Feb 11, 2022

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय ५


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय गजानन असतां शेगांवीं । यात्रा येई नित्य नवी । ती कोठवरी वर्णावी ? । पार न लागे तियेचा ॥१॥ महिमा तो वाढला फार । म्हणून गजानन साधूवर । ती उपाधि करण्या दूर । भटकू लागले काननीं ॥२॥ महिना महिना तिकडेच राहावें । वाटेल तेथेंच बैसावें । कोणाशीं न उमगूं द्यावें । चरित्र आपुलें येतुलेही ॥३॥ श्रोते एका समयासी । महाराज पिंपळगांवासी । गेले तेथे गोष्ट कैसी । झाली ते अवधारा ॥४॥ त्या पिंपळगांवच्या शिवारांत । होतें एक अरण्यांत । शंकराचे मंदिर सत्य । जुनें पुराणें हेमाडपंती ॥५॥ ऐशा त्या मंदिरी । येते झाले साक्षात्कारी । बैसले शिवाच्या गाभारी । लावोनिया पद्मासन ॥६॥ गुराखी त्या गांवचे । आपापले कळप गुरांचे । घेऊनिया निघाले साचे । अस्तमानीं गांवाकडे ॥७॥ कोणी सहज मंदिरांत । गेले वंदण्या शिवाप्रत । तो तेथें पाहोन समर्थ । आश्चर्यचकित जाहले ॥८॥ याचें आता पूजन । करु अवघे आपण । जा स्नानालागून । पाणी आणा ओढयाचे ॥९॥ पोरें गेलीं ओढयावरी । गेळ्यामध्ये आणिलें वारी । परमभावें पायांवरी । घालिते झालें समर्थांच्या ॥१०॥ कोणी वन्यपुष्पें आणिलीं । माळ त्यांची तयार केली । कंठामध्यें घातिली । गुराख्यांनीं साधूच्या ॥११॥ कोणी कांदाभाकर । नैवेद्यार्थ साचार । दिली ठेवून समोर । एका वडाच्या पानावरी ॥१२॥ गुराख्यांनीं केलें नमन । आदरें भाव धरुन । कांहीं वेळ केलें भजन । पुढें बसून समर्थांच्या ॥१३॥ ऐसा आनंद चालला । तो गुराखी एक बोलला । अरे वेळ बहु झाला । चला आतां गांवाकडे ॥१४॥ या साधूची हकीकत । आपण सांगूं गांवांत । शहाण्या वडील माणसांप्रत । म्हणजे येईल कळून कीं ॥१५॥ तें अवघ्यांसी मानवलें । गुराखी सर्व निघून गेले । गांवामाजीं कळविलें । मंदिराचें अवघे वृत्त ॥१६॥ पुढें श्रोते प्रातःकाळीं । आली गांवची मंडळी । समर्थांसी पाहाण्या भली । गुराख्यांच्या बरोबर ॥१७॥ जैसा काल होता बसला । तैसाच आता पाहिला । भाकरीसी ना स्पर्श केला । ती जशीच्या तशीच आहे कीं ॥१८॥ म्हणूं लागले गांवकरी । हा योगी पुरुष कोणी तरी । आहे बैसला मंदिरीं । सांप्रत या शंकराच्या ॥१९॥ हा समाधी उतरील । तेव्हां कांहीं बोलेल । ती उतरण्या आहे वेळ । त्याला त्रास देऊं नका ॥२०॥ ऐसी भवती न भवती झाली । एक पालखी आणविली । त्यांत उचलून ठेविली । समर्थांची मूर्ति पाहा ॥२१॥ ग्रामांतील नारीनर । अवघे होते बरोबर । पुढें वाजंत्र्यांचा गजर । होत होता विबुध हो ! ॥२२॥ मिरवणूक आली गांवांत । मारुतीच्या मंदिरांत । बसविले आणून सद्‌गुरुनाथ । एका भव्य पाटावरी ॥२३॥ तोही दिवस तैसाच गेला । मग लोकांनीं विचार केला । आपण करुं स्तवनाला । उपाशी बसून याच्यापुढें ॥२४॥ ऐसा जो ते विचार करिती । तो आले देहावरती । गजानन श्रीसद्‌गुरुमूर्ति । मुगुटमणी योग्यांचे ॥२५॥ मग काय विचारतां । आनंद झाला समस्तां । प्रत्येक स्त्रीपुरुष ठेवी माथा । स्वामीचिया चरणांवरी ॥२६॥ नैवेद्याची धूम झाली । ज्यानें त्यानें आणिलीं । पात्रें तीं वाढून भली । मारुतीच्या मंदिरांत ॥२७॥ त्या अवघ्यांचा स्वीकार । समर्थें केला थोडाफार । हाळोपाळींत साचार । ही वार्ता श्रुत झाली ॥२८॥ पुढें दुसर्‍या मंगळवारीं । पिंपळगांवचे गांवकरी । आले बाजारा निर्धारीं । शेगांवाकारणें ॥३४॥ ते शेगांवच्या लोकांसी । सहज बोलले प्रेमेसी । आमच्याही गांवांसी । आला एक अवलिया ॥२९॥ शेगांवचे बाजारांत । जिकडे तिकडे हीच मात । बंकटलाला झालें श्रुत । वर्तमान तें अवलियाचें ॥३०॥ बंकटलाल पत्‍नीसहित । गेला पिंपळगांवांत । समर्थांसी जोडोन हात । विनवूं लागला नानापरीं ॥३१॥ आत्तां येतो म्हणून । निघून गेलात आपण । त्यास झाले पंधरा दिन । याचा विचार करा हो ॥३२॥ कित्येक दयाळा आपुले भक्त । राहिले असती उपोषित । त्या शेगांव शहरांत । नित्य दर्शन घेणारे ॥३३॥ तुम्ही न आल्या शेगांवीं । मी ही तनु त्यागीन वरवी । आमुची सांगा पुरवावी । आळ कोणी गुरुवर्या ? ॥३४॥ बंकटलाल ऐसें वदले । महाराज गाडीवरी बसले । शेगांवासी निघाले । पिंपळगांवा सोडून ॥३५॥ पिंपळगांवच्या लोकांप्रती । बंकटलाल समजाविती । नका होऊं दुःखित चित्तीं । जाती न कोठें लांब साधु ॥३६॥ वाटेल तेव्हां दर्शना यावें । हेतु आपुलें पुरवावें । जेथल्या तेथें असूं द्यावें । या अमोल मूर्तीला ॥३७॥ पथीं जातां गुरुमूर्ति । बोलली बंकटलालाप्रती । ही कां साहूची होय रीति । माल दुसर्‍याचा बळें न्यावा ! ॥३८॥ ऐसें ऐकतां हंसूं आलें । बंकटलालाप्रती भलें । विनयानें भाषण केलें । तें ऐका सावचित्तें ॥३९॥ जेथें बाळ तेथें आई । तेथें दुज्याचा पाड काई ? । आपुल्या पायापुढें नाहीं । मला धनाची किंमत ॥४०॥ इतकीच माझी विनंती । शेगांवीं असो वस्ती । धेनू काननातें जाती । परी येती घरी पुन्हां ॥४१॥ तसेंच तुम्हीं करावें । अवघ्या जगां उद्धरावें । परी आम्हां न विसरावें । शेगांवीं यावें वरचेवर ॥४२॥ ऐसी समजूत घालून । शेगांवीं आणले गजानन । तेथें कांहीं दिवस राहून । निघून गेले पुनरपि ॥४३॥ ती ऐकावी तुम्ही कथा । सांगतों मी इथें आतां । अडगांव नामें ग्राम होता । एक तया वर्‍हाड प्रांतीं ॥४४॥ त्या ग्रामाकारण । जाया निघाले दयाघन । प्रातःकाळीं चुकवून । नजर शेगांवकरांची ॥४५॥ मास होता वैशाख । सोळा कलांनीं तपे अर्क । क्वचित्‌ कोठें न राहिलें उदक । ऐसा प्रखर उन्हाळा ॥४६॥ माध्यान्हीच्या समयाला । अकोली गांवापासी आला । हा योगयोगेश्वर साधु भला । गजाननमहाराज ॥४७॥ तों काय घडले वर्तमान । समर्थांसी लागली तहान । करिती चौफेर अवलोकन । तों उदक कोठें दिसेना ॥४८॥ अंगावाटे चालल्या धारा । घामाच्या त्या एकसरा । अधरोष्ठ तो सुकला खरा । उदकाविण समर्थांचा ॥४९॥ ऐशा दुपारच्या अवसरीं । भास्कर नामें शेतकरी । घालीत होता पाळी खरी । आपुल्या त्या शेताला ॥५०॥ त्या अकोलीच्या शिवारांत । जलाचें दुर्भिक्ष्य अत्यंत । एक वेळा मिळेल घृत । परि अभाव पाण्याचा ॥५१॥ आपणांतें प्यावयासी । भास्करानें शेतासी । आणिलें खापराच्या घागरीसी । उदक होतें गांवांतून ॥५२॥ ती घागर झुडुपाखालीं । होती भास्करें ठेविली । त्या ठिकाणीं स्वारी आली । भास्करा जल मागावया ॥५३॥ समर्थ म्हणती भास्कराला । तहान बहुत लागली मला । पाणी दे बा प्यावयाला । नाहीं ऐसें म्हणूं नको ॥५४॥ पुण्य पाणी पाजण्याचें । आहे बापा थोर साचें । पाण्यावांचून प्राणाचें । रक्षण होणें अशक्य ॥५५॥ भास्कर बोले त्यावर । तूं नंगा धूत दिगंबर । तुला दांडग्या पाजिता नीर । पुण्यलाभ कशाचा ? ॥५६॥ तुला ना देणार पाणी । नको करुं रे विनवणी । जा जा करी येथोनी । काळें आपलें चांडाळा ॥५७॥ हें भास्कराचें भाषण । समर्थांनीं ऐकून । थोडे करुनी हास्यवदन । निघोन गेले तेथोनिया ॥५८॥ थोड्या दूर अंतरावर । एक होती साच विहीर । तिकडे धांव अखेर । घेतली स्वामीरायांनीं ॥५९॥ स्वामी तिकडे जाऊं लागतां । भास्कर झाला बोलतां । उच्च स्वरें; वेड्या वृथा । तिकडे कशाला जातोस ? ॥६०॥ ती कोरडी ठणठणीत । आहे विहीर जाण सत्य । पाणी या एक कोसांत । नाही कोठे जाण पिशा ॥६१॥ समर्थ बोलले त्यावरी । ही सत्य तुझी वैखरी । विहिरींत पाणी नाहीं जरी । परी करितों प्रयत्‍न ॥६२॥ तुझ्यासारखे बुद्धिमान । जलाने होती हैराण । तें मी नयनीं पाहून । स्वस्थ ऐसा बसलों जरी ॥६३॥ तरी समाजहितासाठीं । काय मी केली सांग गोष्टी । साह्य होतो जगजेठी । हेतु शुद्ध असल्यावर ॥६४॥ समर्थ आले विहिरीपाशीं । तों थेंब नाहीं तियेशीं । हताश होऊन वृक्षापाशीं । बसले एका दगडावर ॥६५॥ डोळे मिटून केलें ध्यान । चित्तीं साठविला नारायण । जो सच्चिदानंद दयाघन । दीनोद्धार जगद्‌गुरु ॥६६॥ देवा ही आकोली । पाण्यावांचून त्रस्त झाली । वोलही ना राहिली । कोठेच देवा विहिरीतून ॥६७॥ मानवी यत्‍न अवघे हरिले । म्हणून तुजला प्रार्थिले । पाव आतां जगन्माऊले । पाणी दे या विहिरीला ॥६८॥ ऐसें विनवितां ईश्वरा । विहिरीलागीं फुटला झरा । उफाळ्याचा साजिरा । विहीर भरली क्षणामध्यें ॥६९॥ साह्य झाल्या जगन्नाथ । काय एक ना तें होत । ईश्वरी सत्ता अगाध सत्य । जें ना घडे तेंच घडवी ॥७०॥ तेथ पाणी समर्थ प्याले । तें भास्करानें पाहिलें । चित्त त्याचें घोटाळलें । कांहीं न च चाले तर्क त्याचा ॥७१॥ वर्षें झालीं द्वादश । जल नाहीं या विहिरीस । तिलाच एका घटकेस । यानें जलमय केली कीं ॥७२॥ यावरुन हा कोणीतरी । खचित आहे साक्षात्कारी । बळेंच फिरतो पिशापरी । हें आतां समजलें ॥७३॥ शेतीचें काम सोडून । भास्कर आला धांवून । धरितां झाला दृढ चरण । मुखें स्तोत्र आरंभिलें ॥७४॥ हे नरदेहधारी परमेश्वरा । हे दयेच्या सागरा । लेंकरासी कृपा करा । अर्भक मी तुमचें असें ॥७५॥ तुम्हांतें ना जाणून । मी बोललों टाकून । आतां पस्तावा झाला पूर्ण । क्षमा त्याची करा हो ॥७६॥ तैसा तुझा अधिकार । केवढा तरी आहे थोर । तें कळलें साचार । या जलाच्या कृतीनें ॥७७॥ कांहीं असो सद्‌गुरुनाथा । मी न सोडी तुम्हां आतां । लेंकरानें भेटतां । माये कोठें न रहावें कीं ॥७८॥ भास्करासी समर्थ म्हणती । ऐसा न होई दुःखित चित्तीं । आतां घागर डोक्यावरती । गांवांतून आणूं नको ॥७९॥ तुझ्यासाठीं हें जीवन । विहिरींत केलें निर्माण । आतां कशाची नुरली वाण । मग कां प्रपंच टाकिशी ? ॥८०॥ पाणी आलें तुझ्याकरितां । बगीचा तो लाव आतां । भास्कर म्हणे गुरुनाथा । हें आमीष दावूं नका ॥८१॥ पहा श्रोते संतसंगति । क्षणैक घडतां भास्कराप्रती । केवढी झाली उपरति । याचा विचार करा हो ॥८२॥ खर्‍या संताचें दर्शन । आगळें सर्व साधनांहून । तुकारामें केलें वर्णन । संत चरणरजाचे अभंगीं ॥८३॥ पाणी लागलें विहिरीस । ही वार्ता आसपास । पसरतां जन दर्शनास । धांवूं लागले स्वामींच्या ॥८४॥ तैसे श्रोते तेथ आले । लोक अपार मिळाले । विहिरीचें पाणी पाहिले । पिऊन त्यांनी तेधवां ॥८५॥ उदक निर्मळ शीत मधुर । गोड अमृताहून फार । करुं लागले जयजयकार । गजाननाचा लोक सारे ॥८६॥ असो पुढें भास्करासहित । अडगांवासी न जातां परत । महाराज आले शेगांवांत । श्रीगजानन सिद्धयोगी ॥८७॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति पंचमोऽध्यायः समाप्तः ॥

No comments:

Post a Comment