May 16, 2023

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय ८


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे वसुदेव आणि देवकीच्या नंदना, हे गोप-गोपींचे मन संतुष्ट करणाऱ्या तसेच दुष्ट दानवांचे निर्मूलन करणाऱ्या श्रीहरी माझ्यावर तू कृपा कर. II१II कर्म आदींचे अनुष्ठान वा पराकोटीची भक्ती हे जरी तुझ्या प्राप्तीचे साधन असले, तरी त्यासाठी मी पूर्णतः अपात्र आहे. II२II तुझी ज्ञान प्रदान करणारी सर्व शास्त्रें देवभाषा म्हणजेच संस्कृत भाषेत आहेत. हे हरी, त्यांचा अर्थ मी कसा समजावून घेऊ ? हे तू सांग बरे. II३II मला संस्कृत भाषा अवगत नाही. शिवाय माझी बुद्धीही मंद आहे. कमळपुष्पातील मधुरस बेडूकास कधी मिळतो का ? II४II हे श्रीपती, अन्नदान करून तुझी प्राप्ती करावी असे ठरविले, तरी दारिद्र्य गाठीशी बांधल्यामुळें धनाचा माझ्याकडे निश्चितच अभाव आहे.II५II जरी मला तीर्थयात्रा करावी असे वाटले तरी शरीर सामर्थ्य नाही. तसेच आतां तर दृष्टीसही अंधत्व आले आहे.॥६॥ हे चक्रपाणी, असा सर्वच बाजूंनी मी हीनदीन आहे. दरिद्री मनुष्याचे सर्व मनोरथ मनांतल्या मनातच जिरून जातात.॥७॥ हे सारे व्यावहारिक दृष्टीनें जरी खरे असले तरी तुझी कृपा झाल्यावर (मनुष्य) स्वानंदाच्या सागरी सर्वकाळ पोहत राहतो.॥८॥ तुझ्या कृपेची महती इतर सर्व गोष्टींहून आगळी वेगळी आहे. ढगांतून बरसणाऱ्या पाण्याचे कधी पैसे द्यावे लागत नाही.॥९॥ मेघवर्षावाने ज्याप्रमाणे तळीं विहिरी तुडुंब भरतात, त्याचप्रमाणे हे पांडुरंगा, (तुझी कृपा झाल्यास) शुष्क खडकांस देखील पाण्याचे पाट फुटतात. ॥१०॥ अशा त्या तुझ्या कृपेचा हा दासगणू खरोखर भुकेला आहे. त्या कृपेचा एखादा तरी घास तू माझ्या मुखांत घाल. ॥११॥ त्यामुळें मी तृप्त होईन आणि अवघीच सुखे मला प्राप्त होतील. अमृताचा एखादा कणही मिळाला तरी सारे रोग नाहीसे होतात. ॥१२॥ असो. मागील अध्यायांत देशमुख आणि पाटील ह्या घराण्यांत कशी दुफळी होती हे आपण पहिले. ॥१३॥ जिथे जिथे ही दुफळी असते, तिथे तिथे सर्व गोष्टींची ती होळीच करते. ह्या वैरभावाने अवघ्या सुखांची जणू राखरांगोळीच होत असते. ॥१४॥ ज्याप्रमाणें क्षयरोग शरीराला यमसदनास नेतो, त्याचप्रमाणे हा दुफळीचा रोग समाजास लयाला नेतो. सर्व प्रयत्न तिथे व्यर्थ ठरतात. ॥१५॥ असो. एकदा तळ्याच्या काठांवर देशुमखांचा एक महार खंडू पाटलांपुढे निरर्थक बडबड करू लागला.॥१६॥ पाटील हा त्या गावंचा अधिकारी, सर्वेसर्वा असतो. काही काम करण्यावरून त्या दोघांत (खंडू पाटील आणि महार) कुरबुर झाली.॥१७॥ तो मऱ्या नावाचा महार होता. त्याला देशमुखांचे पाठबळ होते, त्यामुळें त्याने खंडू पाटलांस अपमानकारक उलटे उत्तर दिले.॥१८॥ त्यावर पाटील म्हणाला, " हे तुझे वागणे काही बरोबर नाही. गरिबाने कधी आपली पायरी सोडू नये. मला प्रत्युत्तर करण्याचा केवळ देशमुखांसच अधिकार आहे. तुझ्यासारख्या नोकराचा नाही, हे लक्षांत ठेव.॥१९-२०॥ एवढे सांगूनही महार काही ऐकायला तयार नव्हता आणि वर तऱ्हे तऱ्हेच्या चेष्टा करू लागला. त्याचे ते बोलणे ऐकून पाटील मनांत संतापला.॥२१॥ खरें तर बाचाबाचीचे कारण अतिशय क्षुल्लक होते. खंडू पाटलास काही कागदपत्रे ठाण्यांस पाठवायची होती. ॥२२॥ तू आत्ताच हे कागद घेऊन अकोल्यास तहसिलांच्या कचेरीत जा आणि हा टप्पा दे असे (खंडू पाटलांनी) महारास सांगितले होते. ॥२३॥ ते ऐकून महार म्हणाला, " मी काही ही कागदपत्रे घेऊन जाणार नाही. देशमुखांच्या आश्रितांवर तुमचा नेहेमीच डोळा असतो. काही असो, मी आज हा टप्पा घेऊन अजिबात जाणार नाही. तुझ्या ह्या हुकुमास मी शिमग्याच्या बोंबा समजतो." ॥२४-२५॥ असे मोठयाने बोलून, त्याने आपली मूठ वळून आपल्या तोंडासमोर हात नेऊन तसा हावभावही केला. ॥२६॥ ती त्याची कृती पाहून खंडू पाटीलाचे मन संतप्त झाले. त्यावेळीं पाटलाच्या हातांत एक भरीव वेळूची काठी होती. ॥२७॥ त्याच काठीनें त्याने महाराच्या हातावर प्रहार केला. पाटील मूळचाच सशक्त होता, त्यांत त्याने रागानेंच हा प्रहार केला. ॥२८॥ त्या मारामुळे त्या महाराचा हात मोडला आणि तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. ॥२९॥ पाटील तो टप्पा दुसऱ्या महारास देण्यासाठी निघून गेले. तोपर्यंत इकडे काय घडले त्याचा वृत्तांत मी आतां सांगतो. ॥३०॥ तो (जखमी) महार त्याच्या नातेवाईकांनी उचलून देशमुखांच्या वाड्यांत नेला. त्याचा हात मोडलेला पाहून देशमुख आनंदले. ॥३१॥ वा ! वा ! ही तर फार छान गोष्ट झाली. आपल्याला कुरापत काढण्यासाठी ही अवचितच संधी मिळाली आहे, ही आतां हातची ना जाऊ देतां (ह्या संधीचा) उपयोग करून घेऊ या. ॥३२॥ त्यांनी त्या महारास लगेचच कचेरीत नेले आणि तेथील अधिकाऱ्यांस काही खोटेंनाटें सांगितले. ॥३३॥ कोठेही दोन पक्षांत थोडें जरी वैर असल्यास काट्यांचेच कसे नायटे होतात ते बघा. ॥३४॥ त्या महाराची फिर्याद पुस्तकांत नोंदली गेली आणि त्या अधिकाऱ्याने पाटलास पकडून आणण्याची आज्ञा दिली. ॥३५॥ उद्या पाटलाच्या पायी जड बेड्या आणि हातांत कड्या पडणार आहेत, अशी त्या शेगांवांत वार्ता पसरली. ॥३६॥ खंडू पाटलास हे समजल्यावर त्याचे धाबें दणाणले. तो अतिशय चिंतातुर झाला आणि त्याच्या तोंडचें पाणी पळाले. ॥३७॥ हे श्रीहरी, ज्या शेगांवांत मी एखाद्या वाघाप्रमाणें वागत होतो, तिथेच का असा बेडी पडण्याचा माझ्यावर प्रसंग ओढवला. (अशी तो परमेश्वरास प्रार्थना करू लागला.) ॥३८॥ अब्रुदारास अपमान नेहेमीच मरणाहूनही भयंकर वाटतो. त्याचे सारे भाऊही घाबरून गेले होते, कोणासही काही विचार सुचत नव्हता. ॥३९॥ असा चहूबाजूंनी हताश होऊन खंडू बसला असता, अकस्मात त्याला एक विचार सुचला. श्री गजानन महाराजांसच आपण आतां हे सांकडें घालावे. ॥४०॥ या संकटाचे निरसन करण्यासाठी या वऱ्हाडांत त्या साधुशिवाय खरोखर दुसरा कोणीही नाही. ॥४१॥ खंडू पाटलाचे बंधू काही लौकिक प्रयत्न करण्यास अकोल्यास गेले होते. त्याच रात्री तो समर्थांकडे सत्वर आला. ॥४२॥ श्रींकडे येता क्षणीच त्याने नमस्कार केला आणि त्यांच्या पायांवर डोके टेकविले. (आणि सांगू लागला,) महाराज माझ्यावर फार कठीण प्रसंग ओढवला आहे. ॥४३॥ काही सरकारी कामानिमित्त मी एका महारास तळ्यापाशी हातांतील काठीने मारले, हे खरे आहे. ॥४४॥ त्याचा असा परिणाम झाला की देशमुख मंडळींनी माझी मानहानी करण्यासाठी ह्या साध्या घटनेचा जणू काट्याचा नायटा केला. ॥४५॥ त्याचे निमित्त करून उद्या माझ्यावर कैदी होण्याचा प्रसंग आला आहे. हे समर्था, तुझ्याशिवाय माझ्या इज्जतीचे कोण बरे रक्षण करणार ?॥४६॥ उद्याच राजदूत इथे येणार आहेत आणि मला पायांत बेडी ठोकून घेऊन जाणार आहेत, असे आज कळले.॥४७॥ गुरुवरा, ही अशी (मानहानी) होण्यापेक्षा माझा गळा तुम्ही इथेच चिरा. ही तलवार मी तुमच्या हातांत देतो, ती घ्या आणि आतां उशीर करू नका. ॥४८॥ स्वाभिमानी माणसांस मानहानी हेच जणू मरणासमान वाटते. दयाळा, त्यांतून माझा अपराध अगदीच लहान आहे. ॥४९॥ त्या अपराधरूपी खड्याचा आतां मोठा डोंगर झाला आहे. समर्था, माझ्या अब्रूचा ह्या कठीण समयीं मान राखा.॥५०॥ जयद्रथाच्या वेळेला केवळ आपल्या स्वत्वासाठी अर्जुन अग्नींत प्राणार्पण करण्यास तयार झाला होता. ॥५१॥ त्यावेळीं भगवंताने त्याच्या प्रतिष्ठेचे रक्षण केले. प्रभूनेंच द्रौपदीला सभेंत वस्त्रें पुरवली. ॥५२॥ त्याचप्रमाणें माझी पांचाळीरुपी प्रतिष्ठाही कौरवरूपी देशमुखांनी आता नग्न करण्यासाठी आणली आहे. तिचे (तुम्ही) रक्षण करा हो. ॥५३॥ समर्थांस एवढें सांगून पाटील रडू लागला. त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारांचा जणू पूर वाहत होता. ॥५४॥ घरातील सर्व सदस्य आधीच फार चिंताग्रस्त झाले होते. त्यांच्या दु:खाला अंत तरी कुठला असावा बरे ? ॥५५॥ इकडे समर्थांनी त्यांच्या दोन्ही हातांनी खंडू पाटलास कवटाळून हृदयीं धरले आणि त्याचे सांत्वन करू लागले.॥५६॥ अरे ! कर्तृत्ववान पुरुषांवर अशा प्रकारची संकटे वरचेवर येतच असतात, हेच खरे ! तू त्याची अजिबात चिंता करू नकोस.॥५७॥स्वार्थदृष्टी बळावली की हे असेच कायम होते. खरी नीतीमत्ता, अगदी अणूएवढींदेखील त्यांस कळत नाही.॥५८॥ तुम्ही पाटील आणि देशमुख खरे तर एकाच जातीचे असूनसुद्धा केवळ स्वार्थ साधण्यासाठी एकमेकांचे नुकसान करु पाहता.॥५९॥ पूर्वी कौरव - पांडवांत स्वार्थामुळेच वैरभाव निर्माण झाला हे सत्य आहे. तथापि न्यायदृष्टीनें विचार केल्यास पांडवांचा पक्ष तिथे खरा होता.॥६०॥ म्हणूनच भगवंतानें पांडवांस सहाय्य केले. सत्याच्या विजयासाठी कौरवांस मारणें जरुरीचे होते.॥६१॥ जा, तू तिळमात्र घाबरू नकोस. देशमुखानें कितीही आपला जोर लावला तरी, तुला बेडी अजिबात पडणार नाही.॥६२॥ तेच पुढें खरे झालें. खंडू पाटीलाची निर्दोष म्हणून सुटका झाली. संतांच्या मुखावाटें आलेली वचनें कधीच खोटी ठरत नाही.॥६३॥ उत्तरोत्तर श्रीसमर्थांवर पाटील मंडळींची श्रद्धा दृढ होऊ लागली. अमृताचे सेवन करण्यास कोणाला आवडणार नाही ?॥६४॥ पुढें खंडू पाटलाने प्रेमाने विनंती करून समर्थांस आपल्या घरी वास्तव्यास नेले.॥६५॥ पाटील सदनांत गजाननस्वामी समर्थ असतांना अकस्मात पाच-दहा तैलंगी ब्राह्मण तिथे आले.॥६६॥ ते तैलंगी ब्राह्मण विद्वान,कर्मठ आणि वेदपारंगत होते. परंतु, त्यांचे मन धनाच्याबाबतीत अतिशय लोभी होते.॥६७॥ समर्थांकडे काही दक्षिणा मिळेल ह्या आशेनेच तें खरे तर तिथे आले होते. त्यावेळीं समर्थ पांघरूण घेऊन निजलेले होते.॥६८॥ त्यांना जागे करण्यासाठी ब्राह्मण जटेचे मंत्र अतिशय उच्च स्वरांत म्हणू लागले.॥६९॥ मंत्र पठण करतांना त्या ब्राह्मणांनी चूक केली, पण ती त्यांनी दुरुस्त केली नाही. म्हणून श्रोते हो, गजाननाची स्वारी आपल्या आसनीं उठून बसली पहा.॥७०॥ आणि (श्री) त्या ब्राह्मणांस म्हणाले, " तुम्ही कशासाठी वैदिक झाला आहात ? या वेदविद्येला असे निरर्थक हीनत्व आणू नका रे !॥७१॥ ही विद्या केवळ पोटपाण्याची सोय नव्हें, तर खरोखर मोक्षदायी आहे. तुम्ही या डोक्याला बांधलेल्या शालीची कांही तरी किंमत ठेवा.॥७२॥ आतां मी जसे म्हणतो आहे, तसे खरे स्वर लक्षात घेऊन तुम्हीं मंत्र पठण करा. उगाचच सोंग घेऊन भोळ्या भाविकांना फसवू नका."॥७३॥ जी ऋचा ब्राह्मणांनी म्हणण्यास सुरुवात केली होती, तोच अध्याय समर्थांनी घडाघडा म्हणून दाखविला.॥७४॥ कोठेंही काहीही चूक न करता, स्पष्ट शब्दोच्चारांत (समर्थ अध्याय म्हणत होते.) मूर्तिमंत वसिष्ठच जणू वेद म्हणण्यांस बसला आहे, असे वाटत होते.॥७५॥ ते पठण ऐकून तैलंगी ब्राह्मण आश्चर्यचकित झाले आणि मान खाली घालून बसले. त्यांना मुख वर करण्यास धीर होईना, मनांत अतिशय लाज, भय वाटू लागले.॥७६॥ सूर्याचा उदय झाल्यावर त्या तेजापुढें कोणी दीपांचा जयजयकार करतो का ? त्यांचे महत्त्व केवळ अंधारातच असते.॥७७॥ तें ब्राह्मण मनांत विचार करू लागले," हा काही वेडा नव्हें, तर साक्षात महाज्ञानी आहे. चारही वेद यांस मुखोदगत आहेत. जणू सारे वेद यांच्या मुखातच (जिव्हेवर) वास्तव्यास आहेत.॥७८॥ हा तर प्रत्यक्ष परमेश्वरच आहे. हा जातीनें नि:संशय खरोखर ब्राह्मण असावा,यांत काही शंकाच नाही. ॥७९॥ यांनी परमहंसाची दीक्षा घेतली आहे. आतां यांस कोणतेंही बंधन उरले नाही. हे तर जीवन्मुक्त सिद्धयोगी आहेत.॥८०॥ आपलें काही तरी पुण्य गाठींशी होते, म्हणून ह्या मूर्तीचे दर्शन झाले. हा तर साक्षात वामदेव आहे, दुसरी कुठलीच उपमा त्यांना द्यायला योग्य नाही. "॥८१॥ असो. दयाघन समर्थ खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणांना रुपया रुपया दक्षिणा देते झाले.॥८२॥ ते ब्राह्मण संतुष्ट होऊन दुसऱ्या गांवी निघून गेले. गांवातील ह्या उपाधीला आतां महाराज कंटाळले होते.॥८३॥ श्रोते हो, खऱ्या संतांना कधीही उपाधीची आवड नसते. दाभिंकांस मात्र उपाधी म्हणजे भूषण वाटते.॥८४॥ शेगांवच्या उत्तरेला जवळच एक मळा होता. या मळ्यांत भरपूर भाजीपाला पिकत होता.॥८५॥ तिथेच एक शिवाचे मंदिरही होते. त्याच्या आसपास लिंबांच्या वृक्षांची थंडगार सावलीही होती.॥८६॥ हा मळा कृष्णाजी पाटलाच्या मालकीचा होता. हा कृष्णाजी, खंडू पाटलाचा सगळ्यांत धाकटा भाऊ होता.॥८७॥ त्या मळ्यांत महाराज येऊन शिवालयाजवळ असलेल्या एका ओट्यावर बसले. निंबतरुंची गर्द छाया तिथे पसरली होती.॥८८॥ समर्थ कृष्णाजीस म्हणाले, " मी तुझ्या मळ्यांत ह्या श्रीशंकरांजवळ काही दिवस राहण्यासाठी आलो आहे.॥८९॥ हा भोलानाथ कर्पूरगौर, नीलकंठ पार्वतीवर अवघ्या देवांचा राजराजेश्वर आहे.॥९०॥ त्याला तुझा मळा आवडला. म्हणून मीही येथें येण्याचा विचार केला. मला तू आतां इथे निवारा करून दे." ॥९१॥ कृष्णाजीनें तें वाक्य ऐकताच तात्काळ सहा पत्रें आणले आणि ओट्यावर छप्पर केले.॥९२॥ समर्थांनी तिथे वास्तव्य केले, म्हणून ( कृष्णाजीचा ) मळा जणू तीर्थक्षेत्र झाला. राजा ज्या ठिकाणी जातो, ते स्थानच राजधानी होते.॥९३॥ महाराजांच्या बरोबर भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे होते. तें निरंतर स्वामींसेवेत तत्पर असत.॥९४॥ जेवणाखाणाची सर्व व्यवस्था कृष्णाजी पाटील स्वत: जातीनें लक्ष घालून करीत असे. समर्थांचे जेवण झाल्यावर तो प्रसाद घेत असे.॥९५॥ असो. गजानन महाराज मळ्यांत रहात असतांना एक अद्‌भुत गोष्ट घडली. दहा-वीस गोसावी फिरत फिरत तिथे येऊन पोहोचले.॥९६॥ समर्थांची महती त्यांनी आधीच ऐकली होती. त्यामुळें या मळ्यामध्ये येऊन त्यांनी तळ ठोकला.॥९७॥ ते गोसावी (कृष्णाजी) पाटलास म्हणाले, "आम्हीं तीर्थयात्रेला निघालो आहोत. (काशीहून) भागीरथीला घेऊन रामेश्वराला जात आहोत.॥९८॥ गंगोत्री, जम्नोत्री, केदार, हिंगलाज, गिरनार, डाकुर अशी अनेक क्षेत्रें आम्हीं पायी फिरत फिरत पाहिली आहेत.॥९९॥ ब्रह्मगिरी नामक गोसाव्याचे आम्हीं शिष्य आहोत. आमचे महाराजही सध्या आमच्याबरोबरच आहेत.॥१००॥ महासाधु ब्रह्मगिरी महाराज, ज्यांचा प्रत्यक्ष श्रीहरी गुलाम आहे. असे ते मूर्तिमंत सत्पुरुष तुझ्या पूर्वभाग्यानें तुझ्या घरी आले आहेत.॥१०१॥ आजच तुम्ही आम्हांस शिरापुरीचे भोजन द्यावे. गांजासेवनासाठी काही गांजाही पुरवावा.॥१०२॥ आम्हीं इथे केवळ तीन दिवसच राहू आणि चौथ्या दिवशी येथून निघू. तेव्हां पाटील, फार काही प्रयास न करता ही पर्वणी साधून घ्या.॥१०३॥ तुम्ही ह्या मळ्यात हा वेडा,पिसा आणि नंगाधूत मोठ्या कौतुकाने सांभाळला आहे. मग आम्हांस भोजन प्रसाद देण्यास मागें पुढें का पाहतां ?॥१०४॥ गाढवांस आवडीने पाळतात आणि गाईस लाथा मारतात, त्यांना का कधी कुणी सज्जन म्हणतात? याचा तुम्ही विचार करावा.॥१०५॥ आम्ही वैरागी गोसावी अवघा वेदान्त जाणतो. तुमची इच्छा असल्यास मळ्यात पोथी-प्रवचन ऐकावयास या."॥१०६॥ कृष्णाजी त्यावर उत्तरला, " उद्या तुम्हांस शिरापुरीचे भोजन घालीन. आज ह्या भाकरी आहेत, त्याच जेवणासाठी घ्याव्यात.॥१०७॥ माझा चालता बोलता कंठनीळ त्या पत्र्याच्या छपरांत बसला आहे. हवा तितका गांजा तुम्हांला तिथेच मिळेल."॥१०८॥ त्या दुसऱ्या प्रहरी गोसाव्यांनी चूण - भाकरी घेतली आणि मळ्यातील विहिरीजवळ भोजनास बसले. ॥१०९॥ त्यानंतर समर्थांच्या समोरच एका छपरात गोसाव्यांनी आपापली कडासनें लावली.॥११०॥ संध्याकाळीं त्यांचा महंत ज्याचे नाव ब्रह्मगिरी होते, तो भगवद्‌-गीता वाचू लागला.॥१११॥ इतर गोसावीही गीता श्रवणास बसले. तसेच गांवांतूनही काही लोक त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची पोथी ऐकावयास आले.॥११२॥ "नैनं छिन्दन्ति" हा श्लोक निरूपणासाठी घेतला होता. ब्रह्मगिरी पक्का दांभिक होता, त्यामुळें प्रवचनात स्वानुभवाचा काहीच अंश नव्हता.॥११३॥ त्याचे निरूपण ऐकून गावकऱ्यांस तें पटले नाही. "हा तर नुसता शब्दच्छल आहे." असे ते आपापसांत बोलू लागले. ॥११४॥ पोथी ऐकल्यावर तें सर्व लोक गजानन महाराजांचे दर्शन घेण्यास पत्र्याच्या छपरांत आले आणि त्यांच्यासमोर बसले. ॥११५॥ तिथे केवळ निरूपणाचा भाग झाला, इथे पत्र्याच्या छपरांत प्रत्यक्ष स्वानुभवाचा पुरुष बसलेला आहे असे सर्व गावकरी म्हणू लागले.॥११६॥ तिकडे आपण इतिहास ऐकला, इथे प्रत्यक्ष पुरुष पाहिला. गावकऱ्यांच्या या बोलण्याचा त्या गोसाव्यास थोडा राग आला.॥११७॥ सर्व गोसावी त्या पत्र्यात गांजा पिण्यासाठी बसले होते. गांजाची चिलीम भरून ते ओढत होते.॥११८॥ पत्र्याच्या त्या छपरातच एका पलंगावर समर्थांची स्वारी बसली होती. भास्कर वरचेवर चिलीम भरून महाराजांस ओढण्यासाठी देत होता.॥११९॥ त्या चिलिमेच्या विस्तवाची ठिणगी अचानक पलंगावर पडली. ती पडतांना मात्र कोणाचेही लक्ष तिकडे गेले नाही.॥१२०॥ काही वेळ गेल्यावर तिथून धूर निघू लागला आणि बघतां बघतां तो पलंग एकदम चहू बाजूंनी पेटला.॥१२१॥ ते दृश्य पाहून भास्कर सद्‌गुरुनाथांस म्हणाला, "महाराज, हा पलंग सत्वर सोडून द्या आणि खाली उतरा.॥१२२॥ ह्या पलंगाची लाकडें सागाची आहेत,आतां ती पाण्याशिवाय विझायची नाहीत."॥१२३॥ त्यावर,' भास्करा, आग विझवायची तुला मुळींच गरज नाही. तू पाणी अजिबात आणू नकोस.' असे समर्थ वदते झाले.॥१२४॥ अहो ब्रह्मगिरी महाराज, तुम्हीं या पलंगावर येऊन बसा. तुम्हांला तर सारी भगवद्‌-गीता अवगत आहे.॥१२५॥ हे पाहा, श्रीहरीनें तात्काळ त्या (गीता)परीक्षेची वेळ आणली आहे. आतां तुम्ही ' ब्रह्मास अग्नी जाळू शकत नाही.' याचा प्रत्यय दाखवा. ॥१२६॥ "नैनं छिन्दन्ति" या श्लोकावर आत्ताच एक प्रहर प्रवचन दिलेत. मग आतां ह्या पलंगावर बसण्यासाठी का बरें शंकित आहात ?॥१२७॥ भास्करा, तू लवकर जा बरें आणि ब्रह्मगिरीच्या हातास धरून अत्यंत आदरानें या जळत्या पलंगावर बसव. ॥१२८॥ अशी आज्ञा होतां क्षणीच भास्करानें धावत जाऊन ब्रह्मगिरीचा डावा हात आपल्या हाताने धरला.॥१२९॥ भास्कराचे शरीर धिप्पाड, सशक्त आणि पिळदार होते. त्याच्या समोर तो गोसावी एखाद्या घुंगुरड्यासारखा (दुर्बल मनुष्यासारखा) दिसू लागला.॥१३०॥ तोपर्यंत पलंग चौफेर पेटून असंख्य ज्वाळा त्यांतून निघू लागल्या. त्यांहीं परिस्थितीत महाराज मात्र आपल्या आसनीं इतुकेही विचलित ना होतां स्थिर होते.॥१३१॥ कयाधूसुत प्रल्हादास अग्नींत उभें केले होते, हे श्रीव्यासांनी भागवत पुराणांत लिहिलें आहे.॥१३२॥ त्या कथेचेच जणू प्रत्यंतर श्री गजानन साधूंनी कृष्णाजीच्या मळ्यात दाखविले.॥१३३॥ ब्रह्मगिरी भास्करास म्हणू लागला," मला पलंगाजवळ नेऊ नका. मी महाराजांचा अधिकार काही जाणला नाही."॥१३४॥ पण त्याचे म्हणणें न ऐकता भास्कराने त्यास फरफर ओढत आणून आपल्या सद्‌गुरुरायांच्या समोर उभा केला.॥१३५॥ ' नैनं दहति पावक:' हे गीतेतील वचन खरें करून दाखवा, असे महाराज म्हणताच तो गोसावी फारच घाबरला.॥१३६॥ गोसावी भीत भीत बोलू लागला," मी तर केवळ पोटभरू संत आहे. शिरापुरी खाण्यासाठी मी गोसावी झालो.॥१३७॥ हे शांतीधामा,मी केलेल्या अपराधास्तव मला क्षमा करा. हे गीताशास्त्र शिकण्याचा मी उगाचच खटाटोप केला.॥१३८॥ तुला वेडा म्हणून हिणवले, याचा मला आतां पश्चात्ताप होत आहे. दातांत तृण धरून मी तुला शरण आलो आहे, तुम्हीं मला अभय द्या." ॥१३९॥ शेगांवच्या लोकांनी समर्थांस विनवणी केली, "आपणांस अग्नीपासून कदापिही भय नाही, हे खरें आहे.॥१४०॥ पण तरीही आमच्याकरतां तुम्ही लवकर (पलंगावरून) खाली उतरा, महाराज. तुम्हांस अशा स्थितींत पाहून आम्हांला धडकी भरते.॥१४१॥ हे ज्ञानजेठी, आमच्यासाठी तरी तुम्हीं खाली उतरा." गोसावीही पुरतां लज्जित झाला होता, काही न बोलता तो (तसाच उभा राहिला.)॥१४२॥ अवघ्यां लोकांच्या विनंतीस मान देण्यासाठी शेवटी गजानन महाराज खाली उतरले. तें उतरता क्षणींच पलंग कोसळून पडला. अक्षरश: एक पळही तो पलंग कोसळण्यास लागला नाही.॥१४३॥ खरें तर अवघाच जळाला होता. पण थोडें पाणी मारून, अग्नी विझवल्यावर जो काही थोडा भाग उरला होता, तो इतरांस साक्ष म्हणून दाखवायला ठेवला.॥१४४॥ पूर्ण निराभिमानी होऊन ब्रह्मगिरी महाराजांच्या पाया पडला. गंगाजलाचा स्पर्श झाल्यावर, तिथे मलिनता कशी राहील बरें ?॥१४५॥ त्याच मध्यरात्री महाराजांनी ब्रह्मगिरीस बोध केला. तू आजपासून या घेतलेल्या सोंगाचा त्याग कर.॥१४६॥ ज्यांनीं ही राख (भस्म) शरिरास लावलेली आहे, त्यांनी उपाधीचा अट्टाहास करू नये. अनुभव घेतल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचा निरर्थक उपदेश करू नयें.॥१४७॥ या जगतांत नुसतेंच शब्दपांडित्य अतोनात माजले आहे. त्यामुळेंच आपल्या ह्या संस्कृतीची हानी झाली आहे.॥१४८॥ मच्छिंद्रनाथ, जालंदरनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ आदि यतीं आणि संत ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा ?॥१४९॥ श्रीशंकराचार्य केवळ स्वानुभवाच्या जोरावर यती झाले, हे निश्चित ! संत एकनाथांनी प्रपंचात राहूनही ब्रह्मस्थिती अनुभवली.॥१५०॥ या भूमीवर श्री स्वामी समर्थ हेही ब्रह्मचारी आणि थोर ब्रह्मसाक्षात्कारी सत्पुरुष होऊन गेले. या सर्वांच्या चरित्रांचेच तू मनन कर.॥१५१॥ उगाचंच शिरा-पुरी खाण्यासाठी ह्या भूमीवर भटकू नकोस. असें वर्तन ठेवल्यांस इतकेही सार तुझ्या हातीं लागणार नाही.॥१५२॥ महाराजांनी असा बोध केल्यावर ब्रह्मगिरी पुरतां विरक्त झाला. प्रातःकाळींच कोणालाही, अगदी त्याच्या शिष्यांसही न भेटतां तो तिथून निघून गेला.॥१५३॥ दुसऱ्या दिवशीं ही वार्ता अवघ्या शेंगावांत पसरली. जो तो जळालेल्या पलंगाला पाहावयास त्या मळ्यात आला.॥१५४॥ हा दासगणूविरचित, श्री गजाननविजय नावाचा ग्रंथ सर्व भाविकांस ह्या भावसागरांत तारक होवों. दासगणू मनीं हीच इच्छा करतो.॥१५५॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥इति अष्टमो‍ऽध्यायः समाप्तः ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


श्री गजानन विजय कथामृत अध्याय १ ते ७ इथे वाचता येतील.


May 4, 2023

स्तंभी प्रकटला नरहरी हो...


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ ॐ श्री नृसिंहाय नमः


साधारण दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वी पंढरपूर येथें प्रल्हाद शिवाजी बडवे नामक एक थोर संतकवी होऊन गेले. प्रल्हादकवि म्हणून विख्यात असलेले हे संतकवी उत्तम कीर्तन करीत असत. ते श्रीहरी विठ्ठलाचे परमभक्त होते आणि स्वतः पांडुरंग त्यांच्याबरोबर बोलत असे. त्यांची अनेक पदें प्रसिद्ध आहेत.

त्यांपैकी हे एक पद - श्रीनृसिंह अवतार वर्णन करणारे. आज खास श्री नृसिंह जयंतीनिमित्त देत आहोत.

  स्तंभीं प्रकटला नरहरी हो ॥ गडगड गडगड गर्जत घोषें धोकें काळ थरारी हो ॥धृ.॥ कडकड स्तंभ कडाडित नादें गडगड गगन विदारी हो ।  घडघड रविरथ विघडत गगनीं तडतड धरणि तडाडी हो ॥१॥  कराळमुख सिंहाचें दाढा विक्राळा व्यंकटा हो । पिंगट वर्ण जटा सुभटा करिं नखपंक्ती अति तिखटा हो ॥२॥  धडधड धडधड धडकत नेत्रीं अग्नीचे कल्लोळ हो । सळसळ सळसळ वदनि सळाळी विशाळु जिव्हा लोळे हो ॥३॥  जानूवरि हरि धरि दनुजाधिप रागें उदर विदारी हो ।  काढुनि अरिउदरांतुनि अंत्रे घाली निजकंधरी हो ॥४॥  घटघट घोंटित रक्त कंठिचें वाटे काळ भुकेला हो ।  वृत्तवृकापति दिक्पति म्हणती मोठा प्रळय उदेला हो ॥५॥ सुरवर सुमनें वर्षति हर्षें गर्जति जयजयकारी हो ।  स्तविती नरकिंकर विद्याधर प्रल्हादकैवारी हो ॥६॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


श्रीलक्ष्मीनृसिंहद्वादशनामस्तोत्रं आणि श्री मिलिंदमाधवकृत नृसिंहावतार माहात्म्य


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


हरिः ॐ । प्रणम्य शिरसा देवं नृसिंहं भक्तवत्सलम् । सच्चिदानंदरूपोऽयं परिपूर्ण जगद्‌गुरुम् ॥

प्रथमं तु महाज्वालो द्वितीयं तूग्रकेसरी । वज्रनखस्तृतीयं तु चतुर्थन्तु विदारणः ॥१॥ पञ्चमं नारसिंहश्च षष्ठः कश्यपमर्दनः । सप्तमं रिपुहन्ता च अष्टमो देववल्लभः ॥२॥ नवमं प्रह्लादवरदो दशमोऽनन्तहस्तकः । एकादशो महारुद्रो द्वादशं करुणानिधिः ॥३॥

द्वादशैतानि नामानि नृसिंहस्य महात्मनः । मन्त्रराजेति विख्यातं सर्वपापहरं शुभम् ॥४॥ क्षयापस्मारकुष्ठादि तापज्वरनिवारणम् । राजद्वारे तथा मार्गे संग्रामेषु जलान्तरे ॥५॥

गिरिगव्यहरगोव्ये व्याघ्रचोरमहोरगे । आवर्तनं सहस्त्रेषु लभते वाञ्छितं फलम्॥६॥

इति श्रीब्रह्मपुराणे ब्रह्मनारदसंवादे श्रीलक्ष्मीनृसिंहद्वादशनामस्तोत्रं सम्पूर्णम्



श्री मिलिंदमाधवकृत नृसिंहावतार माहात्म्य :