Feb 11, 2022

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय ७


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय हा मारुतीचा उत्सव । करीत होता अवघा गांव । याचा पुढारी खंडेराव । पाटील गणेशकुळीचा ॥१॥ हें पाटील घराणें जाण । आहे अति पुरातन । घरचें धन कनकसंपन्न । पसारा थोर शेतीचा ॥२॥ पूर्वीपासून यांच्या घरीं । संतसेवा होती खरी । आली भाग्ये जमेदारी । मग काय विचारतां ? ॥३॥ महादाजी पाटलास । दोन मुलगे औरस । थोरल्या त्या पुत्रास । नांव असे कडताजी ॥४॥ कुकाजी तो धाकटा । पंढरीचा भक्त निका । गोमाजीचा उपदेश देखा । होता या घराण्यातें ॥५॥ पाटील कडताजी कारण । मुलगे होते सहा जण । कुकाजी नुसता भाग्यवान । पुत्र नव्हतां त्याचे कुशी ॥६॥ कडताजी पावतां मरण । साही मुलांचे संगोपन । कुकाजीनें केलें जाण । जन्मदात्या बापापरी ॥७॥ कुकाजीच्या अमदानींत । भरभराट झाली बहुत । अष्टसिद्धी सदनांत । वाटे नांदूं लागल्या ॥८॥ पाटील कुकाजीनंतर । खंडू करी कारभार । याच्या पुढें साचार । कांहीं न चालें कोणाचें ॥९॥ या खंडू पाटलाप्रती । पांच बंधू निश्चिती । गणपती नारायण मारुती । हरी आणि कृष्णाजी ॥१०॥ बंधु सारे तालीम करिती । दांडपट्टे खेळती । कुस्तीचा तो षोक अती । होता हरी पाटलास ॥११॥ उत्सव नांवास मारुतीचा । तरी जयजयकार पाटलाचा । म्हणतील तो शब्द त्यांचा । झेलणें भाग रयतेला ॥१२॥ असो पाटीलबंधूंनीं । राऊळांत येऊनी । महाराजातें हेटाळणी । करण्याचें तें सुरु केलें ॥१३॥ त्यांचे बोल ऐकावें । समर्थांनीं न उत्तर द्यावें । अवघें हंसण्यावारी न्यावें । कोप न धरावा यत्किंचित्‌ ॥१४॥ ऐसा उर्मट प्रकार । मंदिरीं चाले निरंतर । म्हणून पाटील भास्कर । समर्थासी ऐसें वदला ॥१५॥ नका महाराज येथें राहूं । चला आकोलीं ग्रामा जाऊं । हीं पाटील पोरें माजलीं बहु । यांचा नको संबंध ॥१६॥ हे शक्तीनें माजले । लक्ष्मीनें धुंद झालें । सत्तेपुढें कांहीं न चाले । येथे यांची पाटीलकी ॥१७॥ गजानन बोलले त्यावरी । भास्करा थोडा दम धरी । ही पाटील मंडळी सारी । आहेत माझे परमभक्त ॥१८॥ हीं पोरें पाटलाचीं । माझीं लेकरें आहेत साचीं । कृपा आहे संतांची । यांच्या कुळावर भास्करा ॥१९॥ एके दिवशीं पाटील हरी । आला मारुतीच्या मंदिरी । महाराजांला धरुन करीं । म्हणे कुस्ती करी माझ्यासवें ॥२०॥ तुला कुस्तीत करीन चीत । चाल जाऊं तालमीत । उगे न बैसे ऐसें म्हणत । गण गण गणांत बोते ॥२१॥ तुझें प्रस्थ माजले बहु । तें खरें खोटें आज पाहूं । मला पाडसी तरी देऊं । तुला मोठें बक्षीस ॥२२॥ तें समर्था मानवलें । दोघें तालमीमध्ये गेलें । समर्थांनीं कौतुक केलें । तें आतां परियेसा ॥२३॥ खालीं बसले गजानन । उठीव आतां मजलागून । असलास जरी पैलवान । तरी साच करशील हें ॥२४॥ हरी पाटील उठवावया । लागला यत्‍न करावया । परी ते अवघे गेले वायां । हालेनात समर्थ मुळीं ॥२५॥ घामाघूम तनु झाली । शक्तीची ती कमाल केली । पेंच झाले निर्बळी । समर्थांसी झुंजतां ॥२६॥ हरी म्हणे मनांत । हा केवढा तरी सशक्त ? । अचल ऐसा पर्वत । याच्यापुढें येईल उणा ॥२७॥ हा किडकिडीत दिसतो जरी । शक्ति याची गजापरी । खोड्या आमुच्या नानापरी । आजवरी यानें सहन केल्या ॥२८॥ समर्थ म्हणाले हरीला । आतां बक्षिस द्या आम्हांला । ना तरी चीत मजला । तुवां करावें कुस्तींत ॥२९॥ तुझ्याप्रमाणें पूतनारी । पाटील होता यमुनातिरीं । गोकुळींचीं पोरें सारीं । त्यानें केलीं सशक्त ॥३०॥ तैसें तुवां करावें । शरीरबला वाढवावें । ना तरी हें सोडावें । पाटील नांव आपुलें ॥३१॥ हेंच बक्षीस द्यावें मज । ना तरी कुस्ती करी आज । येणें रिती उतरला माज । समर्थांनीं हरीचा ॥३२॥ हरी म्हणे समर्थांस । आपुली कृपा असल्यास । शेगांवच्या लेकरांस । सशक्त करितां येईल कीं ॥३३॥ असो त्या दिवसापासून । हरीने दिलें सोडून । अद्वातद्वा भाषण । करणें पुण्यपुरुषाशीं ॥३४॥ ही पाहोनि त्याची कृति । इतर बंधु बोलती । हरी तूं त्या जोगड्याप्रति । कां भितोस कळेना ॥३५॥ चाल परीक्षा तयाची । आज आपण करुं साची । मोळी घेऊन ऊंसाची । मंदिरांत पातले ॥३६॥ हरी न कांहीं बोलला । इतरांनीं प्रश्न केला । अरे पिशा या ऊंसाला । खातोस कां तूं सांग हें ? ॥३७॥ जरी ऊंस खाण्याची । इच्छा असेल तुला साची । तरी एक अट आमुची । आहे ती तूं मान्य करी ॥३८॥ आम्ही ऊंसाचे करुं प्रहार । तुझ्या येधवां अंगावर । त्याचे वळ ना उठले जर । तरीच योगी मानूं तुला ॥३९॥ ऐसें भाषण ऐकिलें । महाराज कांहीं न बोलले । लेंकराचे बालिश चाळे । मनीं न आणीं सुज्ञ कदा ॥४०॥ तें दोघां तिघां मानवलें । ऊंस करीं घेतले । समर्थांसी मारण्या भले । आले चढून अंगावर ॥४१॥ तें पाहतां नारीनर । मंदिरीं जे होते इतर । ते पळूं लागले भराभर । भास्कर तेवढा जवळ असे ॥४२॥ भास्कर म्हणे पोरांसी । नका मारुं समर्थांसी । या ऊंसानें आज दिवशीं । हें कांहीं बरें नव्हे ॥४३॥ हे महासाधु तुम्हांसी । जरी न वाटतील मानसी । तरी हीन दीन लेखून यासी । द्यावे सोडून हेच बरें ॥४४॥ यावरी म्हणती पोरें । तुमचें भाषण ऐकिले सारें । गांवींचे लोक अत्यादरें । योगयोगेश्वर म्हणती या ॥४५॥ म्हणून त्याचा पहाया योग । येथें आलों आम्ही चांग । यात न घ्यावा तुम्ही भाग । पहा मौज दुरुनी ॥४६॥ ऊंस घेऊन हातांत । मारुं लागले समर्थांप्रत । जैशा का झोडितात । ओंब्या शेतीं कृषीवल ॥४७॥ परि न महाराज डगमगले । मुलां पाहून हंसत बसले । कोठेंही ना उमटले । वळ त्यांच्या अंगावर ॥४८॥ तें पहातां पोरें भ्यालीं । चरणीं त्यांच्या लागलीं । म्हणती खराच आहे बली । हा योगयोगेश्वर ॥४९॥ महाराज म्हणती पोरांला । मुलांनो तुमच्या कराला । असेल अति त्रास झाला । मारण्यानें मजलागी ॥५०॥ त्या श्रमाचा करण्या नाश । काढून देतो इक्षुरस । तुम्हांलागीं प्यावयास । या बसा माझ्यापुढें ॥५१॥ ऐसे म्हणून घेतला । एक ऊंस करीं भला । हातानेंच पिळून त्याला । रस काढिला पात्रामध्यें ॥५२॥ त्या ऊंसांची अवघी मोळी । समर्थांनी पहा पिळिली । आणि प्यायाकारणें दिली। रस नव्हाळी पोरांस ॥५३॥ श्रीगजानन पुण्य पुरुष । चरकावांचून काढिला रस । तें पाहातां बालकांस । अति आनंद जाहला ॥५४॥ लोक म्हणती ही योगशक्ति । दंतकथा मुळीं नसती । योगें जी का प्राप्त होती । त्या शक्तीला च्युति नसे ॥५५॥ समर्थांसी वंदून । गेलीं पोरें निघून । खंडू पाटलाकारण । वर्तमान श्रुत केलें ॥५६॥ दादा आपुल्या गांवांत । गजानन ईश्वर साक्षात्‌ । त्याचा आज आम्हांप्रत । आला आहे प्रत्यय ॥५७॥ ऐसें म्हणून कथिली सारी । हकीकत त्याला खरी । ती ऐकतां अंतरीं । खंडू पाटील चकित झाला ॥५८॥ मग तोही दर्शनाला । समर्थांच्या येऊं लागला । परी मार्दव वाणीला । मुळीं नव्हतें यत्किंचित्‌ ॥५९॥ गण्या गण्या म्हणे वाणी । परी प्रेम उपजे अंतःकरणी । पहा नारळालागुनी । वर करवंटी खोबरे आंत ॥६०॥ याच न्याये तयाचा । परिपाठ होता बोलण्याचा । वृद्धापकाळ कुकाजीचा । झाला म्हणून कारभार करी ॥६१॥ कुकाजी तो एके दिवशीं । बोलतां झाला खंडूशीं । तूं जातोस प्रतिदिवशीं । महाराजांच्या दर्शना ॥६२॥ सांगतोस मला साक्षात्कारी । गजानन एक भूमीवरी । मग कां रे तुझी वैखरी । मुग्ध होते त्यांच्यापुढें ॥६३॥ तुला नाहीं पोरबाळ । माझा झाला वृद्धापकाळ । नातवंडाचे बोल खेळ । पाहू दे मज डोळ्यानें ॥६४॥ आज विनंती करी त्यांना । स्वामी समर्थ गजानना । म्हणावें त्या करुन करुणा । पोर एखादे द्या मज ॥६५॥ तो खरा साधु असल्या सत्य । पुरतील तुझे मनोरथ । आणि माझाही अवघा हेत । तडीस जाईल त्यायोगें ॥६६॥ साधु पुरुषा अशक्य कांहीं । जगत्रयीं या उरलें नाहीं । संतलाभाचा करुन घेई । कांहीं आपणां उपयोग ॥६७॥ तें खंडूतें मानवलें । एके दिवशीं बोलणे केलें । मारुतीच्या मंदिरीं भले । तें ऐका येणें रिती ॥६८॥ अरे गण्या माझा चुलता । वृद्ध झाला आहे आतां । इच्छा उपजली त्याच्या चित्ता । नातवंड तें पाहण्याची ॥६९॥ तुला लोक साधु म्हणती । दर्शन केल्या तुजप्रती । इच्छा मनींच्या पूर्ण होती । ऐसें लोक सांगतात ॥७०॥ त्याचें दावी प्रत्यंतर । उगा नको करुं उशीर । तुझ्या पायीं ज्याचें शिर । तो कां रहावा निपुत्रिक ? ॥७१॥ ऐसें भाषण ऐकिलें । महाराज त्यासी बोलले । आज हें उत्तम घडून आलें । त्वां याचना केली आम्हां ॥७२॥ याचना म्हणजे मागणें भीक । हें तूं आज केलें देख । तुला होईल बालक । भिक्या नांव ठेव त्याचें ॥७३॥ पुत्र देणें माझ्या करीं । सर्वतोपरी नाहीं जरी । परी मी विनंती करीन खरी । तुझ्यासाठी परमेश्वरा ॥७४॥ हें मम मानी प्रमाण वचन । पुत्र होईल तुजकारण । आम्ररसाचें भोजन । दरसाल घाली ब्राह्मणां ॥७५॥ हें खंडूनें ऐकले । घरीं येऊन सांगितलें । कुकाजीसी निवेदिलें । मंदिराचें वर्तमान ॥७६॥ हें ऐकतां कुकाजीस । आनंद झाला बहुवस । तो कांहीं लोटतां दिवस । समर्थ वचन झालें खरें ॥७७॥ कांता खंडू पाटलाची । गंगाबाई नांवाची । गर्भिणी झाली साची । नवमास पूर्ण झाले ॥७८॥ तिजलागीं पुत्र झाला । खंडू पाटील आनंदला । कुकाजीच्या हर्षाला । पारावार कांहीं नसे ॥७९॥ त्यानें धर्म केला बहु । गरीबां दिले गूळ गहूं । पेढे-बर्फीचा दिला खाऊ । गांवांतील अर्भकांना ॥८०॥ थाटांत झालें बारसें । भिकू नांव ठेविलेंसें । पुढें बाळ वाढला असे । शुक्लपक्षीच्या इंदुपरी ॥८१॥ आम्ररसाचें भोजन । दिलें ब्राह्मणांकारण । तो संप्रदाय अजून । शेगांवांत चालत असे ॥८२॥ पुण्यपुरुषाची वैखरी । कोठून होईल असत्य तरी । पाटलाच्या ओसरीवरी । बाळ रांगूं लागला ॥८३॥ हा बोलबाला पाटलाचा । देशमुखां पटला न साचा । शेगांव हा दुफळीचा । गांव पहिल्यापासून ॥८४॥ एक फळी देशमुखांची । एक फळी पाटलांची । अंतःकरणें एकमेकांचीं । मुळीं होतीं अशुद्ध ॥८५॥ प्रत्येक आपुल्या डावांत । एकमेकांचा करण्या घात । सदा इच्छिती मनांत । लेश नसे प्रेमाचा ॥८६॥ पुढें गोष्ट झाली ऐशी । कुकाजी झाले स्वर्गवासी । पाहूनिया नातवंडासी । भीमातटी पंढरींत ॥८७॥ तेणें खंडूचें उद्विग्न मन । गेलें सहज होऊन । तो म्हणे छत्र पूर्ण । माझे आज ढासळलें ॥८८॥ ऐशी संधि पाहून । बालंट आणाया कारण । पाटलावरी सवड पूर्ण । मिळाली देशमुखमंडळीला ॥८९॥ तो वृत्तांत अष्टमांत । सांगेन श्रोते तुम्हांप्रत । ही जमेदारी खाण सत्य । आहे प्रत्यक्ष द्वेषाची ॥९०॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति सप्तमोऽध्यायः समाप्तः ॥

No comments:

Post a Comment