Feb 10, 2022

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय १


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय जयजयाजी उदारकीर्ती । जयजयाजी प्रतापज्योती । जयजयाजी हे गणपती ! । गौरीपुत्रा मयूरेश्वरा ! ॥१॥ आतां आदि माया सरस्वती । जी ब्रह्माची होय प्रकृती । जी कविवरांची ध्येयमूर्ती । ब्रह्मकुमारी शारदा ॥२॥ आतां हे पुराणपुरुषा । पांडुरंगा पंढरीशा । सच्चिदानंदा रमेशा । पाहि माम् दिनबंधो ॥३॥ हे भवभवान्तक भवानीवरा । हे नीलकंठा गंगाधरा । ओंकाररुपा त्र्यंबकेश्वरा । वरदपाणी ठेवा शिरीं ॥४॥ माझ्या कुळीची कुलदेवता । कोल्हापुरवासिनी जगन्माता । तिच्या पदीं ठेवितों माथा । मंगल व्हाया कारणें ॥५॥ हे दुर्गे तुळजे भवानी । हे अपर्णे अंबे मृडानी । ठेवी तुझा वरदपाणी । दासगणूच्या शिरावर ॥६॥ आतां वंदन दत्तात्रेया । पाव वेगीं मसीं सदया । गजाननचरित्र गाया । प्रसादासह स्फूर्ति दे ॥७॥ आतां शांडिल्यादि ऋषीश्वर । वसिष्ठ गौतम पाराशर । ज्ञाननभीं जो दिनकर । त्या शंकराचार्या नमन असो ॥८॥ आतां अवघ्या संतमहंता । नमन माझें सर्वथा । दासगणूच्या धरुन हाता । ग्रंथ करवा लेखन ॥९॥ संत हेच भूमिवर । चालते बोलते परमेश्वर । वैराग्याचे सागर । दाते मोक्षपदाचे ॥१०॥ त्या संतचरित्रास । श्रवण करा सावकाश । आजवरी ना कवणास । संतांनीं या दगा दिला ॥११॥ त्या संतांच्या तोडीचा । संत श्रीगजानन साचा । या अवतारी पुरुषाचा । प्रभाव खचित लोकोत्तर ॥१२॥ शेगांव नामें वर्‍हाडांत । ग्राम आहे प्रख्यात । खामगांव नामें तालुक्यांत । व्यापार चालें जेथ मोठा ॥१३॥ ग्राम लहान साचार । परि वैभव त्याचें महाथोर । ज्याचें नांव अजरामर । झालें साधूमुळें जगत्रयीं ॥१४॥ शेगांवचे पौरवासी । परम भाग्याचें निश्चयेसी । म्हणून लाधले तयांसी । गजानन हें संतरत्‍न ॥१५॥ रामचंद्र पाटलांनीं । केली माझी विनवणी । पंढरी क्षेत्रीं येऊनि । कार्तिकीच्या वारीला ॥१६॥ माझा मनीं हेत होता । गावें गजानन-चरित्रा । परी त्याची तत्त्वतां । संगत नाहीं लागली ॥१७॥ खर्‍या संताचें धोरण । न कळे कोणालागोन । महापुरुष गजानन । आधुनिक संत चूडामणी ॥१८॥ या महापुरुषाचा । ठावठिकाण कोणचा । वा पत्ता त्यांच्या जातीचा । इतिहासदृष्टया न लागे कीं ॥१९॥ जेवीं ब्रह्माचा ठावठिकाण । न कळे कोणा लागून । ते ब्रह्मास पाहून । निश्चय त्याचा करणें असे ॥२०॥ ऐन तारुण्याभीतरीं । गजानन आले शेगांवनगरीं । शके अठराशाभीतरीं । माघ वद्य सप्तमीला ॥२१॥ कोणी कोणी म्हणती जन । श्रीसमर्थांचें जें कां स्थान । त्या सज्जनगडाहून । या देशीं आले हे ॥२२॥ लोक अवघें भ्रष्ट झाले । नाना यातनें गांजले । त्यांच्यासाठीं वाटतें केलें । कौतुक ऐसें समर्थांनीं ॥२३॥ जगाचा करण्या उद्धार । गजाननरुपें अवतार । धरुन आले महीवर । पुन्हा समर्थसिद्धयोगी ॥२४॥ शेगांवीं माघमासीं । वद्य सप्तमी ज्या दिवशीं । हा उदय पावला ज्ञानराशी । पदनतातें तारावया ॥२५॥ त्या वेळची तुम्हां कथा । सांगतों मी ऐका आतां । एक भाविक गृहस्थ होता । नाम ज्याचें देविदास ॥२६॥ हा देविदास सज्जन । पातूरकराचा वंशज जाण । शाखा ज्याची माध्यंदिन । मठाधिपती होता तो ॥२७॥ त्याच्या एका मुलाची । ऋतुशांति होती साची । त्यानिमित्त भोजनाची । तयारी होती त्याचे घरा ॥२८॥ उष्टया पत्रावळी रस्त्यावर । टाकिल्या होत्या साचार । घराचिया समोर । त्या देविदास विप्राच्या ॥२९॥ तो गजानन समर्थसिद्धयोगी । बैसले होते तया जागीं । एक बंडी होती अंगीं । जुन्या पुराण्या कापडाची ॥३०॥ कोणत्याही उपाधीचें । नांव नव्हतें जवळीं साचें । पात्र पाणी प्यावयाचें । होता एक भोपळा ॥३१॥ कच्ची चिलीम हातांत । जी होती तयांची स्वकृत । कुंभाराच्या भट्टीप्रत । जिनें नव्हतें पाहिलें ॥३२॥ नासाग्र दृष्टि मुद्रा शांत । तपोबल अंगीं झळकत । प्राचीच्या बालरवीवत् । वर्णन किती करावें ॥३३॥ मूर्ति अवघी दिगंबर । भाव मावळला आपपर । आवडनिवड साचार । राहिली न जवळी जयाच्या ॥३४॥ ती समर्थांची स्वारी । बैसोनिया रस्त्यावरी । शोधन पत्रावळींचे करी । केवळ निजलीलेनें ॥३५॥ शीत पडल्या दृष्टीप्रत । तें मुखीं उचलुनी घालीत । हें करण्याचा हाच हेत । अन्न परब्रह्म कळवावया ॥३६॥ त्याची पटवावया खूण । शितें वेंचती दयाघन । त्याचा सामान्य जनालागून । भावार्थ तो कळला नसे ॥३७॥ बंकटलाल आगरवाला । होता रस्त्यानें चालला । त्याने हा प्रकार पाहिला । आपल्या त्या स्नेह्यासह ॥३८॥ दामोदरपंत कुलकर्णी । त्याच्या स्नेह्याचें नांव जाणी । दोघें तो प्रकार पाहोनी । आश्चर्यचकित जाहले ॥३९॥ बंकटलाल म्हणे पंतासी । ऐसेच उभे रस्‍त्यासी । आपण राहूं यत्कृतीसी । अजमावयाकारणें ॥४०॥ प्रथमता तो पुढें झाला । बंकटलाल आगरवाला । गजाननासी विचारण्याला । विनयानें येणें रीतीं ॥४१॥ ह्या पत्रावळीच्या शोधना । कां हो करितां कळेना । क्षुधा असेल आपणां । तरी तरतूद करुं अन्नाची ॥४२॥ त्यानें ऐसें विचारिलें । परि न उत्तर मिळालें । नुसतें वरी पाहिलें । उभयतांच्या मुखाकडे ॥४३॥ तो सतेज कांती मनोहर । दंड गर्दन पिळदार । भव्य छाती दृष्टि स्थिर । भृकुटी ठायीं झाली असे ॥४४॥ निजानंदीं रंगलेला । ऐसा योगी पाहिला । मौनेंच नमस्कार केला । चित्तीं संतोष पावोनियां ॥४५॥ देविदासबुवासी । सांगूं लागले प्रेमेंसी । तुम्ही पात्र वाढून वेगेंसी । आणा एक बाहेर ॥४६॥ देविदासें तैसें केलें । पक्वान्नांनीं भरलेलें । पात्र आणून ठेविलें । द्वारासमोर स्वामींपुढें ॥४७॥ ठेविलेल्या पात्रावरी । भोजना बैसली समर्थस्वारी । चवी न कशाची अंतरीं । अणुमात्र उरली असे ॥४८॥ अनुपम ब्रह्मरसाला । जो पिऊन तृप्त झाला । तो कां मागतो गुळवण्याला । मिटक्या मारीत बैसेल ? ॥४९॥ अवघीं पक्वान्नें एक केलीं । आवडनिवड नाहीं उरली । जठराग्नीची तृप्ती केली । दोन प्रहरच्या समयाला ॥५०॥ बंकटलाल तें पाहून । पंताशी करी भाषण । ह्या वेडा म्हणालों आपण । ती निःसंशय झाली चुकी ॥५१॥ सूर्य माध्यान्हीं आला । भाग भूमीचा तप्त झाला । पांखरेहीं आश्रयाला । जाऊन बैसलीं वृक्षावरी ॥५२॥ ऐशा भर उन्हात । हा बैसला आनंदांत । हा ब्रह्मची होय साक्षात्‌ । भय ना कशाचें उरलें या ॥५३॥ हा जेवला यथेच्छपणीं । तुंब्यामध्यें नाहीं पाणी । तें पंता यालागुनी । आपण देऊं आणून ॥५४॥ पुसूं लागले दामोदर । तुंब्यामध्यें नाहीं नीर । मर्जी असल्या हा चाकर । पाणी द्याया तयार असे ॥५५॥ ऐसे शब्द ऐकिले । समर्थांनीं हास्य केलें । उभयतांसी पाहून वदले । तें ऐका सांगतों ॥५६॥ अन्न भक्षिलें देहानीं । म्हणून त्या पाहिजे पाणी । हा व्यवहार चतुरांनीं । अवश्य पाहिजे जाणिला ॥५७॥ म्हणून तुमच्या चातुर्यासी । गरज असल्या तुम्हां साची । तरतूद करा पाण्याची । म्हणजे अवघें संपलें ॥५८॥ हें भाषण ऐकतां । दोघे हर्षले तत्त्वतां । बंकटलाल म्हणे पंता । आपुलें आहे भाग्य धन्य ॥५९॥ पाणी आणण्या दामोदर । घरांत गेले साचार । तो इकडे प्रकार । काय घडला तो ऐका ॥६०॥ कुपाचिया शेजारीं । हाळ होता निर्धारीं । जेथें जनावरें सारीं । पीत होतीं पाण्याला ॥६१॥ तेथें जाऊन पाणी प्याले । तृप्ततेचे ढेकर दिले । तों इतक्यांत घेऊन आले । पंत पाणी गडव्यांत ॥६२॥ हां हां तें गढूळ पाणी । समर्था न लावा वदनीं । तें जनावरांलागुनी । योग्य आहे प्यावया ॥६३॥ मीं हें पहा आणिलें नीर । गोड निर्मळ थंडगार । वासित केलें साचार । वाळा घालून यामध्यें ॥६४॥ ऐसें भाषण ऐकतां । महाराज वदले तत्त्वतां । व्यावहारिक अवघ्या कथा । ह्या न सांगा आम्हां तुम्ही ॥६५॥ हें अवघें चराचर । ब्रह्मे व्याप्त साचार । तेथें गढूळ, निर्मळ, वासित नीर । हे न भेद राहिले ॥६६॥ पाणी तरी तोच आहे । निर्मळ गढूळ तोच पाहे । सुवास कुवास दोन्ही हें । रुप त्याचें निःसंशय ॥६७॥ पिणाराही वेगळा । त्यापासून ना निराळा । ईश्वराची अगाध लीला । ती कळे या नरजन्मीं ॥६८॥ तें दिलें टाकून । व्यवहारीं गोविलें मन । यांचेच करा सदा मनन । कशापासून जग झालें ॥६९॥ ऐसी ऐकतां समर्थवाणी । दोघे गेले गहिवरोनी । अनन्यभावें समर्थचरणीं । लोळावया तयार झाले ॥७०॥ तो त्यांचा जाणोन हेत । महाराज निघाले पळत पळत । वायूच्या त्या गतिप्रत । अडथळा जगीं कोण करी ? ॥७१॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ इति प्रथमोऽध्यायः समाप्तः ॥

No comments:

Post a Comment