॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
|| श्री गणेशाय नमः || श्री दत्त समर्थ ||
यथावकाश नवमांस पूर्ण होताच शीलधरा राणीनें कार्तिक शु. सप्तमीला रात्रीच्या शुभवेळी एका पुत्ररत्नाला जन्म दिला. कार्तिकस्यसिते पक्ष सप्तभ्यां भानुवासरे । श्रवणर्क्षे निशानाये निशिचे सु सुभेदर्णे || ( स्मृति पुराण १५/३) कृतवीर्य राजाच्या पुत्राच्या जन्मसमयीं पाचही ग्रह उच्चीचे होते. साक्षात प्रभू दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने जन्मलेल्या त्या दिव्य बालकाच्या आगमनाने सारे ब्रह्माण्ड आनंदाने भरून गेले. अनेक शुभ संकेत सहजच सर्वच स्थानीं दिसू लागले. अत्यंत हर्षित झालेल्या कृतवीर्याने आपल्या प्रजेस धन, धान्य आणि वस्त्रे आदि यांचे यथायोग्य दान केले. ब्राह्मणांना विपुल गोदान आणि सुवर्णदानही केले. साधुजनांना प्रसन्न केले आणि त्या सिद्धांच्या मुखांतून त्या बालकासाठी 'आयुष्यमान हो, यशस्वी हो' असे अनेक आशीर्वाद येऊ लागले. राजानें ज्योतिष्यांना पाचारण करून नवजात बाळाचे जातक वर्तविले. ज्योतिषी लग्न पाहून त्या दैवशाली बालकाचे भविष्य अत्यंत प्रसन्न होऊन वदते झाले, दैवशाली हा कुमार । श्रीदत्तात्रेय कृपापात्र । तपोबळें पवित्र । होईल सर्वत्र प्रख्यात याचें घेतां नाम । नष्ट वस्तूचा आगम । स्मरतां करील आगम । हा वेदशास्त्रपारंगत होईल. अनंतव्रताचे फलस्वरूप म्हणून हा सप्तद्वीपांकित पृथ्वीचा सार्वभौम राजा होईल आणि पंचाऐंशी हजार वर्षें राज्य करील. सूर्यनारायणाच्या व्रतप्रभावाने ह्यास लक्ष वर्षांचे निरोगी आयुष्य लाभेल. हा जितेंद्रिय, सर्वदा विजयी आणि सर्वमान्य होईल. ज्योतिषांचे हे वचन ऐकून कृतवीर्य राजाने त्यांचा यथायोग्य सत्कार केला. पुढें, सोळाव्या दिवशी त्या बालकाचा नामकरण विधी करून त्याचे नाव अर्जुन असे ठेवले. कृतवीर्य राजाचा पुत्र म्हणून त्यास कार्तवीर्य असेही प्रजाजन संबोधू लागले.
अर्जुन शुक्ल पक्षांतील चंद्राप्रमाणे वाढू लागला. राजगुरु गर्गमुनींकडून विद्याभ्यासाचे शिक्षण घेऊ लागला. थोडयाच काळांत तो सर्व शस्त्र-शास्त्रपारंगत होऊन युवराज्यपदास योग्य झाला. तथापि, दैववशात कृतवीर्य राजाचा वृद्धापकाळानें मृत्यू झाला. तेव्हा, राजगुरू गर्ग मुनी, प्रधानादि मंत्री गण आणि प्रजेनेंसुद्धा अर्जुनास तू आता राज्याची धुरा सांभाळावी आणि आपल्या राजधर्माचे पालन करावेस असा सल्ला दिला. तेव्हा अर्जुनाने मात्र राज्यपद स्वीकारण्यास नकार दिला. अधिक स्पष्टीकरणार्थ तो गर्ग मुनींस वंदन करून नम्रपणें म्हणाला, "गुरुवर्य, मला हे राज्य नको. मी त्यास मनापासून त्याज्य मानतो. राजाचे अधिपत्य सर्वमान्य असलें तरी अंतिम परिणाम अत्यंत कष्टदायकच असतो. जो राजा आपल्या प्रजेचे न्यायाने पालन करीत नाही, राज्यातील जनतेचे रक्षण करीत नाही अथवा अंगी सामर्थ्य असूनही जर राजाचे आचरण अनीती व अधर्मयुक्त असेल, तर तो राजा नरकवास भोगतो. यांवर तुम्ही मला हे सर्व तू जाणतोस तर आपल्या राजधर्माचें योग्य पालन कर असे जरी सांगितले तरी राज्य करतांना मला माझ्या सेवकांवर विसंबून राहावे लागेल. त्या राजसेवकांनी केलेल्या पापाचा एक चतुर्थांश हिस्सा सहजच राजाच्या मस्तकी पडतो. तेव्हा मी एकटा, स्वबळावर सर्वदा धर्मास अनुसरुन आणि न्यायपूर्वक राज्य करण्यास समर्थ झाल्याशिवाय हा राज्यकारभार कसा स्वीकारू ? "
अर्जुनाचे हे बोलणें ऐकून गर्ग मुनींस अतिशय संतोष झाला. तसेच, या विशाल राज्याचा राजा म्हणून अर्जुन हाच योग्य आहे, याची खात्रीही त्यांना झाली. ते म्हणाले, " अर्जुना, तू हे जे काही बोललास ते अतिशय योग्यच आहे. तुला जर तुझ्या सेवकांवर अवलंबून राज्यकारभार करायचा नसेल तर तू योगाभ्यास कर. त्यांमुळेच तुला राज्याची धुरा समर्थपणे सांभाळता येईल. योगें नाना देह धरिसी । तूं एकला राज्य करिसी । मनोवेगें तूं फिरसी । सर्व जाणशील साक्षित्वें ॥" अर्जुनास असे योग्य मार्गदर्शन करीत गर्ग मुनींनी त्याला भगवान दत्तात्रेयांना शरण जाण्यास सांगितले. " जो या ब्रह्माण्डात ' योगीन्द्र ' म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याचे केवळ नाम उच्चारलें असता हा भवसागर सहजच पार होतो, जो योगसामर्थ्याने भक्तांचे सर्वदा रक्षण करतो, ज्याचे त्रिगुणातीत आचरण देवादिकांनाही अनाकलनीय आहे, आणि जो आपल्या भक्तांना इप्सित वर देतो असा स्मर्तृगामी, अत्रि-अनसूया यांचा नंदन श्री दत्तात्रेय यांची तू आराधना कर."
ज्याचें नित्य गंगास्नान । माहूरीं करीं शयन । सह्याद्रीवरी आसन । करी ध्यान गाणगापुरीं ॥
कुरुक्षेत्रीं आचमन । धोपेश्वरीं जाऊन । करी जो भस्मधारण । संध्यावंदन कर्हाडीं ॥
कोल्हापुरीं भिक्षाटन । पांचाळेश्वरीं जाऊन । नित्य करी भोजन । विचित्राचरण जयाचें ॥
पंढरपुरीं जाऊन । नित्य सुगंध लेवून । पश्चिम सागरीं येऊन । करी अर्ध्यदान सायंकाळीं ॥
जो जो करील स्मरण । त्या त्या देई दर्शन । व्यापिलें जेणें त्रिभुवन । असो नमन तच्चरणा ॥
ज्याची लीला ऐकोन । तृप्त होती कान मन । त्याला कोण कां नमन । न करील जनमान्य जो ॥
श्री दत्तप्रभूंची अशी दिनचर्या आणि महती सांगून गर्ग मुनी पुढे म्हणाले, " अर्जुना, पण एक लक्षात ठेव. दत्त महाराजांना प्रसन्न करणे अतिशय दुष्कर आहे. मात्र निर्मळ चित्त असलेल्या भक्तांना ते सहजच प्राप्त होतात. ' तो भक्तीचा भुकेला । भक्ताधीन राहिला । अंतर न देतां भक्तांला ।' अशा त्रिभुवनव्यापी परमात्म्याला मी मनःपूर्वक नमन करतो. ' जो मायाध्यक्ष होऊन । करी जग उत्पन्न ।त्याचें करीं पालन । जो स्वयें उदासीन निगर्व ॥ ब्रह्मरूपें उत्पादक । विष्णुरूपें पालक । रुद्ररूपें संहारक । करी एक तो सर्व ॥' अशा दत्तात्रेयांची कृपा आणि वरदान तुला लाभल्यास तू एकटाच स्वबळावर आपल्या इच्छेनुसार या सप्तद्वीप पृथीवर अधिराज्य करू शकशील. ' तो देईल तुला धृती (धैर्य)। तो देईल नाना शक्ती । भावें करीं त्याची भक्ती । दे जो सन्मती मुक्तिदाता ॥ जें जें मनीं आणसी । योगप्रभावें तें मिळविसी ।' तेव्हा तू सत्वर सह्याद्री पर्वतावर जाऊन दत्तात्रेयांची आराधना कर.
गर्गमुनींचा हा उपदेश ऐकून अर्जुनाने सदगदित होऊन त्यांना वंदन केले आणि त्यांना अतिशय कृतज्ञतापूर्वक स्वरांत म्हणाला, " गुरुवर्य, या राज्याची धुरा सांभाळण्याची योग्यता मला प्राप्त व्हावी, यासाठी आपण मला दत्तप्रभूंच्या भक्तिचा मार्ग दाखविला, हा आपण माझ्यावर मोठाच अनुग्रह केला आहे. श्री दत्तात्रेयांचे अदभूत चरित्र ऐकण्यास मी अतिशय उत्सुक झालो आहे. आता माझी एकच प्रार्थना आहे की आपण मला हे परम पावन दत्तचरित्र सांगावे. इंद्र-जंभासुराची कथा, इंद्राची आराधना मला विस्तृतपणें निवेदन करावी. देवेंद्रावर दत्तप्रभूंनी कशी कृपा केली ?"
' मग मीही करीन । श्रीदत्ताचें सेवन । जेणें होय प्रसन्न । देईल वरदान श्रीदत्त ॥'
क्रमश:
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
करुणात्रिपदी तिसरें पद : जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानंदन पाहि जनार्दन ।।ध्रु.।। निजअपराधें उफराटी दृष्टी । होउनि पोटीं भय धरूं पावन ।।१।। तूं करुणाकर कधीं आम्हांवर । रुसशी न किंकर-वरदकृपाघन। ।२।। वारी अपराध तूं मायबाप । तव मनीं कोपलेश न वामन ।।३।। बालकापराधा गणे जरी माता । तरी कोण त्राता देईल जीवन ।।४।। प्रार्थी वासुदेव पदिं ठेवी भाव । पदीं देवो ठाव देव अत्रिनंदन ।।५।।
मराठी विवरण :- डॉ. वा. व्यं. देशमुख
जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानंदन पाहि जनार्दन ।।ध्रु.।। तिसऱ्या पदात श्री दत्तप्रभूंच्या कोपाच्या स्वरूपाचे विवेचन आहे. सहेतुक विशेषणांनी संबोधून श्रीदत्तप्रभूंच्या कोपाच्या स्वरूपाचे प्रार्थनेला आरंभ केला आहे. ' हे अनसूयानंदना ' या हाकेने दत्तप्रभूंना त्यांच्या मातेचा आठव करून देऊन, जणू त्यांच्या मातृहृदयालाच जागवले आहे. आपण वर्षाव करणारे मेघच आहात. दयेने नुसते ओतप्रोत भरलेलेच आहात असे नाही, तर त्या दयेची, भक्तांवर सहज, अयाचित पखरण करणे हा आपला स्वभावच आहे. असे सूचित केले आहे. कारण आपल्या आश्रित जनांचे आपण जीवनच आहात. आपला विजय असो! आपण सर्व जनांचे अर्दन, शासन करणारे असला तरी आमचे रक्षण करा.
निजअपराधें उफराटी दृष्टी । होउनि पोटीं भय धरूं पावन ।।१।।
ह्या चरणात स्वामीमहाराजांनी एक महत्वाचा सिद्धांत मांडला आहे. भगवंताचा कोप आणि त्यामुळे आम्हाला वाटणारे भय, हा आमच्याच मनाचा खेळ आहे. आमच्याच अपराधांमुळे दूषित झालेल्या आमच्या मनात देवाची भयावह प्रतिमा उमटली आहे. आरशाच्या वक्रतेने जसे प्रतिबिंब विकृत होते, त्याचप्रमाणे आपल्याच चित्ताच्या विकारांनी आम्हाला कृपाळू भगवंत क्रुद्ध भासतो आणि त्याचे भय वाटू लागते. हे चित्तातील प्रतिकूल संस्कार आमच्याच दुष्कर्मांपासून उद्भवतात. वस्तुतः परमेश्वर निराकार, निःसंग , आनंदपूर्ण , शुद्ध चैतन्यघनच आहे. डोळ्यांना कावीळ झाल्यावर जगच पिवळे दिसते किंवा सापाने विष भिनल्यावर कडुलिंब गोडच लागतो, त्याचप्रमाणे आमच्याच पापांनी आमची जाणीव विकृत होते. हेच आमच्या भीतीचे खरे कारण इथे प्रतिपादले आहे.
तूं करुणाकर कधीं आम्हांवर । रुसशी न किंकर-वरदकृपाघन। ।२।।
पहिल्या पदातच सांगितल्याप्रमाणे या अखिलविश्वाचा आणि त्यातील सकल जिवांचा मायबाप परमेश्वरच आहे. तो स्वभावतःच वात्सल्य सिंधू आहे. तो आमच्यावर का आणि कसा रुष्ट होईल? आम्हा दासांचा तोच करुणासागर वरदाता आहे.
वारी अपराध तूं मायबाप । तव मनीं कोपलेश न वामन ।।३।।
' त्वमेव माता च त्वमेव पिता... ' ही प्रार्थना दृढ करून श्रीमहाराज आमच्या अपराधांचा परिहार करण्याचे मागणे मागत आहेत. हे त्रिविक्रम वामना, तुमच्या मनात कोपाचा लवलेश असूच शकत नाही.' वामन ' ह्या संबोधनाची योजना मार्मिक आहे. इंद्राला स्वर्गाचे राज्य परत मिळवून देण्यासाठी वामनावतार झाला. त्यानुसार बलीराजाच्या औदार्याचाच आधार घेऊन त्याला पाताळात घातले. सकृतदर्शनी हा बलीराजावर क्रोध वाटतो, पण त्याला पाताळाचे राज्य तर दिलेच, शिवाय भगवंत स्वतःच त्याचे द्वारपाल होऊन रक्षण करत आहेत आणि भविष्यात त्याला इंद्रपदही देणार आहेत. अशा रीतीने क्वचित देवाचा कोप झाल्यासारखा वाटलं तरी अंतिम तो कल्याणकारीच ठरतो, अशी गर्भीत सूचना यातून दिली आहे.
बालकापराधा गणे जरी माता । तरी कोण त्राता देईल जीवन ।।४।।
आईच्या प्रेमाबद्दल समर्पक दृष्टांत भगवंताच्या कृपेसाठी दुसरा नाही. आईचे मन आपल्या बाळाच्या प्रेमानेच सदैव तुडुंबलेले असते. त्याच्याविषयी इतर कोणत्याही भावाला तिथे वावच नसतो. तिच्या सर्व कृतींचा उगम बाळाचे रक्षण आणि पोषण यासाठीच असतो. ती बाळावर रागावेल, ओरडेल , अगदी त्याला मारीलही; पण त्यात बाळाची सुरक्षा आणि संवर्धन हाच उद्देश असतो. ह्या तिच्या आंतरिक प्रेमात बाळाकडून कसली अपेक्षा तर नसतेच: पण त्याच्या अपराधांचा त्या प्रेमावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. त्या बाळाला त्याच्या अपराधाच्या शासनाचा किंवा कोणत्याही प्रकारे त्याला दुखवण्याचा विचारही तिच्या मनात येऊ शकत नाही. बाळ आईच्या मांडीवर, रडत, भेकत , लाथाही मारीत असते, पण ती मात्र त्याला शांत करून आपले स्तन त्याच्या मुखात घालण्याचाच प्रयत्न करीत असते. परमेश्वराचेही आम्हा बाळगोपाळांवर असेच निर्हेतुक प्रेम असते. 'दत्तमाऊलीने जर आमच्या अपराधांचा खेद मानला, तर आम्हाला दयास्तन्याने बुझविणारा दुसरा कोण आहे?' एकीकडे ह्या सत्याकडे देवाचे लक्ष वेधत असताना दुसरीकडे श्रीस्वामीमहाराज आम्हाला देवाच्या कारुण्याला कसे आवाहन करावे याची शिकवण देत आहेत.
प्रार्थी वासुदेव पदिं ठेवी भाव । पदीं देवो ठाव देव अत्रिनंदन ।।५।। आतापर्यंत या तीन पदांतून श्रीस्वामीमहाराजांनी भक्तिमार्गाचे उध्वोधन केले आहे. पहिल्या पदात अनन्य होऊन श्रीदत्तप्रभूंची भक्ती करावी, सर्व प्रापंचिक भार त्यांच्यावर घालावा, म्हणजे ते सर्वोतोपरी सांभाळ करून आपल्याला मोक्षमार्गावर प्रगत करतात, असा उपदेश केला. दुसऱ्या पदात त्यांच्या लीलांचे स्मरण, कीर्तन, श्रवण यांच्या द्वारा चित्तशुद्धी करून आपली श्रद्धा दृढतर करायला सांगितली. तिसऱ्या पदात श्रीदत्तप्रभूंच्या सच्चिदानंदस्वरूपातील परमप्रेमस्वरूपाचे प्रतिपादन केले आहे. आता या समारोपाच्या चरणात भक्तिमार्गाची जणू फलश्रुतीच सांगितली आहे. संत ज्ञानेश्वरमहाराजांनी भक्तीचे उद्दिष्ट भगवंताच्या 'अव्यंग धामाची प्राप्ती' असे सांगितले आहे. ('तरि झडझडोनि वहिला निघ I इथे भक्तिचिये वाटे लाग I जिया पावसी अव्यंग I निजधाम माझें II' ९.५१६) नाममुद्रेने अंकित केलेल्या या चरणात श्रीदत्तचरणीं भक्तिभाव व्यक्त केला आहे. आतापर्यंत मांडलेल्या भक्तिमार्गाचा तो निर्देश आहे. तो निर्देश करून आपल्याला दत्तपदी ठाव मागितला आहे. यातील पहिले 'पद' साधनरूप श्रीदत्तचरण आहेत तर दुसरे पद हे भगवद्गीतेत प्रतिपादले अव्यय पद (गच्छन्त्यमूढा: पदअव्ययं तत् II १५.५) आहे. सर्व वेद ज्या पदाचा उद्घोष करतात (सर्वे वेदा यतपदमामनन्ति II कठ उ. १ .२.१५ ) ते सच्चिदानंदपद श्रीस्वामीमहाराजांना इथे अभिप्रेत आहे. त्यांनी आपल्या वेदनिवेदनिस्तोत्रात याचा उहापोह केलेला आहे, तो जिज्ञासूंनी मुळातच पाहावा. अत्रिनंदन परमात्म्याकडे त्याच्या पदाच्या प्राप्तीची याचना केली आहे. यात परमात्मा आणि त्याचे पद या दोन वस्तू नाहीत. याला राहू आणि त्याचे शीर यांचा दृष्टांत दिला आहे. राहुला केवळ शिरच असते. तो जसा त्या शिरापासून अभिन्न असतो तसेच परमात्मा आणि त्याचे पद अभिन्न आहेत. ते पद प्राप्त होणे म्हणजेच आत्मस्वरूपाशी एकत्व पावणे. हेच मागणे मागून श्रीस्वामीमहाराजांनी या 'करुणात्रिपदी' चा उपसंहार केला आहे. यथाशक्ती, यथामती केलेली ही वाक्-सेवा श्रीगुरुचरणी समर्पित असो.
मूळ स्तोत्र : प. प श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित करुणात्रिपदी संदर्भ - श्री वासुदेव निवास, पुणे
॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
गुरुअनुग्रह :
अनसूयात्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबर: ।
स्मृर्तगामी स्वभक्तानामुद्धर्ता भव संकटात् ॥१॥
दारिद्र्यनिवारण :
दरिद्रविप्रगेहे यः शाकं भुक्त्वोत्तमश्रियम् ।
ददौ श्रीदत्तदेवः स दारिद्रयाच्छ्रीप्रदोSवतु ॥२॥
संतानप्राप्ती :
दूरिकृत्यपिशाचार्तिम् जीवयित्वा मृत सुतम् ।
योSभूदभीष्टदः पातु स नः संतानवृध्दिकृत् ॥३॥
सौभाग्य : जीवयामास भर्तारं मृतं सत्या हि मृत्युहा । मृत्युञ्जय: स योगींद्रः सौभाग्यम् मे प्रयच्छतु ॥४॥ ऋणविमुक्ती : अत्रेरात्मप्रदानेन यो मुक्तो भगवानृणात् । दत्तात्रेयं तमीशानं नमामि ऋणमुक्तये ॥५॥
सर्वपापनिवारण :
जपेच्छ्लोकमिमं देवपित्रर्षिपुंनृणापहं ।
सोSनृणो दत्तकृपया परंब्रह्माधिगच्छति ॥६॥
अत्रिपुत्रो महातेजा दत्तात्रेयो महामुनि: ।
तस्य स्मरणमात्रेण सर्वपापै: प्रमुच्चते ॥७॥
सर्व बाधा मुक्ती : नमस्ते भगवन्देव दत्तात्रेय जगत्प्रभो । सर्वबाधाप्रशमनं कुरु शांतिं प्रयच्छ मे ॥८॥ असाध्यव्याधी मुक्ती : नमस्ते भगवन्देव दत्तात्रेय जगत्प्रभो । सर्वरोगा प्रशमनं कुरु शांतिं प्रयच्छ मे ॥९॥ श्री दत्त अनुग्रह : अनुसूयासुत श्रीश जनपातकनाशन । दिगंबरं नमो नित्यं तुभ्यं मे वरदो भव ॥१०॥ श्री विष्णोरवतारोSयं दत्तात्रेयो दिगंबर : । मालाकमण्डलूच्छूलडमरूशंखचक्रधृक् ॥११॥ विद्याप्राप्ती : नमस्ते शारदे देवि सरस्वति मतिप्रदे । वस त्वं मम जिव्हाग्रे सर्वविद्याप्रदा भव ॥१२॥ दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबंधुं मुकुंदम् । नैर्गुण्यं संनिविष्टं पथि परमपदं बोधयंतं मुनीनाम ।। भस्माभ्यंगं जटाभि: सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरुपं । सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्-गुरुं चारूशीलम् ॥१३॥
॥ इति श्री प. प. श्री वासुदेवानंदसरस्वतीविरचिता: मंत्रश्लोका: ॥