Showing posts with label श्री दत्तमाहात्म्य कथा. Show all posts
Showing posts with label श्री दत्तमाहात्म्य कथा. Show all posts

Sep 15, 2022

परमपूज्य सद्‌गुरु श्री मामासाहेब देशपांडेविरचित श्रीदत्तभावांजली 


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


श्रीगजानना गौरीनंदना ज्ञानभास्करा नमोस्तुते ।  द्या स्फूर्ती दत्त-सुयश गाया कल्याणप्रद मजला ते ॥  मतिप्रदे शारदे मला दे नवप्रतिभेची चार फुले। श्रवता जे सत्काव्य सुमंगल जीवमात्र नादात डुले ॥  श्रीवामनगुरु झरू देत शिरावर मधुधारा तव करूणेच्या ।  तेणे माझ्या काव्यी फुलतील नवबागा कैवल्याच्या ॥


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
विश्ववंद्य अवधूत निरंजन, श्रीदत्तात्रेय तुम्हीच ना । अनन्यभावे शरणागत मी, भवभयवारण तुम्हीच ना ॥१॥ युगायुगी निजभक्त रक्षणा, अवतरता प्रभु तुम्हीच ना । बालोन्मत्त पिशाच्चवृत्ती, धारण करता तुम्हीच ना ॥२॥ महासतीचे सत्व पाहण्या, भूवरी आला तुम्हीच ना । अत्रि-अनसूयाश्रमी प्रकटला, दत्त म्हणुनी तुम्हीच ना ॥३॥ नवनारायण सनाथ करूनी, गिरी उभविला तुम्हीच ना । मच्छिंद्रादि प्रवृत्त करूनी, मार्ग दाविला तुम्हीच ना ॥४॥ स्नान काशीपुरी, चंदन पंढरी, संध्या सागरी तुम्हीच ना । करूनी भिक्षा करवीरी, भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना ॥५॥ कुरवपुरी आचमन, सुनिद्रा माहुरनगरी तुम्हीच ना । शांत समाधीमग्न निरंतर, गिरनारी प्रभू तुम्हीच ना ॥६॥ प्रथम दर्शनी विचित्र रूपे, भय दाखविले तुम्हीच ना । श्रद्धा पाहुनी दर्शन दिधले, कार्तवीर्या तुम्हीच ना ॥७॥ राज्य देऊनी सिद्धी दिधल्या, सहस्त्रार्जुना तुम्हीच ना । मस्ती त्याची शमल्यावरती, मुक्ति दिधली तुम्हीच ना ॥८॥ मदालसासुत अलर्क याच्या, भ्रमा निरसिले तुम्हीच ना । अंती त्यासी ज्ञान देऊनी, कृपे तारिले तुम्हीच ना ॥९॥ अवधूत बनुनी गुरू मानिले, चोवीस दत्ता तुम्हीच ना । एक एक गुण त्यांचा घेऊन, भक्त रक्षिले तुम्हीच ना ॥१०॥ आयुनृपाची सेवा बघुनी, प्रसन्न झाला तुम्हीच ना । नहुषासम सत्पुत्र देऊनी, तृप्त केले तुम्हीच ना ॥११॥ विष्णुदत्त कर्मठ मीमांसक, पंक्ति घेतला तुम्हीच ना । सकलशास्त्रगत मर्म कथुनी, पूर्ण केले तुम्हीच ना ॥१२॥ परशुराम माता सहगमनी विधी कथियला तुम्हीच ना । जमदग्नी-रेणुका गौरवून, देवत्व दिधले तुम्हीच ना ॥१३॥ सोमकीर्ति राजास कथियली, आन्हिककर्मे तुम्हीच ना । नित्यकर्म-सद्‌धर्म शिकवुनी, मार्गी लाविले तुम्हीच ना ॥१४॥ नामधारका दर्शनध्यासे, तळमळवियला तुम्हीच ना । आर्त प्रार्थना ऐकून त्याची, दर्शन दिधले तुम्हीच ना ॥१५॥ कली-ब्रह्मा संवाद कथियला सिद्धमुखातुनी तुम्हीच ना । कृत-त्रेता-द्वापार कलीते, साग्र वर्णिले तुम्हीच ना ॥१६॥ अंबरिषाकारणे प्रभुवरा जन्म घेतले तुम्हीच ना । कृपा कार्य हे महान करिता, भक्त तारिले तुम्हीच ना ॥१७॥ ज्ञान लोपले असे पाहुनी, तळमळला मनी तुम्हीच ना । गिरनाराहुनी थेट निघाला, जनउद्धारा तुम्हीच ना ॥१८॥ श्राद्धाचे दिनी भिक्षा केली, पीठापुरी तुम्हीच ना । अपळराज-सुमतीच्या पोटी, जन्म घेतला तुम्हीच ना ॥१९॥ अंध-पंगु बंधु उद्धरिले, मातेसाठी तुम्हीच ना । गोकर्ण क्षेत्री वास केला, श्रीपादवल्लभ तुम्हीच ना ॥२०॥ दशाननाची पाहुनी भक्ति, लिंगही दिधले तुम्हीच ना । गणेश हस्ते लिंग स्थापिले, गोकर्णासी तुम्हीच ना ॥२१॥ चांडाळणीच्या करे बिल्वदल, फेकियले प्रभु तुम्हीच ना । पतिता असुनी पवित्र केले, शिवरात्रीदिनी तुम्हीच ना ॥२२॥ मंदमती त्या शास्त्रीकुमारा, ज्ञानी केले तुम्हीच ना । त्याच्या आईस शनिप्रदोष हे, सुव्रत कथिले तुम्हीच ना ॥२३॥ रजकाच्या सेवेस तुष्टुनी, दिले राज्यपद तुम्हीच ना । कुरवपुरी राहुनी गुप्तरूप, भक्त रक्षिता तुम्हीच ना ॥२४॥ चोरा वधुनी भक्त रक्षिला, वल्लभेश द्विज तुम्हीच ना । त्याचे हातुनी समाराधना, करूनी घेतली तुम्हीच ना ॥२५॥ विप्रस्त्रियेच्या वचनी गुंतला, पीठापुरी तुम्हीच ना । अंबा-माधवपोटी जन्मला, करंजनगरी तुम्हीच ना ॥२६॥ जन्मताच ओंकार गर्जुनी, मौन पाळिले तुम्हीच ना । मौजिबंधनी वेदोच्चारणी, चकीत केले तुम्हीच ना ॥२७॥ कृष्णसरस्वती सद्‌गुरु करूनी, काशीस वसला तुम्हीच ना । रक्षण करण्या वैदिक धर्मा, दीक्षा दिधल्या तुम्हीच ना ॥२८॥ संचारूनी सर्वत्र पुनरपि, मातेस भेटला तुम्हीच ना । पोटशुळाची व्यथा हरविली, ब्रह्मेश्वरस्थळी तुम्हीच ना ॥२९॥ वासरक्षेत्री सायंदेवा, अनुग्रह दिधला तुम्हीच ना । यवनापासुनी रक्षण करूनी, अभयही दिधले तुम्हीच ना ॥३०॥ बालसरस्वती कृतार्थ केला, आश्रम देऊनी तुम्हीच ना । उपदेशुनी सद्धर्मरक्षणा, प्रवृत्त केले तुम्हीच ना ॥३१॥ गुरु माहात्म्यविन्मुख विप्राते, बोध पाजिला तुम्हीच ना । शिष्यासह केलात वास, वैजनाथ क्षेत्री तुम्हीच ना ॥३२॥ भिल्लवडीसी जिव्हा छेदण्या, भाग पाडिले तुम्हीच ना । औदुंबरी ज्ञानवंत केले, विप्रसुतासी तुम्हीच ना ॥३३॥ अमरापुरासी भिक्षा केली, सद्विजसदनी तुम्हीच ना । वेल उपटुनी हेमकुंभही, दिला स्वभक्ता तुम्हीच ना ॥३४॥ गंगानुज कृषिवल भक्ताची, त्रिस्थळी केली तुम्हीच ना । जनउद्धारा दीक्षा दिधली, नृसिंहक्षेत्री तुम्हीच ना ॥३५॥ पिशाच्चपीडा सहज दवडिली, शिरोळग्रामी तुम्हीच ना । विप्रस्त्रियेच्या भक्तिसाठी, सुपुत्र दिधले तुम्हीच ना ॥३६॥ शिरोळग्रामी मृतपुत्रासी जीवन दिधले तुम्हीच ना । मातेकडुनी औदुंबराची, सेवा घेतली तुम्हीच ना ॥३७॥ वांझ महिषिसी दुग्ध निर्मुनी, भिक्षा केली तुम्हीच ना । दैन्य नाशुनी श्रीमंत केले, त्या विप्रासी तुम्हीच ना ॥३८॥ राजानिर्मित मठी राहिला, गाणगापुरी तुम्हीच ना । अश्वत्थाच्या ब्रह्मराक्षसा, उद्धरिले गुरु तुम्हीच ना ॥३९॥ कुमसी ग्रामी शिबिकेमधुनी, मिरवित गेला तुम्हीच ना । संशयरूपी त्रिविक्रमासी, कृतार्थ केले तुम्हीच ना ॥४०॥ म्लेंच्छाईत उन्मत्त ब्राह्मणा, धडा शिकविला तुम्हीच ना । वादविवादी जिंकुनी त्यासी, राक्षस केले तुम्हीच ना ॥४१॥ चार वेद उपशाखासहिते कथन केले तुम्हीच ना । शूद्राकरवी वादामध्ये लज्जित केले तुम्हीच ना ॥४२॥ सात रेखा उलंघून त्यासी, ब्राह्मण केला तुम्हीच ना । भस्म लाविता स्मरणहि दिधले, गतजन्माचे, तुम्हीच ना ॥४३॥ त्रिविक्रमा कर्मविपाक सकल सांगितला प्रभु तुम्हीच ना । शूद्राकडुनी वाद जिंकुनी, गर्व जिरविला तुम्हीच ना ॥४४॥ त्रिविक्रम भारतीसी कथिला विभूतीमहिमा तुम्हीच ना । उद्धरिले वामदेवहस्ते, ब्रह्मराक्षसा तुम्हीच ना ॥४५॥ गोपीनाथसुत दत्तमृतासी, कृपे उठविले तुम्हीच ना । त्याच्या पत्नीस ज्ञान बोधुनी, उद्धरिले गुरु तुम्हीच ना ॥४६॥ अगस्तीबृहस्पती संवादाचे, मर्म कथियले तुम्हीच ना । स्त्रीधर्माची महती कथिली, पतिव्रतेसी तुम्हीच ना ॥४७॥ सहगमनविधी, विधवा धर्मही, वर्णन केला तुम्हीच ना । भस्म आणि रुद्राक्ष श्रेष्ठपण, कथिले दत्ता तुम्हीच ना ॥४८॥ वैश्यरूप घेऊनिया गेला, नंदीग्रामी तुम्हीच ना । महानंदेच्या भक्तिसाठी, गाव तारिले तुम्हीच ना ॥४९॥ रूद्राभिषेक, रूद्राध्याय-माहात्म्य कथिले तुम्हीच ना । राजकुमारा सजीव करूनी, धर्म पढविला तुम्हीच ना ॥५०॥ कच देवयानी आख्यानाचे, मर्म दाविले तुम्हीच ना । मंत्रशास्त्रा स्त्री अनाधिकारी, दाखविले गुरु तुम्हीच ना ॥५१॥ परान्नलोभी विप्र स्त्रीला, अद्दल घडविली तुम्हीच ना । श्वानशूकरासहित भोजन तिसी करविले तुम्हीच ना ॥५२॥ परान्न म्हणजे अशुद्ध याचे, मर्म पटविले तुम्हीच ना । गार्हस्थ्यधर्म कथुनी ब्राह्मणा, उद्धरिले प्रभु तुम्हीच ना ॥५३॥ अल्पशिधा घेऊनी आणिला, भास्कर ब्राह्मण तुम्हीच ना । तेव्हढ्यातहि चार सहस्रा, भोजन दिधले तुम्हीच ना ॥५४॥ वांझ स्त्रियेसी कुमार, कन्या दिधली, दत्ता तुम्हीच ना । अश्वत्थाची सेवा घडविली तिचे हातूनी, तुम्हीच ना ॥५५॥ नंदी नामक कुष्ठी ब्राह्मण, निर्मळ केला तुम्हीच ना । शुष्ककाष्ठ पल्लवित करूनी, नवल घडविले तुम्हीच ना ॥५६॥ सायंदेवाकडुनी घेतली अवघड सेवा तुम्हीच ना । गुरुसेवेचे निधान देऊनी कृतार्थ केला तुम्हीच ना ॥५७॥ काशीयात्रा विधान कथिले त्वष्ट्यालागी तुम्हीच ना । तीच कथा संपूर्ण कथियली सायंदेवा तुम्हीच ना ॥५८॥ कौंडिण्याचे हस्ते केले अनंत सुव्रत तुम्हीच ना । त्याही व्रताचे माहात्म्य कथिले सायंदेवा तुम्हीच ना ॥५९॥ गाणगापुराहून क्षणार्धे तंतुक नेला तुम्हीच ना । श्रीशैल्याची यात्रा करूनी, परत आणिला तुम्हीच ना ॥६०॥ कल्लेश्वर-मी एकच आहे, असे दाविले तुम्हीच ना । नरकेसरीसी ज्ञान देऊनी, उद्धरिले प्रभु तुम्हीच ना ॥६१॥ सात रूपे घेऊन गेला, सप्तग्रामी तुम्हीच ना । रूप आठवे घेऊन होता गाणगापुरी तुम्हीच ना ॥६२॥ भक्तिसाठी शेत कापिले, शूद्राकरवी तुम्हीच ना । प्रसन्न होऊनी त्यासी दिधले, धान्य अपरिमित तुम्हीच ना ॥६३॥ दाखविली प्रभु भीमेमधली, आठही तीर्थे तुम्हीच ना । त्या तीर्थांचा महिमा कथिला, श्रीगुरुदत्ता तुम्हीच ना ॥६४॥ बेदरनगरी राज्य दिधले, रजकसुभक्ता तुम्हीच ना । स्फोटकविकार निमित्त्य करूनी, दर्शन दिधले तुम्हीच ना ॥६५॥ कली मातला असे जाणुनी, गुप्त जाहला तुम्हीच ना । पुष्प आसनी बसुनी गेला, श्रीशैल्यासी तुम्हीच ना ॥६६॥ कर्दळीवनीचा करूनी बहाणा, गाणगापुरी तुम्हीच ना । निर्गुणचरणे दृश्य ठेऊनी, गुप्तमठी प्रभु तुम्हीच ना ॥६७॥ नृसिंहवाडी औदुंबरीहि वास्तव्य असे गुरु तुझेच ना । भीमा अमरजा संगमी रमला गाणगापुरी तुम्हीच ना ॥६८॥ स्वामी जनार्दन, एकनाथ, तरी कृतार्थ केले तुम्हीच ना । नाथसदनीचे चोपदार हो, श्रीगुरुदत्ता तुम्हीच ना ॥६९॥ दासोपंतागृही रंगला, परमानंदी तुम्हीच ना । माणिकप्रभु, श्रीसमर्थ स्वामी, टेंब्येस्वामी तुम्हीच ना ॥७०॥ मम गुरु वामन बनुनी जगती, अवतरला प्रभु तुम्हीच ना । कृतार्थ केले जीवन माझे चिन्मय दाते तुम्हीच ना ॥७१॥ तुम्हीच सद्‌गुरु, वामनमूर्ती सद्‌गुणकीर्ति तुम्हीच ना । दत्तसुता प्रवृत्त करूनी, सेवा घडविता तुम्हीच ना ॥७२॥ अनंतकोटी ब्रह्मांडनायका, दासा रक्षिता तुम्हीच ना । अनंत अपराध पोटी घालुनी, भक्त उद्धरिता तुम्हीच ना ॥७३॥ तुम्हीच ब्रह्मा, तुम्हीच विष्णु, श्रीशिवशंकर तुम्हीच ना । माझे तर सर्वस्वच तुम्ही, सुखप्रदाते तुम्हीच ना ॥७४॥ तुम्हीच माता पिताही तुम्ही, माझे सारे तुम्हीच ना । तुम्हावाचुनी शरण कुणाला जावे सांगा तुम्हीच ना ॥७५॥ कुरवपुरी मज चरण दाविले, कृष्णेमाजी तुम्हीच ना । दिले चरण मज, सर्वस्व दिले, माझे झाला तुम्हीच ना ॥७६॥ सर्व हरविले आणि बसविले, साम्राज्यपदी तुम्हीच ना । तुम्हीच ना - तुम्हीच ना - तुम्हीच ना - तुम्हीच ना ॥७७॥
॥ इति श्रीदत्तभावांजलीस्तोत्रम् समाप्तम् ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥


Mar 24, 2021

कार्तवीर्योsर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् - ४


 || श्री गणेशाय नमः || श्री दत्त समर्थ ||

श्री दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या अर्जुनाने आपल्या कुलगुरुंचे आशीर्वाद घेऊन सह्याद्रीची वाट धरली. लवकरच तो सह्याद्रीच्या शिखरावर पोहोचला. अत्यंत रमणीय आणि निसर्गरम्य असे ते स्थान पाहताच युवराज अर्जुन आपल्या प्रवासाचा शीण क्षणभर विसरला. झुळझुळ वाहणाऱ्या निर्मळ झऱ्याचे अति मधुर जल प्राशन केल्यावर त्याचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. मंदपणे वाहणारा शीतल वायू, पक्ष्यांचा मोहक किलबिलाट, कोकिळांचे गोड कूजन आणि असंख्य प्रकारच्या फळाफुलांनी बहरलेले वृक्षवेली पाहून आपण जणू नंदनवनातच आलो आहोत, असे अर्जुनाला वाटले. त्या अतिपवित्र स्थानी वाघ, इतर हिंस्त्र पशु आणि गाई-हरणे आदि सर्व प्राणी आपला वैरभाव विसरून एकमेकांबरोबर राहत होते. त्या परिसराचे अवलोकन करीत असतांनाच अर्जुनास श्री दत्तप्रभूंच्या चरणकमलांचे ठसे उमटलेले दिसले. वज्र, अंकुश, पताका, शंख, चक्र आणि कमळ आदि शुभ चिन्हांकित ते ठसे पाहून अर्जुनाचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि अंतर्बाह्य भान हरपून, डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. प्रभूंच्या केवळ चरणकमलांच्या ठशांचे दर्शन घेतल्याने योग्यांनाही अगम्य अशी अवस्था अर्जुनाला सहज प्राप्त झाली. महत्प्रयत्नानें तो भानावर आला आणि त्या पावलांना अत्यंत भक्तिपूर्वक साष्टांग नमन करून ती मृत्तिका त्याने आपल्या भाळीं लावली.

हे स्थावर वृक्ष, अचेतन पर्वत, मधुर जलाचे हे वाहते स्रोत हे सर्व जणू दत्तप्रभूंचे कुठल्या जन्मीचे भक्तच असून दत्तसेवेत अविरत कार्यरत आहेत, अशी त्या युवराजाची धारणा झाली. फिरत फिरत लवकरच तो दत्ताश्रमांत पोहोचला. अलौकिक अशा दैवी स्वरांतील वेदध्वनीचा नाद त्या अतिपवित्र वातावरणांत भरून राहिला होता. श्री दत्तप्रभूंच्या अनुपम आणि आसेचनका म्हणजेच ज्यांच्या रूपाकडे पाहून तृप्ती होतच नाही, अशा सौंदर्यमूर्तीला पाहताच अर्जुनाचे भान हरपले, त्याचे मन अनिर्वचनीय अशा आनंदाने भरून गेले. अत्यंत स्वरूपवती आदिमाया, अनाघालक्ष्मी माता श्रीदत्तप्रभूंच्या मांडीवर स्थित होती. तिच्यासोबत मद्य पित क्रीडा करणाऱ्या दत्त महाराजांना बघून तो क्षणभरही विचलित झाला नाही. आपले कुलगुरू, गर्गमुनींच्या वचनांवर दृढ विश्वास ठेवून अर्जुन दत्तप्रभूंची अत्यंत भक्तिने सेवा करू लागला. आत्मसमाधीत निमग्न असणाऱ्या एखाद्या योग्याच्या चित्ताप्रमाणेच कार्तवीर्याचेही चित्त पूर्णतः दत्तमहाराजांच्या चरणीं स्थिरावले होते. श्री दत्तप्रभूंनी मात्र प्रथम त्याच्याकडे सर्वथा दुर्लक्षच केले. कधी अर्जुनाची निर्भत्सना करून तर कधी क्रोधाविष्ट होऊन त्याने आपले हे स्थान सोडून त्वरित निघावे, असे सांगितले. इतुकेच नव्हें तर वारंवार त्याला मारण्याची धमकीही दिली. अर्जुन मात्र प्रभूंची ही लीलाच आहे, असा दृढ भाव ठेवून सेवा करीतच राहिला. आपली निद्रा व आळस त्यागून, तो चंदनादि सुगंधी पदार्थ, फळे, फुलांच्या माळा, जल नित्य दत्तचरणीं ठेवत असे. तसेच प्रभूंनी आज्ञा करताच, मद्य-मांसदेखील आणून देत असे. तो दत्तमहाराजांचे चरण दाबण्याची सेवा करत असतांना कित्येक वेळीं प्रभूंनी त्याला लाथाडले, तरीही हा शिष्योत्तम मात्र आपली तहान-भूक यांची पर्वा न करतां दत्तसेवेत रंगून गेला होता.

त्या अढळ भक्तीने केलेल्या सेवेने, दत्तप्रभूंच्या नित्य दर्शनाने आणि सतत त्यांचेच स्मरण-ध्यान केल्याने हळूहळू कार्तवीर्याचे चित्त निर्मळ होऊन सात्विक भाव वाढू लागले, कर्माला अकर्मता येऊ लागली. एके दिवशी, तो दत्तप्रभूंचे चरण चुरत असतांना दत्तमहाराजांनी आपल्या दृष्टिक्षेपानें त्याचे दोन्ही हात तोडून टाकले, आणि त्याला उपहासात्मक स्वरांत म्हणाले, " अर्जुना, हे अशुद्ध संगतीचे फळ आहे. माझ्यासारख्या अमंगळ, कर्मभ्रष्ट आणि स्त्रीलंपट पुरुषाचा हा संसर्ग तुझी अपरिमित हानी तर करेलच, पण तुझे प्राणही घेईल. तेव्हा, अजूनही वेळ आहे तोवर तू येथून पळून जावेस." आपल्या आराध्य देवतेचे हे कठोर वचन ऐकताच, अर्जुनाला पुन्हा एकदा गर्गमुनींनी केलेल्या हितोपदेशाचे स्मरण झाले. हीच आपल्या दृढभक्तीची, कसोटीची वेळ आहे हे ध्यानात ठेवून तो अनन्य शरणागत होत म्हणाला, " प्रभो, तुमचे हे वचन, वर्तन म्हणजे तुमच्या अतर्क्य लीलाच आहेत, याची मला पूर्णपणे जाणीव आहे. आपण विश्वात्मक, विराट पुरुष असून त्रिगुणातीत आहात. तूं अनघ निश्चळ । अनघा ही शक्ती केवळ ।, तरीही आपल्या मायेच्या प्रभावाने आपण आम्हांस सगुण भासता. तूं आणि हे अवघे चराचर विश्व ह्यांच्यात किंचितही भेद नाही, मात्र ' जो उभयांचें नेणे अंतर । तो भेददर्शी पामर ।' असे अज्ञानी पामर, जगत आणि भगवंत यांच्यात भेद करतात आणि ते अजाण जीव शास्त्रबंधनात गुंतून पडतात. ' नाहीं जयाहून शुद्ध । तो तूं खास अशुद्ध । ' हेच केवळ सत्य आहे आणि हे जाणणाराच खरा ज्ञानी होय. तेव्हा हे भगवंता, ' देह जावो अथवा राहो । त्वद्रूपीं मन निश्चळ होवो । विपरीत भावना न राहो ।' अर्थात आता हा माझा देह राहो अथवा पडो, माझ्या मनांत आपल्याविषयी किंचितही विपरीत भावना न येता तुमच्या या स्वरूपातच माझे चित्त स्थिर व्हावे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना ! " अर्जुनाचे हे मोह-अज्ञानरहित बोलणे ऐकून दत्तप्रभू प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले, " राजपुत्रा, भक्तीचे तत्त्व तुला पूर्णपणे ज्ञात झाले आहे. तुझ्या या अविचल भक्तीने तू मला प्राणप्रिय झाला आहेस. माझ्या भक्तांचे मी इहपर कल्याण आणि उद्धार करणारच, असे माझे ब्रीद आहे. तुला हवा तो वर मागून घे. " आपल्या इष्टदेवतेचे हे वचन ऐकताच कार्तवीर्यास अतिशय आनंद झाला. आपण केलेली सेवा दत्तमहाराजांनी मान्य केली, आपले जीवन जणू सार्थक झाले असा विचार करीत तो प्रभूचरणीं नतमस्तक झाला आणि लीनतेने वदला, " देवा, आपण खरोखर माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर मला सर्व प्रकारचे ऐश्वर्य तसेच धर्म, अर्थ, काम हे पुरुषार्थ प्राप्त व्हावेत. आपल्या आशीर्वादाने ' यावें मला एकुलत्यासी । प्रजापालनसामर्थ्य ।' आणि मी बलवंत होऊन माझी दिगंत कीर्ती व्हावी. ' देवो मन्नाम नष्टलाभ ' अर्थात माझ्या नामस्मरणाने नाहीसे झालेले, हरवलेले परत लाभावे. इच्छित स्थळी जाण्यासाठी अकुंठित गती, अष्टसिद्धी, परचित्तज्ञान, सहस्त्र बाहू आणि सदा सर्वज्ञता लाभावी. जो माझे स्मरण करील त्याला माझे दर्शन घडावे, मला स्वर्गीं-पाताळीं सहज गमन करता यावे, सदा सत्संगती घडावी, मी कधीही कुमार्गांकडे वळू नये, धर्माने प्रजापालन करावे तसेच, पूजनीय अतिथी माझ्या घरी यावेत आणि माझे द्रव्य भांडार अक्षय असावे. सर्वात महत्वाचे म्हणजे, ' आयुष्य पूर्ण असावें । धारातीर्थीं मरावें । भवत्तुल्यानें मारावें । तुमचें असावे नित्य स्मरण ' हे वरदान मला प्राप्त व्हावे. " अर्जुनाची ही प्रार्थना ऐकून श्री दत्तप्रभूंनी ' तथास्तु ' असा वर दिला. तत्क्षणीच त्याला दोन सुंदर भुजा प्राप्त झाल्या, सद्गदित होऊन त्याने श्री दत्तात्रेयांना दृढ अलिंगन दिले. भगवंताचा दिव्य स्पर्श होताच तो तटस्थ होऊन समाधी अवस्थेत गेला. परंतु, आपले वरदान सिद्ध करण्यासाठी दत्तप्रभूंनी आपल्या मायेच्या प्रभावाने अर्जुनाला त्या भावसमाधीतून बाहेर काढले आणि मंद स्मित करत म्हणाले, " वत्सा, तू पृथ्वीतलावरील सातही द्वीपांचा अधिपती होशील. तू आता सत्वर आपल्या माहिष्मती नगरीस जा आणि स्वतःला विधियुक्त राज्याभिषेक करून घे, ही माझी आज्ञा आहे." यावर कार्तवीर्याने " हे प्रभो, आपली आज्ञा मला शिरसावंद्य आहे," असे म्हणत पुनश्च वंदन केले आणि ' विस्मरण न व्हावें तुमचें । आपले हे चरण । हेंचि माझें जीवन ।' अशी विनवणी करीत, पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत आणि दत्तप्रभूंच्या त्या विलक्षण स्वर्गीय रूपाची आपल्या हृदयमंदिरात प्रतिष्ठापना करून अर्जुनाने माहिष्मतीकडे गमन केले. श्री दत्तप्रभूंनी दिलेल्या वरदानामुळे अर्जुन काही क्षणांतच माहिष्मतीला येऊन पोहोचला. नगरीच्या वेशीवरच कुलगुरू गर्गमुनी, मंत्रीगण, नगरवासी यांनी त्याचे स्वागत केले आणि समारंभपूर्वक नगरीत घेऊन गेले. लवकरच एका शुभमुहूर्तावर अर्जुनाला विधीवत राज्याभिषेक करण्यात आला. त्यावेळी अनेक देवता, ऋषीगण, राजे-महाराजे उपस्थित होते. राज्याभिषिक्त झाल्यावर अर्जुनाने विपुल दानधर्म केला आणि उपस्थितांचे उचित पूजन-सत्कारही केले. श्री दत्तात्रेयांकडून प्राप्त झालेल्या वरदानांमुळे तो धर्मानुसार प्रजापालन, शत्रू-नैसर्गिक आपत्तींपासून राज्याचे संरक्षण आणि एकछत्री शासन आदि राजकर्तव्ये उत्तमरीत्या पार पाडू लागला. त्याच्या राज्यांतील प्रजा सुखी होती, सतत यज्ञादिक अनुष्ठानें आयोजित केली जात होती, देवदेवता-ऋषी, ब्राह्मण तृप्त होते, योग्य पर्जन्यमानामुळे भूमीही सुफला होती आणि शरणागतांस अभय होते. ब्रह्मदेव आणि श्री शंकरांच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या रावणासही त्याने सहजच पराजित करून त्रैलोक्यांत ख्याती मिळविली. श्री दत्तकृपेचे अमोघ कवच कार्तवीर्याला लाभले होते. त्याला प्रथम श्री दत्तदर्शन झाले, तो दिवस माघ महिन्यातील वद्य अष्टमीचा होता. प्रतिवर्षी त्या दिवशी तो अनघाष्टमीचे व्रत शास्त्रोक्त पद्धतीने आणि अत्यंत भक्तिभावाने करत असे. सर्व भक्तीत श्रेष्ठ अशी स्मरणभक्ती करून कार्तवीर्याने श्री दत्तप्रभूंचा कृपाप्रसाद मिळविला. अशा रितीने महापराक्रमी, परम तेजस्वी, कर्तव्य-तत्पर, धर्माचरणीं, सहस्रबाहु असणारा आणि श्री दत्तात्रेयांचा प्रिय भक्त अर्जुन सर्वत्र विजय संपादन करून या पृथ्वीतलावरील सातही द्वीपांचा अधिपती झाला. ' न नूनं कार्तवीर्यस्य । गतिं यास्यंति पार्थिवा: । यज्ञदानतपोयोगश्रुतवीर्यजयादिभि: ॥' असे त्याचे उचित वर्णन केले जाते, अर्थात यज्ञ, दान, तप, योग, ज्ञान, शौर्य आणि जय या सर्वांत कार्तवीर्याची बरोबरी करेल, असा राजा होणे सर्वथा अशक्य आहे. कार्तवीर्योsर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् । तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ॥ हा मंत्र तर सर्वश्रुत आहेच. या मंत्राचा श्रद्धेनें जप केल्यास गमावलेली वस्तू अवश्य मिळते, असा अनेकांचा अनुभव आहे. त्या परम दत्तभक्त राजाचा ' नमस्ते कार्तवीर्याय ' हा मंत्र आहे. प्रत्यक्ष ' दत्त निवेशित नष्ट प्रयुक्त ' असे आशीर्वचन लाभलेल्या या दिव्य मंत्रास विविध बीज लावून जप केल्यास साधकांच्या अनेक मनोकामना त्वरित फलित होतात. ॐ नमस्ते कार्तवीर्याय - भवबंधनातून मुक्ती, असाध्य विकार आणि नैसर्गिक प्रलयांपासून संरक्षण ऐं नमस्ते कार्तवीर्याय - वाचासिद्धी, विद्याप्राप्ती श्रीं नमस्ते कार्तवीर्याय - धनप्राप्ती द्रां नमस्ते कार्तवीर्याय - अपमृत्यूनिवारण, रोगनाशक आणि आरोग्यप्राप्ती धूप-दीप लावून वरील मंत्रांचा जप केल्यास अभीष्टप्राप्ती निश्चितच होते. प. प. श्री टेम्ब्येस्वामी महाराजरचित मंत्रविधानम् या ग्रंथातील पृ. क्र. ४२ आणि ४३ वर कार्तवीर्याचे इतर प्रभावी मंत्र विस्तृतपणें सांगितले आहेत.

|| इति कार्तवीर्याख्यानं संपूर्णम ||

|| श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ||


Feb 12, 2021

कार्तवीर्योsर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् - ३


 || श्री गणेशाय नमः || श्री दत्त समर्थ ||

अर्जुनाची ती प्रार्थना ऐकून गर्गमुनींना संतोष वाटला. आपल्या उपदेशाचा उचित परिणाम झाला आहे, याचे त्यांना अतिशय समाधान वाटले. श्री दत्तप्रभूंचे मनःपूर्वक स्मरण करून त्यांनी अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास आरंभ केला. गर्गमुनी म्हणाले -

पूर्वी जंभासुर नावाचा महापराक्रमी दैत्य होता. त्याने संपूर्ण पृथ्वीचे राज्य जिंकले आणि स्वतःला सम्राट घोषित करून अत्यंत जुलुमी पद्धतीने तो राज्यकारभार करू लागला. त्या अतिमहत्वाकांक्षी दैत्याने नंतर स्वर्गावरही चढाई केली. देवराज इंद्र आणि जंभासुर दैत्य यांच्यात घनघोर युद्ध झाले. त्या संग्रामात देवांनी पराक्रम करून दैत्य सेनेचा संहार केला, मात्र अखेर त्या बलशाली दैत्याने अमरावती जिंकून स्वर्गलोकीचे राज्य आपल्या ताब्यात घेतले. पराभूत झालेल्या देवांनी मेरू पर्वतावरील एका गुहेचा आसरा घेतला. आपले स्वर्गलोकीचे राज्य परत मिळविण्यासाठी इंद्रासहित सर्व देव देवगुरु बृहस्पतीकडे आले आणि आपणांस योग्य मार्गदर्शन करावे, अशी प्रार्थना केली. त्यावेळी, देवगुरु बृहस्पतींनी इंद्रासहित सर्व देवगणांस बोध केला. तसेच, त्यांना सह्याद्री पर्वतावर वास करणाऱ्या श्री दत्तात्रेयांस अनन्यभावें शरण जा, तेच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील असे सांगितले.

आपल्या गुरूंची आज्ञा घेऊन इंद्रादिक देव सत्वर सह्याद्रीच्या शिखरावरील श्री दत्तप्रभूंच्या आश्रमांत आले. श्री दत्तात्रेयांचे ते ' मन-बुद्धीपर वाचे अगोचरु ' असे रूप पाहून त्या सर्वांचेच देहभान हरपले. त्यावेळीं, श्री दत्तमहाराजांजवळ सौंदर्यवती अनघादेवीही होती. सर्व देवांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला, मात्र दत्तात्रेयांनी इंद्रादिक देवांकडे अजिबात लक्ष दिले नाही. क्षणभर सर्व देव खिन्न झाले, मात्र देवगुरुंच्या उपदेशाचे स्मरण करून ते सर्व अढळ श्रद्धेने दत्तप्रभूंची सेवा करू लागले. असा बराच काळ लोटला, मात्र दत्तप्रभूंनी ना त्यांची दखल घेतली ना विचारपूस केली. तरीही, अपार कष्ट झेलुनही प्रभूंच्या कृपेची याचना करणाऱ्या त्या सर्व देवांचा दृढ निश्चय आणि अनन्यभाव पाहून अखेर दत्तात्रेय इंद्रास म्हणाले, " देवराज, आपण उगाच इतके कष्ट घेत आहात. मी मद्यासक्त, स्त्रीरत भ्रष्ट असून माझ्यापासून आपणांस कदापिही लाभ होणार नाही. तेव्हा, तुम्ही दुसऱ्या एखाद्या योग्य पराक्रमी पुरुषाकडे जावे." श्री दत्तप्रभूंचे हे बोलणे ऐकून त्या सर्व सुरवरांना आपल्या गुरूंचा उपदेश आठवला. हीच आपली कसोटी आहे, हे लक्षांत घेऊन इंद्रादि देव श्री दत्तांची , " तू ईश्वर स्वच्छंद । भेदपरिच्छेद तुज नाहीं । तूं अनघ अससी । अनघा हे असे तसी । तुझा होतां अनुग्रह । कोण करील निग्रह ।" अशी स्तुती करू लागले. त्यांचा तो दृढभाव आणि चित्तशुद्धी झालेली पाहून दत्तप्रभू प्रसन्न झाले. त्यांनी आता जंभासुराचा विनाश अटळ आहे, तसेच स्वर्गलोकीचे राज्य तुम्हांस लवकरच प्राप्त होईल, असा आशीर्वाद दिला. केवळ स्रीमोहच असुरांचा विनाश करू शकेल, हे भगवान दत्तात्रेय जाणून होते. त्यांनी देवांना दैत्यांशी युद्ध करून युक्तीने त्यांना आपल्या आश्रमांत घेऊन यायला सांगितले. दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार, देवांनी दैत्यांबरोबर रण पुकारले. काही काळ युद्ध करून पूर्वनियोजित युद्धनीतीचे पालन करीत सुरसेनेने समरभूमीतून पळ काढला. त्यांचा पाठलाग करीत सर्व दैत्यही सह्याद्रीवर दत्तात्रेयांच्या आश्रमांत आले. तिथे अनुपम सौंदर्यवती अशा अनघादेवीला बघून ती दैत्यसेना आपण इथे सुरांशी युद्ध करत आलो आहे, हेच विसरली. त्या आदिमायेविषयीं त्यांच्या मनात अभिलाषा निर्माण झाली. त्यांनी तिला पालखीत बसविले आणि डोक्यावर ती पालखी घेऊन ते निघून गेले. दैत्यांचे हे आसुरी कृत्य बघून श्री दत्तात्रेय म्हणाले, " देवेंद्रा, परस्त्रीस्पर्श हे महापातक आहे. त्या पापाच्या प्रभावाने लवकरच दैत्यांचे सामर्थ्य आणि ऐश्वर्य नष्ट होईल.

श्री: पदगाssलयदात्री सक्थिगतांशुकदात्री । गुह्यगता प्रमदादा क्रोडगतार्भकदा चेत् ॥
चेद्धृदि कामितदात्री कण्ठगता वसुदात्री । चेन्मुखगाsशनवाग्दा मूर्धगता तु शिरोदा ॥
तन्मूर्धगाsधुनेयं श्री: शीर्षाण्युत्कृत्य सत्वरम् । आयास्यत्यत्र नैवात्र शङ्का ह्येते मृतोपमा: ॥

अर्थात, श्री म्हणजे लक्ष्मी जर पायांत असेल तर गृहदात्री असते. श्री जर छातीवर घेतली तर वस्त्रलाभ आणि गुह्येंद्रियांत असेल तर स्त्रीलाभ होतो. श्री बाहूंवर संततीकारक, हृदयांत विराजमान झाली तर इच्छापूर्तीकारक, कंठात धनदायक, आणि वाणींत असेल तर शक्ती आणि यशदायक असते. मात्र लक्ष्मीला मस्तकावर घेतले असता विनाश घडविते. तेव्हा देवांनो, दैत्यांचा पराजय आता अटळ आहे. तुम्ही एक क्षणही न दवडतां निर्भय होऊन दैत्यांवर आक्रमण करा. तुमचा विजय आता निश्चित आहे. " दत्तप्रभूंच्या या वचनांवर विश्वास ठेवून इंद्रादिक देवांनी त्वेषाने पुन्हा एकदा दैत्यांशी युद्ध आरंभिले. दुराचरण आणि महापातक यांनी निस्तेज झालेले ते दैत्य थोड्याच वेळांत पराभूत झाले. श्री दत्तकृपेनें त्या दुष्ट दैत्यांचा संहार करून देवसेना विजयी झाली.

आदिमाया अनघादेवीही श्री दत्तप्रभूंच्या अंकावर पुन्हा विराजमान झाली. सर्व देवगणांसहित इंद्राने सद्गदित होत श्रीदत्तप्रभू आणि अनघा देवीची स्तुती केली. त्या स्तवनाने आणि सेवाभावाने प्रसन्न झालेल्या श्री दत्तात्रेयांनी आशीर्वाद देऊन इंद्रास कर्तव्यदक्षतेने स्वर्गलोकीचे राज्य करावयास सांगितले. तसेच सर्व देवांस हवा तो वर मागून घ्यावा असेही सांगितले. त्यांवर, सर्व देवांनी कृतज्ञतेने ' भक्ती द्यावी निश्चयेंसी । दिवा निशी प्रेमयुक्त ।' असे वरदान मागितले. आजसुद्धा, अतीव श्रद्धेने देवराज इंद्र दररोज योगिराज दत्तप्रभूंच्या दर्शनास येत असतो.

इतका कथाभाग सांगून गर्गमुनी अर्जुनाला म्हणाले, " युवराज, स्वर्गीचे वैभवही आपल्या आराध्य देवतेच्या भक्तीपुढे गौण वाटणे, हेच त्या देवतेच्या पूर्ण कृपेचे द्योतक आहे. हेच भक्तीचे अंतिम फळ आहे. तुझ्या मनांत उद्भवलेली ही दत्तदर्शनाची इच्छा कल्याणकारी आहे. तू आता अनन्यभावानें त्यांना शरण जा, तेच तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करतील." गर्गमुनींचा हा हितोपदेश ऐकून अर्जुनाचे मन भक्तिभावाने भरून आले. अतीव श्रद्धेने त्याने आपल्या कुलगुरूंना प्रणिपात केला आणि कृतार्थभावाने म्हणाला, " गुरुवर्य, दत्तचरणांची भक्ती आपण माझ्या हृदयांत उपजविली, याबद्दल मी आपला सदैव ऋणी आहे. माझ्यावर सत्वर दत्तकृपा व्हावी, असा आपण मला आशीर्वाद द्या. दत्तदर्शनासाठी मी अतिशय उत्सुक झालो आहे, आपण आता मला आज्ञा द्यावी." गर्गमुनींनी तथास्तु असे आशीर्वचन देताच अर्जुनाने श्री दत्तप्रभूंच्या सह्याद्रीवरील आश्रमाकडे प्रयाण केले.

क्रमश:


Aug 19, 2020

कार्तवीर्योsर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् - २


|| श्री गणेशाय नमः || श्री दत्त समर्थ ||

यथावकाश नवमांस पूर्ण होताच शीलधरा राणीनें कार्तिक शु. सप्तमीला रात्रीच्या शुभवेळी एका पुत्ररत्नाला जन्म दिला. कार्तिकस्यसिते पक्ष सप्तभ्यां भानुवासरे । श्रवणर्क्षे निशानाये निशिचे सु सुभेदर्णे || ( स्मृति पुराण १५/३) कृतवीर्य राजाच्या पुत्राच्या जन्मसमयीं पाचही ग्रह उच्चीचे होते. साक्षात प्रभू दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने जन्मलेल्या त्या दिव्य बालकाच्या आगमनाने सारे ब्रह्माण्ड आनंदाने भरून गेले. अनेक शुभ संकेत सहजच सर्वच स्थानीं दिसू लागले. अत्यंत हर्षित झालेल्या कृतवीर्याने आपल्या प्रजेस धन, धान्य आणि वस्त्रे आदि यांचे यथायोग्य दान केले. ब्राह्मणांना विपुल गोदान आणि सुवर्णदानही केले. साधुजनांना प्रसन्न केले आणि त्या सिद्धांच्या मुखांतून त्या बालकासाठी 'आयुष्यमान हो, यशस्वी हो' असे अनेक आशीर्वाद येऊ लागले. राजानें ज्योतिष्यांना पाचारण करून नवजात बाळाचे जातक वर्तविले. ज्योतिषी लग्न पाहून त्या दैवशाली बालकाचे भविष्य अत्यंत प्रसन्न होऊन वदते झाले, दैवशाली हा कुमार । श्रीदत्तात्रेय कृपापात्र । तपोबळें पवित्र । होईल सर्वत्र प्रख्यात याचें घेतां नाम । नष्ट वस्तूचा आगम । स्मरतां करील आगम । हा वेदशास्त्रपारंगत होईल. अनंतव्रताचे फलस्वरूप म्हणून हा सप्तद्वीपांकित पृथ्वीचा सार्वभौम राजा होईल आणि पंचाऐंशी हजार वर्षें राज्य करील. सूर्यनारायणाच्या व्रतप्रभावाने ह्यास लक्ष वर्षांचे निरोगी आयुष्य लाभेल. हा जितेंद्रिय, सर्वदा विजयी आणि सर्वमान्य होईल. ज्योतिषांचे हे वचन ऐकून कृतवीर्य राजाने त्यांचा यथायोग्य सत्कार केला. पुढें, सोळाव्या दिवशी त्या बालकाचा नामकरण विधी करून त्याचे नाव अर्जुन असे ठेवले. कृतवीर्य राजाचा पुत्र म्हणून त्यास कार्तवीर्य असेही प्रजाजन संबोधू लागले. 

अर्जुन शुक्ल पक्षांतील चंद्राप्रमाणे वाढू लागला. राजगुरु गर्गमुनींकडून विद्याभ्यासाचे शिक्षण घेऊ लागला. थोडयाच काळांत तो सर्व शस्त्र-शास्त्रपारंगत होऊन युवराज्यपदास योग्य झाला. तथापि, दैववशात कृतवीर्य राजाचा वृद्धापकाळानें मृत्यू झाला. तेव्हा, राजगुरू गर्ग मुनी, प्रधानादि मंत्री गण आणि प्रजेनेंसुद्धा अर्जुनास तू आता राज्याची धुरा सांभाळावी आणि आपल्या राजधर्माचे पालन करावेस असा सल्ला दिला. तेव्हा अर्जुनाने मात्र राज्यपद स्वीकारण्यास नकार दिला. अधिक स्पष्टीकरणार्थ तो गर्ग मुनींस वंदन करून नम्रपणें म्हणाला, "गुरुवर्य, मला हे राज्य नको. मी त्यास मनापासून त्याज्य मानतो. राजाचे अधिपत्य सर्वमान्य असलें तरी अंतिम परिणाम अत्यंत कष्टदायकच असतो. जो राजा आपल्या प्रजेचे न्यायाने पालन करीत नाही, राज्यातील जनतेचे रक्षण करीत नाही अथवा अंगी सामर्थ्य असूनही जर राजाचे आचरण अनीती व अधर्मयुक्त असेल, तर तो राजा नरकवास भोगतो. यांवर तुम्ही मला हे सर्व तू जाणतोस तर आपल्या राजधर्माचें योग्य पालन कर असे जरी सांगितले तरी राज्य करतांना मला माझ्या सेवकांवर विसंबून राहावे लागेल. त्या राजसेवकांनी केलेल्या पापाचा एक चतुर्थांश हिस्सा सहजच राजाच्या मस्तकी पडतो. तेव्हा मी एकटा, स्वबळावर सर्वदा धर्मास अनुसरुन आणि न्यायपूर्वक राज्य करण्यास समर्थ झाल्याशिवाय हा राज्यकारभार कसा स्वीकारू ? " 

अर्जुनाचे हे बोलणें ऐकून गर्ग मुनींस अतिशय संतोष झाला. तसेच, या विशाल राज्याचा राजा म्हणून अर्जुन हाच योग्य आहे, याची खात्रीही त्यांना झाली. ते म्हणाले, " अर्जुना, तू हे जे काही बोललास ते अतिशय योग्यच आहे. तुला जर तुझ्या सेवकांवर अवलंबून राज्यकारभार करायचा नसेल तर तू योगाभ्यास कर. त्यांमुळेच तुला राज्याची धुरा समर्थपणे सांभाळता येईल. योगें नाना देह धरिसी । तूं एकला राज्य करिसी । मनोवेगें तूं फिरसी । सर्व जाणशील साक्षित्वें ॥" अर्जुनास असे योग्य मार्गदर्शन करीत गर्ग मुनींनी त्याला भगवान दत्तात्रेयांना शरण जाण्यास सांगितले. " जो या ब्रह्माण्डात ' योगीन्द्र ' म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याचे केवळ नाम उच्चारलें असता हा भवसागर सहजच पार होतो, जो योगसामर्थ्याने भक्तांचे सर्वदा रक्षण करतो, ज्याचे त्रिगुणातीत आचरण देवादिकांनाही अनाकलनीय आहे, आणि जो आपल्या भक्तांना इप्सित वर देतो असा स्मर्तृगामी, अत्रि-अनसूया यांचा नंदन श्री दत्तात्रेय यांची तू आराधना कर."    

ज्याचें नित्य गंगास्नान । माहूरीं करीं शयन । सह्याद्रीवरी आसन । करी ध्यान गाणगापुरीं ॥

कुरुक्षेत्रीं आचमन । धोपेश्वरीं जाऊन । करी जो भस्मधारण । संध्यावंदन कर्‍हाडीं ॥

कोल्हापुरीं भिक्षाटन । पांचाळेश्वरीं जाऊन । नित्य करी भोजन । विचित्राचरण जयाचें ॥

पंढरपुरीं जाऊन । नित्य सुगंध लेवून । पश्चिम सागरीं येऊन । करी अर्ध्यदान सायंकाळीं ॥

जो जो करील स्मरण । त्या त्या देई दर्शन । व्यापिलें जेणें त्रिभुवन । असो नमन तच्चरणा ॥

ज्याची लीला ऐकोन । तृप्त होती कान मन । त्याला कोण कां नमन । न करील जनमान्य जो ॥

श्री दत्तप्रभूंची अशी दिनचर्या आणि महती सांगून गर्ग मुनी पुढे म्हणाले, " अर्जुना, पण एक लक्षात ठेव. दत्त महाराजांना प्रसन्न करणे अतिशय दुष्कर आहे. मात्र निर्मळ चित्त असलेल्या भक्तांना ते सहजच प्राप्त होतात. ' तो भक्तीचा भुकेला । भक्ताधीन राहिला । अंतर न देतां भक्तांला ।' अशा त्रिभुवनव्यापी परमात्म्याला मी मनःपूर्वक नमन करतो.  ' जो मायाध्यक्ष होऊन । करी जग उत्पन्न ।त्याचें करीं पालन । जो स्वयें उदासीन निगर्व ॥ ब्रह्मरूपें उत्पादक । विष्णुरूपें पालक । रुद्ररूपें संहारक । करी एक तो सर्व ॥' अशा दत्तात्रेयांची कृपा आणि वरदान तुला लाभल्यास तू एकटाच स्वबळावर आपल्या इच्छेनुसार या सप्तद्वीप पृथीवर अधिराज्य करू शकशील. ' तो देईल तुला धृती (धैर्य)। तो देईल नाना शक्ती । भावें करीं त्याची भक्ती । दे जो सन्मती मुक्तिदाता ॥ जें जें मनीं आणसी । योगप्रभावें तें मिळविसी ।' तेव्हा तू सत्वर सह्याद्री पर्वतावर जाऊन दत्तात्रेयांची आराधना कर. 

गर्गमुनींचा हा उपदेश ऐकून अर्जुनाने सदगदित होऊन त्यांना वंदन केले आणि त्यांना अतिशय कृतज्ञतापूर्वक स्वरांत म्हणाला, " गुरुवर्य, या राज्याची धुरा सांभाळण्याची योग्यता मला प्राप्त व्हावी, यासाठी आपण मला दत्तप्रभूंच्या भक्तिचा मार्ग दाखविला, हा आपण माझ्यावर मोठाच अनुग्रह केला आहे. श्री दत्तात्रेयांचे अदभूत चरित्र ऐकण्यास मी अतिशय उत्सुक झालो आहे. आता माझी एकच प्रार्थना आहे की आपण मला हे परम पावन दत्तचरित्र सांगावे. इंद्र-जंभासुराची कथा, इंद्राची आराधना मला विस्तृतपणें निवेदन करावी. देवेंद्रावर दत्तप्रभूंनी कशी कृपा केली ?" 

' मग मीही करीन । श्रीदत्ताचें सेवन । जेणें होय प्रसन्न । देईल वरदान श्रीदत्त ॥' 

क्रमश:


Jul 27, 2020

कार्तवीर्योsर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् - १


|| श्री गणेशाय नमः || श्री दत्त समर्थ ||

यच्छिष्यस्मरणात्सद्यो गतनष्टादि लभ्यते || य ईश: सर्वतस्त्राता दत्तात्रेयं नमामि तं || प. प. वासुदेवानंदरचित दत्तस्तव या स्तोत्रांत भगवान दत्तात्रेयांच्या ज्या महाप्रतापी सद्-भक्ताचा आणि धर्मपरायण परमशिष्याचा उल्लेख केला आहे, त्या चक्रवर्ती कार्तवीर्याच्या श्री दत्तमाहात्म्यात वर्णिलेल्या ह्या काही कथा.

प्रसिद्ध सोमवंशातील हैहय राजाच्या कुळांत कृतवीर्य नावाचा सार्वभौम राजा होऊन गेला. तो कर्तव्यत्पर आणि पराक्रमी होता. त्याला शंभर पुत्र होते. दुर्दैवाने त्या राजपुत्रांकडून काही प्रमाद घडल्याने च्यवन ऋषींनी त्या सर्व राजपुत्रांस शाप दिला आणि त्यायोगें त्यांचा मृत्यू झाला. पुत्रवियोगानें राजा कृतवीर्य अतिशय दु:खी झाला आणि त्याचे राज्यकारभारातून चित्त उडाले. एके दिवशी, तो असाच खिन्न होऊन बसला असता राजगुरूंचे तिथे आगमन झाले. कृतवीर्य राजाने आपल्या गुरूंचे उचित स्वागत करून त्यांस साष्टांग नमस्कार केला आणि अत्यंत दीनपणे त्यांस म्हणाला, " गुरुवर्य, काही पूर्वार्जित सत्कर्मांमुळेच मला आज आपले दर्शन झाले. माझ्या पुत्रांच्या अकाली मृत्यूमुळे मी पुरता खचून गेलो आहे. आपणांस सर्व ज्ञात आहेच. ' प्रारब्धकर्मणां भोगादेव क्षय: ' अर्थात प्रारब्ध कर्म भोगणे अपरिहार्य आहे, हे शास्त्रवचन सत्य असले तरी त्या कर्मसिद्धांताची तीव्रता कमी करण्यासाठी आपणच मला आता योग्य मार्ग दाखवू शकता." त्याचे बोलणे ऐकून श्रीगुरुंनी त्यास धर्मबोध केला आणि सूर्यदेवतेची उपासना करण्यास सांगितले. त्याकरिता गुरूंनी कृतवीर्य राजास भानुसप्तमी व्रताचा शास्त्रोक्त विधी सांगून ते व्रत आचरण्यास सांगितले. तसेच, "हे राजन, वैदिक धर्मातील हे व्रत दृढ भक्तीने केले असता सर्व पापांचे शमन होऊन उत्तम सुख आणि सत्पुत्र आदी लाभ होतात. तेव्हा, पुण्यप्राप्ती होऊन तुझा वंश वृद्धिगंत होण्यासाठी तू ह्या व्रताचे पालन कर. सूर्यनारायणांच्या कृपेने तुझी सर्व अरिष्टे दूर होऊन तुझी संतती वाढेल." अशी ग्वाहीही दिली. आपल्या गुरूंचे हे बोलणे ऐकून राजास अतिशय समाधान वाटले आणि त्याने आपल्या गुरूंचे पूजन करून आशीर्वाद मागितला. त्यानंतर अत्यंत भक्तिभावाने त्याने त्या व्रताचे आचरण केले.

काही काळानंतर महर्षी याज्ञवल्क्यांची पत्नी महासाध्वी मैत्रेयी योगायोगाने राजप्रासादांत आली असता, कृतवीर्याची पत्नी राणी शीलधरा हिने तिचा योग्य आदर सत्कार केला. तसेच, आपले दु:ख तिला निवेदन करून उत्तम पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली. ब्रह्मवादिनी मैत्रेयीनें राणी शीलधरा हिला अनंतव्रत करण्यास सांगितले. ह्या व्रताची महती सांगतांना विदुषी मैत्रेयी म्हणाली, " हे राज्ञी, दत्तपुराणांत ह्या व्रताचे दत्तव्रत असे वर्णन केले आहे. स्वतः श्री दत्तप्रभूंनी ह्या सर्वक्षेष्ठ व्रताचे माहात्म्य आणि आचरणविधी सांगितला आहे. ह्या व्रताच्या प्रभावाने त्या सर्वेश्वराची कृपा होऊन तुम्हांला त्रैलोक्यांत कीर्ती गाजवणारा उत्तम, सद्-गुणी पुत्र होईल." राणीनें त्या ऋषिपत्नीच्या चरणीं लीन होत कृपाशिर्वादाची प्रार्थना केली. राणी शीलधरेने मैत्रेयीचा हा उपदेश राजा कृतवीर्याला सांगून हे व्रत करण्यासाठी त्याची अनुज्ञा मागितली आणि सत्वर व्रतास आरंभ केला. राणी शीलधरा पूर्वीपासूनच दत्तप्रभूंची उपासना करीत असे, त्यामुळे अनंतव्रताचे आचरण करतांनासुद्धा तिने भगवान अनंत म्हणजे श्री दत्तात्रेयच अशी श्रद्धा ठेवूनच निष्ठापूर्वक ते व्रत केले.

राणीच्या त्या भक्तिभावानें भगवान दत्तात्रेय प्रसन्न झाले. प्रभूंनी आपलें निजरूप दाखवून शीलधरेस स्वप्नदृष्टांत देऊन " अत्युत्कट धर्मफळ । राज्ञी मिळेल तत्काळ । तुला पुत्र होईल सबळ । सप्तद्वीपपाळक ॥ जो अकुंठितगती । स्मरतां देईल भेटी ।" असा आशीर्वाद दिला. अर्थात, " ह्या धर्माचरणाचे तुला लवकरच फळ मिळेल. सप्त द्वीपांवर राज्य करणारा, संकल्पमात्रें त्रैलोक्यांत कुठेही जाऊ शकणारा आणि स्मरतां क्षणीच दर्शन देणारा असा महाबलीशाली पुत्र तुला होईल.", असा वर देऊन ते भक्तवत्सल श्री दत्तात्रेय अंतर्धान पावले आणि राणी शीलधरा निद्रेतून जागी झाली. स्वप्नांत झालेल्या आपल्या उपास्य देवतेच्या दर्शनाने ती अतिशय हर्षित झाली होती आणि तिने राजा कृतवीर्याला ते शुभ स्वप्न सांगितलें. ते ऐकून राजाही अतिशय संतोषला. लवकरच त्या उभयंतास दत्तप्रभूंच्या आशीर्वचनाची प्रचिती आली, राणी शीलधरा गर्भवती झाली. तिला अतिशय उत्तम डोहाळे लागले, राजाने ते तत्पर पूर्ण केले. तसेच यथाशास्त्र पुंसवनादि संस्कारही केले. आपल्या राजकर्तव्याचे उत्तम रीतीने पालन करत ते राजा-राणी ईश्वर आराधनेत काळ व्यतीत करू लागले.


क्रमश: