Mar 7, 2025

श्री स्वामी समर्थ मालामंत्र - भावार्थ


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥  ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

कोणत्याही स्तोत्राचा अथवा मंत्रांचा पाठ करतांना किमान त्यातील शब्दार्थ जाणून घेऊन पाठ करावा. असा नित्यपाठ केल्याने काही काळाने साधकाचे उपासनाबळ वृद्धिंगत होते. सद्‌गुरुंच्या कृपेने मग त्या स्तोत्र/मंत्रांचा भावार्थ ध्यानांत येऊ लागतो आणि त्या ध्यानाने साधनामार्गावर योग्य दिशेने वाटचाल होऊ लागते. असा भावार्थ गोचर झाला की त्या भगवद्भक्ताची आराधना फलदायी होते. श्री स्वामी समर्थ मालामंत्राचे नित्यपठण ही अशीच एक प्रभावी उपासना आहे. अनेक स्वामीभक्तांनी याची अनुभूती घेतली आहे. या दिव्यमंत्राचा भावार्थ जाणून घेण्याचा हा अल्प प्रयत्न - ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ जगदंबिका म्हणे । मालामंत्र नारायणे । कथिला जो जगत्कारणे । तो हा सर्वोत्तम असे ॥

आदिमाया आदिशक्ती या मालामंत्राचे माहात्म्य सांगत आहे. जगत्कल्याणासाठी प्रत्यक्ष श्रीनारायणांनी हा सर्वश्रेष्ठ मालामंत्र कथन केला.

ॐ नमो नमो भगवंता । नमोजी श्री स्वामीसमर्था । स्मरणगामी दत्तनाथा । योगीमुनिजन वंदिता ॥ चिदानंदात्मका त्र्यंबका । विश्वेश्वरा विश्वधारका । बालोन्मत्त पिशाच्चवेषा । महायोगीश्वरा परमहंसा ॥ चित्-चैतन्या चिरंतना । अवधूता निरंजना । जगदाधारा सुदर्शना । सुखधामा सनातना ॥

हे भगवंता श्रीस्वामी समर्था, केवळ स्मरणमात्रें संतुष्ट होणाऱ्या, योगींमुनींनाही वंदनीय असणाऱ्या दत्तनाथा तुम्हांला मी नमन करतो. ज्ञान व आनंद हे ज्यांचे स्वरूप आहे, ज्यांना तीन डोळे आहेत (जे शिवस्वरूप आहेत), या विश्वाचे जे ईश्वर आहेत, या चराचराला ज्यांनी व्यापले आहे, बालक, वेडा किंवा पिशाच यांच्याप्रमाणे ज्यांचा कधी कधी वेष असतो, जे महान योगी आहेत, जे परमात्मास्वरूप आहेत, जे विश्वाला चैतन्य देणारे आहेत, जे अक्षर-अविनाशी आहेत, जे मायाविकारांपासून अलिप्त आहेत, जे दोषरहित-सर्वगुणसंपन्न आहेत, जे या जगताचे मूळ आधार आहेत, जे श्रीहरी विष्णुस्वरूप आहेत, जे कारुण्यसिंधू आहेत, जे सनातन अर्थात अनादिसिद्ध आहेत अशा श्रीस्वामीसमर्थांना नमस्कार असो.


सकलकामप्रदायका । सकलदुरितदाहका । सकल संचित-कर्महरा । सकल संकष्ट-विदारा ॥

ज्यांची कृपा झाल्यास सर्व इष्ट मनोकामना पूर्ण होतात, सर्व दुरितें जळून जातात, सकल संचितकर्मांचा दोष नाहीसा होतो आणि सर्व विघ्नांचे सहज निवारण होते अशा श्रीस्वामीसमर्थांना नमन असो.

ॐ भवबंधमोचना । ॐ श्रीं परम ऐश्वर्यघना । ॐ स्वां स्वहितधर्मचालका । ॐ मीं नित्य यशदायका ॥ ॐ सं संसारचक्रछेदका । ॐ मं महाज्ञानप्रदायका । ओमर्था महावैराग्यसाधका । ॐ नं नरजन्मसार्थका ॥ ॐ मों महाभयनिवारका । ॐ भक्तजनहृदयनिवासा

यानंतर तंत्रशास्त्रातील बीजांचे वर्णन केले असून त्याद्वारे विशिष्ट अभिप्सीत प्राप्तीसाठी श्री स्वामी महाराजांची प्रार्थना केली आहे.

जे संसारबंधनातून मुक्त करणारे आहेत (ॐ), जे परम ऐश्वर्य देणारे आहेत (श्रीं), जे निजजनतारक असून धर्मस्वरूप आहेत (स्वां), जे नित्य यश देणारे आहेत (मीं), जे या संसारचक्राचा छेद करणारे आहेत (सं), जे आत्मज्ञान देणारे आहेत (मं), जे विरक्ति देणारे आहेत (ओमर्थ), जे या मनुष्यजन्माच्या इतिकर्तव्यतेचे प्रबोधन करतात (नं), जे महाभय दूर करतात (मों), आणि जे केवळ भावाचे भुकेले असून भक्तजनांच्या चित्तात सदैव वास करतात त्या श्रीदत्तात्रेयस्वरूप श्रीस्वामीसमर्थांना नमस्कार असो.  

परकृत्या थोपव थोपव । परमंत्रा शांतव शांतव ॥ परयंत्रा विखर विखर । ग्रहभूतादि पिशाच्चपीडा हर हर । दारिद्र्यदु:खा घालव घालव । सुखशांती फुलव फुलव ॥ आपदा विपदा मालव मालव । गृहदोष वास्तुदोष पितृदोष सर्पदोषादि सकल दोषा विरव विरव । अहंकारा नासव नासव । मनचित्तबुद्धी स्थिरव स्थिरव ॥ नमोजी नमो देव महादेव । देवाधिदेव श्री अक्कलकोट । स्वामी समर्थ श्रीगुरुदेव । नमो नमो नमो नमः ॥ ( सप्तशते सिद्धि: )

हे भगवन्, परक्यांनी केलेल्या वाईट कृत्यांना माझ्यापासून दूर ठेव. परमंत्रांना शांत कर. परयंत्रांचा नाश कर. ग्रहाभूतादि-पिशाच्चपीडा यांचे निवारण कर. दारिद्र्याला दूर पळव. (मानसिक-शारिरीक) दुःख हरण कर. माझे जीवन सुख-शांती यांनी सदैव बहरलेले ठेव. सर्व संकटांपासून संरक्षण कर. गृहदोष, वास्तुदोष, पितृदोष, सर्पदोषादि सकल दोषांचा समूळ नाश कर. माझ्यातील अहंकाराचे उच्चाटन कर. माझे मन-चित्त आणि बुद्धी तुझ्या चरणीं स्थिर कर. हे परमात्मन महादेवा, अक्कलकोटनिवासी ब्रह्मांडधीशा, स्वामी समर्था श्रीगुरुराया तुला त्रिवार नमन असो.


॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥  

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

रचनाकार - श्रीयुत् नागेश करंबेळकर



Feb 26, 2025

महाशिवरात्री पंचोपचार शिवपूजन - व्रतकथा


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ ॐ नमः शिवाय ॥

  देवांचेही देव महादेव ज्यांना पाच मुख, दहा भुजा, तीन नेत्र आहेत. ज्यांच्या हातांत शूल, कपाल, खट्टांग, तलवार, खेटक, पिनाक नांवाचें धनुष्य असून त्यांचे रूप महाभयंकर आहे. मात्र भोळा सांब भक्तवत्सल, दयाळू असून अल्पसेवेने प्रसन्न होऊन अभय व वरदान देणारे आहेत. ज्यांनी सर्वांगाला भस्मोद्धूलन केलें असून अनेक सर्प धारण केले आहेत. ज्यांच्या भाळी चंद्रकला आणि नीलकंठात कपालमाला शोभत आहे. ज्यांची मेघाप्रमाणें नीलकांति असून जे कोटीसूर्यासारखे दैदीप्यमान आहेत आणि ज्यांच्या सभोवती प्रमथादि गण आहेत असे जगदगुरु श्रीशंकर कैलासशिखरावर असतांना जगन्माता पार्वतीने त्यांना एक प्रश्न विचारला, “ हे देवेशा शंकरा, जें व्रत केलें असतां सर्व पापें नष्ट होतात आणि इष्ट मनोरथ पूर्ण होऊन अंती सायुज्य मुक्ती लाभते, असें उत्तम व्रत मला सांगा. हे परमेश्वरा, आपण मला पूर्वी अनेक व्रतें, तिथींचे निर्णय, अनुष्ठानें, दानें, धर्मकृत्यें, तसेच नानाप्रकारच्या तीर्थयात्रा यांविषयी सांगितले आहेच. परंतु सर्व पापांचा क्षय करणारें व भोग आणि मोक्ष प्राप्त करून देणारे असें अत्यंत शीघ्र फलदायी व्रत मला सांगा.” आदिशक्तीने जगत्कल्याणासाठी विचारलेला हा प्रश्न ऐकून सदाशिव अत्यंत प्रसन्न झाले, आणि म्हणाले, “ हे उमे, जें अत्यंत गुप्त आहे, जें मनुष्याला भोग आणि मोक्ष देणारें असून मी आजपर्यंत कोणालाही सांगितलेलें नाहीं असें सर्व व्रतांमध्यें उत्तम व्रत आता मी तुला सांगतों. या व्रताच्या केवळ श्रवणमात्रानें सर्व पापें नाश पावतात. माघ महिन्याच्या कृष्णपक्षांतील विद्ध नसलेली जी चतुर्दशी असते, तिला महाशिवरात्रि असे म्हणतात. या दिवशी शिवोपासना केल्यास तिचे फळ सर्व यज्ञांपेक्षाही उत्तमोत्तम मिळते. या शिवरात्रिव्रतानें जें पुण्य प्राप्त होतें, तें नानाप्रकारचीं दानें, यज्ञ, तपश्चर्या व कित्येक व्रतें करूनही प्राप्त होत नाहीं. किंबुहना, शिवरात्रीसारखें पापांचा नाश करणारें दुसरें व्रतच नाहीं. हें व्रत जाणतां घडो अथवा अज्ञानानें घडो, त्यानें मोक्षप्राप्ति अवश्य होतेच. हे व्रत ज्यांच्या हातून घडते, ते मुक्त होऊन शिवलोकाला जातात.

माघ महिन्यातील पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात जी चतुर्दशी येते, ती रात्र म्हणजेच महाशिवरात्र होय. त्या दिवशी सर्वव्यापी महादेव सर्व शिवलिंगांमध्ये विशेष रूपाने प्रगट होतात. या सृष्टीत जी चल आणि अचल शिवलिंगे आहेत, त्या सर्वांमध्ये या रात्री शिव आणि शक्‍तीचा संचार होतो. त्यामुळेच या रात्रीला महाशिवरात्र असे म्हणतात. या दिवशी उपवास केल्याने वर्षभर केलेल्या पापांमुळे कलुषित झालेले मन शुद्ध होते. जो मनुष्य शिवरात्रीला शिवलिंगाची पाच विशेष मंत्रांसहित गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य अशा पंचोपचारांनी पूजा करतो, तो पापमुक्‍त होतो.
॥ ॐ सद्योजाताय नमः, ॐ वामदेवाय नमः, ॐ अघोराय नमः, ॐ ईशानाय नमः आणि ॐ तत्पुरुषाय नमः असे हे पाच मंत्र आहेत.
हे वरानने, ही शिवरात्रि सर्वमंगलकारिणी असून सर्व अशुभांचा नाश करणारी व भाविकांना त्वरित भोग-मोक्ष देणारी आहे. हे शिवरात्रिव्रत नरकयातना कसे दूर करते आणि शिवलोकाची प्राप्ती करून देते, याविषयीची पूर्वी घडलेली पौराणिक कथा तुला सांगतों, ती तू एकाग्रचित्ताने ऐक. 
पूर्वीच्या कल्पांत प्रत्यंत देशांतील पर्वताच्या मूलप्रदेशांत एक व्याध राहत होता. तो वन्य प्राण्यांची शिकार करून आपल्या कुटुंबाचें पालन करीत असे. हा अत्यंत बलवान, धनुर्धारी, बद्धगोधांगुलित्राण अर्थात चर्माचे हातमोजे घालत असून सदैव मृगयेविषयीं आसक्त असे. एकदा त्याने गांवातील वाण्यांकडून उधार घेतलेले द्रव्य परत न केल्याने त्या वाण्यांनीं त्याला शिवाच्या मंदिरांत कोंडून ठेवला. कर्मधर्मसंयोगाने तो दिवस माघ कृष्ण चतुर्दशीचा होता. त्यामुळे, सूर्योदयीं त्याला महादेवाचें दर्शन तर घडलेंच तसेच त्यादिवशी व्रतस्थ भक्तांचें सदोदित शिव-शिव असे नामस्मरणराचें श्रवणही घडलें. बराच काळ त्याने त्या सर्व वाण्यांना, “ तुमचे ऋण मी लवकरच चुकते करेन.” अशी विनवणी केली आणि अखेर त्यांनी त्याला बंधमुक्त केले. नंतर तो धनुष्य घेऊन दक्षिणमार्गानें बाहेर निघाला आणि अरण्यात जात असतांना लोकांचा उपहास करूं लागला. तो बोलू लागला, “ आज नगरामध्यें सर्व लोक ‘शिव-शिव’ असा सतत नामगजर कशासाठी करत आहेत?” मनांत असा विचार करत तो व्याध शिकारीसाठी एखादा वन्य प्राणी दिसतो का? हे पाहू लागला. हरिण, सूकर, चितळे यांच्या पावलांच्या ठशांचा वेध घेत घेत तो लुब्धचित्त होऊन पर्वतासह अरण्यांत भटकू लागला. संध्याकाळ झाली तरी, त्यादिवशी एकही प्राणी त्याने लावलेल्या जाळ्यात सापडला तर नाहीच, शिवाय मृग, डुकर, चितळ हे तर कोठेंही दिसेनात, त्यामुळे तो व्याध अगदींच निराश झाला व एवढ्यांत सूर्यनारायणदेखील अस्तास गेला. दिवसभरांत अन्नाचा कणही त्याच्या पोटांत गेला नव्हता. अत्यंत क्षुधार्त झालेल्या त्याने विचार केला कीं रात्रीं या अरण्यातीलच जलाशयाच्या आसपास राहावे, आणि पाणी पिण्यासाठी जे वन्यचर येतील त्यांची शिकार करावी, आणि मग त्यायोगेच आपले व कुटुंबाचे उदरभरण करावे. मग त्याने तेथील एका सरोवराच्या तीरावर आपले जाळे पसरलें आणि तिथेच कोठेतरी लपून बसण्यासाठी जागा शोधू लागला. शिकारीसाठी त्याने जिथे ते जाळे लावले होते, त्याच्या मध्यभागी एक मोठें स्वयंभु शिवलिंग होतें व जवळच एक मोठा थोरला बेलाचा वृक्षही होता. त्या झाडावरच तो व्याध चढला आणि पाणी पिण्यासाठी येणारे प्राणी स्पष्ट दिसावेत म्हणून त्या बेलवृक्षाचीं पानें तोडून खाली फेंकूं लागला, तीं भाग्यवशात त्या शिवलिंगावर पडूं लागलीं. सकाळपासून त्या दिवशी कोंडून ठेवल्यामुळे त्याला भोजन मिळालें नव्हते, मृगयेसाठी त्या रात्री जागरणही  घडलें. याप्रमाणे रात्रीचा एक प्रहर निघून गेला. तेव्हढ्यांत त्याला एका प्राण्याची चाहूल लागली. त्याने परत थोडी बिल्वपत्रे तोडली, अनावधानानेच, त्याच्याही नकळत तो सकाळी मंदिरात ऐकलेल्या शिव नामाचा उच्चार करीत होताच. अशा रितीने त्याच्या हातून महाशिवरात्रीच्या पहिल्या प्रहरींची शिवपूजा घडली. त्या यामपूजेच्या प्रभावाने त्या व्याधाच्या एक चतुर्थांश पातकांचा नाश झाला. त्यावेळी त्या तळ्याकाठी एक गर्भार हरिणी पाणी पिण्यासाठी आलेली त्या पारध्यास दिसली. तो तिरकमठा सावरून शरसंधान करणार इतक्यांत ती मृगी दिव्यवाणीने त्याला म्हणाली, “ हे व्याध्या  ! मी काहीही अन्याय केलेला नाही. असे असता तू मजवर बाण का मारतोस ? मी तर गर्भिणी आहे. तू मला मारू नकोस.” 
त्या हरिणीचे ते मनुष्यवाणीतील बोल ऐकून तो पारधी आश्चर्यचकित होऊन म्हणाला, “ हे मृगी, मी आणि माझे कुटुंब क्षुधेने अत्यंत पीडित असून मला ऋणमुक्तीसाठी द्रव्य संपादन करायचे आहे. म्हणूनच, मी तुला मारतो आहे. मी आजपर्यंत अनेक उत्तम, मध्यम, कनिष्ठप्रतीचे असे असंख्य जीव मारले परंतु त्या सर्व श्वापदांमध्यें अशी वाणी मात्र कधीं ऐकली नाही. तुला पाहून माझ्या हृदयांत करुणा निर्माण झाली आहे. तू कोण आहेस? तुला एवढे ज्ञान कसे व कोठून मिळाले ?”
त्यावर ती मृगी दिव्यवाणीत म्हणाली, “ हे व्याधश्रेष्ठा, माझा पूर्वजन्म वृत्तांत तुला सांगतें. मी पूर्वी स्वर्गाचा राजा इंद्र याच्या दरबारातील एक अप्सरा होतें. अनुपम रूप, लावण्य व सौभाग्य यांमुळे मी अत्यंत गर्विष्ठ झाले आणि हिरण्याक्ष नांवाच्या सामर्थ्यशाली दानवाशी मी विवाह केला. त्याच्याशीं सवहर्तमान मीं यथेच्छ भोग भोगले. त्या दुष्टाच्या सहवासामुळे मी उमापती महादेवाची आराधनाही करेनाशी झाले. मी दररोज शंकरापुढे प्रेक्षणीय असें नृत्य करीत असें. मात्र एके दिवशी भोगलालसेमुळे माझा तो नित्यनेम चुकला. आणि ‘ मज हिमनगजामात । परम क्षोभोनि शाप देत । तू परम पापिणी यथार्थ । मृगी होई मृत्युलोकी ॥’ तेव्हा मी अनन्य शरणागत होऊन प्रार्थना केली, “ हे शाप व अनुग्रह देण्यास समर्थ असणाऱ्या देवाधिदेवा, माझा भर्ता मला प्राणांहून प्रिय आहे, तो एक महाबलवान् दैत्य आहे. त्याच्या सहवासात मी शिवार्चन करणे सोडून दिले. मला क्षमा करा.” तेव्हा त्या परम दयाळू कैलासपतीने मला उ:शाप दिला, “ तू बारा वर्षे मृगी होऊन राहशील, जेव्हा एक व्याध तुझ्यावर शरसंधान करील त्यावेळीं तुला पूर्व जन्माचें स्मरण होईल व नंतर शंकराचें दर्शन घेऊन तू मोक्ष पावशील.” 
हे पूर्वजन्म कथन करून ती हरिणी पुढे म्हणाली, “ हे व्याध्या, मला आता तू सोडून दे. या स्थितीत माझा वध करणें योग्य नाहीं. हे लुब्धका, काही वेळांत दुसरी एक पुष्ट मृगी येईल, तिची शिकार केल्यास सहकुटुंब तुझें यथेच्छ भोजन घडेल. तसेच हे व्याधा, या तळ्यावर पाणी पिण्याकरितां दुसरा मृग प्रातःकाळी येईल, तो तुझ्या क्षुधाशमनार्थ नक्कीच उपयोगीं पडेल. अथवा मी घरीं जाऊन गर्भ प्रसवून मुलेबाळें माझ्या कुटुंबाच्या स्वाधीन करून इथे पुनः शपथपूर्वक येईन.” तिचें तें भाषण ऐकून व्याध मनांत आश्चर्यचकित झाला. मात्र तरीही तो त्या गर्भिण हरिणीस म्हणाला, " तू म्हणतेस ते कदाचित खरेही असेल. मात्र जर दुसरी मृगी किंवा मृग आला नाहीं, व आता मी सहज शिकार करू शकत असलेल्या तुलाही सोडली तर माझेच नुकसान होईल. कारण माझा आत्मा व विशेषतः कुटुंबाचे प्राण क्षुधेनें अत्यंत व्याकुळ झाले आहेत. परंतु प्रातःकाळीं तूं परतून येशील अशी ज्या योगे मला खात्री वाटेल, अशी तू शपथ घे. कारण पृथ्वी, वायु, सूर्य आदि सर्व देव-देवता ह्या सत्यास साक्षी असतात. त्यामुळे ज्यांना इहलोक व परलोक साधावयाचा असेल, त्यांनीं सदैव सत्याचे पालन करावे.”
त्याचे ते भाषण ऐकून गर्भाधाराने वेदनाग्रस्त झालेल्या हरिणीनें सत्य शपथ घेतली ती अशी - हे व्याधा, पुनः मी जर न येईन तर, वेदविहित कर्मे न करणाऱ्या, अनेक दुराचरण करणाऱ्या, आणि देवाचें द्रव्य, गुरूचें द्रव्य व ब्राह्मणाचें हरण करणाऱ्यांना जे पाप लागेल ते मला लागेल. असें मृगीचें भाषण ऐकून तो व्याध प्रसन्न झाला आणि त्यानें धनुष्यबाण ठेवून हरिणीला तत्काळ सोडून दिली. तिच्या त्या उक्तिप्रभावानें व लिंगाच्या पूजेनें व्याधाच्या पापाचा अजून एक चतुर्थांश भाग तत्काळ दूर झाला. हे गिरिजे, रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी म्हणजेच मध्यरात्रीं शिव-शिव असें स्मरण करित असल्यामुळे त्या पारध्याला झोप आली नाहीं. 
एवढ्यांत दुसरी एक सुंदर हरिणी तेथें येत असल्याचे पाहून तो आनंदला. त्याने परत थोडी बेलाची पानें हातांनीं तोडून तीं दक्षिणभागीं टाकलीं आणि पुन्हा एकदा तीं बिल्वपत्रे शिवलिंगावर पडलीं. मग व्याधानें तिला मारण्यासाठी धनुष्याला बाण लावला आणि तो तिर सोडणार, हे त्या हरिणीने पहिले आणि ती म्हणे ‘ व्याधा ऐक ये समयी । मज कामानळे पीडिले पाही । पतीस भोग देवोनि लवलाही । परतोनि येते सत्वर ॥’ हें तिचें भाषण ऐकून तो व्याध चकित होऊन क्षणमात्र विचार करू लागला, “पहिल्या हरिणीची जशी वाणी होती तशीच हिचीही आहे, हिलाही सर्व शास्त्रज्ञान अवगत असणार.” असे चिंतन करून तो त्या हरिणीला म्हणाला, “ तू धन्य आहेस !  तू पुनः येशील अशी सत्य प्रतिज्ञा कर आणि जा."
त्या हरिणीने सांगितलेली अनेक धर्मवचने ऐकून त्या व्याध्यास संतोष झाला आणि त्याने तिला सोडून दिले. त्या रात्री अतिशय थंडीनें, क्षुधेनें व गृहचिंतेनें त्याला झोंप लागली नाहीं, मुखी शिव नाम होतेच. मग तो सहज पुन्हा बेलाची पाने तोडू लागला.
थोड्याच वेळांत तिथे एक मृग आला. पहिल्या हरिणीने सांगितले होते, तसेच घडत असलेले पाहून तो पारधी हर्षित झाला. त्याने धनुष्याची प्रत्यंचा कानापर्यंत ओढून शरसंधान केलें, आणि आतां तो बाण सोडणार एवढ्यांत त्या हरिणानें व्याधाला पाहिलें. 
तोही मृग मनुष्यवाणींत बोलू लागला, “ हे व्याधा, इथे दोन हरिणी आल्या होत्या का ? त्या कोणत्या मार्गाने गेल्या ? तूं त्यांना मारले तर नाही ना ? माझी एक भार्या प्राणासारखी व दुसरी प्राण देणारी आहे. तू मला मारशील तर त्यांना फार दुःख होईल. मी त्यांना सांगून व त्यांचे सांत्वन करून येतो.” हें त्याचें भाषण ऐकून व्याध विचार करूं लागला, “ हा हरिणसुद्धां सामान्य नव्हे, ही कोणीतरी सर्वोत्कृष्ट देवताच असावी.” मग तो त्या मृगास म्हणाला, “ दोन हरिणी माझ्यापाशीं शपथ घेऊन याच मार्गाने गेल्या. त्यांनींच तुला पाठविला असें वाटतें. आतां मी तुला त्वरित मारतों.”  
तेव्हा मृगाने विचारले, “ व्याध्या, त्या दोघींनीं तुझ्यापाशीं कोणती सत्यप्रतिज्ञा केली, कीं तुला विश्वास वाटून तूं दोघींनाही सोडून दिलेस ?” असा प्रश्न करतांच व्याधानें त्यां दोन्ही हरिणींनी सांगितलेले शास्त्रार्थ ज्ञान त्या मृगास कथन केले. ते ऐकून त्या हरिणास अत्यानंद झाला आणि तो बोलू लागला, “ हे व्याध्या, मी आता जाऊन माझी सर्व कर्तव्ये पूर्ण करून तसेच माझ्या सुहृदांची आज्ञा घेऊन शपथपूर्वक परत येईन.” त्याने सांगितलेले पापफळांचे सर्व निरूपण ऐकून व्याधाने त्यालाही जाऊ दिले. हे अपर्णे, तो हरिणही जालपाशांतून सुटल्यामुळे संतुष्ट होऊन जलप्राशन करून पुनः अरण्यांत गेला. त्या व्याधानें पुन्हा पहाटेच्या प्रहरीं बेलाची पानें तोडून शिवलिंगावर टाकलीं. अज्ञानानें का होईना, शिवरात्रीदिवशीं त्या व्याधाला उपोषण-जागरण घडलें व बिल्वपत्रांनी शिवपूजाही घडली, त्याच्या प्रभावानें सूर्योदयीं तो सर्व अघांतून तत्काळ मुक्त झाला. एवढ्यांत दुसरी एक मृगी तेथें आली. तिच्यासोबत तिचे एक लहानसे पाडस होते.  तिला पाहून व्याध्याने पुन्हा एकदा बाण धनुष्याला लावला, ते पाहून ती हरिणी दिव्यवाणीत बोलू लागली, “ हे व्याध्या, तू धर्मवचन जाणतोस. तू हा बाण सोडू नकोस, धर्माचे पालन कर. शास्त्रार्थानुसार मी अवध्य आहे, हे तुला ज्ञात आहे. एखादा धर्मशील राजा मृगयेसाठी निघाला तरी, निद्रिस्त, मैथुनासक्त, स्तनपान करणारा, किंवा व्याधिपीडित हरिण अथवा अन्य वन्य प्राणी तसेच लहान पाडसयुक्त हरिणी यांची कधीच शिकार करत नाहीं. सांप्रतकाळी, तू कदाचित् धर्म सोडून जर मला मारीत असलास तरी काही काळ जरा थांब. मी घरीं जाऊन माझें हे पाडस माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांना सांभाळण्यास देते. आणि तुझ्याकडे परत येते. मग तू मला मार. मी जर दिलेले हे वचन पाळले नाही तर वेदादिक शास्त्रांत वर्णिलेली अनेक पापे मला लागतील.” हें तिचें भाषण ऐकून व्याध मनात विस्मित झाला आणि त्यानें त्या हरिणीलाही सोडले. त्या मृगीला आनंद झाला आणि आपल्या पिल्लासोबत ती अरण्यांत दिसेनाशी झाली.
तो व्याधही मग त्याच्या घरीं जाण्यासाठी निघाला. वाटेत जाता जाता त्या सत्यवादी हरिणांनी सांगितलेली धर्मशास्त्रातील वचनें आठवू लागला आणि या मृगांची व अन्य प्राण्यांची  नित्य हत्या करणारा मी कोणत्या गतीला जाईन बरें, असा मनोमन विचार करू लागला. तो व्याध आपल्या गृहीं परतला, त्यावेळी एक वेळच्या भोजनापुरतें सुद्धां अन्न किंवा मांस त्याने आणले नाही, हे पाहून घरातील सर्वचजण निराश झाले. त्या व्याध्याची लहान मुले, इतर सदस्य आता भुकेने अतिशय व्याकुळ झाले होते. व्याधाचा मात्र जंगलातील त्या हरिणांनी घेतलेल्या शपथवाक्यांवर पूर्णतः विश्वास होता. “ मनुष्यवाणीने बोलणारी ती सर्व हरिणे धर्मात्मेच असून ते निश्चितच येतील, आपण मात्र यापुढे धर्मसंमत वागायचे आणि त्या मृग परिवाराची शिकार करायची नाही.” असा त्याने निश्चय केला. 
इकडे धर्मवचन ऐकून शपथांवर व्याधानें सोडलेला तो हरिण आपल्या आश्रमांत परतला. लवकरच पहिल्या हरिणीची प्रसूती होऊन तिने पाडसाला जन्म दिला. दुसर्‍या हरिणीने पतीला संतुष्ट केले. तिसऱ्या हरिणीने तिच्या लहानग्यास स्तनपान केले. अशा रितीने सर्वांचा निरोप घेऊन तो मृग आणि त्या तीन हरिणी सत्याचे पालन करीत त्या व्याध्याच्या घरी जाण्यासाठी निघाले. तात्पर्य, पूर्वजन्मीच्या सुकृतामुळे धर्मसंबंधाने मनोहर विचार करून कर्तव्याचे पालन करीत ते मृग कुटुंब तो व्याध जिथे होता, तिथे आले. 
व्याधाला पाहून तो मृग म्हणाला, “ व्याध्या, तू प्रथम मला मार, नंतर माझ्या या स्त्रियांना आणि त्यानंतर माझ्या मुलांना मार. आतां उशीर करूं नको. मृगांची हत्या केलीस म्हणून तुला कांहीं दोष लागणार नाहीं. कारण तुला तुझ्या कुटुंबाचा चरितार्थ करायचा आहे. त्यायोगें आम्हांसही  मुक्तीचा लाभ होईल.”
त्या सत्यपालक मृगाचे हे बोल ऐकून तो व्याध म्हणाला, “ हे मृगराज, तुम्ही सर्वजण आपल्या घरी परत जा. मी तुमची शिकार करणार नाही. हे हरिणश्रेष्ठा, धर्माचा उपदेश करणारे तुम्ही सर्वचजण माझे गुरु आहात. आजपासून मी शस्त्रास्त्रे टाकली आणि धर्माश्रय घेतला.” 
तो मृग परिवार मात्र “ आम्ही शपथ घेतल्याने वचनबद्ध आहोत, आता आम्ही परत जाणार नाही. तू आम्हांस लवकर मार.” असे वारंवार म्हणू लागला. ते पाहून पश्चात्तापग्रस्त त्या व्याधानें बाणासह आपले धनुष्य तत्काल मोडून टाकलें व मृग परिवाराला त्याने नमन केले आणि त्रास दिल्याबद्दल क्षमाही मागितली.  
तोच अद्भुत घडले! स्वर्गातील देवांनीं दुंदुभी वाजविली. त्यावेळीं आकाशांतून दिव्य पुष्पवृष्टि होऊं लागली, आणि  शिवदूत त्या ठिकाणी उत्तम विमान घेऊन आले. त्या व्याध्यास ते शिवदूत दिव्यवाणीत म्हणाले, “ हे सत्त्वशीला, या विमानांत बसून तू सशरीर स्वर्गास जा. शिवरात्रिव्रताच्या प्रभावानें तुझें सर्व पाप क्षयाला गेलें. तुला महाशिवरात्रीच्या दिवशीं उपोषण घडलें, रात्रौ जागरण घडलें. अजाणतां कां होईना, दर प्रहरीं शिवाची यामपूजा घडली, त्या पुण्ययोगानें तुला आता शिवलोकीची प्राप्ती होईल.” 
पुढें ते शिवदूत वदले, “ हे धर्मपालक, सत्यवचनी मृगराजा, तूं आणि तुझ्या या तीनही स्त्रिया व पुत्र यांसहवर्तमान तुम्ही नक्षत्रपदाला जा. तें नक्षत्र तुझ्या नांवानें ( मृगशीर्ष नामाने) प्रसिद्ध होईल.” शिवदूतांचे हे भाषण ऐकून तो व्याध व तो मृग परिवार दिव्य विमानांत बसून नक्षत्रलोकाला गेले. 
हे पार्वती, त्या दोन हरिणींचा मार्ग तर अद्यापि स्पष्ट दिसतो व त्याच्या पृष्ठभागीं मण्याप्रमाणे एक नक्षत्र (व्याध) आणि त्याखाली तीन मोठीं तेजःपुंज नक्षत्रे आहेत, त्याला मृगशीर्ष असें म्हणतात. अग्रभागी दोन पाडसे, तर पृष्ठभागी तिसरी मृगी यांसहित मृगशीर्षांजवळ आलेला हा मृगराजा अद्यापही आकाशांत विराजमान दिसतो. व्याधाला शिवरात्रीदिवशीं सहजीं घडलेलें उपोषण, रात्रौ जागरण, व शिवपूजनही घडलें त्याचें असे फळ मिळाले. नकळत घडलेल्या व्रताचें जर एवढे फळ तर मग जे लोक भक्तिभावानें शुभकारक असें शिवरात्रीचें व्रत विधिपूर्वक, उपोषण-जागरणासह करतात त्याचें फल किती वर्णावे? जन्मोजन्मी केलेल्या पातकांचा नाश करणारें महाशिवरात्रीसारखें दुसरें प्रभावी व्रत नाहीं. सहस्र अश्वमेध केल्याने अथवा वाजपेय यज्ञ केल्याने जेवढे फळ प्राप्त होते, तेंच या महाशिवरात्रिव्रतानें प्राप्त होतें यांत संशय नाहीं. माघमासीं प्रयागांत स्नान करणारांला जें पुण्य लाभते व वैशाखांत द्वारावतींत स्नान करणारांला जें फळ मिळते, तपसि (ब्रह्मचाऱ्यानें) पालाशदंड घेतला असतां अथवा कार्तिकामध्यें माधवासमोर गयेस जाऊन विष्णुपदावर पिंड दिल्याने जी फलप्राप्ती होते, तोच लाभ हे महाशिवरात्रित्रत करणाऱ्या भाविकाला खरोखर प्राप्त होईल.  
॥ इति श्रीलिंगपुराणे महाशिवरात्रिव्रतकथा संपूर्णा ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

श्रीशिवोपासना : -

Feb 19, 2025

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय १३


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे अखिल संतमंडळींना वरदान देणाऱ्या श्रीधरा, हे करुणेच्या सागरा, हे गोप-गोपींना अतिप्रिय असणाऱ्या गोपाळा, हे तमालनीळा श्रीहरी माझ्यावर कृपा कर.॥१॥ तुझ्या ईशत्वाची कसोटी घेण्यासाठी जेव्हा ब्रह्मदेवाने यमुनातीरावरील गोकुळातील सर्व गाई-वासरें चोरली, तेंव्हा तू आपली निजलीला दाखविलीस आणि स्वतःच गाई-वासरांचे रूप घेतलेस. अशा रितीनें, तू त्या सृष्टीकर्त्यालाच आपलें परब्रह्मस्वरूप दाखविलेस.॥२-३॥ यमुनेत वास्तव्य करणाऱ्या दुष्ट कालियाचे मर्दन केले. मात्र, त्याला अभय देऊन रमणकद्वीपास स्थलांतर करण्यास सांगितले आणि सर्व गोप-गोपी भयमुक्त केलेस.॥४॥ हे वासुदेवा, असाच माझ्या दुर्दैवाचा समूळ नाश करून या दासगणूलादेखील सर्वत: निर्भय करावे.॥५॥ हे श्रीहरी, मी तुझा एक अज्ञानी, काहीही योग्यता नसलेला असा भक्त आहे. मी तुझ्या कृपाप्रसादास देखील पात्र नाही. तरीही हे प्रभू, तुम्ही माझ्यावर कृपा करा.॥६॥ आणि हे जरी सत्य असलें, तरी तू माझा अंत पाहू नकोस. हे परमेश्वरा, तुझा केवळ एक कृपाकटाक्ष टाकून माझ्या अवघ्या चिंता दूर कर.॥७॥ श्रोतें हो, आतां एकाग्र चित्त करा. बंकट, हरी, लक्ष्मण, विठू, जगदेव आणि इतर काही भक्तमंडळींनी वर्गणी गोळा करण्याचे कार्य सुरु केले.॥८॥ भाविक जनांनी मोठ्या आनंदाने वर्गणी दिली. मात्र काही टवाळखोर कुत्सितपणें बोलू लागले, " तुमच्या या साधू महाराजांना वर्गणीची गरज का भासली ?॥९॥ गजानन महाराज हे अशक्यही सहजप्राय शक्य करून दाखविणारे महान संतपुरुष आहेत, असा तुमचा विश्वास आहे ना ? मग त्यांच्या मठबांधणीसाठी वर्गणी मागण्याची गरज काय ?॥१०॥ अहो, प्रत्यक्ष कुबेर त्यांचा भंडारी आहे ना ? मग तुम्ही उगाच का असे दारोदारी वर्गणी मागत फिरत आहात ? कुबेरावरच हुंडी काढा, म्हणजे तुमचे काम होईल."॥११॥ त्या टवाळ लोकांचे हे बोलणें ऐकून जगदेव हसत म्हणाला," केवळ तुमचे भलें व्हावे, हेच हे वर्गणीरूपी दान मागण्याचे कारण आहे.॥१२॥ हे मठ उभारणीचे शुभ कार्य मुळातच श्री गजानन महाराजांसाठी नाहीच मुळी ! तर तुमचे कल्याण होण्यासाठीच हा सर्व खटाटोप आहे.॥१३॥ हे अवघें त्रैलोक्य त्या स्वामी गजाननाचेच आहे, तोच त्यांचा मठ आहे. त्यांचा बाग-बगीचा म्हणजे या भूतलांवरील सर्व वनराई ! ही धरां हाच त्यांचा पलंग आहे.॥१४॥ अहो, अष्टसिद्धी ज्याच्या घरीं दासी होऊन राबत असतात, त्याचे अवघें वैभव खचितच निराळें आहे. त्याला तुम्ही दिलेल्या देणगीची आवश्यकताच नाही.॥१५॥ त्या प्रत्यक्ष सूर्यनारायणाला, या नभांत तळपणाऱ्या भास्कराला अंधाराचा नाश करण्यासाठी कधी एखादा दिवा आपला प्रकाश देतो काय ?॥१६॥ तो रवी स्वतःच इतका दैदीप्यमान, तेजस्वी आहे की त्याला त्या दीपाची मुळीच गरज नाही. सार्वभौमपद भूषविणारे का कधी शिपाई/जासूद होतील काय ?॥१७॥ मात्र, मनुष्याची ऐहिक वैभप्राप्तीची अभिलाषा या पुण्यकृत्यानें अवश्य फळास येईल.॥१८॥ औषधाचे प्रयोजन हे रोग परिहार करण्यासाठी असते. ते काही प्राणासाठी नसते, हे प्रथम लक्षांत घ्या.॥१९॥ रोग हा शरीरास हानिकारक असतो. त्यापासून प्राणास मुळीच भय नसते. खरें तर, प्राणास जन्म-मरणाचेही भय नसते.॥२०॥ त्याचप्रमाणें, तुमच्या या समृद्धीचे, ऐहिक वैभवाचे रक्षण होण्यासाठी या पुण्यरूप औषधीचे सेवन करणे जरुरी आहे.॥२१॥ अशी संपन्नता हे जर शरीर मानल्यास अनाचार अर्थात दुष्कृत्यें म्हणजे त्या शरीरास होणारे रोग आहेत. त्या व्याधींचा समूळ नायनाट केवळ ही पुण्यरूप औषधीं घेतली असता होईल.॥२२॥ म्हणूनच लोकहो, कुठल्याही शंका मनांत ना आणता या पुण्यसंचयाची ही पर्वणी साधून घ्या. हे पुण्यबीज या भूमीत पेरा, आणि सहस्रपटींनी ही  आपली संपत्ती वृद्धिंगत करा.॥२३॥ कुठलेही बीज जर खडकावर पेरले, तर ते निःसंशय वाया जाते. त्या खडकावर ते बीज कधीच अंकुरित होऊ शकत नाही, हे अवश्य लक्षात घ्यावें.॥२४॥ त्याचप्रमाणें, कुकर्मे, दुष्ट वासना यांही खडकांप्रमाणेच असतात. तेथे जर बीज पेरले, तर शंकारूपी किडे-पांखरें ते सर्व बीज खातात.॥२५॥ थोर संतांच्या सेवेइतकें इतर दुसरें कुठलेही पुण्यकर्म नाही. आणि स्वामी गजानन हे तर सर्व संतांचे मुगुटमणी आहेत.॥२६॥ संतकार्यासाठी काही दान केले असता त्याचे अगणित पटींनी फळ मिळते. जमिनीत एखादे बीज पेरले तरी त्यापासून अनेक कणसें निर्माण होतात.॥२७॥ त्या कणसांचे असंख्य दाणे हे केवळ एका बीजापासून तयार झालेले असतात. सज्जनहो, पुण्याचेही अगदी त्याचप्रमाणे आहे, हे कधीही विसरू नका.॥२८॥ हे बोलणें ऐकून कुत्सित खरोखरच निरुत्तर झाले. जिथे परमसत्य असे श्रेष्ठ तत्त्व असते, तिथे तर्कास मुळीच वाव नसतो.॥२९॥ कुशल, चतुर नेता असल्यावर वर्गणी विपुल प्रमाणात गोळा होते. एखाद्या क्षुल्लक व्यक्तीकडून मात्र हे वर्गणीचे कार्य सफल होणे शक्य नाही.॥३०॥ असो. मंजूर झालेल्या जागेवर कोट बांधण्याचे कार्य त्वरेनें सुरु झाले. सर्व शेगांववासी झटू लागल्यावर कशाची कमी पडणार ?॥३१॥ शेगांवी हे कोटाचे बांधकाम सुरु असतांना दगड, चुना, रेती आदि सामान गाड्यांतून आणले जात होते.॥३२॥ त्यावेळी समर्थांची स्वारी जुन्या मठातच वास्तव्यास होती. एकदा, त्यांच्या मनांत एक विचार आला.॥३३॥ आपण स्वतः तिथे बसल्याशिवाय मठाचे बांधकाम झपाट्यानें होणार नाही. असा विचार करून समर्थांनी काय केले ते श्रोतेहो, तुम्ही आता ऐका.॥३४॥ तिथेच असलेल्या एका रेतीच्या गाडीवर समर्थ जाऊन बसले. त्या गाडीचा वाहक, गाडीवान महार होता, तो पटकन त्या गाडीवरून खाली उतरला.॥३५॥ ते पाहून महाराज त्याला म्हणाले, " का रे बाबा, तू खाली उतरलास ? आम्ही परमहंस आहोत, आम्हांस विटाळ वगैरेंची बाधा होत नाही.॥३६॥ त्यावर तो महार म्हणाला, " महाराज, या गाडीवर तुमच्या शेजारी बसणे हे मला काही योग्य वाटत नाही.॥३७॥ मारुतीराया रामभक्ती करून रामस्वरूपास प्राप्त झाला, पण तो कधीच श्रीरामांच्या शेजारी बसला नाही. तर तो नेहेमीच श्रीरामांपुढे आपले दोन्ही हात जोडून एखाद्या दासाप्रमाणे उभा राहिला."॥३८॥ ( त्यावर महाराज हसत बोलले,) बरें बापा ! जशी तुझी इच्छा. माझी त्यास काहीच हरकत नाही. बैलांनो, तुम्ही आता तुमच्या गाडीवाल्याच्या मागोमाग नीट चला.॥३९॥ समर्थांच्या आज्ञेचे बैलांनीही पालन केले. गाडीवान त्यांना हाकत नसला तरी मार्गांत कुठेही न बुजता, ते बांधकामाच्या ठिकाणीं अगदी व्यवस्थित आले.॥४०॥ मग समर्थ गाडीवरून खाली उतरले आणि त्या जागेच्या मध्यभागीं येऊन बसले. त्याच ठिकाणीं, त्यांची भव्य समाधी बांधली गेली.॥४१॥ ही जागा सर्व्हे क्रमांक सातशेमध्यें असून भूखंड क्रमांक त्रेचाळीस आणि पंचेचाळीस यांचा त्यांत समावेश आहे.॥४२॥ महाराज येऊन ज्या ठिकाणी बसले, तीच जागा मध्यभागीं यावी असे बांधकाम कारभाऱ्यांना वाटले. त्याकरिता, त्या  कुशल कारभाऱ्यांनी त्या दोन क्रमांकाच्या भूखंडातून थोडी जागा घेऊन मठाचा मध्य साधला.॥४३-४४॥ सध्या केवळ एक एकर जमीन मंजूर झाली होती, त्यामुळे समाधीमध्य साधण्यासाठी बांधकाम करतांना जागा थोडी कमी पडली.॥४५॥ मात्र मध्य म्हणून तीच जागा निश्चित झाल्यानें मंजूर झालेल्या जागेपेक्षा अकरा गुंठे जागा जास्त घेतली आणि त्यावर त्या कारभाऱ्यांनी बांधकाम केले.॥४६॥ जागा व्यवस्थित विकसित केल्यास, तुम्हांला आणखी एक एकर जागा मंजूर करून देऊ, असे अधिकार्‍यांनीं पुढारी मंडळींना वचन दिले होते. म्हणूनच, हे अकरा गुंठे जास्त जागा घेऊन त्यावर बांधकाम करण्याचे त्यांनी धाडस केले. मात्र, एका दुर्जनाने हे वृत्त अधिकाऱ्यांस कळविल्याने हे प्रकरण विकोपास गेले.॥४७-४८॥ त्यांमुळे, पुढारी मंडळीं थोडी चिंताग्रस्त झाली. त्या नेते मंडळीतील, हरी पाटील यांनी समर्थांना प्रार्थना केली, " महाराज, या अकरा गुंठे जास्त घेतलेल्या जागेचा तपास करण्यासाठी एक जोशी नामक अधिकारी येणार आहे."॥४९-५०॥ तेव्हा, या जागेबद्दल जो काही तुम्हांस दंड झाला आहे, तो अवश्य माफ होईल. तुम्ही निश्चिन्त राहा, अशी समर्थांनी हसत हरी पाटलाला ग्वाही दिली.॥५१॥ श्री समर्थांनीं प्रेरणा दिल्यानें, या प्रकरणाच्या चौकशीसाठी आलेल्या त्या जोशी नामक अधिकाऱ्याने असा अहवाल सादर केला -॥५२॥ गजानन संस्थेला हा जो काही दंड आकारला गेला आहे, तो योग्य नव्हे. यास्तव, हा दंड त्यांना परत द्यावा.॥५३॥ मी स्वतः शेगांवांत जाऊन सर्वथा चौकशी करून आलो आहे. या प्रकाराबद्दल हा जो काही दंड सुनावला गेला आहे, तो उचित नाही.॥५४॥ तेव्हा, हा दंड त्वरित माफ करण्यात यावा, असा त्याने हुकूम दिला. हे जेव्हा हरी पाटलाला कळलें, तेव्हा त्याला फार आनंद झाला.॥५५॥ आणि तो म्हणू लागला - समर्थांचे वचन कधीच खोटें होत नाही. माझ्यावर नुकतेच एक अरिष्ट आले होते, त्यात एका महाराने माझ्यावर खोटें आरोप केले होते.॥५६॥ त्यावेळी, मी महाराजांना साकडे घातले असता त्यांनी मला आश्वस्त केले होते की तू मुळीच घाबरू नकोस. तुझ्या एका केसालादेखील या संकटाचा धक्का बसणार नाही.॥५७॥ आणि अखेर समर्थवचनाप्रमाणेच सारे काही घडून आले. आजही अगदी तसाच प्रकार पुन्हा घडला आहे.॥५८॥ समर्थांचे बोल खोटें झाले आहेत, हे आजवर कधीच कोणीही ऐकले नाही. असो. शेगांवांतील सर्व लोक स्वामींच्या भक्तीत रंगून गेले.॥५९॥ आतां, नव्या जागी मठ स्थापन झाल्यावर तिथे कुठल्या घटना अर्थात समर्थांचे काय काय चमत्कार झाले, हे मी कथन करतो.॥६०॥ मेहेकरच्या जवळ सवडद नामक गांव आहे. तेथील गंगाभारती गोसावी नावाचा एक ग्रामस्थ या नवीन मठांत आला.॥६१॥ त्याला महारोग झाला होता. त्यामुळे, त्याचे अवघे अंग कुजून गेले होते आणि दोन्ही पायांना जागोजागी भेगा पडल्या होत्या.॥६२॥ त्याच्या शरीरावरील सर्व त्वचा लालसर झाली होती आणि सारी बोटें झडून गेली होती. कानाच्या पाळ्या सुजल्या होत्या आणि सर्वांगास दुर्गंधी येत होती.॥६३॥ अशा त्या महारोगामुळे गंगाभारती अतिशय त्रासला होता. त्याच्या कानी समर्थांची कीर्ति आली, अन तो शेगांवास आला.॥६४॥ श्रोते हो, त्या महारोगग्रस्त गोसाव्याला सर्व लोक अडवू लागले आणि बोलू लागले, " तुला रक्तपिती आहे, तेव्हा तू महाराजांच्या दर्शनासाठी जवळ जाऊ नकोस.॥६५॥ महाराज दिसतील अशा ठिकाणी तू उभा राहा आणि दुरूनच त्यांचे दर्शन घेत जा. त्यांचे चरण धरण्यासाठी कधीही तू त्यांच्या समीप जाऊ नकोस.॥६६॥ हा रोग अतिशय स्पर्शजन्य आहे, असे सर्व वैद्य आणि डॉक्टर सांगतात. तेव्हा ही गोष्ट तू अवश्य लक्षांत ठेव.॥६७॥ मात्र एके दिवशी, गंगाभारती तिथे असलेल्या सर्व लोकांची नजर चुकवून ( कोणाला काही कळायच्या आत ) अतिशय त्वरेनें समर्थांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी आला.॥६८॥ आणि त्याने समर्थांच्या चरणांवर आपले मस्तक ठेविले. लोकहो, त्याच क्षणीं महाराजांनी त्याच्या डोक्यावर अति जोरानें एक चापट मारली.॥६९॥ त्यामुळें गोंधळलेला गंगाभारती उभा राहिला, अन समर्थांना न्याहाळू लागला. तोच, स्वामी आपल्या दोन्ही हातांनी त्याच्या थोबाडीत मारली.॥७०॥ त्याला अनेक मुस्काटांत तर मारल्याच, शिवाय आणिक एक लाथही मारली. पुढे, महाराज खाकरले आणि आपला बेडका त्याच्या अंगावर थुंकले.॥७१॥ आपल्या अंगावर पडलेल्या या बेडक्यास गंगाभारतीने समर्थांचा पावन प्रसाद मानला.॥७२॥ तो आपल्या हातात घेऊन एखाद्या मलमाप्रमाणे सर्वांगास चोळू लागला.॥७३॥ हा सर्व प्रकार तिथेच असलेला एक टवाळ पाहत होता. तो गोसाव्यास बोलू लागला. -॥७४॥ अरे बापा, आधीच तुझे हे रोगग्रस्त शरीर नासले आहे. आणि वर महाराज हा अमंगळ बेडका तुझ्या अंगावर थुंकले.॥७५॥ जो तू प्रसाद मानून अवघ्या शरीरास चोळला. तू आधी साबण लावून तुझे अंग स्वच्छ धुवून टाक.॥७६॥ हे असे वेडे पीर या भूमीवर भ्रमण करू लागतात. काही अंधश्रद्धाळू लोक त्यांना संत-साधू मानू लागतात.॥७७॥ अर्थातच त्याचा परिणाम विपरीत होऊन असंख्य धर्मबाह्य कृत्ये घडली जातात. त्यांमुळे, या समाजाची अधोगती होते.॥७८॥ आता, तुझेच उदाहरण घे ना ! तू तज्ञ वैद्यांकडून औषध न घेता या वेडयापिशाकडे धावत आलास.॥७९॥ त्याचे हे कुत्सित बोलणें ऐकून गोसाव्यास हसू आले आणि तो म्हणाला," अरे, तुम्ही इथेच तर चुकता. थोडा विचार केल्यास सर्व प्रकार ध्यानांत येईल.॥८०॥ संतपुरुषाच्या ठायीं अमंगल, अपवित्र असे किंचितही राहत नाही, हे निश्चित ! जिथे कस्तुरी असते, तिथे दुर्गंधी कधीही असू शकत नाही.॥८१॥ तुला हा जरी साधारण बेडका दिसत असला तरी प्रत्यक्षात हे गुणकारी मलम आहे. तसेच, याला कस्तुरीप्रमाणे सुवास येत आहे.॥८२॥ तुझ्या मनी संशय असल्यास, माझ्या अंगास तू हात लावून पाहू शकतोस. मग तुला खरा प्रकार ध्यानात येईल.॥८३॥ या बेडक्यात थुंकी नावालाही नाही. ही सर्वथैव औषधी आहे, हे निश्चित ! कुठल्याही बेडक्यास मलम मानण्याइतका मी काही वेडा नाही.॥८४॥ तुझा समर्थचरणीं भाव नसल्यामुळे तुला हा केवळ बेडकाच दिसला. समर्थांची थोरवी तू मुळी जाणलीच नाही.॥८५॥ तुला जर याची खात्रीच करावयाची असेल, तर आतां उगाच वेळ घालवू नकोस. समर्थ ज्या ठिकाणी स्नान करतात, तिथे माझ्यासोबत एकदाच चल.॥८६॥ प्रतिदिवशी समर्थ ज्या ठिकाणी स्नान करतात, तेथील ओली माती मी माझ्या सर्वांगास लावतो.॥८७॥ असे आपापसांत बोलून, ते दोघेही स्वामींच्या स्नान करावयाच्या स्थळीं गेले. तो काय आश्चर्य ! त्या कुत्सितास अगदी गोसाव्याने कथन केल्याप्रमाणेच अनुभव आला.॥८८॥ महाराजांच्या स्नानस्थळाची माती त्या दोघांनीही आपल्या हाती घेतली खरीं ! मात्र गोसाव्याच्या हातात असलेली माती औषधी होऊन बसली.॥८९॥ त्या टवाळखोर मनुष्याच्या हातात मात्र केवळ ओली मातीच आली अन तिला किंचित्‌ दुर्गंधीही येत होती.॥९०॥ हा अनुभव घेतल्यावर मात्र तो कुटाळ विलक्षण गोंधळून गेला आणि आपल्या सर्व कुत्सित वल्गना सोडून समर्थांना अनन्यभावाने शरण गेला.॥९१॥ असो. या महारोगी गोसाव्यास कुणीही जवळ बसू देत नव्हते. त्यांमुळे, हा सर्वांपासून कुठेतरी दूर बसून स्वामींपुढे भजन करीत असे.॥९२॥ गंगाभारतीचा आवाज पहाडी, सुमधुर, सुरेल तर होताच, तसेच त्याला गायनकलेचे विशेष ज्ञानही होते.॥९३॥ असेच पंधरा दिवस गेले आणि चमत्कार झाला. त्या गंगाभारतीच्या रोगाचे स्वरूपच पालटलें. त्याच्या सर्वांगाचा लालसरपणा हळूहळू जाऊ लागला.॥९४॥ सर्व भेगा भरून यायला लागल्या आणि त्याचे हात-पाय पूर्ववत झाले. श्रोतेहो, त्याच्या तनूस येणारी दुर्गंधीही पूर्णतः दूर झाली.॥९५॥ त्या गोसाव्याने अत्यंत भक्तिभावाने केलेले ते भजन ऐकून समर्थ प्रसन्न होत असत. प्रत्येक जीवमात्रांस गायन हे आवडतेच.॥९६॥ गंगाभारतीची अनसूया नामक पत्नी आपल्या पतीस परत घरी घेऊन जाण्यासाठी शेगांवीं आली.॥९७॥ त्यावेळी तिच्यासोबत त्यांचा पुत्र संतोषभारती हादेखील आला होता. " आपण आता आपल्या गांवी परतावे. (श्री गजानन महाराजांच्या कृपेनें) तुमची सर्व व्याधी आता बरी झाली आहे, हे मी स्वतः बघितले. समर्थ साक्षात्‌ चंद्रमौळी आहेत, हे सर्वथा सत्य आहे." अशी तिने तिच्या पतीस हात जोडून विनवणी केली.॥९८-९९॥ " बाबा, तुम्ही गजानन महाराजांची आज्ञा घेऊन आपल्या गांवी चला. इथे शेगांवात राहणे आता पुरे झाले." असा मुलगाही आपल्या पित्यास तसेच आग्रह करू लागला.॥१००॥ त्यावर गंगाभारती त्या दोघांना म्हणाला," तुम्ही मला अशी हात जोडून विनवणी करू नका. आजपासून मी खचितच तुमचा आप्तेष्ट नाही.॥१०१॥ ही जी अनाथांची माऊली अर्थातच आपले स्वामी गजानन महाराज जे इथे वास करतात, त्यांनी चापट मारून माझी धुंदी उतरवली, मला वास्तवाची जाणीव करून दिली.॥१०२॥ अंगाला राख फासली आहे, परंतु तुझें सारें चित्त मात्र संसारातच गुंतले आहे. संन्यासी म्हणून हे जे भगवे वस्त्र धारण केले आहेस, त्याची तू अशा रीतीनें अवलेहना केलीस.॥१०३॥ असे सांकेतिक शब्दांत मला समजाविले अन थापट्या मारून सत्याची जाणीव करून दिली. आता, माझे डोळे उघडले आहेत. या संसाराचा मला पुन्हा संबंध नको.॥१०४॥ अरे संतोषभारती बाळा, तू आता इथे न थांबता तुझ्या आईस घरीं घेऊन जा. तुम्ही दोघांनीही सत्वर सवडद ग्रामीं परत जावे.॥१०५॥ ही तुझी माता आहे. तिची तू अखेरपर्यंत सेवा कर. तिला तुझ्यापासून दूर करू नकोस.॥१०६॥ मातापित्यांची सेवा करणारा श्रीहरीस अत्यंत प्रिय असतो. पुंडलिकाच्या मातृ-पितृभक्तीचा आदर्श नेहेमी आपल्यापुढे ठेवावा.॥१०७॥ मी सवडदला परत आल्यास पुन्हा पूर्ववत रोगग्रस्त होईन. म्हणून तुम्ही दोघांनीही मला घरी येण्याचा आग्रह करू नका.॥१०८॥ आजपर्यंत तुमच्यासाठी सर्व काही केले. आतां मात्र परमेश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करतो. या मिळालेल्या नरजन्माचा काहीतरी उपयोग करून घेतो.॥१०९॥ आतापर्यंत संसारात केवळ रमल्यामुळें हा नरजन्म वायाच गेला म्हणायचा. या संसृतीचक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग महाराजांनी मला दाखविला आहे, त्यामुळे हा चौर्‍यांशींचा फेरा सहजच चुकेल.॥११०॥ मला ही विरक्ती केवळ समर्थांच्या कृपेने आली आहे. या परमार्थरूपी खिरीमध्ये तुम्ही ही मोह-मायेची माती टाकू नका रे !"॥१११॥ अशा प्रकारे गंगाभारतीने आपल्या कुटुंबीयांची समजूत काढली आणि पत्नीला मुलासह सवडदाला परत पाठविले. तो स्वतः मात्र समर्थचरणीं शेगांवातच राहिला.॥११२॥ समर्थांची स्तुती-भक्तीपर अनेक पदें तो अत्यंत तन्मयतेने म्हणत असे. श्रोतेहो, त्याला गायन कलेचे विशेष ज्ञान होतेच.॥११३॥ दररोज सायंकाळी तो एकतारा घेऊन समर्थांच्या जवळ बसत असे आणि भजन-गायन करीत असे.॥११४॥ त्याचे ते भक्तिरसपूर्ण स्वरांतील भजन ऐकून सर्वच भक्तजनांचे मन हर्षित होत असे. सुस्वर गायन सर्वांनाच अपार सुख-समाधान देते.॥११५॥ या गंगाभारतीचा रोग समूळ नष्ट झाला आणि तो पूर्ववत निरोगी झाला. पुढें, श्री गजानन महाराजांच्या आज्ञेचे पालन करीत तो मलकापुरास गेला.॥११६॥ असो. एकदा पौष महिन्यांत झ्यामसिंग शेगांवी आला आणि समर्थांना त्याने, " आपण माझ्या गांवी यावे." अशी प्रार्थना केली.॥११७॥ मागें मी माझ्या अडगांव येथील भाच्याच्या घरीं चलावे, असे आपणास विनविले होते. तेव्हा हे समर्था तुम्ही मला वचन दिले होते की मी काही दिवसांनंतर नक्की तुझ्या गृहीं येईल. मात्र आतां तू मला आग्रह करू नये.॥११८-११९॥ त्या घटनेला आता बरेच दिवस होऊन गेले आहेत. तेव्हा, हे दयाळा तुम्ही आता मुंडगांवीं माझ्या घरी यावे. मीही आपला भक्त आहे, म्हणून माझी ही इच्छा पूर्ण करावी.॥१२०॥ माझ्या गृहीं, मुंडगांवी आपण काही दिवस वास करावा. मी तिथें अवघीं सिद्धता, तजवीज करून आपणांस घेऊन जाण्यास आलो आहे.॥१२१॥ तेव्हा, साधुवर्य गजानन झ्यामसिंगासह मुंडगांवी आले. त्या थोर सत्पुरुषाचे दर्शन घेण्यासाठी भाविक स्त्री-पुरुषांची अनिवार गर्दी लोटली. त्या आनंद सोहळ्याचे वर्णन करणे, सर्वथा अशक्य आहे.॥१२२॥ त्यावेळी, झ्यामसिंगाने फार मोठा भंडारा घातला. गोदावरीच्या तीरावर वसलेले ते मुंडगांव जणू दुसरे पैठणच भासू लागले.॥१२३॥ पैठणनगरीत जसे थोर संत एकनाथ प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे मुंडगांवीं श्री गजानन महाराज (शोभू लागले.) भजनी मंडळींच्या अनेक दिंड्या तिथे भजन करण्यासाठी आल्या.॥१२४॥ आचारी भंडाऱ्याचा महाप्रसाद करण्यासाठी स्वयंपाक करू लागले. अर्ध्याहून अधिक पाकसिद्धी झालीही अन तेव्हाच महाराज झ्यामसिंगास म्हणाले, " अरे झ्यामसिंगा, आज चतुर्दशी आहे. ही रिक्त तिथी समजली जाते. या भंडाऱ्याच्या प्रसादाच्या पंक्ती पौर्णिमेला ( म्हणजेच उद्या ) होऊ दे."॥१२५-१२६॥ त्यावर झ्यामसिंग म्हणाला, " महाराज, सर्व स्वयंपाक तयार तर झालेला आहे. शिवाय आपला प्रसाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोकही इथे जमले आहेत."॥१२७॥ ( ते बोलणे ऐकून ) स्वामी उत्तरले," व्यवहारदृष्टीने केलेले तुझे हे बोलणें सर्वथा योग्य आहे खरें ! मात्र हे असे होणे त्या जगदीश्वराला मान्य नाही. झ्यामसिंगा, लोकांस हा अन्नप्रसाद मिळेल असे वाटत नाही. तुम्हां प्रापंचिक लोकांना आपण ठरवल्याप्रमाणेच सर्व घडावे असे वाटते.॥१२८-१२९॥ पुढें, भोजनाच्या पंक्ती बसल्यावर एकाएकी आकाश ढगांनी भरून आले आणि मेघांचा कडकडाट सुरु झाला.॥१३०॥ वीजाही चमकू लागल्या, सोसाट्याचा झंझावात सुटला. त्या वाऱ्याच्या जोराने जंगलातील झाडे उन्मळून पडू लागली.॥१३१॥ काही क्षणांतच सगळीकडे पाणीच पाणी झाले, आणि प्रसादाचे ते सर्व अन्न वाया गेले. हे पाहून झ्यामसिंगाने महाराजांस अशी प्रार्थना केली - महाराज, आता उद्यां तरी आजच्याप्रमाणे नैसर्गिक आपत्ती न येवो. गुरुराया, इथे जमलेल्या अवघ्या मंडळींची (घडलेल्या प्रकारामुळे) पार निराशा झाली आहे.॥१३२-१३३॥ या पर्जन्याचे संकट आता दूर करा. सध्या तर पावसाळ्याचाही काळ नाही, अवकाळी आलेल्या या पावसाने आमचे नुकसानच होईल.॥१३४॥ अवेळी हा असा पाऊस पडला तर शेतातील पिकांचा सर्वनाश होईल. अन मग सर्व लोक मलाच दोष देत बोलतील, हा भंडारा घालून झ्यासिंगाने चांगलेच पुण्यकार्य केले, ज्यांमुळे आमचे तर नुकसान झाले. पुण्यकर्म करण्याची ही कुठली पद्धत ?॥१३५-१३६॥ त्याचे ते बोलणे ऐकून महाराज आश्वासक स्वरांत म्हणाले, " झ्यामसिंगा, असा चिंतीत होऊ नकोस. उद्या हा पाऊस तुझे काहीच नुकसान करणार नाही.॥१३७॥ मी आताच हे पर्जन्याचे संकट दूर करतो, असे म्हणत पुण्यपुरुष गजानन महाराज आकाशाकडे ( दिव्यदृष्टीने ) पाहू लागले. तो काय आश्चर्य ! आभाळ क्षणांत निरभ्र झाले.॥१३८॥ आकाशातील काळे मेघ दूर गेले आणि ( सूर्यनारायणाचे दर्शन होऊन ) सगळीकडे लख्ख ऊन पडले. हा चमत्कार अवघ्या एका क्षणांत झाला. खरोखर संतांचे सामर्थ्य अगाध असते.॥१३९॥ मग दुसऱ्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेला तो भंडारा मोठ्या उत्साहांत साजरा झाला. श्रोतेहो, त्या मुंडगांवीं अजूनही नित्यनियमाने हा भंडारा साजरा केला जातो.॥१४०॥ ( महाराजांच्या त्या सद्भक्ताने ) झ्यामसिंगाने मुंडगांवांत असलेली त्याची सर्व मालमत्ता श्री गजानन महाराजांच्या चरणीं अर्पण केली.॥१४१॥श्रोतेहो, त्या मुंडगांवात समर्थांचे अनेक भक्त रहात होते. त्यापैकी एक होता पुंडलीक भोकरे, या तरुण मुलाची समर्थ चरणीं दृढ श्रद्धा होती.॥१४२॥ हा उकिरड्या नामक कुणब्याचा एकुलता एक, तरुण मुलगा होता. तो महाराजांचा निस्सीम भक्त होता.॥१४३॥ लोकहो, वऱ्हाडप्रांती जर मूल जगत, वाचत नसेल तर नवस बोलून नवजात शिशूचे हे उकीर्डा असे नाव ठेवतात. या प्रांतात तसा रिवाज आहे.॥१४४॥ जसा तेलंगणा प्रांतात पेंटय्या, महाराष्ट्रांत केर-पुंजा अशी नांवे ठेवण्याचा प्रघात आहे. त्याच रितीनुसार, वऱ्हाडांत उकीर्डा असे बालकाचे नाव ठेवतात.॥१४५॥ हा पुंडलीक वद्य पक्षांत नित्यनियमाने शेगांवींची वारी करीत असे. अशाप्रकारे, ( दर पंधरा दिवसांनी ) नित्य समर्थांच्या दर्शनास येत असे.॥१४६॥ ( पांडुरंगभक्त ) वारकरी लोक ज्याप्रमाणें इंद्रायणीं नदीच्या तीरावर वसलेल्या देहू-आळंदी इथे प्रत्येक वद्य पक्षांत ( ज्ञानेश्वर-तुकोबा माऊलींच्या ) दर्शनासाठी जातात. अगदी त्याचप्रमाणें, हा वऱ्हाडांतील भक्त दर वद्य पक्षांत शेगांवांत येऊन गजानन महाराजांचे अत्यंत भक्तिभावानें दर्शन घेत असे.॥१४७-१४८॥ असो. एकदा वऱ्हाडात ग्रंथिक ज्वराच्या रोगाची साथ पसरली. त्यांपासून वाचण्यासाठी गावकरी गांव सोडून जाऊ लागले.॥१४९॥ या तापाची लक्षणें अशी होती की हा संसर्ग झालेल्या मनुष्यास प्रथम थंडी वाजते. तापाने अंगही तापते आणि डोळेही अत्यंत लालबुंद होतात.॥१५०॥ तसेच, कुठल्याही सांध्याच्या स्थानी ग्रंथी म्हणजे गाठ उठते. अशी गाठ येताच वातदोष प्रचंड वाढतो.॥१५१॥ त्यांमुळे, रोग्याला शुद्ध राहत नाही आणि तो असबंद्ध बडबड करू लागतो. शरीराची लाहीलाही होऊन बेशुद्धही पडतो.॥१५२॥ असा हा अत्यंत विपरीत रोग पूर्वी भारतखंडात नव्हता. तर युरोपांत या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होता.॥१५३॥ तेथील साथ इकडे आली आणि गांवोगांवी पसरली. त्या भयंकर साथीपासून वाचण्यासाठी लोक घरेंदारें सोडून दूर वनांत जाऊन राहू लागले.॥१५४॥ त्या दुर्धर साथीचा संसर्ग मुंडगांवातही होऊ लागला. त्याच दरम्यान, पुंडलीकाच्या वारी आली आणि तो शेगांवास निघाला.॥१५५॥ घरी असतांनाच त्याला थोडीफार कणकण जाणवू लागली होती, पण त्याने त्याबद्दल कुणालाच सांगितले नाही. नित्य शेगांवची वारी करण्यासाठी तो त्याच्या वडिलांसोबत निघाला.॥१५६॥ साधारण पाच कोस अंतर चालून झाल्यावर त्याला बराच जोराचा ताप आला आणि थकव्यामुळे त्याला एक पाऊलदेखील चालवेना.॥१५७॥ त्याच्या काखेत एक गाठही आली आणि त्याला अशक्तपणा जाणवू लागला. त्याची ही अवस्था पाहून त्याचे वडील त्यास विचारू लागले, " बाळा पुंडलीका,  असे का करतो आहेस ? तू ठीक आहेस ना?" ॥१५८॥ त्यावर पुंडलीक त्याच्या वडिलांना म्हणाला, " बाबा, मला ताप आला आहे आणि कांखेत एक गोळाही उठला आहे.॥१५९॥ माझी सर्व शक्ती क्षीण होऊन मी अगदी गळून गेलो आहे. आतां मला अजिबात चालवत नाही. माझे दुर्दैव पहा कसे माझ्या वारीच्या आड आले आहे अन आता माझी ही वारी कशी पूर्ण होणार ?॥१६०॥ हे स्वामी दयाघना, माझ्या वारीत खंड पाडू नकोस. तू भक्तवत्सल, कृपानिधी आहेस, तुझ्या दिव्य चरणांचे दर्शन मला होऊ दे.॥१६१॥ माझ्या वारीची सांगता झाल्यानंतर मला खुशाल ताप येऊ दे अथवा माझे शरीर पडू दे. मला त्याची किंचितही पर्वा नाही.॥१६२॥ हे गुरुराया, ही वारी हाच माझा पुण्यठेवा आहे. मात्र ही साथ एखाद्या वैऱ्याप्रमाणे या माझ्या वारीचा नाश करू पाहत आहे. तेव्हा, या संकटापासून तिचे रक्षण करा. ( माझी वारी निर्विघ्नपणें पार पडू द्या. ) ॥१६३॥ शरीरात शक्ती असेल तरच परमार्थ यथार्थ घडतो. मुलाची अशी अतीव कष्टदायक अवस्था पाहून पुंडलीकाचे वडीलही अत्यंत चिंतातुर झाले.॥१६४॥ त्या पित्यास अश्रू अनावर झाले आणि तो परमेश्वरचरणीं प्रार्थना करू लागला, " देवा, हा माझा एकुलता एक पुत्र आहे. माझ्या वंशाचा हा दिवा तू हिरावू नकोस." ॥१६५॥ तेव्हा उकीर्डा आपल्या मुलास म्हणाला," बाळा, आता तुला बसावयास एखादी गाडी अथवा घोडे पाहू का ?" ॥१६६॥ त्यावर पुंडलीक म्हणाला," माझी ही वारी पायीच पूर्ण झाली पाहिजे. मी आता उठत-बसत, हळूहळू जमेल तसे शेगांवास जाण्याचा प्रयत्न करतो.॥१६७॥ मार्गांत जरी मला मृत्यू आल्यास तरी माझे शव तरी तुम्ही शेगांवास न्या. ( हीच माझी शेवटची इच्छा आहे.) आणि तुम्ही मुळीच शोक करू नका, हेच माझे सांगणे आहे.॥१६८॥ अशा प्रकारे, कसातरी बसत-उठत मोठ्या कष्टाने पुंडलीक शेगांवला आला आणि आपल्या स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन त्याने मोठ्या भक्तिभावाने त्यांना साष्टांग नमस्कार केला.॥१६९॥ तोच समर्थांनी एक अदभूत लीला केली. त्यांची स्वतःची काख त्यांनी एका हाताने जोर लावून दाबली.॥१७०॥ आणि पुंडलीकास प्रेमपूर्वक म्हणाले, " तुझे गंडांतर आता पूर्ण टळले आहे. तू यत्किंचितही काळजी करू नकोस." ॥१७१॥ महाराजांनी हे उद्गार काढता क्षणीच पुंडलीकाच्या काखेतील गाठ जगाच्या जागीच विरून गेली आणि त्याचा तापही तात्काळ उतरला.॥१७२॥ अशक्तततेने त्याच्या शरीराला थोडासा कंप मात्र राहिला होता. तेव्हा, समर्थांसाठी पुंडलीकाच्या आईने नैवेद्य वाढून आणला.॥१७३॥ त्या नैवेद्याचे दोन घास समर्थांनी खाल्ले आणि तत्क्षणीच पुंडलीकाच्या शरीराचे कांपरें बंद झाले.॥१७४॥ पुंडलीक अगदी पूर्ववत आरोग्यवंत झाला, केवळ थोडासा अशक्तपणा राहिला. गुरुभक्तीचेच हे खरोखर फळ त्याला मिळाले. शंकेखोर मनुष्यांनी याचा जरूर विचार करावा.॥१७५॥ साक्षात्कारी गुरुची श्रद्धेने केलेली सेवा कधीही वाया जात नाही. कामधेनू तुमच्या घरीं असेल तर तुमच्या सर्व इच्छा का नाही पूर्ण होणार ?॥१७६॥ वारीची सांगता करून पुंडलीक मुंडगांवला परतला. हे चरित्र जो मनोभावें वाचेल त्याचे गंडांतर गुरुकृपेने अवश्य टळेल.॥१७७॥ हे संतचरित्र म्हणजे कपोलकल्पित कहाणी नव्हें, तर ही भक्तांच्या सत्य अनुभवांची खाण आहे. या संतकथेविषयीं मनांत थोडाही अविश्वास आणू नका.॥१७८॥ श्रोतें हो, हा श्रीदासगणूविरचित श्री गजाननविजय नामें ग्रंथ भाविकांस कल्याणप्रद होवो, हेच परमेश्वराजवळ मागणे ! ॥१७९॥
॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति त्रयोदशोSध्यायः समाप्तः ॥  
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


Feb 12, 2025

श्रीगजानन महाराज मालामंत्र


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

या अखंड चराचराला व्यापून टाकणारा तो सर्वशक्तिमान परमात्मा या जगताच्या कल्याणासाठीच विविध रूपें धारण करतो. आपल्या परमभक्तांच्या उद्धारासाठी, मुमुक्षु जनांना सत्पथी लावण्यासाठीच त्याच्या या सर्व लीला असतात. कधी कधी तो निर्गुण, निराकार परमात्मा सगुण, साकार होऊन संतरूपांत अवतरित होतो आणि सर्वांनाच त्याच्या या  सगुणरुपाचा ध्यास लागतो. हे संत-महात्मे असंख्य बद्ध, मुमुक्षु जनांवर कृपा करत त्यांचे जीवन कृतार्थ करतात. अशा साक्षात् परब्रह्मस्वरुप संतांमध्ये शेगावनिवासी संतशिरोमणी श्री गजानन महाराजांचे स्थान अनन्यसाधारण आहे.

आपल्या अवतारकाळांत श्रीगजानन स्वामींनी असंख्य भक्तांवर कृपानुग्रह केला, आणि आजही ‘ देहांताच्या नंतरहि । कितीजणा अनुभव येई ॥' अशी प्रचिती कित्येक गजाननभक्तांना येत आहे. अर्थात ' सदाचाररत सद्‌भक्ता । फळ लाभे बघता बघता ॥' हे मात्र भाविकांनी अवश्य लक्षांत ठेवावे.

या ब्रह्माण्डनायकाचा मालामंत्रही प्रभावी असून, त्याचे श्रद्धापूर्वक पठण केल्यास भाविकांना तात्काळ श्रीगजाननकृपेची अनुभूती येते.      ॐ इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधा निदधे पदम् । समूळ्हमस्य पांसुरे ॥  भावार्थ : ऋषि दयानन्द यांनी या ऋचाचा अर्थ थोडक्यांत असा सांगितला आहे, “यो वेवेष्टि व्याप्नोति चराचरं जगत् स विष्णु:” अर्थात् या चराचर जगतामध्ये जो विद्यमान, व्यापक परमात्मा आहे, तोच हा श्रीहरी विष्णु आहे.  त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपा अदाभ्यः । अतो धर्माणि धारयन् ॥ भावार्थ : त्या वामन बटूरूपी श्रीहरी परमात्म्यानेच आकाशातील त्रिपादव्याप्त स्थानांत त्रैलोक्य निर्माण केले आणि तिथे तो धर्मरूपाने सर्वदा स्थित आहे.    तद्‌विष्णोः परमं पदं सदा पश्यंति सूरयः । दिवीव चक्षुराततम् ॥  भावार्थ : ज्याप्रमाणे आपण सामान्य चक्षूंनी आकाशातील सूर्यनारायण प्रत्यक्ष पाहू शकतो, त्याचप्रमाणे ऋषीमुनी-योगीजन-संत-महात्मे त्यांच्या दिव्य ज्ञानचक्षूंनी श्रीविष्णूंच्या श्रेष्ठस्थानास सहज पाहू शकतात अर्थात परमेश्वराच्या चरणीं म्हणजेच परमपदांस प्राप्त होतात.   ॐ नमो भगवते गजाननाय दर्शनमात्रदुःखदहनाय विदेहदेहदिगम्बराय आनंदकंदसच्चिदानंदाय परमहंसाय अवधूताय मनोवांच्छितफलप्रदाय अयोनिसंभवमहासिद्धाय ॥ "गण गण गणात बोते” महामंत्राय । सर्वमंत्रयंत्रतंत्रस्वरुपाय । सर्वसम्पुटपल्लवस्वरुपाय । ॐ नमो महापुरुषाय स्वाहा ( नमः ) ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

 

Jan 24, 2025

श्रीनृसिंहवाडी स्थानमाहात्म्य - औरवाडच्या द्विजाचे दारिद्र्यहरण अर्थात श्रीगुरुचरित्र अध्याय - १८


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

श्रीदत्त संप्रदायांतील सर्वच अधिकारी विभूतींनी श्री सरस्वती गंगाधर विरचित श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे माहात्म्य पुन्हा पुन्हा अधोरेखित केले आहे. तर असंख्य दत्तभक्तांनीदेखील या वेदतुल्य ग्रंथाचे नित्यपाठ वाचन, पारायण करून श्रीदत्तमहाराजांच्या कृपेची प्रचिती अनुभवली आहे. ज्या दत्तभक्तांना काही कारणास्तव समग्र गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य होत नाही, त्यांनी निदान काही विशिष्ट अध्यायांची यथाशक्ती, भक्तिपूर्वक पारायणे करावीत, असे अनेक अधिकारी संतमहात्म्यांनी सांगितले आहे. या कामधेनूस्वरूप श्रीगुरुचरित्रांतील श्रीनृसिंहसरस्वती स्वामीमहाराजांचा मंगलमय आशीर्वाद लाभलेला एक अध्याय म्हणजे अठरावा अध्याय - द्रव्यसंकट परिहारार्थ हा अध्याय नित्य पाठांत ठेवावा. तसेच या अध्यायांत श्रीदत्तप्रभूंची राजधानी म्हणून विख्यात असलेल्या श्रीनृसिंहवाडीचे माहात्म्यदेखील वर्णन केले आहे. या महान क्षेत्रीं श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे वास्तव्य होणार हे जाणून श्री रामचंद्र योगी आणि इतर अनेक थोर सत्पुरुष येथे आधीपासूनच तपाचरण करीत राहिले होते, इतके हे स्थान परम पवित्र आणि प्राचीन आहे. अशा या तात्काळ प्रचिती देणाऱ्या अध्यायाचा पाठ करतांना तो केवळ वाचनमात्र न राहता, त्या परब्रह्माच्या ठायीं अनन्य शरणागतीचा भाव यावा, भाविकांना त्यांच्या अस्तित्वाची-कृपेची अनुभूती यावी यासाठीच हा चिंतनाचा केलेला अल्प प्रयास ! ही यथामति केलेली वाङ्मयसेवा कृपामूर्ती श्रीदत्तमहाराजांनी त्यांच्या दिव्य चरणीं रुजू करून घ्यावीं, हीच अंतःकरणपूर्वक प्रार्थना !!

II श्री गणेशाय नमः II श्री सरस्वत्यै नमः II श्री गुरुभ्यो नमः II

जय जया सिद्धमुनि I तूं तारक भवार्णी I सुधारस आमुचे श्रवणीं I पूर्ण केला दातारा II१II गुरुचरित्र कामधेनु I ऐकतां न धाये माझें मन I कांक्षीत होतें अंतःकरण I कथामृत ऐकावया II२II ध्यान लागलें श्रीगुरूचरणीं I तृप्ति नव्हे अंतःकरणीं I कथामृत संजीवनी I आणिक निरोपावें दातारा II३II येणेंपरी सिद्धासी I विनवी शिष्य भक्तीसीं I माथा लावूनि चरणांसी I कृपा भाकी तये वेळीं II४II  श्रीनृसिंहसरस्वती महाराज औदुंबरक्षेत्रीं असतांना घडलेला एका मंदमति ब्राह्मणाच्या वरप्रदानाचा कथावृत्तांत ऐकून नामधारक म्हणाला,” हे सिद्धमुनि, तुमचा जयजयकार असो. तुम्हीच हा भवसागर तरून नेणारे त्राता आहांत. हे श्रीगुरुंचे चरित्ररूपी अमृत देऊन तुम्ही माझे सर्व मनोरथ पूर्ण केले. हे कामधेनूस्वरूप गुरुचरित्र कितीही श्रवण केले तरी, माझे मन तृप्त होत नाही. हे कथामृत ऐकत रहावे, अशीच माझ्या मनींची इच्छा आहे. श्रीगुरूंचे ध्यान करण्यांत माझे चित्त निमग्न झाले आहे, श्रीगुरुचरणांचा मला ध्यास लागला आहे. अजूनही माझे पूर्णतः समाधान झाले नाही. हे दयाघना, हे कथामृत अधिक विस्ताराने मला सांगावे.” अशाप्रकारे सिद्धमुनींस भक्तिपूर्वक नमन करून नामधारकाने प्रार्थना केली.        शिष्यवचन ऐकोनि I संतोषला सिद्धमुनि I सांगतसे विस्तारोनि I ऐका श्रोते एकचित्तें II५II ऐक शिष्या-शिखामणि I धन्य धन्य तुझी वाणी I तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं I तल्लीन झाली परियेसा II६II तुजकरितां आम्हांसी I चेतन जाहलें परीयेसीं I गुरुचरित्र आद्यंतेसीं I स्मरण जाहलें अवधारीं II७II शिष्याची श्रीगुरुचरित्र ऐकण्याची ही तळमळ पाहून श्रीनृसिंहसरस्वती महाराजांचे परमभक्त सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला अन प्रसन्न होऊन ते म्हणाले, “ हे शिष्योत्तमा, तुझी श्रीगुरुचरणीं असलेली दृढ भक्ती पाहून मलाही श्रीगुरुचरित्राचे पुन्हा स्मरण होऊ लागले आहे. आता पुढील कथावृत्त ऐक.”     

भिल्लवडी स्थानमहिमा I निरोपिला अनुपमा I पुढील चरित्र उत्तमा I सांगेन ऐका एकचित्तें II८II व्कचित्काळ तये स्थानीं I श्रीगुरू होते गौप्योनि I प्रकट जहाले म्हणोनि I पुढें निघाले परियेसा II९II वरुणासंगम असे ख्यात I दक्षिणवाराणसी म्हणत I श्रीगुरू आले अवलोकित I भक्तानुग्रह करावया II१०II पुढें कृष्णातटाकांत I श्रीगुरू तीर्थें पावन करीत I पंचगंगासंगम ख्यात I तेथें राहिले द्वादशाब्दें II११II
श्रीगुरुमहाराज कृष्णा व वेणी नदीच्या तीरावर भुवनेश्वरीच्या पश्चिमेस असलेल्या औदुंबर वृक्षातळीं राहिले. त्यावेळीं, भिल्लवडी क्षेत्राच्या पैलतीरी त्यांनी चातुर्मासभर तीव्र अनुष्ठान केले. कितीही प्रयत्न केला तरी कस्तुरीचा सुगंध कधीही लपत नाही, त्याचप्रमाणे सकल जनांच्या कल्याणार्थ अवतरलेले सत्पुरुषही फार काळ गुप्त राहू शकत नाही. कोणत्या ना कोणत्या भक्ताच्या उद्धारासाठी ते प्रकट होतातच. करवीर येथील एका मूढ परंतु भुवनेश्वरी देवीच्या दृष्टांतानुसार श्रीगुरुंना अनन्यभावाने शरण गेलेल्या विप्रपुत्राला विद्या देण्याच्या निमित्ताने श्रीगुरुंची कीर्ती पुन्हा पसरली, अनेक भाविक जन त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. त्यामुळे, लोकानुग्रहासाठी श्रीगुरुंनी तेथून प्रयाण करण्याचे ठरविले. कित्येक तीर्थक्षेत्रें पाहत पाहत ते ‘दक्षिण काशी’ म्हणून विख्यात असलेल्या वारणा नदीच्या संगमी आले. त्या भक्तवत्सल गुरूंच्या तीर्थाटनाचे प्रयोजन केवळ मुमुक्षुजनांचा उद्धार, भक्तकल्याणच होते. पुढें, कृष्णेच्या काठी, कुरुंदवाडनजीक जेथे पंचगंगा कृष्णेला मिळते, त्या संगमस्थानी श्रीगुरु सुमारे बारा वर्षे राहिले. श्रीगुरूंच्या या दीर्घकाळ वास्तव्याने पावन झालेले हे स्थान आज  ‘श्रीनृसिंहवाडी’ किंवा ‘श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी‘ म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीगुरुमहिमा हा असा असतो, ते ज्या ज्या स्थानीं वास्तव्य करतात, ते ते क्षेत्र पावन होते.      
अनुपम्य तीर्थ मनोहर I जैसें अविमुक्त काशीपुर I प्रयागासमान तीर्थ थोर I म्हणोनि राहिले परियेसा II१२II कुरवपुर ग्राम गहन I कुरुक्षेत्र तेंचि जाण I पंचगंगासंगम कृष्णा I अत्योत्तम परियेसा II१३II कुरुक्षेत्रीं जितकें पुण्य I तयाहूनि अधिक असे जाण I तीर्थे असतीं अग्रण्य I म्हणोनि राहिले श्रीगुरू II१४II पंचगंगानदीतीर I प्रख्यात असे पुराणांतर I पांच नामें आहेति थोर I सांगेन ऐका एकचित्तें II१५II शिवा-भद्रा-भोगावती I कुंभीनदी-सरस्वती I ' पंचगंगा ' ऐसी ख्याति I महापातक संहारी II१६II ऐसी प्रख्यात पंचगंगा I आली कृष्णेचिया संगा I प्रयागाहूनि असें चांगा I संगमस्थान मनोहर II१७II अमरापुर म्हणिजे ग्राम I स्थान असे अनुपम्य I जैसा प्रयागसंगम I तैसें स्थान मनोहर II१८II वृक्ष असे औदुम्बरु I प्रत्यक्ष जाणा कल्पतरू I देव असे अमरेश्वरू I तया संगमा षट्कूळी II१९II 
काशी, प्रयाग यांसारख्या अतिपावन क्षेत्रांइतकेच या तीर्थाचे माहात्म्य अपार आहे, म्हणूनच श्रीगुरुंनी तिथे वास केला. कृष्णा - पंचगंगा संगमस्थान हे अतिशय श्रेष्ठ आहे. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी आणि सरस्वती या पंचगंगेतील पाच नद्या पुराणकाळापासून प्रसिद्ध आहेत. यांत स्नान केल्यास महापातकांचा नाश होतो. अशी ही अतिपावन पंचगंगा आणि कृष्णा-वेणी या सात नद्यांच्या संगमामुळे इथे ‘षट्कूळ’ तीर्थ झाले आहे - अर्थात सहा तीर म्हणजेच नदीचे काठ असलेले तीर्थ. कृष्णा-वेणीचे दोन तीर, पंचगंगेचे दोन काठ आणि संगम झाल्यानंतर पुढे वाहणाऱ्या नदीचे दोन तट असे हे एकूण सहा तीर असलेल्या या  ‘षट्कूळ’ तीर्थी कल्पतरूसमान औदुंबर वृक्ष आहे. या संगमाजवळ कृष्णेच्या दक्षिण तीरावर कुरवपूर (सध्याचे कुरुंदवाड) वसलेले आहे. नामधारका, हे कुरवपूर म्हणजे कुरुक्षेत्रच आहे. कृष्णा नदीच्या पूर्वतीरावर अमरापूर (सध्याचे औरवाड) नावांचे गांव आहे. येथेच  ‘अमरेश्वर’ नामक अतिशय जागृत असे शिवलिंग आहे. 
जैसी वाराणसी पुरी I गंगाभागीरथी-तीरीं I पंचनदी संगम थोरी I तत्समान परियेसा II२०II अमरेश्वर संनिधानीं I आहेति चौसष्ट योगिनी I शक्तितीर्थ निर्गुणी I प्रख्यात असे परियेसा II२१II अमरेश्वरलिंग बरवें I त्यासी वंदूनि स्वभावें I पूजितां नर अमर होय I विश्वनाथ तोचि जाणा II२२II प्रयागीं करितां माघस्नान I जें पुण्य होय साधन I शतगुण होय तयाहून I एक स्नानें परियेसा II२३II सहज नदीसंगमांत I प्रयागसमान असे ख्यात I अमरेश्वर परब्रह्म वस्तु I तया स्थानीं वास असे II२४II याकारणें तिये स्थानीं I कोटितीर्थे असतीं निर्गुणी I वाहे गंगा दक्षिणी I वेणीसहित निरंतर II२५II 
महान तीर्थक्षेत्र वाराणसी येथील गंगा नदी जशी अतिपवित्र आहे, त्याचप्रमाणे पंचगंगा - कृष्णा संगमाचे महत्त्व आहे. अमरेश्वराजवळ चौसष्ट योगिनी असून, तिथे निर्गुण शक्तितीर्थ नामक प्रख्यात तीर्थ आहे. अमरेश्वर साक्षात काशीविश्वनाथ असून या शिवलिंगाचे श्रद्धेने पूजन केले असता, मनुष्य अमर होतो. माघ महिन्यांत प्रयाग येथे स्नान केल्यास विशेष पुण्यफळ प्राप्त होते. अमरापुर येथील संगमात केवळ एकदा स्नान केल्यास त्या माघस्नानाच्या शतपट पुण्य मिळते. अर्थात हे स्थान प्रयागासम असून तेथे वास करणारा अमरेश्वर प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप आहे. त्यांमुळे तिथे निर्गुणस्वरूपी कोटितीर्थे आहेत. वेणी नदीसहित दक्षिणेकडे वाहणारी कृष्णा ही साक्षात भागिरथीच आहे.    
अमित तीर्थें तया स्थानीं I सांगतां विस्तार पुराणीं I अष्टतीर्थ ख्याति जाग्रणी I तया कृष्णातटाकांत II२६II उत्तर दिशीं असे देखा I वाहे कृष्णा पश्चिममुखा I शुक्लतीर्थ नाम ऐका I ब्रह्महत्यापाप दूर II२७II औदुम्बर सन्मुखेसी I तीनी तीर्थें परियेसीं I एकानंतर एक धनुषी I तीर्थें असती मनोहर II२८II ' पापविनाशी ' ' काम्यतीर्थ ' I तिसरें सिद्ध 'वरदतीर्थ ' I अमरेश्वरसंनिधार्थ I अनुपम्य असे भूमंडळीं II२९II पुढें संगम-षट्कूळांत I ' प्रयागतीर्थ ' असे ख्यात I ' शक्तितीर्थ ' ' अमरतीर्थ ' I ' कोटितीर्थ ' परियेसा II३०II तीर्थें असती अपरांपर I सांगतां असे विस्तार I याकारणें श्रीपाद्गुरू I राहिले तेथें द्वादशाब्दें II३१II कृष्णा वेणी नदी दोनी I पंचगंगा मिळोनि I सप्तनदीसंगम सगुणी I काय सांगूं महिमा त्यांची II३२II ब्रह्महत्यादि महा पातकें I जळोनि जातीं स्नानें एकें I ऐसें सिद्धस्थान निकें I सकळाभीष्ट होय तेथें II३३II काय सांगूं त्यांची महिमा I आणिक द्यावया नाही उपमा I दर्शनमात्रें होती काम्या I स्नानफळ काय वर्णूं II३४II साक्षात् कल्पतरु I असे वृक्ष औदुम्बरु I गौप्य होऊन अगोचरु I राहिले श्रीगुरु तया स्थानीं II३५II भक्तजनतारणार्थ I होणार असे तीर्थ ख्यात I राहिले तेथें श्रीगुरुनाथ I म्हणोनि प्रकट जाहले जाणा II३६II
या पावन संगमस्थानी असंख्य तीर्थे आहेत. त्यांचे महत्त्व पुराणांत वर्णिले आहे, इतके हे स्थान प्राचीन आहे. या कृष्णाकाठी आठ मुख्य तीर्थे आहेत. उत्तर दिशेकडून येणारी कृष्णा जिथे पश्चिमाभिमुख होते, तेथे ‘शुक्लतीर्थ’ आहे. या तीर्थांत स्नान केले असता ब्रह्महत्येचे पातक दूर होते. औदुंबर वृक्षाच्या - अर्थात मनोहर पादुका मंदिरासमोरच ‘पापविनाशी’, ‘काम्यतीर्थ’ आणि ‘वरदतीर्थ’ अशी तीन तीर्थे असून त्या तीर्थांमधील अंतर प्रत्येकी चार चार हात आहे. पुढें, संगमस्थानच्या षट्कुळांत ‘प्रयागतीर्थ’, ‘शक्तितीर्थ’, ‘अमरतीर्थ’ आणि ‘कोटितीर्थ’ अशी चार तीर्थे आहेत. अशा या गुप्त असणाऱ्या पवित्र तीर्थांना प्रकट करण्यासाठीच श्रीगुरु नृसिंहसरस्वती महाऱाज तिथे बारा वर्षे राहिले. नामधारकास या सप्त नद्यांच्या संगमाचे माहात्म्य सांगताना सिद्ध म्हणतात, “ या स्थानी केवळ एकदा स्नान केले असता ब्रह्महत्यादि महापातकेही नष्ट होतात आणि भाविकांच्या सर्व इष्ट मनोकामना सहजच पूर्ण होतात. या क्षेत्राच्या केवळ दर्शनानेच सर्व अभिप्सीत पूर्ण होतात, मग स्नानाच्या  पुण्यफळाचे काय अन किती वर्णन करू ? आणि हा औदुंबर तर साक्षात् कल्पतरु आहे. श्रीगुरूमहाराजांच्या तेथील वास्तव्यामुळेच ही पवित्र तीर्थे प्रकट झाली आणि आजही असंख्य भक्तजन या पवित्र क्षेत्रास भेट देऊन इहपर सौख्याचा लाभ घेत आहेत.” 
दत्तभक्तहो, नृसिंहवाडीच्या कणाकणांत दत्तमहाराजांचे अस्तित्व आहे. श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी ही सर्व अघहारी तीर्थे आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी किंवा मुमुक्षूंसाठी प्रगट केली आहेत. तेव्हा, कधीही दत्तमहाराजांच्या कृपेने श्रीनृसिंहवाडीस भेट देण्याचा योग आला, तर या क्षेत्रातील तीर्थस्नानाचा अवश्य लाभ घ्यावा अथवा किमान या पुण्यदायक तीर्थांचे दर्शन तरी आवर्जून घ्यावे.  
असतां पुढें वर्तमानीं I भिक्षा करावया प्रतिदिनीं I अमरापुरग्रामीं I जाती श्रीगुरू परियेसा II३७II तया ग्रामीं द्विज एक I असे वेदाभ्यासक I त्याची भार्या पतिसेवक I पतिव्रताशिरोमणी II३८II सुक्षीण असे तो ब्राह्मण I शुक्लभिक्षा करी आपण I कर्ममार्गी आचरण I असे सात्विक वृत्तीनें II३९II तया विप्रमंदिरांत I असे वेल उन्नत I शेंगा निघती नित्य बहुत I त्याणें उदरपूर्ति करी II४०II एखादे दिवशीं त्या ब्राह्मणासी I वरो न मिळे परियेसीं I तया शेंगांतें रांधोनि हर्षी I दिवस क्रमी येणेंपरी II४१II ऐसा तो ब्राह्मण दरिद्री I याचकपणें उदर भरी I पंचमहायज्ञ कुसरी I अतिथी पूजी भक्तीनें II४२II
श्रीनृसिंहसरस्वती महाराज कृष्णेच्या पश्चिमतीरावर असलेल्या औदुंबर वृक्षाखाली राहत होते. भिक्षेसाठी ते पूर्वतीरावरील अमरापुर गांवात जात असत. त्या ग्रामी वेदशास्त्रसंपन्न, नित्य विहित कर्माचरण करणारा ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत दरिद्री होता, तरीही परान्न न घेता केवळ कोरडी भिक्षा मागून तो उदरनिर्वाह करीत असे. त्या परिस्थितीतही तो दररोज पंचमहायज्ञ करीत असे आणि घरी आलेल्या अतिथींचेही यथोचित आदरातिथ्य करीत असे. त्याची पत्नीही साध्वी, पतिव्रता होती, आणि सर्वदा पतीच्या वचनांनुसार वागत असे. त्या सद्‌वर्तनी ब्राह्मणाच्या दारात एक घेवड्याचा वेल होता. प्रचंड वाढलेल्या त्या वेलांस भरपूर शेंगा येत असत. एखाद्या दिवशी जर त्या विप्रास पुरेशी भिक्षा मिळाली नाही, तर त्या घेवड्याच्या शेंगा शिजवून त्याचे कुटुंब उदरपूर्ती करत असत.          
वर्ततां श्रीगुरू एके दिवसीं I तया विप्रमंदिरासी I गेले आपण भिक्षेसी I नेलें विप्रें भक्तीनें II४३II भक्तिपूर्वक श्रीगुरूसी I पूजा करी तो षोडशी I घेवडे-शेंगा बहुवसी I केली होती पत्र-शाका II४४II भिक्षा करून ब्राह्मणासी I आश्वासिती गुरु संतोषीं I गेले तुझे दरिद्र दोषी I म्हणोनि निघती तये वेळीं II४५II
अन एके दिवशी त्याची पुण्याई फळास आली. श्रीनृसिंहसरस्वती महाराज त्या सात्त्विक वृत्तीच्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेले. साक्षात श्रीगुरु आपल्या घरी भिक्षेसाठी आलेले पाहून, त्या ब्राह्मणास साहजिकच खूप आनंद झाला. मोठ्या भावभक्तीने त्याने श्रीगुरुंचे स्वागत केले, त्यांना बसण्यासाठी आदरपूर्वक आसन घातले. सर्व पूजासाहित्य आणून अतीव श्रद्धेने त्याने श्रीनृसिंहसरस्वती महाराजांचे षोडशोपचारांनी पूजन केले. त्या दिवशी नेमकी त्याला विशेष भिक्षा मिळाली नव्हती, त्यांमुळे दारातल्या घेवड्याचीच भाजी त्या भाविक दाम्पत्याने श्रीगुरुंना भोजनात वाढली. भक्तवत्सल श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी भावभक्तीने दिलेली ती भिक्षा स्वीकारली आणि प्रसन्न होऊन त्या ब्राह्मणास आशीर्वाद दिला,” आता तुझा दारिद्र्य-दोष गेला बरें !” आणि श्रीगुरु तेथून निघाले. 
दत्तभक्तहो, शुद्धभावानें केलेली कुठलीही सेवा दत्तप्रभू आनंदाने स्वीकारतातच. श्री नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांनी शिरोळच्या ब्राह्मण स्त्रीने वाढलेल्या जोंधळ्याच्या कण्या आनंदाने ग्रहण केल्या, गाणगापूर येथील विप्र स्त्रीने सद्‌गुरुंच्या वचनावर श्रद्धा ठेवून वांझ म्हशीची धार काढली आणि तिने ते दूध तापवून नृसिंहसरस्वती महाराजांना भिक्षा म्हणून दिले. त्याचाही स्वामींनी स्वीकार केला. या काही फार मोठ्या सेवा नव्हेत, पण ही गुरुसेवा करतांना त्यांच्या ठायी जो उत्कट भक्तीभाव, अर्पण भाव होता, त्यामुळेच श्रीगुरू प्रसन्न झाले.        
तया विप्राचे गृहांत I जो का होता वेल उन्नत I घेवडा नाम विख्यात I आंगण सर्व वेष्टिलें असे II४६II तया वेलाचें झाडमूळ I श्रीगुरूमूर्ति छेदिती तात्काळ I टाकोनि देती परिबळे I गेले आपण संगमासी II४७II
त्या ब्राह्मणाच्या दारात असलेला घेवड्याचा वेल प्रचंड वाढलेला होता, त्याने सर्व अंगण व्यापून टाकले होते. त्या वेलाचे मूळच श्रीगुरुंनी तोडून टाकले आणि ते संगमावर निघून गेले.  
विप्रवनिता तये वेळीं I दुःख करिती पुत्र सकळी I म्हणती पहा हो दैव बळी I कैसें अदृष्ट आपुलें II४८II आम्हीं तया यतीश्वरासी I काय उपद्रव केला त्यासी I आमुचा ग्रास छेदुनि कैसी I टाकोनि दिल्हा भूमीवरी II४९II ऐसेपरी ते नारी I दुःख करी नानापरी I पुरुष तिचा कोप वारी I म्हणे प्रारब्ध प्रमाण II५०II
महाराजांनी घेवड्याचा वेल उपटलेला पाहताच त्या ब्राह्मणाच्या पत्नीला अत्यंत दुःख झाले. या दारांत असलेल्या घेवड्यामुळेच कित्येक दिवशी त्या ब्राह्मणाच्या परिवाराची उदरपूर्ती झाली होती. आता मात्र श्रीगुरुंनी तो घेवड्याचा वेलच मूळापासून उपटला होता, त्यामुळे उद्विग्न होऊन ती ब्राह्मणपत्नी आणि त्याचे पुत्र दुःख करू लागले व म्हणू लागले, “ असे कसे आमचे नशीब वाईट आणि काय हे कुठल्या जन्मीचे प्रारब्ध ! आम्ही त्या यतीश्वरांचा असा काय अपराध केला होता, म्हणून त्यांनी आमच्या तोंडचा घास हिरावून मातीत टाकला.” अशाप्रकारे ती ब्राह्मणपत्नी आक्रोश करू लागली. परंतु तो ब्राह्मण मात्र तारतम्य जाणणारा होता. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणें सर्व काही घडत असते, हे तो जाणून होता. श्रीगुरुंवर त्याचा पूर्णतः विश्वास होता, श्रद्धा होती. त्यांमुळे त्याच्या पत्नीने श्रीगुरुंना दोष दिलेला त्याला मुळीच आवडले नाही. 
दत्तभक्तहो, थोडा विचार करा. बहुतांश वेळा कुटुंबाची उदरपूर्ती करणारा तो घेवड्याचा वेल गुरुमहाराजांनी तोडून टाकला आहे. आज रात्री, कदाचित दुसऱ्या दिवशीही आपल्या मुलाबाळांच्या, पत्नीच्या आणि स्वतःच्याही पोटात एखादा घास जाईल याची शाश्वती नाही. त्याही वेळेला या गुरुभक्ताची अशी गाढ श्रद्धा आहे की साक्षात त्रिमूर्तीस्वरूप स्वामींचे पवित्र चरण आपल्या घराला लागले आहेत ना, मग आपले निश्चितच कल्याण होणार. किती ती अनन्यशरणागतता अन किती तो श्रीगुरुंवर दृढ विश्वास ! आणि मग या निजभक्ताचे पूर्वकर्मार्जित दोष निवारण - दैन्यहरण श्रीगुरुमहाराज का नाही करणार बरें?
भाग्यवशात् त्या निजजनतारक श्रीदत्तात्रेयप्रभूंनी आपली अशी परिक्षा घेतली असती, तर त्या प्रसंगी आपण कसे वागलो असतो? त्या ब्राह्मणाच्या पत्नीप्रमाणे उद्विग्न झालो असतो, त्रागा केला असता? का मग त्या सत्त्वगुणी ब्राह्मणाप्रमाणे ' तो तारक आम्हांसी I म्हणोनी आला भिक्षेसी I नेलें आमुचे दरिद्रदोषी I' असा श्रीगुरुंवर अढळ विश्वास ठेवला असता?
म्हणे स्त्रियेसी तये वेळीं I जें जें होणार जया काळीं I निर्माण करी चंद्रमौळी I तया आधीन विश्व जाण II५१II विश्वव्यापक नारायण I उत्पत्तिस्थितिलया कारण I पिपीलिकादि स्थूळ-जीवन I समस्तां आहार पुरवीतसे II५२II ' आयुरन्नं प्रयच्छति ' I ऐसें बोले वेदश्रुति I पंचानन आहार हस्ती I केवीं करी प्रत्यहीं II५३II चौऱ्यांशी लक्ष जीवराशी I स्थूल सूक्ष्म समस्तांसी I निर्माण केले आहारासी I मग उत्पत्ति तदनंतरे II५४II रंकरायासी एक दृष्टीं I करूनी पोषितो हे सर्व सृष्टि I आपुलें आर्जव बरवें वोखटी I तैसे फळ आपणासी II५५II पूर्वजन्मीचें निक्षेपण I सुकृत अथवा दुष्कृत जाण I आपुलें आपणचि भोगणें I पुढिल्यावरी काय बोल II५६II आपुलें दैव असतां उणें I पुढिल्या बोलती मूर्खपणें I जें पेरिलें तेंचि भक्षणें I कवणावरी बोल सांगे II५७II बोल ठेविसी यतीश्वरासी I आपलें आर्जव न विचारिसी I ग्रास हरितला म्हणसी I अविद्यासागरी बुडोनि II५८II तो तारक आम्हांसी I म्हणोनी आला भिक्षेसी I नेलें आमुचे दरिद्रदोषी I तोचि तारील आमुतें II५९II
तो ब्राह्मण आपल्या पत्नीस म्हणाला,” जे काही ज्या ज्या वेळी घडते, ती ईश्वरी योजना असते. हे सारे विश्व त्या परमेश्वराच्या अधीन आहे. या संपूर्ण चराचराला व्यापून टाकणारा तो जगन्नियंता आहे. या अखिल सृष्टीची उत्पत्ति-स्थिती-लय करणाराही तोच आहे. लहान मुंगीपासून ते मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत सर्वांनाच तोच जगदीश्वर आहार पुरवितो. ‘तोच परमात्मा सर्वांना आयुष्य आणि अन्न देतो.’ हे वेदवचन आहे. सिंहाचा आहार हत्ती, तो कसा त्याला मिळतो? याचा जरा विचार करून बघ. चौऱ्याऐंशी लक्ष जीव आणि स्थावर जंगम या सर्वांचा आहार प्रथम निर्माण करून तद्‌नंतरच ईश्वराने त्यांची उत्पत्ती केली. श्रीमंत-निर्धन असा भेदभाव न करता तो समदृष्टी ठेऊन सर्व सृष्टीचे पोषण करतो. आपले पूर्वकर्म जसे असेल त्याप्रमाणेच आपल्याला फळ मिळते. तेव्हा, आपले पूर्वजन्मीचे सुकृत अथवा दुष्कृत जसे असेल ते भोगणे प्राप्त आहे. उगाच इतरांना का दोष द्यावा बरें ? आपलेच दैव खडतर असेल तर दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे आहे. आपण जे पेरले असेल तेच फळ आपल्याला मिळते, त्यासाठी उगाच इतरांना का दोष द्यावा ? तू या अज्ञानसागरांत बुडून त्या सर्वश्रेष्ठ यतीश्वरांनी आपला ग्रास हिरावून घेतला असे म्हणतेस, मात्र आपल्या संचिताचा विचार तू करीत नाहीस. तो निजजनतारक असून आपल्या घरी भिक्षेसाठी आला, त्याच्या कृपेने आपला दारिद्र्य दोष गेला, आता तोच आपल्याला तारील. 
सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता I परो ददातीति कुबुद्धिरेषा I स्वकर्मसूत्रे ग्रथितो हि लोकः II असे वचन आहे. अर्थात आपल्याला सुख अथवा दुःख देणारा दुसरा कोणी नसतो, मुळात इतरांमुळे आपणास सुख अथवा दुःख प्राप्त होते, असे मानणे हीच दुर्बुद्धी आहे. सर्व प्राणिमात्र आपापल्या कर्मसूत्रांत बांधले गेले आहेत. तो ब्राह्मण पंचमहायज्ञ, अतिथीपूजन आणि वेदोक्त आचरण करणारा होता, त्याची वृत्ती सात्त्विक होती. म्हणूनच त्याला हे तत्त्वज्ञान कळले होते.                   
येणेंपरी स्त्रियेसी I संभाषी विप्र परियेसीं I काढोनि वेलशाखेसी I टाकीता झाला गंगेंत II६०II तया वेलाचें मूळ थोरी I जें कां होतें आपुलें द्वारीं I काढूं म्हणूनि द्विजवरीं I खणिता झाला तया वेळीं II६१II काढितां वेलमूळासी I लाधला कुंभ निधानेसीं I आनंद जाहला बहुवसी I घेऊनि गेला घरांत II६२II म्हणती नवल काय वर्तलें I यतीश्वर आम्हां प्रसन्न झाले I म्हणोनि ह्या वेला छेदिलें I निधान लाधलें आम्हांसी II६३II नर नव्हे तो योगीश्वर I होईल ईश्वरीअवतार I आम्हां भेटला दैन्यहर I म्हणती चला दर्शनासी II६४II
अशी पत्नी आणि मुलांची समजूत घालून श्रीगुरूंनी उपटून टाकलेला तो घेवड्याचा वेल त्याने कृष्णा नदींत फेकून दिला. त्या वेलाचे मूळ फार मोठे व जमिनीत खोलवर रुतलेले होते. ते काढण्यासाठी तो विप्र ती जमीन खोदू लागला. वेलाचे मूळ उपटून काढताच तिथे त्याला एक द्रव्याने भरलेला कुंभ आढळला. ते धन पाहून अर्थातच त्या सर्वांच्याच आनंदाला पारावार उरला नाही आणि ते मोठ्या कृतज्ञताभावाने म्हणू लागले, “ हे काय नवलच घडले ! यतीमहाराज आम्हांवर प्रसन्न झाले, म्हणूनच त्यांनी हा वेल तोडून टाकला आणि आम्हांला हा द्रव्यघट सापडला. ते कोणी सामान्य नर नसून साक्षात योगीश्वर आहेत, प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार आहेत. आमचे दैन्य दूर करण्यासाठीच ते आमच्या गृही आले होते. आता आपण सत्वर त्यांच्या दर्शनाला जाऊ.” 
नारायणस्वरूपी दत्तमहाराज गृहीं आल्यावर जगन्माता लक्ष्मीदेवी आपसूक तिथे येणारच, नाही का ? श्रीगुरु हे भावप्रिय आहे. माझ्या भक्तांचा मी उद्धार करणारच, असे त्यांचे ब्रीद आहे. त्यामुळे अंतःकरणपूर्वक केलेल्या अल्प सेवेच्या बदल्यात भक्तांचे इहपर कल्याण असा त्यांचा अनाकलनीय हिशोब असतो.      
जाऊनि संगमा श्रीगुरूसी I पूजा करिती बहुवसी I वृतांत सांगती तयांसी I तये वेळीं परियेसा II६५II श्रीगुरू म्हणती तयासी I तुम्हीं न सांगणें कवणासी I प्रकट करितां आम्हांसी I नसेल लक्ष्मी तुमचे घरीं II६६II ऐसेपरी तया द्विजासी I सांगे श्रीगुरू परियेसीं I अखंड लक्ष्मी तुमचे वंशीं I पुत्रपौत्रीं नांदाल II६७II ऐसा वर लाधोन I गेली वनिता तो ब्राह्मण I श्रीगुरूकृपा ऐसी जाण I दर्शनमात्रें दैन्य हरे II६८II 
मग तो ब्राह्मण उत्तम पूजासाहित्य घेऊन आपल्या पत्नी-मुलांसह संगमावर गेला, श्रीगुरुमहाराज तिथे होतेच. त्या दाम्पत्याने श्रीगुरुंची उत्तम प्रकारे पूजा केली आणि घरी घडलेले सर्व वर्तमान त्यांना सांगितले. तसेच आपण अज्ञानवशात  श्रीगुरुंना दोष दिला त्याबद्दल त्यांची क्षमायाचनादेखील केली. परमकृपाळू गुरूंनी त्यांना क्षमा तर केलीच, पण ‘ तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल, तुम्ही पुत्रपौत्रांसह नांदाल,’ असे शुभाशीर्वादही दिले. पुढें, श्रीगुरुं त्यांना म्हणाले, “ तुम्ही ही धनप्राप्तीची गोष्ट कोणालाही सांगू नका. माझे स्वरूप जर तुम्ही लोकांत प्रकट केले तर तुमची संपत्ती नाहीशी होईल.”  असे शुभ दत्ताशिष प्राप्त होऊन ते ब्राह्मण पती-पत्नी परत गेले. श्रीगुरुकृपा अशी असते, त्यांच्या केवळ दर्शनानेच दैन्य निवारण होते.
दत्तभक्तहो, श्रीगुरुंनी त्या ब्राह्मणाला, ‘ तुम्हीं न सांगणें कवणासी I प्रकट करितां आम्हांसी I नसेल लक्ष्मी तुमचे घरीं II’ ही जी सूचना दिली, कारण त्या वेळी त्यांना प्रकट व्हायचे नव्हते, लोकोपद्रव टाळायचा होता.     
ज्यासी होय श्रीगुरूकृपा I त्यासी कैचें दैन्य पाप I कल्पवृक्ष आश्रय करितां बापा I दैन्य कैंचें तया घरीं II ६९ II दैवें उणा असेल जो नरु I त्याणें आश्रयावा श्रीगुरू I तोचि उतरेल पैलपारु I पूज्य होय सकळिकांसी II ७० II जो कोण भजेल श्रीगुरू I त्यासी लाधेल इह परू I अखंड लक्ष्मी त्याचे घरीं I अष्ट ऐश्वर्ये नांदती II७१II सिद्ध म्हणे नामधारकासी I श्रीगुरूमहिमा असे ऐसी I भजावें तुम्हीं मनोमानसीं I कामधेनु तुझ्या घरीं II७२II गंगाधराचा कुमर I सांगे श्रीगुरूचरित्रविस्तार I पुढील कथामृतसार I ऐका श्रोते एकचित्तें II७३II
ज्यावर श्रीगुरुंची कृपा होते, त्याच्या दारिद्र्य व पापाचा क्षणार्धांत नाश होतो. अहो, कल्पवृक्षाचा आश्रय घेतल्यावर दारिद्र्य कसे बरें त्याच्या घरी राहील? जो मनुष्य दैवहीन असेल त्याने श्रीगुरुंना अनन्यभावें शरण जावे. श्रीगुरुकृपेने तो सहजच भवसागर तरून जाईल आणि सर्वांना पूज्य होईल. जो कोणी श्रीगुरुंची अंतःकरणपूर्वक भक्ती करेल, त्याचे इहपर कल्याण होईल आणि त्याच्या घरी अष्टैश्वर्ये, लक्ष्मी अखंड नांदेल.
खरें पाहता, ब्राह्मण परिवाराच्या उदरपूर्तीचे साधन असलेला घेवड्याचा वेल उपटून श्रीगुरुंनी त्यांच्या संयमाची एक प्रकारे परीक्षाच घेतली. परंतु त्या ब्राह्मणाचे सदाचरण, श्रीगुरुंवर असलेली अढळ श्रद्धा यांमुळे श्री नृसिंहसरस्वती महाराज प्रसन्न झाले आणि फलस्वरूप त्या ब्राह्मणास सुवर्णमोहरांचा कुंभ मिळाला.
दत्तभक्तहो, आपल्याही जीवनांत असंख्य आपदा-विपदा येतात, कित्येकदा चढ-उतारांस सामोरे जावे लागते, अपमान-दुःखाचे प्रसंग येतात. अशा वेळी साहजिकच त्या ब्राह्मणाच्या पत्नीप्रमाणे आपलीही दत्तमहाराजांवर असलेली श्रद्धा कुठेतरी डळमळीत होते. मात्र हीच आपली कसोटीची वेळ असते. “ यांतच माझे कल्याण आहे, भक्तवत्सल श्रीगुरु माझा उद्धार निश्चित करतीलच!”  अशी त्या आचारसंपन्न ब्राह्मणाप्रमाणे दृढ श्रद्धा ठेवल्यास स्मर्तृगामी दत्तमहाराज त्वरित धावून येतील आणि आपल्या मनीचा भाव जाणून घेऊन मस्तकी कृपाहस्त ठेवतील, हे निःसंशय !  
सिद्धमुनी नामधारकास सांगतात, “ श्रीगुरुंचा महिमा हा असा आहे. तू मनोभावे गुरुभक्ती कर. त्यायोगे, जणू कामधेनूच तुझ्या घरी सदैव वास करेल.”
गंगाधराचा पुत्र श्रीगुरूचरित्र विस्तारपूर्वक सांगत आहे. श्रोतें हो, पुढील कथामृतसार तुम्ही एकाग्र मनाने श्रवण करावे.     
II इति श्रीगुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे अमरापुरमहिमानं-द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोSध्यायः II

श्री क्षेत्र औदुंबर येथून निघून भगवान् श्रीगुरूंनी दक्षिण दिशेकडे प्रस्थान केले. त्यांनी कृष्णाकाठच्या अनेक तीर्थयात्रा केल्या. कृष्णामाता साक्षात् विष्णूचे रूप आहे तर वेणीमाता ही भगवान शंकरांचे रूप आहे, असे पद्मपुराणांत वर्णिले आहे. ह्या दोन हरिहरस्वरूप असणाऱ्या नद्यांचा पंचनद्यांसह झालेला अत्यंत मनोहर, पुण्यदायक आणि ब्रह्महत्यादि पंचपातकांचा नाश करणाऱ्या अष्टतीर्थांनी युक्त असा संगम पाहून श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या अतिपवित्र संगमाच्या पश्चिम तीरावरील औदुंबर वृक्षातळी वास करून बारा वर्षे राहिले. या संदर्भात प. प. थोरले स्वामीमहाराजांनी एक अतिशय सुरेख अन समर्पक रूपक केले आहे. श्री टेम्ब्ये स्वामी म्हणतात. “ अष्टप्रकृतींच्या समन्वयाने साकारलेल्या या देहांत आदिमाया चित्शक्ती आणि जीवात्मा यांच्या संगमस्थानी अर्थात अती मनोहर अशा आज्ञाचक्राच्या पलीकडे असलेल्या ब्रह्मरंध्रांत श्रीगुरूमहाराज विराजमान झाले.”
परमात्मस्वरूप श्रीमन्नृसिंहसरस्वतीस्वामी महाराज आपल्या मनोहर स्वरूपांत तिथे स्थापित आहेत. ‘ तया औदुंबरातळीं । श्रीगुरुवास सर्वकाळीं । काम्य होत तात्काळीं । आराधितां श्रीगुरुसी ॥’ अशी ग्वाही श्रीगुरुचरित्रकारांनी दिली आहे. प. प. श्री वासुदेवानंदसरस्वती महाराज, नारायण स्वामी, सनकादिक मंडळी, सद्‌गुरु गुळवणी महाराज, सद्‌गुरु मामा महाराज अशा अनेक थोर संत महापुरुषांनादेखील श्रीदत्तप्रभूंनी, श्रीनृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथे दर्शन दिले आहे, साक्षात्कार दिला आहे. तसेच आजही साक्षात श्रीदत्तप्रभू या पावन स्थानीं मुमुक्षूंना आश्वासन देत, सकाम भक्तांच्या इष्ट मनोकामनांची पूर्ती करत आणि संत-महात्म्यांना परमानंदाचे वरदान देत सदैव वास्तव्य करत आहेत. औदुंबरवृक्षातळीं गुप्तरूपाने वास करणाऱ्या श्रीगुरुंची आराधना केल्यास प्रचिती अवश्य येतेच. 
अमरापूर येथील ब्राह्मणाच्या दैन्यहरणाच्या कथेचेही हेच तात्पर्य आहे की विशुद्ध आचरण, सत्त्वगुणयुक्त विचार आणि चराचराला व्यापून टाकणाऱ्या त्या परमशक्तीवर प्रगाढ विश्वास यांमुळेच गुरुकृपा प्राप्त होते. आचारसंपन्न, वैदिक आणि श्री गुरुमहाराजांवर दृढ श्रद्धा असलेल्या भक्तिमान ब्राह्मण दाम्पत्यास ‘ तुम्ही भूलोकी पुत्र-पौत्रांसह ऐश्वर्यारोग्य भोगून अंती निश्चितपणे मुक्ती पावाल.’ असा आशीर्वाद त्या परमात्म्याने दिला. श्रीनृसिंहसरस्वती महाराजांचे पूजन करतांना, भिक्षा म्हणून घेवड्याची भाजी भोजनात देतांना त्या ब्राह्मणाची जी उत्कट भक्तिभावना होती, त्यांमुळे श्रीगुरु प्रसन्न झाले आणि ‘ तुझे दैन्य जाईल.’ असे त्यांनी आश्वासन दिले. अर्थातच त्यानंतर स्वामींनी त्या ब्राह्मण परिवाराच्या क्षुधाशांतीचे मुख्य साधन असलेल्या घेवड्याचा वेल तोडून त्याची कसोटीही घेतली. ‘ सकल विश्वाचा जनक, पालक आणि संहारक अशा परमेश्वराची श्रीमंत व निर्धन या सर्वांवरच कृपादृष्टी असते. कर्तुमकतुम् अन्यथा कर्तुमचें सामर्थ्य असलेले श्रीगुरुच आपले तारणहार आहेत.’, असा दृढभाव असलेला तो सात्विक वृत्तीचा ब्राह्मण त्या परमात्म्याच्या परिक्षेत सहजच उत्तीर्ण झाला. त्या अल्प गुरुसेवेनेच त्याचे इहपर कल्याण झाले. ‘ ऋण तरि मुष्टी पोहे I त्याच्या व्याजांत हेमनगरी ती I मुदलात मुक्ति देणे I ही कोण्या सावकारिची रीती II’ या कविवर्य मोरोपंतांच्या उक्तीचीच ही प्रचिती नव्हें काय ? थोडक्यांत सांगायचे तर परमेश्वराला निष्काम भावनेने काही समर्पण केले असता ते निश्चितच ‘सुवर्ण’ होऊन परत मिळते, याची खात्री बाळगावी. 
दत्तभक्तहो, कामधेनूस्वरूप श्रीगुरुचरित्रातील हा अध्याय आपणही श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने नित्यपाठांत ठेवू या. दत्तमहाराजांच्या कृपेनें श्रीक्षेत्र श्रीनृसिंहवाटिका आणि इतरही अनेक श्रीदत्तक्षेत्रांच्या दर्शनाचा, सेवेचा लाभ आपणां सर्वांना मिळावा आणि अमरापूरच्या ब्राह्मणाप्रमाणेच आपल्या ठायीं अनन्य गुरुभक्ती असावी, सर्वकाही अनुकूल असतांना आपल्या मनीं नेहेमीच आपल्या आराध्याप्रति कृतज्ञताभाव असावा तसेच प्रारब्धवशांत विपरीत परिस्थिती आली तरी त्यावेळी आपली श्रीगुरुचरणांवरील पकड अधिक दृढतेने घट्ट व्हावी, हीच त्या भक्तवत्सल-दयाघन श्रीपादश्रीवल्लभ-नृसिंहसरस्वती-श्रीदत्तप्रभूंच्या मनोहर चरणीं  प्रार्थना !!!
II श्रीगुरुदेवदत्त II 
II श्रीपादश्रीवल्लभ-नृसिंहसरस्वती-दत्तात्रेयार्पणमस्तु II 
II शुभं भवतु II
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥