Mar 19, 2020

नित्योपासनेसाठी काही पोथी - पुस्तकें


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 



दत्तभक्तांच्या नित्योपासनेसाठी ऑनलाईन उपलब्ध असलेली काही पुस्तकें : 



॥ श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


Mar 14, 2020

श्री गजानन विजय दैनंदिन ओवी स्वाध्याय चिंतन अध्याय - १ ( ओवी १०८ ते १४६ )


II श्री गणेशाय नमः II

१/१०८ प्रथमता तो पुढे झाला | बंकटलाल आगरवाला |

गजाननासी विचारण्याला | विनयाने येणे रिती ||

ते

१/११८ अवघी पक्वाने एक केली | आवड निवड नाही उरली |

जठराग्नीची तृप्ती केली | दोन प्रहरच्या समयाला ||

बंकटलाल सरळ जवळ जाऊन विचारता झाला की क्षुधा असेल तर अन्नपात्राची तरतूद करावी का? न बोलताच त्या तेज:पुंज व्यक्तीने बोलणाऱ्याच्या मुखाकडे पाहिले मात्र त्या पहिल्याच दृष्टीत बंकटलाल भारीत झाला, त्याची अंतर्दृष्टी व भावना विकसित झाल्या, या प्रेषिताच्या केवळ बघण्याने. श्रीं बंकटलाल व दामोदरपंत यांच्याकडे एक प्रखर नजर टाकताच, त्यांचा आधीचा भाव लोप पावला त्यांना श्रींचे मनोहर रूप दृष्टीस पडले. कांती सतेज दिसली. हाताचे दंड, मान पिळदार, छातीची भव्यता जाणवली. श्रींची दृष्टी भृकुटी ठायी स्थिरावलेली. निजानंदात रममाण झालेल्या श्रींचे हे दर्शन होताच त्यांचा नम्रभाव जागृत झाला व श्रींठायी आदर दुणावला आणि नतमस्तक होऊन मनाने आपोआप नमस्कार घडला महाराजांना. कधी नव्हे एवढी प्रसन्नता त्यांना जाणवली. चित्त संतोष पावले. हा असतो योगी दर्शनाचा लाभ ! तो या दोघांना त्यांच्या भाग्याने झाला आणि येथूनच त्यांचे नशिबही बदलले. श्रींच्या हृद्य स्थानी बघताच त्यांना अंतस्थ आत्मारामाचे दर्शन झाले आणि दृष्टी स्थिरावली ती दोन भृकुटीच्या मध्यस्थानी असलेल्या आज्ञा चक्रावर आणि त्यांना ध्यानावस्था प्राप्त झाली क्षणभर त्या भर रस्त्यात. आणि साक्षात्कार झाला की निर्गुण परब्रह्म परब्रह्म म्हणतात ते हेच.

नेवास्याला ज्ञानदेवांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले होते. दररोज सायंकाळी श्री ज्ञानदेव दिवसभर शेतात शेती काम करून थकून भागून आलेल्या गरीब, आडाणी, कष्टकरी साध्याभोळ्या शेतकरी, मोलमजुरी करून प्रामाणिक जीवन जगणाऱ्या निष्पाप व निरागस लोकांना मंदिरात एकत्र बोलावीत आणि एका खांबाला टेकून आपले थोरले बंधू व सद्‌गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपाशीर्वादाने श्रीमद्‌भागवत गीतेवर निरुपण करीत. साध्या सोप्या मराठी भाषेत सांगत होते विश्वकल्याणकारी ज्ञानेश्वरी तरी कशी हो समजली असेल ज्ञानेश्वरी आणि त्यातील अध्यात्म तत्त्वज्ञान त्या निरक्षर ग्रामस्थांना ?  केवळ भगवंताच्या कृपेने व सगुण रूपातील ज्ञानदेवांच्या आशीर्वादाने ते शांतपणे ऐकत होते अगदी सुखमय आनंदात. प्रसन्न अंत:करणानें माना डोलवत होते. ज्ञानदेवांना सकारात्मक प्रतिसाद देत होते. ज्ञानदेवांच्या हळूवार, मधुर व शांत पण भारदस्त व आश्वस्थ वाणीद्वारे ग्रामस्थांना कृपा आशीर्वाद व ऐकण्याचे सामर्थ्य प्राप्त होत होते. ते मंत्रमुग्ध होऊन कानाने हे ज्ञानामृत पीत होते व आपल्या हृदयात साठवत होते. तसेच येथे शेगावात आज घडत होते.

बंकटलालाने श्रींकडे पाहिले तर ते आता भाताची शिते खात नव्हते तर निजानंदात रमलेले महान योगी वाटले. न कळत त्यांचे मन भावविभोर झाले. चित्त संतोष पावले. ही असते शक्ती खऱ्या संताच्या कृपा आशीर्वादाची !

देविदासबुवाकरवी शांतपणे एक पक्वानांनी भरलेले पात्र मागवून हळूच मोठ्या आदराने श्रीना नमस्कार करून त्यांच्या पुढ्यात नेऊन ठेवले. समर्थ स्वारी भोजनाला बसली मात्र अंत:करणात कुठल्याही पदार्थाच्या चवीबद्दल वा आवडी निवडी बद्दल अणुमात्र भाव नव्हता. सर्व पदार्थांच्याबद्दल समभाव. श्री तर तृप्तच होते कारण अनुपम ब्रह्मरस त्यांनी सेवन केला होता. सर्व पक्वान्ने एकत्र केली, काला केला. असा श्रीकृष्णाचा काला श्रींनी ग्रहणही केला. दुपारची भोजनाची वेळ, तेंव्हा जठराग्नीची तृप्ती करावी, एवढाच अन्न ग्रहणाचा अर्थ हेच महाराजांना सांगायचे असेल.

१/११९ बंकटलाल ते पाहून | पंताशी करी भाषण |

ह्या वेडा म्हणालो आपण | ती नि:संशय झाली चुकी ||

ते

१/१२६ पुसू लागले दामोदर |तुंब्यामध्ये नाही नीर |

मर्जी असल्या हा चाकर | पाणी द्याया तयार असे ||

१/१२७ ऐसे शब्द ऐकिले | समर्थांनी हास्य केले |

उभयतासी पाहून वदले | ते ऐका सांगतो ||

ते

१/१४६ हा श्री गजानन विजय ग्रंथ | आल्हादावो भाविकांप्रत |

हेच विनवी जोडून हात | ईश्वरासी दासगणू 

वेदांमध्ये भारतीय धर्मशास्त्राचे मुलभूत सिद्धांत असल्याने त्यांना भारतीय संस्कृतीचा प्राण असे संबोधिल्या जाते. थोडक्यात ज्ञान आणि विज्ञानाचे भांडार म्हणजे वेद !

बृहद्‌दारण्यक उपनिषदात सांगितल्याप्रमाणे चारही वेद परमेश्वराच्या श्वासापासून निर्माण झाले आहेत. वेदमंत्राचे अर्थ अधिभौतिक, अधिदैविक, आध्यत्मिक स्वरूपात केलेत. सायनाचार्यानंतर तुकोबारायांनी आपल्या अनुभूतिस्वरूप अभंगातून वेदातील महावाक्यांचे सविस्तर विवरण केले आहे. महावाक्य म्हणजे ज्या वाक्यात जीव-शिवाची, जीव-ब्रह्माची, जीव-परमेश्वराची एकता प्रतिपादन कलेली असते. या महावाक्याने “ मी ब्रह्म आहे ” असे साधकास ज्ञान होते. श्रीगुरू उपदेशातुनच हे ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान होते. ऋग्वेदाचे “ प्रज्ञानं ब्रह्म ’’ अर्थात प्रज्ञान हे ब्रह्म आहे हे महावाक्य आहे.

तुकोबाराय आपल्या अभंगात म्हणतात-

मरणा हाती सुटली काया | विचारे या निश्चये ||

नासोनिया गेली खंती | सहजस्थिती भोगाचे ||

न देखेसे झाले श्रम | आले वर्म हाता हे ||

तुका म्हणे कैंची कीव | कोठे जीव निराळा || ||१३६६||

जीवब्रह्मैक्याचा सिद्धांत आपल्या सुबोध आणि अमोघ वाणीद्वारा केवळ तुकोबारायच देऊ शकतात.

ते म्हणतात- मी देहाहुन वेगळा असा सत-चीद्‌-अद्वयस्वरूप आहे. सच्चिदानंदरूप आत्मा ब्रह्मरूप आहे, या निश्चयाने माझे शरीर मरणाचे हातून कायमचे सुटले आहे. मला आता चिंता नाही. ब्रह्मस्थिती अनुभवाला आल्याने मी तिचा उपभोग घेत आहे. आता दु:ख, कष्ट, चिंता नसल्याने श्रमाचा पूर्णपणे परिहार झाला आहे. आणि माझा जीव देवाहून वेगळा, निराळा नसल्याने देवापाशी करुणा, विनवणी करावी तरी कशी? प्रज्ञान ब्रह्म आहे या महावाक्यातील जीवब्रह्मैक्य वर्म या अभंगातून प्रगट झाले आहे.

जे वेदांनी सांगितले, तुकोबारायांनी आपल्या अभंगातून सांगितले ते अध्यात्मज्ञान शेगांवकरांना श्री गजानन महाराजांनी आपल्या साध्या जीवनप्रणालीतून प्रगट होताच काही क्षणांतच दिले. भक्त अवाक झाले आणि श्रींना बघताक्षणीच ते त्यांच्या प्रेमात पडलेत ते कायमचेच कसे ते बघा-

तप्त भूमीवर बसलेल्या श्रींना भक्त म्हणालेत, आम्ही पक्वानाचे पात्र आणि वाळा असलेले थंडगार पाणी आपणासाठी आणावे काय? त्यावर “ तुम्हाला गरज असेल तर आणा “ असे महाराज उत्तरले. पण खरे तर

“ एक ब्रह्म जगदांतरी | ओत प्रोत भरले असे ||

आम्हासी या सृष्टीत कोठेही आणि कशातही भेद दिसत नाही.

अन्न काय, पाणी काय दोहोंतही भगवंतच आहे ना? पण तुम्ही म्हणता तो जगद्व्यवहार झाला, भोजनानंतर पाणी अवश्य प्यावे चला, घेऊन या पाणी ! त्या सद्‌भक्ताचा आनंद गगनात मावेनासा झाला. मनी विचार आले - आपले भाग्य उदयाला आले म्हणूनच म्हणूनच ही सेवा घडतेय. तो थंडगार, निर्मळ, वाळा घालून सुगंधित केलेले जल लगेच घेऊन आला खरा, पण पाहतो तर हा महात्मा हौदातील जनावरांसाठी असलेले गढूळ जल स्वच्छ मनाने दोन्ही हाताच्या ओंजळीने सुखावह पितो आहे. हे बघितले आणि तो जवळ जवळ मोठ्याने ओरडलाच- ते पाणी नका पिऊ ? मी आणले ते गार पाणी प्राशन करा. श्रींनी त्याच्याकडे लक्ष न देता, तृष्णाशांती झाल्यावर त्याला सहज भावाने म्हणालेत - ह्या झाल्या तुमच्या संसारीक लोकांच्या गोष्टी, या बघा माझ्या ओंजळीतले पाणी किती गार आणि स्वच्छ आहे ते ! अरे तुम्हाला संसार तेवढा खरा दिसतो आणि परमार्थ खोटा वाटतो. पण हे संपूर्ण चराचर तर ब्रह्ममय आहे ना ? प्रत्येक वस्तुत असणारे तत्त्व हे ईशतत्त्व होय, भगवंताशिवाय कुठलीही वस्तू असूच शकत नाही. प्रत्येकात हे समान तत्त्व आहे, पण तुम्ही तुमच्या चर्मचक्षूने बघता. जी वस्तूकडे बघण्याची दृष्टी तीच जीवाकडे, मानवी प्राण्यांकडे बघण्याची - पण तोही तर भगवंताचाच अंश आहे. बघा या दृष्टीने मग तुम्हाला तो इतर वेगळ्या जातीपातीचा वाटणार नाही, त्याची भाषा, त्याचा वेश, देश, वेगळा आटणार नाही, हा माझा तो तुझा हा भाव मावळेल, तुम्ही समानदृष्टीने, समत्वभावाने त्याच्याकडे बघाल. मी गरीब, तो श्रीमंत; मी उंच, देखणा,तो बुटका, काळाकुट्ट हा आपपर भाव बदलून जाईल.

हा दगड, हे सोने, ही सुकी रोटी, ती पुरणाची पोळी हे भेद ज्याला आध्यात्मिक ज्ञान नाही त्यांच्यासाठी आहेत. ईशतत्त्व सर्वत्र आहे ते बघायला शिका, हेच ज्ञान. भगवंत सर्वच जलात आहे, सर्व स्थळी आहे, मनी आहे. सुवास, कुवास, सुंदर, कुरूप ही त्याचीच रूपे आहेत.पाणी पिणारा व पाणी हे वेगळे नसून मीच आहे. अगाध ईश्वरी लीला कळण्यासाठी साधना हवी, मगच ते प्रत्येकाला कळेल.

अरे बाबा! या विश्वातील सृष्टीची निर्मिती ज्यामुळे घडली, ते दिव्य सत्य-विज्ञान हेच अध्यात्मतत्त्व. तोच भगवंत ! साधकाने ही समर्थ वाणी ऐकली आणि भारावून जाऊन पुढे यायला लागला, श्री चरणी लोटांगण घ्यायला. हे श्रींनी पहिले अन तो त्यांच्यासमोर यायच्या आत श्री वायुवेगाने तेथून निघून गेले, क्षणार्धात दिसेनासे झाले. साधक त्या दिशेकडे अवाक होऊन पाहतच राहिला, त्याच्या कानावर शब्द आलेत “ गणी गण गणात बोते ”.

या पुढील कथा पाही | निवेदन होईल द्वितीयाध्यायी |

अवधान ध्यावे लवलाही | त्या श्रवण करावया ||१/१४५|| हा श्री गजानन विजय ग्रंथ |

आल्हादावो भाविकांप्रत |हेच विनवी जोडून हात | ईश्वरासी दासगणू || १/१४६ ||

|| श्रीहरिहरार्पणमस्तु || शुभं भवतु ||

***|| इति श्री गजानन विजय ग्रंथस्य प्रथमोध्याय: समाप्त ||*** 

II श्री गजानन महाराजार्पणमस्तु II

सौजन्य : श्री गजानन आचार्यपीठ


Mar 12, 2020

श्री गजानन विजय दैनंदिन ओवी स्वाध्याय चिंतन अध्याय - १ ( ओवी ८३ ते १०७ )


II श्री गणेशाय नमः II

१/८३ शेगावी माघमासी | वद्य सप्तमी ज्या दिवशी |

हा उदय पावला ज्ञानराशी | पदनताते तारावया ||

ते

१/९२ मूर्ती अवघी दिगम्बर | भाव मावळला आपपर |

आवड निवड साचार | राहिली न जवळी जयाच्या ||

शेगांवचे साधे भोळे, प्रामाणिक भक्त महाराजांना शरण गेलेत, पूर्ण विश्वास ठेऊन त्यांच्यावर. ईश्वर जाणण्यासाठी, ईश-तत्व, सत्य-तत्व समजण्यासाठी आत्मभाव जागृत व्हावा लागतो, तो संतसेवेत व सत्संगातून होतो. अन्यथा घडत राहते, केवळ भक्तीचे नाटक. पण शेगावंचे भक्त म्हणतात, गजानना ! आपण कितीही लपविले, झाकून ठेवले तरी आपली कृपाच आमच्यावर आता अनुग्रह करू शकेल. आपण ज्ञानी आहात, आमच्या कळवळयानेच आपण भारतातल्या शेगाव या मध्यवर्ती स्थळी अवतार घेतला. आपल्या मूळ रुपात कुणी ओळखू नये म्हणूनच तर आपण असे रूप धारण केले असावे.

देविदास पातुरकर हा एक मठाधिपती होता. त्याच्या मुलाची ऋतुशांती होती. त्यानिमित्ताने घरात मंडळी भोजन करीत होती. पंक्ती उठत होत्या आणि घरासमोरच त्या विप्राने उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या होत्या. समर्थ सिद्धयोगी श्री गजानन महाराजांनी जाणीवपूर्वक हेच स्थान बसण्यासाठी निवडले.

निर्गुणातील भगवंत सगुण रूपाने मानवी अवतार तेंव्हा घेतो, जेंव्हा समाज दिशाहीन झाला असेल, त्याला कुणी वाली राहिला नसेल. सज्जनाचे जीवन जगणे कठीण झाले असेल, सर्व बाजूनी ते नाडल्या जात असतील, दुष्ट भावना समाजात बलिष्ठ झाल्या असतील, समाजाला नीती मुल्यांची चाड राहिली नसेल, धर्म पालन व नीती पालन होत नसेल, सद्-भाव लोप पावला असेल, सर्व सामान्य जनता सर्व बाजूने नाडल्या जात असेल तर, सज्जनांच्या रक्षणासाठी, धर्माचे पालन करण्यासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, व भक्तांना दर्शन देण्यासाठी भगवंत अवतार घेतो कुठल्याही रूपाने आणि शेगांवला असेच घडले यात शंका नाही. अवलिया रूपाने दलीत, पददलित सदभक्तांचा तारणकर्ता बनून २३ फेब्रुवारी १८७८ रोजी म्हणजेच माघ वद्य सप्तमीला शके अठराशे मध्ये ऐन दुपारच्या समयाला अंगात साधी जुनी पुराणी बंडी परिधान करून कोणतीही उपाधी, नाव न स्वीकारता एका हातात पाणी प्यायला म्हणून भोपळा व दुसऱ्या हातात कच्ची चिलीम घेऊन दिगंबर अवस्थेत रस्त्याच्या कडेला उष्ट्या पत्रावळीच्या ढिगाऱ्याशेजारी निर्विकार अवस्थेत पण शांत मुद्रा व नासाग्र दृष्टी ठेऊन सर्व वस्तू बद्दल समभाव राखून तू-मी भाव सोडून उन्हातान्हाची तमा न बाळगता निवांत बसले होते. रस्त्यावरून जाणाऱ्या एकालाही या वेडगळ दिसणाऱ्या, भिकारी वाटणाऱ्या माणसाकडे लक्ष द्यावे असे वाटले नाही. साधू संतांच्या वर्तणुकीत जो आशय असेल, तो सामान्यांना कळतोच असे होत नाही. आपल्या मूळ रुपात कुणी ओळखू नये म्हणूनच तर त्यांनी असे रूप धारण केले असावे. सर्वांना सदा आनंदित करण्यासाठी या रूपाने अवतीर्ण झाले होते महाराज. अति बुद्धिवान, ज्ञानी जनांच्या हे लक्षात येणार नाही कारण सहजासहजी ते कुणावर विश्वास ठेवीत नाहीत कारण त्यांचा असा एक अहं असतो ना ! त्यासाठी श्रद्धावान भक्ताची गरज असते.

पण ज्यांचा उद्धार होण्याची वेळ आली की ते अशा अवतारी महामानवाकडे सात्विक भावाने ओढल्या जातात. पण त्यासाठी परमभाग्य गाठीशी घेऊन जन्माला यावे लागते तेंव्हा हे नशिबाने घडते.

खर तर संतचरण सापडणे कठीण, नशिबाने सापडले तर ते समजणे महाकठीण. एकतर संताचे दर्शनच लवकर होत नाही, झाले तर सत्संग-सहवास लाभत नाही, सहवास लाभला तरी आशीर्वाद लाभेलच असे नाही, आणि आशीर्वादही लाभला तरी सद्गुरूची कृपा होईलच असे नाही. केवळ भाग्यवंत पुण्यात्म्यांनाच संतचरण सेवा लाभून ईश्वर दर्शन होत असते. असे सद्भक्त केवळ साधूचे बाह्य शरीर वा कृती बघत नाहीत तर त्यांचा प्रेमळ, सात्विक भाव आणि अंतकरणीचे ईशतत्व त्यांना जाणवते. मग तो कोण आहे, कोणत्या जातीचा आहे, कोठून आला आहे, त्याचे नाव काय आहे या फंदात पडत नाहीत. कारण साधूच्या कृपेने व आशीर्वादाने ते वेगळ्याच भाव विश्वात असतात. त्यांना समोर दिसतो तो महात्मा त्यांना ब्रह्म वाटतो.


१/९३ शीत पडल्या दृष्टीप्रत | ते मिखी उचलुनी घालीत |

हे करण्याचा हाच हेत | “ अन्नपरब्रह्म ” कळवावया ||

ते

१/१०७ हिरे गारा एक्यां ठायी | मिसळल्या असती जगाठायी |

पारखी तो निवडून घेई | गार टाकून हिऱ्याते ||

नीज आनंदात सदैव रममाण असणारे श्री, भुकेल्या वेड्या मनुष्याने वागावे तसे रस्त्यावर पडलेल्या उष्ट्या पात्रावरील एखादे अन्नाचे शीत दिसले की ते त्वरेने मुखात घालत होते. रस्त्यावरून जाणाऱ्या एकालाही या वेडगळ दिसणाऱ्या, भिकारी वाटणाऱ्या माणसाकडे लक्ष द्यावे असे वाटले नाही. साधू संतांच्या वर्तणुकीत जो आशय असेल तो सामान्यांना कळतोच असे होत नाही. “ अन्न हे परब्रह्म ” आहे हे लोकांना कळावे म्हणून प्रवचन करणारे श्री नव्हते त्यांना तर स्व-आचरणातून लोकांना ते समजावे, उमजावे म्हणून श्री शेगांवात येताच पहिली लीला केली असेल तर ती ही आहे. कारण मानवी जीवनात केवळ पोट भरण्यासाठी मानवाला अन्न लागत नाही तर आध्यात्मिक उन्नतीसाठी ते लागते हा संदेश द्यायचा होता. श्रुतींनी मोठ्याने गर्जना करून हे लोकांच्या मनावर बिम्बविण्याचा प्रयत्न केला पण जनतेने त्याकडे दुर्लक्ष केले. ‘अन्नम् ब्रह्मेति’ ही उक्ती तैत्तिरीयोपनिषदात ३-२-१ मध्ये आलेली आहे. त्यात अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोशाचे सविस्तर वर्णन आले आहे. त्यातूनच हृदयस्थ परमेश्वराला ओळखण्याचे ज्ञान प्राप्त होते. लौकिक आनंदाच्या स्तरावरून उत्तरोत्तर ब्रह्मानंद म्हणजे काय याचा स्वानुभव तर मिळतोच पण अन्नमय कोश माध्यमातून परमात्मा व त्याचे आंनंद स्वरूप स्थितीचे दर्शन होते. त्यासाठी तप सांगितले आहे ते सत्य आचरण, सत्यवाणी, अध्यात्मशास्त्राचे अध्ययन, इंद्रियावर नियंत्रण, मनाचा निग्रह इत्यादी. याची सर्वसामान्यांना जाण राहिली नव्हती, त्याचा विसर पडला होता, अन्न हे केवळ जिभेचे चोचले पुरविण्यासाठी नाही, फक्त पोट भरण्यासाठी नाही तर या अध्यात्म तत्वाचा भावार्थ कळवा हा खरा हेतू होता शीत उचलून खाण्याचा. बर फक्त पोटासाठी अन्न म्हटले तरी विदर्भात दोन वेळेचे अन्न न मिळाल्याने उपाशी झोपणारे गरीब जन होते. आजही विश्वात अनेक लोक अन्न न मिळाल्याने उपाशीपोटी झोपतात. त्याचवेळी अनेक लोक अन्नाची नासाडी करतात. हे योग्य नाही, हा सामाजिक दृष्टीकोन महाराजांना या कृतीतून समाजापुढे आणायचा असेल. त्यांचा विचार व्हावा म्हणून अन्न ताटात उष्टे टाकू नका, हाही संदेश आपल्या आचरणातून जनतेला द्यायचा होता. पण हे कळणारे लोक फार कमी. श्रींनी हे आचरणात आणावे ते प्रथम साधूने व साधूचे साधुपण जनतेला कळावे हाही उद्देश होता. पोटभऱ्या साधू नव्हते श्री. पण नशिबाने भक्ताचा उदयकाळ आला की त्याला साधू गवसतात. शेगाव नगरीत एक सद्भक्त असाच असावा. त्याचे नाव होते बंकटलाल व त्याच्या सोबत असलेल्या मित्राचे नाव दामोदर. योगायोगाने त्याचवेळी हे रस्त्याने जाताना त्यांनी हे दृश्य बघून न बघितल्यासारखे केले. परत नजर गेली बंकटलालची साधूवर, जरा सजग होऊन निरखून बघितले तर तो दिगंबर अवस्थेतील तरुण विलक्षण वाटला. विदेही व तेज:पुंज मुर्ती समोर दिसताच त्याचा आत्मभाव जागृत झाला. हा साधा भिक्षेकरी वा भुकेला भिकारी नाही, कारण याची भूक केवळ अन्न असती तर त्याने घरात अन्न मागितले असते. पण हा तर एक एक कण निट वेचून मिटक्या मारत खातो अगदी “ अन्नम् ब्रह्मेति ’’ भावाने. याचे बाह्य वागणे व कृती आणि अंत:र्मनाचा भाव व चेहऱ्यावरील तेज याचा काही मेळ लागत नाही. त्यांची लक्षणे पाहून हा थोर योगीपुरुष असावा असा त्या सद्भक्ताच्या मनाने ठाव घेतला. रत्न पारखायला रत्नपारखीच हवा. श्रुतीमधील तत्त्वज्ञान लोकांना केवळ सांगून कळत नाही. अनेक पंडित,कथा कीर्तनकार आपल्या कथा कीर्तनातून “ अन्न परब्रह्म ’’ यावर भाष्यही करतात. उपनिषद ही केवळ कोरड्या ज्ञानार्जनासाठी नसतात तर माणुसकीचा ओलावा आपल्या वर्तनात यावा याही दृष्टीने या थोर संत व योगी पुरुषाने अशा कृतीचे अवलंबन केले असावे, अशी जाणीव बंकटलाल यांना झाली असावी. बंकटलाल दामोदरपंतांना हळूच म्हणाला, आपण थोडावेळ येथेच थांबून या पुरुषाचे निरीक्षण करू या. पुढील कृतीवरून थोडा अंदाज बांधता येईल. खरे साधू जगात पिशा म्हणजे वेड्यासारखे वागतात, असे भागवतात महर्षीं व्यास पण सांगून गेले आहेत. कृती तर वेड्या माणसाप्रमाणे आहे पण दिसतो तर तेज:पुंज, ज्ञानी. ह्यामागचे इंगित काय आहे हे आपण येथूनच न्याहाळू. रत्न समजावे लागते आणि त्यासाठी गरज असते रत्नपारख्याचीच. त्याचे मोल नाही कळले तर एखादा अज्ञ त्याला काचेचा मणी समजून आपल्या म्हशीच्या गळ्यात बांधायचा. आता पर्यंत अनेक लोक या रस्त्यावरून हे दृश्य पाहून तसेच पुढे निघून गेलेत. पण त्यांच्या जवळ जिज्ञासू दृष्टी नव्हती. कारण अध्यात्म ज्ञान त्यांचे कमी पडले. बंकटलाल कथा ऐकून तयार झाला होता, त्यामुळे इतरांपेक्षा वेगळा विचार तो करू शकला.

II श्री गजानन महाराजार्पणमस्तु II

सौजन्य : श्री गजानन आचार्यपीठ


Mar 11, 2020

सर्वसौख्यकरं स्तोत्रम्


II श्री गणेशाय नमः II 

यस्य नाम श्रुतेः सद्यो मृत्युर्दूरात्पलायते ।

दुःखवार्ता विलीयेत दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥१॥

शोको नंदाय कल्पेत दैन्यं दारिद्रयहेतये ।

रोगःस्वंगाप्‍तये सम्यग् दिगंबर नमोऽस्तुते ॥२॥

परयंत्रादिकं किञ्चित् प्रभवेन्नैव सूरिषु ।

कर्ता कृतेन बध्येत अवधूत नमोऽस्तु ते ॥३॥

कायिकं वाचिकं वाऽपि मानसं वा तथैव च ।

पापं तापं च दह्येत कालकाल नमोऽस्तुते ॥४॥

विषबाधा भवेन्नैव भूतादिविप्लवः कुतः ।

शत्रवो मित्रतामीयुवैद्यराज नमोऽस्तुते ॥५॥

दुर्बुद्धिः साधुतामेति शठः शाठयं जहात्मरम् ।

पीत्वा यंन्नामपीयूषं सिद्धराज नमोऽस्तुते ॥६॥

भयं दिंक्षु प्रधावेत चिंत्तां चुल्लिमियात् द्रुतम् ।

वैषम्यं विपिनं गच्छेद् योगिराज नमोऽस्तुते ॥७॥

दुःस्वप्नदुखदावाग्निं ग्रहार्निघ्नं ह्यनुत्तमम् ।

संसारमेषजं सौम्यं मृत्युंजय नमामि तम् ॥८॥

रोगाभिसंकुले देहे निःसारे भेषजे सति ।

औषधं नार्मदं वारि दत्तो धन्वंतरिः स्वयम् ॥९॥

भेषजं निष्कलं विद्धि दत्तमेकं विहाय यत् ।

जन्ममृत्युजराहंतृ दत्तनामामृतं महत् ॥१०॥

य इदं पठति स्तोत्रं ’रंग’ रोगार्तिनाशनम् ।

सर्वसौख्यकरं नृणां सायंकाले विशेषतः ॥११॥

त्रिसप्‍तं स्वापकाले वा मंदवारे सुसंयतः ।

तस्य रोगभयं नास्ति त्रिःसत्यं नात्र संशयः ॥१२॥


श्री गजानन विजय दैनंदिन ओवी स्वाध्याय चिंतन अध्याय - १ ( ओवी ६९ ते ८२ )


।। श्री गणेशाय नमः ।।

१/६९ खऱ्या संताचे धोरण | न कळे कोणा लागोन |

महापुरुष गजानन | आधुनिक संतचूडामणी ||

१/७० या महापुरुषाचा | ठावठिकाण कोणचा |

व पत्ता त्यांच्या जातीचा | इतिहासदृष्टया न लागे की ||

१/७१ जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाणा | न कळे कोणा लागून ||

ते ब्रह्मास पाहून | निश्चय त्याचा करणे असे ||

खऱ्या संताचे धोरण कळत नाही याचा अर्थ काय? आणि महापुरुष गजानन हे तर आधुनिक संत चूडामणी. याचा अर्थ संतचरित्र वाचत असताना त्यातील संताचे गूढ काय असेल हे कळल्याशिवाय संत कळणार नाही. तसेच “ ब्रह्माचा ठाव ठिकाणा | न कळे कोणा लागून ”, आणि ब्रह्माला पाहून मग त्याचे ठाव ठिकाण हे निश्चित करावे लागेल. हे सगळे अगम्य ! त्यातील अध्यात्मिक अर्थ अजूनही मला कळला नाही हे सत्य आहे. पण विचारांती मला अस वाटलं की समाजातील सर्व सामान्य माणूस आणि संत यांच्या दृष्टीकोनात, वागणुकीत, विचारसरणीत जी दिव्यत्वाची आध्यत्मिक तफावत दिसते त्यात तर हे उत्तर दडल नसेल ना? एक दिवस ज्ञानेश्वरी वाचत असताना जाणीव झाली की संत थोर का ? तर समाजात एखाद्याच्या हातून चुकून दुराचरण घडले, पण लगेच त्याला पश्चात्ताप झाला आणि तो परमेश्वराच्या भजनी लागला तर संत त्याला पतित जीवनाचे सार्थक कसे करावे याचे धडे गिरवून जवळ घेईल की दुराचारी म्हणून दूर लोटेल ? खऱ्या संताचा कस येथेच लागेल.

जन्म कोणत्या जातीत,कोणत्या स्तरात, कोणत्या वर्णात, कोठे घ्यायचा ? हे ठरविण्याचा अधिकार जन्म घेणाऱ्याला नाही हे खरे पण, सर्व मानवांना ज्ञान मिळविण्याचा समान न्याय असायला हवा, पण तसे होत नाही. प्रत्येकाला ज्ञानप्राप्तीतून जीवनाचे सार्थक करण्याचा पूर्ण अधिकार आहे. इतिहासात तोही नाकरण्यात आला. तेथे वेद काही करू शकले नाहीत. स्त्रिया, वैश्य, शुद्र यांना ज्ञानापासून वंचित ठेवल्या गेले.

हे श्रीकृष्णाला मान्य नसावे, म्हणून त्यांनी गीतेमध्ये नवव्या अध्यायात ती चूक सुधारली. जन्म हातात नाही पण कर्म बाकी आपल्या हातात आहे असे सांगून जन्मवंचित आणि कर्मवंचितांना दिलासा दिला. त्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतोपदेशाचे प्रयोजन केले, ते ज्ञानेश्वरीत दृष्टांताच्या माध्यमातून. जसे - गावातील अनेक ओहोळ नदीला जाऊन मिळाले की त्यांचे क्षुद्रत्व संपून नदी म्हणून तिची ओळख होते, तीच नदी पुढे समुद्राला मिळाली की तिला मग कुणी नदी नाही म्हणत तर ती समुद्र बनते. तसेच काष्ठ अग्नीत टाकी पर्यंतच त्याला काष्ठ म्हणायचे, एकदा अग्नीत टाकले की अग्नी म्हणतो, काष्ठ नव्हे. तोच निर्णय मानवी जीवनासाठी गीतेने मान्य मानला. कोणत्याही वर्णात, जातीत, वा वर्गात जन्म झाला तरी ईश्वराचे वळण लागले की त्याचे पूर्व संदर्भ पूर्णत: गळून पडतात आणि तो ईश्वराचा लाडका बनतो, ज्याला तुम्ही मी साधू म्हणून संबोधतो.

वाल्या पूर्वी दरोडेखोर होता, संत संग लाभला आणि रामनाम जपता जपता विश्व वंदनीय महाकवी वाल्मिकी म्हणून स्थिरावला. ज्ञानदेवांनी विराट जनसमुदायाच्या समोर गीतोपदेशाच्या प्रयोजनातून माणसाला आत्मोद्धारासाठी जन्म किंवा कर्म यापैकी कोणतेच कर्म अडथळे आणू शकत नाहीत स्पष्ट केले.

या महापुरुषाचा- श्री गजाननाचा- ठावठिकाण कोणता, जात कोणती, त्यांचा पत्ता काय हे इतिहासदृष्टया तपासून वा तर्क लाऊन आपण मुक्ती पासून दूर तर जात नाही ना याचा विचार करा. कारण ब्रह्माचा ठाव ठिकाणा कोणाला लागला आहे? याचा विचार करा. परमेश्वर नामाने “ अहं ब्रह्मास्मी ” म्हणणाऱ्या मुक्त आत्म्याच्या दर्शनाने त्याचा निर्णय आप आपल्या ज्ञान कुवती प्रमाणे घ्या. त्यातच आधात्मिक कल्याण आहे

“ ते ब्रह्मास पाहून | निश्चय त्याचा करणे असे || ” म्हणून आरती म्हणतो

‘ झाले समाधान | तुमचे देखिले चरण |

आता उठावेसे मना | येत नाही नारायणा |’

आणि श्री गजानन महाराजही शांतपणे “तथास्तु’ म्हणून आशीर्वाद देतात आपल्या मंगलमय जीवनासाठी.

१/७२ जो का हिरा तेजमान | पूर्णपणे असे जाण |

तेज त्यांचे पाहोन | ज्ञाते तल्लीन होती की ||

१/७३ तेथे त्या हिऱ्याची | खाण आहे कोणची |

हे विचारी आणण्याची | गरज मुळी राहत नसे ||

१/७४ ऐन तारुण्याभीतरी | गजानन आले शेगाव नगरी |

शके अठराशेभितरी | माघ वद्य सप्तमीला ||

जो हिरा पूर्ण तेजस्वी आहे, त्याच्याकडे बघितले की जे रत्नपारखी असतात, ते पटकन त्याचे मोल ओळखतात. खरा हिरा पाहताच रत्नपारखी तो हातात घेतो, त्या हिऱ्याला न्याहाळतो आणि समाधानी होतो. तो हा विचार करीत नाही की हिरा कोणत्या खाणीत मिळाला असेन, कुणाला मिळाला,कसा मिळाला वगैरे वगैरे. अशावेळी ते फार चौकस होत नाहीत कारण मनोमन त्याचे महत्व व गुण पटलेले असतात. असे अवतारी व्यक्तिमत्व प्रथमत: शेगावच्या रस्तात बसलेले ज्यांनी पाहिले, त्या सर्वांनाच त्यांचे महत्व कळले असेन असे नव्हे. पण जे ज्ञानी होते, ते प्रथम त्याचे मोल ओळखून, भाव ठेऊन समर्पित झालेत. त्यांना त्याचे महत्व, मोल कळले. असे महानुभवी इतर चौकशा करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. जसे आपण कोण, कोठले, आपले नाव,गाव कोणते? असे एक दोनच मोजके सज्जन त्यांना पाहून तेथेच थबकले. अंत:र्मनाने त्यांनी जाणले हे काही सर्वसामान्य पुरुष नव्हेत. त्यांच्या मनीचा भाव दाटून आला. मोठ्या सदभाग्याने व नशिबाने एखाद्यालाच हे ज्ञान असते. संतकवी म्हणतात ‘ तेज त्यांचे पाहोन | ज्ञाते तल्लीन होती की || ’ त्या हिऱ्याची खाण कोणची आहे ? हे विचारी आणण्याची मुळी गरजच उरत नाही. तसेच आज म्हणजे शनिवारी दुपारी बारा वाजता शेगावात घडले. कारण त्यांच्यासमोर प्रत्यक्ष परब्रह्म बसलेले त्यानी पाहिले व मनाने अनुभवले. श्री गजानन महाराज ऐन तारुण्यात माघ वद्य ७ ला शके १८०० म्हणजेच शनिवार दिनांक २३/०२/१८७८ रोजी येथे अवतीर्ण झालेत. महाराज हे देह नव्हतेच तर ते देही होते. त्यांच्याकडे बघीतले की हे तर प्रत्यक्ष चैतन्य आहे हे जाणवायचे. त्यांचा देह हीच त्या चैतन्याची शोभा होती महाराज. ते अयोनी जगाच्या कल्याणासाठी अवतारीत झाले होते. ते सामान्य व्यक्तिमत्व नव्हते, महान योगी होते हे जाणायला, कळायला आणि त्याचे दर्शन व्हायला महाभाग्य उदयाला यावे लागते. धर्म हा ज्याचा त्याने आचारायचा असतो कारण धर्म हा अनुभूतीचा, अनुभवाचा व अध्यात्मिक ज्ञानाचा विषय आहे. अध्यात्म हे विज्ञान आहे. त्यासाठी सुसज्ज प्रयोग शाळा लागते. ती प्रयोग शाळा म्हणजे प्रत्येकाचे मन होय. ते निर्मल, स्वच्छ व रिते असावे लागते म्हणजे भगवंत तेथे येऊन बसतो. येथे बोलण्यापेक्षा कृती फार मोलाची ठरते.या अवतारी कार्यात श्री गजाननमहाराज काहीच बोलत नाहीत तर आपले जीवनमूल्ये ते जनी, मनी रुजवतात,ते आपल्या प्रत्यक्ष वागणुकीतून. म्हणून संत चरित्राचे चिंतन करायचे एवढेच.

१/७५ कोणी कोणी म्हणती जन | श्रीसमर्थाचे जे का स्थान |

ते त्या सज्जनगडाहून | या देशी आले हे ||

१/८२ हे त्यांच्या लीलेवरून | पुढे कळेल तुम्हालागून |

योगाचे अगाध महिमान | त्याची सरी न ये कोणा ||

राजकीय, सामाजिक, आर्थिक अभ्यासातून हे जाणवते की १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात विदर्भाची स्थिती तशी हलाखीचीच होती. १८०३ ते १८५३ पर्यंत निजामाची कारकीर्द होती. पुढे १८५३ च्या तहानुसार वऱ्हाड इंग्रजांच्या ताब्यात आला. १८६७ साली बुलढाणा हे थंड हवेचे ठिकाण असल्याने जिल्ह्याची जागा निश्चित झाली. १८७० साली खामगाव हा नवीन तालुका निर्माण करण्यात आला. इ.स. १८५९ साली इंग्रजांनी शेगावचा कारभार पाहण्यासाठी १७ स्थानिक पाटलांची नियुक्ती केली. नापुर विभागाकडून १८६३-६४ साली ग्रेट इंडीया पेनिनसुला रेल्वे शेगाववरून धावू लागली. शेगावला पहिली कापूस गिरणी ही १८६८ मध्ये सुरु झाली. १८६७ पर्यंत शेगाव एक सामान्य खेडेगाव होते. शेगावचा पाणी पुरवठा फार अपुरा होता. १८८७ साली शेगाव नगर परिषदेची स्थापना झाली.१८९० मध्ये शेगावला डाकबंगला बांधल्या गेला. १८ जून १८५८ रोजी ब्रिटीश इस्ट इंडिया कम्पनीने संपूर्ण राज्य विक्टोरिया राणीच्या नावे करून दिले. व्हाईसरॉय व भारताचे गव्हर्नर जनरल राणीच्या नावे राज्य चालवीत होते. इ.स. १९०२ पासून निजाम व इंग्रज यांच्या करारानुसार संपूर्ण विदर्भावर इंग्रजी सत्ता कायम झाली. भारतात ब्रिटीशांची राजवट आल्यापासून सर्वत्र अस्थिरता निर्माण झाली. त्यांची दडपशाही अन्याय व अत्याचाराने भरलेली होती.स्वातंत्र्यसैनिकांना त्रास होताच त्याची झळ सर्वसामान्य माणसालाही लागल्याशिवाय राहत नसे. महात्मा गांधी १९०७ ते १९१४ पर्यंत द.आफ्रिकेत सत्याग्रह करीत होते. नाना यातना सहन करीत लोक जीवन जगत होते. भ्रष्ट लोकांना योग्य मार्ग दाखवावा, त्यांच्या जीवनाला काही आशय द्यावा या उद्देशाने श्रींनी अवतार घेतला होता. जगाचा उद्धार करण्यासाठीच श्री समर्थ सिद्धयोगी श्री गजानन महाराज या भूतलावर दि. २३ फेब्रु. १८७८ ला शेगावी या ऋषीमुनींच्या वास्तव्याने पावन झालेल्या शेगावात अवतीर्ण झाले होते. श्री गजानन महाराज, श्री नरसिंगजी महाराज, साईबाबा व श्रीवासुदेवानंद सरस्वती यांच्या बंधू समजून गाठीभेठी झाल्या आहेत हे बाकी खरे. श्री गजानन महाराज हे पूर्ण अवतारी होते, त्यामुळेच त्यांना बापुना काळेला श्री विठ्ठलरूपात दर्शन देता आले. काही लोक अस म्हणतात की श्री गजानन महाराज म्हणजेच श्रीस्वामी समर्थ रामदास होत जे सज्जनगडावरून विदर्भातील शेगाव नगरी अवतीर्ण झालेत जनकल्याणार्थ. याला सबळ पुरावा असा नाही. पण संतकवी श्री दासगणू हे स्वत: रामदासी होते त्यामुळे त्यांना सर्वत्र श्रीरामस्वरूप दृग्गोचर होणे स्वाभाविकच आहे. श्री स्वामी प्रमाणेच गजानन महाराजांचे हात गुढग्यापर्यंत टेकत, ते आजानुबाहू होते. श्रींची उंचीही साडेसहाफुटापेक्षा कमी नव्हती. निमगोरा रंग , सुदृढ व बांधा सडसडीत होता. तसेच श्री गजानन महाराज परमहंस सन्यासी होते. त्यामुळे काही जनांना ते श्री स्वामी समर्थ वाटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असो.

असाही एक समज आहे की श्री गजानन महाराज तेलंगी ब्राह्मण आहेत. पण तो खरा नाही. वासुदेवानंद सरस्वती तेलंगी ब्राह्मण होते. लोक श्रींना गणपतीचा अवतार मानत, कारण महाराज सदैव गण गण गणात बोते असे म्हणत. त्यामुळे त्यांना गीणगिणे बुवा, गणपत बुवा वा अवलीयाबाबा असेही म्हणत. पण महाराजाना जप करताना किंवा हातात माळ घेऊन बसलेले कुणी कधी पाहिल्याचे ऐकिवात नाही.

कारंज्याचे बाळशास्त्री एक विद्वत्तेने संपन्न व्यक्तिमत्व होते. त्यांना अध्यात्म व संतसत्संगाची आवड होती. शंकराविषयी अपार भक्ती असल्याने ते सतत त्र्यम्बकेश्वर येथे जात. पंचवटीतील गोदावरीकाठी काही पुराणिक, पंडित, शास्त्री, आणि विद्वान यांची शंकर आणि विष्णु यांच्या श्रेष्ठतर, योग्यतेवर चर्चा सुरु होती. काही शंकराला तर काही विष्णूला श्रेष्ठ मानणारे होते तर काही समसमान आहेत असे मानणारे होते. बाळशास्त्रीही या सभेत सहभागी झाले होते. ही चर्चां ऐकण्यासाठी म्हणा वा योगा योगाने म्हणा एक दिगंबर सत्पुरुष जवळच एका झाडाखाली येऊन बसला. त्याच्या हृदयात शिवभक्ती उफाळाला आली होती. बाळाशास्त्रीस त्या सत्पुरुषाच्या रूपाने साक्षात शिव शंकराचे दर्शन झाले. ते सत्पुरुष म्हणजेच श्री गजानन महाराज होते. पुढे शनिवारी दि १८-१२-१८८५ मध्ये मी कारंज्याला येईल, असे श्रींनी कबुल केले होते. बाळशास्त्री सकाळ पासून श्रींच्या शोधात होते. एका सद्-गृहस्थाने त्यांना सांगितले, ऋषीतलावावर एक दिगंबर व्यक्ती सकाळपासून दिसत आहे. बाळशास्त्री तिकडे गेलेत व श्रींना गाठले. श्रींना शरण जाऊन श्रद्धेने त्यांना घरी घेऊन गेलेत. मागणे मागितले “ सद्गुरुनाथ माझा उद्धार करा, माझे अपराध पोटात घाला, या प्रपंचाने श्रमून गेलो आहे, आपण मला यातून वर काढा.” श्रींनी त्यांचे डोक्यावर हात ठेऊन त्यांना बोध दिला. महाराजांचा ज्याला स्पर्श झाला त्याच्या सारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. अशा व्यक्तीला भाव झाला की महाराज शिवाचे अवतार आहेत. महाराज हे जीवन्मुक्त, विदेही, प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप होते. असे गजानन महाराज ज्याचा जसा भाव तसे दर्शन देत, मध्येच गुप्त होत. तर एकाच वेळी दोन गावात वेगवेगळ्या व्यक्तींना भेटत, कारण श्री सिद्धयोगी होते. असे अवतारी गजानन जगाचा उद्धार करण्यासाठी या भूतलावर अवतीर्ण झालेत एवढेच सत्य. योगी श्री गजानन महाराज कोणत्याही रुपात आपल्या योगसामर्थ्याने शिरकाव करून भक्तांना दर्शन देत असत. असेच कृत्य या भूमीवर जगद्गुरुनी केले आहे. संतकवी सांगतात, गोरख हा उकिरड्यात जन्मला, तर कानिफा गजकर्णात. चांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रगट झाले होते. तसेच काही कृत्ये श्री गजानन महाराजांनी या अवतारात केलीत. कारण योगसामर्थ्याने हे सर्व करण्याची शक्ती व सामर्थ्य त्यांचे जवळ होते. श्री गजानन महाराज महान योगी होते,योगसम्राट होते. योग्याची लीला कुणालाही लक्षात येत नाही. योगमहीमा अगाध आहे. त्याची बरोबरी विश्वात कुणालाही करता येणार नाही, हे पुढील श्री कथाभागातून लक्षात येईलच.

II श्री गजानन महाराजार्पणमस्तु II

सौजन्य : श्री गजानन आचार्यपीठ


Mar 5, 2020

श्री गजानन विजय दैनंदिन ओवी स्वाध्याय चिंतन अध्याय - १ ( ओवी ६३ ते ६८ )


।। श्री गणेशाय नमः ।।


१/६३ गजानन चरित्र मेघ थोर | तुम्ही श्रोते अवघे मोर |


चरित्ररूपी वर्षता नीर | नाचाल वाटे नि:संशय ||

श्रोत्यांना मोर आणि या संत चरित्राला थोर मेघाची उपमा देऊन दासगणू महाराज आपले वाङ्मयीन सामर्थ्यच व्यक्त करतात या ओवीत. आकाशात जसजसे मेघ गोळा व्हायला लागतात आणि पाऊस पडायला सुरवात झाली रे झाली की मेघ बेभान होतो त्याला काय करू आणि काय नको हे काहीही कळत नाही आणि बेधुंद, बेभान होऊन तो नाचून जसा आपला दिव्यानंद व्यक्त करतो स्वत:ला विसरून तसेच काहीसे हे संत चरित्र वाचायला सुरवात केल्यानंतर श्री भक्तांचे होईल असे दासगणू यांचे मन त्यांना सांगत असावे.

आपण मन मोकळ करून, रिते करून एकाग्र चित्ताने प्रभूच नाव घेतो, हृदयात भगवंताला साठवून जेंव्हा नामस्मरण घडत तेंव्हा बाहेरच्या जगाचा आणि आपला संबद्ध तुटतो. अशावेळी आपण आपल्या शरीराचे नसतो, शरीर आणि मन वेग वेगळे होतात आणि मन दूरवर चिंतन करीत भटकत असतं आसमंतात आणि शरीर निश्चेष्ट पडून असत भूतलावर.

असच घडतं अध्यात्मात प्रभूचे चिंतन करताना, प्रभू नामाची ही किमया आहे. माणूस बेभान होतो, बेधुंद होतो, शरीराचेही त्याला भान राहत नाही कारण आता तो मश्गुल झालेला असतो, तल्लीन झालेला असतो आत्मानंदात. असाच अनुभव पंढरीच्या वारीत वारकरी भक्तांना येतो भर रस्तात पांडुरंगाचे नाव घेऊन नाचत असताना आपल्या माऊली बरोबर.

पारायण म्हणजे भगवंत चिंतनात तल्लीन होणे, शरीर भाव विसरणे, तल्लीन होऊन एकचित्त होउन आत्मानंदात रममाण झाले की मीपणाचा भाव जाऊन आत्मभाव आपोआप प्रगट होतो. आत्म्याचा संयोग परमात्म्याशी होऊन “ अहं ब्रह्मास्मि ” भाव जागृत होतो. मोराप्रमाणे तोही आपल्या मनाचा पिसारा उघडतो त्या ब्रह्मभावात. मीच तर तो परमेश्वर आहे या सृष्टीचा निर्माणकर्ता. अशा अवस्थेत संकुचित भाव रहात नाही, तो व्यापक होतो आकाशाएवढा.

या ओवीचे चिंतन करताना प्रकर्षाने हेही जाणवले की दासगणू महाराजांना आपल्या लिखाण सामर्थ्यावर पूर्ण आत्मविश्वास आहे, कारण श्री संत चरित्र ते लिहित नसतात तर पांडुरंग त्यांच्या हृदयात बसून त्यांना जशी प्रेरणा देतो तसे ते आपल्या लेखणीने लिहितात. या सुमधुर, साध्या सोप्या भाषेत गेयतापूर्ण असलेले चरित्र वाचता वाचता भक्त स्वत:ला विसरतो आणि केंव्हा गजाननमय होतो हे त्याचे त्यालाही कळत नाही. हे सामर्थ्य श्री कृपेने दासगणूना लाभले यामुळेच त्यांनी पारायणकर्त्याला आश्वस्त करण्याचे धारिष्ट्य केले असावे. दासगणू हे ओळखून होते की एकदा पारायणाला सुरुवात झाली की भक्ताची द्विधा मनस्थिती लोप पावून पुढे तो सर्व विसरून पूर्णत्वाने तन्मय होईल तो फक्त प्रभूचिंतनात.

१/६४ शेगावंचे पौरवासी | परम भाग्याचे निश्चयेसी |

म्हणून लाधले तयासी | गजानन हे संतरत्न ||

१/६५ जेंव्हा करावे लागे पुण्य | तेंव्हाच लाभती संतचरण |

संत श्रेष्ठ देवाहून | येविषयी शंका नसे ||

अनंत जन्माच्या पुण्याईने व प्रारब्धात असेल तर संताची भेट होते, नंतर संतदर्शनाचा लाभ होतो, नशिबात असेल तर संतसहवास घडतो, एखाद्यावर संतांची कृपा होते, आणि संतांच्या परीक्षेत पास झालो आणि संतांची मर्जी असेल तर संतबोध प्राप्त होतो. पण येथे तर शेगावचे सर्वच नागरिक परम भाग्याचे ठरतात. त्यांना तर संतरुपी रत्नच न मागता प्राप्त झाले.

शेगावच्या भक्तांची भक्ती श्रेष्ठतम ठरली, कदाचित त्यांच्या भक्तीत प्रेममय ओलावा असेल, कारण भगवंत स्वत: प्रेमस्वरूप आहेत. त्यामुळे त्यांस प्रेममयी भक्ती फार आवडते. प्रेमाविना केलेल्या भक्तीतून भगवंत भेटण्याची सुतराम शक्यता नाही. तसेच ज्ञानाने, विद्वत्तेने, पांडित्याने भगवंतावर चतुरपणे भाषण करता येईल, पण भगवंताची प्रत्यक्ष सलगी होऊन भगवंत त्यांच्याशी बोलेल असे काही घडत नाही. भगवंताला आपला भक्त सहज ओळखता येतो आणि अशा पक्या भक्ताला जवळ करतो, त्याला जाऊन स्वत: मिळतो.

शेगावचे भक्त पुण्यकर्म करीत असावेत आणि पुण्य केले की भगवंत भेटतो म्हणे. पण संत देवा पेक्षा श्रेष्ठ. तेंव्हा संतचरण शेगावकराना प्राप्त झाले याचा अर्थ ते महा भाग्यवान असावेत त्याशिवाय काय भगवंत अवतार घेईल?

ज्ञानदेवांनी सुद्धा भक्तांचे वर्णन चार प्रकारात केले आहे.-

आर्त भक्त- संकट आले की देव देव करणारा

जिज्ञासू भक्त- मुमुक्षूवादी मनुष्य जिज्ञासू असतो. जिज्ञासा पक्की झालीकी तो मुमुक्षू बनतो. व त्याचा हेतू देव जाणणे असा असतो .

अर्थार्थी भक्त- धनासाठी वा अपेक्षापूर्तीसाठी उपासना करणारा भक्त.

ज्ञानी भक्त - देव जाणून देवाची ज्ञानोत्तर भक्ती करणारा भक्त.

पुस्तकी ज्ञानाचा भक्तिमार्गात फार उपयोग होतोच असे नाही. भक्ती बुद्धीपेक्षा हृदयाचा विषय असावा कारण तो श्रद्धावान बनतो. देवाच्या कृपेने भक्ताच्या हृदयाचा विकास होऊन अशा भक्ताचे अंतरंग लक्षात घेतले की भगवंत कृपेने साक्षात्कार झाल्याची, मोक्षपद प्राप्त झाल्याची अनेक उदाहरणे सापडतात. शेगावी श्रीरूपाने भगवान अवतीर्ण झालेत ही त्यांचेवर झालेली कृपाच आहे, कारण तेथील भक्ताचा भाग्योदय काळ जवळ आला असावा. आईच्या मायेने भक्तांची काळजी वाहायला श्री गजानन महाराज शेगावात प्रकट झाले, ते विदर्भाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी एवढे मात्र खरे. आणि भक्तांचा विश्वास होता “ गजानन ” म्हणायचे आणि निर्धास्त होऊन जीवन जगायचे श्रींच्या आश्रयाने. मग अशा भक्तांचे रक्षण संत करणारच ना. शेगावचे भक्त निर्भय होउन, विश्वासाने जगणारे होते, मग श्रींनाही अशा भक्तांचे रक्षण करणे, संकटापासून दूर ठेवणे, त्यांची मायमाऊली बनून काळजी वाहणे ओघाने आलेच ना. पांडुरंगाचा वारकरी निर्मोही होऊन स्वार्थरहित निर्मल मनाने  “ राम कृष्ण हरी ” म्हणत पायी चालतो, त्याची काळजी कोण वाहतो, तो पांडुरंगच ना ? असा हा भक्त शेकडो मैल प्रवास करून क्षणभर दर्शन घेताना काय मागणे मागतो हो - तो म्हणतो देवा एकच कृपा कर – मी तुझा भक्त आणि तू माझा देव हे नातं बाकी जन्मोजन्मी टिकून ठेव-.

शेगावंचे भक्तही असाच विश्वास ठेवणारे असावेत म्हणून महाराज शेगावात प्रगट झालेत. आज शेगाव श्रीतीर्थक्षेत्र बनले, विश्वात प्रथम क्रमांकाचे. श्री भक्त धन्य झालेत. व्यवहारात मध्यस्थी करणारा लागतो, येथे तर होता निखळ अध्यात्मातील देवभाव. देव आणि भगवंत यांच्यात मध्यस्थ नसतो, असते ती भक्ती, प्रेम, श्रद्धा व विश्वास. इष्ट देवतेवर श्रद्धा भक्ती ठेऊन वागणे हेच भगवंत कवच होय. आणि ते कवच आहे “ गणी गण गणात बोते “. लीला आणि चमत्कारातून विश्वात सर्वत्र भक्तीचा डांगोरा पिटणारे पहिले मराठी संत ठरलेत शेगावचे श्री गजानन महाराज. ते त्रिकालज्ञानी व सर्वज्ञ होते. तुकोबारायांच्या “ वेद शास्त्र नाही पुराण प्रमाण | तयाचे वदन नावलोका ||” या प्रमाणावरून वारकरी संप्रदाय हा वैदिक संप्रदाय आहे, हे स्पष्ट होते. ऐतिहासिक शिलालेख व इतर पुराव्यावरून नामदेवराय व ज्ञानोबारायांच्या अगोदर या संप्रदायाचे अस्तित्व होते हे सिद्ध झाले आहे. ‘ बैसलिये ठायी म्हणता रामराम| काय होय श्रम ऐसे सांगा| ’

जगदुध्दाराची तळमळ हे श्रीमूल्य फारच लक्षणीय आहे. श्री गजानन महाराज शेगावात प्रगट झालेत, जीवनकार्य विदर्भात घडले आणि श्रींनी समाधी घेतली तीही शेगाव येथेच. यावरून या क्षेत्राची महती ध्यानात येते. समाधी नंतरही श्रींचे वास्त्यव्य शेगावातच आहे. समाधी घेताना श्रींनीच भक्तांना तसे आश्वस्त केले –

उदईक अरुणोदय समयासी| जावयाचे आहे निजधामासी|

तिळभरही न करावे दु:खासी| ठायीच आहे समजावे|

...पुनरपि यावे या स्थळासी| इच्छा पूर्ण होतील || म्हणूनच विश्वातून असंख्य भक्त, वर्षातून एकदा का होईना, शेगावी येऊन दर्शन घेऊन कृतकृत्य होतात हे आपण बघत आहोतच. जसे भक्ती केली की मुक्ती निश्चित, तसे ‘म्हणता श्री गजानन| होई इच्छापुर्ती |’ हेही खरे. जय गजानन.

१/६६ रामचंद्र पाटलांनी | केली माझी विनवणी |

पंढरी क्षेत्री येऊनि | कार्तिकीच्या वारीला ||

१/६७ माझ्या मनी हेत होता | गावे गजानन चरित्रा |

परि त्याची तत्वता | सागत नाही लागली ||

१/६८ त्या माझ्या वासनेची | पूर्तता करण्यासाठी |

केली रामचंद्राची | योजना या समर्थे ||

या ओव्यांमधून एक गोष्ट स्पष्ट होते ती ही की दासगणू महाराजांना श्री गजानन चरित्र गायन करण्याची आपल्याला संधी मिळावी, ही मनापासून इच्छा होती हे ते स्वत:च येथे नमूद करतात. पण आज पर्यंत तसा योग आला नाही ह्याची खंतही त्यांच्या मनाला बोचत असावी. याचाच कदाचित परिणाम असेल की या चिंतेतून त्यांना सदैव श्रीगजानन नामस्मरण होत असावे, अंतर्मनात कोठेतरी त्यातून चिंतन घडत असावे, त्यामुळे प्रत्यक्ष लिहिण्याचा प्रसंग आला तेंव्हा एका दिवसात एक अध्याय भराभर दासगणू सांगू शकले... उलट तारांबळ उडायची ते लिखाण लिहून घेत त्या लेखकांची.

ज्याची जशी योग्यता व ज्याची जशी इच्छा ती पूर्णत्वाला नेणे, हे तर श्रींचे ब्रीदच होते ना ! श्री गजानन महाराज वरद आहेत. ती दासगणूची इच्छा पूर्णत्वाला जावी म्हणून शेगावच्या पाटील विश्वस्त मंडळीच्या मनात श्रींचे चरित्र कुणातरी श्रेष्ठ संतकवीकडून गायन करून घ्यावे ही लालसा निर्माण झाली. पण त्यांना दासगणू महाराजांचे नावही माहित नव्हते व त्यांची ओळखही कधी झाली नव्हती. श्री गजानन महाराज संस्थानचे तत्कालीन व्यवस्थापक रावसाहेब श्री रामचंद्र कृष्णाजी पाटील व काही मंडळी नाशिकला जाऊन ह.भ.प श्री . लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांना भेटून आपण महाराजांवर ओवीबद्ध ग्रंथ लिहून द्यावा, अशी विनंती करताच त्यांनी ओवीबद्ध लिखाण करण्यास असमर्थता प्रगट केली आणि श्री कृपेने त्यांच्या मुखी नाव आले ते दासगणू महाराजांचे. अशी असते महाराजांची किमया. श्रींची कुणावर कशी, केंव्हा व कोठे कृपा होईल हे सांगता येत नाही. तरी यावरून हे सिद्ध होते की “ श्री गजानन विजय ” ग्रंथ दासगणूंच्या पुण्याईने श्रींना त्यांच्याचकडून लिहून घेण्याची योजना होती. श्रींची दासगणू महाराजांवर कृपा झाली. त्यांचे मनोगत यशस्वीपणे पूर्णत्वाला न्यावे ही तर श्रींची इच्छा, मग तसेच घडणार ना! श्री संतचरण सापडले की आध्यात्मिक प्रगती झपाट्याने व्हायला लागते आणि त्या भक्ताच्या सकारात्मक कार्यातून लोकशिक्षण व सामाजिक जडण घडण व्हायला हातभार लागतो. तसा योग संतकृपेने यावा लागतो. खरेच दासगणूची लिखाण शैली प्रासादिक आहे, सर्वांना समजेल अशी साधी, सोपी, सरळ भाषा आहे.भक्तीरसाने ओतप्रोत भरली असून मधाळ आणि रसाळ आहे. श्री गजानन महाराज तर प्रत्यक्ष परब्रह्म, त्यांचे कार्य तेच करवून घेतात,एखाद्या सद्भक्ताला निमित्तमात्र होण्याची संधी त्याच्या पुण्याईने त्याला श्री प्राप्त करून देतात. म्हणून संतसेवा मिळाली तर त्याचा अभिमान धरू नये. पण त्यासाठी सबुरीने घावे लागते. लगेच होकार देताना ते म्हणालेत ही सेवा तर प्रत्यक्ष परमेश्वराची कृपा आहे. हा योग माझ्या मनासारखा घडून आला. मानधनाचे विचारताच ते म्हणालेत अहो पाटीलसाहेब, हा योग आला हेच माझे मानधन समजा. मी संतुष्ट आहे. दुसरे मी कोण लिहिणारा, प्रेरणा देणारा तर माझा पांडुरंग विटेवर उभा आहे. प्रेरणा पांडुरंग देतो आणि वाणीद्वारे सहज शब्द बाहेर येतात. हे परमात्म्याचे शब्द या देहातील आत्म्याकडून वदले जातात, त्याचे मानधन ते मी काय घेणार. एक गोष्ट करा, मी गरीब रामदासी आहे, माझ्या प्रवास भाड्याची तेवढी व्यवस्था करा. पाटलांनी ती करताच दासगणू शेगावात दाखल झालेत. दासगणू महाराजांनी श्री कृपेने ग्रंथ पूर्ण केला आणि तेथेच श्री चरणी संस्थानला अर्पण केला. भक्तीत ही समर्पणाची भावना फार मोलाची असते. दासगणू नगर तालुक्यातील अकोळनेर येथे १८८७ साली जन्मले आणि श्री गजानन विजय ग्रंथ लेखन पूर्णत्वाला जायला सन १९३९ उजाडावे लागले. हा योग आला १९०७ साली त्यांच्या पूर्व पुण्याईने घडलेल्या प्रत्यक्ष श्री दर्शनाने. दासगणू लहानपणापासून प्रतिभावान कवी होते ईश्वरकृपेने. हा दैवी गुण आहे. पण लहानपणी शिक्षणात रस नव्हता, मित्र गोंधळी आणि तमासगीर. पुढे बडोद्याला अल्प वेतनावर पोलीस खात्यात नोकरीला लागले. पण श्री साईबाबांच्या कृपेने सन्मार्ग सापडला. नोकरी सोडली. पुढे वामनराव इस्लामपुरकर यांचा गुरु मंत्र घेतला आणि पंढरीची वारी करायला लागलेत. गुरु उपदेशानंतर पूर्वाश्रमीचे गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे आता “ दासगणू ” या नावाने नामरूपाला आले.

संतकवी दासगणू यांनी भक्तीरसामृत, भक्तीलीलामृत आणि संतकथामृत लिहिले. पण श्री गजानन विजय ग्रंथ ज्याच्या प्रत्येक ओवीवर आपण चिंतन करीत आहोत तो अप्रतिम असून या ग्रंथात दासगणूच्या प्रासादीक वाणीचे प्रत्यंतर आल्याशिवाय राहत नाही.

।। श्री गजानन महाराजार्पणमस्तु ।।

सौजन्य : श्री गजानन आचार्यपीठ