॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ अध्याय ८ ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जय यमुनातटविहारा मधुसूदना । पतित पावना करुणाघना । गोपसखा नंदनंदना । ब्रजभूषणा जगत्पते ॥१॥ त्रिभुवननायका गोपगणा । क्षणही ना गमे तुझ्या विना । राधारमणा कुंजवना । धेनु चारिल्या स्वयें तूंचि ॥२॥ कृपा करी यदुनाथा । नम्र चरणीं तुझिया माथा । मार्ग दाखवी दीन अनाथा । हेच मागणे तुजप्रति ॥३॥ तव कृपा असता खरी । स्वानंदाच्या उठती लहरी । लिखाण करण्या हितकारी । होईल पुढती निश्चये ॥४॥ कुकाजीस आले मरण । खंडूजी झाला मनीं खिन्न । भावांभावांत भांडण । भाऊबंदकी सुरू झाली ॥५॥ देशमुख आणि पाटील । दुही हीच गांवातील । वाद वाढता त्यांतील । विकोपास भांडण जात असे ॥६॥ ऐसाच काही घडला प्रकार । खंडू पाटला पडे विचार । गजाननावरी सर्व भार । टाकूनि दर्शना गेला असे ॥७॥ ठेवून पायावरी शिर । भावेंं केला नमस्कार । कृपादृष्टी आम्हांवर । असू द्यावी, वदतसे ॥८॥ जाणुनिया भावनेसी । धरिले त्यासी हृदयासी । करीतसे सांत्वनासी । दयार्णव होऊनी ॥९॥ नाही भिण्याचे कारण । जावे आता परतून । पाटील निर्दोषी म्हणून । सिद्ध त्यांनी करविले ॥१०॥ गजानना विनंती करी । खंडू पाटील राहण्या घरी । नेतां झाला सत्वरी । इच्छा त्यांची पाहुनिया ॥११॥ महाराज असतां सदनास । ब्राह्मण करिती मंत्रघोष । वसती स्थान तेलंगणास । अकस्मात येती शेगांवी ॥१२॥ मंत्र म्हणता चूक झाली । सद्गुरूंनी ती दर्शविली । वेदवाणी पटविली । निजासनी बैसुनिया ॥१३॥ वदते झाले ब्राह्मणांसी । वैदिक झाला तुम्ही कशासी । निरर्थक साधनेसी । करणे योग्य नसेची हो ॥१४॥ पोट भरण्यां जरी ज्ञान । सत्य करावे विद्यार्जन । म्हणवितां जरी ब्राह्मण । कर्मठ म्हणुनी वावरा ॥१५॥ स्पष्ट करुनी उच्चार । गजानन वदती ते स्वर । न लावता उशीर । चकित केले विप्रांना ॥१६॥ दिसावया परमहंस । विद्वत्ता त्या अंगी खास । द्यावया जीवन मुक्तीस । सिद्धयोगी हा असे ॥१७॥ खंडु पाटला बोलाविले । हस्ते त्याच्या दान दिले । ब्राह्मण ते संतोषिले । गेले सोडून शेगांव ते ॥१८॥ महाराजही कंटाळले । गांवात राहुन त्या भले । पाटलाच्या मळ्यांत आले । शिव मंदिर ते पाहुनी ॥१९॥ मंदिराशेजारी ओट्यावर । सावली असे थंडगार । निंबवृक्ष बहरला वर । आसन तिथे घातले ॥२०॥ जागा असे ती छान । रमले असे तिथे मन । झोपडी द्यावी रे करून । वदते झाले कृष्णाजीसी ॥२१॥ असता पाटील सेवेत । घडली गोष्ट अद्भुत । दहावीस गोसावी तितक्यांत । त्या ठायींं हो पातले ॥२२॥ ब्रह्मगिरी गोसाव्याचे । आहोत आम्ही शिष्य साचे । मानस आमुचे भोजनांचे । निवेदिते ते जाहले ॥२३॥ शिरा-पुरीचे भोजन । मागते झाले सर्वजण । राहू म्हणती दिवस तीन । नंतर पुढती जाणे असे ॥२४॥ आज नसे अन्नदान । हजर असे भाकरी चून । त्याच आपण घेऊन । करा भोजन मळ्यांत हो ॥२५॥ भोजनोत्तर बैसले जन । सुरु झाले निरूपण । कुणा न रुचले प्रवचन । शब्दच्छल तो व्यर्थची ॥२६॥ कुजबुज ती सुरु झाली । ब्रह्मगिरीच्या कानी गेली । थोर याहून गुरुमाऊली । श्रद्धास्थान आम्हांसी ते ॥२७॥ गोसावी तो रागावला । समर्थांंपासी आला भला । चिलमीमाजी गांजा भरला । भास्कर देतसे गजानना ॥२८॥ चिलम घेती गजानन । ठिणगी पडली पलंगी जाण । पेट घेई पांघरूण । धूर निघू लागला ॥२९॥ क्षणात भडकला अंगार । समर्थां वदला भास्कर । उतरा खाली सत्वर । सद्गुरुनाथा गजानना ॥३०॥ तों ते वदती भास्करासी । आणा इथे ब्रह्मगिरीसी । नैनं छिन्दन्ति श्लोकासी । सत्य करून दाखवायां ॥३१॥ गुरू आज्ञा ती मानुन । भास्कर करी पाचारण । ब्रह्मगिरी घाबरून । वदतसे तयांला नच न्यावें ॥३२॥ धरूनी त्याचा तो कर । भास्कर ओढी फरफर । गजाननासमोर । आणून उभा करितसे ॥३३॥ नैनं दहति पावक: । खरे करावे शब्द देख । गोसाव्यास त्या धाक । पडला असे खचितचि ॥३४॥ क्षमा मागे समर्थांंची । ना ओळखले मी तुम्हांसी । सद्गुरुवरा गुणराशी । नतमस्तक तो जाहला ॥३५॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य अष्टमोsध्याय: समाप्तः ॥
No comments:
Post a Comment