Feb 11, 2022

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय २०


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय असो समाधिस्थ झाल्यावर । श्रीगजानन साधुवर । म्हणूं लागले नारीनर । आतां काय ह्या शेगांवीं ॥१॥ आतां खेपा शेगांवांत । करणें आहे कीं निमित्त ? । देव नसतां देव्हार्‍यांत । माळा बांधणें व्यर्थची ॥२॥ ऐसें कित्येक बोलती । परी ती असे साच भ्रांती । महाराजांची दिव्य ज्योति । अदृश्य आहे तेच ठायां ॥३॥ जेवीं इंद्रायणीचे तीरीं । ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी । ते आहेत भेटले परी । तेंच ठायीं भाविकां ॥४॥ तैशीच शेगांवांत । श्रीगजाननस्वामी समर्थ । ऐसा जयांचा सिद्धांत । दर्शन त्यांना तेथ होतें ॥५॥ ते विषयींची एक कथा । सांगतों मी येथ आतां । गणपत कोठाडे नामे होता । एक भाविक गृहस्थ ॥६॥ अस्तमानीं प्रति दिवशीं । यावें त्यानें मठासी । बैसोनियां समाधीपासीं । स्तवन करावें एकनिष्ठें ॥७॥ एकदां ऐसें वाटलें त्यास । अभिषेक करून समाधीस । उद्यांच्या विजयादशमीस । ब्राह्मणभोजन घालावें ॥८॥ केली सर्व तयारी । अभिषेकाची साजिरी । शिधा मठाभीतरीं । धाडिला मोठ्या प्रमाणांत ॥९॥ तैं कांता म्हणे हो प्राणनाथा ! । हें तुम्ही काय करितां । हाड नाहीं तुमच्या हातां । खर्च करण्याच्या बाबतींत ॥१०॥ उद्यां आहे विजयादशमी । म्हणून पोरांबाळांसी । कपडे अलंकार अंगासी । करून घाला कांही तरी ॥११॥ हें कांतेचें भाषण । गणपतरावा न रुचलें जाण । तो म्हणे प्रपंचाहून । श्रेष्ठ परमार्थ वाटे मला ॥१२॥ तोच त्याच्या कांतेसी । स्वप्न पडलें रात्रीसी । उगे न छळी पतीसी । तो करतो तें करूं दे ॥१३॥ अभिषेक ब्राह्मणभोजन । हें पारमार्थिक आहे पुण्य । त्याच्यासाठीं वेंचितां धन । तें न जाय अनाठायीं ॥१४॥ पेरलेल्या बीजापरी । त्याची स्थिती होते खरी । म्हणून सांगतों तुला पोरी । अडथळा त्या करूं नको ॥१५॥ ऐशा पाहून स्वप्नास । सांगती झाली पतीस । तेणें गणपतरावास । हर्ष झाला विबुध हो ॥१६॥ आले का हें प्रत्यंतर । महाराज येथेंच साचार । सोडून द्यावा कुविचार । आजपासून कांहीं तरी ॥१७॥ असो गणपतरावानें । पूजन केलें आनंदानें । त्या दसर्‍याच्या मुहूर्तानें । खर्चही केला अत्युतम ॥१८॥ या गणपतरावाची । निष्ठा समर्थपदीं साची । जडली शुद्ध स्वरूपाची । होती पहिल्यापासून ॥१९॥ लक्ष्मण हरी जांजळाला । ऐसाच अनुभव एक वेळां । बोरीबंदरावरी आला । तो ऐका सांगतों ॥२०॥ कांहीं कामानिमित्त । लक्ष्मण गेला मुंबईत । हा समर्थांचा होता भक्त । पहिल्यापासून विबुध हो ॥२१॥ असो बोरीबंदरावरी । लक्ष्मण आला जाया घरीं । तों आगगाडीच्या धक्क्यावरीं । एक भेटला परमहंस ॥२२॥ आजानुबाहु उंच बांधा । दृष्टि नासाग्रासी सदा । ओंकाराचा सर्वदा । जप चालला त्याच्या मुखीं ॥२३॥ तो बोलला लक्ष्मणास । तूं गजाननाचा आहेस शिष्य । ऐसें असून हताश । कां होतोस कळेना ? ॥२४॥ तूं आपुल्या जेव्हां घरीं । पुण्यतिथि केलीस खरी । चारशें पानांची तयारी । करून अमरावतीला ॥२५॥ पुत्रशोक बापटासी । झाला असून प्रसादासीं । तो तुझ्या गेहासी । आला होता ना सांग तें ॥२६॥ पेठकराचे ब्राह्मण भले । सांग कशानें राहिले ? । अरे गजाननस्वामी गेले । त्या उभयतांच्या स्वप्नांत ॥२७॥ उपदेश करून दोघांस । आणिले होतें प्रसादास । हें कैसें विसरलास ? । सांग मला ये वेळीं ॥२८॥ खुणेच्या गोष्टी ऐकून । साशंक झाला लक्ष्मण । म्हणे हा असावा कोण । हें कांहीं कळत नसे ॥२९॥ लक्ष्मणें त्या संन्याशाला । आदरें नमस्कार केला । तो पाहातां पाहातां गुप्त झाला । बोरीबंदर स्टेशनासी ॥३०॥ मग लक्ष्मण येऊन घरीं । वागूं लागला पहिल्यापरी । प्रतिवर्षी आपुल्या घरीं । पुण्यतिथीचा प्रारंभ केला ॥३१॥ अवधूत जयराम खेडकरासी । राहीत साहीत गांवांसी । भेटते झाले पुण्यराशी । संन्याशाच्या वेषानें ॥३२॥ एक माधव मार्तंड जोशी । होता रेव्हेन्यु ऑफिसर । त्याचा गजानन साधुवर । पूर्ण होता भरवंसा ॥३३॥ कळंबासी दिवसभर मोजणी केली । पुढें त्यास इच्छा झाली । अस्तमानाचे समयां भली । शेगांवास जाण्याची ॥३४॥ आज गुरुवारचा आहे दिन । घेऊं समर्थांचें दर्शन । ऐसा विचार करून । आज्ञा केली शिपायाला ॥३५॥ जोड आपुली वेगें दमणी । जाऊं शेगांवालागूनी । रात्र तेथें काढूनी । येऊं सकाळीं परत पुन्हां ॥३६॥ तईं तो शिपाई कुतुबुद्दीन । बोलला कर जोडून । आभाळ आलें भरून । याचा विचार करावा ॥३७॥ जोशी म्हणाले त्यावर । अरे आतां होऊं नदीपार । जा दमणी करी तयार । उगीच सबबी सांगूं नको ॥३८॥ शिपायानें जोडिली दमणी । आला लगेंच घेऊनी । जोशी आंत बैसोनी । जाऊं लागले शेगांवा ॥३९॥ दमणी घातली नदींत । तों पाणी आलें अकस्मात । जाण्या बैल तटाप्रत । अवसर नाहीं राहिला ॥४०॥ झंझावात बळावला । कडकडाट करी चपला । मन नदीला पूर आला । क्षणामाजीं भयंकर ॥४१॥ शिपाई म्हणे कुतुबुद्दीन । साहेब येथेंच आलें मरण । तुम्हां आम्हांलागून । उपाय यासी आतां नसे ॥४२॥ तईं माधव मार्तंड जोशी । घाबरे झाले निजमानसीं । बाहूं लागले समर्थांसी । करुणायुक्त वचानें ॥४३॥ हे समर्थ गजानना । रक्षणा आमुच्या करी प्राणां । अशा संकटीं तुझ्याविणा । त्राता न कोणी आम्हांतें ॥४४॥ जोशी म्हणाले समर्था । अगाध आहे तुझी सत्ता । वाटेल तें करी आतां । तारी अथवा मारी आम्हां ॥४५॥ तो ऐशा महापुरांतूनी । पैल तटा पावली दमणी । उभी राहिली येऊनी । सडकेवरी शेगांवाच्या ॥४६॥ ऐसा प्रकार पाहतां । आनंदले उभयतां । पाहा केवढीं अगाध सत्ता । आहे अवलीया बाबांची ॥४७॥ पुरामाजीं रक्षण केलें । निज भक्तां ना बुडूं दिलें । जोशी शेगांवाप्रती आले । एक घटका रात्रीस ॥४८॥ वंदन केलें समाधीला । पालखीचा पाहिला सोहळा । दुसरे दिवशीं बहुत केला । दानधर्म जोशांनीं ॥४९॥ साकल्य कथिलें वर्तमान । केली विनंती बाळाभाऊलागुन । हे नवसाचे ब्राह्मण । तुम्ही घाला माझ्यास्तव ॥५०॥ एक यादव गणेश सुभेदार । होता हिंगणीचा राहाणार । हा करीतसे व्यापार । वर्‍हाडांत कापसाचा ॥५१॥ यांस एके सालीं भला । दहा हजार तोटा आला । त्या चिंतेनें क्षीण झाला । कांहीं न सुचे मानसीं ॥५२॥ हा एकदां वर्ध्यांत । आला कांहीं कामानिमित्त । उतरण्या गेला घरांत । विनायक असिरकराच्या ॥५३॥ तों इतक्यात तेथें आला । एक भिकारी बुध हो भला । भिक्षां कांहीं मागण्याला । असिरकराच्या घरांत ॥५४॥ पोषाख अवघा मराठी । करामाजीं भव्य काठी । डोईस होती टोपी मोठी । बनातीची मळकट ॥५५॥ कंपवायुनें शरीर । कांपत होतें वरच्यावर । त्यास पाहातां असिरकर । चित्तीं परम कोपले ॥५६॥ जा बेट्या मागल्या द्वारीं । तेथें मिळेल भिक्षा खरी । नको चढूंस पायरी । ओसरीची ये वेळां ॥५७॥ परी हे बोल त्याचे । भिक्षेकरी न मानी साचे । येऊनी वरती ओसरीचे । यादवासन्निध बैसला ॥५८॥ घाल भिक्षा कांहीं तरी । असें म्हणून पुढें करी । भिक्षापात्र भिकारी । यादव सुभेदाराच्या ॥५९॥ त्यातें पाहातां न्याहाळून । तईं तो भासला गजानन । सुभेदाराकारण । शेगांवचा राजयोगी ॥६०॥ तेज मुद्रा बोलणें । होतें समर्थाप्रमाणें । तें पाहून ऐसें म्हणे । सुभेदार निज चित्तीं ॥६१॥ कांहीं असो पैसे दोन । देऊं भिकार्‍याकारण । श्रीगजानन समजून । ऊहापोह ज्याचा नको ॥६२॥ पैसे घेतले भिकार्‍यानें । आणिक कांहीं देई म्हणे । श्रीगजाननाकारणें । शेरणी वाट गुळाची ॥६३॥ ते वायदे करिसी वरचेवर । ते मी न आतां मानणार । तोटा दहा हजार । तुज व्यापारीं आला ना ? ॥६४॥ पुन्हां रुपये काढिले । भिकार्‍यासी अर्पिले । तों इतुक्यांत घरांत गेले । विनायकराव असिरकर ॥६५॥ यादवराव एकटा बसला । होता असिरकराच्या ओसरीला । तें पाहून बोलला । सुभेदारासी येणें रीतीं ॥६६॥ तुझ्या अवघ्या अंगावर । दृष्टि पडूं देई एकवार । माझीं तेणें होईल दूर । व्याधि तुझी यादवा ॥६७॥ रुपये घेऊन भिक्षेकरी । गेला द्वाराच्या बाहेरी । यादवानें बहुतापरी । तपास केला गांवांत ॥६८॥ सुभेदार म्हणे मानसीं । हे समर्थ असल्या आज दिवशीं । फायदा होईल व्यापारासी । कांहींतरी निःसंशय ॥६९॥ तों सुभेदाराच्या । गाड्या आल्या कापसाच्या । विकावयासाठीं साच्या । वर्ध्याचिया बाजारीं ॥७०॥ विक्री होतां किंमत । येती झाली तया बहुत । तेणें यादव चित्तांत । समाधान पावला ॥७१॥ आणि निश्चय ऐसा केला । जो भिकारी भेटला । तो होता समर्थ भला । श्रीगजानन योगीराज ॥७२॥ समर्थ आपुल्या भक्तांसी । रक्षण करती अहर्निशीं । निष्ठा मात्र त्यांचेविषयीं । दृढतर पाहिजे मनांत ॥७३॥ भाऊ राजाराम कवर । खामगांवीं होता डॉक्टर । त्याची तेल्हार्‍यावर । बदली असे जाहली ॥७४॥ म्हणून तेथें जाण्याला । खामगांवाहून निघाला । सहकुटुंब मठांत आला । घ्याया श्रींचें दर्शन ॥७५॥ गाडी केली तेल्हार्‍याची । तयारी केली निघण्याची । वेळ अस्तमानाची । असती झाली ते वेळां ॥७६॥ बाळाभाऊ मठाधिपती । तो त्या बोलला येणें रीति । अहो ऐका माझी विनंती । प्रसाद घेऊन जावें तुम्हीं ? ॥७७॥ ह्यांतून आहे व्यतिपात । हें आणावें मनांत । कवर सांगें त्याप्रत । मला निकड आहे बहु ॥७८॥ बोलल्याप्रमाणें निघाला । तेल्हार्‍यासी डॉक्टर भला । घेऊन मुलांमाणसांला । दमणीमाजीं बसून ॥७९॥ तों चमत्कार ऐसा झाला । तेल्हार्‍याचा रस्ता चुकला । कोणी न भेटे पंथाला । विचारावें कोणा जरी ॥८०॥ गाडी अरुंद रस्त्यावर । दोही बांजूस कांटे फार । गाडी उभी कांठावर । एका भव्य तलावाच्या ॥८१॥ म्हणतां झाला गाडीवाला । साहेब रस्ता आहे चुकला । हें ऐकून कवराला । आश्चर्य वाटलें मानसीं ॥८२॥ तूं तेल्हार्‍याचा म्हणून । तुझी गाडी केली जाण । आडमार्गें आणून । आम्हां कैसें सोडिलें ? ॥८३॥ ऐसें कवर बोलतां । गाडीवाला जोडी हातां । कां हो मजला शिव्या देतां ? । म्यां न अपराध केला कीं ॥८४॥ बैलही ना कोठें वळले । तें नीट येथेंच आले । तलाव पाहातां स्तब्ध झाले । हा न रस्ता तेल्हार्‍याचा ॥८५॥ मग कवर समजला मनांत । हें समर्थाचें आहे कृत्य । प्रसाद घेतल्याविरहित । कां कीं मी निघालों ॥८६॥ बाळाभाऊच्या विनंतीला । मीं नाहीं मान दिला । म्हणून माझा रस्ता चुकला । आतां वाट गवसे कशी ? ॥८७॥ हें भयंकर कानन । येथें मशी त्राता कोण । गजानना ! तुजवांचून । रक्षण माझें कराया ॥८८॥ तों तळ्याच्या दुसर्‍या बाजूला । घांगरमाळांचा आवाज झाला । डॉक्टराच्या कानीं पडला । तेणें आला थोडा धीर ॥८९॥ गाडीवाल्यासी म्हणे कवर । रस्ता नाहीं फार दूर । या चाहुलीचा सुमार । धरून गाडी हाण आतां ॥९०॥ तों हें शेगांवचें शिवार । आहे समजलें साचार । मग म्हणाला डॉक्टर । चाल शेगांवीं परत आतां ॥९१॥ सूर्योदयाचे समायाला । शेगांवासी कवर आला । वृत्तांत बाळाभाऊला । केला सर्व निवेदन ॥९२॥ मग बाळाभाऊ म्हणाले । हेंच आज बरें झालें । व्यतिपातीं न जाऊं दिलें । समर्थांनीं तुम्हांस ॥९३॥ संतांच्या जे असेल मनीं । तेंच येईल घडोनी । भरंवसा त्यांचे चरणीं । ठेवून स्वस्थ असावें ॥९४॥ दुसरे दिवशीं प्रसादासी । घेऊन गेला तेल्हार्‍यासी । आतां पुढील गोष्टीसी । अवधान द्यावें श्रवणातें ॥९५॥ एक रतनसा नामें नर । होता जातीनें भावसार । तयाचा मुलगा दिनकर । होता एक वर्षाचा ॥९६॥ त्यासी सोबणीचा रोग झाला । कोणी म्हणती सटावला । बालक अवघा सुकून गेला । रक्त न राहिलें अंगांत ॥९७॥ वैद्य म्हणती रतनसासी । आतां औषध न देईं यासी । हा तुझ्या हातासी । लागणें आहे अशक्य ॥९८॥ ऐसें ऐकून रतनसा । रडूं लागला ढसढसां । शेवटीं विचार त्यानें ऐसा । केला आपुल्या मानसीं ॥९९॥ येवींतेवी मरतें पोर । माझें आतां साचार । पाहूं करून एकवार । उपाय हा शेवटचा ॥१००॥ हातपाय गार झाले । नेत्रतेज मंदावलें । मनगटाचें सोडिलें । ठिकाण पाहा नाड्यांनीं ॥१०१॥ ऐशा स्थितिमाझारी । रतनसानें पुत्र करीं । घेऊन ठेविला असें द्वारीं । नेऊनिया समर्थांच्या ॥१०२॥ आणि केला त्यांसी नवस । पुत्र माझा उठल्यास । शेरणी वांटीन तुम्हांस । मी पांच रुपयांची ॥१०३॥ तुम्ही पावले अवघ्यांला । त्याचा अनुभव द्यावा मला । मीही आहे आपुला । माझी उपेक्षा करूं नका ॥१०४॥ माझें मूल द्वारांत । तुझ्या जरी झालें मृत । तरी अवघ्या वर्‍हाडांत । तुझी होईल नाचक्की ॥१०५॥ अमृततुल्य तुझी दृष्टि । त्याची करावी आज वृष्टि । नको करूंस मला कष्टी । महापुरुषा गजानना ! ॥१०६॥ त्यास कांहीं वेळ झाला । तों प्रकार ऐसा घडून आला । मूल हातापायांला । हालवावया लागलें ॥१०७॥ नाडी आली ठिकाणीं । रुदन करूं लागलें जाणी । तों प्रकार पाहूनी । लोक सारे आनंदले ॥१०८॥ समर्थकृपा झाल्यावर । राहील कोठून त्या दर ? । सूर्याचिया समोर । तमाचा तो पाड नसे ॥१०९॥ दिनकर थोडे दिवसांत । होता झाला पूर्वतत । नवस असला श्रद्धायुक्त । तो फळे हा न्याय असे ॥११०॥ दादा कोल्हटकरांचा । पुत्र राजा नांवाचा । आहे प्रसाद समर्थांचा । संतकृपा अमोल खरी ॥१११॥ कन्या रामचंद्र पाटलाची । चंद्रभागा नांवाची । ज्वान अठरा वर्षांची । लाडेगांव सासर जिचें ॥११२॥ लाडेगांवाहून माहेरीं । चंद्रभागा आली खरी । प्रसूतीस्तव निर्धारी । जनरीतीप्रमाणें ॥११३॥ मोठ्या कष्टानें प्रसूती । झाली तिची निश्चिती । तोंच चंद्रभागेवरती । ज्वरें अंमल बसविला ॥११४॥ तो होतां नवज्वर । थकून गेले डॉक्टर । औषधउपचार केले फार । आपुल्या मुलीस पाटलांनीं ॥११५॥ थोडाबहुत गुण आला । व्याधि तितक्यापुरता दबला । परी नव्हता मुळींच झाला । नामशेष देहांतूनी ॥११६॥ चंद्रभागा आजारी । पडूं लागली वरच्यावरी । मग पाटलानें केला विचार अंतरी । आतां वैद्य गजानन ॥११७॥ तारो अथवा मारो इसी । अंगारा लावा प्रतिदिवसीं । तीर्थ द्यावें प्यावयासी । समर्थांच्या पायांचें ॥११८॥ पिता मोठा निष्ठावंत । समर्थांवरी अवघा हेत । हळुंहळूं त्या पोरीप्रत । गुण येता जाहला ॥११९॥ तिला उठवत नव्हतें शय्येसी । तीच आली दर्शनासी । पायीं चालत मठासी । हें महत्त्व अंगार्‍याचें ॥१२०॥ निष्ठावंत ज्याचा भाव । तयाशीं पावे देव । उपास्यापदीं भाव । उपासकें ठेवावा ॥१२१॥ रामचंद्राची अंगना । जानकाबाई सुलक्षणा । परी दैवयोग सुटेना । तो भोगल्यांवाचुनी ॥१२२॥ वाताचा झाला विकार । जानकाबाईस साचार । पोट दुखे वरच्यावर । कांहीं उपाय चालेना ॥१२३॥ औषध देतां दबे वात । पुनः उठे पूर्ववत । ऐसा क्रम दिवस बहुत । चालला होता श्रोते हो ॥१२४॥ औषध उपाय बहुत केले । जाणतेही आणविले । गंडे बहुत बांधिले । करीं जानकाबाईच्या ॥१२५॥ पाटील बिचारा सारें करी । कांता बरी न होय परी । विचार त्यानें अखेरीं । ऐशा रीतीं ठरविला ॥१२६॥ वैद्य आतां गजानन । जाणता आतां गजानन । देव ऋषि आतां गजानन । तो जें वाटेल तें करो ॥१२७॥ माझी बायको सून त्याची । ही भावना माझी साची । आतां अन्य उपायांची । गरज नाहीं आम्हांला ॥१२८॥ तूं उद्यांपासून । प्रातःकाळीं करी स्नान । मठामाजीं जाऊन । घाली प्रदक्षिणा समाधीसी ॥१२९॥ तें तिनें पतीचें वचन । सर्वथैव केलें मान्य । समर्थ समाधीलागून । घालूं लागली प्रदक्षिणा ॥१३०॥ गेल्या न त्या मात्र वायां । दया आली सद्‌गुरुराया । वातविकार जाऊनियां । निर्दोष ती जाहली ॥१३१॥ खर्‍या खर्‍या संतांची । सेवा न जाई वायां साची । परी निष्ठा मानवाची । जडणें तेथें अशक्य ॥१३२॥ समर्थांच्या नंतर । बाळाभाऊ गादीवर । बसले त्यांचे चमत्कार । कांहीं थोडे जाहले ॥१३३॥ हे वैशाख वद्य षष्ठीसी । शेगांवीं गेले वैकुंठासी । त्यांच्यामागून गादीसी । बसले येऊन नारायण ॥१३४॥ कांहीं दिवस यांनींही । अधिकार चालविला ते ठायीं । यांची समाधि झाली पाही । चैत्र शुद्ध षष्ठीला ॥१३५॥ पूर्वसुकृतावांचून । संतसेवा न घडे जाण । संतसेवेचें महत्पुण्य । त्या पुण्या पार नसे ॥१३६॥ श्रीगजाननलीलेचा । पार कधीं न लागायाचा । अंबरीच्या चांदण्यांचा । हिशेब कोणा न लागे कधीं ॥१३७॥ त्यानें जें जें वदविलें । तें तें मीं कथित केलें । लेखणीनें अक्षर लिहिलें । परी तें न तिचें सामर्थ्य ॥१३८॥ त्यांच्या कृपेंकरून । मीं हें केलें लेखन । येथें माझें मोठेपण । कांहींच नाहीं विबुध हो ! ॥१३९॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति विंशोऽध्यायः समाप्तः ॥

No comments:

Post a Comment