Aug 28, 2025

ओवाळीतो स्वामीराया... दावी चिन्मय स्वरुपाला


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते गजाननाय

या अखंड चराचराला व्यापून टाकणारा तो सर्वशक्तिमान परमात्मा या जगताच्या कल्याणासाठीच विविध रूपें धारण करतो. आपल्या परमभक्तांच्या उद्धारासाठी, मुमुक्षु जनांना सत्पथी लावण्यासाठीच त्याच्या या सर्व लीला असतात. कधी कधी तो निर्गुण, निराकार परमात्मा सगुण, साकार होऊन संतरूपांत अवतरित होतो आणि सर्वांनाच त्याच्या या सगुणरुपाचा ध्यास लागतो. हे संत-महात्मे असंख्य बद्ध, मुमुक्षु जनांवर कृपा करतात, आपल्यासारख्या सामान्य जनांना सन्मार्ग दाखवितात. अशा साक्षात् परब्रह्मस्वरुप संतांमध्ये शेगावनिवासी संतशिरोमणी श्री गजानन महाराजांचे स्थान अनन्यसाधारण आहे.

आपल्या अवतारकाळांत श्रीगजानन स्वामींनी असंख्य भक्तांवर कृपानुग्रह केला, आणि आजही ‘ देहांताच्या नंतरहि । कितीजणा अनुभव येई ॥' अशी प्रचिती कित्येक गजाननभक्तांना येत आहे. संतकवी दासगणू महाराजांनी श्रीगजानन विजय या प्रासादिक ग्रंथात गजाननासी अंगें सारीं । होतीं योगाचीं अवगत ॥ अनेक वेळा सांगितले आहे. अशा साक्षात्कारी संतपुरुषांचा वास त्यांच्या स्थूल देहापेक्षा सूक्ष्मांत असतो. त्यांमुळे या योगीराजांच्या समाधीनंतरही त्यांचे अवतार कार्य अखंड, अविरत सुरूच असते. किंबुहना ते सहस्त्रपटींनी अधिक कार्यरत होते. सिद्धयोगी श्रीगजानन महाराजांनी समाधी घेऊन एक शतकापेक्षाही अधिक काळ लोटला आहे, तरीही ' मी गेलों ऐसें मानूं नका । मी आहे येथेंच ॥' या समर्थवचनांची अनुभूती आजही त्यांच्या भक्तांना येत आहे. श्री क्षेत्र शेगांव येथे दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी आणि भक्तांकडून श्रीगजानन विजय या समर्थांच्या चरित्रग्रंथांची होणारी नित्य पारायणे या गोष्टीची साक्ष देतात. 

या दिव्य ग्रंथातील अध्याय १९ आणि अध्याय २१ मध्ये श्रीगजानन महाराजांचे निष्ठावंत भक्त रामचंद्र निमोणकर यांचा उल्लेख आहे. ऐसाच एक निमोणकर । गोविंदाचा कुमार । रामचंद्र नामें साचार । ओव्हरसियरच्या हुद्यावरी ॥ योगयोगेश्वर गजानन महाराजांचा त्यांना प्रसाद प्राप्त झाला आणि योगाभ्यास थोडा बहुत । आला निमोणकराप्रत । श्रीगजाननकृपेनें ॥   त्यांनी समर्थ सदगुरु श्रीगजानन महाराजांवर एक पुस्तिका लिहून ती प्रकाशित केली होती. या पुस्तिकेतील ही अतिशय सुंदर, भावपूर्ण आरती ! या सद्‌भक्ताची महाराजांच्या ठायीं असलेली भक्ती, अनन्य श्रद्धा आणि शरणागतीचा भाव या आरतीतील प्रत्येक पदांतून विनासायास व्यक्त होतात.     

ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया । आवडी जगन्मोहीनीला । दावी चिन्मय स्वरुपाला ॥धृ॥ देई सद्‌बुद्धी मजला । प्रेमे तव यश गाण्याला । भक्तांकिता स्वामीराया, चरण मी शरण, करुनी भय हरण दावी सुखसदन, अमित मम दोष लागुनीया । विनवितो दास तुम्हा सदया ॥१॥ ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया । आवडी जगन्मोहीनीला । दावी चिन्मय स्वरुपाला ॥  जनपद मुक्ति पदान्याया । स्थली या अवतरला राया । ही जड मुढ मनुष्य काया । पदी तव अर्पियली राया । हे दिव्य वसन योगीराया । नको मज जनन, पुनरुपी मरण । प्रार्थना हेचि असे पाया ॥२॥ ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया । आवडी जगन्मोहीनीला । दावी चिन्मय स्वरुपाला ॥  नेण्या आत्मतमा विलया । आलासी ज्ञान रवी उदया । करी तू ज्ञानी जना राया। निरखुनी मोह पटल माया । गजानन संतराजा, असशी बलवंत, तसा तू धिमंत । नको बघू अंत, विनवितो दास तुम्हा राया । नका त्या दुर करु सदया ॥३॥ ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया । आवडी जगन्मोहीनीला । दावी चिन्मय स्वरुपाला ॥

    

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
मूळ स्रोत : श्रीगजानन महाराज चरित्र कोश - ( लेखन, संशोधन - दासभार्गव )

 

Aug 27, 2025

श्रीसमर्थ रामदासस्वामीकृत श्रीगणेश स्तवन - श्रीपाद श्रीवल्लभ अवतार कथन


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये

सर्व दत्तभक्तांना श्री गणेश चतुर्थी आणि 'श्रीदत्तप्रभूंचे संपूर्ण योगावतार' या नांवाने जगतविख्यात असलेले, श्री भगवान दत्तात्रेयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा !!



मयूरेशा, लंबोदरा खळखळू दे मांगल्य झरा
हरी अवकृपा तिमिरा  बा, गजानना, हेरंबा वक्रतुंडा जगन्नायका


श्रीसमर्थ रामदासस्वामीकृत श्रीगणेश स्तवन :

ॐ नमोजी गणनायका । सर्व सिद्धि फळदायका । अज्ञानभ्रांति छेदका । बोधरूपा ॥१॥ वंदूनिया मंगळनिधी । कार्य करितां सर्व सिद्धि आघात अडथळे उपाधी । बाधूं शकेना ॥२॥ ऐसा सर्वांगे सुंदरू । सकळ विद्यांचा आगरू । त्यासी माझा नमस्कारू । साष्टांग भावें ॥३॥ ध्यान गणेशाचे वर्णितां । मति प्रकाश होये भ्रांता । गुणानुवाद श्रवण करितां । वोळे सरस्वती ॥४॥ जयासी ब्रह्मादिक वंदिती । तेथे मानव बापूडे किती । असो प्राणी मंदमती । तेहीं गणेश चिंतावा ॥५॥


श्रीपाद श्रीवल्लभ अवतार कथन

श्रीपाद श्रीवल्लभ यांचा चरित्रग्रंथ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ! या अक्षरसत्य ग्रंथामध्ये श्रीपाद स्वामींच्या जन्माचे विस्तृतपणें वर्णन केले आहे.

आंध्र प्रदेशात मल्याद्रीपूर नामक एक गाव होते. तेच मल्याद्रीपुर सध्या मल्लादि या नावाने ओळखले जाते. त्या ग्रामांत मल्लादि नावाची दोन वेदशास्त्रपारंगत घराणी होती. मल्लादि बापन्नावधानि या नांवाचे विद्यावंत हरितस गोत्रीय तर मल्लादि श्रीधरअवधानी या नांवाचे विद्वान कौशिक गोत्रीय होते. श्रीधरअवधानी यांची बहिण राजमांबा हिचा विवाह बापन्नावधानी यांच्या बरोबर झाला होता. गोदावरी तटांवर असलेल्या आइनविल्लि या गांवात गणपती महायाग संपन्न होणार होता. त्या यज्ञासाठी हे दोन्ही प्राज्ञ पंडित तिथे गेले होते. यज्ञ सर्वथा शास्त्रोक्त विधींनुसार पार पडल्यास, शेवटची आहुती यज्ञवेदींत अर्पण करतेवेळीं प्रत्यक्ष महागणपती स्वर्णकांतीयुक्त स्वरूपांत दर्शन देईल आणि आहुती स्वीकारेल, अशी ग्वाही वेदोक्त मंत्र पठण करणाऱ्या ब्राह्मणांनी दिली होती. त्या विधीवत संपन्न झालेल्या यज्ञाची सांगता सुफळ झाली देखील - वेदमंत्र उच्चारून यज्ञपूर्ततेची आहुती देताच त्या यज्ञकुंडातून सुवर्णकांतीयुक्त, दैदीप्यमान श्रीगणेश प्रगट झाले आणि आपल्या सोंडेत त्यांनी ती आहुती स्वीकारली. श्री गणेश महायाग यथासांग पार पडल्याचे ते फलित पाहून सर्वच तुष्ट झाले. तिथे उपस्थित असलेल्या सर्व भाविकांनी हर्षित होऊन गजाननास नमस्कार केला. प्रसन्न होऊन श्री महागणपती वरदान देत म्हणाले, " मी स्वतः गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण कलेने श्रीपाद श्रीवल्लभ रुपाने अवतार घेईन." गणेशाचे आशीर्वचन ऐकून सर्वांनी त्यांचा जयजयकार केला, मात्र त्या सभेतील तीन नास्तिकांचा त्यावर विश्वास बसला नाही. ते शंकित स्वरांत म्हणाले, " हे दृश्य नक्कीच इंद्रजाल अथवा महेंद्रजाल असावे. हे प्रत्यक्ष महागणपती असतील तर त्यांनी परत एकदा दर्शन द्यावे. " त्या नास्तिकांचे हे वक्तव्य ऐकताच होमकुंडातील विभूती महागणपतीच्या स्वरुपात दृश्यमान झाली आणि आपल्या दिव्य वाणींत बोलू लागली, " मीच परब्रह्म आहे. मीच या सकल ब्रह्माण्डाचा स्वामी असून ईश-पार्वतीनंदन म्हणून या जगतांत प्रसिद्ध आहे. त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी श्रीशंकरांनी, शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास अटकाव करतेवेळी श्री विष्णूंनी, महिषासुराशी युद्ध करण्यापूर्वी श्री आदिमाया जगदंबेनी तसेच सकल देवता, योगी, तपस्वी आणि ऋषी- मुनी यांनीही माझेच स्मरण आणि आराधना करून अभीष्ट प्राप्त केले. ब्रह्मा आणि रुद्र श्री विष्णुरूपात विलीन झाले, तेच त्रैमूर्ति दत्तात्रेय आहेत. शास्त्रांच्या वचनांनुसार मीच दत्तरूप आहे. तेच महागणपतीरूपी श्री दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपांत गणेशचतुर्थीच्या दिवशी अवतार घेतील. माझ्या आजच्या दर्शनाप्रमाणेच दिव्य ज्योतीच्या स्वरूपांत ते प्रगट होतील." 

मल्लादि बापन्नावधानि यांच्या राजयोगावर जन्मलेल्या कन्येच्या जन्मपत्रिकेत सर्वच ग्रह शुभस्थानीं होते. त्यांनी तिचे सुमती महाराणी असे नामकरण केले. तिचा विवाह अप्पललक्ष्मी नरसिंहराज शर्मा नामक भारद्वाज गोत्रीय विप्राशी झाला होता. आपळराज आणि सुमती यांच्या पूर्वजन्मीच्या दत्तभक्तीचे, पुण्यकर्मांचे फलित म्हणूनच त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांचे माता-पिता होण्याचे सद्भाग्य लाभले होते. त्या सत्शील दाम्पत्याचा पूर्वजन्म वृत्तांत थोडक्यात असा - पूर्वयुगीं सह्य पर्वताजवळील माहूर गांवी विष्णुदत्त नामक कर्मनिष्ठ ब्राह्मण रहात होता. तो श्री दत्तप्रभूंचा भक्त होता. त्याची पत्नी सोमदेवम्मा ( श्री दत्तमाहात्म्यात हिचे नाव सुशीला असे आले आहे.) थोर पतिव्रता होती. साक्षात श्री दत्तात्रेय त्या ब्राह्मणाच्या गृही दर्श श्राद्धदिनीं भोजन करण्यासाठी आले होते. त्या पंक्तीला श्री सूर्यनारायण आणि अग्निदेवही यांनीही भोजन स्वीकारले होते. त्यावेळीं, या तीनही देवतांचे उत्तमोत्तम आशीर्वाद त्या धर्मपरायण ब्राह्मण पती-पत्नीस मिळाले होते आणि त्यांच्या पितरांनाही सद्‌गती प्राप्त झाली होती. पुढें, याच पती-पत्नींनी पीठापुरी आपळराज आणि सुमती म्हणून पुन्हा जन्म घेतला होता. सुमतीचे अहोभाग्य असे की या जन्मींदेखील सुमतीला पुनःश्च श्री दत्तप्रभूंचे दर्शन घडले होते आणि भक्तकामकल्पद्रुम श्री दत्तात्रेय, आपळराज-सुमती यांचा पुत्र म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेते झाले. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थी रोजी सूर्योदयाच्या वेळी झाला. या अवताराचे वेगळेपण अथवा असाधारणत्व असे की श्रीपादांचा जन्म मातेच्या उदरातून सामान्य मुलासारखा न होता, दिव्य ज्योतीरूपाने झाला. त्यावेळी प्रसूतिगृहात मंगल वाद्ये वाजू लागली. पवित्र अशा वेदमंत्रांचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला. त्यांच्या जन्मानंतर सतत नऊ दिवस, तीन फणा असलेला नाग त्यांच्या मस्तकी छत्र धरीत असे. भक्तजनरक्षणार्थ श्रीगुरुनाथ या भूतलावर अवतरला होता.


॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


अवश्य वाचा :

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - श्रीपादावतारकथन


Aug 11, 2025

अथ श्रीवसिष्ठविरचितं दारिद्र्यदहनशिवस्तोत्रं



॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
ॐ नमः शिवाय ॥

विश्वेश्वराय नरकार्णवतारणाय कर्णामृताय शशिशेखरधारणाय ।

कर्पूरकान्तिधवलाय जटाधराय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥१॥

गौरीप्रियाय रजनीशकलाधराय कालान्तकाय भुजगाधिपकङ्कणाय । गङ्गाधराय गजराजविमर्दनाय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥२॥ भक्तिप्रियाय भवरोगभयापहाय उग्राय दुर्गभवसागरतारणाय । ज्योतिर्मयाय गुणनामसुनृत्यकाय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥३॥ चर्माम्बराय शवभस्मविलेपनाय भालेक्षणाय मणिकुण्डलमण्डिताय । मञ्जीरपादयुगलाय जटाधराय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥४॥ पञ्चाननाय फणिराजविभूषणाय हेमांशुकाय भुवनत्रयमण्डिताय । आनन्दभूमिवरदाय तमोमयाय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥५॥ भानुप्रियाय भवसागरतारणाय कालान्तकाय कमलासनपूजिताय । नेत्रत्रयाय शुभलक्षणलक्षिताय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥६॥ रामप्रियाय रघुनाथवरप्रदाय नागप्रियाय नरकार्णवतारणाय । पुण्येषु पुण्यभरिताय सुरार्चिताय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥७॥ मुक्तेश्वराय फलदाय गणेश्वराय गीतप्रियाय वृषभेश्वरवाहनाय । मातङ्गचर्मवसनाय महेश्वराय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥८॥ वसिष्ठेनकृतं स्तोत्रं सर्वरोगनिवारणम् सर्वसम्पत्करं शीघ्रं पुत्रपौत्रादिवर्धनम् ।

शुभदं कामदं हृद्यं धनधान्यप्रवर्धनम् त्रिसन्ध्यं यः पठेन्नित्यं स हि स्वर्गमवाप्नुयात् ॥९॥
॥ इति श्रीवसिष्ठविरचितं दारिद्र्यदहनशिवस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

॥ ॐ नम: शिवाय ॥ श्री पार्वतीपरमेश्वरार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


Aug 9, 2025

श्री.प.प.श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं दकारादिदत्तात्रेयाष्टोत्तरशतनामस्तोत्रं


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

श्री सत्यदत्त व्रत करतांना या दिव्य स्तोत्राचे पठण अवश्य करावे.
















दत्तं वन्दे दशातीतं दयाब्धिं दहनं दमम् । दक्षं दरघ्नं दस्युघ्नं दर्शं दर्पहरं दवम्  ॥१॥ दातारं दारुणं दांतं दास्यादं दानतोषणम् । दानं दावप्रियं दावं दासत्रं दारवर्जितम् ॥२॥ दिक्पं दिवसपं दिक्स्थं दिव्ययोगं दिगम्बरम । दिव्यं दिष्टं दिनं दिश्यं दिव्याङ्गं दितिजार्चितम् ॥३॥ दीनपं दीधितिं दीप्तं दीर्घं दीपं च दीप्तगुम् । दीनसेव्यं दीनबन्धुं दीक्षादं दीक्षितोत्तमम् ॥४॥ दुर्ज्ञेयं दुर्ग्रहं दुर्गं दुर्गेशं दुःखभंजनम् । दुष्टघ्नं दुग्धपं दुःखं दुर्वासोऽग्र्यं दुरासदम् ॥५॥ दूतं दूतप्रियं दूष्यं दूष्यत्रं दूरदर्शिपम् । दूरं दूरतमं दूर्वाभं दूराङ्गं च दूरगम् ॥६॥ देवार्च्यं देवपं देवं देयज्ञं देवतोत्तमम् । देहज्ञं देहिनं देशं देशिकं देहिजीवनम् ॥७॥ दैन्यं दैन्यहरं दैवं दैन्यदं दैविकांतकम् । दैत्यघ्नं दैवतं दैर्घ्यं दैवज्ञं दैहिकार्तिदम् ॥८॥ दोषघ्नं दोषदं दोषं दोषित्रं दोर्द्वयान्वितम् । दोषज्ञं दोहपं दोषेड्बन्धुं दोर्ज्ञं च दोहदम् ॥९॥ दौरात्म्यघ्नं दौर्मनस्य-हरं दौर्भाग्यमोचनम् । दौष्ट्यत्रं दौष्कुल्यदोष-हरं दौर्हृद्यभञ्जनम् ॥१०॥ दण्डज्ञं दण्डिनं दण्डं दम्भघ्नं दम्भिशासनम् । दन्त्यास्यं दन्तुरं दंशिघ्नं दण्ड्यज्ञं च दण्डदं ॥११॥ अनन्तानन्तनामानि सन्ति तेऽनन्तविक्रम । वेदोऽपि चकितो यत्र नुर्वाग्हृद्दूर का कथा ॥१२॥ ॥ इति श्री.प.प.श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं दकारादिदत्तात्रेयाष्टोत्तरशतनामस्तोत्रं संपूर्णम् ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

May 9, 2025

श्री स्वामी समर्थ मठ संस्थान, केज - शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळा


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


सुंदर हे रूप गोजिरे सुकुमार । दिसे मनोहर, स्वामीराज ॥

एक कर कटी शोभतो साजिरा । रुद्राक्ष हो हार, गळा एका ॥

केशराची उटी, कस्तुरी ललाटी । भक्ताचे हो संकटी उभा असे ॥

सरळ नासिक शोभते वदना । रत्नाची हो खाणी, स्वामीराज ॥

वैराग्य विभूती, कौपिन शोभत । असे ते स्वरूप स्वामीराया ॥ 

चरण मृदू असे नवनीतापरी । वंदिता कैवारी, स्वामीराज ॥ 

लावण्याचा गाभा, ज्योतीची ही प्रभा । भक्तासाठी उभा, सर्वकाळ ॥ 

स्वामीसुत म्हणे, काय वर्णू रूप । खरे तीच एक स्वामीराया ॥


श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परमशिष्यांत श्री. महारूद्रराव देशपांडे अर्थात श्री नानासाहेब देशपांडे (केजकर स्वामी) यांचे स्थान अग्रेसर आहे. ' स्वामीमहाराजांचे भक्तजनांत । केजकर स्वामी असती प्रख्यात । सदाचारी, ज्ञानी, श्रीमंत । उदार, भक्तिज्ञानसंपन्न ते ॥' असे ब्रह्मनिष्ठ वामनबुवांनी त्यांचे वर्णन केले आहे. श्रीस्वामीसमर्थांच्या कृपाप्रसादामुळे महारूद्ररावांना त्यांचे ऐहिक वैभव, सामाजिक प्रतिष्ठा पुनश्च प्राप्त तर झालेच, अन सद्‌गुरुकृपेचा चिरंतन लाभदेखील झाला. त्यायोगे त्यांच्या चित्तवृत्तींत बदल होऊ लागला. त्यांना सतत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाचा ध्यास लागला. असेच एकदा महारूद्रराव श्री स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे गेले होते, तेव्हा श्री स्वामी समर्थ राजवाड्यात गेले असल्याचे त्यांना समजले. त्यावेळी अनेक प्रयत्न करूनही श्रीसमर्थांचे दर्शन त्यांना झाले नाही. द्‌गुरुदर्शनाचा ध्यास लागलेले हे परमभक्त तेव्हा अन्न-पाणी ग्रहण न करता राजवाड्याबाहेरच पूर्ण दिवसभर बसून राहिले. स्वामीभक्तहो, महारूद्ररावांचा तो दृढनिश्चय अन निग्रह पाहून अलौकिक अवतारी, करुणाघन स्वामी द्रवले, यांत नवल ते काय ? श्रीस्वामी महाराजांनी त्वरित सेवेकऱ्यांस आज्ञा केली, " जाव, नाना को यहाँ लेके आव ।" सेवेकऱ्यांनी तात्काळ बाहेर जाऊन विचारणा केली आणि ते महारूद्ररावांना आपल्यासोबत राजवाड्यात घेऊन गेले. आपल्या आराध्याचे, श्रीस्वामीसमर्थांचे दर्शन होताच या सत्शिष्याचा कंठ दाटून आला, त्यांना भावसमाधी लागली. तेव्हा, भक्तवत्सल श्रीस्वामींनी जवळच असलेला एक गोटा आणि आपल्या पायांतील जोडे महारूद्ररावांच्या दिशेने भिरकावले. श्रीस्वामींच्या पुनीत हस्ताने प्राप्त झालेला हा प्रसाद महारूद्ररावांनी मोठ्या भक्तिभावाने आपल्या मस्तकी लावला आणि त्यांनी आपल्या द्‌गुरुंचे मनोभावें दर्शन घेतले. पुढें, या प्रासादिक वस्तू त्यांनी केज येथे त्यांच्या देवघरात नित्य पूजनार्थ ठेवल्या. श्रीस्वामींचा कृपाप्रसाद असलेला हा गोटा व चर्म पादुका यांचे दर्शन भाविक आता केजच्या या मठांत घेऊ शकतात. अनंतकोटी ब्रह्मांडांचे नायक असलेले श्री स्वामी समर्थ महाराज महारूद्ररावांना 'माझा नाना' असे संबोधित असत, इतुकेच नव्हें तर केजकर स्वामींची समाधीदेखील श्रीस्वामींच्या प्रेरणेने श्रींच्याच प्रिय आद्य मठांत बांधली गेली, यांतच महारूद्ररावांचे श्रेष्ठत्व अन वेगळेपण दिसून येते. खरोखरच, केजकर स्वामी महद्भाग्यवंत होते, हे निःसंशय !

 " आम्हांसि न लगे द्रव्य-अघ । आपल्या घरासि जा रे नीघ । घराचे उकीरड्यांत टाकून दे ओघ । हा दगड तेथे नेऊन ठेव रे ॥" ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृतात वर्णिलेला  हा  'दगड' म्हणजेच या पावन पादुका होत.


प्रत्यक्ष श्रीस्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार या प्रासादिक पादुका श्रीमंत महारूद्र (नानासाहेब) केशवराव देशपांडे यांनी श्री ब्रह्मचारी महाराज (मुंबई गादी) यांच्या हस्ते, शके १७९७ साली (इ.स. १८७५) गुरुवारी वैशाख शुद्ध १५ या तिथीला प्रतिष्ठापित केल्या. या मंगल घटनेला वैशाख शुद्ध तिथी १५ शके १९४७ अर्थात १२ मे २०२५ रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. या शुभ प्रसंगाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ मठ संस्थान, केजतर्फे पंचकुंडी पंचायतन महायज्ञ, दीड कोटी स्वामी नामजप, अन्नदान तसेच विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

श्री स्वामी समर्थांचे पट्टशिष्य श्री हरिभाऊ तावडे उर्फ स्वामीसुत यांचे धाकटे बंधू दादामहाराज (मोरपीस) आणि त्यांची मातोश्री काकूबाई हे दोघेही या पावन पादुकांची स्थापना होत असताना स्वामी समर्थांच्या आज्ञेने प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यामुळे आजही या मठात श्री स्वामीसुतांची सांप्रदायिक परंपरा श्रद्धेने पाळली जात आहे.

साक्षात त्या ब्रह्मांडनायकाच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या केज येथील या श्री स्वामी समर्थ मठास स्वामीभक्तांनी शक्य झाल्यास अवश्य भेट द्यावी आणि या विशेष सोहळ्यास उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा. 


श्री स्वामी समर्थ मठ संस्थान, केज - या सोहळ्याविषयीची सविस्तर माहिती इथे उपलब्ध आहे.


केजकर स्वामी - महारूद्रराव देशपांडे यांचे चरित्र इथे वाचता येईल.



॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥  

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

सौजन्य : श्री स्वामी समर्थ मठ संस्थान, केज