Aug 27, 2025

श्रीसमर्थ रामदासस्वामीकृत श्रीगणेश स्तवन - श्रीपाद श्रीवल्लभ अवतार कथन


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये

सर्व दत्तभक्तांना श्री गणेश चतुर्थी आणि 'श्रीदत्तप्रभूंचे संपूर्ण योगावतार' या नांवाने जगतविख्यात असलेले, श्री भगवान दत्तात्रेयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा !!



मयूरेशा, लंबोदरा खळखळू दे मांगल्य झरा
हरी अवकृपा तिमिरा  बा, गजानना, हेरंबा वक्रतुंडा जगन्नायका


श्रीसमर्थ रामदासस्वामीकृत श्रीगणेश स्तवन :

ॐ नमोजी गणनायका । सर्व सिद्धि फळदायका । अज्ञानभ्रांति छेदका । बोधरूपा ॥१॥ वंदूनिया मंगळनिधी । कार्य करितां सर्व सिद्धि आघात अडथळे उपाधी । बाधूं शकेना ॥२॥ ऐसा सर्वांगे सुंदरू । सकळ विद्यांचा आगरू । त्यासी माझा नमस्कारू । साष्टांग भावें ॥३॥ ध्यान गणेशाचे वर्णितां । मति प्रकाश होये भ्रांता । गुणानुवाद श्रवण करितां । वोळे सरस्वती ॥४॥ जयासी ब्रह्मादिक वंदिती । तेथे मानव बापूडे किती । असो प्राणी मंदमती । तेहीं गणेश चिंतावा ॥५॥


श्रीपाद श्रीवल्लभ अवतार कथन

श्रीपाद श्रीवल्लभ यांचा चरित्रग्रंथ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ! या अक्षरसत्य ग्रंथामध्ये श्रीपाद स्वामींच्या जन्माचे विस्तृतपणें वर्णन केले आहे.

आंध्र प्रदेशात मल्याद्रीपूर नामक एक गाव होते. तेच मल्याद्रीपुर सध्या मल्लादि या नावाने ओळखले जाते. त्या ग्रामांत मल्लादि नावाची दोन वेदशास्त्रपारंगत घराणी होती. मल्लादि बापन्नावधानि या नांवाचे विद्यावंत हरितस गोत्रीय तर मल्लादि श्रीधरअवधानी या नांवाचे विद्वान कौशिक गोत्रीय होते. श्रीधरअवधानी यांची बहिण राजमांबा हिचा विवाह बापन्नावधानी यांच्या बरोबर झाला होता. गोदावरी तटांवर असलेल्या आइनविल्लि या गांवात गणपती महायाग संपन्न होणार होता. त्या यज्ञासाठी हे दोन्ही प्राज्ञ पंडित तिथे गेले होते. यज्ञ सर्वथा शास्त्रोक्त विधींनुसार पार पडल्यास, शेवटची आहुती यज्ञवेदींत अर्पण करतेवेळीं प्रत्यक्ष महागणपती स्वर्णकांतीयुक्त स्वरूपांत दर्शन देईल आणि आहुती स्वीकारेल, अशी ग्वाही वेदोक्त मंत्र पठण करणाऱ्या ब्राह्मणांनी दिली होती. त्या विधीवत संपन्न झालेल्या यज्ञाची सांगता सुफळ झाली देखील - वेदमंत्र उच्चारून यज्ञपूर्ततेची आहुती देताच त्या यज्ञकुंडातून सुवर्णकांतीयुक्त, दैदीप्यमान श्रीगणेश प्रगट झाले आणि आपल्या सोंडेत त्यांनी ती आहुती स्वीकारली. श्री गणेश महायाग यथासांग पार पडल्याचे ते फलित पाहून सर्वच तुष्ट झाले. तिथे उपस्थित असलेल्या सर्व भाविकांनी हर्षित होऊन गजाननास नमस्कार केला. प्रसन्न होऊन श्री महागणपती वरदान देत म्हणाले, " मी स्वतः गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण कलेने श्रीपाद श्रीवल्लभ रुपाने अवतार घेईन." गणेशाचे आशीर्वचन ऐकून सर्वांनी त्यांचा जयजयकार केला, मात्र त्या सभेतील तीन नास्तिकांचा त्यावर विश्वास बसला नाही. ते शंकित स्वरांत म्हणाले, " हे दृश्य नक्कीच इंद्रजाल अथवा महेंद्रजाल असावे. हे प्रत्यक्ष महागणपती असतील तर त्यांनी परत एकदा दर्शन द्यावे. " त्या नास्तिकांचे हे वक्तव्य ऐकताच होमकुंडातील विभूती महागणपतीच्या स्वरुपात दृश्यमान झाली आणि आपल्या दिव्य वाणींत बोलू लागली, " मीच परब्रह्म आहे. मीच या सकल ब्रह्माण्डाचा स्वामी असून ईश-पार्वतीनंदन म्हणून या जगतांत प्रसिद्ध आहे. त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी श्रीशंकरांनी, शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास अटकाव करतेवेळी श्री विष्णूंनी, महिषासुराशी युद्ध करण्यापूर्वी श्री आदिमाया जगदंबेनी तसेच सकल देवता, योगी, तपस्वी आणि ऋषी- मुनी यांनीही माझेच स्मरण आणि आराधना करून अभीष्ट प्राप्त केले. ब्रह्मा आणि रुद्र श्री विष्णुरूपात विलीन झाले, तेच त्रैमूर्ति दत्तात्रेय आहेत. शास्त्रांच्या वचनांनुसार मीच दत्तरूप आहे. तेच महागणपतीरूपी श्री दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपांत गणेशचतुर्थीच्या दिवशी अवतार घेतील. माझ्या आजच्या दर्शनाप्रमाणेच दिव्य ज्योतीच्या स्वरूपांत ते प्रगट होतील." 

मल्लादि बापन्नावधानि यांच्या राजयोगावर जन्मलेल्या कन्येच्या जन्मपत्रिकेत सर्वच ग्रह शुभस्थानीं होते. त्यांनी तिचे सुमती महाराणी असे नामकरण केले. तिचा विवाह अप्पललक्ष्मी नरसिंहराज शर्मा नामक भारद्वाज गोत्रीय विप्राशी झाला होता. आपळराज आणि सुमती यांच्या पूर्वजन्मीच्या दत्तभक्तीचे, पुण्यकर्मांचे फलित म्हणूनच त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांचे माता-पिता होण्याचे सद्भाग्य लाभले होते. त्या सत्शील दाम्पत्याचा पूर्वजन्म वृत्तांत थोडक्यात असा - पूर्वयुगीं सह्य पर्वताजवळील माहूर गांवी विष्णुदत्त नामक कर्मनिष्ठ ब्राह्मण रहात होता. तो श्री दत्तप्रभूंचा भक्त होता. त्याची पत्नी सोमदेवम्मा ( श्री दत्तमाहात्म्यात हिचे नाव सुशीला असे आले आहे.) थोर पतिव्रता होती. साक्षात श्री दत्तात्रेय त्या ब्राह्मणाच्या गृही दर्श श्राद्धदिनीं भोजन करण्यासाठी आले होते. त्या पंक्तीला श्री सूर्यनारायण आणि अग्निदेवही यांनीही भोजन स्वीकारले होते. त्यावेळीं, या तीनही देवतांचे उत्तमोत्तम आशीर्वाद त्या धर्मपरायण ब्राह्मण पती-पत्नीस मिळाले होते आणि त्यांच्या पितरांनाही सद्‌गती प्राप्त झाली होती. पुढें, याच पती-पत्नींनी पीठापुरी आपळराज आणि सुमती म्हणून पुन्हा जन्म घेतला होता. सुमतीचे अहोभाग्य असे की या जन्मींदेखील सुमतीला पुनःश्च श्री दत्तप्रभूंचे दर्शन घडले होते आणि भक्तकामकल्पद्रुम श्री दत्तात्रेय, आपळराज-सुमती यांचा पुत्र म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेते झाले. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थी रोजी सूर्योदयाच्या वेळी झाला. या अवताराचे वेगळेपण अथवा असाधारणत्व असे की श्रीपादांचा जन्म मातेच्या उदरातून सामान्य मुलासारखा न होता, दिव्य ज्योतीरूपाने झाला. त्यावेळी प्रसूतिगृहात मंगल वाद्ये वाजू लागली. पवित्र अशा वेदमंत्रांचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला. त्यांच्या जन्मानंतर सतत नऊ दिवस, तीन फणा असलेला नाग त्यांच्या मस्तकी छत्र धरीत असे. भक्तजनरक्षणार्थ श्रीगुरुनाथ या भूतलावर अवतरला होता.


॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


अवश्य वाचा :

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - श्रीपादावतारकथन


No comments:

Post a Comment