Nov 30, 2021

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी ३१ ते ३५


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥


हे जाणुनी अंतरी । पिंड ब्रह्मांड शोधिले जरी । तरी सूक्ष्मीच्या आधारी । व्यापक निर्धारी तूचि एक ॥३१॥
हे समर्था, संपूर्ण विश्वाला व्यापून राहिलेले ते विश्वम्भर परब्रह्म तूच आहेस याची प्रचिती येण्यासाठी नामोपासना हेच उत्तम साधन आहे, हे मी पूर्णतः जाणले आहे. हेच परब्रह्म सर्वव्यापी असल्याने विशाल आणि सूक्ष्मदेखील आहे. या पिंडातील स्थूल, सूक्ष्मादि देहांची तत्त्वें आणि स्वरूप यांचे आकलन झाले की सर्वत्र परब्रह्मच आहे हे विवेकबुद्धीने जाणता येते. ' तत्त्वमसि ' अर्थात ते तूच आहेस, हे ज्ञान प्राप्त होते. परब्रह्माचे वर्णन करणे सर्वथा शब्दातीत असले तरी, ते वाच्यार्थाने सांगितले जाते. पिंड आणि ब्रह्मांडाचे हेच समानत्व दर्शवण्यासाठी ' पिंडी ते ब्रह्मांडी ' ही संकल्पना परमार्थात सर्वार्थाने प्रचलित आहे. ब्रह्मांडाचा परमात्मा तर पिंडामध्ये जीवात्मा असतो. या सर्व दृश्य अदृश्य चराचराचा नियंता परमात्मा असून जीवात्मा हा त्याचाच अंश आहे. सद्गुरुंच्या कृपेनें असा ' जीव-ब्रह्म-ऐक्य ' आत्मसाक्षात्कार सहज प्राप्त होऊ शकतो. याच सिद्धांताला पुष्टी देत श्री आनंदनाथ महाराज म्हणतात, " ज्याच्या अस्तित्वामुळे हे चराचर विश्व निर्माण झाले, ज्याच्या आधारामुळे या सृष्टींत नियमबद्ध सुसूत्रता आहे, आणि जो या चराचरांत अनंत आहे असा व्यापक परमात्मा म्हणजेच सदगुरु होय. अशा या व्यापकाचे चिंतन, नामस्मरण केले म्हणजे साहजिकच ते सदोदिताला म्हणजेच पावते. सदोदित म्हणजे सदा उगवलेले असते ते अर्थात नित्य, निरंजन असे परब्रह्मच होय."
म्हणोनि मौन्यगती । तुज निजानंदी स्तविती । जरी बोलविसी वाचाशक्ती । तरी हाती तुझ्या दयाळा ॥३२॥
म्हणूनच तुझ्या या अगम्य, निराकार स्वरूपाचे ज्ञान झालेले योगीजन त्या परमानंद स्थितीची अनुभूती घेतात आणि तुझे वर्णन करणे सर्वथा शब्दातीत असल्याने केवळ मौन धारण करून तुझे मनोमन स्तवन करतात. अद्वैताची प्रचिती आल्यावर जे सुख, समाधान मिळते तो आत्मसाक्षात्काराचा आनंद केवळ अनुभवायचा असतो, ती निर्विकार परमात्मस्वरूप अनुभूती शब्दबद्ध करणे सर्वथा अशक्यच होय. मात्र हे कृपाळा, तुला शरणागत आलेल्या मुमुक्षु साधकांसाठी, भक्तांसाठी तू मला वाचाशक्ती प्रदान कर आणि तुझे स्तवन रचण्याची बुद्धी दे, अशी मी तुला प्रार्थना करतो. हे अनंतशक्तिसूत्रधारा, आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी तू नेहेमीच असंख्य लीला करतोस, तेव्हा एव्हढें वरदान तू मला दे.
म्हणोनि स्तवने स्तवनी । तुज सांगणे एक जनी । वश व्हावे भक्ती लागुनी । अवतार करणी जाणोनिया ॥३३॥
हे भक्तचिंतामणी, तुझी ही स्तवनगाथा गात असतांना माझे एकच मागणें आहे. हे सद्गुरो, तू हा अवतार घेण्याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या भक्तांवर कृपा करणे आणि त्यांचा उद्धार करणे हेच आहे. तू आपल्या भक्तांच्या नेहेमीच अधीन असतोस. हे दत्तप्रभो, या तुझ्या स्तवनांत मी केवळ तुला याच गोष्टीचे स्मरण करून देत आहे. तुझ्याच कृपाशिषाने आणि इच्छेने, मी हे जे काही तुझे यथामति, यथाशक्ति स्तवन रचतो आहे, ते तुला मान्य व्हावे. माझ्या या साध्या, भोळ्या-भाबड्या भक्तीने तू प्रसन्न व्हावे, हेच माझे तुझ्या चरणीं मागणे आहे. अनन्यभावानें शरण आलेल्या भक्तांचे कवच बनून संरक्षण करणाऱ्या समर्था, आम्हांलाही तुझा कृपाप्रसाद लाभावा, हीच प्रार्थना !
अहंभाव तुटोनि गेला । प्रेमभाव प्रगटला । देव तेथेचि राहिला । अनुभवशुद्धी खेळवी ॥३४॥
बोध हीच खरी आत्मज्ञानाची पहिली पायरी आहे. सदगुरु मुमुक्षु शिष्यांना त्यांच्या योग्यतेनुसार मार्गदर्शन करतात आणि अहंकार, पाप-पुण्यादि कर्माभिमान यांच्या गुंत्यातून बाहेर काढतात. परिणामी, अहंकार-चित्ताचे जडत्व लोप पावून प्रेम आणि भक्तीचा उदय होतो. 'जीवो ब्रह्मैव नापरा' असा आत्मसाक्षात्कार झालेला हा शिष्य त्या परब्रह्मी तादात्म्य पावतो. हे भक्तनिधाना, केवळ तुझ्याच कृपेनें ईश्वराधिष्ठित असणाऱ्या या आपल्या स्वस्वरूपाचे आकलन होतें, अनुभव येतो. तुझ्या लीला अतर्क्य, अनाकलनीय आहेत, हेच खरें !

यज्ञ कोटी करू जाता । जे फळ न ये हाता । ते प्रेमभावे स्तविता । हरिते व्यथा भवाची ॥३५॥
परमेश्वर हा केवळ भावाचा भुकेला आहे. विशुद्ध भक्ती, अनन्य शरणागत भाव असलेल्या भक्तांच्या तो नेहेमीच अधीन असतो. यासाठीच श्री आनंदनाथ महाराज म्हणतात - कोटी यज्ञ केले आणि इष्टदेवतेप्रित्यर्थ काही भाव नसला तर त्याचे कधीच फळ मिळत नाही. मात्र आपल्या सद्गुरुंचे अकृत्रिम प्रेमाने, भक्तिपूर्वक स्तवन केले, त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवली तरी या भवसागरातून आपण सहजच तरून जाऊ. आपल्या देहाभिमानामुळेच आपण या जन्म-मृत्यूच्या भवसागरात अडकलो आहोत. या भवबंधनांतून पैलपार जाण्याचे सहज-सुलभ साधन म्हणजे आपल्या गुरूला अनन्यभावानें शरण जाणे हेच आहे. 

॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

क्रमश:


Nov 18, 2021

स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - ६


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

॥ ध्यानम् ॥ अजानुबाहु विशाल नेत्रम् । अनंत ब्रह्माण्डकार स्वरुपम् ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥

श्रीकार्तिकस्वामी दर्शन - रामशास्त्रीं डोंगरे

एकदा बडोद्यातील काही भक्त मंडळी कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी तीर्थयात्रेस निघाली. मार्गक्रमण करतांना वाटेतच अक्कलकोट येत असल्याने तिथे काही काळ थांबून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावे आणि त्यांचा कृपाशीर्वाद घेऊन पुढील यात्रेस प्रारंभ करावा असे त्यांनी ठरविले. त्याप्रमाणे, ती सर्व भक्तमंडळी प्रज्ञापुरीस आली. ' योगीश्वर-दर्शनासि सारे । जाऊनि नमिती प्रेमभरें ' अशाप्रकारे स्वामी समर्थांचे त्यां सर्वांनी भक्तिभावानें पूजन केले आणि श्री कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी प्रस्थान करण्याची अनुज्ञा मागितली. त्या भक्तमंडळींमध्ये रामशास्त्रीं डोंगरे नावाचे एक सद्-गृहस्थ होते. श्री समर्थचरणीं त्यांची अपार श्रद्धा होती. तेव्हा, इतर सर्व भक्तजनांस स्वामी महाराजांनी पुढील प्रवासास अनुमती दिली आणि त्यांची ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडेल असे आशीर्वचनही दिले. मात्र रामशास्त्रींसी समर्थ वदती - आज्ञा नाही तुम्हांसि । दर्शनार्थ जावया ।.
श्री स्वामी समर्थांचे हे वचन ऐकताच रामशास्त्रीं डोंगरे उद्विग्न चित्त झाले. इतक्या दूर येऊनही, आपल्या नशिबी श्री कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा योग नसावा याचे त्यांना वाईट वाटले. त्यावेळीं ते श्री स्वामीचे थोर भक्त बाबा सबनीस यांच्या गृही मुक्कामास उतरले होते. रामशास्त्रींना असे दुःखी-कष्टी झालेले पाहून, बाबा सबनीसांनी त्यांची चौकशी केली. त्यावर रामशास्त्री म्हणाले, " श्री स्वामीरायांनी मला पुढील यात्रेसाठी अनुमती दिली नसल्याने मी खिन्न झालो आहे. आपण समर्थांचे निजभक्त आहात, मला यांवर काही तरी उपाय सुचवाल का ?" त्यांचे समाधान करण्यासाठी, ते बाबा साधु वदती सत्य वचन । जाऊं नये प्रभु आज्ञाभंग करून । तुम्हीं तळमळ टाकूनि राहावें । अर्थात श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेचे अवलंघन करू नये आणि इथेच निःशंकपणें राहावे. बाबा सबनीसांचे हे बोलणें ऐकून रामशास्त्रीं अक्कलकोटीं राहिले खरें, मात्र त्यांचे मन श्री कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी व्याकुळ झाले होते.
पुढें पाच दिवसांनी कार्तिक मासांतील पौर्णिमा आली. कार्तिक पौर्णिमेसि कृत्तिकायोगांत । दर्शनासि जमली मंडळी बहुत । स्नान संध्या आटोपूनि रामशास्त्री त्वरित । दर्शनार्थ पातले बाबासह त्या शुभयोगावर सर्व भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे विधीवत पूजन केले, मंगल आरतीही केली. प्रत्येक भक्तगण श्री स्वामी समर्थांच्या चरणीं नतमस्तक होऊ लागला. तो प्रसन्नवदन योगीश्वरही उभा राहून आपला कृपाकर भक्तांच्या मस्तकीं ठेवून आशीर्वाद देऊ लागला. रामशास्त्रींनीही समर्थांना अत्यंत भक्तिभावाने साष्टांग नमस्कार केला आणि ते उठून स्वामींकडे श्रद्धापूर्वक पाहू लागले. तोच एक चमत्कार झाला - कार्तिकस्वामींचे सगुण स्वरूप । प्रत्यक्ष धारण करूनि सर्वांसमीप । दर्शन दिधलें दाता-सत्यसंकल्प । त्या देवाधिदेवानें त्यांना श्री कार्तिकस्वामींचे सगुण दर्शन घडविले होते. त्या अपूर्व पुण्यदायीं योगावर कार्तिकस्वामींचे मूर्तिमंत दर्शन झालेले पाहून रामशास्त्रीं अतिशय सद्गदित झाले आणि अनन्यभावानें त्यांनी पुन्हा एकदा त्या अक्कलकोटांत अवधूतरूप धारण केलेल्या सर्वेश्वरांस साष्टांग नमन केले. त्या मंगल दर्शनाने त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले होते आणि ते मनोभावें प्रार्थना करू लागले - हे भगवान दत्तमूर्ते । परमेश्वर आहां बोलते चालते । माझ्यासारख्या अज्ञानी, मदांध आणि या संसारसागरात भरकटलेल्या सामान्यजनास साक्षात्कार देऊन संशयरहित केले. हे परमात्म्या, तुझे सामर्थ्य अगाध आहे. कृपालुत्वें देऊनि दर्शनप्रबोध । कृतार्थ केलें अनुभवी । हे दीनदयाळा, आपण प्रत्यक्ष परमात्मस्वरूप आहात आणि केवळ या जगताच्या उद्धारास्तवच आपण हा अवतार धारण केला आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थांचे यथासांग पूजन केले.
' प्रचीतिवीण कवणाची । परमार्थीं न निष्ठा बसे ' हे सर्वथा खरें आहे. या कृपानुभवानंतर, श्री स्वामी समर्थांच्या ठायीं असलेली त्यांची श्रद्धा अधिकच दृढ झाली. हा साक्षात्कार घडल्यावर रामशास्त्री डोंगरे पुढे दोन वर्षे प्रज्ञापुरींतच राहिले. श्री स्वामी समर्थांच्या नित्य पूजन-दर्शनाचे, असंख्य थोर स्वामीभक्तांच्या सहवासाचे आणि अनेक स्वामीलीला पाहण्याचे सद्भाग्य त्यांना लाभले. पुढें दत्तात्रेय-आज्ञा घेऊन । आले बडोद्यासि संतुष्टमन । तिथे ते सदाचारी, विवेकसंपन्न रामशास्त्री पुराण-कीर्तन आणि दत्तात्रेयस्वामी लीलांचे वर्णन करीत असत. श्री स्वामींच्या कृपाशीर्वादाने त्यांना काशी-महायात्राही घडली.
स्वामीभक्तहो, श्रीगुरुस्वामी परमेश्वर । कृपादृष्टि करील जयावर । त्यासि चारी पुरुषार्थ प्राप्त होती साचार । कां न्यून नसेचि हेच सत्य नव्हें काय ?

श्री स्वामी समर्थार्पणमस्तु
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ श्री गुरुदेव दत्त ॥

संदर्भ : ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत स्वामीभक्तहो, या उपक्रमातील सर्व लेख इथे वाचता येतील.

Nov 17, 2021

श्रीगुरुचरित्र अध्याय - ५


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ नामधारक भक्तासी । सिद्ध सांगे विस्तारेसीं । अवतार झाले मानुषी । भक्तजन तारावया ॥१॥ ऐक भक्ता नामधारका । अंबऋषीकारणें विष्णु ऐका । अंगीकारिले अवतार देखा । मानुषीं नाना रुपें घेतसे ॥२॥ मत्स्य कूर्म वराह देख । नराचा देह सिंहाचें मुख । वामनरुप झाला भिक्षुक । झाला ब्राह्मण क्षत्रियकर्मी ॥३॥ दशरथकुळीं जन्म । प्रख्यात अवतार श्रीरघुराम । राजा होऊनि मागुती जन्म । गौळियां घरीं गुरें राखी ॥४॥ वस्त्रें फेडूनि झाला नग्न । बौद्धरुपी झाला आपण । होऊनि कलंकी अवतार जाण । तुरंगारुढ काय आवडी ॥५॥ नाना प्रकारें नाना वेष । अवतार धरीं हृषीकेश । तारावया साधु मानुष । दुष्टनिग्रह करावया ॥६॥ द्वापार जाऊनी जाहला कली । अज्ञान लोक ब्राह्मणकुळीं । आचारहीन होऊनि प्रबळीं । वर्तती, महिमा कलियुगीं ॥७॥भक्तजनरक्षणार्थ । अवतरला श्रीगुरुनाथ । सगरांकारणें भगीरथ । आणी गंगा भूमंडळीं ॥८॥ तैसी एक विप्रवनिता । आराधिलें श्रीविष्णु-दत्ता । तिचे उदरीं अवतार धरितां । आश्चर्य झालें परियेसा ॥९॥ ' पीठापूर ' पूर्वदेशीं । होता ब्राह्मण उत्तमवंशी । आपस्तंब शाखेसी । नाम ' आपळराज ' जाण ॥१०॥ त्याची भार्या नाम ' सुमता ' । असे आचार पतिव्रता ।अतिथी आणि अभ्यागता । पूजा करी भक्तिभावें ॥११॥ ऐसें असतां वर्तमानीं । पतिसेवा एक मनीं । अतिथीपूजा सगुणी । करी निरंतर परियेसा ॥१२॥ वर्ततां ऐसें एके दिवशीं । आला दत्त अतिथीवेषीं । श्राद्ध होतें अमावास्येसी । तया विप्राघरीं देखा ॥१३॥ न जेवितां ब्राह्मण घरीं । दत्तात्रेया भिक्षा घाली ते नारी । दत्तात्रेय साक्षात्कारी । प्रसन्न झाला तये वेळीं ॥१४॥ त्रिमूर्तींचें रुप घेऊनि । स्वरुप दाविलें अतिगहनी । पतिव्रता धरुनि चरणीं । नमन करी मनोभावें ॥१५॥ दत्तात्रेय म्हणती तियेसी । माग वो माते जें वांछिसी । जे जे वासना तुझे मानसीं । पावेल त्वरित म्हणितले ॥१६॥ऐकोनि स्वामीचें वचन । विप्रवनिता करी चिंतन । विनवीतसे कर जोडून । नानापरी स्तवोनियां ॥१७॥ जय जया जगन्नाथा । तूं तारक विश्वकर्ता । माझे मनीं असे आर्ता । पुरवावी ते देवराया ॥१८॥ तूं कृपाळू सर्वांभूतीं । वेद पुराणें वाखाणिती । केवीं वर्णूं तुझी कीर्ति । भक्तवत्सल कृपानिधि ॥१९॥ मिथ्या नव्हे तुझा बोल । जें कां ध्रुवासी दिधलें अढळ । बिभीषणासी स्थापियलें । राज्यीं लंकाद्वीपीचे ॥२०॥ भक्तजनां तूं आधार । व्हावया धरिसी अवतार । ब्रीद असे सचराचर । चौदा भुवनांमाझारीं ॥२१॥ आतां मातें वर देसी । वासना असे मानसीं । नव्हा अन्यथा बोलासी । कृपासिंधु देवराया ॥२२॥ माझे मनींची वासना । तुवां पुरवावी जगत्रजनना । अनाथतारका नारायणा । म्हणोनि चरणीं लागली ॥२३॥ ऐकोनि तिचें करुणावचन । संतोषला त्रयमूर्ति आपण । कर धरुन आश्वासोन । माग जननी म्हणतसे ॥२४॥ तंव बोलिली पतिव्रता । स्वामी जें निरोपिलें आतां । ' जननी ' नाम मज ठेवितां । कर निर्धार याचि बोलाचा ॥२५॥ मज पुत्र झाले बहुत । नव्हती स्थिरजीवित । जे राहिले असती आतां सजीवित । अक्षहीन पादहीन ॥२६॥ योग्य झाला नाहीं कोणी । काय करावे मूर्ख प्राणी । असोनि नसती येणे गुणीं । पुत्रावीण काय जन्म ॥२७॥व्हावा पुत्र आम्हां ऐसा । ज्ञानवंत परमपुरुषा । जगद्वंद्य देवसदृशा । तुम्हांसारिखा मज आतां ॥२८॥ ऐकोनि तियेचें वचन । प्रसन्न झाला दत्त आपण । पुढें असे कार्याकारण । दीक्षार्थ भक्तजनांसी ॥२९॥ म्हणे तापसी तियेसी । पुत्र होईल तुज तापसी । उद्धरील तुझ्या वंशासी । ख्यातिवंत कलियुगीं ॥३०॥ असावें तुम्हीं त्याचिया बोलीं । येर्‍हवीं न राहे तुम्हांजवळी । ज्ञानमार्गें अतुर्बळी । तुमचें दैन्यहारक देखा ॥३१॥ इतुके सांगोनि तापसी । अदृश्य झाला परियेसीं । विस्मय करीतसे मानसीं । विप्रवनिता तये वेळीं ॥३२॥ विस्मय करोनि घरांत । पतीसी सांगे वृत्तांत । दोघें हर्षनिर्भर होत । म्हणती होईल दत्तात्रेय ॥३३॥ माध्यान्हसमयीं अतिथिकाळीं । दत्तात्रेय येताति तये वेळी । विमुख न व्हावें तये काळीं । भिक्षा मात्र घालिजे ॥३४॥ दत्तात्रेयांचें स्थान जाण । माहूर करवीर क्षेत्र खूण । सदा वास याचि ग्रामा । पांचाळेश्वर नगरांत ॥३५॥ नाना रुपें भिक्षुकवेषें । दत्तात्रेय येताति हरुषें । न पुसतां माझ्या निरोपास । भिक्षा मात्र घालिजे ॥३६॥ विप्रस्त्री म्हणे पतीसी । आजि अवज्ञा केली मीं तुम्हांसी । ब्राह्मण न जेवितां तयासी । भिक्षा घातली म्हणतसे ॥३७॥ ऐकोनि सतीचे बोल । विप्रमन संतोषलें । म्हणे पतिव्रते भलें केलें । पितर जाहले माझे तृप्त ॥३८॥करुनि कर्म पितरांचे नामीं । समर्पावें विष्णूसी आम्हीं ।साक्षात्कारें आपण येऊनि । भिक्षा केली आम्हां घरीं ॥३९॥कृतार्थ झाले पितृ समस्त । निर्धारें झाले स्वर्गस्थ । साक्षात् विष्णु भेटला दत्त । त्रयमूर्ति-अवतार ॥४०॥ धन्य धन्य तुझी मातापिता । जो वर लाधलीस मुख्य आतां । पुत्र होईल तुज निभ्रांता । न धरीं चिंता मनासीं ॥४१॥ हर्षें निर्भर होवोनि । राहिली दोघें निश्चिन्त मनीं । वर्ततां जाहली अंतर्वत्नी । विप्रस्त्री परियेसा ॥४२॥ ऐसे नव मास क्रमोनि । प्रसूत जाहली शुभदिनीं । विप्रें स्नान करुनि । केलें जातकर्म तये वेळीं ॥४३॥ मिळवोनि समस्त विप्रकुळीं । जातक वर्तविती तये वेळीं । म्हणती तपस्वी होईल बळी । दीक्षाकर्ता जगद्गुरु ॥४४॥ ऐकोनि म्हणती मातापिता । हो कां आमुचा कुळउद्धरिता । आम्हांसी वर दिधला दत्ता । म्हणोनि ठेविलें तया नांव ॥४५॥ ' श्रीपाद ' म्हणोनि याकारणें । नाम ठेविलें तया ब्राह्मणे । अवतार केला त्रैमूर्ति आपण । भक्तजन तारावया ॥४६॥ वर्तत असतां त्याचे घरीं । झाला सात संवत्सरीं । मुंजीबंधन ते अवसरीं । करिता झाला द्विजोत्तम ॥४७॥ बांधितां मुंजी ब्रह्मचारी । म्हणता झाला वेद चारी । मीमांसा तर्क अतिविस्तारीं । म्हणों लागला तये वेळीं ॥४८॥ ऐकोनि समस्त नगरलोक । विस्मय करिती सकळिक । होईल अवतार कारणिक । म्हणोनि बोलती आपणांत ॥४९॥ आचार-व्यवहार-प्रायश्चित्त । समस्तांसी आपण बोलत । वेदांतभाष्य वेदार्थ । सांगता झाला द्विजवरांसी ॥५०॥ वर्ततां ऐसें परियेसीं । झाला संवत्सर षोडशी ।विवाह करुं म्हणती पुत्रासी । मातापिता अवधारा ॥५१॥ विचार करिती पुत्रासवें । बा रे विवाह तुज करावें । श्रीपाद म्हणे ऐका भावें । माझी वांछा सांगेन ॥५२॥ कराल विवाह मज तुम्ही । सांगेन ऐका, विचारिलें आम्हीं । वैराग्यस्त्री असे नेमी । काम्य आमुचे तेथें असे ॥५३॥ ते स्त्रियेवांचूनि आणिक नारी । समस्त जाणा मातेसरी । जरी आणाल ते सुंदरी । वरुं म्हणती तये वेळीं ॥५४॥ आपण तापसी ब्रह्मचारी । योगश्रियावांचोनि नारी । न लगती, हा बोल धरा निर्धारीं । ' श्रियावल्लभ ' नाम माझें ॥५५॥ ' श्रीपाद-श्रीवल्लभ ' ऐसे । नाम झालें त्रिमूर्ति कैसें । पितयातें म्हणतसे । जाऊं उत्तरपंथासी ॥५६॥ ऐकोनि पुत्राचें वचन । आठव जाहलें पूर्वील सूचन । भिक्षुकें सांगितलें निर्गुण । सत्य झालें म्हणतसे ॥५७॥ आतां याचिया बोलासी । मोडा घालितां परियेसीं । विघ्न होईल भरंवसी । म्हणोनि विचारिती तये वेळीं ॥५८॥ न म्हणावें पुत्र यासी । अवतारपुरुष तापसी । जैसें याचे वसे मानसीं । तैसें करावें म्हणती मातापिता ॥५९॥ निश्चय करुनि आपुले मनीं । पुत्रासी म्हणती जनकजननी । होतों आशाबद्ध होऊनि । प्रतिपाळिसी म्हणोनियां ॥६०॥  ऐसें मनीं व्याकुळित । डोळां निघती अश्रुपात । माता पडली मूर्च्छागत । पुत्रस्नेहेंकरोनियां ॥६१॥ देखोनि मातेचें दुःख । संबोखीतसे परमपुरुष । उठवूनि आपुल्या करकमळिकें । अश्रुपात पुसतसे ॥६२॥ अवो माते न करीं चिंता । जें जें वांछिसी तें देईन आतां । दृढ करुनियां चित्ता । रहा सुखें नांदत ॥६३॥ बा रे तुजकरितां आपण । दुःख विसरलें अंतःकरण । रक्षिसी आम्हां म्हातारपणीं । दैन्यावेगळें करिसी म्हणोनि ॥६४॥ पुत्र असती आपणा दोन । पाय पांगुळ अक्षहीन । त्यांतें पोसावें आतां कवणें । आमुतें कोण रक्षील ॥६५॥ ऐकोनि जननीचें वचन । अवलोकीतसे अमृतनयनें । पुत्र दोघे जाहले सगुण । आली दृष्टिचरणादिक ॥६६॥ जैसा चिंतामणि-स्पर्शें । लोखंड होय सुवर्णासरिसें । तैसें महात्मदृष्टि-वर्षे । योग्यता आली तत्काळीं ॥६७॥ वेदशास्त्रादि व्याकरण । सर्व म्हणती तत्क्षण । दोघे येऊनि लागती चरणा । कृतार्थ झालों म्हणोनियां ॥६८॥ आश्वासून तये वेळीं । दिधला वरु तत्काळीं । पुत्रपौत्रादीं नांदाल प्रबळीं । श्रियायुक्त सनातन ॥६९॥ सेवा कराल जनकजननी । पावाल सुख महाज्ञानी । इह सौख्य पावोनि । व्हाल मुक्त हे निश्चित ॥७०॥ ऐसें बोलोनि तयांसी । संबोखीतसे मातेसी । पाहोनि दोघां पुत्रांसी । राहतां सौख्य पावाल ॥७१॥ पुत्र दोघे शतायुषी । निर्धार धरीं वो मानसीं । कन्या पुत्र होतील त्यांसी । पौत्रपुत्र पाहाल नयनीं ॥७२॥ अखंड लक्ष्मी यांचे घरीं । यांचे वंशपारंपरीं । कीर्तिवंत सचराचरीं । संपन्न होतील वेदशास्त्रीं ॥७३॥ आमची अवज्ञा न करितां । निरोप द्यावा अवो माता । जाणें असे उत्तरपंथा । दीक्षा देणें साधुजनां ॥७४॥ ऐसें सांगोनि मातापित्यांसी । अदृश्य झाला परियेसीं । पावला त्वरित पुरी काशी । गुप्तरुपें होता तेथें ॥७५॥ निघाला तेथूनि बदरीकानना । भेटी घेऊनि नारायणा । अवतार असे आपणा । कार्याकारण मनुष्यदेहीं ॥७६॥ दीक्षा करावया साधुजनां । तीर्थें हिंडतसे आपण । मनोवेगें मार्गक्रमण । आले तीर्थ गोकर्णासी ॥७७॥ ऐकोनि सिद्धाचें वचन । विनवी नामधारक आपण । तें परिसा श्रोतेजन । म्हणे सरस्वती गंगाधरु ॥७८॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे दत्तात्रेय-श्रीपादावतारकथनं नाम पंचमोऽध्यायः ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥


Nov 12, 2021

अक्कलकोटनिवासी श्रीसद्‌गुरु स्वामी समर्थ सहस्रनाम


॥ श्री गणेशाय नमः ॥ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


अक्कलकोट-निवासी अद्भुत स्वामी समर्था अवधुता । सिद्ध-अनादि रूप-अनादि अनामया तू अव्यक्ता ।

अकार अकुला अमल अतुल्या अचलोपम तू अनिन्दिता । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥१॥


अगाधबुद्धी अनंतविक्रम अनुत्तमा जय अतवर्या । अमर अमृता अच्युत यतिवर अमित विक्रमा तपोमया ।

अजर सुरेश्वर सुहृद सुधाकर अखंड अर्था सर्वमया । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥२॥


अनल अश्विनी अर्चित अनिला ओजस्तेजो-द्युती-धरा । अंतःसाक्षी अनंतआत्मा अंतर्योगी अगोचरा ।

अंतस्त्यागी अंतर्भोगी अनुपमेय हे अतिंद्रिया । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३॥


अमुख अमुख्या अकाल अनघा अक्षर आद्या अभिरामा । लोकत्रयाश्रय लोकसमाश्रय बोधसमाश्रय हेमकरा ।

अयोनी-संभव आत्मसंभवा भूत-संभवा आदिकरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥४॥


त्रिविधतापहर जगज्जीवना विराटरूपा निरंजना । भक्तकामकल्पद्रुम ऊर्ध्वा अलिप्त योगी शुभानना ।

संगविवर्जित कर्मविवर्जित भावविनिर्गत परमेशा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥५॥


ऊर्जितशासन नित्य सुदर्शन शाश्वत पावन गुणाधिपा । दुर्लभ दुर्धर अधर धराधर श्रीधर माधव परमतपा ।

कलिमलदाहक संगरतारक मुक्तिदायक घोरतपा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥६॥


निस्पृह निरलस निश्चल निर्मल निराभास नभ नराधिपा । सिद्ध चिदंबर छंद दिगंबर शुद्ध शुभंकर महातपा ।

चिन्मय चिद्घन चिद्गति सद्गति मुक्तिसद्गति दयावरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥७॥


धरणीनंदन भूमीनंदन सूक्ष्म सुलक्षण कृपाघना । काल कलि कालात्मा कामा कला कनिष्ठा कृतयज्ञा ।

कृतज्ञ कुंभा कर्ममोचना करुणाघन जय तपोवरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥८॥


कामदेव कामप्रद कुंदा कामपाल कामघ्निकारणा । कालकंटका काळपूजिता क्रम कळिकाळा काळनाशना ।

करुणाकर कृतकर्मा कर्ता कालांतक जय करुणाब्धे । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥९॥


करुणासागर कृपासागरा कृतलक्षण कृत कृताकृते । कृतांतवत् कृतनाश कृतात्मा कृतांतकृत हे काल-कृते ।

कमंडलूकर कमंडलूधर कमलाक्षा जय क्रोधघ्ने । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥१०॥


गोचर गुप्ता गगनाधारा गुहा गिरीशा गुरुत्तमा । कर्मकालविद् कुंडलिने जय कामजिता कृश कृतागमा ।

कालदर्पणा कुमुदा कथिता कर्माध्यक्षा कामवते । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥११॥


अनंत गुणपरिपूर्ण अग्रणी अशोक अंबुज अविनाशा । अहोरात्र अतिधूम्र अरूपा अपर अलोका अनिमिषा ।

अनंतवेषा अनंतरूपा करुणाघन करुणागारा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥१२॥


जीव जगत् जगदीश जनेश्वर जगदादिज जगमोहन रे । जगन्नाथ जितकाम जितेंद्रिय जितमानस तूं जंगम रे ।

जरारहित जितप्राण जगत्पति ज्येष्ठा जनका दातारा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥१३॥


चला चंद्र-सूर्याग्निलोचना चिदाकाश चैतन्य चरा । चिदानंद चलनांतक चैत्रा चंद्र चतुर्भुज चक्रकरा ।

गुणौषधा गुह्येश गिरीरुह गुणेश गुह्योत्तम घोरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥१४॥


गुणभावन गणबांधव गुह्या गुणगंभीरा गर्वहरा । गुरु गुणरागविहीन गुणांतक गंभीरस्वर गंभीरा ।

गुणातीत गुणकरा गोहिता गणा गणकरा गुणबुद्धे । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥१५॥


एका एकपदा एकात्मा चेतनरूपा चित्तात्मा । चारुगात्र तेजस्वी दुर्गम निगमागम तूं चतुरात्मा ।

चारुलिंग चंद्रांशू उग्रा निरालंब निर्मोही निधे । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥१६॥


धीपति श्रीपति देवाधिपति पृथ्वीपति भवतापहरे । धेनुप्रिय ध्रुव धीर धनेश्वर धाता दाता श्री नृहरे ।

देव दयार्णव दम-दर्पध्नि प्रदीप्तमूर्ते यक्षपते । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥१७॥


ब्रह्मसनातन पुरुषपुरातन पुराणपुरुषा दिग्वासा । धर्मविभूषित ध्यानपरायण धर्मधरोत्तम प्राणेशा ।

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती तारक त्रिशूळधारी तीर्थकरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥१८॥


भावविवर्जित भोगविवर्जित भेदत्रयहर भुवनेशा । मायाचक्रप्रवर्तित मंत्रा वरद विरागी सकलेशा ।

सर्वानंदपरायण सुखदा सत्यानंदा निशाकरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥१९॥


विश्वनाथ वटवृक्ष विरामा विश्वस्वरूपा विश्वपते । विश्वचालका विश्वधारका विश्वाधारा प्रजापते ।

भेदांतक निशिकांत भवारि द्विभुज दिविस्पृश परमनिधे । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥२०॥


विश्वरक्षका विश्वनायका विषयविमोही विश्वरते । विशुद्ध शाश्वत निगम निराशय निमिष निरवधि गूढरते ।

अविचल अविरत प्रणव प्रशांता चित्चैतन्या घोषरते । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥२१॥


ब्रह्मासदृश स्वयंजात बुध ब्रह्मभाव बलवान महा । ब्रह्मरूप बहुरूप भूमिजा प्रसन्नवदना युगावहा ।

युगाधिराजा भक्तवत्सला पुण्यश्लोका ब्रह्मविदे । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥२२॥


सुरपति भूपति भूत-भुवनपति अखिल-चराचर-वनस्पते । उद्भिजकारक अंडजतारक योनिज-स्वेदज-सृष्टिपते ।

त्रिभुवनसुंदर वंद्य मुनीश्वर मधुमधुरेश्वर बुद्धिमते । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥२३॥


दुर्मर्षण अघमर्षण हरिहर नरहर हर्ष-विमर्षण रे । सिंधू-बिंदू-इंदु चिदुत्तम गंगाधर प्रलयंकर रे ।

जलधि जलद जलजन्य जलधरा जलचरजीव जलाशय रे । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥२४॥


गिरीश गिरिधर गिरीजाशंकर गिरिकंदर हे गिरिकुहरा । शिव शिव शंकर शंभो हरहर शशिशेखर हे गिरीवरा ।

उन्नत उज्ज्वल उत्कट उत्कल उत्तम उत्पल ऊर्ध्वगते । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥२५॥


भव-भय-भंजन भास्वर भास्कर भस्मविलेपित भद्रमुखे । भैरव भैगुण भवधि भवाशय भ्रम-विभ्रमहर रुद्रमुखे ।

सुरवरपूजित मुनिजनवंदित दीनपरायण भवौषधे । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥२६॥


कोटीचंद्र सुशीतल शांता शतानंद आनंदमया । कामारि शितिकंठ कठोरा प्रमथाधिपते गिरिप्रिया ।

ललाटाक्ष विरुपाक्ष पिनाकी त्रिलोकेश श्री महेश्वरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥२७॥


भुजंगभूषण सोम सदाशिव सामप्रिय हरि कपर्दिने । भस्मोध्दूलितविग्रह हविषा दक्षाध्वरहर त्रिलोचने ।

विष्णुवल्लभा नीललोहिता वृषांक शर्वा अनीश्वरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥२८॥


वामदेव कैलासनिवासी वृषभारूढा विषकंठा । शिष्ट विशिष्टा त्वष्टा सुष्टा श्रेष्ठ कनिष्ठा शिपिविष्टा ।

इष्ट अनिष्टा तुष्टातुष्टा तूच प्रगटवी ऋतंभरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥२९॥


श्रीकर श्रेया वसुर्वसुमना धन्य सुमेधा अनिरुद्धा । सुमुख सुघोषा सुखदा सूक्ष्मा सुहृद मनोहर सत्कर्ता ।

स्कन्दा स्कन्दधरा वृद्धात्मा शतावर्त शाश्वत स्थिरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३०॥


सुरानंद गोविंद समीरण वाचस्पति मधु मेधावी । हंस सुपर्णा हिरण्यनाभा पद्मनाभ केशवा हवी ।

ब्रह्मा ब्रह्मविवर्धन ब्रह्मी सुंदर सिद्धा सुलोचना । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३१॥


घन घननीळ सघन घननादा घनःश्याम घनघोर नभा । मेघा मेघःश्याम शुभांगा मेघस्वन मनभोर विभा ।

धूम्रवर्ण धूम्रांबर धूम्रा धूम्रगंध धूम्रातिशया । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३२॥


महाकाय मनमोहन मंत्रा महामंत्र हे महद्रुपा । त्रिकालज्ञ हे त्रिशूलपाणि त्रिपादपुरुषा त्रिविष्टपा ।

दुर्जनदमना दुर्गुणशमना दुर्मतिमर्षण दुरितहरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३३॥


प्राणापाना व्यान उदाना समान गुणकर व्याधिहरा । ब्रह्मा विष्णू रुद्र इंद्र तूं अग्नि वायू सूर्य चंद्रमा ।

देहत्रयातीत कालत्रयातीत गुणातीत तूं गुरुवरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३४॥


मत्स्य कूर्म तू वराह शेषा वामन परशूराम महान । पंढरी विठ्ठल गिरिवर विष्णू रामकृष्ण तू श्री हनुमान ।

तूच भवानी काली अंबा गौरी दुर्गा शक्तिवरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३५॥


सर्वेश्वरवर अमलेश्वरवर भीमाशंकर आत्माराम । त्रिलोकपावन पतीतपावन रघुपति राघव राजाराम ।

ओंकारेश्वर केदारेश्वर वृद्धेश्वर तू अभयकरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३६॥


शेषाभरणा शेषभूषणा शेषाशायी महोदधे । पूर्णानंदा पूर्ण परेशा षड्भुज यतिवर गुरुमूर्ते ।

शाश्वतमूर्ते षड्भुजमूर्ते अखिलांतक पतितोद्धारा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३७॥


सभा सभापति व्रात व्रातपति ककुभ निषङ्गी हरिकेशा । शिवा शिवतरा शिवतम षङ्गा भेषजग्रामा मयस्करा ।

उर्वि उर्वरा द्विपद चतुष्पद पशुपति पथिपति अन्नपते । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥३८॥


वृक्ष वृक्षपति गिरिचर स्थपति वाणिज मंत्रि कक्षपति । अश्व अश्वपति सेनानी रथि रथापती दिशापती ।

श्रुत श्रुतसेना शूर दुंदुभि वनपति शर्वा इषुधिमते । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥३९॥


महाकल्प कालाक्ष आयुधा सुखद दर्पदा गुणभृता । गोपतनु देवेश पवित्रा सात्त्विक साक्षी निर्वासा ।

स्तुत्या विभवा सुकृत त्रिपदा चतुर्वेदविद समाहिता । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥४०॥


नक्ता मुक्ता स्थिर नर धर्मी सहस्रशीर्षा तेजिष्ठा । कल्पतरू प्रभू महानाद गति खग रवि दिनमणि तू सविता ।

दांत निरंतर सांत निरंता अशीर्य अक्षय अव्यथिता । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥४१॥


अंतर्यामी अंतर्ज्ञानी अंतःस्थित नित अंतःस्था । ज्ञानप्रवर्तक मोहनिवर्तक तत्त्वमसि खलु स्वानुभवा ।

पद्मपाद पद्मासन पद्मा पद्मानन हे पद्मकरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥४२॥


जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा

जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा

श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त

श्री स्वामी समर्थ महाराज की जय


रचनाकार - श्रीयुत् नागेश करंबेळकर



Nov 4, 2021

श्रीनारदोक्तं श्रीदत्तात्रेयस्तोत्रं


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥

॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


ॐ अस्य श्रीदत्तात्रेयस्तोत्रमन्त्रस्य नारदऋषिः । दत्तात्रेयो देवता । अनुष्टुप् छन्दः ।

सकलकामनासिद्ध्यर्थे जपे विनियोगः ॥ नारद उवाच -

अत्रिपुत्रो महातेजा दत्तात्रेयो महामुनिः । तस्य स्मरणमात्रेण सर्वपापैः प्रमुच्यते ॥१॥ मुण्डनं कौपिनं भस्मं योगपट्टं च धारयन् । शैली श्रृङ्गी तथा मुद्रा दण्ड पात्र जिनासनम् ॥२॥ कन्थादो पञ्च आधारी कण्ठमालां च पादुकाम् । कर्णकुण्डलधारी च सिद्धोही भ्रमते महिम् ॥३॥ दत्तात्रेयो महादेवो विष्णुरूपो महेश्वरा । स्मरणात् सर्वपापानि नश्यन्ते नात्र संशयः ॥४॥ मातापूरनिवासी च देवो दत्तात्रेयो मुनिः । नित्य स्नानं प्रकुरुते भागीरथ्यां दिने दिने ॥५॥ दत्तात्रेयो हरिः साक्षात् वसन्ते सह्यपर्वते । भक्तानां वरदो नित्यं सः देवश्चिन्तितं मया ॥६॥ नागहार धरो देवो मुकुटादि समन्विता । पुष्पमालाधरो देवो सः देवो वरदो मम ॥७॥ अत्रिजो देवदेवेषो मातुर्लिङ्गधर प्रभु । सर्वसौभाग्ययुक्तश्च भक्तानां वरदः सदा ॥८॥ इति श्रीनारदोक्तं श्रीदत्तात्रेयस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


Nov 3, 2021

प्रार्थना श्री सद्गुरूंची


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


सद्गुरूनाथा, हात जोडीतो अंत नको पाहू । उकलुनि मनीचे हितगुज सारे, वद कवणा दावू धृ. निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू, किती तुज शीण देऊ । हृदयी वससि परि नच दिससी, कैसे तुज पाहू ॥१ उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी, तनु तुज वाहू । बोधुनि दाविसी इहपर नश्वर, मनीं उठला बाऊ ॥२ कोण कुठील मी कवण कार्य मम, जनी कैसा राहू । करी मज ऐसा निर्भय निश्चल, सम सकला पाहू ॥३ अजाण, हतबल, भ्रमित मनीची तळमळ कशी साहू । निरसूनि माया दावी अनुभव, प्रचिती नको पाहू ॥४


॥ श्री गुरुदेव दत्त