Oct 16, 2019

नवनाथ भक्तिसार आणि कथासार - अध्याय १


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीपांडुरंगाय नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीमातापितृभ्यां नमः ॥ ॐ चैतन्य दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः ॥ ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः  ॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः  ॥ ॐ चैतन्य जालंदरनाथाय नमः  ॥ ॐ चैतन्य अडबंगनाथाय नमः  ॥ ॐ चैतन्य चौरंगीनाथाय नमः  ॥  ॐ चैतन्य रेवणनाथाय नमः  ॥ ॐ चैतन्य भर्तरीनाथाय नमः  ॥ ॐ चैतन्य गहिनीनाथाय नमः  ॥ ॐ चैतन्य नवनाथाय नमः ॥ॐ नमो जी हेरंबमूर्ती ॥ वक्रतुंडा गणाधिपती ॥ विद्यार्णवा कळासंपत्ती ॥ भक्तसंकट वारीं गजानन ॥१॥ सदैव धवला श्वेतपद्मा ॥ विद्याभूषित कलासंपन्नधामा ॥ तुझ्या वंदितों पादपद्मा ॥ ग्रंथाक्षरां बोलवीं ॥२॥ तूं निश्वळ निरंजन निर्विकार ॥ परी भक्तरज्जुबंधनाधार ॥ प्रेमें संभवोनि मूर्ति साकार ॥ आम्हां दासां मिरविसी ॥३॥ तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा ॥ किंकिणीमंडिता ग्रंथादरा ॥ येऊनि स्वामी वदनसुंदरा ॥ मम रसनारस सेवीं कां ॥४॥ अगा अर्थ - लिंग - प्रकरण - ऱ्हस्व - ॥ दीर्घ शृंगार धारणा सुरस ॥ छंद ताल नवरसरस ॥ ग्रंथामाजी आदरीं कां ॥५॥ हे गणाधिपते गणराज ॥ मी अबुध वर्णना आहे सहज ॥ परी कृपा करोनि सकळां भोज ॥ विकळ आपदा हरी आतां ॥६॥ हे मोरेश्वरा गणाधिपति ॥ सर्वविषयाधीशमूर्ती ॥ मंगळारंभी मंगळाकृती ॥ आरंभीं स्तुती पार्थितो ॥७॥ तरी सरस्वती कळामांदुस ॥ सवे घेऊनि वहनहंस ॥ या संतांगणीं येऊनि सभेस ॥ विराजावें महाराजा ॥८॥ जी मंगलदायक वाग्भवानी ॥ चातुर्थसरिता ब्रह्मनंदिनी ॥ ती महाशक्ती हंसवाहिनी ॥ येऊनि घेई महाराजा ॥९॥ जीचेनि कृपें वांकुडें दृष्टी ॥ वाचस्पतीच्या मिरवती कोटी ॥ ती माय तूं सवें गोरटी ॥ घेऊनि येई महाराजा ॥१०॥ असो ऐसें पाचारणवचन ॥ ग्लानित भावना सम्यक् पाहून ॥ ग्रंथासनीं मूर्तिमंत येऊन ॥ वरालागीं ओपिजे ॥११॥ सकळसिद्धी पूर्णपणा ॥ पावोत ऐशा विनीतवचना ॥ वरद मौळी हस्तकंजना ॥ स्पर्शोनि ज्ञान मिरविलें ॥१२॥ म्हणे महाराजा कलोत्तमा ॥ सिद्धी पावेल काव्यमहिमा ॥ ऐसे बोलोनि सुशीलधामा ॥ रसने स्थापिली सरस्वती ॥१३॥ यापरी नमितों श्रीगुरुराज ॥ जो अज्ञानतमी सविता विराजे ॥ जो मोक्षपदातें वरवूनि काज ॥ साधकातें विराजवी ॥१४॥ तो ज्ञानेश गुरु ज्ञानदिवटी ॥ संजोगोनि बैसला मम पृष्ठीं ॥ लेखणी कवळोनि करसंपुटीं ॥ ग्रंथालागीं आदरीतसे ॥१५॥ वरदहस्तें स्पर्शोने मौळी ॥ फेडिली सकळ अज्ञानकाजळी ॥ यापरी तया बद्धांजुळी ॥ अनन्यभावें नमितों मी ॥१६॥जो नरहरिवंशीं विजयध्वज ॥ धुंडिराज नाम तयाचें साजे ॥ तोही पृष्ठीं बैसोनि सहज ॥ ग्रंथालागीं आदरीतसे ॥१७॥ आतां नभूं ज्ञानशक्ती ॥ जी सत्तामयी चिदभगवती ॥ अनन्यभावें चरणांवरती ॥ भाळ तिचिये अर्पोनियां ॥१८॥ यापरी नमितो श्रोते संत ॥ कीं तुमच्या गृहींचा मी अतीत ॥ तरी ग्रंथांतरीं सुरस नितांत ॥ प्रेमभरित दाटवा ॥१९॥ अहो प्राज्ञिक संत श्रोतीं ॥ प्रत्यक्ष तुम्ही महेशमूर्ती ॥ तुम्हां वर्णावया अबुध शक्ती ॥ मजमाजी केवीं मिरवेल ॥२०॥ परी धन्य तुम्ही भक्तिंवाडें ॥ स्वीकारितां बोल बोबडे ॥ जड बाळा उभवोनि कोडें ॥ जगामाजी मिरवितां ॥२१॥ कीं पहा जैसें कांचमण्यास ॥ सोमकांत नांव ठेविलें त्यास ॥ तेणोंचे शब्दें लाज सोमास ॥ वरवूनि बुंदां ढाळीतसे ॥२२॥ तेवीं तुमचा शरणागत ॥ नरहरि मालू धुंडीसुत ॥ तस्मात महंत श्रोते संत ॥ करा सरतें आपणांतरीं ॥२३॥ यापरी पूर्वी कथासारामृत ग्रंथ ॥ वदविला तुम्हीं श्रद्धायुक्त ॥ आतांही ओपूनि वरद हस्त ॥ भक्तिसार वदवा हा ॥२४॥ जे संत झाले जगद्विख्यात ॥ तयांचें माहात्म्य वदविलें समस्त ॥ परी सारसार कथा त्यात ॥ उरल्या असती महाराजा ॥२५॥ ज्या संतांच्या पायी रत ॥ गुरुमूर्ती प्रतापवंत ॥ कि ज्यांनी सांप्रदाय जगद्विख्यात ॥ जगामाजी स्थापिले ॥२६॥  तरी त्यांची सर्व कथा ग्रंथीं ॥ स्वीकारावया अवधान द्यावें श्रोतीं ॥ असो कलिप्रारंभीं रमापती ॥ नवनारायणां पाचारी ॥२७॥ उद्भवासी बैसवोनि सन्निध ॥ कनकासनीं यादववृंद ॥ तंव ते नवनारायण प्रसिद्ध ॥ प्रविष्ट झाले द्वारके ॥२८॥ कवि प्रथम हरि दुसरा ॥ अंतरिक्ष तृतीय होय चतुर ॥ महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर ॥ नारायण चतुर्थ तो ॥२९॥ पंचम महाराज पिप्पलायन ॥ सहावा आविर्होत्र नारायण ॥ सातवा द्रुमिल आठवा चमस जाण ॥ करभाजन नववा तो ॥३०॥ ऐसे नवनारायण महाराज ॥ द्वारकेंत पातले सहजासहज ॥ रमापतीचें पाचारणचोज ॥ दृश्य झाले धवळारी ॥३१॥ हरीनें पाहतांचि नारायण ॥ सोडिता जाहला सिंहासन ॥ परम गौरविले आलिंगून ॥ कनकासनीं बैसविले ॥३२॥ सकलवैभवभूषणाकार ॥ मेळवोनि सकळ अर्चासंभार ॥ सारिता झाला सपरिकर ॥ षोडशोपचारें पूजेसी ॥३३॥ हरिचा गौरव पाहोन ॥ बोलते झाले नारायण ॥ कवण अर्थी पाचारण ॥ आम्हांसी केलें श्रीरंगा ॥३४॥हरि म्हणे जो महाराजा ॥ कीं मनीं काम वेधला माझ्या ॥ कलींत अवतार घेणें ओजा ॥ तुम्हीं आम्हीं चलावें ॥३५॥ जैसे सम्रुच्चयें एकमेळीं ॥ राजहंस जाती उदधिजळी ॥ तेवीं तुम्हीं कृपाकल्लोळीं ॥ अवतारदीक्षा मिरवावी ॥३६॥ येरु म्हणती जनार्दना ॥ अवतार घ्यावा कवणे स्थाना ॥ कवण नामीं कवण लक्षणां ॥ जगामाजी मिरवावें ॥३७॥ यावरी बोले द्वारकाधीश ॥ कवि नारायण जो कां प्रत्यक्ष ॥ तेणें मच्छिंद्र होऊनि दक्ष ॥ जगामाजी मिरवावें ॥३८॥ यावरी हरी जो महादक्ष ॥ तो तंव शिष्य होऊनी प्रत्यक्ष ॥ महाराज नामें तो गोरक्ष ॥ जगामाजी मिरविजे ॥३९॥ यापरी अंतरिक्ष नारायण नाम ॥ तो जालिंदर मिरविजे प्रकाम ॥ तयाचा शिष्य भक्तिद्रुम ॥ प्रबुद्ध नामें कानिफा ॥४०॥ यापरी पंचम पिप्पलायन प्रकाम ॥ मिरविजे जगीं चरपट नाम ॥ आविर्होंत्र जो योगद्रुम ॥ मिरविजे जगीं नामें नागेश ॥४१॥ यापरी द्रुमिल अतिसमर्थ ॥ जगीं मिरविजे भरतनाथ ॥ आणि चमस नारायण जगीं विख्यात ॥ रेवणनामें मिरविजे ॥४२॥ नववा जो करभाजन ॥ तो गहिनी ऐसें मिरविजे नाम ॥ ऐसे अवतार महीकारण ॥ दीक्षेप्रति मिरवावे ॥४३॥ म्हणाल एकटपणीं वास ॥ करणें सांगतां आह्मी कलीस ॥ तरी तुम्हांसवें अवतारास ॥ बहुत येतील महाराजा ॥४४॥ प्रत्यक्ष कवि वाल्मीक सुरस ॥ तो पुढें होईल तुलसीदास ॥ आणि शुक महाराज जो ब्रह्ममास ॥ कबीर भक्त होईल तो ॥४५॥ यापरी जो व्यास मुनी ॥ तो जयदेव होईल महाप्राज्ञी ॥ आणि उद्धव माझा प्राणाहुनी ॥ आवडता होईल नामा तो ॥४६॥ आणि भक्तिप्रौढी जांबुवंत ॥ तो नरहरि होईल नितांत ॥ प्रत्यक्ष जो बलराम भ्रात ॥ पुंडलीक होईल तो ॥४७॥ मीही प्रत्यक्ष जन्मोन ॥ ज्ञानदेव नामें मिरवीन ॥ आणि धवलारी जो पंचानन ॥ निवृत्तिनाथ होईल कीं ॥४८॥ आणि सत्यनाथ चतुरानन ॥ तो स्वनामीं मिरवील सोपान ॥ जी योगमाया मानसमोहन ॥ मुक्ताबाई विराजेल ॥४९॥ यापरी प्राज्ञक हनुमंत ॥ तो रामदास होईल महाभक्त ॥ आणि कुब्जा दासी मातें रमत ॥ जनी जनांत होईल कीं ॥५०॥ असो ऐसें समुच्चयेंकरोन ॥ कलींत वाढवावें भक्तिमाहात्म्य जाण ॥ मग अवश्य म्हणोनि नारायण ॥ पुढें बोलत प्रश्नातें ॥५१॥ म्हणती महाराजा सर्वज्ञमूर्ती ॥ आम्हां सांगतां जन्मस्थिती ॥ परी कवण स्थानीं केउते युक्तीं ॥ व्यक्त होणें तें सांगा ॥५२॥ यावरी बोले प्रत्यक्ष नारायण ॥ कीं दीक्षेचें भविष्यपुराण ॥ पूर्वीच कथिलें पराशरनंदनें ॥ महामुनि व्यास तो ॥५३॥ अगा पूर्वी अठ्ठ्यांयशीं सहस्त्र ऋषी ॥ निर्माण झाले विधिवीर्यासीं ॥ तें वीर्य चुकोनि ठायाठायासी ॥ अपाप कांहीं उरलें असे ॥५४॥ तें जीवदशेवांचोनि सत्य ॥ महाराजा न पावे उदय ॥ तरी ते ठायीं ठायीं केउतें वीर्य ॥ त्याचें ठाय ऐकावें ॥५५॥ उपरिचर वसु यानी असतां ॥ वीर्य गळलें उर्वशी पाहतां ॥ तें शरस्तंबीं दुरोनि द्रवतां ॥ आदळतां झालें त्रिभाग ॥५६॥ यमुनेंत वीर्यबिंदु द्रोणाकांठीं ॥ पडतांचि झाले विभाग शेवटीं ॥ दोन भाग द्रौणापोटीं ॥ एक जळीं पडियेला ॥५७॥ असो पर्णद्रोणांत जो भाग पडिला ॥ तो तत्काळ द्रोणकूपीं जन्मला ॥ परी जळांत जो भाग पडिला ॥ तो ग्रासिला मत्स्यानें ॥५८॥ तरी तें मत्स्युदरीं वीर्य ॥ नारायण प्रत्यक्ष आहे ॥ परी जीवदशेविण गर्भवंशोदय ॥ होत नाहीं महाराजा ॥५९॥ तरी प्राज्ञिक कवि नारायण ॥ तेणें मत्स्युदरी जन्म घेणें ॥ मच्छिंद्र ऐसें जगांत नामाने ॥ मिरवावें महाराजा ॥६०॥ यापरी शिव कामावरी कोपोन ॥ तृतीयनेत्रींचा काढोनि अग्न ॥ महास्मर केला भस्म तेणें ॥ ऐसें ग्रंथ बोलती ॥६१॥ परी तो काम द्विमूर्धनी ॥ बैसला आही वीर्य प्राशन करोनी ॥ तरी तयाचे जठरीं अंतरिक्ष जाऊनी ॥ जालिंदर नामें मिरवेल ॥६२॥ यापरी कुरुवंशीं जनमेजयें ॥ नागसत्री आवाहन केलें आहे ॥ तया वंशीं महान पाहें ॥ बृहद्रथ राणा मिरवेल ॥६३॥ तो महीलागीं करील हवन ॥ तेव्हां गर्भ सांडील द्विमूर्धन ॥ यज्ञकुंडीं देदीप्यमान ॥ जालिंदरें जन्मावें ॥६४॥ यापरी ब्रह्मवीर्य सहस्त्रेंशीं ॥ ऋषि निर्मिले सहस्त्र अठ्ठ्यायशीं ॥ तेव्हां वीर्य रेवातीरासी ॥ रेवेमाजी पडियेलें ॥६५॥ तें महीचे परम कुशीं ॥ वीर्य आहे रेवातीरासी ॥ तेथें व्यापोनि जीवदशेसी ॥ देहालागीं मिरवावें ॥६६॥ तो महाराजा चमस नारायण ॥ रेवणसिद्ध मिरविजे नामानें ॥ रेवारेवेंत झाला जन्म ॥ म्हणोनि नाम हें त्याचें ॥६७॥ तेचि वेळीं आणिक रेत ॥ सर्पिणीमौळीं अकस्मात ॥ पडतां प्राशिलें तिनें नेमस्त ॥ भक्ष्य म्हणोनि जाण पां ॥६८॥ ते जनमेजयाचे नागसत्रांत ॥ नाग आहुति विप्र देत ॥ तये वेळीं आस्तिकें निश्वित ॥ सर्पिणीतें लपविलें ॥६९॥ ब्रह्मवीर्य उदरांत ॥ अंडजाशुक्तिरत्नयुक्त ॥ पुढें होईल महानाथ ॥ भविष्य जाणोनि आच्छादी ॥७०॥ महातरुच्या पोखरी ॥ तक्षकात्मजा पद्मिनी नारी ॥ ठेवितां प्राज्ञिक ऋषीश्वरी ॥ नवमास लोटले ॥७१॥ असो त्या अंडजाशुक्तिकायुक्त ॥ जीवदशा सकळ होऊनि मुक्त ॥ तरी आविर्होंत्र नारायण तेथ ॥ संचरिजे महाराजा ॥७२॥वीर्य अंडजपात्र सांडोनी ॥ गेली आहे तक्षकनंदिनी  ॥ तो वडाच्या पोखरस्थानीं ॥ अद्यापि आहे महाराजा ॥७३॥ तरी तेथें आविर्होत्र ॥ प्रवेश करितां सत्पात्र ॥ वटसिद्धनाथ स्वतंत्र ॥ तया देहीं मिरवावे ॥७४॥ यापरी मित्ररेत मंत्रसंपत्तीं ॥ कृपें कुरवाळील मच्छिंद्रजती ॥ ती वरदहस्ताची उकरडा विभूती ॥ साचोकार मिरवेल ॥७५॥ तें मंत्रप्रतायें सूर्यवीर्य ॥ सविताराज सांडिता होय ॥ परी तें भविष्यकारणीं उकरडामय ॥ वरदभस्म मिरवेल ॥७६॥ तेथें हरी जो नारायण ॥ शीघ्र संचरोनि दीक्षाकारण ॥ गौरक्ष ऐसें प्रतिष्ठानामानें ॥ जगामाजी मिरवावें ॥७७॥ यापरी मृडानीकारणीं ॥ सुरवर आलिया दक्षसदनीं ॥ ते कमलोद्भव पाकशासनी ॥ समारंभें पातले ॥७८॥ परी दक्षात्मजेची रुपरहाटी ॥ नेत्रकटाक्ष पाहतां परमेष्ठी ॥ तेणें धडाडोनि कामपाठीं ॥ इंद्रियद्वारा द्रवला तो ॥७९॥परी तो चतुराननी ॥ बैसला होता समास्थानीं ॥ काम द्रवतां इंद्रियवदनीं ॥ परम चित्तीं लाजला तो ॥८०॥मग रगडोनि चरणटांचे ॥ छिन्नन्व केलें रेताचें ॥ तें एक आगळें साठ सहस्त्रांचें ॥ रेतभाग वहियेलें ॥८१॥ तें साठ सहस्त्र रेतप्रभाणासी ॥ जीवदशा अपत्य वालखिल्यऋषींसी ॥ झाले परी एक भागासी ॥ वीर्य आहे तैसेंच ॥८२॥ तें लज्जायुक्त होऊनी ॥ केरासह सांडिले भागीरथीजीवनीं ॥ तयांतूनि एक भाग जाऊनी ॥ कुशवंटीं ॥ स्थिरावला ॥८३॥ तरी ते कुशदरीचे निखळीं ॥ रेतभागाची आहे वेली ॥ ती पिप्पलायन माउली ॥ संचारावें तेणें तेथें ॥८४॥ टांचे चरपटलें आहे रेत ॥ म्हणोनि नाम चरपटनाथ ॥ जगांत मिरवोनि जगविख्यात ॥ दीक्षेलागी विराजावा ॥८५॥यापरी कुंभोदभवाचा उदय झाला ॥ तो मित्रकामशराचा लोट लोटला ॥ तो गगनपंथें विमुक्त झाला अतिबळें करोनियां ॥८६॥ एक भाग घटीं पडतां ॥ अगस्तिउदय झाला तत्त्वतां ॥ एक भाग महीवरता ॥ कैलिकसदनीं पातला ॥८७॥ तो महाराज कैलिकऋषी ॥ भिक्षाभरतरी ऊर्ध्वशी ॥ भरतरी म्हणती भिक्षापात्रासी ॥ आंगणीं तें ठेविलें ॥८८॥ तों मित्ररेत अकस्मात ॥ येऊनि पडिलें भरतरीआंत ॥ तें कौलिकें पाहोनि भविष्यातें ॥ भरतरीं तैसें रक्षितसे ॥८९॥ तरी ते भरतरीरेतसंगीं ॥ द्रुमिल नारायण प्रसंगीं ॥ संचारोनि रेत अंगीं ॥ भरतरी नामें मिरविजे ॥९०॥ यापरी हिमाद्रीच्या विपिनस्थानी ॥ दिग्गज ठेला महीते शयनीं ॥ तैं सरस्वतीचे उद्देशेंकरोनी ॥ विधि वीर्यासी ढांसळला ॥९१॥तें वीर्य गजकर्णात ॥ पडतांचि झाले बिंदयुक्त ॥तरी काहीसे वीर्य होऊनी विभक्त ॥ महीवरी पडीयेले ॥९२॥ तयावरोनी व्याघ्र चाली ॥ चालता भेदले पाउलीं ॥ तया पादसंधींत तनु ओतिली ॥ जीवदशा अत्रीची ॥९३॥  तैसा गजकर्णसूतिकारण ॥ प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न ॥ तया नामाभिधानी प्रयत्न ॥ कर्णकानिफा मिरविजे ॥९४॥ यापरी गोरक्षाची हतवटी ॥ पडतां वाळवंटाचे पोटीं ॥ कर्दमओपुतळा करितां जेठी ॥ अभिमंत्रोनि भविष्यांत्तर ॥९५॥ मंत्रशक्ती विष्णुवीर्य ॥ आव्हानिलिया पुतळामय ॥ तैं करभाजनें संचराया ॥ जीवदशा मिरवावी ॥९६॥ ऐसें सांगोनि रमारमणें ॥ संतुष्ट केले नवनारायण ॥ मग परस्परें नमनानमन ॥ करोनियां उठले ते ॥९७॥ असो भगवंतेंशीं नवनारायण ॥ पाहती मंदराचळमौळीस्थान ॥ श्रीशुकाचार्य समर्धपासीं जाऊन ॥ समाधीं वरियेलें ॥९८॥ नव समाधी मेरुपाठारीं ॥ दहावी समाधी शुकऋषीश्वरीं ॥ असो ते दाही स्थूळशरीरीं ॥ पुढें तेथोनियां निघाले ॥९९॥ यापरी शुकवीर्याचें कथन ॥ वद्रिकाश्रमीं सोमब्राह्मण ॥ रंभाउद्देशें झालें पतन ॥ कबीर तेथें जन्मला ॥१००॥ही कथा भक्तिकथामृतांत ॥ वदविली आहे जगन्नाथें ॥ आतां नवनारायण झालें व्यक्त ॥ त्यांची कथा ऐक वी ॥१॥ असो वसुवीर्य दोन्ही भाग झाला ॥ एक मच्छीनें प्राशिला ॥ तंव कवि नारायण संचरोनि वहिला ॥ गर्भ लागला वाढीसी ॥२॥ दिवसानुदिवस नवमास ॥ मच्छीने लोटिले जलोदरास ॥ पुढें प्रसूत अंडज सुरस ॥ यमुनाजळीं व्हावें जों ॥३॥ तों तेथें एक कथा वर्तली ॥ श्रीकैलासीं अपर्णा माउली ॥ शिवासी म्हणे कृपासाउली ॥ अनुग्रह मज द्यावा जी ॥४॥ तुम्ही जपता जो मंत्र ॥ तो मज द्यावा जी पवित्र ॥ तेणेंकरोनि मी चिर ॥ सनाथपणें मिरवेन जी ॥५॥ शिव म्हणे उमे ऐक ॥ मी मंत्र उपदेशीन सकळिक ॥ परी एकांत ठाव अलोकिक ॥ ऐसा जाण पाहिजे गे ॥६॥ अपर्णा म्हणे एकांतस्थान ॥ तरी महीवरी शोधूं आपण ॥ ऐसें ऐकतां दयाघन ॥ अवश्य तीतें म्हणतसे ॥७॥ मग सिद्ध करोनि नंदिकेश्वर ॥ हिंडतां स्थाने महीवर ॥ श्रमोनि वर्ततां उमाईश्वर ॥ यमुनेतटीं येऊनि पोंचले ॥८॥ मग उतरोनि नंदिकेश्वरावरुनि तीं ॥ नंदी ठेवोनि तटावरती ॥ उभयतां उतरोनि यमुनेसरितीं ॥ जवळ कांठीं बैसलीं ॥९॥ तंव तो यमुनातटएकांत ॥ तेथें मनुष्यांची न मिळे जात ॥ ऐसें पाहोनि शुद्ध एकांत ॥ तें स्थान ईश्वरासी मानलें ॥११०॥ परी तो मच्छोदरांत ॥ कवि नारायण नेणोनि त्यांत ॥ पार्वतीतें उपदेशित ॥ मंत्रसंजीवनीसी नाथ ॥११॥ तीतें तो मंत्र उपदेशितां ॥ मच्छी तेथें होती सत्यता ॥ तो उपदेशशब्द गर्भी तत्त्वतां ॥ मच्छिंद्रानें ऐकला ॥१२॥ ऐकलेपरी ग्रहणचि झालें ॥ तेणेंकरुनि ज्ञान प्रगटलें ॥ मीतूंपण सर्व सरलें ॥ सर्वचि ब्रह्म सनातन ६ ॥१३॥ असो शिव पार्वतीतें पुसत ॥ कीं कैसें चोज उपदेशांत ॥ तूतें सांपडेल खूण ते मातें ॥ बोलानि दावीं अपर्णे तूं ॥१४॥ ऐसें शिव तीस पुसतां ॥ तों आधींच मच्छेंच्र झाला बोलता ॥ म्हणे महाराजा आदिनाथा ॥ ब्रह्मवोज मिरवेल ॥१५॥ आतां किंबहुना चराचरा ॥ असे स्वरुपीं वृत्ति साकार ॥ नग नोहे हेमचि सार ॥ आब्रह्मभुवनापासोनी ॥१६॥ ऐसें शिव ऐकतां वचना ॥ जळीं पाहे चाकाटोन ॥ तों मच्छोदरीं नारायण ॥ कवि महाराज समजला ॥१७॥ मग शंकर बोलते झाले त्यातें ॥ म्हणती महाराज तूं आहेस येथें ॥ तरी मम उपदेशाचा तूतें ॥ लाभ झाला कविराया ॥१८॥ परी हें फारचि झालें अपूर्व ॥ पुढें ऐक आनंदपर्व ॥ मंत्रउपदेशगौरव ॥ दत्तमुखीं करवीन मी ॥१९॥ तरी तुज जन्म झालियापाठीं ॥ बद्रिकाश्रमी यावें शेवटीं ॥ तेथें तूतें देईन भेटी ॥ सर्व सामग्री सचिन्ह ॥१२०॥ ऐसें बोलोनि आदिनाथ ॥ स्वस्थाना गेला अपर्णेसहित ॥ येरीकडे गर्भ मच्छोदरांत ॥ तोचि मंत्र घोकीतसे ॥२१॥ यापरी भरतां पूर्ण दिवस ॥ मच्छीनें प्रसूतकळा समयास ॥ अंड सांडोनि जळतटास ॥ मच्छी गेली जळोदरीं ॥२२॥ असो अंड सांडोनि तीरास ॥ मच्छी गेली जळोदरास ॥ त्यास कांहीं लोटल्या दिवस ॥ यमुनातीरी महाराजा ॥२३॥ तंव तेथे समयकाळी ॥ बकपक्ष्यांची उतरली मंडळी ॥ मीन वेचावया यमुनाजळी ॥ निजगणासहित संचरले ॥२४॥ तो अकस्मात मित्रात्मजातटी ॥ अंडजशुक्तिका पाहिली दृष्टीं ॥ मग सर्व मिळोनि चंचुपुटीं ॥ खाद्य म्हणोनि भेदिती ते ॥२५॥ चंचुपुटांचा भेदवज्र ॥ तेणें अंड झालें जर्जर ॥ द्विशकल होऊनि सत्वर ॥ महीवरे आदळले ॥२६॥ परी वरील शकल पडिलें महीं ॥ खालील शकलांत बाळ विदेही ॥ जैसा अर्क उदकप्रवाहीं ॥ एकाएकीं उतरला ॥२७॥ रुदनशब्द कडकडाट ॥ बाळतेजाचा बोभाट ॥ तें न्याहाळितां चकचकाट ॥ पाहोनियां पळाले ते ॥२८॥ असो सकळशुक्तिका रत्नाकर ॥ आंत मुक्तमुक्तिकेचा भद्र मच्छेंद्र ॥ असतां तमारिकन्यातीर ॥ पावला धीवर त्या काळीं ॥२९॥ तो धीवर कामिकनाम सुभट ॥ पाहतां अंडजशुक्तिका प्रकट ॥ तों आंत रत्नतेज स्फुट ॥ बाळ रम्य देखिला ॥१३०॥ देखिला परी जो सविता ॥ मग चित्तीं द्रवली मोहममता ॥ म्हणे बाळ हें कोमळ तत्त्वतां ॥ यातें भक्षील कोणी सावज ॥३१॥ ऐसा उदय होतां चित्तीं ॥ देव शब्दकुसुमां सांडिती ॥ कीं हे महाराजा कामिकमूर्ती ॥ बाळ नेई वो सदनातें ॥३२॥ अरे हा कवी नारायण ॥ मच्छोदरी पावला जनन ॥ तरी मच्छेंद्र ऐसे याते नाम ॥  जगामाजी मिरवी कि ॥३३॥ अरे हा दक्ष योगींद्रजेठी ॥ तारक नौका महीपाठीं ॥ तरी तूं संशय सोडोनि पोटीं ॥ सदना नेई महाराजा ॥३४॥ ऐसें देववागुत्तररत्न ॥ कर्णपुटिकं होतां भूषण ॥ मग तें दृढ करोनि जतन ॥ हदयसंपुटीं पाळीतसे ॥३५॥ महाविश्वासाचे पाठीं ॥ आधींच मोह नांदेल पोटीं ॥ आनंदाची अपार दाटी ॥ आनंदपात्रीं हेलावे ॥३६॥जैसें पयाचेनि पात्रीं ॥ घृतशर्करा होय मिश्रिती ॥ तो गोडपणाचा भाग अमृतीं ॥ वाढला कां जाईना ॥३७॥ कीं दरिद्राचे सुरवाडास ॥ मनीं पेटली राजहौस ॥ ते गजशुंडींची माळा ग्रीवेस ॥ सुख कां वाटलें जाईना ॥३८॥ कीं वंशवृद्धि ते शून्यमय ॥ चिंताकाळिमा निशा आहे ॥ तैसा सुतमित्राचा होतां उदय ॥ मग तेथ चिंता कासया ॥३९॥ कीं कवडीसाठीं वोंचितां प्राण ॥ ते मांदूसचि लाधली सुखधन ॥ कीं मृत्युभयातें असुख मानून ॥ चित्त जडे चिंतासाकडीं ॥१४०॥ तों पीयूषाची अनुकूलता ॥ गोडी सुखाचा उदय होतां ॥ मग चिंतानिशीचा आनंदसविता ॥ प्रभेलागीं हेलावे ॥४१॥ मग स्नेहकवचें करसंपुटीं ॥ तोयें न्हाणिला बाळजेठी ॥ हदयीं वाहूनि कामिक पोटीं ॥ सदनीं आणिले तयातें ॥४२॥ शारद्वता नामें सुंदरा नारी ॥ ओपिता झाला तिचे करीं ॥ म्हणे साजणी वंशाधारी ॥ सुत मिरवीं लोकांत ॥४३॥कीं पाहें पां पूर्ण भरंवसा ॥ कीं राधातनय कर्ण जैसा ॥ तरी तो पुढें राजमांदुसा ॥ जगामाजी आव्हानी ॥४४॥ तन्न्यायें भाग्योदयें ॥ सर्व सुखशयनीं पहुडावे ॥ अहाहा बाळ अवतार होय ॥ कवि नारायण मच्छेंद्र ॥४५॥ मग कामिकहाती सुढाळ सुता ॥ नवरत्नांच्या सम पाहतां ॥ परम आनंदली शारद्वता ॥ बाळ कवळिला स्नेहमेळीं ॥४६॥ स्नेहें धरितांचि पयोघरी ॥ पय दाटलें अतिपाझरीं ॥ जैसें सोमतेजकरी ॥ सोमकांत द्रवतसें ॥४७॥ असो कुशांचें मंडन ॥ स्नेहभावें होतां संगोपन ॥ मग बाळजठरापिंडींचा अग्न ॥ पय पाहोनि स्वीकारी ।४८॥ तैं स्नेहाचा ओघ बाणे ॥ बाळ अंगिकारोनि मार्जनें ॥ तप्तोदकीं घालोनि स्नानें ॥ पालखातें हालवितसे ॥४९॥ आधींच नामें शारद्वता ॥ त्यावरी अपत्यकामी कांता ॥ तेथें बाळमोहकाम द्रवतां ॥ कवण रीतीं वर्णावें ॥१५०॥आधींच असतां अमरवेलीं ॥ त्यावरी पजन्यर्वृष्टी झाली ॥ मग तो हेलावा लवलव पाउलीं ॥ कवणासी वर्णवे ॥५१॥ ऐसेपरी आनंदस्थितीं ॥ दिवस लोटले कांहींसे मिती ॥ पांच वरुषें वयावरुती ॥ मच्छिंद्रनाथ मिरवला ॥५२॥ तंव कोणे एके दिवसी ॥ सुदिनीं उदईक भूमीसी ॥ पिता म्हणे तमारिकन्येई ॥ चला जाऊं ये मच्छिंद्रा ॥५३॥ अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ ॥ कृतांतभगिनीतीरा येत ॥ मग जळोदरीं संचरोनि तात ॥ मच्छबाळां आव्हानीतसे ॥५४॥ तंव जाळ्यासवें मीनधाडी ॥ आंतुल्या ओढी करसंपुती ॥ बाहेर काढितां कामिक जेठी ॥ महीं मीनांतें सोडीतसे ॥५५॥ मच्छिंद्रासी म्हणे सुतोत्तमा ॥ वेंचोनि सांठवी या मीनां ॥ ऐसे वदोनि कामिक पुन्हां ॥ जळामाजी संचरे ॥५६॥ येरीकडे मच्छिंद्रनाथ ॥ मीन देखतां म्हणे हो तात ॥ अहा मातुळकुळा घात ॥ कामिका ताता मांडिला ॥५७॥ तरी आपण असतां ऐसी रहाटी ॥ बरवेपणें पाहतां दृष्टीं ॥ हें योग्य नव्हे कर्म पाठीं ॥ उपकारा मिरवावें ॥५८॥ पूर्वीं आस्तिकें मातुळकुळा रक्षिलें ॥ आपुले तपाचेनि बळें ॥ राव बोधोनि सत्रपाळ ॥ नागकुळा वाचविलें ॥५९॥ मग एक एक मत्स्य वेचोनी ॥ प्रवाहा मेळवी जीवनालागोनी ॥ तें कामिकतातें दृष्टीनें पाहोनी ॥ परम चित्तीं क्षोभला ॥१६०॥ जैसा परम सबळ ॥ पेटला मिरवी वडवानळ ॥ तेवीं कामिकक्रोधाग्नि प्रबळ ॥ हदयानाजी धडाडी ।६१॥कीं मेघमंडळाचे दाटीं ॥ चपळा पळती तेजावाटी ॥ तैसा धडाडोनि क्रोध पोटीं ॥ बाहेर आला तत्क्षणीं ॥६२॥ लक्षोनि मच्छिंद्राचें मुखमंडन ॥ स्वकरपुटी केले ताडन ॥ म्हणे जळोदरीचे काढितां मीन ॥ बहु श्रम जाणसी ॥६३॥ तरी पुन्हां जळोदरी ॥ मच्छ सोडितोसी कैसा भिकारी ॥ खासील काय उदरांतरीं ॥ भीक मागों जाशील ॥६४॥ ऐसे ऐकोनि कामिकवचन ॥ मनांत मच्छिंन्द्र करी बोलणें ॥ सर्वांत पवित्र भिक्षान्न ॥ दोष त्यासी कांहीं नसे ॥६५॥ तरी हाचि आतां उपदेश ॥ आरंभावे भिक्षान्नास ॥ येरीकडे जळोदरास ॥ कामिक तेव्हां संचरला ॥६६॥ येरीकडे मच्छिंद्रनाथ ॥ दृष्टी चुकवोनि गमन करीत ॥ भ्रमण करितां अद्वैतवनांत ॥ सुढाळ जागा दिसेना ॥६७॥ मग उत्तरदिशा बद्रिकाश्रम ॥ पाहतां झाला योगद्रुम ॥ तेथें द्वादश वर्षे उत्तमोत्तम ॥ गालागी आचरला ॥६८॥ तें तीव्र तप गा शुचिस्मंत ॥ मंत्रदृष्टी अद्वैतवनांत ॥ लोहकंटक पादांगुष्ठांत ॥ देऊनि तप करीतसे ॥६९॥ ऊर्ध्व वायूचे करुनि भक्षण ॥ दृष्टी अर्का देऊनि दान ॥ वाचा करोनि कृष्णार्पण ॥ हरीभजनीं मिरविल ॥१७०॥ शरीर क्लेशा देऊनि दान ॥ ईश्वरी वेध तनुमनप्रमाणें ॥ तेणें अस्थिपंजरावरोन ॥ त्वचा तितुकी मिरवीतसे ॥७१॥ तपें भक्षिलें सकळ मांस ॥ परी लाग न लागे अस्थित्वचेस ॥ मांस भक्षोनि सकळ भागास ॥ वृद्धिरस सकळ आटिलें ॥७२॥ नेत्र फिरोनि झाल्या वाती ॥ दिसों लागली कार्पासरीती ॥ सकळ तेजाची आटली ज्योति ॥ महाघोर तपानें ॥७३॥ अस्थि त्वचा व्यक्त होऊनी ॥ शिरा दिसती चांगुलपर्णी ॥ सर्व अंग गेले वाळोनि ॥ काष्ठापरी मिरवितसे ॥७४॥ ऐसे क्लेश असंभवित ॥ मच्छिंद्रअंगीं जाणवत ॥ तों तेथें अकस्मात ॥ अत्रिनंदन पातला ॥७५॥ संचरोनि देवालया ॥ स्तविता झाला उमाराया ॥ हे दक्षजामाता करुणालया ॥ दिगंबरा आदिपुरुषा ॥७६॥ कामांतका फणिवेष्टका ॥ रुंडभूषणा कैलासनायका ॥ अपर्णानिधाना कामांतका ॥ वृषभारोहणा महाराजा ॥७७॥ हे सकळ दानवांतका ॥ देवाधीशा उमाकांता ॥ प्रळयरुद्रा त्रिपुरांतका ॥ शूळपाणी महाराजा ॥७८॥ हे शंकरनामाभिधानी ॥ पंचवक्त्रा त्रिनयनी ॥ भस्मधारणा उमारमणी ॥ नरकपाळा विराजसी ॥७९॥ ऐसें स्तुतीचें वाग्रत्न ॥ दत्त अर्पितां माळा करोन ॥ तेणें तोपोनि कामदहन ॥ प्रत्यक्षपणे मिरवला ॥१८०॥प्रत्यक्ष होतां उमाकांत ॥ नयनीं यजिता झाला दत्त ॥ मग आलिंगोनि प्रेममरित ॥ निकट आपण बैसला ॥८१॥ योगक्षेमाची सकळ वार्ता ॥ शिव पुसतां झाला दत्ता ॥ तेणेंही सांगोनि क्षेमवार्ता ॥ शिवसुखा पुसिलें ॥८२॥ यापरी बोलता झाला दत्त ॥ कीं बद्रिकाश्रमीं कानन बहुत ॥ तरी महाराजा दृष्टी व्यक्त ॥ माजी करा कृपाळुवा ॥८३॥ मग अवश्य म्हणोनि उमारमण ॥ उभयतां पाहूं चालले कानन ॥ परी ही वासना दत्ताकारणें ॥ मच्छिंद्रदैवें उदभवली ॥८४॥ जैसा लाभ असतो पदरीं ॥ तो सहज वळूनि येत घरीं ॥ लघुशंके मूत्रधारीं ॥ मांदुसघट लागतसे ॥८५॥ कीं उष्णत्रासें मही चाली ॥ आतुडे कल्पतरुची साउली ॥ तेवीं दत्तवासना उदभवली ॥ मच्छिंद्रदैवप्रकरणीं ॥८६॥ कीं याजव्रता टाकिल्या बाहेरी ॥ हिरा ठेवोनि नेत गारी ॥ तेवीं दत्तात्रेयवासनालहरीं ॥ उदेली मच्छिंद्रदैवानें ॥८७॥ असो ऐशा लाभभावना ॥ उभयतां रमती बद्रिकाश्रमा ॥ नाना तरुप्लवंगमां ॥ अपार चिन्हें पाहती ॥८८॥सुरतरु पोफळी ॥ बकुळ चंपक कर्दळी ॥ गुलछबु गुलाब केळी ॥ नारळी सोनकेळी शोभल्या ॥८९॥ की सहज पाषाण ढाळितां महीसी ॥ दैवें आतुडे हस्तपादांसी ॥ तेवीं मच्छिंद्रदैवउद्देशी ॥ दत्तवासना उदभवली ॥१९०॥ ऐसे वर्णितां अपारतरु ॥ तरी बद्रिकेचा फार शेजारु ॥ कानना महा निकट मंदारु ॥ मंदराचळ शोभला ॥९१॥ तयावरोनि वर्षत तोयधर ॥ मणिकर्णिके अपार नीर ॥ ती भागीरथी उत्तमतीर ॥ निजदृष्टीनें पाहिली ॥९२॥ मग तेथ ओघ धरोन ॥ उभयतां करिते झाले गमन ॥ असो मच्छिंद्राकारणें ॥ निजदृष्टीं पाहातील ॥९३॥ तेथें जी जी होईल वार्ता ॥ श्रीगुरु ज्ञानंत होय सांगता ॥ निमित्तमात्र धुंडीसुता ॥ ग्रंथामाजी मिरविलें ॥९४॥ धुंडीसुत नरहरिवंशीं ॥ मालू वदे कवित्वासी ॥ निमित्तमात्र नरहरिकृपेसी ॥ तोचि बोलवी ज्ञानेश ॥९५॥ स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्यकिमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ प्रथमोऽध्याय गोड हा ॥१९६॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ नवनाथभक्तिसार प्रथमोऽध्याय समाप्त ॥  


****************************************************************************

कथासार : नऊ नारायणांपैकी मच्छिंद्रनाथाचा जन्म, त्याची तपश्चर्या 


ग्रंथारंभी मालुकवि म्हणतात- कलियुगास प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांताने नवनारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरिता आपल्या सेवकास पाठविले. त्यावेळ सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसला होता. जवळ उद्धवही होता. इतक्यात कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्धि, पिप्पलायन, अविर्होत्र (ऐरहोत्र), चमस, द्रुमिल, (ध्रुवमीन) आणि करभाज असे नऊ नारायण तेथे येऊन दाखल झाले. त्यास पाहताच हरीने सिंहासनाखाली येऊन मोठ्या गौरवाने त्यांस आलिंगन देऊन आपल्या सुवर्णाच्या सिंहासनावर बसविले. नंतर त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली. तो मोठा समारंभाचा थाट पाहून कोणत्या कारणास्तव आम्हास बोलावून आणिले, असे नवनारायणांनी हरीस विचारिले. तेव्हा त्यांने त्यास सुचविले की, आपणा सर्वांना कलियुगात अवतार घ्यावयाचे आहेत. जसे राजहंस एका जुटीने समुद्राच्या उदकात जातात, त्याप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन मृत्युलोकात प्रगट होऊ. हरीचे असे भाषण ऐकून ते म्हणाले, जनार्दना ! आपण आम्हांस अवतार घ्यावयास सांगता, पण अवतार घ्यावयाचा तो कोणत्या नावाने हे कळवावे. त्यांचे हे म्हणणे ऐकून द्वारकाधीशाने सांगितले की, तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करीत जावा. तुम्ही कदाचित असे म्हणाल की, आम्हासच अवतार घ्यावयास सांगता, असे मनात आणू नका. तुमच्याबरोबर दुसरी बहुत मंडळी मृत्युलोकी अवतार घेणार आहेत, प्रत्यक्ष कवि वाल्मीकि हा तुळसीदास होऊन येईल. शुकमुनि हा कबीर, व्यासमुनि तो जयदेव व माझा अति आवडता जो उद्धव तो नामदेव होईल. जांबुवंत हा नरहरी या नावाने अवतार घेउन प्रसिद्धीस येईल. माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल. मीसुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे. कैलासपति शंकर हा निवृत्ति होईल. ब्रह्मदेव हा सोपान या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल. आदिमाया ही मुक्ताबाई होईल. हनुमंत हा रामदास होईल. मजशी रममाण होणारी जी कुब्जा ती जनी दासी या नावाने उघडकीस येईल. मग आपणाकडून होईल तितके आपण कलीमध्ये भक्तिमाहात्म्य वाढवू.

अवतार कोणत्या ठिकाणी व कशा रितीने घेऊन प्रगत व्हावे ते सविस्तर कळविण्याविषयी नवनारायाणांनी पुन्हा विनंति केली. तेव्हा हरीने त्यांस सांगितले की, पराशर ऋषीचा पुत्र जो व्यास मुनि त्याने भविष्यपुराणात हे पूर्वीच वर्णन करून ठेविले आहे. पूर्वी ब्रह्मदेवाचा वीर्यापासून अठ्यांयशी हजार ऋषि निर्माण झाले. त्याप्रसंगी वीर्याचा काही भाग ठिकठिकाणी पडला आहे; पैकी थोडासा भाग तीनदा यमुनेत पडला. त्या तीन भागापैकी दोन भाग द्रोणात पडले व एक भाग यमुनेतील पाण्यात पडला. ते वीर्य लागलेच एका मच्छीने गिळिले तिच्या उदरात कवि नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रगट व्हावे. शंकराने तृतीय नेत्रापासून अग्नि काढून जाळून टाकिलेला जो काम तो अग्नीने प्राशन केला आहे; यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्याच्या जठरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्ध व्हावे. ते अशा रितीने की, कुरुवंशात जनमेजय राजाने नागसत्र केले आहे, त्याच्याच वंशात बृहद्रवा राजा हवन करील; तेव्हा द्विमूर्धन (अग्नि) गर्भ सांडील. त्या प्रसंगी जालंदराने त्या यज्ञकुंडात प्रगट व्हावे. अठ्यायशी हजार ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही अंश रेवातीरी सुद्धा पडला आहे, तेते चमसनारायण याने रेवणसिद्ध या नावाने प्रगट व्हावे. त्याच वीर्यापैकी थोडासा अंश एका सर्पिणीलाहि मिळाला होता. तो तिने प्राशन केला. मग जनमेजय राजाच्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी साऱ्या सर्पांची आहुति दिली; त्या समयी हिच्या उदरात ब्रह्मबीज आहे, असे जाणल्यावरून त्या सर्पिणीला आस्तिक ऋषीने वडाच्या झाडाखाली लपवून ठेविले. पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तेथेच टाकून निघून गेली. ते अंडे अजून तेथे होते तसे आहे, त्यात आविर्होत्र नारायणाने जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे. मच्छिंद्रनाथ याने सूर्यरेत प्राप्तीस्तव मंत्र म्हणून दिलेले भस्म उकिरड्यावर पडेल, त्यात सूर्य आपले वीर्य सांडील, ते उकिरडामय असेल; त्यात हरिनारायण याने गोरक्ष या नावाने प्रगट व्हावे. दक्षाच्या नगरात त्याची कन्या पार्वती हिला लग्नसमारंभसमयी पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले; त्यासमयी त्यास परम लज्जा उत्पन्न झाली. मग ते वीर्य रगडून चौफेर केले, त्यावेळी ते एके बाजूस साठ हजार ठिकाणी झाले, त्याचे साठ हजार वालखिल्य ऋषी झाले. दुसऱ्या अंगाचे केराबरोबर भागीरथी नदीमध्ये पडले ते कुश बेटात गेले; ते अद्यापि तेथे तसेच आहे. यास्तव पिप्पलायन नारायणाने तेथे प्रगट होऊन चरपटीनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे. भर्तरी या नावाने भिक्षापात्र कैलीकऋषीने आंगणात ठेविले होते; त्यात सूर्याचे वीर्य अकस्मात पडले; ते त्याने (भर्तुहरि) तसेच जपून ठेविले आहे. त्यात धृवमीन नारायणाने संचार करून भर्तरी या नावाने अवतीर्ण व्हावे. हिमालयाच्या अरण्यात सरस्वतीचे उद्देशाने ब्रह्मदेवाची वीर्य गळाले; त्यातले थोडेसे जमिनीवर पडले. त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात राहिले व थोडेसे हत्तीच्या कानात पडले. त्यात प्रबुद्धाने संचार करून कानिफा या नावाने प्रगट व्हावे. गोरक्षाने चिखलाचा पुतळा केला, त्यात करभंजनाने संचार करावा. अशा रीतीने, कोणी कोठे व कसे जन्म घ्यावयाचे, ह्याही नवनारायणांना खुलासेवार समजूत करून दिली. मग ते आज्ञा घेऊन तेथून निघाले व मंदराचलावर गेले, तेथे शुक्राचार्यांच्या समाधीजवळ समाधिस्त होऊन राहिले. पुढे हे नऊ व शुक्राचार्य असे दहा जण निघाले.

एके दिवशी शिव-पार्वती कैलास पर्वतावर असता, 'तुम्ही जो मंत्र जपत असता, त्याचा मला अनुग्रह द्यावा,' असे पार्वतीने शंकरास म्हटले. हे ऐकून तो तिला म्हणाला, 'मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन; पण यासाठी एकांतस्थान पाहिजे. तर चल, आपण ते कोठे आहे त्याचा शोध करू. असे म्हणून ती उभयता एकांतस्थान पाहावयास निघाली. ती फिरत फिरत यमुनेवर आली. तेथे मनुष्याचा वास नव्हता. यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केले व तेथे ती उभयता बसली. तेथे पार्वतीस सुंदर मंत्रोपदेश करू लागले. पण ज्या एका मच्छाने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता, ती गर्भिणी जवळच उदकात होती. तिच्या उदरातील गर्भ तो मंत्र ऐकत होता. तेणे करून त्यास शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व द्वैतभाव नाहीसा होऊन तो ब्रह्मरूप झाला.

उपदेश संपल्यावर उपदेशाचे सार काय समजलीस म्हणून शंकराने पार्वतीस विचारले, इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाला की, सर्व ब्रह्मरूप आहे. हा ध्वनि ऐकून शंकराने तिकडे पाहिले. तेव्हा मच्छीच्या उदरी कविनारायणाने संचार केल्याचे समजले. मग त्यास शंकराने सांगितले की, तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला; परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रेयाकडून करवीन. यास्तव तू पुढे बदरिकाश्रमास ये; तेथे मी तुला दर्शन देईन. असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासास गेले.

मच्छींद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला. पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीतीरी टाकून आपण उदकात निघून गेली. पुढे काही दिवसांनी कितीएक बकपक्षी मासे धरावयास यमुनातटी आले. त्यांनी ते अंडे पाहिले व लागलेच आपल्या तीक्ष्ण चोचींनी फोडिले. तेव्हा त्याची दोन शकले झाली व एका शकलात ते बालक पाहून व त्याच्या कर्कश रडण्याचा शब्द ऐकून ते भिऊन पळून गेले. पुढे तो शिंपला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला. त्यात सूर्यासारखा दैदीप्यमान बालक पाहून त्याचे अंतःकरण कळवळले आणि कोणी तरी सावज या कोमल बालकास मारील असे त्यास वाटले. इतक्यात आकाशवाणी झाली की, हा साक्षात कविनारायणाचा अवतार आहे. ह्या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा. नीट संरक्षण कर व ह्याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव. ह्याच्याविषयी तू मनात किमपि संशय आणू नको. ते ऐकून कोळ्याने त्यास घरी नेऊन आनंदाने आपल्या शारद्धता स्त्रीस दिले व मुलगा आपणाला ईश्वराने दिला म्हणून सांगितले. तिने त्यास घेऊन अति आनंदाने स्तनाशी लाविले, तो पान्हा फुटला. मुलगाही दूध पिऊ लागला. मग मुलास न्हाऊ-माखू घालून पाळण्यात निजविले. आधीच त्या उभयताना मूल व्हावे म्हणून आशा सुटली होती; तशात अवचित पुत्ररत्न हाती आल्याने त्यांस अनुपम आनंद झाला.

मच्छिंद्रनाथाचे वय पाच वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्यास समागम घेऊन त्याचा बाप कामिक, मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला. तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरिले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथाजवळ आणून ठेवून पुन्हा जाळे घेऊन तो पाण्यात गेला. ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश करावयास हा उद्युक्त झाला आहे; असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. तसेच आपण असता बाप हे कर्म करीत आहे, हे स्वस्थ बसून पाहणे चांगले नाही व आस्तिक ऋषीने सर्व प्रकारे उपकार करू जनमेजय राजाच्या सर्पसत्रात नागकुळाचे जसे रक्षण केले त्याचप्रमाणे आपण कसेहि करून ह्याचा हा उद्योग हा उद्योग बंद केला पाहिजे, असे मच्छिंद्रनाथाने मनात आणले. मग तो एक एक मासा उदकात टाकू लागला. ते पाहून त्याच्या बापास इतका राग आला की, तो लागलाच पाण्याबाहेर आला आणि त्यास बऱ्याच चपराका मारून म्हणाला, मी मेहनत करून मासे धरून आणितो व तू ते पुन्हा पाण्यात सोडून देतोस; तर मग खाशील काय? भीक मागावयाची असेल अशा लक्षणानी ! असे बोलून तो पुन्हा उदकात शिरला.

त्या माराच्या तिरिमिरीत मच्छिंद्रनाथास फार दुःख होऊन, भिक्षेचे अन्न पवित्र असते व तेच आता आपण खावे, असा विचार करून व बाप पाण्यात शिरला हे पाहून त्याची दृष्टी चुकवून मच्छिंद्रनाथ तेथून निघाला व फिरत फिरत बदरिकाश्रमास गेला. तेथे त्याने बारा वर्षे तपश्चर्या केली. ती इतकी कठीण की, त्याच्या हाडांचा सांगाडा मात्र राहिला.

इकडे श्रीदत्तात्रेयाची स्वारी शिवालयात गेली व शंकराची स्तुति करताच शंकराने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले व जवळच बसविले. नंतर उभयतांनी एकमेकांस नवल वर्तमान विचारले. तेव्हा बदरिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहाण्याची दत्तात्रेयाने आपली इच्छा असल्याचे शंकरास कळविले. मग त्यास बरोबर घेऊन शंकर अरण्यात गेला. त्याच समयी मच्छिंद्रनाथाचा उदयकाल होण्याचे दिवस आल्याकारणाने तो योगायोग घडून येण्यासाठीच दत्तास अरण्य पाहाण्याची वासना होऊन त्यास शंकराचा रुकारही मिळाला. ते उभयतां बदरिकावनातील शोभा पाहून आनंद पावले.


Oct 15, 2019

श्री साई चरित्रामृत - ३


ll श्री गणेशाय नमः ll श्री सद्‌गुरु साईनाथाय नमः ll ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ll


संतश्रेष्ठ श्री साईबाबा यांचे आचरण आणि  शिरडीतील काही अद्भूत घटना 


साईचरित्रकार हेमाडपंत लिहितात, "जेव्हा धर्माचार्यांचे मानखंडण होते, कोणीही धर्माची आज्ञा मानत नाही, योग्य आचारविचारांकडे सामान्य जनांचे दुर्लक्ष होते. तेव्हा ईशाज्ञेनें संत अवतार घेतात." व्हावया वर्णाश्रमधर्मरक्षण । करावया अधर्माचे निर्दळण । दीन गरीब दुबळ्यांचे संरक्षण । क्षिती अवतरण संतांचे ।। शिरडी गावाची पुण्याई खरोखर थोर होती, त्यामुळेच साईंसारखे रत्न इथे वास्तव्यास आले. हा दुस्तर संसार ज्यांनी जिंकला होता, शांती हाच ज्यांचा अलंकार होता असे ज्ञानाचे भांडार, वैष्णवांचे माहेरघर साईनाथ शिरडी ग्रामीं आले. साई स्वतः कधीही प्रवचन वा वेदांतावर विवेचन देत नसत. तर केवळ या शाब्दिक उपदेशापेक्षा स्वतःच्या आचरणांतून व अनुभवांतून तें भक्तांना बोध देत असत. सत्‌पुरुषाचें आचरण । पुढील पिढीला साधन । या दासगणूंच्या रचनेंप्रमाणे त्यांचे वर्तन होते. भागवत पुराणांत भगवंत सांगतात, "जो माझी सेवा करतो,माझे भजन करतो व मला अनन्यपणें शरण येतो. तो होय मद्रूप जाण ! म्हणजेच तो भक्त माझेच रूप असतो."  श्री साईबाबाही हाच उपदेश करत असत. अनन्यभावें जर कोणी ईश्वराचे नामस्मरण करीत असेल, तर तो साईकृपेस नेहेमीच पात्र ठरत असे.

एकदा शिरडीस एक रोहिला आला. बाबांच्या दर्शनानें व वर्तनानें तो भारावून गेला. त्यानेही बाबांबरोबर मशिदीतच मुक्काम ठोकला. तो एखाद्या रेड्यासारखा शरीराने धष्टपुष्ट होता. तो कोणाचेही ऐकत नसे आणि त्याला हवें तसेच वागत असे. दिवस असो वा रात्र अथवा मशिदीत वा चावडीत कुठेही असो, तो रोहिला कुराणांतील कलमें मोठ्या आणि अत्यंत आवेशपूर्ण आवाजांत म्हणत असे. अगदी मध्यरात्रींही त्याचें उच्च स्वरांत कलमें म्हणणे चालू असे. साईमहाराज तर शांतीची प्रत्यक्ष मूर्तीच होते. परंतु, दिवसभर उन्हातान्हांत शेतांत काबाडकष्ट करणाऱ्या शिरडीवासियांना त्या वेळी-अवेळी सतत चालू असलेल्या खड्या आवाजातील कवनांमुळे अतिशय त्रास होऊ लागला.अगदी रात्रीही तें निवांत झोपू शकत नव्हतें. साईंना मात्र त्या रोहिल्याच्या मोठ्या आवाजाचा त्रास होत नव्हता. पण शिरडीतील गावकऱ्यांची 'इकडे आड,तिकडे विहीर' अशी अवस्था झाली होती. बाबांनीही आपल्याला पाठीशी घातलें आहे, हे पाहून आधीच अतिशय स्वैर वागणारा तो रोहिला अजूनच चढेल आणि ताठर झाला. लोकांशी सतत उद्दामपणें बोलू लागला, तसेच त्याचे वर्तनही अतिशय बेफाम होऊ लागले. अखेर, रात्रंदिन ती सतत किरकिर ऐकून गावकऱ्यांचा संयम संपला आणि तें सर्व त्या रोहिल्याच्या विरोधात गेले.  साईमहाराज शरणागतांसी कायम पाठीशीच घालत असत, त्यामुळें सर्व लोक त्यांच्याकडे जाऊन या रोहिल्यास आपण समजवावें अशी विनंती करू लागलें. परंतु बाबा मात्र उलट 'हा रोहिला माझा अतिशय आवडता आहे, त्याला तुम्ही काही त्रास देऊ नका.' असें गावकऱ्यांसच सांगू लागले. आणिक वर "त्या रोहिल्याचे असे सतत भजन करणें माझ्यासाठी अतिशय हितकारक आहे, अन्यथा त्याची खाष्ट बायको रोहिली इथें येऊन मला अतिशय त्रास देईल. जेव्हा हा स्वतःच थकेल, मग आपणहूनच त्याचा हा घोष थांबेल." असेही साईनाथ गावकऱ्यांस वदलें. हे ऐकून गावकऱ्यांचा नाईलाज झाला आणि ते परतलें. हा रोहिला जरी वेडा पीर वाटत असला, तरी तो त्याच्या निजधर्मानुसार अत्यंत आनंदात कलमें पढत असे. भगवंताचे असे सतत नामस्मरण करणें, साईबाबांस आवडायचे. खरे पाहतां, ओलें-कोरडे मागून खाणारा तर कधी काही मिळाले नाही तर उपाशीही राहणारा अशा त्या रोहिल्याचे ना लग्न झालें होते, ना त्यास बायको होती. पण, जयासी हरिनामाचा कंटाळा । बाबा भीती तयाच्या विटाळा । म्हणती उगा कां रोहिल्यास पिटाळा । भजनीं चाळा जयातें ॥ केवळ याचसाठी त्यांनी रोहिल्यास कधीही कलमें पढण्यांस प्रतिबंध केला नाही. ग्रामस्थांचे गाऱ्हाणे त्यांनी ऐकून घेतलें नाही आणि ‘मद्भक्ता यत्र गायंति’ । तिष्ठें तेथें मी उन्निद्र स्थितीं । सत्य करावया हे भगवदुक्ति । ऐसी प्रतीति दाविली ॥          

साईबाबा आपल्या भक्तांस नामस्मरणाचे महत्त्व समजावें म्हणून आपल्या सन्मुख नामसप्ताह करून घ्यायचे. दासगणू महाराज बाबांचे परमभक्त होते. असेच एकदा, साईंनी दासगणूस नामसप्ताहाचा प्रारंभ करण्याची आज्ञा केली. त्यावर दासगणू महाराज "बाबा, आपली आज्ञा मला शिरसावंद्य आहे, पण सप्ताहाची समाप्ती होताच मला विठ्ठल दर्शन झाले पाहिजे." असे म्हणताच बाबांनीही भावार्थी भक्त असल्यास विठ्ठल अवश्य प्रकटतो, असे निक्षून सांगितले. त्या सप्ताहाची समाप्ती होताच दासगणूंस शिरडीत विठ्ठल दर्शन होऊन साईनाथांची प्रचिती आली होती.

एखाद्या शिष्याचे आचरण कसे असावें, हे लोकांना कळण्यासाठी साईबाबांनी एक लीला केली. श्रोतें हो, मोहिद्दीनने साईंना कुस्तीत हरविलें ती कथा पूर्वीच वर्णन केली आहे. त्यानंतर साधारण पाच वर्षांनी अहमदनगर निवासी जव्हारअल्ली आपल्या शिष्यांसहीत राहात्याला आला. वीरभद्राच्या देवळाजवळची एक मोकळी बखळ पाहून त्या फकिराने तेथेच तळ ठोकला. राहात्यातील एक तरुण रहिवासी, भागू सदाफळ त्या जव्हारअल्लीचा सेवक झाला. जव्हारअल्ली मोठा विद्वान होता. कुराण शरीफ वगैरेंचा त्याचा दांडगा अभ्यास असून, त्यास तें मुखोदगत होते. अनेक परमार्थी,स्वार्थी आणि भाविक लोक त्याला शरण आले होते. तिथें त्याने इदगा बांधावयास प्रारंभ केला, पण काही काळानंतर त्यानें वीरभद्रदेव बाटविला, असा आरोप त्या जव्हारअल्लीवर आला. त्याला लोकांनी गावाबाहेर हाकलून दिलें आणि तो इदगा बंद पडला. राहाते गाव सोडून तो शिरडीला आला आणि बाबांजवळ मशिदीत राहू लागला. जव्हारअल्ली मृदुभाषी होता, त्याच्या त्या गोड बोलण्यानें सगळा शिरडी गाव त्याच्या भजनी लागला. तो साईबाबांनादेखील 'तू माझा चेला हो !' असे म्हणू लागला. श्रीसाईही मोठे विनोदी आणि खट्याळ होते. त्यांनी होकार देताच जव्हारअल्लीला अतिशय आनंद झाला. त्या फकिराचे दैव खरोखर बलवान होते. अन्यथा, ज्याचा सर्वत्र डंका गाजतो, असा शिष्य त्याला लाभला नसता. पुढें तो श्रींना राहाते गावी घेऊन गेला. खरी वस्तुस्थिती अशी होती की गुरूला या शिष्याच्या थोरवीची आणि ज्ञानाची काहीच जाणीव नव्हती. शिष्याला मात्र गुरूचा उणेपणा पुरतां ज्ञात होता. तरीदेखील गुरूचा केव्हाही अनादर न करता साईंनी आपलें शिष्य-धर्माचे कर्तव्य पूर्णपणें पार पाडले. त्यांनी जव्हारअल्लीने केलेली प्रत्येक आज्ञा गुर्वाज्ञा म्हणून वरचेवर झेलली. त्याच्या घरीं पाणीसुद्धा भरले. अशाप्रकारे बाबा राहात्यास जाऊन बरेच दिवस लोटले. त्यांमुळे ते शिरडीला आता अंतरलें, असे शिरडीकरांस वाटू लागले. शिरडीतील साईंच्या अनेक शिष्यांस बाबांच्या वियोगाचें दु:ख असह्य झाले. शेवटी, सर्वांनी विचार विनिमय करून राहात्यास जाऊन बाबांस शिरडीत परत आणण्याचा निश्चय केला. मग काही भक्त राहात्यास त्या इदग्याजवळ गेलें आणि बाबांना शिरडीस परतण्याची प्रार्थना करू लागलें. परंतु साईबाबा मात्र, "हा फकीर भलताच रागीट आहे. तुम्ही काही त्याच्या नादी लागू नका. तो मला कधीही सोडणार नाही. तो माझा गुरु एवढ्यांतच गावातून इथे येईल आणि तुम्ही मला न्यायला आला आहात, असे कळतांच क्रोधायमान होईल. तेव्हा तुम्ही सत्वर इथून निघा." असे त्यांस सांगू लागले. इतक्यांत तो जव्हारअल्ली तिथें आला, व शिरडीकरांस म्हणाला,"तुम्ही या पोराला परत शिरडीस घेऊन जाण्यासाठी आला असाल, तर उगाच या फंदात पडू नका." अर्थात असे जरी तो त्या ग्रामस्थांस आरंभी बोलला, तरी त्या भक्तांना पाहून तो मनात कचरला होता. अखेर, " मलाही या मुलाबरोबर शिरडीला घेऊन चला." असे म्हणू लागला. अशा रितीनें, त्या जव्हारअल्लीसह साई शिरडीत परत आले. त्या जव्हारअल्लीच्या भ्रमाचा भोपळा पुढें लवकरच फुटला. एकदा, देवीदास बुवा आणि जव्हारअल्ली यांच्यात शास्त्रीय वादविवाद रंगला, त्यांत बैरागीबुवांनी त्या फकीरास वादात जिंकले आणि त्याला शिरडीतून हाकलून लावले. तो जव्हारअल्ली मग वैजापुरांत जाऊन राहिला. त्यानंतर कित्येक वर्षांनी शिरडीला परत येऊन त्याने साईनाथांना नमस्कार केला. तोपर्यंत त्याचा आपण गुरु आणि साई चेला, ह्या भ्रमाचे पुरतें निरसन झालें होते. बाबांनीही त्या पश्चात्तापग्रस्त फकिराचे पूर्ववत स्वागत करून त्याचा सत्कार केला.

ऐसी बाबांची अगाध लीला । निवाड होण्याचा तेव्हां झाला । परी तो गुरु आपण चेला । भाव हा आदरिला तेथवर ॥तयाचें गुरुपण तयाला । आपुलें चेलेपण आपणाला । हा तरी एक उपदेश एथिला । स्वयें आचरिला साईनाथें ॥




बाबांची ती निर्विषय स्थिती पाहून लहान-थोर सर्वच चकित होत असत. मशिदीत राहण्यापूर्वी साईमहाराज तकियात राहत असत. बराच काळ तें तिथें रमले होते. पायांत घुंगरू बांधून,खंजिरीच्या तालावर बाबा नाचत आणि प्रेमानें मधुर गाणेही म्हणत. आरंभी, साईंना दीपोत्सवाची अतिशय आवड होती. दीप लावण्यासाठी तेल मागायला तें स्वतःच दुकानदारांकडे जात. टमरेल हातांत घेऊन साई वाणी आणि तेली यांच्या दुकानांत जाऊन तेलाची भिक्षा मागत असत. नंतर मशिदीत येऊन ते तेल पणत्यांत भरीत असत आणि त्या पणत्यांच्या प्रकाशात देवळें आणि मशिद उजळून टाकत असत. त्यांचा हा दीपराधनेचा क्रम खंड न पडतां काही दिवस चालला होता. दिपवाळी दिवशींही ह्या दीपोत्सवासाठी बाबा चिंध्या काढून वाती वळत असत आणि मशिदींत दीप प्रज्वलित करीत. परंतु, बाबा रोजच हे फुकटचें तेल मागायला येतात, ही त्या दुकानदारांस कटकट वाटू लागली. एके दिवशी त्या सर्वांनी कपटी योजना करण्याचे ठरविले. नित्यनियमानुसार साईमहाराज जेव्हा तेल मागायला गेले, तेव्हां आपल्या योजनेनुसार त्या वाणी आणि तेल्यांनी तेल त्यांस दिले नाही, सर्वांनीच बाबांस तेल देण्यास नकार दिला. करुणेचा पुतळा साई निमूटपणें परत मशिदीत आले. त्यांनी तें कोरडेच कांकडे पणत्यांत ठेवले. तेलाशिवाय बाबा आतां दिवे कसे लावणार ? याची वाणी लोक मौज पाहत होते. बाबांनी मशिदीच्या जोत्यावरील टमरेल उचलून घेतले. महत्प्रयासानें सांजवात लागेल इतकें, अगदी इवलेसे तेल त्यांत शिल्लक होते. बाबांनी त्या तेलात पाणी घातलें आणि तें पिऊन टाकले. अशा प्रकारे ते थोडेसे तेल ब्रह्मार्पण करून बाबांनी निव्वळ पाणी घेतले. मग ते पाणी पणत्यांत ओतून सुके कांकडे पूर्ण त्यांत भिजविले आणि त्यांना काडी ओढून लावली. तो काय महदाश्चर्य ! सर्व पणत्या पेटल्या. पाण्यावर उजळलेल्या त्या पणत्या पाहून वाणी लोकांनी आश्चर्यानें तोंडात बोटें घातली आणि बाबांना तेल न दिल्याचा त्यांना पश्चात्ताप झाला. तेल नाकारणारे व्यापारी । मशिदीत आले झडकरीं । लोटांगण श्री चरणांवरी । पाहा तयांनी घातले ।। परंतु, बाबांच्या मनात मात्र त्यांच्याबद्दल काहीही रागद्वेष नव्हता. अशा रीतीने, पणत्या सारी रात्र अखंड उजळत राहिल्या, सारें ग्रामस्थ जन हा साईनाथांचा चमत्कार पाहून दंग झाले. 

अनेक थोर विभूतीं, संतमंडळींकडून असे चमत्कार घडलें आहेत. अशा घटना केवळ लोकांच्या उद्धारासाठीच आणि ईश्वराठायीं श्रद्धा वाढावी यासाठीच असतात. साईबाबांसारखे संतश्रेष्ठ ज्यांचे वर्णन करतांना चारही वाणी आणि चारही वेद यांनी हार मानली, तसेच षटशास्त्रें आणि पुराणें ज्यांचे गुणवर्णन करण्यास असमर्थ ठरली आहेत, अशा त्यांच्या लीला अगाध आहेत.  


क्रमश: 


Oct 10, 2019

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय ३



॥ श्रीगणेशाय नमः ॥

हे सच्चिदानंदा श्रीहरी, तुझा जयजयकार असो.तुम्ही आता माझ्यावर लवकर कृपा करा.तुम्हांस शरण आलेलें जे भक्तजन आहेत, त्यांच्याशी तुम्ही कधीच कठोरपणे वागत नाही.।।१।। तूं करुणेचा सागर आहेस.तू दीनांचे माहेर आहेस. तू भक्तांसाठी खरोखर कल्पतरु वा चिंतामणीच आहेस.।।२।। हे राघवा रामा,असा तुझा अगाध महिमा सर्व संतांनी गायला आहे. तेव्हा पुरुषोत्तमा या दासगणूवर तू क्षणाचाही विलंब न करतां सत्वर कृपा कर.।।३।। साक्षात्कारी,दीन दुबळ्यांचे कैवारी श्रीगजानन महाराज बंकटलालाच्या घरी रहावयास आले.याचे वर्णन तुम्ही मागील अध्यायात वाचले आहे.।।४।। दूर दुरून अनेक भक्तगण श्री समर्थांच्या दर्शनास येऊन वंदन करू लागले.जिथे मकरंद असतो तिथे मधमाश्या लगेच जमतात.त्यासाठी  त्यांना कोणाच्याही आमंत्रणाची गरज नसते.।।५।। आता एके दिवशी काय घडले, ते मी तुम्हांस सांगतो.त्यावेळी महाराज निजासनीं आनंदांत बसले होते.।।६।। ती प्रसन्न सकाळ होती. पूर्व दिशेला नुकतेच तांबडे फुटू लागले होते.वृक्षांवर बसून पक्षी चिवचिवाट करत होते.।।७।। कोंबडा आरवू लागला.शीतल वायू मंदपणे वाहत होता.प्रभातकाळी वृद्ध लोक शय्येवर बसून परमेश्वराचे नामस्मरण करू लागले.।।८।। सूर्यनारायणाचे पूर्व दिशेला आनंदात आगमन होऊ लागले. त्यामुळे तम दूर गुहेत पळू लागला.।।९।। परम भाविक सुवासिनी सडासंमार्जन करू लागल्या आणि वासरे गाईंस पाहून चर्‍हाटें तोडण्याचा प्रयत्न करू लागले.।।१०।। अशा त्या रम्य वेळी एक साधू शेगावांत श्रीगजानन महाराजांच्या दर्शनासाठी येता झाला.।।११।। तो गोसावी एखाद्या भणंग, भिकाऱ्याप्रमाणे दिसत होता.अर्थातच महाराजांच्या श्रीमंत भक्त मंडळींनी त्याची दखल घेतली नाही.।।१२।। एक अतिशय जीर्ण झालेली लंगोटी त्या गोसाव्याने नेसली होती व भगवी चिंधी डोक्यास गुंडाळली होती.त्याच्या डाव्या खांद्यावर झोळी होती.।।१३।। तर पाठीवर मृगजिनाची गुंडाळी होती. असा तो गोसावी श्रींच्या दर्शनासाठी एकीकडे कोपर्‍यांत जाऊन बसला.।।१४।। एव्हाना महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होऊ लागली होती.त्या गर्दीत गोसाव्यास श्रींच्या दर्शनाचा लाभ कसा बरे होणार ?।।१५।। तो तिथेच बसून ' भक्तगणांच्या इतक्या गर्दीत आज मला केवळ समर्थांचे चरणही दृष्टीस पडणे कठीण आहे.' असा विचार करू लागला.।।१६।। मी काशीत असतांनाच श्री समर्थांची कीर्ती ऐकली होती. तिथेच मी स्वामींस भांग अर्पण करण्याचा नवस श्रद्धेने केला होता.।।१७।। तो हेतु मनात धरूनच मी इथे शेगावांस आलो खरा, पण त्या माझ्या नवसाची पूर्तता येथील भक्त मंडळी करू देतील काय?।।१८।। गांजाचें केवळ नांव जरी मी काढले तरी हे लोक मला लाथाच घालतील.मी तर फक्त माझा गांजा अर्पण करण्याचा नवस फेडण्यासाठीच शेगावांस आलो आहे.।।१९।। ह्या माझ्या नवसाची गोष्ट मी कोणाला अन कशी सांगावी बरे? इथे जमलेल्यांपैकी एकही भक्तगण या शांभवीची आवड असलेला दिसत नाही.।।२०।। जी वस्तु आपणांस प्रिय वा आवडती असते,तीच गोष्ट या जगात सर्वोत्तम आहे असे वाटते आणि त्यामुळे अर्थातच त्या वस्तुचाच नवस केला जातो.।।२१।। असे नाना विचार तो गोसावी करू लागला.तो समर्थांचे दर्शन घेण्यास अत्यंत आतुर झाला होता.।।२२।। ती त्याची मनीषा अंतर्ज्ञानी समर्थांस कळली आणि त्यांनी इतरांस त्या काशीच्या गोसाव्यास आपणासमोर आणण्यास सांगितले.।।२३।।' तो पहा, एका कोपऱ्यात बिचारा लपून बसला आहे.' हे समर्थ वचन ऐकून त्या गोसाव्यास अतिशय आनंद झाला.।।२४।। आणि तो मनी विचार करू लागला,' खरोखरच हे संत त्रिकालज्ञानी असतात. मी जे काही मनात बोललो, ते सर्व काही यांना समजले.।।२५।। अगदी स्वर्गलोकीच्याही सर्व कथा श्रेष्ठ अशा योगीवरांस समजतात,असे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत षष्ठाध्यायीं लिहिलेले आहे.।।२६।। त्याचीच इथे मला आता प्रचीती आली.हा त्रिकालदर्शी,महात्मा साधुवर खरेच धन्य धन्य होय.।।२७।। मी काहीही बोललो नाही, तरी हे पुण्य पुरुष माझा नवस नक्कीच जाणतील.आता काही क्षणातच मला ह्याचे प्रत्यंतर येईल.'।।२८।। भक्तमंडळींनीं त्या गोसाव्याला महाराजांसमोर आणले.त्याला पाहून महाराज म्हणाले,"तुझ्या झोळीत काय आहे ते आता बाहेर काढ.ज्या गोष्टीचा तू नवस करून ती गोष्ट तीन महिने सांभाळलीस,त्याचे आता इथेच पारणे होऊ दे."।।२९-३०।। हे ऐकताच तो गोसावी गहिवरला,अन समर्थांच्या चरणी त्याने माथा टेकला व स्वामींपुढे एखाद्या लहान बालकाप्रमाणे गडबडा लोळूं लागला.।।३१।। त्यावर महाराज बोलते झाले,आता तुझे हे नाटक पुरें झाले.त्या गांजाची बुटी झोळीच्या बाहेर काढ.।।३२।। नवस बोलतांना तुला काही लाज नाही वाटली आणि आता का हे निरर्थक चाळे करतो आहेस?।।३३।।गोसावी महाचतुर होता.दोन्ही हात जोडुन,अत्यंत नम्रतेने तो जरा भीत भीतच बोलू लागला.।।३४।।' मी बोललेला नवस फेडण्यासाठी झोळीतील गांजाची बुटी काढतो,परंतु ह्या दीन दासाची एक विनंती आपण मान्य करावी.।।३५।। ह्या माझ्या बुटीची आपणांस नित्य आठवण रहावी.(ही बुटी आपण सतत आपल्याजवळ ठेवावी व हिचे कायम सेवन करावे.)हीच माझ्या मनीची इच्छा आहे, ती आपण माझ्यावर कृपा करून पूर्ण करावी.।।३६।। वास्तविक ह्या बुटीची आपणांस काहीच आवश्यकता नाही,हे मी पूर्णत: जाणुन आहे.पण केवळ ह्या बालकाची आठवण म्हणुन तरी ही बुटी आपण स्वीकारावी.।।३७।। भक्त जे जे इच्छितात, ते ते सर्व परमेश्वर त्यांना देतो.अगदी अंजनीचीच कथा आठवून पहा.।।३८।। अंजनी एक वानरी होती. तिने शिव शंभो महादेवाला प्रार्थना केली की हे शंकरा,तुम्ही माझ्या उदरीं वानर होऊन जन्म घ्यावा.।।३९।। ते हराने मान्य केले.शिव तिच्या पोटी महारुद्र म्हणुन जन्मास आले. अशा रितीने चंद्रमौळींनीं अंजनीचे मनोरथ पूर्ण केले.।।४०।। तिथे अंजनीचे वानरपण शिववरदानाच्या आड आले नाही.तेव्हा माझ्या बुटीची आठवण रहावी म्हणुन तिचा तुम्ही स्वीकार करा.।।४१।। तसेच तुम्ही साक्षात कर्पूरगौर शंकरच आहांत,म्हणून हे दयाळा,या बुटीचा असा अव्हेर करू नका.।।४२।। ही बुटी इतरांना जरी हीन वाटली, तरी ती आम्हांस भूषणावह असेल,असे प्रत्यक्ष ज्ञानवल्ली शंकर हिच्याविषयी बोलले आहेत.'।।४३।। यावर महाराज किंचित द्विधा झाले, पण अखेर त्यांनी होकार दिला.आई आपल्या बाळांचे वेडेवाकडे हट्ट पुरवतेच.।।४४।। मग त्या गोसाव्याने झोळीतून बुटी काढली व हातावर घेऊन धुतली. नंतर ती चिलमींत भरून पुण्यपुरुष गजानन महाराजांना ओढण्यास दिली.।।४५।। असा बुटीचा वृत्तांत मी तुम्हांस सकारण कथिला. त्याचे मर्म लक्षात घेऊन प्रत्येकाने विचार करावा.।।४६।। असो. अशाप्रकारे स्वत:ला धन्य धन्य मानून तो गोसावी काही दिवस शेगावांत राहिला व नंतर रामेश्वरास गेला.।।४७।।गांजाची अशी प्रथा त्या शेगांवात पडली.पण त्यामुळे समर्थांस व्यसनाधीनता कधीच आली नाही.।।४८।। एखाद्या पद्मपत्राप्रमाणेच ते खरोखर अलिप्त होते. अशा त्या थोर महात्म्याची कधी कुणाबरोबर तुलना होऊ शकेल काय?।।४९।। समर्थ कधी वेदऋचा उदात्त-अनुदात्त स्वरांसहित अस्खलित म्हणत असत तर कधी त्यांचे नावही घेत नसत.।।५०।। महाराजांचे ते स्पष्ट, अस्खलित वेदोच्चार ऐकून वैदिक ब्राह्मणही आश्चर्यचकित होत असत.केवळ यांमुळेच गजानन हे ब्राह्मण असावेत, असे खूप लोकांचे मत होते.।।५१।। कधी कधी महाराज एखाद्या अभिजात गायकाप्रमाणे एकच पद वेगवेगळ्या रागांतून गाऊन दाखवत असत.।।५२।।' चंदन चावल बेलकी पतीया ' हे पद त्यांना अत्यंत प्रिय होते.अतिशय हर्षयुक्त स्वरांत हे पद समर्थ नेहेमीच गात असत.।।५३।। ते कधी ' गण गण गणात ' हे भजन म्हणत असत, तर कधी नुसतेच मौन धरत असत.तर काही वेळा शय्येवरी निचेष्टित पडुन रहात असत.।।५४।। समर्थ कधी कधी वेड्यासारखे वागतं, तर काही वेळेला वनांत भटकत असत. कधी अकस्मिकपणे एखाद्याच्या घरी जात असत.।।५५।। असो.त्या शेगांवांत जानराव देशमुख नावाचे एक सज्जन गृहस्थ होते. ते वयोवृद्ध झाल्याने त्यांचा अंत:काळ जवळ आला होता.।।५६।। त्यांचे शरीर व्याधीग्रस्त झाले होते,जणु काही शरीरातील सर्व शक्तीच निघून गेली होती.वैद्य सर्वतोपरी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते.।।५७।। अखेर नाडी परीक्षा करून वैद्याने त्यांच्या नातेवाईकांस कळविले की हा कठीण प्रसंग आहे खरा, पण जानराव आता ह्यांतून वाचतील अशी आशा वाटत नाही.।।५८।। आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न केले, पण तिळभरसुद्धा त्यास यश आले नाही.तेव्हा यांना आतां घोंगडयावरती काढुन ठेवलेलेच बरे.।।५९।। हे ऐकताच अवघे नातेवाईक अत्यंत दु:खी झाले व जानराव, तू आम्हांस सोडुन जाऊ नकोस असा विलाप करू लागले.।।६०।। तुझ्याप्रीत्यर्थ कित्येक दैवतांना आम्ही नवससायास केले, पण दुर्दैवाने एकही देव आम्हांस पावला नाही.।।६१।। आता तर वैद्यानेदेखील हात टेकले, जेणेकरून आमचे सर्व प्रयत्नच कुंठित झाले. आता फक्त हा अखेरचा प्रयत्न एकदा करून पाहूं या.।।६२।।बंकटलालाच्या घरी एक साक्षात्कारी महापुरुष आले आहेत.त्यांच्या योगें ही शेगांव नगरी जणु प्रती पंढरपूरच झाली आहे.।।६३।। संत-साधूंनी मनांत आणले तर काय होत नाही ? अशक्य गोष्टीही शक्य होतात. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मृत सच्चिदानंदबाबाला पुनर्जीवित केले.।।६४।। आपण आता त्याची प्रचीती पाहू. चला, कोणीतरी जाऊन समर्थांना नमन करून त्यांची करुणा भाकू या. उगीचच आता वेळ दवडून उशीर करू नका कारण जानरावाचा अंतसमय अगदीच जवळ आला आहे.।।६५।। असा विचार विनिमय झाल्यावर एक आप्त धावतच बंकटलालाच्या घरी आला आणि त्याने जानरावाची हकीकत बंकटलालास कथन केली.।।६६।। जानराव देशमुखाचा अंत:काळ जवळ आला आहे,म्हणूनच मी तुमच्याकडे आलो आहे.।।६७।। तेव्हा कृपा करून महाराजांचें चरणतीर्थ तुम्हीं मला द्यावे.जानरावांसाठी ते तीर्थ अमृताप्रमाणे प्रभावी ठरेल असेच आम्हांस वाटते.।।६८।। त्यावर बंकटलाल म्हणाला," ही गोष्ट काही माझ्या हातात नाही,तुम्ही माझ्या पित्याला यासाठी आदरपूर्वक विनंती करावी."।।६९।। जसे त्याने सुचवले, तसेच त्या आप्ताने तात्काळ केले व भवानीरामांस समर्थांचे तीर्थ देण्याची विनवणी केली.।।७०।। भवानीराम अतिशय दयाळू आणि सज्जन गृहस्थ होते. खरे सज्जन नेहेमीच दुसर्‍याचें दुःख ऐकून दु:खी-कष्टी होतात.।।७१।। त्यांनी एका पेल्यामध्ये पाणी भरले व ते समर्थांच्या चरणांस लावले आणि समर्थांस प्रार्थना केली की हे तीर्थ मी जानरावास पिण्यास देतो.।।७२।। समर्थांनी त्यांस संमती दिल्यावर ते तीर्थ जानरावास पाजण्यात आले, अन काय आश्चर्य ! जानरावाच्या घशाची घरघर ते तीर्थ प्राशन केल्यावर बंद झाली.।।७३।। तो हात हालवूं लागला,त्याने डोळेही किंचित उघडले. अशाप्रकारे समर्थांच्या तीर्थाच्या प्रभावाने जानरावाच्या व्याधीस गुण येऊन उतार पडु लागला.।।७४।। हा चमत्कार पाहून तिथे जमलेले सर्व स्त्री-पुरुष अतिशय आनंदीत झाले.सर्वांस गजानन महाराज या सत्पुरुषाचा अधिकार वा थोरवी कळून आली.।।७५।। मग त्या नातेवाईकांनी औषधोपचार बंद करण्याचा निर्णय घेतला व केवळ समर्थांच्या तीर्थावरच भिस्त ठेवली.त्यांमुळे लवकरच जानराव व्याधीमुक्त होऊन आरोग्यवान झाला.।।७६।। आठ दिवसानंतर जानराव पाहिल्याप्रमाणेच निरोगी व ठणठणीत झाला आणि भवानीरामाच्या घरी समर्थांच्या दर्शनांस आला.।।७७।।पहा श्रोतेहो, सर्व उपचारांत संतांचें चरणतीर्थ कसे अमृतच ठरले.खरोखर समर्थ केवळ संत नसून ह्या कलीयुगातील साक्षात परमेश्वरच होते.।।७८।। प्रत्यक्ष श्री गजाननासारखे थोर संत शेगांवीं होते,मग ते तिथे असतांना शेगांवातील कुणीही यमसदनी जायलाच नको होते. अशी आता इथे एक शंका सहज येऊ शकते.पण हा एक कुतर्कच झाला.।।७९-८०।। संत काही मृत्यू टाळत नाहीत तर ते निसर्गनियमाप्रमाणेच वागतात.परंतु एखादे आगंतुक संकट आल्यांस ते मात्र सहज निवारू शकतात.।।८१।। श्रीज्ञानेश्वर महाराजांनी नेवासे गावी सच्चिदानंदबाबांस पुनर्जीवित केले.पण त्यांनी स्वत: मात्र आळंदीला संजीवन समाधी घेतली.।।८२।। याचे रहस्य इतकेच की संत भक्तांवर आलेले गंडांतर टाळू शकतात, गंडांतर टाळणे हे थोर संताना काहीच अशक्य नसते.।।८३।। या जगांत मृत्यूचे तीन प्रकार आहेत. त्यांची नांवें मी आता तुम्हांस क्रमवार देतो.।।८४।। पहिला आध्यात्मिक,दुसरा आधिभौतिक आणि तिसऱ्याचे नावं अधिदैविक आहे.या तिघांत सर्वात प्रबळ आध्यात्मिक मृत्यु होय.।।८५।। आधिभौतिकाची सुरुवात खरे तर कुपथ्यानें होते.नाना प्रकारच्या व्याधी शरीरांत निर्माण होतात.।।८६।। त्यांचा प्रादुर्भाव झाल्यावर अखेर मृत्यु येतो.त्या मृत्युवर औषधानें मात करता येते.।।८७।। मात्र त्यासाठी औषध देणारा कुशल शास्त्रज्ञ असला पाहिजे की ज्याला औषधींचे पूर्ण ज्ञान आहे.।।८८।। असा एखादा वैद्य भेटल्यास आधिभौतिकाचा नक्की नाश होतो.तसेच आधिदैविकास नवस सायास करून दूर करता येते.।।८९।। तर हे भौतिक आणि दैविक असे दोन गंडांतर प्रकाराचे मृत्यु या जगी जनांस माहीत आहेत.।।९०।। आता थोडे आध्यात्मिक मृत्युविषयी, जो कुणासही टाळता येत नाही.प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण समीप असतांना देखील अर्जुनाचा पुत्र अभिमन्यु रणांत मृत्युमुखी पडला.।।९१।। तर जानरावाचा मृत्यु हा गंडांतर स्वरुपाचा होता, तो समर्थतीर्थ देऊन सहजच टाळला.।।९२।।म्हणजेच गंडांतर हे थोर साधूंच्या कृपेने दूर करता येते आणि तेच शेगांवात घडून आले.।।९३।। या जगी काहीजणांचे मृत्यु हे नवसांनीं टाळता येतात, परंतु हे लोकहो, तो नवस मात्र अत्यंत श्रद्धेने केला पाहिजे.।।९४।। पूर्ण श्रद्धा असल्यावर तीच मृत्यु टाळू शकते.खरोखर श्रद्धाच सर्व तऱ्हेने सर्वांहून श्रेष्ठ असते.।।९५।।थोर साधूचे चरणतीर्थदेखील वरील दोन प्रकारचे मृत्यु टाळू शकतात, मात्र तो खरोखरच संत असावयास हवा.।।९६।।केवळ साधुचा वेष धारण केलेला एखादा अयोग्य पुरुष असल्यास मात्र ही गोष्ट घडणे शक्यच नाही.माती ही कधीही कस्तुरी होऊ शकत नाही, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा.।।९७।। षड्‌विकारांचे निवारण केल्याशिवाय अंगी साधुत्व येत नाही आणि खरे साधू असल्याशिवाय असे अघटित कधीही होणार नाही.।।९८।। म्हणून एखाद्या बहुरुप्यास ओळखणे हे आवश्यक आहे,उगाच केवळ पिवळे दिसते म्हणुन पितळेस सोने मानू नका.।।९९।। श्री गजानन महाराज हे वेषधारी साधू नव्हते, तर ते पूर्ण साक्षात्कारी संत होते, म्हणूनच जानरावाची व्याधी समर्थांच्या तीर्थानें बरी झाली.।।१००।।जानराव देशमुख बरे झाल्यावर त्यांनी बंकटलालाच्या घरी श्री गजानन महाराजांप्रीत्यर्थ थोर भंडारा घातला.।।१०१।।तीर्थ घेऊन देशमुख बरा झाला खरा, पण स्वामींना एक पेच पडला.त्यांवर त्यांनी एक असा विचार मनांत केला.।।१०२।। आपण कडकपणा धरल्याशिवाय ही उपाधी काही जाणार नाही,स्वार्थी प्रापंचिक काही साधुत्वाचे खरे महत्त्व जाणत नाहीत.।।१०३।। त्या दिवसापासून दयाघन स्वामी महाराज सर्वांशी केवळ लटकेच कठोर वर्तन करू लागले.।।१०४।। हा त्यांचा कडकपणा इतरांना असह्य झाला, पण त्यांच्या भक्तांना त्याचें काहीच वाटले नाही.।।१०५।।जसा नरसिंह अवतार इतरांस क्रूर वाटला,पण कयाधुचा पुत्र प्रल्हाद त्या रूपांस मुळीच घाबरला नाही.।।१०६।। वाघीण इतरांस जरी भयंकर वाटली तरी तिचा बछडा तिच्याच अंगावर अगदी निर्भयपणें खेळतो.।।१०७।। असो.आतां मी तुम्हांस अजून एक दुसरी खरी गोष्ट सांगतो.कस्तुरीच्या आसपास असलेली मातीही सुगंधित होते अन तिचे मूल्य वाढते.।।१०८।। चंदन तरुच्या सभोवताली असलेली वृक्षवल्लीही थोडीफार सुवासित होते,अर्थात हा तर निसर्ग नियमच आहे.।।१०९।। आता अशी सुवासित झालेली झाडे जर आपणाला चंदन समजू लागली तर त्यांच्या फजितीला निश्चितच काही पारावार उरणार नाही.।।११०।। जिथे ऊंस उगवतो,तिथेच निवडुंगही उगवतो. तर जिथे मोगरा वाढतो तिथेच पिंगूळसुद्धा येतो.।।१११।। जिथे साधु सज्जन या जगात असतात, तिथेच दुर्जनही असतात.हिरे आणि गारा खाणीत नेहेमीच एकत्र असतात.।।११२।। अर्थात एकाच स्थानी आहेत म्हणुन त्यांची किंमत समान नसते.हिऱ्याचे तेज हे हिऱ्याचे भूषण असते,तर गार कधीच तेजस्वी नसते.।।११३।। त्यामुळेच गार ही गारंच राहते व पायाखालीं तुडविली जाते. अमूल्य हिऱ्यावर अशी(पायाखाली तुडविले जाण्याची) वेळ कधीच येत नाही.।।११४।।श्री गजानन महाराजांच्या भक्तमंडळीत असाच एक दुर्जन होता. संतसेवेचा गर्व त्याच्या ठायी होता.।।११५।। तो वर वर सेवा करीत असे,पण त्याच्या मनात भक्तीभाव नव्हता.समर्थांचे नाव सांगून तो मिठाई,पेढे स्वत: लुबाडीत असे.।।११६।।मीच केवळ समर्थकृपेस पात्र आहे व कुठलेच काम माझ्याशिवाय इथे होत नाही असे तो इतर भक्तगणांस सतत म्हणत असे.।।११७।। स्वामी समर्थांचा जसा कल्याण तसाच मी (गजानन महाराजांचा) अत्यंत आवडता पट्टशिष्य होय.माझे सर्व हट्ट ते नेहेमीच पुरवतात.(माझा शब्द ते कधी खाली पडु देत नाहीत.)।।११८।। मीच त्यांची चिलीम भरतो, त्यांच्या खाण्यापिण्याची तयारी करतो,इतर सर्व कामेही मीच करतो.असा मी समर्थांचा अत्यंत आवडता आहे.।।११९।।असे तो सतत लोकांस सांगत असे व आपलीच मनमानी करीत असे.विठोबा घाटोळ माळी हे त्या अधमाचें नांव होते.।।१२०।। महाराज साक्षात स्वत:च शिवशंकर होते,तर हा स्वत:ला नंदिकेश्वर समजू लागला.महाराजांच्या दर्शनास येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांशी तो सतत बाचाबाची करत असे.।।१२१।। हे अर्थातच सर्व काही समर्थांनीं अंतर्ज्ञानाने जाणले. तर लोक हो एक दिवशी श्रींनी काय कौतुक केले ते तुम्ही ऐका.।।१२२।। एके वेळी परगावी रहाणारी कांहीं मंडळी समर्थांच्या दर्शनासाठी शेगांवास आली होती.त्या वेळी समर्थांची स्वारी त्यांच्या शय्येवर निजलेली होती.।।१२३।। समर्थांस जागे करण्याची कुणाचीही हिम्मत होईना,परंतु त्या मंडळीस पुढें जाण्याची घाई होती.।।१२४।। त्यांनी आपापसात कुजबुज केली व ते विठोबाला विनंती करू लागले,' विठोबा,आम्हांस आतांच इथून परगावी जावे लागेल कारण की एक अत्यंत जरूरी काम आहे.पण महाराज तर शय्येवर अजूनही निद्रीस्तच आहेत तर हे कसे घडावे बरे? त्यांचे दर्शन घेतल्याशिवाय काही आमचा पाय निघणार नाही. हे अत्यंत अवघड काम तुझ्याशिवाय कोणी करणे शक्यही नाही. तू समर्थांच्या सर्व शिष्यांत मुख्य व चतुर आहेस. तेव्हा आम्ही तुला हात जोडून विनंती करतो की एवढें काम तू आम्हांसाठी करावेस.'।।१२५-१२८।। अशी आपली स्तुती ऐकून विठोबा मनांत एकदम गर्वानें फुलून गेला. त्याने त्याच क्षणी जाऊन महाराजांस उठविले.।।१२९।। त्यांमुळे त्या मंडळींचे काम झाले पण त्या विठोबा घाटोळावर मात्र संकट ओढवलें.जसे कर्म तसेच फळ हेच खरे.।।१३०।। समर्थांच्या हाती एक भली मोठी काठी होती,तीच त्यांनी त्या विठोबा माळ्याच्या पाठीत घातली.।।१३१।। अन त्यावर महाराज वदले,' आपली योग्यता विसरून हा बेटा(विठोबा)माजला. ह्या लुच्च्यानें उघड उघड इथे व्यापारच आरंभिला आहे.मला मोठमोठ्या पदव्या लावतो, इथे मठांत घंटा आणून बांधतो तर कधी कधी अंगात वारं आल्यासारखे वागतो, असा हा अतिशय नीच मनुष्य आहे. त्या वर्तनाचे आज मी तुला खास हे बक्षीसच देतो.तुझ्यावर कृपा केल्यास मी प्रभूचा अपराधी होईन. सोमरसाला साखर मानूं नये, विषाला जवळ करुं नये, चोरांस निजकंठींचा ताईत कधी समजू नये.'।।१३२-१३५।। अशा रीतीने महाराजांनी त्या घाटोळाला छडीने ठोकला. त्यानंतर विठोबा जो पळाला तो पुन्हा परतून आलाच नाही.।।१३६।। जे का खरे संत असतात ते असेच ढोंगी भक्तांना शिक्षा करतात. इतर ढोंगी साधू मात्र अशा भक्तांमुळे वाहवत जातात.।।१३७।। म्हणजेच अधिकार नसतांनाही ढोंगी साधू संत महात्म्याचे सोंग घेतात अन भोळ्या भक्तजनांस नादी लावतात.असे किती तरी प्रकार झाले आहेत.।।१३८।। स्वार्थी, मतलबी त्यांना साथ देतात, त्यांचा उदो उदो करतात, त्या ढोंग्यांचे भलभलते साक्षात्कार लोकांस सांगतात.।।१३९।। त्यामुळे दोघांचेंही काम होते,अन त्यांना अपार पैसा मिळतो.परंतु ही प्रथा काही बरी नाहीं,ह्या अशाच प्रकारांमुळे समाज रसातळास जातो.।।१४०।। खरे संत हे ईश्वराचे निःसीम भक्त असतात, त्यांना ह्या अश्या षंढ लोकांचे सान्निध्य मुळीच आवडत नाही.।।१४१।। एखाद्या पतिव्रतेची शेजारी कसबिण असू शकेल, हे कधी पटेल का ? तसेच सोन्याचे अलंकार काय कथिल या धातुबरोबर शोभतील काय?।।१४२।। संत महात्मे दुर्जनांस त्यांच्या आश्रयास राहू देतात, परंतु त्यांस काही महत्व देत नाहीत. ती एक व्यक्ती या जगांत केवळ कृतकर्म भोगण्यासाठी आली आहे (असे मानतात).।।१४३।। असे मनी समजून त्याविषयीं मौन धरतात, जसे की ही भूमी निवडुंगालाही स्थान देते.।।१४४।। मोगरा, निवडुंग आणि शेर ही तीनही जमीनीचीं लेंकरे आहेत. पण तिघांची किंमत मात्र निरनिराळी असते.।।१४५।। लोकं मोगर्‍याचें संरक्षण व निवडुंगाचें दहन करतात. तर शेर दारावर चिलटांसाठीं बांधून ठेवतात.।।१४६।।तसेच संत हे भूमीप्रमाणेच जरी अवघ्यांचें रक्षण करतात, तरी प्रत्येकांस त्यांच्या वेगवेगळ्या गुणांप्रमाणेच किंमत देऊन त्याचप्रमाणे ठेवतात.।।१४७।। खरोखर विठोबा घाटोळाचें नशीब अतिशय खडतर होतें,म्हणुनच थोर साधूंचे सान्निध्य लाभूनही दैवानेच ते दूर झाले.।।१४८।। जर त्याने ढोंग केले नसते,तर तो त्याच्या योग्यतेप्रमाणे पात्र ठरला असतां,मात्र त्याने संतांची ती योग्यता मुळीच जाणली नाही.।।१४९।। त्याने कल्पवृक्षाखाली बसून गारगोटी इच्छिली वा कामधेनूजवळ करवंटी मागितली.।।१५०।। थोर संतांच्या सान्निध्यात राहून असे कुणीही करू नये.तिथे केवळ सदविचारांनाच अहर्निश जागृत ठेवावे.।।१५१।। हा दासगणूविरचित श्रीगजाननविजय ग्रंथ अवघ्यां भाविकांस हा भवसागर तरून जाण्यासाठी तारक होवो.(हीच ईश्वरचरणी प्रार्थना.)।।१५२।।

॥श्रीहरिहरापर्णमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ इति तृतीयोऽध्यायः समाप्तः ॥   


Oct 8, 2019

श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्रम्


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


श्रीपाद वल्लभ गुरोः वदनारविन्दं

वैराग्य दीप्ति परमोज्ज्वलं अद्वितीयम । 

मन्द स्मितं सुमधुरं करुणार्द्र नेत्रं 

संसार ताप हरणं सततं स्मरामि ॥


श्रीगुरु श्रीपाद श्रीवल्लभ यांचे मुखकमल वैराग्य कांतीयुक्त, परम तेजस्वी, एकमेव अद्वितीय, सुमधुर मंद हास्ययुक्त असून डोळे करुणेने ओलावलेले (व) संसार ताप नाशक आहेत, त्यांचे मी सतत स्मरण करतो.


श्रीपाद वल्लभ गुरोः कर कल्पवृक्षं 

भक्तेष्ट दान निरतं रिपु संक्षयं वै। 

संस्मरण मात्र चिति जागरणं सुभद्रं 

संसार भीति शमनं सततं भजामि॥


श्रीगुरु श्रीपाद श्रीवल्लभ यांचे हात कल्पवृक्षाप्रमाणे असून भक्तांना इष्ट ते देण्यात तत्पर व शत्रुचा नाश करणारे व केवळ मनात स्मरण केल्याने देखिल बोध करुन उत्तम कल्याण करणारे तसेच संसार भयाचे शमन करणारे आहेत. त्यांचे मी सतत भजन करतो.


श्रीपाद वल्लभ गुरोः परमेश्वरस्य 

योगीश्वरस्य शिव शक्ति समन्वितस्य। 

श्रीपर्वतस्य शिखरं खलु सन्निविष्टं 

त्रैलोक्य पावन पदाब्जं अहं नमामि॥ 


श्रीपाद श्रीवल्लभ गुरु परमेश्वर योगेश्वर शिव-शक्तीसह असलेले, श्रीशैल पर्वताच्या शिखरावर खरोखर निवास करणारे, त्रैलोक्याला पावन करणारे मल्लिकार्जुन आहेत, त्यांच्या चरण कमलांना मी नमस्कार करतो.


Oct 5, 2019

श्री रंगावधूतमहाराज विरचितं श्री स्वामीसमर्थ स्तोत्रं


ll ॐ ll 

ll श्री गणेशाय नमः ll

ll श्री स्वामीसमर्थ स्तोत्रं ll


स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् l

समर्थ नाम्ने अपर नारसिंह ll

त्रिईश अवतार त्रितय आर्ति हारिन् l 

प्रचंडकाय प्रणय एक शुल्क ll १ ll

प्रपन्न कल्पद्रुम पाप दाव l

स्फुलिंग नेत्रोदकशील साधो ll

आजानुबाहो अगमलील योगिन् l

ज्ञ स्वैराचारिन् नाती तुष्ट तिष्ठो ll २ ll

दिग् वस्त्र भूष प्रवि दग्ध पूषन् l

कारुण्य सिंधो नत दीन बंधो ll

मां बालरंगं कृपयोद्धर त्वं l

जहि इह मां मा भव सिन्धु पोत ll ३ ll 

स्तोत्रं स्वामी समर्थस्य चतुर्विशति नामभृत् l

य: पठेत् प्रयतो भक्त्या निर्भय: स सुखी भवेत् ll

ll इति श्री दत्त पादारविंद मिलिंद ब्रह्मचारि पांडुरंग (रंगअवधूत) महाराज विरचितं श्री स्वामी समर्थ स्तोत्रं संपूर्णम् ll

ll श्री स्वामी अर्पणं अस्तु ll    


भावार्थ : अहो, अक्कलकोटनिवासी स्वामी, समर्थ असे नाव असलेलें दुसरें नरसिंह तुम्हांस नमस्कार असो. ब्रह्मा, विष्णू, आणि शिव या देवांचे अवतार असलेलें, अधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा तीन तापांचा नाश करणारे, रुद्ररूप धारण करणारे, केवळ प्रेमभक्ती स्वीकारणारे, शरणागतांचे कल्पवृक्ष, पातकांचे दहन करणारे, अग्नीप्रमाणे तेजस्वी असणारे, पाणीदार डोळें असलेलें, संतश्रेष्ठ, आजानुबाहू, (ज्यांच्या) अगम्य लीला आहेत असे, थोर संन्यासी, ज्ञानीं, (त्रैलोक्यांत) मुक्त संचार करणारे, आणि सदा संतुष्ट अवस्था धारण करणारे अशा (श्री स्वामी समर्थांस) नमस्कार असो. हे दिशारूपी वस्त्र धारण करणाऱ्या पूर्ण ज्ञान भास्करा, हे करुणासागरा, हे दीनांच्या कैवारी (तुम्हांस) नमस्कार असो. तुम्ही माझा,या रंगअवधूत बालकाचा कृपया उद्धार करावा. हे संसार सागरतारका, मला मारू नकोस. श्री स्वामी समर्थांचे चोवीस नावांनी युक्त असे स्तोत्र जो दृढ श्रद्धेनें वाचतो, तो निर्भय आणि सुखी होतो. असे हे श्रीदत्त महाराजांच्या चरण-कमलांतील भ्रमर असलेले, ब्रह्मचारी पांडुरंग (रंगअवधूत) महाराजांनी रचलेलें श्री स्वामी समर्थ स्तोत्र संपूर्ण झाले.


Oct 1, 2019

श्री साई चरित्रामृत - २


।। श्री गणेशाय नमः ।। श्री सद्गुरू साईनाथाय नमः ।। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ।।


श्री साईबाबांचे शिरडीतील सुरुवातीचे वास्तव्य आणि दिनक्रम 


शिरडीत आल्यावर साईबाबा मशिदीत राहू लागले. बाबांच्या शिरडीतील पुनरागमनाच्या साधारणपणें १०-१२ वर्षे  आधी देवीदास नावाचे एक वैरागी सत्पुरुष मारुतीच्या देवळांत वास्तव्यास होते. साई त्यांच्याबरोबर काही काळ घालवीत असत. कधी त्यांची बैठक चावडीत तर कधी मारुतीरायाच्या मंदिरात असे. अशाप्रकारे लहर येईल तेथे स्वच्छंदपणे बाबा राहत असत.पुढे जानकीदास नावाचे महानुभावी गोसावी शिरडीत आले. त्या जानकीदासांबरोबर साई महाराज नित्य गप्पा- गोष्टी करत असत किंवा मग जेथे साई असत तिथे जानकीदास येत असत. उभयतांसी मोठे प्रेम । बैठकी होती नित्यनेम । ऐसा तयांचा समागम । सुख परम सकळिकां ।। 

तरुणवयांत साई डोक्याचे केस सबंध राखीत व डोके कधीच मुंडवीत नसत. तसेच त्यांचा पोशाखही एखाद्या पहिलवानाप्रमाणे असे. बाबा जेव्हा राहात्याला जात असत, तेव्हा झेंडू, जाई, जुई वगैरेंची रोपें आणीत आणि आपल्या हातांनी उजाड जागेत लावीत. त्या रोपांस नित्य पाणीही घालीत असत. बाबांचे भक्त वामनराव गोंदकर व तात्याबा कोते पाटील त्यासाठी मातीचे दोन कच्चे घडे दररोज पुरवीत असत. विहिरीवरील कुंडीमधून पाणी त्या घड्यांत भरून बाबा ते घडें खांद्यावर वाहून आणीत असत आणि रोपांस आपल्या हातांनी पाणी शिंपीत असत. संध्याकाळ होताच ते घडें निंबातळीं ठेवीत असत. ठेवण्याचाच अवकाश तेथ । जागचे जागीच भंगूनि जात । उदयीक तात्या आणूनि देत । घडें तयांप्रत नूतन ।। तीन वर्षे हाच उद्योग करून बाबांनी त्या उजाड जागेंत बाग फुलवली. त्याच जागी नंतर सुयोगाने साठे वाडा उभा राहिला व सुरुवातीला साईभक्तांच्या राहण्यासाठी फारच उपयुक्त ठरला. 

पुणतांबे येथील गंगागीर नावाचे एक महाप्रसिद्ध वैष्णव आणि ब्रह्मचर्याश्रमी यांचे शिरडीस वरचेवर आगमन होत असे.प्रथम जेव्हा दोन्ही हातांत मातीच्या घागरी भरून रोपांसाठी विहिरीवरून पाणी वाहतांना साईबाबांना त्यांनी पाहिले, तेव्हा गंगागीरांस मोठे आश्चर्य वाटले. परंतु समारोसमोर भेट होताच,गंगागीरबुवा स्पष्टपणे म्हणाले, " या शिरडीचे भाग्य खरोखर धन्य आहे. हा खांदा आज पाणी वाहतोय खरा, पण ही मूर्ती सामान्य नाहीं. या भूमीचे काही पुण्य होतें, म्हणूनच हे श्रेष्ठ रत्न इथें आले."

तसेच आणिक एक महाविख्यात संत आनंदनाथ यांचेही 'हे साईनाथ अद्भुत कार्य करतील.' असेच भाकित होतें. अक्कलकोटवासी महापुरुष श्री स्वामी समर्थ यांचे आनंदनाथ शिष्य होते. एकदा शिरडी येथील माधवराव देशपांडे, दगडू गायके, नंदराम मारवाडी व भागचंद मारवाडी अशी काही भक्त मंडळी आनंदनाथ महाराजांच्या दर्शनास येवले येथील त्यांच्या मठांत गेली होती. तेथून ते सर्व  परत येत असतांना आनंदनाथ महाराज त्यांच्या बैलगाडीत बळेच बसले आणि " मलाही शिरडीस यावयाचे आहे. " असे म्हणून शिरडीस आले. तिथे साईबाबांना समक्ष पाहून ते म्हणाले, " अहो ! हा प्रत्यक्ष हिरा आहे हिरा... आज जरी हा उकिरड्यावर राहतोय, तरी हा हिरा आहे, गारगोटी नव्हें ! माझे हे बोल ध्यानांत ठेवा, पुढें तुम्हांस याची प्रचिती येईल." आनंदनाथांनी जेव्हा हे उद्गार काढले तेव्हा, बाबांचे केवळ पोरवय होते. असे भविष्य वर्तवून आनंदनाथ महाराज येवल्यास परतले. 

खरोखर, प्रत्यक्ष ईश्वराचे अवतार असलेले हे संत स्वतः निर्विकार असून जगताचा उद्गार आणि कल्याण करण्यासाठी पृथ्वीवर पुन्हा पुन्हा अवतार घेत असतात. पुढे काही कालांतराने एक आश्चर्यकारक घटना घडली. मोहिद्दीन तांबोळी नावाच्या पहिलवानाबरोबर साईबाबांचा काही बेबनाव होऊन त्यांची कुस्ती जुंपली. त्यांत बाबा हरले. तेव्हापासून मग निश्चय करून बाबांनी आपला पोशाखच बदलला. साईंनी त्यानंतर अंगावर कफनी ओढली, लंगोट लावला आणि डोक्याला एक फडका गुंडाळला. गोणपाटाचे बसण्यासाठी आसन केले, गोणाचेच अंथरूण केले. असे फाटके तुटके नेसून त्यांतच ते समाधान मानू लागले. ह. भ. प. दासगणू महाराज विरचित भक्तिसारामृत या ग्रंथात अध्याय २६ मध्ये याविषयीं थोडी वेगळी कथा आहे. त्यानुसार बाबांचे गुरु गोपाळराव देशमुख यांनी आपल्या डोक्याचे फडके काढून बाबांच्या डोक्यांस बांधले आणि शिरडीकडे जाण्याची आज्ञा केली. चांद पाटील यास जेव्हा साई प्रथम भेटले, तेव्हाही त्यांचा पोशाख कफनी आणि डोक्यावर टोपी असाच होता. त्यावरून ही कथा जास्त योग्य वाटते.असो. गंगागीरांच्या बाबतीतही अशीच घटना घडली होती. त्यांना तालीमबाजीची फार आवड होती. एकदा कुस्ती खेळतांना एका सिद्धपुरुषाचे अनुग्रहपर शब्द कानीं पडले,आणि त्यांस वैराग्य प्राप्त झाले. संसारावर पाणी सोडून गंगागीर परमार्थ भजनाला लागले. पुणतांब्याजवळ गोदावरी नदीच्या दोन प्रवाहांमधील बेटावर गंगागीर बुवांचा मठ आणि शिष्यही आहेत. 

पुढें साईनाथ कोणी काही विचारले तर उत्तर देत व स्वतः आपण कोणाबरोबर बोलत नसत. दिवसा त्यांची बैठक निंबाखाली असे, तर कधी गावाच्या सीमेवरच्या ओढ्याजवळील बाभूळीच्या सावलीत बसत. "गरिबी अव्वल बादशाही । अमीरी से लाख सवाई । गरिबों का अल्ला भाई ।" अक्षयीं साई वदत कीं ।।


बायजाईची साई भक्ती आणि बाबांचे भिक्षाटन 


Image result for sai satcharitra adhyay 8

त्या शिरडींत काही लोक मात्र बाबांचे श्रेष्ठपण जाणत होते. तात्या कोते यांची आई, बायजाबाई डोक्यावर टोपलीत भाजी-भाकरी घेऊन रानांत जात असे. भर दुपारी रानावनांत कोस न कोस अंतर चालत, दाट झाडें-झुडपें यांत ह्या वेड्या फकिरांस शोधत फिरत असे. त्यांच्या पाया पडून आपल्या हातांनी बाबांस भाजी-भाकरी वा घरून आणलेलें खास अन्न भरवीत असे. साईंनी अन्न ग्रहण केल्याशिवाय बायजाई जेवत नसें. त्या माऊलीच्या सत्त्वाची किती थोरवी गावी,बरें ! गणपतराव कोते पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी बायजाबाई ह्या उभयंतांची बाबांवर अपार श्रद्धा होती. फकीरचि देव त्या उभयतांचा । भावार्थियाचाच देव कीं ।। हे धार्मिक,सहृदयी आणि सात्विक दाम्पत्य जेव्हा श्री साईबाबांच्या प्रथम भेटीस गेले, त्या प्रसंगाचे वर्णन श्री. कवडे महाराजांनीं आपल्या 'श्री संत साईमहाराज यांचे चरित्र' या पुस्तकांत अत्यंत सुरेख केले आहे. ते म्हणतात, "सौ. बायजाबाई दर्शनास येताच महाराज तात्काळ उठून उभे राहिले. चुकलेल्या वासराला अचानक आपली माय दिसावी, तसे तें सौ. बायजाबाईंकडे आशाळभूतपणें पाहू लागले. जणू पूर्वजन्मींचा संबंध ते या जन्मी निश्चित करत होते." साईबाबा नेहेमीच ध्यानस्थ असत. बायजाई पान मांडून टोपलीतले अन्न त्यांत वाढत असे. साई कधी खात तर कधी बायजाबाई प्रयत्न करून त्यांस खाऊ घालत असे. हा क्रम बरेच दिवस चालला होता. पुढें बाबांनी रान सोडले आणि ते गावांत येऊन राहू लागले. मशिदीत वास्तव्यास आल्यावर साईबाबांनी भिक्षा मागण्यास प्रारंभ केला. अशा रितीने बायजाईचे बाबांना शोधत राना-वनांत फिरण्याचे कष्ट वाचले. पाटील दाम्पत्यांनी हा बाबांस जेवू घालण्याचा / नैवैद्य अर्पण्याचा नेम आजन्म चालविला. तो तसाच त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाने, तात्या कोते पाटील यांनीही चालू ठेवला. श्री साईबाबांच्या समाधीनंतरही कोते घराण्यांतून आजही श्रींस नेवैद्य जात आहे. 

श्रेष्ठ संत श्री साई यांचे आचरण एखाद्या फकीराप्रमाणे होते. ते सर्वकाळ आत्मानंदात रंगलेले असत. सुरुवातीच्या काळांत बाबा भिक्षेकरी होऊन "पोरी, आण गें चतकुर भाकरी !" असे म्हणत ठराविक घरासमोर उभे राहून भिक्षा मागत. ठराविक ऐशा पाच घरीं । बाबा मागत भाकरी । त्यांतून अन्न उरलें जरी । खाऊ घालीत श्वानांसी ।। श्री. गणपतराव व बायजाबाई कोते पाटील, राधाबाई गोंदकर पाटील, श्री. संताजी शेळके पाटील, नंदराम शेट मारवाडी आणि श्री अप्पाजी कोते पाटील ह्या भाग्यवानांच्या दारी श्रीसाई भिक्षा मागत असत. एका हातांत टमरेल आणि दुसऱ्या हातात फडक्याची चार टोकें एकत्र करून भिक्षेसाठी बनवलेली झोळी घेऊन स्वतः दररोज ठरलेल्या घरी फिरत असत. शिजलेला भात किंवा भाकरी यासाठी झोळी तर भाजी, दूध,ताक यांसारख्या कुठल्याही पातळ पदार्थांसाठी टमरेलाचा उपयोग करीत असत. यदृच्छेनें जे जे अन्न मिळत असे, त्यांवरच तें संतुष्ट असत. श्रीसाई भिक्षासुद्धा नियमित मागत नसत. कधी एका वेळेस तर कधी दिवसातून दहा-बारा वेळांही भिक्षा मागत असत. मशिदीमध्ये एक पसरट मातीचे वा दगडाचे भांडे होते. मिळालेले अन्न साईबाबा त्या भांड्यात ठेवीत असत. त्यांतच कावळे, कुत्रें येऊन खात असत. मशिद व त्यापुढील अंगण झाडणारीसुद्धा त्यांतील दहा-बारा भाकरीं घेऊन जात असे. कोणालाही बाबांनी कधी अन्न खाण्यास वा घेऊन जाण्यास मज्जाव केला नाही. आरंभी हा वेडा फकीर । येचि नामें जनां महशूर । तुकडें मागुनि भरी जो उदर । कैंचा बडिवार तयाचा ।। श्री साईबाबांचा हा क्रम समाधीच्या आदल्या दिवसापर्यंत चालू होता. 


क्रमश: