Dec 16, 2021

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - अंबरीषोपाख्यान


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीसद्‌गुरुवे नमः ॥

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार तृतियोऽध्यायः ॥

ऐसें वेदधर्माख्यान । नामधारक ऐकून । पुसे कां हा देव असून । अवतरुन ये येथें ॥१॥ कां घे दशावतार हे । सिद्ध म्हणे ऐक तूं हें । अंबरीषाकरितां हें । नटन आहे नारायणा ॥२॥ दुर्वास ऋषी द्वादशीसी । आला अंबरीषापाशीं । लावी विलंब कर्मासी । हो मानसीं खिन्न भूप ॥३॥ टळे वेळा हें जाणून । राजा करी जलपान । गर्भवासा जा म्हणून । दे कोपून ऋषी शाप ॥४॥ तेव्हां दयाळु येऊन । स्वयें शाप स्वीकारुन । अवतरे नारायण । जो असोन सर्वव्यापी ॥५॥ ॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे अंबरीषोपाख्यानं नाम तृतियोऽध्यायः ॥ सिद्धमुनींनी कथन केलेले वेदधर्म-दीपक आख्यान नामधारकाने एकाग्र चित्ताने श्रवण केले. त्यामुळे, त्याचे मन संशयरहित झाले आणि दृढ गुरुभक्ती त्याच्या ठायीं निर्माण झाली. त्याने सिद्धयोगींना नमस्कार करून, " स्वामी, मला श्री गुरूंचा महिमा आणि चरित्र विस्तारपूर्वक सांगावे.", अशी विनवणी केली. त्यावर सिद्धांनी त्याला आश्वस्त केले आणि परम पवित्र, कामधेनूस्वरूप श्री गुरुचरित्र सांगण्यास सुरुवात केली. नामधारकाने पुन्हा एकदा श्री गुरूंना वंदन केले आणि विनयाने हात जोडून विचारले," हे सिद्ध योगेश्वरा, श्रीगुरु तर प्रत्यक्ष ब्रह्मा-विष्णु-महेशरूपी त्रिमूर्ती आहेत, असे तुम्ही सांगितले. तर मग ते मानव म्हणून अवतार घेऊन का आले ? त्यांना दहा अवतार का घ्यावे लागले ? हे मला सविस्तर सांगा." तेव्हा सिद्ध म्हणाले, " नामधारका, भक्तवत्सल श्रीहरीने आपल्या प्रिय भक्त अंबरीषासाठी हे दहा अवतार घेतले. अंबरीष नामक धर्मपरायण राजा अत्यंत भक्तिभावाने द्वादशी व्रत करत असे. एकदा, द्वादशीच्या दिवशी दुर्वास ऋषी अतिथी म्हणून अंबरीषाच्या राजदरबारांत आले. राजाने वंदन करून त्यांची यथोपचारें पूजा केली आणि प्रार्थना केली, " महर्षी, आपण आपले अनुष्ठान करून सत्वर भोजनास यावे. आज एक घटिकाच साधन द्वादशी असल्याने, घटकेच्या आत व्रत सोडण्याकरिता राजवाड्यांत परतावे. " दुर्वास ऋषी नदीवर अनुष्ठानासाठी गेले, तिथे त्यांना विलंब झाला. इकडे अंबरीष राजास व्रत कसे पूर्ण करावे, याची चिंता वाटू लागली. अखेर, आपला व्रतभंग होऊ नये यासाठी घटिका सरण्यापूर्वी राजाने जल प्राशन करून उपवास सोडला. मात्र अतिथीला न घेताच राजाने भोजन केले म्हणून दुर्वास ऋषी कोपले आणि त्यांनी अंबरीषाला शाप दिला," तुला प्रत्येक योनींत जन्म घ्यावें लागतील." अंबरीष राजाने आपल्या आराध्य देवतेचे म्हणजेच शार्ङ्गधराचे स्मरण केले. भक्तवत्सलता हेच ब्रीद असलेला नारायण तात्काळ तिथे प्रकट झाला आणि दुर्वास ऋषींना म्हणाला, " ऋषीवर्य, आपण माझ्या भक्ताला दिलेला शाप मी स्वीकारतो." तेव्हा, आपल्या भक्तांचे, सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचे निर्दालन करून भूमीचा भार उतरण्याचे कार्य करण्यासाठी श्रीविष्णूंनी लक्ष्मीसहित अवतार घेतल्यास जनकल्याणच होईल आणि या भूलोकी हरिचरणांचे दर्शन तसेही दुर्लभ आहे, तेही भाग्यवंतांना प्राप्त होईल, असा विचार करून दुर्वास ऋषी वदले, " हे विश्वात्म्या, तू या अवघ्या चराचरांस स्थूल अन सूक्ष्म रूपांत व्यापून आहेसच. पुढें, या पृथीतलावर अनेक स्थानीं तू अवतार घेशील. तुझे हे दहा अवतार विशेष प्रसिद्ध होतील. " अशारितीने, जगत्पिता श्रीहरीने आपल्या प्रिय भक्तासाठी दुर्वास ऋषींनी दिलेला शाप स्वीकारला आणि दहा अवतार घेतले.

॥ प. प. श्रीद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

No comments:

Post a Comment