनी प्रसन्न होऊनि मजसीं । दरिद्र दुःखासी नाशिलें ॥७०॥ आणिक एक दुर्बळ ब्राह्मण । दरिद्रदुःखें पीडिला जाण । घरीं कुटुंबासि न मिळेचि अन्न । परी स्वधीर मन तयाचें ॥७१॥ तो स्वामीपासीं एकदां येऊनी । विनये मस्तक ठेविला चरणीं । हात जोडोनि तयेक्षणीं । अमृतवचनीं बोलत ॥७२॥ म्हणें कृपाकरोनि अनाथावरी । भिक्षेसि यावें माझे घरीं । अनुकुळ पडेल ते अवसरीं । प्रतिउत्तरीं बोलिले ॥७३॥ ऐसें ऐकोनि अभयवचन । ब्राह्मण घरासि आला जाण । मग कांतेसि सांगे वर्तमान । स्वामींनी मान्य केलें असें ॥७४॥ परी दिवस तिथी नेम कांहीं । ऐसा नेम केला नाहीं । एके दिवसीं वैश्वदेव समयीं । अकस्मात विदेही पातला ॥७५॥ ब्राह्मणें देखोनि तयाप्रती । परम हर्ष वाटला चित्तीं । सप्रेम नमस्कार करोनि प्रीती । पाट देती बैसावया ॥७६॥ चिंचवणी कण्या ते अवसरीं । पाकनिष्पत्ती जाहली घरीं । म्हणवोनी चिंतातुर अंतरीं । म्हणे कैसी परी करूं आतां ॥७७॥ अगोदर सूचना असती पाहीं । तरी पदार्थ मेळविला असता कांहीं । स्त्रीपुरुष संकोच करिती जीवीं । मग तयासि विदेही काय म्हणें ॥७८॥ दूध कण्या भक्षाव्या येथ । ऐसा चित्तीं उपजला हेत । तू ही म्हैस बांधिली अंगणांत । ते दोहुनि त्वरित आणावी ॥७९॥ ब्राह्मण म्हणे त्या अवसरा । ती वंध्या म्हैस योगेश्वरा । वर्षे लोटोनि गेलीं बारा । परी गर्भोदरा न धरीच ॥८०॥ स्वामी म्हणती ते अवसरीं । ते आजपासोनि दुभेल घरीं । कधीं न आटेल जन्मवरी । निश्चय अंतरीं असों द्या ॥८१॥ ब्राह्मण दोहोनि पाहतां सत्वर । दूध निघालें आठ शेर । आश्चर्य करीतसे धरामर । म्हणे हा ईश्वर साक्षात ॥८२॥ बैसोनि नरसिंह सरस्वती । दूध-कण्या भक्षिल्या प्रीतीं ।मुखशुद्धी तुळसी पत्र देती । मग आज्ञा करिती स्वामी तया ॥८३॥ उदईक भिक्षेसि येऊं येथ । शिष्य घेऊनि सात शत । आणि क्षेत्रवासी ब्राह्मण समस्त । आमंत्रणें त्यातें देईजे ॥८४॥आणि पंचविसां माणसांचें मिष्टान्न । तुवां सत्वर निपजवणें । तितुकें पुरेंल सकळांकारणें । उद्वेग मनें न करावा ॥८५॥ ऐसें सांगोनि त्याजकारणें । तेथूनि सत्वर केलें गमन । दुसरें दिवसीं आमंत्रणें । देत ब्राह्मण घरोघरीं ॥८६॥ ब्राह्मण आश्चर्य करिती सकळ । याच्या कुटुंबासि अन्न न मिळे । आजि कां मांडिले पोर खेळ । ऐसें न कळे सर्वथा ॥८७॥ असो विविध लोक नानापरी । बोलत असती ते अवसरीं । दोन प्रहर होतांचि सत्वरी । समुदावो घरीं मिळाला ॥८८॥ सातशें शिष्यां समवेत । स्वामी येवोनि बैसले तेथ । आणि गांवींचे ब्राह्मण पांचशत । अन्न सर्वांतें वाढिलें ॥८९॥ पंचविसांचें वाढिलें अन्न । तितुकेंचि पुरे सकळां कारणें । हें स्वामींचे कर्तृत्त्व म्हणवोन । सकळ ब्राह्मण बोलती ॥९०॥ पंक्ति उठतांचि ते वेळां । विडे दक्षिणा दिधली सकळां । म्हणती योगेश्वराची अगाध लीला । कौतुक डोळां दाखविती ॥९१॥ घरीं उरलें होतें अन्न । तें इतर यतींस वांटिलें त्यांणें ।त्याचें दरिद्र जाहले विच्छिन्न । झालासे धन संसारी ॥९२॥ आणखी एक रजक होता तेथें । तो स्वामींच्या दर्शानासि नित्य येत । मूर्ति आणोनि ध्यानांत । मानसीं पूजित आपुल्या ॥९३॥ ऐसे लोटतां दिवस बहुत । तों कल्पना आली मनांत । विजापुरीचे राज्य निश्चित । हें आपणातें असावें ॥९४॥ ऐसी कल्पना येतांचि मनीं । तो स्वामी प्रगटले तेच क्षणीं । म्हणती इच्छा असेल तुजलागुनी । ते सांग ये क्षणीं लवलाहें ॥९५॥ तुझ्या मनींची कल्पना जाण । ते श्रुत जाहली मजकारणें । कांहीं संकोच न धरोनि मनें । मनोरथ सांगणें सत्वर ॥९६॥ रजक म्हणे ते अवसरीं । ऐसी इच्छा वाटते अंतरीं । राज्य करावें विजापुरीं । तरी कैशापरी प्राप्त होय ॥९७॥ मग प्रसन्न होऊनि अवधूत । म्हणती आतांच पुरविन मनोरथ । रजक मागुति विनवित । जर्जर बहुत शरीर हें ॥९८॥ वार्धक्यदशा आली निश्चितीं । विषय भोगावें कैशा रीतीं । तरी दुसरे जन्मीं पुरविजे आर्ती । म्हणवोनि विनंती करीतसे ॥९९॥ स्वामी म्हणती त्या अवसरा । तुझे मनोरथ पुरतील नरा । आणि आमुचा आठव करितां अंतरा । दर्शन सत्वरा देऊ आम्ही ॥१००॥ ऐसें वदोनि त्याजकारणें । आपण पावले अंतर्धान । रजक तेथेंचि पावला मरण । देहापासोन मुक्त झाला ॥१०१॥ विजापुरींचा राजा यवन । त्याच्या उदरासि गेला आपण । पुत्र होताचि त्याजकारणें । समाधान नृपनाथा ॥२॥ सुख सोहळे निरंतर । दिवसंदिवस जाहले थोर । सोळावे वर्षी साचार । राज्यावर बैसला ॥३॥ परी विषयीं लंपट होऊनि निश्चिती । स्वामीचा आठव न होय चित्तीं । यास्तव पायांस अवचितीं । व्यथा होती निर्माण ॥४॥ आरोग्य व्हावया साचार । वैद्य वाणी केली फार । परी न होय रोगाचा परिहार । चिंतातुर म्हणवोनी ॥५॥ एके दिवशीं नृपवर । निद्रित असतां साचार । तों स्वप्नीं आठवलें जन्मांतर । सविस्तर ते समयीं ॥६॥ तेव्हां स्वामींचें होतां स्मरण । तत्काळ दिधलें दर्शन । म्हणती उदयीक परमहंस येईल जाण । तो रोग दारूण निरसील ॥७॥ राजा होऊनियां जागृत । प्रधानासी सांगीतला वृत्तांत । म्हणती उदयीक येईल जो अतीत । त्याचा सन्मान बहुत करावा ॥८॥ दुसरे दिवसीं माध्यान्ह समयीं । स्वामी प्रगटले ते ठायीं । रायें मस्तक ठेवितांचि पायीं । रोग सर्वही परिहरे ॥९॥ मग अवधूत तयासि नीति सांगत । राज्यपदें न व्हावें उन्मत्त । दीन गरीब जे अनाथ । पीडण तयांतें न करावें ॥११०॥ गाई ब्राह्मणांचा प्रतिपाळ । करीत जावा सर्वकाळ । प्रतापें दंडावें दुष्ट खळ । तरीच सुफळ संसार हा ॥११॥ श्रीहरी स्मरण सप्रेमयुक्ती । करीत जावें दिवसरातीं । वैष्णवभक्त ब्राह्मण अतिथी । शरण यांप्रती असावें ॥१२॥ ऐसें सांगतां सिद्धमूर्ती । अवश्य तयासि म्हणे भूपती । म्हणें आता दर्शन होईल मागुतीं । तो नियम मजप्रती करावा ॥१३॥ अवधूत म्हणती ते अवसरीं । तुवां चलावें काशीपुरीं । तेथें भेट देऊं सत्वरी । निश्चित अंतरीं असों दें ॥१४॥ ऐसें वदोनि त्याजकारणें । आपण पावले अंतर्धान । राजा अनुताप धरोनि मनें । यात्रेसि गमन करितसे ॥१५॥ आनंदवनासि जावोनि त्यानें । भागिरथीचें केलें स्नान । स्वामीचें चित्तीं होतांचि स्मरण । साक्षात दर्शन ते देती ॥१६॥ मग आज्ञा करिती ते अवसरीं । चतुर्मास राहे काशीपुरीं । आम्ही जातों अमरजा तीरीं । दर्शना माघारी ये तेथें ॥१७॥ माझ्या पादुका स्थापुनि येथें । त्याचें पूजन करावे नित्य । ऐसें सांगोनियां त्यातें । अंतर्धानातें पावलें ॥१८॥ स्वामीच्या आज्ञेनें साचार । चतुर्मास राहिला नृपवर । मग धुंडित आला गाणगापुर । अमरजा तीर ते ठायीं ॥१९॥ तेथें स्वामीच्या घेऊनि दर्शना । मग तो गेला आपुल्या स्थाना । सत्वगुणें करोनि जाणा । राज्यासना भोगीतसे ॥१२०॥ मागिले जन्मीं निजप्रीतीनें । घेतलें संतांचें दर्शन । इतुकें फळ लाधलें तेणें । नृपनंदन जाहला ॥२१॥ गाणगापुरीं स्वामी असती । ते सकळ शिष्यांसि काय बोलती । आतां दर्शन दुर्लभ तुम्हांपती । तरी सांगतों युक्ती ते ऐका ॥२२॥ येथें करोनि पादुका स्थापना । करीत जावें त्यांचें पूजन । ऐसें सांगोनि त्यांजकारणें । अंतर्धान पावलें ॥२३॥ कृष्णातीरीं एक ग्राम जाण । कुरुंदवाड नामाभिधान । ते स्थळीं प्रकट जाहले आपण । अघटित विंदान दावावया ॥२४॥ सत्पुरुष देखोनि साचार । दर्शनासि येती नारीनर । नवस कल्पितांचि सत्वर । तरी मनोरथ पुरे तयाचा ॥२५॥ एक वंध्या कांता होती जाण । म्हणे मज पुत्र होईल निधान । तरी स्वामींच्या दर्शनासि आणीन । कल्पना मनें हें केली ॥२६॥ तंव तें जाहली गरोदर । सुलक्षणिक जाहला पुत्र । घरीं उत्सव केला थोर । तों काय चरित्र वर्तलें ॥२७॥ षण्मास लोटतांचि जाण । लेंकरूं जाहलें गतप्राण । मातेनें प्रेत उचलोन । म्हणे स्वामी कारणें दाखवितें ॥२८॥ स्वामीच्या सन्मुख आणितां । तो जीवंत जाहलें तें अवचितां । चित्तीं आनंद पावोनि माता । मग अवधुता नमस्कारी ॥२९॥ आणिक एक सावकार होता । तो मृत्यु पावला अवचिता । शय्या गमनीं निघे कांता । माया ममता टाकोनि ॥१३०॥ मिरवत आली कृष्णातीरीं । तो स्वामीसि दुरोनि देखिलें नेत्रीं । सद्भावे येवोनि नमस्कारी । तों आशिर्वाद सत्वरीं बोलिले ॥३१॥ तों सती म्हणतसे अवधुता । शांत जाहला माझा भर्ता । चालिलें शय्या गमनार्था । माया ममता टाकोनि ॥३२॥ अष्टपुत्रा सौभाग्यवती । आशिर्वाद दीधला मजप्रती । स्वामी प्रसन्न होऊनि म्हणती । भ्रतार निश्चिती उठेल तुझा ॥३३॥ प्रेतापासीं येतांचि जाण । तों भ्रतार बसला उठोन । जैसें दीधलें आशीर्वचन । तैसेच आलें घडोन अनायासें ॥३४॥ कृष्णातीरींचे बहुत जन । भक्तीसि लाविले अवधुतानें । मग ते स्थळीं अदृश्य जाहले आपण । कोणासी दर्शन न देती ॥३५॥ करावया विश्वोद्धार । घेतला सगुण अवतार । ऐसा संतांचा महिमा थोर । प्राकृत नर नेणती ॥३६॥ आणीक चरित्र ऐका सादर । एक महा मुद्‍गल भट्टद्विजवर । वेदशास्त्रीं निपूण फार । परी चित्तीं अहंकार असेना ॥३७॥ महापंडित आला थोर । तरी कुंठित होय त्याच्या समोर । इतुकी विद्यां असता फार । परी वाद अणुमात्र न घाली ॥३८॥ सर्वाभूतीं दया पूर्ण । आत्मवत भासे विश्वजन । असत्य सर्वथा न बोले वचन । वृत्ति संपूर्ण मुराल्या ॥३९॥ न करी कोणाचें उपार्जन । रावरंक समसमान । आशापाशी न गुंतेचि मन । नैराश्य परिपूर्ण सर्वथा ॥१४०॥ स्नानसंध्या करोनि नित्य । पंचमहायज्ञ सारित । समयीं आलिया अभ्यागत । तयासि पुजित सद्‌भावें ॥४१॥ श्रीराम सीता लक्ष्मण । भरत आणि शत्रुघ्न । ह्या मूर्ति घरीं पुरातन । करीतसे अर्चन सद्भावें ॥४२॥ श्रीराम मनीं श्रीराम ध्यानीं । श्रीराम दिसे जागृती  स्वप्नीं । श्रीराम भरला जनीं वनीं । व्यापक त्रिभुवनीं श्रीराम ॥४३॥ पुत्रमित्र आणि भार्या । श्रीरामरुप दिसती तया । श्रीराम राहाटवी सकळ इंद्रियां । पूर्णस्थिती तया बाणली ॥४४॥ अयाचित वृत्ती करून। जितुकें मिळेल वस्त्रअन्न । तेणेंचि होय कुटुंब रक्षण । संतोष मन सर्वदा ॥४५॥ श्रीराम जयंती माझारी । महा उत्सव करिती घरीं । दहा दिवस अन्न शांति करी । मिष्टान्नें बरीं ब्राह्मणां ॥४६॥ मुद्‍गल भट्ट प्रतिष्ठित द्विजवर । साहित्य करिती भाविक नर । संत महंत वैष्णववीर । कीर्तन गजर ते करिती ॥४७॥ दहावे दिवसीं करोनि लळित । मग गौरविती वैष्णवभक्त । ऐसें लोटतां दिवस बहुत । तों चरित्र अद्भुत वर्तलें ॥४८॥ एकदा कुटुंबासह वर्तमान । महा यात्रेसि चालिले आपण । एक पुत्र घरी ठेविला जाण । देवतार्चन करावया ॥४९॥ दारा पुत्र आणि सुनेसी । अश्व मनुष्य घेवोनि ऐशीं । मुद्‍गलभट्ट जावोनि काशीसी । भागींरथीसी स्नान केलें ॥१५०॥ विश्वेश्वर ज्योतिर्लिंग पूर्ण । त्याचें सद्भावें केलें पुजन । मग नित्य यात्रा सर्व करून । समाधान पावले ॥५१॥ रामनवमीसि परतोनि जावें घरी । यास्तव निघाले सत्वरीं । गया प्रयाग अयोध्यापुरी । पाहोनि अंतरीं संतोष ॥५२॥ स्नान दान गया वर्जन । यथाविधि देवतार्चन । जे जे क्षेत्रीं जें आचरण । तितुकें कारण संपादिलें ॥५३॥ ऐसी यात्रा करोनि त्वरित । परतोनि येतसे विष्णुभक्त । तों मार्गी कोणी सज्ञान गृहस्थ । तो आदरें राहवी तयांसी ॥५४॥ म्हणती विष्णु भक्ताचें आगमन । जाहलें असें दैवें करून । पूजा करोनि यथाविधिनें । वस्त्रें भूषणें अर्पिती ॥५५॥ रामजयंती उत्सव सदनीं । यास्तव द्रव्य देती आणोनी । मुद्‍गलभट्ट तें अंगींकारुनीं । चालिले परतोनी सत्वर ॥५६॥ आणिकही कोणी भाविक प्रेमळ । सद्भावें अर्पिती तुळसीदळ । द्रव्य बहुत सांचलें जवळ । हें तस्करांसि कळलें तें समयीं ॥५७॥ गमन करितांचि मुद्‍गलभट्ट । सवें चोर चालिले त्याचे पाठीं । म्हणती अरण्यांत पाडोनि गाठीं । द्रव्य शेवटीं हरावें ॥५८॥ ऐसी दुर्बुद्धी धरोनि थोर । मागें चालिलें ते तस्कर । हें सर्वथा नेणे भक्त चतुर । एक जाणे रघुवीर अंतरात्मा ॥५९॥ मुद्‍गलभट्टाची स्थिती ऐसी । चोर साव सारिखेचि त्यासी । रक्षण करावें निज द्रव्यासी । हें कल्पना मानसीं त्यास नाहीं ॥१६०॥ कोणी देती अथवा नेती । कोणी निंदिती कोणी स्तविती । हें समान मानूनियां प्रीतीं । चित्तीं रघुपती धरियेला ॥६१॥ निरसोनि सकळ क्रोध काम । हृदयीं सांठविला मेघश्याम । चित्तीं ठसावें हेंचि प्रेम । कीं सर्वत्र राम एक असे ॥६२॥ ऐसी मुद्‍गलभट्टाची स्थिती । परी निर्दय तस्कर महादुर्मती । चित्तीं घात करूं इच्छिती । हरोनि संपत्ती न्यावया ॥६३॥ शस्त्रें घेऊनि साचार । चालत असती मार्गावर । हें जाणोनियां श्रीरघुवीर । सगुण साकार रूप धरी ॥६४॥ भक्तासि संकट पडतांचि पाहीं । काळ वेळ न विचारी कांहीं । सगुण होऊनि शेषशायी । विघ्नें सर्वही निरसित ॥६५॥ श्रीराम आणि लक्ष्मण । भरत आणि शत्रुघ्न । धनुर्धरांचीं रूपें धरून । मार्गी त्वरें प्रगटले ॥६६॥ कुटुंबासहित प्रेमळभक्त । भजन करीत जातसे पंथ । चौघे धनुर्धर तयासि रक्षित । तस्करही जपत चालती ॥६७॥ धनुष्यबाण घेऊनि हातीं । भरत शत्रुघ्न पुढें जाती । श्रीराम लक्ष्मण मागूनि येती । भक्तासि रक्षिती प्रीतीनें ॥६८॥ हे चौघेही दिसती तस्करांकारणें । उग्ररूपें भासती जाण । अंतरीं होवोनि क्रोधायमान । आरक्त नयन वटारिती ॥६९॥ ऐसें स्वरूप देखतां दृष्टी । चोरांसि भय उपजलें पोटीं । म्हणती याणें कां पुरविली पाठी । बोलती गोष्टी परस्परें ॥१७०॥ मागें पुढें राहती दूर । मग द्रव्य हिरोनि घेऊन समग्र । ते न विसंबती क्षणभर । दिवस रात्र रक्षिती ॥७१॥ निद्रित होतां वैष्णववीर । जागत बैसती चारी प्रहर । चित्तीं आश्चर्य करिती चोर । म्हणती कैसा विचार करावा ॥७२॥ तंव एके दिवसीं साचार । धनुर्धरांसि पुसती तस्कर । तुम्हा जाणें कोठवर । ऐकोनि रघुवीर काय म्हणे ॥७३॥ मुद्‍गलभट्ट हा यात्रेकरी । आम्ही करितों याची चाकरी । तयासि पोंहचवूनियां घरीं । मग अयोध्यापुरीं आम्हीं जाऊं ॥७४॥ ऐसें बोलोनि श्रीरघुवीर । परी ते सर्वथा न ओळखती चोर । जो अंतरात्मा जगदुद्धार । म्हणवितो चाकर भक्तांचा ॥७५॥ ज्याची मूर्ति हृदयसंपुटीं । एकांतीं पूजीतो धूर्जटी । तो भक्ताचा सेवक होय जगजेठी । हें नवल पोटीं मजवाटे ॥७६॥ आज उद्यां राहतील दूर । मग द्रव्य होरोनि घेऊं सत्वर । ऐसी आशा धरोनि चोर । गंगातीर पातले ॥७७॥ मुद्‍गलभट्ट प्रवेशले मंदिरांत । कंठाळ उतरोनि नेली आत । मग चौघे धनुर्धर अदृश्य होत । तस्कर विस्मित जाहले ॥७८॥ अस्तमानासि गेला दिनकर । यास्तव बाहेर उतरले चोर । मुद्‍गलभट्टाच्या भेटीसि सत्वर । भाविक नर पातले ॥७९॥ यात्रा जाहलीं कीं सुखरूप । उत्तर देती रघुवीर कृपे । तों तस्करांसि जाहला अनुताप । आपोआप ते समयीं ॥१८०॥ म्हणती हा विष्णुभक्त आहे । म्हणोनि देवें रक्षिलें काय । आपण केलें नाना उपाय । परी हातास न ये त्याचें ॥८१॥ असों मुद्‍गलभट्ट तें अवसरीं । सत्वर जावोनि देव घरीं । सद्भावें साष्टांग नमस्कारी । मूर्ति साजिरी पाहोनि ॥८२॥ उपाहार करावया सत्वर । तों द्वारापासीं देखिलें तस्कर । म्हणती संगतीनें आलां येथवर । वरी भाजी भाकर खा आतां ॥८३॥ ऐसें बोलोनि त्यांजकारणें । मग घरांतूनि देवविलें अन्न । भक्षितांचि त्याचा जाहला गुण । गेली निघोनि दुर्बुद्धी ॥८४॥ मुद्‍गलभट्टासि नमस्कार । करोनि स्वमुखें बोलती उत्तर । तुम्हीं चौघे ठेविले होते चाकर । ते कां साकार न दिसती ॥८५॥ रूपें सुंदर त्यांचीं असती । धनुष्य बाण घेवोनि हातीं । रात्रंदिवस तुम्हांसि रक्षिती । ते कां न दिसती ते ठायीं ॥८६॥ मुद्‍गलभट्ट देती उत्तर । आम्हीं ठेविलें नाहींत चाकर । तुम्हीं कोण अहांत साचार । तरी हें सत्वर सांगावें ॥८७॥ ते म्हणती आम्हीं सर्व चोर जाण । पाळत लावोनि आलों दुरून । कीं तुमचें हिरोनि घ्यावें धन । परी ते चौघेजण रक्षिती ॥८८॥ एकदां पुसिलें साचार । तुम्हांसि जाणें कोठवर । तें म्हणती आम्हीं याचें चाकर । अयोध्यापुर गांव आमुचें ॥८९॥ तुम्हीं वाडियांत प्रवेशतां सदनीं । आम्हीं येथवर देखिलें नयनीं । ऐकोनि तस्करांचीं वाणी । म्हणे कैवल्यदानी शिणविला ॥१९०॥ मग मुद्‍गलभट्ट ते समयीं । तस्करांच्या लागतसे पायीं । म्हणे तुम्हांसि भेटले शेषशायीं । अंतपार नाहीं भाग्यासि ॥९१॥ तुम्हीं केवळ वैष्णव भक्त । यास्तव भेटले रघुनाथ । मीतरी पतित त्रिवाचा सत्य । म्हणवोनि लपत मजपुढें ॥९२॥ द्रव्याची गांठोडीं सत्वरा । आपुल्या हातें देतसे चोरां । म्हणती रित्याहातें न जावें घरा । अंगींकार करा स्वामी याचा ॥९३॥ श्रीराम सखा लक्ष्मण । भरत आणि शत्रुघ्न । यांहीं धनुर्धरांचीं रूपें धरोन । तुम्हांसि दर्शन दिधलें ॥९४॥ ऐसी ऎकोनि वचनोक्ती । तस्करांसि अनुताप जाहला चित्तीं । म्हणती आम्ही पापिष्ठ दुर्मती । तुझ्या संगती उद्धरलों ॥९५॥ आणिकासि छळितां साचार । तरी भोगणें लागता नरक घोर । तुझें संगतीने साचार । श्रीजानकीवर देखिला ॥९६॥ द्रव्य नलगेचि आम्हांकारणें । तुझ्या संगतीं जाहलों पावन । मग मुद्‍गलभट्टें नेत्र झांकोन । मांडिलें स्तवन रामाचें ॥९७॥ जयजयाजी रघुवीरा । सायुज्यदानी अति उदारा । नीलग्रीव शंकराच्या प्रियकरा । येवोनि सत्वरा भेटी द्यावी ॥९८॥ धनुष्यबाण घेऊनि हातीं । नित्य भेटसी तस्करांप्रती । माझी विचित्र कर्मगती । जानकीपती ते सांगा ॥९९॥ करुणारसें प्रीती करोनी । गीर्वाण भाषा वदले वाणी । शत आर्या केल्या त्याणीं । मग कैवल्यदानी भेटले ॥२००॥ श्रीराम सीता लक्ष्मण । भरत आणि शत्रुघ्न । देव घरीं एकांती प्रगट होऊन । दिधलें दर्शन तयासी ॥२०१॥ सगुणरूप देखिलें दृष्टीं । तेंचि ठेविलें हृदय संपुटीं । निजभक्त पडतां संकटीं । पावे जगजेठी तत्काळ ॥२॥ तों श्रीरामजयंती माझारी । संत महंत पातले घरीं । महाउत्सव होतसे मंदिरीं । मंगळतुरीं नामघोष ॥३॥ नित्य ब्राह्मण संतर्पण । रात्रिसमयीं हरिकीर्तन । तों स्नेह सरोनि गेलें जाण । उपाय आन नसेचि ॥४॥ बाजारांतुनि आणावें जर । तरी दिवाणाचें भय थोर । रात्रीं वागतांना नारीनर । तरी घरटीकार धरी त्यांसी ॥५॥ कीर्तनासि कोणी येती जर । ते येथेंचि राहती चारी प्रहर । दिवस उगवतां साचार । घरोघर मग जाती ॥६॥ ऐसें असतां ये ठायीं । कीर्तनांत तेल सरलें पाही । संकटीं पडिले शेषशायी । मग लाघव काय करीतसे ॥७॥ मुद्‍गलभट्टाचा विद्यार्थी । त्याचें रूप धरी सीतापती । तेलियाचें घरीं जावोनि प्रीतीं । गहाण ठेविती मुद्रिका ॥८॥ तेलिणीसि सांगती ते समयीं । प्रातःकाळीं आणोनि देई । आपुलें द्रव्य घेऊनि जाई । ऐसें ते समयीं बोलिले ॥९॥ तेल आणोनि घागरभर । पात्रांत रिचवी शारंगधर । ऐकत बैसले कीर्तन गजर । दीनोद्धार तेधवां ॥२१०॥ हरीदास कीर्तन उभें असती । चारी प्रहर जाहली जागृतीं । मग उजळोनि मंगळारती । सीतापती ओवाळिला ॥११॥ तेव्हां सकळ श्रोतयांप्रती । प्रसाद वांटिला खिरापती । आपुलाल्या घरासि लोक जाती । तों उदयासि गभस्ती पातला ॥१२॥ मुद्रिका घेवोनि आली तेलिण । मुद्‍गलभट्टासि बोले वचन । रात्रीं तुमच्या विद्यार्थीयानें । ठेविलें गहाण मजपाशीं ॥१३॥ तेल आणिलें घागरभर । माझें द्रव्य द्या सत्वर ।ऐसें ऎकोनियां उत्तर । विस्मित अंतर तयाचे ॥१४॥ विद्यार्थियांसि पुसतां पाहीं । ते म्हणती आम्हांसि विदित नाहीं । तेल मात्र दिसतें गृहीं । विस्मित जीवीं तें होती ॥१५॥ मुद्‍गलभट्ट समजलें मनीं । म्हणती ही श्रीरामाची करणी । मुद्रिका देव्हार्‍यांत ठेवोनी । प्रीती करोनी पूजित ॥१६॥ पुढिले अध्यायीं रस अद्भुत । वदविता श्रीगुरु रुक्मिणीकांत । महीपती त्याचा मुद्रांकित । शरणागत संतांचा ॥१७॥ स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ । प्रेमळ परिसोत भाविकभक्त । एकुणपन्नासावा अध्याय रसाळ हा ॥२१८॥


Jul 8, 2020

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र - ( श्लोक ४१ ते ४४ )


|| श्री गणेशाय नमः ||

दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू. जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.


महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.

|| श्री गुरुदेव दत्त ||


ज्ञातेऽपि धर्मे नहि मे प्रवृत्ति-

र्ज्ञातेऽप्यधर्मे न ततो निवृत्तिः ॥

श्रीदत्तनाथेन हृदि स्थितेन

यथा नियुक्तोऽस्मि तथा करोमि ॥४१॥

भावार्थ : हे परमेश्वरा, धर्मयुक्त आचरण असावे हे कळत असूनसुद्धा त्या मार्गाकडे मी वळत नाही. तर बरेचदा हा अधर्म आहे, हे जाणत असूनदेखील त्या कृत्यापासून मी परावृत्त होत नाही. माझ्या हृदयीं वास करणारा तू दत्तनाथ आहेस, आणि तू जशी मला प्रेरणा देतोस तसेच मी आचरण करतो. (हे सत्य नाही का ?)   


कृतिः सेवा गतिर्यात्रा स्मृतिश्चिन्ता स्तुतिर्वचः ।

भवन्तु दत्त मे नित्यं त्वदीया एव सर्वथा ॥४२॥

भावार्थ : हे कृपाघना, माझे प्रत्येक कृत्य, कर्म तुझ्या सेवेसाठीच घडावें. माझे भ्रमण नेहेमीच तुझ्या यात्रेसाठी असावे. मी केलेले चिंतन, माझे विचार-मंथन केवळ तुझ्या स्मृती जागृत करोत. तुझे स्तवन करण्यासाठीच सर्वदा माझे वचन, बोल असावेत. हे दत्तात्रेया, माझ्या तन-मन-वाचा यांचा उपयोग नित्य तुझ्या सेवेसाठी, दर्शनासाठी, तुझ्या लीलांचे स्मरण करण्यासाठी आणि स्तवनासाठी व्हावा, हे वरदान तू मला द्यावेस.       


प्रतिज्ञा ते न भक्ता मे नश्यन्तीति सुनिश्चितम् ।

श्रीदत्त चित्त आनीय जीवनं धारयाम्यहम् ॥४३॥

Jul 6, 2020

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र - ( श्लोक ३१ ते ४० )


|| श्री गणेशाय नमः ||

दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू. जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.

महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.

|| श्री गुरुदेव दत्त ||



जीवनं भिन्नयोः पित्रोर्लोक एकतराच्छिशोः ।

त्वं तूभयं दत्त मम माऽस्तु निर्दयता मयि ॥३१॥

भावार्थ : या जगांत बाळाला माता-पिता दोन्ही असतात. दोघांपैकी एक तरी त्या बाळाच्या पाठीशी कायम असतोच , म्हणजे पिता जरी एखाद्यावेळेस रागावला तरी माता त्या बालकास जवळ घेते. किंवा माता कधी त्या बालकावर नाराज झाली तर पिता त्याची समजूत काढतो. पण हे दत्तात्रेया, माझे माता-पिता दोन्ही तूच आहेस, मग तूच जर माझी उपेक्षा केलीस तर या जगांत मला कोण सांभाळणार ? यास्तव, माझ्याशी तू असा कठोरपणे वागू नकोस. 


स्तवनेन न शक्तोऽस्मि त्वां प्रसादयितुं प्रभो ।

ब्रह्माद्याश्चकितास्तत्र मन्दोऽहं शक्नुयां कथम् ॥३२॥

भावार्थ : हे दत्तप्रभो, तुझे स्तवन करून तुझ्या कृपाप्रसादास पात्र होणे हे माझ्या शक्तीपलीकडे आहे (सर्वथा अशक्य आहे ). ब्रह्मदेवादिही जिथे तुझी स्तुती करता करता थकले, तिथे माझ्यासारखा मंदमति तुझ्या सकल गुणांचे वर्णन कसा करू शकेल ? 


दत्त त्वद्-बालवाक्यानि सूक्तासूक्तानि यानि च ।

तानि स्वीकुरु सर्वज्ञ दयालो भक्तभावन ॥३३॥

भावार्थ : हे सर्वज्ञ, दयाळू आणि भक्तप्रिय असणाऱ्या अत्रिनंदना, या तुझ्या बाळाचे जे वेडे-वाकडें  वा चांगले-वाईट बोल आहेत त्यांचा तू स्वीकार कर. (आणि मला तुझा कृपाप्रसाद दे.)