॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
Jan 23, 2026
स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - ७
May 9, 2025
श्री स्वामी समर्थ मठ संस्थान, केज - शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळा
सुंदर हे रूप गोजिरे सुकुमार । दिसे मनोहर, स्वामीराज ॥
एक कर कटी शोभतो साजिरा । रुद्राक्ष हो हार, गळा एका ॥
केशराची उटी, कस्तुरी ललाटी । भक्ताचे हो संकटी उभा असे ॥
सरळ नासिक शोभते वदना । रत्नाची हो खाणी, स्वामीराज ॥
वैराग्य विभूती, कौपिन शोभत । असे ते स्वरूप स्वामीराया ॥
चरण मृदू असे नवनीतापरी । वंदिता कैवारी, स्वामीराज ॥
लावण्याचा गाभा, ज्योतीची ही प्रभा । भक्तासाठी उभा, सर्वकाळ ॥
स्वामीसुत म्हणे, काय वर्णू रूप । खरे तीच एक स्वामीराया ॥
" आम्हांसि न लगे द्रव्य-अघ । आपल्या घरासि जा रे नीघ । घराचे उकीरड्यांत टाकून दे ओघ । हा दगड तेथे नेऊन ठेव रे ॥" ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृतात वर्णिलेला हा 'दगड' म्हणजेच या पावन पादुका होत.
साक्षात त्या ब्रह्मांडनायकाच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या केज येथील या श्री स्वामी समर्थ मठास स्वामीभक्तांनी शक्य झाल्यास अवश्य भेट द्यावी आणि या विशेष सोहळ्यास उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा.
श्री स्वामी समर्थ मठ संस्थान, केज - या सोहळ्याविषयीची सविस्तर माहिती इथे उपलब्ध आहे.
केजकर स्वामी - महारूद्रराव देशपांडे यांचे चरित्र इथे वाचता येईल.
Apr 30, 2025
श्री स्वामी समर्थ महाराजांचे दुर्मिळ चरित्र आणि 'श्रीस्वामी सत्संग'
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे प्राचीन व दुर्मिळ चरित्र पुणे नगर वाचन मंदिर यांनी सर्व स्वामीभक्तांसाठी उपलब्ध करून दिले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीला, आरत्या, पदें, अष्टकें आणि स्तोत्र यांचे अतिशय सुंदर संकलन केलेला हा ग्रंथ प्रत्येक स्वामी भक्ताने आवर्जून सतत नित्योपासनेसाठी संग्रही ठेवावा असाच आहे.
*** पदामृत सागर - श्रीअक्कलकोटनिवासी स्वामीसमर्थ मंडळ ***
'श्रीस्वामी सत्संग' अर्थात अँफी थिएटर, बोरिवली पूर्व इथे आयोजित केलेले श्री संजय नारायण वेंगुर्लेकर यांचे ओघवत्या शैलीतील भक्तिरसमय असे व्याख्यान प्रत्येक स्वामीभक्ताने वारंवार ऐकावे असेच आहे.
Jan 22, 2022
विश्वव्यापी परात्मा यो नानारूपधरोsप्यज:
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ श्री नृसिंहसरस्वत्यै नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
Nov 18, 2021
स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - ६
॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥
Oct 7, 2021
स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - ५
॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥
Oct 1, 2021
स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - ४
॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
Sep 22, 2021
स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - ३
॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
केजकर स्वामी - महारूद्रराव देशपांडे आपल्या कुलस्वामींच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे महारूद्रराव गेले असता, श्री विठ्ठलमूर्तीच्या जागी त्यांना श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाले. त्या अक्कलकोटनिवासी योगिश्वरांच्या कृपेनें हा अद्वैताचा साक्षात्कार घडल्यावर महारूद्ररावांची त्यांच्या चरणी असलेली श्रद्धा अधिकच दृढ झाली अन आपली श्रीगुरुदेवमूर्ति कधी एकदा पाहीन, असा ध्यास लागला. पुढें काही दिवसांनी अक्कलकोटास जाण्याचा योग आला आणि श्री स्वामी समर्थ हेच आपले कुलदैवत रुक्मिणीकांत श्रीजनार्दन आहेत असा भाव ठेवून त्यांनी महाराजांना लोटांगण नमन घातले. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटांत असतांना काही ठराविक भक्तमंडळींच्या गृहीं वारंवार येत असत. तेथील ग्रामजोशी बाळकृष्णबुवा हे त्या भाग्यवंत भक्तांपैकीच एक होते. ते विद्वान, वैष्णव आणि ज्योतिषी असून अनेक लोक आपले कार्य प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्या घरी सतत येत असत. त्याशिवाय स्वामींच्या दर्शनासाठी बाहेरगावांहून येणारी गणपतराव अरब आदि अनेक मंडळीही बाळकृष्णबुवांच्याच घरी मुक्कामास राहत असत. हैदराबादचे हे गणपतराव अरब हे मराठी, पण त्यांच्याकडे निजामाचा अरब रिसाला होता. त्यामुळे, त्यांना अरब नाव पडले. हे श्री दत्तभक्त होते. सदाचारी, विद्यासंपन्न आणि सुस्वभावी असे बाळकृष्णबुवा अत्यंत अगत्यपूर्वक सर्वांचे आतिथ्य करीत असत. त्यांच्याच गृही महारूद्रराव आपल्या कुटुंबियांसहित उतरले. मनोभावें श्री स्वामीराजांचे पूजन करून त्यांनी सहस्र-भोजन समाराधना केली. शुक्ल पक्षींच्या चंद्रकलासम । श्रीस्वामीसमर्थ चरणीं निरुपम । महारूद्ररावांची शुद्धभक्ति नि:सीम । जडली सप्रेम सर्वदा ॥ अशा रीतीने श्री समर्थांचे कल्याणप्रद असे आशीर्वचन घेऊन अत्यंत समाधानाने महारूद्रराव आपल्या घरीं केज येथे परतले. ते श्री नृसिंह-मुनींचे नित्य स्मरण करीत असत. अक्कलकोटाहून घरीं आल्यावर पुढे चार-आठ दिवसांतच महारूद्ररावांना पुनः श्री स्वामींच्या कृपेची अनुभूती आली. त्यांच्या जागेंत काही काम सुरु होते, आणि तिथेच त्यांना द्रव्याचें हांडे सापडले. विपुल अशा धनसंपत्तीचा लाभ झाल्याने सर्व देशपांडे मंडळी अत्यंत आनंदित झाली. दिवसोंदिवस भाग्यकाळ वृद्धिंगत होऊ लागला, ' जगन्नाथ स्वामी सदाशिव कृपाल । साह्य होतां काय उणे ' या उक्तीची प्रचिती येऊ लागली आणि महारूद्ररावांची श्री स्वामी समर्थ चरणीं भक्ती अधिकच दृढ होऊ लागली. गृहस्थाश्रमीं असूनही त्यांची आपल्या सद्गुरूंवर नितांत श्रद्धा होती, आपल्या या आराध्यदैवतास ते अनन्यभावें शरण आले होते. असेच एकदा, महारूद्रराव सहपरिवार श्री महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले आणि नेहेमीप्रमाणेच श्री बाळकृष्णबुवांच्या गृहीं मुक्कामास उतरले. नित्यनियमांनुसार, श्री दत्तगुरु स्वामी समर्थांचे दर्शन झाले खरें, मात्र त्यावेळीं महारूद्ररावांना ज्वर येऊन वायुप्रकोप झाला. वैद्योपचार घेऊनही उतार पडण्याची काहीच चिन्हें दिसेनात आणि बघतां बघतां त्यांची प्रकृती अतिशय खालावत गेली. ते या आजारांतून वाचतील अशी काहीच लक्षणें दिसत नव्हती. देशपांडे कुटुंबियांचा आता मात्र धीर खचला आणि श्री स्वामी समर्थांनाच आता शरण जावें, त्याशिवाय आता कुठलाच मार्ग नाही असा विचार त्या सर्वांनी केला. तेव्हा, महारूद्ररावांचे ज्येष्ठ पुत्र रघूत्तमराव त्या जगत्सूत्रधारक समर्थांकडे आले आणि अत्यंत चिंतीत होऊन ' आमचे पित्याची घातली घटिका । त्यावीण आमचा प्रपंच लटिका । प्राप्त व्हावी कृपारूप अंजनगुटिका । ' अशी त्यांची करुणा भाकली. ' हे दयासागरा, तुम्हीच सर्वथा आमचे मायबाप आहात, असे म्हणत त्याने श्रीमद्दत्तात्रेय स्वामींना साष्टांग नमस्कार केला आणि त्यांचे चरण दृढतेने धरले. त्याची प्रार्थना ऐकून करुणाघन कळवळले आणि आश्वासक स्वरांत म्हणाले, " अरे तुझ्या पित्यास लवकरच बरें वाटेल आणि तो व्याधीमुक्त होईल. तू अजिबात चिंता करू नकोस, सत्वर आपल्या स्वस्थानीं जा." समर्थांचे ते अमृतवचन ऐकताच रघूत्तमरावांस संतोष वाटला आणि स्वामींचा तीर्थप्रसाद घेऊन ते धावतच आपल्या बिऱ्हाडीं परतले. आपल्या पित्यास ते तीर्थ देऊन ते स्वामीनाम जपू लागले. अन काय आश्चर्य ! महारूद्ररावांच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. ' आठ चार दिवसांत आला शुभ प्रत्यय । महारूद्ररावांची प्रकृति झाली निरामय ' स्वामीभक्तहो, त्या पूर्णप्रतापी योगीश्वराची कृपा असता अशक्य काय ते सांगा बरें ? महारूद्ररावांना आरोग्यप्राप्ती झाल्यामुळे देशपांडे कुटुंबीय अतिशय सुखावले. रघूत्तमराव सत्वर स्वामींच्या दर्शनासाठी आले आणि त्यांना अनन्यभावानें वंदन करून म्हणाले, " हे दयाघना, आपल्या आशीर्वादाने माझ्या पित्यावर आलेले गंडांतर दूर झाले. ते व्याधीमुक्त होऊन त्यांना आरोग्यता लाभली. स्वामी, मला आपल्या चरणीं दहा सहस्त्र रौप्यमुद्रा अर्पण करण्याची इच्छा आहे, आपण त्यास अनुमती द्यावी." त्यांचे हे बोल ऐकून त्या ब्रह्मांडनायकास हसू आले आणि अत्यंत प्रसन्नतेने ते म्हणाले, " आम्हांसि न लगे द्रव्य-अघ । आपल्या घरासि जा रे नीघ । घराचे उकीरड्यांत टाकून दे ओघ । हा दगड तेथे नेऊन ठेव रे ॥" क्रमश: ॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ श्री गुरुदेव दत्त ॥ संदर्भ : ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत स्वामीभक्तहो, या उपक्रमातील सर्व लेख इथे वाचता येतील.
Sep 16, 2021
स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - २
॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
मोगलाई प्रांतात आंबे-जोगाईनजिक केज नांवाचे छोटेसे गांव आहे. तेथे महारुद्र देशपांडे नामक ऋग्वेदी ब्राह्मण जहागिरदार होते. लक्ष्मी आणि सरस्वती या दोघींचाही वरदहस्त त्यांच्या घराण्यांवर होता. महारूद्ररावांना दोन कनिष्ठ बंधू होते. एके काळीं काही कारणांनी त्यांचे निजाम-सरकारांतील उत्पन्न जप्त झाले होते. ते सोडविण्यासाठी या तीन बंधूंनी विशेषतः महारूद्ररावांनी अथक प्रयत्न केले, परंतु त्यांस यश आले नाही. त्याकाळी, बीड प्रांतात श्रीरामानंद बीडकर महाराज हे साधुपुरुष प्रसिद्ध होते. परब्रह्मस्वरूप अक्कलकोट स्वामी समर्थांचे ते कृपांकित शिष्य होते. महारूद्ररावही त्यांच्या दर्शनास वारंवार जात असत. असेच, एकदा ते दर्शनासाठी गेलें असता, त्यांनी बीडकर महाराजांस आपलें अडलेले कार्य पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली. त्यांवर त्या संतपुरुषानें महारूद्ररावांना अक्कलकोट येथे जाऊन तेथील परमहंस स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावें असे सांगितले. श्री स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे उत्पन्न पुन्हा लवकरच सुरु होईल असा त्यांनी विश्वास दिल्यानंतर महारूद्रराव ह्यांस आशेचा किरण दिसु लागला. त्यानुसार, लवकरच ते अक्कलकोटास रवाना झाले. महाराज त्यावेळीं विरुपाक्ष मोदींच्या गृहीं आहेत हे समजताच श्रीफलादि पूजा साहित्य घेऊन ते समर्थांच्या दर्शनास निघाले. देशपांड्यांनी श्रीफलादी अर्पून । घातले प्रेमे साष्टांग नमन । तदा महारूद्ररावांचे हृद्गत जाणून । अवधूत निरंजन वदले - " तुम्ही चार मनोरे आहेत तेथे जावें, म्हणजे तुमचे शेत सोडुन देऊ..!! ". हे आशीर्वचन ऐकताच महारूद्ररावांना श्री स्वामी समर्थांच्या अंतर्साक्षीत्वाची प्रचिती आली आणि स्वामींचरणी त्यांची श्रद्धा दृढ झाली. त्याच दिवशी भोजन झाल्यावर स्वामींची आज्ञा घेऊन ते हैद्राबादेस निघाले. समर्थांच्या वचनांवर त्यांचा विश्वास होताच, तेव्हा वंदूनि श्रीदत्त-दिगंबरपदांस । त्वरेकरूनि निघाले ।
Aug 16, 2021
स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - १
॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
Jul 20, 2021
मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - प्रस्तावना
॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥
॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥
आम्ही नमू दीनानाथ l श्री गुरु स्वामी हा समर्थ l तोची बुद्धीचा दातार l भक्तवत्सल करुणाकर l चौदा विद्या चौसष्ट कळा l ज्याच्या दारीचा धुरोळा l वेद जेथे लोटांगणी l नेती बोलती वदनी l चारी मुक्तीची पायरी l सदा झुले ज्याचे द्वारी l आणिकाची कथा काय l शिव वंदी भावे पाय l कर जोडी शारंगधर l होऊनी पायाचा किंकर l ब्रह्मा बापुडा तो किती l काळा लागी ज्याची भीती l देव दानव किंकर l मुनी घेती निराकार l तया मानव भुलुनी गेले l अभिमाने नागवले l आनंद म्हणे दीनानाथ l निर्गुण की समर्थ l भगवान श्री दत्तात्रेयांचा तृतीय अवतार, अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांच्या अलौकिक स्वरूपाचे माहात्म्य अतिशय भक्तिपूर्ण आणि सहज सुंदर शब्दांत वर्णन करणारा हा अभंग ! अशा अनेक नितांतसुंदर रचनांचे रचयिता म्हणजेच परब्रह्म परमेश्वर सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांचे परमशिष्य, भक्तशिरोमणी श्रीमद सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज. यांचे मूळ नाव ' गुरुदास एकनाथ वालावलकर ' असे होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यांत महुरे नामक छोट्या गांवात ते वास्तव्यास होते. वंश परंपरेने त्यांच्या घराण्यांत दत्तभक्तीचा वारसा होता. लक्ष्मीचा वरदहस्त लाभल्यामुळे संपन्नताही होती. तरुणपणी ते मुंबईस राहून काथ्याचा आणि हरड्याचा धंदा करीत असत. त्यांचे राहणीमान उच्च थाटाचे होते. एकदा, ते भेंडे यांच्या म्हणजेच स्वामी समर्थांचे भक्त असलेले तात महाराज यांच्या पेढीवर बसले असता, त्यांनी अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ यांची महती ऐकली. अनेक भक्तांचे अनुभव आणि काहींना आलेली परमार्थिक प्रचिती ऐकून गुरुदासांना श्री स्वामी दर्शनाची ओढ लागली. ते अस्वस्थ झाले आणि कुणालाही न सांगता अक्कलकोटास प्रयाण करते झाले. मार्गांत श्री स्वामींचेच ध्यान करीत करीत लवकरच गुरुदास अक्कलकोटास पोहोचले. तेथील वडाजवळ असलेल्या तलावांत ते हातपाय धुण्यासाठी म्हणून उतरले. त्यांचे चित्त मात्र श्री स्वामींच्या दर्शनाच्याच ध्यासाने व्यापले होते. तेव्हढ्यांत त्यांच्या डोक्यावर त्या वटवृक्षाची एक सुकलेली डहाळी पडली. दचकून त्यांनी वर पाहिले तो काय आश्चर्य! श्री स्वामी समर्थ त्या वडाच्या एका फांदीवर बसून खळखळून हास्य करीत होते. त्यांनीच ती सुकलेली डहाळी त्यांच्या मस्तकावर टाकली होती. आनंदातिशयाने धावतच गुरुदास त्या वटवृक्षाजवळ गेले. तोपर्यंत स्वामी महाराजही वडावरून खाली उतरले होते. गुरुदासांनी श्री स्वामी समर्थांना अत्यंत भक्तिभावाने प्रणिपात केला, आपले मस्तक त्यांच्या चरणकमलांवर टेकविले. श्री स्वामींनी त्यांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला आणि त्यांना समाधी लागली. अशा रितीने, प्रथम भेटीतच श्री स्वामी समर्थांनी त्यांच्यावर अनुग्रह केला आणि कृपांकित केले. काही दिवस, समर्थांच्या सान्निध्यांत राहून गुरुदास आपल्या घरी परतले आणि प्रपंचातील त्यांचे ध्यान उडाले. ते सदा सर्वदा स्वामींच्या ध्यानांत मग्न राहू लागले. त्यानंतर, पुढील सहा वर्ष ते नित्य श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास जाऊन त्यांची सेवा करू लागले. श्री स्वामींवरील त्यांची श्रद्धा आणि भक्ती वृद्धिगंत होऊन ते 'गुरुदासा' चे 'आनंदनाथ' झाले. श्री स्वामींची स्तवनगाथा, अभंग, स्तोत्र असे प्रासादिक वाङ्मय आनंदनाथ महाराजांनी स्वामीकृपेनें रचले. एकदा आनंदनाथ महाराजांनी श्री स्वामींना, 'आपणांस कृपाप्रसाद द्यावा.' अशी प्रार्थना केली असता, प्रसन्न होऊन श्री स्वामी समर्थांनी आपल्या मुखातून आत्मपादुका काढून त्यांना दिल्या आणि आपली कार्यध्वजा उभारण्यास सांगितले. श्री स्वामी समर्थांच्या त्या आत्मपादुका घेऊन आनंदनाथ महाराज नाशिक जिल्ह्यांतील सावरगाव येथे वास्तव्यास आले आणि तेथेच त्यांनी आपल्या या आराध्यदेवतेचा मठ स्थापन केला. काही काळानंतर त्या मठाची धुरा एका भक्ताकडे सोपवून आनंदनाथ महाराज श्री नृसिंहवाडी इथे काही काळ आराधना करीत राहिले. त्यानंतर बेळगांवला जाऊन सावंतवाडी तालुक्यांतील होडावडे या गांवी आले. त्या ग्रामींच एका औदुंबराखाली त्यांनी अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांच्या पादुका स्थापन केल्या. कालांतराने, तिथेच श्री स्वामींचा मठही उभा राहिला. त्यानंतर, वेंगुर्ल्याजवळ धावडे या गांवी तिसरा मठ स्थापन केला. श्री स्वामी समर्थांनी प्रसाद म्हणून दिलेल्या त्या दिव्य आत्मपादुका ( आत्मलिंग ) आजही या मठांत नित्यपूजेत आहे. तसेच, स्वामीभक्त दर गुरुवारी त्यांचा दर्शन लाभही घेऊ शकतात. श्री स्वामी समर्थांच्या समाधी नंतरही पंचवीस वर्षांहून अधिक काळ आनंदनाथ महाराजांनी स्वामीभक्ती प्रसाराचे कार्य चालू ठेवले होते. ते ऐश्वर्यसंपन्न होते. त्यांच्या श्रीमंतीच्या थाटाचे काय वर्णन करावें ? ते घोड्यावरून फिरत असत. श्री दत्तजयंती आदी उत्सवांस सहस्त्रभोजन, अमाप दान-दक्षिणा करीत असत. मात्र त्यांची वृत्ती विरक्त होती. शिर्डीवासी श्री साईनाथांचे माहात्म्य यांनीच प्रथम सर्वांस कथन केले. १९०३ साली आनंदनाथ महाराजांनी 'संजीवन समाधी' घेतली आणि ते श्री स्वामी चरणीं लीन झाले. श्री आनंदमहाराजकृत 'श्रीगुरुस्तवन स्तोत्र' ( कामधेनू स्तोत्र ) हे स्वामीभक्तांच्या नित्यपठणांत असते. या दिव्य स्तोत्राचे चिंतन आणि मननाचा हा अल्प प्रयास आपण पुढील काही लेखांमधून करणार आहोत.
॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥ ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
क्रमश:


