॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीराम समर्थ ॥
हृदयीं वेदगर्भ विलसे l मुखीं सरस्वती विलासे l साहित्य बोलता जैसे l भासती देवगुरु l शांति दया क्षमाशील l पवित्र आणि सत्त्वशील l अंतरशुद्ध ज्ञानशील l ईश्वरीपुरुष ॥ ( श्रीमत दासबोध )
श्रीसमर्थ रामदास स्वामीनीं श्रीमत दासबोधात केलेले हे ईश्वरीपुरुषाचे वर्णन वाचतांना श्री प. प. सद्गुरू श्रीधरस्वामी महाराजांचेच स्मरण होते. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यांत देगलूर नामक तालुक्याचे गांव आहे. तिथल्याच पतकी या देशस्थ ऋग्वेदी कुटुंबात श्रीधरस्वामींचा जन्म झाला. नारायणराव आणि कमलाबाई या सुशील दाम्पत्यांस तीन अपत्यें झाली. तथापि, त्यांच्या कुलोपाध्यायानें ' पतकी ' घराण्यास सर्पशाप असून लवकरच हे घराणे निर्वंश होईल, असे भविष्य वर्तविले. तसेच, वंशोद्धारासाठी श्री क्षेत्र गाणगापूर येथे जाऊन श्री दत्तात्रेयांचे अनुष्ठान करावे, असे सांगितले. तदनुसार, नारायणरावांनी सहकुटुंब गाणगापुरास जाऊन श्री दत्तप्रभूंची कठोर उपासना केली. त्याचेच, फलस्वरूप म्हणून ' मी स्वतः अंशरूपानें तुमच्या वंशात जन्म घेईन.' असा श्री दत्त महाराजांचा नारायणरावांस दृष्टांत झाला आणि १९०८ साली मार्गशीर्ष पौर्णिमेस श्री दत्तजयंतीच्या शुभदिनीं श्रीधरस्वामींचा जन्म झाला.
यथावकाश, श्रीधर स्वामींनी श्रीसमर्थ रामदास यांच्या प्रतिमेसमोर त्रयोदशाक्षरी श्रीराम या दिव्य मंत्राचा अनुग्रह घेतला आणि श्रीक्षेत्र सज्जनगड येथे तपश्चर्या केली. शके १८५१च्या श्रीदासनवमी उत्सवांत श्रीधर श्रीसमर्थ चिंतन करीत असतांना त्यांना श्री रामदास स्वामींचे दिव्य दर्शन झाले. त्यावेळीं श्रीसमर्थांनी त्यांना ' दक्षिणेकडे धर्मप्रचारार्थ भ्रमण करावे. ' अशी आज्ञा केली. गुरुवचनांचे श्रीधर स्वामींनी पालन केले. त्यांनी रचलेली विपुल वाङ्मय संपदा, श्री स्वामींची प्रवचने, आणि त्यांचे चरित्रग्रंथ आता भाविकांसाठी उपलब्ध आहे.
श्री प. प. सद्गुरू श्रीधरस्वामी यांचा दिव्य मंत्र :
नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरुपिणे । स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः ॥
श्री श्रीधर स्वामींची वाङ्मय संपदा

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.