May 9, 2025

श्री स्वामी समर्थ मठ संस्थान, केज - शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळा


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


सुंदर हे रूप गोजिरे सुकुमार । दिसे मनोहर, स्वामीराज ॥

एक कर कटी शोभतो साजिरा । रुद्राक्ष हो हार, गळा एका ॥

केशराची उटी, कस्तुरी ललाटी । भक्ताचे हो संकटी उभा असे ॥

सरळ नासिक शोभते वदना । रत्नाची हो खाणी, स्वामीराज ॥

वैराग्य विभूती, कौपिन शोभत । असे ते स्वरूप स्वामीराया ॥ 

चरण मृदू असे नवनीतापरी । वंदिता कैवारी, स्वामीराज ॥ 

लावण्याचा गाभा, ज्योतीची ही प्रभा । भक्तासाठी उभा, सर्वकाळ ॥ 

स्वामीसुत म्हणे, काय वर्णू रूप । खरे तीच एक स्वामीराया ॥


श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परमशिष्यांत श्री. महारूद्रराव देशपांडे अर्थात श्री नानासाहेब देशपांडे (केजकर स्वामी) यांचे स्थान अग्रेसर आहे. ' स्वामीमहाराजांचे भक्तजनांत । केजकर स्वामी असती प्रख्यात । सदाचारी, ज्ञानी, श्रीमंत । उदार, भक्तिज्ञानसंपन्न ते ॥' असे ब्रह्मनिष्ठ वामनबुवांनी त्यांचे वर्णन केले आहे. श्रीस्वामीसमर्थांच्या कृपाप्रसादामुळे महारूद्ररावांना त्यांचे ऐहिक वैभव, सामाजिक प्रतिष्ठा पुनश्च प्राप्त तर झालेच, अन सद्‌गुरुकृपेचा चिरंतन लाभदेखील झाला. त्यायोगे त्यांच्या चित्तवृत्तींत बदल होऊ लागला. त्यांना सतत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाचा ध्यास लागला. असेच एकदा महारूद्रराव श्री स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे गेले होते, तेव्हा श्री स्वामी समर्थ राजवाड्यात गेले असल्याचे त्यांना समजले. त्यावेळी अनेक प्रयत्न करूनही श्रीसमर्थांचे दर्शन त्यांना झाले नाही. द्‌गुरुदर्शनाचा ध्यास लागलेले हे परमभक्त तेव्हा अन्न-पाणी ग्रहण न करता राजवाड्याबाहेरच पूर्ण दिवसभर बसून राहिले. स्वामीभक्तहो, महारूद्ररावांचा तो दृढनिश्चय अन निग्रह पाहून अलौकिक अवतारी, करुणाघन स्वामी द्रवले, यांत नवल ते काय ? श्रीस्वामी महाराजांनी त्वरित सेवेकऱ्यांस आज्ञा केली, " जाव, नाना को यहाँ लेके आव ।" सेवेकऱ्यांनी तात्काळ बाहेर जाऊन विचारणा केली आणि ते महारूद्ररावांना आपल्यासोबत राजवाड्यात घेऊन गेले. आपल्या आराध्याचे, श्रीस्वामीसमर्थांचे दर्शन होताच या सत्शिष्याचा कंठ दाटून आला, त्यांना भावसमाधी लागली. तेव्हा, भक्तवत्सल श्रीस्वामींनी जवळच असलेला एक गोटा आणि आपल्या पायांतील जोडे महारूद्ररावांच्या दिशेने भिरकावले. श्रीस्वामींच्या पुनीत हस्ताने प्राप्त झालेला हा प्रसाद महारूद्ररावांनी मोठ्या भक्तिभावाने आपल्या मस्तकी लावला आणि त्यांनी आपल्या द्‌गुरुंचे मनोभावें दर्शन घेतले. पुढें, या प्रासादिक वस्तू त्यांनी केज येथे त्यांच्या देवघरात नित्य पूजनार्थ ठेवल्या. श्रीस्वामींचा कृपाप्रसाद असलेला हा गोटा व चर्म पादुका यांचे दर्शन भाविक आता केजच्या या मठांत घेऊ शकतात. अनंतकोटी ब्रह्मांडांचे नायक असलेले श्री स्वामी समर्थ महाराज महारूद्ररावांना 'माझा नाना' असे संबोधित असत, इतुकेच नव्हें तर केजकर स्वामींची समाधीदेखील श्रीस्वामींच्या प्रेरणेने श्रींच्याच प्रिय आद्य मठांत बांधली गेली, यांतच महारूद्ररावांचे श्रेष्ठत्व अन वेगळेपण दिसून येते. खरोखरच, केजकर स्वामी महद्भाग्यवंत होते, हे निःसंशय !

 " आम्हांसि न लगे द्रव्य-अघ । आपल्या घरासि जा रे नीघ । घराचे उकीरड्यांत टाकून दे ओघ । हा दगड तेथे नेऊन ठेव रे ॥" ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृतात वर्णिलेला  हा  'दगड' म्हणजेच या पावन पादुका होत.


प्रत्यक्ष श्रीस्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार या प्रासादिक पादुका श्रीमंत महारूद्र (नानासाहेब) केशवराव देशपांडे यांनी श्री ब्रह्मचारी महाराज (मुंबई गादी) यांच्या हस्ते, शके १७९७ साली (इ.स. १८७५) गुरुवारी वैशाख शुद्ध १५ या तिथीला प्रतिष्ठापित केल्या. या मंगल घटनेला वैशाख शुद्ध तिथी १५ शके १९४७ अर्थात १२ मे २०२५ रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. या शुभ प्रसंगाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ मठ संस्थान, केजतर्फे पंचकुंडी पंचायतन महायज्ञ, दीड कोटी स्वामी नामजप, अन्नदान तसेच विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

श्री स्वामी समर्थांचे पट्टशिष्य श्री हरिभाऊ तावडे उर्फ स्वामीसुत यांचे धाकटे बंधू दादामहाराज (मोरपीस) आणि त्यांची मातोश्री काकूबाई हे दोघेही या पावन पादुकांची स्थापना होत असताना स्वामी समर्थांच्या आज्ञेने प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यामुळे आजही या मठात श्री स्वामीसुतांची सांप्रदायिक परंपरा श्रद्धेने पाळली जात आहे.

साक्षात त्या ब्रह्मांडनायकाच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या केज येथील या श्री स्वामी समर्थ मठास स्वामीभक्तांनी शक्य झाल्यास अवश्य भेट द्यावी आणि या विशेष सोहळ्यास उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा. 


श्री स्वामी समर्थ मठ संस्थान, केज - या सोहळ्याविषयीची सविस्तर माहिती इथे उपलब्ध आहे.


केजकर स्वामी - महारूद्रराव देशपांडे यांचे चरित्र इथे वाचता येईल.



॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥  

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

सौजन्य : श्री स्वामी समर्थ मठ संस्थान, केज

Apr 30, 2025

श्री स्वामी समर्थ महाराजांचे दुर्मिळ चरित्र आणि 'श्रीस्वामी सत्संग'


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥  ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे प्राचीन व दुर्मिळ चरित्र पुणे नगर वाचन मंदिर यांनी सर्व स्वामीभक्तांसाठी उपलब्ध करून दिले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीला, आरत्या, पदें, अष्टकें आणि स्तोत्र यांचे अतिशय सुंदर संकलन केलेला हा ग्रंथ प्रत्येक स्वामी भक्ताने आवर्जून सतत नित्योपासनेसाठी संग्रही ठेवावा असाच आहे.

*** पदामृत सागर - श्रीअक्कलकोटनिवासी स्वामीसमर्थ मंडळ ***


'श्रीस्वामी सत्संग' अर्थात अँफी थिएटर, बोरिवली पूर्व इथे आयोजित केलेले श्री संजय नारायण वेंगुर्लेकर यांचे ओघवत्या शैलीतील भक्तिरसमय असे व्याख्यान प्रत्येक स्वामीभक्ताने वारंवार ऐकावे असेच आहे.

 

 

॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥  

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

Mar 22, 2025

श्रीदत्ताशिष ब्लॉगवरील लेखन


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


नमस्कार दत्तभक्तहो ! परब्रह्मस्वरूप श्री दत्तमहाराजांची कुठल्याही स्वरूपांत थोडीफार सेवा घडावी, याच हेतूने श्रीदत्ताशिष या ब्लॉगची निर्मिती झाली. श्री गुरुदेव दत्तात्रेय यांचे आणि एकूणच दत्त संप्रदायांतील विविध ग्रंथ, स्तोत्र-मंत्र, व्रत-वैकल्य, विविध उपासना यांबरोबरच या संप्रदायांतील अनेक थोर संतपुरुष यांची महती/ संकलित माहिती या ब्लॉगवर दत्तभक्तांना सहजपणे उपलब्ध व्हावी, हेच त्यावेळी प्रामुख्याने उद्दिष्ट होते. हे सर्व लेख प्रकाशित करतांना प्रत्येकवेळी मूळ स्रोतांचा, लेखकांचा आवर्जून उल्लेख करायचा प्रामाणिक प्रयत्न केला. श्रीदत्तमहाराजांच्या कृपेने आणि आशीर्वादाने आपला उत्तम प्रतिसादही या संकल्पास मिळत गेला.

पुढें दत्तभक्तांच्या आग्रहानुसार संस्कृतमध्ये रचलेली काही दिव्य स्तोत्रं-मंत्र यांचा भावार्थ सर्वांना कळावा आणि समजून उमजून उपासना घडावी यासाठी काही लेखन घडले. त्याचप्रमाणे श्रीगुरुचरित्र, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, श्रीगुरुलीलामृत, श्रीगजानन विजय, श्री साई सत्चरित्र यांसारख्या परम प्रासादिक ग्रंथांविषयी केलेले क्वचित थोडेफार चिंतनपर लेखही प्रकाशित केले. त्या भक्तवत्सल अत्रिनंदनाची घडलेली ही अत्यल्प लेखनसेवा ही केवळ आणि केवळ त्यांच्या कृपाशीर्वादस्वरूपाने घडली अशीच सदैव भावना असल्याने, ' इदं न मम् ' अशीच भूमिका आजवर घेतली आहे. त्यांमुळे अनेकदा कित्येक वाचकांनी या ब्लॉगवरील लेखन इतरत्र वापरले गेले आहे, हे निदर्शनास आणून दिल्यावरही आजपर्यंत कधीच खंत वाटली नाही. काही वर्षांपूर्वी श्रीशंकर भट्टलिखित आणि प. पू. हरिभाऊ निटूरकर जोशीमहाराज अनुवादित श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा दिव्य ग्रंथ वाचला आणि आपणही श्रीपाद श्रीवल्लभांच्या या लीला साररूपांत लिहाव्यात असे वाटले. जेणेकरून भाविकांच्या मनांत मूळ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा प्रासादिक ग्रंथ वाचण्याची इच्छा निर्माण होईल. प्रभूंच्या प्रेरणेने या ब्लॉगवर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृताचे अध्याय १ ते १२ प्रकाशितही झाले. अनेक भाविकांनी ते आवडल्याची पोचही दिली. हे सर्व अध्याय इथे उपलब्ध आहेत. हे सर्व लेखन करतांना ग्रंथकारांच्या मूळ दिव्य रचनेस कधीही धक्का लागू न देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला. जाणता-अजाणता काही चूक झाल्यास अथवा त्रुटी राहिल्यास ती सुधारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आज मात्र श्रीदत्ताशिष ब्लॉगच्या काही वाचकांनी हा व्हिडीओ निदर्शनास आणून दिल्यावर मन व्यथित झाले.


या व्हिडीओतील मूळ अध्याय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय ११ हा या ब्लॉगवर वाचू शकता.

मुळातच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा अक्षरसत्य आणि दिव्य स्पंदनाने भरलेला ग्रंथ आहे, याची ग्वाही श्रीपाद प्रभूंचे कृपांकित श्रीशंकर भट्ट व हरिभाऊ निटूरकर यांनी असंख्य वेळा दिली आहे. तसेच प्रत्येक अध्यायांची फलश्रुतीही त्यांनी स्पष्टपणे कथिली आहे. त्यामुळे या परम प्रासादिक ग्रंथाच्या मूळ मजकूरातील आशयांत बदल करण्याचा अधिकार आपल्यासारख्या सर्व-सामान्य भाविकांना नक्कीच नाही.

अर्थात ऐहिक सुखाची कामना हेच बहुधा आपले मागणे असते आणि त्यांत गैर काही नाही. मात्र, '१०० वर्षाने आला हा योग, अमुक हा वार संपण्यापूर्वी हा अध्याय ऐका, घरातून वाईट शक्तीचा नाश होईल, २४ तासांत आनंदाची बातमी कळेल ' अशी या अध्यायाची फलश्रुती ठामपणे सांगणे म्हणजे भाविक दत्तभक्तांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. मूळ चरित्रग्रंथातदेखील या अध्यायाची ही अशी फलश्रुती स्वतः ग्रंथकारांनी कुठेच सांगितलेली नाही, तर दुर्गुणांपासून मुक्ती असे या अध्याय पठणाचे फल अधिकारी महात्म्यांनी कथित केले आहे. मग माझ्यासारख्या अतिसामान्य व्यक्तीने केवळ साररूपांत लिहिलेल्या या अध्यायाविषयी अशी ग्वाही देणे, हे खचितच योग्य नाही.


यासाठीच काही गोष्टी इथे स्पष्ट कराव्यात, असे वाटले.

  • सर्वप्रथम, श्रीदत्ताशिष ब्लॉगचा या 'God blessings-marathi' चॅनेलशी कुठलाही संबंध नाही.
  • या चॅनेलच्या ताई या अधिकारी व्यक्ती असतीलही, मात्र या ब्लॉगवरील कुठलेही लेखन इतरत्र कुठल्याही स्वरूपांत पुनर्प्रकाशित करावयाचे असल्यास ते मूळ स्वरूपांतच करावे, मूळ स्रोताचा - श्रीदत्ताशिष ब्लॉगचा उल्लेख करणे अथवा न करणे हे अर्थातच प्रत्येकाच्या स्वभावगुणांवर वा मनोवृत्तीवर अवलंबून आहे. भाविक-भक्तांच्या श्रद्धेचा असा गैरफायदा कदापिही घेतला जाऊ नये, यासाठीच हा आग्रह आहे.

श्रीदत्तमहाराज परमकृपाळू आणि भक्तवत्सल आहेत, हे खरे दत्तभक्त पूर्णपणे जाणतात. ' मला शरण आलेल्यांचा मी उद्धार करणारच !' असे स्मरतां क्षणीच प्रसन्न होणाऱ्या या ब्रह्माण्डनायकाचे ब्रीदच आहे, आणि याची अनेक दत्तभक्तांनी पुरेपूर अनुभूती घेतली आहे. अहो म्हणूनच, मनापासून केलेला नमस्कार ते प्रेमाने स्वीकारतात. आपल्या भक्ताचा अनन्य शरणागत भाव पाहून ते तात्काळ कृपा करतात, भाविकांच्या शुद्ध आचरणाने प्रसन्न होतात आणि गुरुवाक्य प्रमाण मानणाऱ्या सद्‌भक्तांचे पूर्वकर्मार्जित दोष निवारण सहजच करतात, अशी ग्वाही अनेक संत-सज्जन-महापुरुषांनी स्वानुभवाने दिली आहे. सर्व साधकांच्या हृदयांत अशी निर्मळ दत्तभक्ती अखंड प्रवाहित राहू दे, हीच त्या अनसूयात्मजाच्या पावन चरणीं सदिच्छा!

शेवटी, थोरल्या महाराजांच्या करुणात्रिपदीमधील पुढील पदाने या लेखनप्रपंचाचा विराम घेत आहे. तव पदरीं असता ताता । आडमार्गीं पाऊल पडतां । सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दूजा त्राता ॥ निजबिरुदा आणुनि चित्ता । तूं पतीतपावन दत्ता । वळे आतां आम्हांवरता । करुणाघन तूं गुरुनाथा ॥ भगवान दत्तमहाराजांची आपल्या सर्वांवर सर्वमंगला कृपादृष्टी व्हावी, हीच नित्य प्रार्थना ! ॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


Mar 7, 2025

श्री स्वामी समर्थ मालामंत्र - भावार्थ


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥  ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

कोणत्याही स्तोत्राचा अथवा मंत्रांचा पाठ करतांना किमान त्यातील शब्दार्थ जाणून घेऊन पाठ करावा. असा नित्यपाठ केल्याने काही काळाने साधकाचे उपासनाबळ वृद्धिंगत होते. सद्‌गुरुंच्या कृपेने मग त्या स्तोत्र/मंत्रांचा भावार्थ ध्यानांत येऊ लागतो आणि त्या ध्यानाने साधनामार्गावर योग्य दिशेने वाटचाल होऊ लागते. असा भावार्थ गोचर झाला की त्या भगवद्भक्ताची आराधना फलदायी होते. श्री स्वामी समर्थ मालामंत्राचे नित्यपठण ही अशीच एक प्रभावी उपासना आहे. अनेक स्वामीभक्तांनी याची अनुभूती घेतली आहे. या दिव्यमंत्राचा भावार्थ जाणून घेण्याचा हा अल्प प्रयत्न - ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ जगदंबिका म्हणे । मालामंत्र नारायणे । कथिला जो जगत्कारणे । तो हा सर्वोत्तम असे ॥

आदिमाया आदिशक्ती या मालामंत्राचे माहात्म्य सांगत आहे. जगत्कल्याणासाठी प्रत्यक्ष श्रीनारायणांनी हा सर्वश्रेष्ठ मालामंत्र कथन केला.

ॐ नमो नमो भगवंता । नमोजी श्री स्वामीसमर्था । स्मरणगामी दत्तनाथा । योगीमुनिजन वंदिता ॥ चिदानंदात्मका त्र्यंबका । विश्वेश्वरा विश्वधारका । बालोन्मत्त पिशाच्चवेषा । महायोगीश्वरा परमहंसा ॥ चित्-चैतन्या चिरंतना । अवधूता निरंजना । जगदाधारा सुदर्शना । सुखधामा सनातना ॥

हे भगवंता श्रीस्वामी समर्था, केवळ स्मरणमात्रें संतुष्ट होणाऱ्या, योगींमुनींनाही वंदनीय असणाऱ्या दत्तनाथा तुम्हांला मी नमन करतो. ज्ञान व आनंद हे ज्यांचे स्वरूप आहे, ज्यांना तीन डोळे आहेत (जे शिवस्वरूप आहेत), या विश्वाचे जे ईश्वर आहेत, या चराचराला ज्यांनी व्यापले आहे, बालक, वेडा किंवा पिशाच यांच्याप्रमाणे ज्यांचा कधी कधी वेष असतो, जे महान योगी आहेत, जे परमात्मास्वरूप आहेत, जे विश्वाला चैतन्य देणारे आहेत, जे अक्षर-अविनाशी आहेत, जे मायाविकारांपासून अलिप्त आहेत, जे दोषरहित-सर्वगुणसंपन्न आहेत, जे या जगताचे मूळ आधार आहेत, जे श्रीहरी विष्णुस्वरूप आहेत, जे कारुण्यसिंधू आहेत, जे सनातन अर्थात अनादिसिद्ध आहेत अशा श्रीस्वामीसमर्थांना नमस्कार असो.


सकलकामप्रदायका । सकलदुरितदाहका । सकल संचित-कर्महरा । सकल संकष्ट-विदारा ॥

ज्यांची कृपा झाल्यास सर्व इष्ट मनोकामना पूर्ण होतात, सर्व दुरितें जळून जातात, सकल संचितकर्मांचा दोष नाहीसा होतो आणि सर्व विघ्नांचे सहज निवारण होते अशा श्रीस्वामीसमर्थांना नमन असो.

ॐ भवबंधमोचना । ॐ श्रीं परम ऐश्वर्यघना । ॐ स्वां स्वहितधर्मचालका । ॐ मीं नित्य यशदायका ॥ ॐ सं संसारचक्रछेदका । ॐ मं महाज्ञानप्रदायका । ओमर्था महावैराग्यसाधका । ॐ नं नरजन्मसार्थका ॥ ॐ मों महाभयनिवारका । ॐ भक्तजनहृदयनिवासा

यानंतर तंत्रशास्त्रातील बीजांचे वर्णन केले असून त्याद्वारे विशिष्ट अभिप्सीत प्राप्तीसाठी श्री स्वामी महाराजांची प्रार्थना केली आहे.

जे संसारबंधनातून मुक्त करणारे आहेत (ॐ), जे परम ऐश्वर्य देणारे आहेत (श्रीं), जे निजजनतारक असून धर्मस्वरूप आहेत (स्वां), जे नित्य यश देणारे आहेत (मीं), जे या संसारचक्राचा छेद करणारे आहेत (सं), जे आत्मज्ञान देणारे आहेत (मं), जे विरक्ति देणारे आहेत (ओमर्थ), जे या मनुष्यजन्माच्या इतिकर्तव्यतेचे प्रबोधन करतात (नं), जे महाभय दूर करतात (मों), आणि जे केवळ भावाचे भुकेले असून भक्तजनांच्या चित्तात सदैव वास करतात त्या श्रीदत्तात्रेयस्वरूप श्रीस्वामीसमर्थांना नमस्कार असो.  

परकृत्या थोपव थोपव । परमंत्रा शांतव शांतव ॥ परयंत्रा विखर विखर । ग्रहभूतादि पिशाच्चपीडा हर हर । दारिद्र्यदु:खा घालव घालव । सुखशांती फुलव फुलव ॥ आपदा विपदा मालव मालव । गृहदोष वास्तुदोष पितृदोष सर्पदोषादि सकल दोषा विरव विरव । अहंकारा नासव नासव । मनचित्तबुद्धी स्थिरव स्थिरव ॥ नमोजी नमो देव महादेव । देवाधिदेव श्री अक्कलकोट । स्वामी समर्थ श्रीगुरुदेव । नमो नमो नमो नमः ॥ ( सप्तशते सिद्धि: )

हे भगवन्, परक्यांनी केलेल्या वाईट कृत्यांना माझ्यापासून दूर ठेव. परमंत्रांना शांत कर. परयंत्रांचा नाश कर. ग्रहाभूतादि-पिशाच्चपीडा यांचे निवारण कर. दारिद्र्याला दूर पळव. (मानसिक-शारिरीक) दुःख हरण कर. माझे जीवन सुख-शांती यांनी सदैव बहरलेले ठेव. सर्व संकटांपासून संरक्षण कर. गृहदोष, वास्तुदोष, पितृदोष, सर्पदोषादि सकल दोषांचा समूळ नाश कर. माझ्यातील अहंकाराचे उच्चाटन कर. माझे मन-चित्त आणि बुद्धी तुझ्या चरणीं स्थिर कर. हे परमात्मन महादेवा, अक्कलकोटनिवासी ब्रह्मांडधीशा, स्वामी समर्था श्रीगुरुराया तुला त्रिवार नमन असो.


॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥  

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

रचनाकार - श्रीयुत् नागेश करंबेळकर



Feb 26, 2025

महाशिवरात्री पंचोपचार शिवपूजन - व्रतकथा


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ ॐ नमः शिवाय ॥

  देवांचेही देव महादेव ज्यांना पाच मुख, दहा भुजा, तीन नेत्र आहेत. ज्यांच्या हातांत शूल, कपाल, खट्टांग, तलवार, खेटक, पिनाक नांवाचें धनुष्य असून त्यांचे रूप महाभयंकर आहे. मात्र भोळा सांब भक्तवत्सल, दयाळू असून अल्पसेवेने प्रसन्न होऊन अभय व वरदान देणारे आहेत. ज्यांनी सर्वांगाला भस्मोद्धूलन केलें असून अनेक सर्प धारण केले आहेत. ज्यांच्या भाळी चंद्रकला आणि नीलकंठात कपालमाला शोभत आहे. ज्यांची मेघाप्रमाणें नीलकांति असून जे कोटीसूर्यासारखे दैदीप्यमान आहेत आणि ज्यांच्या सभोवती प्रमथादि गण आहेत असे जगदगुरु श्रीशंकर कैलासशिखरावर असतांना जगन्माता पार्वतीने त्यांना एक प्रश्न विचारला, “ हे देवेशा शंकरा, जें व्रत केलें असतां सर्व पापें नष्ट होतात आणि इष्ट मनोरथ पूर्ण होऊन अंती सायुज्य मुक्ती लाभते, असें उत्तम व्रत मला सांगा. हे परमेश्वरा, आपण मला पूर्वी अनेक व्रतें, तिथींचे निर्णय, अनुष्ठानें, दानें, धर्मकृत्यें, तसेच नानाप्रकारच्या तीर्थयात्रा यांविषयी सांगितले आहेच. परंतु सर्व पापांचा क्षय करणारें व भोग आणि मोक्ष प्राप्त करून देणारे असें अत्यंत शीघ्र फलदायी व्रत मला सांगा.” आदिशक्तीने जगत्कल्याणासाठी विचारलेला हा प्रश्न ऐकून सदाशिव अत्यंत प्रसन्न झाले, आणि म्हणाले, “ हे उमे, जें अत्यंत गुप्त आहे, जें मनुष्याला भोग आणि मोक्ष देणारें असून मी आजपर्यंत कोणालाही सांगितलेलें नाहीं असें सर्व व्रतांमध्यें उत्तम व्रत आता मी तुला सांगतों. या व्रताच्या केवळ श्रवणमात्रानें सर्व पापें नाश पावतात. माघ महिन्याच्या कृष्णपक्षांतील विद्ध नसलेली जी चतुर्दशी असते, तिला महाशिवरात्रि असे म्हणतात. या दिवशी शिवोपासना केल्यास तिचे फळ सर्व यज्ञांपेक्षाही उत्तमोत्तम मिळते. या शिवरात्रिव्रतानें जें पुण्य प्राप्त होतें, तें नानाप्रकारचीं दानें, यज्ञ, तपश्चर्या व कित्येक व्रतें करूनही प्राप्त होत नाहीं. किंबुहना, शिवरात्रीसारखें पापांचा नाश करणारें दुसरें व्रतच नाहीं. हें व्रत जाणतां घडो अथवा अज्ञानानें घडो, त्यानें मोक्षप्राप्ति अवश्य होतेच. हे व्रत ज्यांच्या हातून घडते, ते मुक्त होऊन शिवलोकाला जातात.

माघ महिन्यातील पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात जी चतुर्दशी येते, ती रात्र म्हणजेच महाशिवरात्र होय. त्या दिवशी सर्वव्यापी महादेव सर्व शिवलिंगांमध्ये विशेष रूपाने प्रगट होतात. या सृष्टीत जी चल आणि अचल शिवलिंगे आहेत, त्या सर्वांमध्ये या रात्री शिव आणि शक्‍तीचा संचार होतो. त्यामुळेच या रात्रीला महाशिवरात्र असे म्हणतात. या दिवशी उपवास केल्याने वर्षभर केलेल्या पापांमुळे कलुषित झालेले मन शुद्ध होते. जो मनुष्य शिवरात्रीला शिवलिंगाची पाच विशेष मंत्रांसहित गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य अशा पंचोपचारांनी पूजा करतो, तो पापमुक्‍त होतो.
॥ ॐ सद्योजाताय नमः, ॐ वामदेवाय नमः, ॐ अघोराय नमः, ॐ ईशानाय नमः आणि ॐ तत्पुरुषाय नमः असे हे पाच मंत्र आहेत.
हे वरानने, ही शिवरात्रि सर्वमंगलकारिणी असून सर्व अशुभांचा नाश करणारी व भाविकांना त्वरित भोग-मोक्ष देणारी आहे. हे शिवरात्रिव्रत नरकयातना कसे दूर करते आणि शिवलोकाची प्राप्ती करून देते, याविषयीची पूर्वी घडलेली पौराणिक कथा तुला सांगतों, ती तू एकाग्रचित्ताने ऐक. 
पूर्वीच्या कल्पांत प्रत्यंत देशांतील पर्वताच्या मूलप्रदेशांत एक व्याध राहत होता. तो वन्य प्राण्यांची शिकार करून आपल्या कुटुंबाचें पालन करीत असे. हा अत्यंत बलवान, धनुर्धारी, बद्धगोधांगुलित्राण अर्थात चर्माचे हातमोजे घालत असून सदैव मृगयेविषयीं आसक्त असे. एकदा त्याने गांवातील वाण्यांकडून उधार घेतलेले द्रव्य परत न केल्याने त्या वाण्यांनीं त्याला शिवाच्या मंदिरांत कोंडून ठेवला. कर्मधर्मसंयोगाने तो दिवस माघ कृष्ण चतुर्दशीचा होता. त्यामुळे, सूर्योदयीं त्याला महादेवाचें दर्शन तर घडलेंच तसेच त्यादिवशी व्रतस्थ भक्तांचें सदोदित शिव-शिव असे नामस्मरणराचें श्रवणही घडलें. बराच काळ त्याने त्या सर्व वाण्यांना, “ तुमचे ऋण मी लवकरच चुकते करेन.” अशी विनवणी केली आणि अखेर त्यांनी त्याला बंधमुक्त केले. नंतर तो धनुष्य घेऊन दक्षिणमार्गानें बाहेर निघाला आणि अरण्यात जात असतांना लोकांचा उपहास करूं लागला. तो बोलू लागला, “ आज नगरामध्यें सर्व लोक ‘शिव-शिव’ असा सतत नामगजर कशासाठी करत आहेत?” मनांत असा विचार करत तो व्याध शिकारीसाठी एखादा वन्य प्राणी दिसतो का? हे पाहू लागला. हरिण, सूकर, चितळे यांच्या पावलांच्या ठशांचा वेध घेत घेत तो लुब्धचित्त होऊन पर्वतासह अरण्यांत भटकू लागला. संध्याकाळ झाली तरी, त्यादिवशी एकही प्राणी त्याने लावलेल्या जाळ्यात सापडला तर नाहीच, शिवाय मृग, डुकर, चितळ हे तर कोठेंही दिसेनात, त्यामुळे तो व्याध अगदींच निराश झाला व एवढ्यांत सूर्यनारायणदेखील अस्तास गेला. दिवसभरांत अन्नाचा कणही त्याच्या पोटांत गेला नव्हता. अत्यंत क्षुधार्त झालेल्या त्याने विचार केला कीं रात्रीं या अरण्यातीलच जलाशयाच्या आसपास राहावे, आणि पाणी पिण्यासाठी जे वन्यचर येतील त्यांची शिकार करावी, आणि मग त्यायोगेच आपले व कुटुंबाचे उदरभरण करावे. मग त्याने तेथील एका सरोवराच्या तीरावर आपले जाळे पसरलें आणि तिथेच कोठेतरी लपून बसण्यासाठी जागा शोधू लागला. शिकारीसाठी त्याने जिथे ते जाळे लावले होते, त्याच्या मध्यभागी एक मोठें स्वयंभु शिवलिंग होतें व जवळच एक मोठा थोरला बेलाचा वृक्षही होता. त्या झाडावरच तो व्याध चढला आणि पाणी पिण्यासाठी येणारे प्राणी स्पष्ट दिसावेत म्हणून त्या बेलवृक्षाचीं पानें तोडून खाली फेंकूं लागला, तीं भाग्यवशात त्या शिवलिंगावर पडूं लागलीं. सकाळपासून त्या दिवशी कोंडून ठेवल्यामुळे त्याला भोजन मिळालें नव्हते, मृगयेसाठी त्या रात्री जागरणही  घडलें. याप्रमाणे रात्रीचा एक प्रहर निघून गेला. तेव्हढ्यांत त्याला एका प्राण्याची चाहूल लागली. त्याने परत थोडी बिल्वपत्रे तोडली, अनावधानानेच, त्याच्याही नकळत तो सकाळी मंदिरात ऐकलेल्या शिव नामाचा उच्चार करीत होताच. अशा रितीने त्याच्या हातून महाशिवरात्रीच्या पहिल्या प्रहरींची शिवपूजा घडली. त्या यामपूजेच्या प्रभावाने त्या व्याधाच्या एक चतुर्थांश पातकांचा नाश झाला. त्यावेळी त्या तळ्याकाठी एक गर्भार हरिणी पाणी पिण्यासाठी आलेली त्या पारध्यास दिसली. तो तिरकमठा सावरून शरसंधान करणार इतक्यांत ती मृगी दिव्यवाणीने त्याला म्हणाली, “ हे व्याध्या  ! मी काहीही अन्याय केलेला नाही. असे असता तू मजवर बाण का मारतोस ? मी तर गर्भिणी आहे. तू मला मारू नकोस.” 
त्या हरिणीचे ते मनुष्यवाणीतील बोल ऐकून तो पारधी आश्चर्यचकित होऊन म्हणाला, “ हे मृगी, मी आणि माझे कुटुंब क्षुधेने अत्यंत पीडित असून मला ऋणमुक्तीसाठी द्रव्य संपादन करायचे आहे. म्हणूनच, मी तुला मारतो आहे. मी आजपर्यंत अनेक उत्तम, मध्यम, कनिष्ठप्रतीचे असे असंख्य जीव मारले परंतु त्या सर्व श्वापदांमध्यें अशी वाणी मात्र कधीं ऐकली नाही. तुला पाहून माझ्या हृदयांत करुणा निर्माण झाली आहे. तू कोण आहेस? तुला एवढे ज्ञान कसे व कोठून मिळाले ?”
त्यावर ती मृगी दिव्यवाणीत म्हणाली, “ हे व्याधश्रेष्ठा, माझा पूर्वजन्म वृत्तांत तुला सांगतें. मी पूर्वी स्वर्गाचा राजा इंद्र याच्या दरबारातील एक अप्सरा होतें. अनुपम रूप, लावण्य व सौभाग्य यांमुळे मी अत्यंत गर्विष्ठ झाले आणि हिरण्याक्ष नांवाच्या सामर्थ्यशाली दानवाशी मी विवाह केला. त्याच्याशीं सवहर्तमान मीं यथेच्छ भोग भोगले. त्या दुष्टाच्या सहवासामुळे मी उमापती महादेवाची आराधनाही करेनाशी झाले. मी दररोज शंकरापुढे प्रेक्षणीय असें नृत्य करीत असें. मात्र एके दिवशी भोगलालसेमुळे माझा तो नित्यनेम चुकला. आणि ‘ मज हिमनगजामात । परम क्षोभोनि शाप देत । तू परम पापिणी यथार्थ । मृगी होई मृत्युलोकी ॥’ तेव्हा मी अनन्य शरणागत होऊन प्रार्थना केली, “ हे शाप व अनुग्रह देण्यास समर्थ असणाऱ्या देवाधिदेवा, माझा भर्ता मला प्राणांहून प्रिय आहे, तो एक महाबलवान् दैत्य आहे. त्याच्या सहवासात मी शिवार्चन करणे सोडून दिले. मला क्षमा करा.” तेव्हा त्या परम दयाळू कैलासपतीने मला उ:शाप दिला, “ तू बारा वर्षे मृगी होऊन राहशील, जेव्हा एक व्याध तुझ्यावर शरसंधान करील त्यावेळीं तुला पूर्व जन्माचें स्मरण होईल व नंतर शंकराचें दर्शन घेऊन तू मोक्ष पावशील.” 
हे पूर्वजन्म कथन करून ती हरिणी पुढे म्हणाली, “ हे व्याध्या, मला आता तू सोडून दे. या स्थितीत माझा वध करणें योग्य नाहीं. हे लुब्धका, काही वेळांत दुसरी एक पुष्ट मृगी येईल, तिची शिकार केल्यास सहकुटुंब तुझें यथेच्छ भोजन घडेल. तसेच हे व्याधा, या तळ्यावर पाणी पिण्याकरितां दुसरा मृग प्रातःकाळी येईल, तो तुझ्या क्षुधाशमनार्थ नक्कीच उपयोगीं पडेल. अथवा मी घरीं जाऊन गर्भ प्रसवून मुलेबाळें माझ्या कुटुंबाच्या स्वाधीन करून इथे पुनः शपथपूर्वक येईन.” तिचें तें भाषण ऐकून व्याध मनांत आश्चर्यचकित झाला. मात्र तरीही तो त्या गर्भिण हरिणीस म्हणाला, " तू म्हणतेस ते कदाचित खरेही असेल. मात्र जर दुसरी मृगी किंवा मृग आला नाहीं, व आता मी सहज शिकार करू शकत असलेल्या तुलाही सोडली तर माझेच नुकसान होईल. कारण माझा आत्मा व विशेषतः कुटुंबाचे प्राण क्षुधेनें अत्यंत व्याकुळ झाले आहेत. परंतु प्रातःकाळीं तूं परतून येशील अशी ज्या योगे मला खात्री वाटेल, अशी तू शपथ घे. कारण पृथ्वी, वायु, सूर्य आदि सर्व देव-देवता ह्या सत्यास साक्षी असतात. त्यामुळे ज्यांना इहलोक व परलोक साधावयाचा असेल, त्यांनीं सदैव सत्याचे पालन करावे.”
त्याचे ते भाषण ऐकून गर्भाधाराने वेदनाग्रस्त झालेल्या हरिणीनें सत्य शपथ घेतली ती अशी - हे व्याधा, पुनः मी जर न येईन तर, वेदविहित कर्मे न करणाऱ्या, अनेक दुराचरण करणाऱ्या, आणि देवाचें द्रव्य, गुरूचें द्रव्य व ब्राह्मणाचें हरण करणाऱ्यांना जे पाप लागेल ते मला लागेल. असें मृगीचें भाषण ऐकून तो व्याध प्रसन्न झाला आणि त्यानें धनुष्यबाण ठेवून हरिणीला तत्काळ सोडून दिली. तिच्या त्या उक्तिप्रभावानें व लिंगाच्या पूजेनें व्याधाच्या पापाचा अजून एक चतुर्थांश भाग तत्काळ दूर झाला. हे गिरिजे, रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी म्हणजेच मध्यरात्रीं शिव-शिव असें स्मरण करित असल्यामुळे त्या पारध्याला झोप आली नाहीं. 
एवढ्यांत दुसरी एक सुंदर हरिणी तेथें येत असल्याचे पाहून तो आनंदला. त्याने परत थोडी बेलाची पानें हातांनीं तोडून तीं दक्षिणभागीं टाकलीं आणि पुन्हा एकदा तीं बिल्वपत्रे शिवलिंगावर पडलीं. मग व्याधानें तिला मारण्यासाठी धनुष्याला बाण लावला आणि तो तिर सोडणार, हे त्या हरिणीने पहिले आणि ती म्हणे ‘ व्याधा ऐक ये समयी । मज कामानळे पीडिले पाही । पतीस भोग देवोनि लवलाही । परतोनि येते सत्वर ॥’ हें तिचें भाषण ऐकून तो व्याध चकित होऊन क्षणमात्र विचार करू लागला, “पहिल्या हरिणीची जशी वाणी होती तशीच हिचीही आहे, हिलाही सर्व शास्त्रज्ञान अवगत असणार.” असे चिंतन करून तो त्या हरिणीला म्हणाला, “ तू धन्य आहेस !  तू पुनः येशील अशी सत्य प्रतिज्ञा कर आणि जा."
त्या हरिणीने सांगितलेली अनेक धर्मवचने ऐकून त्या व्याध्यास संतोष झाला आणि त्याने तिला सोडून दिले. त्या रात्री अतिशय थंडीनें, क्षुधेनें व गृहचिंतेनें त्याला झोंप लागली नाहीं, मुखी शिव नाम होतेच. मग तो सहज पुन्हा बेलाची पाने तोडू लागला.
थोड्याच वेळांत तिथे एक मृग आला. पहिल्या हरिणीने सांगितले होते, तसेच घडत असलेले पाहून तो पारधी हर्षित झाला. त्याने धनुष्याची प्रत्यंचा कानापर्यंत ओढून शरसंधान केलें, आणि आतां तो बाण सोडणार एवढ्यांत त्या हरिणानें व्याधाला पाहिलें. 
तोही मृग मनुष्यवाणींत बोलू लागला, “ हे व्याधा, इथे दोन हरिणी आल्या होत्या का ? त्या कोणत्या मार्गाने गेल्या ? तूं त्यांना मारले तर नाही ना ? माझी एक भार्या प्राणासारखी व दुसरी प्राण देणारी आहे. तू मला मारशील तर त्यांना फार दुःख होईल. मी त्यांना सांगून व त्यांचे सांत्वन करून येतो.” हें त्याचें भाषण ऐकून व्याध विचार करूं लागला, “ हा हरिणसुद्धां सामान्य नव्हे, ही कोणीतरी सर्वोत्कृष्ट देवताच असावी.” मग तो त्या मृगास म्हणाला, “ दोन हरिणी माझ्यापाशीं शपथ घेऊन याच मार्गाने गेल्या. त्यांनींच तुला पाठविला असें वाटतें. आतां मी तुला त्वरित मारतों.”  
तेव्हा मृगाने विचारले, “ व्याध्या, त्या दोघींनीं तुझ्यापाशीं कोणती सत्यप्रतिज्ञा केली, कीं तुला विश्वास वाटून तूं दोघींनाही सोडून दिलेस ?” असा प्रश्न करतांच व्याधानें त्यां दोन्ही हरिणींनी सांगितलेले शास्त्रार्थ ज्ञान त्या मृगास कथन केले. ते ऐकून त्या हरिणास अत्यानंद झाला आणि तो बोलू लागला, “ हे व्याध्या, मी आता जाऊन माझी सर्व कर्तव्ये पूर्ण करून तसेच माझ्या सुहृदांची आज्ञा घेऊन शपथपूर्वक परत येईन.” त्याने सांगितलेले पापफळांचे सर्व निरूपण ऐकून व्याधाने त्यालाही जाऊ दिले. हे अपर्णे, तो हरिणही जालपाशांतून सुटल्यामुळे संतुष्ट होऊन जलप्राशन करून पुनः अरण्यांत गेला. त्या व्याधानें पुन्हा पहाटेच्या प्रहरीं बेलाची पानें तोडून शिवलिंगावर टाकलीं. अज्ञानानें का होईना, शिवरात्रीदिवशीं त्या व्याधाला उपोषण-जागरण घडलें व बिल्वपत्रांनी शिवपूजाही घडली, त्याच्या प्रभावानें सूर्योदयीं तो सर्व अघांतून तत्काळ मुक्त झाला. एवढ्यांत दुसरी एक मृगी तेथें आली. तिच्यासोबत तिचे एक लहानसे पाडस होते.  तिला पाहून व्याध्याने पुन्हा एकदा बाण धनुष्याला लावला, ते पाहून ती हरिणी दिव्यवाणीत बोलू लागली, “ हे व्याध्या, तू धर्मवचन जाणतोस. तू हा बाण सोडू नकोस, धर्माचे पालन कर. शास्त्रार्थानुसार मी अवध्य आहे, हे तुला ज्ञात आहे. एखादा धर्मशील राजा मृगयेसाठी निघाला तरी, निद्रिस्त, मैथुनासक्त, स्तनपान करणारा, किंवा व्याधिपीडित हरिण अथवा अन्य वन्य प्राणी तसेच लहान पाडसयुक्त हरिणी यांची कधीच शिकार करत नाहीं. सांप्रतकाळी, तू कदाचित् धर्म सोडून जर मला मारीत असलास तरी काही काळ जरा थांब. मी घरीं जाऊन माझें हे पाडस माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांना सांभाळण्यास देते. आणि तुझ्याकडे परत येते. मग तू मला मार. मी जर दिलेले हे वचन पाळले नाही तर वेदादिक शास्त्रांत वर्णिलेली अनेक पापे मला लागतील.” हें तिचें भाषण ऐकून व्याध मनात विस्मित झाला आणि त्यानें त्या हरिणीलाही सोडले. त्या मृगीला आनंद झाला आणि आपल्या पिल्लासोबत ती अरण्यांत दिसेनाशी झाली.
तो व्याधही मग त्याच्या घरीं जाण्यासाठी निघाला. वाटेत जाता जाता त्या सत्यवादी हरिणांनी सांगितलेली धर्मशास्त्रातील वचनें आठवू लागला आणि या मृगांची व अन्य प्राण्यांची  नित्य हत्या करणारा मी कोणत्या गतीला जाईन बरें, असा मनोमन विचार करू लागला. तो व्याध आपल्या गृहीं परतला, त्यावेळी एक वेळच्या भोजनापुरतें सुद्धां अन्न किंवा मांस त्याने आणले नाही, हे पाहून घरातील सर्वचजण निराश झाले. त्या व्याध्याची लहान मुले, इतर सदस्य आता भुकेने अतिशय व्याकुळ झाले होते. व्याधाचा मात्र जंगलातील त्या हरिणांनी घेतलेल्या शपथवाक्यांवर पूर्णतः विश्वास होता. “ मनुष्यवाणीने बोलणारी ती सर्व हरिणे धर्मात्मेच असून ते निश्चितच येतील, आपण मात्र यापुढे धर्मसंमत वागायचे आणि त्या मृग परिवाराची शिकार करायची नाही.” असा त्याने निश्चय केला. 
इकडे धर्मवचन ऐकून शपथांवर व्याधानें सोडलेला तो हरिण आपल्या आश्रमांत परतला. लवकरच पहिल्या हरिणीची प्रसूती होऊन तिने पाडसाला जन्म दिला. दुसर्‍या हरिणीने पतीला संतुष्ट केले. तिसऱ्या हरिणीने तिच्या लहानग्यास स्तनपान केले. अशा रितीने सर्वांचा निरोप घेऊन तो मृग आणि त्या तीन हरिणी सत्याचे पालन करीत त्या व्याध्याच्या घरी जाण्यासाठी निघाले. तात्पर्य, पूर्वजन्मीच्या सुकृतामुळे धर्मसंबंधाने मनोहर विचार करून कर्तव्याचे पालन करीत ते मृग कुटुंब तो व्याध जिथे होता, तिथे आले. 
व्याधाला पाहून तो मृग म्हणाला, “ व्याध्या, तू प्रथम मला मार, नंतर माझ्या या स्त्रियांना आणि त्यानंतर माझ्या मुलांना मार. आतां उशीर करूं नको. मृगांची हत्या केलीस म्हणून तुला कांहीं दोष लागणार नाहीं. कारण तुला तुझ्या कुटुंबाचा चरितार्थ करायचा आहे. त्यायोगें आम्हांसही  मुक्तीचा लाभ होईल.”
त्या सत्यपालक मृगाचे हे बोल ऐकून तो व्याध म्हणाला, “ हे मृगराज, तुम्ही सर्वजण आपल्या घरी परत जा. मी तुमची शिकार करणार नाही. हे हरिणश्रेष्ठा, धर्माचा उपदेश करणारे तुम्ही सर्वचजण माझे गुरु आहात. आजपासून मी शस्त्रास्त्रे टाकली आणि धर्माश्रय घेतला.” 
तो मृग परिवार मात्र “ आम्ही शपथ घेतल्याने वचनबद्ध आहोत, आता आम्ही परत जाणार नाही. तू आम्हांस लवकर मार.” असे वारंवार म्हणू लागला. ते पाहून पश्चात्तापग्रस्त त्या व्याधानें बाणासह आपले धनुष्य तत्काल मोडून टाकलें व मृग परिवाराला त्याने नमन केले आणि त्रास दिल्याबद्दल क्षमाही मागितली.  
तोच अद्भुत घडले! स्वर्गातील देवांनीं दुंदुभी वाजविली. त्यावेळीं आकाशांतून दिव्य पुष्पवृष्टि होऊं लागली, आणि  शिवदूत त्या ठिकाणी उत्तम विमान घेऊन आले. त्या व्याध्यास ते शिवदूत दिव्यवाणीत म्हणाले, “ हे सत्त्वशीला, या विमानांत बसून तू सशरीर स्वर्गास जा. शिवरात्रिव्रताच्या प्रभावानें तुझें सर्व पाप क्षयाला गेलें. तुला महाशिवरात्रीच्या दिवशीं उपोषण घडलें, रात्रौ जागरण घडलें. अजाणतां कां होईना, दर प्रहरीं शिवाची यामपूजा घडली, त्या पुण्ययोगानें तुला आता शिवलोकीची प्राप्ती होईल.” 
पुढें ते शिवदूत वदले, “ हे धर्मपालक, सत्यवचनी मृगराजा, तूं आणि तुझ्या या तीनही स्त्रिया व पुत्र यांसहवर्तमान तुम्ही नक्षत्रपदाला जा. तें नक्षत्र तुझ्या नांवानें ( मृगशीर्ष नामाने) प्रसिद्ध होईल.” शिवदूतांचे हे भाषण ऐकून तो व्याध व तो मृग परिवार दिव्य विमानांत बसून नक्षत्रलोकाला गेले. 
हे पार्वती, त्या दोन हरिणींचा मार्ग तर अद्यापि स्पष्ट दिसतो व त्याच्या पृष्ठभागीं मण्याप्रमाणे एक नक्षत्र (व्याध) आणि त्याखाली तीन मोठीं तेजःपुंज नक्षत्रे आहेत, त्याला मृगशीर्ष असें म्हणतात. अग्रभागी दोन पाडसे, तर पृष्ठभागी तिसरी मृगी यांसहित मृगशीर्षांजवळ आलेला हा मृगराजा अद्यापही आकाशांत विराजमान दिसतो. व्याधाला शिवरात्रीदिवशीं सहजीं घडलेलें उपोषण, रात्रौ जागरण, व शिवपूजनही घडलें त्याचें असे फळ मिळाले. नकळत घडलेल्या व्रताचें जर एवढे फळ तर मग जे लोक भक्तिभावानें शुभकारक असें शिवरात्रीचें व्रत विधिपूर्वक, उपोषण-जागरणासह करतात त्याचें फल किती वर्णावे? जन्मोजन्मी केलेल्या पातकांचा नाश करणारें महाशिवरात्रीसारखें दुसरें प्रभावी व्रत नाहीं. सहस्र अश्वमेध केल्याने अथवा वाजपेय यज्ञ केल्याने जेवढे फळ प्राप्त होते, तेंच या महाशिवरात्रिव्रतानें प्राप्त होतें यांत संशय नाहीं. माघमासीं प्रयागांत स्नान करणारांला जें पुण्य लाभते व वैशाखांत द्वारावतींत स्नान करणारांला जें फळ मिळते, तपसि (ब्रह्मचाऱ्यानें) पालाशदंड घेतला असतां अथवा कार्तिकामध्यें माधवासमोर गयेस जाऊन विष्णुपदावर पिंड दिल्याने जी फलप्राप्ती होते, तोच लाभ हे महाशिवरात्रित्रत करणाऱ्या भाविकाला खरोखर प्राप्त होईल.  
॥ इति श्रीलिंगपुराणे महाशिवरात्रिव्रतकथा संपूर्णा ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

श्रीशिवोपासना : -