Apr 15, 2023

श्रीदत्तप्रार्थना ( कामदा छन्द )



श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

व्यर्थ हट्टि मी सांडुनी त्रपा । बाहतों तुला ज्या नये कृपा । रंक पापि मी तूं रमापती । तैं कशी मशीं होय संगती ॥१॥ 
माझे अंगणीं घेवडा नसे । वांझमहिषिचे दूधही तसें । वाळतें जरी दारिं या मढें । धांवतें तुझें चित्त रोकडें ॥२॥ 
असतीच निंदा मदंतरीं । होति फावती तूज बा तरी । जाहला न विद्यामद मला । फावती कशी होय बा तुला ॥३॥ 
ताडिते जरी चोर हें शिर । धांवता तरी हो मुनीश्वर । गांजती जरी क्रूर सुंदरी । बाहतास तूं बा मला तरी ॥४॥
बा दिवाळिचा ये जरी क्षण । ये त्वदागमा योग्य कारण । राज्य असतां तूं पहावया । येसि बा नसें तें कपाळिं या ॥५॥
कर्में माझिया आण घातली । बा तुला तरी ती करी खुली । दीधल्या विना येसि ना जरी । अर्पि सत्य सर्वस्व ते करीं ॥६॥
कामकाक हा त्वत्पदीं वसे । यास्तव तुझा आगम नसे । भक्तमानसहंस शीघ्र या । कामकाक जाईल उडोनिया ॥७॥माझि आण दत्ता असे तुला । दाविं पाउला कीर्तनीं मला । जीवनाविना मीन तळमळें । तुजविणें तसा येथ मी लोळे ॥८॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


स्रोत : प. प. श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामीमहाराजांचा पदसंग्रह 


Apr 10, 2023

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय ७


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे राघवा रामा तुझा जयजयकार असो. हे मेघःश्यामा, संतजनांच्या विश्रामा, हे सीतापतें, दाशरथा तुझा जयजयकार असो.॥१॥ तुझ्याच कृपेनें सर्व वानर ह्या भूमीवर बलवान झालें. हे देवा, ज्यांनीं लंकेत जाऊन रावणाचा चक्काचूर केला.॥२॥ तुझी कृपा एखाद्यावर झाल्यास तो सर्वदा विजयी होतो. तुझा भक्त जें जें इच्छील तें तें काम सफळ संपूर्ण होतें.॥३॥ हे देवा, एखाद्यास भूपतीचे साहाय्य लाभल्यास तो कितीही नीच असला तरी सर्वांस वंद्य होतो.॥४॥ अशा अमोघ कृपेला मी खरोखर पात्र होईल का ? याचा जों मीं विचार केला, तर असे कळून आलें की ना माझ्याकडे ज्ञान आहे वा हे श्रीपती माझी भक्तीही खरीखुरी नाहीं. पांडुरंगा, अशी माझी स्थिती दयनीय आहें.॥५-६॥ तसेंच माझे मनदेखील सदा आशाळभूत असून तें कधीही स्थिर होत नाही. मनांत सतत नाना विकल्पही येऊ लागतात.॥८॥ हे दीनबंधो, तुला अगदी मनापासून पातक्याचीच आवड आहें असे पुराणांत दाखले आहेंत.॥९॥ पुण्यवानांना तारल्यास तें काय नवल बरें ? जो पापी मनुष्यास उध्दरतो तोच खरोखर थोर होय.॥१०॥ परमेश्वरा, या जगतीं तुझ्यापेक्षा कुणीही मोठा नाहीं आणि माझ्या पातकांस तू आतां चुकूनही पाहूं नकोस.॥११॥ हे नारायणा, मला सांभाळून घे अन आपल्या मोठेपणाचे रक्षण कर. हा दासगणू तुझ्या चरणीं शरण आला आहें, आतां माझी उपेक्षा करुं नका.॥१२॥ अवघें शेगांव हा मारुतीचा उत्सव साजरा करत होता. गणेशकुळीचा खंडेराव पाटील याचा पुढारी होतां.॥१३॥ हें पाटील घराणें गावांत अतिशय पुरातन व धन-कनकसंपन्न असून त्यांची भरपूर शेतीवाडीही आहें.॥१४॥ पूर्वीपासूनच यांच्या घरीं संत-सेवा होत होती. नशिबाने जमीनदारीही मिळाली. मग काय विचारता?॥१५॥ महादाजी पाटलांचे दोन औरस पुत्र होते. थोरल्या मुलाचे नांव कडताजी असें होते.॥१६॥ तर धाकटाचे नांव कुकाजी होते. या घराण्याला गोमाजी ह्या संतपुरुषाचा उपदेश व आशीर्वाद होता.॥१७॥ कडताजी पाटील ह्यांस सहा पुत्र होते तर कुकाजी भाग्यवान असूनही त्यांच्या पोटी एकही पुत्र नव्हता.॥१८॥ कडताजी पाटलांचे निधन झाल्यावर कुकाजींनीच त्यांच्या सहाही मुलांचे संगोपन जन्मदात्या पित्यासारखें केले होते.॥१९॥ कुकाजींच्या कार्यकाळांत खूपच आर्थिक भरभराट झाली. घरांमध्ये साक्षात अष्टसिद्धि नांदूं लागल्या आहेंत असेच वाटू लागलें.॥२०॥ कुकाजी पाटील ह्यांच्या नंतर खंडू पाटलाने कारभार आपल्या हातांत घेतला. त्याच्या पुढें कधीच कुणाचे काही चालत नसे.॥२१॥ या खंडू पाटलास गणपती, नारायण, मारुती, हरी आणि कृष्णाजी असे पांच भाऊ होते.॥२२॥ आधींच ते पाटील जमीनदार होते वर सर्व सत्ताही त्यांच्याच हातांत होती. त्यांच्या सदनामध्यें अक्षरश: पैशाचा धूर निघत असे.॥२३॥ ते सर्व बंधु तालीम करायचे, तालीम खेळायचे. हरी पाटलास कुस्तीचा खूप छंद होता.॥२४॥ उत्सव केवळ नावाचाच मारुतीचा होता, जयजयकार मात्र पाटलाचा होत असे. त्यांचा म्हणतील तो शब्द झेलणें साऱ्या गावकऱ्यांस भाग होतें.॥२५॥ शेगांवांत नेहमींच कटकटी, मारामार्‍या होत असत. पाटीलबंधू सर्व लोकांस एकाच तऱ्हेची वागणूक देत असत.॥२६॥ हा सज्जन तर तो साधुसंत आहें असे कांही ते मानत नसत. मनांत येईल तसे अद्वातद्वा ते सर्व जनांस बोलत असत.॥२७॥ असो. या पाटीलबंधूंनीं देवळात येऊन महाराजांची सतत हेटाळणी करणे सुरु केलें.॥२८॥ कोणी त्यांना ' अरे वेड्या गण्या, तुला कण्यां-ताक खाण्यास हव्यात का ? ' अश्या प्रकारचे टिंगलटवाळीच्या गोष्टी बोलून ते समर्थांस त्रास देऊ लागलें.॥२९॥ तर कोणी म्हणें तुम्ही आतां आमच्याबरोबर कुस्ती खेळा, तुम्हांस तर सर्व लोक योगयोगेश्वर असे म्हणतात तर तुम्ही आताच त्याचें प्रत्यंतर दाखवा. नाही तर आम्ही मार देऊ, ह्याचा बर्‍या बोलानें विचार करा.॥३०-३१॥ त्यांचे ते सारें बोलणें समर्थ हंसण्यावारी नेत असत. महाराजांनी त्या पाटील बंधूंस ना कधी उत्तर दिले ना कधी ते त्यांच्यावर यत्किंचित्‌ रागावले.॥३२॥ त्या मंदीरात असा तो उर्मट प्रकार नेहेमीच घडू लागला. शेवटी भास्कर पाटील समर्थांस म्हणाला, 'महाराज तुम्ही इथे राहू नका. चला, आपण आकोलीं गावी जाऊ या. ही पाटलांची पोरें खूप माजलीं आहेत, यांचा यांपुढे काही संबंध नको. हे सर्व शक्तीनें माजलें आहेत. पैशामुळें धुंद झाले आहेत.सत्तेपुढें कुणाचेच कांहीं चालत नाहीं, इथे तर यांचीच पाटीलकी आहें."॥३३-३५॥ गजानन महाराज त्यांवर उत्तरले, "भास्करा, थोडा धीर धर. ही सर्व पाटील मंडळी माझे परम भक्त आहेंत.॥३६॥ मात्र यांच्यामध्ये जराही नम्रपणा नाही. तू यांच्या अंत:करणांत थोडे डोकावून पहा, म्हणजे तुझे तुलाच कळेल.॥३७॥ ही पाटलांची मुलें माझींच लेंकरें आहेत. भास्करा, यांच्या कुळावर थोर संतांची कृपा आहे.॥३८॥ उर्मटपणा हेच जमीनदारांचे भूषण असतें. वाघाचे वजन कधी गाईच्या वजनाएवढें असते का?॥३९॥ तलवारीला मऊपणा काय उपयोगाचा बरें ? वा अग्नीनें कधी शीतलता धारण करावी का ?॥४०॥ कांहीं काळानंतर हा उर्मटपणा नक्की जाईल. पावसाळ्यातील गढूळ जल हिंवाळ्यांत कसें नितळ स्वच्छ होतें."॥४१॥ एके दिवशीं हरी पाटील मारुतीच्या मंदीरात आला आणि महाराजांस हाताने पकडून 'माझ्याबरोबर कुस्ती करा.' असे बोलू लागला.॥४२॥ तुला आतांच मी कुस्तींत चीत करीन, चल आपण तालमींत जाऊं. इथे उगाच ' गण गण गणांत बोते ' असें म्हणत असा बसू नकोस.॥४३॥ या शेगांवी तुझे प्रस्थ खूप माजलें आहें, ते आज मी खरें की खोटें आहे तेच बघतो. मला तू कुस्तीत हरविलेस तर तुला मी मोठें बक्षीस देईन.॥४४॥ समर्थांनी ते मान्य केलें. दोघेंही तालमीमध्यें गेले. त्यावेळीं समर्थांनी काय कौतुक/ गम्मत केली ते आतां जाणून घ्या.॥४५॥ श्री गजानन तालमींत जाऊन खाली बसले आणि आतां मला जागेवरून उठव असे म्हणाले. हरी, तू जर खरांच पहिलवान असशील तरच तू हे करू शकशील.॥४६॥ हरी पाटील समर्थांस उठवण्यासाठी प्रयत्न करू लागला. परंतु ते सारेच वायां गेले. समर्थ आपल्या जागेवरून मुळींच हालले नाहींत.॥४७॥ तो घामाघूम झाला. पूर्ण ताकदीने तो समर्थांसी झुंज देऊ लागला खरा, पण कुस्तीतील त्याचे सारे पेच निष्फळ झाले.॥४८॥ हरी मनांत विचार करू लागला, हा केवढा तरी सशक्त आहें ? अचल असा पर्वतही याच्यापुढें अगदीच उणा पडेल.॥४९॥ हा जरी किडकिडीत दिसतो तरी याची शक्ती मात्र एखाद्या हत्तीसारखी आहें. तरीही आजपर्यंत आमच्या साऱ्या खोडया यानें सहन केल्या.॥५०॥ याचें एकमेव कारण म्हणजे हा बलवान गजराज तर आम्ही क्षुद्र जंबुक होतो.म्हणूनच हा (दयासागर ) आम्हांवर रागावला नाहीं.॥५१॥ जंबुकाच्या चेष्टेला गजपती कधीच महत्त्व देत नाहीं. श्वानांच्या भुंकण्यांस वाघ अजिबात किंमत देत नाहीं.॥५२॥ आतां काही असो, यांच्या पायांवर डोके ठेवणे आलें. आजपर्यंत मी कुणालाही कधी नमन केले नाहीं.॥५३॥ समर्थ हरीला म्हणाले,आम्हांस आतां बक्षिस द्यावे, नाही तर तू मला कुस्तींत चीत करावेस.॥५४॥ कुस्ती हा मर्दानी षोक सर्वांहुन श्रेष्ठ असा आहें. अरे,कृष्ण-बलरामानें त्यांच्या बालपणीं अशाच कुस्त्या खेळल्या होत्या.॥५५॥ ह्याच मल्लविद्येनें त्या परमेश्वरानें मुष्टिक आणि चाणूर या कंसाच्या देहरक्षकांचा वध केला.॥५६॥ पहिली संपत्ति हें शरीर, दुसरीं तें घरदार तर तिसरी संपत्ती म्हणजे धनधान्य होय.॥५७॥ तुझ्याप्रमाणेंच पूतनारीही पाटील होता. यमुनातीरीं त्यानें गोकुळींचीं सारी मुलें बलवान केली होती.॥५८॥ तसेंच तुही करावेस. शेगांवातील लोकांचे शरीरबळ वाढवावेंस. नाही तर आपलें हे पाटील नांव तू सोडून दे.॥५९॥ हेंच मला तू बक्षीस द्यावेंस, अन्यथा आज माझ्याशी कुस्ती कर. अशा रीतीने समर्थांनीं हरीचा माज उतरवला.॥६०॥ त्यांवर हरी समर्थांस म्हणाला, आपली कृपा झाल्यांस शेगांवच्या लेंकरांस सशक्त करतां येईल.॥६१॥ हरी पाटलानें असे धूर्तपणाचें बोलणें केलें. जे मुळांत शहाणे असतात त्यांना शाळा नको असतें.॥६२॥ असो. त्या दिवसापासून, हरीने या पुण्यपुरुषाशीं उद्धट भाषण करणें सोडून दिलें.॥६३॥ त्यांचे हे असें वागणे बघून इतर बंधू बोलू लागलें, अरे हरी तू त्या जोगड्याला का बरे भितोस हें काही आम्हांस कळत नाहीं.॥६४॥ आपण पाटीलांचे पुत्र असून या गांवाचे जमीनदार आहोंत. पण तू मात्र त्या नागड्याच्या पायीं आपलें डोकें का ठेवतोस ?॥६५॥ त्या वेड्याचे यागांवीं फार थोतांड माजलें आहें. गावकऱ्यांस सावध करण्यासाठीं आपण त्याचा नायनाट केलाच पाहिजे.॥६६॥ आपण जर असें केलें नाही तर अवघे लोक वेडें होतील. साऱ्या गावांस हुशार करणें हेच पाटलाचें खरें कर्तव्य असतें.॥६७॥ ठग साधूचे सोंग घेतात आणि वेडेवाकडे वर्तन करतात. गरीब स्त्रियांना फसवतात, याचा विचार आपण केला पाहिजे.॥६८॥ सोन्यांस कस लावल्याशिवाय त्याचे सोनेपण सिद्ध होत नाही. तुकाराम महाराजांचा शांतपणा ऊसांची परिक्षा घेऊनच कळला.॥६९॥ जेंव्हा रेडा बोलता झाला, तेव्हांच ज्ञानेश्वर महाराजांचे साधूत्व कळले. परिक्षा घेतल्याशिवाय कोणासही उगाचच अस्थानीं मान देऊ नये.॥७०॥ चला, आजच आपण त्याची परिक्षा घेऊ, असे म्हणत ते सर्व ऊंसाची एक मोळी घेऊन मंदिरांत आलें.॥७१॥ हरी काहीच बोलला नाही. मात्र इतरांनी महाराजांना प्रश्न केला, "अरे वेड्या, तुला हा ऊस खावयास हवा आहे का ? ॥७२॥ जर तुझी हा ऊस खाण्याची इच्छा असेल तर तुला आमची एक अट मान्य करावी लागेल. ॥७३॥ आम्हीं या ऊसांने तुझ्यावर प्रहार करूआणि जर त्याचे वळ तुझ्या अंगावर उठले नाहीत तरच तुला योगी मानूं."॥७४॥ त्यांची ही बडबड ऐकून महाराज काहीच बोलले नाहीत. अजाण बालकांचे बालिश चाळे सुज्ञ कधीच मनावर घेत नाहीत.॥७५॥ त्यावर मारुती म्हणाला, अरे हा तर फारच घाबरला आहे. ऊसाचा मार खाण्यासाठी हा कांहीं तयार नाही.॥७६॥ मग गणपती म्हणाला, अरे ह्याचे मौन म्हणजेच त्यानें आपणांस संमती दिली आहें. आतां काय पहातां ?॥७७॥ हें दोघां तिघांस पटले. त्यांनी हातांत ऊस घेतले अन समर्थांस मारण्यासाठी ते त्यांच्या अंगावर धावून आलें.॥७८॥ ते पाहून त्या मंदिरांत असलेले स्त्री-पुरुष घाबरून पळून गेलें. भास्कर मात्र तेवढा श्री समर्थांजवळ थांबला.॥७९॥ भास्कर त्या पोरांस समजावू लागला, " अरे तुम्हीं या ऊंसानें आज श्री समर्थांस मारूं नका.हें कांहीं बरें वर्तन नव्हे.॥८०॥ तुमचा खरे तर पाटील-कुळांत जन्म झाला आहे, त्यांमुळे दीनांविषयीं तुमचें अंतःकरण दयाळू असावें.॥८१॥ तुम्हीं यांस महासाधू असे मानत नसला तरी पण हीन दीन समजून यांना सोडून द्या.हेंच बरें होईल.॥८२॥ अरे, जे शूर शिकारी असतात ते वाघावर हल्ला करतात. उगीच हातांत बंदूक घेऊन नाकतोडा मारत नाहीत.॥८३॥ मारुतीरायानेदेखील त्या रावणाची लंका जाळली. उगीच दुबळ्यांच्या झोंपडया पाहून त्यांवर चाल केली नाही."॥८४॥ त्यावर ती पाटील-पोरें उत्तरली, तुमचे सारें बोलणे आम्ही ऐकले. शेगांवातील सारे लोक यांस अतिशय आदरपूर्वक योगयोगेश्वर असे म्हणतात.॥८५॥ त्याचा योग पाहण्यासाठीच खरोखर आम्ही इथे आलों आहोत. तुम्हीं यांत न पडतां दुरूनच मौज पहा.॥८६॥ शेतकरी कसे आपल्या शेतांत ओंब्या काठीने झोडपून काढतांत त्याचप्रमाणें तें सर्वजण हातांत ऊंस घेऊन समर्थांस मारुं लागले.॥८७॥ पण महाराज मात्र डगमगले नाहींत तर या मुलांस पाहून हसत बसून राहिलें. त्यांच्या अंगावर कोठेंही ऊसाच्या प्रहाराने वळ उठले नाहींत.॥८८॥ ते बघून पोरें घाबरलीं. त्यांच्या चरणीं नतमस्तक होऊन हा खरंच बलवान योगयोगेश्वर आहें असे म्हणू लागली.॥८९॥ महाराज त्या पाटलांच्या पोरांस बोलले," मुलांनो ! तुमच्या हातांना मला मारल्यामुळें खूपच त्रास झाला असेल.॥९०॥ तो श्रम परिहार करण्यासांठी मी तुम्हांस या ऊसाचा रस काढून पिण्यांस देतो.या असे तुम्ही माझ्यापुढें बसा."॥९१॥ असे म्हणून समर्थांनी एक ऊस हातांत घेतला आणि केवळ हातानेंच पिळून त्याचा एका पात्रामध्यें रस काढला.॥९२॥ अशा रितीने समर्थांनीं त्या ऊंसांची अवघीच मोळी पहा पिळली आणि पोरांस ताजा रस पिण्यास दिला.॥९३॥ पुण्यपुरुष श्रीगजानन महाराजांनी चरकाशिवाय ऊसांचा रस काढला. ते पाहून त्या बालकांस अतिशय आनंद झाला.॥९४॥ ही मुळींच दंतकथा नसून योगशक्ति आहें असे लोक म्हणतात. योगानें जी शक्ती प्राप्त होतें, त्यांवर मात करतां येत नाहीं.॥९५॥ पौष्टिक पदार्थांनीदेखील शक्ती येते, पण ती अशी कायम टिकत नाहीं. आपल्या राष्ट्रांस सशक्त करावयाचे असल्यांस योग शिका.॥९६॥ श्रोते हो, हेंच तत्त्व सुचवण्यासाठी त्या पाटील अर्भकांस समर्थांनी रस काढून दाखविला.॥९७॥ समर्थांस वंदन करून ती पोरें निघून गेली. हे सारे वर्तमान त्यांनी खंडू पाटलास श्रुत केलें.॥९८॥ अरे दादा, आपल्या शेगांवीचे गजानन महाराज साक्षात्‌ ईश्वर आहेंत. आम्हांस आजच त्याचा प्रत्यय आलेला आहे.॥९९॥ असें म्हणून त्यांनी सारी हकीकत त्यास सांगितली. ती ऐकून खंडू पाटीलही अंतरी चकित झाला.॥१००॥ मग तोही समर्थांच्या दर्शनांस येऊ लागला. पण त्याची वाणी वा त्याचे बोलणें मात्र यत्किंचित्‌ही मृदू नव्हतें.॥१०१॥ समर्थांस तो खंडू पाटील ' गण्या, गजा ' असें म्हणत असें. अरे-तुरे प्रकारचे हें बोलणें दोन ठिकाणीं होतें.॥१०२॥ जिथे आत्यंतिक प्रेम असते, तिथेच असे घडतें. आई-लेंकरांचे बोलणेंही अरे-तुरेचें असतें.॥१०३॥ हा एक प्रकार झाला. आतां राहिलेला दुसरा प्रकारही सांगतों, तोही तुम्ही सावधान चित्तानें ऐका.॥१०४॥ वतनदार लोकं नोकर-चाकर वा हीन-दीन यांच्याबरोबर जे संभाषण करतात तेंही असेंच एकेरी स्वरुपाचेंच असतें.॥१०५॥ अशा प्रकारें सर्वांनाच अरे तुरे म्हणण्याची खंडू पाटलांस संवय होती. ह्याचें हेच कारण की गावांतील साऱ्या जनतेस तों निःसंशय आपली लेकरेंच समजत होता.॥१०६॥ श्रोतें हो, याच संवयीनें खंडू पाटील श्रीसमर्थांस ' गण्या ' म्हणत असे. इतर कुठलेही कारण त्यांस नव्हते.॥१०७॥ जरी ' गण्या गण्या ' असे तो संबोधित होता, तरीं त्याच्या अंतःकरणांत मात्र समर्थांबद्दल अतिशय प्रेम होतें. पहा बरें, नारळाची बाहेर करवंटीं असली तरी आंत खोबरें असतें.॥१०८॥ अशाच प्रकारचा त्याचा बोलण्याचा परिपाठ होता. कुकाजीचा वृद्धापकाळ झाल्याने तोच शेगांवीचा कारभार करत असें.॥१०९॥ एके दिवशीं कुकाजी खंडूस म्हणाला, " तू प्रतिदिवशीं महाराजांच्या दर्शनास जातोस.॥११०॥ 'या भूमीवर गजानन महाराज एक साक्षात्कारी योगपुरुष आहेत.' असे मला सांगतोस. मग का रे तुझी वाणी त्यांच्यापुढे गप्प होते?॥१११॥ तुला अजून पोरबाळ नाहीं. माझाही आतां वृद्धापकाळ झाला आहें. माझ्या डोळ्यांनी मला नातवंडाचे बोल आणि खेळणे पाहू दे.॥११२॥ तू आज त्यांना विनंती कर,' हे स्वामी समर्थ गजानना, कृपा करून मला एखादे मूल द्या.'॥११३॥ तो जर खरेंच साधू असेल तर तुझे मनोरथ पूर्ण होतील आणि त्यांमुळे माझाही अवघा हेतू तडीस जाईल.॥११४॥ या त्रिजगतांत साधुपुरुषांस काहीही अशक्य नसते. तू संतलाभाचा थोडातरी आपणांसाठी उपयोग करून घे."॥११५॥ तें खंडूस पटले. एके दिवशीं मारुतीच्या मंदिरांत त्यानें समर्थांबरोबर काय बोलणें केले ते तुम्ही ऐका.॥११६॥ अरे गण्या, माझा चुलता आतां वृद्ध झाला आहे. त्याच्या मनांत नातवंड पाहण्याची इच्छा उपजली आहें.॥११७॥ तुला लोक साधु म्हणतात. तुझें दर्शन झाल्यावर मनींच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असेही लोक सांगतात.॥११८॥ त्याचें आतां प्रत्यंतर दाखव. उगाच उशीर करूं नकोस. तुझ्या चरणी ज्याचें शिर आहे, तो निपुत्रिक का बरें रहावा ?॥११९॥ असे तें बोलणे ऐकून महाराज त्यास म्हणाले," आज हें उत्तम घडून आलें अन तू आम्हांपाशी याचना केली.॥१२०॥ तू सत्ताधीश आणि धनवान आहेंस, तूं प्रयत्‍नवादीदेखील आहेस. तरीही तू आम्हांप्रति ही विनंती का करत आहेस हे काही कळत नाहीं.॥१२१॥ धन आणि बळापुढे अवघेंच असहाय्य असते. मग हे मागणे धन आणि शक्तीने का साध्य होत नाही बरें?॥१२२॥ तुझी भव्य शेती आहे,पुष्कळ गिरण्या दुकानें आणि पेढयाही आहेत. या साऱ्या वर्‍हाडांत तुझा शब्द कुणीही मोडत नाहीत.॥१२३॥ मग त्या ब्रह्मदेवास, 'आपणांस एक पुत्र द्यावा' अशी आज्ञा का बरे करत नाहीस? हेच मला एक कोडे पडलें आहे."॥१२४॥ त्यावर खंडू म्हणाला, ही गोष्ट केवळ प्रयत्नांवर अवलंबून नाही. या जगीं जरी पिकें पाण्यापासून येत असली तरी पाणी पाडणें मात्र मानवाच्या हातांत नसते. दुष्काळांत या साऱ्या जमिनी अगदीच कोरड्या-शुष्क होऊन जातात.॥१२५-१२६॥ पण पाणी पडल्यावर मात्र माणूस आपलें कर्तृत्व दाखवू शकतो. अगदी तसाच हाही प्रकार आहे, तिथे केवळ मानवी प्रयत्न पुरेसे होत नाहीत.॥१२७॥ खंडू पाटील असे बोलल्यावर समर्थ हसूंन बोललें, " आतां तूं माझ्याकडे मुलाची याचना केलीस.॥१२८॥ याचना म्हणजे भीक मागणे होय. खंडू, हें तूं आज केलेंस पहा. तुला एक बालक होईल, त्याचे नांव तू भिक्या असे ठेव.॥१२९॥ जरी पुत्र देणें हे काही सर्वतोपरी माझ्या हाती नाहीं, तरी मी तुझ्यासाठीं त्या परमेश्वराला नक्की विनंती करेन.॥१३०॥ तो माझी प्रार्थना ऐकेल, त्या ईश्वराला हें काहीच अशक्य नाही. तुझी घरची परिस्थिती उत्तम आहे, तर तू ब्राह्मणांस आमरसाचे भोजन दे.॥१३१॥ ह्यां माझ्या वचनांवर विश्वास ठेव. तुला पुत्र होईल. मात्र दरवर्षी ब्राह्मणांस आम्ररसाचें भोजन घालत जा."॥१३२॥ हें समर्थ वचन खंडूने ऐकलें आणि घरीं येऊन मंदिरातील सर्व वृत्त कुकाजीस सांगितलें.॥१३३॥ ते ऐकून कुकाजीस अत्यानंद झाला. काही दिवसांनंतर समर्थ वचन खरें झालें.॥१३४॥ खंडू पाटलाची पत्नी, गंगाबाई गर्भवती झाली. नवमास पूर्ण झाल्यावर तिला पुत्र झाला. खंडू पाटील यांस आनंद झाला तर कुकाजीच्या हर्षाला कांही पारावार राहिला नाहीं.॥१३५-१३६॥ त्यांनी खूप दानधर्म केला. गरीबांस गूळ,गहू दिले तर गांवांतील बालकांस पेढे-बर्फीचा खाऊ दिला.॥१३७॥ बाळाचे थाटांत बारसें केले गेले आणि भिकू असे नांव ठेवले. पुढें बाळ शुक्लपक्षीच्या चंद्राप्रमाणें वाढू लागला.॥१३८॥ ब्राह्मणांस आम्ररसाचें भोजन दिलें. शेगांवांत अजूनही ती परंपरा चालली आहें.॥१३९॥ खरोखरच पुण्यपुरुषाची वाणी कशी असत्य होईल बरें?(गजाननाच्या कृपेने) पाटलाच्या ओसरीवर बाळ रांगूं लागला.॥१४०॥ पाटील मंडळींचा हा बोलबाला देशमुखांना काही पटला नाहीं. शेगांवांत पहिल्यापासूनच दुफळी होती.॥१४१॥ तिथे एक फळी देशमुखांची तर एक फळी पाटलांची होती. (त्या सर्वांची) अंतःकरणें एकमेकांबद्दल मुळातच दूषित, कलुषित होती.॥१४२॥ प्रत्येक जण आपापल्या डावांत एकमेकांचा सतत घात करण्याचीच इच्छा करीत असे. त्यांच्या मनांत एकमेकांबद्दल प्रेमाचा लेशही नव्हता.॥१४३॥ त्यांचे शास्त्री दोन, मंत्री दोन, शस्त्री दोन तर तंत्रीदेखील दोन होतें. श्वान जसे एकमेकांपुढें आल्यावर नेहेमीच गुरगुरतात, त्याचप्रमाणें त्या शेगांवांतसुद्धा पाटील आणि देशमुखांत सतत कुरबुर चालें. खरोखर त्यांच्यात छत्तिसाचा आंकडा होता, जो कधीही त्रेसष्टाचा होणार नाहीं.॥१४४-१४५॥ पुढें अशी गोष्ट झाली की कुकाजी नातवंडाला पाहून भीमा नदीच्या तीरी वसलेल्या पंढरींत स्वर्गवासी झाले.॥१४६॥ त्यांमुळे खंडू पाटलांचे मन अगदीच उद्विग्न झालें. तो म्हणू लागला, " आज माझें छत्र पूर्णपणे ढासळलें.॥१४७॥ हे श्रीहरी, ज्या चुलत्याच्या जीवावर मी या भूमीवर निर्भय होतों,तो माझा आधार कां रे काढून नेलास ?" ॥१४८॥ अशी ही संधी पाहून, देशमुखमंडळीना पाटील मंडळींवर बालंट आणण्यासाठी पूर्ण सवड मिळाली.॥१४९॥ श्रोतें हो, तो सारा वृत्तांत मी तुम्हांस आठव्या अध्यायांत सांगेन. ही जमीनदारी म्हणजे प्रत्यक्ष द्वेषाची खाणच आहें, हे सत्य आहें.॥१५०॥ हा दासगणूविरचित गजाननविजय नांवाचा ग्रंथ कुतर्कांस सोडून, एकाग्र होऊन श्रोतेंजन तुम्हीं ऐका.॥१५१॥शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति सप्तमोऽध्यायः समाप्तः ॥         

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


श्री गजानन विजय कथामृत अध्याय १ ते ६ इथे वाचता येतील.