Dec 30, 2020

श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर पुण्यतिथी महोत्सव २०२०-२१


|| श्रीराम समर्थ ||

ब्रह्माला चैन पडेना म्हणून चैतन्यरूपाने खाली आले ते श्रीब्रह्मचैतन्य ! 

श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर संस्थान, गोंदवले यांच्या विश्वस्तांतर्फे श्रींचा १०७वा पुण्यतिथी दि. ३१ डिसेंबर २०२० ते ८ जानेवारी २०२१ या कालावधीत श्रीक्षेत्र गोंदवले येथे साजरा झाला. 

संस्थानच्या अधिकृत वेबसाईट लिंकवर आपण दर्शनाचा लाभ दररोज घेऊ शकता.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर १०७वा पुण्यतिथी महोत्सव  

श्री सद्-गुरु श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे ओवीबद्ध चरित्र :

संपूर्ण श्री सद्-गुरुलीलामृत 

श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरविरचित श्रीरामपाठ

हाचि सुबोध गुरूंचा ...

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति


Dec 29, 2020

श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पारायण


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री गणेश-दत्त -गुरुभ्यो नमः ॥

॥ कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दन: । द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः ॥ श्री सरस्वती गंगाधर रचित ' श्री गुरुचरित्र ' हा ७४९१ ओव्यांचा अत्यंत प्रासादिक ग्रंथ आहे. ह्या वेदतुल्य ग्रंथाच्या वाचनाचे / पारायणाचे काही नियम आहेत. या ग्रंथाचे वाचन सर्वांना मुक्तपणे करता यावे यासाठी, प.प. वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी 'श्री सप्तशतीगुरुचरित्रसार ' हा सातशे ओव्यांचा ग्रंथ लिहिला. संपूर्ण श्रीगुरुचरित्र ह्या छोटया ग्रंथात साररूपाने कथन केला आहे. थोरल्या महाराजांनी रचलेल्या प्रत्येक ग्रंथात अथवा स्तोत्रांत नेहेमीच त्यांची असामान्य प्रतिभा, तीव्र बुद्धीमत्ता आणि उत्कट दत्तभक्ती यांचा प्रत्यय येतो. अर्थातच, श्री सप्तशतीगुरुचरित्रसार ग्रंथही त्यास अपवाद नाही. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक ओवीतील तिसरे अक्षर वाचत गेल्यास भगवदगीतेचा संपूर्ण पंधरावा अध्याय तयार होतो. तसेच, श्री टेम्ब्ये स्वामींच्या प्रश्नावलीतील आठवे सूचित साधन श्री सप्तशती गुरुचरित्रसाराच्या आवर्तनांची उपासना करण्यास सांगते. या दिव्य ग्रंथाच्या वाचनाने श्री गुरुचरित्र वाचनाचे फळ तर मिळतेच, शिवाय अत्यंत अल्प वेळांत श्री दत्तमहाराज, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आणि श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्या लीलांचा आनंदही घेता येतो. श्री वासुदेव निवास, पुणे इथे श्री दत्तजयंती सप्ताह अंतर्गत श्री सप्तशतीगुरुचरित्रसार या ग्रंथाचे सामूहिक पारायण करण्यात आले होते. दत्तभक्तांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा.

श्री टेम्ब्ये स्वामींरचित श्री सप्तशतीगुरुचरित्रसार ग्रंथ इथे वाचता येईल.

श्रीमद्भगवद्गीतेंतील पंधरावा अध्याय अधोरेखित करण्यासाठी या ग्रंथाच्या बहुतेक आवृत्तीत तिसरे अक्षर शब्दविग्रह करून दाखविले जाते, मात्र त्यांमुळे या पोथीचे पारायण अथवा वाचन करतांना मूळ शब्द सलग वाचता येत नसल्याने तो शब्द आणि त्या अनुषंगाने एकूणच त्या पदाचा/ओवीचा अर्थ लगेच लक्षांत येत नाही. यासाठी दत्तभक्तांसाठी सलग शब्द ठेवून ही पाठावृत्ती तयार केली आहे. समस्त दत्तभक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

॥ श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचित श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार ॥




॥ श्री गुरुदेव दत्त

अनसूयात्रिपुत्रः स श्रीदत्तः शरणं मम ...


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

सत्ययुगातील प्रथम मन्वन्तराच्या प्रारंभी श्री दत्तात्रेय प्रगट झाले होते. केवळ स्मरतां क्षणीच प्रसन्न होणारे हे दैवत या विश्वातील सकल प्राणिमात्रांच्या दुःख, दैन्य, आणि पाप - ताप निवारणार्थ अवतारीत झाले. या अलौकिक अवताराचे वैशिष्ट्य असे, ' अवतार येती आणि जाती । तैसी नोहे दत्तमूर्ती । सदा राहे पृथ्वीवरती । लोकोद्धार करावया ।' अर्थात श्री दत्तप्रभू या पृथ्वीतलांवर भक्त कल्याणाकरिता, दीन जनांचा उद्धार करण्यासाठी सतत संचार करीत असतात. 

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या सायंकाळी श्री दत्तात्रेयांचा जन्मकाळ साजरा केला जातो. त्या दिवशी दत्तोपासक मृग नक्षत्रांत दिसणाऱ्या तीन ताऱ्यांना भगवान त्रिमूर्ती दत्तात्रेय मानून त्यांचे दर्शन घेतात.  त्यानंतर त्यांची पूजा, आरती आणि प्रदक्षिणा केली जाते. श्री दत्तमहाराजांचे जन्माख्यान, पाळणा, गुरुचरित्र पारायण आदि अनेक प्रकारच्या उपासना दत्तभक्त या शुभ दिनी करतात. 

पुराणांत दत्तात्रेयांच्या अवताराची कथा अशी वर्णिली आहे - सृष्टीकर्ता ब्रह्मदेवांचे मानसपुत्र महर्षि अत्रि यांचा विवाह देवहूतिची कन्या अनसूया हिच्याबरोबर झाला होता. पुत्रप्राप्तीसाठी उभयतांनी कठोर तपश्चर्या केली. त्यावेळीं ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांनी प्रसन्न होऊन आपण त्यांचे पुत्र म्हणून अवतार घेऊ, असे अत्रि-अनसूयेला वरदान दिले. अर्थात, स्वतःचे दान केलेला तो दत्त आणि अत्रिमुनींचा पुत्र आत्रेय असे दत्तात्रेय प्रगट झाले. दत्तपुराणात अत्रि म्हणजेच त्रिगुणातीत चैतन्य आणि ' अनसूया ' नावाचा अर्थ असूयारहित प्रकृती असा वर्णिला आहे. मार्कण्डेय पुराणानुसार, अत्रि-अनसूयेच्या प्रथम पुत्र सोम (चंद्र) हा ब्रह्मदेवांचा अवतार रजोगुणी होता. त्यांचा द्वितीय पुत्र श्री विष्णूंचा अवतार श्री दत्तात्रेय सत्वगुणप्रधान होते तर शिव अवतार असलेले तृतीय पुत्र दुर्वास तमोगुणप्रधान होते. परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती - टेंबे स्वामी महाराज श्री दत्तमहाराजांचे वर्णन करतांना म्हणतात, नमस्ते समस्तेष्टदात्रे विधात्रे, नमो नमस्तेऽस्तु पुरान्तकाय, नमो नमस्तेऽस्त्वसुरान्तकाय । अर्थात सकल वांच्छित मनोकामना पूर्ण करणाऱ्या आणि ह्या सृष्टीचा निर्माणकर्ता (ब्रह्मदेवस्वरूप) असलेल्या हे जगन्नियंत्या, तुला माझा नमस्कार ! पुरांतकांला म्हणजे त्रिपुरांतकांला (अर्थांत श्रीशिवशंकर स्वरुप) श्रीदत्तात्रेया तुला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. असुरांचे निर्दालन करणाऱ्या (श्रीहरिविष्णुस्वरूप) जगदीशा, तुला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. 

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे साजरा करण्यात आलेला श्री दत्तात्रेय जयंती सोहळा खास दत्तभक्तांसाठी

         


निरंजन स्वामीकृत दत्तजन्म आख्यान


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


ॐ नमोजी गुरु स्वामी दत्तात्रेया । कृपाळू सखया दीनबंधू ॥१॥ तुझे कीर्तिगुण वर्णाया लागुन । इच्छितसे मन माझें बहु ॥२॥ तरि देई मति वदावया वाणी । आनंदाची खाणी प्रगटाया ॥३॥ ऐका हो तुम्ही श्रोते संतजन । जन्म सुलक्षण श्रीदत्ताचा ॥४॥ सावित्री आणिक लक्ष्मी पार्वती । एके ठायीं स्थिती झाली होती ॥५॥ अकस्मात आली नारदाची फेरी । वीणा स्कंधावरी घेऊनियां ॥६॥ देवोनियां त्यातें बैसाया आसन । पुसती वर्तमान त्रैलोकीचें ॥७॥ असे नारदमुनीं त्रैलोक्य भुवनीं । आम्हा ऐशा कोणी असती काय ॥८॥ पतिव्रता आणि सर्वसत्ता अंगीं । ऐशा कोणी जगीं असती काय ॥९॥ ऐशा गर्विष्ठ पाहे तिघीजणी । बोले नारदमुनी तयालांगीं ॥१०॥ तुमची याहुनी श्रेष्ठ कोटीगुण । देखलीसे जाण पतिव्रता ॥११॥ भूलोकाचे ठायी अत्रिमुनी-जाया । सती अनसूया नाम तिचें ॥१२॥ तुम्हां ऐशा दासी तिजला शोभती । काय सांगूं ख्याति तिची तुम्हां ॥१३॥ ऐसे ऐकोनी मुनीचें वचन । मनामाजीं खिन्न झाल्या तिघी ॥१४॥ आपुलिया घरा उठोनियां गेल्या । पतीसी बोलल्या जाऊनियां ॥१५॥ ऐका हो तुम्ही आमुचें वचन । कासावीस होती प्राण बहू ॥१६॥ अनसूयेची कीर्ति नारदमुनीनीं । वर्णिली येवोनी आम्हांपाशीं ॥१७॥ तरी तुम्ही जावें मृत्युलोकाठायी । अनसूयेचे गृहीं लागवेगीं ॥१८॥ हरोनियां तिच्या सत्वालागीं जाण । यावें परतून निजघरा ॥१९॥ स्त्रियांचे वचन ऐकोनी कानीं । तिघे तत्क्षणीं उठीयेले ॥२०॥ ब्रह्मा विष्णु आणि तिजा चंद्रमौळी । निघाले ते काळीं मृत्युलोका ॥२१॥ स्नानसंध्येलागी अत्रिमुनि गेला । माध्यान्हीं पातला दिनमणी ॥२२॥ तयाकाळीं तिघें होवोनि अतीथी । गेले आकस्मात भिक्षेलागीं ॥२३॥ अनसुयेलागीं मारुनियां हांक । बोलती कौतुक करोनियां ॥२४॥ भिक्षा घाली माते आम्हांसी सत्वर । नग्न दिगंबर होवोनियां ॥२५॥ नाहीं तरी आम्ही जातो परतोनि । सत्त्वासि घेऊनि तुझ्या आतां ॥२६॥ ऐकोनि ऐसें अतिथी वचन । पतिव्रतारत्‍न चिंतावलें ॥२७॥ करोनियां मनीं पतीचें चिंतन । तीर्थातें घेऊन शिंपीयलें ॥२८॥ तंव ते तिघेजण झाले चिमणे बाळ । रांगती लडिवाळ होवोनियां ॥२९॥ अनसुया नग्न होवोनियां आपण । करि दुग्धपान तयांलागीं ॥ ३०॥ तिघेजण एका पालखीं घालून । ओवीया गाऊन हालवीत ॥३१॥ इतुकियामाजीं अत्रिमुनी आले । बाळांतें पाहिलें निजडोळां ॥३२॥ विस्मित होवोनि आपुलीया मनीं । म्हणे श्रेष्ठ कोणी असती हे ॥३३॥ असो या लागून झाले बहुदिन । स्वर्गींचें भुवन शून्य ठेलें ॥३४॥ लक्ष्मी पार्वती सावित्री या तिन्ही । चिंताग्रस्त मनीं जाल्या बहू ॥३५॥ एके ठायीं सर्व होवोनियां गोळा । चिंता वेळोवेळां करिताती ॥३६॥ इतुक्यांत आली नारदाची फेरी । मंजुळ उच्चारी नाममंत्र ॥३७॥ देवोनि आसन बैसविले मुनी । करिती विनवणी तयांलागीं ॥३८॥ आमुचे भ्रतार गेले कोणीकडे । आम्हांसी सांकडें घालोनियां ॥३९॥ तयावीण आम्हां न गमेचि क्षण । जाले बहुदिन तयालागीं ॥४०॥ तयांवीण सर्व शोभित मंदीर । दिसति भयंकर आम्हांलागीं ॥४१॥ तुम्हांप्रति कोठें भेटतील तरी । सांगावें सत्वरीं आम्हांलागीं ॥४२॥ तंव बोले मुनि तया स्त्रियांप्रति । देखियेले पती तुमचे म्यां ॥४३॥ अनसूयेचे घरीं तिघेजण बाळ । होवोनि लडिवाळ खेळताती ॥४४॥ ऐकोनि ऐंसें मुनीचें वचन । विस्मित होऊन बोलती त्या ॥४५॥ आमुचिया बोला गेले सतीघरीं । आम्हांलागीं घोरीं घालूनियां ॥४६॥ चला जाऊं आतां तयेचिया घरा । मागूनि भ्रतारा घेऊं आजी ॥४७॥ अभिमान दूर सांडुनियां जाण । पातल्या शरण अनसूयेसीं ॥४८॥ म्हणती वो माते देई चुडेदान । करी बोळवण आम्हांलागीं ॥४९॥ भ्रतारांवाचून आमुचे पंचप्राण । कंठापाशीं जाण आले माते ॥५०॥ सर्वभावें आतां शरणागत आम्ही । द्यावे आमुचे स्वामी आम्हांलागीं ॥५१॥ पतिव्रता म्हणे ’न्यावे आपुले पती । धरुनियां हातीं आपुलाले’ ॥५२॥ तवं त्या बोलती तिघीजणी तीतें । ओळख आम्हांते न पडेचि ॥५३॥ समान दिसती ब्रह्माविष्णुरुद्र । तिन्ही मुखचंद्र सारिखेची ॥५४॥ माय होवोनियां न होय मावशी । द्यावे हो आम्हांसी ओळखून ॥५५॥ ऐशा त्या वेल्हाळा पाहूनियां । दीन केलेसें विंदान अनुसूयेनें ॥५६॥ पतीच्या तीर्थासीं शिंपूनी मागुती । तिघीचेही पती दाखविले ॥५७॥ ब्रह्माविष्णुरुद्र होवोनि प्रसन्न । म्हणे ’वरदान मागें कांहीं ’ ॥५८॥ म्हणे अनसूया द्यावे ऐसे वर । तिघेही कुमार तुम्हां ऐसे ॥५९॥ तथास्तु म्हणोनि देऊनीयां वर । ब्रह्महरीहर जाते झाले ॥६०॥ तयांच्या प्रसादें झाले तिघे पुत्र । उत्तम पवित्र पुण्यशील ॥६१॥ विरंचीचा चंद्र शिवाचा दुर्वास । विष्णूचा तो अंश दत्तात्रय ॥६२॥ तयाकाळीं हर्ष झाला जयजयकार । येती सुरवर तया ठायां ॥६३॥ आनंदोनि देव वर्षती सुमनें । करिती निंबलोण सर्व जग ॥६४॥ निरंजन म्हणे धन्य आजि दिन । पाहिलें निधान दत्तात्रय ॥६५॥


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


श्री दत्तमाहात्म्य - श्रीदत्तावतार



॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

असो आतां ऐक शिष्या । त्रिमूर्ती देववरा मानुनियां । अनसूयेच्या उदरीं येवोनियां । गर्भरूपें वाढती ॥

ज्यांच्या स्मरणें तुटे फांस । त्यासी कैंचा गर्भवास । अज असोनी दाविती खास । भक्ताधीनत्व या लोकीं ॥

अनसूये डोहाळे होती । उत्तम ज्ञान बोले ती । ऐसे नवमास लोटती । करी संस्कार अत्रिमुनी ॥

मार्गशीर्ष पौर्णिमेसी । बुधवारीं प्रदोषसमयासी । मृग नक्षत्रीं शुभ दिवशीं । अनसूयेसी पुत्र झाले ॥

तव अत्रिऋषी येऊन । पाहीन म्हणे पुत्रवदन । तों अकस्मात् त्रिमूर्ती पाहून । विस्मित-मन जाहला ॥

माला कमंडलु अध:करीं । डमरू त्रिशूल मध्यकरीं । शंखचक्र ऊर्ध्वंकरीं धरी । भक्तकैवारी त्रिमूर्त्यात्मक ॥

काषायवस्त्र परिधान । विभूतीचें लेपन । मस्तकीं जटामंडन । वात्सल्यरसायन धाम जें ॥

तें दिव्यरूप पाहून । करसंपुट जोडून । अनसूया अत्रि वंदून । करिती स्तवन सगद्गद ॥

जयजया परात्परा । अजा अव्यया निर्विकारा । जगत्कारणा जगदाधारा । सत्या असंगा उदासीना ॥

सावकाश ज्याच्या पोटीं । परिभ्रमती ब्रह्मांडकोटी । तो तूं व्यापक आमुचे पोटीं । येसी हे खोटी गोष्ट होय ॥

सृष्टीपूर्वीं तूं एक सत्य । स्थितिकालींही न होसी असत्य । प्रळयीं निर्बाधत्वें सत्य । त्वद्वचन असत्य होय कीं ॥

निज बिरुदावळी पाळिसी । वासनावन जाळिसी । भक्तजनां संभाळिसी । आळसी न होसी भक्तकाजीं ॥

स्वयें असोनी स्वतंत्र । भावाच्या भुकेनें होसी परतंत्र । कोण जाणे तुझा मंत्र । भ्रमविसी यंत्रबद्ध विश्व ॥

ह्या रूपा आमुचा नंदन । म्हणणें हें जगीं विडंबन । म्हणूनि तूं बाल होऊन । राहतां मन हर्षेल ॥

पुत्रभावेंकरून । तुझें करितां लालन पालन । जाईल आमुचें मायावरण । म्हणोनी चरण धरियेले ॥

मग बोले वनमाळी । तुम्हीं तप केलें कूलाचळीं । तीन स्वरूपीं त्या वेळीं । तुम्हां दर्शन दीधलें ॥

एकाचें करितां ध्यान । तुम्ही आलेंत कोण तीन । ऐसें तुम्हीं पुसतां दिलें वचन । आम्ही तीन एकरूप ॥

पुढें अतिथी होऊन । जसें मागितलें भिक्षादान । तसेंच देतां नग्न होऊन । अनसूयेपुढें तीन बाळ झालों ॥

आमच्या शक्त्या येऊन । आम्हां मागती प्रार्थना करून । तेव्हां हा पाळणा न व्हावा शून्य । म्हणोनि वरदान मागितलें ॥

तसाच वर देऊन । शक्तींसह केलें गमन । निजभक्त देवगण । त्यांहीं वरदान तुम्हां दिलें ॥

तें सर्व सत्य करावया । पूर्व वरा स्मरावया । लोकीं भक्तिख्याती व्हावया । प्रगट केलें ह्या दिव्यरूपा ॥

तुमचा भाव पाहोन । तुम्हां दिलें म्यां माझें दान । राहीन तुमच्या स्वाधीन । देतों वचन त्रिवार ॥

माझें दर्शन न हो निष्फळ । जें गती दे तत्काळ । असें म्हणोनि तीन बाळ । झाला घननीळ विश्वनाटकी ॥

मग अत्रि करी स्नान । करी जातकर्मविधान । मिळोनियां मुनिजन । जयजयकार करिती ॥

पुष्पें वर्षती सुरवर । वारा चाले मनोहर । जगीं आनंद होय थोर । परात्पर अवतरतां ॥

वांझ वृक्ष झाले सफळ । वंध्येपोटीं आलें बाळ । पळोनि गेला दुष्काळ । अवतरतां मूळपुरुष हा ॥

अनसूया धन्य पतिव्रता । विधिहरिहरांची झाली माता । जिचें स्तनपान करितां । ये तृप्तता त्रिमूर्तीला ॥

बारावे दिनीं अत्रिमुनीं । नामकर्म करोनी । अन्वर्थक नामें तिन्ही । तयांचीं ठेविलीं प्रेमानें ॥

ज्यानें केलें स्वात्मदान । त्याचें दत्त हें अभिधान । सर्वां देई आल्हादन । म्हणोनि चंद्राभिधान ब्रह्मांशा ॥

दुर्वासा नाम रुद्रांशा दे । मग अनसूया आनंदें । पाळणा बांधूनी स्वच्छंदें । बाळा निजवूनी गातसे ॥


( पाळणा

॥ जो जो जो जो रे परात्परा ॥ भजकांच्या माहेरा ॥ध्रु.॥

सह्याद्रीवरि जो अत्रिसुत । अनसूया जठरांत ।

प्रगटुनि विख्यात । हो दत्त ॥

तारिल जो निजभक्त ।जय जगदुद्धारा, उदारा ॥ भजकांच्या माहेरा ॥ जो जो जो जो रे ॥

प्रर्‍हादा देशी विज्ञान । येतां अर्जुन शरण । सिद्धी देऊन उद्धरून । स्वपदीं देशी स्थान ॥

अलर्क यदुतारा, योगिवरा । भजकांच्या माहेरा ॥ जो जो जो जो रे ॥


( पाळणा २ )

 जो जो रे जो जो जयविश्वात्मन् ।

परावर भूमन् । जयजय जय भगवन् ॥ध्रु.॥

चारभूत खाणी । पाळणा बांधोनी । चोवीस तत्वें घेवोनी । दृढतर ओंवोनी ॥

गुणसूत्रें माया । स्तंभीं बांधुनीयां । कर्मदोरी धरूनी । झोंके घेसी वायां ॥

चाळाचाळी टाकूनी । श्रुतिगीत ऐकूनी । घे झोंप उन्मनी । स्वानुभवें करूनी ॥

( पाळणा संपूर्ण ) ॥ 

जो सृष्टिस्थिति संहार करितीं । तयास पाळण्यांत निजवी सती । स्वकरें पुन: पुन: झोंके देती । काय गती भक्तीची हो ॥


॥ श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु

श्री दत्तमाहात्म्य - अध्याय ३


Dec 8, 2020

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र - ( श्लोक ७१ ते ८० )


|| श्री गणेशाय नमः ||

दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू. जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.

महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.

|| श्री गुरुदेव दत्त ||


नृसिंहवाटिकास्थो यः प्रददौ शाकभुङ्-निधिम् ।

दरिद्रब्राह्मणायासौ श्रीदत्तः शरणं मम ॥७१॥

भावार्थ : ज्या दत्तप्रभूंनी नृसिंहवाडीत वास्तव्य केले, ज्यांनी एका विप्राघरीं घेवड्याच्या शेंगांच्या भाजीची भिक्षा घेऊन त्या दरिद्री ब्राह्मणास द्रव्यनिधीचा खजिना प्रसाद म्हणून दिला, असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.


भक्ताय त्रिस्थलीयात्रां दर्शयामास यः क्षणात् ।

चकार वरदं क्षेत्रं स श्रीदत्तः शरणं मम ॥७२॥

भावार्थ : ज्या दत्तगुरूंनी आपल्या भक्ताला एका क्षणात काशी-प्रयाग-गया ह्या त्रिस्थळीं यात्रेचे दर्शन घडविले, तसेच कृष्णा-पंचगंगा संगम स्थानास वरद क्षेत्र (श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे, प्रत्यक्ष दत्तप्रभूंची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेले दत्तक्षेत्र आहे) केले, असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.

Dec 4, 2020

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय ६


अप्पलराज - सुमती महाराणी यांचा पूर्वजन्म वृत्तांत, श्रीपादांचा जन्म व बाललीला आणि नरसावधानींची कथा  

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

श्री शंकरभट्टांनी रात्री तिरुमलदासच्याच घरी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळीच ते स्नान-संध्या करून ध्यानाला बसले. तिरुमलदासही तिथेच श्रीपादस्वामींचा जप करत होते. जप पूर्ण झाल्यावर तिरुमलदास प्रसन्नतेने शंकरभट्टांस म्हणाले, " शंकरा, या चराचर सृष्टीचे मूलाधार व चालक श्रीपाद श्रीवल्लभच आहेत. या विश्वातील सकल शक्तीचे स्रोत केवळ दत्तप्रभूच आहेत. सर्व शक्ती त्यांच्यापासूनच उत्पन्न होऊन परत त्यांच्यातच विलीन होत असतात. तेच देव, दानव, ऋषी, मुनी, आणि सर्व प्राणिमात्रांचा आधार आहेत. प्रत्येक प्राणिमात्राचे स्वतःचे असे एक कांतीवलय असते. मी पूर्वी पीठिकापुरांत राहत असताना तेथे एक योगी आला. त्याचा या विग्रहाच्या कांतीवलयाचा विशेष अभ्यास होता. तो कोणत्या व्यक्तीत परमात्म्याचा अंश किती प्रभावी आहे म्हणजेच त्या व्यक्तीचे अथवा जागृत देवालयाचे तेजोवलय कुठल्या रंगाचे असून त्या आभेची व्याप्ती कुठवर आहे हे सांगू शकत असे. पीठिकापुरांत येताच त्याने श्री कुक्कुटेश्वर मंदिरातील स्वयंभू दत्त मूर्तीच्या सूक्ष्मकांतीचे परिक्षण करण्याचे ठरविले. त्यासाठी तो गाभाऱ्यात येऊन श्री दत्तांच्या मूर्तीसमोर उभा राहिला, मात्र दत्तप्रभूंच्या स्थानी त्याला श्रीवल्लभांचे दर्शन झाले. श्रीपाद स्वामींच्या मस्तकाभोवती असलेल्या प्रखर, दिव्य अशा धवल तेजोवलयाने त्या योग्याचे डोळे दिपून गेले. कोटी विद्युल्लतेसमान तेजस्वी अशा त्या शुभ्र कांतीवलयाचा बाह्य भाग अजून एका अतिशय विशाल आणि अथांग अशा निळया रंगाच्या दिव्य कांतीवलयानें व्यापलेला होता. श्री दत्तप्रभू गंभीर आणि स्थिर स्वरांत त्या योग्यास म्हणाले, " वत्सा, इतरांच्या सूक्ष्मकांती शोधण्याच्या या प्रयत्नांत तू तुझे हे अमूल्य जीवन व्यर्थ घालवू नकोस. प्रथम स्वतःचे हित साधून घे. तुझे आयुष्य थोडकेच उरले आहे, तेव्हा तुला परलोकीं सद्-गती कशी मिळेल याचा तू विचार कर. मीच भक्तजनांच्या कल्याणासाठी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपांत अवतार घेतला आहे." प्रभूंचे ते उपदेशामृत ऐकता क्षणींच त्या योग्याची वृत्ती पालटली. त्याच्या पूर्व वासनांचा नाश झाला. त्यायोगें त्याच्या सर्व सिद्धी दत्तप्रभूंमध्ये विलीन झाल्या आणि त्याचे चित्त श्रीपादचरणीं लीन झाले. श्रीवल्लभांचे त्यांच्याच स्वगृहात दर्शन घेऊन तो धन्य झाला. शंकरा, श्रीपादांच्या सभोवती असलेले शुभ्र-धवल वलय प्रभू निर्मळ असून ते संपूर्ण योगावतार असल्याचे द्योतक आहे. बाह्यभागांतील निळ्या रंगाचे तेजोवलय श्रीपादांच्या प्रेम, करुणा आणि भक्तवात्सल्यतेचे प्रतीक आहे. अंतर्बाह्य बदललेल्या त्या योग्याने नंतर पीठिकापुरांतील विद्वान पंडिताबरोबर अभ्यासपूर्ण, सखोल चर्चा केली आणि आपल्या शंका निरसन करण्याचा प्रयत्न केला. काही बाबतींत मात्र त्या पंडितांचे मतैक्य होत नव्हते."

सत्यऋषिश्वर या नावाचे मल्लादि बापन्नावधानी हे पीठिकापूर ब्राह्मण सभेचे मुख्य होते. ग्रामस्थ त्यांना आदराने बापन्ना आर्य असे म्हणत असत. ते सूर्य आणि अग्निचे उपासक होते. एकदा पीठिकापुरांत यज्ञाचे आयोजन केले होते. त्या यज्ञाचे अधिपत्य श्री सत्यऋषिश्वर यांनी केले होते. यज्ञाची सांगता होत असतानांच वर्षावृष्टी झाली होती, त्यांमुळे गांवकरी समाधानी होते. श्री वत्सवाई नरसिंह वर्मा नावाचे एक सज्जन, क्षत्रिय गृहस्थ पीठिकापुरांतील प्रतिष्ठित ग्रामस्थ होते. त्यांनी श्री सत्यऋषिश्वरांना आपण इथेच पीठिकापुरांत कायमचे वास्तव्य करावे, अशी विनंती केली. परंतु, श्रीबापन्ना आर्य केवळ यज्ञयागादि कार्यांत मिळालेली दक्षिणा अथवा शिधा स्वीकारत असत. इतर कुठल्याही प्रकारची दक्षिणा ते द्रव्यशुद्धीच्या कारणास्तव स्वीकारत नसत. त्यांमुळे त्यांनी श्री वर्मांच्या विनंतीस नम्रपणें नकार दिला. त्याच सुमारास, श्री वर्मांची गायत्री नावाची, एक दूध-दुभती गाय हरवली. श्री बापन्ना आर्य ज्योतिषशास्त्रांत पारंगत असल्यामुळें श्री वर्मांनी गायत्रीच्या शोध घेण्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला. श्री बापन्ना आर्यांनी कुंडली मांडून हरवलेली गाय श्यामलांबापूर (सामर्लकोटा) गांवात खानसाहेब नावाच्या एका कसायाकडे असल्याचे सांगितले. तसेच, तो कसाई लवकरच तिची हत्या करेल, असेही भविष्य त्यांनी वर्तविले. वर्मांनी तात्काळ आपला एक मनुष्य गायीच्या शोधार्थ शामलांबापुरास पाठविण्याची तयारी केली. मात्र त्यांनी बापन्ना आर्यांना एक अट घातली. बापन्ना आर्यांच्या भाकितानुसार जर गायत्री गोमाता मिळाली तर, वर्मांनी दिलेली दक्षिणा बापन्ना आर्यांना स्वीकारावी लागेल. त्यांनी ती दक्षिणा स्वीकारण्यास नकार दिला तर वर्मा त्यांचा ज्योतिषविषयक संकेत मानणार नाही आणि गायीच्या शोधार्थ कुणालाही शामलांबापुरास पाठवणार नाहीत. श्री वर्मांचे ते बोल ऐकून बापन्ना आर्य धर्मसंकटात सापडले. दक्षिणा स्वीकारली तर आजपर्यंतच्या तत्त्वांशी तडजोड होईल, मात्र जर दक्षिणा मान्य केली नाही तर शामलांबापुरात गोहत्या होईल आणि ते पातक त्यांना लागेल. गोहत्या पातकापेक्षा पंडित बहुमानाचा स्वीकार करणेच केव्हाही श्रेयस्कर, असा विचार करून बापन्ना आर्यांनी श्री वर्मांकडून दक्षिणा घेण्याचे मान्य केले. वर्मांची गायत्री नामक कपिला सुखरूप घरीं परतली. त्या आनंदात, त्यांनी तीन एकर सुपीक भूमी आणि निवासास योग्य असे घर बापन्ना आर्यांना त्यांच्या पांडित्याचा बहुमान म्हणून दक्षिणा दिली.

अशा रितीने, पीठिकापुरवासियांचे पूर्वसुकृत, पूर्व-पुण्याई फळास आली. श्री बापन्नावधानी पीठिकापुरांत कायमचे राहवयास आले. लवकरच श्री बापन्ना आर्यांना वेंकटावधानी नावाचा मुलगा झाला. काही काळाने त्यांना कन्याप्राप्तीही झाली. राजयोगावर जन्मलेल्या त्या कन्येच्या जन्मपत्रिकेत सर्वच ग्रह शुभस्थानीं होते. श्री बापन्ना आर्यांनी तिचे सुमती महाराणी असे नामकरण केले. अल्पावधीतच श्रीबापन्ना आर्यांच्या विद्वता, कर्तव्यनिष्ठा आणि धर्मपारायणतेची कीर्ती दिगंत पसरली.

काही काळानंतर, अप्पललक्ष्मी नरसिंहराज शर्मा नावाचा भारद्वाज गोत्रीय आणि अपस्तंभ, वैदिकशाखेचा एक बालक पीठिकापुरांत आला. घंडिकोटा असे आडनाव असलेल्या त्या मुलाचे मातृ–पितृ छत्र हरपले होते. त्याच्याजवळ वंशपरंपरेनें आलेली श्री कालाग्निशमन दत्तांची अतिशय जागृत अशी मूर्ती होती.पूजाअर्चा करते वेळी ती दत्तमूर्ती बोलत असे, आदेशही देत असे. अशीच एकदा पूजा करतांना श्री दत्तप्रभूंनी नरसिंहराजास '' तू पीठिकापुरांत जाऊन मल्लादि बापन्नावधानी या वेदज्ञानी विप्राकडे विद्याभ्यास करावा.'' असा आदेश दिला होता. त्या आदेशाचे पालन करीत राजशर्मा श्री बापन्ना आर्यांकडे वेदाध्यपन करण्यासाठी विद्यार्थी म्हणून आला होता. तो पोरका असल्याचे समजताच, श्री बापन्ना आर्यांनी त्याला माधुकरी मागू न देता आपल्याच घरात त्याच्या भोजनाची व्यवस्था केली.

श्री बापन्ना आर्य आणि त्यांच्या घरातील सर्व सदस्य शनिप्रदोषाचे व्रत अत्यंत श्रद्धेनें करत असत. पूर्वी हे प्रभावी व्रत नंद-यशोदेने केले होते. त्या शनिप्रदोष काळी केलेल्या शिवाराधनेची फलप्राप्ती म्हणून त्यांना साक्षात श्रीकृष्णाचे पालन करण्याचे सौभाग्य लाभले. श्री नरसिंह वर्मा, श्री वेंकटप्पैय्या श्रेष्ठी तसेच पीठिकापुरांतील काही प्रतिष्ठित लोकही श्री बापन्ना आर्यांच्या पौरोहित्याखाली हे व्रत करीत असत. अशाच एका शनिप्रदोषीं सर्वजण श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरातील शिवलिंगाचे शास्त्रोक्त पूजन करत असतांना त्या शिवलिंगातून एक दिव्य प्रकाश येऊ लागला. आश्चर्यचकित होऊन सर्वांनी महादेवाला नमन केले, त्याचवेळी शिवलिंगातून वाणी झाली, " हे बापनार्या, तुझी मुलगी सुमती महाराणी आणि अप्पलराजु शर्मा यांचा तू विवाह लावून दे, ही दत्तप्रभूंची आज्ञा आहे. त्यामुळे लोककल्याण होईल. ह्या महानिर्णयाचे उल्लंघन करू नकोस." हा भगवान शंकरांचा आदेश वेंकटप्पया श्रेष्ठी, नरसिंह वर्मा आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्व जनसमुदायानें ऐकला. ही दैवी लीला पाहून सर्वजण दिग्मूढ झाले, त्यांनी त्वरित विवाहाची तयारी सुरु केली.

श्री बापन्ना आर्यांनी आइनविल्ली ह्या गावातील राजवर्माचे काही जवळचे नातलग आणि मित्रमंडळी यांना विवाहाचे वर्तमान कळविले. विवाहाचा निर्णय झाला खरा, मात्र राजशर्माला घरदार नव्हते. त्यांवर उपाय म्हणून श्री वेंकटप्पा श्रेष्ठी यांनी त्यांच्या मालकीच्या अनेक घरांपैकी एखादे घर राजशर्मास देण्याचे ठरविले. मात्र राजशर्मा हे दान स्वीकारायला तयार झाले नाहीत. अखेर, ग्रामांतील प्रमुख ज्येष्ठ मंडळींबरोबर चर्चा करून, श्री श्रेष्ठींनी राजशर्मांच्या वडिलोपार्जित गृहाच्या अत्यल्प मोबदल्यांत आपले एक सदन राजशर्माला विकले. त्यानंतर लवकरच महापंडितांच्या उपस्थितीत श्री सुमती महाराणी आणि श्री अप्पल लक्ष्मी नरसिंह शर्मा यांचा शुभ विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. सुमती महाराणी आणि राजशर्मा यांचा जोडा अनुरूप होताच, आणि त्यात प्रभू दत्तात्रेयांचा आशीर्वाद म्हणजे दुग्ध-शर्करा योगच जुळून आला होता. यथावकाश त्या दाम्पत्यांस दोन पुत्र झाले. दुर्दैवाने, एक बालक जन्मांध तर दुसरें शिशु अपंग जन्माला आले होते. त्यामुळें, सुमति आणि राजशर्मा अत्यंत दु:खी होते. त्यांची ती कष्टी अवस्था पाहून, अप्पलराजु शर्माचे आइनविल्लि येथील नातलग आपल्या गांवातील प्रसिद्ध विघ्नेश्वराचा महाप्रसाद या पती-पत्नीसाठी घेऊन आले. सुमती आणि राजशर्मानी अत्यंत भक्तिभावाने विघ्नेश्वराची प्रार्थना केली व श्रद्धापूर्वक तो प्रसाद ग्रहण केला. त्या दिवशीच रात्रीं सुमती महाराणीला स्वप्नात ऐरावताचे दर्शन झाले आणि नंतरही काही दिवस तिला अतिशय शुभसूचक स्वप्नं, सिद्धांचे दिव्य दर्शन आणि ईश्वरी संकेत आदि शुभशकुन होऊ लागले. एके दिवशी तिने आपल्या पित्यास आणि मामा श्रीधर पंडित यांस आपणांस येत असलेल्या दिव्य अनुभवाबद्दल सविस्तर सांगितले. श्री बापन्ना आर्य आणि श्रीधर पंडित दोघेही प्रज्ञावंत तर होतेच शिवाय ज्योतिषशास्त्राचे त्यांना विशेष ज्ञान, प्राविण्यही होते. त्यांनी सुमतीला ही सर्व लक्षणें अत्यंत शुभसूचक असून लवकरच तुझ्या पोटी एखाद्या महापुरुषाचा जन्म अथवा ईश्वर अवतार होईल यांचेच द्योतक आहेत, असे सांगितले. आपल्या पित्याचे आणि मामाचे ते भाकित ऐकून सुमती महाराणीला आनंद झाला.

तिने ही सर्व हकीकत आपल्या पतीस सांगितली. ते ऐकून राजशर्मा उल्हासित होत म्हणाले, " सुमती, मी उद्या श्री कालाग्नीशमन दत्त महाराजांची पूजा केल्यावर तुला येणाऱ्या दिव्य अनुभवांबद्दल प्रभूंना विचारतो. आजपर्यंत मी कधीही त्यांना सामान्य विषय किंवा स्वार्थभरित समस्या निवेदन केली नाही. आपल्यास ते निश्चितच मार्ग दाखवतील. " दुसऱ्या दिवशी राजशर्मांनी नेहेमीप्रमाणेच एकांतात दत्तप्रभूंची विधीवत पूजा केली. श्री दत्तमहाराज प्रसन्न होऊन मानवी रूपात राजशर्मांसमोर बसले. त्रिकालदर्शी आणि अंतर्ज्ञानी श्री दत्तात्रेयांनी राजशर्माच्या मनांतील भाव ओळखले आणि ते वात्सल्यपूर्ण स्वरांत बोलू लागले, " वत्सा, माझ्या लीला केवळ या पृथ्वीतलावरच सीमित नाहीत. या अखिल ब्रह्मांडाचा मी स्वामी आहे. मी जन्म मृत्यूच्याही अतीत आहे. या सृष्टीतील प्रत्येक घटना, उत्पत्ती-स्थिती-लय यांचा मीच कर्ता आहे. " असे म्हणत दत्तप्रभूंनी राजशर्माच्या भूमध्यांत स्पर्श केला. तात्काळ, राजशर्माची पूर्वजन्म स्मृती जागृत झाली. पूर्वजन्मी तो विष्णुदत्त नामक दत्तभक्त विप्र असून सुमती हीच त्याची त्या जन्मांतील सोमदेवम्मा नामक पत्नी होती. त्या जन्मांत त्याला दत्तमहाराजांचे प्रत्यक्ष दर्शन झाले होते. प्रभूंनी त्यावेळी त्याची काय इच्छा आहे ? असे विचारले असता विष्णुदत्ताने महाराजांना पितृश्राद्धाच्या दिवशी भोजनास येण्याची प्रार्थना केली होती. तदनुसार, दत्तप्रभूंनी सूर्य आणि अग्निदेवांबरोबर त्याच्या घरीं श्राद्धान्न ग्रहण केले होते आणि त्याच्या सर्व पितृदेवतांना शाश्वत ब्रह्मलोकांची प्राप्ति करून दिली होती. आपला पूर्वजन्म आठवून राजशर्माचे अष्टभाव जागृत झाले आणि दत्तप्रभूंच्या चरणीं आपले मस्तक ठेऊन तो त्यांना अनन्यभावानें शरण गेला. त्यास प्रेमाने उठवून दत्तमहाराज म्हणाले, " बाळा, लवकरच या पृथ्वीतलावर माझा अंशावतार होणार आहे. पूर्वी त्रेतायुगात महर्षि भारद्वाज यांनी पीठिकापुरांत सवितृकाठक चयन (यज्ञ) केला होता. त्या अतिपवित्र यज्ञातील भस्म कालांतराने द्रोणगिरी पर्वतावर शिंपडले गेले. संजीवनी औषधीसाठी मारूती द्रोणगिरी पर्वत लंकेस घेऊन जात असताना, त्या पर्वताचा एक छोटा भाग गंधर्वपुरात (गाणगापुर) पडला. माझ्या ह्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतार समाप्तीनंतर, भक्तोद्धारासाठी मी पुन्हा नृसिंहसरस्वती नामक अवतार घेऊन गंधर्वनगरात अनेक लीला करीन. त्यानंतर, श्री शैल्यातील कर्दळीवनात ३०० वर्षे तपोसमाधीत राहीन. पुन्हा एकदा माझ्या भक्तांच्या कल्याणासाठी श्री स्वामी समर्थ ह्या नांवाने प्रज्ञापुरात निवास करीन." इतके बोलून मानवी रूपातील दत्तप्रभू श्री कालाग्नीशमन दत्त मूर्तीत विलीन झाले.

दत्तप्रभूंनी दिलेली ही सर्व अनुभूती राजशर्माने आपले गुरुदेव म्हणजेच सत्यऋषिश्वर बापनार्य यांना आणि आपल्या धर्मपत्नीस सांगितली. त्यावर अतिशय तुष्ट चित्ताने श्री बापन्ना आर्य म्हणाले, " राजशर्मा, पूर्वजन्मांत साक्षात श्री दत्तप्रभूंना, तसेच सूर्यदेव आणि अग्निदेव यांना श्राद्ध-भोजन दिलेला तू पुण्यात्मा आहेस. ह्या जन्मातदेखील दत्तमहाराज तुझ्या घरीं भोजनासाठी येतील. सुमती, तो दिवस कुठलाही अगदी पितृश्राद्धाचा जरी असला तरी कसलाही किंतु मनीं न आणतां, ब्राह्मण जेवायच्या आधीच श्री दत्तप्रभूंनी भोजन मागितले, तर तू जरूर वाढावे. ही गोष्ट तू कायम ध्यानांत ठेव."

पुढे, महालय अमावस्येच्या दिवशी राजशर्माच्या घरी पितृश्राद्ध होते. सर्व स्वयंपाक तयार होता आणि भोजनासाठी आमंत्रण दिलेल्या ब्राह्मणांची राजशर्मा वाट पाहत होते. साधारण माध्यान्हीं, सुमती महाराणीने ''भवति भिक्षांदेही'' असा धीरगंभीर आवाज ऐकला. तिने लगेच श्राद्धभोजनासाठी तयार केलेले अन्न एका पानांत वाढून घेतले आणि ते घेऊन भिक्षा वाढण्यासाठी घराबाहेर आली. दारांत उभ्या असलेल्या तेजस्वी अवधूताला तिने प्रेमाने भिक्षा वाढली. प्रसन्न झालेला तो अवधूत सुमतीस " आई, काहीतरी माग. तुझी काय इच्छा आहे ? ते मला सांग. " असे म्हणाला. त्यावर सुमती विनयशीलतेने म्हणाली, "आपण अवधूत आहात. आपले वाक्य सिद्धवाक्य आहे. श्री दत्तप्रभू लवकरच या भूमीवर अवतार घेणार आहेत, असे अनेक विद्वान लोक, योगी, तपस्वी विधान करत असतात. मला प्रभूंचे ते रूप पाहण्याची तीव्र अभिलाषा आहे." सुमतीचे ते मागणें ऐकून तो अवधूत प्रचंड कडकडाटी हास्य करत अदृश्य झाला अन सुमती महाराणीसमोर १६ वर्षे वय असलेल्या एका सुंदर, तेजस्वी आणि प्रेमळ बालक यतीच्या रूपात प्रगट झाला. तिच्याकडे अपार वात्सल्यतेनें पाहत तो बालयती बोलू लागला, " आई ! मीच श्रीदत्तप्रभूंचा अंशावतार श्रीपाद श्रीवल्लभ आहे. आज तू मला भोजन देऊन तृप्त केलेस, तू जे वरदान मागशील ते द्यावे, अशी माझी इच्छा आहे. तू आणि तुझा पती धर्मपरायण असून तुम्ही विशेष असे निष्काम कर्माचे आचरण केले आहे. असे अकर्म पूर्णतः ईश्वराधीन असते, यास्तव तुम्हां दंपतीस काही तरी प्रतिफळ दिलेच पाहिजे. माते, तुझ्या मनींची काही इच्छा असेल तर तू मला सांग. माझ्या संकल्पमात्रें ती जरूर पूर्ण होईल."

दत्तप्रभूंचे ते दिव्य रूप पाहून सुमती महाराणीचे भान हरपले. तिने अत्यंत भक्तिभावाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार केला. श्रीवल्लभांनी सुमती महाराणीच्या मस्तकावर हात ठेवून तिला उठविले आणि कृपाळू स्वरांत म्हणाले " माते, मुलाच्या असे पाया पडणे हे अयोग्य आहे. याने मुलाचे आयुष्य क्षीण होते." तेंव्हा सुमती प्रार्थना करत म्हणाली, " प्रभू, आपण मला आज आई म्हणून हाक मारली. आपले हे बोल खरें करावेत. मला तुमच्यासारखा तेजस्वी, तिन्ही लोकांत वंदनीय असा पुत्र व्हावा." यावर श्रीदत्त प्रभूंनी ''तथास्तु'' असा आशिर्वाद दिला आणि म्हणले, " मी स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने तुझा पुत्र म्हणून जन्म घेईन. मात्र तू मला विवाह बंधनासाठी आग्रह करू नये, तसेच मला यति होऊन स्वेच्छेने विहार करण्याची परवानगी द्यावी. आई आपल्या पुत्राच्या पाया पडल्यास मुलाचे आयुष्य क्षीण होते. धर्मकर्माच्या ह्या सूत्रांचे मला पालन करणे आवश्यक आहे, म्हणून मी पुत्र रूपाने केवळ १६ वर्षापर्यंतच तुझ्याजवळ राहीन." असा वर देऊन दत्तप्रभू त्वरित अदृश्य झाले.

सुमती महाराणी दिग्मूढ झाली होती. आपल्याला खरोखरच प्रभू दत्तात्रेयांचे दर्शन झाले की हा केवळ भास अथवा स्वप्न होते, हे काहीच तिला समजेना. अखेर घरांत जाऊन तिने घडलेला सर्व वृतांत आपल्या पतीस सांगितला. तो ऐकून अप्पलराजूंना अत्यंत संतोष झाला आणि ते म्हणाले, " सुमती, प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंनी आपल्या घरीं आज श्राद्धान्न ग्रहण केले. आज आपल्या साऱ्या पितरांस मोक्षप्राप्ती झाली. श्रीदत्त महाराज या प्रकारे आपल्या घरी भिक्षेस येतील असे भविष्य तुझ्या वडीलांनी पूर्वीच वर्तविले होते. आज आपण धान्य झालो. आता तू फार विचार करू नकोस. दत्तप्रभू करुणेचा महासागर आहेत. तेच सर्व बघून घेतील." अशा रितीने त्या भाग्यशाली पती-पत्नीस पुन्हा एकदा दत्तमहाराजांनी कृपाप्रसाद दिला. त्या भक्तवत्सल, भक्ताभिमानी दत्तमहाराजांच्या लीलांचा कोणास ठाव लागणार बरें !

अप्पल राजुच्या घरी प्रत्यक्ष अवधूत भिक्षा करून गेले, ही वार्ता सगळया पीठिकापुरांत पसरली. पितृदेवांची अत्यंत मुख्य तिथी असलेल्या महालय अमावस्येच्या दिवशी, ब्राह्मण जेवायच्या आधी सुमती महाराणीने अवधूतास भिक्षा कशी दिली ? ह्यावरून ब्राह्मणवर्गांत विशेष चर्चा झाली. नरसावधानी नावाच्या एका ब्राह्मणानें पीठिकापुरातील सर्व ब्राह्मणांना अप्पलराजुच्या घरी श्राद्ध-भोजनासाठी न जाण्याचे सुचविले. तसेही, पितरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या दिनी सर्वच ब्राह्मण आपापल्या घरीं पितृकार्यामध्येच व्यस्त होते. त्यामुळे, श्राद्ध-भोजनासाठी फारच थोडें ब्राह्मण येऊ शकत होते. त्यांनीही भोजनास येण्यास नकार दिल्यामुळे अप्पलराजु थोडे चिंतीत झाले. मात्र श्री बापन्नार्य आपल्या घरी निर्विघ्नपणे कार्य पार पडेल, याविषयी निःशंक होते. श्री राजशर्मांनी मनोमन श्री कालाग्नीशमन दत्तांची प्रार्थना केली. आणि काय आश्चर्य, माध्यान्हीच्या वेळीं तीन विप्र अतिथी म्हणून आले, आणि पितृकार्य यथाविधी पार पडले.

काही दिवसांतच अवधूताच्या आशीर्वचनाची प्रचिती आली. सुमती महाराणीला आगळे वेगळे डोहाळे लागले. ती सतत श्रीदत्तात्रेयांची स्तोत्रे, भक्तिगीते मधुरस्वरांत गात असे. सदैव दत्तमहाराजांच्या चिंतनात मग्न असे. 'दत्त दत्त ऐसे लागलें ध्यान, हरपले मन झाले उन्मन ' अशीच तिची भावावस्था झाली होती. यथावकाश दहाव्या मासी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीस (गणेश चतुर्थीस) सुमती महाराणीने एका अति सुंदर, दैदिप्यमान शिशुस जन्म दिला. विशेष म्हणजे, श्रीपादप्रभू मातेच्या गर्भातून साधारण बालकाप्रमाणे जन्मास न येता ज्योति स्वरूपाने अवतरले होते. त्यावेळीं महाराणी सुमती मर्च्छित झाल्या. प्रसुतीगृहातून मंगल वाद्यांचा ध्वनी येऊ लागला. श्रीपादांच्या दर्शनासाठी चार वेद, अठरा पुराणे आणि महापुरुष ज्योति रूपाने प्रगट झाले व पवित्र वेदमंत्रांचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला. थोडया वेळाने सर्वत्र शांतता पसरली. श्रीपादांच्या जन्मानंतर, सतत नऊ दिवस एक तीन फण्यांचा नाग आपला फणा उभारून निजलेल्या बाळावर छाया करीत असे. अशा अनेक अद्भूत, अगम्य घटना पाहून सर्वचजण आश्चर्यचकित होत होते .

काही दिवसांनंतर, एकदा ब्राह्मण सभेत वैश्यांना वेदोक्त्त उपनयन करण्याचा अधिकार आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला गेला. त्या वेळी त्या सभेत अनेक वेदपारंगत, तीर्थयात्रा करत असलेले प्रज्ञावंत, दशग्रंथी असे अनेक ब्राह्मण हजर होते. श्री बापन्नाचार्यांनी ' नियमनिष्ठेमध्ये ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य समानच असतात. ' असा निर्णय दिला. त्यांचा हा निर्णय नरसावधानीने मान्य केला नाही. आधीच महालयाच्या दिवशी राज शर्मांच्या घरी घडलेल्या घटनेने काही ब्रह्मवृंद नाराज होता. आता, त्या सर्वांनी येनकेन प्रकारेण बापन्नार्य आणि त्यांच्या परिवाराचा सतत अपमान करण्याचे , त्यांना त्रास देण्याचे ठरविले. बापन्नार्य यांनी तांत्रिक प्रयोगाने नरसावधानींची बगलामुखी साधना विफल केली, असा कुप्रचार करण्यास त्यांनी सुरवात केली. मनुष्य कदापिही पूर्णब्रह्माचा अवतार होऊ शकत नाही, तर श्रीपाद श्रीवल्लभ हे तर एक तान्हें बाळ आहेत. मग ते सर्वांतर्यामी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान अशा श्रीदत्त प्रभूंचे अवतार कसा होऊ शकतील ? असे बोलून नरसावधानी लोकांची मने कलुषित करण्याचा सतत प्रयत्न करू लागले. तथापि जर काही सुज्ञ जनांनी जर श्रीपाद प्रभूंनी अगदी लहान असताना केलेला प्रणवोच्चार, पाळण्यात असताना केलेला शास्त्र प्रसंग आणि श्रीपादांचे सकल शास्त्र- वेदांचे ज्ञान यांविषयी विचारले असता, नरसावधानी त्यावर ' एखादा प्रज्ञावंत ब्राह्मणाचे भूत श्रीपादाच्या शरीरात प्रवेश करून बोलत असावे.' असे त्या लोकांना सांगायचा. श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरात असलेले स्वयंभू दत्तात्रेय हेच खरें प्रभू आहेत. या बालकास दत्तस्वरूप मानणे सर्वथा चुकीचे आहे, असे तो वारंवार पीठिकापुरवासियांना सांगायचा.

श्रीपाद ८-१० महिन्यांचे झाल्यावर त्यांचे आजोबा श्री बापन्नार्य त्यांना आपल्या बरोबर ब्राह्मण सभेत नेऊ लागले. त्या लहान वयांतही त्यांच्या लीला पाहून सर्वजण अचंबित होत असत. श्रीपादांच्या बालपणांच्या त्या रम्य आठवणींत रमलेलें तिरुमलदास शंकरभट्टांस स्वतःचाच अनुभव सांगू लागले. - मी मलयाद्रीपुराहून पीठिकापुरास आल्यावर श्रीबापन्नार्य आणि राजशर्मा यांच्या घरी रजक म्हणून काम करीत होतो. मलयाद्रीपूर येथे असल्यापासूनच मी श्रीबापन्नार्य यांना ओळखत होतो. त्यांचे विद्वत्तापूर्ण भाषण ऐकून आणि धर्मनिष्ठ आचरण पाहून मलाही अध्यात्माची ओढ वाटू लागली होती. पुढे, नरसावधानीच्या घरचा जो रजक होता तो वृध्दावस्थेने मरण पावला, त्यांमुळे त्यांच्या घरचेही रजकाचे काम मला मिळाले. मात्र बापन्नाचार्यांसारख्या सज्जन गृहस्थाचा द्वेष करणाऱ्या आणि अत्यंत अहंकारी अशा नरसावधानीचे कपडे मी स्वत: न धुता माझा मुलगा रविदास ते धूत असे. हे नरसावधानीस कळल्यावर त्याने मला बोलावून, त्यांचे कपडे मी स्वत: धूवावे अशी आज्ञा केली. ती आज्ञा मानून मी नरसावधानीचे कपडे स्वत: धुऊ लागलो. त्याचे कपडे धूत असताना मी सतत श्रीपादांचे नामस्मरण करीत असे. एके दिवशी, मी धुतलेले कपडे घेऊन रविदास नरसावधानींकडे गेला. मी धुतलेले कपडे जेंव्हा त्याच्या कुटुंबीयांनी घातले, तेंव्हा कोणालाच काही झाले नाही. परंतु, नरसावधानींनी ज्या वेळी ते कपडे घातले, तेंव्हा त्यांच्या शरीरास अग्निदाह होऊ लागला, तर कधी त्यांना त्यांच्या अंगावर विंचू, गोम सरपटत आहेत, असा भास होऊ लागला. मी काही मांत्रिक प्रयोग त्यांच्या कपडयावर केला आहे, अशी त्यांनी माझी गांवातील प्रमुखांकडे तक्रार केली. मात्र, त्या निवाड्यांत सर्वांनी मला निर्दोष असे घोषित केले. मी त्या करुणासागर दत्तप्रभूंचे मनोमन आभार मानले आणि घरी आलो. काही वेळांतच श्रीपाद प्रभू एका सोळा वर्षाच्या युवकाच्या रूपात आमच्या घरी आले. श्रीपादप्रभू अगदी बालक असतांनादेखील अशा काही अगम्य लीला करत असत. अचंबित होऊन मी त्यांना नमस्कार केला आणि " प्रभू, आपण ब्राह्मण कुलामध्ये जन्मलेले आहात, तेंव्हा आमच्यासारख्या शूद्रांच्या वस्तीत येणे योग्य नाही." अशी विनवणी केली. त्यांवर मंद स्मित करत श्रीपाद म्हणले, " मी कायम माझ्या भक्तांच्या अधीन असतो. माझा भक्त कुठल्याही वर्णाचा, धर्माचा असला तरी त्यांचा मी उद्धार करणारच, असे माझे ब्रीद आहे." त्यांच्या कृपेची प्रचिती मला आलीच होती आणि त्यांचे ते अमृतमय बोल ऐकून मी अनन्य शरणागत होऊन त्यांना साष्टांग नमस्कार केला. श्रीप्रभूंनी आपल्या दिव्य हाताचा स्पर्श करून मला उठवले आणि आपला उजवा हात माझ्या शिरावर ठेवला. त्याच क्षणी मला माझ्या सर्व पूर्वजन्मांचे स्मरण झाले आणि माझी कुंडलिनी शक्तीसुद्धा जागृत झाली. मी काही काळ समाधी अवस्थेत गेलो. माझ्यावर असा अनुग्रह करून श्रीपाद प्रभू अंतर्धान पावले.

नरसावधानींच्या शेतांत राजगिऱ्याच्या भाजीचे उत्तम पीक येत असे. मात्र ते गांवातील कुणालाही ती भाजी देत नसत. एके दिवशी बाल श्रीपादांनी आपल्या आईजवळ राजगिऱ्याची भाजी करून देण्याचा हट्ट केला. त्यांना नरसावधानींच्याच घरातील भाजी हवी होती. श्रीपादांचे आजोबा बापन्नार्य तेव्हा त्यांना समजावत म्हणाले, " श्रीपादा, उद्या आपण दोघेही नरसावधानींच्या घरी जाऊन त्यांना राजगिऱ्याची भाजी देण्याची विनंती करू या. परंतु त्यांनी ती भाजी देण्यास नकार दिला, तर आपण परत त्यांच्याकडे कधीही भाजी मागायला जायचे नाही. " दुसऱ्या दिवशी सकाळीच बापन्नार्य बाळ श्रीपादाला घेऊन नरसावधानींकडे गेले. त्यावेळी नरसावधानी घराबाहेर ओसरीवरच बसले होते. त्यांची लांब शिखा पाठीवर रुळत होती. बापन्नाचार्यांनी बाळ श्रीपादाला त्यांना नमस्कार करण्यास सांगितला. श्रीपादांनी आपले दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार केला. तेव्हा त्यांची दृष्टी नरसावधानींच्या शिखेवर पडली आणि काय आश्चर्य ती आपोआप गळून खाली पडली. ते पाहून श्रीपाद म्हणाले, " आजोबा, नरसावधानी आजोबांची शिखा तर गळून पडली. आता त्यांच्याकडे राजगिऱ्यांची भाजी मागणे योग्य नव्हें. चला, आपण आपल्या घरी परत जाऊ. " त्यानंतर, श्रीपादांनी राजगिऱ्याच्या भाजीचा पुन्हा कधीही हट्ट केला नाही.

श्रीपादांनी नमस्कार केल्यामुळें आपला पुण्यक्षय झाला आहे, हे विद्वान नरसावधानींना कळून चुकले. त्या दिवशी ध्यानांत असतांना त्यांना त्यांच्या इष्टदेवतेचे दर्शन झाले. ती देवता बोलू लागली, " साक्षात श्री दत्तात्रेयांचे अवतार असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांचा तू वारंवार अपमान केलास. नजीकच्या भविष्यातील तुझे दारिद्र्य हरण करण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी तुला 'शाकदान' मागितले होते. मात्र तुझ्या अहंकाराने तुझ्या मोक्षाची एक सुवर्णसंधी तू दवडलीस. श्रीपाद प्रभू अति दयाळू आहेत. हा अवतार संपल्यावर ते दुसरा नृसिंहसरस्वती नांवाने अवतार घेतील. त्यावेळी तू एक दरिद्री ब्राह्मणाच्या रूपात जन्म घेशील. त्या जन्मात तू घरी राजगिऱ्याच्या भाजीवर उदरनिर्वाह करत असशील. ह्या जन्मांत केलेल्या काही पुण्याईमुळे, श्रीपादप्रभू म्हणजेच नृसिंहसरस्वती तुझ्या घरी भिक्षेसाठी येतील. तू प्रेमाने वाढलेली भिक्षा घेऊन तुला ते ऐश्वर्य प्रदान करतील. आता, यापुढील तुझा काळ अतीव कष्टाचा असेल." हे ऐकताच नरसावधानींचे ध्यान भंगले.

याच सुमारास पीठिकापूरात विषूचिकाची साथ आली. गांवातील अनेक लोक या साथीच्या रोगाचे बळी पडू लागले. बापन्नाचार्यांचा अनेक शास्त्रांचा सखोल अभ्यास होता. त्यांनी वैद्यक, मंत्र शास्त्रांतील उपाय करून या महामारीच्या रोगाचे निर्मुलन केले. गावांतील अनेक अनिष्ट प्रथा बंद केल्या. पीठिकापूरवासी आता त्यांचे नाव अति आदरानें घेऊ लागले, गावांत त्यांना मान-सन्मान मिळू लागला. बघतां बघतां श्रीपाद दोन वर्षांचे झाले. त्यांचा दुसरा जन्मदिन त्यांच्या आजोबांच्या म्हणजेच बापन्नाचार्यांच्या घरीं उत्साहांत साजरा झाला. बापन्नाचार्यांनी त्यादिवशी श्रीपादांची अजून एक लीला अनुभवली. ते श्रीपादांना आपल्या मांडीवर घेऊन बसलें होते. सहजच त्यांनी श्रीपादांचे चरण कमल हातांत घेतलें आणि त्यांवरील शुभ चिन्हें पाहू लागले. चक्र, स्वस्तिक, शंख, कमळ अशा अनेक शुभचिन्हांनी युक्त ते चरण त्यांना षोडशवर्षीय कुमाराच्या पदचिन्हासारखे भासले. हा बालक नक्कीच श्री दत्तात्रेयांचा अवतार आहे, ही त्यांची धारणा दृढ झाली. त्यांच्या मुखातून आपोआपच श्री दत्तस्तुतीपर पद निघाले. त्या दिव्य चरणांच्या दर्शनाने त्यांचा अष्टभाव जागृत झाला. त्यांना श्रीपाद षोडशवर्षीय कुमाराच्या रूपांत दिसू लागले, ते अत्यंत प्रेमळ स्वरांत म्हणाले, " आजोबा, मी केवळ सोळा वर्षे पर्यंत तुमच्या घरी राहणार आहे. या संसारचक्राच्या बंधनातून मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुमुक्षूंना अनुग्रह देण्याचे कार्य मला करावयाचे आहे. मी चिरंजीव असावे, अशी तुमची मनोकामना आहे, ती मी पूर्तीस नेईन. भविष्यांत, मी नृसिंह सरस्वती हा अवतार घेतला तरी श्रीपाद श्रीवल्लभ रूप हेच नित्य सत्य रूप म्हणून राहील." ही अनुभूती येताच श्री बापन्नाचार्यांना आपलें जीवन कृतार्थ झाल्यासारखें वाटले.

पीठिकापुरांत त्या दिवशी आणखी एक आश्चर्य घडले. कुक्कटेश्वराच्या मंदिरातील स्वयंभू दत्तात्रेयांची मूर्ती अचानक अदृश्य झाली. गावांतील एका तांत्रिकाने, ती दत्तमूर्ती नरसावधानींनी चोरली आहे, असे सांगितले. पीठिकापुरांतील ब्राह्मणवर्गाने नरसावधानींच्या घराची झडती घेण्याचे ठरविले. मात्र त्यांच्या घरांत श्रीदत्तात्रेयांची मूर्ती मिळाली नाही. श्री नरसावधानी मूर्तीच्या चोरीच्या आरोपापासून मुक्त झाले खरें, मात्र त्यांच्या घरांत काही तांत्रिक विद्येसाठी वापरण्यांत येणाऱ्या वस्तू मिळाल्यानें ग्रामस्थ त्यांचा निरादर करू लागले. त्यांच्या विद्वत्तेचे तेजही हळूहळू लोप पावू लागले. दिवसोंदिवस त्यांची प्रकृती क्षीण होत होती. नरसावधानींकडे एक वांझ गाय होती. तिचा उपयोग ते बैलाप्रमाणे शेतीच्या कामासाठी करीत असत. एकदा, नरसावधानींच्या घरी त्यांच्या आईचे श्राद्ध होते. श्राद्धकर्म करून ब्राह्मणांचे भोजन झाले होते. त्याचवेळी ती वांझ गाय खुंटाला बांधलेली दोरी तोडून थेट अंगणातील वस्तू तुडवू लागली. तिला आवरण्याचा सर्व प्रयत्न करत होते, मात्र ती थेट घरात शिरली व समोर आलेल्या लोकांना आपल्या शिंगाने मारू लागली. स्वयंपाक घरांत जाऊन त्या गाईने सारे अन्न व वडे खाऊन टाकले. इकडे, त्याचवेळी बाळ श्रीपाद आपल्या पित्यास मला नरसावधानींच्या घरी घेऊन चला, असा हट्ट करू लागले. अखेर, श्री राजशर्मा त्यांना घेऊन नरसावधानींच्या घरासमोरील अंगणात गेले. तेव्हा, त्यांना तिथे लोकांची गाईला आटोक्यांत आणतांना उडालेली तारांबळ दिसली. अचानक ती गाय नरसावधानींच्या घरातून धावत बाहेर आली. अंगणात उभ्या असलेल्या बाळ श्रीपादांना तिने तीन प्रदक्षिणा घालून आपले पुढील पाय टेकवून वंदन केले आणि गतप्राण झाली. या प्रसंगानंतर नरसावधानींना गोहत्येचे पातक लागलें आहे, असे नाना लोकापवाद उठू लागले. एका पाठोपाठ आलेल्या या अकल्पित संकटांनी नरसावधानी पुरतें खचून गेले. त्यांचा आजार बळावला. अनेक वैद्यकीय उपचार करूनही त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि त्या रोगातच त्यांचा एके दिवशी मृत्यू झाला.

नरसावधानींच्या पत्नीची मात्र श्रीपाद श्रीवल्लभांवर अपार श्रद्धा होती. नरसावधानींच्या मृत्यूचे वर्तमान कळताच श्री राजशर्मा व श्रीपाद त्यांच्या घरी गेले. त्यावेळीं अत्यंत शोकाकुल झालेल्या नरसावधानींच्या पत्नीने बाळ श्रीपादाची आर्तपणें प्रार्थना केली, " बाळा श्रीपादा ! आम्ही अनंत अपराधी आहोत, हे सत्य असले तरी माझ्या सौभाग्याचे रक्षण करणें केवळ तुलाच शक्य आहे. तू प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयच आहेस, तर तुझ्या नरसावधानी आजोबाना जिवंत करणे तुला शक्य नाही का ?'' असे म्हणून ती माऊली अतीव दुःखाने रडू लागली. तिचा तो विलाप पाहून क्षमा आणि करूणेचीच मूर्ती असलेल्या श्रीपाद प्रभूंना तिची दया आली. थोड्याच वेळात, सर्व तयारी होऊन अंतयात्रा निघाली. अप्पलराज शर्मा आणि बाळ श्रीपादसुद्धा त्यात सामील झाले. शवयात्रा स्मशानात पोचली आणि नरसावधानींना लाकडाच्या चितेवर निजविण्यात आले. त्यांचा पुत्र आपल्या मृत पित्यास अग्नी देणार, तितक्यात श्रीपादांनी त्यास थांबविले आणि चितेवर असलेल्या नरसावधानींच्या भूमध्यावर आपल्या अंगुष्ठाने स्पर्श केला. प्रभूंच्या त्या दिव्य स्पर्शाने नरसावधानींच्या अंगात चैतन्य येऊ लागले. काही क्षणांतच ते चितेवर उठून बसले. श्रीपादप्रभूंच्या अंगुष्ठ स्पर्शाने नरसावधानींना कर्मसूत्राचे सूक्ष्म ज्ञान प्राप्त झाले होते. त्यांच्या घरातील मृत झालेली वांझ गाय, ही गत जन्मातील नरसावधानींची माता होती. त्यांच्या घरी असलेला बैल हे त्यांचे पिता होते, अशा पूर्वजन्मांतील अनेक लागेबांधेची त्यांना जाणीव झाली. त्यांच्या वांझ गायीने प्राण सोडण्यापूर्वी श्रीपाद प्रभूंनी आपले दूध प्यावे अशी प्रार्थना केली होती. पुढच्या जन्मी जेंव्हा वांझ म्हैस म्हणून ती जन्माला येईल, त्यावेळी श्रीपाद प्रभू नृसिंहसरस्वती अवतारात तिचे दुग्धपान करतील, हे श्रीपादांनी त्या गाईस वचन दिले आहे, हेही नरसावधानींना दिसले. नरसावधानींवर दत्तमूर्तीच्या चोरीचा खोटा आरोप करणारा तो तांत्रिक पुढच्या जन्मी ब्रह्मराक्षसाच्या योनीत जन्म घेणार असून, त्याच्यावर यतिरूपात असलेल्या श्रीपादांचा अनुग्रह होईल, हे ही कर्मसूत्रांचे विशेष ज्ञान नरसावधानींना श्रीपादाच्या कृपाप्रसादाने ज्ञात झाले. त्यांना स्वत:च्या पुढील जन्मात त्यांच्या घरी श्रीपाद प्रभू यतीरूपाने येऊन त्यांच्याकडून राजगिऱ्याच्या भाजीची भिक्षा स्वीकारून, त्या वेलीच्या मुळाशी असलेला धनाने भरलेला हंडा देऊन त्यांचे दारिद्र्य हरण करतील, असा जन्मवृत्तांतही दिसला. चितेवरून धावतच जात त्यांनी श्रीपाद प्रभूंना भक्तिभावानें अनन्य शरणागत होऊन साष्टांग नमस्कार केला. श्रीपादांच्या कृपेनें आपला पती पुनर्जिवित झालेला पाहून नरसावधानींच्या पत्नीचा आनंद गगनात मावत नव्हता. ती कृतज्ञतेनें पुन्हा पुन्हा श्रीपाद प्रभूंचा जयजयकार करत होती, त्यांना वारंवार नमन करीत होती.

नरसावधानींची कथा सांगून तिरुमलदास पुढे म्हणाले, " शंकरा, श्रीपादांचा चेहरा अतिशय तेजस्वी, रेखीव होता. त्यांची दृष्टी अतीव दयाशील होती. त्यांच्या अमृत वचनांतून सतत कृपेचा वर्षाव होत असे. त्या दिव्यावताराचे वर्णन करण्यास माझे शब्द अपुरे पडतात. उद्या, मी तुला श्रीपाद प्रभूंनी, नरसावधानी आणि त्यांच्या पत्नीस केलेला उपदेश, तसेच इतर अनुग्रहपर लीला सविस्तर सांगेन. तूर्तास, आपण त्यांच्या नामामृतात रंगून जाऊ या. ज्या ठिकाणी प्रभूंचे भक्तिपूर्वक नामस्मरण, भजन वा कीर्तन होत असते, त्या ठिकाणी स्मर्तृगामीं श्रीपाद प्रभू सूक्ष्मरूपाने उपस्थित असतात. दृढ श्रद्धा असल्यास भक्तांना, साधकांना याची प्रचिती निश्चितच येते."

तिरुमलदासासारख्या ज्येष्ठ भक्ताचे ते अगम्य अनुभव ऐकतांना शंकरभट्टांस अपूर्व सुख-शांतीचा अनुभव येत होता. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अथांग चरित्र सागरातील एका थेंबाने जर एवढी तृप्तता अनुभवता येत असेल, तर तो चरित्ररूपी अमृतसागर आपणांस पुन्हा पुन्हा प्राशन करावयास मिळो, अशी दत्तप्रभूचरणीं प्रार्थना करीतच ते निद्राधीन झाले.

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय फलश्रुती - पितृदोष निवारण

प्रथम दिवस विश्राम


Dec 2, 2020

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय ५


साडेसाती निवारण, भक्त तिरुमलदास आणि स्वयंभू वरसिद्धी विनायकाची कथा  

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

श्री पळनीस्वामींनी वर्णन केलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य रूपाचे चिंतन करत करत शंकरभट्टांचा चिदंमबरम येथून महाक्षेत्र तिरुपतीकडे प्रवास सुरु झाला. त्या सिद्ध तपस्व्याचे प्रबोधन आणि आशीर्वाद प्राप्त झाल्यानें शंकरभट्ट समाधान पावले होते. तिरुपती या अतिपवित्र तीर्थक्षेत्री येताच त्यांना अपूर्व अशा मनःशांतीची अनुभूती आली. पुष्करणीमध्यें स्नान करून त्यांनी श्री वेंकटेश्वराचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले आणि त्या भव्य मंदिराच्या प्रांगणातच थोडा वेळ ध्यान करण्याचे ठरविले. ध्यानस्थ असतांना शंकरभट्टांना श्री वेंकटेश्वरांचे दर्शन प्रथम बालत्रिपुरसुंदरीच्या रूपांत तदनंतर श्री महाविष्णुंच्या स्वरूपांत झाले. काही क्षणांतच ती मूर्ती एका बालयतीरूपांत दिसू लागली. तेजस्वी आणि अमृतमय दृष्टीचा जणू कृपा वर्षाव करणाऱ्या त्या वामनास त्यांनी मनोमन नमस्कार केला. त्या दिव्य बालकाचा कृपाहस्त आपल्या मस्तकावर आहे, असा साक्षात्कार त्यांना झाला. अन अचानक त्या बालयतीजवळ एक काळाकुट्ट, कुरूप मनुष्य प्रगटला. त्या बालयतीस प्रणाम करून तो म्हणाला, " हे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू ! या सकळ सृष्टीचे आपण जगन्नियंते आहात. आपला भक्त शंकरभट्टाची आजपासून साडेसाती प्रारंभ होत आहे, हे आपणांस ज्ञात आहेच. या काळांत त्यास त्याच्या कर्मांनुसार अनेक प्रकारचे कष्ट, यातना भोगाव्या लागतील. आपली आज्ञा घेण्यासाठी मी येथे आलो आहे." त्यांवर मंद स्मित करत ते करुणासागर प्रभू शांत स्वरांत बोलू लागले, " हे शनैश्चरा, तू कर्मकारक ग्रह आहेस. सर्व जीवांना त्यांच्या कर्मफळांप्रमाणे अनुभव देऊन तू त्यांना कर्मबंधनातून मुक्तच करतोस. तू तुझ्या या धर्मकर्तव्यांचे अवश्य पालन करावेस. तथापि, ' माझ्या भक्तांचा मी कधीही नाश होऊ देत नाही. ' अशी माझी प्रतिज्ञा आहे, हे तुला ठाऊक आहेच. माझे कृपाकवच सदैव शंकरभट्टांचे रक्षण करेल." हे दृश्य पाहून शंकरभट्टांचे ध्यान भंगले. येणारा काही काळ कठीण असणार आहे, याची त्यांना जाणीव झाली. मात्र श्रीपाद श्रीवल्लभांवर त्यांची दृढ श्रद्धा असल्यानें, प्रभुंवरच आपण आपला पूर्ण भार टाकून निश्चिंत रहावे, असे त्यांनी ठरविले.

शंकरभट्ट तिरुमलाहुन खाली तिरुपतीला आले. तेथील रस्त्यांवरून चालत असतांना अचानक एक न्हावी त्यांच्यासमोर आला आणि त्यांचा हात धरून मोठ्या आवाजांत विचारू लागला, " अरे, तू वीस वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुब्बय्या आहेस ना ? तुझ्या आई-वडिलांची आणि तुझ्या तरुण पत्नीची तुझ्या काळजीने काय अवस्था झाली आहे, ते जरा घरी जाऊन बघ." त्याच्या त्या आवाजाने त्यांच्याभोवती अनेक लोक जमा झाले. हा प्रकार पाहून शंकरभट्ट भांबावून म्हणाले, "अहो, मी कन्नड देशांतील ब्राह्मण असून श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी कुरूगड्डीला निघालो आहे. तुम्ही समजतां तो सुबय्या न्हावी नाही." परंतु त्या बोलण्यावर गावकऱ्यांनी अविश्वास दाखवून त्यांना सुब्बय्याच्या घरी जबरदस्तीनें ओढत नेले. सुब्बय्याचे वृद्ध आई-वडील बिचारे आपलाच मुलगा घरी परत आला आहे हे पाहून आनंदित झाले आणि शंकरभट्टांची समजूत घालू लागले. " मी स्मार्त ब्राह्मण असून श्रीपाद प्रभूंचा भक्त आहे. हे माझे यज्ञोपवित पाहा." असे शंकरभट्ट वारंवार सांगत होते, पण त्यांचे बोलणें ऐकून न घेता त्या लोकांनी त्यांचे बळजबरीने क्षौर कर्म केले आणि पवित्र यज्ञोपवितसुद्धा काढून टाकले. त्यानंतर तेथील मांत्रिकाला बोलावून काही विधीही केले. त्या मांत्रिकाने या सुब्बय्याला ब्राह्मण भूताने पछाडले आहे, असे सांगताच ते सर्वजण गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणांकडे गेले. तिथेही शंकरभट्टांनी आपण भारद्वाज गोत्रीय ब्राह्मण असून संध्या-वंदन, नमक चमक आदि शास्त्रकर्म करू शकतो असे शपथपूर्वक सांगितले. मात्र त्या द्विजवरांनीही हाच सुब्बय्या असून त्याला एका कन्नड ब्राह्मण भूताने झपाटले आहे, तेव्हा योग्य चिकित्सा करून त्याची या त्रासांतून सुटका करावी, असाच निर्णय दिला. ते ऐकून शंकरभट्टांची उरलीसुरली आशादेखील मावळली आणि आपल्या साडेसातीच्या कष्टकाळाची सुरुवात झाली आहे, याची त्यांना कल्पना आली. आता केवळ श्रीपादप्रभूच आपले रक्षण करतील, अशी दृढ श्रद्धा ठेवून ते मनांत श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करू लागले.

तो मांत्रिक मात्र चित्र-विचित्र पूजा करीतच होता. सतत तीन दिवस असा त्रास सहन केल्यावर एक चमत्कार घडला - चौथ्या दिवशीं शंकरभट्ट प्रभूंच्या नामस्मरणांत मग्न असतांनाच तो मांत्रिक त्यांना चाबकाने मारू लागला, पण नवल असे की त्या चाबकाचे वळ त्याच्याच शरिरावर उठू लागले. ही श्रींचीच लीला आहे, हे शंकरभट्ट समजून चुकले आणि ' श्रीवल्लभा शरणं शरणं ' अशी आर्तपणें विनवणी करू लागले. पाचव्या दिवशी त्या भगताचे घर जळून राख झाले. एव्हढें घडूनसुद्धा, तो भोंदू मांत्रिक अधिक पूजाविधींसाठी सुब्बय्याच्या भोळ्या आई-वडिलांकडे धनाची मागणी करतच होता. हे पाहून शंकरभट्ट त्या वृद्ध दाम्पत्यांस हात जोडून म्हणाले, '' तुम्ही मला माझ्या माता-पित्यासमान आहात. या मांत्रिकावर विश्वास ठेवू नका, मी अगदी ठीक-ठाक आहे.'' त्यांचे ते बोल ऐकून सुब्बयाचे आई-वडील संतोष पावले आणि त्यांनी त्या मांत्रिकास घराबाहेर काढले. शंकरभट्टही आपला धर्म भ्रष्ट होऊ देऊ नये, अशी अत्यंत दीनपणे श्रीपादांची अखंड प्रार्थना करीतच होते. सुब्बय्याच्या तरुण पत्नीलाही त्यांनी आपली खरी ओळख सांगितली आणि मी तुला माझ्या बहिणीच्या रूपांतच कायम पाहीन असेही सांगितले. तिचीही शंकरभट्टांचे आत्तापर्यंतचे वर्तन पाहून हा संस्कारी ब्राह्मण सत्यच बोलत असावा अशी खात्री झाली होती आणि तिने आपल्या पतीच्या परतण्याची वाट पाहत, पतिव्रता धर्माचे पालन करीत यापुढचे आयुष्य काढायचे असे ठरविले. " तुमच्या आराध्यदेवतेला म्हणजेच श्रीपाद प्रभूंना ह्या जटिल समस्येचे लवकरात लवकर धर्माला अनुसरुन निवारण करावे, अशी प्रार्थना करावी." अशी विनंती तिने शंकरभट्टांना केली.

अखेर आठव्या दिवशी त्यांची प्रार्थना फळाला आली. एक भविष्यवेत्ता माला जंगम सुब्बय्याच्या घरीं आला. त्याच्याकडे ताडपत्रांवर लिहिलेले नाडी ग्रंथ होते आणि त्या आधारें सर्व भाविकांना तो अचूक भूत-भविष्य सांगत असे. त्यानें थोड्या कवड्या शंकरभट्टांना देऊन खाली टाकण्यास सांगितल्या. त्यानंतर काही गणित करून त्याने आपल्या जवळच्या ग्रंथातून एक पत्र काढून वाचण्यास सुरूवात केली - प्रश्नकर्ता शंकरभट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण असून त्याच्या हातून दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रलेखनाचे अदभूत कार्य घडणार आहे. पूर्वजन्मी हा कंदुकूर नगराजवळील मोगलीचर्ला ह्या ग्रामात असलेल्या स्वयंभू श्री दत्तप्रभूंच्या मंदिराच्या पुजाऱ्यांच्या घरी जन्मला. तरुण वयांत येताच त्याला जुगार खेळण्याचे व्यसन लागले. एके दिवशी तो आपल्या मित्राबरोबर त्या जागृत दत्त मंदिरातच जुगार खेळू लागला. त्यावेळी ह्याने आपल्या मित्रास त्याच्या पत्नीस पणाला लावण्यास सांगितले. श्री दत्तप्रभूंच्या समोर आपण हे दुष्कृत्य करतोय, याची त्याला ना जाणीव होती ना खंत ! खेळामध्ये पूर्वजन्मांतील शंकरभट्ट विजयी झाल्यावर मात्र त्या मित्राने आपल्या पत्नीस त्याला देण्याचे नाकारले. त्यांवर चिडून त्याने गावांतील सुज्ञ लोकांस निवाडा करण्यास सांगितले. त्या ज्ञानी मंडळींनी पवित्र अशा दत्तप्रभूंसमोर एवढे मोठे वामकृत्य घडले, याबद्दल अत्यंत खेद व्यक्त केला आणि परस्त्रीचा मोह केल्याच्या अपराधाबद्दल शंकरभट्टांस आणि आपल्या पत्नीस पणाला लावल्याच्या गुन्ह्याबद्दल त्यांच्या मित्रास कठोर शिक्षा करून ग्रामातून बहिष्कृत केले. दत्तप्रभूंची अल्पकाळ सेवा केल्याने शंकरभट्टांस या जन्मीं ब्राह्मणकुळांत दत्तभक्त म्हणून जन्म मिळाला. त्यांचा मित्र सुब्बय्या या नावाने परमपवित्र अशा तिरुपती क्षेत्री क्षौर कर्म करणाऱ्यांच्या घरी जन्मला. हे भविष्य जेव्हा वर्तविले जाईल, त्याच्या दुसऱ्याच दिवशी सुब्बय्या त्याच्या पत्नीच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने परत येईल आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेनें या कर्मभोगाची शंकरभट्टांची साडेसाती केवळ साडेसात दिवसांत संपेल.

हे भविष्य ऐकून शंकरभट्टांनी श्रीपाद प्रभूंना मनोमन नमन करून त्यांची करुणा भाकली. त्या भविष्यवेत्त्याने अचूक भविष्य वर्तविले होते. श्रीपाद श्रीवल्लभांची पूर्ण कृपादृष्टी शंकरभट्टांवर होती. दुसऱ्या दिवशीच सुब्बय्या स्वगृहास परतला. श्रीपाद प्रभूंच्या कृपेने संशय आणि संभ्रमाचे सर्व ढग विरून गेले. सुब्बय्याची सर्वांनाच ओळख पटली आणि त्याच्या घरांत आनंदीआनंद झाला. शंकरभट्टांनीही सुब्बय्याच्या माता-पित्याची परवानगी घेऊन पुढील प्रवास सुरु केला.

दत्तप्रभूंच्या भक्तवात्सल्यतेची प्रचिती आल्यामुळें शंकरभट्ट अतिशय तुष्ट चित्ताने मार्गक्रमण करत होते. लवकरच ते चित्तूर जिल्हयातील काणिपाकं या गांवी पोहोचले. तेथील प्रसिद्ध वरसिद्धी विनायकाच्या मंदिरात जाऊन त्यांनी भक्तिभावानें दर्शन घेतले. जवळच असलेल्या वरदराज स्वामीं आणि मणिकंठेश्वर स्वामींच्या देवळांतही जाऊन त्यांनी प्रार्थना केली. वरसिद्धी विनायकाचे दर्शन घेऊन बाहेर येताच त्यांना एक चमत्कारिक दृश्य दिसले. त्या मंदिरातील पुजारी प्रसादाचे गाठोडे मंदिराबाहेर असलेल्या एका उंच कुत्र्याला देत होते. त्याच्याबरोबर आणखी तीन तसेच उंच श्वानदेखील तिथे होते. त्या श्वानांना पाहून शंकरभट्ट खरें तर घाबरले होते. मात्र पुजाऱ्याने त्यांना धीर देत सांगितले, " महाशय, तुम्ही या कुत्र्यांस अजिबात घाबरू नका. ते कोणालाही त्रास देत नाहीत. एका दत्तप्रभूंच्या भक्ताचे हे पाळीव श्वान आहेत. तो धोबी असल्याने या मंदिरांत येत नाही, मात्र ह्या चौघांना प्रसाद घेण्यास पाठवतो. दत्तप्रभूच श्रीपाद श्रीवल्लभ रूपांत अवतार घेते झाले आहेत, असे तो सर्वांना सांगत असतो. तू ह्या श्वानांबरोबर जाऊन त्या दत्तभक्ताची अवश्य भेट घे."

आपल्या या प्रवासांतील प्रत्येक घटना ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेची अनुभूतीच देत असते, अशी शंकरभट्टांचीही आता दृढ धारणा झाली होती. तिरुपती येथे घडलेल्या प्रसंगातून त्यांना एक कळून चुकले होते की कर्मसिद्धांतानुसार प्रारब्धभोग सर्वांनाच भोगावा लागतो. पूर्वजन्मांतील संचितानुसार कुठल्याही वंशात जन्म होऊन चांगल्या अथवा वाईट कर्मांनुसारच आपल्याला अनुभव येत असतात. आपण केवळ भगवंतावर श्रद्धा ठेवून हा भवसागर तरून जाण्याची प्रार्थना करत राहणेच योग्य आहे. तसेच श्रीपाद श्रीवल्लभांच्या भक्ताला भेटण्याची ही संधी सोडू नये, असा विचार करीत शंकरभट्टही त्या कुत्र्यांच्या मागोमाग चालत त्या धोब्याच्या झोपडीजवळ आले. त्यांचा आवाज ऐकून तो धोबी त्याच्या झोपडीतून बाहेर आला. आपली ओळख करून देत त्याने शंकरभट्टांची अत्यंत आपुलकीने चौकशी केली. सुमारें ७० वर्षे वय असलेल्या त्या श्रीपाद प्रभूंच्या भक्ताचे नाव तिरुमलदास असे होते. तो त्यांना आपल्या झोपडीत घेऊन गेला आणि त्याने शंकरभट्टांचे उत्तम आदरातिथ्य केले. आत्तापर्यंतच्या प्रवासांत आलेल्या अनुभवांमुळे शंकरभट्टांचा आपण ब्राह्मण असल्याचा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला होता. श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त केवळ एव्हढीच ओळख त्यांना आता पुरेशी वाटत होती. तिरुमलदासाने त्यांना वरसिद्धी विनायकाच्या मंदिरातील प्रसाद आणि जलपानही दिले.

त्यानंतर तिरुमलदास म्हणाले, " मी आपली अत्यंत आतुरतेनें वाट पाहत होतो. माल्याद्रीपुर आणि श्रीपीठिकापुर येथील विशेष वार्ता मी तुला कथन करणार आहे. शंकरभट्टा, आज आपणांस वरसिद्धी विनायकाच्या प्रसादाचा लाभ झाला, या शुभदिनींच तू श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताचा श्रीगणेशा कर. श्रीपाद श्रीवल्लभांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच, तसेच तुला कुरवपुरांत त्यांचे दर्शनही घडेल." ते ऐकून शंकरभट्ट अतिशय सद्गदित झाले त्यांनी तिरुमलदासाला नमन केले आणि म्हणाले, " प्रभू श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल आपण मला सविस्तर सांगावे. आपण त्यांचे भक्त कसे झाला, तसेच माल्याद्रीपुरांत घडलेली विशेष वार्ता ऐकण्यास मी उत्सुक झालो आहे. "

तिरुमलदास आपला पूर्ववृतांत सांगतांना म्हणाला, " पूर्वजन्मी मी एक प्रतिष्ठित वेदपारंगत ब्राह्मण होतो. परंतु अतिशय लोभी होतो. माझ्या मृत्यूसमयी, नुकतेच जन्मलेले एक गाईचे वासरू जुन्या चिंधीस चघळत असलेले मी पहिले. माझ्या कृपण स्वभावानुसार माझ्या मुलांना मी ते जीर्ण वस्त्र जपून ठेवण्यास सांगितले. मृत्यूसमयीं मलिन वस्त्रावर नजर ठेवल्यामुळें मला रजकाचा जन्म प्राप्त झाला. शंकरभट्टा, प्राणत्याग करतांना आपल्या मनांत जो संकल्प असतो, त्यालाच अनुसरून आपणांस पुढील जन्म मिळतो. माझ्या काही पूर्वपुण्याईमुळे माझा गर्तपुरी (गुंटुरू) मंडळातील पल्यनाडू प्रांतातील माल्याद्रीपूर इथे पुनर्जन्म झाला. तेच मल्याद्रीपुर सध्या मल्लादि या नावाने ओळखले जाते. त्या ग्रामांत मल्लादि नावाची दोन वेदशास्त्रपारंगत घराणी होती. मल्लादि बापन्नावधानि या नांवाचे विद्यावंत हरितस गोत्रीय तर मल्लादि श्रीधरअवधानी या नांवाचे विद्वान कौशिक गोत्रीय होते. श्रीधरअवधानी यांची बहिण राजमांबा हिचा विवाह बापन्नावधानी यांच्या बरोबर झाला होता. गोदावरी तटांवर असलेल्या आइनविल्लि या गांवात गणपती महायाग संपन्न होणार होता. त्या यज्ञासाठी हे दोन्ही प्राज्ञ पंडित तिथे गेले होते. यज्ञ सर्वथा शास्त्रोक्त विधींनुसार पार पडल्यास, शेवटची आहुती यज्ञवेदींत अर्पण करतेवेळीं प्रत्यक्ष महागणपती स्वर्णकांतीयुक्त स्वरूपांत दर्शन देईल आणि आहुती स्वीकारेल, अशी ग्वाही वेदोक्त मंत्र पठण करणाऱ्या ब्राह्मणांनी दिली होती. त्या विधीवत संपन्न झालेल्या यज्ञाची सांगता सुफळ झाली देखील - वेदमंत्र उच्चारून यज्ञपूर्ततेची आहुती देताच त्या यज्ञकुंडातून सुवर्णकांतीयुक्त, दैदीप्यमान श्रीगणेश प्रगट झाले आणि आपल्या सोंडेत त्यांनी ती आहुती स्वीकारली. श्री गणेश महायाग यथासांग पार पडल्याचे ते फलित पाहून सर्वच तुष्ट झाले. तिथे उपस्थित असलेल्या सर्व भाविकांनी हर्षित होऊन गजाननास नमस्कार केला. प्रसन्न होऊन श्री महागणपती वरदान देत म्हणाले, " मी स्वतः गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण कलेने श्रीपाद श्रीवल्लभ रुपाने अवतार घेईन." गणेशाचे आशीर्वचन ऐकून सर्वांनी त्यांचा जयजयकार केला, मात्र त्या सभेतील तीन नास्तिकांचा त्यावर विश्वास बसला नाही. ते शंकित स्वरांत म्हणाले, " हे दृश्य नक्कीच इंद्रजाल अथवा महेंद्रजाल असावे. हे प्रत्यक्ष महागणपती असतील तर त्यांनी परत एकदा दर्शन द्यावे. " त्या नास्तिकांचे हे वक्तव्य ऐकताच होमकुंडातील विभूती महागणपतीच्या स्वरुपात दृश्यमान झाली आणि आपल्या दिव्य वाणींत बोलू लागली, " मीच परब्रह्म आहे. मीच या सकल ब्रह्माण्डाचा स्वामी असून ईश-पार्वतीनंदन म्हणून या जगतांत प्रसिद्ध आहे. त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी श्रीशंकरांनी, शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास अटकाव करतेवेळी श्री विष्णूंनी, महिषासुराशी युद्ध करण्यापूर्वी श्री आदिमाया जगदंबेनी तसेच सकल देवता, योगी, तपस्वी आणि ऋषी- मुनी यांनीही माझेच स्मरण आणि आराधना करून अभीष्ट प्राप्त केले. ब्रह्मा आणि रुद्र श्री विष्णुरूपात विलीन झाले, तेच त्रैमूर्ति दत्तात्रेय आहेत. शास्त्रांच्या वचनांनुसार मीच दत्तरूप आहे. तेच महागणपतीरूपी श्री दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपांत गणेशचतुर्थीच्या दिवशी अवतार घेतील. माझ्या आजच्या दर्शनाप्रमाणेच दिव्य ज्योतीच्या स्वरूपांत ते प्रगट होतील." त्यानंतर त्या तिघा नास्तिकांकडे पाहत श्री गणपती क्रोधायमान स्वरांत म्हणाले, " माझे हे सत्यस्वरूप पाहुनदेखील तुम्ही ते असत्य आहे, असा अविश्वास दाखवला. त्यांमुळे मी तुम्हांस शाप देत आहे. पुढील जन्मीं तुमच्या पैकी एक आंधळा, एक मुका आणि एक बहिरा जन्मेल. मात्र आजच्या या मंगल दिनीं मी तुम्हांस उ:शापदेखील देत आहे, माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावर तुम्ही त्वरित दोषरहित व्हाल." एवढे बोलून श्री गणेश अंतर्धान पावले.

यथावकाश ते तिघे नास्तिक मृत्यू पावले आणि काणिपूर या गांवात तीन भाऊ म्हणून जन्मले. महागणपतींच्या शापवाणीनुसार मोठा भाऊ आंधळा, मधला बहिरा आणि तिसरा धाकटा मुका होता. ते आपल्या एक एकर जमिनीत शेती करुन उदर निर्वाह करीत होते. एके वर्षी त्या गावात भयंकर दुष्काळ पडला. सर्व जलाशयांतील जल आटून गेले. ह्या तीन भावंडांच्या शेतातील विहिरीतदेखील पाणी टंचाई जाणवू लागली. शेवटी, आपली विहीर अजून खोल खणावी असा विचार करून ते तिघे भाऊ विहिरीत उतरले. विहीर खणावयास प्रारंभ केल्यावर काही वेळाने त्यांची कुदळ एका टणक दगडावर आदळली अन एक नवल वर्तले, त्या खडकातून रक्ताची धार वर उडाली. ते रक्त मुक्या भावाच्या हातास लागता क्षणीच त्याला बोलता येऊ लागले. त्याचवेळी विहिरीला पाणीही लागले आणि विहीर जलमय झाली. त्या पाण्याचा स्पर्श होताच बहिरा असलेल्या भावास स्पष्ट ऐकू येऊ लागले. आपल्या दोन्ही भावांचे ते आनंदोद्गार ऐकून आंधळा भाऊदेखील त्यांच्या दिशेने जाऊ लागला. तेव्हा, त्याचा त्या विहिरीतील खडकास स्पर्श झाला अन काय आश्चर्य, त्याला दृष्टी प्राप्त झाली. विहिरीतील तो खडक म्हणजे एक स्वयंभू विनायकाची दगडी मूर्ती होती. त्या मूर्तीच्याच मस्तकावर कुदळीचा घाव बसल्याने तो रक्तस्त्राव सुरु झाला होता. त्या तीन बंधूंनी ती स्वयंभू विनायकाची मूर्ती विहिरीतून काळजीपूर्वक बाहेर काढली.

पुढे ग्रामस्थांनी त्या वरसिद्धी विनायकाची प्रतिष्ठापना करण्याचे ठरविले. त्यावेळी श्रीपाद प्रभूंचे आजोबा श्री बापन्नाचार्युलू जे आता सत्यऋषिश्वर या नावाने ओळखले जात होते आणि त्यांचे मेहुणे श्रीधरावधानी त्या ग्रामी आले होते. कृपाप्रसाद देतांना श्रीवरसिद्धी विनायक त्यांना म्हणाले, “ आईनविल्ली येथे तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्माचेच हे रूप आहे. तुमच्यावर मी एक विशेष कार्य सोपवणार आहे. श्रीशैल्य या क्षेत्री कळा कमी आहेत. तेथे तुम्ही सूर्यमंडळातील तेजाचा शक्तिपात केला पाहिजे. श्रीशैल्यास जेव्हा शक्तिपात होईल, त्या दिवशीच गोकर्ण क्षेत्री, काशीमध्ये, बदरी आणि केदार या क्षेत्री एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल. श्री दत्तात्रेय लवकरच श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या रूपांत अवतार घेणार आहेत. श्रीधरा, कौशिक गौत्रीय तुझे वंशज आजपासून श्रीपाद या आडनावाने ओळखले जातील.” असा आशीर्वाद देऊन वरसिद्धी विनायक अंतर्धान पावले.

स्वयंभू वरसिद्धी विनायकाचा हा कथावृत्तांत सांगून तिरुमलदास शंकरभट्टांस पुढे म्हणाले, " शंकरा, काही काळाने सत्यऋषिश्वर म्हणजेच बापन्नाचार्युलू आणि श्रीधर पंडित पीठिकापुरांत वास्तव्यास गेले. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनेक अगम्य बाललीला पाहिल्या आहेत, त्या तुला उद्या सविस्तर सांगेन. मला माझ्या प्रथम पत्नीपासून रविदास नावाचा एक मुलगा आहे. तो सध्या कुरवपुरांत राहत असून श्रीपाद प्रभूंची यथामती यथाशक्ती सेवा करीत असतो. मी मात्र श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार इथे काणिपुरातच माझ्या दुसऱ्या पत्नी आणि मुलाबरोबर राहून प्रभूंच्या नामस्मरणांत आणि त्यांच्या लीलांचे चिंतन करीत काळ व्यतीत करत आहे. श्रीपाद स्वामींच्या कृपेने तू श्री पीठिकापुरात अनेक महानुभावांना भेटशील. श्री वेंकटप्पय्या श्रेष्ठी नावाचे श्रेष्ठ भक्त ज्यांच्या वंशावर श्रीपादांचा अभयहस्त आहे, तसेच वत्सवाई असे उपनाम असलेल्या नरसिंह वर्मा नामक श्रीपादांशी घनिष्ट संबंध असणारे निष्ठावंत उपासक यांची तू अवश्य भेट घे. त्यांच्याकडून श्रीपादांच्या चरित्र लेखनाकरिता तुला अनेक महत्वपूर्ण माहिती मिळेल. तू लिहीलेल्या या ग्रंथाखेरीज इतर कोणताही ग्रंथांत श्रीपादांच्या संपूर्ण चरित्र कथा अथवा लीला असणार नाहीत, असा श्रीपाद प्रभूंचा तुला आशीर्वाद आहे." तिरुमलदासाचे हे बोलणे शंकरभट्ट एकाग्रतेनें ऐकत होते. श्रीपादप्रभूंची ही आपल्यावर केवढी कृपा आहे, याचा त्यांना नित्य अनुभव येतच होता. ' कृतार्थ झालो काय मागू तुला । देई भक्तीसुधारस नित्य प्यावया मजला ' अशी कळकळीची प्रार्थना त्यांनी श्रीपादचरणीं केली.  

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय फलश्रुती - विघ्नें निवारण होण्यासाठी, देवतांचा कोप दूर होतो.