Mar 4, 2021

श्री गजानन विजय दैनंदिन ओवी स्वाध्याय चिंतन अध्याय - २ ( ओवी १ ते १० )


|| श्री गणेशाय नम: ||

१/१ जयजय अज अजिता सर्वेश्वरा | हे चंद्रभागा तटविहारा |
पूर्णब्रह्मा रुक्मिणीवरा | दीनबंधो पाहि माम ||
१/२ कुडीमाजी नसल्या प्राण | कोण विचारी मढ्याते |
तुझ्या वाशिल्यावाचून | अवघेच आहे देवा शीण ||
१/३ सरोवराची दिव्य शोभा | तोयामुळे पद्मनाभा |
पाप ताप दैन्य वारी | हेच मागणे ||
१/४ रसभरीत आतला गाभा | टरफलाते महत्व आणी ||
तुझी कृपा त्याच परि | शरणागताते समर्थ करी |
हे पांडुरंगा, हे पंढरीनाथा, प्राणेश्वरा तुझ्याच कृपेने व आशीर्वादाने श्रीगजानन चरणी भक्तीभाव निर्माण झाला, त्याचेमुळे तुझे पाय सापडले. ओवी चिंतन करताना पहिला अध्याय संपवून दुसऱ्या अध्यायात केंव्हा शिरलो कळलेही नाही. पण खरे तर हे आहे की आपल्याला महाराजांचे दास होता आले पाहिजे. आपण दास न बनता मालक बनण्याचा प्रयत्न करायला गेलो रे गेलो की तो भुयारात बसलेला प्रत्यक्ष ईश्वर दिसावा, भेटावा मुक्ती मिळावी म्हणून आपण त्याचे जवळ जायचा जितका प्रयत्न करू तितका तो आपल्या पासून दूर दूर जायला लागतो व त्याला कधीही पकडणे शक्य होत नाही. त्याची कृपा होणे तर दूरच. दास होता आले पाहिजे, ते प्रारब्धात असायला हवे तर सेवा मिळते, नाहीतर हाताला यायचे तेही केंव्हा निसटले याचे भानही राहत नाही, मालक बनण्याच्या नादात. एखाद्या कार्य उभारणीत भगवंत कुणाला तरी कार्य करण्याची प्रेरणा देतो तो भाग्यवंत ठरतो, तोही ईश कार्य समजून तळमळीने कार्यात सर्वस्व सोडून वाहून घेतो, त्या कार्यपूर्तीसाठी कष्ट उपसतो, भगवंत त्याला यश देतो आणि भगवंताचे आपल्यावर फर ऋण झाले असे समजून मरेपर्यंत त्या कार्याचा वसा सोडत नाही हा भाव वेगळा. अशा कार्याचा वारसा त्यांना प्रभूकृपेने लाभत असतो, कारण भगवंताने त्यासाठीच त्यांची योजकता केली असते. त्यात खारीचा वाटा उचलण्याने त्यांना सुद्धा खूप समाधान लाभते व त्याचा नम्र भाव होतो की ईशकृपेने ही सेवा लाभली बरें ! तोही स्वत:ला कृतार्थ मानतो. जो शरणागत भावाने अशा कार्यात सेवा देतो त्यास श्री गजानन महाराज समर्थ करतात, त्याची इच्छापूर्ती करून असल्यास त्याचे पाप, ताप, दैन्य नाहीसे करतात. बंकटलाल प्रेमयुक्त भक्तीचा जाणकार होता, कारण त्यास श्रीमद भागवत ऐकण्याचा योग आला असावा. त्यामुळेच त्याच्या अंत:करणात श्रींबद्दल प्रेमयुक्त भक्ती उपजली. एखादा मन हेलावणारा प्रसंग जसा आपल्यासमोर घडावा आणि त्या दृश्यामुळे आपले मन जर त्याच घटनेचा विचार करीत राहिले तर तो प्रसंग डोळ्यासमोरून जाता जात नाही कारण हा मनाला बसलेला चटका असतो. त्या घटनेचा त्याला नकळत ध्यास लागतो. त्याच घटनेचे चिंतन होत राहते जोपर्यंत मनाला समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत. बंकटलालाचे असेच काही झाले असावे. मनाने तो श्री महाराजांशी एकसंध झाला होता, पण महाराज अचानक दूर निघून गेल्याने डोळ्याने तर दिसत नव्हते. तो कासावीस झाला होता. बेचैन झाला. हवी असलेली वस्तू दिसली नाही, तर त्या वस्तुविषयी अजून आकर्षण वाढते. त्या साठी तो झुरतो. त्याच गोष्टीचा ध्यास घेतो. या भावावस्थेत बंकाटलाल अडकून पडला. आई थोडा वेळ जर डोळ्याला दिसली नाही तर लहान बाळ जसे रडायला लागते तसे त्यांचे मन श्रीसाठी आक्रंदन करू लागले.
फार पूर्वी कारंजा गावी एक तळे पाहण्याचा योग आला होता, तेंव्हा त्या तळ्यात कमळें असायची, पाणी पण मुबलक होते. त्या कमळांमुळे तलावाचे सौंदर्य खुलुन उठले होते. तलाव परिसरात चिंताग्रस्त मनुष्य गेला तरी त्याचे मन तलावाकडे बघून शांत व्हायचे. काही कवी म्हणत्तात की जशी मनाची अवस्था असेल तसा निसर्ग दिसतो, पण येथील निसर्ग सौंदर्य इतके दिव्य होते कुणीही गेले की निसर्ग सानिध्यात मन प्रसन्न व्हायचे. मनाचा भाव बदलायचा. मन:परिवर्तन करण्याची शक्ती व किमया जशी निसर्गात आहे तशीच शक्ती श्री नामस्मरणात आहे. नामस्मरणात भगवंत चिंतन घडते, त्याचे अस्तित्व हृदयात जाणवते. ही भावना बनते की मी विश्वासाने एकदा स्मरण केले की तो भगवंत माझी काळजी घ्यायला समर्थ आहे, मग मला काहीच करावे लागणार नाही. श्रीचरणी शरणागत झाला की तादात्म्य पावतो तो ईशशक्ती बरोबर. हा भाव निर्माण झाला की त्यातून ज्याचा मनात इतर सटरफटर विचार येत नाहीत. त्यांचे जिणे दिव्य होते व पुनरपि जन्म घेऊन भूतलावर दु:ख भोगण्यासाठी यावे लागत नाही. शरीर, मन, बुद्धी, भगवंतात विलीन झाली की आपण जेथून आलो त्या स्वरूपात परत विलीन होतो व आत्मसुख भोगतो. साधू संतांचे चरण दर्शन घडले की चैतन्य वाटायला लागते करण त्या संतांच्या स्पदनांचा परिणाम मनावर व आपल्या शरीरावर होत असतो. संतसंगतीत सुखाचा अनुभव येतो कारण त्यांचा आत्मा हा परमात्म्याशी संयोग पावलेला असतो आणि ज्यात रसभरीत आत्माराम वसला आहे त्याला देहाचे काय ते तेवढेच महत्व वाटणार. पण टरफल जसे आतील रसभरीत गाभा सांभाळते, त्यामुळेच आपोआपच त्या टरफलाही महत्व प्राप्त होते. तसे या मानवी शरीराचे आहे.
ध्यानधारणा, योग, सत्संग, श्री नामस्मरण हे राग, लोभ, मोह, मत्सर, हेवेदावे, स्वार्थ, मीपणा, अहंकार यांना दूर सारते. भक्तीतील दिखाऊ वृत्ती नकोशी होते. अर्थात, त्यासाठी सदैव भगवंताला न विसरता आवाहन करावे लागते. नामस्मरण करावे लागते, निर्मोही व रिते मन करून. तरच सेवा भाव निर्माण होतो. शरीर चैतन्यमयी बनते. परमात्मा आपल्या आत्म्यात येऊन सुखावतो. विनम्र व शरणागत भाव निर्माण होतो.
मी माझा मालक, देवाचा व माझा संबंध काय? मी माझा समर्थ आहे, माझे जीवन घडवायला असे मानणे म्हणजे अज्ञान ठरेल. निरंतर आपण जो श्वास घेतो तोच भगवंत असतो, प्राण असतो, चैतन्य असते, जीवन असते, सजीवता असते. आणि नि:श्वास सोडतो तेंव्हा आपल्या मनातील वाईट विचार, आशा, चिंता, दु:ख, वेदना, तो विश्वासरुपी भगवंत बाहेर बाहेर घेऊन जातो. मग आपणास हलके हलके वाटायला लागते. मनात जागा रिती झाली की तेथे सुविचार जाऊन बसतात. अशी संधी हरघडी तुमच्या समोर उभी असते. त्याचे सोने करता आले पाहिजे. प्रारब्धाने व संतकृपेने हे घडते. सत-तत्वाची जाण असायला हवी, मीपण सोडावे व समर्पित भाव सिद्ध झाला की निश्चित समजावे भगवंताची कृपा आपल्यावर झाली आहे.
सकाळी उठताचं श्री स्मरणाने भावशुद्धी होते व मन जागृत होऊन आनंद मिळतो. यावेळी शुद्धभावाने घेतलेले श्री दर्शन शरणागत भाव निर्माण करते. पाप, ताप, दैन्य, दु:ख सोडून चैतान्यमयी शुद्धभाव घेऊन आपण जय गजानन म्हणत बाहेर पडतो. चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहतो. नामस्मरण सुखाने संसार करण्यासाठी केले की जो आनंद होतो, तेच भक्ताचे तप व मुक्ती होय.
तासाभरा पूर्वी अचानक माणूस भेटला आणि तो निघून गेला तर मला सांगा कुणाला रडायला येईल का ? नाही हेच तुमचे उत्तर आहे ना. बरोबर आहे. पण मग आता प्रश्न उभा राहतो तो हा की हा बंकटलाल का रडतोय? तो वेडां होता का? खुळा का होता तो? असे काय त्याने गमावले की तो रडायला लागला. हा सामान्य प्रसंग नाही, सामान्य स्थिती नाही. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्याना हा भाव नाही कळणार. आपला देव आपल्याला सोडून गेला, आता आपण एकटे पडलो, पोरके झालो अशी जाण त्यास झाली. बंकटलालाची ही आध्यत्मिक उत्क्रांती नव्हे, श्री कृपेने क्षणात घडलेली क्रांती आहे बंकटलालाच्या जीवनात. हा भक्तीचा, शरणागतीचा, विश्वासाचा, श्रद्धेचा दृश्य परिणाम श्रींनी प्रगट केला शेगावात पहिल्याच भेटीत. बर अस झाल नाही की श्री दिसत नाहीत, आता ते आपल्याला भेटणारच नाहीत म्हणून बंकटलाल स्वत:ला दोष देतोय, मी दुर्दैवी, कमनशिबी अस म्हणत नाही. माझे दुर्दैवाने लाभलेला हिरा मी गमावून बसलो म्हणत नाही. कारण एकदा का तो श्रींच्या प्रभाव क्षेत्रात आला व श्रींनी त्याला आपले म्हटले की त्याचा मुक्तीचा काळ या जन्मी आहे हे निश्चित मानावे. महाराज आणि बंकटलाल हे नाते जन्मोजन्मीचे असावे, माय लेकराचे असावे, म्हणूनच आई दिसली नाही की मूल जसे कावरे बावरे होते तसा तो भावविभोर झाला, बाळाला जशी हुरहूर वाटते तशी हुरहूर वाटायला लागली बंकटलालास. आई नाही तर आता दूध कोण देईल हा स्वार्थ भाव त्याच्या मनाला स्पर्श करीत नाही, तर आई नाही म्हणजे माझे सर्वस्व संपले, असे समजून तो झुरणीला लागतो आईच्या प्रेमापोटी, तसे येथे प्रेमापोटी बंकटलालाची तहान-भूक हरवली. त्याला भूक होती ती प्रेममयी भक्तीची व आपल्या माउलीची. तो सुन्न झाला, काय केले म्हणजे श्री सापडतील, तसे शेगाव फार मोठे नव्हते, त्याला वाटले काढू आपण शोधून पण भगवंत असा शोधून पकडल्या जातो का? किती सान्निध्य लाभले तर तासभर आणि एवढ्या कमी वेळात कुणावर एवढे प्रेम उपजू शकते का ?, असा प्रश्न अनेक विद्वान विचारतात, पण प्रेमवीर विचारीत नाहीत कारण एका दृष्टीक्षेपात हे घडू शकते हे अनुभवाने ते सांगू शकतील. पण ते सत्य असावे, त्यात निष्ठा असावी व विश्वासाने केलेले भावपूर्ण प्रेम असावे लागते.
म्हणूनच भक्ताला तप करण्यासाठी घरदार, संसार सोडून, अंगाला राख लाऊन हिमालयात जावे लागत नाही... मुलबाळ, संसार सोडावा लागत नाही. कारण त्याला आता परोपकारी जीवन अर्थपूर्ण जगायचे असते. मनाला टवटवीत ठेवायचे असते. आत्म्यातील परमात्म्याचे निरंतर स्मरण ठेऊन त्याल रसभरीत बघायचे असते व त्यासाठी जपायचा असते शरीर, कारण ज्या शरीरात भगवंत राहतो त्या शरीराचे मोल व महत्व तो भक्त जाणत असतो. कुडीमाजी नसल्या प्राण | कोण विचारी मढ्याते || प्राण असेपर्यंत तो पुरुष असतो, बाई असते त्याला मानवी अस्तित्व असत. पण एकदाचा शेवटचा श्वास सोडला आणि परत श्वास घेताच आला नाही की ते शरीर त्याक्षणी आपला भाव बदलते. त्या प्राणहीन शरीराला आता इंग्रजीत ‘इट’ या संबोधनाने ओळखतात. लोक पटापट जमून त्या मढ्याची स्मशानात अग्नी देऊन विल्हेवाट लावतात, त्याला निरोप देतात. त्याचे आभार मानून की त्याने प्राण जपला. जीवनात भगवंतांचे अस्तित्व व्यक्त केल सुसंकल्पनातून, शुद्ध आचार-विचारातून, परोपकारी भावनेतून. तोपर्यंत तो देवमाणूस होता तोही भगवंताच्या कृपेने ,सत्शील वर्तनाने, प्रफुल्ल व शांत मनाने आणि आनंदी, हसऱ्या टवटवीत चेहऱ्याने, पण प्रभू कृपा संपली, तो शेवटचा श्वास ठरला त्या शरीराचा, पण आत्मा तर अमर आहे ना.
१/५ मागले अध्यायी झाले कथन | समर्थ गेले निघून |
तेणे बंकटलाला लागून | हुरहूर वाटू लागली ||
न हाले दृष्टिपासोनी | गजाननाचे रूप ते ||
१/६ गोड न लागे अन्नपाणी | समर्थाचा ध्यास मनी |
याचे नाव श्रोते ध्यास | उग्या नसती पोरचेष्टा ||
१/७ जिकडे पाहावे तिकडे भास | होवो लागला त्यांचा खास | १/८ चुकलेल्या धेनूची | वत्स शुद्धि करी साची
वडीलापासी बोलावया | छाती त्याची होईना ||
तैसी बंकटलालाची | स्थिती झाली विबुध हो || १/९ हे हितगुज सांगावया | जागा नव्हती कोठे तया | १/१० ऐशा रिति चित्त भले | विचाराचे काहूर झाले |
पहिल्या अध्यायाच्या अंतिम चरणात आपण बघीतले की बंकटलांल आता पूर्ण भावविवश झाला होता, समोरची व्यक्ती ही माणूस नसून प्रत्यक्ष भगवंत आहेत याची पक्की मनाला खात्री पटली, म्हणून तो जमिनीवर बसलेल्या श्रींना वाकून व डोळे मिटून नमस्कार करायला लागला, त्याच क्षणी श्री महाराज केंव्हा उठून दूरवर निघून गेले हे कळले देखील नाही. डोळे उघडून पाहतो तर श्री कोठे ही दिसत नाहीत, भीरी भीरी इकडे तिकडे तो पहायला लागला पण महाराज त्याला कोठे दिसले नाहीत. परत परत सर्व दिशांना दूरवर नजर टाकली पण श्री नाहीत, हे पाहून त्याला जत्रेत आई हरविलेल्या निरागस मुलाला रडू कोसळावे तसे बंकटलाल रडायला लागलेत.
शेगाव अवघे धुंडाळीले | परि न पता लागला ||
श्री गजानन महाराजांनी कोठेही एका शब्दाने उपदेश केल्याचे दिसत नाही, त्यासाठी माध्यम वापरले ते स्वत:चे जीवन चरित्र. लोक सहयोगातून व सहवासातून आपल्या विलक्षण कृपेने व सहयोगातून विदर्भाच्या सर्व भक्तांवर बत्तीस वर्षे अधिराज्य गाजविले. त्या बंकटलालाला एवढा आपलासा केला की श्रींशिवाय जगणे त्यास नामंजूर होते, म्हणून हुरहूर वाटणाऱ्या या सद्भक्ताला त्याचा शोध घ्यावासा वाटला. हे खरच असे नवल प्रथमच शेगावात घडले व याचे नायक होते श्री. आपल्या जीवनातून असे आगळे वेगळे दर्शन घडविणारे ते फक्त आध्यात्मिक गुरु नव्हते तर एक थोर संत होते, थोर समाजाची धारणा करणारे श्रेष्ठ लोकनेते होते. सर्व जनतेला समान मनुष्य पातळीवर आणून समतेचा धडा शिकविणारे वारकरी होते. त्यासाठी लागते थोर नशीब तर भक्ताला असा थोर गुरु लाभतो, व संताला आपल्या तपाने सद्भक्त. हा एक ईश्वरी चमत्कार घडला विदर्भात शेगाव नगरी.
दुसरा मुद्दा असा निर्माण होतो की बंकाटलालाचे महाराज काय घेऊन गेले होते. त्याच्या जीवनाचा अर्थ, संतकृपेने प्राप्त होणारी कृपादृष्टी, की त्याचे श्रद्धास्थान? एवढे मात्र खरे की श्री नाहीत म्हणजे जीवनात आता काही राम उरला नाही. त्यांच्या विना जिणे व्यर्थ आहे. बेचैन होऊन सगळे शेगाव पालथे घातले पण बंकटलालास महाराज काही गवसले नाहीत. एकच ध्यास महाराज कोठे व कधी भेटतील? एकच विचार काय केले म्हणजे भेटतील. पण आता मी शोधू तर कोठे शोधू? लहान बाळाला आईचा लळा लागावा तसा माऊलीचा लळा लागला या सदभक्तास. शोधूनही श्री दिसत नाहीत त्यामुळे त्याच्या जीवाची तगमग व्हायला लागली. जीव घाबरा व्हायला आला. तशी हुरहूर अजून वाढली. महाराज तर क्षणभरही त्याच्या डोळ्यासमोरून सरकत नव्हते. मन इतरत्र रमत नव्हते. अशी काय जादू केली असेल बरें या भक्तावर श्रींनी काही कळायला मार्ग नाही. तहान नाही, भूक नाही. आग्रहाने कुणी दिलेच तर त्यात ना गोडवा, ना आनंद ना सुख समाधान. एखाद्याने गजानन अशी हाक जरी कुणाला मारली तर हा तिकडे मान वळवून पाही व कान टवकारून ऐकत असे, एवढा श्रींचा ध्यास घेतला होता. आज कुणाला ही अतिरंजित गोष्ट वाटेल पण अध्यात्मात गुरु आपल्या शिष्याला सहज भावाने- तो योग्य असल्यास स्वत:कडे खेचून घेतो जसे लोहचुंबकाकडे लोखंड. अध्यात्मात म्हणूनच स्वानुभवाला फार महत्व आहे. ते शरीराने वेगवेगळे असले तरी मनाने एकात्मता अनुभवतात. जंगलात भटकलेल्या गाईलासुद्धा वासराजवळ लवकर पोहचता यावे अशी तळमळ असते, इकडे वासरूसुद्धा सारखे हंबरडा फोडत असते, केविलवाणे होऊन आपल्या मातेसाठी. बंकटलालास याची जाण होती की सर्वांनाच ही माझी अवस्था कळणार नाही, त्यामुळे दुसऱ्याजवळ बोलायची सोय नव्हती. त्याला भीती वाटत होती, ते आपल्याला हसतील म्हणून. इकडे वडिलांना सांगायची हिम्मत होत नव्हती. आणि एकट्याने हे दु:ख पचविण्याची हिंमत नव्हती. अशा अवस्थेत त्याचे मन आक्रंदन करू लागले. बुद्धीत एकच विचार व लक्ष्य होते श्रींची भेट. पण उपाय तर सापडत नव्हता. काय करणार बिचारा ? अशी अवस्था एखाद्याच सद्भक्ताला लाभते, कारण गुरु त्याची परीक्षा घेत असतात. संताला विरक्त भाव आवडतो, त्यामुळे सामान्य माणसाचा वाराही त्यांना सहन होत नसतो. पण शेगावचे हे बैरागी बाबा फार वेगळ होते बरं ! जन-कल्याणार्थ त्यांनी एकांतातून लोकांतात येणे पसंत केले. लोकांतात एकाकी जीवन जगणारे हे अवतारी बाबा होते. त्यांना अशाच एकांतात लोकांच्या उद्धाराचा नवीन मार्ग शोधायचा होता. म्हणूनच श्रींनी आपल्या दिव्य शक्तीने बंकटलालासारख्या सदभक्तात तासाभरात एवढा बदल घडवून आणला असावा.

|| श्री गजानन महाराजार्पणमस्तु ||

सौजन्य : श्री गजानन आचार्यपीठ


No comments:

Post a Comment