Jan 16, 2017

॥ श्री दत्तस्तवस्त्रोत्रम ॥


II श्री गणेशाय नमः II


भूतप्रेतपिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः I

दूरादेव पलायन्ते दत्तात्रेयं नमामि तम् II १ II


यन्नामस्मरणाद्दैन्यं पापं तापश्च नश्यति I

भीतिग्रहार्तिदुःस्वप्नं दत्तात्रेयं नमामि तम् II २ II


दद्रुस्फोटककुष्ठादि महामारी विषूचिका I

नश्यन्त्यन्ते‍ऽपिरोगाश्च दत्तात्रेयं नमामि तम् II ३ II


संङ्गजा देशकालोत्था अपि साङ्क्रमिका गदाः I

शाम्यन्ति यत्स्मरणतो दत्तात्रेयं नमामि तम् II ४ II


सर्पवृश्चिकदष्टानां विषार्तानां शरीरिणाम् I

यन्नामशान्तिदं शीघ्रं दत्तात्रेयं नमामि तम् II ५ II


त्रिविधोत्पातशमनं विविधारिष्टनाशनम् I

यन्नाम क्रूरभीतिघ्नं दत्तात्रेयं नमामि तम् II ६ II


वैर्यादिकृतमन्त्रादिप्रयोगा यस्य कीर्तनात् I

नश्यन्ति देवबाधाश्च दत्तात्रेयं नमामि तम् II ७ II


यच्छिष्यस्मरणात्सद्यो गतनष्टादि लभ्यते I

य ईशः सर्वतस्त्राता दत्तात्रेयं नमामि तम् II ८ II


जयलाभयशःकामदातुर्दत्तस्य यः स्तवं I

भोगमोक्षप्रदस्येमं प्रठेद्दत्तप्रियो भवेत् II९II

II इति श्री.प.प.वासुदेवानंदसरस्वतीविरचितं दत्तस्तवस्तोत्रं संपूर्णम् II


Jan 15, 2017

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा । 

दत्तगुरुंचे नाम स्मरा हो दत्तगुरुंचे भजन करा ॥धृ.

हे नामामृत भवभय हारक । अघसंहारक त्रिभुवन तारक ।

आत्मसुखाचा मोक्ष लुटाया । अमोल ठेवा हाती धरा

दत्तचरण माहेर सुखाचे । दत्तभजन भोजन मोक्षाचे

कवच लाभता दत्तकृपेचे । कळी-काळाचे भय न धरा

हा उत्पत्ति स्थिती लय कर्ता योग ज्ञान उदगाता त्राता

दत्त चरित मधु गाता गाता । भव सागर हा पार करा

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

दत्ता मजला प्रसन्न होसी...


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

दत्ता मजला प्रसन्न होसी जरि तूं वर देसी । तरि मी आनन मागें तुजसी निर्धारुनी मानसी ॥धृ.॥ स्मरण तुझें मज नित्य असावे तव गुण भावे गावे । अनासक्तिने मी वागावे ऐसे मन वळवावे ॥१॥ सर्व इंद्रिये आणि मन हें तुझे हाती आहे । यास्तव आतां तू लवलाहें स्वपदी मन रमवावे ॥२॥ विवेक आणि सत्संगति हे नेत्रद्वय आहे । वासुदेव निर्मल देहें जेणें त्वत्पदीं राहे ॥३॥ दत्ता मजला प्रसन्न होसी जरि तूं वर देसी। तरि मी आनन मागें तुजसी निर्धारुनी मानसी ॥४


श्री नृसिंह महाराजांची आरती


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

कृष्णा-पंचगंगासंगम निजस्थान ।

चरित्र दाऊनि केले गाणगापुरी गमन ।

तेथें भक्तश्रेष्ठ त्रिविक्रमयति जाण ।

विश्वरूपें तया दिधलें दर्शन ॥ १ ॥

जय देव जय देव जय सद्‌गुरु दत्ता ।

नृसिंह सरस्वति जय विश्वंभरिता ॥ धृ. ॥

वंध्या साठी वर्षे पुत्रनिधान ।

मृत ब्राह्मण उठवीला तीर्थ शिंपून ॥

वांझ महिषी काढवि दुग्ध दोहोन ।

अंत्यवक्रें वदवी निगमागम पूर्ण ॥ जय. ॥ २ ॥

शुक्लकाष्टीं पल्लव दावुनि लवलाही ।

कुष्ठी ब्राह्मण केला शुद्ध निजदेही ॥

अभिनव महिमा त्याची वर्णूं मी कायी ।

म्लेंच्छराजा येउनि वंदी श्रीपायीं ॥ जय देव. ॥ ३ ॥

दिपवाळींचे दिवशीं भक्त येउनि ।

आठहि जण ठेवीत मस्तक श्रीचरणीं ॥

आठहि ग्रामीं भिक्षा केली तें दिनीं ।

निमिषमात्रे तंतुक नेला शिवस्थानीं ॥ जय. ॥ ४ ॥

ऎसे चरित्र दावुनि जडमुढ उद्धरिले ।

भक्तवत्सल ऎसे ब्रीद मिरविलें ॥

अगाध महिमा म्हणूनि वेदश्रुति बोले ।

गंगाधरतनय सदा वंदी पाऊलें ॥ ५ ॥



Dec 31, 2016

श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज जयंती


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


आज पौष शुध्द २ , श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज यांची जयंती. 

दुपारी १२ वाजता महाराजांचा जन्मकाळ , जन्म स्थान : कारंजा. जन्मोत्सव श्री क्षेत्र नृसिंहवाडी.

माधवस्त्री अंबिका कारंज सती थोर l पूर्वजन्मी तिजसि श्रीवल्लभ वर ll

पुढील जमनी तव कुशि धरीन अवतार l म्हणवूनी आंबे कुशि आले ऐका तिथिवार ll

द्वितीया पौष शुध्द शततारावरी,l माध्यान्ही अवतरले नरहरि शनिवारी ll

आदौ माघ कृष्ण शुभ तिथी भृगुवारी l पुष्पासनी आरुढले त्रिगुण यतिधारी ll

जयदेव जयदेव जयजय त्रिगुणात्मा l श्री दत्त श्रीपाद नरहरी परमात्मा जयदेव जयदेव ll

कारंजा येथील नृसिंह स्वामींचे जन्मस्थान , "काळे वाडा".

श्री नृसिंह सरस्वतींचे संक्षिप्त चरित्र खाली दिले आहे.

श्री नृसिंह सरस्वती - संक्षिप्त चरित्र (इ.स. १३७८ ते १४५८)

श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयाचे दुसरे अवतार. श्रीपाद श्रीवल्लभ हा पहिला अवतार. त्यांनीच करंजनगर नावाच्या गावी जन्म घेतला. त्यांच्या वडिलांचे नाव माधवराव व आईचे नाव अंबाभवानी असे होते. पती-पत्नी दोघेही शिवभक्त होते. मुलाचे नाव जन्मतःच शाळिग्रामदेव असे ठेवले. नंतर मोठ्या थाटाने त्याचे बारसे साजरे करून नरहरी हे व्यावहारिक नाव विधीपूर्वक ठेवण्यात आले.

जन्मतःच हे मूल 'ॐ' कार हा शब्द म्हणू लागले. बालक मोठे होऊ लागले. तीन वर्षाचे झाले तरी 'ॐ' काराखेरीज एकही दुसरा शब्द ते बोलत नव्हते. मुलगा सात वर्षाचा झाला तरीही 'ॐ' काराशिवाय काहीही बोलू लागला नाही. माधवराव व अंबा भवानी मनात फार कष्टी झाले. त्यांनी शिवपार्वतीची आराधना केली. त्यांच्या कृपाप्रसादाने आम्हाला मुलगा झाला, तोही मुका असावा, या गोष्टीमुळे ते पती-पत्नी खूप दुःखी बनली.

एक दिवस अंबाभवानी नरहरीला जवळ घेऊन म्हणाली, ''बाळ, तू अवतारी पुरुष आहेस, युगपुरुष आहेस, असे ज्योतिषी सांगतात. आमच्या भाग्याने तू आमच्या घरी जन्माला आलास. तू जगद्गुरू असावास याबद्दल आमची खात्री झाली आहे. तू शक्तिमान आहेस. तू बोलू का लागत नाहीस? तुझे बोल ऐकण्याची आमची इच्छा आहे. तेवढी पुरी कर !'' मुलाने मातेचे हे उद्गार ऐकून खुणेने सांगितले की, माझी मुंज करून दिलीत की, मला सगळे काही बोलता येईल !''

व्रतबंधाकरिता मुहूर्त ठरविण्यात आला. सर्व तयारी केली. मुंजीला चतुर्वेदी ब्राह्मण आमंत्रित केले. मुंजीचा सोहळा पाहण्यास अलोट गर्दी लोटली. माधवरावांनी नरहरीच्या कमरेभोवती मौजीबंधन केले व ठरलेल्या शुभ मुहूर्तावर त्याच्या कानात गायत्री मंत्राचा तीन वेळा उच्चार केला. नरहरीने मनातल्या मानत गायत्री मंत्राचा उच्चार केला. उघडपणे केला नाही. लोक हसले; म्हणाले, ''मुका मुलगा गायत्री मंत्र काय उच्चारणार?''

अंबा भवानी या त्याच्या आईने पहिली भिक्षा देऊन त्याला आशीर्वाद देताच त्याने ऋग्वेदातील प्रथम मंत्राचा स्पष्टपणे उच्चार करून, ऋग्वेद म्हणून दाखवला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेदातील प्रारंभीचा भाग व यजुर्वेद म्हणून दाखवला. आईने तिसरी भिक्षा घालताच त्याने सामवेदाचे गायन करून दाखवले. माधवराव व अंबाभवानी यांना अत्यंत आनंद झाला. मुका मुलगा चारी वेद बोलून दाखवू लागला, हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले.

नरहरी आपल्या आईला म्हणाले, ''आई, मला आता निरोप दे. तीर्थयात्रेला जावे असा मी निश्चय केला आहे. घरोघरी भिक्षा मागून, ब्रह्मचर्याचे पालन करून, वेदाभ्यास करावा असा माझा मानस आहे.'' हे ऐकून आईला फारच दुःख झाले.

''जेव्हा माझे चिंतन कराल, मला भेटण्याची उत्कंठा वाटेल तेव्हा मी तुम्हाला मनोवेगाने येऊन भेटेन.'' असे नरहरीने आश्वासन दिल्यावर त्याच्या आई-वडिलांनी त्याला संन्यासदीक्षा घेण्यास मान्यता दिली.

नरहरी प्रथम काशीक्षेत्र या ठिकाणी गेले. तेथे त्यांनी अध्ययन केले. कृष्ण सरस्वती यांचा अधिकार जाणून नरहरींनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली व त्यानंतर ते नृसिंह सरस्वती या नावाने प्रसिध्द झाले.

श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी दक्षिणेकडील निरनिराळ्या तीर्थांना भेट दिली. नरसोबाची वाडी येथे बारा वर्षे राहून त्यांनी लोकोद्धाराचे प्रचंड कार्य केले. पुढे ते गुप्त रूपाने संचार करीत गाणगापूर येथे प्रगट झाले. त्यांचे असंख्य शिष्य होते. श्री गुरूंनी सर्व शिष्यांना बोलाविले आणि सांगितले की, ''आम्ह्ची प्रसिद्धी फार झाली आहे. यापुढे गुप्त राहावे असे मनात आहे. मी तुम्हाला सोडून जात नसून फक्त गुरुरुपाने येथे राहणार आहे.

जे जे असती माझ्या प्रेमी l

त्यांते प्रत्यक्ष दिसे नयनी l

लौकिकमते अविद्याधर्मी l

जातो श्रीशैल्ययात्रेसी ll

श्री गुरु म्हणाले, ''जे लोक माझी भक्ति करतील, मनोभावे माझे गुणगान करतील, त्यांच्या घरी आम्ही सदैव राहू. त्यांना व्याधी, दुःख आणि दारिद्र्याचे भय असणार नाही. त्यांच्या सर्व मनोकामनांची पूर्ती होईल. माझे चरित्र जे वाचतील त्यांच्या घरी निरंतर लक्ष्मी, सुख व शांति लाभेल, असे सांगून ते त्यांच्या इच्छेनुसार भक्तांनी केलेल्या फुलांच्या आसनावर बसले. ते आसन नावेसारखे पाण्यात सोडले. भक्तांच्या भावना अनावर झाल्या. ''लौकिकमताने मी जात आहे. तरी भक्तांच्या घरी व गाणगापूरला माझे सान्निध्य सदैव राहील.'' असे श्री गुरूंनी सांगितले. नंतर ते पोचल्यावर प्रसादाची खूण म्हणून फुले वाहत आली.

तू भक्तजना कामधेनु l मनुष्यदेही अवतरोनु l

तुझा पार न जाणे कवणू l त्रैमूर्ती तूच होसी ll

श्री गुरूंच्या लीलाकथा श्रीगुरूचरित्रात आलेल्या आहेत. आजही श्री गुरु गाणगापुरातच आहेत. भक्तांना ते दर्शन देतात.



सौजन्य : Shripad Joshi (श्री. श्रीपाद जोशी), श्री क्षेत्र नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी).


https://www.facebook.com/narsobachiwadi