Feb 25, 2020

श्री साई चरित्रामृत - ४


ll श्री गणेशाय नमः ll श्री सद्‌गुरु साईनाथाय नमः ll ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ll


महायोगीश्वर साईनाथ

श्री साईनाथांना सर्व योगक्रिया अवगत होत्या. लोकांची नजर चुकवून ते एकांतस्थळीं जात. स्नानाच्या निमित्ताने अभ्यांतरी करतांना कितीतरी शिरडीवासियांनी त्यांना पाहिलें आहे. त्यांना धोती पोती आदी योगांगांचे पूर्णतः ज्ञान होते. इतकेच नव्हें, तर कधी कधी साई खंडयोग लावून शरीराचे सर्व अवयव विलग करून मशिदीत जागोजाग फेकून देत. त्यांचा तो खंड-विखंड झालेला देह पाहण्यासाठी लोक मशिदीत धावून धावून येत असत, मात्र त्यांना बाबा पूर्ववत अखंड स्वरूपांत दिसत. अशाच एका प्रसंगी, साईंचा खंडयोग पाहून एक गृहस्थ अतिशय घाबरला. " मशिदीत चार कोपऱ्यांत बाबांच्या शरीराचे तुकडें दिसत आहेत. भर मध्यरात्रीची वेळ आहे. कुणीही जवळ नाही. कोणा दुष्टाने बाबांना ठार केले असेल बरें ? कोणी हा अत्याचार केला असेल बरें ? कोणाला सांगायला जावें, तर आपल्यावरच नाहक आळ येईल." असा विचार करीत चिंताग्रस्त होऊन तो गृहस्थ बाहेर जाऊन बसला. बाबांची ही काही योगसाधना असेल, असे त्याच्या स्वप्नींही नव्हते. अखेर, पहाटें तो धीर करून मशिदीत गेला अन काय आश्चर्य ! साईनाथ आपल्या नेहेमीच्या ठिकाणी स्वस्थ बसलें होते. आपण मध्यरात्री जे दृश्य पाहिलें, ते स्वप्न तर नव्हते ना असे वाटून तो आश्चर्यचकित झाला.

साईंच्या योगसामर्थ्याच्या महतीचे वर्णन करतांना अजून एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केलाच पाहिजे.  कैसी साईंची रहाणी । कोठे तें निजत कोण्या ठिकाणी । सादर श्रवणीं श्रोतें व्हा । बाबांची झोपण्याची पद्धत अतार्किक अन अचंबित करणारी होती. मशिदीच्या आढ्याला झोपाळ्यासारखी एक लाकडी फळी टांगलेली होती. ती फळी साधारण चार हात लांब आणि एकच वीत रुंद होती. विशेष म्हणजे या फळीची दोन्ही टोकें केवळ चिंध्यांनी बांधलेली होती. बाबा याच फळीवर झोपत असत. इतकेच नव्हें तर बाबांच्या उशाशी म्हणजेच मस्तकाजवळ आणि पायथ्याशी म्हणजेच अर्थातच पायांजवळ पेटलेल्या पणत्या ठेवलेल्या असत. या फळीवर निद्रिस्त झालेल्या बाबांना अनेकांनी अगणित वेळा पाहिले आहे. मात्र तें फळीवर केव्हा आणि कसे चढत तसेच केव्हा उतरत, हें कोणालाच कळत नसे. ऐसी चिंध्यांनीं बांधिली फळी । वजन बाबांचें कैसें सांभाळी । महासिद्धि असतां जवळी । नांवाला फळी केवळ ती ॥ साध्या चिंध्या एकत्र करून बांधलेली ती चौहाती लाकडी फळी बाबांचे वजन कसे पेलवत असेल ? ही एक अद्भुत लीला होती. अर्थात,अष्टसिद्धींवर विजय मिळवलेल्या साईबाबांसाठी मात्र ही सहजशक्य गोष्ट होती. साईनाथांचे असे अनेक चमत्कार आणि लीला, त्यांच्या दिव्यशक्तीची नोंद घेण्यास भाग पाडतात. अर्थात जे प्रसंग साईचरित्रकारांनी वा इतर साईभक्तांनी शब्दबद्ध केलें आहेत तितकेच आपल्याला ठाऊक आहेत. जें अनुभव, ज्या लीला ग्रंथबद्ध झाल्या नाहीत, त्याबद्दल काय लिहावे ?    

थोडक्यांत,साईंची ही योगस्थिती कोणालाही अगम्य अशीच होती. सहा शास्त्रें आणि षडदर्शनें ज्यांच्यासमोर नतमस्तक होतात, ते साईनाथ !

साईबाबांनी मशिदीत वास्तव्यास प्रारंभ केल्यावर म्हाळसापती आणि तात्या कोते पाटील सतत त्यांच्या सहवासात असायचे. ते दोघेही बाबांसोबतच मशिदीत झोपत असत. पूर्व, पश्चिम आणि उत्तर अशा तीन दिशांना तिघांची डोकी असत आणि परस्परांचे पाय मध्यबिंदूस भिडलेले असत. रात्री उशिरा बराच काळापर्यंत त्यांच्या गप्पागोष्टी चालत असत. कुणा एखाद्यास डुलकी लागली तर इतर दोघे त्यास जागे करीत असत. असे जवळजवळ १४ वर्षें तात्या बाबांसमवेत मशिदीतच असत. पुढें तात्यांचे वडील श्री. गणपतराव कोते पाटील निर्वतले. त्यानंतर तात्यांवर प्रपंचाची जबाबदारी आली, ते घर-संसारात पडले आणि मशिदीतील रात्रीच्या वास्तव्यात खंड पडला. मात्र साई आणि तात्यांचा ऋणानुबंध कायम राहिला. खरोखर म्हाळसापती आणि तात्यांच्या भाग्याचे वर्णन किती करावे बरें !

तसेच राहाता गावांत खुशालचंद नावाचे एक श्रीमंत व गावचे नगरशेट गृहस्थ बाबांचे भक्त होते.प्रसिद्ध पाटील गणपत कोते । जैसे बाबांचे फार आवडते । चुलते खुशालचंदांचे होते । तैसेचि बाबांतें प्रिय बहु ॥ खुशालचंदांचे चुलते चंद्रभान शेट बाबांचे अत्यंत लाडके होते. त्यांचे देहावसान झाल्यावरदेखील बाबांची कृपा खुशालचंद आणि त्यांच्या घराण्यावर कायम राहिली. कधी बैलगाडीत तर कधी टांग्यात आपलें काही भक्त बरोबर घेऊन शिरडीपासून सुमारे दीड मैलांवर असलेल्या राहात्यास बाबा जात असत. त्यावेळीं गांवकरी लोक ताशे वाजंत्रींसह वेशीवर सामोरे येऊन बाबांचे स्वागत करीत असत. मग तेथूनि गांवाआंत । बाबांस समारंभें नेत । अति प्रेमें वाजत गाजत । आनंदभरित मानसें ॥ नंतर खुशालचंद बाबांना आपल्या घरी घेऊन जाऊन पूजाअर्चा आणि उत्तम आदरातिथ्य करीत असत. अशाप्रकारे काही काळ तिथे राहून बाबा आपल्या भक्तगणांसोबत शिरडीस परत येत असत.

एकीकडे हे राहते गाव आणि दुसरीकडे निमगाव होते. शिरडीपासून साधारण एक मैलभर अंतरावर असलेल्या निमगावाच्या परिसरांत साईबाबा दुपारी मनास येईल तसे हिंडत असत.निमगांवचे जहागिरदार  बाबासाहेब डेंगळे यांची साईंवर श्रद्धा होती. साईही निमगांवास गेल्यावर डेंगळ्यांच्या घरी जात असत. निमगांवावरी जातां फेरी । बाबानीं जावें तयांचे घरीं । अति प्रेमें तयांबरोबरी । दिवसभरी बोलावें ।। बाबासाहेबांची डोळ्यांची व्यथा साईंनी दूर केली होती तसेच शिवेच्या नाल्याजवळ दर्शन देऊन श्री शेषशायी श्रीहरी रूपांत दिव्यस्वरूपही प्रगट केले होते. बाबासाहेब डेंगळ्यांचे कनिष्ठ बंधू, नानासाहेब डेंगळे अपत्यप्राप्तीसाठी तळमळत होते. बाबासाहेबांच्या सांगण्यानुसार नानासाहेब श्री साईंच्या दर्शनास आले. साईबाबांच्या कृपेनें आणि आशीर्वादाने यथावकाश त्यांना पुत्रप्राप्ती झाली. नंतर हळूहळू साईनानाथांची ख्याती वाढत गेली आणि त्यांच्या दर्शनासाठी जनसमुदाय लोटू लागला. पुढे ही वार्ता अहमदनगरला, जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचली. तिथे सरकार दरबारी नानांचे बरेच येणें जाणें होते, वजन होते. तिथे सर्कल इन्स्पेक्टर गोपाळराव गुंड आणि चिदंबर केशव गाडगीळ नावाचे चिटणीस होते. नानासाहेब डेंगळ्यांनी त्यांना पत्र लिहून साईसमर्थांचा महिमा सांगितला व सहकुटुंब, इष्टमित्रांसहित बाबांचे दर्शन घेण्यासही सुचविले.ऐसे एकामागून एका । शिरडीस येऊं लागले अनेक । वाढला जैसा बाबांचा लौकिक । परिवारही देख तैसाचि ॥

बाबा आपल्या शिरडीतील वास्तव्याच्या सुरुवातीच्या काळांत रहाते व नीमगांव या दोन गावांपलीकडे अन्यत्र कधीही गेले नाहीत. तरीही त्यांना सर्व ठिकाणांची माहिती होती, आणि रेलगाडीचे वेळापत्रकही माहीत होते. 


धन्वंतरी साई   

बाबा प्रारंभी गावांत वैद्यकी करत असत. त्यांच्या हाताला बरेच यशही होते. त्यामुळें, सत्पुरुष व फकीर याचबरोबर प्रख्यात 'हकीम' अशीही उपाधी त्यांना सुरुवातीच्या काळांत प्राप्त झाली होती. एकदा एका भक्ताचे डोळें सुजून लाल झालें होते व बुबुळेंही रक्तबंबाळ झाली होती. शिरडीतील वैद्यांचाही उपाय चालेना. अखेर,साईबाबांवर अढळ श्रद्धा असल्यानें सर्व मशिदीत आले. साईंनी कुणा भक्ताकडून बिब्बे ठेचून घेतलें. तें गोळें हा त्रास असलेल्या भक्ताच्या डोळ्यांवर दाबून भरलें आणि त्यांवर एक फडकें गुंडाळले. दुसऱ्या दिवशी, साईंची त्या भक्ताच्या डोळ्यांवरील पट्टी सोडून डोळ्यांवर पाण्याची धार धरली. नंतर, त्या भक्तास डोळें उघडण्यास सांगितले असता डोळ्यांची सूज पूर्णपणें निवळली होती, तसेच बुबुळेंही स्वच्छ, निर्मळ झाली होती. डोळ्यांसारखा नाजूक भाग असूनही बिब्ब्यानें मुळीच आग झाली नव्हती, उलट नेत्ररोग पूर्णतः बरा झाला. असें अनेक अनुभव श्रद्धावंतांस येऊ लागलें होते. साईनाथांच्या केवळ दर्शनानेदेखील कित्येक लोक आरोग्यवान झाले, कित्येक दुष्टांचे सुष्ट- सदाचारी झाले. अनेक लोकांचे कुष्ठही नाहीसे झाले. नेत्रहिनांना दृष्टी, तर पंगू लोकांस चालतां येऊ लागलें. कित्येक लोकांचे कल्याण झालें. त्यांची काया जरी मानवाची असली तरी, करणी मात्र अपूर्व आणि परमेश्वराची होती. साईचरित्रकार सांगतात की असे बाबांचे असंख्य चमत्कार आहेत, तें सर्व वर्णन करणें सर्वथा अशक्य आहे.



पुढें साईबाबांच्या प्रसिद्धीचा ओघ वाढत राहिला, तरी त्यांच्या वर्तनामध्ये मात्र फारसा फरक पडला नाही. दिवसभर भक्तांच्या सान्निध्यात बुडालेले बाबा रात्रीच्या वेळी पडक्या मशिदीचा आसरा घेत असत.  बाबांसोबत चिलीम, टमरेल, सटका मात्र नित्य-निरंतर असे. चिलमीमध्ये भरण्यासाठी कुणा भक्ताने दिलेल्या तंबाखूची पुरचुंडी बाबा जपून ठेवत असत. बाबांच्या अंगात पायघोळ कफनी व डोक्याला पांढरा फडका बांधलेला असे. ते धूतवस्त्र आपल्या डाव्या कानामागे पीळ देऊन एखाद्या जटेप्रमाणे गुंडाळत असत. स्नानाचाही काही नित्य नियम नसे. मनांत आल्यास काहीतरी खावे, तर कधी भटकंती करावी अन्यथा पडक्या मशिदीतील गोणपाटावर बसून राहावे, असा दिनक्रमही प्रत्येक दिवशी वेगळा असायचा. बाबा पायात कधीही वहाण घालत नसत. एक गोणपाट हेच त्यांचे आसन होते. मशिदीमध्ये नाथसंप्रदायाची निशाणी, धुनी सतत पेटलेली असे. त्यात कधी खंड पडला नाही. बाबा अनेकदा एकटे असता दक्षिण दिशेकडे असलेल्या या धुनीकडे एकटक पाहत बसत, अशावेळी त्यांचे कुणाकडेही लक्ष नसे. बाबा स्वतःमध्ये मग्न व विचारात गढलेले असत. बाबांनी स्वहस्तें पेटवलेली ही धुनी आजही शिरडीत अखंड-अव्याहतपणे पेटती ठेवली जात आहे. 

श्री साईबाबांच्या १८५८ सालच्या शिरडीतील पुनरागमनानंतरची साधारणपणें १२ वर्षे त्यांनी विजनवासात काढली. ह्या काळांत प्रामुख्याने फक्त बायजाबाई, श्री.गणपतराव कोते व फार थोड्या गावकऱ्यांनी त्यांचा महिमा जाणला. सन १८७०च्या सुमारास बाबा मशिदीत वास्तव्यास राहू लागलें. पुढें १८७३मध्ये बीडकर महाराज, त्यानंतर गंगागीर व १८८०मध्ये आनंदनाथ महाराजांनी जनमानसांत त्यांची प्रतिमा उजळण्याचे कार्य केलें. त्याच साली, बाबांनी मशिदीत दीपोत्सवाचाही चमत्कार केला. त्याआधी १८७८ साली श्री स्वामी समर्थांनी समाधी घेतली आणि हळूहळू साईनाथ ही सिद्धशक्ती शिरडीत प्रकाशमान झाली. याच काळांतील बाबांच्या प्रमुख भक्तमंडळींत म्हाळसापती, काशीराम,कोते दाम्पत्य,डेंगळे बंधू, माधवराव आदींचा प्रकर्षाने उल्लेख केला पाहिजे. नंतर १८९२ पासून नानासाहेब चांदोरकर, दासगणू शिरडीत बाबांच्या दर्शनास येऊ लागले आणि त्यांनी सर्वथा बाबांची कीर्ती दूरदूरपर्यंत पोहोचवण्यांत अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. १९०५ नंतर श्री साईभक्तीचा महाप्रवाह महाराष्ट्रात आणि भारत देशात वेगानें वाहू लागला. तर आजमितीला शिरडी संस्थान हे पूर्ण विश्वातील असंख्य साईभक्तांचे श्रद्धास्थान झाले आहे. 


क्रमश: 


Feb 24, 2020

श्री गजानन विजय दैनंदिन ओवी स्वाध्याय चिंतन अध्याय - १ ( ओवी ३४ ते ४१ )


।। श्री गणेशाय नमः ।।

१/३४ संत हेच भूमिवर | चालते बोलते परमेश्वर |

वैराग्याचे सागर | दाते मोक्षपदाचे ||

१/३५ संत हेच सन्नीतीची | मूर्ति होय प्रत्यक्ष साची |

संत भव्य कल्याणाची | पेठ आहे वोबुध हो ||

श्री गजानना! भगवंता! या शेगाव - विदर्भ नगरीचे भाग्य उदयाला आले आपल्या अवतार रूपाने. तुझ्या दर्शनाने मन कसे आनंदाने भरून गेलें आहे. तुझी अपार शक्ती जाणण्याच्या पलीकडे आहे. तुझ्याकृपेशिवाय का अंतर्मन हातात लेखणी घेऊन तुझे गुणगान करायला सिद्ध झाली असावी. देवा ! ज्ञानदाता तर तूच आहेस ना ? तुझ्या नामाचा ध्यास आणि तुझा वास चित्तात आहेच पण तो कळावा, जाणावा, समजावा, साधावा व त्याची ओळख पटावी म्हणून हे मागणे बरें ! भक्ती ही ज्ञानाच्या अनुषंगाने केली, तरच तो भगवंत भेटेल आणि या नरदेहाचे सार्थक होईल. पण मी तर अज्ञानी. पण तुझी कृपा अगाध आहे. सद्भाग्याने ती झाली की पांगळा मनुष्य सुद्धा लीलया उंच पहाड उल्लंघून जातो, म्हणून तुझे नामस्मरण वा गुणगान करण्यासाठी केवळ ज्ञानच लागते असे नाही तर शुद्धभाव हवा, प्रेम हवे, भक्ती हवी. तेवढी मनात जागृत कर देवा. तुझी शक्ती एवढी महान आहे की माझे हे मागणे फारच साधे आहे. तुझी कृपा झाली तर मुका सुद्धा अस्खलित भगवंत चिंतन करू शकतो.

देवा आम्हाला तुझे निर्गुण रूप नाही समजणार, म्हणूनच तू सर्वसामान्य मनुष्याच्या सगुण रुपात प्रगटला. संतरूपाने आपण अवतीर्ण झालात. संत हेची देव. तर असे हे चालते बोलते परमेश्वर आणि हा  अनुभव शेगांवकर भक्तांना आला, कारण आपली वैराग्यपूर्ण जीवनलीला फार काही देऊन गेली व आजही देत आहे भक्तांना. तू एका मुठीतून भक्ती दिली तर लगेच दुसऱ्या मुठीतून जीवनमुक्तीचा लाभ घडवून आणला भक्तांच्या जीवनात. अनेक भक्तांना सरळ मोक्षपदी पाठविले. त्यांची या मृत्यू लोकातील येरझार संपविली. धन्य आहे देवा. तुझी धर्मभावना, तुझे साधे सरळ निर्मळ सात्विक जीवनविषयक तत्वज्ञान, समाजसुधारण्याची प्रवृत्ती, सामान्य जनाच्या देवावरील भावना दृढ करण्यासाठीकेलेले अथक प्रयत्न लपून का राहिले?

मायलेकराचे नाते लपून राहात नाही, ते शब्दांत व्यक्तही करावे लागत नाही. या नात्यात प्रेमाचा उमाळा हा सहज व उत्स्फूर्त असतो. विशेष म्हणजे हा प्रेमाचा झरा कधीही,कोठेही, कुठल्याही प्रसंगी आटत नाही. खरा संत समाजाची आई होतो, म्हणून लोक संताना मान देतात, त्यांच्या चरणकमलांचे दर्शन घेतात.

संत हेच या पृथ्वीतलावरील चालते-बोलते परमेश्वर आहेत. संताचे दर्शन बाह्यरूपाने घेऊन फसणारे नागरिक शेगांवचे नव्हते. संतत्व हे प्रवृत्तीत आहे, वागणुकीत आहे, वैराग्यात आहे. महाराजच जाणोत की वैराग्यपूर्ण जीवन जगावे कसे आणि त्याची अनुभूती भक्तांना द्यावी कशी? एक तर शेगावचे लोक भाग्यवान असावेत किंवा प्रथम दर्शनातच महाराजांनी त्यांच्या आध्यात्मिक शक्तीने त्यांचे अंतर्मन जागृत केले असावे. महाराजांनी भक्तांवर निर्हेतुक प्रेम केले, सर्वांशी समत्व भावाने वागले, आपल्या आशीर्वादाने सर्वांची अंत:करणे ईश्वरप्रेमाने भरून टाकलीत. भक्तांच्या कल्याणाचा मार्ग महाराजांनी परोपकारातून उन्नत केला. बत्तीस वर्षं शेगांवात भक्तांचे धारण,पोषण व संवर्धन करणारे प्रती-ईश्वर होते महाराज.

आपल्या निस्सीम भक्ताला मोक्षपद बहाल करून त्याच्या नरदेहाचे सार्थक केले. असे हे शेगावंचे भक्त व त्यांना लाभलेले हे महाराज. उलट आम्ही भक्त, भक्तीचा, ज्ञानाचा केंव्हा अहं येईल हे नाही सांगता येणार. कदाचित देव आम्हाला समजलाच नसेल, त्याचे अस्तित्व जाणवले नसेल, तो कोठे राहतो हे कळले नसेल. आम्ही आम्हालाच धोका देत बसतो. मग कसा भेटेल तो सत्य परमेश्वर आम्हाला? शेगावंचे साधे भोळे, प्रामाणिक भक्त महाराजांना शरण गेलेत, पूर्ण विश्वास ठेऊन त्यांच्यावर. आज शेगाव संतनगरी ही श्रींच्या वास्तव्याने भक्त कल्याणाची प्रसिद्ध पेठ बनली. त्यामुळेच विश्वातील अनंत भक्त आवर्जून या पेठी येऊन भक्तीचा स्वानुभव घेऊन धन्य होतात. आपापल्या देशी सुख समाधानाने निघून जातात, जय गजानन श्री गजानन म्हणत म्हणत. परत श्रीदर्शन वारंवार जीवनात लाभत राहावे, ही शुभ भावना ठेऊन.

१/३६ त्या संतचरित्रास | श्रवण करा सावकाश |

आजवरी ना कवणास | संतानी या दगा दिला ||

आदर्श तत्त्वज्ञान जीवनात उतरविणारी, स्वत: त्याबरहुकुम वागणारी विभूती श्रेष्ठ ठरते, अनुकरणीय असते. संताचे आदर्श जीवन त्यांना जनमानसात, विश्व कल्याणार्थ रुजवायचे असते. त्यासाठी करावा लागतो स्वार्थत्याग व जगावे लागते समर्पित जीवन. त्यासाठी ते लोकांच्या भावविश्वात विरघळून जातात, त्यांच्या पैकी एक होतात, त्यांची भाषा आत्मसात करतात, त्यांना भावेल त्या रुपात, वेशात अवतीर्ण होतात. आणि आपले दिव्य विचार त्यांच्या मनाला भावतील अशा माध्यमातून या भोळ्याभाबड्या लोकांच्या मनात प्रवेश करतात तो कायमचा.

" संतापरते दैवत नाही ज्या चित्ती | तोची एक पूर्ण स्थिती ब्रह्मज्ञानी |

संत तोची देव जयाची वासना | एका जनार्दनी भावना नाही दुजी || "

म्हणून या ओवीत संतकवी दासगणू महाराज लिहितात- वाटते तेवढें समजायला संतचरित्र सोपे नसतें, समजलें तरी अनुकरण करणे कठीण जाते, म्हणून ते मनापासून, शांत मनाने सावकाश हळू हळू वाचा. त्यावर चिंतन करा. दररोज तेच तेच वाचा, जोपर्यंत त्याचा अंगिकार जीवनात होत नाही. म्हणून पारायण असतात बरं ! संतावर, देवावर विश्वास, श्रद्धा असावी लागते, शरणागतीचा भाव ठेऊन जीव त्यांना अर्पण करावा लागतो, मीराबाईसारखे प्रसंगी लोकप्रवाद झेलत झेलत सेवा करावी लागते.मग स्वानुभव प्राप्त होतो

“आजवरी ना कवणास | संतानी या दगा दिला ||”

तुकोबारायांना ही किमया फार अप्रतिम साधली बर ! त्यांनी माध्यम निवडलें ते अभंग गायन–कीर्तनाचे. खऱ्या अर्थाने ज्ञानाचे समाजीकरण जर कोणी केले असेल तर ते देहूच्या तुकोबारायांनी. तसेच कार्य विदर्भात गुरुमाऊली योगी श्री गजानन महाराज यांनी शेगाव येथे अवतीर्ण होऊन आपल्या जीवन चरित्रातून लोकांसमोर ठेवले आणि अठरा पगड जातीला एका भक्तीसूत्रात न कळत केंव्हा बांधले व त्यांना पंढरपुरच्या पांडुरंगाचा मार्ग कसा व केंव्हा प्रशस्त केला हे कळलेही नाही आणि जाणवलेही नाही, मिळाला तो फक्त जीवनानंद. थोडक्यात आमच्या गुरुमाऊलीने संतज्ञानातून अध्यात्मिक तत्वज्ञांनाचे सुलभीकरण करून हे ज्ञान-विज्ञान, भक्ती या नावाने समाजातील सर्व पातळीवर प्रतिष्ठित केलें, आपल्या उघड्या-नागड्या जीवनातून पारदर्शकपणे लोकासमोर ठेवलें असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. भारतातील धर्मपरंपरा ही विवेकनिष्ठ विचारांची व लोककेंद्री ज्ञानसंपादनाची राहिली आहे, हे येथे सांगणे न लगे.

“ संतचरण वंदुनी तत्वता | सायुज्य मुक्ती माथा पाय देऊ |

थोरीव थोरीव संताची थोरीव | आणिक वैभव काही नेणे ||”

धर्मज्ञान हे सुसंस्कारीत जीवन व मुक्तीसाठी आवश्यक समजून संतानी ते आपल्या परीने जनसामान्याच्या दारात नेले व ही संस्कृती विस्तारित करून जनमान्य केली व त्यांच्या गळी सहजतेने उतरविली अवतारी श्री गजानन महाराजांनी. म्हणून आज आम्ही त्यांच्या चरणी नतमस्तक होतो व “अध्यासन केंद्र” संकल्पना स्वीकारतो. मानवी जीवन सार्थकी लावण्याच दैवी कार्य विदर्भात श्रींनी साध्य केले व विश्व जनकल्याण साधले. विश्वात शांती टिकवून सहजीवन व बंधुभाव दृढ केला, हे आज विश्वसंमत विश्वमत आहे.

१/३७ ईश्वरी तत्वाचे वाटाडे | संत हेचि रोकडे |

अमोघ ज्ञानाचे ते गाडे | भरले असती प्रत्यक्ष ||

१/३८ संतचरणी ज्यांचा हेत | त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत |

आता मलरहित करा चित्त | गजाननचरित्र ऐकावया ||

प्रपंचाचे तत्त्व शिकविणारी एखादी शाळा शोधणारा संसारी मनुष्य तुम्हाला भेटला आहे का? नसेलच भेटला. जन्मत:च त्याला ते ज्ञान देणारी फौज सज्ज असते. पण प्रपंच म्हणजे सर्वस्व नव्हे. मन:शांती साठी त्याची धडपड सुरूच असते. तो मंदिरात गेला, साधना केली, ध्यान केले की जरा बरे वाटते. संसारातील दु:ख, संकट, द्वेष, लोभीपणा सोसता सोसता तो मेटाकुटीला येतो. यावेळी नशिबाने कोणी सज्जन भेटला तर भगवंताच्या कथा ऐकून आधार वाटतो. पण हा आधारकर्ता दिसत नाही, भेटत नाही पण चाहूल तर निर्माण होते मनात काहीतरी घडतंय याची. त्यालाच तो ईश्वर या नावाने ओळखायला लागतो. सद्भाग्याने प्रपंचातून ईश्वराकडे घेऊन जाणारा दुवा लाभला तर संसाररूपी नौका सुखरूप पैलतीरावर वाट पहाणाऱ्या भगवंताला भेटून कृतकृत्य होते. असे जो कुणी हे घडवून आणतो तो कुणीतरी हेच आमचे संत असतात. मलरहित चित्त करा, असे म्हणून ते होणार नाही, तर गजानन चरित्राचे बोल ऐकायला आले की मनाचा भाव आपोआप बदलतो. चित्त निर्मल होत. स्वभाव जाऊन परमात्मभाव उदयाला येतो. नवविधा भक्तीच्या आधारावर व आपल्या भक्तीच्या जोरावर त्यांना परमेश्वर भेटतो. पण तो परमेश्वर इतरांनाही भेटावा, अशी कळकळ ज्यांना असते तो संत. " बुडते जग न देखवे डोळा " अशी त्यांची अवस्था होते. संतांचे कार्य एका दिशेने स्वार्थ रहित निर्मोही मनाने होत असते, त्यांचा भाव असतो संसारातील मनुष्याला परमेश्वर जाणता यावा, सुखाचा प्रपंच करता करता जीवनात ईश्वरभक्तीद्वारे शांतीचा अनुभव घेत घेत, अध्यात्म आणि परमार्थ जाणता यावा म्हणून तो सामाजात राहून डोळसपणे कार्यरत असतो.

“ ईश्वरी तत्वाचे वाटाडे | संत हेचि रोकडे | ” असे म्हणणाऱ्या दासगणू महाराजांना स्पष्ट हेच सुचवायचे आहे की या भूतलावर परमेश्वराने जगाच्या उद्धारासाठी अनेक अवतार घेऊन भक्तांचा उद्धार केला. जसे श्रीराम प्रभू, दयाघन श्रीकृष्ण तसेच सगुण रूप घेऊन विश्वात्मक मानवतेद्वारे शांतीचा आणि ईश्वर प्राप्तीचा आपल्या जीवनचरित्रातून संदेश देणारे शेगांवचे श्री गजानन महाराज होत. त्यामुळे श्रींचे जीवन चरित्र मनाला भिडते, जसे संत तुकोबारायांचे अभंग. ’ तुज आहे तुजपाशी | परि तू जागा चुकलासी || ’

१/४० जंबूद्वीप हे धन्य धन्य | आहे पहिल्यापासोन |

कोणत्या सुखाची ही वाण | येथे न पडली आजवरी ||

१/४१ याचे हेच कारण | या भूमीस संतचरण |

अनादि कालापासोन | लागत आले आहेत की ||

भारतखंडात सुखाची वाण कधीही पडली नाही कारण या भूमीला अनादी कालापासून अनेक संत व संतवाङ्मयांची वाण पडली नाही. संत लाभले की सत्संग घडतो, सत्संगातून आत्मज्ञान होतें, आत्मज्ञानातून तो भगवंत कळतो. या आपल्या आत्म्याद्वारे परमात्म्याशी एकात्मता साधता येते. द्विधा मनस्थिती असली की ईशतत्त्वाचा आधार तुटतो, आणि ईशतत्त्व म्हणजे सत्य व्यवहार ! तो संपला की भगवंत आपल्याला सोडून देतो आपल्या कर्मावर. मग आपल्या हातून घडतो अनाचार आणि त्याचीच आपण पाठराखण करतो स्वार्थापोटी. नीतीहीन समाजात अनागोंदी माजते. पण जेथे संत अस्तित्व आहे, तेथे सदाचार घडतो. समाजाची नितीमत्ता, अध्यात्मिकता, शांती, सलोखा, सद्भाव, सहकार्य, एकसंधपणा, समत्वभाव, बंधुभाव हे संतसहवासात वृद्धिंगत होतात. संतांमुळे लोकजीवन उन्नत होते, सत्वशीलता टिकून राहते. सत्शीलतेने लोक नांदतात. अपकारापेक्षा परोपकाराने जीवन जगणारे अधिक असतात. त्यामळे समाज आत्मसुखाचा अनुभव घेतो आणि धन्य पावतो हे सत्य आहे. भरत खंडात संत अस्तित्व व संतवाणी प्रखर होती, म्हणून असे घडले हे नाकारून चालणार नाही.

या संतामुळेच भारत आध्यात्मिक दृष्ट्या आघाडीवर होता व पुढेही राहील. जोपर्यंत संत महात्म्य आहे तोपर्यंत भारत जगज्जेता व जगाचा स्वामी राहील. म्हणूनच भारताने अनंत काळापासून “ संत तेथे सुख ” हा अनुभव घेतला, हा इतिहास नाकारून चालणार नाही. संत तेथे कल्याण, संत तेथे अध्यात्म, संत तेथे लक्ष्मी, संत तेथे उन्नती, संत तेथे सद्भाव, संत तेथे सौंदर्य, संत तेथे उदारता असा हा संत महिमा आहे ज्याचे तुम्ही मी सक्षम वारस आहोत. ईश्वर आराधनेतून सुनिती व सन्मार्ग सापडतो. म्हणून संत हे आमचे खरे वाटाडे ठरतात. विदर्भातील शेगाव नगरी भगवंताने अवतार घेतला श्रींच्या रूपाने व परिसराचा कायापालट झाला. या अवतारात त्यांनी षडरीपुनी ग्रासलेल्या समाजाला अहंकार, चिंता, मीपणा, प्रपंच, विवंचना यातून मुक्ती दिली.

त्यासाठी गुरुवरील श्रद्धा जपा व चिंतामुक्त होऊन त्याच्या आधारे निर्धास्त जीवन जगा. तो तुमची काळजी वाहतो. स्वामी स्वत: आपला कार्यभार आनंदाने उचलतात कारण तुमचा अढळ विश्वास असतो- ‘ महाराजांच्या मर्जी प्रमाणे जगतोय झाले, तो आहे ना माझी चिंता वहायला, झाले तर मग.’ जय गजानन.

।। श्री गजानन महाराजार्पणमस्तु ।। 


सौजन्य : श्री गजानन आचार्यपीठ


Feb 22, 2020

श्री गजानन विजय दैनंदिन ओवी स्वाध्याय चिंतन अध्याय - १ ( ओवी २२ ते ३३ )



।। श्री गणेशाय नमः ।।


आणि आपण पहात आहोत की श्री दासगणू महाराज अनेक देव देवतांना वंदन करतात, संत चरित्र सुगमपणे गायची पात्रता मागतात.

 १/२२ माझ्या कुळीची कुलदेवता| कोल्हापुरवासिनी जगन्माता |

 तिच्या पदी ठेवितो माथा | मंगल व्हाया कारणे |

१/२३ हे दुर्गे तुळजे भवानी | हे अपर्णे अंबे मृडानी |

ठेवी तुझा वरदपाणी | दासगणूच्या शिरावर |

१/२४ आता वंदन दत्तात्रेया | पाव वेगी मसी सदया |

गजानन चरित्र गाया | प्रसादासह स्फूर्ति दे |

आपल चरित्र गायनाचे कार्य सफल व सुफळ व्हाव यासाठी दासगणु आपल्या कुलदेवतेला , कोल्हापूरच्या लक्ष्मी मातेला जनमंगल व्हावे म्हणून तिच्या पायावर आपले डोके ठेवतात. तुळजापूरच्या भवानी मातेचे, दुर्गामातेचे, अंबादेवीचे स्मरण करतात आणि विनवणी करतात शक्ती मातेला की तुझ्या आशीर्वादाशिवाय हे दिव्य कार्य माझ्या हातून घडणे नाही, म्हणून तुझे कर माझ्या डोक्यावर ठेऊन मला वर दे, आशीर्वाद दे.

दत्तात्रेयाच चिंतन, स्मरण करून त्या शक्तीलाही आवाहन करायला दासगणु विसरत नाहीत. दत्तत्रेया, मला प्रसाद दे अशी विनवणी करतात. त्या आशीर्वादरूपी प्रसादामुळेच मला स्फूर्ती प्राप्त होईल श्री गजानन विजय ग्रंथ लेखन कार्य करण्यासाठी. हा ग्रंथ जनकल्याणार्थ माझ्या हातून पूर्ण होवो जेणेकरून समाजातील सर्व सामान्य जनतेला आपले आध्यात्मिक अस्तित्व गवसेल आणि तो भक्ती मार्गाकडे मनापासून आपसूक खेचल्या जाईल. फार ज्ञानी, विद्वान, वेदपंडीत नसला तरी आपला सर्व सामान्य संसार नेटका करून त्याला या भक्ती मार्गावर पादाक्रांत होता येईल. जन्मत: ऊन्नत व सात्विक बनेल. सहयोग, सुख,समाधान,शांती नांदेल. समाज एकदिलाने समरस होईल व परोपकाराच्या भावनेतून जीवन जगायला शिकतील ते या साधूच्या चरित्र गायनातून, पारायणातून. हे स्वप्न आज पूर्णत्वाला जात असल्याचे दृष्टीगोचर होत आहे. श्री गजानन महाराजांना सुद्धा भारत आध्यात्मिक जगाचा पुन्हा नायक व्हावा व सूत्रे असावीत सर्वसामान्य जनतेच्या हातात, म्हणून हा भाव श्रींनी दासगणू महाराजांच्या मनात निश्चितच संक्रमित केला असावा. त्यामुळेच ते आपल्या कार्यात यशस्वी ठरलेत. दासगणू महाराजांनासुद्धा या जनतेला सत्याच्या वाटेवर खांद्यावर पताका घेऊन रस्त्याने ताठ मानेने व “ राम कृष्ण हरीचा ” जप मोठ्याने न लाजता चालत जाणारे भक्त श्रींना निर्माण करायचे आहेत व ते बळ आज फक्त श्री गजानन महाराजांत आहे हे दिसत असावे. त्यांच्या सामर्थ्याने त्यांचे डोळे दिपून गेले होते. त्यातूनच समत्वाची, एकात्मतेची, एकत्वाची, समन्वयाची परिस्थिती देशात निर्माण करणे शक्य होते हेही त्यांनी श्रींकडे बघून मनोमनी जाणले असावे आणि हे श्रींचे मनोगत व्यक्त करावयाचे होते श्री विजय ग्रंथातून, विजयी भावनेने म्हणून सर्वच देव देवतांना ते आवाहन करीत आहेत. प्रार्थनेतून आशीर्वाद मिळवीत आहेत. हाच भाव व क्रांतिकारी दृष्टी असावी तेंव्हाच्या श्री गजानन महाराज संस्थानच्या शिस्तबद्ध कार्यरत असणाऱ्या चालक वर्गाची. त्यामुळे त्यांचे मोठेपण नजरेआड करून चालणार नाही. त्यांचे ऋण मान्य न करता पुढे सरकणे हा कृतघ्नपणा ठरेल, हा अपराध ठरेल.

१/२५ आता शांडील्यादि ऋषीश्वर | वशिष्ठ गौतम पाराशर |

ज्ञाननभी जो दिनकर | त्या शन्कराचार्या नमन असो ||

देवादिकांच्या आशीर्वादानंतर ऋषी, मुनी, यांच्या चरणी आता दासगणू विनम्र भावाने नमन करतात. ते शांडील्यऋषी, वशिष्ठ, गौतम, पाराशर यांना तर शरण जातातच , पण जो ज्ञाननभातील सूर्य आहे त्या शंकराचार्यांना नमन करायला विसरत नाहीत. या सर्वांना स्मरून त्यांच्या चिंतनातून प्रेरणा घेऊन त्यांच्याच आशीर्वादाने श्रींचे चरित्र मनापासून जनकल्याणार्थ गायचे आहे. त्यासाठी या सर्व ऋषी, मुनी, साधू, संत व त्याचे शिष्य-उपासक याना एकत्र आणून, सर्वांच्या प्रेरणेतून प्राप्त होणारे काव्य प्रगट करायचे आहे. दुसरा भाव हाही असू शकतो, एकमुखाने ह्या चरित्र लेखनाला सहाय्य्य प्राप्त झाले तर एक शक्ती त्यातून निर्माण होईल आणि अध्यात्मात एकसुरीपणा आणता येईल. आज या चरित्राच्या प्रभावामुळे व श्रींवर असलेल्या श्रद्धेपोटी समाज मन एक झाले आहे, समाजात एकात्मभाव,बंधुभाव निर्माण होताना दिसतो आहे. श्री गजानन महाराज गुरु तर त्यांचे सर्व भक्त हे एकमेकाला गुरुबंधू म्हणून संबोधतात. तोच भाव श्री दासगणू महाराजांना साध्य करायचा होता. या संत चरित्रातून आज तो साधला जात आहे. हे पाहून निश्चित वाटते दासगणू केवळ संतकवीच नव्हते तर ते एक द्रष्टे होते.

१/२६ आता अवघ्या संतमहंता | नमन माझे सर्वथा |

दासगणुच्या धरुनी हाता | ग्रंथ करवा लेखन ||

१/२७ गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर | श्रीतुकाराम देहूकर |

हे भवाब्धीचे तारू थोर | त्या रामदासा नमन असो ||

१/२८ हे शिर्डीकर साई समर्था | वामनशास्त्री पुण्यवंता |

दासगणूसी अभय आता | तुमचे असो द्या संत हो ||

आई ज्या मायेने,प्रेमाने,आस्थेने बालवाडीत जाणाऱ्या लहान बाळाचा हात धरून त्याला अक्षरें गिरवायला शिकविते, तसेच मोठ्या लडिवाळपणे दासगणू अवघ्या संतमहंताना नमन करतात. “दासगणुच्या धरुनी हाता | ग्रंथ करवा लेखन ||” मी तर निमित्तमात्र आहे, आपण माझ्याकडून जे लिहून घेणार आहत तेच भावपूर्ण शब्द उमटणार आहेत कागदावर. केवढा हा विश्वास व लीनता.

हे नमन घडत असतांनाच त्यांना स्मरण होते ते गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, श्रीज्ञानेश्वर महाराज, | श्रीतुकाराम महाराज, समर्थ श्रीरामदास महाराज, शिर्डीचे साईबाबा,वामनशास्त्री या पुण्यवंतांचे. दासगणू म्हणतात, संत हो, मला अभयदान द्या. आता त्याशिवाय माझ्याकडून लिखाण नाही होऊ शकणार. “ तुम्हा अवघ्यांच्या कृपेने | मी हे करीन बोलणे ” दासगणू महाराजांचा बालभाव जागृत होतो आणि ते शरणागत होऊन म्हणतात- मला तुमचे तान्हे बाळ समजून कठोर होऊ नका, पदराखाली घ्या, सांभाळ करा.

संतकवी दासगणू चरित्र लेखन पूर्णत्वाला जावे म्हणून प्रथम देवादिकांना शरण जातात, नंतर ऋषीमुनींची सहाय्यासाठी विनवणी करतात. एवढे त्यांना पुरे वाटत नाही म्हणून की काय ते आता साधू-संताना शरण जात आहेत आणि बालवत नम्र होऊन संत कार्य पूर्ण होणे कसे समाजहितासाठी गरजेचे आहे हे संतांच्या मांडीवर बसून प्रेमाने सांगत आहेत. दासगणू हे सारखे एकीकडून दुसरीकडे का फिरत आहेत? त्यांचा कुणा एकावर विश्वास नाही का? अध्यात्मात तर एका वर श्रद्धा व विश्वास ठेऊन निर्धास्त होणे हा मार्ग अनुसरावा असे सांगितले आहे ना? मग सकाळी एका देवाच्या देवळांत, दुपारी दुसरा, सायंकाळी तिसरा देव पकडायचा आणि रात्रीला परत वेगळ्याच देव मंदिरात जायचे असे करणारे अनेक भक्त आपण समाजात बघतो. हे त्यांचे वागणे बरे नाही, असेही म्हणतो तर मग दासगणू असे का करीत असावेत ? यावर चिंतन केले की सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात माझ्या मनात. याचे झाले असे असावे की संतचरित्र परिपूर्ण व्हावे ही तर दासगणू महाराजांना प्रखर इच्छा आहेच. म्हणून ते देवाला साकडे घालतात. पण देव फार प्रखर व अंतिम निर्णय देणारे, चुकल्यास शिक्षा करणारे प्रखर न्यायाधीश आहेत. तेथे तुमचे सत्कर्म असेल तर लगेच बक्षिस, कुकर्म असेल तर तसे फल देऊन देव त्वरेने मोकळा होतो. ऋषी मुनी हे तप करणारे. रागीट, शाप देणारे, तेंव्हा आपले काही चुकले तर येथे माफी नाही म्हणून शेवटी त्यांना संतांची आठवण होते. संत हे दयाळू, खट भक्तालासुद्धा समजून घेऊन त्याला परत नीट मार्गावर आणणारे मायाळू. शिक्षा न करता त्याला सुधारण्याची संधी देणारे हे संत असतात, ह्याची दासगणू यांना आठवण झाली असावी. म्हणून सर्वसमावेशक संताना आपण शरण गेलो की आपले काम शंभर टक्के यशस्वी होणारच, हा भाव त्यांचे मनात जागृत झाला असावा.  यामुळेंच ते संत चरणी प्रेम भावाने लीन होतात. या जगात मोठेपणापेक्षा स्वत:कडे लहानपण घेणे चांगलें. तुकोबारायाही असेच म्हणतात. मला मुंगीपेक्षा लहान राहू दे. “ लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा ” मुंगीला कुणाच्याही पोत्यात शिरुन साखर खायला मिळते. हत्ती मोठा खरा पण अंकुशाचा मार खावा लागतो.उंचावर राहतो त्याला सतत वादळाला तोंड द्यावे लागतें. लहानपण अंगी असले, म्हणजे कोणी हेवा करीत नाही. तुकाराम महाराज ही प्रतिमा योजून लहान पणातल्या नम्रत्वाची उंची गाठतात. हीच मुंगीची प्रतीमा आणखी एका अभंगात येते. “ मुंगी होऊन साखर खावी | निजवस्तूची भेटी घ्यावी “ निजवस्तू साठी मुंगीहून लहान व्हावे, नम्र व्हावे. ज्ञानेश्वरीतही धाकटेपणाचा गौरव केला आहे. तसे धाकुटे बनून दासगणू संत चरित्र लिहू इच्छितात म्हणून शरणागतीचा भाव स्वीकारतात.

१/३३ आता श्रोते सावधान | संतकथेचे करा श्रवण |

करोनिया एकाग्र मन | निजकल्याण व्हावया ||

दासगणू महाराजांनी प्रत्यक्ष श्री गजानन महाराजांचे दिव्य चरित्र लिहिण्या आधी ३२ ओव्यांचे नमन करून, ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे अशा संतांची संगती करावी हा भाव उमटला. म्हणून त्यांनी श्रींचा अंतर्मय नाम जप करून स्वत:ला गजाननमय करून घेतले. श्री तुकोबारायांनी जन कल्याणासाठी अतिशय चंचल व विकारी मनाचा निग्रह करण्यासाठी तर्कशुद्ध व सिद्धांतस्वरूप असा मनोबोध केला तो असा-

“ तुका म्हणे संग उत्तम असावा | याविण उपावा काय सांगो ||’’

चांगल्या संगतीने जीवन सुखमय, आनंदी व उत्तम घडते. जीवन घडविण्यासाठी संगत चांगली असावी लागते. ती सापडते प्रारब्धाने, प्राप्त झालेल्या गुरुकृपेने व उत्तम आध्यात्मिक संस्काराने. म्हणून देवाकडे सतत प्रार्थना करावी, इच्छा करावी ती संत्संगतीची व त्यासाठी प्रयत्नशील राहावे. “ करी संतांचा सायास ”. मन स्थिर होण्यासाठी याचा फार उपयोग होतो. दासगणूंना आता अंतर्बाह्य श्रीच दिसायला लागले, भासायला लागले. विश्वात सर्वत्र त्यांना श्रीच दिसायला लागलेत. असा पूर्ण श्रींचा ध्यास घेतल्या नंतर मुखातून शब्द आलेत “आता”. ही मानसिक भूमिका तयार झाल्यानंतर आता संतकवी श्रोत्यांना सावधान व्हायला सांगतात. सावधान व्हायचं ते कशासाठी तर संतकथा ऐकण्यासाठी.

संतकथा श्रवण करायची म्हटली की भक्ताला प्रबळ व प्रभावी इच्छा व्हावी लागते, त्याच मन आतुर असले पाहिजे तर तो एकाग्र चित्त होऊन शांत मनाने मनात साठवेल व त्यावर मनन चिंतन करेल. बरं एवढ सगळ करून ऐकल तरी प्रश्न उरतोच, कशासाठी ऐकायची संतकथा? “निजकल्याण व्हावया ||” दासगणू महाराज उत्तर देऊन मोकळे झाले. माझ निजकल्याण कशात आहे? दिखाऊ वृत्तीने श्री दर्शन घ्यायचं, इतरांना मी किती धार्मिक आहे दाखवून देण्यासाठी दर्शनाच नाटक करायचं, व्यापारात नफा व्हावा, संतती, संपत्ती, सत्ता लाभावी व आरामदायी जीवनात चैन करता यावी, दुसऱ्याला गुलाम समजून त्याचा छळ करून त्याचेकडून सेवा करून घ्यावी, यांत माझे खरच निजकल्याण आहे का? हा विचार ज्या दिवशी मनात येईल त्यादिवशी निजकल्याणार्थ संतकथा ऐकणे होईल, त्याला प्रत्येक आत्म्यात परमात्म्याचे दर्शन होईल, दुजाभाव संपेल. मी-तू हा भाव संपेल.आणि खऱ्या अर्थाने “निजकल्याणासाठी” वा मुक्तीसाठी कथा ऐकण्याचा भाव निर्माण होईल. आणि ते नरदेहाचे खरे सार्थक ठरेल. भगवंतप्राप्ती होऊन पुन:र्जन्म संपेल. हेच मन:शक्तीचे चिंतन व त्यातूनच लाभणार मन:शांती. अशा श्रवणातून निजकल्याण साधेल. जसे जनाबाई म्हणते- चराचरी जे दिसते, ते अविद्यामायेमुळे. खरा तो देवच आहे. मुक्ताईने शून्यामध्ये विठ्ठल पहिला तर जनाबाईने विठ्ठलात “सोहं” पाहिला. तोही पुढे नाहीसा झाला

“ नामयाची जनी निजवस्तू झाली | अवघ्यासी बुडाली परब्रह्मी ||" अशी जीवमुक्त दशा तिला प्राप्त झाली. सहजपणे ती “ तत्वमसि ” म्हणजे तो परमेश्वर पांडुरंग तूच आहेस या परमज्ञानाप्रत पोचली. सगुण-निर्गुण ही दोन्ही तत्त्वे एकच आहेत, याची तिला खात्री पटली. संतकथा या भावाने श्रवण केली की निजकल्याण होते ते असे.

।। श्री गजानन महाराजार्पणमस्तु ।। 


सौजन्य : श्री गजानन आचार्यपीठ


Feb 20, 2020

श्री गजानन विजय दैनंदिन ओवी स्वाध्याय चिंतन अध्याय - १ ( ओवी १ ते २१ )


१/१ ।। श्री गणेशाय नम: ।।

जय जयाजी उदारकीर्ती | जय जयाजी प्रतापज्योती ||

जय जयाजी हे गणपती | गौरीपुत्रा मयुरेश्वरा ||

ग्रंथारंभी नमन करण्याचा प्रघात आहे वैदिक तत्वज्ञ संतांचा. याला अनुसरूनच श्री गजानन विजय ग्रंथाचे लेखक ह.भ.प. संतकवी श्रीदासगणू महाराज श्री गणेशाचे नमन करून ग्रंथाच्या प्रथम अध्यायाचा शुभारंभ करतात. जय जय का? तर त्याचे उत्तर आहे पहिल्या अध्यायाच्या ३ ऱ्या ओवीत.

१/३ तुझ्या कृपेची अगाध शक्ती / विघ्ने अवघी भस्मे होती //

कापुसाचा पाड किती / अग्निपुढे दयाघना //

१/४ म्हणून आदरे वंदन / करीतसे मी तुझ्या चरणा //

सुरस करी पद्य रचना / दासगणूच्या मुखाने //

ग्रंथ लेखन कार्यात कुठेही विघ्न येऊ नये, म्हणून त्या विघ्नहर्त्या गणपतीलाच साकडे घालत असावेत दासगणू महाराज. पण ओवीचा ध्यास घेऊन अधिक चिंतन केलें तर माझे लक्ष्य केंद्रित झाले तुझ्या कृपेची अगाध शक्ती - तुझ्या चरणांवर. आणि अंतरंगात शब्द उमटले तुझ्या कृपेची म्हणजे श्री गजानन महाराज कृपेची. आणि भाव निर्माण झाला श्री दासगणू महाराजांना अवतार रुपी श्री गजानन महाराजांच्या सामर्थ्यापुढे नतमस्तक व्हावयाचे असावे. श्रींच्या कृपेची याचना करताना त्यांना जाणवले असावे ते हे की श्री गजानन महाराजाची आत्मिक शक्ती फार मोठी आहे. त्यांच्या श्रीनामाचा एकदा जरी उच्चार केला किंवा न कळत घडला तरी जीवनात विघ्न हे येऊच शकणार नाही. हा महिमा आहे संत कृपेचा आणि प्रसाद आहे श्री गजानन विजय ग्रंथ. अग्निपुढे कापूस जसा सामर्थ्यहीन होतो त्याच नम्रभावाने ग्रंथकर्ते श्रीचरणी लीन हे श्रीचरणी लीन होऊन केलेले वंदन हे निश्चितच फलदायी होते, म्हणून सुरस पद्यरचना घडावी यासाठी दासगणू श्रींची करूणा भाकत आहेत, शरणागतीचा भाव व्यक्त करतात असे वाटते. म्हणून स्वत: कडे जागृत होऊन कमीपणा घेतात, जेणे करून अहं निर्माण होणार नाही म्हणून विनवणी करतात माझ्या हातून तुझे चरित्र लेखन यशस्वीपणे पूर्णत्वाला जाऊ दे.

१/५ मी अज्ञान मंदमती / नाही काव्यव्युत्पत्ति /

परी तू वास केल्या चित्ती / कार्य माझे होईल हे //

देवाचा शोध घ्यावा तरी कोठे? तो परमात्मा तर प्रत्येकाच्या आत्म्यातच सदैव असतोना. म्हणून दासगणू महाराज हृदयस्थ परमात्म्याचें स्मरण करतात जेणे करून त्याना आत्मविश्वास प्राप्त होतो की श्री गजानन महाराजांच्याच कृपेने माझे कार्य पूर्ण होईल. मला कुठे काव्य करता येतें ?, मी तर मंदमती अज्ञानी माणूस, म्हणून तूच मला सामर्थ्य दे आणि तुझे कार्य माझ्याकरवी करून घे असा समर्पणाचा भक्ताचा भाव येथे दृष्टोत्पत्तीस येतो.

१/६-१० दासगणू महाराज नमनात जास्तीत जास्त देव देवतांचे नाव घेऊन स्मरण करतात,त्यांचे महात्म्य गातात जसे आदिमाया सरस्वतीला आवाहन करून जगदंबेची करुणा भाकतांना मी तुझ अजाण लेकरू आहे ना ? मग त्याचा अभिमान धरून हे थोर कार्य माझ्या हातून करवून घे. तुला हे सहज शक्य आहे. तुझी थोरवी एवढी मोठी आहे की तू जर प्रसन्न झाली तर भक्त पांगळा असला तरी त्याला सहजतेने पर्वत चढायला सक्षम बनविते, मुका जरी असला तरी सभेत पंडितासमान अस्खलित व्याख्यान देऊन सभा जिंकतो. या तुझ्या कीर्तीला कमीपणा येऊ नये, म्हणून मी प्रार्थना करतो की या संताच्या अगम्य चरित्राचे लिखाण सुलभपणे पूर्णत्वाला जाऊ दे. दिनाचा उद्धार करणाऱ्या उदार पंढरीच्या पांडुरंगाचे, भक्तांचे पालन पोषण करून त्यांना सुख समाधान प्रदान करून मुक्ती मिळवून देणाऱ्या सच्चिदानंदाला भक्तीपूर्वक दासगणू प्रार्थना करीत असावेत की रसपूर्ण, मधुर सोप्या भाषेत हे संत चरित्र निर्माण झाले, तर मराठमोळ्या साध्याभोळ्या भक्तांच्या मनाचा ते ठाव घेईल आणि त्याच वेळी श्रींच्या चमत्कारातून भक्तीचा महिमा जनसामान्यांच्या मनात ठसेल.यातून अध्यात्मिक जनकल्याण होईल, लोक तुझे नामस्मरण करून त्यांच्या मुक्तीचा मार्ग प्रशस्त करतील. श्री गजानन महाराजांचे महात्म्य दासगणू महाराजांच्या ध्यानी आलेच होते, म्हणून ते श्रींचीच मनातून विनवणी करीत असावेत की ,

” साह्य दासगणूला | ग्रंथरचनेस करी या | ”

पण मग इतर देवदेवतांची नावे घेण्याचे प्रयोजन एवढ्याच साठी असावे की भविष्यात समाजातील अनेक स्तरावरील भक्त भक्तिभावाने जेंव्हा या पोथीची पारायण करतील, तेंव्हा त्यांना आपापल्या देवतेचे स्मरण करिताना अजून प्रसन्न वाटेल व प्रेम आणि आपुलकी व जवळीक निर्माण होईल या संत चरित्राबद्दल. अढळ श्रद्धा व सद्भाव गुरुप्रती असला की सतगुरु कृपेने न कळत आपले सद्भाग्य उदयाला येत असतेच, हे दासगणू महाराजाना चांगलेच ठाऊक होते. या विश्वासापोटीच त्यांनी सहाय्य मागितले श्रींचे आणि श्रींनीही भरभरून ते त्यांना दिले. वास्तविक दासगणूना हे माहित होते की श्री, श्रींचे कार्य स्व:तच करवून घेतात ,आपण फक्त असतो ते निमित्तमात्र. म्हणूनच त्यांना स्मरण झाले असावे ते कमरेवर दोन्ही हात ठेऊन युगानुयुगे उभे असणाऱ्या पंढरीरायाचे.

१/११ तू सर्व साक्षी जगदाधार | तू व्यापक चराचर|

कर्ता करविता सर्वेश्वर | अवघे काही तूच तू ||

या ओवीचे चिंतन करताना मला संत तुकोबारायांच्या वाङ्मयीन व आध्यात्मिक वारकरी कविचे स्मरण होते. कारण तुकोबारायांच्या अनेक अभंगाची तुलना श्री गजानन महाराजांच्या जीवन चरित्राशी करता येते. दोघेही अवतारी महापुरुष- कर्मठ कर्मकांडाला संतांनी फाटा दिला, सामान्य जनतेला व्यक्तीस्तोमापासून व कर्मकांडापासून वाचविले आणि नामस्मरणाचा पचेल, रूचेल असा सुलभ मार्ग आम जनतेला सांगितला. श्रींनी आपल्या जीवनात जे जे “ अनुभव आले अंगा | ते या जगा देतसे ||” तुकोबारायाच्या लोकसंवादाची प्रेरणा जशी या वचनातून –

“बुडते हे जन न देखवे डोळा | म्हणोनी कळवळा येतो आम्हा || तसेच जीवन श्रींनी या अवतारात ठेवले कारण त्याना माहित होते की –

आम्ही वैकुंठासी | आलो याची कारणाशी | बोलीले जे ऋषी | साच भावे वर्तायां ||

श्री ज्ञानेश्वर माउली, तुकोबामहाराज या अवतारी संतकविनी आपल्या या अवतार कार्यात रसातळाला जाणाऱ्या जीवनाला आधार देऊन आध्यात्मिक क्रांती घडवली. तेच कार्य १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात श्रींनी आपले एकांतातील तप बाजूला सारून लोकांत येऊन आपल्या जीवन चरित्रातून सर्व पातळीवरील जनतेशी प्रेममय भक्तीचे संबध निर्माण करून त्यांच्या कडून एकात्मतेचा,समरसतेचा धडा तर गिरवून घेतलाच, पण अध्यात्मिक सुख स्वत: कसे अनुभवावे, हे ज्ञान आपल्या दिव्य मार्गाने त्यांच्यात संक्रमित करुन मोक्षप्राप्ती भक्तांना सहज सिद्ध केली ती या गजानन अवतारातच. पंढरीच्या पांडूरंगाच्या आज्ञेनुसार शेगावला समाधी घेऊन आजही आपल्या दिव्य चैतन्याने भक्तांचा सांभाळ करतात हे सत्य विश्वातील अनंत भक्त अनुभवत आहेत.

दासगणू महाराज म्हणतात, " अवघे काही तूच आहेस. चराचरातील अणुरेणूंत तूच सामाविला आहेस. या जगताचा आधार तूच आहेस. सर्वांचा कर्ता-करविता ही देवा तूच आहेस.” श्रीच्या जीवनातील दिव्य लीलांचा व चमत्कारांचा महिमा एव्हढा थोर की तो कुणालाही सहज कळत नाही, म्हणूनच दासगणू श्रींसमोर नम्र होऊन म्हणतात- तुझ्या पुढे माझा काय पाड लागणार आहे तुझ्या कृपेशिवाय. दासगणू नम्र होऊन श्री चरित्र कथन करतात. स्वत:ची क्षमता असतानाही सर्वस्वाने, समर्पित वृत्तीने सेवा करणारे दासगणू ओळखून असावेत की श्री गजानन महाराज अवतारी महापुरुष आहेत,तेच सगुण आहे,तेच निर्गुण आहे. मोह,माया, भेदाभेद या गोष्टीना आश्रय न देणारे, सुख-दुखात सम बुद्धीने वागणारे, विश्वातील प्रत्येक वस्तू मात्रात ईश्वर तत्व ओतप्रोत भरले असून प्रत्येक आत्मा हा ईश्वर अंश असल्याने या मानवी जीवनात त्याला “अहं ब्रह्मास्मि” हा अनुभव घेण्यासाठीच हा नरदेह प्राप्त झाला आहे, असे मानत. श्री दासगणू लिहितात-

१/१२ जग,जन आणि जनार्दन| तूच एक परिपूर्ण |

सगुण आणि निर्गुण | तूच की रे मायबापा |

१/१४ रामकृपा जेंव्हा झाली| तेंव्हा माकडा शक्ती आली |

गोप तेही बनले बली| यमुनातीरी गोकुळात ||

रामकृपा झाली की भाग्योदय होतो, शक्ती प्राप्त होते. म्हणूनच माकडेंसुद्धा बलाढ्य शत्रूचा नायनाट करू शकले कारण रामकृपा.

१/१५ तुझी कृपा व्हाया जाण | नाही धनाचे प्रयोजन |

चरणी होता अनन्य | तू त्याते साह्य करिशी |

अध्यात्म आणि धन यांचा काही संबंध आहे का? भगवंताची मनापासून निरहंकारी होऊन निर्मोही मनाने प्रार्थना आणि चिंतन करण्यासाठी धनाची गरज आहे का? धनहीन लोकांनाच भगवंत कृपा होणार आहे का? भगवंत धन घेऊन कृपा करतो का? यावर थोड चिंतन करून आपले मन काय उत्तर देत ते कागदावर लिहा.

या संत चरित्र लिखाणात दासगणू स्पष्ट मत व्यक्त करतात - भगवंत कृपेसाठी धनाची गरज नाही. धन आहे म्हणजे कृपा होईलच असेही नाही. मग प्रश्न निर्माण होतो की भगवंताची कृपा केंव्हा होईल?

भगवंताच्या चरणी आपला शुद्ध निखळ भक्तीभाव मनापासून शरणागत भावाने समर्पित करतो दोन्ही हात जोडून जो संताच्या चरणी माथा टेकतो त्यास संत भगवंताशी एकरूप होण्यासाठी साह्य करतात. पण शुद्ध आचरण व सत्कर्म हे संताच्या कृपा छायेखाली करावे लागते, ते त्या मुमुक्षु भक्तालाच.

सिद्ध संतकवी दासगणू महाराजांना प्रार्थनेनंतर हा विचार आला असावा की सर्व संत मंडळी भगवंताविषयी असेच काहीसे बोलत असतात अगर लिहित असतात. पण ज्यावर आपण लिहितो तो विदर्भात शेगाव नगरीत अचानक प्रकट झालेला विदेही आत्मा हा सगळ्यांपेक्षा थोडा हटके आहे, वेगळा आहे. तो बोलत नाही, तो नाही लिहीत ग्रंथ पण जस जगतो तेच त्याच सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे, ज्यामुळे आज जग आध्यात्माकडे आकर्षित झाले आहे. शेगावकडे भक्तिभावाने ओढल्या गेलें आहे. त्या विदेही संताचे जीवन चरित्र हेच मुळी एक तत्वचिंतन आहे. तोच एक महान ज्ञानकोश आहे. आपल्या अवतीभोवतीच्या अठरापगड जातीतील समाजात प्रेममय भक्तीभावाने वागणें  आणि नकळात त्यांच्या मनावर अधिराज्य करणें सोप का होतें ? अशा समाजातील भक्तांना बंधुभावाने सम पातळीवर आणणे आणि तसे मनापासून प्रेमाने जगायला उद्युक्त करणे हे कसे हो शक्य झाले असेल महाराजांना ? त्यासाठी शाळा नाही, अभ्यासक्रम नाही, स्वाध्याय नाही, पाठशाला नाही. जबरदस्ती नाही. जाचक शिस्त नाही. आहे तो फक्त स्वमनाचा अंकुश व संतांवर पूर्ण श्रद्धा. आहे तो फक्त भक्तीचा महामंत्र “गणी गण गणात बोते”.

हे रहस्य आहे या ओवी चिंतनात. श्री गजानन महाराज कुणाचे दर्शन घेत असतील हो या अवतार कार्यात ? मला वाटते श्री समाजात राहूनच आपले यती जीवन जगात असताना, आत्मा आणि परमात्म्याच्या संयोग दर्शनाचा त्यांना लाभ झाला असावा.  सर्व प्राणीमात्रांच्या आत्म्यातील परमात्म्याचे दर्शन घेत घेत मोहरहित होऊन कार्य केले असेल. ज्ञानी श्रीमहाराज हे ओळखून होते की हा मोहच मनुष्याच्या इच्छा, आकांक्षा,कर्म आणि इंद्रियांना जीवन दान देत असतो व त्यातच त्यांना गुंतवून ठेऊन जिवातील ईश म्हणजे सत्य तत्त्वापासून दूर ठेवतो. म्हणून महाराज या मोहमयी बंधनात अडकून पडले नाहीत, चित्ताला त्यांचा स्पर्शही होऊ दिला नाही आणि आपल्या वर्तनाने समाजात डांगोरा पिटला की या विश्वाचा खरा निर्माता जर कोणी असेल, तर तो आहे चंद्रभागेच्या काठी कमरेवर हात देऊन युगानुयुगे उभा असलेला भगवंत.

१/१६ ऐसा संतानी डांगोरा | तुझा पिटला रमावरा |

त्या काळ्या पांडुरंगाच्या कृपेसाठी धन लागत नाही तर लागते सृजन मन. ही भावना चित्ती धरा, मोह सोडा, भगवंताला आपलासा करा कारण तो आणि तुम्ही, मी एकच आहोत. भगवंत पंढरपुरात नाही तर तो आहे तुमच्या, माझ्या, सर्वांच्या अंत:करणात. त्याला ओळखा, स्वत:ला ओळखा. इतरांशी देवासारखे वागा, म्हणजे धनाशिवाय त्याची कृपा होईल आपोआप. विषय वासना सोडा, जागृत व्हा, आपल्यातच असणाऱ्या भगवंताला ओळखून आपलेसे करा, सहृदय होऊन भावनेने जपा त्याला. पांडुरंगाला शरण जा. संसार करा पण वैराग्य जागून खरा सुखाचा संसार करता येतो हे सर्व सामान्याना शिकविणारा पहिला समाजाभिमुख विदेही संत आहे विदर्भातील शेगावचा. त्यासाठी १६ व्या ओवीत दासगणू शेवटी म्हणतात

म्हणून आलो तुझ्या द्वारा | आता विन्मुख लाऊ नको |

१/१७ हे संतचरित्र रचावया | साह्य करी पंढरीराया |

माझ्या चित्ती बसोनिया | ग्रंथ कळस नेई हा ||

१/१८ हे भवभयांतक भवानीवरा | हे निलकंठा गंगाधरा |

ओंकाररूपा त्र्यंबकेश्वरा | वरदपाणी ठेवा शिरी ||

या ओवीत नामस्मरणाचे महत्व प्रतिपादन केले आहे दासगणु महाराजांनी आपल्या अनुभवातून. तुकोबारायसुद्धा आपल्या गाथेत नाम भाव व्यक्त करताना म्हणतात “ नाम तारक भवसिंधु | विठ्ठल तारक भवसिंधु | ” हा भवसागर तरून जाण्यासाठी भगवंताचे- विठ्ठल नाम घेत घेत वैराग्य वृत्तीने संसार करावा म्हणजे इष्ट फलप्राप्ती होते. दासगणू तर पंढरीच्या विठूरायाला आवाहनच करतात की हे श्रींचे चरित्र रचण्यासाठी तू मला साह्यभूत हो. त्यासाठी तू माझ्या चित्तात ग्रंथ लेखन होईपर्यंत बसून माझ्या वाणीद्वारे या श्री चरित्र ग्रंथाचा कळस अध्याय पूर्ण कर. मनापासून केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. “ वरदपाणी ठेवा शिरी ” ही दासगणुनी लीनतेने केलेली प्रार्थना श्रींनी स्वत:च ऐकली मात्र आणि आणि भक्तांच्या हाकेला ओ देणाऱ्या या देवाने वरदान दिले “यशस्वी भव”. असे हे वरद गजानन आहेत.

|| ओम नमो सद्गुरू श्रीगजाननाय | ओम नमो भगवते श्रीगजाननाय ||

विदर्भातील प्रख्यात संत श्री गजानन महाराज यांच्या ३२ वर्षाच्या तेजस्वी कालखंडाचे चरित्र दर्शन अत्यंत रसाळपणे संत कवी दासगणू भाविकासमोर मांडतायेत भावपूर्ण मनाने. तोच हा श्री गजानन विजय ग्रंथ. या सोप्या अमृतमय ग्रंथातील संगीतमय माधुर्याने भक्त तन्मय होतात व समाधीगत अवस्थेत पोहचतात. त्यातील गोडव्याचा पारायणात जेंव्हा ते रसास्वाद घेतात, तेंव्हा त्यांचे मन भावविभोर होते, प्रसन्न होते आणि श्रीं कृपाशीर्वादाने आपण धन्य झालो असे वाटून मुखातून शब्द येतात सहज, नकळत “ गणी गण गणात बोते ! ”

प्रत्येक मनुष्य, प्रत्येक जीव हा शाश्वत सुख-शांतीच्या शोधात असतो. त्यासाठी अनेक योनीत अनेक जन्म घेऊनही योग्य मार्ग आणि दिशा सापडत नाही व भगवत चिंतन न घडल्यामुळे अनंत जन्माचे भोग भोगावे लागतात, पण त्याच्या काही सुकृतामुळे आता मनुष्य जन्मही लाभला आणि नशिबाने या जन्मात श्री दर्शन भाव प्राप्त झाला. तसेच श्री चरित्र पारायणातून शांतीचा अनमोल ठेवा प्राप्त झाला असे वाटणे हीच प्रभू कृपा.

भोग आणि विषयानंदाच्या मागे लागलात की जीव परमानंदापासून दूर दूर फेकल्या जातो हा बोध देणारा महान ग्रंथ आहे श्री गजानन विजय! हा बोधच आत्मस्वरूप, शांतस्वरूप ब्रह्म होय. श्री चिंतनातून ज्ञानप्राप्ती होऊन प्रेममयी भक्तीचा भाव मनात ठसतो आणि कळायला लागते की ब्रह्म शोधून कधीच हाती लागणार नाही. अंतिम सत्यदर्शन हेच की मीच तर ब्रह्म आहे. “अहं ब्रह्मास्मि ” चा स्वानुभव प्राप्त होतो. हे कळणे म्हणजे जीवनातील अंतिम परम ध्येय गाठणे होय.

१/१९ तुझे साह्य असल्यावरी | काळाचाही नाही दर |

लोखंडासी भांगार | परीस करून ठेवितसे ||

१/२० तुझी कृपा हाच परीस | लोखंड मी गणूदास |

साह्य करी लेकरास | प्रते मजला लोटू नको ||

दासगणू आपली आत्मानुभूती या दोन ओव्यातून व्यक्त करीत आहेत. पण त्यासाठी अहंभाव सोडून शरणागतीचा भाव हाच आपल्या मनाचा स्थिर स्थायी भाव व्हायला लागतो. तो दासगणू महाराजांचा झाला असावा. म्हणूनच ते स्वत:ला लोखंड वगैरे मानतात तरच या जीवनाचे सोने होईल असा भाव आहे. कारण ते श्रींची करूणा  भाकतात, सहाय्य मागतात, वरदान मागतात. मला सदैव आपल्या जवळ ठेवा, कधीही दूर लोटू नका असे म्हणतात आणि श्री तर वरद गजानन आहेत. त्यांची कृपा ही होणारच. आणि संतांची कृपा म्हणजे परीस, मग परीस लोखंडाचे रुपांतर सुवर्णांत आपल्या स्पर्शाने करते. भगवंत हाच माझा सहाय्यकर्ता असे मानून जीवन जगायला लागले की मग भाव निर्माण होतो, माझी काळजी तर तो भगवंत वाहतो मला काय भय काळाचे वा संकटाचे. येथे दासगणूचा स्वानुभव प्रगट होतो. आणि पूर्ण अनुभूती आली ती श्री गजानन विजय ग्रंथ लिखाणातून. दासगणू महाराजांनी अनेकदा साईबाबांच्या मुखातून गजानन महाराजांचे नाव ऐकले होते, पण आजपर्यंत दर्शन झाले नव्हते ही गोष्ट सत्य आहे. ई.स. १९०७ ची ही गोष्ट. साईबाबांच्या आज्ञेनुसार ते आकोटला जायला निघाले होते. तेंव्हा शेगाव-अकोट हा प्रवास दासगणूंनी टांग्यातून केल्याचा दाखला मिळतो. अचानक त्यांचे लक्ष्य ओढ्याकाठी निजानंदी बसलेल्या विदेही साधू कडे गेले. वेळ असेल साधारण दुपारची बारा साडेबाराची. मुखाने “गणी गण गणात बोते” हे प्रिय भजन चालू होते. आजूबाजूला बराच भक्त जन समुदाय जमला होता. सहज त्यांनी टांग्यांवाल्यास विचारणे केले आणि त्यांना कळले हेच श्री गजानन महाराज. पटकन त्यांनी टांग्याखाली उडी मारली आणि श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. हेच त्यांना घडलेले श्रींचे प्रथम दर्शन. त्या दर्शनाचा प्रसाद म्हणजेच हा श्री गजानन विजय ग्रंथ असावा. श्रींच्या आशीर्वादानेच दासगणूंना श्रींचे शब्द ब्रह्म रेखाटणे शक्य झाले. “ दर्शन हेळा मात्रे तया होई मुक्ती, तया होई प्राप्ती” असा हा श्री कृपा दर्शन महिमा व प्रताप म्हणावा लागेल.

पुढे सन १९३९ साली लिखाणास शेगावला प्रत्यक्ष प्रारंभ करण्यापूर्वी दासगणू मंदिरात श्री दर्शनाला गेलेत व तेथे त्यांनी पूर्वाभिमुख बसून श्रीविष्णूसहस्त्र नामाचा पाठ केला. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ असा जय जय कर केला. श्री गजानन महाराजांना श्रद्धेने नमस्कार करताना श्री दासगणूंचे अष्टसात्विक भाव दाटून आले, झरा झरा डोळ्यातून प्रेमाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तेंव्हा सद्गदित झालेल्या दासगणुमहाराजांनी श्रींची स्तुती करताना, त्यांच्या मुखातून सहज काव्य बाहेर आले “ सतेज दुसरा रवि | हरि समान याचे बल | वसिष्ठ सम सर्वदा | तदीय चित्त ते निर्मल | असे असुनिया खरे | वरी वरी पिसा भासतो | तया गुरु गजानना प्रति |सदा गणू वंदितो ||”

तसेच आजही पारायणकर्ते भक्तीभावाने शांत चित्त होऊन समाधान पावतात, त्यांची भावसमाधी लागते, आणि आपणास श्रींचे खरेच कृपा आशीर्वाद लाभले असा आत्मभाव जागृत होऊन मनातल्या मनात श्रांत होतात, भक्तीमग्न होतात. हा आपलाही अनुभव असेन.जय गजानन.

१/२१ तुला अशक्य काही नाही | अवघेच आहे तुझ्या ठायी |

लेकरा साठी धाव घेई | ग्रंथ सुगम वदवावया ||

या ओवीतून मिळतो तो दिव्यत्वाचा आनंद. भगवंत आणि भक्त यांचे नातें माय - लेकरासारखे आहे. तेंव्हा मुलाला आपली आई जशी संपूर्ण काळजी घेऊन जे जे मागितले ते पुरविते असा विश्वास असतो, तसा भाव श्री दासगणूजी या ओवीत व्यक्त करतात. देवा! तूच या सृष्टीचा निर्माता व पालनकर्ता, जे तुझ्या जवळ जे नाही ते विश्वात कुठेही नाही. तुला अशक्य तर काहीच नाही, तूच तर आमच्या संकल्पांचा दाता आहेस. माझ मागणें एवढेच आहे, "देवा, तू दिलेली प्रतिभा मला हे श्री चरित्र गाताना पूर्णत्वाने वापरायची सुबुद्धी दे."

श्री दासगणू महाराज हे “ पोटभऱ्या लेखक ” नव्हते. ते स्वत: स्वानुभवाने व संत संगती लाभल्यामुळे पूर्णत्वाला पोहोचलेले संतच होतें असे म्हणा ना. त्यामुळे केवळ यावेळी त्यांना संतचरित्र रेखाटायचे नव्हते, तर श्री कृपेने श्री चरित्र गाऊन आत्मोद्धराचा स्वमार्ग शोधून प्रशस्त करावयाचा होता. पण स्वबळावर आपण काही ठरविले म्हणजे होत नसते, भगवंत कृपेने प्रारब्ध उदयाला यावे लागते, संतकृपा लाभावी लागते याची जाण व आध्यात्मिक ज्ञानही त्यांना गुरुकृपेने प्राप्त झाले होते. रावण ज्ञानी होता, बळवंत होता, भगवंताचा वरदहस्त ही लाभला होता पण अत्यंत लोभी, हट्टी, मी म्हणेल तीच पूर्व या वृत्तीचा होता, मला कुणी हरवूच शकत नाही असा फाजील आत्मविश्वास बाळगत होता. मंदोदरीने, त्याच्या राणीने परोपरीने समजून सांगायचा प्रयत्न केला की राम हे भगवंत आहेत ते केवळ अयोध्येचे सम्राट नाहीत, पण कुणाचे काही ऐकायचेच नाही, असे एकदा ठरवून आपल्या मताप्रमाणेच मी वागेन असे म्हटले की सर्व नाश अटळ असतोच. पण दासगणू तर विठ्ठलभक्त, रामभक्त होते. भक्ताचा प्रथम गुण हा की शरणागतीचा भाव ठेऊन वागणे. दासगणू यांचे जीवनविषयक तत्वज्ञान असे की प्राप्त नरदेहाचे सोने करायचे तर पूर्णत्वाने भगवंताला शरण जावे आणि परोपकारात जीवन व्यतीत करावे. भगवंत कृपेने यावेळी काय करायचे हे त्यांचे एकाग्र मन त्यांना सांगत होते की मला श्रींच्या दिव्य चरित्राचे सुगम गायन करायचे आहे, जेणे करून ते भक्तांच्या मनात ठसेल,  त्यांचा आत्मभाव जागृत होईल, त्यांना सात्विक शांती लाभून परमानंद प्राप्त  होऊन

अंतिमत: पांडूरंगात विलीन होता येईल. देह आहे तो पर्यंत वैराग्य व निरपेक्ष वृत्तीने सुखाचा संसारही करता येईल. सर्व सामान्यांना या श्री गजानन विजय ग्रंथाने जर काही दिले असेल तर ते ही की सहज भावाने “ जय गजानन –श्री गजानन ” म्हणत म्हणत साधे सरळ सोपे जीवन मार्गावर एक मुमुक्षु बनून श्रींचा सेवक या नात्याने चालत राहावे, पुढे श्री बघून घेतील याचे काय करायचे, तेंव्हा मी कशाला चिंता करून वेळ वाया घालवू ? त्याऐवजी नामजप करेन. माझे गुरु परिसापेक्षाही श्रेष्ठ आहेत, परीस तरी लोखंडाचे सोने बनविते माझे सद्गुरू तर मला त्यांच्यासम प्रभू बनवितात. मग मी आताच प्रभू बनून समाजात वागण्याचा प्रयत्न का नको करू? समाजात आमुलाग्र परावर्तन घडवून आणण्याची किमया या श्री चरित्राने केली एवढे मात्र खरे. दासगणू स्वबळापेक्षा भगवंत बळ श्रेष्ठ मानून संत चरित्र उत्तम लिहिल्या जावे, म्हणून पांडुरंगाचा धावा करतात व पांडुरंगाची कास ते कधीही सोडत नाहीत. या पांडुरंगाच्या कृपेने आणि श्री ज्ञानदेव-तुकोबाराय या संत कार्यातून महाराष्ट्राची जडण घडण झाली, अठरापगड जाती जमातींना एका झेंड्या खाली आणले. समाजात आत्मभाव, समरसता व समन्वय निर्माण केला. देव माऊली बनला व भक्तांनाही माऊली बनविले. महाराष्ट्राची ही नवी ओळख विश्व वंदनीय केली.वारकरी संप्रदायाने जात,पात,धर्म, भाषा, वंश भूप्रदेश यांचे अडसर दूर करून विश्वाला बंधुत्वाची नवी ओळख करून दिली. त्यांना त्यांच्या पायावरच केवळ उभे नाही केले तर त्या पायांना दिंडीच्या रूपाने चालते केले समाज जागृती साठी. केवढे मोठे अध्यात्म कार्य या एका श्री चरित्रातून घडले.

हे संत चरित्र पारायणासाठी आज विश्वात सर्वत्र प्रचलित झाले आहे. दासगणूचा केवळ श्री चरित्र लिहिणे हा संकल्प नव्हता तो मनीचा ध्यास होता श्रीकृपेने. म्हणून मनापासून त्यांनी साकडे घातले ते भक्तांची अहोरात्र वाट पहाणाऱ्या हात कमरेवर ठेऊन व विटेवर उभे राहणाऱ्या दैवताला – पंढरी नाथाला.

“ माझे मागणे ते किती | दाता लक्ष्मीचा पती” अस म्हणणाऱ्या तुकोबारायांच्या सारखी स्थिती दासगणू महाराजांची झाली असावी. प्रभूचा हात सदैव आपल्या डोक्यावर असला की जीवाचे कल्याण होते हे ते जाणत होते आणि म्हणूनच नम्र भावाने संतचरित्र लेखन यशस्वी व्हावे,पूर्णत्वाला जावे म्हणून देवदेवतांचा धावा करताना येथे दिसत आहेत....जसे त्र्यम्बकेश्वरातील ओंकाराचा, देवाधिदेव महादेवाचा, तसेच प्रसंगी महादेवालाही शांत करणाऱ्या प्रभू रामचंद्राचादेखील ! प्रभू राम हे असे राजे आहेत जे पूर्णत्वाने वैराग्य स्तिथीत राहून जनकल्याणार्थ राज्य करतात. ज्यांनी काही निमित्ते करून राजप्रासाद सोडला आणि सीतेसह वनात गेले. का ? तर आपल्या वनवासी रयतेची सुख दु:ख समजून घेण्यासाठी. या वेळी त्यांनी देवत्वाची शाल न पांघरता वनवासी जनतेला दर्शन तर दिलेच पण भाव होता त्यांचातील शुद्ध सात्विक प्रेमभाव जवळून अनुभवण्यासाठी. राम वनात आलेत हे कळताच वनवासी शुद्ध अंत:करणाने पळसाच्या पानावर रानातील मेवा घेऊन बायकापोरांसह रामभेटी साठी हजर, काही मागायला नव्हे तर राम - सीतामैयाची भूक क्षालन व्हावी, या प्रसंगी वनात त्यांना आश्वस्थ करण्यासाठी. जो राम त्यांचा उद्धार करायला आला होता, त्यालाच हे साधे भोळे वनवासी म्हणतात - आम्ही आहोत ना या वनात ! आपण मुळीच काळजी करू नका.तसेच सीतामाईची काळजी घ्यायला, सोबत द्यायला आमच्या बायका,लेकी सुना आहेतच. आपण निश्चिंत असा. काय हा भगवंताचा व भक्तांचा भाव बरे ! असेच काहीसे दृश्य श्रींच्या अवतार कार्याने विदर्भात दिसायला लागले होते. संत हेची देव. संत हे भक्तांना मुक्त करतात, त्यांना आपल्यासम बनवतात. दासगणु महाराज ज्ञानी होते, काव्यमय ओवीबद्ध चरित्र लिखाणाची हातोटी त्यांच्याजवळ होती पण त्यांचा बालवत शरणागतीचा भाव श्रींना आवडला असावा आणि त्यांच्या मुखाने आपले चरित्र तें स्वत:च वदते झाले श्री जनकल्याणार्थ ! 

।। श्री गजानन महाराजार्पणमस्तु ।। 


सौजन्य : श्री गजानन आचार्यपीठ


श्री गजानन विजय - दैनंदिन ओवी स्वाध्याय चिंतन लेखमाला



।।श्री गणेशाय नमः ।।

।। अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगांवनिवासी  समर्थ सद्‌गुरु श्री गजानन महाराज की जय ।। 

श्री गजानन महाराजांच्या भक्तांसाठी श्रीधरअण्णा वक्ते लिखित " श्री गजानन विजय - दैनंदिन ओवी स्वाध्याय चिंतन " ही लेखमाला आजपासून सादर करीत आहोत.श्री गजानन महाराजांच्या चरित्रग्रंथावर आधारित ही लेखमाला अतिशय सुबोध असून गजानन महाराजांच्या भक्तांनी आवर्जून वाचावी. 

याविषयीं स्वतः श्रीधरअण्णा वक्ते लिहितात :

आपल्या हातून दररोज श्रीसेवा घडावी, आध्यत्मिक चिंतन व्हावे म्हणून स्वेच्छेने एक मानसिक व्रत घ्यायचे आहे की, “ मी दररोज थोडा वेळ काढून श्री गजानन विजय ग्रंथाच्या फक्त एका ओवीचे क्रमश: नेमाने पठण करेल, त्यावर मनन करेन आणि जो भाव माझ्या मनाला भावेल तो एका कागदावर लिहून दररोज “श्री गजानन अचार्यपीठ” या ग्रुप वर पोस्ट करीन. सन २०१६ च्या प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी एका अध्यायातील सर्व ओव्यांचा माझा स्वाध्याय पूर्ण होईल याची दक्षता घेईन. हा प्रेमयुक्त भक्तीचा मळा सर्वत्र फुलवून भक्तिरसात डुंबून जाऊ या. " 

श्रीधरअण्णा वक्ते ७५ औरंगाबाद.

जय गजानन.

ही लेखमाला या ब्लॉगवर केवळ श्री गजानन महाराजांच्या चरित्राची ओळख जास्तीत जास्त भक्तांना व्हावी आणि सर्व भाग सलग, एकत्र वाचता यावेत, याचसाठी पुन्हा प्रकाशित करत आहोत. तसेच या लेखमालेचे सर्व लेखनश्रेय श्री श्रीधरअण्णा वक्ते यांचेच आहे, ह्याची सर्व गजानन भक्तांनी नोंद घ्यावी.


सौजन्य : श्रीगजानन आचार्यपीठ


Feb 13, 2020

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय ४


॥ श्रीगणेशाय नमः।।

हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा,नीलकंठा,गंगाधरा,महाकाल त्र्यबंकेश्वरा,श्रीओंकारा तू मला पाव.।।१।।आम्हांसाठी तूं आणि रुक्मिणीश हे एकच तत्त्व आहांत.तोय वा वारी म्हंटले तरी जलांस काही फरक पडतो का ?।।२।।हे जगत्पति, तंतोतंत अशीच तुमची स्थिती आहे.ज्याच्या मनी जसा भाव त्याच रूपात तो तुला पुजितो.।।३।। अनन्यभावें तुझी आराधना केल्यांस तू आपल्या भक्तांस निश्चितच पावतो.माता आपल्या बाळांविषयी कधीच निष्ठुरता धरत नाही.।।४।।मीही तुझें अजाण लेंकरुं आहे,तरी तू तुझी माया कमी करू नकोस.हे हरा,तू तर साक्षात् कल्पतरु आहेस,तेव्हा माझी इच्छा पूर्ण करा.।।५।।श्री स्वामी समर्थ बंकटलालाच्या घरांत असतांना एकदा अघटीत असा प्रकार घडला.।।६।।वैशाख शुद्ध पक्षातील अक्षयतृतीयेच्या दिवशीं पितरांसाठी श्राद्ध करून उदककुंभाचे दान देतात.।।७।।अक्षयतृतीयेचा हा दिवस वर्‍हाडांतील लोकांस विशेष वाटतो.तिथे ह्या सणाचे मोठे महत्त्व आहे.।।८।।तर त्या दिवशीं काय झालें हे तुम्ही श्रोते हो ऐका.महाराज लहान मुलांबरोबर बसले होते.जणु त्यांना कौतुकाने लीलाच दाखवायची होती.।।९।।त्या बालकांस गजानन स्वामी म्हणाले,"मला तुम्ही तंबाखूची चिलीम वरती विस्तव ठेवून भरून द्या. सकाळपासून मी असाच चिलीम मुळीच न पीता बसलेलो आहे,त्यामुळें हैराण झालों आहे तर मुलांनो, आता तुम्ही चिलीम भरा."।।१०-११।।अशी आज्ञा ऐकताच अवघी बालके आनंदली आणि तंबाखू आंत घालून चिलीम भरुं लागलीं.।।१२।।त्यानंतर त्यांनी विस्तवाचा तपास केला,पण घरी तो मिळाला नाही कारण लोकहो, चूल पेटण्यास अजून अवकाश होता.।।१३।।ती बालके आपापसांत विचारविमर्ष करून चिलिमेसाठी विस्तव कसा मिळवावा यांवर उपाय शोधू लागली.।।१४।। मुलें अशी चिंतातुर झालेली पाहून बंकट त्यांना समजावत बोलला,"अरे आपल्या आळींत जानकीराम सोनार आहे ना,त्याच्याकडे तुम्ही जा आणि त्याला थोडा विस्तव मागा. दुकान सुरु करण्याकरिता त्यांस आधी विस्तव पेटवावा लागतो.आधी बागेसरी(सोनाराची शेगडी)पेटते, त्यानंतरच दुकानदारी सुरु होते. अशीच खरी सोनाराची रीत असते हे तुम्हांला माहीत आहेच की."।।१५-१७।।मुलांना ते पटले.ती मुले जानकीरामाकडे गेली अन समर्थांच्या चिलमीसाठी त्याला विस्तव मागूं लागली.।।१८।।त्यावर जानकीराम चिडला,अक्षयतृतियेच्या सणाला मी कुणालाही विस्तव देणार नाही असे त्या बालकांस बोलू लागला.।।१९।।मुलें त्यास हात जोडुन म्हणाली,असा अविचार करू नकोस.विस्तव श्री समर्थांना पाहिजे आहे.।।२०।।श्रीगजानन महाराज प्रत्यक्ष देवाचेही देव आहेत.त्यांच्या चिलमीसाठी हा विस्तव हवा आहे.।।२१।।थोर साधुंसाठी काहीही दिले तरी तिथे अशुभ असे काहीच नसते.या अशा व्यावहारिक कथा उगीचच आम्हांस सांगत बसू नकोस.।।२२।।आम्ही मुले तर लहानच आहोत व तूं तर आमच्यापेक्षा मोठा आहेस,असे असूनही ही गोष्ट तुला कळत कशी नाही?।।२३।।तू जर विस्तव आम्हांस दिलास व त्यांमुळे गजानन महाराज चिलीम पिऊन तृप्त झाले तर तुझ्या घरीं भाग्य निश्चितच येईल.।।२४।।तें बोलणे त्या सोनाराने ऐकले नाहीच,वर तो त्या मुलांसच अद्वातद्वा बोलू लागला.खरोखर ज्याचें मरण जवळ आलेले असते,त्याचे पाय खोलाकडेच जातात.।।२५।।तो सोनार त्या बालकांस बोलू लागला,गजानन कुठला पुण्यराशी आहे ?त्या चिलमीबहाद्दरास साधु म्हणून संबोधू नका.।।२६।।तो गांजा,तंबाखू पीत असतो,साऱ्या गावांत नग्न हिंडतो. एखाद्या वेड्यासारखे चाळे करतो,गटारातीलही पाणी पितो.।।२७।।तो कुठलीही जात,गोत पहात नाही, अशा वेडयापिशाला मी साधु मानण्यास मुळींच तयार नाही.।।२८।। बंकटलाल खरे तर खुळावला आहे व त्याच्या नादी लागला आहे.मी काही त्याच्या चिलमेसाठी विस्तव देणार नाही.।।२९।।तो साक्षात्कारी आहे ना, मग त्यांस कशाला विस्तव पाहिजे आहे?तो आपल्या कर्तृत्वाने विस्तव का निर्माण करीत नाही बरें ?।।३०।।नाथपंथीय साधू जालंदरनाथ हे सुद्धा फार चिलीम पीत होते. परंतु विस्तवासाठीं ते कधी घरोघरी फिरले नाहीत.।।३१।।आता तुम्ही इथे उभे न रहाता निघून जा. तुम्हांस माझ्याकडून विस्तव काही मिळणार नाही.त्या तुमच्या वेड्यापिशाची माझ्या लेखी काहीच किंमत नाही.।।३२।।ती मुलें अशा रितीने विन्मुख परत आलीं व सोनाराच्या दुकानांत घडलेली हकीकत महाराजांस त्यांनी निवेदन केली.।।३३।।ती हकीकत ऐकताच दयाघन गजानन महाराज हसून बोलले,'अरे, आपल्याला त्याच्या विस्तवाची मुळीच आवश्यकता नाही.'।।३४।।असे म्हणुन त्यांनी चिलीम आपल्या हातांत घेतली आणि बंकटलालास फक्त एक काडी त्या चिलीमेवर धरावयास सांगितली.।।३५।।त्यावर बंकट म्हणाला,' महाराज तुम्ही थोडे थांबावे. मी लगेच आपणासाठी काडी घासून विस्तव पेटवून देतो.।।३६।।काडी घासल्याशिवाय काही अग्नी प्रगटणार नाही,म्हणून मी तुम्हांस ही विनंती करतो. हे समर्था,ती तुम्ही मान्य करावी.'।।३७।।त्यावर महाराज त्यास उत्तरले,तू आता उगाच बडबड करू नकोस.तू फक्त एक काडी ह्या चिलीमेवर धर व तिला मुळींच घासूं नकोस.।।३८।। बंकटलालाने तसेच केले व समर्थ-आज्ञा म्हणून नुसत्या एका काडीस चिलीमेवरती धरले.।।३९।।तेव्हा काय चमत्कार झाला, तो तुम्ही चतुर श्रोत्यांनी श्रवण करावा. नुसती एक काडी त्या चिलीमेवर धरल्यावर साक्षात वैश्वानर(अग्नी) तिथे प्रगट झाला.।।४०।।खरे तर त्या काडीत विस्तवाचा अंशही नव्हता.हा खचितच महाराजांच्या लोकोत्तर शक्तीचा प्रभाव होता.।।४१।।काडी तर तशीच न जळता मूळ रूपात होती,चिलीमही पेटली गेली होती,ह्या कशाचीच जरूरी त्या खर्‍या साधूला पडली नाही.।।४२।।श्रोतेहो,ह्याचेच नांव साधुत्व होय.हे काही उगीच थोतांड नव्हतें.आतां सोनाराच्या घरांत काय झालें तें तुम्ही ऐका.।।४३।।या अक्षयतृतियेला चिंचवण्यास विशेष मान असतो. जसे की वर्षप्रतिपदेला निंबाच्या फुलांचें फार महत्त्व असते.।।४४।।असो.तर त्या सोनाराच्या घरी भोजनासाठी पंगत बसली होती व द्रोणांत चिंचवणें वाढलेंले होते.तोच एक अघटीत प्रकार तिथे घडून आला तो तुम्ही ऐका.।।४५।।त्या वाढलेल्या चिंचवण्यामध्ये नाना प्रकारच्या अळ्या त्या पंगतीस बसलेल्यांस दिसून आल्या.भोजनांत असा अळ्यांचा बुजबुजाट झालेला पाहून त्या सर्वांस अतिशय किळस वाटली.।।४६।।सारे लोक अवघ्या अन्नांस टाकून पात्रांवरुन तसेच उठले.सोनार अतिशय दु:ख्खी होऊन अधोवदन बसला.त्याला ह्या सर्व प्रकारचे कारण काही उमजत नव्हते.।।४८।।त्या दुषित चिंचवण्याच्यामुळें अवघेच अन्न वायां गेलें होते.मग त्याला कोडें उमगलें  की हे असे घडण्याला मीच कारण आहे.।।४८।।मी सकाळी साधूंस विस्तव दिला नाही,त्यांच्या साधुत्वाची प्रचीती मला तात्काळ आली.श्री गजाननाची अगाध लीला मी खचितच जाणली नाही.।।४९।।गजानन महाराज हे जान्हवीच्या पवित्र जलाप्रमाणे आहेत,पण मी त्यांना थिल्लर मानले. श्री गजानन राजराजेश्वर असतांना मी त्यांस भिकारी समजलो.।।५०।।गजानन स्वामी खरोखर त्रिकालज्ञ आहेत,परंतु मी त्यांस पूर्णपणे वेडा मानले.साक्षात कल्पतरुंस मी बाभळ समजत होतो.।।५१।।गजानन महाराज प्रत्यक्ष चिंतामणी आहेत, पण मी त्यांस साधी गारच लेखत होतो.श्री गजानन कैवल्यदानी आहेत,पण मी त्यांस ढोंगीच मानत होतो.।।५२।।हाय हाय रे माझ्या दुर्दैवा, तू असा कसा ऐनवेळी दावा साधलास? माझ्या हातून तू काही संतसेवा घडू दिली नाहीस.।।५३।।माझा धिक्कार असो.मनुष्याचा जन्म घेऊनदेखील ह्या भूमीला मी केवळ भारच आहे. जणू काही मी दोन पायांचा पशुच आहे.।।५४।।आज माझ्या भाग्योदयाच्याच वेळी नेमकी माझी मति फिरली.माझ्याच हाताने मी ही सुयोगाची जी वेळ आली होती ती दवडली.।।५५।।असो,जे घडून गेले ते गेले,आता  काहीही झाले तरी मी बंकटाच्या घरी जाऊन समर्थांचे पाय धरतो.त्यांच्या पदी अनन्य होऊन माझ्या चुकीची क्षमा मागतो.।।५६।।असा विचार करून,तो सोनार आपल्या सोबत ती नासलेली चिंचवणी घेऊन बंकटलालाच्या घरी आला व झालेली सर्व हकीकत सांगू लागला.।।५७।।'अहो बंकटलाल शेटजी,आज माझा घात झाला.ह्या चिंचवण्यास पहा,ह्यांत कसे किडे पडले आहेत ते बघा.।।५८।।श्राद्धासाठी आलेली सर्व माणसें तशीच उपोषित उठलीं. त्यांमुळे श्राद्धघात झाला.हे असे घडण्यांस माझा मीच कारणीभूत आहे.।।५९।।आज सकाळी माझ्याकडे लहान मुले समर्थांच्या चिलिमीसाठी विस्तव मागत होती आणि मी त्यांना तो दिला नाही.।।६०।।त्याचेंच हें फळ मला मिळाले.त्यामुळेंच ही सर्व चिंचवणी नासली.' जानकीरामाचे तें सर्व बोलणे ऐकून बंकटलाल उत्तरला,'अहो तुम्हीं चिंचोके नीट पाहिले नसतील,ते कदाचित किडलेलें असतील.म्हणूनच तुमची चिंचवणी नासली असेल,असेच मला वाटते.'।।६१-६२।।त्यावर तो सोनार उत्तरला,'शेटजी,तुम्ही अशी शंका मुळीच घेऊं नका.ती नवीन चिंच होती,मग त्यांत चिंचोके किडके कसे असणार ?।।६३।।मी जी चिंच फोडली, तिचीं टरफलें अजून पडलीं आहेत व चिंचोक्यांचीही रास तिथेच आहे.तुमची इच्छा असल्यास ती तुम्ही बघू शकता.।।६४।।पण माझी तुम्हांस एवढीच विनंती आहे की शेटजी, तुम्ही मला लगेचच समर्थांच्या पायांवर नेऊन घाला.।।६५।।मी अनन्यभावाने माझ्या अपराधाची क्षमा मागेन.मुळातच श्री गजानन साधू,दयेचे परिपूर्ण सागर आहेत.'।।६६।।त्वरित जानकीराम समर्थांपुढें भीत भीतच गेला.त्याने समर्थांना साष्टांग दंडवत घातला.।।६७।। आणि त्यांस दीनपणे म्हणाला,' हे दयाघना, तुला माझी करुणा येऊ दे. मी खूप अपराध केले आहेत, तरी तू मला क्षमा करावेस. तू या शेगांवांत नांदणारा साक्षात उमानाथ आहेस. तुझ्याविषयी माझ्या मनांत भ्रांत होती, तिचे आज तू निवारण केलेस.हे माझे अवघे अपराधरुपीं तृण तू  तुझ्या अग्नीरुपी कृपेने जाळून टाक. समर्था, आजपासून मी तुझी निंदा करणार नाही.जी आज मला शिक्षा केलीस, तेवढीच मला पुरे झाली.तूं अनाथांचा वाली आहेस, तेव्हा आतां माझा आणखी अंत पाहूं नकोस.।।६८-७१।।त्यावर महाराज बोलले,जानकीरामा,तू किंचितही खोटे बोलू नकोस. तू आणलेली ही चिंचवणी मधुरच आहे. त्यामध्यें किडे पडलेले नाहीत.।।७२।।ते ऐकताच सर्वजण ती चिंचवणी पाहू लागले.त्यावेळी जो प्रकार आधी घडला होता,त्याचा कुठेही मागमूस नव्हता.जणु असे काही घडलेच नव्हते.।।७३।।ते सर्वजण आश्चर्यचकित झाले, त्यांना समर्थांचें महत्त्व कळलें.हां हां म्हणतां हें वृत्त त्या गांवामध्यें पसरले.।।७४।।ज्यांच्या त्यांच्या तोंडीं हीच हकीकत होती.खरोखर, कस्तुरी झाकली तरी तिचा सुवास लपवता येत नाही.।।७५।।त्या शेगांवात चंदुमुकीन नांवाचा एक गृहस्थ होता. तो समर्थांचा निःसीम भक्त होता. त्याची ही कथा तुम्ही ऐका.।।७६।।श्रोतेहो,एका ज्येष्ठ मासांत समर्थांच्या सभोवती सर्व भक्त जमले होते. ते अत्यंत आदराने हात जोडुन समर्थांच्या चरणांकडे दृष्टि ठेवून बसले होते.।।७७।।काही जण आंबे कापत होते तर कोणी त्या फोडी समर्थांच्या हातांत देत होते. तर काही भक्त समर्थांस पंख्यानें वारा घालत होते.।।७८।।काही जण खडीसाखर वाटत होते, तर कोणी त्यांच्या गळ्यांत हार घालत होते.इतर भक्त गजानन साधूंच्या अंगांस शीतल चंदन लावत होते.।।७९।।तेव्हा महाराज चंदूला म्हणाले," हे आंबे मला नकोत. तुझ्या घरातील उतरंडीला असलेले दोन कान्होले तू मला आणून दे.।।८०।।त्यावर चंदू कर जोडून उत्तरला," महाराज, आतां माझ्या कानवले घरी कसे असतील ? आपली इच्छा असल्यास, हे गुरुराया, मी ताजे तळून आणतो."।।८१।। तेव्हा महाराज परत बोलले , "ताजे कानवले करायची गरज नाही. मला तर तुझ्या घरातील उतरंडीत असलेलेच कानवले खाण्यास हवे आहेत. जा आता, उगाच उशीर करू नकोस, वा काही सबबी सांगू नकोस.अरे वेड्या,गुरूशी कधीही यत्किंचित् खोटें बोलू नये."।।८२-८३।।हे ऐकून तिथे असलेले भक्तगण त्या मुकिन चंदूस बोलू लागले,"तू आता लवकर घरी जाउन पहा कारण की संतवाणी कधीच खोटी होत नाही."।।८४।।चंदू लगेच घरी गेला व "आपल्या घरातील उतरंडीस दोन कानवले आहेत का ग ?" असे पत्नीस विचारू लागला.।।८५।।त्यांवर त्याची पत्नी म्हणाली,"कानवले केले होते त्यांस आता एक महिना होऊन गेला तर आता आपल्या घरांत कानवले कसे बरे मिळणार?हे पतिराया, अक्षयतृतीयेला मी कानवले केले होते, ते तर त्याच दिवशी संपले.त्यांमुळे आता काहीच शिल्लक नाहीत."।।८६-८७।।"आपली इच्छा असल्यास मी आत्ताच ताजे कानवले श्री समर्थांसाठी करते अन तळून देते. हे पहा नाथा, मी ही कढई लगेचच चुलीवर ठेवते.।।८८।।तुम्ही थोडाच वेळ थांबा. घरांत अवघेच सामान तयार आहे,तेव्हा कानवल्याच्या साहित्यासाठी बाजारांतही जायला नको."।।८९।।त्यावर चंदू वदला,"प्रिये,ताजे कानवले समर्थांस नको आहेत, जे तू उतरंडीत दोन कानवले ठेवले आहेत, तेच तू मला दे. समर्थांनीं मला जसे  सांगितले आहे तेच मी तुला आत्ता निवेदन केले. तेव्हा तू जरा नीट आठवून पहा बरे !" ।।९०-९१।।पतीचे ते बोलणे ऐकून त्याची पत्नी विचारात पडली व मनांत "आपण कानवले कुठे ठेवलेत का ?" हे आठवून ते शोधू लागली.।।९२।कानवले शोधत असतांना तिला अचानक काहीतरी आठवले व "अहो,समर्थ वचन सत्य आहे." असे ती आपल्या पतीस बोलली.।।९३।।दोन कानवले उरले होते खरे, ते मी तेव्हा उतरंडीत ठेवले होते.पण मला इतक्या महिन्यांत त्याची आठवणही झाली नाही.।।९४।।आता तर त्या गोष्टीला महिना होऊन गेला आहे. त्या कानवल्यांस कदाचित बुरशीदेखील आली असेल,ते खाण्यासाठी निश्चितच योग्य नाहीत.।।९५।।असे बोलून ती तात्काळ उठली व स्वयंपाकघरातील उतरंडीत शोधू लागली.तेव्हा कानवले ठेवलेली एक मातीची कळशी तिला सापडली.।।९६।।तिने त्यांत डोकावून पाहिले तर तिच्या दृष्टीस दोन कानवले पडले, जे थोडे सुकून गेले होते.।।९७।।श्रोतेहो, त्या कानवल्यांना बुरशी मुळींच आली नव्हती.खरोखर या जगांत संतवाणीला कधीच बट्टा लागलेला नाही.।।९८।।कानवल्यांस पाहून त्या उभयतांचें मन अतिशय आनंदले.महा समर्थ सिद्धयोगी साधु गजानन खरेच धन्य आहेत.।।९९।।त्यानंतर चंदू तें कानवले घेऊन समर्थांकडे आला व त्याने ते कानवले त्यांस अर्पण केले.ते पाहून सर्व लोक आश्चर्य करू लागले.।।१००।।स्वामी गजानन खचितच त्रिकालज्ञ आहेत व त्यांस अवघेच भूत भविष्य वर्तमान कळते असे तें लोक म्हणू लागले.।।१०१।।चंदूच्या त्या कानवल्यांस पुण्यराशी गजानन सेवन करते झाले, ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी शबरीच्या बोरांस खाल्ले होते.।।१०२।।श्रोतेहो, शेगांवच्या दक्षिणेस एक चिंचोली नावाचे गांव आहे, तिथे एक माधव नावाचा विप्र रहात होता.।।१०३।।त्याचे वय साठापेक्षाही जास्त होते, वृद्धत्वामुळे तो गलितगात्र झाला होता.तरुणपणीं केवळ संसार हेच जणू त्याचे ब्रह्म होते.।।१०४।।ह्या भूमीवर प्रारब्धाच्या पुढे कुणाचे चालले आहे ?ब्रह्मदेवाने जी काही अक्षरें लिहिलीं असतील तीच खरी होतात.।।१०५।।माधवाची बायको अन मुले मृत झाले होते, त्यास जवळचे कोणीही उरले नव्हते.म्हणूनच त्याचे मन संसारातून विरक्त झाले होते.।।१०६।।ज्या काही चीजवस्तू शिल्लक होत्या,त्याही संपून गेल्या.'आता माझे काय दशा होणार?' अशा चिंतेने तो ग्रासला होता.।।१०७।।मी केवळ ज्या संसारात रमलो,तो तर आता अवघाच नष्ट झाला. हे दीनबंधो मी तुझे कधी एक क्षणही स्मरण केले नाही.।।१०८।। आता हे दीनदयाळा एक तुजवांचून कोण बरे माझा वाली असणार? देवा, माझे हे अरण्यरुदन तुझ्याशिवाय कोण ऐकणार?।।१०९।।असा पश्चात्ताप होऊन तो शेवटीं शेगांवीं आला आणि गजाननाच्या दारी तो एकच हट्ट धरून बसला.।।११०।।त्याने अन्न-पाणी त्यागून उपोषण आरंभिलें व अखंड नारायण नाम तो वदनी जपू लागला.।।१११।।असाच एक दिवस गेला,पण तो काही तिथून उठला नाही.तेव्हा महाराज त्यास वदले की हे असे करणे योग्य नव्हे.।।११२।।हेच हरीचें नामस्मरण तू पूर्वी का बरे केले नाहीस ?देहांताच्या समयी आता वैद्य बोलावून काय उपयोग होणार?।।११३।।सारे तारुण्य ब्रह्मचारी म्हणून राहिल्यावर म्हातारपणी पत्नी आणण्याला काहीच अर्थ नाही. अरे, योग्य वेळी साधन वापरले नाही तर त्याचा कधीही उपयोग होत नाही.।।११४।।जे करायचें ते नेहेमीच विचारपूर्वक वेळेवर करावे.एकदा का घर पेटले की मग विहीर खोदण्यास सुरवात करणे निरर्थकच असते.।।११५।।ज्या कन्यापुत्रांसाठीं तूं एवढा झिजलास,ते अवघेच तुला एकटे टाकून निघून गेले.।।११६।।तू शाश्वताला विसरुन केवळ अशाश्वतातच रमला.त्या तुझ्या कर्माचीं फळें तुला भोगणें भाग आहे.।।११७।।तीं कर्म फ़ळें भोगल्याशिवाय तुझी सुटका होणार नाही. तेव्हा तू मनांत सारासार विवेक करून हा हट्टीपणा सोडून दे.।।११८।।परंतु माधवाने ते काही न ऐकता आपला हट्ट सोडला नाही. त्यास भोजन घालण्याचे इतर लोकांचे प्रयत्नही वाया गेले.।।११९।।शेगांवचा कुलकर्णीदेखील त्याला आपल्या घरी येऊन असे अन्नाशिवाय न राहातां भोजन करण्याची विनंती करू लागला.।।१२०।।पण माधवाला तेंही म्हणणें पटलें नाही. तो तसाच समर्थांजवळ हरीचे नाम घेत बसून राहिला.।।१२१।।हळूहळू आकाशांत अंधार दाटु लागला, रात्रीचे दोन प्रहर झाले. रातकिड्यांची किरकिर वरचेवर होऊ लागली.।।१२२।।आसपास कुणीही नाही, हे पाहून स्वामी गजाननांनीं तेव्हा एक कौतुक केले.।।१२३।।महाराजांनी भयंकर रूप धरले जणु काही दुसरा यमाजी भास्करच ते भासत होते. असे तें महाराज माधवावर आ पसरुन त्यास भक्षण्यास धांवून आले.।।१२४।।त्यांमुळे माधव आपला जीव वाचवण्यास पळू लागला.तो खूपच घाबराघुबरा झाला होता,त्याची छाती धडधडत होती.।।१२५।।त्याच्या तोंडाला बुडबुडे (फेस) आले होते, मुखातून एकही शब्द फुटत नव्हता.त्याची अशी स्थिती पाहून समर्थांनी सौम्य रुप धारण केले.।।१२६।।आणि गर्जून बोलू लागले,' माधवा, हेच काय तुझे धीटपण ? तू काळाचें भक्ष्य आहेस, तो काळ तुला असाच खाईल.।।१२७।।तुला मी केवळ चुणूक दाखवून पुढील भविष्य दाखवले. तुला यमलोकांत पळण्यासाठी आता जागा उरली नाही.'।।१२८।।ते ऐकून माधव विनयाने बोलला,आता मला यमलोकाची वार्ताच नको, माझे हे  विधीलिखित (आपल्या कृपाकटाक्षाने) टाळा.।।१२९।।आता हे जगणेही नको, मला आता वैकुंठप्राप्ती व्हावी. महाराज, हीच माझी शेवटची आपणांस विनंती आहे.।।१३०।।यमलोकीं जें दिसणार होतें,तेच तुम्हीं इथे दाखविले. आतां या लेकरास यमलोकीं धाडूं नका.।।१३१।।जरी माझ्या पातकाच्या राशी असंख्य आहेत, तरी त्या सर्व जाळणें तुम्हांस मुळीच अशक्य नाही.।।१३२।।माझ्या गाठीशी काही तरी सुकृत होते, म्हणूनच मला तुमचे दर्शन झाले. संत दर्शन झालेल्यांस कधीही यमलोकाची भीती नसते.।।१३३।।असे त्याचे बोलणे ऐकून समर्थ हसून वदले,महापातक्यालाही पावन/पवित्र केवळ साधूच करू शकतात.।।१३४।।तेव्हा माधवा,'श्रीमन्नारायण नारायण ' असेच तू भजन करीत रहा.तुझें मरण जवळ आले आहे, तू आतां गाफील राहूं नकोस.।।१३५।।किंवा तुला अजून जगण्याची इच्छा आहे का ? ती असल्यास मी तुझी आयुष्यवाढ करतो.।।१३६।।त्यांवर माधव उत्तरला, गुरुराया, मला आतां आयुष्याची वाढ नको.ही प्रपंचमाया खोटी आहे, त्यांत मला तुम्ही आतां अडकवू नका.।।१३७।।महाराज तथास्तु असे वदले व पुढे म्हणाले, तू जे मागितलेस ते मी तुला दिले. आतां या भूमीवर तुला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही.।।१३९।।अशा रितीने त्या दोघांचा गुप्त संवाद झाला.त्याचे वर्णन करण्यास माझी वाणी असमर्थ आहें.।।१३९।।त्यानंतर माधव आपले देहभान, दिनचर्या सारे काही विसरला.तो करत असलेल्या उपवासामुळेच त्याचे मस्तक फिरले, असे कित्येक लोक बोलू लागले.।।१४०।।त्यास वेड लागले आहे अश्या अनेक वदंता त्यावेळी उठल्या. त्या सर्व कुठवर सांगाव्यात ?।।१४१।। असो.माधवाचे   देहावसान समर्थांच्याच जवळ झाले. श्री गजाननाच्या कृपेनें त्याचा जन्म-मृत्यूचा फेरा चुकला.।।१४२।।असो. एकदा श्री समर्थांस एक इच्छा झाली, ती त्यांनी आपल्या शिष्यवर्गाजवळ व्यक्त केली. ।।१४३।।वैदिक ब्राह्मण बोलावून इथे आपण मंत्रजागर करू या. वेद श्रवणाने परमेश्वरांस अतिशय आनंद होतो. ।।१४४।।पन्हें,पेढे,बर्फी आणि खवा (प्रसादासाठी) आणा.भिजल्या डाळीस मीठ लावा.घनपाठी ब्राह्मणांस एकेक रुपया (दक्षिणा म्हणून) द्या.।।१४५।।असे महाराजांचे बोल ऐकून शिष्य त्यांस विनवूं लागले, या आपल्या शेगांवात असे वैदिक ब्राह्मण आतां उरले नाहीत.।।१४६।।आपण सांगाल तो खर्च आम्ही करू खरा, पण ब्राह्मण मिळणे हीच एक मोठी अडचण आहे.यांवर आमच्याकडे काही उपायही नाही.।।१४७।।त्यांवर महाराज म्हणाले,तुम्ही उद्या तयारी करा तर खरी, श्रीहरी तुमच्या वसंतपूजेसाठी ब्राह्मण नक्की पाठवेल.।।१४८।।मग काय विचारता,सर्व भक्तगण अतिशय आनंदित झाले,हां हां म्हणतां शंभर रुपये जमा होऊन (मोठ्या उत्साहात)सर्व तयारी झाली.।।१४९।।सर्व सामान आणले गेले.चंदनाचें उटणें केलें,त्यांत केशर व कापुरही कालवला.।।१५०।।भक्तजनहो,दोन प्रहरी काही ब्राह्मण शेगावी येते झाले, जे पदक्रम जटेला जाणत होते.।।१५१।।त्यांमुळे वसंतपूजा अगदी थाटांत साजरी झाली.ब्राह्मण मंडळीही संतुष्ट होऊन दक्षिणा घेऊन अन्य ग्रामी निघून गेली. ।।१५२।।  खरोखरच जे जे संतांच्या मनांत येते, तें तें यत्किंचितही काही कमी न पडू देता रमानाथ पूर्ण करतो.थोर संतांचा प्रभाव हा असाच असतो.।।१५३।।त्यानंतरही बंकटलाल अतिहर्षाने हे व्रत दरवर्षी करत असे. अजूनही त्याचे वंशज शेगांवी हे व्रत करतात.।।१५४।।हा दासगणूविरचित 'गजाननविजय' नावाचा ग्रंथ निर्मळ अशा हरिभक्तीचा साधकांना पथ दाखवू दे , हीच श्रीचरणी प्रार्थना.।।१५५।।श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ ॥ इति चतुर्थोऽध्यायः समाप्तः ॥