May 14, 2021

ब्रह्मनिष्ठ वामन ( वामनबुवा ) रावजी वैद्यरचित श्रीगुरुलीलामृत


 श्रीगणेशाय नम  द्रां दत्तात्रेयाय नमः 

॥ श्री स्वामी समर्थ 

श्री दत्तप्रभूंचा अवतार असलेलें अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तगणांत अलोट मान्यता लाभलेला ग्रंथ म्हणजे ब्रह्मनिष्ठ वामन ( वामनबुवा ) रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत ! या ग्रंथाच्या नित्य पठणें । सर्व सिद्ध निःशंक होतें श्रवणें । गृहीं हा ग्रंथ संरक्षणें । दत्तदर्शन होईल ॥ अशी निश्चित प्रचिती देणारा हा अलौकिक ग्रंथ प्रामुख्याने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रावर आधारित आहे. ह्या दिव्य ग्रंथाच्या लेखनाच्या प्रेरणेविषयीं आत्मनिवेदन करतांना ब्रह्मनिष्ठ वामनबुवा म्हणतात - हें नाहीं नाहीं स्वकपोलकल्पित । वेदशास्त्रपुराणार्थरहस्यमथित । हृदयस्थ परमात्मा दत्तावधूत । त्यांचे तेचि वदविती ॥ अर्थात हा सिद्ध ग्रंथ स्वकपोलकल्पित नसून प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंनीच लिहून घेतला आहे. 

पंचावन्न अध्याय आणि ९७५८ ओव्या असलेल्या ह्या ग्रंथात धर्म, मीमांसा, व्याकरण, न्याय, ज्योतिष, वैद्यक आदि अनेक शास्त्रांचे सविस्तर विवेचन केले आहे. त्याखेरीज, श्रुति, स्मृति, पुराणे, वेद-उपनिषदें यांतील अनेक श्लोक-वचनेंही प्रतिपादित केली आहेत. श्रीगुरुलीलामृत या चरित्र ग्रंथात प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभी वेदान्तातील काही प्रमेयांचे विश्लेषण आहे, तदनंतर त्याच अनुषंगाने श्रींच्या भक्तांच्या कथा आल्या आहेत. 

' भावेन विद्यते देव: ' या स्मृति वचनावर विश्वास ठेवून भाविकांनी या प्रासादिक ग्रंथाचे वाचन केल्यास श्री स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती अवश्य येतेच. ही ग्वाही देतांना ग्रंथकार लिहितात - नित्यश: एक अध्याय तरी । सद्भावें वाचावा निर्धारीं । तयाचे सकल मनोरथ पूर्ण करी । श्रीसद्गुरुस्वामी निश्चयें ॥ 

ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्यरचित संपूर्ण श्रीगुरुलीलामृत अर्थात श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरित्र इथे वाचता येईल. 

  ॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु 

  सौजन्य : http://swamisamarthmathindore.org/


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.